Skip to main content

खाजवा डोकं : अक्षरांच्या पलीकडे

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 15/02/2022 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दखेळ हे भाषिक मनोरंजनाचे एक महत्त्वाचे व रंजक अंग. गेल्या काही वर्षात इथे विविध प्रकारचे शब्दखेळ सादर झालेत. मागचा महिना खऱ्या अर्थाने गाजला तो वर्डल या शब्दखेळाने. त्याच्या जोडीला त्याची इतर प्रारूपे (Ab, Dor, शब्दक) देखील सादर झाली. आपल्यातील अनेक जण त्याचे व्यसनी झालेत. अर्थात तो खेळ आता अंगवळणी पडल्याने त्यातले नाविन्य संपले आहे. एक नित्यकर्म म्हणून दिवसाकाठी आपण एखादा शब्द आवडीने सोडवत राहू. पण आता असे वाटले की, निव्वळ अक्षरपालट व शब्दशोध याच्या पलीकडे जाऊन एक नवा खेळ, जो बुद्धीला वेगळी चालना देईल, असा शोधावा. या खेळाचे स्वरूप असे आहे : प्रश्नकर्ता एखादा प्रसंग किंवा घटना थोडक्यात येथे लिहिल. मग त्याच्यावर आधारित एक दोन प्रश्न विचारेल. सहभागींनी नीट विचार करून त्याचे उत्तर लिहावे. विचारला गेलेला प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचा किंवा एकाच शब्दात उत्तर असलेला (हो/नाही) नसावा.अपेक्षित उत्तर आल्यावर प्रश्नकर्ता तसे जाहीर करेल. त्यानंतरच दुसर्‍या कोणीही दुसऱ्या दिवशी नवा खेळ किंवा कोडे द्यावे. खेळाच्या स्वरूपासंबंधी काही सूचना करतो. सर्वांनी विचार करून मत द्यावे. १. दिवसाला एकच प्रश्न /खेळ ही मर्यादा पाळूच पाळूया. म्हणजे लवकर कंटाळा येत नाही. २. रोजचा दिवस भारतीय वेळेनुसार 00.01 वाजता सुरू होईल. त्यानंतर जो प्रथम प्रश्न देईल तो त्या दिवसाचा (चोवीस तासांचा) खेळ लागू होईल. ३.एखाद्या खेळाचे उत्तर लवकर दिले गेले तरी नंतर येणाऱ्या लोकांना तो दिवसभर त्यावर चर्चा, सूचना, सुधारणा करता येतील. ४. 20 तासात कोणीच उत्तर दिले नाही तर प्रश्नकर्त्याने उत्तर सांगून त्याच दिवशी खेळ संपल्याचे जाहीर करावे. ५. लागोपाठच्या दोन दिवसांमध्ये प्रश्नांचे विषय पूर्ण वेगळे असावेत. (गणित, भाषा, भूगोल, सामान्यज्ञान, रहस्य, इत्यादी). …… सूचनांचे स्वागत. उद्यापासून प्रत्यक्ष खेळ सुरू करता येईल

वाचने 33343
प्रतिक्रिया 134

प्रतिक्रिया

उद्याच्या कोड्याची वाट बघतो आहे पैजारबुवा,

In reply to by Bhakti

धन्यवाद, बुवा आणि भक्ती. प्रश्नामध्ये जे वर्णन असेल ते सर्व मराठीत करायचे. इंग्लिश भाषेवर आधारित खेळ द्यायला काहीच हरकत नाही. सर्व संवाद मात्र मराठीतून असावा.

खेळ क्रमांक १ सुनील व संजय जानेवारी महिन्यात उसाच्या रसवंतीगृहामध्ये रस प्यायला बरोबर जातात. थोड्याच वेळात दोघांच्याही पुढे रसाचे पेले ठेवले जातात. या दोन्ही पेल्यांमध्ये गुंगीचे औषध समप्रमाणात घातलेले असते. सुनील चेंगट प्राणी असून तो हळूहळू एक एक घोट पितो, तर संजय हा अधाशासारखा पहिल्या पेल्यामधील रस भरकन पिऊन संपवतो. त्याला अजून खूप प्यायची इच्छा असल्याने तो पुन्हा एक पेलाभर रस मागवतो. तरीसुद्धा सुनीलचा पहिलाच पेला अजूनही पिऊन संपलेला नाही. अखेर सुनीलचा पहिलाच पेला पिऊन संपेपर्यंत संजयचे एकूण चार प्याले रस गटागट पिऊन संपतात. आता ते दोघे उठणार एवढ्यात सुनीलला प्रचंड गुंगी येऊन तो जवळपास खालीच पडतो. तर संजय मात्र अगदी व्यवस्थित भानावर असतो. या दोघांपैकी फक्त सुनीललाच प्रचंड गुंगी का आली ते स्पष्ट करा. … टीप : दिलेल्या माहितीच्या आधारेच उत्तर द्यावे. न दिलेल्या काही गोष्टी गृहीत धरलेल्या असतात. अधिक माहिती विचारू नये. गरज वाटल्यास उत्तरांच्या एकाहून अधिक शक्यताही लिहायला हरकत नाही. चला तर, खाजवा डोकं आणि द्या उत्तर ! ……..

In reply to by हेमंतकुमार

गुंगीचे औषध फक्त पहिल्या ग्लास मध्ये होते असे जर गृहीत धरले तर इतर ३ ग्लास पिल्याने शरीरातील त्याचे प्रमाण डायल्युट झाले असेल. त्याशिवाय शर्करा भरपूर असल्याने औषध मेटॅबोलाईझ सुद्धा लवकर झाले असेल. संजय ह्या दरम्यान विश्रांतीकक्षांत गेला कि नाही ठाऊक नाही पण गेला असेल तर मग औषध शरीरातून बाहेर सुद्धा गेले असेल.

गुंगीचे औषध तळाशी गेले असेल काय? सुनील दरवेळी पेला मिक्स करून सावकाश पित असल्याने त्याला ती मात्रा लागू झाली.संजलला नाही. (माफ करा, मी अगदीच बाळबोध उत्तर दिले​आहे ;))

**गुंगीचे औषध तळाशी गेले असेल काय? >>>छान प्रयत्न. दिशा योग्य आहे अजून थोडा विचार केला तर उत्तर येईल

गुंगीचे औषध हे रसात न विरघळणारे व ग्लासच्या तळाला जाउन बसणारे असावे. त्यांनी जानेवारी महिन्यात रस प्यायला सुरुवात केली होती आणि आता सुनिलचा पहिला पेला संपला आहे. जरी आपण ३१ जानेवारीला सुरुवात केली होती असे गृहित धरले तर सुनिल ला रसाचा एक पेला संपवायला १६ दिवस लागले. संजयचा पहिला पेला सधारण १ ते ४ फेब्रूवारी दरम्यान कधीतरी संपला असेल त्याच वेळी त्याच्यावर गुंगीच्या औषधाचा परीणाम होउन तो बेशुध्द पडला असेल व शुध्दीवर आल्यावर त्याने उरलेले तीन पेले संपवले. ज्यात गुंगीचे औषध नव्हते. सुनिल आता पेल्याच्या तळाशी पोचला व त्याच्या पोटात गुंगीचे औषध आता गेले म्हणून तो उठताना चक्कर येउन पडला पण संजय मात्र आता व्यवस्थित होता. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

कल्पनेची भरारी आवडली अर्थात अपेक्षित उत्तर नाही पण बघूया अजून काय काय शक्यता येताहेत :)

रसवंतीगृहात त्यावेळी मिथुन शेठचे 'बाहो मे बोतलं' हे गाणे वाजत असणार. त्यातली "हो... एक घुंटसे क्या होगा.... हैं प्यास समंदर पिनेकी..." ही ओळ ऐकून उत्तेजित झालेल्या संजयने, पायाने ठेका धरत गटागट चार ग्लास 'बिना बरफ' रस ठोकला असणार. बर्फ घातलेला नसल्याने त्याला ग्लास सतत हलवावा लागला नाही आणि बॉटम अप करत रस प्यायल्याने रसात व्यवस्थित मिक्स न झालेले गुंगीचे औषधं तळाशी राहून गेले. (चहा असो कि रस, थोडा ग्लासात सोडण्याची वाईट खोड अनेकांना असते 😀) सुनिल मात्र ढिम्म बसून, हेडफोन लावून पंकज उधासचे "मजा लेना हैं पिने का तो.... कम कम, धीरे धीरे पी" हे गाणे ऐकत जानेवारी महिन्यातल्या थंडी वगैरेचा विचार न करता बर्फ घातलेला रस, ग्लास हलवून हलवून पीत बसल्याने त्याच्यावर औषधाचा परिणाम झाला असणार. शेवटी एक ग्लास पिऊन लुढकायला तो सुनील थोडीच आहे? चार ग्लास ठोकूनही व्यवस्थित राहणारा माझा नावबंधू संजय आहे तो

😎

बाकी गुंगी येऊन खाली पडणाऱ्या सुनिलला पाहून त्याच गाण्यातली "होश उडादे हमारे अभी तक पैदा ना ऐसा हुवा...." ही ओळ संजयने मोठ्यानी म्हटली असणार ह्यात शंका नाही 🤣 🤣 🤣 उत्तर बरोबर असो कि चूक, खालच्या गाण्याची मजा जरूर घ्यावी!

In reply to by टर्मीनेटर

उत्तर बरोबर असून अपेक्षित उत्तरा प्रमाणेच आहे. पहिल्यांदा जेव्हा दोन्ही पेले भरून रस दिला गेला त्यावेळेस दोघांच्याही पेल्यांत बर्फ होता आणि गुंगीचे औषध बर्फामध्ये घातलेले होते. जानेवारी महिन्यात बर्फ अर्थातच हळू वितळतो. प्रत्येक सहभागीने वेगवेगळ्या शक्यता लिहिल्या. त्याने मजा आली. :)))

In reply to by हेमंतकुमार

बाहोमे बोतल गाणं भन्नाट आहे हे वेगळे सांगणे न लगे !

In reply to by हेमंतकुमार

शाळकरी वयात व्हिडीओ कॅसेट लायब्ररीतून ह्या चित्रपटाची कॅसेट आणून पहिला होता हा चित्रपट! किशोर कुमार आणि आशाताईंच्या आवाजातले हे गाणे भप्पी लहिरी ह्यांनी सांगितबद्ध केले होते. उत्तराच्या जवळपास पोचल्याचे समाधान लाभले. माझे आवडते संगीतकार भप्पी लहिरी ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

In reply to by टर्मीनेटर

चार ग्लास ठोकूनही व्यवस्थित राहणारा माझा नावबंधू संजय आहे तो >> हे वाक्य वाचलं आणि परत वर जाऊन प्रतिसाद कर्त्याच नाव बघितलं. जीव भांड्यात पडल्याचा मोठा आवाज ऐकू आला असेलच

पुढची समस्या?

In reply to by Nitin Palkar

ठरल्याप्रमाणे उद्या दिवसाला एकच पुरे. उद्याचे कोण देणार बोला. आधी सांगून ठेवले तर मग मी नाही देणार त्यासाठी सर्वांचे स्वागत आहे !

एक उत्तर पूर्व भागातील निलयला दैवयोगाने बछडा पाळण्याची संधी मिळते.निलयला त्याच्या घरच्या मंडळींना त्याचा लळा लागतो.त्याच नाव ते उमंग ठेवतात. परंतू उमंग जसा जसा मोठा ,युवा व्हायला लागतो त्यांचं कोंबड्या पळवणे,धुसमुसळापणा सुरू होतो.त्यामुळे भीती व आजूबाजूच्या दबावामुळे उमंगला प्राणी संग्रहालयात सोडण्याचं ठरवतो.मोठ्या दु:खाने त्याला तिथे सोडून निलय घरी येतो. दरवर्षी निलय उमंगला भेटायला जात असतो. तीन वर्षे तो जातो नंतर मात्र खंड पडतो. दोन वर्षांनी निलयला पुन्हा प्राणी संग्रहालयात जायची संधी मिळते. तो उमंगच्या पिंजर्‍याजवळ उभा राहतो.तर उमंग खुप कृश दिसतो.पण नेहमी प्रमाणे निलय पिंजऱ्यात हात देऊन उमंगला माया करतो,त्याच्याशी गप्पा मारतो.वाघही नीट वागतो.दूरुन एक चौकीदार येतो .तो हे दृश्य पाहून आश्चर्यचकीत होतो. निलय त्यावर रागावतो "तुम्ही उमंगला खायला देत नाही का?"असा खडा प्रश्न करतो.परंतू चौकीदाराने दिलेल्या उत्तराने निलय पुरता हादरून जातो. प्रश्न असा की ते उत्तर काय असेल?

In reply to by Bhakti

ह्यावेळी पहिलेच उत्तर बरोबर आल्याने डोकं खाजवायची संधीच मिळाली नाही 😔 उमंग बद्दल वाचून आम्हाला शाळेत असलेला पाळीव सिंहिणी बद्दलचा 'सोनाली' हा धडा आठवला.

In reply to by हेमंतकुमार

त्यांचं नाव नाही आठवत आता, पण त्यांनाही ती मोठी होऊ लागल्यावर कायदे आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना वाटणाऱ्या भीतीमुळे 'सोनाली' ला पेशवे पार्क कि कुठल्यातरी प्राणी संग्रहालयात ठेवावे लागले होते असे आठवतंय!

In reply to by हेमंतकुमार

वाचावे लागेल हे पुस्तक. विस्तृत माहिती असावी त्यात असे preview वरून वाटतंय. आम्हाला असलेला धडा संक्षिप्त स्वरूपात होता. किंवा ते त्या पुस्तकातील एक प्रकरण असेल.

In reply to by आंद्रे वडापाव

मस्तच! ह्या लिंक साठी अतीव आभार 🙏 ऑडिओ बुक आवडले हे वेगळे सांगणे न लगे!

In reply to by हेमंतकुमार

हो संपूर्ण पुण्यात फेमस होती सोनाली लहानपणी एकदा मी आई बाबांबरोबर पेशवेपार्कात गेलो होतो त्याच वेळी डॉक्टरांच्या कुटूंबातले कोणीतरी सोनालीला भेटायला आले होते. (कोण होते ते नक्की आठवत नाही, पण बहुदा डॉक्टर पूर्णपात्रेच होते) येणारा मनुष्य तिच्या नजरेच्या टप्प्याच्या बराच दूर होता, पण तो येतोय हे तिला आधिच कसे समजले ते देव जाणे? अचानक सोनाली जोर जोरात ओरडायला लागली आणि पिंजर्‍यावर रेलून दोन पायांवर उभी राहिली आणि दणादणा पिंजरा हलवायला लागली. पिंजर्‍याबाहेर उभ्या असलेल्या आमच्या सारख्या तमाम प्रेक्षकांचे धाबे दणाणले. ती का ओरडते आहे हे बघायला सुरक्षा रक्षकही धावत पिंजर्‍या जवळ आले. तो पर्यंत ती व्यक्ती सुरक्षा कठडे ओलांडून पिंजर्‍याच्या जवळ पोचली होती. त्यांना पाहिल्यावर सगळे सुरक्षारक्षक हसले आणि त्यांच्याशी काहितरी बोलले. एक जण तिथे थांबला आणि बाकिचे निघून गेले. मग तो भरत भेटीचा प्रसंग आम्ही याची देही याची डोळा बघितला. साधारण अर्धातास तिच्या बरोबर गप्पा मारल्यावर त्यांना जायचे होते. मग सुरक्षा रक्षकांनी सोनालीला पिंजर्‍याच्या आतल्या छोट्या पिंजर्‍यात ढकलले त्या नंतरच ते तिथुन निघाले. ते निघाले हे त्या बयेला आत बसुन कसे समजले ते माहित नाही पण त्या वेळी सुध्दा आतल्या पिंजर्‍यात तिने जबरद्स्त धुमाकूळ घातला होता. आम्हाला तिचा नुसता आवाज ऐकू येत होता पण तो इतका भयानक होता की आता सुध्दा तो प्रसंग आठवला की भिती वाटते. त्या वेळी तिला जर शक्य असते तर तिने पिंजरा तोडून टाकला असता एवढा जास्त दंगा सुरु होता तिचा. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आम्हांला पाठ्यपुस्तकातून ओळख झालेल्या 'सोनाली'ला तुम्ही ह्याची देही ह्याची डोळा बघितले आहे हे वाचून भारीच वाटले 👍 तुमचा हा अनुभव रोचक आहे!

In reply to by टर्मीनेटर

छान किस्सा. तो वृत्तपत्रात वाचल्याचे आठवते आहे . रच्याकने याला अवांतर अजिबात समजू नये. किंबहुना दिवसाला एक खेळ ही मर्यादा ठेवण्यामागे तोच हेतू आहे. एखाद्या दिवशी प्रश्नाचे उत्तर पाच मिनिटात सुद्धा येऊन जाईल. पण पुढे दिवसभर त्या विषयाच्या अनुषंगाने साधक-बाधक चर्चा, पूरक माहितीचे आदान-प्रदान जरूर व्हावे.

"हा उमंग नाही" हे उत्तर तो चौकीदार देतो आणि आपण अपरिचित वाघाला आंजारले-गोंजारले हे कळल्यामुळे निलय हादरतो. (अश्याच अर्थाची गोष्ट आधी कधीतरी वाचल्यामुळे हे उत्तर सुचले)

In reply to by सौन्दर्य

हाच विचार मनात आला होता शेवट वाचताना पैजारबुवा,

In reply to by सौन्दर्य

वाह! बरोबर :) चौकीदार सांगतो "हा तुमचा उमंग नाही.तो तीन महिन्यांपूर्वी वारला.हा नवीन वाघ आहे जो खुप हिंस्र आहे.तो जेवणाची वाट पाहतोय." ही गोष्ट रस्किन बॉंड यांची 'द टायगर इन हाऊस ' ही आहे. पण यात असेही पाहू शकतो की निलय प्राण्यांशी सहज मैत्री करू शकत होता.

In reply to by सौन्दर्य

वाह! बरोबर :) चौकीदार सांगतो "हा तुमचा उमंग नाही.तो तीन महिन्यांपूर्वी वारला.हा नवीन वाघ आहे जो खुप हिंस्र आहे.तो जेवणाची वाट पाहतोय." ही गोष्ट रस्किन बॉंड यांची 'द टायगर इन हाऊस ' ही आहे. पण यात असेही पाहू शकतो की निलय प्राण्यांशी सहज मैत्री करू शकत होता.

In reply to by Bhakti

यावरून प्रकाश आमटे यांची मुलाखत आठवली. लहानपणी त्यांच्यामुळं मुलाने शाळेत असताना माझा आवडता पाळीव प्राणी या निबंधात चक्क वाघा बद्दल लिहिले होते, कारण वाघ त्यांच्या घरी पाळीव प्राण्या प्रमाणेच होता.!

In reply to by हेमंतकुमार

हो त्यांच्यावरच्या सिनेमात मेगन जेव्हा जग सोडतो तेव्हाचा प्रसंग खुप भावूक करतो. https://youtu.be/7mZUl8_4Cwo तसेच लाईफ ऑफ पाय सिनेमामधला रिचर्ड पारकर विसरूच शकत नाही. यानिमित्ताने माझा एक धागा आठवला मिया अण्ड व्हाईट लायन नितांत सुंदर सिनेमा :)

कुठे तरी वाचले होते त्यामुळे वाघाचे पिल्लू लहानपणी मांजरे म्हणुन पाळले आशी उदाहरणं आहेत

काही गूढ असावे की काय असा विचार करतोय पण वेगळे काही सुचत नाही.

एकदा एका गाडीतून पिता-पुत्र जात असतात. अचानक अपघात होतो व पिता जागच्या जागी मरण पावतो. मुलगा बेशुद्ध होऊन पडलेला असतो. मुलाला ऍम्ब्युलन्समध्ये घालून एका हॉस्पिटलात नेले जाते. त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. ऑपरेशन थिएटरमध्ये त्याला पाहिल्याबरोबर डॉक्टर उदगारतात, "अरे, हा तर माझा मुलगा आहे". प्रश्न असा आहे की त्या डॉक्टरचे व मुलाचे नाते काय होते ? (ज्यांना ह्याचे उत्तर आधीच माहीत असेल, त्याने ते कृपया देऊ नये, इतर मिपाकरांना डोके खाजविण्याची संधी द्यावी ही विनंती.)

In reply to by सौन्दर्य

डॉक्टर त्या मुलाच्या आई असाव्या इथे डॉक्टर पुरुष आहे का स्त्री त्याचा उल्लेख नाहीये त्यामुळे असे असू शकेल आणि बिचाऱ्यांचा त्यांच्या आईच्या दवाखान्या जवळच अपघात झाला असावा कसला भयंकर दुर्दैवी योगायोग, पैजारबुवा,

दोन शक्यता आहेत त्यातली आता पहिली लिहीतो गाडीतून जाणारे पिता-पुत्र हे एकमेकांचे पिता-पुत्र आहेत असे काही लिहिलेले नाही त्यामुळे त्या कुठल्याही दोन व्यक्ती (वेगळ्या वयांच्या) असू शकतात किंवा आजोबा आणि मुलगा सुद्धा असू शकतात पुढे जे डॉक्टर आहेत ते अपघाती मुलाचे खरे वडील

अंदाज पिता-पुत्र .जे पिता मृत पावले,ते बेशुद्ध झालेल्या मुलाचे पिता नसून इतर मुलाचे होते.जो बेशुद्ध झाला तो खरोखरच डॉक्टरचा मुलगा असावा.

मुलाचे दोन वडील अशी परिस्थिती स्पष्ट करायची असल्यास : एक जैविक वडील आणि दुसरे ज्यांना दत्तक गेला आहे ते वडील.

नाते संबंध स्पष्ट आहे, पिता पुत्र अपघात ग्रासत,माझा पुत्र म्हणून म्हणणाऱ्या उरल्या आई.

आजच्या खेळाचे उत्तर व समारोप थोड्या वेळाने होईल ही अपेक्षा. उद्या मी एक अंकांचा खेळ देत आहे म्हणजे विषयबदल होईल. परवा अन्य कोणीही इच्छुक आपला खेळ देऊ शकेल धन्यवाद !

सर्व प्रतिसाद कर्त्यांचे खूप खूप आभार. कुमार सरांनी एक चांगला उपक्रम सुरु केल्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. सर्व साधारणपणे डॉक्टर म्हंटले म्हणजे पुरुष डॉक्टरच डोळ्यासमोर उभा राहतात, त्यामुळे ह्या कोड्यात डॉक्टर स्त्री असू शकेल व पर्यायाने त्या मुलाची आई, हेच लक्षात येत नाही. अचूक उत्तर देणार्यांचे, ज्ञानोबा, टर्मिनेटर, कर्नल तपस्वी, अभिनंदन. मुविंनी माझ्या व्यक्तिगत आयडीवर अचूक उत्तर पाठवले म्हणून त्यांचे देखील अभिनंदन.

In reply to by सौन्दर्य

हे कोडे आम्हांला 'Uncouncious bias' बद्दलच्या ट्रेनिंगमध्ये उदाहरण म्हणून दिले होते. पण त्यांच्या मते दोन्हीही उत्तरे बरोबर असू शकतात. १. आई किंवा २. डॉ. कुमार यांनी एका प्रतिसादात लिहिलं आहे तसं जैविक/ ज्यांना दत्तक गेला आहे ते वडील. तुम्ही लिहिलं आहे तसं "पुरुष डॉक्टरच डोळ्यासमोर" येतात हा एक bias , किंवा दोन्हीही पालक biological असतील म्हणून आई हे उत्तर देणं हाही एक bias असे त्यात सांगितले होते.

छान खेळ .मजा आली. रुपी विश्लेषण आवडले.

खाली काही अंक प्रत्येकी एका गटामध्ये लिहिलेले आहेत. प्रत्येक गटात ठराविकच 3 अंक का निवडले असावेत हे ओळखायचे आहे. गट अ : १, ८, ९ गट ब : २, ३ , ९ गट क : ४, ५, ७

In reply to by हेमंतकुमार

Square Root of 9 =3 4 बायका आणि 5 मुले म्हणजे सप्तस्वर्ग

In reply to by मुक्त विहारि

हे अपेक्षित उत्तर नसले तरी अशा प्रकारचे तर्क लढवणे अपेक्षित आहेच ! येऊद्यात.... :)

In reply to by हेमंतकुमार

239 457

In reply to by मुक्त विहारि

.

In reply to by मुक्त विहारि

.

In reply to by मुक्त विहारि

मग तसे अन्य अंक पण क्रमाने लिहिता येतील तेच 3.का?

In reply to by मुक्त विहारि

तुम्ही एकटेच लढताय त्याबद्दल कौतुक !

In reply to by हेमंतकुमार

आकड्यांवरून एक वाक्य आठवले 1,2,3,4,5,7,10,12,15,20,30. काही ठिकाणी, हे वाक्य चपखल बसते, मग ते शिक्षण असो किंवा शेती किंवा व्यवसाय किंवा आर्थिक नियोजन

In reply to by सुक्या

शिक्षणाच्या बाबतीत ... मग ते सुरूवात असो किंवा पदवी मिळाल्या नंतर असो ... पहिल्या वर्षी तोंडओळख ते 30 वर्षांचा अनुभव आला की यश मिळतेच मिळते ... साधारण पणे, वयाच्या 25व्या वर्षी पदवी घेतलेला मनुष्य 55व्या वर्षी, डिपार्टमेंट हेड होण्या इतपत अनुभवी झालेला असतो.(हे सर्व साधारण वाक्य आहे, काही लोकं 40 व्या वर्षीच ते ध्येय गाठतात, तर काही रिटायरमेंट झाली तरी गाठू शकत नाहीत...) ------- शेतीच्या बाबतीत, लगेच फळ देणारी झाडे (मिरची, हळद, पपई,शेवगा इत्यादी) ते चंदना सारखी 30 वर्षांनी भरपाई देणारी लागवड ------ आर्थिक बाबतीत ... लगेच परतावा ते आयुष्यभराचा ठेवा ------

३ अंकांचे एकमेकाशी गणिती नाते बघायची गरज नाही रंजक प्रकारचा खेळ आहे अंकांकडे नीट निरखून बघा आणि विचार करा

Numerology अणि spritual या दृष्टिकोनातून पाहिले तर कुठलेही कार्य पूर्ण करण्यास हे अंक एकमेकांना पूरक आहेत

सर्व अंक अक्षरांमध्ये लिहून काढा. आता प्रत्येक गटातील संख्या पहा. प्रत्येकी तिघांमधील साम्य असे आहे: गट अ: या प्रत्येक शब्दात एक स्वर आहे गट ब :या प्रत्येक शब्दात न हे व्यंजन आहे गट क : या प्रत्येक शब्दात एकही स्वर नाही आणि प्रत्येकाची सुरुवात आकारांत व्यंजनाने होते.

नवीन देऊ शकता कोणीही.

खेळ क्र. ५ मृत्यू समीप आलेला एक श्रीमंत माणूस आपली संपत्ती त्याच्या तिघांपैकी एकाच मुलाला द्यायची ठरवतो. तो तिघांना बोलवून सांगतो की तुमच्यापैकी जो सर्वात हुशार ठरेल त्यालाच माझी संपत्ती मिळेल. त्यासाठी तुम्ही असे करायचे आहे: प्रत्येकाने बाजारात जाऊन काहीतरी वस्तू आणायची आहे. ती वस्तू अशी असावी की, ज्यामुळे माझे शयनगृह पूर्ण भरून जाईल, परंतु ती वस्तू तुमच्या खिशातही मावली पाहिजे ! त्यानुसार ३ मुले बाजारात जाऊन तीन वेगळ्या वस्तू घेऊन येतात. आता तो माणूस प्रत्येक मुलाला स्वतंत्रपणे आपल्या खोलीत बोलावतो. पहिला मुलगा खोलीत गेल्यावर सांगतो की त्याने कापडाचे तुकडे आणले आहेत आणि तो खिशातून काढून ते जमिनीवर अंथरतो. त्यातून जेमतेम जमीन फक्त व्यापली जाते. नंतर दुसरा मुलगा आत येतो. तो खिशातून भरभर गवत काढतो आणि जमिनीवर पसरून दाखवतो. त्यातून तर जेमतेम निम्मी जमीनच व्यापते. शेवटी तिसरा मुलगा आत येतो आणि त्याची वस्तू दाखवतो. त्या क्षणी श्रीमंत माणसाचा निर्णय पक्का होतो की सर्व संपत्ती तिसऱ्याच मुलाला द्यायची. प्रश्न : तिसऱ्या मुलाने वडिलांना कोणती वस्तू दाखवली असेल ? स्पष्टीकरण द्या.