Skip to main content

प्राध्यापकांचा संप मिटणार कधी ?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 16/08/2009 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांचा संप सुरु होऊन आज तीस दिवस होत आहेत, [सर्वात मोठा संप चोपन्न दिवसाचा रेकॉर्ड आहे] अजून प्राध्यापकांचा संप मिटण्याची कोणतीच चिन्ह नाहीत. प्राध्यापक संपावर का गेले आहेत ? प्राध्यापक संपावर आहेत कारण महाराष्ट्रातील सर्व शासकीय कर्मचार्‍यांना सहावा वेतन आयोग लागू झाला आहे, त्याची अंमलबजावणी झाली आहे. प्राध्यापकांच्या बाबतीत शासन केवळ आश्वासन देत आहे, कालच्या दैनिकामधून महाराष्ट्र सरकारच्या उच्च तंत्र शिक्षण विभागाने एक जाहीरात दिली असून दि.१२ ऑगष्टला०९ ला प्राध्यापकांना सहावा वेतन आयोग लागू केला असून प्राध्यापकांनी महाविद्यालयात रुजू व्हावे अशी एक जाहिरात दिली. काही खुलासे केले आहेत. सदरील जाहिरातीतील सर्व मुद्दे खोटारडे आहेत. महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर हा चर्चा प्रस्ताव टाकेपर्यंत शासन निर्णय नव्हता, पाहा शासनाच्या संकेतस्थळावरील दुवा. नेट-सेट नसलेल्या प्राध्यापकांची काय भानगड आहे ? युजीसी (विद्यापीठ अनुदान आयोग )ने प्राध्यापकांसाठी नेट-सेट परिक्षा उत्तीर्ण होणे सक्तीची १९९१ केले परंतु मा.सर्वोच्च न्यायालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नेट-सेटच्या रेग्युलेशनच्या बाबतीत एक महत्वपूर्ण आणि धोरणात्मक निर्णय दि. ०८ /०९/१९९४ दिला. त्यात म्हटले की, परिक्षा सक्तीची करायची किंवा नाही याबाबतचा निर्णय विद्यापीठाने आणि शासनाने घ्यावा तरच तो परिनियम लागू पडेल. तेही पुर्वलक्षी प्रभावाने नव्हे. महाराष्ट्र शासनाने परिक्षा सक्तीची नियमन करायला १९९९ हे वर्ष उजाडले आणि तोपर्यंत सेवेत प्राध्यापकांची भरती होत गेली. प्राध्यापकांची ही नियुक्ती सक्षम निवड समितीने केलेली होती. म्हणजे विद्यापीठाचे प्रतिनिधी, सहसंचालक, विषय तज्ञ इत्यादी. जर ती परिक्षा सक्तीची होती तर नेट-सेट पात्रता नसलेल्या अधिव्याख्यात्यांना सेवेत घ्यायलाच नको होते. आता या सेवेत असलेल्या लोकांना नेट-सेट परिक्षा सक्तीची उत्तीर्ण व्हा चा आग्रह शासन धरत आहे. विद्यापीठांनी आपल्या कायद्यात नेट-सेट सक्तीचे असावे असा कायदा केलेला नसल्यामुळे ती अट सेवेत असलेल्या प्राध्यापकांना लागू होत नाही. तसे असूनही शासनाने त्यांची वरीष्ठ श्रेणी, वाढीवभत्ते, रोखले आहेत. आणि त्यांची सेवा (अ-डॉक) तदर्थ सेवेची ठरवली आहे. सेवेत असलेले प्राध्यापक ज्या दिवशी सेट-नेट किंवा पीएच.डी झालेले असतील त्या दिवसापासून त्यांची वरीष्ठश्रेणी, इतर अनुषांगिक फायद्यासाठी त्यांची नियुक्ती ग्राह्य धरण्यात यावी असे महाराष्ट्र शासन म्हणते, जी युजीसे ने आपल्या मार्गदर्शक तत्वात या नसलेल्या गोष्टी कधीच सांगितल्या नाही. आणि आता शासन म्हणते की, त्या प्राध्यापकांचे प्रश्न युजीसी सोडवावेत. अशी ही शासनाची आडमुठेपणाचे धोरण आहे. सहावा वेतन आयोग लागू करण्याच्या बाबतीतही केंद्रसरकार ८० टक्के रक्कम देते आणि महाराष्ट्र शासनाला २० टक्के रक्कम द्यायची असते पण ती देण्यासाठी संप करावा लागतो हे प्राध्यापकांचे दुर्दैव आहे. अर्थात मायसुद्धा लेकराला रडल्याशिवाय दुध पाजत नाही, हे तर आपले अजब मायबाप सरकार आहे. प्राध्यापकांच्या बाबतीत गलेलठ्ठ पगार मिळवणारे कर्मचारी असे म्हणून पाहतात. वर्गावर न जाणारे प्राध्यापक, केवळ पाच तास महाविद्यालयात थांबणार्‍यांना इतके पगार काय करायचे ? प्राध्यापक विद्यार्थ्यांना शिकवतात काय ? नॉलेज अपडेट आहे का ? वगैरे प्रश्न विचारले जातात. प्राध्यापक मागतात काय आणि देतात काय असा एक सकाळचा लेख वाचण्यासारखा आहे. (दुवा सापडत नाहीहे) विद्यार्थी कॉलेजच्या व्हरंड्यात येतात पण वर्गात येत नाही. त्याची वेगळी कारणं आहेत. कला-वाणिज्य महाविद्यालयातील वर्ग ओस पडत आहेत. त्याला प्राध्यापकच जवाबदार धरल्या जातो. बीए, बीकॉमच्या वर्गाला उपस्थित राहण्यापेक्षा कमाइकडे तरुण वळला आहे. असो, ती वेगळी गोष्ट आहे. अशा आणि अजून काही मागण्यांसाठी (एमफूक्टो)प्राध्यापक महासंघाबरोबर प्राध्यापक संपावर आहेत, योग्य मार्ग निघावा आणि संप लवकर मिटावा या पेक्षा अधिक काय म्हणू शकतो ?

वाचने 23526
प्रतिक्रिया 112

प्रतिक्रिया

हं.... प्राध्यापक मंडळीच्या मागण्या योग्य असतील तर त्यांना न्याय मिळायला हवा. सगळे काही त्यांच्या मनाप्रमाणे झाले की शिक्षणक्षेत्रातील आपली जबाबदारी ते अधिक चांगल्या रितीने पार पाडतील अशी भाबडी अपेक्षा बाळगतो. सर्व संपकरी प्राध्यापकांना शुभेच्छा ! -- अवलिया

In reply to by अवलिया

असेच म्हणतो. *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

In reply to by अवलिया

जवाबदारी पूर्ण करण्यासाठी सर्वच पुढे आले पाहिजेत, विशेषतः विद्यार्थी वर्गात आले पाहिजेत. विद्यार्थी वर्गात आले की, प्राध्यापकांना शिकवावेच लागेल. म्हणजे येतच नाही असे म्हणत नाही. पण जे येतात त्यांची संख्या खूपच कमी आहे. अर्थात विद्यार्थी असो की नसो, हॉल वर / ष्टाफ रुममधे विद्यार्थ्यांचे वाट पाहणारी प्राध्यापक मंडळी असतातच. तेव्हा प्राध्यापक आपापली जवाबदारी पार पाडतात असे वाटते. अवांतर : काल अजितदादा पवार एका भाषणात म्हणाले, प्राध्यापकांना खूप पगार आहे. पुन्हा बायको प्राध्यापिका असली की, विचारुच नका. च्यायला या मंत्र्यांच्या... मंत्र्यांना वाढीव भत्ते-आणि अनुषगिक फायदे [मरणापर्यंत नव्हे तर सरणापर्यंत] द्यायचे असा प्रस्ताव आल्याबरोबर तो शुन्य मिनिटात 'मंजूर' होतो. त्याची ना बोंब होते ना चर्चा...चालायचेच नै का ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>जवाबदारी पूर्ण करण्यासाठी सर्वच पुढे आले पाहिजेत, विशेषतः विद्यार्थी वर्गात आले पाहिजेत. आता आपले शिक्षान काही जास्ती नाय .. त्यामुळे जास्त बोलात नाय. पण आमचे दोस्त कधी कधी कालिजात जायचे... पेश्शल काही काही मास्तरच्या लेक्चरला कदीच बंक नाय करायचे... का? झ्याक शिकवायचे म्हणे ते.. ! आता कालिजातली पोरं ... इशेषतः शिणीयर कालीजातली.. जास्ती नाय पण थोडी अक्कल असेलच ना? कोन कसं शिकवतं ? का नाय शिकवतं.. ! काय ? तशी मास्तर काय अन पोरं काय .... दोघं बी चांगली आहेत कमी जास्त होत असलं इकडं तिकडं.. :) बाकी, आमच्या अजितदादांची चर्चा दुस-या धाग्यावर... या धाग्यावर अवांतर होईल ती चर्चा ! :) --अवलिया

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>विशेषतः विद्यार्थी वर्गात आले पाहिजेत. विद्यार्थी वर्गात आले की, प्राध्यापकांना शिकवावेच लागेल>>> पुण्यातल्या एका प्रथितयश महाविद्यालयात माझ्या एका मैत्रिणीच्या मुलीने कला शाखेत प्रवेश घेतला आहे. गणित ह्या विषयासाठी शिकवायला कोणी नसल्याने ह्या विद्यार्थ्यांना बाहेरच क्लास लावा अशी अनऑफिशिअल सूचना मिळालीय म्हणे! तेह्वा विद्यार्थी वर्गात असले तरी प्राध्यापक असतीलच असे नाही, असे वाटते...

In reply to by यशोधरा

पुण्यातल्या एका प्रथितयश महाविद्यालयात माझ्या एका मैत्रिणीच्या मुलीने कला शाखेत प्रवेश घेतला आहे. कुणावरही अशी वाईट वेळ येऊ नये... पुढे कला शाखेत प्राध्यापक होऊन मिसळपावावर टवाळकी करायला लागणार.. आपल्या दु:खात सामील आहे. -- मिसळभोक्ता

In reply to by मिसळभोक्ता

कुणावरही अशी वाईट वेळ येऊ नये... पुढे कला शाखेत प्राध्यापक होऊन मिसळपावावर टवाळकी करायला लागणार.. सहमत आहे. पुन्हा टवाळकी करता करता भलत्या जबाबदा-या गळ्यात पडुन टवाळकी पण करता न येणे हे तर अजुनच दुर्देव... --अवलिया

In reply to by अवलिया

संपादक ला पाली अर्धमागधीत काय म्हणतात हो ? ऊचक्रम वर विचारायला हवे. हल्ली संपामुळे तिकडूनच ज्ञानसंकलन करावे लागते म्हणतात. (कॉमनरूम मध्ये गप्पा मारायला कुणी नसतोच मुळी.) -- मिसळभोक्ता

In reply to by मिसळभोक्ता

मराठीत मॉडरेटर किंवा एडिटर असे म्हटले जाते असे काल कॅन्टीन मधे चर्चेत कळले. तसेही हल्ली संस्कृत शिकवणा-या प्राध्यापिका स्टाफरुम मधे येत नसल्याने स्टाफरुममधे बसुन कंटाळाच येतो. --अवलिया

In reply to by अवलिया

संस्कृतच्या शिक्षिकेला तुम्हीच टोमणे मारून घालवले. आता इतिहासाच्या शिक्षिका, पुरातन धार्मिक वांगमयाचे शिक्षक, पूर्वेकडील राज्यांचे भुगोलाचे शिक्षक येतात की स्टाफरूम मध्ये. त्यांच्याशी गप्पा मारा. हिकडं कशापायी, म्हन्तो म्या ? -- मिसळभोक्ता

In reply to by मिसळभोक्ता

छ्या छ्या त्यांच्यात तो स्पार्क नाही. बाकी टोमण्यांचे जरा चुकलेच... घाईत लक्षात आले नाही कुठे थांबायचे. आता जे झाले ते झाले.... म्हणुन इकडे हातपाय मारुन पहावे असा सुज्ञ विचार. --अवलिया

In reply to by मिसळभोक्ता

LOL! मिभो! आज ह्या धाग्यावर कृपादृष्टी वळलीय का? चालूद्यात :)

अत्यंत कमी पगार, आठवड्याचे पाच सहा तास काबाडकष्टाचे काम,खुपच कमी सुट्ट्या व इतर काही हालाखीच्या बाबी ह्या मुळे मुळातच आपल्या मागण्याबाबत मवाळ असणारा प्राध्यापकवृंद अगोदरच होरपळुन गेला आहे.त्यात माजोरी सरकार निवडणुकीच्या घाईमुळे अक्षरशःखिरापत वाटल्यासारखे सगळ्याच्या मागण्या मान्य करत असताना , बिचार्‍या प्राध्यापकानी काय वाईट केले आहे?. माझ्यामते तर महाराष्ट्रसरकारने त्याना आताच सातव्या वेतन आयोग स्थापन करुन त्याप्रमाणे वेतन श्रेणी जाहिर करावी व देशात आघाडी घ्यावी.संप लवकर मिटावा नाहीतर आणखी एका विक्रमी संपाचे आपण परत एकदा साक्षीदार होवु शकतो. वेताळ

In reply to by वेताळ

अत्यंत कमी पगार, आठवड्याचे पाच सहा तास काबाडकष्टाचे काम,खुपच कमी सुट्ट्या व इतर काही हालाखीच्या बाबी ह्या मुळे मुळातच आपल्या मागण्याबाबत मवाळ असणारा प्राध्यापकवृंद अगोदरच होरपळुन गेला आहे. हा हा हा ... मस्त ! :) एक महिन्याचा पगार कापला ना राव आमचा ! महाराष्ट्रसरकारने त्याना आताच सातव्या वेतन आयोग स्थापन करुन त्याप्रमाणे वेतन श्रेणी जाहिर करावी व देशात आघाडी घ्यावी. अहो, दर दहा वर्षांनी वेतन आयोग लागू होतोच. फक्त देईपर्यंत खूप उशीर होतो. आता हा आयोग २००६ लाच लागू झाला. आणि अजून तो आम्हाला मिळत नाहीहे :( संप लवकर मिटावा नाहीतर आणखी एका विक्रमी संपाचे आपण परत एकदा साक्षीदार होवु शकतो. धन्यवाद ! :) -दिलीप बिरुटे

हा असा काही संप चालला आहे याचीच माहिती आम्हाला नव्हती. कळविल्याबद्दल आभार आणि प्राध्यापकांना चर्चेसाठी शुभेच्छा. एक प्रश्नः हे नेट-सेट पास होणे प्राध्यापकांना सक्तीचे करण्यात काय चुकीचे आहे? सर्व प्राध्यापकांनी ते केले की समस्या/प्रशासन-प्राध्यापक वाद तेव्हढे राहतच नाही असे संपाकडे वरवर पाहता वाटते. चूभूद्याघ्या! इतकी काही अवघड नसते हो ती परीक्षा. (प्रा.पासून गेली काही वर्षेतरी दूर असलेला) एकलव्य

>>सर्वात मोठा संप चोपन्न दिवसाचा रेकॉर्ड आहे होय. १९७८. आम्ही तेव्हा १०वीत होतो. परीक्षा पुढे ढकलली गेल्यामुळे झालेला त्रास भोगला. संप होणे हे करंट्या समाजवादाचे लक्षण आहे. आता समाजवाद हे 'नकोसे' तत्त्व आहे म्हणून नव्या आर्थिक धोरणाच्या काळात संप करणे हे महापाप समजले जाते त्यामुळे जरी तुमची बाजू बरोबर/न्याय्य असली तरी समाजाच्या पाठिंब्याची शक्यता कमीच. तेव्हा संभाळून. हे पे कमिशन नावाचे प्रकरण काय कसोट्या लावून पगार ठरवते त्याचे थोडक्यात विवेचन कोणी करेल काय? नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)

In reply to by नितिन थत्ते

समाजाच्या पाठिंब्याची शक्यता कमीच. कोणत्या संपाला समाजाची सहानुभूती असते ? बँक वाले, बसवाले चालक-वाहक, शिक्षक, कामगार,कर्मचारी, डॉक्टर, शासकीय अधिकारी, या पैकी कोणत्या शासकीय-निमशासकीय कर्मचार्‍यांबद्दल समाजातील सर्व वर्गाची सहानुभूती समाजात असते, मला वाटते कोणाचीच नसावी. जो पर्यंत स्वतःचे काही जळत नाही, तो पर्यंत त्याकडे पाहायचे नाही. ही आपली (स्वार्थी) प्रवृती आहे, असते. तेव्हा सहानुभूतीची अपेक्षा कोणाकडूनच नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by नितिन थत्ते

>>>संप होणे हे करंट्या समाजवादाचे लक्षण आहे. संप करावा की करु नये हा वादाचा मुद्दा असु शकतो. जेव्हा कारवाई होईल अशी भिती असतांना सुद्धा जेव्हा कुणी मनुष्य किंवा मनुष्यांचा समुह प्रस्थापित सत्तेविरुद्ध आवाज उठवत संपासारखे हत्यार उपसतो, तेव्हा त्या मनुष्यांना स्वतः करत असलेल्या कृत्याची साधक बाधक जाणीव असावी. जरी नसेल तरी त्यांना करंटे म्हणवुन हिणवणे योग्य वाटत नाही. --अवलिया

In reply to by अवलिया

गरज पडली तर संप करणे योग्यच असे माझेही मत आहे. आणि इतरांनी ते समजून घेऊन पाठिंबा द्यायला हवा हेही मान्य आहे. परंतु गेल्या काही वर्षांत नव्या युगाच्या प्रचारकांनी युनियन करणे, संप करणे हे देशाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या प्रगतीस मारक असते म्हणून संप करणे महापाप असा उद् -घोष लावलेला आहे. (संप करणार्‍यांना त्यांच्या योग्यतेनुसारमोबदला मार्केटमध्ये मिळत असतो पण त्यांना स्वतःची योग्यता काय हे समजत नसते म्हणून ते अवाजवी मागण्या करीत असतात आणि संघटनेच्या झुंडशक्तीने त्या मान्य करून घेण्याचा प्रयत्न करतात असे त्यांचे म्हणणे असते) (अवांतरः बोनससाठी महापालिकेचे सफाईकामगार संप करतात तेव्हा प्राध्यापकांच्या संघटनेची भूमिका काय असते हे जाणून घेणे योग्य ठरेल). हा प्रतिसाद प्राध्यापकांच्या विरोधात नसून नव्या युगाच्या उद्गात्यांविरोधात आहे. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)

ठीक आहे, पण किती दिवस संप करायचा याला काही मर्यादा असाव्यात. सहाव्या वेतन आयोगामुळे अर्थातच प्राध्यापकांचे भले व्हावे ही इच्छा मनात धरूनही मुलांची परवड होते आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. मुले वर्गात येत नाहीत म्हणून वर्ग न घेतल्याने फारसे नुकसान होणार नाही असा काही लोक युक्तिवाद करतील आणि तो काहींना पटू शकतो, पण तो बरोबर नाही. नात्यातल्या ज्या काही मुलांशी मी बोलले त्यांना या गोष्टीचा त्रासच होतो आहे, कॉलेजमध्ये काय शिकवले जाते याकडे त्यांचे लक्ष आहे आणि त्यावर अवलंबून ही मुले आहेत असेच मला दिसले. पुढचे वेळापत्रक अनिश्चित असल्याने त्यांना इतर आखण्या करणे अवघड जाते आहे. त्यामुळे प्राध्यापकांच्याबद्दलची सहानुभूती ओसरण्याआधीच त्यांनी संप संपवला पाहिजे. (संपाशिवाय इतर काही मार्ग नसतात का?)

In reply to by चित्रा

संप लवकरच मिटेल असे चिन्ह आहेत. महाराष्ट्राचे मुख्यंत्र्यांनी प्राध्यापकांची भुमिका समजावून घेतली. १९ किंवा २१ ला अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. संप काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होते हे मान्य. झालेले नुकसान सुट्यांमधे किंवा अधिकचे तासेस घेऊन पूर्ण केल्या जातात. तशी अटच काहीएक निर्णय घेण्यापूवी शासन लादते. >>(संपाशिवाय इतर काही मार्ग नसतात का?) उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या मंत्र्यांना संपाबाबत नोटीस दिली होती. संप सुरु झाल्यानंतरही काही दिवसांनी मा. मंत्री म्हणतात. मला संपाबाबत काहीच माहिती नाही. काय बोलावे. असो, प्राध्यापकांच्या न्याय्य मागण्यांसाठी दुसरा मार्ग नसावा असे वाटते ! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संप काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होते हे मान्य. झालेले नुकसान सुट्यांमधे किंवा अधिकचे तासेस घेऊन पूर्ण केल्या जातात.
आणि यातही विद्यार्थीच भरडून निघतात. आधी सक्तीची महिनाभर सुट्टी. नंतर ढोरासारखं काम.

In reply to by पिशी अबोली

आत्ताच्या संपासंबंधी म्हणाल तर तासिंकावर बहिष्कार नव्हता तर प्रात्यक्षिक परिक्षा, लेखी परिक्षा आणि त्यानंतरच्या कामावर बहिष्कार चालू आहे. विद्यार्थी भरडला जातो याच्याशी सहमतच आहे. पण, सहावा वेतन आयोग लागू सर्वांना झाला आणि फरकांची रक्कम सर्वांना केव्हाच मिळाली आहे. २००७ ला मिळणारे लाखभर रुपये आज उद्या मिळाले तर त्याचे काही मूल्य राहीले आहे का, असे असूनही आहेत ते देण्याचे सरकारच्या जीवावर येत आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी मागच्या संपाचा स्वानुभव सांगितला. मला प्राध्यापकांचे प्रश्न मान्य आहेत. मी फक्त विद्यार्थ्यांची बाजू सांगितली..शेवटी सगळ्यात जास्त नुकसान त्यांचंच होतं.. :(

यावर्षी प्राध्यापकांनी शिकवले नसल्यामुळे निकाल चांगला लागेल अशी अफवा ऐकण्यात येत आहे. :) --अवलिया

In reply to by अवलिया

प्राध्यापकांनी शिकवले नसल्यामुळे निकाल चांगला लागेल अशी अफवा ऐकण्यात येत आहे. :) अवलिया, कधीच सुधारणार नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>अवलिया, कधीच सुधारणार नाही. प्राध्यापकांकडुन शिक्षण न घेण्याचा परिणाम म्हणावा काय ? :? --अवलिया

आय वॉज बॉर्न इन्टेलिजन्ट. एजुकेशन रुइन्ड मी...

मागण्या न्याय्य असल्या / नसल्या तरी संप हे योग्य हत्यार वाटत नाहि. मागण्या जर खरोखरच न्याय्य आहेत तर न्यायप्रक्रियेवर विश्वास ठेऊन न्यायालयात न्याय मिळेलच त्यासाठी संप का? बाकी "शिक्षणाने मला काय दिले असेल तर न्यूनगंड" हे अनिल अवचटांचे वाक्य उगाच आठवले ऋषिकेश ------------------ दुपारचे १ वाजून २५ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "मोत्या शिक रे अ आ ई ...."

In reply to by ऋषिकेश

न्यायालय हे या गोष्टीत (म्हणजे असलेला पगार योग्य आहे की नाही किंवा पगार किती असावा याबद्दल) हस्तक्षेप करणार नाही. मागण्या न्याय्य असणे म्हणजे बहुधा कायदेशीर असे नसून वाजवी असणे असे असावे. न्यायालयांचा रोल संपामुळे कुणाच्या घटनादत्त अधिकारांवर अतिक्रमण होते आहे का किंवा संप कायदेशीर आहे का वगैरे पाहण्यापुरताच आहे. पगार किती असावा ही प्रशासकीय बाब आहे त्याचा तोडगा प्रशासनानेच काढलेला बरा. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

शासनाने मान्य केलेला सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमेसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावता येणे शक्य होते काय? (४२० कलमाखाली फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे वगैरे) की संप हेच एकमेव शस्त्र नव्या आंदोलनात उपलब्ध होते?

In reply to by आजानुकर्ण

शक्य आहे. फक्त अट असावी एक. 'क्ष' गोष्ट केलीस तर 'य' गोष्ट देतो, असे समोरच्याने म्हटलेले असेल, तर आधी 'क्ष' ही गोष्ट सिद्ध करावी लागेल. तर, आणि तरच, 'य' न देणं ही समोरच्याकडून झालेली फसवणूक ठरते.

वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांचा संप सुरु होऊन आज तीस दिवस होत आहेत
मराठीत प्रोफेसर, रीडर आणि लेक्चरर या तिन्ही पदांसाठी प्राध्यापक हा एकच शब्द आहे का? नसेल तर, वरिष्ठ महाविद्यालयात किती टक्के शिक्षक प्राध्यापक आहेत? तेवढेच फक्त संपावर गेले आहेत का बाकीचे रीडर्स, लेक्चरर्सही संपावर गेले आहेत? अदिती

मराठीत प्रोफेसर, रीडर आणि लेक्चरर या तिन्ही पदांसाठी प्राध्यापक हा एकच शब्द आहे का? नाही. चढती भाजणी खालीलप्रमाणे ट्यूटर / डेमोन्स्ट्रेटर - मराठी प्रतिशब्द माहीत नाही. (फ्रेश पासआउट) लेक्चरर - अधिव्याख्याता. (दोन वर्षे) सिनियर लेक्चरर - वरीष्ठ अधिव्याख्याता (तीन वर्षे) रीडर - प्रपाठक (चार वर्षे) प्रोफेसर - प्राध्यापक (पाच वर्षे) पूर्वी रीडर आणि प्रोफेसरमध्ये आणखीन एक पोस्ट होती 'असोसिएट प्रोफेसर' ती आता अनेक विद्यापीठांनी खालसा केली आहे. रीडरनंतर डायरेक्ट प्रोफेसर होतो पाच वर्षांनी. (सध्यातरी निदान महाराष्ट्र आरोग्यविज्ञानपीठात असे आहे) डॉ. प्रसाद दाढे वरीष्ठ अधिव्याख्याता मुखशल्यचिकित्सा महाराष्ट्र आरोग्यविज्ञानपीठ

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

वरीष्ठ अधिव्याख्याता, डॉक्टरसाहेब! कुणाहीबाबत व्यक्तीगत नाही, पण ट्यूशनक्लासेसमधेही शिकवणारे लोकंही स्वतःला "प्रा.अमुकतमुक" म्हणवून घेतात म्हणून वैतागून विचारलं. मागे पिडाकाकांनी जॉर्ज कोल्डवेलमधे, प्रोफेसर शब्दाबद्दल काही लिहिलं होतं, ते आठवलं अदिती

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

ओह असंय होय .. तरीच
नेट-सेट पात्रताधारक महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून आले पाहिजेत. याबाबत प्राध्यापक महासंघ सहमत आहे.
म्हणजे जे आता प्राध्यापक झालेत ते सुटले ह्या परिक्षेतून!! का म्हणून? सगळ्यांना परिक्षा कंपल्सरी करा म्हणून ह्या अधिव्याख्याता लोकांनी संप केला पाहिजे नाही? ;) ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ३ वाजून ५९ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "मी मोर्चा नेला नाही...मी संपही केला नाही."

In reply to by ऋषिकेश

महाविद्यालयाच्या किंवा विद्यापीठाच्या सेवेत अधिव्याख्याता म्हणून यायचे असेल किंवा प्राध्यापक म्हणून यायचे असेल तरी नेट-सेट पात्रता परिक्षा आवश्यकच ! महाराष्ट्र शासनाने वरिष्ठ महाविद्यालयातील अधिव्याख्यात्यांना सहावा वेतन आयोग लागू केल्याचा शासन निर्णय काढला आहे. (पण देणार कधी त्याचा काही खुलासा नाही) फक्त एकच पण महत्वाचा प्रश्न शिल्लक राहिलाय...तोही मार्गाला लागेल असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

अधिव्याख्याता आणि प्रपाठक ही महाविद्यालयात असलेली पदे. विद्यापीठात 'अधिव्याख्याता' आणि 'प्राध्यापक' महाविद्यालयातील अधिव्याख्याता पीएच.डी असेल तर चार वर्षांनी वरिष्ठ श्रेणीला येतो, तो वरिष्ठ अधिव्याख्याता आणि सेवेच्या बारा वर्षानंतर प्रपाठक (रिडर) डॉ.दिलीप बिरुटे (रिडर)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महाविद्यालयातील अधिव्याख्याता पीएच.डी असेल तर चार वर्षांनी वरिष्ठ श्रेणीला येतो, तो वरिष्ठ अधिव्याख्याता आणि सेवेच्या बारा वर्षानंतर प्रपाठक (रिडर) अशी गारंटी आहे का ? म्हणजे शिकवतो कसा, शिकतो कसा, मार्गदर्शन कसा करतो, संशोधन कसा करतो, याला काहीच महत्व नाही का ? तरीच. -- मिसळभोक्ता

दर्जा ढासळला आहे का उमेदवारांचा ? ही शक्यता मला जरा वास्तवाच्या जर जवळ वाटते, अनेक प्रकारच्या राजकारणाला वैतागुन आज अनेक हुशार लोक ह्या क्षेत्राकडे वळतच नाही. मग नगाला नग म्हणुन भरती चालवल्यास कनिष्ठ पातळीच्या उमेदवारांना ही परिक्षा अवघड जाऊन शुन्य टक्के निकाल लागु शकतो. ज्यासाठी ही परिक्षा डिसाईन केलीच नाही त्याने १० वेळा डोके फोडले तरी त्यातुन पास होणे कठिण आहे, दोष मग नेट-सेटला तरी का द्या ?
डॉनच्या मताशी सहमत आहे. तसेच,
एका विषयाची आवड असताना (माझ्या बाबतीत खगोलशास्त्र, क्लासिकल मेकॅनिक्स इ) इतर विषयांचा (उदा. सॉलिड स्टेट फिजीक्स, इलेक्ट्रॉनिक्स) आळस यायचा. शिवाय एकदा बी.एस्सी., एम.एस्सी.ला ज्याचा अभ्यास करून परीक्षा दिली तेच पुन्हा पुन्हा काय करायचं या विचारानेही कंटाळा यायचा.
नेट परिक्षेच्या अभ्यासक्रमाबाबतचे अदितीचे हे मत सुद्धा बरोबर आहे. शिक्षकवर्गाला मिळणारा पगार आणि कायमस्वरुपी नोकरीची शक्यता हे दोन महत्वाचे विषय असावेत असे मला वाटते. हुशार विद्यार्थी करियर करण्यासाठी या मार्गाकडे (अतिशय आवड) असल्याशिवाय फिरकत नाहीत आणि मग जो येईल त्याला संधी देऊन वर्ग चालूच ठेवण्याकडे कल होतो असे मला वाटते. भरपूर पागार मिळण्यासाठी आणी नेट-सेट-पिएच्डी वर योग्य तोडगा निघावा या साठी शिक्षण खात्यातल्या लोकांना शुभेच्छा ! -- लिखाळ. दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.

प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकल्याची बातमी समजली होती. त्याचे पुढे काय झाले? प्राध्यापक तपासणार आहेत का पेपर? की सिनियर मुलांकडून तपासून घेणार आहेत? काही कळले का?

In reply to by कुंदन

तुम्हा दोघांची प्रश्नोत्तरे संपली की मी सवडीने उत्तर देईन. च्यायला, कुठेच सूख नाही. -दिलीप बिरुटे

परत एकदा प्रा.चा संप चालू झाला आहे असे दिसते. लोकसत्ताने प्राध्यापकांची चांगलीच हजामत केली आहे असे दिसते. http://www.loksatta.com/sampadkiya-news/excess-demand-of-teachers-92608/

मा.श्री शरद पवार साहेबांनी प्राध्यापकांच्या संपाबाबत प्रश्न समजून घेतला आणि मध्यस्थी घडवून आणली आहे. लवकरच सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमेचा आणि नेट-सेट संदर्भातल्या लाभांचे प्रश्न सुटतील असे वाटते. बाकी, लोकसत्ताचे लेख तेव्हाचे तेव्हा (ताजं दैनिक) वाचले आहेत. रिसर्च पेपरच्या (शोधनिबंध) बाबतीत सहमत असलो तरी असे का होत आहे, याबाबत फारसा कोणी विचार करत नाही. चालायचंच. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तरी असे का होत आहे, याबाबत फारसा कोणी विचार करत नाही. चालायचंच.
का होत आहे हे कळाले तर बरे होईल. यामागच्या कारणांचा विचार संप पुकारणाऱ्या प्राध्यापक संघटनेने केला आहे काय? शिक्षणक्षेत्राचा दर्जा सुधारावा, प्राध्यापकांचे ज्ञान वाढावे या कारणांसाठी ते पुढचा संप जाहीर करण्याची काही शक्यता आहे काय?

In reply to by आजानुकर्ण

पदोन्नतीसाठी काही गुणांची विभागणी विद्यापीठ अनुदान आयोगाने केली. त्यात शोधनिबंध लिहिणार्‍यांसाठी दहा गुण ठेवण्यात आले आहेत आणि असेच गुण इतर विषयांसाठीही ठेवण्यात आले. विद्यापीठ अनुदान आयोगाने चर्चासत्रासाठी (राज्यस्तरीय,देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय) अनुदान महाविद्यालयांना द्यायला सुरुवात केली. विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणताही विचार न करता भाराभर प्रस्तावांना निधी दिला आणि मग महाविद्यालयांनी जमेल तसे चर्चासत्र आयोजित केली आणि मग शोधनिबंध,पेपर वाचनाचा बाजार उठला, याला सर्वस्वी जवाबदार युजीसी आहे, असं माझं मत आहे. चर्चासत्र आणि त्यामागची कल्पना व्यवस्थित राबविली गेली नाही, त्यामुळे काही दोष निर्माण झाले आहेत असे वाटते. >>> यामागच्या कारणांचा विचार संप पुकारणाऱ्या प्राध्यापक संघटनेने केला आहे काय ? प्राध्यापक संघटनेचा तो विषय आहे असे मला वाटत नाही. >>> शिक्षणक्षेत्राचा दर्जा सुधारावा, प्राध्यापकांचे ज्ञान वाढावे या कारणांसाठी ते पुढचा संप जाहीर करण्याची काही शक्यता आहे काय? प्राध्यापक संघटनांचे प्रतिनिधी शिक्षणक्षेत्राचा दर्जा, प्राध्यापकांचे ज्ञान, वाढावे अशा कोणत्या समितीवर नियुक्त नसतात असे वाटते त्यामुळे अशा गोष्टींसाठी त्यांचा पुढचा संप जाहीर होईल असे वाटत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पगारवाढीव्यतिरिक्त आणखी कोणते मुद्दे प्राध्यापक संघटनेच्या कार्यकक्षेत येतात? प्राध्यापकांचा दर्जा वाढण्यासाठी एखादी उपसंघटना स्थापण्यासारखे काही उपाय करता येतील का?

In reply to by आजानुकर्ण

>> पगारवाढीव्यतिरिक्त आणखी कोणते मुद्दे प्राध्यापक संघटनेच्या कार्यकक्षेत येतात ? पगारवाढीव्यतिरिक्त म्हटलं तर भविष्य निर्वाह निधींचे शिक्षकांच्या अडकलेली प्रकरणे, चुकीचे रोष्टर भरुन नियुक्त्या दिल्या जातात तेव्हा नियुक्त्या नियमाप्रमाणे झाल्या पाहिजेत, शिक्षकांच्या अडीअडचणी सोडविणे, शासन, शासन नियम आणि शिक्षक यांच्यात समन्वयाचे काम प्राध्यापक संघटना करते. अजूनही बरीच कामे प्राध्यापक संघटनेच्या कार्यक्षेत्रात येतात. >>>प्राध्यापकांचा दर्जा वाढण्यासाठी एखादी उपसंघटना स्थापण्यासारखे काही उपाय करता येतील का ? उपसंघटना वगैरे स्थापन करुन शिक्षणाचा दर्जा वाढवता येईल असे मला वाटत नाही. विद्यापीठ अनुदान आयोग शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अनेक प्रयोग करत असतात, काही यशस्वी होतात कदाचित काही अपयशी ठरत असावेत. आणि सध्या उच्च शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे, असे मला वाटत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>आणि सध्या उच्च शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे, असे मला वाटत नाही. सहमत आहे. खालावण्यासाठी आधी वरचा दर्जा असायला हवा त्यामुळे आधीच रसातळाला असलेला अजून किती खोल जाणार हा प्रश्नच आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राडॉ यू टू??? उच्च शिक्षणाचा दर्जा खालावला नाही हे तुम्हाला कसे म्हणवते याचे सखेद आश्चर्य वाटते. नाही, चांगले प्राध्यापक असतातच हो सगळीकडे-मान्य आहेच. पण त्यांचे प्रमाण किती? त्यांचे ऐकतो कोण? जण्रल विद्यापीठांचा दर्जा कसा आहे??? इतकी मारामारी होत असलेले टेक्निकल इंजिनिअरिंग फील्डच इतके गंडलेले आहे, तिथे इतरांची काय कथा? इतर फील्ड्स तर अलीकडे सापत्न झालेली आहेत जवळपास.

In reply to by बॅटमॅन

पाण्यात राहून माशाशी वैर कशाला अशा भावनेने त्यांनी तसे लिहिले असावे किंवा टिपीकल प्राध्यापकाप्रमाणे त्यांनी झापडे लावलेली असावीत किंवा त्यांना समजूनही त्यांचे हितसंबंध दुखावू नये म्हणुन त्यांनी तसे लिहिले असावे किंवा.. अशा अनेक शक्यता असाव्यात. हो की नै प्रा डॉ ? ;)

In reply to by नाना चेंगट

इथं आहे कोण? तुम्ही आणि मी, हे नक्कीच. बाकीचे येतील. तेव्हा पाहू... ;-)

In reply to by बॅटमॅन

फिर्यादी, साक्षीदार, (आरोपी), अभियोक्ता, न्यायाधीश या सर्व भूमिका एकाच ठिकाणी आल्यावर सखेद आश्चर्य करण्याजोगे काही असत नाही. पण... असो. :-)

In reply to by नाना चेंगट

नाना, आपले आजचे पंतप्रधान मनमोहन सिंह एकेकाळी दिल्ली विद्यापीठात शिकवायचे. तेही 'प्रा.डॉ.'च आहेत. जरा स्मरणशक्तीला ताण द्या राव...

In reply to by श्रावण मोडक

हो लक्षात आहे. फक्त प्रा डॉ असतांना जर त्यांना तो अधिकार मिळाला असता तर अजून किती वाट लागली असती याचा विचार करा :) प्राडॉ हा शब्द जरा भरकन बोलला की फ्रॉडा फ्रॉड असा का उच्चारला जातो हे कळत नाही. लहानपणी शब्द नीट उच्चारायची सवय नाही लागली.. त्याचा परिणाम की काय कोण जाणे.

In reply to by नाना चेंगट

फक्त प्रा डॉ असतांना जर त्यांना तो अधिकार मिळाला असता तर अजून किती वाट लागली असती याचा विचार करा
हां... हे बाकी खरं. पण आजकाल काय आहे की, हे अधिकार असणारे प्राध्यापकीही करतात ना...
प्राडॉ हा शब्द जरा भरकन बोलला की फ्रॉडा फ्रॉड असा का उच्चारला जातो हे कळत नाही. लहानपणी शब्द नीट उच्चारायची सवय नाही लागली.. त्याचा परिणाम की काय कोण जाणे.
पटलं... सारे 'लहानपणी'चेच दोष आपले. ;-)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जर्नल इम्पॅक्ट फॅक्टर वगैरे गोष्टी असतात तसलं काही तरी ठेवायचं नं मग. त्या जर्नलचा इम्पॅक्ट फॅक्टर ढीमका असेल तर ते ठरलेले गुण वगैरे...?

In reply to by लॉरी टांगटूंगकर

खिक्... हे वाचलं नाहीत का काय? अशांसाठीच्या यंत्रणा तयार करणं मुश्कील नाही राव...

In reply to by श्रावण मोडक

च्यामारी ! निदान प्राध्यापकांना तरी लोकपालाच्या कक्षेत आणायला हवं !!

In reply to by नाना चेंगट

लोकपाल कोण? तिथल्या अटींत दोनेक 'प्राध्यापक' निवांत 'बसतात'.

In reply to by श्रावण मोडक

सहमत आहे. शिकवणे हा मुद्दा दुय्यम पहिले छन छन... रोकडा फेका.. शार्पच्या नोटसवरुन तुम्हीच शिका

In reply to by श्रावण मोडक

नुसतं आयएसएसएन क्रमांक असलेल्या नियतकालिकात वगैरे चुकीचं झालं असे म्हणायचं होतं. इम्पॅक्ट फॅक्टर म्हणजे ते जर्नल पुढे किती जण वापरत आहेत किंवा कितपत उपयोगी आहे अशा अर्थाचे रेटिंग. विकीच्या म्हणण्यानुसार The impact factor (IF) of an academic journal is a measure reflecting the average number of citations to recent articles published in the journal. It is frequently used as a proxy for the relative importance of a journal within its field, with journals with higher impact factors deemed to be more important than those with lower ones. The impact factor was devised by Eugene Garfield, the founder of the Institute for Scientific Information. Impact factors are calculated yearly for those journals that are indexed in the Journal Citation Reports. जर का ते कोणाला उपयोगी नाही तर कोणी वापरणार नाही अन् शून्य इम्पॅक्ट फॅक्टर असे. http://en.wikipedia.org/wiki/Impact_factor

In reply to by लॉरी टांगटूंगकर

काय सांगताय!
reflecting the average number of citations to recent articles published in the journal
हे रिफ्लेक्शन मोजायचं कसं एवढंच सांगा. मग मी तुम्हाला, कराडच्या नियतकालिकात (हे तेच, वरच्या लेखात असणारे) संगमनेरच्या नियतकालिकाचा संदर्भ देतो, आणि हे दोन्ही संदर्भ एखाद्या शोधनिबंधात देतो, हे कसं जमते ते दाखवतो. मग आपण ते मान्य करायचं?

In reply to by श्रावण मोडक

खरडफळाच करायचाय का? त्यात जगभरात कुठे कसा वापरला गेला त्याचे डिस्ट्रिब्युशन असावे. अशा लोकल लेव्हलच्या जर्नलचा जगभर वापरल्या जाणाऱ्या जर्नलवर परिणाम करता येईल??? अन् तुम्ही दिलेलं उदाहरण पटलंय, असलं काही करायला लागलो तर संपलच. खरं तर यावर मला विचार करता येत नाहीये. अनासपुरेचा पिक्चर आठवायला लागलाय (निशाणी डावा अंगठा) :) .

In reply to by लॉरी टांगटूंगकर

खरडफळाच करायचाय का?
तिथं असं काही चालतं का हे माहिती नाही. त्यामुळं, जी, नाही. 'जगभर' म्हणाल तर अलीकडेच वाचनात आलेला एक लेख आहे. हा लेखक प्राध्यापक नसावा, पण विज्ञानातील आहे, फिजिसिस्ट आहे. यात बरंच काही आलं. जगभरातील ही नियतकालिकंही कशी चालतात हा संशोधनाचा विषय नक्कीच नाही. त्यामुळं अशाही नियतकालिकात 'साईट' झालं म्हणजे संशोधन झालं असं असेल, तर गोष्ट वेगळी. 'जगभरात' याची व्याख्या काय हा प्रश्न अलाहिदा.

In reply to by श्रावण मोडक

वरचा प्रतिसाद टायपून होई पर्यंत ४,५ प्रतिसाद आलेले होते. म्हून खफ करायचा का लिहिलं. दुवा वाचला, सगळी नियतकालिके अशीच आहेत काय ?? अन् रिसर्चलं लागणारा पैसा तर वेगळाच. इथे बऱ्याच ठिकाणी जर्नल्स घेतली जात नाहीत. तिथे संशोधनाला किती पैसा दिला जात असेल देवच जाणे. खाली म्हणल्याप्रमाणे एकूण ठिगळं लावायची तरी किती ?? जो चल रहा है चलने दो...

In reply to by लॉरी टांगटूंगकर

माझ्या माहितीप्रमाणे भारताचा या इम्पॅक्ट फॅक्टरनुसार केलेल्या यादीत अतिशय खालचा क्रमांक आहे. रिसर्च पेपरच्या फॅक्टर्‍या असल्याप्रमाणे ते प्रकाशित होतात.त्यांची खरी किंमत? शून्य.. आणि हे असे भरमसाठ पेपर प्रकाशित न करणारे लोक वेडे ठरतात आपल्याकडे संशोधन किंवा शिक्षणक्षेत्रात. विद्यार्थ्यांनाही असेच पेपर करण्यासाठी उत्तेजन दिलं जातं. नावावर पेपर आला म्हणजे झालं, ही मनोवृत्ती अगदी अपवाद सोडले तर सगळ्यांचीच आहे. हे अपवाद तरी करुन करुन काय करणार? प्रवाहाच्या फार विरुद्ध जाता येत नाही त्यांनाही. एकूण ठिगळं लावायची तरी किती ठिकाणी आणि कशी हा मोठाच प्रश्न आहे.

सदर बातमी वाचून दोन विचार मनात आले. च्यायला आमच्यावेळी असे नव्हते च्यायला आमच्यावेळी असे का नव्हते.

आता सरकार ने फक्त परिक्षा घेणे आणि निकाल लावणे इतकेच काम करावे. ज्या विद्यार्थ्यांना शिकायचे आहे, ते शिकतील खाजगी शिकवणी लावुन. ९०% प्राध्यापकांची लायकी शाळेची घंटा वाजवणार्‍य शिपायाची सुद्धा नाहिये. उरलेले १०% क्लासेस चालवून शिकवतील ज्यांना शिकायचे आहे त्यांना.

In reply to by प्रसाद१९७१

कृपया शाळेतील शिपायाचा प्राध्यापकांशी तुलना करुन अपमान करु नका. शिपाई कष्ट करुन कमावत असतो.

In reply to by नाना चेंगट

माझी चुक मान्य. शिपायांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील प्राध्यापकांशी तुलना करुन त्याबद्दल क्षमस्व.

परशुरामा, वाचतोय ना प्रतिसाद. सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम नको, नेट-सेटचे लाभ नको, संप तर नकोच नको, पण मिपावरचे प्रतिसाद तेवढे आवर रे बाबा......!!!! :) अवांतर : आमचा मित्र मिभो उर्फ सर्किट याची धाग्याची निमित्तानं लै आठवण येतेय. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा हा हा दमलात एवढ्यात ! चक चक चक !

माझ्यामते १) त्याना कमीतकमी २ लाख प्रतिमहिना एवढा पगार करावा. २)त्याना सर्वात उत्कृष्ट व महागडी सेडाना कार ड्रायव्हर सह सरकारने पुरवावी.(गाडी पुसण्याचा व चालवण्याचा त्याचा वेळ व पैसा वाचेल व एकाद्या होतकरु विद्यार्थ्याला नोकरी देखिल मिळेल.) ३) त्याना ३ किंवा ४ बीएचके बंगला अथवा सदनिका द्यावी. त्यात करकामासाठी एक घरगडी व स्वंयपाकासाठी एक बाई असावी.(आजकाल सर्व प्राध्यापकाच्या बायका बीएड करत असतात त्यामुळे सरांना वेळेत बर्‍याच गोष्टी मिळत नाहीत) ४)सेट नेट किंवा पीएचडी ह्या गोष्टींची सक्ती त्याच्यावर करु नये.(एकाच विषयावर १०० जणानी पीएचडीचा एकसारखा शोधनिबंध लिहण्याचा त्रास तरी वाचेल.) ५)प्राध्यापकाना दररोज ३च लेक्चर असावीत. (निदान त्याना तरी कळेल आपण आज काय शिकवले.) ६)कॉलेजात त्याना स्टाफरुम मध्ये इंटरनेट सुविधा,फुकट प्रिंटाउट मिळाव्यात.(म्हणजे एमएलएम कंपण्याचे लॉगैन व प्रिंट त्याना वेळेत कॉलेजातच मिळत जातील.तसेच नवीन कोणत्या एमएलएम कंपण्याचालु झाल्या आहेत त्याची माहिती त्याना नोटिसबोर्डावर उपलब्द करुन दिली जावी) ७)एल आयसी किंवा इतर विमा कंपन्यानी सर्व प्राध्यापकाना आपले एजंट म्हणुन नोंदणी करुन घ्यावे.म्हणजे त्याना कमी पडणारा पैसा त्यातुन ते मिळवु शकतील. अजुन बरेच काही सांगता येईल. पण सरकारने निदान वरील ७ मागण्या तात्काळ मंजुर करुन घ्याव्यात.

एल आयसी किंवा इतर विमा कंपन्यानी सर्व प्राध्यापकाना आपले एजंट म्हणुन नोंदणी करुन घ्यावे.म्हणजे त्याना कमी पडणारा पैसा त्यातुन ते मिळवु शकतील.
आणि सर्व विद्यार्थ्यांनी कमीत कमी एक कोटीची पॉलिसी घेतलीच पाहिजे ह्या प्राध्यापकांकडुन. १ दिवसाला ३ तास घेणे फार होते. एक लेक्चर पुरे. २. Staff room AC असावी. त्यात प्रत्येक प्राध्यापकांसाठी बेड असावेत. ३. Staff room मधे १०० इन्ची LED TV असावा. ४. income tax नसावा अजुन बर्‍याच काही मागण्या आहेत.

खरय आज कुणीही उठाव आणी प्राध्यापकांना झोड्पावं अशी स्थिती दिसते,प्राध्यापकांमधे काही लोक म्हणतात तसे काही लोक असतीलही पण सगळ्यांना एकाच तराजुने तोलण कस शक्य आहे,आज कुठल अस क्षेत्र आहे की ज्यात सगळे एक सारखेच लोक आहेत. प्राध्यापकांचा पगार सर्व समाजाच्या डोळ्यात खुपतोय अस दिसत्,फक्त पाच तास काम करुन एव्हढा पगार हेच वरकरणी दिसतय पण ते पाच तास शिकवण्यासाठी किती तास आधी तयारी करावी लागते याचा विचार कोणी करताना दिसत नाही. प्राध्यापकांच्या बहिष्कारा बद्दल बोललं जातय पण पण ही वेळ त्यांच्यावर कोणी आणली याचा विचार होताना दिसत नाही,मित्रहो प्राध्यापकांनाही त्यांच्या न्याय्य मागण्यासाठी भांडण्याचा हक्क आहेत हे आपण विसरता. बाकी चर्चेच्या हीन पातळी बद्द्ल काही न लिहणंच बर,,,,,

In reply to by प्राध्यापक

>>> बाकी चर्चेच्या हीन पातळी बद्द्ल काही न लिहणंच बर,,,,, चालायचंच सर....!!! :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्राध्यापक

आपल्याला घडवण्यात शाळेपासून महाविद्यालयापर्यंतच्या शिक्षकांचा / प्राध्यापकांचा पुरेपूर वाटा आहे. प्रत्येकच क्षेत्रात चांगल्याबरोबर वाईटही असणारच. संपूर्ण प्राध्यापकवर्गावर इतकी टोकाची टिका करण्यापेक्षा शिक्षणक्षेत्रात सुधारणा होण्यासाठी स्वतःला काय करता येईल हे पहावे. काहीच नाही तर आपल्या कार्यक्षेत्राशी संबंधीत अभ्यासक्रम शिकवला जातो तिथे जाऊन विद्यांर्थ्यांना गेस्ट लेक्चर्स वगैरे द्यावीत. म्हणजे पुस्तकी ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग कसा करता येतो हे विद्यार्थ्यांना योग्य वेळी कळेल. मी हे करून पाहिले आहे व त्यासाठी प्राध्यापक व विद्यार्थी या दोन्हींचेही पूर्ण सहकार्य मिळाले.

In reply to by श्रीरंग_जोशी

प्रचंड असहमत. मी जेव्हडे काही शिकलो आहे आणि नोकरी करुन पोटापाण्याची सोय करत आहे त्यात महाविद्यालयापर्यंतच्या प्राध्यापकांचा थोडा सुद्धा वाटा नाही. माझी प्राध्यापकांबद्दल ची मते माझ्या अनुभवातुन बनली आहेत. समाजावरची बांडगुळे आहेत.

In reply to by प्रसाद१९७१

वाटा नाही कसा? आहेच. सकर्मक नसेल, अकर्मक आहेच. काय करायचे हे त्यानी सांगितले नसेल, पण काय करू नये हे वागण्या-बोलण्यातून नक्कीच शिकवले असेल. तो वाटाच आहे.

In reply to by प्राध्यापक

>>>खरय आज कुणीही उठाव आणी प्राध्यापकांना झोड्पावं अशी स्थिती दिसते,प्राध्यापकांमधे काही लोक म्हणतात तसे काही लोक असतीलही पण सगळ्यांना एकाच तराजुने तोलण कस शक्य आहे,आज कुठल अस क्षेत्र आहे की ज्यात सगळे एक सारखेच लोक आहेत. तेच तर आम्ही म्हणतोय. पण प्राध्यापक आम्ही नाही तसले असा आव आणतात तो चुकीचा आहे एवढेच >>प्राध्यापकांचा पगार सर्व समाजाच्या डोळ्यात खुपतोय अस दिसत्,फक्त पाच तास काम करुन एव्हढा पगार हेच वरकरणी दिसतय पण ते पाच तास शिकवण्यासाठी किती तास आधी तयारी करावी लागते याचा विचार कोणी करताना दिसत नाही. हा हा हा असे किती तयारी करुन तासिका घेणारे आहेत प्राध्यापक? एकदा त्यांच्या चरणाचे तीर्थ प्राशन करावे म्हणतो. असतील म्हणा नाही असे नाही पण गेल्या चाळीस वर्षांत एक माईचा लाल असा तयारीने आलेला दिसला नाही. सगळे आपले आपल्या बॅ़क बॅलन्सच्या फिकीरीत.. असो ! आमचे नशीब आम्हाला चांगले प्राध्यापक दिसलेच नाहीत. >>प्राध्यापकांच्या बहिष्कारा बद्दल बोललं जातय पण पण ही वेळ त्यांच्यावर कोणी आणली याचा विचार होताना दिसत नाही,मित्रहो प्राध्यापकांनाही त्यांच्या न्याय्य मागण्यासाठी भांडण्याचा हक्क आहेत हे आपण विसरता. भांडावे की जरुर भांडावे... ! पण न्याय्य मागण्यांसाठी भांडतांना आपले कर्तव्य विसरु नये. असो. विषय मोठा आहे. >>>बाकी चर्चेच्या हीन पातळी बद्द्ल काही न लिहणंच बर,,,,, सहमत आहे. मिपावर यापेक्षाही हीन पातळीवर चर्चा झाली आहे. त्यावेळेस आपण काही बोललेले दिसले नाही. तुम्हाला दुजोरा देणारे तर आनंदाने टाळ्या वाजवून सामिल झालेले आम्ही पाहिले आहे. मिपा हे समाजाचे प्रतिबिंब आहे. आज समाजात प्राध्यापक हा हेटाळणीचा आणि कुचेष्टेचा विषय होत चालला आहे हे नक्की. मिपावर त्याचे प्रतिबिंब उतरणारच. प्राध्यापकांना फक्त आरत्याच ओवाळून घ्यायच्या असतील तर इतर हुच्चभ्रु संकेत स्थळे आहेत किंवा कुठल्यातरी खेड्यातून प्रसिद्ध होणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची (!) जर्नल्स आणि शेमिनार्स आहेत. जै हो !! >>विद्याविनयेन शोभते सहमत आहे. आमच्यापाशी ना विद्या ना विनय त्यामूळे शोभण्याचा प्रश्नच नाही. जातीचे नंगट ! पटल त्याला उचलून धरणार नाही पटल त्याला शिव्या देणार ! हाकानाका.

In reply to by प्राध्यापक

फक्त पाच तास काम करुन एव्हढा पगार हेच वरकरणी दिसतय पण ते पाच तास शिकवण्यासाठी किती तास आधी तयारी करावी लागते याचा विचार कोणी करताना दिसत नाही.
अभ्यासक्रम बदलला तरीही वर्षानुवर्ष त्याच पुटं चढलेल्या, पिवळ्या झालेल्या वह्यातलं शिकवायचं, एक-दोनच विषय घेउन दशकानुदशकं शिकवायचं, क्वालेजच्या ट्रस्टीज समोर हांजी हांजी करायची वगैरे हे विसरलात. आमच्यावेळी बहुतांश क्वालेज मध्ये इंटर्नल मार्क्स प्राध्यापक मंडळींच्या हातात नसते तर वर्गात काळं कुत्रं फिरकलं नसतं अशी परिस्थिती होती (आताचं माहीत नाही ;) ) आया(याया)यटीज/रिजनल वगैरे क्वालेजेसचं माहीत नाही पण मागच्या तीन-चार दशकांपासून कुत्र्याच्या छत्र्यांसारख्या उगवलेल्या अभियांत्रिकी क्वालेजेसचं सांगतो. ज्यांना कंपन्यात कुठेच चांगली नोकरी मिळत नाही ती लोकं कंटाळून प्राध्यापकी करतात असा माझा समज माझ्या ब्याच मेटस नी पक्का केला आहे. :)

In reply to by दादा कोंडके

>>आया(याया)यटीज/रिजनल वगैरे क्वालेजेसचं माहीत नाही यांच्याबद्दल सर्वसामान्य माणसांनी मतप्रदर्शन करायला बंदी आहे.

In reply to by दादा कोंडके

क्वालेजच्या ट्रस्टीज समोर हांजी हांजी करायची वगैरे हे विसरलात. आमच्यावेळी बहुतांश क्वालेज मध्ये इंटर्नल मार्क्स प्राध्यापक मंडळींच्या हातात नसते तर वर्गात काळं कुत्रं फिरकलं नसतं अशी परिस्थिती होती (आताचं माहीत नाही )
हॅ हॅ हॅ..आज काल तर कॉलेजच्या ट्रस्टीज चे वाढदिवस सुद्धा प्राध्यापक मंडळीं कॉलेज समोर बॅनर वैग्रे लावून, फटाके फोडून साजरे करतात. बाकी, अजून पर्यंत जरी इंटर्नल मार्क्स प्राध्यापक मंडळींच्या हातात असले तरी वर्गात उपस्थिती मात्र प्रचंड रोडावली आहे एव्हढाचं काय तो फरक. त्याचे कारण तुम्हाला मी सांगायला नकोचं ;)
ज्यांना कंपन्यात कुठेच चांगली नोकरी मिळत नाही ती लोकं कंटाळून प्राध्यापकी करतात असा माझा समज माझ्या ब्याच मेटस नी पक्का केला आहे.
सेम हियर. :)

In reply to by प्राध्यापक

पाच तास शिकवण्यासाठी किती तास आधी तयारी करावी लागते याचा विचार कोणी करताना दिसत नाही.
वर्षानुवर्ष तेच ते शिकवूनहि जर रोज शिकवण्यासाठी आधी तयारी करावी लागत असेल तर अवघड ए ब्वॉ. प्राध्यापकांच आणि इद्यार्थ्यांच बी.

प्राध्यापक हो तुमच्यावर इतका अन्याय खरोखरच होत असेल तर तुम्ही दुसरी नोकरी का शोधत नाही. तुमच्या मागण्या मागण्याचा जसा तुम्हाला हक्क आहे,तसा शिक्षण घेण्याचा विध्यार्थ्यांना देखिल हक्क आहे.दुसर्‍याचा हक्क पायदळी तुडवताना व वर चर्चा चालु आहे तिला हिन चर्चा म्हणता,शिक्षण क्षेत्रात तुम्हाला पगार मिळत नसल्यास इतर क्षेत्रात तुम्ही जाउ शकता. इतक्या विद्यार्थ्याच्या आयुष्याशी खेळण्याचा हक्क कोणी तुम्हास दिला आहे. विद्याविनयेन शोभते...तुमच्या सारख्या लक्ष्मी भक्ताना तर नाहीच नाही. एक विद्यार्थी.

In reply to by वेताळ

तुम्ही दुसरी नोकरी का शोधत नाही.
प्रचंड सहमत.

अभाविप.ने मुंबई उच्च न्यायालयात प्राध्यापकांच्या परिक्षेच्या कामकाजावरील बहिष्काराच्या बाबतीत जनहितयाचिका टाकली असून ती याचिका उच्च न्यायालयाने स्वीकारुन महाराष्ट्र सरकार, युजीसी आणि एमफुक्टो (प्राध्यापक संघटना) यांना प्रतिवादी केलं आहे. त्याबाबतची सुनावनी १६ एप्रिलला होणार आहे. मा.शरद पवार आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार यांची याबाबतची काल होणारी बैठक काही झाली नाही. बघु या काय तोडगा निघतो ते....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उच्च न्यायालयाने प्राध्यापकांना फटकारू नये तसेच त्यांचे वाभाडे काढू नये अशी सदिच्छा व्यक्त करतो. :)

मला वाटते आता कुठला संप चालू नाही... पण मग हा धागा कधी मिटणार? :)

In reply to by विकास

संप चालू नसला तरी प्राध्यापकांचा बहिष्कार चालू आहे. त्यांच्या रास्त मागण्या पूर्ण झाल्या की आपण हा धागा मिटवू या ! तोवर प्राध्यापकांना नैतिक पाठिंबा देणे आपले कर्तव्य आहे. कोण म्हणतो देणार नाही ! घेतल्याशिवाय सोडणार नाही ! प्राध्यापकांचा विजय असो ! समस्त प्राध्यापकांनो एक व्हा !

प्राध्यापकांच्या बहिष्काराच्या संदर्भात, प्राध्यापकांनी विद्यापीठाच्या परीक्षा कामावर बहिष्कार टाकला त्या कारणांची गंभीर नोंद घेण्यास हायकोर्टाने स्पष्ट नकार दिला. ''नेट-सेट पात्रता नसलेल्या प्राध्यापकांना विद्यापीठांनी मान्यता दिल्याच्या तारखेपासून सेवागृहित धरून वेतननिश्चिती व स्थाननिश्चिती देण्यात यावी , या विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या निर्णयाची राज्य सरकारने चार महिन्यात कारवाई करून अंमलबजावणी करावी , असा आदेश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे ज्या मूळ कारणांसाठी प्राध्यापकांनी विद्यापीठाच्या परीक्षा कामावर बहिष्कार टाकला त्या कारणांची गंभीर नोंद घेण्यास हायकोर्टाने स्पष्ट नकार दिला. तसेच सरकारला निर्णय घेण्यासाठी पुरेसा कालावधी दिला आहे.'' मटा. -दिलीप बिरुटे (हायकोडताच्या निर्णयाने आनंदित झालेला)

In reply to by रुमानी

नै वो. अजून पगार कै वाढले नाही. प्राध्यापकांचा बहिष्कार पगारासाठी नाही. सहाव्या वेतन आयोगाची जी फरकाची रक्कम आहे, त्यासाठी हा बहिष्कार आहे. सर्वांनी मीठ मोहर्‍यांनी नजर काढली होती, तुम्हीच राहील्या होत्या. धन्यवाद. ;) -दिलीप बिरुटे

प्राध्यापकांनी म्हणे गुढी न उतरविण्याचा संकल्प केला होता,पण सहचरणीचे रुप पाहुन उतरविली गुढी