मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खाजवा डोकं : अक्षरांच्या पलीकडे

हेमंतकुमार · · काथ्याकूट
शब्दखेळ हे भाषिक मनोरंजनाचे एक महत्त्वाचे व रंजक अंग. गेल्या काही वर्षात इथे विविध प्रकारचे शब्दखेळ सादर झालेत. मागचा महिना खऱ्या अर्थाने गाजला तो वर्डल या शब्दखेळाने. त्याच्या जोडीला त्याची इतर प्रारूपे (Ab, Dor, शब्दक) देखील सादर झाली. आपल्यातील अनेक जण त्याचे व्यसनी झालेत. अर्थात तो खेळ आता अंगवळणी पडल्याने त्यातले नाविन्य संपले आहे. एक नित्यकर्म म्हणून दिवसाकाठी आपण एखादा शब्द आवडीने सोडवत राहू. पण आता असे वाटले की, निव्वळ अक्षरपालट व शब्दशोध याच्या पलीकडे जाऊन एक नवा खेळ, जो बुद्धीला वेगळी चालना देईल, असा शोधावा. या खेळाचे स्वरूप असे आहे : प्रश्नकर्ता एखादा प्रसंग किंवा घटना थोडक्यात येथे लिहिल. मग त्याच्यावर आधारित एक दोन प्रश्न विचारेल. सहभागींनी नीट विचार करून त्याचे उत्तर लिहावे. विचारला गेलेला प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचा किंवा एकाच शब्दात उत्तर असलेला (हो/नाही) नसावा.अपेक्षित उत्तर आल्यावर प्रश्नकर्ता तसे जाहीर करेल. त्यानंतरच दुसर्‍या कोणीही दुसऱ्या दिवशी नवा खेळ किंवा कोडे द्यावे. खेळाच्या स्वरूपासंबंधी काही सूचना करतो. सर्वांनी विचार करून मत द्यावे. १. दिवसाला एकच प्रश्न /खेळ ही मर्यादा पाळूच पाळूया. म्हणजे लवकर कंटाळा येत नाही. २. रोजचा दिवस भारतीय वेळेनुसार 00.01 वाजता सुरू होईल. त्यानंतर जो प्रथम प्रश्न देईल तो त्या दिवसाचा (चोवीस तासांचा) खेळ लागू होईल. ३.एखाद्या खेळाचे उत्तर लवकर दिले गेले तरी नंतर येणाऱ्या लोकांना तो दिवसभर त्यावर चर्चा, सूचना, सुधारणा करता येतील. ४. 20 तासात कोणीच उत्तर दिले नाही तर प्रश्नकर्त्याने उत्तर सांगून त्याच दिवशी खेळ संपल्याचे जाहीर करावे. ५. लागोपाठच्या दोन दिवसांमध्ये प्रश्नांचे विषय पूर्ण वेगळे असावेत. (गणित, भाषा, भूगोल, सामान्यज्ञान, रहस्य, इत्यादी). …… सूचनांचे स्वागत. उद्यापासून प्रत्यक्ष खेळ सुरू करता येईल

वाचने 33323 वाचनखूण प्रतिक्रिया 134

In reply to by Bhakti

हेमंतकुमार 15/02/2022 - 20:29
धन्यवाद, बुवा आणि भक्ती. प्रश्नामध्ये जे वर्णन असेल ते सर्व मराठीत करायचे. इंग्लिश भाषेवर आधारित खेळ द्यायला काहीच हरकत नाही. सर्व संवाद मात्र मराठीतून असावा.

हेमंतकुमार 16/02/2022 - 04:23
खेळ क्रमांक १ सुनील व संजय जानेवारी महिन्यात उसाच्या रसवंतीगृहामध्ये रस प्यायला बरोबर जातात. थोड्याच वेळात दोघांच्याही पुढे रसाचे पेले ठेवले जातात. या दोन्ही पेल्यांमध्ये गुंगीचे औषध समप्रमाणात घातलेले असते. सुनील चेंगट प्राणी असून तो हळूहळू एक एक घोट पितो, तर संजय हा अधाशासारखा पहिल्या पेल्यामधील रस भरकन पिऊन संपवतो. त्याला अजून खूप प्यायची इच्छा असल्याने तो पुन्हा एक पेलाभर रस मागवतो. तरीसुद्धा सुनीलचा पहिलाच पेला अजूनही पिऊन संपलेला नाही. अखेर सुनीलचा पहिलाच पेला पिऊन संपेपर्यंत संजयचे एकूण चार प्याले रस गटागट पिऊन संपतात. आता ते दोघे उठणार एवढ्यात सुनीलला प्रचंड गुंगी येऊन तो जवळपास खालीच पडतो. तर संजय मात्र अगदी व्यवस्थित भानावर असतो. या दोघांपैकी फक्त सुनीललाच प्रचंड गुंगी का आली ते स्पष्ट करा. … टीप : दिलेल्या माहितीच्या आधारेच उत्तर द्यावे. न दिलेल्या काही गोष्टी गृहीत धरलेल्या असतात. अधिक माहिती विचारू नये. गरज वाटल्यास उत्तरांच्या एकाहून अधिक शक्यताही लिहायला हरकत नाही. चला तर, खाजवा डोकं आणि द्या उत्तर ! ……..

In reply to by हेमंतकुमार

साहना 16/02/2022 - 11:05
गुंगीचे औषध फक्त पहिल्या ग्लास मध्ये होते असे जर गृहीत धरले तर इतर ३ ग्लास पिल्याने शरीरातील त्याचे प्रमाण डायल्युट झाले असेल. त्याशिवाय शर्करा भरपूर असल्याने औषध मेटॅबोलाईझ सुद्धा लवकर झाले असेल. संजय ह्या दरम्यान विश्रांतीकक्षांत गेला कि नाही ठाऊक नाही पण गेला असेल तर मग औषध शरीरातून बाहेर सुद्धा गेले असेल.

Bhakti 16/02/2022 - 11:00
गुंगीचे औषध तळाशी गेले असेल काय? सुनील दरवेळी पेला मिक्स करून सावकाश पित असल्याने त्याला ती मात्रा लागू झाली.संजलला नाही. (माफ करा, मी अगदीच बाळबोध उत्तर दिले​आहे ;))

हेमंतकुमार 16/02/2022 - 11:05
**गुंगीचे औषध तळाशी गेले असेल काय? >>>छान प्रयत्न. दिशा योग्य आहे अजून थोडा विचार केला तर उत्तर येईल

गुंगीचे औषध हे रसात न विरघळणारे व ग्लासच्या तळाला जाउन बसणारे असावे. त्यांनी जानेवारी महिन्यात रस प्यायला सुरुवात केली होती आणि आता सुनिलचा पहिला पेला संपला आहे. जरी आपण ३१ जानेवारीला सुरुवात केली होती असे गृहित धरले तर सुनिल ला रसाचा एक पेला संपवायला १६ दिवस लागले. संजयचा पहिला पेला सधारण १ ते ४ फेब्रूवारी दरम्यान कधीतरी संपला असेल त्याच वेळी त्याच्यावर गुंगीच्या औषधाचा परीणाम होउन तो बेशुध्द पडला असेल व शुध्दीवर आल्यावर त्याने उरलेले तीन पेले संपवले. ज्यात गुंगीचे औषध नव्हते. सुनिल आता पेल्याच्या तळाशी पोचला व त्याच्या पोटात गुंगीचे औषध आता गेले म्हणून तो उठताना चक्कर येउन पडला पण संजय मात्र आता व्यवस्थित होता. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

हेमंतकुमार 16/02/2022 - 11:34
कल्पनेची भरारी आवडली अर्थात अपेक्षित उत्तर नाही पण बघूया अजून काय काय शक्यता येताहेत :)

टर्मीनेटर 16/02/2022 - 12:37
रसवंतीगृहात त्यावेळी मिथुन शेठचे 'बाहो मे बोतलं' हे गाणे वाजत असणार. त्यातली "हो... एक घुंटसे क्या होगा.... हैं प्यास समंदर पिनेकी..." ही ओळ ऐकून उत्तेजित झालेल्या संजयने, पायाने ठेका धरत गटागट चार ग्लास 'बिना बरफ' रस ठोकला असणार. बर्फ घातलेला नसल्याने त्याला ग्लास सतत हलवावा लागला नाही आणि बॉटम अप करत रस प्यायल्याने रसात व्यवस्थित मिक्स न झालेले गुंगीचे औषधं तळाशी राहून गेले. (चहा असो कि रस, थोडा ग्लासात सोडण्याची वाईट खोड अनेकांना असते 😀) सुनिल मात्र ढिम्म बसून, हेडफोन लावून पंकज उधासचे "मजा लेना हैं पिने का तो.... कम कम, धीरे धीरे पी" हे गाणे ऐकत जानेवारी महिन्यातल्या थंडी वगैरेचा विचार न करता बर्फ घातलेला रस, ग्लास हलवून हलवून पीत बसल्याने त्याच्यावर औषधाचा परिणाम झाला असणार. शेवटी एक ग्लास पिऊन लुढकायला तो सुनील थोडीच आहे? चार ग्लास ठोकूनही व्यवस्थित राहणारा माझा नावबंधू संजय आहे तो

😎

बाकी गुंगी येऊन खाली पडणाऱ्या सुनिलला पाहून त्याच गाण्यातली "होश उडादे हमारे अभी तक पैदा ना ऐसा हुवा...." ही ओळ संजयने मोठ्यानी म्हटली असणार ह्यात शंका नाही 🤣 🤣 🤣 उत्तर बरोबर असो कि चूक, खालच्या गाण्याची मजा जरूर घ्यावी!

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 16/02/2022 - 12:56
उत्तर बरोबर असून अपेक्षित उत्तरा प्रमाणेच आहे. पहिल्यांदा जेव्हा दोन्ही पेले भरून रस दिला गेला त्यावेळेस दोघांच्याही पेल्यांत बर्फ होता आणि गुंगीचे औषध बर्फामध्ये घातलेले होते. जानेवारी महिन्यात बर्फ अर्थातच हळू वितळतो. प्रत्येक सहभागीने वेगवेगळ्या शक्यता लिहिल्या. त्याने मजा आली. :)))

In reply to by हेमंतकुमार

टर्मीनेटर 16/02/2022 - 17:03
शाळकरी वयात व्हिडीओ कॅसेट लायब्ररीतून ह्या चित्रपटाची कॅसेट आणून पहिला होता हा चित्रपट! किशोर कुमार आणि आशाताईंच्या आवाजातले हे गाणे भप्पी लहिरी ह्यांनी सांगितबद्ध केले होते. उत्तराच्या जवळपास पोचल्याचे समाधान लाभले. माझे आवडते संगीतकार भप्पी लहिरी ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

In reply to by टर्मीनेटर

आनन्दा 16/02/2022 - 19:20
चार ग्लास ठोकूनही व्यवस्थित राहणारा माझा नावबंधू संजय आहे तो >> हे वाक्य वाचलं आणि परत वर जाऊन प्रतिसाद कर्त्याच नाव बघितलं. जीव भांड्यात पडल्याचा मोठा आवाज ऐकू आला असेलच

In reply to by Nitin Palkar

हेमंतकुमार 16/02/2022 - 20:27
ठरल्याप्रमाणे उद्या दिवसाला एकच पुरे. उद्याचे कोण देणार बोला. आधी सांगून ठेवले तर मग मी नाही देणार त्यासाठी सर्वांचे स्वागत आहे !

Bhakti 17/02/2022 - 00:02
एक उत्तर पूर्व भागातील निलयला दैवयोगाने बछडा पाळण्याची संधी मिळते.निलयला त्याच्या घरच्या मंडळींना त्याचा लळा लागतो.त्याच नाव ते उमंग ठेवतात. परंतू उमंग जसा जसा मोठा ,युवा व्हायला लागतो त्यांचं कोंबड्या पळवणे,धुसमुसळापणा सुरू होतो.त्यामुळे भीती व आजूबाजूच्या दबावामुळे उमंगला प्राणी संग्रहालयात सोडण्याचं ठरवतो.मोठ्या दु:खाने त्याला तिथे सोडून निलय घरी येतो. दरवर्षी निलय उमंगला भेटायला जात असतो. तीन वर्षे तो जातो नंतर मात्र खंड पडतो. दोन वर्षांनी निलयला पुन्हा प्राणी संग्रहालयात जायची संधी मिळते. तो उमंगच्या पिंजर्‍याजवळ उभा राहतो.तर उमंग खुप कृश दिसतो.पण नेहमी प्रमाणे निलय पिंजऱ्यात हात देऊन उमंगला माया करतो,त्याच्याशी गप्पा मारतो.वाघही नीट वागतो.दूरुन एक चौकीदार येतो .तो हे दृश्य पाहून आश्चर्यचकीत होतो. निलय त्यावर रागावतो "तुम्ही उमंगला खायला देत नाही का?"असा खडा प्रश्न करतो.परंतू चौकीदाराने दिलेल्या उत्तराने निलय पुरता हादरून जातो. प्रश्न असा की ते उत्तर काय असेल?

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 17/02/2022 - 13:51
ह्यावेळी पहिलेच उत्तर बरोबर आल्याने डोकं खाजवायची संधीच मिळाली नाही 😔 उमंग बद्दल वाचून आम्हाला शाळेत असलेला पाळीव सिंहिणी बद्दलचा 'सोनाली' हा धडा आठवला.

In reply to by हेमंतकुमार

टर्मीनेटर 17/02/2022 - 14:08
त्यांचं नाव नाही आठवत आता, पण त्यांनाही ती मोठी होऊ लागल्यावर कायदे आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना वाटणाऱ्या भीतीमुळे 'सोनाली' ला पेशवे पार्क कि कुठल्यातरी प्राणी संग्रहालयात ठेवावे लागले होते असे आठवतंय!

In reply to by हेमंतकुमार

टर्मीनेटर 17/02/2022 - 14:47
वाचावे लागेल हे पुस्तक. विस्तृत माहिती असावी त्यात असे preview वरून वाटतंय. आम्हाला असलेला धडा संक्षिप्त स्वरूपात होता. किंवा ते त्या पुस्तकातील एक प्रकरण असेल.

In reply to by हेमंतकुमार

हो संपूर्ण पुण्यात फेमस होती सोनाली लहानपणी एकदा मी आई बाबांबरोबर पेशवेपार्कात गेलो होतो त्याच वेळी डॉक्टरांच्या कुटूंबातले कोणीतरी सोनालीला भेटायला आले होते. (कोण होते ते नक्की आठवत नाही, पण बहुदा डॉक्टर पूर्णपात्रेच होते) येणारा मनुष्य तिच्या नजरेच्या टप्प्याच्या बराच दूर होता, पण तो येतोय हे तिला आधिच कसे समजले ते देव जाणे? अचानक सोनाली जोर जोरात ओरडायला लागली आणि पिंजर्‍यावर रेलून दोन पायांवर उभी राहिली आणि दणादणा पिंजरा हलवायला लागली. पिंजर्‍याबाहेर उभ्या असलेल्या आमच्या सारख्या तमाम प्रेक्षकांचे धाबे दणाणले. ती का ओरडते आहे हे बघायला सुरक्षा रक्षकही धावत पिंजर्‍या जवळ आले. तो पर्यंत ती व्यक्ती सुरक्षा कठडे ओलांडून पिंजर्‍याच्या जवळ पोचली होती. त्यांना पाहिल्यावर सगळे सुरक्षारक्षक हसले आणि त्यांच्याशी काहितरी बोलले. एक जण तिथे थांबला आणि बाकिचे निघून गेले. मग तो भरत भेटीचा प्रसंग आम्ही याची देही याची डोळा बघितला. साधारण अर्धातास तिच्या बरोबर गप्पा मारल्यावर त्यांना जायचे होते. मग सुरक्षा रक्षकांनी सोनालीला पिंजर्‍याच्या आतल्या छोट्या पिंजर्‍यात ढकलले त्या नंतरच ते तिथुन निघाले. ते निघाले हे त्या बयेला आत बसुन कसे समजले ते माहित नाही पण त्या वेळी सुध्दा आतल्या पिंजर्‍यात तिने जबरद्स्त धुमाकूळ घातला होता. आम्हाला तिचा नुसता आवाज ऐकू येत होता पण तो इतका भयानक होता की आता सुध्दा तो प्रसंग आठवला की भिती वाटते. त्या वेळी तिला जर शक्य असते तर तिने पिंजरा तोडून टाकला असता एवढा जास्त दंगा सुरु होता तिचा. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

टर्मीनेटर 17/02/2022 - 14:39
आम्हांला पाठ्यपुस्तकातून ओळख झालेल्या 'सोनाली'ला तुम्ही ह्याची देही ह्याची डोळा बघितले आहे हे वाचून भारीच वाटले 👍 तुमचा हा अनुभव रोचक आहे!

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 17/02/2022 - 14:48
छान किस्सा. तो वृत्तपत्रात वाचल्याचे आठवते आहे . रच्याकने याला अवांतर अजिबात समजू नये. किंबहुना दिवसाला एक खेळ ही मर्यादा ठेवण्यामागे तोच हेतू आहे. एखाद्या दिवशी प्रश्नाचे उत्तर पाच मिनिटात सुद्धा येऊन जाईल. पण पुढे दिवसभर त्या विषयाच्या अनुषंगाने साधक-बाधक चर्चा, पूरक माहितीचे आदान-प्रदान जरूर व्हावे.

सौन्दर्य 17/02/2022 - 00:12
"हा उमंग नाही" हे उत्तर तो चौकीदार देतो आणि आपण अपरिचित वाघाला आंजारले-गोंजारले हे कळल्यामुळे निलय हादरतो. (अश्याच अर्थाची गोष्ट आधी कधीतरी वाचल्यामुळे हे उत्तर सुचले)

In reply to by सौन्दर्य

Bhakti 17/02/2022 - 08:35
वाह! बरोबर :) चौकीदार सांगतो "हा तुमचा उमंग नाही.तो तीन महिन्यांपूर्वी वारला.हा नवीन वाघ आहे जो खुप हिंस्र आहे.तो जेवणाची वाट पाहतोय." ही गोष्ट रस्किन बॉंड यांची 'द टायगर इन हाऊस ' ही आहे. पण यात असेही पाहू शकतो की निलय प्राण्यांशी सहज मैत्री करू शकत होता.

In reply to by सौन्दर्य

Bhakti 17/02/2022 - 08:35
वाह! बरोबर :) चौकीदार सांगतो "हा तुमचा उमंग नाही.तो तीन महिन्यांपूर्वी वारला.हा नवीन वाघ आहे जो खुप हिंस्र आहे.तो जेवणाची वाट पाहतोय." ही गोष्ट रस्किन बॉंड यांची 'द टायगर इन हाऊस ' ही आहे. पण यात असेही पाहू शकतो की निलय प्राण्यांशी सहज मैत्री करू शकत होता.

In reply to by Bhakti

हेमंतकुमार 17/02/2022 - 08:50
यावरून प्रकाश आमटे यांची मुलाखत आठवली. लहानपणी त्यांच्यामुळं मुलाने शाळेत असताना माझा आवडता पाळीव प्राणी या निबंधात चक्क वाघा बद्दल लिहिले होते, कारण वाघ त्यांच्या घरी पाळीव प्राण्या प्रमाणेच होता.!

In reply to by हेमंतकुमार

Bhakti 17/02/2022 - 09:15
हो त्यांच्यावरच्या सिनेमात मेगन जेव्हा जग सोडतो तेव्हाचा प्रसंग खुप भावूक करतो. https://youtu.be/7mZUl8_4Cwo तसेच लाईफ ऑफ पाय सिनेमामधला रिचर्ड पारकर विसरूच शकत नाही. यानिमित्ताने माझा एक धागा आठवला मिया अण्ड व्हाईट लायन नितांत सुंदर सिनेमा :)

सौन्दर्य 17/02/2022 - 23:49
एकदा एका गाडीतून पिता-पुत्र जात असतात. अचानक अपघात होतो व पिता जागच्या जागी मरण पावतो. मुलगा बेशुद्ध होऊन पडलेला असतो. मुलाला ऍम्ब्युलन्समध्ये घालून एका हॉस्पिटलात नेले जाते. त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. ऑपरेशन थिएटरमध्ये त्याला पाहिल्याबरोबर डॉक्टर उदगारतात, "अरे, हा तर माझा मुलगा आहे". प्रश्न असा आहे की त्या डॉक्टरचे व मुलाचे नाते काय होते ? (ज्यांना ह्याचे उत्तर आधीच माहीत असेल, त्याने ते कृपया देऊ नये, इतर मिपाकरांना डोके खाजविण्याची संधी द्यावी ही विनंती.)

In reply to by सौन्दर्य

डॉक्टर त्या मुलाच्या आई असाव्या इथे डॉक्टर पुरुष आहे का स्त्री त्याचा उल्लेख नाहीये त्यामुळे असे असू शकेल आणि बिचाऱ्यांचा त्यांच्या आईच्या दवाखान्या जवळच अपघात झाला असावा कसला भयंकर दुर्दैवी योगायोग, पैजारबुवा,

हेमंतकुमार 18/02/2022 - 07:58
दोन शक्यता आहेत त्यातली आता पहिली लिहीतो गाडीतून जाणारे पिता-पुत्र हे एकमेकांचे पिता-पुत्र आहेत असे काही लिहिलेले नाही त्यामुळे त्या कुठल्याही दोन व्यक्ती (वेगळ्या वयांच्या) असू शकतात किंवा आजोबा आणि मुलगा सुद्धा असू शकतात पुढे जे डॉक्टर आहेत ते अपघाती मुलाचे खरे वडील

Bhakti 18/02/2022 - 07:59
अंदाज पिता-पुत्र .जे पिता मृत पावले,ते बेशुद्ध झालेल्या मुलाचे पिता नसून इतर मुलाचे होते.जो बेशुद्ध झाला तो खरोखरच डॉक्टरचा मुलगा असावा.

हेमंतकुमार 18/02/2022 - 08:38
मुलाचे दोन वडील अशी परिस्थिती स्पष्ट करायची असल्यास : एक जैविक वडील आणि दुसरे ज्यांना दत्तक गेला आहे ते वडील.

हेमंतकुमार 18/02/2022 - 21:25
आजच्या खेळाचे उत्तर व समारोप थोड्या वेळाने होईल ही अपेक्षा. उद्या मी एक अंकांचा खेळ देत आहे म्हणजे विषयबदल होईल. परवा अन्य कोणीही इच्छुक आपला खेळ देऊ शकेल धन्यवाद !

सौन्दर्य 19/02/2022 - 00:03
सर्व प्रतिसाद कर्त्यांचे खूप खूप आभार. कुमार सरांनी एक चांगला उपक्रम सुरु केल्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. सर्व साधारणपणे डॉक्टर म्हंटले म्हणजे पुरुष डॉक्टरच डोळ्यासमोर उभा राहतात, त्यामुळे ह्या कोड्यात डॉक्टर स्त्री असू शकेल व पर्यायाने त्या मुलाची आई, हेच लक्षात येत नाही. अचूक उत्तर देणार्यांचे, ज्ञानोबा, टर्मिनेटर, कर्नल तपस्वी, अभिनंदन. मुविंनी माझ्या व्यक्तिगत आयडीवर अचूक उत्तर पाठवले म्हणून त्यांचे देखील अभिनंदन.

In reply to by सौन्दर्य

रुपी 19/02/2022 - 03:19
हे कोडे आम्हांला 'Uncouncious bias' बद्दलच्या ट्रेनिंगमध्ये उदाहरण म्हणून दिले होते. पण त्यांच्या मते दोन्हीही उत्तरे बरोबर असू शकतात. १. आई किंवा २. डॉ. कुमार यांनी एका प्रतिसादात लिहिलं आहे तसं जैविक/ ज्यांना दत्तक गेला आहे ते वडील. तुम्ही लिहिलं आहे तसं "पुरुष डॉक्टरच डोळ्यासमोर" येतात हा एक bias , किंवा दोन्हीही पालक biological असतील म्हणून आई हे उत्तर देणं हाही एक bias असे त्यात सांगितले होते.

हेमंतकुमार 19/02/2022 - 05:09
खाली काही अंक प्रत्येकी एका गटामध्ये लिहिलेले आहेत. प्रत्येक गटात ठराविकच 3 अंक का निवडले असावेत हे ओळखायचे आहे. गट अ : १, ८, ९ गट ब : २, ३ , ९ गट क : ४, ५, ७

In reply to by मुक्त विहारि

हेमंतकुमार 19/02/2022 - 09:00
हे अपेक्षित उत्तर नसले तरी अशा प्रकारचे तर्क लढवणे अपेक्षित आहेच ! येऊद्यात.... :)

In reply to by हेमंतकुमार

आकड्यांवरून एक वाक्य आठवले 1,2,3,4,5,7,10,12,15,20,30. काही ठिकाणी, हे वाक्य चपखल बसते, मग ते शिक्षण असो किंवा शेती किंवा व्यवसाय किंवा आर्थिक नियोजन

In reply to by सुक्या

शिक्षणाच्या बाबतीत ... मग ते सुरूवात असो किंवा पदवी मिळाल्या नंतर असो ... पहिल्या वर्षी तोंडओळख ते 30 वर्षांचा अनुभव आला की यश मिळतेच मिळते ... साधारण पणे, वयाच्या 25व्या वर्षी पदवी घेतलेला मनुष्य 55व्या वर्षी, डिपार्टमेंट हेड होण्या इतपत अनुभवी झालेला असतो.(हे सर्व साधारण वाक्य आहे, काही लोकं 40 व्या वर्षीच ते ध्येय गाठतात, तर काही रिटायरमेंट झाली तरी गाठू शकत नाहीत...) ------- शेतीच्या बाबतीत, लगेच फळ देणारी झाडे (मिरची, हळद, पपई,शेवगा इत्यादी) ते चंदना सारखी 30 वर्षांनी भरपाई देणारी लागवड ------ आर्थिक बाबतीत ... लगेच परतावा ते आयुष्यभराचा ठेवा ------

हेमंतकुमार 19/02/2022 - 15:13
३ अंकांचे एकमेकाशी गणिती नाते बघायची गरज नाही रंजक प्रकारचा खेळ आहे अंकांकडे नीट निरखून बघा आणि विचार करा

हेमंतकुमार 19/02/2022 - 23:16
सर्व अंक अक्षरांमध्ये लिहून काढा. आता प्रत्येक गटातील संख्या पहा. प्रत्येकी तिघांमधील साम्य असे आहे: गट अ: या प्रत्येक शब्दात एक स्वर आहे गट ब :या प्रत्येक शब्दात न हे व्यंजन आहे गट क : या प्रत्येक शब्दात एकही स्वर नाही आणि प्रत्येकाची सुरुवात आकारांत व्यंजनाने होते.

हेमंतकुमार 21/02/2022 - 10:01
खेळ क्र. ५ मृत्यू समीप आलेला एक श्रीमंत माणूस आपली संपत्ती त्याच्या तिघांपैकी एकाच मुलाला द्यायची ठरवतो. तो तिघांना बोलवून सांगतो की तुमच्यापैकी जो सर्वात हुशार ठरेल त्यालाच माझी संपत्ती मिळेल. त्यासाठी तुम्ही असे करायचे आहे: प्रत्येकाने बाजारात जाऊन काहीतरी वस्तू आणायची आहे. ती वस्तू अशी असावी की, ज्यामुळे माझे शयनगृह पूर्ण भरून जाईल, परंतु ती वस्तू तुमच्या खिशातही मावली पाहिजे ! त्यानुसार ३ मुले बाजारात जाऊन तीन वेगळ्या वस्तू घेऊन येतात. आता तो माणूस प्रत्येक मुलाला स्वतंत्रपणे आपल्या खोलीत बोलावतो. पहिला मुलगा खोलीत गेल्यावर सांगतो की त्याने कापडाचे तुकडे आणले आहेत आणि तो खिशातून काढून ते जमिनीवर अंथरतो. त्यातून जेमतेम जमीन फक्त व्यापली जाते. नंतर दुसरा मुलगा आत येतो. तो खिशातून भरभर गवत काढतो आणि जमिनीवर पसरून दाखवतो. त्यातून तर जेमतेम निम्मी जमीनच व्यापते. शेवटी तिसरा मुलगा आत येतो आणि त्याची वस्तू दाखवतो. त्या क्षणी श्रीमंत माणसाचा निर्णय पक्का होतो की सर्व संपत्ती तिसऱ्याच मुलाला द्यायची. प्रश्न : तिसऱ्या मुलाने वडिलांना कोणती वस्तू दाखवली असेल ? स्पष्टीकरण द्या.

In reply to by हेमंतकुमार

सुरिया 21/02/2022 - 11:08
शालेय पुस्तकात होती ही कथा. खिशात बसवायची अट न्हवती पण ती वस्तू आणण्यासाठी थोडेसे पैसे प्रत्येक मुलाला दिलेले असतात. सगळ्यात धाकटा मुलगा ती रुम स्वच्छ झाडतो, साफसाफाई करतो आणि मिळालेल्या पैशातून एक देवाची तसबीर आणि उदबत्त्या आणतो. तेथे देवाची प्रार्थना करत राहतो. रुममध्ये असलेला उदबत्तीचा दरवळ आणि प्रसन्नतेने रुम भरली जाते.

हेमंतकुमार 21/02/2022 - 12:01
**एल ई डी बल्ब आणला असेल. उजेडाने भरुन जाइल.>>> किंवा काडेपेटी. तो मुलगा काडी पेटवून दाखवतो आणि खोली उजेडाने भरून जाते. ... धन्यवाद.

हेमंतकुमार 22/02/2022 - 12:23
एक यंत्रणा ओळखायची आहे. तिचे वर्णन असे : यंत्रणेचे दोन मोठे भाग आहेत. प्रत्येक भागाचे पाच उपविभाग आहेत. प्रत्येक उपविभागात काही महत्त्वाच्या गोष्टी क्रमाने रचलेल्या आहेत. त्या गोष्टींची संख्या खालील प्रमाणे आहे : • वरचा भाग : 1, 2, 8, 5, 14. • खालचा भाग : 1, 3, 7, 5, 14. ही यंत्रणा ओळखण्यासाठी तुम्हाला कुठेही गावभर शोधत बसायची गरज नाही. पहा जरा जवळच डोकावून ! कदाचित सापडूनही जाईल लगेच 😀

In reply to by नीळा

हेमंतकुमार 23/02/2022 - 10:10
हात आणी पायाची हाड बरोबर. ....... या खेळातील वरचा भाग = एक संपूर्ण हात (म्हणजे खांदा ते बोटांची टोके) खालचा भाग = एक संपूर्ण पाय( म्हणजे खुब्या पासून ते पायाच्या बोटाच्या टोकांपर्यंत) या प्रत्येकातील टप्प्याटप्प्याने लिहिलेली हाडांची संख्या आहे ती

चौकस२१२ 23/02/2022 - 07:20
तीन मित्र चहा प्यायला जातात ३० रुपये खर्च होतो, मालक त्या दिवशी खुश असतो आणि वेटर ला ५ रुपये देतो आणि म्हणतो कि जा त्याना हे परत दे आजची खास सवलत म्हणून वेटर विचार करतो कि आता हे ५ रुपये ३ जणात समसमान कसे वाटायचे ? तो त्यातील २ रुपये स्वतःकडे ठेवतो आणि तिघांना १ रुपया प्रत्येकी देतो आता हिशेब बघा हा कसा होतो ते - प्रत्येकाने सुरवातीला १० रुपये खर्च केले पण त्यातील एक रुपया परत मिलायन्स प्रत्येकाचे ९ रूपयेच खर्च झाले म्हणजे एकूण २७ - वेटर कडे २ रुपये - एकूण बेरीज २९ मग १ रुपया गेला कुठे ? ( आपणास उत्तर सहजी माहिती असल्यास लागेचच सांगू नका ज्यांना माहिती नाही त्यांना खाजवूद्या कि जरा खाजवूद्या कि .. डोकं )

- एकूण बेरीज २९ मग १ रुपया गेला कुठे ?
खर्च रु २७ + वेटर जवळचे रु २ + परत केलेले रु. ३ असे एकुण रु ३२ होतात. पैजारबुवा,

आग्या१९९० 23/02/2022 - 12:12
मित्रांच्या बाजूने खर्चाचा विचार केल्यास त्यांना प्रत्येकी एकेक रुपया परत मिळाल्याने त्यांचा खर्च रु. २७ च झाला. मालकाने दिलेल्या पैशातील २ रुपये वेटरने त्याच्याकडे ठेवले हे मित्रांना माहीत नसल्याने मित्र ताळा करताना २७+२= २९ असा कसे करणार? ताळा करण्यासाठी २७+३ = ३० असेच करणार. मालकाला वेटरने २ रुपये स्वतःकडे ठेऊन घेतले हे माहीत नसल्याने तो ३०-५= २५ असाच हिशोब करणार.

हरवलेला 24/02/2022 - 00:56
मित्रांनी केलेला खर्च = मालकाला मिळालेले रुपये + वेटर जवळचे रुपये (९+९+९) = (३० - ५) + २ २७ = २५ + २

चौकस२१२ 24/02/2022 - 06:40
उत्तर हे आहे कि " " सगळे पैसे जसेच्या तसे आहेत , ना कमी झाले ना वाढले , कोडे लिहिणार्याने लिहताना एक रक्कम जमेच्या बाजूने घेतली आणि एक रक्कम खर्चाच्या बाजूने घेतली आणि चुकीचा आणि फसवा ताळेबंद केला " भौतिक दृष्ट्या मोजा : रुपये ३०च राहिले ना २९ ना ३२ ! मालकांकडे २५ + मितरांकडे ३ + वेटर कडे २ = ३० यांना उत्तर "गवसले" आहे असे म्हण्याला हरकत नाही त्यांनी ताळेबंद बरोबर मांडला फक्त शब्द वेगळे वापरले मी उत्तरचा खुलासा करताना हे कोडे इतरांना घाला , बघ काय उत्तरे मिळतात ते .. लोक भांडताना पाहिलेली आहेत

नीळा 24/02/2022 - 08:19
एक वीशीष्ठ वीषय शीकवणारे गुरुजी असतात. त्यांचा एक शीष्य असतो. सर्व शीक्षण संपल्यावर गुरु शीष्याला म्हणतात आता मी तुझी परीक्षा घेणार आहे. गुरुजी शीष्याला एक प्रश्न वीचारतात. प्रश्न त्यांच्या वीषयाशीच संबधीत असतो. शीष्य ऊत्तर देतो. गुरूजी म्हणतात तुझा अभ्यास पुर्ण झाला आहे. ऊत्तर बरोबर आहे एकदम. पण तु परीक्षेत नापास झालास..... कोणता वीषय होता आणि काय प्रश्न होता?

हेमंतकुमार 24/02/2022 - 11:20
कोणता वीषय होता आणि काय प्रश्न होता?
वीषय : मातृभाषेतून शालेय शिक्षण प्रश्न : मातृभाषेतून शिकणे मानसिक जडणघडणीसाठी उपयुक्त असते का ? जो याचे उत्तर हो देईल तो सध्याच्या व्यवहारात नापास ठरवला जाईल !

In reply to by हेमंतकुमार

नीळा 24/02/2022 - 12:15
नाही..... तात्वीक नव्हता प्रश्न.... त्या विषयाचा अभ्यास केलेल्या कोणीही तेच ऊत्तर काढले असते

गुरुजी शिष्याला विचारतात "कटप्पाने बाहुबली को क्यो मारा?" शिष्य सांगतो "त्या करता बाहुबली द कनक्लुजन पहा" या उत्तरा करता गुरुजी त्याला नापास करतात कारण तो पर्यंत सर्वांनी बाहुबलीचा दुसरा भाग पाहिलेला असतो. पैजारबुवा,

हेमंतकुमार 25/02/2022 - 07:11
अजून तासाभराने उत्तर लिहायला हरकत नाही बहुतेक आता कोणी प्रयत्न करत नसावे त्यानंतर नवे देण्यास कोणी इच्छुक असल्यास तसे सांगावे

नीळा 25/02/2022 - 07:19
ते गुरूजी ज्योतिष शास्त्र शिकवत असतात. प्रश्न असा असतो की माझ्या म्रुत्यु ची वेळ आणि तरीख काय आहे? शिष्य योग्य आकडेमोड अरून अचूक ऊत्तर देतो. गुरु म्हणतात अशी कोणालाही म्रुत्युची वेळ आपल्या शास्त्रात सांगायची नसते. तु ऊत्तर बरोबर दिलेस पण परिक्षेत नापास झालास........

हेमंतकुमार 25/02/2022 - 09:38
चला, एक इमला बांधूयात ! • ४ मातीचे गोळे एकत्र थापून ठेवले. • मग घेतल्या ५ फरश्या व जोडून टाकल्या एकमेकांना आणि ठेवले त्यांना मातीच्या गोळ्यांवर • आता याच्यावर चढले ५ दगड, वा ! • आता यांच्यावर ठेवल्या नगद १२ विटा आणि.... • सर्वात शेवटी यावर ठेवल्या लगोऱ्यामधील ७ चकत्या झाला की नाही हा भक्कम पाया ? ही इमारत नक्की मजबूत असेल की नाही ! कुठल्या इमारतीबद्दल केलेलं वर्णन आहे हे ? जरा स्पष्ट करता का… …. तुमचा विचार होईपर्यंत मी गोष्ट पुढे चालू ठेवतो.... पहिली इमारत उभी राहिली. मग त्याच्या शेजारी दुसरी पण बांधायला घेतली. पण या खेपेस तळातले मातीचे गोळे मात्र तीनच ठेवले. मात्र बाकी काही फरक नाही केला. आता ही पण चांगली झाली दणकट ! मग त्याच्या शेजारी उभी राहिली तिसरी इमारत. या खेपेस तळाचे मातीचे गोळे चक्कघेतले. बाकी मात्र पहिल्या दोघांप्रमाणेच बर का.. अगदी शेम टू शेम ! आता ही बी मजबूत झाली हो .. का बरं झाला असा फरक या तिघींमध्ये ? जरा विस्कटून सांगा की राव !! …………………………………………………………………………………………………

In reply to by हेमंतकुमार

चौकस२१२ 25/02/2022 - 09:46
कुमार१, हे कोडं प्रतीकात्मक इमारती बद्दल आहे कि भौतिक ( फिजिकल) उभारणी बद्दल आहे ,, एकदा विचार करतोय कि ३डी मॉडेल बनवावे पण अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत उदाहरण : प्रत्येक गोळ्याचा आकार सारखा आहे का ,, वैगरे !

हेमंतकुमार 26/02/2022 - 07:29
दोन तास राहीले आहेत या आधी मी जो हात व पाय यांचा खेळ दिला होता त्याच प्रकारचा आहे

हेमंतकुमार 26/02/2022 - 09:45
प्रतीकात्मक इमारत म्हणजे मानवी पाठीचा कणा. त्याचे विविध भाग किंवा टप्पे असतात. त्या प्रत्येकातील मणक्यांची संख्या दिलेली आहे. खालपासून वरपर्यंत गेल्यास ती अशी असते : • तळ : ४ • बूड : ५ • कंबर : ५ • पाठ किंवा धड : १२ • मान: ७ तीन वेगळ्या इमारतींबद्दल : तळाशी जे 4 अपरिपक्व मणके असतात त्यांची संख्या व्यक्तिगणिक बदलू शकते. काही जणांमध्ये तीन तर काही जणांमध्ये पाचही असू शकतात. पण तरीही सर्वांचा कणा मजबूतच असतो. धन्यवाद !

In reply to by हेमंतकुमार

बरोबर आहे नवरा आणि बायको असेल तर, शून्य ते काही मुले पण, दोन भिन्न संस्कृती एकत्र आल्या तर नंतर फक्त एकच संस्कृती शिल्लक राहते, मग ते मेक्सिको असो किंवा अफगणिस्तान

हेमंतकुमार 22/03/2022 - 11:47
नवा कूटप्रश्न खाली काही अंक प्रत्येकी एका गटामध्ये लिहिलेले आहेत. प्रत्येक गटात ठराविकच अंक का निवडले असावेत हे ओळखायचे आहे. गट अ : ०, ०, ४, ४ गट ब : ०, ४, ० गट क : १, ०, ५ गट ड : ०, ०, ३ टीप : गणिती सूत्रांचा संबंध नाही. चारही गटांचे सूत्र समान आहे. अंक-क्रम गरजेनुसार बदलू शकता.

In reply to by हेमंतकुमार

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरुन रात्रीए उशिरा सुटणार्‍या लोकल गाड्यांचे वेळापत्रक आहे का हे? ० म्हणजे रात्री १२ वाजता सुटणारी लोकल गट कदाचित ठाणे लोकल, कल्याण लोकल, कर्जत आणि विरार असे असावे, पैजारबुवा,

हेमंतकुमार 23/03/2022 - 09:35
अंकांचा क्रम लावून दिलाय : गट अ : ४ ,०, ४, ० गट ब : ४, ०, ० गट क : १, ५, ० गट ड : ३, ० ,०

हेमंतकुमार 24/03/2022 - 09:41
दिलेले अंक हे एखाद्या टेनिस सामन्यातील गुणांकन दर्शवतात : ४ ० - ४० ४० - ० १५- ० ३० - ०