Skip to main content

"अखेरचे निवेदन" (हुतात्मा भगतसिंग यांचा पंजाब राज्यपालांस 'मृत्यु अर्ज')

शुक्रवार, 23/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक २३ मार्च. हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांचा ८१ वा हौतात्म्यदिन. या महान क्रांतिकारकांना त्यांच्या हौतात्म्यदिनी सादर वंदन. 'तुम्ही केलेल्या हिंसेबद्दल पश्चात्ताप व्यक्त करा, आम्ही तुमच्यासाठी रदबदलीचा प्रयत्न करू' अशा प्रस्थापित नेत्यांच्या देकाराला उत्तर म्हणुन हुतात्मा भगतसिंग यांनी पंजाबच्या राज्यपालांना दिलेल्या 'मृत्यु अर्जाचे' हे मराठी भाषांतर. प्रति, मा. राज्यपाल, पंजाब महोदय, आपल्या सन्माननीय पदाचा आदर करून मी आपल्या निदर्शनास काही गोष्टी आणुन देऊ इच्छितो त्या अशा.हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकारचे सत्ताप्रमुख या नात्याने व्हॉईसरॉय महाशय यांनी बजावलेल्या वटहुकुमाअन्वये आम्हाला लाहोर अभियोगाअंतर्गत नियुक्त खास न्यायासनाने दिनांक ७ ऑक्टोबर १९३० रोजी मृत्युदंडाची सजा ठोठावली असुन ’इंग्लंडचा राजा ’किंग जॉर्ज’ यांच्या विरुद्ध युद्ध पुकारणे’ हा आमच्यावरील मुख्य आरोप आहे. वरील निश्कर्ष काढताना सरकारने बहुधा दोन गोष्टी गृहित धरल्या असाव्यात: प्रथम तर असे की हिंदुस्थान व इंग्लंड या दरम्यान नित्याने युद्ध सुरू आहे, दुसरे असे आम्ही या युद्धात हिंदुस्थानच्या वतीने सहभागी झालो आहोत म्हणजेच पर्यायाने आम्ही युद्धकैदी आहोत. दुसऱ्या कलमाबाबत बोलायचे तर ते आम्ह्च्यावर स्तुतिसुमने उधळल्यागतच आहे आणि आत्मस्तुतिचा दोष पत्करुन आम्हास ते मान्य करण्याचा मोह अनावर होत आहे. दृश्यता: असे कोणतेही युद्ध सुरू असल्याचे आम्हाला तरी दिसत नाही.असो, तरी या विधानाची सकृतदर्शनी ग्राह्यता पडताळुन पाहण्याची मुभा आम्ही घेऊ इच्छितो. मात्र सत्य परिस्थितीचे रास्त आकलन होण्यासाठी मला आता थोडे सविस्तर कथन करावे लागेल. जोपावेतो भारतीय कष्टकरी जनता आणि हिंदुस्थानची नैसर्गिक संपत्ती यांचे शोषण परकिय बांडगुळे करीत आहेत तोपर्यंत हे युद्ध अटळ आहे आणि ते अखंड सुरूच राहील. शोषणकर्ते हे निखळ इंग्रजच असोत, हिंदुस्थानी असोत वा मिश्र गटातील असोत वा ती नोकरशाही संस्था असो, आम्हाला त्याने काहीच फरक पडत नाही. तुम्ही देऊ केलेल्या क्षुल्लक सोयी-सवलतींमुळे तुम्हाला समाजाचा काही उच्च्भृ समाज वश झाला असला आणि त्यामुळे होणाऱ्या विरोधाची धार क्षणभर बोथटली असली म्हणुन काही फरक पडत नाही. या प्रवाही युद्धात क्रांतिकारक एकाकी पडले म्हणुनही फरक पडत नाही. ज्यांनी आम्हाला सहानुभुती दर्शवु पाहिली व त्याबद्दल ज्याचे आम्ही ऋणी आहोत अशा मान्यवर नेत्यांनीही आपल्या आदर्शवादी अहिंसेच्या; जी पूर्णत: निष्प्रभ ठरली आहे, तीच्या अट्टाहासापायी अनेक दुर्बल घटकांवर, पिडीतांवर, परवड निघालेल्या स्त्रियांवर जराही लक्ष न देण्याचा बेदरकारपणा दाखवला असला कारण ते वा त्यांचे संबंधी हे अहिंसेचे कट्टर विरोधक होते; तरी त्याने फरक पडत नाहे. केवळ अहिंसेला विरोध केला म्हणुन जरी कुटुंबाचा वा सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या महानायिकांकडे या नेत्यांनी पाठ फिरवली असली तरी त्यामुळे यत्किंचितही फरक पडत नाही. सरकारी दलालांनी क्रांती व क्रांतिकारक यांची बदनामी व चारित्र्यहनन यासाठी कितीही खालची पातळी गाठली तरी हे युद्ध चालुच राहील. हे युद्ध परिस्थितीनुसार आपले स्वरुप बदलत राहील; कधी छुपे तर कधी उघड उघड, कधी केवळ निदर्शनात्मक तर कधी जीवन मृत्युमधील संघर्षाचे भयानक स्वरुप ते घेत राहील. आता अर्थातच हे युद्ध मवाळ स्वरुपाचे केवळ निषेधात्मक असावे की रक्तरंजित असावे हे केवळ आपल्यावर अवलंबुन आहे, काय ते तुम्ही निवडाचे आहे, मात्र केवळ तत्त्व, नितीमत्ता याच्या अनावश्यक वा अप्रस्तुत अट्टाहासाने या युद्धाची धार कधीच बोथट होणार नाही. जो पर्यंत शोषणमुक्त अशी नवी सक्षम समांतर समाजव्यवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत हा संघर्ष अटळ आहे. जो पर्यंत माणुसकी, समता व शांती प्रस्थापित होत नाही तोपर्यंत हे युद्ध नित्य नव्या जोमाने व प्रखरतेने चालुच राहील. भांडवलदार आणि साम्राज्ववाद्यांचे दिवस आता भरत आले आहेत. जे युद्ध आम्ही सुरूच केले नाही ते आमच्या देहांताने संपण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! आमचे हौतात्म्य हे रत्नजडीत मालेची केवळ एक बारीक कडी म्हणता येईल, या मालेची शान असलेली रत्ने म्हणजे वज्रनिश्चयाने आमरण अन्नत्यागातुन उद्भवलेले जतीनदांचे हौतात्म्य, निष्ठा, त्याग, शौर्य व ध्येयवाद यासाठे झटणाऱ्या भगवतीबाबुंचा बाँब चाचणीतला दुर्दैवी अपघाती देहांत व एकाकी योद्ध्याप्रमाणे अखेरचे काडतुस शिल्लक असेपर्यंत आणि अखेरचा श्वास असेपर्यंत लढत लढत शत्रुला मारत मिळालेले चंद्रशेखर आझादांचे धगधगते हौतात्म्य हीच आहेत. आता उरला तो आमच्या मृत्युचा प्रश्न! एकदा तुम्ही आम्हाला या जगातुन नाहीसे करण्याचा निश्चय केलाच आहात तर तुम्ही तसे नक्कीच कराल कारण सत्ता तुमच्या हाती आहे आणि सत्ता हीच जगातली सर्वात मोठी ताकद आहे आणि म्हणुनच तो न्याय ठरतो. आमचा अभियोग आपण ज्या पद्धतीने चालविलात त्यावरून ते सिद्ध झालेच आहे. आता आम्ही आपल्या निदर्शनास असे आणुन देऊ इच्छीतो की आपण ठेवलेल्या आरोपपत्रानुसार आपण असा निकाल दिलाच आहात की आम्ही युद्ध गुन्हेगार आहोत. तेव्हा आता आम्ही त्याला अनुसरून अशा वर्तनाचा आग्रह का धरू नये? अर्थात आम्हाला गोळ्या घालुन ठार मारले जावे, फासावर लटकावुन नव्हे असे आवाहन मी करीत आहे. आपण लिहिलेला शब्द खरा करण्याची जबाबदारी तुमची आहे आणि म्हणुनच आपण लष्करी तुकडीच्या बंदुकधारी पथकाला पाचारण करा आणि आम्हाला वीरमरण द्या ही विनंती. आपला, भगत सिंग news tribune
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5623
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

त्या त्रिमुर्तीला विनम्र अभिवादन. धन्यवाद साक्षीजी.

भगतसिंगांच्या सुस्पष्ट आणि परखड विचारांनी कोणीही प्रभावित होईल. मृत्यू तर स्विकारला आहेच पण त्याच्या कार्यवाहीसाठी अर्जीलेला सन्मानिय मार्गही लाभू न देऊन सरकारने ब्रिटीशांच्या न्याय्य नाही तर अन्याय्य हुकुमशाही तत्वांचेच प्रदर्शन घडविले आहे. धीक्कार असो. सर्वसाक्षीजी आपण केलेला मराठी अनुवादही कौतुकास्पद आहे.

पत्र वाचून अंगावर काटा आला! भाषांतर इथे दिल्याबद्दल धन्यवाद!

क्रांतीवीरांना वंदन! दरवेळी आठवणीने त्यांचे स्मरण करुन देणार्‍या साक्षीजींना धन्यवाद.

अनुवाद वाचताना पडदा धूसर झाला. क्रांतीवीरांना मानाचा मुजरा! स्वाती

तीनही वीरांना सलाम.. कोणाच्या अंगात इतकी पराकोटीची विचारांची प्रगल्भता असेल आणि तेही आपलं मरण समोर ढळढळीत दिसत असताना? साक्षीशेठ, धन्यवाद.. - वाट्या..

क्रांतिकारकांना वंदन...! थोडंसं अवांतरः एवढ्या लहान वयात काय जाण होती या 'पोरांची'! काळ पुढे सरकेल तसं माणसाचं 'मोठं' होण्याचं वय वाढू लागलंय काय?

सर्वच मानवी हिमालयास सलाम. वाटाड्याशी सहमत. *चर्चा अजून हिंसा-अहिंसा, क्रांतिकारक्-सत्याग्रह अशा दोन टीममध्ये विभागली गेली नसल्याचे पाहून सुखद धक्का बसला*

भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव ह्या तिन्ही हुतात्मांना नमन आणि श्रद्धांजली... >> जोपावेतो भारतीय कष्टकरी जनता आणि हिंदुस्थानची नैसर्गिक संपत्ती यांचे शोषण परकिय बांडगुळे करीत आहेत तोपर्यंत हे युद्ध अटळ आहे आणि ते अखंड सुरूच राहील. शोषणकर्ते हे निखळ इंग्रजच असोत, हिंदुस्थानी असोत वा मिश्र गटातील असोत वा ती नोकरशाही संस्था असो, आम्हाला त्याने काहीच फरक पडत नाही. लढाई अजूनही सुरुच आहे...

In reply to by चिगो

>>शोषण परकिय बांडगुळे करीत आहेत नुकतेच इंग्रजी पत्र* वाचले त्यात परकीय हा शब्द दिसला नाही, बांडगुळे एवढाच शब्द दिसला. *इंग्रजी पत्र ऑथेंटिक आहे की नाही ते ठाऊक नाही.

In reply to by नितिन थत्ते

थत्ते साहेब, जोपावेतो भारतीय कष्टकरी जनता आणि हिंदुस्थानची नैसर्गिक संपत्ती यांचे शोषण परकिय बांडगुळे करीत आहेत तोपर्यंत हे युद्ध अटळ आहे आणि ते अखंड सुरूच राहील.> पूडील वाक्य असे आहे, तेही वाचा शोषणकर्ते हे निखळ इंग्रजच असोत, हिंदुस्थानी असोत वा मिश्र गटातील असोत वा ती नोकरशाही संस्था असो>. इंग्रज, इंग्रजांचे आश्रीत वा इंग्रजधार्जिणे या सर्वांना 'परकिय' असे म्हणावयास हरकत नाही. मूळ संदर्भ लक्षात घेता या पत्रात 'सरकार विरुद्ध युद्धाची कारणमिमांसा' या संदर्भात वाचले तर हा शब्द खटकु नये. हुतात्मा भगतसिंग यांच्यावर सरकार विरुद्ध युद्ध पुकारल्याचा अरोप होता आणि सरकार हे परकिय होते. सदर उल्लेखिलेले मूळ पत्र 'शहिद भगतसिंग.ओआरजी येथे उपलब्ध आहे. त्या संकेतस्थळाच्या 'स्वगृहावरचे' हे निवेदन पाहता ते या पत्राच्या सत्यतेविषयी शंका येउ नये. Welcome This web site is supported by Shahid Bhagat Singh Research Committee, Ludhiana. The authentic contents of this web site are being maintained under the guidance of Prof Jagmohan Singh son of Bibi Amar Kaur younger sister of Shahid Bhagat Singh . The objective is to have a web archive of the original Photographs and documents of Shahid Bhagat Singh and his Compatriots alongwith documents and photographs of Indian Independence Struggle. By the study of original documents, the young generation will be able to understand the spirit and the ideas of great Martyrs. It is only with a correct and deeper understanding that one can play his part in the transformation of society. Welcome T

In reply to by सर्वसाक्षी

इंग्रजी पत्र ऑथेंटिक आहे का ही माझ्या स्वतःबद्दलची शंका होती कारण मी भगतसिंग.ऑर्ग वर पत्र वाचले नव्हते इतरत्र वाचले होते. त्यामुळे भाषांतरात परकीय हा अधिकचा शब्द आहे हे माझे म्हणणे योग्य आहे का याविषयी शंका होती. आपण पत्राचे भाषांतर इथे दिल्याबद्दल धन्यवाद. एकूण ब्रिटिशविरोधी स्वातंत्र्यलढा आणि भगतसिंग यांचा लढा यांच्या परस्पर नात्यावर अधिक प्रकाश पडला.

परवा एका न्युजचॅनल वर भगतसिंगाबद्दल "५० अनसुनी कहानियाँ" असा कार्यक्रम दाखवत होते.. त्यातली काही अतिरंजकता सोडली तरी काही गोष्टी खरंच भयानक होत्या.. त्यानुसार, ह्या तिन्ही हुतात्म्यांना फाशी दिल्यानंतर, त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन जेलची मागची भिंत तोडून नदीकाठी नेण्यात आले.. तिथे तिन्ही मृतदेहांना एकाच चितेवर ठेवून पेटवून देण्यात आले.. रात्रीच्या वेळी नदीकठी पेटलेली चिता पाहून जमाव तिकडे जायला लागला, तसे त्या चितेला उधळून मृतदेहांचे तुकडे नदीत फेकल्या गेले आणि पोलिसांनी तिथून पळ काढला.. ह्यानंतर गावकर्‍यांनी त्या अर्धवट जळलेल्या मृतदेहांना जमा करुन त्यांना वेगवेगळ्या चितांवर अग्नी दिला.. भयानक होतं हे !!

भयानक असले तरी ते सत्य आहे. मृत्युनंतरही इंग्रजांना हुतात्मा भगतसिंग प्रभृतिंची दहशत होती. मृतदेह जर नातेवाईकांच्या ताब्यात दिले तर तर लोक महायात्रा काढतिल व कदाचित परिस्थिती हाताबहेर जाईल ही भिती होती. लोहारकाम कारखान्या नजीकची भिंत फोडुन गपचुप हे देह मागच्या भागातुन रात्री साडे आठच्या सुमारास काढले गेले. बरोबर एक लोरी भरुन सशस्त्र पोलिस होते. वाटेत गुडासिंगवाला येथे एक ग्रंथी व दोन प्म्डीत यांनाही अंत्यसंस्कारासाठी घेतले गेले. म्हणजे हे सर्व सुनियिजीत होते.फिरोजपूर रस्त्यावर कैसर ए हिंद पुलानजिक सदर प्रकारे त्यांची विल्हेवाट लावायचा प्रयत्न केला गेला.