मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मुलन करता येईल का? -१

कलंत्री · · काथ्याकूट
आजच्या काळात हिंसेचे उत्तर हिंसेने किंवा त्यापेक्षा जास्त हिंसेने देण्यात यावे असा सर्वसाधारण लोकप्रिय समज आहे. कालच्या अतिरेकी कारवाईने प्रत्येक भारतीयाच्या मनात अथवा जगातील शांतताप्रेमींच्या मनात नकळतच एक काळजीची भावना निर्माण झाली आहे. सगळ्याच्याच मनात भडक विचार येत आहेत. एकदा सोक्षमोक्षच लावू या असाही विचार नकळतच सगळ्याच्या मनात येत असेलच. आरपाराची लढाईतर करून घ्याच. अशा पार्श्वभूमींवर या समस्येच्या मुळातच जाता येईल का? पिढ्यानपिढ्या चालणारा संघर्ष संपेल का / संपवता येईल का? यात मला थोडाफार आशेचा किरण दोन गोष्टीमध्ये दिसतो.एकतर आपल्या देशात ब्रिटिशाविरुद्ध यशस्वी ठरलेला गांधीवाद (त्याचबरोबर जगाला शांततामय लढ्याला प्रेरणा देणारा) आणि अतिरेकी असली तरी ती माणसेच असावी. काल्पनिक भीतीच्या अथवा आदर्शाच्या पोटी त्यांना दिशाभूल करत असावेत असे मला वाटते. प्रत्येक व्यक्तिच्या मतात परिवर्तन हे काळाच्या ओघात, अनुभवामुळे आणि भ्रमनिरासामुळे होत असतेच. त्याही अगोदर आपणा सर्वांचे काही मुद्द्याबाबत एकमत झाले तर बरे होईल असे मला वाटते. 1. सर्वसाधारण अतिरेक्यांचे वय हे पक्व नसते. त्यात विवेक नसतो पण कोणत्याही गोष्टीला त्यात धार्मिक शिकवणही आली यात तो स्वतःची दिशाभूल करून घेतो. पुस्तकी माहितीवर, ज्यांची वैचारिक वाढ खुंटली आहे अश्या लोकांच्या साचेबद्ध मार्गदर्शनावर त्याचा धृढ विश्वास बसत जातो. 2. हिंसेने आणि केवळ हिंसेनेच प्रश्न सुटतील असे त्याला वाटत असते. 3. तो कोणाच्याही हातचे बाहुले बनतो आणि त्या त्या पंथाचे नेते, राजकारणी, गुंड पध्दतशिरपणे त्याचा वापर करून घेत असतात. 4. आपल्याला अशा दैवी कार्यात मृत्यू आलातरी भूतकाळाचे ओझे, अन्याय कायमस्वरुपी दूर होईल आणि तेच करण्यासाठीच आपला जन्म झाला आहे असे त्याला वाटते. 5. थोडाफार आदर्श आणि सांगितलेले काम पूर्ण करावे असेच त्याला वाटत असते. 6 शि़क्षण, आर्थिकस्थिती अथवा पालकाच्या पार्श्वभूमीचा कधी संबंध असतो तर कधी नसतो. बहुधा वरील विवेचन सर्वच प्रकारच्या अतिरेक्यांना लागू होत असावे. आता दुसरा मुद्दा अतिरेकी कोण होऊ शकतो? माझ्या मते माझा स्वतःचा अनुभव यासाठी बोधप्रद व्हावा. १९८३/८४ च्या सुमारास मी २०/२१ वर्षच असावा. तेव्हा रामजन्मभूमीचे आंदोलन फारच जोरात होते. "मंदिर वही बनायेंगे जहा रामने जन्म लिया, बच्चा बच्चा रामका जन्मभूमी के कामका, अब तो यह झाकी है मथुरा काशी बाकी आहे" अशा घोषणांनी आमच्या सारख्या बर्‍याच तरुणानं एक आदर्श, जीवनाची दिशा दिली होती. त्यात मोगलांचे अत्याचार, स्त्रिया, मंदिराला बाटवणे इत्यादी गोष्टींनी आता तर बदला घ्यायलाच हवा असे तरुणांचे मत बनत होते. त्यात अयोध्यांची मस्जिद पाडली गेली आणि भाजपाचे सरकार आल्यावर राममंदिर एक औपचारिकताच उरली आहे असे आमच्या मित्रमंडाळीचे मत होते. आता राममंदिर झाल्यावर मग मथुरा आणि काशीचे मंदिर मुक्त करायचे, भारतातील सर्वच मुस्लिमाचे शिरकाण करावयाचे असेही मत, चर्चा आणि योजना आम्ही बनवत होतो / ऐकत होतो. १००० वर्षाच्या जुलमी कारकीर्दीचा अंत जवळ आला आहे असेच आम्हा सर्वांना वाटत होते. त्यात एकदा नॆस्ट्रोडोमस नावाच्या एका ज्योतिषाचे लेखही माझ्या वाचनात आले होते. त्यात जगातील सर्वच इस्लामी सत्तेचा अंत २००४ च्या सुमारास होईल इत्यादी छापून आलेले आणि मी वाचलेले मला आठवते, नव्हे त्या लेखाने मला तर भारुनच टाकले होते. साहजिकच आम्हा सर्व हिंदूच्या उत्साही लोकांना आकाश ठेंगणे झाले होते. तर अश्या पार्श्वभुमीवर एकदा भाजपाच्या राज्य अधिवेशनाला जाण्याचा योग आला. तेथे बरीच मोठी एक आसामी होती, सध्या ती स्वर्गात असावी, त्यांच्या भाषणाने आम्हाला वेड लागत असे. काय ते वकृत्व, काय तो भाषेचा ओघ, तर आम्ही दूर उभे असताना कोणीतरी जवळ आला आणि सांगितले की अमुक अमुक नेत्याने काही खोक्यात काम होईल असे आश्वासन दिले आहे. दुसरा कोणी आला आणि सांगितले की त्या नेत्याच्या कनिष्ठ सहायकाने सांगितले की ५० पेटीच्या खाली असेल तर कृपया माझा वेळ घेऊ नका. या दोन्ही वार्तांत कितपत तथ्य असेल; ते एक रामच जाणे, पण मनाला कोठेतरी तेव्हा तडा गेला होता. मग आमच्या बरोबर एक ज्येष्ठ कार्यकर्ता होता त्याने सांगितले की अरे शिवाजीने पण लूटमार केलीच होती ना? रामजन्मभूमीसाठी पैसा कोठेन येणार? त्यात मनाची कोठेतरी समजूत घातली आणि नेमके वर्ष आठवत नाही पण भाजपाने सत्तेत येताच रामजन्मभूमीचा मुद्दा बरोबर बासनात बांधून ठेवला. नंतर रामजन्मभूमी असा मुद्दाच नाही असाही प्रतिवाद सुरू झाला. (९०/९२ वर्ष असावे.) त्यात सर्वच संधीसाधुपणा नसावा,काही मर्यादाही असाव्यात असे आज वाटते. त्याहीपेक्षा लोकांच्या आकलनाच्या मर्यादा असाव्यात असे माझ्या अनुभवाने वाटते. पण या सर्व काळखंडात आमचा बराच भ्रमनिरास झाला, मनाचेही बरेच परिवर्तन झाले. शेकडो गांधींना जे जमले नसते ते भाजपासारख्या एका प़क्षाने एका झटक्यातच आम्हा तरुणांना आमच्या विचारसरणीवर आणि हिंसामय कार्यक्रमावर विचार प्रवृत्त केले यासाठी मी तरी भाजपाचा ऋणीच आहे, तरीपण या आंदोलनात कितीतरी कारसेवक मारले गेले, दंगली झाल्या, वित्त, जीवहानी झाली त्याचा विचार करुच नये असे मला वाटू लागले. मुख्य म्हणजे आपण किती मूर्ख असू शकतो याचेही ज्ञान झाले. सुबहाका भुला शामको घर लौट आया तो उसे भुला नही कहते. आता इतके पाल्हाळ लावण्याचे कारण म्हणजे की जर भाजपाने आमचा भ्रमनिरास केला नसता तर मीसुद्धा कोठेतरी बॊम्ब बनविणे, गोळ्या झाडणे अथवा निरपराधाच्या मृत्यूने स्वतःची पाठ थोपटण्यात धन्यता मानली असती. माणूसकी पेक्षा धर्म कसा श्रेष्ट आहे यावर आयुष्य घालवले असते. शिवाजी, गोविंदसिहजी, राणाजी यांच्या जीवनाचा चुकीचा अर्थ लावला असता. त्यामुळे जेव्हा केव्हाही असे हल्ले होतात, अतिरेकी, सामान्यजन आणि पोलिस मारले जातात कदाचित आपणही असे केले असते या कल्पनेने अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. सारांश : अतिरेकी कोणीही थोडाश्या प्रभावित भाषणाने निर्माण केले जाऊ शकतात. मग ते हिंदू असोत अथवा मुस्लिम असोत.काही वयोगटात नकळतच असले विष भिनवणे फारच सोपे असते. असा अतिरेकी कदाचित तुमच्या घरातही निर्माण होऊ शकतो. ( पुढच्या भागात मला समजलेला गांधीवाद म्हणजे काय?)

वाचन 15438 प्रतिक्रिया 0