प्रेरणा: http://www.misalpav.com/node/48304
तांत्रिक शोधांसाठी कुतूहल, अचूक निरीक्षण आणि वेगळ्या प्रकारे विचार करता येणे या तीन गोष्टी महत्वाच्या आहे. त्यातही वेगळया प्रकारे ,वेगळ्या दिशेने विचार करता येणे सर्वात महत्वाचं असं माझं मत बनलं आहे.
आता वेगळा विचार म्हणजे काय? तर उपलब्ध स्रोतांचाच वापर करुन त्याद्वारे समस्या सोडवणे. तांत्रिक शोध लावतानाही हेच होते. काहीतरी समस्या असते आणि नेहमीच्या मार्गांनी ती सुटत नाहीसे दिसू लागल्यावर जेव्हा वेगळ्या प्रकारे,वेगळ्या दिशेने विचार सुरु होतो तेव्हाच त्या समस्येवर उपाय मिळू लागतो. याचं एक अतिशय साधं उदाहरण बघा.
एका राजपुत्राला एका राक्षसानं खोल तळघरात कोंडून ठेवलं आहे. खाली पक्की जमीन. भिंती तीन फूट जाड. हवा - उजेड यायला छताला एक खिडकी. छताची उंची पंधरा फूट. राजपुत्र फार तर आठ - नऊ फूट उंच उडी मारू शकतो ! एक दिवस तिथल्या पहारेकऱ्याला राजपुत्र काहीतरी खणताना दिसतो. ' हं ! ' म्हणून तो उपहासानं हसतो आणि फसतो ! पहारेकरी कसा फसला ? राजपुत्र भुयार खणतोय असं समजून पहारेकरी उपहासानं हसला. जमीन उकरण्याचा अर्थ तिथं खड्डा किंवा भुयार असाच विचार त्यानं केला. पण उकरलेल्या मातीचा ढीग करून त्यावर चढून खिडकीतून पसार होता येतं; असा विचारच तो करू शकला नाही
असा वेगळ्या प्रकारे उलटसुलट विचार करता येण्यासाठी मेंदूला तितकी मोकळीक द्यावी लागते. बाह्य गोष्टींनी ही विचारप्रक्रिया बिघडता कामा नये किंवा थांबता कामा नये. यामुळेच कदाचित युरोपात आणि नंतर अमेरिकेतही अगदी युद्धजन्य परिस्थितीतही अनेक तांत्रिक शोध लागले आहेत. युद्धामुळे आपला मृत्यू होऊ नये किंवा आपला देश परकियांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून शक्य तितके खटाटोप प्रत्येक युरोपियन देश यथाशक्ती करतच होता.कोणाला अधिक यश मिळाले तर कोणाला कमी. ज्या देशांना जास्त यश मिळाले तिथल्या लोकांकडे ही वेगळ्या प्रकारे विचार करण्याची क्षमता अधिक प्रमाणात असावी. दुसर्या देशाने केलेला हल्ला ही समस्या आहे असे मानणारे लोक या देशांमधे जास्त असावेत. याउलट ज्या देशातील लोक अंतर्बाह्य गांगरुन,भेदरुन गेले ते शोधप्रक्रियेपासून लांब राहिले. आपण परकीय आक्रमण या समस्येतून सुटायचेच या प्रेरक विचारांमुळे हे शोध लागले असे म्हणायला हरकत नसावी.
या खटाटोपांचे फलित म्हणजे विविध तांत्रिक शोध अमेरिका आणि युरोपात लागले. या कुतूहल, निरीक्षण, वेगळ्या विचारांचं अनन्यसाधारण महत्त्व समजल्यामुळेच त्यांच्या शिक्षणपद्धतीत या तीन गोष्टींना फार महत्त्व दिलं गेलं असावं. आखातात तेल मिळू शकते किंवा अफ्रिकेत हिरे वगैरेसारखी खनिजसंपत्ती मिळू शकते हे तिथल्या स्थानिकांऐवजी गोर्यांनीच जगाला का दाखवून दिले यामागे हेच कारण असेल का?
आता हा प्रकार भारतात मुस्लिम आक्रमक आल्यानंतर बराच कमी झाला. कारण असं आक्रमण झालं म्हणजे आपलं काही खरं नाही आता देवच आपला तारणहार किंवा सरळ आक्रमकांची गुलामगिरी पत्करुन तग धरणे असे पराभूत विचार करणारे लोक जास्त असावेत.अर्थात सगळे तसेच होते असे नाही. शिवाजी महाराजांचे गनिमी काव्याचे तंत्र, टिपू सुलतानच्या सैन्याने विकसित केलेले म्हैसुरीयन रॉकेट (याबद्दल इथे वाचू शकाल. https://en.m.wikipedia.org/wiki/Mysorean_rockets) शिवकर बापुजी तळपदेंचे विमान असे काही प्रयत्नही झाले आहेत. म्हणजे अगदी सगळ्यांची घाबरगुंडी उडून वेगळा विचार करण्याची क्षमता नाहीशी झाली असे काही नव्हते.
आता युरोप किंवा अमेरिकेत हे तांत्रिक शोधांचे प्रमाण जास्त का? तर एखादा वेगळा विचार स्विकारला जाणे, त्यादृष्टीने संशोधनासाठी पुरेसा निधी मिळणे, निधी देणार्या लोकांनी किंवा काही वेळा सरकारी संस्थांनी संशोधनासाठी पुरेसा वेळ देणे किंवा तितकी जोखीम स्विकारणे, संशोधनासाठी आवश्यक महागडी साधने , तंत्रज्ञान सहज उपलब्ध असणे किंवा उपलब्ध करुन दिले जाणे, लालफितीत न अडकणे, भ्रष्टाचार नसणे किंवा फार कमी असणे अशा बर्याच गोष्टी कारणीभूत असू शकतात. भारतात यातल्या बर्याच गोष्टींची वानवा असल्याने भारत तांत्रिक संशोधनात पाश्चात्यांपेक्षा मागे पडला असावा.
कुतूहल, अचूक निरीक्षण आणि वेगळ्या प्रकारे विचार करता येणे या तीन पायर्या संशोधनात महत्वाच्या असाव्यात.
अजुन एक गोष्ट लागते ते म्हणजे