✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

इंटरव्हेन्शन

र
राजेश घासकडवी यांनी
Sat, 06/02/2012 - 08:33  ·  लेख
लेख
बरेच लोक दारू पितात. दारू पिण्यात काहीच गैर नाही. मित्रांबरोबर दोनचार पेग घेतले, थोडी दंगामस्ती केली, अधूनमधून जरा जास्त देखील घेतली. आपणही कधी कधी असं करतो. प्रत्येकाचीच एक मर्यादा असते. बहुतांश वेळी बहुतेक लोक त्या रेषेच्या आत रहातात. कधी कधी एखादवेळी ती ओलांडलीही जाते. असं चालतंच. 'काहीतरी यडपटासारखं बरळेल. मग थोड्या वेळाने उलटी काढेल. उद्या दुखेल प्रचंड डोकं. पण नंतर येईल ताळ्यावर.' हे आपल्याला आपल्या अनेक मित्रांविषयी माहीत असतं. पण एखाद्या कोणाचीतरी कथा थोडी वेगळी व्हायला लागते. मित्रांबरोबरच नव्हे, तर सदासर्वकाळ दारू पिणं सुरू होतं. मैफिलीसाठी दारू न होता दारूसाठी मैफिली होतात. आणि नाहीत मैफिली तर नाहीत, पण दारू हवी. दारू हीच मैफील होते. मग तो त्या व्यसनाच्या गर्तेत बुडून जातो. सोन्यासारखं आयुष्य त्या खोल खोल गर्तेत बुडवून टाकतो. आपण त्याला अधूनमधून 'जरा बेताने बरं का' असा सल्ला दिलेला असतो. त्यावर 'अरे काही नाही रे. आपला कंट्रोल आहे.' असं जड जिभेने ऐकलेलंही असतं. आपल्याप्रमाणेच इतर मित्रही अधूनमधून सांगतात. पण सुधारणा होत नाही. आणि अचानक तो एकेकाळी धट्टाकट्टा दिसणारा, रोडावलेला दिसतो. आपण त्याला पुन्हा सांगून बघतो. पण नंतर संबंध तुटतो. आणि काही वर्षांनी अचानक तो दारूपायी गेल्याची बातमी येते. साला काय फास्ट बॉलिंग करायचा... डोळ्यात चमक होती त्याच्या, मी दोन वर्षांपूर्वी पाहिलं तेव्हा सगळी रया गेली होती... मी सांगण्याचा प्रयत्न केला, पण आपण किती करणार? नुसती हळहळ शिल्लक राहाते. दारूचं व्यसन ही फक्त एक प्रकारची गर्ता आहे. इतरही खोल खोल विहिरी, दऱ्या आहेत, ज्यात माणूस हळूहळू खेचला जातो. दलदलीत पाय रुतल्यावर शरीर सावकाश आत आत शिरत जावं तसा. कधी ही दलदल खूप उबदार असते. आत शिरण्याचा मोह आवरत नाही. बाहेरच्या कोरड्या शुष्क जगापेक्षा हीच ओल मनाला भावते. आत जाताना आधी पायांना, मग गुढग्यांना, त्यानंतर कंबरेला अतीव सुखदायक वाटतं. बाहेर पडायची इच्छाच होत नाही. कुठेतरी यात काहीतरी धोका आहे असं वाटत असलं तरी मन सांगत राहातं 'अजून थोडा वेळ. मला हवं तेव्हा मला बाहेर येता येईलच...' हीच खरी धोकादायक परिस्थिती असते. आतमध्ये कुठेतरी घण् घण् घण् धोक्याची घंटा वाजत असते. पण तिच्याकडे लक्ष देण्यापलिकडे कान बधीर झालेले असतात. अशा व्यक्तीकडून 'मला काही प्रॉब्लेम नाही' हे विधान अतिशय ठामपणे येताना दिसतं. अशा गर्तेत बुडताना कधीकधी बाहेरून एखादा प्रचंड धक्का बसतो. आणि मग आत जाण्याचा वेग वाढतो. नोकरी जाणं, प्रेमभंग, प्रिय व्यक्तीचं निधन... अशी कुठचीही गोष्ट परिस्थितीवरचा ताबा घालवायला कारणीभूत ठरू शकते. बुडत्याचा काडीचाही आधार जातो. आणि गटांगळ्या सुरू होतात. बाहेर डोकं काढून हपापल्यासारखा श्वास घ्यायचा... मदतीसाठी हाक मारायची. कधी हे होतं, तर काही वेळा तेही होत नाही. प्रवाहाला शरण जाऊन भोवऱ्यात जाणं होतं. आणि आपण किनाऱ्यावर बसून बघत राहातो. पण अशा वेळी नक्की करायचं तरी काय? 'मी माझ्या मित्राला माझ्या परीने सांगून पाहिलं. उपयोग झाला नाही. याच्यापलिकडे मी काय करणार?' असं म्हणता येतं खरं. पण मी अजून काहीतरी करायला हवं होतं ही मनाला चुकचुक लागून राहाते. इंटरव्हेन्शन हा त्यावरचा एक उपाय आहे. जेव्हा एखाद्या रोग्याला त्याचा रोग इतका वेढून टाकतो की आपल्याला मदत हवी आहे याचीही जाणीव नाहीशी होते तेव्हा ती मदत पुरवण्याची जबाबदारी इतरांवर येते. आपल्या समोर कोणी गाडीखाली येऊन बेशुद्ध पडला असेल तर त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी आपली. 'त्याच्या इच्छेवर अवलंबून राहून तो स्वतःला हवे तेव्हा हवे तसे उपचार करून घेईल', असा विचार करण्याची चैन परवडण्यासारखी नसते. वाहातं रक्त डोळ्यासमोर दिसत नसेल, हात-पाय मोडलेले दिसत नसतील तर प्रत्यक्ष उचलून हॉस्पिटलमध्ये टाकायची गरज तितक्या तीव्रतेने जाणवत नाही. पण मानसिक विकार किंवा व्यसन किंवा दुःख तितक्या पराकोटीला पोचतच नाही असं नाही. जेव्हा ते तसं झालेलं दिसतं तेव्हा तितक्याच तीव्रतेने आपल्याला त्यात सामील व्हावं लागतं. तितकीच जबाबदारी आपल्यावर येऊन पडते. 'तुला मदतीची गरज आहे. आणि ती तू घ्यावीस यासाठी आम्ही पडेल ते करू' असं अनेक मित्र, सुहृद, आप्तेष्ट यांनी एकत्र येऊन सांगणं हा एक मार्ग असतो. यालाच इंटरव्हेन्शन असं म्हणतात. एखादा मित्र जेव्हा कळकळीने सांगतो तेव्हा त्याचा थोडा परिणाम होतो, नाही असं नाही. पण तो कदाचित पुरेसा नसतो. त्याऐवजी जर त्याचे जमतील तितके मित्र, नातेवाईक, त्याच्यावर प्रेम करणारे आणि त्याचं ज्यांच्यावर प्रेम आहे असे सगळेजण एकत्र येऊन त्यांनी ठामपणे सांगितलं तर त्याचा परिणाम त्या व्यक्तीचं जीवन बदलण्यास कारणीभूत ठरू शकतो. मरण टाळण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. विकीपिडियावर http://en.wikipedia.org/wiki/Intervention_%28counseling%29 इंटरव्हेन्शनची व्याख्या अशी दिली आहे An intervention is an orchestrated attempt by one or many, people – usually family and friends – to get someone to seek professional help with an addiction or some kind of traumatic event or crisis, or other serious problem. The term intervention is most often used when the traumatic event involves addiction to drugs or other items. हे घडण्यासाठी त्या व्यक्तीला आडून आडून, गोड शब्दांत सल्ला देण्यापलिकडे जाऊन स्पष्ट, काहीशा कठोर शब्दांतच 'तुला मदतीची गरज आहे असं आम्हा सगळ्यांना वाटतं. ती तू घेण्यासाठी आम्ही पडेल ते करू. ती घेण्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ती घेताना जे अडथळे येतील त्यात आम्ही तुला मदत करू. पण तू ज्या मार्गावरून चालला आहेस त्यात तुझं भलं नाही.' असं सांगण्याची गरज असते. दलदलीत फसत जाणाऱ्याला, त्याच्या मनाविरुद्ध का होईना, दोऱ्या बांधून, सगळ्यांनी मिळून खेचून बाहेर काढण्याचा हा प्रयत्न असतो. या प्रयत्नांत अर्थातच दोरी गळ्याला लागून फास बसणार नाही याची काळजी घ्यायची असतेच - पण दोरी कंबरेला काचून जखमा होतील त्याची काळजी करायची नसते. सर्वसाधारणपणे लेख लिहिताना मी बराच जास्त अभ्यास करतो. पण हा लेख अपुऱ्या माहितीवर लिहितो आहे. तो चांगला झाला आहे की वाईट झाला आहे याची मला पर्वा नाही. हा लेख लिहिण्यामागे मला माझ्या मनातली कळकळ पोचवायची आहे. तुम्हाला तुमच्या आसपास कोणी जर दिसत असेल, ज्यांना मदतीची गरज आहे तर जरूर धावा. तुमचं मन शुद्ध असेल की या माणसाला मी, आम्ही, सगळ्यांनी मदत करण्याची गरज आहे तर कोणाच्या भावनांची कदर करण्याच्या भानगडीत पडू नका. तात्काळ कृती करा. पण एकटे जाऊ नका. शक्य तितके सुहृद, मित्र, आप्तेष्ट, हितचिंतक गोळा करा. आणि सगळ्यांनी मिळून एकदिलाने त्या दलदलीत खचणाऱ्याला त्याच्या मनाविरुद्ध का होईना, बाहेर काढा. नंतर नुसती हळहळ शिल्लक ठेवायची की आत्ताच प्रयत्न करायचा हे आपणच ठरवायचं असतं.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
सल्ला
माहिती
मदत

प्रतिक्रिया द्या
26716 वाचन

💬 प्रतिसाद (94)

प्रतिक्रिया

हा लेख फक्त दारूविषयी नाही हे

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 06/03/2012 - 01:05 नवीन
हा लेख फक्त दारूविषयी नाही हे नविन कळलं.
माऊ ताई, मूळ लेखात खालील वाक्य शोध. त्या पुढचा अख्खा भाग हा जनरल आहे. "दारूचं व्यसन ही फक्त एक प्रकारची गर्ता आहे. इतरही खोल खोल विहिरी, दऱ्या आहेत, ज्यात माणूस हळूहळू खेचला जातो."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

काही उत्तरं

राजेश घासकडवी
Sun, 06/03/2012 - 04:40 नवीन
दारु, सिगरेट शिवाय इतर कुठल्या व्यसनांनी/वागणूकीनी/विचारांनी (?) लिव्हर, फुप्फुस, हृद्य किंवा इतर महत्वाचे अवयव निकामी होतात?
नेमके लिव्हर, फुप्फुस, हृदय हेच निकामी होतील असं नाही. पण खालील प्रकारच्या वागणुकींनी तशीच हानी पोचू शकते. १. जुगार खेळण्याचा नाद - तुमचं शरीर भले या नादापायी बिघडणार नाही, पण आयुष्य उध्वस्त होऊ शकतं. २. डिप्रेशन - ही वागणूक नाही, पण हा रोग जडलेला असेल तर आयुष्यच नकोसं होतं. जाऊन मदत घेण्याची इच्छा देखील नाहीशी होते. अशा वेळी थोड्या गोड शब्दांनी चुचकारून, कधी ठासून सांगून मदत घेण्यासाठी प्रवृत्त करता यावं.
स्वतःची कुठलीही शरीरिक, मानसिक, वैचारिक बैठक बदलण्याची इच्छाच मूळात कुणालाही नसते. ज्यांना असते ते आपापला मार्ग बरोबर शोधतात.
हे तुमचं वैयक्तिक निरीक्षण असावं. प्रस्थापित विज्ञान वेगळं सांगतं. मानसशास्त्र हे भौतिकशास्त्राइतकं तंतोतंत नसलं तरी बऱ्याच लोकांची वागणुक व वैचारिक बैठक एका मर्यादेपर्यंत बदलण्याचं तंत्र आत्मसात केलेलं आहे.
एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीत अडकलेली दिसली तर खरोखरच सांगून त्या व्यक्तीला ते पटते का, याबद्दल मला शंका आहे.
इंटरव्हेन्शनच्या बाबतीत म्हणावं तर या लिंकवर खालीलप्रमाणे म्हटलेलं आहे. ..an informal poll taken at the National Association of Independent Interventionists Conference (AIS) in 1995 revealed that 90% of professionally facilitated interventions resulted in the identified patient entering treatment as a direct result of the intervention. टाइमपाससाठी या धाग्यापेक्षा थोडे कमी गंभीर धागे आहेत - उदाहरणार्थ कुणाला मिपारत्न द्यावे, प्यार्टीसाठी मदत हवी आहे वगैरे. शोधा म्हणजे इतरही सापडतील कदाचित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

प्रकाटाआ

स्वानन्द
Sun, 06/03/2012 - 14:09 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

माझा मुद्दा असा आहे, की

कवितानागेश
Sun, 06/03/2012 - 14:43 नवीन
माझा मुद्दा असा आहे, की मूळातच 'व्यसनी' माणूस हा एकटा पडलेला असतो, आणि हे खूप आधीच कधीतरी होउन मग तो व्यसनांच्या आहारी गेलेला असतो. तिथे त्याच्या आणि व्यसनाच्या मध्ये घुसून कुणी काही सांगू शकेल अशी व्यक्ती फार क्वचित शिल्लक असते. मग ज्या आजूबाजूच्या व्यक्ती शिल्लक आहेत, त्यांच्या सांगण्याचा उपयोग वरवरच्या मलमपट्टी सारखाच होइल. कायमचा होणे कठीण आहे. जोपर्यंत कुठल्यातरी क्षुल्लक वस्तूनी किंवा कृतीनी मिळणारा अशाश्वत आनंद माणसाला महत्त्वाचा वाटतोय, तोपर्यंत कुणीही माणूस कुठल्याही व्यसनाला बळी पडू शकतो. ज्याला एकंदरीत अस्तित्व, आयुष्य व परस्परसंबंध याबद्दल प्रेम आहे, असा मनुष्य घसरत नाही. बाकीची कुणीही कधीही घसरु शकतात. अवांतरः मी टाईमपास करावा यासाठी आग्रह का? मी गंभीरपणेच लिहित आहे. भले ती माझी वैयक्तिक मते आहेत, त्यामुळे 'प्रस्थापित' निष्कर्षांइतकी महत्त्वाची नाहीत. पण यापुढे चर्चा करणार नाही. फक्त 'वा, वा' म्हणेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

हम्म्म्म

परिकथेतील राजकुमार
Mon, 06/04/2012 - 14:23 नवीन
टाइमपाससाठी या धाग्यापेक्षा थोडे कमी गंभीर धागे आहेत - उदाहरणार्थ कुणाला मिपारत्न द्यावे, प्यार्टीसाठी मदत हवी आहे वगैरे.
आपणहून मदत मागणारे धागे टाइमपास आणि कुणी शाट मदत मागीतली नसताना कळफलक बडवून लेख पाडणे म्हणजे गंभीरपणा ? फारच अवघड व्याख्या आहे बॉ. असो..
शोधा म्हणजे इतरही सापडतील कदाचित.
शोधायचे कशाला ? पल्याडच्या 'ऐसी भंकसे' का काय संस्थळावरील १०० पैकी ९९ धागे तसेच असतात की. बाकी श्री. घासकडवी हे सदस्यांना इतरांच्या लेखावरती टाइमपास / अवांतर / भंकस करण्यासाठी उघडपणे उद्युक्त करत आहेत ह्याची संपादक नोंद घेतील काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

इंटरव्हेन्शन

रामदास
Sat, 06/02/2012 - 18:51 नवीन
विषय आवडला. काही विचार पटले. माझे काही प्रयोग यशस्वी झाले आहेत. पण अयशस्वी झालेल्या प्रयोगांची संख्या (वैयक्तिक अनुभवापर्यंत मर्यादीत) जास्त आहेत याचे वाईटही वाटते. पण त्यामुळे इंटरव्हेन्शन करणे बंद करीन / केले आहे असे नाही. ज्या संस्थळावर रहदारी भरपूर आहे तेथे हे लेखन केल्यामुळे जास्तीत जास्त वाचले जाईल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

ज्या संस्थळावर रहदारी भरपूर

राजेश घासकडवी
Sat, 06/02/2012 - 20:26 नवीन
ज्या संस्थळावर रहदारी भरपूर आहे तेथे हे लेखन केल्यामुळे जास्तीत जास्त वाचले जाईल अशी अपेक्षा आहे.
हा लेख मी फक्त मिसळपाववरच का लिहिला आणि आत्ताच का लिहिला याची बहुतेकांना कल्पना असावी. त्याचा रहदारीशी काडीइतका संबंध नाही.
  • Log in or register to post comments

कळले नाही

शुचि
Sat, 06/02/2012 - 22:37 नवीन
काही अघटीत घटले आहे काय मिपा वरील कोण्या सदस्याबाबत? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

काही अघटीत घटले आहे काय मिपा

llपुण्याचे पेशवेll
Sun, 06/03/2012 - 21:01 नवीन
काही अघटीत घटले आहे काय मिपा वरील कोण्या सदस्याबाबत? हो . भारतीय संस्कृतीमधील पुरातन गुरुशिष्य संबंध आणि त्याचे थोडे पैलु एका मिपाकराला अनुभवावयास मिळाल्याने सर्व साठोत्तरी पुरोगामी म्हणवणार्‍याना वैचारीक जुलाब सुरु झाले आहेत अशी आतली बातमी आहे. असो आपले सगळेच चुकीचे असे एक पहील्या धारेच औंषध त्या येशाला दिल्यावर लायनीवर येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

हो . भारतीय संस्कृतीमधील

नाना चेंगट
Mon, 06/04/2012 - 13:12 नवीन
हो . भारतीय संस्कृतीमधील पुरातन गुरुशिष्य संबंध आणि त्याचे थोडे पैलु एका मिपाकराला अनुभवावयास मिळाल्याने सर्व साठोत्तरी पुरोगामी म्हणवणार्‍याना वैचारीक जुलाब सुरु झाले आहेत अशी आतली बातमी आहे. असो आपले सगळेच चुकीचे असे एक पहील्या धारेच औंषध त्या येशाला दिल्यावर लायनीवर येईल. अतिशय नेमके आणि परखड विश्लेषण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

नानाना नाना,घासकडवींना हा

यकु
Mon, 06/04/2012 - 17:02 नवीन
नानाना नाना , घासकडवींना हा मदतीचा लेख लिहिण्याची प्रेरणा कुठून मिळाली हे त्यांना माहित नाही, त्यामुळं त्यांना बिलकुल दोष द्यायला नको. उलट मला हा लेख इथे प्रगटल्यानंतर जो मिळायचा तो संदेश मिळून गेला आहे, वर माझ्या प्रतिसादात माझ्या गुरुंनी घासकडवींमार्फत दिलेला संदेश वेगळा देखील काढला आहे - सो अल्टीमेटली राजेश घासकडवी इज ए गुड मॅन. घासकडवींना 'चेतना', 'जाणीव'वगैरेबद्दल खोलवर काहीही माहिती नसतानाही
कधी ही दलदल खूप उबदार असते. आत शिरण्याचा मोह आवरत नाही. बाहेरच्या कोरड्या शुष्क जगापेक्षा हीच ओल मनाला भावते. आत जाताना आधी पायांना, मग गुढग्यांना, त्यानंतर कंबरेला अतीव सुखदायक वाटतं. बाहेर पडायची इच्छाच होत नाही. कुठेतरी यात काहीतरी धोका आहे असं वाटत असलं तरी मन सांगत राहातं 'अजून थोडा वेळ. मला हवं तेव्हा मला बाहेर येता येईलच...' हीच खरी धोकादायक परिस्थिती असते. आतमध्ये कुठेतरी घण् घण् घण् धोक्याची घंटा वाजत असते.
हे त्यांच्यात लेखात कसं आलं? वर जे कोट केलंय त्याचे घासकडवींचे रेफरन्स पॉइंट काय असतील ते असो, पण माझे आणि माझ्या गुरुंचे वेगळे होते. पायांना, गुढघ्यांना आणि कंबरेला अतीव सुखदायक वाटतं हे उर्ध्वरेतनाशी संबंधीत आहे, मी ते करुन पहात होतो आणि ते होत नव्हतं तेव्हा मी पियूशाच्या कोड्याचं उत्तर लिहित असतानाच मी गुरुंना साद घातली, त्या माझ्या प्रतिसादाचा वेळ आणि घासकडवींचा हा लेख प्रकाशित होण्याचा वेळ ताडून पहा - फार अंतर असणार नाही, चेतना एक आहे आणि सिद्ध पुरुषांना ती हवी त्या व्यक्तीमध्‍ये त्या व्यक्तीला नेमकं काय चाललंय हे न कळू देताही ऑपरेट करता येते. सिद्धपुरुष अर्थातच आमचे गुरुदेव नवरत्न नाथ, एवढे सिद्ध की त्यांनी शिष्याला (म्हणजे मला) दोन स्थूल देहांमुळे समजून घ्‍यायला अवघड जातंय म्हणून देह देखील सोडला, आता हा देहच त्यांचा देह.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

गैरसमज नसावा

राजेश घासकडवी
Mon, 06/04/2012 - 20:42 नवीन
पुपे, तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेताय असं दिसतंय. आम्ही भारतीय संस्कृतीचे खंदे समर्थक आहोत. किंबहुना काही महिन्यांपूर्वी कोणी कवयित्रीने वटपौर्णिमेसारख्या परमपूज्य प्रथेची निंदा केली तेव्हा त्यांना जाब विचारणारा लेख आम्हीच लिहिला होता. तो तुम्ही वाचलेला दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

बहुतेकांना कल्पना असावी.

रामदास
Sat, 06/02/2012 - 21:40 नवीन
का असावी ?
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो.

आनंदी गोपाळ
Sat, 06/02/2012 - 23:40 नवीन
पण हा लेख अपुऱ्या माहितीवर लिहितो आहे.
असे आपणच म्हटला आहात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

अस काय करता काका आज सुट्टीचा

निनाद मुक्काम …
Sun, 06/03/2012 - 13:51 नवीन
अस काय करता काका आज सुट्टीचा दिवस आहे तेव्हा गुर्जी ना वाटले आपल्या लेखाचे प्रयोजन ज्यांना माहित आहे त्यांच्यासाठी हा लेख आणि ज्यांना ह्या लेखामागील कळकळ व तगमग कोणासाठी आहे हे जाणून घेण्याची जिज्ञासा असेल तर सुट्टीचा अमुल्य दिवस खर्ची करून दोन चार खरडी व ३ चार व्यनी केले किंवा दूरध्वनी चा अथवा चेपू चा सुयोग्य उपयोग केला तर लेख कोणासाठी व आतच का लिहिला आहे ह्यामागील कारण कळेल. आणि ते कळले कि मला देखील कळवा. दिवसभर नुसती पावसाची रिपरिप चालू आहे. रविवार फुकट गेल्यात जमा आहे. ठराविक व्यक्तीसाठी हा लेख असेल तर व्यनी किंवा खर्डी चा उपयोग साधता आला असता. पण सत्यमेव जयतेचा बहुतेक परिणाम असावा म्हणून त्या निमित्ताने समाजप्रबोधन केले असावे. त्यात तुम्ही आम्ही सर्वांनी खारीचा वाटा उचलला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

अल्कोहोलिझम-- मद्यपाश -

अत्रुप्त आत्मा
Sat, 06/02/2012 - 22:33 नवीन
अल्कोहोलिझम-- मद्यपाश - आजाराची माहिती http://www.ncbi.nlm.nih.gov/pubmedhealth/PMH0001940/ http://en.wikipedia.org/wiki/Alcoholism http://www.medicalnewstoday.com/articles/157163.php अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस--- बेवड्यांची आखरी अदालत- ए.ए. ए.ए. पुणे शाखा--- http://www.aagsoindia.org/pune.htm ए.ए. ची इतर माहिती--- http://www.aa.org/lang/en/subpage.cfm http://www.aa.org/?Media=PlayFlash बेवड्यांचा बेवड्यांनी मद्यमुक्तिसाठी शोधलेला एकमेव इलाज ए.ए. च्या मिटिंग,म्हणजेच--- अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस :-)
  • Log in or register to post comments

राजेश, कृतज्ञता नसणं हा मूळ प्रश्न आहे

संजय क्षीरसागर
Sun, 06/03/2012 - 10:53 नवीन
ओशोंच एक प्रसिद्ध वाक्य आहे: `सलाह दुनियाकी सबसे जादा दी जानेवाली और सबसे कम ली जानेवाली चीज है' याचं कारण असंय की जोपर्यंत बाधित व्यक्तीचा स्वत:चा काही स्टेक नाही तोपर्यंत मोफत इंटरवेनशनचा काही उपयोग नाही. स्वत:ला परिस्थितीतनं मार्ग काढायचा असेल तेव्हाच संबधित व्यक्तीचा इनिशिएटिव असतो, इतरांच्या सदिच्छा काही काम करत नाहीत. तुमच्या ओरिजिनल लिंकमधे पण `प्रोफेशनल हेल्प' असा शब्द आहे. फार सिरियस गोष्टी सोडा, साधं इंटरनेटचं बघा, नुसते प्रश्न मंडले जातात, बाकीचे सदस्य आपुलकीनं प्रतिसाद देतात पण एकही सदस्य पुढे काय झालं, उपयोग झाला की नाही याविषयी एक ओळ देखील लिहित नाही (आणि त्याला काही खर्च नसताना !) माझा तर आगदी दोन दिवसापूर्वीचा अनुभव आहे, तुमचं यावर काय म्हणणय?
  • Log in or register to post comments

दारू पिणे ही आवड तर पाजणे हा

निनाद मुक्काम …
Sun, 06/03/2012 - 11:09 नवीन
दारू पिणे ही आवड तर पाजणे हा एकेकाळी आमच्या चरितार्थाचा भाग होता. म्हणून ह्याविषयावर हक्काने थोडेसे खरडतो.( एरवी सुद्धा खरडतो ......) एखादा माणूस दारू चे आचमन करत असेल तर अनुभवाने आम्ही (पाजणारे ) हा दारू पितोय का दारू ह्याला पीत आहे हे सांगू शकतो. येथे दारूला उगाच बदनाम करण्यात येत आहे. असे माझे स्पष्ट मत आहे. दारू हे केवळ एक निमित्त असते. मुळात व्यसनाधीन माणूस कोणत्याही व्यसनाच्या आधीन होण्याआधी त्यांच्या मानसिक दृष्ट्या कुठेतरी जबरदस्त कंपूवत असतो. कारणे जगात अनेक असतात पण त्या कारणांना वास्तविक आयुष्यात तोंड देणे विविध कारणास्तव शक्य झाले नाही. किंवा तोंड देण्याची मानसिकता नसेल तर मग आपले शरीर एखादे मृगजळ शोधते. मग त्यासाठी वास्तविक जगातील एखादे व्यसन उदा दारू हि त्या इसमास खर्या आयुष्यातून एखाद्या मोहमयी जादुई दुनियेत नेऊन ठेवते. तेथे मिळणारा क्षणिक आनंद व त्यात दुनियेत चालणारी आपली अधिसत्ता त्या दुनियेत आपल्याला सारखे रमण्यास प्रवृत्त करते ह्यालाच मग व्यसन लागणे असे म्हणतात. माझ्या पाहण्यात अनेक लोक आयुष्यात काहीतरी मोटीव. लक्ष्य ,उदिष्टाचा अभाव असल्याने दारूच्या आहारी नोकरी झाल्यावर संध्याकाळी काय करायचे ह्या विवंचनेत जातात. दारूचे काय किंवा अमली पदार्थांचे काय व्यसन हे केव्हाही वाईट. दारूपेक्षा सिगरेट चे व्यसन केव्हाही वाईट. हे व्यसन कुठेही सार्वजनिक जागी भागवता येत असल्याने ते लवकर लागते.दारू शिवाय एकादी व्यक्ती दिवसभर राहू शकते. मात्र सिगारेट पिणारी साधी व्यक्ती दिवसातून एकदा सुद्धा सिगारेट मिळाली नाही तर ...... कितीतरी माझ्या माहितीत असणारे सज्जन सिगारेट प्यायल्या शिवाय सकाळी संडास सुद्धा करू शकत नाही. माझ्या आयुष्यात आभासी जगत आणि त्यातील संस्थळ आल्यामुळे इतर कोणत्याही गोष्टी करण्यात फुरसत मिळत नाही. घराची कामे व त्यातून मिळालेल्या वेळात ह्या जगतात वाचन ,लिखाण करायला फुरसत नसते- एखाद्या दारूच्या व्यसनी माणसाने मिपावर एखाद्या कंपूशी पंगा घ्यावा मग कसा तो सतत आपले व्यनी किंवा आपल्या खरडी किंवा एखादे लेख त्यावरील प्रतिसाद किंवा स्वतःचे लेख त्यावरील प्रतिसाद ह्यावर व्यसन जडल्या सारखा जखडून जातो. सुरवातीला मला मिपाचे व्यसन म्हणावे इतके व्यसन लागले होते. मग मी काही दिवस दारूच्या आहारी गेलो आणि आता मद्य व मिपा असे दोन्ही मकारांमधील संतुलन सांभाळून जगत आहे. जय( मद्य मिपा )
  • Log in or register to post comments

मुळात व्यसनाधीन माणूस

llपुण्याचे पेशवेll
Sun, 06/03/2012 - 21:03 नवीन
मुळात व्यसनाधीन माणूस कोणत्याही व्यसनाच्या आधीन होण्याआधी त्यांच्या मानसिक दृष्ट्या कुठेतरी जबरदस्त कंपूवत असतो. तुम्हाला कंपूचा लईच तिटकारा बॉ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

माफ करा जरा शब्दांशी खेळलो

निनाद मुक्काम …
Sun, 06/03/2012 - 22:55 नवीन
माफ करा जरा शब्दांशी खेळलो हा द्वयर्थी शब्द असून तुम्ही म्हणता तसे दोन्ही अर्थ येथे अपेक्षित आहेत: म्हणजे दुबळा ह्या अर्थाने सुद्धा आणि आणि दारू पिण्यासाठी माणसाला सुरवातीला आवश्यक असतो तो म्हणजे दारू पिणाऱ्या मंडळींचा कंपू ह्या अर्थी कंपू असलेला :::: कारण एखादा निर्व्यसनी माणूस सुरवातील ह्या घोळक्यात आपल्या भाषेत वाचनमात्र असतो: मग हळूहळू ट्राय कर ; अरे होईल सवय अश्या वाक्यांनी एकच प्याल्याची सुरवात होते:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

हम्म

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 06/03/2012 - 15:49 नवीन
>>>>> हा लेख लिहिण्यामागे मला माझ्या मनातली कळकळ पोचवायची आहे. कळकळ जवळ जवळ पोहचली आहे. >>>>>>>तुम्हाला तुमच्या आसपास कोणी जर दिसत असेल, मला माझ्या आजूबाजूला असं कोणीही दिसत नाही. विनाकारण कोणाच्या आयुष्यात कोणत्याही अधिकारिक विदांशिवाय कोणत्याही किरकोळ गोष्टीवरुन एखादा व्यक्ती मला व्यसनी- आजारी वाटते अशा गोष्टींमधे कोणी कितीही जवळचा असला तरी कोणी मत विचारल्याशिवाय आणि मी एखाद्याच्या आयुष्यात माझ्या सल्ल्याने खरंच काही बदल होऊ शकतो अशी खात्री वाटली तर मी एखाद्याला सल्ला देईन, नसता कोणाच्या आयुष्यात मला दखल देणे गरजेचे वाटत नाही. तसंही कोणाच्याही सल्ल्याला काहीच किंमत नसते असं माझं मत आहे. जालावरील अशी प्रबोधन किती प्रामाणिक असतात त्यावर विश्वास नसल्यामुळे (आपल्याबद्दल नाही) अशा मताला-विचारांना काहीच किंमत नसते. '' स्वतःची कुठलीही शारीरिक, मानसिक , वैचारिक बैठक बदलण्याची इच्छाच मूळात कुणालाही नसते. ज्यांना असते ते आपापला मार्ग बरोबर शोधतात. अस कुणाचाही सल्ला वगरै ऐकत बसत नाहीत. लीमाउजेट च्या वरील दोन ओळीतून बरंच काही सांगितल्या गेलं आहे. दारु या व्यसनाच्या निमित्तानं लेखनातला पूर्वार्ध एकदम उत्तम होता पण पुढे तो घसरल्यासारखा वाटतो. आता हे असं का वाटतं हे मला कोणी कितीही खोदून खोदून विचारलं तरी ते मला कोणालाही सांगायचं नाही. मेरी मर्जी. बाकी, चालू द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

प्रयत्न करणे आपल्या हाती...

प्रभाकर पेठकर
Sun, 06/03/2012 - 17:13 नवीन
लेखातील आदर्शवादी विचार आणि उदात्त हेतू मनाला पटतो पण प्रत्यक्षात कितपत अमलात आणता येईल ह्या बद्दल साशंकता आहे. माणसे दोन प्रकारात जर विभागली, १) त्रयस्थाच्या दृष्टीकोनातून विचार करू शकणारी आणि २) स्वतःच्याच विचारात वाहून जाणारी तर पहिल्या प्रकारातील माणसे शक्यतो व्यसनाच्या आहारी जात नाहीत पण काही तात्कालिक कारणाने (जसे कोणा प्रिय व्यक्तिचा मृत्यू, व्यावसायिक अपयश तसेच अपरंपार यश, इप्सित ध्येयप्राप्ती इ.इ.) जरी व्यसनाकडे झुकली तरी त्यांचे योग्य ते समुपदेशन करून त्यांना पुन्हा मार्गावर आणता येते. पण दुसर्‍या प्रकारातील व्यक्ती स्वतःच्याच विचारांमध्ये वाहून जायच्या प्रवृत्तीच्या असल्याने दूसर्‍यांच्या विचारांना त्यांच्या जीवनात काही महत्त्व नसते. त्या आपल्या कृतीचे सोयिस्कर असे समर्थन शोधून स्वतःच्या व्यसनाला गोंजारत बसतात. अशी माणसे कोणाच्या सल्ल्याने (अगदी डॉक्टरच्याही) बदलत नाहीत तर व्यसनातून उद्भवणार्‍या शारीरिक क्लेषांना झाकण्यासाठी पुन्हा व्यसानाचाच आधार घेतात. ते स्वतःला जगापासून वेगळे करतात. त्यांची सुटका फक्त मृत्यूच करू शकतो. अशी माणसेही व्यसनमुक्त होऊ शकतात. पण फार फार विरळा. त्यांची स्वतःची योग्य विचार करण्याची यंत्रणा सुरू झाली (चमत्कार), आपलं चुकतंय हे जाणवलं आणि चुक सुधारण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली तर आणि तरच अशी माणसे व्यसनमुक्त होऊ शकतात. पण पुन्हा, तीही स्वतःच्या विचारांनी. कोणाच्या सल्ल्याने नाही. स्वभावावर औषध नाही असे म्हणतात.'चिंता' आणि 'संशयाचे भूत' ह्या दोन मानसिक व्याधीही कुटुंबाचा सत्यानाश करू शकतात. ह्यासाठीही त्यांची स्वतःची योग्य विचार करण्याची यंत्रणा सुरू झाली (चमत्कार), आपलं चुकतंय हे जाणवलं आणि चुक सुधारण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली तर आणि तरच ती बदलू शकतात. मानसोपचार तज्ज्ञ कदाचित मदत करू शकत असतीलही. पण त्यासाठी मानसोपचार तज्ज्ञाची भेट घेणं, औषधोपचार करून घेणं ह्यासाठी मानसिक तयारी त्या 'रुग्णा'लाच करावी लागते. त्यासाठी आपण 'रुग्ण' आहोत हे स्विकारावे लागते. तेच स्विकारले नाही तर बाहेरचे सल्ले फोल ठरतात उलट 'मला वेडा समजतात' ह्या विचारांनी माणूस अजून कोषात जाऊन इतरांशी त्याचा संवाद संपर्क तुटतो. मनाला महासागराची उपमा दिली आहे. त्याच्या तळाशी काय चाललेलं असतं ते कधी कधी त्या व्यक्तिलाही कळत नाही. महासागरात मोती असतात तसेच अक्राळ विक्राळ जलचर प्राणीही असतात. त्याप्रमाणेच मनांत दडलेले स्वभाव सौंदर्याचे नमुने असतात तसेच अनेक जीवघेण्या व्याधीही असतात. कधी उपाय करता येतात तर कधी कधी त्या व्याधी त्या व्यक्तीला संपवून टाकतात. इतरांच्या हाती त्या व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न करणं एवढंच असतं. तो प्रयत्न आपण नेहमीच करत असतो.
  • Log in or register to post comments

वा काका..

वाटाड्या...
Mon, 06/04/2012 - 22:04 नवीन
फारच छान..अगदी मनातलं बोल्लात...पण शेवटी एकच म्हणावसं वाटतय...उम्मेद पे दुनिया कायम है..शेवटी व्यसन कुठलंही( काही अपवाद वगळतां) वाईटच...पण कोणाला त्यातुन बाहेर काढण्याची हौस सोडु नये... - वाट्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

चांगला प्रतिसाद.

शुचि
Tue, 06/05/2012 - 20:41 नवीन
चांगला प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

चिंता

मन१
Sun, 06/03/2012 - 19:45 नवीन
चिंता पोचली. स्पष्ट लिहिल्याबद्दल कौतुक वाटलं.
  • Log in or register to post comments

दारू पिणे आणि त्याचे व्यसन

निनाद मुक्काम …
Sun, 06/03/2012 - 20:18 नवीन
दारू पिणे आणि त्याचे व्यसन असणे ह्यातही दोन प्रकार आहेत मान्य की दारू नियमितपणे पोटभरून पिणे हे शरीराला अपायकारक आहे. पण समाजातील प्रतिष्टीत मंडळी अगदी सिनेजगतातील अनेक मान्यवर अनेक वर्ष दारूची साथ लाभून सुद्धा आपल्या सामाजिक आर्थिक व व आरोग्याची स्थिती संभाळून समाजात वावरत असतात. तर एखद्या गरीब गरीब घरातील मनुष्य परिस्थितीला हार जाऊन दारूला शरण जातो. त्याचा मात्र दारू निकाल लावते. दारू आपण कोणत्या उद्देशाने आणि कशी पीत आहोत ह्यावर सुद्धा बरेच काही अवलंबून असते. उदा सिने सृष्टीतील कुत्ते कमीने असे पडद्यावर म्हणणारा ७० वर्षीय तरणाबांड म्हातारा आजही मदिरा नित्यनियमाने भरपेट पितो. मात्र कसरत व आहार व जीवनाकडे व दारूकडे पाहण्याचा निकोप दृष्टीकोन त्याला अजूनही ह्या वयात गब्रू जवान ठेवतात. आपला आहार व शारीरिक व्यायाम असेल तर दारू शरीराला सोसते. नियमित पिणाऱ्या लोकांचे सामाजिक , सार्वजनिक जीवन पाहून माझे हे मत बनले आहे. पण दारू कडे आयुष्याकडे पळवाट किंवा निराशावादी जीवनाला दारूची साथ लाभली की दारू ही गरज बनते. माणूस दारू पितो इथपर्यंत ठीक आहे पण दारूने माणसाला प्यायला सुरवात केली की आयुष्य खडतर बनते. चाळ नावाची वाचाळ वस्ती मध्ये चंदू पारखी ची दारू सोडवण्यासाठी सर्व चाळकरी माणसे त्यांच्या आयुष्यात इंटरव्हेन्शन करतात. आणि त्याची दारू सुटते. भारतीय समाज हा जास्त एकसंघ व कुटुंब प्रधान व समाजाला विशेतः आपल्या कम्युनिटी मधील लोक काय विचार करतील ह्याचा विचार करून आपले सामाजिक वर्तन ठरवतो. उदा मुलाने शिक्षण कोणते घ्यावे असे अनेक निर्णय तो आपल्या कम्युनिटी चा ट्रेंड पाहून ठरवतो. तेव्हा दारू पिण्याच्या समस्येवर गुर्जीचा उपाय निदान भारतात तरी चांगाच कारगीर ठरेल सोनाराने कान टोचलेले चांगले असतात भारतात काय नि मिपावर सोनारांना तोटा नाही. वानगीदाखल यक्कू ला पहा त्याच्या गुप्तकाशी च्या धाग्यावर त्याचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कितीतरी सोनारांनी कान टोचले आहेत.
  • Log in or register to post comments

उत्तम लेख.......

अमितसांगली
Mon, 06/04/2012 - 10:19 नवीन
व्यसनांच्या आहारी गेलेल्यांसाठी उपाय - विश्रांतवाडी पुणे येथे 'मुक्तांगण' व्यसनमुक्ती केंद्र आहे. तिथे आपलेपणाने सिगरेट, दारू, ड्रग्ज ते इंटरनेट अशा सर्व प्रकारच्या व्यसनांवर उपचार केला जातो. पण या संपूर्ण प्रोसेस मध्ये रूग्णाची व्यसन सोडायची इच्छाशक्ती खूप महत्वाची असते........अधिक माहितीसाठी मोदक यांना व्यनी करा.
  • Log in or register to post comments

दारु

मन१
Mon, 06/04/2012 - 16:31 नवीन
काहिंना दारु न पिण्याचही व्यसन असतं की काय?
  • Log in or register to post comments

लेख पावला.

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 06/04/2012 - 20:38 नवीन
गुर्जी, कळकळ पोहोचली. फायदा किती होईल हे माहित नाही. पण लेख लिहीला नसतास तर फायदा होण्याची शक्यताही शून्याच्या जवळ जाते.
  • Log in or register to post comments

विकीपिडीत रडारड

सुहास..
Fri, 06/08/2012 - 15:02 नवीन
विकीपिडीत रडारड ;)
  • Log in or register to post comments

"यकुला वेळीच मदत मिळाली असती

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 11/19/2012 - 21:18 नवीन
"यकुला वेळीच मदत मिळाली असती तर..." असा विचार आजचा संपूर्ण दिवस खाणार. एक आयुष्य अकाली संपलं.
  • Log in or register to post comments

हे खरं आहे. पण आपण बरेचजण

रेवती
Mon, 11/19/2012 - 21:22 नवीन
हे खरं आहे. पण आपण बरेचजण एकमेकांना जालावरच ओळखत असतो म्हणून सहसा पोहोचण्याचा प्रयत्न केला जात नाही. शी! काहीतरी विचित्र वाटतय. जे शक्य होतं पण झालं नाही हा विचार फार त्रासदायक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ओळखत नसतो, आपला तेवढा अधिकार

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 11/19/2012 - 21:30 नवीन
ओळखत नसतो, आपला तेवढा अधिकार नाही असं आपण मानतो, हे काही खोटं आहे असं नाही. अशा परिस्थितीत आपण आपल्याच अखत्यारित अधिकारांचं उल्लंघन करावं का? शारीरिक व्याधी असणार्‍यांकडे आपण सहानुभूतीने पहातो, मानसिक व्याधी असणार्‍यांना अशीच वागणूक देत नाही. मानसोपचार आणि ते घेणार्‍यांकडे बघण्याची आपली दृष्टी मधुमेहाबद्दल आहे, तशी होणार का? यकु गेला. आपण त्याबद्दल आता काहीही करू शकत नाही. निदान पुढच्या वेळेस तरी ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

ओळखत नसतो, आपला तेवढा अधिकार

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 11/19/2012 - 21:31 नवीन
ओळखत नसतो, आपला तेवढा अधिकार नाही असं आपण मानतो, हे काही खोटं आहे असं नाही. अशा परिस्थितीत आपण आपल्याच अखत्यारित अधिकारांचं उल्लंघन करावं का? शारीरिक व्याधी असणार्‍यांकडे आपण सहानुभूतीने पहातो, मानसिक व्याधी असणार्‍यांना अशीच वागणूक देत नाही. मानसोपचार आणि ते घेणार्‍यांकडे बघण्याची आपली दृष्टी मधुमेहाबद्दल आहे, तशी होणार का? यकु गेला. आपण त्याबद्दल आता काहीही करू शकत नाही. निदान पुढच्या वेळेस तरी ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सहमत आहे

बंडा मामा
Tue, 11/20/2012 - 01:48 नवीन
झोप उडाली. सगळी रात्र जागावे लागणार ह्या विचाराने आता. त्या आत्मशुन्याशी संपर्क झाला का. त्याचीही अशीच भिती वाटते आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आत्मशुन्यशी संपर्क झाला, तो

५० फक्त
Tue, 11/20/2012 - 16:01 नवीन
आत्मशुन्यशी संपर्क झाला, तो घरीच आहे. व्यवस्थित. काळजी नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

अगदी समहत.. हाच विचार सारखा

ऋषिकेश
Tue, 11/20/2012 - 10:49 नवीन
अगदी समहत.. हाच विचार सारखा डोक्यात येतोय.. ही बोच घेऊनच सगळ्यांनाच पुढे जावं लागणार आहे :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

चर्चा

श्रावण मोडक
Mon, 11/19/2012 - 21:23 नवीन
पूर्वीची चर्चा येथे पूर्ण दिसत नाही. त्यामुळे संदर्भहीन ठरणारे असे धागे अभिव्यक्ती स्वातंत्र्य फाट्यावर मारून मागे टाकले जावेत. ते वर येणार नाहीत अशी व्यवस्था करावी, ही विनंती.
  • Log in or register to post comments

हा धागा वर काढण्याची विनंती

रेवती
Mon, 11/19/2012 - 21:27 नवीन
हा धागा वर काढण्याची विनंती अदितीकडून झाली होती. धागा पूर्ववत, म्हणजेच पूर्ण दिसणारा करण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतोय. सदयांनी एकमेकाला नावे न ठेवण्याचे ठरवले तर असे धागे चालून जावेत. निदान गेलेल्या माणसाच्या बाबतीत तरी हे ठरवण्यास हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

लेखातले विचार पटले.

अर्धवटराव
Mon, 11/19/2012 - 23:03 नवीन
वेळ निघुन गेल्यानंतर दु:ख व्यक्त करत बसण्यापेक्षा आवश्यक तिथे असे इंटर्व्हेन्शनचे प्रयत्न नक्कीच फलदायी असतात. गुर्जी झिंदाबाद. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

लेखातील विचार आज मनापासून

निनाद मुक्काम …
Tue, 11/20/2012 - 04:08 नवीन
लेखातील विचार आज मनापासून पटले. आणि त्यावेळी ह्या लेखामागील कळकळ मला समजली नव्हती हे देखील येथे नमूद करतो. खूप वाईट आणि विचित्र वाटत आहे.
  • Log in or register to post comments

लेख तेव्हा आवडला होताच

राही
Tue, 11/20/2012 - 12:21 नवीन
आणि हा लेख वाचता वाचता यकुंसंबंधीचेच विचार डोक्यात घोळत होते. मनोरुग्णांशी (ह्यात अनेक प्रकार येतात) अगदी निकटचा कौटुंबिक संबंध. यांची मानसिक तडफड अत्यंत जवळून पाहिलेली. द्विमनस्कत्व,निराशागर्तापतन,समाजभीती अथवा तिटकारा. अनेक रूपे. या निमित्ताने मानसिक व्याधी,उपचार,आसरा,ते देणार्‍या संस्था/व्यक्ती यांची माहिती. पण इथे माहिती आणि ज्ञान फारसे उपयोगाचे नाही हे लगेच लक्षात आले. हवी असते प्रदर्शन न करता दिलेली सहानुभूती,कमालीचा धीर(पेशन्स्),प्रेमळपणा आणि समजूतदारपणा. रुग्णाला सांभाळताना संबंधितांच्या, विशेषतः आईच्या माणूसपणाची कसोटी लागते. कुटुंबियांकडून योग्य इंटरवेन्शन हे अतिशय हवेहवेसे असते. मात्र फक्त सल्ले आणि उपदेश अगदी नकोनकोसे असतात.पीडिताशी मैत्री करणे (नुसते चॉकलेट्स किंवा भेटवस्तू देणे नव्हे),त्याचा विश्वास कमावणे,त्याची गार्‍हाणी शांतपणे ऐकून घेणे पण प्रसंगी त्याच्या चुकीच्या वागण्याला ठामपणे विरोध करणे, आठवड्यातले एक दोन तास त्याच्या सोबत घालवणे,(या मुळे रुग्णाच्या आईवडिलांना थोडा मोकळा वेळ मिळू शकतो)मंदबुद्धी असेल तर हस्तकला, चिकणमातीतून आकार घडवण्यासारखे छंद शिकवणे अशा गोष्टी करता येण्याजोग्या असतात.मुख्य म्हणजे जग वाईट आहे,ते आपल्यावर जाणूनबुजून अन्याय करतेय,ही भावना काढून टाकून मनाला सकारात्मक दिशा देणे महत्त्वाचे. असो. यकुंच्या जाण्याने,ते अनपेक्षित नव्हते तरी,अतिशय दु:ख झाले. सोन्यासारखा जीव हकनाक(असे म्हणता येईल का?त्यांच्या दृष्टीने काहीतरी कारण असणारच.)गेला. त्यांना श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

गुर्जी..

विटेकर
Wed, 11/21/2012 - 10:07 नवीन
तुम्ही तुमच्याकडून पुरेशे प्रयत्न केले.. आभार. यश-अपयश दैवाधीन असते.. पण तरीही यकु वाचायला हवा होता. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नाला सलाम !
  • Log in or register to post comments

हा लेख

आनंदयात्री
Sun, 09/11/2016 - 08:57 नवीन
हा लेख प्रसिद्ध झाला तेव्हापासून कैकवेळा वाचलाय. या तंत्राचा वापर एकेकाळच्या जवळच्या, पण गेल्या काही वर्षात दूर गेलेल्या एका मित्रासाठी करता येईल असे पटले होते. पण तशी ठोस पावले योग्य वेळी उचलली गेली नाहीत, आणि आता लेखात म्हटले आहे तशी फक्त हळहळ उरली आहे. तुमच्या ओळखीत कुणासाठी हे तंत्र वापरायला हवे असे तुमच्या मनात वाटून गेले असेल तर कृपया उशीर करू नका. योग्य वेळी मदत पोचवा , हे कळकळीने सांगण्यासाठी हा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा