Skip to main content

कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 02/04/2021 या दिवशी प्रकाशित केले.
ok या विषयाचे आधीचे संदर्भ : १. हात, जंतू, पाणी आणि साबण २. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज .कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य ४. कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण ........................ पूरक विषय : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन ....... 31 डिसेंबर 2019 रोजी जागतिक बारसे झालेल्या कोविड१९ या आजाराने अद्यापही आपला पिच्छा सोडलेला नाही. मध्यंतरी काही काळ आपण त्याच्यावर कुरघोडी केल्यासारखे वाटत होते. परंतु आता तर तो विषाणू विविध अवतार बदलून आलाय. या बदललेल्या अवतारांची काही रुपे जरा जास्तच त्रासदायक होत आहेत. दरम्यान जागतिक पातळीवर लसीकरण व्यापक स्वरूपात होत आहे. औषधोपचारांच्या दृष्टीनेही संशोधन चालू आहे पण अद्याप रामबाण असा उपाय सापडलेला नाही. एकंदरीत पाहता भारतात या आजाराची दुसरी लाट आली आहे असे म्हटले जाते. काही युरोपीय देशांनी तर त्यांच्याकडे ‘तिसरी लाट’ आली असे म्हटले आहे. या लेखमालेच्या मागच्या भागामध्ये एका वाचक महोदयांनी निरोपाद्वारे अशी सूचना केली, की इथे चर्चेदरम्यान दिली जाणारी महत्त्वाची माहिती ही प्रतिसादांच्या रूपाने असल्याने ती विस्कळीत स्वरूपात राहते. तेव्हा अशी माहिती एकसंध वाचायला मिळाल्यास बरे होईल. त्यावर अन्य काही वाचकांशीही विचारविनिमय झाला. तसेही असा माहितीपर धागा सुमारे तीन महिने जुना झाला की त्याच्या चर्चेची जागा बऱ्यापैकी फुगलेली असते. त्यामुळे मागच्या पानांवर जाऊन काही बघायचे झाल्यास ते बऱ्यापैकी कष्टप्रद होते. यावर विचार करून मी असा एक पर्याय काढला आहे. मागच्या धाग्यातील चर्चेदरम्यान आलेली महत्त्वाची उपयुक्त माहिती संपादित करून इथे एकसंध स्वरूपात लिहीत आहे. त्यानेच या धाग्याची सुरुवात करतो. ही महासाथ आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला तीन आघाड्यांवर लढायचे आहे : १. लसीकरणाच्या माध्यमातून प्रतिबंध २. औषधोपचार आणि ३. सामूहिक आरोग्यशिस्त आणि प्रशासकीय उपाय. गेल्यावर्षीच्या अखेरीस विविध उत्पादकांच्या लसी बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. त्यातील काहींना संबंधित देशांच्या औषध प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर लोकांचे लसीकरण सुरू झाले. भारतातील लसीकरण साधारण जानेवारीमध्ये सुरू झाले. भारतात सध्या दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत या दोन्ही स्नायूंमध्ये इंजेक्शन द्वारा घ्यायच्या आहेत : १. कोविशिल्ड : ही ‘सिरम’ने तयार केलेली असून त्यात अन्य वाहकविषाणू आणि प्रथिन-कोड हे तंत्रज्ञान वापरले आहे. २. कोवाक्सिन : हे भारत बायोटेकने तयार केलेले असून त्यात निष्प्रभ विषाणूशी संबंधित तंत्रज्ञान वापरलेले आहे. दोन्ही लसींचे दोन डोस घ्यावयाचे आहेत. कोवाक्सिनच्या बाबतीत ते एक ते दीड महिन्याच्या अंतराने, तर कोविशिल्डच्या बाबतीत पहिल्या डोसनंतर दीड ते दोन ( जास्तीत जास्त तीन) महिन्यांपर्यंत दुसरा डोस घेतलेला चालेल, असे संबंधितांनी जाहीर केले आहे. अमेरिकेत मुख्यतः फायझर आणि मॉडरना या दोन कंपन्यांच्या लसी वापरल्या जात आहेत. त्या दोन्ही अत्याधुनिक अशा एम-आरएनए तंत्रज्ञानावर आधारित बनवल्या आहेत. त्याही इंजेक्शनद्वारच घ्यायच्या आहेत. अमेरिकेत फायझर व भारतात कोवाक्सिनच्या संदर्भात २ डोस घेऊन झाल्यानंतर तिसरा डोसच्या आवश्यकतेबाबतचे शास्त्रीय प्रयोग सुरु झालेत. कुठलीही लस परिपूर्ण नसते. त्यामुळे स्वतः लसवंत झाले तरीही संबंधित रोगजंतूचा संसर्ग होऊ शकतो. परंतु त्या परिस्थितीत लसीकरण झाल्याचे स्वतःला प्रत्यक्ष व इतरांना अप्रत्यक्ष फायदे असे मिळतात :

१. लस घेतलेल्या व्यक्तीस तो संसर्ग जर झालाच तरी त्याचा परिणाम सौम्य असतो. तिच्या शरीरात विषाणूची घनता व आक्रमकता खूप कमी राहते. २. वरील व्यक्तीद्वारा ते विषाणू पसरवण्याची शक्यता राहते, पण तिचे प्रमाण खूप कमी असते.

अर्थात इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे इतरांना होणारा रोगप्रसार थांबेल की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. या संदर्भात अमेरिकेत एक महत्त्वाचे संशोधन चालू झाले आहे. त्यामध्ये बारा हजार महाविद्यालयीन तरुणांचा समावेश केलाय. दोन टप्प्यांत त्यांना मॉडर्नाची लस दिली जाईल. त्या प्रत्येकाजवळ एक ‘इ-डायरी ऍप’ असेल. यातील प्रत्येकजण स्वतःच्या नाकातून रोज स्वाब घेईल. तसेच ठराविक काळाने त्यांचे रक्तनमुनेही तपासणी जातील. पुढच्या टप्प्यात या तरुणांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक यांचीही संबंधित तपासणी केली जाईल. सुमारे पाच महिन्यानंतर या अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील. लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर लोकांच्या वैयक्तिक अनुभवांची देवाणघेवाण होत आहे. त्यातील एक महत्वाचा मुद्दा असा: “लस दिल्यानंतर इंजेक्शनच्या जागी दुखले, जागा लाल झाली आणि थोडा ताप आला, म्हणजे ‘चांगलेच’ झाले. याचा अर्थ लस काम करीत आहे”, अशी एक सामान्य समजूत (मिथक) असते. ( नो पेन, नो गेन कन्सेप्ट). यासंदर्भात बराच शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. लसींच्या विविध प्रकारानुसार अगदी भिन्न स्वरूपाचे अनुभव आलेले आहेत. लोकांमध्ये ताप येण्याचे प्रमाण तर सहसा २५ टक्‍क्‍यांवर जात नाही. एकंदरीत विदा पाहता वरील मिथक शास्त्रीयदृष्ट्या काही सिद्ध झालेले नाही. लसीमुळे शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती ही प्रतिपिंडे (Ab) आणि T संरक्षक पेशी या दुहेरी स्वरूपाची असते. ती व्यक्तीनुसार कमीअधिक प्रमाणात निर्माण होते. आपले शरीर आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित अनेक घटकांवर ती अवलंबून असते. करोना-2 च्या जनुकीय बदलाने सुमारे १६ नवे विषाणू-अवतार अस्तित्वात आले आहेत. त्यापैकीहे पूर्वीच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहेत. त्यापैकी चौघे सद्य लसींना मध्यम प्रमाणात विरोध करणारे (evaders) आहेत, तर एक अल्प विरोध करणारा आहे. सद्य लसी या अजूनही विषाणूला भारी आहेत असे तज्ञ म्हणताहेत. पण बहुतेक मोठ्या उत्पादकांनी विषाणूच्या बदलानुसार लसीमधील तांत्रिक बदल सुरू केलेले दिसतात. शेवटी सतत बदल करत राहण्याऐवजी एकच सर्वसमावेशक (युनिव्हर्सल) लस करता येईल का, याचा उहापोह चालू आहे. इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे शरीरात केंद्रीय प्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते. परंतु श्वसनमार्गात स्थानिक प्रतिकारशक्ती फारशी निर्माण होत नाही. ही शक्ती देखील महत्वाची असते कारण मुख्यत्वे तिच्यामुळे एखाद्या व्यक्तीकडून दुसरीस होणारा रोगप्रसार आटोक्यात येतो. त्यादृष्टीने अशा काही लसींचे संशोधन सुरु आहे. भारतातील परिस्थिती अशी आहे: १. भारत बायोटेकने नाकाद्वारे घ्यायची लस बनवली असून त्याचे मानवी शास्त्रीय प्रयोग सुरू झालेले आहेत. २. प्रेमास बायोटेकने तोंडातून घ्यायच्या कॅप्सूलच्या माध्यमातून लस विकसित केली आहे. तिचे प्राणीप्रयोग यशस्वी झालेले आहेत. लसींच्या जोडीने उपचारांवरही संशोधन सातत्याने चालू आहे. त्यापैकी नवीन घडामोडी : १. १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या औषध प्रशासनाने Bamlanivimab and Etesevimab (Antibodies) या औषधांच्या संयुक्त वापराला आपत्कालीन वापराची परवानगी दिली. सौम्य ते मध्यम आजार असलेल्या रुग्णांना हे दिल्यास आजार रोखला जातो. 2. Monlupiravir : हे औषध तोंडाने घ्यायची गोळी असून त्याचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील रुग्णप्रयोग काही ठिकाणी चालू आहेत. ते औषध शरीरात गेल्यानंतर करोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबवते. अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. तोंडाने घ्यायची गोळी हा तिचा महत्त्वाचा फायदा राहील. ३. Favipiravir (गोळी) या औषधाला भारतात ‘आपत्कालीन वापराची परवानगी’ या आधीच मिळालेली आहे. काही रुग्णांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. तरीसुद्धा त्याच्या उपयोगितेचा पुरेसा विदा अजून उपलब्ध नाही. त्याच्या वापराबाबत तज्ञांत मतांतरे आहेत. रुग्णास जर मूत्रपिंडाची सहव्याधी असेल तर हे औषध काळजीपूर्वक द्यावे लागते. ४. Ivermectin : हे पूर्वापार जंतावरील औषध कोविड रुग्णांसाठी भारत आणि दक्षिण आशियात बर्‍यापैकी वापरलं जातं आणि त्याचे अनुभव चांगले आहेत. मात्र WHOने त्याचा सरसकट वापर करू नये असे म्हटले आहे; सध्या ते फक्त शास्त्रीय रुग्णप्रयोगादरम्यान वापरले जावे असे सुचविले आहे. वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींमध्ये कोविड संबंधी काही संशोधन पुढे गेलेले असल्यास संबंधित जाणकारांनी जरूर भर घालावी. महासाथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि उपचारांच्या जोडीने मूलभूत त्रिसूत्री आणि गर्दी टाळण्याची शिस्त दीर्घकाळ ठेवावी लागेल. .... तर असा आहे हा गेल्या २ महिन्यातील घडामोडींचा परामर्श. खरं म्हणजे ही महासाथ जर या वर्षाच्या प्रारंभीच बरीचशी आटोक्यात आली असती तर या विषयावरील वाढत्या चर्चेचे काही कारण नव्हते. परंतु निसर्गाला अजून तरी हे मंजूर नाही असे दिसते. त्यामुळे सध्या तरी वैज्ञानिक व संबंधित सामाजिक घटनांचा आढावा घेणे एवढे आपण करूया. नेहमीप्रमाणेच प्रश्न, पूरक माहिती आणि व्यक्तिगत अनुभव अशा विविधांगी चर्चेचे स्वागत आहे. …………………………………………………

वाचने 114773
प्रतिक्रिया 230

प्रतिक्रिया

In reply to by हेमंतकुमार

आपण स्वतचं आपली खात्री करून घेणे उत्तम.ही टेस्ट करून घेतो.

लसी चे दोन्ही डोस घेवून सुद्धा मुंबई मध्ये 62 वर्षीय स्त्री चा डेल्टा प्लस नी बळी घेतला. मधुमेह असणाऱ्या व्यक्ती नी लस घेवून सुद्धा संरक्षण मिळत नसेल तर कठीण आहे. भारतात मधुमेही लोकांची प्रचंड लोकसंख्या आहे..हल्ली तरुण मुल ,मुली पण मधुमेह ला बळी पडत आहेत.

पहिल्या लाटेत मृत्यूमुखी पडलेल्यांमधे जेष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त होते असे वाचले होते. यास्तव लसीकरणामधे जेष्ठ नागरिकांना प्रधान्य देण्यात आले अशीही उपपत्ती वाचली होती. दुसर्‍या लाटेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांमधे जेष्ठ नागरिकांचे प्रमाण घटले असे म्हणतात. हा परिणाम जर जेष्ठ नागरिकांमधील लसीकरणामुळे झाला असेल, तर लसीकरण करून घेणे योग्य समजले पाहिजे असे वाटते.

अमेरिकी औषध प्रशासनाने प्रतिकारशक्ती दुबळी झालेल्या लोकांसाठी covid-19 लसीच्या तिसऱ्या डोसची शिफारस केली आहे. या प्रकारात खालील रुग्ण मोडतात : १. इंद्रिय प्रत्यारोपण झालेले २. कर्करोग उपचार घेत असलेले ३. विविध ऑटोइम्युन आजार असलेले

In reply to by हेमंतकुमार

लसी पण बनावट ?बाजारात लस टोचून देणारे डॉक्टर तरी original आहेत का ?का ते पण बनावट.

In reply to by Rajesh188

वा राजेश वा. मानलं तुम्हाला. पण डॉ. शक्यतो लस टोचत नाही हो. शक्यतो म्हंटल बरं नाहीतर यावर पण जिलेबी पाडालं.

In reply to by हेमंतकुमार

१०९ दिवस व्हेंटिलेटर राहून पण जीव वाचला जी आनंदाची च बातमी आहे. पण १०९ दिवस व्हेंटिलेटर राहिल्या मुळे शरीराचे किती अतोनात नुकसान झाले असेल.

"कोविड - 22 असा नवा घातक variant " या मथळ्याची बातमी समाजमाध्यमांमध्ये फिरत आहे. त्यासंबंधी गैरसमज नको म्हणून हा खुलासा : विषाणूच्या संभाव्य प्रकाराला असे नाव देणे चुकीचे आहे. प्रा. साई रेड्डी यांच्या एका मुलाखतीचा चुकीचा अर्थ काढून माध्यमांनी हे पसरवले आहे. प्राध्यापक रेड्डी यांनी खालील खुलासा इथे केलेला आहे : https://www.google.com/amp/s/inews.co.uk/news/world/covid-22-new-varian… “To make it clear my statement meant to convey that I believe Covid in 2022, particularly the early part of the year (January – March) has a chance to be worse than this year, Covid in 2021

दोन महिन्यांपूर्वी इस्रायलने कोविडवर चांगला विजय मिळवला होता आणि तिथली बरीच बंधने हटवली होती .सध्या मात्र तिथे चौथी लाट जाहीर केलेली आहे. https://www.google.com/amp/s/www.theweek.co.uk/news/science-health/9539…

भारतात लशीचे दोन्ही डोस घेतल्यावर ज्या रुग्णांना कोविड होत आहे त्यांच्या लशीबाबत अधिक माहिती प्रसिद्ध केली जात आहे का ? असल्यास कुठे मिळू शकेल ? म्हणजे उदा: कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतलेल्या किती टक्के लोकांना कोविड झाला आहे ? किती टक्के लोकांचा आजा गंभीर झाला ? किती टक्के मृत्यू झालेत ? तशीच आकडेवारी कोव्हिशिल्डचीही.. मला वाटते प्रसारमाध्यमे हे लपवत आहेत. अगदी डॉ. आगरवाल यांच्या मृत्यूसंबंधित बहुतेक बातम्यांत त्यांनी घेतलेल्या लशीचा उल्लेख नव्हता.

In reply to by शाम भागवत

लसीकरण योग्य की अयोग्य किंवा हवे की नको यापेक्षा मला सांख्यिकी माहितीद्वारे कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन यांचे तुलनात्मक परिणाम जाणून घेण्यात रस आहे. पण अजून ते प्रसिद्ध केले जात नाहीयेत (कदाचित जाणूनबुजूनच?) असे दिसतेय.

लसीकरण किती उपयोगी पडेल ह्या बाबत ठाम माहिती नसताना सुद्धा लसी चे स्तोम माजवले गेले.दोन डोस घेणारे अन सुरक्षित नाहीत हे आता practically सिद्ध होत आहे लसी मुळेच व्हायरस जास्त धोकादायक झाला हे काही दिवसातच सुद्धा होईल. उपचार पद्धती पण पण चुकीची च होती हे पण सिद्ध होत च आहे. संजीवनी समजून प्रचार केलेली औषध च सरकार ban करत आहे. उपचार मुळेच लोक जास्त मृत्यू मुखी पडले असं निष्कर्ष निघू नये म्हणजे झाले.

In reply to by Rajesh188

काही पुरावे आहेत का ह्या बकबक चे. की हातात मोबाईल आणि नेट पॅक स्वस्त आहे म्हणून चालू आहे खरडणे.

In reply to by Rajesh188

दोन डोस घेणारे अन सुरक्षित नाहीत हे आता practically सिद्ध होत आहे जगातील बहुतेक सरकार आणि वैद्यकीय विचारवंत महामूर्खाच असणार ,, कारण दोन लसी घेऊन रोगाचे शेवटचे टोक गाठणे टाळता येते असेच सगळे म्हणत आहेत पण १८८ आणि थोतांड वाले गामा यांना नक्की काही तरी या सर्वांपेक्षा जास्त माहिती असणार..... धन्य

सध्याच्या महासाथीमुळे अन्य तीन महत्त्वांच्या रोगांवरील नियंत्रणही बरेच ढिले पडले आहे. हे तीन आजार म्हणजे एड्स, क्षयरोग आणि मलेरिया. यासंदर्भात सुमारे १०० गरीब देशांचा अभ्यास करून काही निष्कर्ष निघाले आहेत: https://www.nature.com/articles/d41586-021-02469-8 सद्य महासाथीमुळे सर्व आरोग्य सुविधा व संसाधने covid-19 वर केंद्रित झाल्यामुळे वरील तीन आजारांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले असून त्याचे काही दुष्परिणाम दिसून येत आहेत.

फायझर व मॉडर्नच्या कोविडविरोधी लसी या एम- आरएनए तंत्रज्ञानावर आधारित आहेत हे सर्वज्ञात आहे. या तंत्रज्ञानावर सुमारे 40 वर्षांपासून संशोधन चालू आहे. आधी त्याचा इन्फ़्लुएन्ज़ा व आता करोना विरोधात त्याचा वापर केला गेला आहे. हे संशोधन खूपच कष्टाचे ठरले आहे. पुढील महिन्यात यंदाचे नोबेल पुरस्कार जाहीर होतील. यंदा वैद्यकातील पुरस्‍कार एम-आरएनए तंत्रज्ञान संशोधकांपैकी कोणाला तरी तो मिळेल अशी जोरदार हवा आहे. त्यामुळे या संशोधनाचे मुख्य श्रेय कोणाला मिळावे हा वैज्ञानिक वादाचा मुद्दा झाला आहे. संबंधित वैज्ञानिकांचे या बाबतीतील मतभेद चव्हाट्यावर आलेले आहेत :

अमेरिकेतील ओरेगॉन राज्यातील एक ठळक घडामोड. तिथल्या एका डॉक्टरांनी या महासाथी दरम्यान स्वतः मास्क बिलकुल वापरला नाही. एवढेच नाही तर त्यांनी त्यांच्या रुग्णांनाही तो वापरू नका असा ठाम सल्ला दिला. या डॉक्टरांच्या मते सतत मास्क वापरल्याने स्वतः बाहेर सोडलेल्या कार्बन डाय ऑक्साईडचे पुन्हा श्वसन होऊन आपल्याला विषबाधा होते. महासाथी दरम्यान सर्वांनी मास्क वापरावेत हा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियम आहे. त्याचा भंग केल्याबद्दल आधी या डॉक्टरांना दहा हजार डॉलरचा दंड ठोठावण्यात आला. तरीही त्यांनी त्यांच्या व्यवसायात आपला हेका चालूच ठेवला. यापुढे जाऊन त्यांनी दमा व अन्य श्वसनविकाराच्या रुग्णांना असा सल्ला दिला, की मास्क वापरलात तर तुमचा आजार वाढेल किंवा तुम्हाला हृदयविकाराचा झटका पण येऊ शकेल. या सगळ्याची दखल घेऊन अखेर संबंधित राज्य वैद्यकीय मंडळाने या डॉक्टरांचा व्यावसायिक परवाना रद्द केला आहे. १. २.

भारताचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांच्या मते तिसरी लाट येईलच असे नाही. जरी आली तरी ती सौम्य असू शकते. नागरिकांनी आहे ती काळजी घेत राहणे उत्तम.

अजून एक मत : भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता जवळ जवळ नाही :डॉ. जेकब जॉन, नामवंत विषाणूतज्ञ

कोविड लसीच्या सक्तीकरणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्या संदर्भातील न्यायालयीन तपशील इथे आहे. त्यातील महत्त्वाचे : या सुनावणीदरम्यान भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयातर्फे एक प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले गेले. त्यानुसार कोणत्याही नागरिकाला त्याच्या इच्छेविरुद्ध ही लस देता येणार नाही. तसेच, ही लस घेतलेले आणि न घेतलेले या दोन प्रकारच्या नागरिकांमध्ये सरकारला समाजजीवनात भेदभाव करता येणार नाही.

In reply to by हेमंतकुमार

हे वाचून बरे वाटले. सक्तीने लस देणे अयोग्यच ठरेल. लशीचे इतर दीर्घकालीन परिणाम (साईड इफेक्ट्स) नेमके काय काय आहेत हे पण अजून पुर्णतः समोर आलेलं नाही. शिवाय लशींना आपत्कालीन वापराकरीता परवानगी देण्यात आली आहे. पण आपत्कालीन वापर म्हणजे नेमके काय ?

In reply to by तर्कवादी

आपत्कालीन वापर म्हणजे नेमके काय ?
चांगला प्रश्न. एखाद्या नव्या औषधाला मान्यता देताना काही टप्पे असतात. जर त्या औषधाला अंतिम स्वरूपाची मान्यता द्यायची असेल, तर त्या औषधाचे रुग्णांवर पुरेसे प्रयोग करून समाधान कारक निष्कर्ष मिळाल्याचा विदा सादर करावा लागतो. सद्यस्थितीत जेव्हा मोठी साथ आलेली असते तेव्हा तातडीने काहीतरी औषध किंवा लस देणे भाग असते. पुरेसा विदा जमा होईपर्यंत थांबता येत नाही. अशा वेळेस औषध प्रशासन जो काही थोडा विदा सादर केलेला असेल त्याला अनुसरून तात्पुरत्या वापराची मान्यता देते.

In reply to by हेमंतकुमार

आज सकाळीच कोर्टातला तपशील वाट्सॅपवर वाचायला मिळाला. आणि तेव्हाच आमच्या औरंगाबाद जिल्हाधिका-यांनी आदेश काढले की ज्यांनी कोणी लशीचा डोस घेतला नसेल त्याला राशनपाणी पेट्रोल डिझेल बंद. ( आशय असाच कमी जास्त होऊ शकतो) खात्रीसाठी संबंधित आदेश बघावा. माझ्या मनात एक विचार आला. आपण सगळेच करोनाच्या दहशतीखाली होतो. जगभर परिस्थितीही तशी झालीच होती. जगु की जगणार नाही इतका तो करोना आपल्या बोकांडी बसला होता. आत्ता थोडीशी हिम्मत वाढल्यावर असे वाटते. मिपावर एक धागा होता. करोनाची लस : एक थोतांड या धाग्याचा श्वास मोकळा करावा. असे काय झाले की झालं की एकदमच इतकं करोना कमी झाला ? अजूनही कित्येक लोक विना मास्क लशीचं वावरत आहेत. चर्चा व्हायला पाहिजे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

**असे काय झाले की झालं की एकदमच इतकं करोना कमी झाला ? >>> एकदम नाही कमी झालेला. इथे या आधी काही लिहिलं होते. https://www.misalpav.com/comment/1064648#comment-1064648 त्यानुसार मोठी लाट >> ओसरणे >> छोटी लाट >> सौम्य धुमसणे अशा टप्प्यांमध्ये तो कमी होत जातो. या कालखंडात उपचार, लसीकरण आणि सामूहिक प्रतिकारशक्ती या घटकांचाही प्रभाव पडतो

"ही लस घेतलेले आणि न घेतलेले या दोन प्रकारच्या नागरिकांमध्ये सरकारला समाजजीवनात भेदभाव करता येणार नाही." ज्या त्या देशाचा प्रश्न आहे .. पण इतर लोकशाही देशात "ज्यांनी लस घेतली आहे" आणि " ज्यांनी घेतली नाही" यांच्यात फरक केला जातो आहे .. आणि काही थोडी लोक सोडली तर बहुतेक समाज हे मान्य करतो कि असे "पॉसिटीव्ह डिस्क्रिमिनेशन " अश्या परिस्थितीत चालू शकते !

चौकस२१२,
थोतांड वाले गामा यांना नक्की काही तरी या सर्वांपेक्षा जास्त माहिती असणार..... धन्य
काही वर्षांपूर्वी तुम्ही एक धुळीचा कणही नव्हतात. त्यापासून तुमचं एका पूर्ण वाढ झालेल्या नरात रुपांतर कोणी केलं? त्यासाठी तुमच्या शरीराचं संरक्षण व्हायला हवं ना? हे संरक्षण करण्यासाठी अत्यंत अभ्युच्च व हुरहुन्नरी रक्षाव्यवस्था ( = sophisticated and versatile immune system ) हवी ना? त्या रक्षाव्यवस्थेस करोनाशी लढायची ताकद नाहीये म्हणे. कुठलंसं द्रव्य टोचल्याने तिला ती ताकद येणारे म्हणे. अंधश्रद्धेचं इतकं प्राणघातक उदाहरण दुसरं काही आहे का? असो. पांढऱ्या कपड्यातल्या आलोपाठी मेडिसिनल चर्चच्या कार्डीनलानं फतवा काढला की करोना हा सर्वभक्षी विषाणू आहे. यावर कोणीही कसलेही प्रश्न उपस्थित करयचे नाहीत. कळलं? मग केवळ पांढऱ्या कपड्यातल्या कार्डीनलाने मंत्रावलेलं पाणीच तुमचा जीव वाचवू शकतं. यावर कोणीही कसलेही प्रश्न उपस्थित करयचे नाहीत. कळलं ना? व्हेरी गुड. हे पाणी टोचून घ्यायचं असतं. जे पुण्यवान असतील ते वाचतील. जे पापी असतील ते सारे नष्ट होतील. यावर कोणीही कसलेही प्रश्न उपस्थित करयचे नाहीत. कळलं ना व्यवस्थित ? फ्लूचा विषाणू मारायला mRNA लस कशाला? mRNA म्हणजे messenger-RNA. हे जनुकोपचार ( Gene Therapy ) आहेत. विषाणू मारायला जनुकोपचार कशासाठी? डास मारायला कोणी रणगाडा आणतं का? करोना खरंच इतका घातक आहे की त्याची वारंवार चाचणी करावी लागते? आणि लोकांना सतत पटवून द्यावं लागतं की तुम्हांस रोग झालाय म्हणून? पण काये की एकदा आपलं ठरलंय की प्रश्न विचारायचेच नाहीत. फक्त विज्ञानाच्या नावाने ढोल बडवायचे. मग सगळं कसं परीकथेसारखं चानचान दिसू लागतं. नरेंद्र महाराज की त्यांचे कोणी भक्त कसलासा ताईत वा अंगठी द्यायचे. ती वस्तू परिधान केली की भक्ताचं रक्षण होतं म्हणे. तर मग प्रश्न असाय की : आलोपाठी सफेदकोटी बिशप आणि नरेंद्र महाराज यांच्यात नेमका फरक काय ? उत्तर : आलोपाठी अभिमंत्रित पाण्याने जीव जाऊ शकतो. नरेंद्र महाराजांच्या ताईताने जीव जात नसतो. आवडलं उत्तर? असो. घोड्यास पाण्यापर्यंत नेता येतं. पाणी मात्र त्याचं त्यानेच प्यायचं असतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अंधश्रद्धेचं इतकं प्राणघातक उदाहरण दुसरं काही आहे का? या आपलया प्रतिकाराला उत्तर एखाद्या वैद्यानेच दयावे ( कुमार, खरे ) ( पण मग असा व्यक्तीला तुम्ही "पांढऱ्या कपड्यातल्या आलोपाठी मेडिसिनल चर्चच्या कार्डीनल" असे बिरुद लावाल ! हे जे पालुपद आहे ना तुमचे "कि प्रश्नच विचाऱ्याला बंदी का?"... खूप झाला कांगावा एक सर्वसामान्यांचं विचारातून एवढे लोकांना समजते त्यासाठी कार्डीनल" चा फतवा लागत नाही भाऊ लस म्हणजे काय आणि ती कशी आणि कितीप उपयुक्त असू शकते यावर वर्षानुवर्षे जगभर अभ्यास झालं आहे त्याकडे दुर्लक्ष कार्याचा का ! एक साधा प्रश्न आहे अहो संपूर्ण जगातील विविध दावे आणि उजवे सगळी सरकारे या "थोतांडाला " गंडली असा तुमचा दावा आहे का? या कोविड चा दूरपुपयोग अनेकनै केला . सरकार, खाजगी उद्योग आणि व्यक्ती " आणि त्या बद्दल प्रश्न विचारायचे काहीच गैर नाही पण ते विचारताना काहीतरी तारतम्य ? हे सर्व थोतांड आहे हीच जर ठाम वृत्ती असले तर खरच "घोड्यास पाण्यापर्यंत नेता येतं. पाणी मात्र त्याचं त्यानेच प्यायचं असतं." एक काम करा भाऊ तुम्ही राहत असलेलया देशात / गावात ज्यांचे बालक किंवा पालक हे यामुळे मृत्यू पडले आहेत त्यांना जाऊन विचारा कि थोतांड आहे का हे !

कुठलंसं द्रव्य टोचल्याने तिला ती ताकद येणारे म्हणे. घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, गोवर, देवी, कांजिण्या, हिपॅटायटिस बी यांच्या लशी सुद्धा थोतांड आहेत म्हणा कि! एवढाच कशाला सर्प विष प्रतिबंधक द्रव्य सुद्धा त्याच श्रेणीत येतंय. मग काय नाग मण्यार घोणस चावल्यावर निंबाच्या पाल्यावर निजवायचं आणि अंबाबाईचा गोंधळ घालायचाय का ?

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे,
घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, गोवर, देवी, कांजिण्या, हिपॅटायटिस बी यांच्या लशी सुद्धा थोतांड आहेत म्हणा कि!
या लशींविषयी इथे माझा एक लेख आहे : https://www.misalpav.com/node/48431 अर्थात, लेख जरी माझा असला तरी तो एका पुस्तकावर आधारित आहे. ते पुस्तक डॉक्टर सुझन हम्फ्रीज व रोमन बिस्त्रीयांक या द्वयींनी लिहिलेलं आहे. डॉक्टर सुझन हम्फ्रीज या अमेरिकेतल्या खऱ्याखुऱ्या म्हणजे मेडिकल डॉक्टर असून पेशाने मूत्रपिंडतत्ज्ञा आहेत. त्यांनी लशींकरणाविषयी प्रचंड शोधाशोध करून माहिती मिळवून २०१३ साली एक पुस्तक लिहिलं आहे. पुस्तकाचं नाव : Dissolving Illusions - Disease, Vaccines, and The Forgotten History (2013) by Suzanne Humphries MD. हे पुस्तक येथे उपलब्ध आहे : https://drive.google.com/file/d/1ZAR7v0i5t62JOUqmPlWR2v90ntpJfXRD/view?… या निमित्ताने तुम्हांस व डॉक्टर कुमार१ यांना विनंती करू इच्छितो. तुम्ही व/वा कुमार१ यांनी ते वाचून त्याची चिरफाड करावी. ही विनंती मी तुम्हांस यापूर्वीही केली आहे. त्यानिमित्ताने लशींचे धोके व परिणामकारकता यांविषयी बऱ्याच कल्पना स्पष्ट होतील. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

लशींचे धोके व परिणामकारकता यांविषयी बऱ्याच कल्पना स्पष्ट होतील.
तटस्थपणे चर्चा व्हायला पाहिजे. आता तसंही जवळ जवळ आपण सर्वच मिपाकरांनी लस घेतलीय. आता आपल्याकडे परतीचे कोणतेही ऑप्शन शिल्लक नाहीत. संदर्भ, नवी माहिती त्याबद्दल अभ्यासपूर्ण चर्चा, व्हायला काही हरकत नाही असे वाटते. -दिलीप बिरुटे

चौकस२१२, १.
लस म्हणजे काय आणि ती कशी आणि कितीप उपयुक्त असू शकते यावर वर्षानुवर्षे जगभर अभ्यास झालं आहे त्याकडे दुर्लक्ष कार्याचा का !
कोण करतोय दुर्लक्ष ? उलट मी म्हणतोय की असा अभ्यास झालाय. तो डॉक्टर एलिझाबेथ हम्फ्री यांच्या पुस्तकात सविस्तर वर्णिलेला आहे. पण पुस्तक उघडून वाचणार कोण, इतकाच प्रश्न आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो : आजवर कुठल्याही लशीने कसलीही साथ आटोक्यात आलेली नाहीये. २.
एक साधा प्रश्न आहे अहो संपूर्ण जगातील विविध दावे आणि उजवे सगळी सरकारे या "थोतांडाला " गंडली असा तुमचा दावा आहे का?
हो. फक्त त्यास 'थोतांडाला गंडणे' म्हणंत नाहीत. त्यास 'जनोच्छेदक धोरण' म्हणजे genocidal policy असं म्हणतात. हा प्रकार सुमारे १०० वर्षांपूर्वीही घडला होता. मुद्दामून केलेल्या विपरीत उपचारांमुळे स्पॅनिश फ्लू ची साथ १९१८ च्या सुमारास आली होती. हे विधान १९४८ साली हेन्रीख म्युलर ( Heinrich Mueller) या गेस्टापो प्रमुखाने दिलेली कबुली आहे. संदर्भ (इंग्रजी दुवा) : http://themillenniumreport.com/2018/01/spanish-flu-a-genocide-carried-o… लेख वाचायचा असेल तर वाचा अन्यथा आपण आपल्या मर्जीचे मालक. फक्त एक प्रश्न उरतोच : तुम्हाला जिवंत राहायचं आहे की सरकारला? ३.
हे जे पालुपद आहे ना तुमचे "कि प्रश्नच विचाऱ्याला बंदी का?"... खूप झाला कांगावा
कांगावा? हे काय असतं? एक गंमत सांगतो. आंथनी फौचीने उघड कबुली दिलीये की पूर्वी दिलेल्या कोविड लशीची परिणामकारकता कमी होतेय. त्यामुळे लसधारकांची प्रतिकारक्षमता उणावतेय. हा घ्या इंग्रजी दुवा : https://www.nytimes.com/2021/11/12/podcasts/the-daily/anthony-fauci-vac… वरील लेखात waning immunity किती वेळा आलाय ते शोधा. तर मग लस घ्यायचीच कशाला? आपल्या प्रतिकारशक्तीचा ऱ्हास करवून घेण्यासाठी का? आता, यावर तुम्ही फौचीला काय प्रश्न विचाराल ? आ.न., -गा.पै.

दक्षिण आफ्रिकेतून उगम पावलेला नवा प्रकार ओमायक्रोन त्याबद्दल विविध बातम्या येऊ लागल्या आहेत. तूर्तास त्याच्यावर अभ्यास चालू आहे आणि खात्रीशीर वैज्ञानिक काहीच जाहीर झालेले नाही. या उपप्रकारामुळे काय परिणाम होतील याचा अभ्यास तीन आघाड्यांवर चालू आहे : १. त्याची प्रसारक्षमता २. आजार अथवा लसीमुळे मिळालेल्या प्रतिकारशक्तीवर तो मात करू शकतो का ? ३. त्याच्यामुळे होणाऱ्या संभाव्य आजाराची तीव्रता जशी अधिकृत माहिती मिळेल तशी या मुद्द्यांमध्ये भर घालेन. तूर्तास अधिकृत सूत्रानुसार या प्रकारामुळे निर्माण झालेल्या नव्या केसेसचा खात्रीशीर आकडा असा आहे : जगभरात एकूण 113 (दक्षिण आफ्रिका 99 बोटस्वना 6 इंग्लंड व HK प्रत्येकी २ इतर 4)

दोन लस घेउन झाल्यावरचे माझे अनुभव... मला कोव्हिड काळात [ लाट दुसरी ] कोव्हिड होउन गेल्यावर आलेले अनुभव [ कोव्हिड झाल्यावर अनुभवास आले होते तसेच ] म्हणजे गंध न समजणे, चव न समजणे [ हे हल्लीच परत झाले होते.] तसेच मला पुष्कळ सर्दी होऊ लागली आहे. मी काहीही गार पदार्थ,पाणी न घेता देखील मला सर्दी होते, या आधी असे कधीही झालेले नाही. माझ्या अंदाजाने कोव्हिड विषाणू काही काही काळाने शरीरावर परिणाम करत असावा आणि दुसर्‍या लाटेतुन शरीर मजबुत झाल्याने तसेच लसीचे डोस घेतल्याने घातक परिणाम व्हायरसला करता येत नसावा. मला २ वेळा भयानक सर्दी झाल्यावर मी ivermectin च्या गोळ्या घेतल्या आणि माझी सर्दी वेगाने कमी झाल्याचा अनुभव आहे. जाता जाता :- गेल्या काही दिवसांपासुन चीन मध्ये परत कोव्हिड [ ओमायक्रॉन नव्हे ] पसरत असल्याच्या बातम्या आणि व्हिडियो येत आहे. लॉक डाऊन लागण्याच्या आधी चीन मध्ये जी परिस्थिती होती [ २०२०] आणि त्यावेळी मी जसे व्हिडियो पाहिले आणि फॉरवर्ड केले होते जवळपास [ पूर्णपणे नाही. ] तसेच व्हिडियो आता चीन मधली परिस्थिती दर्शवतात. [ याच बरोबर चीन ने मोठ्या प्रमाणात अन्न-धान्य साठवण्यास काही काळा पासुन सुरुवात केली असुन, चीन कशाची तरी मोठ्या प्रमाणात सज्जता करत आहे याची ग्वाही त्यांची ही कृती करत आहे.] का कुणास ठावुक पण साधारण नविन वर्षातील फेब्रुवारी अखेरीस पासुन/मार्च च्या सुरवातीला आपल्या इथे परत प्रसार होईल अशी भिती वाटत आहे, ही भिती निराधार ठरावी हीच इच्छा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ना मशवरा ना राय चाहिए, ठंड बढ गई... एक ग्लास चाय चाहिए |

*भिती निराधार ठरावी हीच इच्छा. >> सहमत उत्तम आरोग्य शुभेच्छा !

“लोकल प्रवासासाठी लस सक्तीचा माजी मुख्य सचिवांनी घेतलेला निर्णय कायद्यानुसार नव्हता” ; मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी "आता सध्या नियंत्रणात आलेली करोना परिस्थिती पाहता, मुंबई उच्च न्यायालयाने आज काही टिप्पणी केली. ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की आता लोकल ट्रेन्स, मॉल या ठिकाणी जे दोन्ही लसीकरण झालेल्यांनाच केवळ प्रवेश दिला जात होता, तो निर्णय आता मागे घ्यायला हवा. आता परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे. त्यामुळे केवळ आडमुठेपणा करून राज्याचं नाव जे करोना काळात देशात नावाजलं गेलं होतं, ते नाव आता तुम्ही खराब करू नका."

जगातील अनेक देशांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट होत आहे. कोरोना महासाथीचा अंत झाला आहे, हे समजण्यासाठी नेमके कोणते निकष, संकेत असावेत याबाबत जागतिक आरोग्य संघटनेत चर्चा सुरू आहे. कोरोना महासाथ संपुष्टात आल्याची घोषणा इतक्यात तरी होणार नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. https://www.google.com/amp/s/marathi.abplive.com/news/world/coronavirus…

जगातील अनेक देशांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट होत आहे. कोरोना महासाथीचा अंत झाला आहे, हे समजण्यासाठी नेमके कोणते निकष, संकेत असावेत याबाबत जागतिक आरोग्य संघटनेत चर्चा सुरू आहे. कोरोना महासाथ संपुष्टात आल्याची घोषणा इतक्यात तरी होणार नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. https://www.google.com/amp/s/marathi.abplive.com/news/world/coronavirus…

सध्याच्या युरोपीय युद्धामुळे युक्रेनचे सुमारे 30 लक्ष निर्वासित अन्य युरोपीय देशांमध्ये जमा झालेले आहेत. त्यापैकी सुमारे निम्मी मुले आहेत. या निर्वासितांच्या अन्य प्रश्नांच्या जोडीने आरोग्य समस्याही हाताळाव्या लागताहेत. त्यादृष्टीने युरोपीय समुदायाने या मुलांच्या लसीकरणाचा कार्यक्रम हाती घ्यायचे ठरवले आहे. त्यामध्ये कोविडच्या जोडीनेच क्षयरोग, पोलिओ आणि गोवराच्या लसींचा समावेश आहे. युक्रेनमध्ये पूर्वीसुद्धा या सर्व लसी देण्याचे प्रमाण निर्धारित मानकापेक्षा कमीच होते.

दिल्ली, तामिळनाडू, हरियाणा आणि कर्नाटक या राज्य सरकारांनी सार्वजनिक ठिकाणी आणि प्रवासात पुन्हा एकदा मुखपट्टी वापराची सक्ती केलेली आहे.

In reply to by हेमंतकुमार

कोविड सुसंगत व्यवहार याची डोळसपणे चिकित्सा कुणी करणार आहे की नाही असा प्रश्न पडतो. उदाहरणंच घेऊ या. निर्जंतुकीकरण सक्ती: या मध्ये ठराविक वेळेनंतर मुक्त हस्ताने द्रव फवारले जाते. हे चिकट द्रव अजूनच धूळ आणि सूक्ष्म जीव धरून ठेऊन इतर आरोग्याच्या समस्या निर्माण करत असतील. ऑफिस फर्निचर साबणाच्या पाण्याने पुसून नंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाकता येणार नाही का? लिफ्ट, हॉटेल मधील टेबल, आणि ऑफिस फर्निचर या प्रकारे जास्त स्वच्छ ठेवता येईल. विक्रेता आणि ग्राहक यामध्ये मोठ्या पोलिथिलिनच्या शिटचा पडदा: याने कोंदटपणा वाढून उलट रोग पसरण्यास मदत होईल ना? वातानुकूलन कमी अथवा बंद करने: याने हवेतील ऊच्छवासामुळे निर्माण होणारी आर्द्रता वाढून रोग तीव्रतेने पसरू शकतो. मुखपट्टीची सक्ती: या सक्तीमुळे बाहेर टाकलेली हवाच परत मोठ्या प्रमाणावर शरीरात जाऊन प्राणवायूची कमतरता निर्माण होऊ शकते. मुखपट्टीच बऱ्याचवेळा इतकी मळकी असते की विचारू नका. दोन वर्षानंतर कोविड सुसंगत मार्गदर्शक तत्त्वांची चिकित्सा झाल्यास बरे या हेतूने हा प्रतिसाद देत आहे.

In reply to by सर टोबी

१. निर्जंतुकीकरण सक्ती >>> रसायनांचे उठसूट फवारे अनावश्यक. त्यातून एलर्जीच्या समस्या वाढतात. माझ्या घरी असे कुठलेही रसायन नाही. गेली तीन वर्षे फक्त साबण वापरून हात धुतले आहेत. २. पोलिथिलिनच्या शिटचा पडदा: काही फायदा होतो असे वाटत नाही ३. वातानुकूलन >>> मुळातच यापेक्षा खिडक्या उघड्या व पंखा किंवा कुलर बरे असे माझे मत आणि माझी व्यक्तिगत पसंती. ४. मुखपट्टीची सक्ती >>>या विषयावर मी या लेखमालेत यापूर्वीच्या भागांमध्ये सविस्तर लिहिले असल्याने आता पुनरावृत्ती करत नाही.

बरोबर तीन वर्षांपूर्वी (31/ 12/ 2019) covid-19 या आजाराचे जागतिक पातळीवर नामकरण झाले. आज अखेरीस चीन वगळता अन्य बर्‍याच देशांमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. पुन्हा एकदा थोडीफार प्रवास बंधने, चाचण्या इत्यादी गोष्टी लागू झाल्यात. 2023 च्या उत्तरार्धापर्यंत तरी ही महासाथ पूर्णपणे संपावी अशी सदिच्छा व्यक्त करतो.

१. सध्या जगभरात असलेल्या या आजारात Omicron (XBB.1.5) हा प्रकार सर्वाधिक आढळतो. त्याची संसर्गक्षमता आतापर्यंतच्या सर्व प्रकारांपेक्षा अधिक आहे. २. मात्र त्याने बाधित रुग्णांमध्ये चव आणि वास याच्यावर सहसा परिणाम होत नाही. ३. या प्रकारामुळे अमेरिकेत एकदम रुग्णवाढ झालेली दिसते ४. लांब पडल्याच्या विमान प्रवासांमध्ये प्रवाशांनी मुखपट्टी वापरावीच असा जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला ५. 27 जानेवारीला संघटनेची महत्त्वाची बैठक. त्यात कोविड-19 ‘आणीबाणी’च्या समाप्तीची घोषणा करायची की नाही, यावर महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाईल.

वर उल्लेख केलेल्या डब्ल्यूएचओच्या बैठकीचा सविस्तर वृत्तांत इथे आहे Covid-19 ची महासाथ संध्या संक्रमण अवस्थेत आहे. अजूनही आरोग्य आणीबाणीची परिस्थिती चालू ठेवावी असे त्यात म्हटले आहे.

कोविड्ची फेज उलटुन गेल्यानंतर अनेकांना सांधे दुखीचा त्रास जाणवत आहे असे ऐकीवात आहे . या त्रासाला avascular narcosis असे म्हणले जाते . यामुळे गुडघेदुखी किंवा मानेचे दुखणे अनेकांना झाले आहे .

In reply to by सिरुसेरि

avascular narcosis
सर्वप्रथम हा शब्द सुधारून घेतो: Avascular necrosis (necrosis =पेशींचा मृत्यू) खरे आहे की अशा प्रकारचे काही रुग्ण आढळलेले आहेत. १. प्रामुख्याने हा त्रास अशा रुग्णांना झाला आहे की ज्यांना स्टिरॉइड्स अधिक प्रमाणात आणि अधिक काळ द्यावी लागली होती. अधिकतर हा त्रास मांडीच्या हाडाच्या खुब्यातील भागाला होतो. २. काही रुग्णांच्या बाबतीत ती न देताही समस्या उद्भवलेली आहे. अर्थात यावर अधिक संशोधन झाल्यावरच चित्र स्पष्ट होईल.

माणसांना होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी सुमारे 60 टक्के आजार विविध प्राण्यांकडून सूक्ष्मजंतू संक्रमित झाल्याने होतात ( बहुतांश जंगली प्राण्यांकडून). सध्याच्या महासाथीच्या मुळाशी चीनमधील वटवाघळे (Horseshoe bats) असल्याचे म्हटले जाते. यापुढची महासाथ उद्भवण्याची शक्यता कधी आहे, हा यक्षप्रश्न वैज्ञानिकांना सतावतो आहे. त्या दृष्टिकोनातून वटवाघळांच्या विशिष्ट प्रजातींचा (fruit bats) एक महत्वाकांक्षी अभ्यास हाती घेण्यात आलेला आहे. निसर्गतःच वटवाघळे स्वतःमध्ये विविध विषाणूंचा साठा उत्तम रीतीने करतात. त्या विषाणूंपासून त्यांना आजार होत नाही. मात्र त्यांच्या शरीरातून ते विषाणू माणसात संक्रमित झाल्यास आपल्याला विविध गंभीर आजार होतात. अशा प्रकारचे संक्रमण होण्यास खालील गोष्टी कारणीभूत असाव्यात: १. टोकाचे हवामान बदल २. जंगलतोड आणि तिथे चाललेला एकंदरीत मानवी हस्तक्षेप. अशा हस्तक्षेपामुळे वटवाघळांचे अन्नशोधासाठी मानवी वस्तीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. प्रस्तुत संशोधन प्रकल्पात जमैकातील वटवाघळे अमेरिकेत आणली जाणार आहेत. त्यांना विविध प्रकारचे खाद्य दिले जाईल तसेच काही प्रकारचे विषाणू त्यांच्या शरीरात सोडले जातील. त्यानंतर त्यांचा सखोल शारीरिक अभ्यास केला जाईल. या सगळ्यातून आपल्याला साथरोगांच्या प्रतिबंधासाठी काय करता येईल याचा अंदाज येईल.. या प्रकल्पात सात देशांमधील सत्तर वैज्ञानिक सहभागी होत आहेत. १. २.

माणसांना होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी सुमारे 60 टक्के आजार विविध प्राण्यांकडून सूक्ष्मजंतू संक्रमित झाल्याने होतात ( बहुतांश जंगली प्राण्यांकडून). सध्याच्या महासाथीच्या मुळाशी चीनमधील वटवाघळे (Horseshoe bats) असल्याचे म्हटले जाते. यापुढची महासाथ उद्भवण्याची शक्यता कधी आहे, हा यक्षप्रश्न वैज्ञानिकांना सतावतो आहे. त्या दृष्टिकोनातून वटवाघळांच्या विशिष्ट प्रजातींचा (fruit bats) एक महत्वाकांक्षी अभ्यास हाती घेण्यात आलेला आहे. निसर्गतःच वटवाघळे स्वतःमध्ये विविध विषाणूंचा साठा उत्तम रीतीने करतात. त्या विषाणूंपासून त्यांना आजार होत नाही. मात्र त्यांच्या शरीरातून ते विषाणू माणसात संक्रमित झाल्यास आपल्याला विविध गंभीर आजार होतात. अशा प्रकारचे संक्रमण होण्यास खालील गोष्टी कारणीभूत असाव्यात: १. टोकाचे हवामान बदल २. जंगलतोड आणि तिथे चाललेला एकंदरीत मानवी हस्तक्षेप. अशा हस्तक्षेपामुळे वटवाघळांचे अन्नशोधासाठी मानवी वस्तीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. प्रस्तुत संशोधन प्रकल्पात जमैकातील वटवाघळे अमेरिकेत आणली जाणार आहेत. त्यांना विविध प्रकारचे खाद्य दिले जाईल तसेच काही प्रकारचे विषाणू त्यांच्या शरीरात सोडले जातील. त्यानंतर त्यांचा सखोल शारीरिक अभ्यास केला जाईल. या सगळ्यातून आपल्याला साथरोगांच्या प्रतिबंधासाठी काय करता येईल याचा अंदाज येईल.. या प्रकल्पात सात देशांमधील सत्तर वैज्ञानिक सहभागी होत आहेत. १. २.

11 मार्च 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने covid-19 या आजाराची आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती. त्याला नुकतीच तीन वर्षे पूर्ण झाली. काल अखेरीस ढोबळमानाने परिस्थिती अशी आहे : एकूण संसर्ग झालेल्या व्यक्ती : 68 कोटी आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्ती : 65 कोटी कोविड संबंधित मृत्यू : 68 लाख

कोविडमुळे बाधितांच्या वास घेण्याच्या क्षमतेवर दीर्घकालीन परिणाम झाल्यास आढळले आहे. या संदर्भात पुण्यातील IISER या संस्थेतील डॉ. निक्सन अब्राहम यांच्या नेतृत्वाखालील चमू आणि बी. जे. मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त सहकार्याने एक महत्त्वाचा संशोधन प्रकल्प पार पडला. लक्षणविरहित असणाऱ्या बाधित 80 टक्के लोकांमध्ये वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम झालेला आढळला. या संशोधनादरम्यान वरील चमूने वासक्षमता मोजण्याचे olfactometer हे उपकरण देखील विकसित केले.

कोविड- आरोग्य आणीबाणी आता संपली आहे. WHO ची घोषणा अर्थात अजून काही काळ लोक बाधित होत राहतील; योग्य ती काळजी आवश्यक.

गेल्या 24 तासात बहुतेक इ-वृत्तमाध्यमातून खालील प्रकारचा मथळा झळकतो आहे :
“'डिजीज X' आहे तरी काय? जगावर घोंगावतोय महामारीचा धोका; WHO नं जारी केलाय अलर्ट”
हे वाचून विचलित व्हायचे किंवा दडपून जायचे काही कारण नाही. सन 2018 मध्येच जागतिक आरोग्य संघटनेने, ‘भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या विषाणूजन्य साथींसाठी’ “डिसीज एक्स” (माहित नसलेले) हे नामकरण करून ठेवलेले आहे. हे संबोधन कुठल्याही विशिष्ट एका आजारासाठी नसून संभाव्य आजारांच्या गटासाठी आहे. जसजसे नवे विषाणू सापडत जातील ते सर्व या एक्स पंथातील घटक राहतील. किंबहुना कोविड-19 घडविणारा विषाणू या पंथातील पहिला घटक होता.

30 जानेवारी 2020 रोजी भारतातील खात्रीशीर निदान झालेला पहिला कोविड19 रुग्ण आढळला होता. गेल्या तीन वर्षात कोविडबाधितांची सेवा करताना अनेक डॉक्टर्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कर्तव्य बजावताना (आणि रुग्णांनाही) मृत्यू आला होता. त्याप्रित्यर्थ भारतात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विविध शाखांतर्फे 30 जानेवारी हा कोविड हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. अभिवादन !

In reply to by हेमंतकुमार

अभिवादन. सर्व डॉक्टर, सेवा कर्मचारी, सफाई कामगार, गरजेच्या सेवा देणारे इतर सर्व... सर्वांनाच अभिवादन !

जर्मनीतील एका 62 वर्षीय माणसाने कोविड लस एकूण 217 वेळा घेतल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्यापैकी 130 वेळा घेतल्याचा कायदेशीर पुरावा आहे. वैज्ञानिकांनी या माणसावर काही चाचण्या करून त्याच्या प्रतिकारक्षमतेचा सखोल अभ्यास केला. त्यातून असे दिसले, की त्याच्या मूलभूत प्रतिकारशक्तीवर कोणताही परिणाम (चांगला अथवा वाईट) झालेला नाही. हे एक अजब प्रकरण आहे खरे !