मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तांत्रिक संशोधनासाठी काय लागतं?

उपयोजक · · काथ्याकूट
प्रेरणा: http://www.misalpav.com/node/48304 तांत्रिक शोधांसाठी कुतूहल, अचूक निरीक्षण आणि वेगळ्या प्रकारे विचार करता येणे या तीन गोष्टी महत्वाच्या आहे. त्यातही वेगळया प्रकारे ,वेगळ्या दिशेने विचार करता येणे सर्वात महत्वाचं असं माझं मत बनलं आहे. आता वेगळा विचार म्हणजे काय? तर उपलब्ध स्रोतांचाच वापर करुन त्याद्वारे समस्या सोडवणे. तांत्रिक शोध लावतानाही हेच होते. काहीतरी समस्या असते आणि नेहमीच्या मार्गांनी ती सुटत नाहीसे दिसू लागल्यावर जेव्हा वेगळ्या प्रकारे,वेगळ्या दिशेने विचार सुरु होतो तेव्हाच त्या समस्येवर उपाय मिळू लागतो. याचं एक अतिशय साधं उदाहरण बघा. एका राजपुत्राला एका राक्षसानं खोल तळघरात कोंडून ठेवलं आहे. खाली पक्की जमीन. भिंती तीन फूट जाड. हवा - उजेड यायला छताला एक खिडकी. छताची उंची पंधरा फूट. राजपुत्र फार तर आठ - नऊ फूट उंच उडी मारू शकतो ! एक दिवस तिथल्या पहारेकऱ्याला राजपुत्र काहीतरी खणताना दिसतो. ' हं ! ' म्हणून तो उपहासानं हसतो आणि फसतो ! पहारेकरी कसा फसला ? राजपुत्र भुयार खणतोय असं समजून पहारेकरी उपहासानं हसला. जमीन उकरण्याचा अर्थ तिथं खड्डा किंवा भुयार असाच विचार त्यानं केला. पण उकरलेल्या मातीचा ढीग करून त्यावर चढून खिडकीतून पसार होता येतं; असा विचारच तो करू शकला नाही असा वेगळ्या प्रकारे उलटसुलट विचार करता येण्यासाठी मेंदूला तितकी मोकळीक द्यावी लागते. बाह्य गोष्टींनी ही विचारप्रक्रिया बिघडता कामा नये किंवा थांबता कामा नये. यामुळेच कदाचित युरोपात आणि नंतर अमेरिकेतही अगदी युद्धजन्य परिस्थितीतही अनेक तांत्रिक शोध लागले आहेत. युद्धामुळे आपला मृत्यू होऊ नये किंवा आपला देश परकियांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून शक्य तितके खटाटोप प्रत्येक युरोपियन देश यथाशक्ती करतच होता.कोणाला अधिक यश मिळाले तर कोणाला कमी. ज्या देशांना जास्त यश मिळाले तिथल्या लोकांकडे ही वेगळ्या प्रकारे विचार करण्याची क्षमता अधिक प्रमाणात असावी. दुसर्‍या देशाने केलेला हल्ला ही समस्या आहे असे मानणारे लोक या देशांमधे जास्त असावेत. याउलट ज्या देशातील लोक अंतर्बाह्य गांगरुन,भेदरुन गेले ते शोधप्रक्रियेपासून लांब राहिले. आपण परकीय आक्रमण या समस्येतून सुटायचेच या प्रेरक विचारांमुळे हे शोध लागले असे म्हणायला हरकत नसावी. या खटाटोपांचे फलित म्हणजे विविध तांत्रिक शोध अमेरिका आणि युरोपात लागले. या कुतूहल, निरीक्षण, वेगळ्या विचारांचं अनन्यसाधारण महत्त्व समजल्यामुळेच त्यांच्या शिक्षणपद्धतीत या तीन गोष्टींना फार महत्त्व दिलं गेलं असावं. आखातात तेल मिळू शकते किंवा अफ्रिकेत हिरे वगैरेसारखी खनिजसंपत्ती मिळू शकते हे तिथल्या स्थानिकांऐवजी गोर्‍यांनीच जगाला का दाखवून दिले यामागे हेच कारण असेल का? आता हा प्रकार भारतात मुस्लिम आक्रमक आल्यानंतर बराच कमी झाला. कारण असं आक्रमण झालं म्हणजे आपलं काही खरं नाही आता देवच आपला तारणहार किंवा सरळ आक्रमकांची गुलामगिरी पत्करुन तग धरणे असे पराभूत विचार करणारे लोक जास्त असावेत.अर्थात सगळे तसेच होते असे नाही. शिवाजी महाराजांचे गनिमी काव्याचे तंत्र, टिपू सुलतानच्या सैन्याने विकसित केलेले म्हैसुरीयन रॉकेट (याबद्दल इथे वाचू शकाल. https://en.m.wikipedia.org/wiki/Mysorean_rockets) शिवकर बापुजी तळपदेंचे विमान असे काही प्रयत्नही झाले आहेत. म्हणजे अगदी सगळ्यांची घ‍ाबरगुंडी उडून वेगळा विचार करण्याची क्षमता नाहीशी झाली असे काही नव्हते. आता युरोप किंवा अमेरिकेत हे तांत्रिक शोधांचे प्रमाण जास्त का? तर एखादा वेगळा विचार स्विकारला जाणे, त्यादृष्टीने संशोधनासाठी पुरेसा निधी मिळणे, निधी देणार्‍या लोकांनी किंवा काही वेळा सरकारी संस्थांनी संशोधनासाठी पुरेसा वेळ देणे किंवा तितकी जोखीम स्विकारणे, संशोधनासाठी आवश्यक महागडी साधने , तंत्रज्ञान सहज उपलब्ध असणे किंवा उपलब्ध करुन दिले जाणे, लालफितीत न अडकणे, भ्रष्टाचार नसणे किंवा फार कमी असणे अशा बर्‍याच गोष्टी कारणीभूत असू शकतात. भारतात यातल्या बर्‍याच गोष्टींची वानवा असल्याने भारत तांत्रिक संशोधनात पाश्चात्यांपेक्षा मागे पडला असावा. कुतूहल, अचूक निरीक्षण आणि वेगळ्या प्रकारे विचार करता येणे या तीन पायर्‍या संशोधनात महत्वाच्या असाव्यात.

वाचने 12761 वाचनखूण प्रतिक्रिया 34

मराठी_माणूस 06/03/2021 - 15:04
अजुन एक गोष्ट लागते ते म्हणजे त्या संशोधना बद्दल समाजामधे कौतुक, आदर इत्यादी. आपल्याकडे फक्त पैशाला महत्व आहे. तो कसा मिळवला हे गौण आहे.

In reply to by मराठी_माणूस

स्वलिखित 07/03/2021 - 11:10
आणि अजून एक लागते , ती म्हणजे गरज , विनाकारण काहीही शोध लागत नाहीत किंवा लावत नाहीत , जे हुकून चुकून विनाकारण शोध लागतात त्याला बायप्रॉडक्ट म्हणू ...

माईसाहेब कुरसूंदीकर 06/03/2021 - 15:25
उत्तम लिहिले आहेस रे उपयोजका. संशोधनात्/उद्योगव्यवसायात वेगळ्या पद्धतीने विचार करण्याला महत्व आहेच. आपल्या येथे अवकाश तंत्रज्ञानात इस्रोने तसे केले आहे. विक्रम साराभाई,सतिश धवन व त्यांनी घडवलेले अनेक शास्त्रज्ञ. विकसित देशानी मदत करण्यास हात आखडता घेतल्यावर 'वेगळ्या पद्धतीने' विचार नक्कीच झाला असणार.सुरुवातीच्या काळात अनेक उपकरणांमध्ये रशियावर अवलंबून असणारा भारत आता उपग्रह १००% भारतीय बनावटीच्या उपकरणांनी बनवतो. नविन,भव्य,जगावेगळ्या कामात पैसा गुंतवणे व त्यात झोकुन देउन काम करणे ही पाश्चिमात्यांची खासियत आहे. सरकारी लालफीत्,भ्रष्टाचार वगैरे दुय्यम आहेत असे आमचे मत.बोइंग-७४७ चे उदाहरण घ्या.अमेरिकन संरक्षण खात्याने 'जगातले सर्वात मोठे विमान' बनवायचे जाहीर केले तेव्हाही अमेरिकेत टीका झाली होती. एका खंडातून विमान थेट, न थांबता दुसर्या खंडात, ३००-३५० प्रवासी नेणे..हे स्वप्न होते. आताच्या काळात ह्याचे अप्रुप नाही पण मुंबई-लंडन हा प्रवास, मुंबई-कराची-तेल-अव्हिव-लंडन ज्यांनी केला आहे त्यांना त्याचे महत्व कळले असणार. आपली भारतीय्/आशियाई वृत्ती एकंदरीतच 'जैसे थे' आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

उपयोजक 06/03/2021 - 18:05
काही लोक म्हणतात की यात भारताने पूर्णपणे नवे असे संशोधन काहीही केले नाहीये. अमेरिकेच्या अवकाश मोहीमांची नक्कल तुलनेने कमी पैशात बनवून देणे हेच भारत करतो. त्यात कितपत तथ्य आहे?

In reply to by उपयोजक

माईसाहेब कुरसूंदीकर 06/03/2021 - 22:16
नक्कल माहित नाही पण कमी पैशात असली कामे करणे हेही आव्हानात्मक होते/आहे. विक्रम साराभाई ह्यांनी सुरुवातीला म्हंटले होते की "आमचा उद्देश विकसित देशांबरोबर स्पर्धा करणे नाही किंवा महागडी स्वप्ने पुरी करणे हा ही नाही. जे संशोधन करणार्/बनवणार ते सर्वसामान्य भारतियांसाठी उपयोगी असले पाहिजे हे स्वप्न आहे". इस्रोने पूर्णपणे नवे संशोधन कदाचित केलेही नसेल. जाणकार प्रकाश टाकू शकतील.
.... या तीन पायर्‍या संशोधनात महत्वाच्या असाव्यात.... ह्याला अजून जोड हवी, आर्थिक मदत.... एक पुस्तक वाचले होते, त्यात लिहिले होते की, मुलभूत शोध सोडले तर, लस, तंत्रज्ञान, हे आता आर्थिक दृष्टीने सधन असलेल्या आस्थापनाच पुढे नेतील...

In reply to by मुक्त विहारि

उपयोजक 06/03/2021 - 18:00
संशोधनासाठी पुरेसा निधी मिळणे, निधी देणार्‍या लोकांनी किंवा काही वेळा सरकारी संस्थांनी संशोधनासाठी पुरेसा वेळ देणे किंवा तितकी जोखीम स्विकारणे, संशोधनासाठी आवश्यक महागडी साधने , तंत्रज्ञान सहज उपलब्ध असणे किंवा उपलब्ध करुन दिले जाणे.

चौथा कोनाडा 06/03/2021 - 17:51
बरोबर. संशोधनाला आर्थिक पाठवळ आणि प्रतिष्ठा देणे फार गरजेचे आहे !

Rajesh188 06/03/2021 - 19:24
गाड्या उत्पादन करणाऱ्या कंपन्या गाड्या मध्ये काय नवीन तंत्र वापरता येईल ह्या साठी संशोधन करत असतात त्या साठी निधी त्या राखून ठेवता.असे सर्वच क्षेत्रात होत असते. संशोधक कोणत्या ना कोणत्या कॉर्पोरेट कंपन्यांचे बांधील असतात त्या मुळे शोध सुद्धा एका व्यक्ती च्या नावावर नसतात तर कंपन्यांच्या नाव वर असतात. पहिल्या सारखे न्यूटन, आइन्स्टाइन,आता निर्माण होणार नाहीत अगदी युरोपियन देशात पण नाही. आणि संशोधन हे कोणाचे तरी बांधील असणार आहे.

उपयोजक 06/03/2021 - 20:16
हे थॉमस एडिसनने सुरु केले. R&D विभाग जगात सर्वात प्रथम त्याच्याच जनरल इलेक्ट्रिक कंपनीत सुरु झाला. सांघिक संशोधन सुरु झाले.
टिपू या तंत्राचा उद्गाता नव्हता. त्याच्या आधी मराठ्यांनी असे राॅकेट्स वापरले आहेत. तसे संदर्भ उपलब्ध आहेत. पहिले उदाहरण आहे सातारच्या शाहू छत्रपतींच्या २६ मे १७२७ च्या पत्राचे. या पत्राद्वारे शाहू छत्रपतींनी नागपूरकर भोसल्यांकडून काही शस्त्र सामग्री मागवली होती, त्यात दारूच्या बाणांचा उल्लेख आहे. हे पत्र पेशवा दफ्तर खंड २० मध्ये क्रमांक ८ वर छापलं आहे. दुसरे उदाहरण १७५४ साली श्रीगोंदे येथून पाठविलेल्या मराठा- निजाम यांच्यातील युद्धाच्या एका वृतांतातील आहे. या पत्रामध्ये, " दारू ( तोफखान्याची ) वीस मण सापडली व बाणाचे चोथवे काही सापडले." असे नमूद केले आहे. यातील 'चोथवे' या शब्दाचा अर्थ "ज्यात दारू भरलेली नाही असे दारूच्या बाणाचे नळकांडे" असा होतो. (संदर्भ :- ऐतिहासिक शब्दकोश , पृ. १०३२). https://m.facebook.com/groups/203175528963/permalink/10158290369473964/ मराठ्यांनी रॉकेट वापरले फक्त त्याच स्वरुप, measurements कस होते याविषयी पुरेशी माहिती नाही. टिपू बाबतीत ती आहे कारण हे रॉकेट इंग्रज सैन्याने नेले होते. त्यावर पुढे विल्लीयम कॉंग्रीव्ह याने त्याचा अभ्यास करुन 1807 साली "A Concise account of the origin and progress of the rocket systems.." लिहिल. ते 1810 साली प्रसिद्ध झाल. Introduction मधे तो म्हण्तो "I knew that rockets were used for military purposes in India; but that their magnitude was inconsiderable, and their range not exceeding 1000 yards. I knew also, that some years since several experiments had been made in the royal laboratory by General Desaguliers." मराठा सैन्याने रॉकेट वापरल्याचे उल्लेख पेशवे दफ्तरात आहेत. सत्येन वेलणकर

In reply to by उपयोजक

रंगीला रतन 06/03/2021 - 20:43
रोचक माहिती समाज माध्यमावरच्या पोस्टिंना मी गंभीरपणे घेत नाही. ही माहिती खरी असेल तर रोचक आहे. जाणकरांनी प्रकाश टाकावा.

In reply to by रंगीला रतन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली उदाहरणे आहेत, त्या ही आधीची विजापूर आदिलशाही सैन्याने दारूचे बाण म्हणजे रॉकेट वापरल्याचे उदाहरण आहे. इंग्रजांनी आपला विजय मोठा करण्यासाठी टिपूचे कौतुक केल्याने ते उदाहरण जगभर पोचलं, आणि बाकी पोचली नाहीत एवढंच. सत्येंनने दिलेली उदाहरणे आणि संदर्भ बरोबर आहेत.

साहना 06/03/2021 - 23:00
माझ्या धाग्याने तुम्हाला प्रेरणा मिळाली हे ऐकून आनंद झाला. माझे दोन पैसे. १. नवीन ज्ञानाचा शोध लागतो तो संशोधना द्वारे. ह्यावर कार्ल पोप्पर ह्यांचे लेखन पायाभूत लेखन मानले जाते. सर्व संशोधन हे शेवटी "अंदाज" असतात. एक गृहीतक निर्माण करायचे. मग ठाऊक असलेले ज्ञान, तर्क शास्त्र आणि प्रयोग ह्यांची सांगड घालून गृहीतक चुकीचे ठरवायचे. आधुनिक संशोधनात कुठलेही गृहीतक "बरोबर" ठरवले जाऊ शकत नाही फक्त चुकीचे ठरवले जाऊ शकते. (भारतीय मीमांसा वगैरे तत्वज्ञानात सुद्धा हेच आहे फक्त फरक इतका कि भारतीय ज्ञानव्यवस्थेंत आत्मप्रमाणं हे सर्वांत चांगले ज्ञान आहे जे आधुनिक विज्ञानाला मान्य नाही. ) २. संशोधन करायचे असेल तर "अंदाज" लावायला पाहिजेत. जितके "अंदाज" जास्त तितके आउटपुट जास्त. आणि ह्यासाठी जास्त माणूस पाहिजेत, हे माणूस विचार करण्यासाठी स्वतंत्र असले पाहिजेत, प्रयोग करण्यासाठी स्वतंत्र असले पाहिजेत. त्याशिवाय ह्यांना "वैचारिक धक्के" मिळायला पाहिजेत जे बहुतेक वेळा लोकांच्या प्रवासातून मिळतात. नेटिव्ह अमेरिकन किंवा ऑस्ट्रेलियन नेटिव्स वैचारिक दृष्टया गरीब असण्याचे कारण सुद्धा हेच आहे. > असा वेगळ्या प्रकारे उलटसुलट विचार करता येण्यासाठी मेंदूला तितकी मोकळीक द्यावी लागते. खरे आहे. ज्या समाजांत विचारांवर बंधने आहेत, जिथे व्यापार सरकार नियंत्रित करते, विचार, सेवा आणि वस्तूंच्या देवाणघेवाणीला बंदी आहे तिथे आपोआप संशोधनाची प्रक्रिया मंदावते. ३. आता युरोप किंवा अमेरिकेत हे तांत्रिक शोधांचे प्रमाण जास्त का? आपण खालील पुस्तके किंवा त्यांच्या लेखकांचे तुनळीवरील इंटरव्यू एका - गन्स जेर्म्स अँड. स्टील - https://www.ted.com/talks/matt_ridley_when_ideas_have_sex/transcript - https://www.amazon.com/dp/B00K7ED54M/ [सेपियन्स] टीप : संपूर्ण मानव जातीचा इतिहास पहिला तर जवळ जवळ सर्व प्रदेशांतील समाजानी अनेक शोध लावले आहेत. आपण सध्या अमेरिकन आणि युरो केंद्रित जगांत आहोत म्हणून आम्हाला त्यांचे कौतुक वाटते पण हजारो वर्षांचा इतिहास लक्षांत घेतला तर आपण पाहाल कि बहुतेक समाजानी काही शतके अजब प्रगती केली होती. - सध्याचे इराक, लेबेनॉन इत्यादी प्रदेश मानवजातीच्या संस्कृतीची सुरुवात मानतात. कायद्याचे राज्य, "घटना" इत्यादी गोष्टी इथून उदय पावल्या. शहरे, दूरवरचा व्यापार इत्यादी सुद्धा इथेच निर्माण झाला. भाषा, त्याचा अभ्यास सुद्द्धा मूळ इथलेच (ह्याला आपण अरब प्रदेश म्हणू शकतो). चाकाचा शोध सर्वप्रथम इथेच लागला. (चाकाचा शोध बहुतेक समाजानी भांडी निर्माण करण्यासाठी (पोटर्स व्हील) म्हणून प्रथम लावला आणि त्यानंतर त्याचा गाडी साठी वापर केला. ) - त्यानंतर आफ्रिकेतील इजिप्त ने नेत्रदीपक प्रगती केली. वस्त्रोद्योग, पिरॅमिड सारखे वास्तुकाम, जलप्रवास, आकाश निरीक्षण, कालगणना, इत्यादी. - अखंड भारत आणि चीन प्रदेशांत ह्याच वेळी अनेक प्रकारचे शोध लागत होते. गणित, कालमापन, खेळ, आधुनिक शहरांचे निर्माण, शैक्षणिक स्थानांचे निर्माण, कायदा, कर व्यवस्था, सुती कपडे, धातुकाम इत्यादी. - अमेरिकेतील मायन आणि इंका वगैरेंनी इतर अनेक शोध लावले होते. त्यांनी महाप्रचंड शहरे, खेळणारे पाणी, ऍनिमल ब्रीडिंग, खेळणी, धातुकाम, औषध शास्त्रे इत्यादींचे शोध लावले होते. काही मायन शहरे आधुनिक शहरांपेक्षा जास्त घनतेची होती. - ग्रीक आणि रोमन (मेडिटेरियन) : ह्यांचे पराक्रम सर्वश्रुत आहेत. ह्याशिवाय पर्शिअन, ऑट्टोमन, मंगोल, आणि अनेक अश्या संस्कृती आहेत ज्याची नावे घेतली जाऊ शकतात. मला वाटते प्रत्येक संस्कृतीचा एक उच्च बिंदू असतो आणि एक खालचा बिंदू. सध्या अमेरिका उच्च बिंदू वर आहे तर भारत वगैरे खाली. कदाचित येत्या ५०० वर्षांत हे बदलू शकेल.

In reply to by साहना

उपयोजक 07/03/2021 - 07:46
आभार! छान लिहिलेत. युट्युब व्हिडिओ नक्की पाहतो. _/\_ येत्या ५०० वर्षात चित्र बदलू शकेल असं म्हणताय तुम्ही पण काही शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वी अजून फारतर २५० ते ३०० वर्षे मानवास राहण्यायोग्य असेल.त्याआधीच आपण दुसरा राहण्यायोग्य ग्रह शोधून ठेवला पाहिजे. पुढच्या पिढ्यांना हा दुसरा राहण्यालायक ग्रह शोधणे कमी श्रमात व्हावे म्हणून सध्याच्या पिढ्यांनी जमेल तितके ग्रहसंशोधन केले पाहिजे असे काही वैज्ञानिकांचे मत. म्हणून तर नासा सतत वेगवेगळ्या ग्रहांचा वेध तर घेत नसेल?

In reply to by उपयोजक

साहना 07/03/2021 - 12:12
> पृथ्वी अजून फारतर २५० ते ३०० वर्षे मानवास राहण्यायोग्य असेल. ह्या असल्या भविष्कथनाला काहीही अर्थ नाही. शिवाजी महाराजांच्या काळी कुणी २५० वर्षे वर्षांतील प्रगती वर्तवू शकले असते का ? ते सोडून द्या २० वर्षे मागे आपल्या भारतांतच प्रत्येकाकडे स्मार्टफोन असेल असे आम्हाला शक्य तरी वाटले होते का ? २५० वर्षांचे सोडून द्या, पुढील २० वर्षाचे भविष्य सुद्धा कुणीच वर्तवू शकत नाही. इतकेच म्हणू शकतो कि बदल हा निसर्गाचा नियम आहे.

In reply to by साहना

किंबहुना, तंत्रज्ञानामुळे ध्वनी, हवा, जमीन आणि पाणी यांचे प्रदुषण वाढतेच, असे निरीक्षण आहे...

In reply to by मुक्त विहारि

ह्यामुळे काहीही फरक पडत नाही/पडणार नाही. मानवी सरासरी आयुष्यमान वाढत आहे, वाढणार आहे. मानवी सुख वाढत आहे आणि आणखीन वाढणार आहे. प्रदूषण, नैसर्गिक अप्पत्ती, शीत लहर, गरमीची लहर, पूर इत्यादींमुळे होणारे मृत्यू आणखीन कमी होणार आहेत. ह्यावर मी आधी विपुल लेखन केले असल्यामुळे ह्या मुद्द्यावर हि शेवटची प्रतिक्रिया.

In reply to by उपयोजक

सहमत आहे, तंत्रज्ञान वाढले की, जमीन, हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषण वाढतेच, हे माझे निरीक्षण आहे...
जेंव्हा सद्याचे तन्त्र गरजेच्या सन्दर्भात अपुरे आहे अशी खात्री समाज, संशोधक व पुरस्कार कर्त्याला होते. सध्याच्या ज्ञानाच्या आधारावर एक "हायपोथेसिस" मान्डावा लागतो. मुख्य म्हणजे संशोधनात प्रगति कितपत हे मापण्याची सोय असण्याचे तन्त्र शोधलेले असावे लागते.

Rajesh188 08/03/2021 - 12:55
देवा नी आपल्याला पण मेंदू दिला आहे ह्याची स्वतः ला जाणीव हवी.आणि त्या मेंदूचा वापर केला पाहिजे. कोणती ही माहिती खरी आहे असे बिनडोक पने समजायची गरज नाही. कोणती ही माहिती खरी असेल की खोटी ह्याची स्वतःच मेंदू वापरून ठरवता आलं पाहिजे. मग माहिती देणारा कोणी ही असू ध्या. नवीन शोधाचे सोडा आपण रोज वापरत असलेल्या गाडी विषयी किती लोकांना पूर्ण माहिती असते. कधी बंद पडली ,चालू झाली नाही तर ,विविध आवज येत असतील तर ते कशाचे असतील. ह्या विषयी खूप कमी लोकांना माहिती असते. स्वतः पंख्याचे वायरिंग कसे करावे,tube light लागत नसेल तर ती कशी चालू करावी. खूप लोकांना माहीतच नसते. पाहिले रोज वापरत असणाऱ्या वस्तू कसे काम करतात हे समजून घेणे म्हणजे संशोधक वृती. आणि अशी वृत्ती असणारे लाखात 1 ह्या प्रमाण मध्ये पण आपल्याकडे कोण नसेल.

In reply to by Rajesh188

आनन्दा 09/03/2021 - 18:17
>>> देवा नी आपल्याला पण मेंदू दिला आहे ह्याची स्वतः ला जाणीव हवी.आणि त्या मेंदूचा वापर केला पाहिजे. >>>> कुठे वापरायचा ही जाणीव पण महत्वाची आहे.

Rajesh188 08/03/2021 - 13:55
आपल्याकडे म्हणजे जगात कुठे ही भारतीय आहेत त्यांच्या रक्तात जे गुण आहेत ते बदलेले नाहीत.. ते सर्व भारतात राहणाऱ्या लोकांन पेक्षा बिलकुल वेगळे नाहीत. शेवटी DNA तोच आहे.

Rajesh188 08/03/2021 - 13:56
आपल्याकडे म्हणजे जगात कुठे ही भारतीय आहेत त्यांच्या रक्तात जे गुण आहेत ते बदलेले नाहीत.. ते सर्व भारतात राहणाऱ्या लोकांन पेक्षा बिलकुल वेगळे नाहीत. शेवटी DNA तोच आहे.

अर्धवटराव 09/03/2021 - 03:47
संशोधनाने व्यापार हिताला प्रचंड फायदा होतो हे गोर्‍यांनी ओळखलं, आणि आर्थीक हुकुमत हि राजकीय हुकुमतेएव्हढीच, किंबहुना काकणभर जास्तच फलदायी असते देखील त्यांना लवकर कळलं. म्हणुन कदाचीत तिथे संशोधनाला जास्त प्रोत्साहन मिळालं. आपल्याकडे आर्थीक सुबत्तेच्या जाणीवेची वानवा नव्हती. एक से बढकर एक श्रीमंत राज्ये झालीत आपल्याकडे. पण त्याचा उपयोग दातव्यं-भोक्तव्यं इतकाच राहिला.

In reply to by अर्धवटराव

उपयोजक 09/03/2021 - 13:26
सहमत आहे. व्यापार वाढवण्याच्या इच्छेने संशोधनाला बळ आणि निधीही उपलब्ध होत असावा. चोळ राजांच्या काळात आग्नेय आशियात व्यापार पसरवण्यासाठी नाविक दल ,नौकानयन यात बरीच प्रगती झाली. Catamaran हे नाव 'कट्टामारन' या तमिळ लोकांनी विकसित केलेल्या वेगाने जाणार्‍या बोटीच्या नावावरुनच आले आहे.

In reply to by उपयोजक

अर्धवटराव 09/03/2021 - 18:12
Catamaran हे नाव 'कट्टामारन' या तमिळ लोकांनी विकसित केलेल्या वेगाने जाणार्‍या बोटीच्या नावावरुनच आले आहे.
हे माहित नव्हतं. माहितीबद्दल धन्यवाद.

Rajesh188 10/03/2021 - 06:18
आता खूप पद्धतशीर पने स्वार्थ साधला जातो. आता नसलेली गरज शोधली जाते निर्माण केली जाते. मग ती गरज भागवणे कसे गरजेचे आहे ह्याचा प्रचार केला जातो आणि अगोदरच ठरवून संशोधन केलेला प्रॉडक्ट बाजारात येतो. गरजेतून शोध हा प्रकार आता बंद झाला आहे शोध पहिला आणि नंतर गरज निर्माण करणे असा उलटा प्रकार चालू आहे
१) अणुबॉम्ब नी शत्रू राष्ट्र ला दबावात ठेवता येते शत्रू चा भयंकर विनाश करता येतो. युद्ध जिंकणे ही गरज अणुबॉम्ब हा शोध. पण अणू बॉम्ब पासून स्वतःचे रक्षण करण्याकरता कोणतेच नवीन संशोधन झालेलं नाही. शस्त्र राष्ट्र नी अणुबॉम्ब चा वापर केला तर तो हवेतच निष्क्रिय करण्याचे तंत्र जगात कोणाकडेच नाही. म्हणजे गरज इथे पण आहे पण शोध नाही. २) ak ४७ पासून अनेक आधुनिक बंदुका निर्माण झाल्या . पण त्या पासून वाचण्यासाठी उत्तम प्रतीचे आणि खात्री नी रक्षण करणारे बुलेट proof जॅकेट अस्तित्वात नाही. इथे पण गरज आहे पण शोध नाही. ३) वस्तू पॅकिंग पासून अनेक गोष्टी ची गरज प्लास्टिक चा शोध लावून पूर्ण झाली. पण प्लास्टिक प्रदूषण करते ,प्लास्टिक चे विघटन होत नाही . प्लास्टिक चे विघटन होणे ही गरज आहे पण तसे कोणतेच तंत्र आज तरी उपलब्ध नाही. ५) विविध रोग जंतू शोधून काढले,जिवाणू ,विषाणू ह्यांचा अभ्यास केला गेला. पण कोणी जैविक हत्यार वापरले तर स्व संरक्षण करण्याचे कोणतेच हत्यार उपलब्ध नाही. गरज आहे पण शोध नाही. Corona काळात साधा मास्क बनवता आला नाही ज्यांनी पूर्ण स्वतःचे रक्षण होईल असा. लोकांना फडकी तोंडाला बांधावी लागली आणि प्लास्टिक पासून शिवलेले कपडे ppt kit म्हणून वापरायला लागले. अशी काही उदाहरणे बघितली तर असे म्हणता येईल गरज हे फक्त शोध लागण्याचे कारण नाही. तर आर्थिक फायदा जिथे होवू शकेल त्याच क्षेत्रात शोध लागले जातात.व्यापक जन हितासाठी आता कोणतेच शोध लावले जात नाहीत. पूर्वी संशोधक स्वतःला झोकून द्यायचे त्यांच्या स्वतःच्या कऱ्यस्त आर्थिक हिशोब न ठेवता आता कोणताच संशोधक स्वतःला झोकून देत नाही.तर आर्थिक फायदा जिथे जास्त तिथेच ते काम करतात. हे प्रतेक क्षेत्रात च आहे.