मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फलज्योतिषाची उपयुक्तता

प्रकाश घाटपांडे · · काथ्याकूट
युयुत्सु महाराजांच्या या धाग्यातील पहिल्या दोन परिच्छेदाशी आम्ही सहमत आहोत. फलज्योतिषाची काहि लोकांसाठी असलेली उपयुक्तता आम्हाला मान्य देखील आहे. सर्वच ज्योतिषी हे जातकाच्या मानसिकतेचा गैरफायदा घेतात अस सरसकट मी म्हणू शकत नाही. फलज्योतिष हे विज्ञान नसेना का पण उपयुक्त तर आहे? त्याची उपयुक्तता कोणास व कशी यावर ते अवलंबून आहे. दारुच्या आहारी गेलेल्या माणसाला दारु ही त्याच्यासाठी उपयुक्तच नव्हे तर उपकारकही वाटत असते!दारू, गांजा, अफू यामुळे माणूस आपली दु:खं काही काळ का होईना विसरतो म्हणून त्याने व्यसनात बुडून जाणे हा काय त्यांच्या दु:खावरचा ईलाज झाला का? प्रथम, ते उपयुक्त का नाही, इतकेच नव्हे तर ते उपद्रवकारक का आहे ते पाहू. एक सश्रद्ध गृहस्थ ज्योतिषाकडे कधीही जात नसत. त्याचे कारण सांगताना ते म्हणाले, ''हात दाखवून अवलक्षण का करून घ्यायचे?`` याचा अर्थ असा की भविष्यात घडणार असलेल्या प्रतिकूल घटना आधी कळून घेउन उगीच मन:स्ताप कशाला करून घ्यायचा ? जे होणार आहे ते अटळ आहे हे जर खरे असेल तर ते आधी कळण्याने काय फायदा ? नसत्या विवंचनेला आपण होउन का आमंत्रण द्यायचे ? यावर ज्योतिषीलोक जो युक्तिवाद नेहमी करतात तो असा. चक्रीवादळ टाळता येत नाही म्हणून वेधशाळेने ते वर्तवूच नये का? पुढे येणार असलेल्या प्रतिकूल परिस्थितीची आधी कल्पना आली तर माणूस त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करू शकतो. प्रतिकूल परिस्थितीची तीव्रता कमी व्हावी यासाठी व्यवहारी किंवा दैवी उपाय योजू शकतो. उन्हाळा आहे कडकडीत उन थोपवणे काही आपल्या हातात नाही पण चपला घालणं, टोपी घालणं, छत्री घेणं हे तर आपल्या हातात आहे ना! त्यामुळे उन्हाचे चटके तर बसत नाहीत ना. या युक्तिवादात हे गृहीत धरण्यात आले आहे की ज्योतिष्यांना आगामी घटनांची कल्पना आधी निश्चितपणे येउ शकते. आणखीही एक गोष्ट नकळत गृहीत धरली आहे ती म्हणजे जे होणार आहे ते पूर्णपणे अटळ नाही. त्यात माणसाच्या प्रयत्नाने थोडाफार फेरबदल होउ शकतो. ही दोन्ही गृहीतकृत्ये वादग्रस्त आहेत. चक्री वादळाचे उदाहरण इथे गैरलागू आहे. वेधशाळेने चक्रीवादळ वर्तवल्यामुळे ते टाळता आले नाही तरी त्याची सत्यता तपासता येते. उपग्रहाद्वारे त्याचे चित्रण बघता येते. चक्रीवादळांचे अंदाज तपासता येतात कारण त्यांचा संख्यात्मक अभ्यास उपलब्ध असतो. परंतु ज्योतिषांच्या भााकितांबाबत असा अभ्यास केला जात नाही. फलज्योतिषाचे अनिष्ट भाकित योगायोगाने खरे ठरले तर 'बघा! सांगितले होते. पण ऐकले नाही.` असे म्हणता येते. खोटे ठरले तर 'योग्य ते उपाय, तोडगे केले म्हणून अरिष्ट टळले` असेही म्हणण्याची सोय आहे. प्रतिकूल परिस्थितीने हैराण झालेला माणूस ज्योतिष्यांचा सल्ला घेण्यासाठी पैसे खर्च करीत असतो. चांगल्या गोष्टी घडणार असल्याचे भाकीत सांगून ज्योतिषी त्याला दिलासा व आधार देउ शकतो, किंवा आताचे वाईट दिवस लवकरच संपणार आहेत अशी मनाला उभारी देउ शकतो हे जरी खरे असले तरी त्यासाठी त्या बिचाऱ्याचा आधीच हलका झालेला खिसा आणखी हलका होत असतो. भरल्या गाडीला सुपाचे काय ओझे? या विचाराने दैवी उपाय करण्यासाठी प्रसंगी माणूस कर्जसुद्धा काढतो. फलज्योतिष हे जर खरोखरीच विश्वसनीय शास्त्र असते तर हा खर्च कारणी लागला असे म्हणता आले असते. पण तशी वस्तुस्थिती नाही, आणि हेच तर आम्हाला पुढे सांगायचे आहे.मन खंबीर करण्यासाठी आवश्यक अशी उपाययोजना केली तर सतत उठसूट ज्योतिषाचा आधार लागण्याची मानसिकता निर्माण होणार नाही. लहान मूल सुद्धा स्वत:च्या पायावर उभे रहाण्यासाठी आवश्यक तेवढाच आईचा आधार घेतं. नंतर आईचा हात सोडूनच चालायला शिकतं ना? खाचखळग्याच्या रस्त्यावर, अवघड ठिकाणी गिर्यारोहक सुद्धा काठीचा, दोराचा आधार घेतातच ना! पण तो तेवढयापुरताच. आधार घ्यावा लागणं ही गोष्ट स्वाभाविक आहे. पण हा आधार विवेकपूर्ण असावा. पत्रिका पहाण्याच्या प्रथेमुळे लग्ने जुळवण्यात येणाऱ्या अडचणीत आणखीच भर पडते. पत्रिका जुळून केलेले विवाह सुखाचे ठरतात असे जर हमखासपणे सिद्ध झाले असते तर ही अडचण सोसायलाही हरकत नाही असे म्हणता आले असते. पण वस्तुस्थिती तशी नाही हे सर्वांना माहीत आहे. आता उपयुक्ततेबद्दल विचार करू. कुंडलीवरून माणसाचा नैसर्गिक कल कोणत्या गोष्टीकडे आहे ते कळते असे ज्योतिषी म्हणतात. तसे खरोखरीच कळत असेल तर ती फार चांगली गोष्ट आहे. पाशात्य देशात या अंगाने खूप संशोधन झालेले आहे. त्याचे निष्कर्ष फलज्योतिषाला बहुतांशी प्रतिकूल असेच निघालेले आहेत. म्हणजे त्याची उपयुक्ततासुद्धा वादातीतपणे सिद्ध झालेली नाही. आता ते मनोरंजन म्हणून उपयुक्त आहे असा दावा कुणी केला तर मात्र त्याची उपुक्तता आम्ही मान्य करु. कारण जगात शास्त्रज्ञांची चलती झाली म्हणून कवी लगेच ओस पडले असे दिसून येत नाही. उपयुक्ततेच्या मुद्याचे यश हे ज्योतिषाच्या सामर्थ्यात नसून जातकाच्या मानसिकतेमध्येच आहे. [ ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी ... मधुन उधृत]

वाचने 5113 वाचनखूण प्रतिक्रिया 17

अवलिया 08/09/2009 - 09:43
पकाकाका, मला तुमच्याबद्दल आदर आहे आणि तुम्ही राग मानणार नाही म्हणुन सांगण्याचे धैर्य करत आहे. बास झाले हे ज्योतिषाचे धागे, जरा काही काळ वेगळे वाचु द्या आम्हाला.. ! :) जरा विश्रांती घ्या आणि मग परत टाका वाटल्यास.. ! पण सध्या अजीर्ण व्हायला आले आहे.. ! प्ली.... ज ! समजुन घ्या !! आपलाच, अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

प्रकाश घाटपांडे 08/09/2009 - 10:05
अरे ही तर प्रतिक्रिया माझ्या मनात होती. अशी कुणी ती देईल का हे आजमवण्यासाठी मी हा धागा टाकला. दुसरा ही एक उद्देश होता कि सर्फिंग करणार्‍या वा मिपावर आलेल्या नवीन लोकांना मागील धागे उचकट बसायला वेळ नसतो. त्यांच्या साठी ही बाब पुर्णपणे नवीन असते.जे समोर आले ते पाहिले जाते व प्रासंगिक प्रतिक्रिया मनात येतात. मिपावर मागील धागे हा काळाआड व पडद्या आड वेगाने जातात, समयोचित प्रसंगी जर पुढे आले तर काही व्यक्तिंना त्यात स्वारस्य वाटू शकते. जुन्या लोकांना दुर्लक्षण्याची सुविधा/ मुभा असते पण नवीन लोकांना तीच बाब संधी असते. फलज्योतिषाच्या उपयुक्ततेचा मुद्दा युयुत्सुंच्या धाग्यात आला म्हणुन हा मोह आवरला नाही
मला तुमच्याबद्दल आदर आहे आणि तुम्ही राग मानणार नाही म्हणुन सांगण्याचे धैर्य करत आहे.
धैर्य कसले तो हक्क च आहे तेवढा हक्क दाखवण्याइतपत 'जवळीक' सहअस्तित्वातुन येतेच. तो आम्ही नाकारण्याच्या शक्यतेच भय आपल्याला वाटले म्हणुन धैर्य बिर्य शब्द सुचले की काय नाना? बाकी चालु द्यात. सध्या उसंत घेतो प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रभाकर पेठकर 08/09/2009 - 11:01
घाटपांडेसाहेब, तुमचा लेख मुद्देसुद आणि कोणालाही पटावा असाच आहे. अभिनंदन. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

युयुत्सु 08/09/2009 - 11:26
फलज्योतिषाची उपयुक्तता
"फलज्योतिषाची काहि लोकांसाठी असलेली उपयुक्तता आम्हाला मान्य देखील आहे. सर्वच ज्योतिषी हे जातकाच्या मानसिकतेचा गैरफायदा घेतात अस सरसकट मी म्हणू शकत नाही. फलज्योतिष हे विज्ञान नसेना का पण उपयुक्त तर आहे?"
चला एक बरे झाले! घाटपांड्यांचे वरील मतप्रदर्शन वाचून धन्य धन्य झाले. याशिवाय करमणुकीच्या पंक्तीला ते फलज्योतिषाला बसवायला तयार आहेत म्हणजे विज्ञान आणि फलज्योतिष करमणुकीसाठी का होईना एका पातळीवर आहेत, हे लक्षात आल्यामूळे गुदगुल्या झाल्या. आंतरराष्ट्रीयख्यातीच्या शास्त्रज्ञांच्या वैज्ञानिक सुरस आणि चमत्कारिक परिकथा (read rejected theories) शेवटी करमणूक करतातच की... पण ही भूमिका त्यांची वैयक्तिक की अंनिसची अधिकृत, हे कळले नाही.
"या युक्तिवादात हे गृहीत धरण्यात आले आहे की ज्योतिष्यांना आगामी घटनांची कल्पना आधी निश्चितपणे येउ शकते."
वरील विधान दिशाभूल करणारे आहे. माझा त्यातील "निश्चितपणे" या शब्दाला आक्षेप आहे. वास्तविक आधुनिक ज्योतिषी फक्त शक्यता सांगतो. भारतीय ज्योतिषी जेव्हा "ठामपणे" बोलतो तेव्हा तो समूहमनाने तयार झालेल्या मानसिकतेतून बोलत असतो. त्यामूळे "ज्योतिष्यांना आगामी घटनांची कल्पना आधी निश्चितपणे येउ शकते" या समजाला धर्माने/संस्कृतीने दिलेला जीवनविषयक दृष्टीकोन आणि त्यातून निर्माण झालेली मानसिकता कारणीभूत आहे.
"ही दोन्ही गृहीतकृत्ये वादग्रस्त आहेत."
एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणा‍र्‍या घटनांचे दोन प्रकारांत वर्गीकरण मी निश्चित व्याख्या करून यापूर्वीच केले आहे. त्यामुळे हे वाद्ग्रस्त कसे याचा पुरेसा खुलासा घाटपांड्यांनी करावा ही विनंती. आता मला घाटपांड्याना एक रोखठोक प्रश्न विचारायचा आहे. त्या प्रश्नाला त्यांनी (दाभोळकरांसारखी) बगल न देता उत्तर द्यायचा प्रयत्न करावा, ही विनंती. एखादे भाकीत खोटे ठरते तेव्हा खालिल शक्यता असू शकतात. त्या अशा - The technique used by astrologer does not suitably capture events in the life of a person - The astrologer made mistake/oversight in using the right technique - The native made adequate effort to avoid/alter the predicted event त्यामुळे पत्रिका जुळून केलेले विवाह सुखाचे ठरतात हे हमखासपणे सिद्ध झाले नाही असे म्हणण्यास वरील मर्यादा आहेत. मुळात ज्योतिषातील नियम प्रवाही आहेत (भाषेच्या नियमांप्रमाणे) हे वास्तव आपण मान्य करायचे नाकारत आहात. आपल्याला अपेक्षित असलेली "वादातीत सिद्धता" होण्यातील मुख्य अडचण अशी की कालबाह्य नियम वापरून जुळवलेल्या पत्रिका आणि वर्तवलेली भविष्ये ही खोटी ठरणारच... तेव्हा माझा प्रश्न असा की ज्योतिषाला निकालात काढणारी संशोधने वरील सर्व बाबींचा योग्य विचार करतात का? जाता जाता "मनाचा खंबीरपणा" विषयी - मनाच्या खंबीरपणाला नैसर्गिक क्षमता आणि सभोवतालची परिस्थिती यांच्या मर्यादा असतात. मनाचा खंबीरपणा अपार वाढवता येईल असे खात्रीलायक मार्ग विज्ञानाने उपलब्ध करून दिले तर ज्योतिषांची कशाला गरज राहील. तेव्हा आपण आणि अंनिसने समाजाची ही गरज युद्धपातळीवर पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे ही विनंती...

In reply to by प्रशांत उदय मनोहर

युयुत्सु 09/09/2009 - 09:25
आपण नक्की कुणाशी सहमत ते कळले नाही.

In reply to by युयुत्सु

प्रशांत उदय मनोहर 09/09/2009 - 13:59
अर्थात, आपल्याशी. तुमच्या प्रतिक्रियेला उत्तर दिलंय. :) बाय द वे, मी या संदर्भात काही लिहू इच्छितो आहे. पण लोकांचं अजीर्ण बरं झाल्यावरच लिहीन. आपला, (मिपाकर) प्रशांत --------- मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :) माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

In reply to by युयुत्सु

विजुभाऊ 08/09/2009 - 16:22
The technique used by astrologer does not suitably capture events in the life of a person याचा अर्थ कायद्याच्या तरतुदीत असलेली पळवात असा होउ शकतो - The astrologer made mistake/oversight in using the right technique तर मग तो/ती अचूकतेचा दावा कसा करू शकतात? - The native made adequate effort to avoid/alter the predicted event म्हणजे भविष्य हे तकदीरमध्ये नसून तदबीर मध्ये आहे . तदबीरने तकदीर को मात दे दी पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

In reply to by युयुत्सु

नितिन थत्ते 08/09/2009 - 20:41
>>The astrologer made mistake/oversight in using the right techniq>> इत्यादि. यालाही हरकत नाही. पण चुकलेल्या भाकीतामध्ये कोणते तंत्र वापरले होते आणि त्या ऐवजी दुसरे तंत्र वापरले असते तर असे बरोब्बर भाकीत आले असते असे दाखवून द्यायला हवे. ज्योतिष्याचे नेमके काय चुकले ते दाखवता येत नसेल तर ज्योतिषशास्त्र बरोबर पण ज्योतिषी चुकला हे म्हणण्यासदेखील जागा रहात नाही. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)

परिकथेतील राजकुमार 08/09/2009 - 12:06
पकाकाका तुम्हाला शिक्षाच करतो बघा आता x-( पुढच्या वेळी कॅफेत आलात की तुम्हाला 'यौवनफुफाट्या' कडे पाठ करुन बसवणार आता. (संतप्त) परा ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

बिपिन कार्यकर्ते 08/09/2009 - 12:17
माझी सगळ्याच नाडी आणि ज्योतिष वाल्यांना जाहिर विनंती आहे की काही काळापुरते तरी आता हे नाडी आणि ज्योतिषाचे धागे काढणे बंद करा. अति झालं आणि हसू आलं अशी गत झालीये आता. प्रकाशराव रागवणार नाहीतच याची खात्री आहे, बाकीच्यांनी पण रागवू नये, सामान्य जनतेच्या सहनशक्तीचा विचार करून त्यांच्यावर दया करावी. अगदीच वाटले तर आपापल्या ब्लॉगांवर साद-प्रतिसाद देऊन त्याच्या लिंका तुमच्या खरडवहीत लावा. जिज्ञासू तिथे जाऊन वाचतील. बाकीचे सुखात राहतील. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मनिष 08/09/2009 - 16:59
ह्या नाडीवाल्यांच्या आणि ज्योतिष्याच्या नाड्या आवळा आता...वैताग आलाय नुसता! :(

In reply to by बिपिन कार्यकर्ते

निमीत्त मात्र 08/09/2009 - 22:04
नाडी आणि जोतिष्य ह्यांचा आता वैताग आला आहे. पण ह्यात नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे युयुत्सुंसारखे जोतीषी लोक लेखनाचा भडीमार करत आहेत ते त्यांच्या दुकानाची जाहीरात व्हावी ह्या स्वार्थी हेतूने. ज्योतिष विषयक लेखनाची ही लाट त्यांनीच सुरू केली. (आठवा ब्लॉगची लिंक देणारे अनेक लेख/स्फुट) त्यांच्या ब्लॉगवर गेले असता ते २५० रुपये घेऊन भविष्य बघतात ही माहिती प्रथमदर्शनी दिसते आणि त्यामुळेच ट्रॅफिक खेचण्यासाठी त्यांची धडपड चालली आहे हे कुणीही सांगेल. वैयक्तिक हल्ले/ टीका झाली तरी युयुत्सु नेमाने लिहितात कारण त्यांच्या ते पथ्यावरच पडते आणि ब्लॉगची भरपूर जाहिरात होते. प्रकाश घाटपांडेंचा मात्र तसा कुठलाही छुपा/उघड स्वार्थ दिसत नाही. त्यांचे लेखन हे युयुत्सु सारख्यांच्या आवाहनाला बळी पडण्यापासुन सामान्य जनतेला सावध करण्यासाठीच आहे ह्याची खात्री वाटते.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

निमीत्त मात्र 08/09/2009 - 22:04
नाडी आणि जोतिष्य ह्यांचा आता वैताग आला आहे. पण ह्यात नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे युयुत्सुंसारखे जोतीषी लोक लेखनाचा भडीमार करत आहेत ते त्यांच्या दुकानाची जाहीरात व्हावी ह्या स्वार्थी हेतूने. ज्योतिष विषयक लेखनाची ही लाट त्यांनीच सुरू केली. (आठवा ब्लॉगची लिंक देणारे अनेक लेख/स्फुट) त्यांच्या ब्लॉगवर गेले असता ते २५० रुपये घेऊन भविष्य बघतात ही माहिती प्रथमदर्शनी दिसते आणि त्यामुळेच ट्रॅफिक खेचण्यासाठी त्यांची धडपड चालली आहे हे कुणीही सांगेल. वैयक्तिक हल्ले/ टीका झाली तरी युयुत्सु नेमाने लिहितात कारण त्यांच्या ते पथ्यावरच पडते आणि ब्लॉगची भरपूर जाहिरात होते. प्रकाश घाटपांडेंचा मात्र तसा कुठलाही छुपा/उघड स्वार्थ दिसत नाही. त्यांचे लेखन हे युयुत्सु सारख्यांच्या आवाहनाला बळी पडण्यापासुन सामान्य जनतेला सावध करण्यासाठीच आहे ह्याची खात्री वाटते.

युयुत्सु 08/09/2009 - 12:22
नो प्रोब्लेम! पण हल्ले झाल्यास उत्तर देण्याचा अधिकार राखून ठेवत आहोत.

लिखाळ 08/09/2009 - 19:50
छान लेख. ज्योतिष विषयाच्या दोन्ही बाजू वाचायला बरे वाटते आहे. -- लिखाळ. आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?