पारध
"भिंतींवर थुंकणारा माणसाची औलाद नसेल" या खास पुणेरी पद्धतीच्या पाटीने आमचे जंगी स्वागत केल्यावर आम्ही आमचा मोर्चा तिकीटखिडकीकडे वळवला. प्रभातच्या दारावर तिकीट घेणारे आजोबा मी गेल्या १८ वर्षांपासून बघत आलोय. ते अजूनही तसेच दिसतात. पुणेरीपणाची 'सिनेमा बघायचाय तर बघा नाहीतर शनिवारवाडा बघा पण दारातून लवकर टळा' अशी एक खास मिजास चेहर्यावर ठेवून ते आत्मीयतेने तिकीटे फाडतात. तिकीटखिडकीवर मी ५०० ची नोट देत "दोन द्या" असे म्हटल्यावर तिथल्या माणसाने चेहर्यावरची सुरकुतीही न हलू देता थंडपणे "सुट्टे द्या!" अशी पुणेरी संयत डरकाळी फोडल्यावर मी गुपचूप सुटे काढून दिले. मला एकदम पुलंच्या 'नाथा कामत' मधला क्रूड ऑईल पिणारा शित्या सरमळकर आठवला. "दीड दमडीच्या पिना घेता आणि धाच्या नोटा काय नाचवता?" असे काहीसे तो मनातल्या मनात (आता जमाना बदललाय म्हणून) म्हटला असेल असे वाटून गेले.
बाकी "भिंतींवर थुंकणारा माणसाची औलाद नसेल" या पाटीने आमची खूप करमणूक केली. यांच्या तर्कानुसार भिंतीवर थुंकणारा जर माणसाची औलाद नसेल तर त्याला ही पाटी कशी काय वाचता येईल असा फालतू प्रश्न मनात डोकावून गेला. जाऊ द्या...
आत आलो आणि विको वज्रदंतीच्या आणि विको टरमरीकच्या तरुणपणीच्या मॄणाल कुळकर्णीच्या हास्याने फुललेल्या प्राचीन जाहिराती बघून बरे वाटले. "कील मुहासों को जड से मिटायें, हल्दी चंदन के गुण इसमें समायें..." अशी परिचित ओळ ऐकल्यावर एकदम ऐंशी-नव्वदीतल्या काळात मन जाऊन पोहोचले. यथावकाश 'पारध' सुरु झाला.
सुरुवातच पवनचक्यांनी सजलेल्या डोंगराखालच्या रस्त्याने जाणार्या अलिशान गाड्यांमधून ऐकू येणार्या संवादांनी होते. एक शासकीय समिती पवनचक्क्यांमुळे पर्जन्यमानावर होणार्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी एका गावात येत असते आणि येता-येता कोंबडीच्या पार्टीचे बेत आखत असते. खेड्यातली माणसे, शेतकर्यांच्या आत्महत्या, खेड्यातल्या लोकांच्या समस्या याविषयी त्यांची 'अभ्यासपूर्ण' मते ऐकून वैतागलेला एक तरूण त्याच्या विचारांमधून त्याचे खेड्यातले आयुष्य आणि त्याच्या कुटुंबाची झालेली वाताहत याविषयी प्रेक्षकांना सांगतो आणि फ्लॅशबॅक पद्धतीने चित्रपट उलगडतो.
तीन भाऊ, एक विवाहित, तिघांचे वृद्ध वडिल, एक बहीण असे मोठे कुटुंब. मोठा भाऊ काबाडकष्ट करून शेती पिकवतो. कुटुंब वारकरी संप्रदायातले. सगळ्यात धाकटा शिकतोय आणि मधला एका स्थानिक पुढार्याच्या नादी लागून स्वतःला वाघ-बिघ समजतोय. बहीण लग्नाशिवाय घरात बसून आहे. मोठ्या भावाच्या मनावर वाढत्या वयाच्या बहीणीच्या लग्नाचं, धाकट्या भावाच्या शिक्षणाचं , आपल्या पिल्लांच्या शिक्षणाचं आणि मधल्या भावाच्या भविष्याचं असं सारं एकत्रित ओझं आहे. वहिनी नेटाने घर चालवते आहे. चित्रपट इथून पुढे सरकत जातो. अमरभाऊ नावाचा एक कुटील राजकारणी मधल्या भावाला (यशवंत) हाताशी धरून प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करतो. यशवंतचं महत्व वाढत जातं. घरात पैसा येतो पण मोठा भाऊ (विठू) या अचानक आलेल्या पैशाने सैरभैर होतो. असा आलेला पैसा, बहीणीला सुटलेली पैशाची हाव, त्या मार्गाने घरात शिरलेलं व्यसन आणि यशवंताची अरेरावी यामुळे विठू हतबुद्ध होतो. नंतर बहीणीने अमरभाऊच्या खास माणसासोबत वाढवलेली 'मैत्री ' कुटुंबाच्या संस्कारांवर एक मोठा आघात करते. विठू हताशपणे हे सगळं बघत असतांना राजकारण टिपेला पोहोचतं आणि मग पुढे काय होतं याचं प्रभावी चित्रण म्हणजे 'पारध'.
'पारध'ची पहिली दमदार बाजू म्हणजे प्रभावी आणि पुरेशी वेगवान पटकथा. कथा तशी ढोबळ आहे आणि आधी बर्याचदा पडद्यावर येऊन गेलेली आहे. 'अर्जून', 'भ्रष्टाचार' अशा हिंदी आणि 'सरकारनामा' सारख्या मराठी चित्रपटांमधून अशा पद्धतीची कथा येऊन गेलेली आहे. पण 'पारध'चं वैशिष्ट्य म्हणजे त्याची सशक्त पटकथा आणि दिग्दर्शकाने सादरीकरणाला दिलेला वेगळा चेहरा. गजेन्द्र अहिरेंनी चित्रपट कुठेही कंटाळवाणा होणार नाही याची खबरदारी घेतलेली आहे. पुरेसा वेग ठेवून त्यांनी प्रेक्षकांना गुंतवून ठेवले आहे. मुख्य भूमिकांचे कंगोरे अधोरेखित करण्यात ते बर्यापैकी यशस्वी होतात. मारुतीबाबा (विनय आपटे) हे पात्र मात्र अतिशय प्रभावहीन आणि अनावश्यक वाटतं. एखाद्या मुरब्बी राजकारण्याप्रमाणे वावरणारे हे पात्र प्रत्यक्षात कुठलीच राजकीय खेळी खेळत नाही. कुठल्याच पकड घेणार्या प्रसंगात या पात्राचं अस्तित्व नसतं. यशवंताची तरुणपणातली 'वाघ' होण्याची खुमखुमी, त्याची अरेरावी, अमरभाऊसमोर गळणारी त्याची लाचारी हे सगळे पैलू अतिशय प्रभावीपणे बाहेर येतात. अमरभाऊचा उजवा हात बाबा देखील अगदी चपखल बसलेला आहे. त्याच्यातला बेरकीपणा आणि परिस्थितीनुरुप रंग बदलण्याची वृत्ती खुबीने दाखवली आहे. इंदू (बहीण) गरीब शेतकरी घरातल्या असहाय आणि वाढलेल्या वयाच्या विवाहोत्सुक आणि सुखलोलूप तरुणीचं परिणामकारक प्रतिनिधित्व करते. या भावंडांचे वृद्ध वडिल मात्र तितकेसे रंगलेले नाहीत. धक्कादायक प्रसंगातही ते गप्प-गप्प राहतात आणि अगदी परक्या व्यक्तीसारखे फक्त मान हलवतात. कुठलाच बाप आपल्या घरात घडणार्या अनपेक्षित घटनांना इतका थंड प्रतिसाद देईल असे वाटत नाही. दिग्दर्शन मनाची पकड घेते. पटकथेला न्याय देणारे दिग्दर्शन आहे असे वाटते.
तांत्रिक पातळीवर 'पारध' ठीक-ठाक आहे. चित्रीकरण तितकंसं खास नाही (की प्रभातचा पडदा काळपट होता कुणास ठाऊक). अंधारलेलं चित्रीकरण चित्रपट बघतांना त्रासदायक वाटतं आणि त्यामुळे रसभंग होतो तो वेगळाच. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' किंवा 'लालबाग परळ' या चित्रपटांच चित्रीकरण अगदी स्वच्छ आणि चकचकीत वाटतं. 'पारध' त्या बाबतीत थोडा कमी पडतो. पार्श्वसंगीत पुरेसं परिणामकारक आहे. चित्रपटात दुसर्या भागात जाणवणारी उत्सुकता, गडदपणा पार्श्वसंगीताने व्यवस्थित पकडला आहे.
थोडा ताण हलका करण्यासाठी इंदूचं पात्र थोडं भोळसट दाखवलेलं आहे. अमरभाऊच्या खास माणसाच्या (बाबाच्या) मदतीने ती कर्ज घेऊन गायी घेते. त्यांची नावे काय ठेवायची या विचारात असतांना यशवंता 'ऐश्वर्या' आणि 'कतरिना' अशी नावे सुचवतो. त्याला थोडा चावट प्रतिसाद म्हणून इंदू यशवंताला 'चावट' ठरवते आणि 'ही नावं ठेवली तर ऐश्वर्याचं दूध काढलं का? कतरिनाचं दूध काढलं का? असं विचारावं लागेल" असं म्हणून प्रेक्षकांचा ताण हलका करते. 'पारध्'चे संवाद देखील परिणामकारक वाटले. एका प्रसंगात बाबा विनाकारण एका स्त्रीला त्रास देतो म्हणून यशवंता त्याला झापतो. "आपण अमरभाऊचे कार्यकर्ते आहोत; पारावरचे गुंड नाहीत" असे म्हणून तो त्या बाईची मनापासून माफी मागतो.
अभिनयाच्या बाबतीत मला व्यक्तीशः आवडला सिद्धार्थ जाधव! यशवंताची भूमिका अक्षरशः जगलाय हा माणूस! चेहर्यावरचे हावभाव, देहबोलीतून अभिनय, डोळ्यांमधून भावनाविष्कार... सगळंच अप्रतिम. अमरभाऊने टाकलेला विश्वास, अमरभाऊचं घरी येणं, अमरभाऊने आपल्याला आपण 'वाघ' आहोत असं सांगण्यातली नशा हे सगळे कंगोरे सिद्धार्थने अतिशय समर्थपणे रंगवले आहेत. एका प्रसंगात यशवंता अमरभाऊची एक कामगिरी फत्ते केल्यावर आधाश्यासारखा चिकनची तंगडी हादडत असतो. मागून अमरभाऊ येतात आणि यशवंता अगदी लाचारीने त्याच्याकडे बघून हसतो. अमरभाऊ त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला नीट जेवायला सांगतो. या प्रसंगात सिद्धार्थने लाचारी, भूक, अमरभाऊचे खास माणूस असल्याचा उन्माद, तोच आपला अन्नदाता असल्याची भावना या सगळ्या छटा इतक्या छान दाखवल्या आहेत की खरचं जवाब नाही. नंतर 'वाघ' असल्याची गुर्मी, अमरभाऊ मागे असल्यावर आपलं कोण काय बिघडवेल हा माज, कुटुंबाविषयीची काळजी, बहिणीचा वापर झाल्याचा राग, जीवाच्या आकांताने पळणारा यशवंता, हे सगळं सिद्धार्थ ताकदीने उभे करतो.
मिलिंद शिंदे मूर्तिमंत हरामखोरपणा जिवंतपणे उभा करतात. यशवंताच्या बहीणीला गेस्टहाऊसवर बोलावून तिला साळसूदपणे 'आपल्याला बलात्कार नाही करायचा' असे सांगणारा आणि नंतर निर्लज्जपणे तिला 'ऑफर' देणारा, शेवटी यशवंताच्या जीवावर उठलेला, अमरभाऊला देखील अप्रत्यक्षरीत्या आपली नखे दाखवणारा बाबा मिलिंद शिंदेंनी अतिशय छान साकारलाय. अभिनयातला आक्रस्ताळेपणा जर त्यांनी कमी केला तर त्यांचा अभिनय अधिक जमून येईल.
यशवंताची बहीण (अभिनेत्रीचं नाव माहित नाही) मस्त झालीय. टीव्हीवर बघून छानछोकीचे आयुष्य जगायला मिळावे म्हणून धडपडणारी, भावाच्या रक्षणासाठी झटणारी, क्षणिक सुखासाठी बाबाच्या आहारी जाणारी आणि उघडपणे तिच्या या कृत्याचं समर्थन करणारी इंदू अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवते.
विठूच्या भूमिकेत रवी काळे छाप पाडतो. असहाय गरीब शेतकरी त्याने चांगला उभा केला आहे. अमरभाऊच्या भूमिकेत मकरंद अनासपुरेने गहिरे रंग भरले आहेत. खलनायकाची भूमिका असणारा त्यांचा हा कदाचित पहिलाच चित्रपट असावा. नाकपुड्या फुगवून, डोळे विस्फारून बेरकीपणा दाखवण्याची त्यांची लकब वाखाणण्याजोगी आहे. त्यांना नेहमीच्या साचेबद्ध विनोदी भूमिकांमधून बाहेर पडून वेगळं काही करण्याची संधी मिळाली आहे त्याचा त्यांनी उपयोग करून घ्यावा. त्यांच्या संवादातलं वाक्याच्या शेवटी त्यांनी बोललेलं 'हाव्व...' मात्र तितकसं नैसर्गिक वाटत नाही.
वडिलांच्या भूमिकेत शाहीर विठ्ठल उमप, मारुतीबाबाच्या भूमिकेत विनय आपटे ठीक आहेत. धाकट्या भावाची भूमिका करणारा अभिनेता देखील यथायोग्य.
असा हा 'पारध' मनाला भिडतो हे खरं. आवर्जून पहावा असा चित्रपट!
चित्रपट संपल्यावर बाहेर आलो. पाटीचा फोटो काढायचा होता. मोबाईलमध्ये काढला. इथे डकविण्याची इच्छा होती पण तो मोबाईलवरून काँप्युटरवर कसा घ्यावा ही समस्या असल्याने तूर्तास ती योजना विचाराधीन आहे. शिवाय तुम्ही मंडळी प्रभातला जालचं की 'पारध' बघायला. तेव्हा बघून घ्या ती पाटी! काय?
प्रतिक्रिया
डोबिंवली फास्ट + झेंडा = पारध
मस्त जमलय परिक्षण लगे
विस्तृत परिक्षण
मस्त
छान परिक्षण.
मनापासुन...
परीक्षण आणि अवांतर क-ड-क
मस्त परीक्षण
चांगलं परिक्षण. आणि
छान परिक्षण रे.. नक्की बघणार
धन्यवाद!
कालच पाहिला
पारध
ही पहा
मस्त परीक्षण.