✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दत्तजयंतीच्या निमित्ताने...

अ
अवलिया यांनी
Mon, 12/20/2010 - 12:28  ·  लेख
लेख
२० डिसेंबर २०१० ही दत्तात्रेय जयंती. या दिवसाचे निमित्त साधून, पुढील गोष्टिचे निरुपण माझ्या बुद्धीने देत आहे. हे निरुपण असेच असेल किंवा असावे असा आग्रह नाही. हे निरुपण तुम्ही मानावेच असाही आग्रह नाही. मानल्यास माझी हरकत नाही. या विषयावर चर्चा करण्यास माझी ना नाही.. मी त्यात भाग घेईलच असे नाही. असो. सदर निरुपण मिपावर अंधश्रध्दा फैलावणारे आहे असा संपादकांचा समज होत असल्यास सदर लेखन उडवले तरी माझी हरकत नाही. ही कथा माझ्याकडे असलेल्या पुस्तकांतून जशीच्या तशी उतरवली आहे. पुस्तकाचे नाव आहे - "चरित्र चिंतन -प प श्रीमदवासुदेवानंदसरस्वती (टेंबे) स्वामी महाराज". या पुस्तकाचे लेखक आहेत - डॉ वासुदेव व्यंकटेश देशमुख. कथा ठळक टाईपात असुन त्यावरचे माझे निरुपण नेहमीच्या ठशात आहे याची नोंद घ्यावी. एका प्रसंगी आंबेजोगाईच्या परिसरात काही ब्राह्मण दत्तदर्शनाच्या इच्छेने तप करत होते. समर्थांना ओळखून त्यांनी आपला हेतू सांगून त्यांचे साह्य मागितले. समर्थांनी त्यांना "भाव दृढ करा" असे सांगून ते ही त्यांचेजवळ बसले. कोणताही मनुष्य देवभक्ति ज्या अनेक हेतुंनी करत असतो त्यात देवाचे दर्शन, देवाची माहिती त्याचप्रमाणे मनातल्या सुप्त इच्छांची पूर्ती, कुठे द्वेष भावनेवर आधारीत कुणाचे वाईट व्हावे ही इच्छा तर कुठे सगळ्यांचे चांगले व्हावे ही इच्छा असते. मनातील अनेक भावनांचा विचार करता मनुष्य ज्या काही विविध इच्छा मनात बाळगतो त्या सर्वांचे प्रतिबिंब देव भक्ति या भावनेच्या आविष्कारात आढळते. परंतु वरकरणी मनुष्य मला देवदर्शनाचीच आस आहे, बाकी ऐहिक सुखाची लालसा अजिबात नाही असेच दाखवत गुरुला मार्ग विचारतो. गुरु अशा विविध पद्धतीच्या साधकांना चांगला ओळखुन असल्याने त्यांच्यातले योग्य साधक कोणते हे परिक्षेने ठरवतो. याकथेत सुद्धा हे रुपकाच्या माध्यमातुन सुचवले आहे. गुरुकडे शरण आलेल्यांकडे हौशे, गवसे, नवसे असतात. त्यातले नक्की कसे कोण आहेत हे काही काळ गेल्यावर समजते. गुरु सर्व साधकांना, शिष्यांना परमेश्वरापाशी भाव दृढ करा असे सांगतात. स्वतः त्यांच्याबरोबर असतात. विविध दृष्टांत आणि कथांच्या सहाय्याने मुल तत्वज्ञानाचा उपदेश देतात. कित्येक शिष्य अशा प्रसंगी आपण गुरुला विचारले काय आणि गुरु सांगतो काय या विचाराने गडबडून जातात. देव आपल्याला शक्ती देईल, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करेल या आशेने आपण आलो पण इथे गुरुने ही तर वेगळीच पोपटपंची लावली असा अनेक शिष्यांचा ग्रह होतो आणि ते शिष्य अशा गुरुला सोडून जातात. मात्र खरा गुरु त्यांचे सुद्धा भलेच होवो असाच आशीर्वाद देतो. कसे घडते हे आता आपण रुपककथेत पाहू. एक प्रहर रात्र उलटल्यावर दत्तप्रभू गारुड्याच्या रूपात पत्नी, पाच मुले, हल्यावर लादलेली गोणी,हातात पाच कोंबडे व बोकड अशा परिवारासह तेथे येऊन थांबले. गुरु शिष्याला या विश्वाचे रहस्य, जीव कोण, ईश्वर कोण आहे हे सांगणार आहे. पण त्याची तयारी आहे का हे पण पाहिले पाहिजे. केवळ काही ऐहिक वस्तुंच्या लालसेने देवाची भक्ती करणारा शिष्य यथार्थ स्वरुप समजुन घेण्यास पात्र नसतोच पण त्याला स्वस्वरुप सांगून काही उपयोग नसतो. म्हणून गुरु त्याला मायेचे स्वरुप समजावुन सांगायचा प्रयत्न करतो. कधी कैवल्याद्वैताच्या मायावादाच्या सहाय्याने किंवा कधी सांख्ययोगाच्या सहाय्याने गुरु समजावुन सांगतो. गारुड्याचे रुपक वापरुन गुरु मूळ पुरुष गारुडी असुन त्याची पत्नी ही प्रकृती आहे असे रुपक मांडतो. पंच ज्ञानेंद्रिये म्हणजे कोंबड्याचे रुपच. कधी कोंबडा पाहीला आहे... दिसेल त्या कोंबडीशी संग करत सतत खाणे, हिंडणे यातच वेळ घालवणारा. पण दुसरा कोंबडा तिथे येताच भांडण करणारा. मनुष्याची पंचेद्रिये विषयांचा भोग घेण्यासाठी अशीच सदैव आतुर असतात. त्यात आडकाठी आली की भडकतात. अजुन हवे अजुन हवे हा सतत घोष चालू असते. कधीही तृप्त न होणारी इंद्रिये अगदी त्या कोंबड्याप्रमाणेच असतात. माणसाचे मन मोठे विचित्र असते. मी केले मी करेन या अहंभावनेने सदैव ग्रासलेले मन अतिशय अहंकारी आणि उद्दाम असते. कर्तृत्वाचा डांगोरा पिटतांना मूळ स्वभावाशी फारकत घेत मी माझे यात मनुष्य अगदी बोकडाप्रमाणे वर्तन करतो. आपल्याच मस्तीत मश्गुल, संपूर्ण रस्ता स्वत:च्याच बापाच्या मालकीचा आहे हा उद्दाम पणा अंगी बाळगत, उग्र दर्प सोडत बोकड रस्त्याने जातांना बघा म्हणजे तुम्हाला पटेल नक्की काय म्हणायचे आहे ते ! पाच मूले म्हणजे पंचतत्वे. ज्यांच्या सहाय्याने हे विश्व आकाराला आले आहे ते स्थुल आणि सुक्ष्मपंच तत्वे. हल्या हे प्रपंचाचे प्रतिक असुन त्यावर लादलेल्या गोण्या म्हणजे मनुष्याच्या इच्छा आकांक्षाची असलेली गोळाबेरीज. त्या वेळी बरोबरच्या स्त्रीला "भूक लागली" असे म्हणून स्वयंपाक करायला सांगीतले. गुरु त्याच्याकडे आलेल्या शिष्याला जगाचे स्वरुप रुपकाच्या माध्यमातुन सांगत आहेत. मूळ पुरुष जेव्हा प्रकृतीच्या सहाय्याने स्थुल आणि सूक्ष्म पंचतत्वाच्या सहाय्याने शरीररुपाने जगात येतो तेव्हा पंचेद्रियांच्या आणि मनाच्या कचाट्यात सापडून त्याचा ठिकाणी कामना जागृत होते. भुक लागली या वाक्याने मला हे हवे, मला ते हवे ही मनुष्याच्या मनात जागृत होणारी सुप्त इच्छा जी पुढे विचार बनुन कृतीला प्रेरणा देते ती जागृत होते असे सांगतो. तिने एक चूल मांडून तीवर एक हंडी चढविली व कोंबडे , बोकड त्यात कापून घातले तरी हंडी भरत नाही असे पाहून क्रमाक्रमाने तो हल्या व पोरेही कापून त्यात घातली. जेव्हा मनुष्य आपली इच्छापुर्ती व्हावी म्हणुन धडपडू लागतो तेव्हा विषयांचा भोग घेता घेता त्याला त्यातच गोडी वाटु लागते. भोग संपता संपत नाहीत आणि इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत. एक इच्छा पूर्ण होते न होते तोच दूसरी इच्छा आ वासून उभी रहाते. अक्राळ विक्राळ असा इच्छेचा हा पगडा जणू समस्त प्राणीजगतावर अनादी अनंत काळापासून आहे. इच्छा पूर्ण झाली असे वाटुन सुख वाटते तोच दुसरी इच्छा पूर्ण नाही म्हणुन दु:ख वाटु लागते. ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा तो पहिलीचे सूख संपते आणि त्यातले दु:ख समोर येते. एक धरावे तर दुसरे सुटते. अक्षरशः जीवाचे रान करावे आणि हातात शून्य यावे अशी अवस्था होत जाते. स्वामी विवेकानंदांच्या शब्दात सांगायचे तर जे तरुण आहेत, ज्यांच्या डोळ्यासमोर भव्य दिव्य स्वप्ने आहेत त्यांना हे लक्षात येणार नाही, पण ज्यांनी चार पावसाळे पाहिले आहेत त्यांना कळेल मला काय म्हणायचे आहे ते. हीच माया. सगळ्यांना जखडून टाकणारी पण त्याचवेळी कर्म करण्यास प्रवृत्त करणारी माया ती हीच. तरी हंडी भरेना तेव्हा ते पलिकडे बसलेले परदेशी (तपाला बसलेले ब्रह्मण) आहेत असे त्याचे बोलणे ऐकून ब्राह्मण पळून गेले. अशा प्रकारे गुरु जगाचे स्वरुप सांगतात पण देवभक्ती, गुरुभक्ती केवळ ऐहिक लालसे पोटी आणि काही तरी लाभ व्हावा याच हेतुपोटी करणारे भक्त अशा गुरुला काही कामाचा नाही असे समजुन सोडून जातात. पळून जातात. त्यांना देवाला भेटायचे नसते. देवाचे यथार्थ स्वरुप त्यांना जाणून घ्यायचे नसते. त्यांना हवे असते फक्त इंद्रियांना सुखावणारे सुख. त्याचसाठी ते देवाची भक्ती करत असतात. खरोखर जगात असेच कितीतरी भक्त असतात देवा मला हे दे, देवा मला ते दे असे म्हणत त्याच्याजवळ याचना करणारे. पण देवा मला तु भेटच अशी आर्त विनवणी करणारे किती दुर्मिळ असतात हे आपण जाणतोच. समर्थ मात्र शांतपणे बसून राहीले, कारण हे कोण आहेत हे त्यांनी ओळखले होते.तेव्हा ते सर्व दृष्य नाहीसे होऊन तिथे श्री दत्तस्वरूप प्रकट झाले. त्यावेळी समर्थांनी त्या ब्राह्मणांनाही दर्शन द्यावे अशी प्रर्थना केली.पण ते सकाम भक्त आहेत त्यांची आत्मसाक्षात्काराची योग्यता नाही असे दत्तप्रभूंनी सांगीतले.पुढे श्रीसमर्थांच्या वाक्यास्तव त्या ब्राह्मणांचे स्वप्नात समाधान केले असे वर्णन आहे. समर्थांच्या रुपाने एका खर्‍या भक्ताची, ज्ञानी मनुष्याची आपल्याला ओळख पटते. मायेचे यथार्थ स्वरुप जाणुन सृष्टीतील मिथ्यात्व जाणून लपलेल्या सत्य तत्वाची ओळख अशा भक्ताला पटते. आणि मग मागे लपलेले तत्व त्याला कुणी ब्रह्म म्हणते, कूणी ईश्वर म्हणते, कूणी देव तर कुणी अल्लाह म्हणते ते समोर येते. नव्हे ते काय आहे हे जाणले जाते. समजणे आणि जाणणे ह्या खूप भिन्न गोष्टी आहेत. असा भक्त परमदयाळू असतो, त्याला असे वाटते मला जे समजले, मी जे जाणले ते इतर लोकांना कळावे. भले त्यांच्या इच्छा, आकांक्षा ऐहिक जगातील असु द्या पण त्यांना हे परम तत्व जाणवावे, आकळावे. पण जोपर्यंत मन बाह्य विषयात गुंतले आहे तोपर्यंत हे तत्व जाणवणार नाही. केवळ दिव्यातील तेल संपले म्हणुन जशी ज्योत शांत झाली तसेच केवळ मनातील भावनांना खतपाणी न घालुन संयम केला मन शांत होते. आणि जोपर्यंत मन शांत होत नाही तोपर्यंत मूलतत्व समजणे अतिशय अवघड आहे. अशक्य आहे.
***
संत एकनाथ दत्ताचे स्वरुप सांगतात. हा दत्त म्हणजे सत्व, रज, तम या त्रिगुणांनी युक्त, निर्माता ब्रह्मदेव, रक्षण कर्ता विष्णू आणि लयकर्ता शिव यांचे एकत्रित रुप आहे. हा संपूर्ण विश्वाचा नियंता, राजा असून ह्याच्यापाशी अज्ञान अजिबात नाही. असे म्हटले जाते की ते अद्वितीय, अनादी अनंत चैतन्य म्हणजेच विश्वाचे सत चित् आनंद स्वरुप कसे आहे हे विचारले की श्रूती केवळ हे नाही हे नाही असे नकारार्थी उत्तर देते कारण ते कसे आहे याचे वर्णन करण्यास मानवी वाणी असमर्थ आहे. तेव्हा मानवी वाणीतुन उगम पावलेली श्रुती हे नाही हे नाही असेच सांगते. पण याच्यापाशी असे अज्ञान नाही इतकेच काय याचे स्वरुप कसे आहे हे देव, मुनी, योगी यांना ध्यान वा समाधीतुन सुद्धा कळत नाही. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेति नेति शब्द न ये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥१॥ बाह्य विश्वात आणि आंतर विश्वात तुच केवळ आहेस. पण मी अभागी आहे मला हे समजत नाही, उमजत नाही. विचारांचे सुक्ष्म स्वरुप मनात उगम पावते आणि तिथेच त्याच्यापासुन निरस्त होत मूल स्वरुपाची ओळख न पटल्याने जन्म मरणाच्या फेर्‍यात अडकुन जातो. अज्ञान हेच जन्ममरणाचे कारण आहे. विवेकाने ज्ञान प्राप्ती झाली की जन्म मरणापासुन मुक्ती मिळते. पण हा विवेक सहजसाध्य नाही. सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैसी न कळे ही मात पराही परतली तेथे कैचा हा हेत जन्म मरणाचा पुरलासे अंत ॥२॥ असा दत्त अचानक माझ्या समोर आला आहे. निर्गुण निराकार परब्रह्म मला सगुण रुपाने समोर दिसल्याबरोबर माझ्या मनाच्या सर्व शंका फिटल्या. त्याने प्रसन्न होऊन मला आशीर्वाद दिला आणि माझा जन्ममरणाचा फेरा संपवला. ज्ञानाने, विवेकाने ते निर्गुण निराकार ब्रह्म माझ्या डोळ्यासमोर साकार झाले. आता कुठला जन्म कुठला मृत्यु ! अनादी मी अनंत मी ! दत्त येऊनिया उभा ठाकला भावे साष्टांगेसी प्रणिपात केला प्रसन्न होउनी आशीर्वाद दिधला जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥३॥ मात्र ते निर्गुण निराकार माझ्यासमोर साजिरे रुप घेउन आले आणि आता मला त्याचीच गोडी लागली आहे. माझे मन आता जागृत्,स्वप्न, आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांच्या पलिकडे गेले आहे. या अवस्थेत माझे मन उन्मन झाले आहे. यात आता माझे तुझे मी तू हा विषय विषयी हा भेदच उरला नाही. जे जे चेतन असो वा अचेतन, जीव असो वा जड ते सर्व मीच आहे हा भाव आता माझ्या ठि़काणी एकवटला आहे. आणि माझ्या मनात केवळ दत्त असुन त्याचेच निरंतर ध्यान करत आहे. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तू पणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान ॥४॥ असे हे सर्व घडले ते केवळ त्या गुरुदेव दत्तामुळे. चला त्याची आरती करु त्याला ओवाळु ! आपल्या सर्व प्रपंच्याच्या चिंता त्याच्यामुळे हलक्या होतील, लयाला जातील यात संशय नाही. जय देव जय देव जय गुरुदत्ता श्री गुरुदत्ता , आरति ओवाळिता हरली भवचिन्ता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ! श्री गुरुदेव दत्त !!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19737 वाचन

💬 प्रतिसाद (89)

प्रतिक्रिया

अशी गोष्ट असू शकेल, आणि

Pain
Tue, 12/21/2010 - 05:53 नवीन
अशी गोष्ट असू शकेल, आणि त्याचे काहीतरी स्पष्टीकरणही असेल, पण या गोष्टीसाठी तुमचे स्पष्टीकरण पटले नाही. उपमा/रुपके ओढून ताणून बसवण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी श्रीदत्ताच्या आरतीच्या अर्थासाठी धन्यवाद. सार्थ मनाचे श्लोक, गणेशस्त्रोत्र असते पण आरत्यांचा अर्थ सहसा मिळत नाही. त्या बर्‍यापैकी सहज समजतात म्हणूनही असू शकेल.
  • Log in or register to post comments

वा वा

सन्जोप राव
Tue, 12/21/2010 - 06:09 नवीन
अध्यात्मिक उन्नती झाल्यासारखे वाटले. उन्नत या शब्दाचा अशा अर्थानेही वापर करता येतो (हे त्या घासकडवींना सांगा कुणीतरी!) दत्त येऊनिया उभा ठाकला भावे साष्टांगेसी प्रणिपात केला प्रसन्न होउनी आशीर्वाद दिधला जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥३॥ आम्ही लहानपणी 'जन्ममरणाचा 'पेढा' चुकविला' असे म्हणत असू आणि पेढा का चुकवावासा वाटला असेल याचे त्या वेळी नवल वाटत असे.
  • Log in or register to post comments

छान निरुपण .आवडले मित्रा

प्रकाश१११
Tue, 12/21/2010 - 06:32 नवीन
छान निरुपण .आवडले मित्रा .मनापासून !!
  • Log in or register to post comments

नाना आजोबा, निरुपण

शिल्पा ब
Tue, 12/21/2010 - 08:45 नवीन
नाना आजोबा, निरुपण आवडले...कथा adult आहे पण निरुपण छान केले आहे. शुचे, पुढच्या वेळी अशी कथा वगैरे देताना नानाचा सल्ला घेऊन बोध, निरुपण वगैरे पण देत चल...
  • Log in or register to post comments

मस्तचं रे नानुडी...

मदनबाण
Tue, 12/21/2010 - 09:22 नवीन
मस्तचं रे नानुडी... :)
  • Log in or register to post comments

हं - स्पिन डॉक्टर

सहज
Tue, 12/21/2010 - 10:03 नवीन
Spin doctor Meaning A political press agent or publicist employed to promote a favourable interpretation of events to journalists. उगाच नाही बुवाबाजी वाढत आहे! टाळ्या वाजवायला, जपनामाला, प्रेक्षक केव्हाचा तयार आहे. नाना, तुम्ही सिद्ध केलेले यंत्र, रुद्राक्ष विकायला काढा आता. एजन्सी द्या मला. स्पष्ट मत - सगळा शब्दछल आहे. लिहणारे पण तेच, अर्थ समजवणारे पण तेच. पुन्हा जुने शब्द / मत खोडून कालानुरुप नवे मत सांगणारे पण तेच. कित्येक शतकानुशतके ह्या अश्या मांडण्या करुन विशिष्ट लोकांची पोटे भरली, पण अजुन पुरे झाले नाही आहे असेच दिसते.
  • Log in or register to post comments

सहमत

आजानुकर्ण
Tue, 12/21/2010 - 10:06 नवीन
स्पष्ट मत - सगळा शब्दछल आहे. लिहणारे पण तेच, अर्थ समजवणारे पण तेच. पुन्हा जुने शब्द / मत खोडून कालानुरुप नवे मत सांगणारे पण तेच.
पूर्णपणे सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अवलियांनी लिहिले ती शैली

गवि
Tue, 12/21/2010 - 10:19 नवीन
अवलियांनी लिहिले ती शैली सुंदरच आहे. तीच कथा पण बटबटीतपणाची झाक टाळून सुश्राव्य आणि अर्थपूर्ण केली आहे. हे सर्व मान्य करुनही तुमच्या या मताशी सहमत. कारण शोधले की कोणत्याही गोष्टीचा कुठेही दुसरा / आल्टरनेट अर्थ सापडतोच. उदा: उदा.मांत्रिक केरसुणीने झोडपून एखाद्याचे भूत उतरवतोय म्हणजेच तो जणू केरकचरा,घाणसदृश असे त्याच्यातले दुरित गुण स्वच्छ करत आहे.इ.इ.तस्मात आल्टरनेट अर्थ कशातही शोधता येतात. .... शिष्याने गळू चोखले..म्हणून तो खरा पट्टशिष्य.. म्हणजे भक्ती/सेवा करताना घाणीची पर्वा न करता निखळ सेवा करावी (जसे नर्सने पेशंटची काळजी घेताना त्याचे मलमूत्रही काढायची तयारी ठेवावी लागते तरच ती सुश्रुषा होते.) ... इ.इ. हे सर्व (मूर्ख )सामान्य मर्त्य माणसाला कसे कळावे? तो पहिलाच अर्थ घेणार.. बर्‍याच जणांनी "यामुळे अंधश्रद्धा वाढतील/ बळी दिले जातील" वगैरे म्हटले आहे. त्याविषयी सांगणे कठीण आहे. तशा तर अनेक गोष्टी सिनेमातून वगैरे दिसतच असतात. त्यामुळे प्रत्यक्ष किती बळी/ गुन्हे वाढले हे सिद्ध करणे कठीण. फक्त अशा गोष्टी सांगताना जो अर्थ घेणे अपेक्षित आहे त्यासह सांगाव्यात. चार आंधळ्यांमधे एक हत्ती सोडला आणि समजा चारही जणांनी त्याला "साप", "खांब" वगैरे वेगवेगळे इन्टरप्रीट केले तरी तो हत्ती आहे हे ज्यांना माहीत आहे त्या डोळसांनी तिथेच ते आंधळ्यांच्या लक्षात आणून द्यावे म्हणजे हतीच्या पायी तुडवले जाणे टळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

उत्सुकता!

कवितानागेश
Wed, 12/22/2010 - 23:31 नवीन
सहज उत्सुकता म्हणून विचारते, हा ( http://www.misalpav.com/node/15427 ) धागा बिभत्स नाही का? आणि या ( http://www.misalpav.com/node/15606 ) धाग्यात गुरुंनी घेतलेली परिक्षा 'दुष्ट' नाही का? ही मी खरोखरच उत्सुकता म्हणून विचारत आहे. मला 'प्रगल्भ' लोकांच्या अशा शब्दांच्या व्याख्या समजून घ्यायच्या आहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हो आपण दिलेला माझा पहिला धागा

गवि
गुरुवार, 12/23/2010 - 10:18 नवीन
हो आपण दिलेला माझा पहिला धागा बीभत्स आहे आणि दुसर्‍या धाग्यात गुरुंनी दुष्ट अवघड परीक्षा घेतलेली आहे. पण मला एकमेव अर्थाने तेच म्हणायचे आहे. हातोड्यासारखा बोल्ट गन पावडरनं दणकवलेला असतो. दोन डोळ्याच्या मध्यभागी टेकवून उडवतात. यात दोन प्रकार आहेत. एक पेनीट्रेटिंग बोल्ट. हा डोक्यात घुसून मेंदूचा बराच भाग नष्ट करतो. याच्यावर बंदी आली आहे. कारण मेंदू फुटल्यामुळे त्याचे टिश्यूज रक्तप्रवाहात मिसळून ते मांस खाणा-या माणसांत मॅड काउ डिसीज फैलावू शकतो. या बीभत्स रचनेचा अर्थ तोच आणि एकच आहे. यातून दुसरा काही अर्थ निघत होता आणि तो आपणा अज्ञांस कळला नाही असं नव्हतं. ज्यावर चर्चा चालू आहे त्या कथेत ते "बाळांना चिरुन शिजवण्याचे वर्णन किती बाई किळसवाणे" असा आक्षेप माझा कधीच नव्हता. तर तसे केल्याने पुढे परीक्षा पास झाली, दर्शनप्राप्ती झाली, परमेश्वरप्राप्ती झाली वगैरे दर्शवण्याला विरोध होता. एका पोस्टमधे मी एका मांत्रिकाने मुलीला चेटकीण ठरवल्यामुळे तिच्याच आईबापांनी तिला कोंडून भुके मारलं तेव्हा ती टाचा घासत मेली. .. अजून एकः एका केसमधे स्टाफच्या इग्नोरन्समुळे इन्क्युबेटरमधे बाळं जळून मेली, याची वर्णनं केली आहेत.. जेव्हा आपण लिहितो तेव्हा ते तथाकथित आल्हाददायक असावे असे मुळीच म्हणणे नाही. पण (उदा. समजा त्याच माझ्या पोस्टमधे ) अशी पोटची पोर टाचा घासत मारल्याने त्यांच्यावर पुढे येणारे संकट टळले वगैरे अशी कथा लिहिणे मी सरळ सरळ दुरित समजतो. (आणि वरुन मग चेटकीण हे प्रतीकात्मक आहे. चेटकीण म्हणजे अस्वच्छता, रोगराई.. ती टाळणे म्हणजे चेटकीण मारणे..असे वेगळाले अर्थ समजून घेणे..!!) मी काय म्हटलंय? अवलियांची शैली आवडली..बटबटीतपणा टाळला आहे. याचा अर्थ कोणीच तसे बटबटीत बीभत्स वर्णन करु नये असा होत नाही. अवलियांनी तीच कथा वेगळ्या रसात सौम्य करुन सांगितली आहे हे पाककौशल्य मी वाखाणत होतो. फक्त अशा गोष्टी (जिथे रुपकात्मक अर्थ सर्वांना समजणे अवघड आणि आवश्यक आहे) सांगताना जो अर्थ घेणे अपेक्षित आहे त्यासह सांगाव्यात. हा मुद्दा तुम्हाला बघायचाच नाहीये असं दिसतं. खूप खूप वाईट हे वाटते की वादासाठी उत्साहित होऊन मी जे म्हणतोय स्पष्ट ते न लक्षात घेता आपण ताशेरे मारत आहात. (याचे कारण मला असे वाटते की मूळ लेखाविषयी असंख्य सहमत आणि विरोधी प्रतिक्रिया आल्या. त्यातल्या विरोधी प्रतिक्रियांचेही अनेक एकमेकांपासून वेगळे विचार होते. तुम्ही ते सर्व एकत्र करून सहमत वि. असहमत अशी चर्चा चालू केली आहेत. त्यामुळे एका व्यक्तीचा विरोधी प्रतिसाद, जो इतर अनेक विरोधी प्रतिसादांच्याही विरोधातच आहे हा विचार मागे पडला असावा..) किचकट वाटल्यास हे शेवटचे र्‍हाव दे.. :) मी प्रगल्भ आहे की नाही हे माहीत नाही पण त्या शब्दाविषयी किंवा तसे असण्याविषयी मला आकस नाही म्हणून प्रगल्भ हा तुमचा शब्द उपरोधिक म्हणून घेतला नाहीये. सॉरी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

वाद

कवितानागेश
गुरुवार, 12/23/2010 - 10:38 नवीन
माफ करा, मला देखिल वाद घालायचा नाहिये. तुमच्याशी तर वाद घालण्याचा हेतु बिलकुलच नाहिये. मला त्या कथेतुन काय कळले हे मी फक्त शेअर करत होते, कारण सरळ अर्थांचा विपर्यास होताना दिसला. मला काय किंवा कुणालाच काय मी म्हणते/तो तेच खर्रे खर्रे असं देखिल म्हणायचे नाहिये. 'बीभत्स' काहीच लोकांसमोर येउ नये असे मला देखिल वाटते, पण म्हणून जे आधीच लिहिले गेले आहे, त्याची विनाकारण (जुने म्हणजे वाइटच असे ठरवून) हेटाळणी करने योग्य नाही. (आणि ते इथे लिहिणार्‍या व्यक्तीची करणे तर तर अगदीच योग्य नाही) इथे सरळ अर्थ सांगणार्‍या प्रत्येकावर वैयक्तिक स्वरुपाचे आरोप केले गेले, त्यांमूळे चर्चेला वादाचे स्वरुप आले आहे. मला तुमच्यावर वइयक्तिक आरोप करायचा नाहिये, पण ज्या गोष्टींवर अक्षेप घेतला जातोय त्याचेच आधुनिक /थोडे सौम्य वर्णन असलेले माहितीपर लेखन चालते, हा विरोधाभास सर्वांनाच दाखवायचा होता. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या पद्धतीनी कथा लिहिल्या जातात. त्यामूळे अत्ताच्या पिढीला या अशा कथा वाचायला बर्‍या वाटणार नाहित, हे न कळण्याइतकी मी म्हातारी झाले नाहिये. शिवाय जुनेच कवटळून बसु नये हेदेखिल इथे सगळ्याना कळते. पण म्हणून अर्थाचा विपर्यास करुन विनाकारण शंख करत रहावे हे देखिल योग्य नाही. मलादेखिल असेच म्हाणायचे आहे की, खूप खूप वाईट हे वाटते की वादासाठी उत्साहित होऊन मी जे म्हणतेय स्पष्ट ते न लक्षात घेता इथे सतत ताशेरे मारले जात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हो.. लिहिणार्‍या व्यक्तीवर

गवि
गुरुवार, 12/23/2010 - 10:53 नवीन
हो.. लिहिणार्‍या व्यक्तीवर वैयक्तिक आरोप केले गेले. हे अत्यंत निषेधार्ह आहे होते आणि राहील. आम्ही तिथेच प्रथम उपलब्ध क्षणी याविरुद्ध निषेध दर्शवला/ त्याला पाठिंबा दिला.. आपण माझी पूर्वीच्या पोस्टची (दोनपैकी दोन माझीच) उदाहरणे वापरून काही सिद्ध करु पाहू गेलात म्हणून साहजिकच आपला थोडा (गैर) समज झाला असावा असे वाटून इतके टंकले. आता दूर झाला असावा. इतःपर ठीक.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

सहमत

चिंतामणी
गुरुवार, 12/23/2010 - 14:47 नवीन
हो.. लिहिणार्‍या व्यक्तीवर वैयक्तिक आरोप केले गेले. हे अत्यंत निषेधार्ह आहे होते सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

१००% सहमत

नितिन थत्ते
Tue, 12/21/2010 - 12:55 नवीन
सहमत आहे. (अवांतर: आम्ही काही लोक काळेकाका आणि गांधीवादी यांना पेपरातल्या बातम्यांचे असेच वेगळे अर्थ काढून दाखवतो. पण त्यांना ते पटत नाहीत).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

उगाच नाही बुवाबाजी वाढत आहे!

अवलिया
Tue, 12/21/2010 - 15:41 नवीन
उगाच नाही बुवाबाजी वाढत आहे! टाळ्या वाजवायला, जपनामाला, प्रेक्षक केव्हाचा तयार आहे. नाना, तुम्ही सिद्ध केलेले यंत्र, रुद्राक्ष विकायला काढा आता. एजन्सी द्या मला. अत्यंत बिनबुडाचा आरोप. माझ्या लेखामुळे बुवाबाजी वाढत आहे किंवा मी यंत्र, रुद्राक्ष विकण्याचा धंदा सुरु करण्याच्या विचारात आहे अशा प्रकारचा असंबंध्द आरोप करणार्‍या श्री सहजराव यांच्या मानसिक स्थितीत योग्य तो बदल घडो. स्पष्ट मत - सगळा शब्दछल आहे. लिहणारे पण तेच, अर्थ समजवणारे पण तेच. पुन्हा जुने शब्द / मत खोडून कालानुरुप नवे मत सांगणारे पण तेच. . कुठलेही तत्वज्ञान हे शब्दाच्या आश्रयाने असते. शब्दानेच मांडले जाते. तत्वज्ञानाचे समर्थन किंवा विरोध हा शब्दानेच होत असतो. ज्ञानाचे परस्परांमधील आदानप्रदान हे शब्दानेच होत असते. कूठलेही तत्वज्ञान हे विज्ञानाप्रमाणे प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही. त्यामुळे चोरी करु नये असा उपदेश असो किंवा अमुक अमुक नागरिकाचे हक्क आहेत असा घटना दत्त अधिकार सुद्धा शब्दांनीच मांडला जातो. त्याची कूठल्याही प्रयोगशाळेत सिद्धता मिळत नाही. तत्वज्ञानातील तत्वांचे (अगदी घटनादत्त अधिकारांचे वा हक्कांचे सुद्धा) वर्णन करुन त्यावर भाष्य करायचे असल्यास त्या काळाला सुसंगत असे भाष्य करणे अपेक्षित असते, त्यात सर्वमान्य, त्या काळाला अनुरुप, समोरील संवादकर्त्याला आणि ग्रहण कर्त्याला समजतील असेच दृष्टांत (सोपे करुन सांगण्यासाठी वापरलेली रुपके) सांगावे लागतात. यात गैर काही नाही. त्यामुळे अशा प्रकारे कूणी समजावून सांगत असेल तर त्यातला हेतु नीट न समजणे हे अज्ञान असल्याचे लक्षण असल्याने त्यावर विशेष टिपण्णीची गरज नाही. कित्येक शतकानुशतके ह्या अश्या मांडण्या करुन विशिष्ट लोकांची पोटे भरली, पण अजुन पुरे झाले नाही आहे असेच दिसते सदर लेख लिहुन मला मिपा मालक किंवा संपादक किंवा सदस्य यांच्याकडून कोणतेही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मानधन मिळाले नाही. त्यामुळे माझ्या पोट भरण्यात सदर लेखापासुन असलेल्या मिळकतीचा काहीही वाटा नाही हे मी नमुद करु इच्छितो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

जाउ द्या हो !!

अर्धवटराव
Wed, 12/22/2010 - 01:36 नवीन
तुमचं निरुपण बाकी फार छान झालय. __/\__ अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

सहमत

प्रियाली
Tue, 12/21/2010 - 18:45 नवीन
स्पष्ट मत - सगळा शब्दछल आहे. लिहणारे पण तेच, अर्थ समजवणारे पण तेच. पुन्हा जुने शब्द / मत खोडून कालानुरुप नवे मत सांगणारे पण तेच. कित्येक शतकानुशतके ह्या अश्या मांडण्या करुन विशिष्ट लोकांची पोटे भरली, पण अजुन पुरे झाले नाही आहे असेच दिसते.
गुरुपेक्षा भक्त हुशार असतात त्याचे उदाहरण वाटते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

सहजराव

मुक्तसुनीत
Tue, 12/21/2010 - 20:21 नवीन
टाळ्या वाजवायची स्मायली शोधतो आहे :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

स्पष्ट मत - सगळा शब्दछल आहे.

आमोद शिंदे
Tue, 12/21/2010 - 20:38 नवीन
स्पष्ट मत - सगळा शब्दछल आहे. लिहणारे पण तेच, अर्थ समजवणारे पण तेच. पुन्हा जुने शब्द / मत खोडून कालानुरुप नवे मत सांगणारे पण तेच. कित्येक शतकानुशतके ह्या अश्या मांडण्या करुन विशिष्ट लोकांची पोटे भरली, पण अजुन पुरे झाले नाही आहे असेच दिसते.
अभिनंदन श्री.सहज. स्पष्टवक्ता परखड प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 12/21/2010 - 22:27 नवीन
उत्तम प्रतिसाद. मुलं कापण्याची रूपकं जुनी, कालबाह्य आणि बेकायदेशीर वाटू शकतात; (मिपावर पहाता अनेकांना ती तशीच वाटतात). तेव्हा आधुनिक बाबा, बुवा, गुरूजी, माता, देवाचे दलाल, बडवे, पुजारी, उत्पात, निरूपणाचार्य, कीर्तनकार हे लोकं नवीन गोष्टी का नाही हुडकून काढत किंवा बनवत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

+१

क्लिंटन
Tue, 12/21/2010 - 22:50 नवीन
+१
तेव्हा आधुनिक बाबा, बुवा, गुरूजी, माता, देवाचे दलाल, बडवे, पुजारी, उत्पात, निरूपणाचार्य, कीर्तनकार हे लोकं नवीन गोष्टी का नाही हुडकून काढत किंवा बनवत?
त्याचे काय आहे, हजारो वर्षांपूर्वी कोणीतरी काहीतरी लिहून ठेवले ते केवळ धर्मग्रंथात लिहिले या एका कारणाने त्यावर स्वत:चा विचार न करता "परंपरा जपायच्या" या गोंडस नावाखाली त्याच त्याच गोष्टी पिढ्यानपिढ्या चालू ठेवण्यात लोक धन्यता मानतात.अशा गोष्टींना साधे क्वेश्चन करणारे लोक पाखंडी आणि हिंदूविरोधी समजले जातात.म्हणजे कोण हिंदू समर्थक आणि कोण विरोधी हे ठरवायचा अधिकार अशा ठराविक मंडळींना दिलेला असतो (की कोणीही न देता तो त्यांनी स्वत:कडे घेतलेला असतो)." असे त्यांना अडचणीत टाकणारे प्रश्न विचारणाऱ्यांना "हिंदूविरोधी" म्हणणारे लोकच मोठ्या तोंडाने "आमचा हिंदू धर्म किती सहिष्णू" असेही म्हणतात. अशा वातावरणात कोण नवीन काही निर्माण करायला जाईल?तेव्हा अशा स्वयंघोषित हिंदू समर्थकांकडे दुर्लक्षच केलेले इष्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

उत्तम

आजानुकर्ण
Wed, 12/22/2010 - 10:11 नवीन
.अशा गोष्टींना साधे क्वेश्चन करणारे लोक पाखंडी आणि हिंदूविरोधी समजले जातात.म्हणजे कोण हिंदू समर्थक आणि कोण विरोधी हे ठरवायचा अधिकार अशा ठराविक मंडळींना दिलेला असतो (की कोणीही न देता तो त्यांनी स्वत:कडे घेतलेला असतो).
वा!
अशा स्वयंघोषित हिंदू समर्थकांकडे दुर्लक्षच केलेले इष्ट.
सहमत (हिंदू) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

असे त्यांना अडचणीत टाकणारे

Nile
गुरुवार, 12/23/2010 - 00:23 नवीन
असे त्यांना अडचणीत टाकणारे प्रश्न विचारणाऱ्यांना "हिंदूविरोधी" म्हणणारे लोकच मोठ्या तोंडाने "आमचा हिंदू धर्म किती सहिष्णू" असेही म्हणतात.
क्लिंटनराव, क्या बात है! नुकतंच कुणाच्यातरी सहित असलीच काहीतरी बरळ वाचल्यासारखं वाटतंय. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

द्वयर्थी

राजेश घासकडवी
Wed, 12/22/2010 - 01:38 नवीन
स्पष्ट मत - सगळा शब्दछल आहे. लिहणारे पण तेच, अर्थ समजवणारे पण तेच. पुन्हा जुने शब्द / मत खोडून कालानुरुप नवे मत सांगणारे पण तेच.
अगदी योग्य मुद्यावर बोट ठेवलंत. चांगलं म्हणजे काय व वाईट म्हणजे काय हे समजावून सांगणाऱ्या लेखनात मुळातच संदिग्धता असता कामा नये. जर दोन अर्थ निघत असतील तर चांगला तेवढा घ्यावा व वाईट सोडून द्यावा असं म्हटलं तर काय अर्थ आहे? द्वयर्थी अश्लील लेखनात 'चांगला तेवढा घ्यावा' असं म्हणता येतं का? संस्कृतीचे रक्षक स्वतः वाईट अर्थ घेऊन बोंब मारणारच. शेवटी 'सोयीस्कर अर्थ घ्यावा व तो अर्थ सांगण्याचा मक्तादेखील सोयीस्करपणे स्वतःकडे घ्यावा' हेच खरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

सहजकाकांची एंट्री आवडली, आमचे

Nile
गुरुवार, 12/23/2010 - 07:46 नवीन
सहजकाकांची एंट्री आवडली, आमचे प्रतिसाद टंकायचे कष्ट वाचवल्याबद्दल आभार. नाना ह्या बुवावाजीच्या धंद्यात उतरले* तर बक्कळ पैसा कमावतील असे भविष्य त्यांच्या नाड्या हातात न घेता वर्तवतो. *मुळात आहेत की नाहीत हे आपल्याला ठावुक नाही ब्वॉ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

नाना ह्या बुवावाजीच्या

आमोद शिंदे
गुरुवार, 12/23/2010 - 07:48 नवीन
नाना ह्या बुवावाजीच्या धंद्यात उतरले* तर बक्कळ पैसा कमावतील असे भविष्य त्यांच्या नाड्या हातात न घेता वर्तवतो.
सहमत आहे. नानांकडे ते कौशल्य चांगले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

सहमत आहे. स्वामी विवेकानंद,

अवलिया
गुरुवार, 12/23/2010 - 08:34 नवीन
सहमत आहे. स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याप्रमाणे भारतीय तत्वज्ञानावर व्याख्याने देण्याचा विचार आहे. आता ही उल्लेख केलेली मंडळी बुवाबाजी करत होती का ते माहित नाही. आणि त्यातुन त्यांना किती आर्थिक लाभ होत होता ते माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

ती गोष्ट सहा आंधळ्यांची

विजुभाऊ
Tue, 12/21/2010 - 11:14 नवीन
ती गोष्ट सहा आंधळ्यांची आहे. रामदासकाकानी त्यात सातवा आंधला अ‍ॅड केलाय. पण त्या सातव्या आंधळ्यामुळे हत्तीने त्या सर्वाना पायतळी तुडवले
  • Log in or register to post comments

मुळात आंधळेच असणार्‍यांना

गवि
Tue, 12/21/2010 - 11:17 नवीन
मुळात आंधळेच असणार्‍यांना आपल्यासोबत अजून तीन आंधळे आहेत , चार आहेत की पाच हेही पटकन कळणे अवघड. त्यामुळे संख्या चुकू शकते.. आम्हाला चारच वाटले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

दोन पैसे:

प्यारे१
Tue, 12/21/2010 - 18:19 नवीन
अवलियाच्या (दत्तप्रभूना अवलिया ही म्हणतात) रसाळ निरुपणानंतर खरंतर काही लिहायला नको पण, दत्त महाराजांच्या आई वडिलांबद्द्ल थोडे लिहावेसे वाटले. आईचे नाव अनसुया आणि वडील अत्रि. अन्-असूया आणि अ-त्रि. थोडी फोड केल्यावर लक्षात येते की, दत्त कोणापोटी जन्म घेतात? जिला अजिबात असूया वाटत नाही तिच्या आणि अ त्रि म्हणजे जे त्रि-तीन गुणांच्या पलिकडे गेलेले आहेत अशा वडिलांच्या पोटी. जरी वर त्रिगुणात्मक असे म्हटले असले तरी दत्त महाराज हे त्रिगुणातीत आहेत. ब्रह्मदेव रज, विष्णू सत्त्व आणि शंकर तमोगुणाचे स्वामी आहेत. आणि अर्थातच स्वामी हा नियंता /नियंत्रण करणारा अशा अर्थाने वापरला आहे. दत्त हे या तिन्हीचे मिळून रुप असल्याने साहजिकच ते तिन्ही गुणांचे अधिपती आणि त्रिगुणावतार अशा अर्थाने म्हटले गेले आहेत. शिवाजी दुसर्‍याच्या घरी जन्मावा अशी इच्छा असणार्‍या लोकांसाठी परमार्थ नाही. रोख ठोक मामला. पेहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे सारखा आणि अत्यंत व्यक्तिगत. मला कोणाबद्द्ल किती असूया वाटते आणि मी कुठ्ल्या गुणाच्या (सत्व, रज, तम) प्रभावाखाली (दारुडा दारुच्या असतो तसे) आहे हे न जाणून घेता, दुसर्‍या व्यक्ति, मत,विचारधारा यांवर झोड उडवणारे लोक बघितले की कीव येते. दत्त आहेत का, खरे की खोटे या प्रश्नाआधी किमान दुसर्‍या बद्दल असूया मत्सर द्वेष नसणे एवढे मिळाले तरी पुरे. अवांतरः बाकी मोर नाचताना त्याचा फुललेला पिसारा बघायचे सोडून मागे जाऊन त्याचा पार्श्वभाग बघणार्‍यांबद्दल काय बोलावे....????
  • Log in or register to post comments

हा हा हा

कवितानागेश
Tue, 12/21/2010 - 18:35 नवीन
पार्श्वभाग बघणार्‍यांबद्दल काय बोलावे....????>>>> ...मला वाटते हल्ली सर्वांगीण विचार या अशाच कृतीला म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

राजा नागडा आहे

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 12/21/2010 - 22:37 नवीन
सर्व संत्री-मंत्री "वाह वा, काय सुंदर आहे राजाचा अंगरखा" असं म्हणत असताना "राजा नागडा आहे" असं ओरडणर्‍या मुलाची गोष्ट आठवली. तिरळ्या राजाचं सुंदर चित्र काढण्याची जबाबदारी खांद्यावर पडलेला चित्रकार, राजा एक डोळा बंद करून बाण सोडण्याचा तयारीत आहे, असं चित्र काढतो अशीही एक गोष्ट आहे. =================================================== 'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट' का 'जो बात तुझ में है तेरी तस्वीर मे नही' हा फक्त दृष्टीकोनाचाच मुद्दा असतो. नसणार्‍या मोराचा नसलेला पिसारा बघणं सोपं नसावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

बाकी मोर नाचताना त्याचा

Nile
गुरुवार, 12/23/2010 - 00:24 नवीन
बाकी मोर नाचताना त्याचा फुललेला पिसारा बघायचे सोडून मागे जाऊन त्याचा पार्श्वभाग बघणार्‍यांबद्दल काय बोलावे....????
पार्श्वभाग दाखवुन नाचणार्‍या गाढवाकडे पाहुन काय उमदा घोडा आहे असे म्हणणारे निराळेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

सुंदर

गुंडोपंत
Wed, 12/22/2010 - 06:07 नवीन
श्री गुरुदेव दत्त! फार सुरेख विवेचन, मस्त निरूपण. याच धर्तीवर अजून लेखन करावे ही मनापासून विनंती!
  • Log in or register to post comments

+१

वडिल
Wed, 12/22/2010 - 12:11 नवीन
हेच म्हणतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत

वाहवा छान चर्चा चालली आहे.

llपुण्याचे पेशवेll
Wed, 12/22/2010 - 09:42 नवीन
वाहवा छान चर्चा चालली आहे. चांगले वैचारीक वाचायला मिळाले. नानासाहेबांचे निरुपण तर क्लासच. वर अजून कोणीतरी अत्रि -अनसूया यांच्याबद्दल लिहीलेले पण छानच आहे. पटले. =================================================== 'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट' का 'जो बात तुझ में है तेरी तस्वीर मे नही' हा फक्त दृष्टीकोनाचाच मुद्दा असतो. नसणार्‍या मोराचा नसलेला पिसारा बघणं सोपं नसावं पण पार्श्वभाग बघणं असावं. कारण तसे करताना अनेक लोक दिसतात.
  • Log in or register to post comments

+१

वारकरि रशियात
गुरुवार, 12/23/2010 - 14:14 नवीन
आध्यात्मिक (रूपक) कथेची कोडी सोडवण्यासाठीची किल्ली. खरेतर सर्व (अंतर्मुख व बहिर्मुख) शास्त्रांच्या अभ्यासात हा प्रश्न पडतो व सोडवता यावा लागतो (च). टिंगल तर सर्वच गोष्टींची करता येते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

वा! नाना. छान निरुपण. अजुन

मितभाषी
गुरुवार, 12/23/2010 - 22:03 नवीन
वा! नाना. छान निरुपण. अजुन येवु द्या.
  • Log in or register to post comments

वा

स्पा
गुरुवार, 03/20/2014 - 22:02 नवीन
वा
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा