मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'पाकनिष्ठ' कांदा, लुडबूडतो कशाला?

गंगाधर मुटे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
'पाकनिष्ठ' कांदा, लुडबूडतो कशाला? भाजून पीक सारे, पाऊस तृप्त झाला उध्वस्त शेत आधी, मागून थेंब आला कांदा पुसे रडूनी, कांद्यास अक्कलेच्या तो ’पाकनिष्ठ’ कांदा, लुडबूडतो कशाला? चेचून वेदनांना, पायात गाडले; पण स्वप्नात भूत त्यांचे, रेंगाळती उशाला दचकून जाग येते, निद्रा लयास जाते ते घाव प्राक्तनाचे, छळती क्षणाक्षणाला सोडून भूतळाला, ती दैत्य जात गेली देऊन दान वृत्ती, या सभ्य माणसाला ना झाकते कधी ती, वस्त्रात अंग सारे मिळणार भाव कैसा, शेतीत कापसाला? समजून घे "अभय" तू नाहीत भ्याड सारे निपजेल शूर येथे, विश्वास दे उद्याला गंगाधर मुटे ...............................................

वाचने 2830 वाचनखूण प्रतिक्रिया 15

सहज 12/01/2011 - 07:33
पाकनिष्ठ कांदावरुन लोकप्रभामधील हा लेख आठवला, जरुर वाचा.

In reply to by सहज

गंगाधर मुटे 12/01/2011 - 08:19
वाचलाय तो लेख. सोईचं तत्वज्ञान फारच सोईचं असतं. ते लवचिकही असतं. त्याला शेंडाबूड असण्याचीही गरज नसते. शिवाय असे तत्वज्ञान सोईचे व फायद्याचे असल्याने जनसमर्थन आणि राजाश्रयही सहज मिळून जातो. चिक्कार पैसेही मिळतात. तोशीस सोसावी लागत नाही, त्यागाशी वगैरे सोयरसुतक ठेवण्याचीही गरज असत नाही. मरणार्‍याच्या मरण्यावर असे तत्वज्ञानी स्वतःचे मात्र मस्त पोट भरून घेतात. असते एकेक जातकुळी तत्वज्ञांचीही......! :)

In reply to by अवलिया

सहज 12/01/2011 - 15:56
मुटे साहेब तुम्ही म्हणता पाकचा कांदा लुडबुडतो, पाकीस्तान म्हणते की, बास झाले, भारताला कांदानिर्यात आता पुरे! भारत सरकार म्हणते की पाकीस्तान असे नका करु द्या अजुन कांदा. आता पाकीस्तान नाही म्हणते तर त्यांच्या नाकावर टिच्चुन भारताने त्यांच्याकडून कांदा आता आणायचाच!! म्हणजेच भारताचा विजय असे देशप्रेमी लोक म्हणणार. म्हणजे पाकीस्तानचा कांदा (नाही म्हणत आहे तर आणलाच पाहीजे) आणायचाच, पाकीस्तान नाही म्हणतो म्हणजे काय? पाकीस्तानची ही हिंम्मत??? बाजारात कांदा मिळाला नाही तर आम आदमी म्हणणार कसले हे सरकार, खेचा खाली यांना... मधल्या मधे कांद्याचा भाव वाढणार. कांदा मिळाला तरी मुटेसाहेब नाराज, नाही मिळाला तरी आम आदमी नाराज, पाकीस्तानने नाही दिला तर देशप्रेमी भारतीय म्हणणार पाकीस्तानचा विजय झाला. असो जाउ द्या! आपण समजु देशात सामान्य माणुस कांदा घेणार नाही. पाकीस्तानचा कांदा, चीनच्या वस्तु बघता क्षणी पाठ फिरवेल. आम आदमी काय तो सच्चा. बाकी सगळा गहजब तत्वज्ञांचा.

In reply to by सहज

प्रसन्न केसकर 12/01/2011 - 16:25
कांदा झाला की टोमॅटो, टोमॅटो झाला की अंडी, अंडी झाली की गहु अन डाळ, ते झालं की अजुन काही... सामान्य जनता सरकार पाडणार वगैरे काही नाही. नेत्यांच्या गालावरच्या खळ्या पाहुन मतं टाकणार, जीडीपी इकॉनॉमिक प्रोग्रेस रेट वगैरे बळेच बरळ ऐकुन भुलणार अन भुक भुक भाकरी द्या म्हणुन रडणार. अशी अजुन दोन वर्षे गेली की वॉलमार्ट, रिलायन्स वगैरे कंत्राटी शेती करणार अन पुढच्या निवडणुकीच्या वेळी परत सगळी आबादी-आबाद होणार.

In reply to by सहज

चिंतामणी 12/01/2011 - 10:20
पण त्या पाकी कांद्यामुळे होणा-या (राजकीय) वांद्यापेक्षा चिनी बनावटाच्या गोष्टींच्या (आणि थोडेफार विणा मलीकबद्दल) वर्णनाने जागा अडली आहे. सुधीर काळ्यांनी मागे त्याच्या स्वाक्षरीत चिनी बनावटीच्या गोष्टींबद्द्ल लिहील्याप्रमाणेच सांगु इच्छीतो.

श्रावण मोडक 12/01/2011 - 15:19
भाजून पिक सारे...सणसणीत!

यशोधरा 12/01/2011 - 15:51
भाजून पीक सारे, पाऊस तृप्त झाला उध्वस्त शेत आधी, मागून थेंब आला कल्पना आवडली. सुरेख. चेचून वेदनांना, पायात गाडले; पण स्वप्नात भूत त्यांचे, रेंगाळती उशाला रेंगाळते?

प्राजु 13/01/2011 - 02:22
खणखणीत आहे. भाजून पीक सारे, पाऊस तृप्त झाला उध्वस्त शेत आधी, मागून थेंब आला चेचून वेदनांना, पायात गाडले; पण स्वप्नात भूत त्यांचे, रेंगाळती उशाला जबरदस्त!!