Skip to main content

कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 02/04/2021 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
ok या विषयाचे आधीचे संदर्भ : १. हात, जंतू, पाणी आणि साबण २. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज .कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य ४. कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण ........................ पूरक विषय : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन ....... 31 डिसेंबर 2019 रोजी जागतिक बारसे झालेल्या कोविड१९ या आजाराने अद्यापही आपला पिच्छा सोडलेला नाही. मध्यंतरी काही काळ आपण त्याच्यावर कुरघोडी केल्यासारखे वाटत होते. परंतु आता तर तो विषाणू विविध अवतार बदलून आलाय. या बदललेल्या अवतारांची काही रुपे जरा जास्तच त्रासदायक होत आहेत. दरम्यान जागतिक पातळीवर लसीकरण व्यापक स्वरूपात होत आहे. औषधोपचारांच्या दृष्टीनेही संशोधन चालू आहे पण अद्याप रामबाण असा उपाय सापडलेला नाही. एकंदरीत पाहता भारतात या आजाराची दुसरी लाट आली आहे असे म्हटले जाते. काही युरोपीय देशांनी तर त्यांच्याकडे ‘तिसरी लाट’ आली असे म्हटले आहे. या लेखमालेच्या मागच्या भागामध्ये एका वाचक महोदयांनी निरोपाद्वारे अशी सूचना केली, की इथे चर्चेदरम्यान दिली जाणारी महत्त्वाची माहिती ही प्रतिसादांच्या रूपाने असल्याने ती विस्कळीत स्वरूपात राहते. तेव्हा अशी माहिती एकसंध वाचायला मिळाल्यास बरे होईल. त्यावर अन्य काही वाचकांशीही विचारविनिमय झाला. तसेही असा माहितीपर धागा सुमारे तीन महिने जुना झाला की त्याच्या चर्चेची जागा बऱ्यापैकी फुगलेली असते. त्यामुळे मागच्या पानांवर जाऊन काही बघायचे झाल्यास ते बऱ्यापैकी कष्टप्रद होते. यावर विचार करून मी असा एक पर्याय काढला आहे. मागच्या धाग्यातील चर्चेदरम्यान आलेली महत्त्वाची उपयुक्त माहिती संपादित करून इथे एकसंध स्वरूपात लिहीत आहे. त्यानेच या धाग्याची सुरुवात करतो. ही महासाथ आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला तीन आघाड्यांवर लढायचे आहे : १. लसीकरणाच्या माध्यमातून प्रतिबंध २. औषधोपचार आणि ३. सामूहिक आरोग्यशिस्त आणि प्रशासकीय उपाय. गेल्यावर्षीच्या अखेरीस विविध उत्पादकांच्या लसी बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. त्यातील काहींना संबंधित देशांच्या औषध प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर लोकांचे लसीकरण सुरू झाले. भारतातील लसीकरण साधारण जानेवारीमध्ये सुरू झाले. भारतात सध्या दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत या दोन्ही स्नायूंमध्ये इंजेक्शन द्वारा घ्यायच्या आहेत : १. कोविशिल्ड : ही ‘सिरम’ने तयार केलेली असून त्यात अन्य वाहकविषाणू आणि प्रथिन-कोड हे तंत्रज्ञान वापरले आहे. २. कोवाक्सिन : हे भारत बायोटेकने तयार केलेले असून त्यात निष्प्रभ विषाणूशी संबंधित तंत्रज्ञान वापरलेले आहे. दोन्ही लसींचे दोन डोस घ्यावयाचे आहेत. कोवाक्सिनच्या बाबतीत ते एक ते दीड महिन्याच्या अंतराने, तर कोविशिल्डच्या बाबतीत पहिल्या डोसनंतर दीड ते दोन ( जास्तीत जास्त तीन) महिन्यांपर्यंत दुसरा डोस घेतलेला चालेल, असे संबंधितांनी जाहीर केले आहे. अमेरिकेत मुख्यतः फायझर आणि मॉडरना या दोन कंपन्यांच्या लसी वापरल्या जात आहेत. त्या दोन्ही अत्याधुनिक अशा एम-आरएनए तंत्रज्ञानावर आधारित बनवल्या आहेत. त्याही इंजेक्शनद्वारच घ्यायच्या आहेत. अमेरिकेत फायझर व भारतात कोवाक्सिनच्या संदर्भात २ डोस घेऊन झाल्यानंतर तिसरा डोसच्या आवश्यकतेबाबतचे शास्त्रीय प्रयोग सुरु झालेत. कुठलीही लस परिपूर्ण नसते. त्यामुळे स्वतः लसवंत झाले तरीही संबंधित रोगजंतूचा संसर्ग होऊ शकतो. परंतु त्या परिस्थितीत लसीकरण झाल्याचे स्वतःला प्रत्यक्ष व इतरांना अप्रत्यक्ष फायदे असे मिळतात :

१. लस घेतलेल्या व्यक्तीस तो संसर्ग जर झालाच तरी त्याचा परिणाम सौम्य असतो. तिच्या शरीरात विषाणूची घनता व आक्रमकता खूप कमी राहते. २. वरील व्यक्तीद्वारा ते विषाणू पसरवण्याची शक्यता राहते, पण तिचे प्रमाण खूप कमी असते.

अर्थात इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे इतरांना होणारा रोगप्रसार थांबेल की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. या संदर्भात अमेरिकेत एक महत्त्वाचे संशोधन चालू झाले आहे. त्यामध्ये बारा हजार महाविद्यालयीन तरुणांचा समावेश केलाय. दोन टप्प्यांत त्यांना मॉडर्नाची लस दिली जाईल. त्या प्रत्येकाजवळ एक ‘इ-डायरी ऍप’ असेल. यातील प्रत्येकजण स्वतःच्या नाकातून रोज स्वाब घेईल. तसेच ठराविक काळाने त्यांचे रक्तनमुनेही तपासणी जातील. पुढच्या टप्प्यात या तरुणांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक यांचीही संबंधित तपासणी केली जाईल. सुमारे पाच महिन्यानंतर या अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील. लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर लोकांच्या वैयक्तिक अनुभवांची देवाणघेवाण होत आहे. त्यातील एक महत्वाचा मुद्दा असा: “लस दिल्यानंतर इंजेक्शनच्या जागी दुखले, जागा लाल झाली आणि थोडा ताप आला, म्हणजे ‘चांगलेच’ झाले. याचा अर्थ लस काम करीत आहे”, अशी एक सामान्य समजूत (मिथक) असते. ( नो पेन, नो गेन कन्सेप्ट). यासंदर्भात बराच शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. लसींच्या विविध प्रकारानुसार अगदी भिन्न स्वरूपाचे अनुभव आलेले आहेत. लोकांमध्ये ताप येण्याचे प्रमाण तर सहसा २५ टक्‍क्‍यांवर जात नाही. एकंदरीत विदा पाहता वरील मिथक शास्त्रीयदृष्ट्या काही सिद्ध झालेले नाही. लसीमुळे शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती ही प्रतिपिंडे (Ab) आणि T संरक्षक पेशी या दुहेरी स्वरूपाची असते. ती व्यक्तीनुसार कमीअधिक प्रमाणात निर्माण होते. आपले शरीर आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित अनेक घटकांवर ती अवलंबून असते. करोना-2 च्या जनुकीय बदलाने सुमारे १६ नवे विषाणू-अवतार अस्तित्वात आले आहेत. त्यापैकीहे पूर्वीच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहेत. त्यापैकी चौघे सद्य लसींना मध्यम प्रमाणात विरोध करणारे (evaders) आहेत, तर एक अल्प विरोध करणारा आहे. सद्य लसी या अजूनही विषाणूला भारी आहेत असे तज्ञ म्हणताहेत. पण बहुतेक मोठ्या उत्पादकांनी विषाणूच्या बदलानुसार लसीमधील तांत्रिक बदल सुरू केलेले दिसतात. शेवटी सतत बदल करत राहण्याऐवजी एकच सर्वसमावेशक (युनिव्हर्सल) लस करता येईल का, याचा उहापोह चालू आहे. इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे शरीरात केंद्रीय प्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते. परंतु श्वसनमार्गात स्थानिक प्रतिकारशक्ती फारशी निर्माण होत नाही. ही शक्ती देखील महत्वाची असते कारण मुख्यत्वे तिच्यामुळे एखाद्या व्यक्तीकडून दुसरीस होणारा रोगप्रसार आटोक्यात येतो. त्यादृष्टीने अशा काही लसींचे संशोधन सुरु आहे. भारतातील परिस्थिती अशी आहे: १. भारत बायोटेकने नाकाद्वारे घ्यायची लस बनवली असून त्याचे मानवी शास्त्रीय प्रयोग सुरू झालेले आहेत. २. प्रेमास बायोटेकने तोंडातून घ्यायच्या कॅप्सूलच्या माध्यमातून लस विकसित केली आहे. तिचे प्राणीप्रयोग यशस्वी झालेले आहेत. लसींच्या जोडीने उपचारांवरही संशोधन सातत्याने चालू आहे. त्यापैकी नवीन घडामोडी : १. १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या औषध प्रशासनाने Bamlanivimab and Etesevimab (Antibodies) या औषधांच्या संयुक्त वापराला आपत्कालीन वापराची परवानगी दिली. सौम्य ते मध्यम आजार असलेल्या रुग्णांना हे दिल्यास आजार रोखला जातो. 2. Monlupiravir : हे औषध तोंडाने घ्यायची गोळी असून त्याचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील रुग्णप्रयोग काही ठिकाणी चालू आहेत. ते औषध शरीरात गेल्यानंतर करोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबवते. अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. तोंडाने घ्यायची गोळी हा तिचा महत्त्वाचा फायदा राहील. ३. Favipiravir (गोळी) या औषधाला भारतात ‘आपत्कालीन वापराची परवानगी’ या आधीच मिळालेली आहे. काही रुग्णांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. तरीसुद्धा त्याच्या उपयोगितेचा पुरेसा विदा अजून उपलब्ध नाही. त्याच्या वापराबाबत तज्ञांत मतांतरे आहेत. रुग्णास जर मूत्रपिंडाची सहव्याधी असेल तर हे औषध काळजीपूर्वक द्यावे लागते. ४. Ivermectin : हे पूर्वापार जंतावरील औषध कोविड रुग्णांसाठी भारत आणि दक्षिण आशियात बर्‍यापैकी वापरलं जातं आणि त्याचे अनुभव चांगले आहेत. मात्र WHOने त्याचा सरसकट वापर करू नये असे म्हटले आहे; सध्या ते फक्त शास्त्रीय रुग्णप्रयोगादरम्यान वापरले जावे असे सुचविले आहे. वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींमध्ये कोविड संबंधी काही संशोधन पुढे गेलेले असल्यास संबंधित जाणकारांनी जरूर भर घालावी. महासाथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि उपचारांच्या जोडीने मूलभूत त्रिसूत्री आणि गर्दी टाळण्याची शिस्त दीर्घकाळ ठेवावी लागेल. .... तर असा आहे हा गेल्या २ महिन्यातील घडामोडींचा परामर्श. खरं म्हणजे ही महासाथ जर या वर्षाच्या प्रारंभीच बरीचशी आटोक्यात आली असती तर या विषयावरील वाढत्या चर्चेचे काही कारण नव्हते. परंतु निसर्गाला अजून तरी हे मंजूर नाही असे दिसते. त्यामुळे सध्या तरी वैज्ञानिक व संबंधित सामाजिक घटनांचा आढावा घेणे एवढे आपण करूया. नेहमीप्रमाणेच प्रश्न, पूरक माहिती आणि व्यक्तिगत अनुभव अशा विविधांगी चर्चेचे स्वागत आहे. …………………………………………………

वाचने 114864
प्रतिक्रिया 230

प्रतिक्रिया

In reply to by Bhakti

सामूहिक प्रतिकारशक्ती हा अगदी किचकट विषय आहे. मुळात तो एक गणिती अंदाज असतो. जेव्हा विषाणूचा संसर्ग दर एक लाख लोकांमागे फक्त एक व्यक्ती इतका कमी होतो, तेव्हा आपण हा आजार काबूत ठेवला आहे असे म्हणता येईल. सध्या इसराइल त्या अवस्थेत आहे( ०.८ प्रति एक लाख लोक). किती टक्के लसीकरणाने अशी शक्ती येईल हे कोविडबाबत वादग्रस्त झालेले आहे. उदाहरणार्थ अमेरिकेसंबंधी हा एक दुवा आहे : Reaching ‘Herd Immunity’ Is Unlikely in the U.S., Experts Now Believe https://www.nytimes.com/2021/05/03/health/covid-herd-immunity-vaccine.h…

In reply to by हेमंतकुमार

सध्या इसराइल त्या अवस्थेत आहे( ०.८ प्रति एक लाख लोक). तिथे ही अवस्था ,उपलब्धी अशीच राहो जेणेकरून कोवीड युद्धासाठी एक उत्तम उदाहरण होईल. https://www.bbc.com/news/health-56722186

च्यायला, या करोना महामारीच्या. करोना घडामोडींनी प्रत्येक दिवशी काही तरी नवीन येतं. भारतात गेल्या ऑक्टोंबरात सापडलेल्या करोनाचा बी. १.६१७ हा उत्परिवर्तीत विषाणू वेगाने पसरत असून त्यामुळे जगभरातच जोखीम झाली आहे. (अधिक वृत्त) -दिलीप बिरुटे

बी १.६१७ बद्दल वैज्ञानिकांत मतभेद आहेत. दुसरी बाजू : १. या प्रकारात एकूण पंधरा जनुकीय बदल झालेले आहेत. त्यापैकी ठराविक दोघांचा ठळकपणे उल्लेख करून त्याला ‘डबल mutant’ असे चुकीचे नाव माध्यमांनी रूढ केले. २. आता वरील जे दोन बदल आहेत त्यातील एक जुनाच (कॅलिफोर्नियावाला) आहे. तर दुसऱ्या बदलाचे जीवशास्त्रीयदृष्ट्या विशेष महत्त्व नाही. ३. म्हणून बी १.६१७ मुळेच भारतातील दुसरी लाट जोरात पसरली का, हे ठामपणे म्हणता येत नाही. या प्रकाराला गरजेपेक्षा जास्त प्रसिद्धी दिली गेली आहे.

हा विषाणु उपप्रकार भारतिया आहे आणि जणु मोदि जबाबदार आहेत अशी जागतिक बदनमी झाली तर हवीच आहे. चीन ने कधिही विषाणु फैलावाची जबाबदारी घेतली नाही. आपले मोदी राजकिया विरोधक बाहेरच्या देशात मुलाखती देउन देउन देशाची बदनांमी करुन घेतील. खरतर माझ्यासारख्या सामन्य व्यक्तीला असा प्रश्न कायम पडतोय की २०२० ल साथ आटोक्यात होती म्हणजे भारतियान्ची प्रतिकार्शक्ती नक्किच चान्गली आहे. भारताच अपेक्शीत नुकसान होत नाही म्हणुन जनुकिया बदल करुन नवीन उपप्रकार तयार झाला असावा का?(नैसर्गिक, अनैसर्गिक?) शेवटी विज्ञान असल तरी काही गोष्टिन्चा उलगडा होणे ही वेळ लागणारी प्रक्रिया आहे.

दिव्यकिर्ती म्हणून व्लॉगरचा एक युट्यूब व्हिडीओ आला आहे. अफवां आणि चुकीची माहिती पसरवण्यापासून वाचण्याच महत्व या गृहस्थांनी छान विषद केल आहे. वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडणे आणि सुपरस्प्रेडर इव्हेंट यावरून सरकारवरही टिका आहे पण जबाबदारीने केलेली टिका आहे. सोबत समाजाच्या बेजबाबदारपणावरही बोट ठेवले आहे. या युट्यूबमध्ये ०.०१ ते १८ हा वयोगटाकडे दुर्लक्ष करण्यामुळे वीषाणू नियंत्रण कठीण रहाण्याचा मुद्याकडे लक्ष वेधले आहे आणि आणखीही काही मुद्द्यांकडे चांगले लक्ष वेधले आहे. युट्यूब मधील कायमस्वरूपी वीषाणू हाकलून लावण्या बद्दल सूर अंशतः अटळतावादी वाटला त्यांचा अटळतावाद तेवढा योग्य वाटला नाही. टोकाच्या अटळतावादामुळे जन सहाकार्य आणि वैश्विक सहकार्य कमी रहाण्याचा धोका संभवू शकतो.

माहितीबद्दल आभार !

https://www.loksatta.com/desh-videsh-news/covishield-vaccine-central-go… कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर पूर्वी ४ ते ६ आठवडे होते. त्यानंतर ते वाढवून ६ ते ८ आठवडे आणि आता पुन्हा वाढवून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या दोन डोसमधील गॅपमागचं लाॅजिक काय आहे? जर १२ ते १६ आठवड्यांचा गॅप चालत असेल तर अगोदर हा गॅप कमी का होता?

कोविशील्डच्या अधिकृत माहितीपत्रकानुसार सुरुवातीस दोन मात्रामधले अंतर चार ते सहा आठवडे असे होते. परंतु परदेशात झालेल्या अभ्यासानुसार, ते बारा आठवड्यांपर्यंत ठेवल्यास अधिक प्रतिकारशक्ती मिळते असा विदा त्यांच्याकडे होता. मात्र आता आपल्याकडे जे सोळा आठवड्यापर्यंत केले आहे त्यासंबंधीचे शास्त्रीय कारण माहीत नाही.

In reply to by हेमंतकुमार

मात्र आता आपल्याकडे जे सोळा आठवड्यापर्यंत केले आहे त्यासंबंधीचे शास्त्रीय कारण माहीत नाही.
त्यामागे लसींचा तुटवडा हे अशास्त्रीय कारण असावे :)

In reply to by प्रचेतस

शक्यता तीच वाटतेय. किंवा लोकांची तशी समजूत होण्याचा धोका आहे. दुसरा डोस ६ ते ८ आठवड्यात घेतला नाही तर दोन्ही डोस पुन्हा घ्यावे लागतील असे मधे ऐकिवात होते. आता ३-४ महिन्याचा गॅप चालेल म्हणतायत. जर हा गॅप नक्की चालत असेल तर ठीक नाहीतर दोन्ही डोस मिळालेली जनता परत मोकाट उंडरायला मोकळी आणि प्रत्यक्षात प्रतिकारक्षमता जास्त नसल्याने अजून एक दोन लाटा यायच्या.

Ivermectin : मतभिन्नता भारतात गोवा आणि उत्तराखंड या दोन राज्यांच्या सरकारांनी तेथील लोकांना हे औषध प्रतिबंधात्मक म्हणून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. गोव्यात ते 18 वर्षावरील लोकांना तर उत्तराखंडमध्ये दोन वर्षावरील सर्वांना (गरोदर व स्तन्यदा सोडून) देण्याचे ठरले आहे. डब्ल्यूएचओ आणि खुद्द या औषधाची निर्माती कंपनी Merck यांनी हे औषध कोविड संदर्भात देण्यास विरोध दर्शविला आहे !

In reply to by राहुल मराठे

श्री. राहुल मराठे, लेख खूपच रोचक आणि माहितीपूर्ण आहे. मागच्या वर्षीच्या साथ काळात एका परिचयातील रिटायर्ड इंजिनीयर प्राध्यापक महोदय मास्क न बांधलेल्या अवस्थेत भेटले असता मी त्यांना मास्क बांधण्यास सुचवल्यावर त्यांनी मला पाच मायक्रॉनचाच फंडा देऊन ते वीषाणू गुरुत्वाकर्षाणाने जमिनीवर जातात असा फंडा दिला . मी हा लेख तेव्हा वाचलेला नव्हता पण सर्वसाधारण हवा पुरेशा वजनाच्या जसे की पाला पाचोळा वस्तुही बर्‍यापैकी दूर नेते आणि गुर्त्वाकर्षणाचा प्रभाव नंतर येतो हे प्राध्यापक महोदयांना सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी माझे म्हणणे मनावर घेतले नाही. एनीवे हाँगकाँगने अधिक यशस्वीपणे व्हायरस मॅनेजमेंटसाठी व्हेंटीलीएशन वर लक्ष पुरवले व्हेंटीलीएशनच्या मुद्याबद्दल फारशी जनजागृती नाही भारतातील कोट्यावधी शॉप्स आस्थापना असंख्य जागांमध्ये व्हेंटीलिएशनची काळजी घेतलेली नसते. लोकही या मुद्द्याबाबत अलर्ट नसतात. भारतातील लसीकरण पूर्ण होई होई पर्यंत तिसरी लाट येऊन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोविडोत्तर बुरशीजन्य आजार एव्हाना सर्वांच्या परिचयाचा आहे. कोविडमुळे प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते आणि त्यानंतर अन्य प्रकारचे सूक्ष्मजंतूही पेशींवर हल्ला करू शकतात. अशाच जंतूपैकी Cytomegalovirus हा विषाणू गंभीर आजार घडवू शकतो. सुरुवातीस तो फुफ्फुसांना इजा करतो. परंतु आटोक्यात आला नाही तर शरीरातील बहुतेक महत्त्वाच्या अवयवांना इजा करतो आणि परिस्थिती बिकट होते. नुकतेच निधन पावलेले खासदार राजीव सातव हे अशा प्रकारच्या आजाराला बळी पडले. आदरांजली.

ताजी बातमी करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

पद्मश्री डॉ. केके अग्रवाल यांचे करोनामुळे निधन, लसीचे घेतले होते दोन्ही डोस https://www.loksatta.com/desh-videsh-news/padma-shri-dr-kk-agarwal-dies… नवीन केसेस कमी होत आहेत पण म्रुतांचा आकडा वाढत आहे असे दिसतय.

आत्ताशी त्याचं वितरण सुरू झाल्याची बातमी वाचली आहे. चाचणी प्रयोगांदरम्यान त्याने रुग्णालयात दाखल व्यक्तींसाठी फायदा दाखवलेला आहे. आता प्रत्यक्ष वापर झाल्यानंतर काही दिवसांनी विदा उपलब्ध होईल.

पांढऱ्या बुरशीचा आजार (Candidiasis) प्रतिकारशक्ती खच्ची झालेल्या रुग्णांमध्ये या प्रकारचा आजार होऊ शकतो. असे काही मोजके रुग्ण सध्या बिहार मध्ये आढळले आहेत( https://www.loksatta.com/desh-videsh-news/after-black-fungus-mucormycosi...). कोविड रुग्णांना याचा धोका होऊ शकतो. या आजारात घशामध्ये असे चित्र दिसते ok याच्या उपचारासाठी clotrimazole, miconazole, or nystatin, fluconazole या प्रकारची औषधे वापरली जातात.

For Corona treatment WHO सुधारीत गाईडलाईन नुसार https://www.ndtv.com/video/shows/trending-tonight/remdesivir-dropped-fr… फन्गल इन्फेक्शन भारतातच अधिक आहेत का? स्टेराइडचा अति आणि अयोग्य वापर याला महत्वाचे कारण दिसते.

फन्गल इन्फेक्शन भारतातच अधिक आहेत का?
>> त्यासंबंधी इथे काही माहिती आहे. त्यानुसार मार्च अखेरीस जगातील एकूण बुरशी रुग्णांपैकी 70 टक्के भारतात होते. परंतु इथे मेख आहे. ही महासाथ सुरू होण्यापूर्वी या बुरशीजन्य आजाराचे प्रमाण आधी बघू. दोन देशांची तुलना इथे दिलेली आहे. रुग्णसंख्या प्रति लाख लोक अशी आहे : भारत 14 ऑस्ट्रेलिया 0.06 या वर्षाखेरीस विस्तृत विदा आल्यावर अधिक भाष्य करता येईल.

या वर्षाखेरीस विस्तृत विदा आल्यावर अधिक भाष्य करता येईल. माहितीसाठी धन्यवाद.

ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुणा यांचे शुक्रवारी करोना संसर्गाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. आदरांजली ! “वृक्ष म्हणजे प्राणवायूची बँक” असे त्यांचे वचन आहे.

कोविड उपचारांमुळे म्युकरमायकोसिस वाढत नाहीय, तर व्हायरसमध्ये म्युटेशन झालय, नवीन स्ट्रेन आलाय. हा नवीन स्ट्रेन स्वादुपिंडाच्या बीटासेल्सवर परिणाम करतोय. त्यामुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढतेय. त्यामुळे म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढतायत" असे डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.

In reply to by हेमंतकुमार

हा नवीन स्ट्रेन स्वादुपिंडाच्या बीटासेल्सवर परिणाम करतोय. या बद्दल काही माहिती उपलब्ध आहे का? डॉ. तात्या राव लहाने हा माणूस विश्वासार्ह राहिलेला नाही. राजकारणी माणसांना लस देण्यासाठी हि व्यक्ती त्यांच्या घरी जाते (याचे अनेक फोटो वृत्तपत्रात आले होते) हे एकंदर वैद्यकीय व्यवसायाच्या प्रतिष्ठेला साजेसे नाही. आणि अशी लस घरी दिल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे सुद्धा ओढले होते. बाकी भारतात अनिर्बंधित मधुमेहाचे कोट्यवधी रुग्ण असताना या महामारीच्या अगोदर कुणाला म्युकरमायकोसिस का झाला नाही याचे डॉ लहाने उत्तर देतील का? बुरशी जन्य आजार हे आपली प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे होतात हे वैद्यकशास्त्राला वर्षानुवर्षे माहिती आहे. अवयव रोपण, अनेक कर्करोग विशेषतः रक्ताचा ( ल्युकेमिया) किंवा अस्थिमज्जा रोपण (bone marrow transplant) अशा रोग्यांमध्ये असे रोग होताना अशा रुग्णालयात काम केलेल्या माझ्या सारख्या अनेक डॉक्टरांनी वर्षानुवर्षे पाहिलेले आहे. बहुसंख्य करोना च्या रुग्णांना डेक्सामेथासोन हे स्टिरॉइड जीव वाचवण्यासाठी दिले जाते त्यामुळे त्यांच्या रक्तातील साखर वाढते विशेषतः मधुमेह असलेल्या. याशिवाय टोसिलीझूमॅब किंवा बॅरिसीटीनिब हि औषधे सायटो काइन स्टॉर्म मध्ये असामान्य वाढलेल्या प्रतिकारशक्तीला थंड करण्यासाठी औषधे दिली जातात यामुळे बुरशीजन्य आजार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढते. तेंव्हा या दोन्ही औषधांचा एकत्रित परिणाम म्हणून रक्तातील साखर वाढते वर प्रतिकारशक्ती कमी होते म्हणून बुरशीचा प्रादुर्भाव बराच वाढतो. तेंव्हा करोना मुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते हे सत्य असले तरी त्यामुळे म्युकरमायकोसिस होतो असे ठामपणे म्हणता येईल का याविषयी शंका वाटते.

त्यामुळे म्युकरमायकोसिस होतो असे ठामपणे म्हणता येईल का याविषयी शंका वाटते.
+१११

या महामारीच्या अगोदर कुणाला म्युकरमायकोसिस का झाला नाही
>>> आधीही हा आजार भारतात वाढत होता असे हा २०१९ चा संदर्भ म्हणतो . ....... " In reality, a rising number of cases are reported from India [5,10,16,17]."

मी वैद्यकीय तज्ञ नाही (वैद्यकीय तज्ञांच्या ज्ञानाबद्दल विशेष आदर आहेच) पण तार्किक उणिवांकडे लक्ष ठेऊन असणार्‍यांपैकी आहे. आणि विज्ञानावर विश्वास असणार्‍यांनी तर्कांबाबत सावध असणे श्रेयस्कर असावे असे वाटते. खालील ओळी अ‍ॅड होमिनेम या तार्कीक उणीवेच्या एका उपप्रकारात मोडत असाव्यात.
डॉ. तात्या राव लहाने हा माणूस विश्वासार्ह राहिलेला नाही. राजकारणी माणसांना लस देण्यासाठी हि व्यक्ती त्यांच्या घरी जाते (याचे अनेक फोटो वृत्तपत्रात आले होते) हे एकंदर वैद्यकीय व्यवसायाच्या प्रतिष्ठेला साजेसे नाही. आणि अशी लस घरी दिल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे सुद्धा ओढले होते.
एखाद्या विषयावरील भाष्य करण्याचा नैतिक अधिकार हा विश्वासार्हतेवर अवलंबून असतो हे मान्य आहेच. पण तर्कशास्त्रानुसार विश्वासार्ह नसलेला/ नैतिक आधिकार नसलेला माणूस प्रत्येक वेळेस खोटेच बोलेल असे गृहीत धरता येत नाही. समुद्रातल्या चक्रीवादळाची बातमी इतरबाबतीत विश्वासार्ह नसलेल्या माणसाने देऊन जहाज बंदरात आणण्याचे सुचवले पण व्यक्ती विश्वासार्ह नाही म्हणून नाकारले पण चक्रिवादळाची बातमी तर बरोबर होती आणि जहाज आणि त्यातील माणसे बुडाली असेही होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक जोखिमीच्या शक्यतेचा शहानिशा व्यक्तिच्या विश्वासार्हतेची बाब बाजूस ठेऊन केली जाणे श्रेयस्कर आणि गरजेचे असू शकते किंवा कसे. कोरोना व्हायरसच्याच बाबतीत वुहान मधून वेगळ्या व्हायरसची शक्यता व्यक्त करणार्‍या डॉक्टरवरचेच आधी तोंड बंद करण्याचा प्रकार चिनी मंडळींनी केला आणि त्याचे परिणाम अखील मानव भोगतो आहे. करोना व्हायरस एअरबोर्न असण्याचे लक्षात न येणे, मास्कची गरज वेळीच लक्षात घेता न येणे याही गोष्टी तार्कीक उणीवेमुळेच घडल्या. आणखीही बरीच उदाहरणे पँडेमीक हाताळणीत दिसून येतात. एकीकडे तात्याराव लहाने वैद्यकीय उपचारांबद्दल लावल्या जाणार्‍या गालबोटाची जबाबदारी झटकण्या साठी व्हायरस म्युटेशन कडे बोट दाखवत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. (तात्यारावांच्या दाव्यातही तार्कीक उणिवेची शक्यता नाकारता येत नाही) दुसरीकडे व्हायरस मुटेशनच्या परिणामाने श्युगरलेव्हल वाढण्याची शक्यता शंका जरी आली तरी वैज्ञानिक पद्धतीने तपासल्याशिवाय फेटाळणे श्रेयस्कर ठरत नसावे किंवा कसे. सांगण्याचा मुद्दा वैज्ञानिक दृष्टीकोणासाठी, तात्यारावांचे इतर बाबीतील वागणे आणि त्यांनी व्याधीबाबत केलेली तक्रार यांची गल्लत करणे श्रेयस्कर नसावे किंवा कसे.

In reply to by माहितगार

तेंव्हा करोना मुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते हे सत्य असले तरी त्यामुळे म्युकरमायकोसिस होतो असे ठामपणे म्हणता येईल का याविषयी शंका वाटते. हि शेवटची ओळ वाचली का? बाकी डॉ. तात्याराव लहाने यांच्या बाबत असलेली इतर माहिती सार्वजनिक जालावर उघड करणे मला श्रेयस्कर वाटत नाही. म्हणून मी येथेच थांबतो.

In reply to by सुबोध खरे

हा नवीन स्ट्रेन स्वादुपिंडाच्या बीटासेल्सवर परिणाम करतोय. या बद्दल काही माहिती उपलब्ध आहे का? हे माझे पहिलेच वाक्य आहे. मी बऱ्याच वैद्यकीय गटांमध्ये याबद्दल विचारणा केली आणि जालावर/ वैद्यकीय नियतकालिकात शोध घेतला असता असे उत्परिवर्तन झाले आहे याचा कोणताही पुरावा मला सापडला नाही. ( एवढ्या लवकर असा खात्री लायक पुरावा सापडेल हि शक्यता जरा कमीच आहे) पण मला सापडला नाही म्हणजे तो नाहीच असेही मी विधान केलेले नाही. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

आपल्या वैद्यकीय दृष्टीकोणाबद्दल कोणतेच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही कारण तसा संबंधीत ज्ञानाधिकार मला नाही.
एकीकडे तात्याराव लहाने वैद्यकीय उपचारांबद्दल लावल्या जाणार्‍या गालबोटाची जबाबदारी झटकण्या साठी व्हायरस म्युटेशन कडे बोट दाखवत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. (तात्यारावांच्या दाव्यातही तार्कीक उणिवेची शक्यता नाकारता येत नाही)
माझ्या प्रतिसादातून उपरोक्त वाक्यही स्पष्ट केले आहे. तात्यारावांच्या इतरही उणीवा असतील पण संबंध नसलेल्या ठिकाणी त्यांचा संबध लावणे विज्ञानास आणि तर्कशास्त्रास अनुसरुन आहे का याची खात्री करणे श्रेयस्कर असावे एवढाच काय तो मुद्दा मी मांडला आहे. प्रा.डॉ. ते अनेक इतरही मित्रवर्यांच्या लेखनावरही वेळोवेळी तार्कीक मर्यादा दाखवण्याची वेळ येते तेव्हा तसे आपपर भाव न ठेवता खीसपाडणे हा आमच्यासारख्या कुरुंदकरी बाण्याच्या लोकांचा स्थायीभाव असतो. बाकी आपल्या वेळोवेळच्या ज्ञान आणि मार्गदर्शना बद्दल आदर आहेच. 'हेल्दी' चर्चेसाठी अनेक आभार.

विश्लेषण आवडले.

In reply to by हेमंतकुमार

_/\_

सौम्य ते मध्यम कोविडमध्ये (अधिक धोका असलेल्या रुग्णांसाठी) उपचारासाठी casirivimab and imdevimab या दोन प्रतिपिंडाच्या मिश्रणाच्या औषधाला भारतीय औषध नियंत्रकांनी नुकतीच मान्यता दिलेली आहे. आता सिप्लातर्फे हे औषध भारतात टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जाईल.

In reply to by हेमंतकुमार

विज्ञान प्रगतीपथावर आहे हि आनंदाची गोष्ट आहे अर्थात उपचार उपलब्ध झाले तरी हॉस्पीटलचा आश्रय हा शेवटचा पर्याय रहावा म्हणून कोविड काळजी घेण्याची त्रिसुत्री जनतेने किमान अजून दिडएकवर्षेतरी गंभीरपणे पाळणे गरजेचे आहे असे वाटते.

*** नमनाला वाडगेभर १ *** प्रथमतः वैज्ञानिक दृष्टीकोणात आस्था ठेवणारी मंडळी, लसिकरणाबाबत 'अतार्किक अनाठायी संशयवाद' न बाळगता लसीकरणावर भर देतात. सद्य विज्ञानास उत्तम दर्जा अधोरेखित करणारे लसिकरण साध्य करण्यास पाचेक वर्षांचा तरी कालावधी अभिप्रेत असतो तरी सुद्धा, कोविड १९ साथीच्या बाबतीत इतर विश्वासार्ह वैद्यकीय उपचारांअभावी लसीकरण किमान परिक्षणांवर स्विकारावे लागले आहे; आता पर्यंत उपलब्ध लसींची परिणामकारकता लसीपरत सर्वसाधारणपणे ७० ते ९० टक्के आहे, म्हणजे १० ते ३० टक्के लोक लसीकरण झालेले असूनही कोविड १९च्या जोखिमीस सामोरे जाऊ शकतात, पण तरीही सर्वसाधारणपणे ७० ते ९० टक्के लोक लसिकरणातून काही ना काही प्रमाणात आरोग्य सुरक्षा प्राप्त करणार हे सर्वांना विदीत आहेच. त्यामुळे लसिकरणाच्या कोणत्याही मर्यादेची चर्चा झाली म्हणून लसिकरणाचा उपलब्ध मार्ग सोडू नये हे वेगळे सांगणे न लगे. *** नमनाला वाडगेभर २ *** आता जरा मर्यादांची चर्चा या बीबीसी वृत्तानुसार सेचिल बेटे आणि चिली देशातील काही बर्‍यापैकी लसिकरण साध्य केलेल्या भागातही लसिकरण झालेल्या व्यक्तीही काही प्रमाणात (२० टक्क्याच्या आसपास ?) कोविडने बाधीत झालेल्या आणि त्यातील इतर व्याधी सुद्धा असलेल्यांना अधिक वैद्यकीय निरी़क्षण आणि उपचारांची गरज भासलेली आहे असा वृत्तांवरून अंदाज येतो. जेव्हा सद्य लसिंची परीणामकारकता ७० ते ९० टक्के एवढी मर्यादीत आहे म्हणजे हि आकडेवारी आश्चर्यकारक नाही. आपल्याकडे भारतातही एकतर एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे लसिकरण साध्यकरण्यासाठी बर्‍यापैकी कालावधी जाणार आहे, शिवाय १८ पेक्षा कमी वयाचे लसिकरण शक्य होण्यास अधिकचा कालावधी लागणार आहे आणि तो पर्यंत कोविडची अजून एखादी लाटेची साधार शक्यता तज्ञमंडळी व्यक्त करत आहेत. ***नमनाला वाडगेभर ३*** दुर्दैवाने करोना वीषाणूंचा प्रसार वायूजन्य मार्गाने अधिक दूरवर होतो हे वैज्ञानिक वैद्यकीय जगाने स्विकारण्यास अधिक कालावधी लागला. त्या संदर्भाने या , वृत्तांचे वाचन उपयूक्त असावे. वीषाणू आणि इतर पॅथोजेन्सच्या वायूजन्या प्रसाराची चर्चा करणार्‍या स्वतत्र धागा लेखाची तज्ञमंडळींकडून होण्याची गरज असावी असे वाटते. ज्यात एकुण कोविडशिवाय इतर कोण कोणते वीषाणू आणि पॅथोजेन वायूजन्य पद्धतीने पसरतात इत्यादीचा समावेश असावा असे वाटते. *** जे मला समजले ते *** तुर्तास विषय मला जेवढा समजला तेवढ्यात वायूजन्य याचा अर्थ घर दुकाने ऑफीस मॉल हॉटेले इत्यादी सर्व ठिकाणी खिडक्या दारे बंद करून न बसता बाह्यवातावरणातील हवेसोबत अधिक चलनवलन कसे होऊ शकेल हे पाहिले पाहिजे. अवघड शब्द प्रयोगाचे कारण हवा खेळती राहण्यासाठी केवळ सिलींग फॅन लावणे पुरेसे नसावे क्रॉस व्हेंटीलिएशन ची बंद जागेतील हवा बदलली जाण्याची गरज असावी, एक्झॉस्ट फॅन आणि पेडेस्टल फॅन्सच्या मदतीने आतली हवा घालवून ताज्या नव्या हवेस प्रवेशाचा वाव देणे महत्वाचे असावे . अशा सार्वजनिक आणि व्यापारी जागा जिथे हवा बदलली जात नाही एक्झॉस्ट फॅन आणि पेडेस्टल फॅन्सचा पुरेसा वापर नाही त्या ठिकाणचा वावर लसिकरण झालेल्यांनीही टाळणे पण विशेषत; ज्यांना इतर व्याधी आहेत आणि लसिकरण अद्याप झालेले नाही त्यांनी टाळणे श्रेयस्कर असावे. मोकळ्या जागीही गर्दी करूनये आणि कुठे गर्दी असेल तर गर्दीत जाऊ नये. अर्थात कुणाला भेटायचे असल्यास बंद जागे पेक्षा मोकळ्या हवेत भेटणे श्रेयस्कर असावे. मास्कची गरज गर्दी नसलेल्या मोकळ्या जागे पेक्षा बंदीस्त जागा आणि गर्दी असलेल्या मोकळ्याजागां मध्ये अधिक असावी. लॉकडाऊन उठले तरीही अजून येते दिडेकवर्ष तरी क्रॉस व्हेंटीलिएशन नसलेल्या जागी खरेदी पेक्षा मोकळ्या मैदानावर गर्दी नसलेली एक्झिबीशन किंवा गर्दी न घडवता माल विकणारे फिरते हातगाडी आणि टेम्पोवाले, डोअर डेलिव्हरी मागवणे हे अधिक चांगले पर्याय असावेत. बंद रेस्टॉरंट पेक्षा सॅनिटाईज केलेले गर्दी नसलेले गार्डन रेस्टॉरंट असे पर्याय अधिक श्रेयस्कर असावेत असे वाटते. *डिसक्लेमर: मी वैद्यकीय तज्ञ नाही, चुभूदेघे.

एक सुंदर लेख डॉ. एम. सिद्धेश्वर आणि डॉ. त्रिशला शहा-सिंघवी यांच्या सद्यस्थितीतील कामाबद्दलचा. त्यातले ‘वॉर अँड पीस’ मधले हे उद्धृत छानच ! ‘काळ आणि संयम हे जगातील सर्वात मोठे योद्धे आहेत'.

कोविड ची लास घेतल्यानंतर ४५ दिवस मद्यपान करू नये अशी जी बातमी होती त्या बद्दल कोणी माहिती सांगू शकेल काय

रा. म. लसीनंतर 45 दिवस मद्यपान नको या संदर्भात संशोधन झालेले नसून तसा काही निष्कर्ष उपलब्ध नाही. काही तज्ञांच्या मते लस घेण्याअगोदर दोन दिवस व घेतल्यानंतर दोन आठवडे हे टाळावे. (https://www.diabetes.co.uk/news/2020/jan/people-who-receive-covid-19-va…) यावर एक सविस्तर प्रसिद्ध प्रतिसाद मी यापूर्वीच दिलेला आहे. जमल्यास शोधा.

सौम्य ते मध्यम कोविडच्या उपचारांसाठी Sotrovimab या नव्या अँटीबॉडी इंजेक्शन उपचाराला अमेरिकी औषध प्रशासनाने नुकतीच आपत्कालीन मान्यता दिली. गेल्या काही महिन्यात विषाणूचे जे नवे ६ उपप्रकार आलेले आहेत (भारतातील धरून) त्यांच्या विरोधात हे औषध चांगले काम करते असे अभ्यासात दिसले आहे. GSK हा उद्योग लवकरच हे औषध भारतातही उपलब्ध करून देण्याच्या मार्गावर आहे.

Covid आजारासाठी दाखल असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णालय औषधे 'शोधून' आणायला का पाठवतात? कात्रज पासून निगडीपर्यंत औषध शोधत फिरणारे किंवा दिसेल त्या माध्यमातून औषधे आहेत का, अशी साद घालणाऱ्या नातेवाईक, मित्रांचे संदेश पाहून वाईटही वाटतं आणि रुग्णालयांचा रागही येतो.

In reply to by तुषार काळभोर

चायला या रुग्णालयाचे contacts जास्त असणार की रुग्णाचे ? रुग्णाला औषध इथून विकत घ्या हा आग्रह वजा सल्ला ठीक आहे पण सोय तुमची तुम्ही करा म्हणजे काय ? भलतीच आत्मनिर्भरता अपेक्षित ठेवत आहेत...

माझे व माझ्या पत्नीचे वय हे १८-४५ या वयोगटात मोडते. मी कोविन अ‍ॅपवरून कोवॅक्सीन / कोवीशिल्ड इ साठी नोंदणी करण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला पण स्लॉट काही मिळाला नाही. तेलंगाना शासनाच्या सध्याच्या लसीकरणाच्या कार्यक्रमानुसार, अजून अनेक दिवस तरी मिळण्याची शक्यता दिसत नाही. तथापि, एका खाजगी कंपनी मार्फत, या महिन्यात आम्हाला स्पुतनिक ही लस घेण्याची संधी आहे.
  • स्पुतनिक लस घ्यावी का?
  • ही लस कुणी मिपाकराने घेतली आहे का?
  • ही लस घेणे सुरक्षित आहे का?
मला मत / सल्ला हवा आहे. हा प्रतिसाद या धाग्यावर अयोग्य वाटत असल्यास क्षमस्व.

प्रत्यक्ष अनुभव नाही . स्थानिक डॉक्टरांचा सल्ला घेऊन ठरवा

दुसरी लाट नियंत्रणात आल्याचे केंद्र सरकारचे निवेदन

१)लसीकरण . ते फक्त कमी लोकांचे झाले आहे. २)लॉक डाऊन हे कारण असू शकते पण perfect अमलबजावणी ह्यांची पण झाली नाही लोक फिरत च होती. ३) नैसर्गिक रीत्या व्हायरस कमजोर झाला. ह्या कारणाचा जरूर विचार करावाच लागेल. ४)उपचार हा प्रकार लाट कमी झाली ह्या साठी विचारात घेण्याची गरज नाही. चुकीचे उपचार,औषधाची टंचाई असे अनेक मामले खूप प्रसिद्ध आहेत. बघू आता तज्ञ,डॉक्टर,सरकार कोणाला श्रेय देत आहेत दुसरी लाट संपत आली त्या साठी.

पहाडमूळ (म्हणजेच व्हेलव्हेटलीफ) नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीचा सार्क कोव्ही-२ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फायदा होऊ शकतो. - भारतामधील केंद्र सरकाच्या अखत्यारित असणाऱ्या औद्योगिक आणि वैज्ञानिक संशोधन परिषदेचे संशोधन चालू.

सार्क कोव्ही-२ >>> सार्स असे वाचावे.

Tocilizumab या दाहप्रतिबंधक औषधाला रुग्णालयात दाखल असलेल्या (तीव्र) covid-19 रुग्णांच्या उपचारासाठी अमेरिकी औषध प्रशासनाने आज मान्यता दिली. यापूर्वी हे औषध वापरले जातच आहे. आज त्याच्यावर कोविडसाठी मान्यतेची मोहर उमटवली गेली. हे जुने औषध असून यापूर्वी संधिवात आणि अन्य काही तत्सम आजारांसाठी वापरले जाते. सध्या भारतात हे आयात करावे लागते.

अमेरिकेच्या मॉडर्ना लसीला भारतात परवानगी; DGCI नं दिली लस आयातीसाठी मंजुरी! ही एम आर एन ए प्रकारची आहे.

लसीचे दोन डोस भिन्न प्रकारच्या तंत्रज्ञानाचे घेऊन लस मिश्रणाचे काही प्रयोग चालू आहेत. काही युरोपीय देशांमधील प्रयोगांमध्ये उत्साहवर्धक निष्कर्ष आढळले आहेत. अर्थात अजून हे प्रयोग बऱ्याच मोठ्या प्रमाणावर झाल्याशिवाय निष्कर्ष काढता येणार नाहीत. तरीसुद्धा एक रोचक बाब त्यातून पुढे आलेली आहे. कोविशिल्ड प्रकारच्या लसीमुळे शरीरात T -सेल्सची निर्मिती चांगली होते. तर फायझर प्रकारच्या लसीमुळे शरीरात अँटीबॉडीज अधिक चांगल्या प्रमाणात तयार होतात. त्यामुळे भविष्यात या दोन लसींचे मिश्रण देण्याबाबत अधिक विचार करता येईल. विषाणूच्या बदलत्या नव्या उपप्रकारांविरुद्धही अशा प्रकारचे मिश्रण अधिक उपयुक्त ठरू शकेल ठरू शकेल, असा प्राथमिक अंदाज आहे. अर्थात अधिक संशोधनाची गरज आहे.

In reply to by हेमंतकुमार

माझ्या एका नातेवाईकाने कोव्हॅक्सीनची लस घेतली. त्यामुळे म्हणे त्याला व्हिसा मिळायला त्रास होतोय. कोविशिल्ड लस घेतलेल्यांना मात्र व्हिसा मिळू शकतो.

In reply to by शाम भागवत

कोव्हॅक्सीनच्या बाबतीत विसा मिळताना संबंधित देशागणिक वेगवेगळे धोरण आहे, असे बातम्यातून समजते.

अतिशय सुंदर लेख आणि माहीतगारांचे पूरक प्रतिसाद आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येकाच्या शंकेचे केलेले माहितीपूर्ण निरसन यामुळे लेखाची उपयुक्तता वाढली आहे. नवनवीन विषयांवर लिहिण्यासाठी शुभेच्छा. _/\_

ऑलिंपिक नगरीतील covid + लोकांची संख्या १५ पर्यंत पोहोचली आहे. त्यात 3 खेळाडूंचाही समावेश आहे. बातमी

डेल्टा उपप्रकाराच्या आगमनानंतर जो नव्याने धुमाकूळ झाला त्यासंदर्भात डेल्टाचा अधिक अभ्यास केल्यानंतर खालील गोष्टी समजल्या आहेत : १. शरीरात विषाणूने प्रवेश केल्यानंतर प्रत्यक्ष आजार होणे याचा कालावधी पूर्वीच्या प्रकारांच्या तुलनेत कमी आहे (साधारण चार दिवस). २. या प्रकाराची प्रजननक्षमता वेगवान आहे. ३. डेल्टाबाधित व्यक्तीच्या शरीरात विषाणूची घनता पूर्वीच्या प्रकारांच्या तुलनेत १२६० पट अधिक आहे. वरील सर्व कारणांमुळे डेल्टा प्रकार हा अधिक रोगप्रसारक ठरला आहे. https://www.nature.com/articles/d41586-021-01986-w

खोलीच्या सामान्य अथवा उष्ण तापमानात व्यवस्थित टिकून राहणाऱ्या लसीची निर्मिती करण्याचा प्रकल्प भारतात Mynvax यांनी हाती घेतला आहे अशी लस यशस्वी झाल्यास तिची साठवण अतिशय सोपी राहील . शुभेच्छा !

सद्य लसींवर मात करणारे विषाणूचे नवे प्रकार का उद्भवतात, यावर सध्या अभ्यास चालू आहे. असे नवे प्रकार निर्माण होण्यामागे तीन महत्त्वाची कारणे अशी असतात : 1. लसीकरणाची गती मंद असणे 2. संसर्ग झालेल्या लोकांचे प्रमाण जास्त असणे 3. विषाणूच्या उत्परिवर्तनाची गती जास्त असणे. हे विचारात घेता असे नवे उपप्रकार निर्माण होऊ नयेत म्हणून आपण काय करू शकतो ? 1. लसीकरणाची गती शक्य तितकी वाढवणे 2. जरी एखाद्या प्रदेशात बहुसंख्यांचे लसीकरण झालेले असेल तरीसुद्धा मूलभूत त्रिसूत्रीचे पालन चालूच ठेवणे. हे पालन जितके जास्त काळ आपण चालू ठेवू तितके फायदेशीर राहील.

COVID विषयी विज्ञान जगतात कोणतेच ठाम निष्कर्ष नाहीत. विज्ञान जग द्विधा अवस्थेत आहे. विषाणू जन्य आजार पृथ्वी वर अनेक वेळा येवून गेले पण त्यांचा मुक्काम काही वर्ष च होता होता. कोणत्याच आधुनिक उपचार वीणा ती साथ निघून पण गेली. Corona व्हायरस काही खूप वेगळा असेल ह्याची शक्यता 0 आहे. नैसर्गिक नियमांना अनुसरून च त्याचे वर्तन आहे. फक्त आता विज्ञान जगताला ग्रहण लागले आहे. म्हणून उलट sulat बातम्या येत आहेत. सायन्स अलर्ट वर लेख पण आला आहे. आताचे विज्ञान नवीन अंध श्रद्धा निर्माण करत आहे. डोळे झाकून विज्ञान वादी होवू नका.

जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस कोविड-१९ लसीला भारतात आपातकालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे.

रोज पेपर मधे नवीन रुग्ण, बरे झालेले रुग्ण वगैरे नियमीत पणे येत असते त्यात नवीन रुग्णांपैकी किती जणांनी व्हॅक्सीन घेतले होते ते का दिले जात नसावे

In reply to by मराठी_माणूस

माझे अनेक मित्र अमेरिकेत डॉक्टर आहेत. त्यांनी एकमुखाने हेच सांगितले आहे कि त्यांच्याकडे आता येणारे ९५ % अत्यवस्थ रुग्ण हे लस न घेतलेले आहेत. आपण यातून बोध घेणे आवश्यक आहे.