मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी चित्रपटातील संवादच दळीद्री?

विसोबा खेचर · · काथ्याकूट
राम राम मिपाकरहो, देवदत्तरावांनी सुरू केलेला सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये हा धागा वाचनात आला. त्यात अनेकांनी हिंदी चित्रपटातील लक्षात राहिलेली वाक्ये, लक्षात राहिलेले संवाद नोंदवले आहेत. याकरता हिंदी चित्रपट सृष्टीचा आपल्यावरील पगडा कारणीभूत आहे, तसेच तुमच्याआमच्या सारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांना जसेच्या तसे लक्षात राहावेत इतपत त्यातील संवाद/वाक्ये परिणामकारक आहेत असे म्हणावे लागेल. आणि म्हणूनच एका अर्थी हे हिंदी चित्रपटांचे यश आहे असेही म्हणावे लागेल.. परंतु हा धागा वाचत असतांना एक गोष्ट वारंवार लक्षात आली ती अशी की त्यात मराठी चित्रपटातील लक्षात राहिलेली वाक्ये किंवा परिणामकारक संवाद अगदी एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतपतच नोंदवले गेले आहेत/नाहीत! असे का? मराठी चित्रपटात परिणामकारक संवांदांची एवढी हालाखी का? किंवा प्रेक्षकांच्या नेहमी लक्षात राहील असा एखादाही संवाद मराठी लोकांना लिहिता येत नाही? किंवा तेवढ्या परिणामकारकतेने तो मराठी अभिनेत्यांना बोलता येत नाही? की आपल्यावर हिंदी चित्रपट सृष्टीचा जेवढा पगडा आहे तेवढा मराठी चित्रपटांचा नाही? नसल्यास कारण काय? मराठी चित्रपटांचा निदान मराठी प्रेक्षकांवर तरी हिंदी चित्रपटांपेक्षा अधिक पगडा का नसावा? विशेषत: मराठी चित्रपट पाहायला पाहिजे, तो मागे पडत चालला आहे असा नेहमीचा आक्रोश करणार्‍या लोकांनी वरील प्रश्नांची उतरे द्यावीत..! :) मध्यंतरी काही मंडळींनी सचिन, महेश कोठारे या मंडळींनी लक्ष्या, अशोक सराफला घेऊन काढलेल्या खंडीभर चित्रपटांची तोंड भरून स्तुती केल्याचे आठवते! :) असो.. चित्रपटातले संवाद लोकांच्या लक्षात रहाणे, त्यांच्या तोंडी असणे हा कुठलाही चित्रपट चांगला किंवा वाईट हे ठरवण्याचा एकमेव निकष नाही हे अगदी कबूल! परंतु चित्रपटाच्या लोकांवर होणार्‍या परिंणामकारकतेचा एकमेव नसला तरी तो एक महत्वाचा निकष आहे असे मानायला हरकत नाही! आपला, (हिंदी चित्रपट प्रेमी) तात्या.

वाचने 31724 वाचनखूण प्रतिक्रिया 70

विसोबा खेचर 12/03/2009 - 09:07
मराठी चित्रपटाच्या कैवार्‍यांना हिंदी चित्रपटाच्या प्रत्येक गाजलेल्या संवादास उत्तर म्हणून मराठी चित्रपटातील एकही संवाद उत्तर म्हणून फेकता येऊ नये? :) अरे काय रे है?! छ्या..! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रमेय 13/03/2009 - 04:24
तात्याबा, काही म्हणा,पण मराठीत संवाद हा फेकावा लागतो. हिंदी किंवा विंग्रजी सारखे 'स्पिल आउट' अवघडच! हे घ्या माझे उत्तर. माझ्यासाठी हे सगळे पेशल आहेत... १. ओम् फट स्वाहा: २. ओम् भग्नी भागोदरी भस्मासे ओम् फट स्वाहा: (मुलांमध्ये हा एवढा प्रसिद्ध झाला होता की शाळेत प्रत्येकजण दुसर्‍यावर हा मंत्र सोडायचा.) ३. डोळ्यात बघ, डोळ्यात बघ. ४. (महेश कोठारेंचा हातावर मुठ आपटत) डॅम इट... बाकीचे लक्षात आल्यावर यादीत वाढवेन.

विंजिनेर 12/03/2009 - 09:20
असं म्हणतात की लाखभर मा़कडे बसविली तर कधी ना कधी तरी शेक्सपियर पेक्षा सरस नाट्य तयार होईल (अंदाज पंचे दाहोदरसे) आता मराठी सिनेमे मुठभर तर हिंदी सिनेमे ढिगभर. पर्यायाने सिनेमाचे संवाद लिहिणार्‍या माकडांची संख्या पण मराठीत हिंदी पेक्षा कमीच असणार. म्हणून असं होत असावं कदाचित :). (झुलु भाषेतल्या सिनेमांचा प्रेमी) विंजिनेर

सहज 12/03/2009 - 09:25
शक्य आहे. कितीही जोर दिला तरी डोक्यात काहीतरी निळू फुले शाळामास्तरीणीशी बोलताना खास आवाजात "पण बाई आम्ही काय म्हणतो.." असलेच संवाद असेल असे वाटते. मधे फार एक काळ तमाशा चित्रपटांनी खराब केला मग पाचकळ इनोदी सिनेमांनी व कुबलपटांनी / आता जरा वेगवेगळे मराठी चित्रपट येत आहेत बरे आहे.

चिरोटा 12/03/2009 - 09:26
खरे सान्गायचे तर जास्त मराठी चित्रपट बघितले नाही आहेत्.परन्तु मराठी सन्वाद खुपच बोजड असतात असे मराठी चित्रपट बघणारे सान्गतात.भाषा सहज आणि लक्षात राहिल अशी नसते.काही विनोदी चित्रपटात भाषा अगदिच रस्त्यावरची असते.हिन्दी आणि उर्दु ह्यान्चे जसे नाते आहे तसे मराठी आणि कुठल्या दुसर्या भाषेचे नाही. भेन्डि सोलापुर्,कोल्हापुर सह विशाल कर्नाटक झालाच पाहिजे.

पिवळा डांबिस 12/03/2009 - 09:43
"दाभाडे: नाही, ते समजलं! पण काही वैयक्तिक? डिकास्टा: या (मागण्या) लेखी राहू शकत नाहीत. पण जर का त्या पुर्‍या झाल्या नाहीत तर नव्या मुख्यमंत्र्याला सचिवायलासमोर मी जोड्यानं मारीन!!!" चित्रपटः सिंहासन

मराठी_माणूस 12/03/2009 - 09:48
एखादे वाक्य्/संवाद खुप लोकप्रीय होतो , जेंव्हा त्याची लोकांच्यात सार्वजनीक ठीकाणी खुप चर्चा होते. इथे मराठी माणसे चार लोकात मराठीतच बोलायला लाजतात ते काय मराठी चीत्रपटातल्या संवादाची चर्चा करणार. (अवांतर:काही दिवसापुर्वी कार्यालयातल्या एका मराठी मुलाला रजनीकांतची नक्कल करताना पाहीले त्याच्या तमीळ संवादा सकट)

शिप्रा 12/03/2009 - 09:59
तात्या..दादा कोंडकेंना विसरलात? त्यांचे चित्रपट हे त्याकाळि फक्त संवादांवर चालत (द्वयर्थी );)

चिरोटा 12/03/2009 - 10:09
माझ्यामते हिन्दि चित्रपटान्चा सामान्य मराठी माणसान्वर प्रचन्ड प्रभाव आहे.अगदी आघाडीची 'माय मराठी' वाली व्रुत्तपत्रेपण 'शहारुख बोलतो कसा/काजोल ला मटण मसाला आवडतो की चिकन मसाला' ह्यावर रकानेच्या रकाने देत असतात. (अवान्तर्-इकडे कन्नड व्रुत्तपत्रे/टी.वी.वाले केवळ कन्नड चित्रपट्/नाटके/पुस्तके ह्यान्ची दखल घेतात्.टी.व्ही. वरिल सन्गीत स्पर्धा पण कन्नड गाणाच्यान्च. नन्तर वेळ मिळालाच तर हिन्दि.आन्धळे अनुकरण करण्याची पध्धत तेवढी लोकप्रिय नाही.). भेन्डि

चिरोटा 12/03/2009 - 10:16
लहान्पणी बघितलेला चित्रपट- कुठला ते आठवत नाही.परन्तु निळु फुले होते.त्यान्च्यावर बलात्काराचा आरोप. पोलिस- बलात्कार तुम्हिच केलात का? फुले- हो पोलिस्-कधी केलात? फुले-(काहितरि वेळ सान्गतात) पोलिस्-कुठे केलात ती जागा दाखवा. फुले- साहेब, साखर बेडरुम मधे खाल्लि काय सन्डासात खाल्ल्लि काय, गोडच लागते.!!

सुनील 12/03/2009 - 10:45
पूर्वी मराठी घरांत गाण्यांच्या भेंड्या खेळल्या जात. जरी बहुतांश गाणी हिंदीतली असली तरी अधून्-मधून मराठी गाणीही म्हटली जात. आता भेंड्या जाऊन अंताक्षरी आली आणि मराठी गाणी पार दिसेनाशी झाली. साहजिकच आहे, भावगीतांच्या व्याजावर किती दिवस काढणार? गेल्या विस वर्षांत मराठी गाण्यांत उल्लेखनीय भर पडल्याचे उदाहरण नाही. त्यातून हिंदीतर राज्यांमध्ये हिंदीचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्रावर आहे. तेव्हा त्याचे प्रतिबिंब सर्व ठिकाणी पडणारच - मग ती गाणी असोत, चित्रपट संवाद असोत, मालिका असोत, की अजून काही. जाता जाता - रंगपंचमी होळी पौर्णिमेनंतर पाचव्या दिवशी येते. ती महाराष्ट्राची खरी परंपरा. होळीच्या दुसर्‍या दिवशीची धुळवड ही उत्तरेतून झालेली अजून एक आयात! थोडक्यात, विषय चित्रपट संवादापुरता मर्यादित नाही!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

llपुण्याचे पेशवेll 12/03/2009 - 11:10
जाता जाता - रंगपंचमी होळी पौर्णिमेनंतर पाचव्या दिवशी येते. ती महाराष्ट्राची खरी परंपरा. होळीच्या दुसर्‍या दिवशीची धुळवड ही उत्तरेतून झालेली अजून एक आयात! थोडक्यात, विषय चित्रपट संवादापुरता मर्यादित नाही!! वरील पूर्ण प्रतिसाद आणि या वाक्यांशी सहमत. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

प्रमोद देव 12/03/2009 - 11:26
होळीच्या दुसर्‍या दिवशीची धुळवड ही उत्तरेतून झालेली अजून एक आयात! धुळवड तथा धुलिवंदन ही महाराष्ट्राचीच आहे. मात्र हल्ली धुळवडीलाच लोक रंगपंचमी समजतात हे दूर्दैव आहे. पूर्वी हा सण होळीपासून पुढे पाच दिवस खेळला जायचा....रंगपंचमी तथा वसंतपंचमी पर्यंत. आता कुणाला वेळ आहे इतका? म्हणून मग धुळवडीलाच रंगपंचमी साजरी करतात झालं. :) आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर 12/03/2009 - 11:31
म्हणून मग धुळवडीलाच रंगपंचमी साजरी करतात झालं. माझ्या मते ज्य दिवशी रंगांची उधळण होते ती रंगपंचमी! आपल्याकडे फक्त एकच दिवस रंगांची उधळण होते, ती म्हणजे धुळवडीच्या दिवशी. मग त्या दिवसाला रंगपंचमी म्हटलं तर बिघडलं कुठे? आता 'पंचमी' या शब्दाला आपलं महत्व टिकवून धरण्याची ताकद नाही त्याला कोण काय करणार?! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

llपुण्याचे पेशवेll 12/03/2009 - 11:43
कोकणात बर्‍याचश्या गावांमधे अजूनही रंगपंचमीलाच रंग खेळतात. होळीच्या दुसर्‍या दिवशी धुळवड असते ती अक्षरशः होळीची उरलेली राख आणि धुळ यानि खेळली जायची. शिमग्याच्या पालख्या होळीची बोंब ठोकून सुरू होतात आणि संपूर्ण गावभर फिरून रंगपंचमीला परत त्या त्या देवळात परत येतात. आणि त्या दिवशी म्हणजे रंगपंचमीला रंग खेळला जातो. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

धमाल मुलगा 12/03/2009 - 12:35
फक्त कोकणात? म्हाराजा, मुंबई, पुणे आणि नाशिक हा सुवर्ण त्रिकोण म्हणजे उभा महाराष्ट्र नव्हे. संपुर्ण पश्चिम महाराष्ट्रात तरी (निदान माझ्या माहितीप्रमाणे!) वर पेशव्यांनी नमुद केल्याप्रमाणे रंगपंचमीलाच रंग खेळला जायचा! आता सुवर्ण त्रिकोणाचं अनुकरण करणं म्हणजे आपण पुढारलेलो आहोत ह्या फोल समजुतीतून उपरोक्त गावांच्या महानगर होताना स्वत:च्या मुळ पध्दती टिकवून न ठेवण्याच्या प्रक्रियेतून झालेल्या बदलाला स्विकारुन धुळवडीलाच रंग खेळला जाऊ लागला आहे. धुळवडीला रंग नव्हे तर आदल्या दिवशीच्या होळीतली राख व माती अंगाला फासली जाते (जायची म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल!) म्हणुन ह्या दिवसाला 'धुलीवंदन'/'धुळवड' म्हणले जाते. असो! कालच रंग लावायला आलेल्या एकाला फटकावला. इमारतीच्या तळमजल्यावर रंग लावण्यासाठी अडवल्यावर त्याला एकाच वाक्यात परतवला. विचारलं, "तू भैय्या-बिहारी आहेस का? मी भैय्या-बिहारी आहे का? आज रंगपंचमी आहे का? नाही ना? मग हो बाजुला! रंगपंचमीला ये आणि वाट्टेल तेव्हढा रंग फास.." आता मुद्द्याचं: मराठीतली माझी आठवणीतली वाक्यं: १. मारुती कांबळेचं काय झालं? २.उठसुठ कसले रे हगल्या मुतल्यासारखे डे साजरे करता? म्हणे मदर्स डे अन् फादर्स डे...आपल्यात आईबापाचे दिवस कधी घालतात? ते गेल्यावर. तुम्हीतर जिवंतपणीच त्यांचे दिवस घालायला लागलात की! (सातच्या आत घरात) निळू फुलेंची तर कित्येक वाक्यं.. सातच्या आत घरातमधला त्यांचा एकमेव तीन मिनिटांचा सीन! त्यातलं तर वाक्य अन् वाक्य! उदा: १.आमच्या घराण्यात गलास फोडल्याचे बारा आणे कधी कुणी भरले नाहीत. पोरानं दारु प्यावी, मास्तराला मारावं, हवालदाराच्या कानफटात ठेऊन द्यावी आन बापानं नायतर आज्यानं सगळं नुसतं करंगळीवर निभाऊन न्यावं.... २.निळूभाऊ: हे बगा इनिसप्याक्टर... इन्स्पेक्टरः मांजरेकर! निळूभाऊ: क्वॉकनातले क्यॅय? इन्स्पेक्टरः हो! निळूभाऊ: तर्रीपन ऐकायचं! ते तुमचं काय डायर्‍या, यफाराय, पंचनामा जितं कुटं युवराजांचं नाव असंल तितं काट मारायची......येवड्यासाठी मला शीयेम ना फोन करायला लाऊ नका! ते सोत्ता इथं येतील. ३.बाकी....पोरीला साडीचोळी..ह्ये$$$ आमी करु! आवो खानदानी पध्दतय ती आमची! सध्या पटकन इतकेच आठवले. :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

In reply to by प्रमोद देव

अमोल नागपूरकर 13/03/2009 - 14:58
रंगपंचमी तथा वसंतपंचमी पर्यंत वसंतपंचमी ही माघ शुद्ध पंचमीला साजरी करतात. ती होळीच्या खूप आधी येते. तिचा आणि रंग खेळण्याचा काही संबंध नाही.

सँडी 12/03/2009 - 10:52
फुले- साहेब, साखर बेडरुम मधे खाल्लि काय सन्डासात खाल्ल्लि काय, गोडच लागते.!! =)) झ्याक!

चन्द्रशेखर गोखले 12/03/2009 - 11:02
मराठी चित्रपटांतील संवाद दरिद्री आहेत या मताशी मी सहमत नाही. चित्रपट परिणाम कारक करण्यासाठी संवाद परिणामकारक असणे आवश्यक आहे, हे खरे. परतु ही गोष्ट त्या चित्रपटाच्या कथानकावर अवलंबुन आहे.चित्रपटाचे कथानक जीवनाच्या वास्तवतेच्या जवळ जाणारे असेल तर साधेसुधे तुम्ही आम्ही रोज बोलणारे संवाद अधिक परिणाकारी वाटतात. शामची आई, शेजारी, छोटाजवान, पिंजरा,एकटी, उंबरठा, सामना, सिंहासन, श्वास, देवराई, जैत रे जैत, एक होता विदुषक. यात कुठेही नायकांच उदत्तीकरण न करता चित्रपटांमध्ये मांडलेल्या समस्यांना महत्वाच स्थान दिलेल आहे. हे चित्रपट गाजले ते त्यांमध्ये माडलेल्या निरनिराळ्या समाजिक समस्यासाठी व त्या जीवंतपणे उतरवण्यासाठी दिग्दर्शकांनी/अभिनेत्यानी घेतलीले कष्ट व त्याच बरोबर त्यातील साधे सोपे संवाद यात काम करणा-या अभिनेत्यांनी स्टाइलाइज करुन हे संवाद म्हंटले असते तर चित्रपटाची वाट लागली असती. मराठीत बहुतांशी समाजिक व कौटुंबिक चित्रपट ख-या अर्थाने निर्माण झाले. हिंदी चित्रपटांचे तसे नाही. त्या मध्ये नायक नायिकेचे अवास्तव उदात्तीकरण केलेले असते. आनंद मधला राजेशखन्ना लक्षात रहातो कान्सरची समस्यानाही दिवार मधला मेरेपास मा है हा संवाद लक्षात रहातो व गुन्हेगारी व्रुत्तीचे उदात्तीकरण होते. मशाल मधे पत्रकारितेच्या समस्या लक्षात रहात नाहीत तर दिलिपकुमारचा ए भाय रुको ए भाय गाडी रोको हा प्रसंग लक्षात रहातो. शोले घ्या पाकिझा घ्या सा-या चित्रपटांमध्ये कथानकाला व समाजिक प्रश्नांना दुय्यम स्थान आहे कारण सर्व पात्रांच उदात्तीकरण केल्याच दिसतं आणि मग अपरिहार्यपणे संवादांना महत्व आलचं पण मदर इंडीया,आक्रोष अर्धसत्य मंथन यांसारखे चित्रपट वास्तवाशी जवळीक साधणारे आहेत त्यांचे संवाद कुठे लक्षात आहेत..? आपल्या कडे हि जबाबदारी नाटकांकडे जाते आणि नाटकाच्या माध्यमाला ते आवश्यकच आहे, रामगणेश गडक-यांपासून अत्रे रांगणेकर, बाळ कोल्हटकर ,वसंत कानेटकर ,कालेलकर, शिरवाडकर रमेश पवार यांच्या नाटकांतील स्वगते संवाद चिरंतन आहेत. शेवटी माझ्यामते मराठी चित्रपटाला एक चांगली परंपरा आहे, हिन्दीची कॉपी करण्याच्या नादात आपले स्वत्व मारु नये, संवादांचा प्रश्न तितकासा महत्वाचा नाही.

In reply to by चन्द्रशेखर गोखले

विसोबा खेचर 12/03/2009 - 11:26
संवादांचा प्रश्न तितकासा महत्वाचा नाही. प्रश्नच मिटला..! विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. तात्या.

In reply to by चन्द्रशेखर गोखले

धमाल मुलगा 12/03/2009 - 12:41
गोखलेसाहेब, मान गये उस्ताद! अप्रतिम प्रतिसाद.
मशाल मधे पत्रकारितेच्या समस्या लक्षात रहात नाहीत तर दिलिपकुमारचा ए भाय रुको ए भाय गाडी रोको हा प्रसंग लक्षात रहातो. शोले घ्या पाकिझा घ्या सा-या चित्रपटांमध्ये कथानकाला व समाजिक प्रश्नांना दुय्यम स्थान आहे कारण सर्व पात्रांच उदात्तीकरण केल्याच दिसतं आणि मग अपरिहार्यपणे संवादांना महत्व आलचं पण मदर इंडीया,आक्रोष अर्धसत्य मंथन यांसारखे चित्रपट वास्तवाशी जवळीक साधणारे आहेत त्यांचे संवाद कुठे लक्षात आहेत..?
अगदी अगदी! पुर्ण पटलं. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

परिकथेतील राजकुमार 12/03/2009 - 11:19
आता मराठीत येउन जाउन लक्षात राहण्यासारखे संवाद म्हणजे :- १)बाई, अहो आपला स्वतःचा येव्हडा वाडा असताना तुम्ही त्या पडक्यात राहणार ? तुम्हाला तिथे बघुन, आम्हाला हिकड रातीला झोप यायची नाही. (इती निळु फुले) २)ह्म्म्म जाधव शी एम ला फोन लावा, सांगा आम्ही बोलणारे म्हणाव (निळु फुले) ३) सात च्या आत घरात मधला हा प्रसंग तर निळु फुले च्या संवादफेकी मुळे आयुष्यभर विसरला जाणार नाही. तेच सामना चित्रपटाबाबत सुद्धा. ४) महेश कोठारेचे डॅम्म इट सुद्धा लक्षात राहणारे. पण खरे सांगु का संवादांवर जेव्हडी मेहनत सामना, पिंजरा, वजीर, सिंहासन च्या वेळी घेतली गेली तेव्हडी त्यानंतर फार कमी चित्रपटात बघायला मिळाली. आणी हिंदी मधील काहि संवाद हे अगदी नकळत मेंदुत घुसुन बसतात. मग "तो कितने आदमी थे" असो किंवा "डावर साब, मै आज भी फेके हुअ पैसे नहि उठाता" असो. आम्ही मराठीतले संवाद लक्षात वगैरे मुद्दाम ठेवत नाही असे मात्र काहि नाही. आज सुद्धा आम्हाला 'अहो बाई, वापरलेला दगड आहे' म्हणणारा दादा कोंडके तेव्हड्याच सहजपणे आठवतो जेव्हड्या सहजपणे अर्धसत्य मधला ओम पुरी :) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

sanjubaba 12/03/2009 - 11:33
मराठीतील गाजलेल्या श्याम च्या आई चे संवाद हे गब्बर च्या संवादा सारखे सिनिमॅटिक नसतील पण आजही ते संवाद लक्षात राहतील असेच आहेत. उदा. " श्याम जसा पायाला घाण लागू नये म्हणून जपतो तसच मनाला घाण लागू नये म्हणून पण जप" " श्याम कळ्या क्धीच तोडू नये, : ई. आणि सध्या संजय पवार हे नव्या दमाचे संवाद लेखक खूप चांगले संवाद लिहितात म्हणजे तुमचे वैचारिक विश्व ढवळून काढतील असे, उदा. मातीच्या चुली, आई शपथ, दिवसेंदिवस अश्या चित्रपटातील संवाद उलेखनीय आहेत संजूबाबा

In reply to by sanjubaba

परिकथेतील राजकुमार 12/03/2009 - 11:40
मातीच्या चुली, आई शपथ, दिवसेंदिवस अश्या चित्रपटातील संवाद उलेखनीय आहेत प्रत्येकातले २/३ संवाद सांगा बर पटापटा म्हणालो तर किती आठवतील हो ? संवाद सगळेच चांगले असतात हो पण लक्षात किती आणी कोणकोणते राहतात हे महत्वाचे. 'कितने आदमी थे' लक्षात राहतो पण 'नाही बाप्पु ते गाढवांसमोर गीता म्हणायला माझी काय हरकत न्हाई, पण निदान गाढव जागी आहेत का झोपलीयेत ते तरी बघा ना' हा संवाद राहतो का लक्षात ? ;) आणी फक्त संवाद किंवा संवाद्फेकीमुळे चित्रपट चालत असते तर 'राजकुमारचे' सगळे चित्रपट सुपरहिट व्हायला पहिजे होते ना ? ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

हेरंब 12/03/2009 - 12:33
सामना मधले लागू व निळुभाऊ यांच्यातले सगळेच संवाद लक्षांत रहातील असे होते. विशेषतः ,मास्तर तुम्ही जेवणार नसला तर आम्ही बी जेवणार नाही असे निळुभाऊंनी म्हटल्यावर लागू म्हणतात, आम्ही तुम्हाला आमच्यावर प्रेम करण्याचा हक्क दिलेला नाही. हा आणि असे अनेक खोचक संवाद नीट ऐकले तर आमची मराठी किती सकस आहे याचा प्रत्यय येईल.

In reply to by हेरंब

शिवापा 12/03/2009 - 16:25
निळुभाउ : मास्तर हे काय सोंग? लागु : तो आमचा राजमुकुट आहे. अजुन एक लागु: मालक तुम्ही आमच्या मुस्कुटात मारा. सकाळी या गालात मारली आता या गालात मारा म्हणजे फिटंफाट. अजुन एक लागु चहा पिउन झाल्यावर :- यांनंतर दारू मिळेल असे सांगु नका. पण देणार असाल तर अवश्य घेउ. न मिळाल्यास हिसकावुन घेउ. कारण दारु हे आमचं अन्न आहे. तो आमचा श्वास आहे. सामना, सिंहासन, अर्धसत्य सर्व पटकथा विजय तेंडुलकरांनी लिहल्या होत्या. आपला तेंडुलकरवाला, पॉप्युलरवाला, समांतरवाला वैगेरे शिवापा

सहज 12/03/2009 - 12:44
मराठीत संवाद म्हणले की अजुनही बर्‍याच लोकांना "निळू फुले" आठवतात :-) सलाम!

In reply to by सहज

छोटा डॉन 12/03/2009 - 13:44
>>मराठीत संवाद म्हणले की अजुनही बर्‍याच लोकांना "निळू फुले" आठवतात +++++++++++++१, अगदी शब्दशः सहमत ... असुद्यात, तुम्ही आम्लेट घ्या. गावातल्या अनेक लोकांना अजुन २ वेळचं प्र्ण जेवण मिळत न्हाय, उपाशी झोपतात पोरं. तुम्ही आम्लेट घ्या ... ( अर्थातच "सामना" मधला सीन ... ) काय करणार, जुनी खोड, स्वतःलाही सोडलं नाही. नको त्या वेळेला नको ते प्रश्न विचारणारच : इति मास्तर ( सामना ) --- छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

३_१४ विक्षिप्त अदिती 12/03/2009 - 13:49
"मारुती कांबळेचं काय झालं?" अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

छोटा डॉन 12/03/2009 - 13:56
पुन्हा एकदा सामनाच ... रागावणार नसाल आणि उत्तर देणार असाल तर एक प्रश्न विचारु काय ? " तुमच्या ह्या सुंदर बिनडोकपणाचे रहस्य काय ? " तात्पर्य : सामना, सिंहासन, सरकारनामा, चौकट राजा, निळुभाऊंचे काही चित्रपट अशा कित्येक चित्रपटांचे संवाद आम्हाला तोंडपाठ आहेत. नुसता हुकुम करा समोर जंत्री लाऊन देऊ ... पण वाइट ह्याचे वाटते की अशा चित्रपटांची "संख्या" फार कमी आहे, अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत ... कदाचित हाच तात्यांचा प्रश्न असावा ... "ड्यांबिस म्हणालो मी; ड्यांबिस ..!!! तुम्ही दोघेही सारखेच , डावं-उजवं करणं अवघड आहे." : इति डिकास्टा ( सिंहासन ) ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

३_१४ विक्षिप्त अदिती 12/03/2009 - 14:07
" तुमच्या ह्या सुंदर बिनडोकपणाचे रहस्य काय ? " =)) डानराव, देऊ का जे उत्तर मास्तरांना मिळालं ते?? ;-) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

In reply to by छोटा डॉन

विसोबा खेचर 12/03/2009 - 14:48
पण वाइट ह्याचे वाटते की अशा चित्रपटांची "संख्या" फार कमी आहे, अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत ... कदाचित हाच तात्यांचा प्रश्न असावा ... तू सेड इट! आमचा हाच मुद्दा होता. हिंदी सिनेमांच्या तुलनेत दोन पाच चित्रपटांतले संवाद लक्षात असणे हे प्रमाण अगदीच नगण्य आहे. निळूभाऊंना अर्थातच सलाम..! लक्षात रहावे इतपत संवादफेंकीचे तंत्र मराठीत निळूभाऊंसारख्या एखाद दोघांनाच अवगत आहे. बाकी संवाद लिहिणार्‍या लेखकांच्या बाबतीत आणि ते म्हणणार्‍या अशोक सराफ - लक्ष्या जोडीबद्दल अधिक काही बोलायलाच नको. सगळा आनंदच आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत दुय्यम कामं करण्यातच या दोघांनी धन्यता मानली. नाना, मोहन जोशी हे अर्थातच सन्माननीय अपवाद.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

शिवापा 12/03/2009 - 16:33
आठ्वड्यातुन एकदा शनिवारी लक्श्याच्या चित्रपटातली ऍडिशन "अय्या मज्जा" आणि नंतरचा लेट करंट जोक चालुन जायचा. आता मराठी चॅनल्सवर रोज रोज "अय्या मज्जा" पाहुन लक्श्याबद्दलचा आदर कमी होतो. तसा एक होता विदुषक सोडला तर लक्श्याने फार कमी विविधता दिली होति. अशोक सराफांना हि जाणिव असावि कारण त्यांनि प्रचंड ताकदिच्या भुमीका देखिल थोड्याफार करुन ठेवल्या आहेत.

मदनबाण 12/03/2009 - 14:03
ये आये तु घोरु नकोस मला भ्या वाटतं. इति :-लक्ष्या. (झपाटलेला) मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

प्रभाकर पेठकर 12/03/2009 - 15:04
वाक्य लक्षात राहिली नाहीत तरी श्वास मधे अरुण नलावडे म्हणतो, 'उद्या पोराचं ऑपरेशन झालं की त्याला काही दिसणार नाही म्हणून आज सर्व शहरात फिरवून आणलं. पाहता येईल तेवढं जग दाखवलं' अशा अर्थाचा डायलॉग आहे. तो प्रसंगच डोळ्यात तात्काळ पाणी आणतो आणि मनांत चिरंतन रुजतो. 'दुर्वांची जुडी' मध्ये बाळ कोल्हटकर म्हणतात्,'पृथ्वी वर २/३ पाणी आहे आणि १/३ जमीन. जोपर्यंत पृथ्वीचा पाया पाणी आहे तो पर्यंत मानवी जीवनाचा पाया अश्रूच असणार आहेत.' 'गारंबीचा बापू'त विठोबा (बापूचे वडील) बापूला स्वकमाईतून केलेले 'सल्ले' देतात तेंव्हा सद्गदून बापू म्हणतो,' विठोबा, अरे हे सोन्याचे नाहीत रे, हे तर तुझ्या रक्ताचे 'सल्ले' आहेत, म्हणून इतके चमकताहेत.' 'नटसम्राट' दता भट म्हणतात,' अरे! संभोग तर किडे-मुंग्याही करतात. क्लिबांच्या संभोगाला शृंगार म्हणत नाहीत.' 'बेबंदशाही'त संभाजी राजांना औरंगझेब म्हणतो,' कुत्तेकी मौत मारे जाओगे|' तेंव्हा उसळून संभाजी राजे म्हणतात.'अरे! आबासाहेबांच्या चितेवर त्यांच्या स्वामीनिष्ठ वाघ्याने जी झेप घेतली ती पाहिली असतीस तर असा शाप दिला नसतास. तुला रे काय ठाऊक कुत्तेकी मौत?' ( ह्या घटनेला इतिहास साक्ष नसला तरी नाटकातील वाक्य जोरदार आहे). 'अखेरचा सवाल' मध्ये रक्ताच्या कर्क रोगाने ग्रस्त मुलगी, आपले भवितव्य जाणत असते आणि तिला तिच्या आईची होणारी घुसमट समजत असते. एका प्रसंगी ती आईला म्हणते,'आई, मला ठाऊक आहे माझा मृत्यू अटळ आणि नजीक आहे. किती सहन करशील तू? आज तू माझी मुलगी हो, मी तुझी आई होते. माझ्या खांद्यावर डोके ठेवून मन मोकळं करून रडून घे.' हिन्दी चित्रपटात, राजकुमारचा डायलॉग आहे. 'कुंदनशेठ, जिनके घर शीशेके होते है, वो दुसरोंके घरोंपर पत्थर फेका नही करते.' कुंदनशेठचा बॉडीगार्ड चाकू काढतो तेंव्हा तो आपल्या हाताने बंद करून त्याला परत देत राजकुमार म्हणतो,' ये चाकू है| कोई बच्चोंका खिलौना नही| हाथ कट जाएगा तो खून बहेगा|' 'शोले'त ठाकूर बलदेव सिंग म्हणतो,' जाओ! गब्बरसे कह दो रामगढवासीयोंने कुत्तोंके सामने अनाज फेकना बंद किया है|' 'शोले'तच ए.के. हनगल म्हणतो,' जानते हो इस दुनियामे सबसे ज्यादा बोझ क्या होता है? बुढे कंधोंपर जवान बेटेका जनाजा|' 'दिवार' मध्ये शशी कपुर म्हणतो,'भाऽऽऽई! तुम साईन करते हो के नही?' तेंव्हा अमिताभ म्हणतो,' जाओ! पहले उनसे साईन लेलो जिन्होने मेर हाथ पर ये लिख दिया के, 'मेरा बाप चोर है|' बादमे तुम जहाँ चाहो मै साईन कर दूंगा|' 'शक्ती'मध्ये दिलीप कुमार म्हणतो,'क्या मै पुछ सकता हूं कौन सुन रहा है, बेटा या मुजरिम?' तेंव्हा अमिताभ म्हणतो,'जबतक बाप बात कर रहा है, एक बेटा सुनेगा| जब एक पुलीस अफसर बात करेगा, तो एक मुजरिम सुनेगा| ' अनेक डायलॉग - प्रसंग नाटक - सिनेमातून असतात. सगळेच लिहीत बसलो तर एक स्वतंत्र लेख होईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

नितिन थत्ते 12/03/2009 - 16:36
राजकुमारचा डायलॉग आहे. 'कुंदनशेठ, जिनके घर शीशेके होते है, वो दुसरोंके घरोंपर पत्थर फेका नही करते.' यावरून घेतलेला कादरखानचा एक डायलॉग आहे "जिनके घर शीशेके होते हैं, वो बत्ती बुझाके कपडे बदलते हैं". खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by प्रभाकर पेठकर

आनंदयात्री 13/03/2009 - 15:08
आमचा फेव्हरेट मिथुन अन त्याचा सुप्परहिट पिक्चर "पाप" .. त्यातले त्याचे हिट्ट वाक्यः पाप का बाप हुं मै !! बाकी भुतानी, इराणी चित्रपटातले सुपरहीट संवांदांची वाट पाहीली, ते आल्यावर सहमतीसाठी हा प्रतिसाद ठेवला होता .. पण आता काय येत नाहीत वाटतं .. म्हणुन वापरला. :) - (सी ग्रेड हिंदी चित्रपटांचा चाहता) आंद्या चक्रवर्ती

In reply to by प्रभाकर पेठकर

गणपा 18/03/2009 - 16:57
काल काम आटोपुन जेव्हा गेस्ट हाउसवर पोहोचलो, तेव्हा दारात पाय टाकताच "कितने आदमी थे ?" दचकलोच (सराउंड साउंड + फुल आवाज ) डी व्ही डी वर शोले लागला होता. (आम्ही १० जण एकत्र रहातो आहोत. ५ दक्षिण भारतीय, ४ उत्तर भारतीय, आणि पश्चिम भारताच नेतृत्व करणार मी एकटाच.) मला वाटल की कुणी उभा(उत्तर भारतीय) असेल. पाहिलतर २ दभा. (झटका नं. १) :O हात पाय धुवुन बसलो त्यांच्या जोडीला. गाब्बरचा सीन चालु होता. एकाने हळुच कानात विचारल "य्ये कोण?" ~X( (झटका नं. २) मला वाटल की पात्राच (अमजद च) नाव विचरतोय. मी सांगीतल "अमजद खान". तर म्हणाला"नै. मुव्ही मे क्या नाम है?" (मनात म्हटल लेका पिक्चर पाहतोय की मुकपट. गब्बरच नाव आता पर्यंत असंख्य वेळा येउन गेलेल.) पुढचा प्रश्र फेकुन फेफरच आणल त्याने "य्ये गब्बर व्हिलन है क्या?" @) माझा काल पर्यंतचा "शोले हा मैलाचा दगड" असल्याचा समज ह्या मित्राने पार मातीत मिळवला.. --गणपा

sanjubaba 12/03/2009 - 15:22
राजकुमारचा डायलॉग आहे. 'कुंदनशेठ, जिनके घर शीशेके होते है, वो दुसरोंके घरोंपर पत्थर फेका नही करते.' प्रभाकर साहेब, यामध्ये, शेठ चे नाव कुन्दन नाही तर "चिनॉय शेठ " आहे. असो बाकी नाटकातील बरेचसे निवडक संवाद फार छान.......... संजूबाबा

In reply to by sanjubaba

प्रभाकर पेठकर 12/03/2009 - 15:32
मान्य. शब्द चुकले असतील (नव्हे आहेतच). आता वय झालं एवढं मात्र नक्की. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

In reply to by प्रभाकर पेठकर

धमाल मुलगा 12/03/2009 - 18:17
काका, तुम्हाला बहुतेक आपल्या कुंदनशेठची खरड्/व्यनि/फोन आला असावा किंवा त्याला संपर्क करण्याचा विचार करत असणार तुम्ही! काय बरोबर की नाही? :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

लिखाळ 12/03/2009 - 16:01
छान चर्चा.. आणि छान प्रतिसाद ! गोखलेसाहेबांचा प्रतिसाद वेगळा मुद्दा मांडणारा वाटला. विचार करण्यासारखा. बाकी तात्या आणि डॉन्याशी सहमत आहे. हिंदी संवाद जाहिरातबाजी/प्रभा यांमुळे आपल्यावर जास्त आदळतात आणि मराठी संवाद आपण फारसे म्हणतच नाही हे सुद्धा एक कारण आहेच. वरच्या प्रतिसादांत लिहिलेली अनेक चांगली वाक्ये 'कितने आदमी थे?' सारख्या वाक्यांपुढे मराठी माणसांत काहीच प्रसिद्ध नाहित. मार्मिक सुंदर वाक्ये, स्टायलीत म्हटलेली वाक्ये आणि म्हणणारे लोक विरळाच आहेत. निवडुंग मधले एक वाक्य आठवते. पडखाउ वृत्तीच्या रविंद्र मंकणीला दुसरे पात्र सल्ला देते की 'तू निवडुंगासारखा वाढलास. पण निवडुंगाला काटे असतात हे विसरलास. आता काटे फुलव. तरच तुझी किंमत कळेल.' -- लिखाळ.

यन्ना _रास्कला 12/03/2009 - 17:18
विच्छा माझी पुरी करा चालु परिस्थितीवर फटाफट बनवले जाणारे संवाद, विशेषकरुन राजकारणावर. अगदी घडलय बिघडलयने जसा भुजबळांना चेपला होता तसा या वगाने त्या काळी अनेकांना चेपला. उभा माहाराष्ट्र या वगाला बघताना खदखदुन हसत असे. जाम मजा यायची विजय कदमचे उस्फुर्त संवाद ऐकताना. नक्की वाचा : : http://www.loksatta.com/daily/20031221/rv05.htm _______________________________________________

मुत्सद्दि 12/03/2009 - 19:09
जाउ बाई, नका बाई जाउ! अशीहि बनवाबनवी, चला, आता जवळजवळ झोपायचि वेळ झाली.;) गाढवाच लग्न. मुत्सद्दि.

आपला अभिजित 12/03/2009 - 19:45
चित्रपटांची अवस्था, विषय, कलाकार यांचा विषय निघाला, की नेहमीच त्यांची हिंदी चित्रपटांशी तुलना केली जाते. ती अनेकदा अयोग्य असते. मराठी आणि हिंदी चित्रपट यांत जमीन-अस्मानाचं अंतर आहे. 1. मराठी चित्रपटाचं बजेट आणि त्यातून मिळणारं उत्पन्न, हे प्रमाण हिंदीच्या तुलनेत अगदीच व्यस्त आहे. मराठी चित्रपट सरासरी (डोक्‍यावरून पाणी म्हणजे) 50 लाख रुपयांत तयार होतात. तो अगदी उत्तमरीत्या चार-पाच आठवडे सगळीकडे चालला, उत्तम व्यावसायिक रीतीने निर्मात्यानं सगळी गणितं हाताळली, तरी त्याच्या हाती जास्तीत जास्त वीस लाख रुपये फायदा मिळू शकतो. ही सुद्धा अत्युच्च कोटीतील गोष्ट आहे. सर्वसामान्य निर्मात्यांच्या बाबतीतली ही गोष्ट आहे. झी टॉकीज किंवा अन्य बड्या निर्मात्यांच्या अपवादात्मक चित्रपट व्यवसायाबद्दलची स्थिती वेगळी असते. 2. मराठी आणि हिंदी चित्रपटांचे विषयही अगदीच वेगळे असतात. बॉलिवूडमध्ये पहिल्यापासूनच अतिरंजित, अवास्तव, भडक आणि कल्पनाविश्‍वात रमविणारे व्यावसायिक चित्रपटच प्रचंड यशस्वी ठरत आले आहेत. हृषिकेश मुखर्जी, बासू चटर्जी, बासू भट्टाचार्य, जे. ओमप्रकाश आणि आताच्या काळात अझीज मिर्झा वगैरैंसारख्या दिग्दर्शकांचे चित्रपटच वास्तवाच्या जवळ जाणारे आणि सर्वसामान्य लोकांच्या आयुष्याशी संबंधित, साधेसुधे असायचे. त्यामुळे अशा काल्पनिक जगातल्या चित्रपटांतील व्यक्तिरेखाही तेवढ्याच काल्पनिक असणार! असायच्याही. आपल्या मनावर वर्षानुवर्षं अशाच व्यक्तिरेखांचं, त्या साकारणाऱ्या कलाकारांचं गारूड आहे आणि त्यांचे संवाद जास्तीत जास्त प्रभावी वाटत आले आहेत. आठवा ः दीवार, शोले, जंजीर, अमर-अकबर-अँथनी, शक्ती, शराबी, कालिचरण, जॉंबाज, कुर्बानी, इत्यादी इत्यादी. 3. मराठी नायकदेखील वर्षानुवर्षं अगदी आपल्यातले, फारसे ग्लॅमर नसलेले असत आणि तसेच स्वीकारले जात, जातात. मराठी माणसाचं मर्यादित विश्‍वदेखील त्याला कारणीभूत आहे. हिंदी चित्रपटांत देखील कुठल्या हिरॉइनच्या बापाचं आडनाव जोशी-कुलकर्णी-देशपांडे-भांडारकर-नेने वगैरे असलेलं आठवतंय? बडा उद्योगपती असलेला, क्रूझवर नायिकेला लग्नाची मागणी घालणारा, दहशतवाद्यांना एका दमात लोळवणारा, युरोपात सिक्रेट एजंट वगैरे असलेला नायक (कितीही अत्याधुनिक पोशाखात वावरत असला, तरी) मराठी चित्रपटात झेपेल आपल्याला? जशा या व्यक्तिरेखा अगदी आपल्याला रोज भेटणाऱ्या, सर्वसामान्य आणि आपल्यातल्याच वाटायला हव्यात, तसेच त्यांचे संवादही. म्हणूनच "कुत्र्या, नायालकांतल्या नालायका, तुझं रक्त पिऊन टाकीन मी!' असले संवाद कधी आपल्याला मराठीत ऐकायला मिळाले नाहीत. 4. मराठी चित्रपटांचं बजेट हेदेखील व्यक्तिरेखांच्या वैविध्यांना मारकच. वैचित्र्यपूर्ण, वेगळ्या वातावरणातली व्यक्तिरेखा दाखवायची, तर तशी कथा हवी. ती पटणारी हवी. मराठी प्रेक्षकांना झेपणारी हवी. अगदी साधं उदारहण घ्या! "क्रिश' किंवा "मिस्टर इंडिया'सारखे सुपरहिरो चालतील मराठीत? "जबरदस्त'नं तसा एक प्रयत्न केला. पण तो झेपला नाही फारसा मराठी प्रेक्षकांना. मराठी प्रेक्षकांना आपल्यासारखाच वाटणारा, पण थोडासा ऍडव्हान्सड्‌ किंवा काहीतरी वेगळं वैशिष्ट्य असलेला हिरो हवा असतो. मुळात मराठीत "हिरो'बद्दल फारसं वलयच नाही. त्यामुळंच मराठी हिरो वर्षानुवर्षं बावळट, साधासुधा, धसमुसळा, वेंधळा, असाच राहिला आहे. आत्ता देखील भरत जाधव, मकरंद अनासपुरे, संजय नार्वेकर, मंगेश देसाई असेच "हिरो' साकारतात की! मराठीत खऱ्या अर्थानं डॅशिंग हिरो होता, अजिंक्‍य देव. पण त्याला फार यश मिळालं नाही. सध्याच्या काळात अंकुश चौधरी बऱ्यापैकी तशाच प्रकारचा हिरो साकारतो. 5. हिरोच असा साधासुधा असल्यानं दुसरा हिरो, खलनायक, नायिका, अन्य प्रमुख व्यक्तिरेखा अशा वेगळ्या वातावरणातल्या असण्याचा प्रश्‍नच उद्‌भवला नाही, उद्‌भवत नाही! संवादही अगदी आपल्यातलेच, नेहमीच्या बोलण्यातलेच असण्याचं मुख्य कारण तेही असेल. 6. मराठी चित्रपटांत आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, विजय तेंडूलकर, ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, गो. नी. दांडेकर, विश्राम बेडेकर यांच्यासारखे लेखक कथा-पटकथा-संवाद लिहायचे. त्यानंतर रत्नाकर मतकरी, वसंत सबनीस, अशा मातब्बर लेखकांचेही चित्रपट आले. आता स्वतःचं वेगळं साहित्यकर्तृत्व नसलेले लोक चित्रपट लिहीत आहेत. त्यातून मध्यंतरी लावणीपटांची, त्यानंतर विनोदपटांची, त्यानंतर रडूबाईपटांची आणि आता पुन्हा विनोदपटांची लाटच मराठी चित्रपटसृष्टीत आली. त्यात कथा-पटकथा-संवाद सारंच वाहून गेलं. नव्या काळात आता काही जणांकडून आशा ठेवण्यासारखी परिस्थिती आहे. बघूया! अतिसविस्तर आणि अतिप्रदीर्घ प्रतिक्रियेबद्दल क्षमस्व!

In reply to by आपला अभिजित

प्राजु 12/03/2009 - 23:19
मराठी चित्रपट सृष्टीचं वलय कसं असतं हे सांगितलं आहे अभिजीतने. प्रतिसाद आवडला. आणि पटलाही. १००% सहमत आहे. बाकी, म्हणूनच "कुत्र्या, नायालकांतल्या नालायका, तुझं रक्त पिऊन टाकीन मी!' असले संवाद कधी आपल्याला मराठीत ऐकायला मिळाले नाहीत. याने खूपच करमणूक झाली. =)) =)) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

मैत्र 13/03/2009 - 10:35
उत्तम प्रतिसाद अभिजित. थोडक्यात मराठी चित्रपटाची विचार धारणाच सांगितलीत. एका वाक्यात म्हणावं तर मराठी चित्रपट सहसा तुमच्या आमच्या जवळचे असतात. 'लार्जर दॅन लाइफ' बनत नाहीत, कदाचित रुचत नाहीत. त्यामुळे त्याबरोबर येणारे धडाकेबाज संवादही नाहीत. दुसरा एक मुद्दा म्हणजे राष्ट्रभाषेला एक परिणामकारक टोन, बाज आणि लहेजा आहे जो लक्षात राहतो. (पथनाट्य करताना हे जाणवतं काही वेळा). आणि कदाचित पुन्हा पुन्हा बघत नाही आपण. शोले हा मापदंड आहे. त्यामुळे त्याची तुलनाच होऊ शकत नाही. अर्धा अधिक चित्रपट त्या संवादांवर आहे. (हमारी जेल में सुरंग, आधे लोग उधर जाओ, हम अंग्रेजों के जमाने के जेलर है, ये हाथ मुझे दे दे ठाकूर, लग गया निशाना, तेरा नाम क्या है बसंती, वैसे बोलने की आदत तो है नही, मैने आपका नमक खाया है सरदार, जो डर गया समझो मर गया). मराठीत संवादाच्या भारदस्त पणा पेक्षा एकूण प्रसंगानुरुप रचना जास्त असते. कदाचित तेंडुलकरांनंतर कोणी तसं लिहिलं नसेल....

In reply to by मैत्र

धमाल मुलगा 13/03/2009 - 12:12
अभिजीत, छान गोशवारा सांगितला. मैत्र,
दुसरा एक मुद्दा म्हणजे राष्ट्रभाषेला एक परिणामकारक टोन, बाज आणि लहेजा आहे जो लक्षात राहतो. (पथनाट्य करताना हे जाणवतं काही वेळा).
हे थोडं उकलुन सांगशील काय्? मला नीटसं लक्षात येत नाहीय्ये की तू कोणत्या दृष्टीने हे वाक्य वापरलंस. ह्या संदर्भात माझ्यापुढे निळूभाऊ, डॉ.लागु, नाना पाटेकर, प्रशांत दामले (शहरी बाज.) ह्यांची उदाहरणं नजरेपुढे आली. कृपया, गोंधळ दूर करशील काय? ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

In reply to by धमाल मुलगा

मैत्र 13/03/2009 - 14:23
संवादाचा भारदस्त पणा आणि परिणामकारकता हिंदी मध्ये जरा काकणभर जास्त आहे असं वाटतं.. त्यामुळे ते शब्द, डिक्शन ( मराठी ?) लक्षात राहतं...

In reply to by मैत्र

अमोल नागपूरकर 13/03/2009 - 15:05
मी एकदा मराठी वर्तमान्पत्रान्तील पत्रकारान्चा मोर्चा पाहिला होता. आता ते तर सगळे मराठी . त्यान्ची मीठ भाकर मराठीवर अवलम्बून. पण त्यान्च्या घोषणा मात्र ," लेके रहेंगे, नही चलेगी, झिन्दाबाद, मुर्दाबाद" अशा. मी एकाला त्याविषयी विचारल्यावर तो म्हणाला की मराठी घोषणान्मध्ये काही punch (हा त्याचाच शब्द) नाही.

कालिन्दि मुधोळ्कर 13/03/2009 - 10:58
भरपूर आहेत मराठी चित्रपट संवाद लक्षात राहण्यासारखे. वर अनेकांनी नमूद केल्यानुसार मराठी संवादांचा बाज वेगळा आहे-- शाब्दिक कोट्या, प्रासंगिक, तिरकस विनोद ई.ई. त्यांची हिंदीशी तुलना करणे काय आणि उझबेक्/जपानी चित्रपट संवादांशि तुलना करणे काय सारखेच होईल! (मला व्यक्तीशः हिंदीपेक्षा मराठी सिनेमे आवडतात कारण त्यातले अफाट संवाद!) काही उदाहरणे: "सामना": निळू फुले म्हणतात" अरे मास्तरांना दूध भातात साखर घालून दे" "कायद्याचं बोला": "तुला माणूस म्हणावं तर अक्क्ल नाही आणि गाढव म्हणावं तर शेपूट नाही". "दे दणादण": महेशः "लक्ष्या, ही आवडी--गुराप्पांची मुलगी." लक्ष्या: "गुराप्पांच्या गोठ्यात्ली आहे होय?!" पछाड्लेला: जखमी भरत जाधवः सौंदर्याचा आटमबोंब फुट्ला डोळ्यावर (सौंदर्याच्या वडिलांनी मारल्यानंतर)

सालोमालो 13/03/2009 - 11:13
धुमधडाका मधली लक्ष्याच्या तोंडची वाक्ये: १. भूत आया भागो भागो , हेच ते भूत! २. पापा, टा़ळी वाजवा ना! ३. अहो पपा, मी हीच्यावर बलात्कार करत होतो. तुम्ही मधेच येउन तो कट केलात. ४. कॅमेरामन डोळस, डोळस, ए डोळस! अजून खूप वाक्य आहेत. जय महाराष्ट्र! सालो

उपटसुंभ 13/03/2009 - 12:43
"वजीर" मधील एक जबरदस्त वाक्य - कुलदीप पवार विक्रम गोखलेना म्हणतात - आता तुम्ही चौकटीत बंदीस्त असलेले राजे नाही, तर पटाच्या चारही कोपर्‍यात धुमाकूळ घालणारे वजीर आहात वजीर.. "सरकारनामा"मध्ये यशवंत दत्त प्रभावळकरांना म्हणतात - अण्णा, मेजवानीला बोलवायला आलोय. बोकड कापायचाय बोकड.. याच प्रसंगात पुढे यशवंत दत्त म्हणतात - अण्णा, तुमच्या कालच्या खेळीनं आमचा केसबी वाकडा झालेला नाही. आणि तुमच्या त्या *****ला धाडून दिलाय नरकाच्या वाटंला. त्यावर प्रभावळकर - असू दे. पहिला डाव भूताचा म्हणून सोडून देऊ आम्ही. बाकी कोकणात गेल्यावर तो फुरसं चावून मरणारच होता. माझं पाप तुम्ही तुमच्या डोक्यावर घेतलंत याबद्दल तुमचा आभारी आहे सी.एम. यशवंत दत्त -- अण्णा, तुला हिथं गाडीन. प्रभावळकर -- गाडा. तुमचा पाहुणा म्हणून आलोय. तुमच्या पाहूणचाराची ही पद्धत असेल तर खुशाल गाडा. बाहेर पत्रकार वाट बघतायत.

देवदत्त 14/03/2009 - 14:53
दोन दिवस मिपा वर वाचनमात्रच येत होतो, आता प्रतिक्रिया लिहिण्यास वेळ मिळाला. तात्या, मी तो धागा सूरू केला तेव्हाच विचार होता की कोणत्याही चित्रपटांतील वाक्ये लिहावीत. म्हणून मी ही लेखाच्या नावात हिंदी टाकले नव्हते. पण लिहिता लिहिता लक्षात आले की मी ही मराठी पेक्षा हिंदी सिनेमाच जास्त (आणि जास्त वेळा) पाहिले आहेत. त्यामुळे माझ्या लेखातही हिंदी सिनेमांचीच वाक्ये जास्त आहेत. आणि त्यातल्या त्यात त्याच ओघात त्या लेखाच्या दुसर्‍या भागाच्या शेवटी 'आपण हिंदी सिनेमा पाहतोच ' असेच वाक्य आहे ;) आता हेच सर्वसाधारणपणे दिसत असेल कारण हिंदी सिनेमांची छाप जास्त पडली आहे. तरी त्यामुळे मराठी सिनेमांतील संवाद दळिद्री आहेत असे नाही म्हणता येणार. वर अभिजीत आणि चंद्रशेखर गोखले ह्यांनी लिहिलंय त्याच्याशी मी सहमत आहे. त्यांनी लिहिल्याप्रमाणे हिंदी आणि मराठी सिनेमांच्या सादरीकरणात खूप फरक होताच. हिंदी सिनेमातील कथा/संवाद हे आधीच थोडेसे उदात्तीकरण केलेले असते. मराठी सिनेमांचे तसे नव्हते. तसा आता त्यांत फरक पडत चालला आहेच. फक्त 'संवादांचा प्रश्न तितकासा महत्वाचा नाही' ह्या मताशी मी असहमत आहे. जर संवादाला महत्व नसते तर 'आलम आरा' बनलाच नसता :) आणि मध्ये आलेला कमल हासनचा 'पुष्पक' हाच बाजी मारून गेला असता. ह्म्म, तेवढ्या एका कारणाने मग आपण कोणत्याही देशात बनलेला सिनेमा पाहू शकत होतो. :) असो, बाकी मराठी सिनेमांतील म्हणायचे तर,
सरकारनामा मधील
१. ह्याचा सत्कार करा. २. तुमचे सावरता सावरता आमचे निसटायची वेळ आली आहे. (शब्द वेगळे असू शकतात) ३. अण्णा, तुला हिथं गाडीन ४. बोकड कापायचंय, बोकड.
ही यशवंत दत्त ह्यांची वाक्ये त्यांच्या संवाद शैलीमुळे नेहमी लक्षात राहतील.
तसेच झपाटलेला मधील 'तात्या विंचू म्हणत्यात मला' हेही एक वाक्य आहे.

दिपोटी 15/03/2009 - 12:59
चित्रपट : सिंहासन प्रसंग : एका गझलनवाजाची मैफिल ... नुकतीच सुरु झाली आहे व चांगलीच रंगात सुध्दा आली आहे ... राज्याचे मुख्यमंत्री (अरुण सरनाईक) या नुकत्याच सुरु झालेल्या मैफिलीत त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या पहिल्या रांगेतील खुर्चीत येऊन बसतात. दोन-चार मिनिटे एखाद्या दर्दी श्रोत्याप्रमाणे अगदी मान डोलावून व तल्लीन होऊन 'क्या बात है' अशी दाद दिल्यावर मग थोड्या वेळाने ... मुख्यमंत्री (शेजारील सरकारी अधिकार्‍यास) : हे कोण ... गुलाम अली वाटतं ? अधिकारी : नाही नाही, हे मेहदी हसन. मुख्यमंत्री (अंमळ बेफिकीरपणे) : हां हां, म्हणजे तेच ते. मुरलेल्या व मुरब्बी अशा राजकारण्यांचा हा भंपकपणा / संभावितपणा फक्त दोन-तीन वाक्यांत नेमका व अचूक दर्शवणे हे फक्त तेंडुलकरच करु जाणोत. - दिपोटी

In reply to by दिपोटी

परिकथेतील राजकुमार 17/03/2009 - 13:35
माझ्या मते तो प्रसंग अरुण सरनाईक यांचा नसुन , श्रीराम लागु हसन नावाच्या पक्ष सोबत्याच्या घरी विरोधकांची मिटिंग घेतात तेंव्हा जेवण चालु असतानाच आहे ! गंमत म्हणजे ह्या मुस्लिम सहकार्‍याची बायको प्रत्यक्षात दाखवली नाहिये, ह्याच्या घरातुन निघताना डॉ. लागु तीचा निरोप घ्यायला जातात तेंव्हा ती फक्त दाराच्या आतुन बोलताना दाखवली आहे, आणी तो आवाज रीमा लागु ह्यांचा आहे हे लगेच लक्षात येते. प्रसाद मुजावर ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

दिपोटी 18/03/2009 - 04:26
परा, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! मात्र मी वर्णिलेला प्रसंग हा माझ्या मते कोणाच्या घरी घडलेला दाखवला नसून प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या एका प्रेक्षागृहात घडलेला दर्शवला आहे. अरुण सरनाईकांच्या तोंडचा हा संवाद इतक्या वर्षांनंतर आजही माझ्या चांगल्याच आठवणीत आहे. - दिपोटी

नितिन थत्ते 15/03/2009 - 12:37
आपल्या एका मिपाकराची पंचलाईन हा श्यामची आई या चित्रपटातला संवादच आहे. "पायाला घाण लागू नये म्हणून ......." खराटा (रंग माझा वेगळा)

अनिल हटेला 16/03/2009 - 09:46
१) बाबा लगीन !!!!~~~~~~~!!!!! धींगच्याक ढीच्यांग ढींगच्याक ढीच्यांग !!!!! नवरा आला वेशी पाशी !!!!! =)) २) दुर्गे सूड !!!!! ~~~~~~~!!!!! ;-) ३) मालक बरोबर ना मालक @@@!!! ३)डोळे बघ डोळे बघ !!!! ;-) इती- पछाडलेला !!!! ४) कित्ती बोलतात रे ह्या बायका !!! ;-) इती - अग बाई अरेच्या !! ५)ये झेमण्या !! ;-) इती - गोलमाल (मराठी) ६)बोला कधीपासुन येताये पापड लाटायला ,सकाळी एक चहा ,दोन टाइम वडापाव आणी दिवसाला २० रुपये !! ;-) इती -जत्रा !!! ७) ओ ~~ ओ !! =)) इती -जत्रा!! ८) आरे ये मास्तुरड्या !! :-) इती - पिंजरा !!! अजुनही बरेच संवाद आहेत ,पण टंकायचा जाम कंटाळा आलाये ......;-) (केदार शिंदेचा पंखा) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

उपटसुंभ 16/03/2009 - 10:09
"ऑफिसर, थोडा वेळ खिडकीत बसलो तर चालेल ? अख्खं आयुष्य गेलं या चौथ्या सीटवर..!" "ज्या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत त्या प्रश्नांवरच फुली मारायची..!"

केदार_जपान 17/03/2009 - 07:57
माझ्या मते, मराठी सिनेमा मधे खूपशे लक्षात राहण्यासारखे संवाद नाहीत पण त्याची कसर मराठी नाटकानी पुरेपुर भरुन काढली आहे असे वाटते....आणि मराठी रंगभुमी ही अजुनही आपल्या देशात एक नंबर आहे असे मला तरी वाटते... :) मला काही लक्षात राहिलेले मराठी नाटकांतले संवाद, १. अरे हाय काय आणि नाय काय ---- प्रशांत दामले..गेला माधव कुणिकडे २. मीच तो...मीच तो ----- यदा कदाचित मधली पात्रांची यंट्री.. ३. अरे दारु म्हण्जे काय रे भाउ?? ------ वार्‍यावरची वरात... (पुल खरच महान :).. हा प्रसंग मी जेव्हाही पहतो तेव्हा गडाबडा लोळल्याशिवाय रहात नाही ) अजुनही ऍड करावे किन्वा वेगळा धागा सुरु करा ;) ------------------------ केदार जोशी

फ्रॅक्चर बंड्या 17/03/2009 - 11:10
यदा कदाचित मधला एक प्रसंग : कोणीतरी म्हणते : देवा मला पाव भिम : हे घे बारा पाव

मी असाकसा वेगळ… 17/03/2009 - 12:10
द्रौपदिचा भाऊ : येथे जमलेल्या माझ्या मेव्हण्यांनो.... कोणीतरि : अरे तुम्ही द्रौपदिचा सामुदायिक विवाह मांडला काय?

In reply to by मी असाकसा वेगळ…

केदार_जपान 17/03/2009 - 13:04
यदा-कदाचित मधला अजुन एक.. भीम : मी दुर्योध्नाच्या तंगड्या तोडु... (अश्याच अर्थाचे एक वाक्य) धर्मराज - नाय्-नो-नेव्हर ते एवढे लोकाना पाठ होते, कि शेवटी धर्म्राज नुसते हात्-वारे करतो...आणि पिटातले लोकच म्हणतात हे वाक्य....भन्नाट्च एकदम :)

भिडू 17/03/2009 - 13:09
वारयावरची वरात मधला.... श्रीकांत मोघे:-हा आहे रिदम... पु.ल.-अहो तुम्हि मगाशी याचे नाव कदम म्हणालात.... श्रीकांत मोघे:- जो वाजवतो तो कदम.... जे वाजवतो तो रिदम..... अजुन एक "दारु म्हणजे काय रे भाउ"

सूहास (verified= न पडताळणी केलेला) 17/03/2009 - 19:19
मला वरिल सर्वेच्या सर्व आवडतात्..पण "वजीर" मधल "लख्तर करीन लख्तर " हे खास आवडत सुहास.. "व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे," "वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "

विशाल कुलकर्णी 25/03/2009 - 14:14
सरकारनामा : सत्कार करा रे यांचा वजीर : लक्तरं करीन लक्तरं सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)