सगळीकडे दिवाळी चालू होते धनत्रयोदशीला. पण काही घरांसारखी माझ्याही घरी ही चाहूल आधीपासूनच लागते. आधी घरी चार-पाच म्हशी होत्या तेव्हा काही काळजी नसायची. एकादशीला आई, आत्या, आणि घरोघरच्या लक्ष्म्या भल्या पहाटे उठत. (आता असे फक्त म्हणावं लागतंय. एकादशीला घरी असल्याला लै सालं उलटली). आम्ही त्यानंतर अर्ध्या तासाने डोळे चोळत बाहेर जाऊ तोवर तिचा अंगणात शेणसडा घालून झालेला असायचा. मला आईच्या कामात लुडबुड करायची असायचीच, पण ती मोठ्या ठामपणे माझा बेत हाणून पाडायची. तिथून उठून रांगोळ्या काढणार्या बहिणींच्यात गेले, तरी तिथेही तीच गत.