समाज
काही न बदलणे हा इथला रिवाज आहे!
सुखासाठी तुझ्या मी धडपडावे वाटले होते
(कधी काळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते)
जरी तू चालली होतीस माझी साथ सोडूनी
वळून एकदा मज तू बघावे वाटले होते
तुला मी पाहिले जेव्हा, तुझ्याशी बोललो जेव्हा
असे सुंदर कुणी अपुले असावे वाटले होते
लबाडीने जरी ते खेळती जिंकावया सारे
तिच्यासाठी मला सारे हरावे वाटले होते
मला स्वीकार वा झिडकार तू मंजूर आहे पण
तुझ्यासाठी मला 'अनघड' सजावे वाटले होते
रदिफ,काफिया, गझल ह्यातुनी कशावर भाळले नक्की?
रुपाला की तिच्या घाटाला, मी काय चाळले नक्की?
कविता माझ्या, लेखही माझे, अन अस्फुट काही उरलेले
सारे तुला जर पाठच होते, काय जाळले नक्की?
गोठलेला स्पर्श तिचा तो अजून खांद्यावरती आहे,
ओलावा हा स्वतःच सांगे अश्रू कुणी ढाळले नक्की.
तुझ्या नि माझ्या कथेतले ते 'प्रकरण' सुरेख होते,
सारे लिहूनी कमीच काही, काय गाळले नक्की?
गळ्यातल्या त्या सूत्रामध्ये मंगळ काही दिसले नाही,
माझे नाव कुठे कुठे अन् कसे माळले नक्की?
योग बापडा कधीच जमून आला नाही
भेट म्हणाला होता अजून आला नाही
.
जगास विसरून त्याच्या मध्ये गुंतत गेले
त्याला कळले होते कळून आला नाही
.
मनापासुनी किती काळजी माझी त्याला
कठीण घेणे निरोप म्हणून आला नाही
.
यश कीर्तीचे त्याला होते सदा वावडे
किर्ती सोबत माझ्या बघून आला नाही
.
वाट पाहणे सोड एकदा हारवल्यावर
काळ कधीही तुष्की वळून आला नाही
.
तुष्की नागपुरी