आज दिनांक २३ मार्च. हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांचा ८१ वा हौतात्म्यदिन. या महान क्रांतिकारकांना त्यांच्या हौतात्म्यदिनी सादर वंदन.
'तुम्ही केलेल्या हिंसेबद्दल पश्चात्ताप व्यक्त करा, आम्ही तुमच्यासाठी रदबदलीचा प्रयत्न करू' अशा प्रस्थापित नेत्यांच्या देकाराला उत्तर म्हणुन हुतात्मा भगतसिंग यांनी पंजाबच्या राज्यपालांना दिलेल्या 'मृत्यु अर्जाचे' हे मराठी भाषांतर.
प्रति,
मा. राज्यपाल, पंजाब
महोदय,
आपल्या सन्माननीय पदाचा आदर करून मी आपल्या निदर्शनास काही गोष्टी आणुन देऊ इच्छितो त्या अशा.हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकारचे सत्ताप्रमुख या नात्याने व्हॉईसरॉय महाशय यांनी बजावलेल्या वटहुकुमाअन्वये आम्हाला लाहोर अभियोगाअंतर्गत नियुक्त खास न्यायासनाने दिनांक ७ ऑक्टोबर १९३० रोजी मृत्युदंडाची सजा ठोठावली असुन ’इंग्लंडचा राजा ’किंग जॉर्ज’ यांच्या विरुद्ध युद्ध पुकारणे’ हा आमच्यावरील मुख्य आरोप आहे.
वरील निश्कर्ष काढताना सरकारने बहुधा दोन गोष्टी गृहित धरल्या असाव्यात: प्रथम तर असे की हिंदुस्थान व इंग्लंड या दरम्यान नित्याने युद्ध सुरू आहे, दुसरे असे आम्ही या युद्धात हिंदुस्थानच्या वतीने सहभागी झालो आहोत म्हणजेच पर्यायाने आम्ही युद्धकैदी आहोत. दुसऱ्या कलमाबाबत बोलायचे तर ते आम्ह्च्यावर स्तुतिसुमने उधळल्यागतच आहे आणि आत्मस्तुतिचा दोष पत्करुन आम्हास ते मान्य करण्याचा मोह अनावर होत आहे. दृश्यता: असे कोणतेही युद्ध सुरू असल्याचे आम्हाला तरी दिसत नाही.असो, तरी या विधानाची सकृतदर्शनी ग्राह्यता पडताळुन पाहण्याची मुभा आम्ही घेऊ इच्छितो. मात्र सत्य परिस्थितीचे रास्त आकलन होण्यासाठी मला आता थोडे सविस्तर कथन करावे लागेल. जोपावेतो भारतीय कष्टकरी जनता आणि हिंदुस्थानची नैसर्गिक संपत्ती यांचे शोषण परकिय बांडगुळे करीत आहेत तोपर्यंत हे युद्ध अटळ आहे आणि ते अखंड सुरूच राहील. शोषणकर्ते हे निखळ इंग्रजच असोत, हिंदुस्थानी असोत वा मिश्र गटातील असोत वा ती नोकरशाही संस्था असो, आम्हाला त्याने काहीच फरक पडत नाही. तुम्ही देऊ केलेल्या क्षुल्लक सोयी-सवलतींमुळे तुम्हाला समाजाचा काही उच्च्भृ समाज वश झाला असला आणि त्यामुळे होणाऱ्या विरोधाची धार क्षणभर बोथटली असली म्हणुन काही फरक पडत नाही. या प्रवाही युद्धात क्रांतिकारक एकाकी पडले म्हणुनही फरक पडत नाही. ज्यांनी आम्हाला सहानुभुती दर्शवु पाहिली व त्याबद्दल ज्याचे आम्ही ऋणी आहोत अशा मान्यवर नेत्यांनीही आपल्या आदर्शवादी अहिंसेच्या; जी पूर्णत: निष्प्रभ ठरली आहे, तीच्या अट्टाहासापायी अनेक दुर्बल घटकांवर, पिडीतांवर, परवड निघालेल्या स्त्रियांवर जराही लक्ष न देण्याचा बेदरकारपणा दाखवला असला कारण ते वा त्यांचे संबंधी हे अहिंसेचे कट्टर विरोधक होते; तरी त्याने फरक पडत नाहे. केवळ अहिंसेला विरोध केला म्हणुन जरी कुटुंबाचा वा सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या महानायिकांकडे या नेत्यांनी पाठ फिरवली असली तरी त्यामुळे यत्किंचितही फरक पडत नाही. सरकारी दलालांनी क्रांती व क्रांतिकारक यांची बदनामी व चारित्र्यहनन यासाठी कितीही खालची पातळी गाठली तरी हे युद्ध चालुच राहील.
हे युद्ध परिस्थितीनुसार आपले स्वरुप बदलत राहील; कधी छुपे तर कधी उघड उघड, कधी केवळ निदर्शनात्मक तर कधी जीवन मृत्युमधील संघर्षाचे भयानक स्वरुप ते घेत राहील. आता अर्थातच हे युद्ध मवाळ स्वरुपाचे केवळ निषेधात्मक असावे की रक्तरंजित असावे हे केवळ आपल्यावर अवलंबुन आहे, काय ते तुम्ही निवडाचे आहे, मात्र केवळ तत्त्व, नितीमत्ता याच्या अनावश्यक वा अप्रस्तुत अट्टाहासाने या युद्धाची धार कधीच बोथट होणार नाही. जो पर्यंत शोषणमुक्त अशी नवी सक्षम समांतर समाजव्यवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत हा संघर्ष अटळ आहे. जो पर्यंत माणुसकी, समता व शांती प्रस्थापित होत नाही तोपर्यंत हे युद्ध नित्य नव्या जोमाने व प्रखरतेने चालुच राहील. भांडवलदार आणि साम्राज्ववाद्यांचे दिवस आता भरत आले आहेत. जे युद्ध आम्ही सुरूच केले नाही ते आमच्या देहांताने संपण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! आमचे हौतात्म्य हे रत्नजडीत मालेची केवळ एक बारीक कडी म्हणता येईल, या मालेची शान असलेली रत्ने म्हणजे वज्रनिश्चयाने आमरण अन्नत्यागातुन उद्भवलेले जतीनदांचे हौतात्म्य, निष्ठा, त्याग, शौर्य व ध्येयवाद यासाठे झटणाऱ्या भगवतीबाबुंचा बाँब चाचणीतला दुर्दैवी अपघाती देहांत व एकाकी योद्ध्याप्रमाणे अखेरचे काडतुस शिल्लक असेपर्यंत आणि अखेरचा श्वास असेपर्यंत लढत लढत शत्रुला मारत मिळालेले चंद्रशेखर आझादांचे धगधगते हौतात्म्य हीच आहेत.
आता उरला तो आमच्या मृत्युचा प्रश्न! एकदा तुम्ही आम्हाला या जगातुन नाहीसे करण्याचा निश्चय केलाच आहात तर तुम्ही तसे नक्कीच कराल कारण सत्ता तुमच्या हाती आहे आणि सत्ता हीच जगातली सर्वात मोठी ताकद आहे आणि म्हणुनच तो न्याय ठरतो. आमचा अभियोग आपण ज्या पद्धतीने चालविलात त्यावरून ते सिद्ध झालेच आहे. आता आम्ही आपल्या निदर्शनास असे आणुन देऊ इच्छीतो की आपण ठेवलेल्या आरोपपत्रानुसार आपण असा निकाल दिलाच आहात की आम्ही युद्ध गुन्हेगार आहोत. तेव्हा आता आम्ही त्याला अनुसरून अशा वर्तनाचा आग्रह का धरू नये? अर्थात आम्हाला गोळ्या घालुन ठार मारले जावे, फासावर लटकावुन नव्हे असे आवाहन मी करीत आहे. आपण लिहिलेला शब्द खरा करण्याची जबाबदारी तुमची आहे आणि म्हणुनच आपण लष्करी तुकडीच्या बंदुकधारी पथकाला पाचारण करा आणि आम्हाला वीरमरण द्या ही विनंती.
आपला,
भगत सिंग


वाचने
5623
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
भगतसिंग, राजगुरु, सुखदेव या
समयोचित
_/\_
भगतसिंग आदिंना आदरांजली. हे
+१
In reply to भगतसिंग आदिंना आदरांजली. हे by नितिन थत्ते
नतमस्तक....
सुंदर अनुवाद .... तिन्ही
श्रद्धांजली..
धन्यवाद
सुंदर अनुवाद. पत्र
अनुवाद
विनम्र श्रद्धांजली
क्रांतिकारकांना अभिवादन
क्रांतिकारकांना
लेख आणि अनुवादाबद्दल
धन्यवाद ! मूळ पत्र कुठे
सलाम....
नमन..
बांडगुळे
In reply to नमन.. by चिगो
बांडगुळे/ पत्राची विश्वासार्हता
In reply to बांडगुळे by नितिन थत्ते
तशी शंका नव्हती......
In reply to बांडगुळे/ पत्राची विश्वासार्हता by सर्वसाक्षी
भगतसिंग यांना फाशी दिल्याचे
भयंकर
ते सत्य आहे