आठवड्यातून भरनारया बाजारासारखे ..!!
तो तुकड्या तुकड्याने फिरत असतो ह्या महानगरात
तो राहत असतो कोठेतरी दूर....उपनगरात
वसई ,बोरीवली ,कधीकधी विरारला
अंबरनाथ ,कसारा ,कधी पुण्याला ,नाशिकला देखील
पोटासाठी येत असतो
पहाटे उठतो चारला ,पाचला, सहा किंवा सातला
डबा भरते त्याची बायको
रात्रीच भिजवून ठेवते कणिक
पोळ्या भाजी नि कधी चटणी
तो निघतो भल्या पहाटे ,सकाळी सकाळी
नि स्वप्न बघत असतो उद्याच्या सुखाची
पुढच्या महिन्यात असतो बायकोचा वाढदिवस
एखादया मुलाचा किंवा मुलीचा देखील
छोटा परिवार सुखी परिवार [?]
घट्ट डोक्यात असते त्याच्या
तरीही वेळ मिळत नसतो
क्षणभर....!!
किती तरी दिवसात तो बायकोला नाही घेऊन गेला सिनेमाला
नाही कधी प्रेमाने बघितले त्याने तिच्याकडे एकदाही
नाही संवाद साधता आला चिमुटभर
पहाटे ,सकाळी निघून
त्याला मस्टर गाठायचे असते
रात्री येऊन तो थकून जातो
एन्यास्थेशिया दिल्यासारखा तो झोपेत मिटून जातो
ती पण झोपी जाते
पहाटे , सकाळी तिला भिजवलेली कणिक लाटायची असते
मुलाचा , मुलीचा पेपर देखील असतो
शाळा शिकवण्यात एका मुलातच घर थकून जाते
दिवस असेच जात असतात
कसे जातात कळत नसते ...!
खूप स्वप्ने असतात त्याच्या उराशी
तो तुकड्या तुकड्याने विभागला जातोय आठवणीत
डोक्यावरचे मळके आभाळ सांभाळीत
त्याला घ्यायची असते मुलीसाठी एखादी स्कूटी
मुलासाठी बाईक
नि बायकोसाठी बरेच काही .....
आणि स्वतासाठी त्यांच्या चेहरयावरचा आनंद
गाडीच्या पिचकारलेल्या खिडकीतून
किलकिल्या नजरेने तो बांधीत राहतो स्वप्नांचे मजले
मग कधीतरी मनात येत असते अचानक
आपली भेट होत असते फक्त रविवारी
आपल्या मुला बाळांशी
आजकाल खरेच वाटत असते सारखे सारखे
आपण आहोत मुलगा,भाऊ ,नवरा ,बाप
कांदा,बटाटा ,मिरची ,कोथिंबीर ,मटाराच्या ढिगासारखे
आठवड्यातून भरनारया बाजारासारखे.....!!
वाचने
1024
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
खुप छान !!!
छान आहे
पण विक्रमादित्याने हट्ट सोडला नाही !
कविता आवडली.... आयुष्य असेच