कोविड १९ घडामोडी : समज, गैरसमज

हेमंतकुमार काथ्याकूट
(शेवटचे संपादन : २० /०३/२०२१) गेले तीन महिने आपण सर्व कोविडमय झालेलो आहोत. हा आजार नवा असल्याने त्यावर अविरत संशोधन होत आहे. या दरम्यान अनेक प्रसारमाध्यमांतून या आजाराबद्दलची विविध माहिती दिली जात आहे. त्यापैकी काही विश्वासार्ह असते, पण त्याच बरोबर चुकीची माहिती, अर्धवट माहिती आणि अनेक अफवा यांचाही सुकाळ आहे. या संदर्भात मला व्यक्तिगत संपर्काद्वारा अनेक प्रश्न विचारले गेले. त्यातून असे जाणवले की काही बाबतीत समाजात बरेच गैरसमज पसरले आहेत. त्यांचे निराकरण करावे या उद्देशाने हा स्वतंत्र धागा काढत आहे. तो लेख स्वरूपात नसून लोकांकडून प्रत्यक्ष जे प्रश्न विचारले गेले त्यांची उत्तरे, या स्वरूपाचा आहे. अजून जसजसे लोकांचे प्रश्न वाढत जातील तशी या प्रश्नोत्तरांमध्ये भर घालता येईल.

कोविड१९ हा समाजात उद्भवलेला पूर्ण नवीन आजार आहे. संबंधित रुग्णांचा जागतिक पातळीवर सतत अभ्यास चालू आहे. त्यातून त्याचे स्वरूप हळूहळू उलगडत आहे. त्यानुसार तज्ञांची मते तयार होत आहेत. बऱ्याचदा त्यात एकवाक्यता दिसत नाही. आजाराचे स्वरूप देखील विविधांगी आहे. या धाग्यात केलेले लेखन हे लिहितेवेळीच्या अधिकृत वैद्यकीय माहितीनुसार केलेले आहे. त्यात वेळोवेळी बदल होऊ शकतात याची नोंद घ्यावी. असे काही महत्त्वाचे बदल झाल्यास त्याची दखल नव्या प्रतिसादातून घेईन.

प्रश्न : …………………………………………….. १. कोविडसाठी Antibodies चा उपाय पारंपारिक विषाणूनाशक औषधांपेक्षा भारी असतो का? ‘भारी’ असे नाही म्हणता येत; उपचारांच्या त्या दोन दिशा आहेत. सध्या सुमारे ५० प्रकारच्या करोनाविरोधी औषधांच्या चाचण्या चालू आहेत. ढोबळ मानाने त्यांचे असे वर्गीकरण करता येईल: १. पारंपरिक रासायनिक औषधे ( HCQ इ.) २. विषाणूविरोधी औषधे ३. अ‍ॅन्टिबॉडीज ४. मूळ पेशींचे उपचार. या सर्वांचे रुग्णप्रयोग शास्त्रीय पद्धतीने चालू आहेत. त्यांचे दखलपात्र निष्कर्ष बाहेर यायला काही महिने जावे लागतील. काही रुग्णांना अ‍ॅन्टिबॉडीजच्या जोडीने विषाणूविरोधी औषधे देखील द्यावी लागतात. पुरेसे निष्कर्ष हाती आल्याखेरीज अमुक एक उपचार ‘भारी’ आहे असे म्हणता येणार नाही. ………………………………………………………………………………………………………….. २. कोविडसाठी बीसीजी लसीचे उपचार उपयुक्त आहेत का ? बीसीजी लस आणि कोविड यांचा संबंध तपासण्यासाठी एप्रिलपासून अनेक रुग्णप्रयोग चालू झालेले आहेत. त्यांचे निष्कर्ष हाती यायला सुमारे ४ महिने तरी लागतील. यानिमित्ताने बीसीजीबद्दल काही उपयुक्त माहिती: १. ज्या देशांत ती बालपणी सर्वांना देतात, तिथे बालकांच्या श्वसनाच्या गंभीर आजारांचे प्रमाणात घट दिसली आहे. २. मुळात ही लस जरी जीवाणूविरोधी असली तरी तिच्यात काही विषाणूविरोधी गुणधर्म आहेत. ३. या लसीचे देखील काही उपप्रकार आहेत. त्यानुसार तिचे गुणधर्मही बदलतात. याचाही पुरेसा अभ्यास व्हायचा आहे. ४. सध्यातरी करोना- 2 आणि बीसीजीचे उपचार यासंदर्भात पुरेसा विदा मिळालेला नाही …………………………………………………………………………………………………………………………………………. ३. ड जीवनसत्व आणि कोविडची तीव्रता यांचा कितपत संबंध आहे ? यासंबंधी आता जोरदार संशोधन आणि काथ्याकूट होत आहे त्यासंदर्भात काही रोचक मुद्दे असे आहेत: १. आपल्या त्वचेत तयार होणारे ड आणि आपले राहण्याचे भौगोलिक स्थान यांचा घनिष्ट संबंध असतो. हे स्थान विषुववृत्तापासून जसजसे उत्तरेकडे वरवर जाते तसे ड कमी प्रमाणात तयार होते. २. ज्या शहरांत हवेच्या प्रदूषणाचे प्रमाण खूप असते तिथे देखील शरीरात ड कमी तयार होते. ३. वरील दोन्ही घटक वुहान, तेहरान, मिलान, सिएटल, न्यूयॉर्क आणि लॉस एंजेलिस या शहरांना लागू होतात. ४. वाढत्या वयानुसार देखील त्वचेतील ड चे उत्पादन कमी होत जाते. बरेच जेष्ठ लोक आहारातून पुरेसे ड मिळेल याची काळजी घेत नाहीत. त्यामुळे त्यांना ड ची कमतरता होते. ५. तसेच दीर्घकाळ धूम्रपान केल्यास देखील ड ची कमतरता होते. ६. ड ची पातळी आणि श्वसनसंस्थेची रोगप्रतिकारशक्ती यांचा संबंध काही अभ्यासांत दिसला आहे. ..... जसे या विषयावर अधिक संशोधन होत राहील, तसा अधिकाधिक प्रकाश पडेल. ……………………………………………………………………………………………………………………….. ४. गेल्या काही दिवसात “अमुक-तमुक रसायने खा आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवा”, या आशयाचे अनेक सल्ले ढकलपत्रांतून फिरवले गेले. त्यात किती तथ्य ? या संदर्भात मला एका वैद्यकीय तज्ञांचे मत दखलपात्र वाटले. ते इथे लिहितो. शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी लागणाऱ्या विविध घटकांपैकी जर कशाची खरोखर कमतरता असेल, तरच तो घटक बाहेरून देण्याने उपयोग होतो. “ प्रतिकारशक्ती वाढवा (बूस्ट)” हे विधान मुळात अशास्त्रीय आहे. जर एखाद्या कमतरतेमुळे प्रतिकारशक्ती कमी झाली असेल, तर ती कमतरता बाहेरून घटक देऊन भरून काढली जाते. त्यामुळे कमी झालेली प्रतिकार शक्ती पूर्ववत (नॉर्मल) होते. तेव्हा नागरिकांनी निव्वळ ढकलपत्रातील संदेश वाचून वैद्यकीय सल्याविना कुठलेही रसायन/ औषध घेण्यात मतलब नाही. कोविड-प्रतिबंध आणि जीवनसत्वे १. क जीवनसत्व : औषधरूपात घेण्याची गरज नाही. रोजच्या आहारात लिंबू आणि मोसमानुसार पेरू, आवळा इत्यादी फळे व्यवस्थित खावीत. २. ड जीवनसत्व : वयाच्या 50 ते 55 नंतर जर हाडांची दुखणे उद्भवली असतील तरच संबंधित डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधरूपात घ्यावे. उगाचच स्वतःच्या मनाने नाही. ………………………………………………………………………………………………………………………………………………. ५. कोविड१९ साठी रक्तद्रव उपचार : गेल्या काही दिवसात यावर खूप चर्चा होत आहे. म्हणून या बद्दलची काही शास्त्रीय माहिती : १. या उपचारासाठी दात्याची निवड कशी करतात ? खालील निकष पूर्ण करणारा दाता सुयोग्य असतो: *वय १८ ते ५५ दरम्यान. *१०१.३ अंश F च्यावर ताप येऊन तो तीन दिवस वा अधिक टिकलेला असणे. *असा दाता स्वतः कोविडसाठी उपचार घेऊन नुकताच बरा झालेला असतो. त्यानंतर सुमारे १४ दिवस त्याला या आजाराची कुठलीही लक्षणे नसावी लागतात. त्याची प्रयोगशाळा चाचणी सलग दोनदा नकारात्मक यावी लागते. *पहिले लक्षण आलेल्या दिवसानंतर एक महिन्याने त्याच्या रक्तातील IgG बॉडीजचे प्रमाण चांगले असते. २. या उपचारात प्राप्तकर्त्या रुग्णास काही धोका असतो का ? वरवर पाहता तसा नसतो पण, एक शक्यता राहते. जेव्हा आपण सध्याच्या करोनाविषाणू विरोधी antibodies दिल्या, तर कालांतराने या विषाणूच्या अन्य प्रकारापासून संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो. ………………………………………………………………………………………………………………………………………………… ६. कोविड होण्याचे प्रमाण आणि लिंगभेद यात तथ्य किती ? या प्रश्नाचे उत्तर वंश आणि देशानुसार वेगवेगळे आहे. तरी काही निरीक्षणे लिहितो. या विषाणूचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा लिंगभेद नाही. पण, हा आजार झाल्यानंतर तो गंभीर होण्याचे आणि त्यातून पुढे मृत्यूंचे प्रमाण काही देशांत पुरुषांत अधिक दिसून आले आहे. याची कारणमीमांसा तशी रोचक आहे. अद्याप यावरील संशोधन चालू आहे. अंदाजे काही निष्कर्ष असे आहेत : १. साधारणपणे स्त्रियांमध्ये रोग प्रतिकारशक्तीची कार्यक्षमता अधिक असते. यामागे स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या हॉर्मोन्सचा वाटा असतो. तसेच स्त्रीमध्ये दोन X गुणसूत्रे (XX) असल्याचाही या शक्तीला काही फायदा होतो. त्यामुळे शरीरात घुसलेल्या रोगजंतूंचा निचरा लवकर आणि चांगल्या प्रमाणात होतो. २. बऱ्याच देशांत धूम्रपानाचे प्रमाण पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा अधिक आहे, हाही मुद्दा विचारात घ्यावा लागतो. ३. या विषयाची अजून एक बाजू. जागतिक महासाथीमुळे जे विपरीत मानसिक परिणाम होतात, ते मात्र स्त्रियांमध्ये अधिक तीव्र असतात. ……………………………………………………………………………………………………………………………………….. ७. कोविडसाठी (संसर्गातून) सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्याबाबत विशेष असं संशोधन जगात चालू आहे का? होय, असे काही अभ्यास चालू आहेत. १. अशा अभ्यासात बाधित लोकांपैकी किती मृत्यू पावतात याचे गुणोत्तर काढले जाते. ते देशानुसार भिन्न आहे. २. एकदा बाधित झाल्यानंतर पुन्हा तोच संसर्ग होतो का हे आजमावले जाते. त्यासाठी माकडांवर काही प्रयोग झाले आहेत. ३. बऱ्या झालेल्या रुग्णांत विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीज किती प्रमाणात निर्माण झाल्यात हेही मोजले जाते. ४. एकंदरीत करोना या विषाणू जमातीने शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती अल्पकालीन असावी, असा सध्याचा अंदाज आहे. ५. त्यामुळेच लस शोधणे महत्त्वाचे ठरेल. ……………………………………………………………………………………………………………………………………………………………. ८. घरगुती पातळीवर आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी सगळ्यांनी मोजावी का? प्रश्न चांगला आहे पण त्याचे उत्तर सरळ नाही ! बरेच उलट-सुलट मुद्दे विचारात घ्यावे लागतात. १. रक्तातील ऑक्सिजनची पातळी अन्य श्वसनाच्या आजारात देखील कमी होऊ शकते. उदा. न्युमोनियाचे अन्य प्रकार, अन्य दीर्घकालीन श्वसनविकार . ३. घरगुती वापराच्या oximeter यंत्रांची अचूकता बरीच कमी असते. विशिष्ट ऑक्सिजन पातळीच्या खाली त्यांची उत्तरे विश्वासार्ह नसतात. ४.अशी मोजणी घरी करताना दक्षता घ्यावी लागते. हात पुरेसे गरम असावे लागतात तसेच संबंधित बोटाच्या नखाला नेलपॉलिश असलेले सुद्धा चालत नाही. ५. उठसूट घरगुती मोजणीमुळे विनाकारण भीतीचे प्रमाण वाढत जाते. हे सर्व बघता या उपकरणाचा उठसूट सर्वांसाठी वापर सुचविलेला नाही. ………………………………………………………………………………………………………………………………………………………… ९. कोविडमुळे मृत्यू होण्याची कारणे काय आहेत ? कोविडमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या जगभरात बरीच आहे. अशा काही मृतदेहांचे अभ्यासासाठी शवविच्छेदन केले जाते. त्यातून मृत्यू होण्याची कारणे अभ्यासली जातात. आतापर्यंत विच्छेदनातून समजलेली तीन कारणे अशी आहेत: १. विषाणूच्या थेट हल्ल्यामुळे झालेला शरीरपेशींचा नाश २. अनेक रक्तवाहिन्यांमध्ये झालेल्या रक्तगुठळ्या ३. या विषाणूला रुग्णाच्या शरीराने दिलेला hyperimmune प्रतिसाद >>> अधिकाधिक पेशींचा नाश. ....................................................................... १०. करोना २ ची लस खरेच लवकर उपलब्ध होईल का? ती घाईने बाजारात आणल्यास काही तोटे? लसीचा मुद्दा उपस्थित केलाय हे छान झाले. सध्या या संदर्भात माध्यमांतून काही उलटसुलट आणि अर्धवट बातम्या आलेल्या आहेत. या निमित्ताने काही अधिकृत माहिती इथे देतो. कुठलीही लस प्रत्यक्ष वापरात येण्यापूर्वी ती सुरक्षित आणि प्रभावी अशी सिद्ध व्हावी लागते. हे दीर्घकालीन काम असते. एखाद्या लसीवरील संशोधन परिपूर्ण व्हायला तब्बल वीस वर्षे जावी लागतात. आता सध्याच्या आजारावरील लस्सीबद्दल पाहू. ही लस जर घाईघाईत तयार केली तर तिच्या संशोधनातील बरेच टप्पे नजरेआड करावे लागतात. कुठलीही लस तिच्या संशोधनादरम्यान अनेक लोकांना देऊ पहावी लागते, तसेच तिचे निरनिराळे डोस देखील देऊन पहावे लागतात. त्यानंतर संबंधित लोकांचे दीर्घकाळ निरीक्षण केल्यावरच योग्य निष्कर्ष निघतात. हे सर्व पाहता सुरक्षित आणि प्रभावी अशी लस लवकर वापरात येणे अवघड दिसते. म्हणून कोविडशी सामना करीतच बराच काळ जावा लागेल असे दिसते. ................................................................................................................................................. ११. करोनाचा संसर्ग डोळ्यांच्यावाटे होतो का? ज्याप्रमाणे फ्ल्यूचे अन्य विषाणू डोळ्यांच्यावाटे शिरू शकतात तसेच हाही विषाणू शिरू शकतो. पण, अशा प्रकारे संसर्ग झालेल्या व्यक्ती अत्यल्प आहेत. किंबहुना त्याचा पुरेसा विदा उपलब्ध नाही. आरोग्यसेवकांनी काम करताना आपला चेहरा पूर्ण झाकावा हे योग्यच. पण सामन्यांसाठी तशी शिफारस नाही. नाक व तोंड झाकणे पुरेसे आहे. हात नेहमी स्वच्छ ठेऊन ते डोळ्यांना लागणार नाहीत, ही काळजी घेतली की पुरे. ................................................................................................... १२. सध्या जे रोगी कोविड१९ होऊन बरे झाले आहेत त्यांना यापुढे हा आजार पुन्हा होत नाही, हे खरे आहे का? याचे उत्तर गुंतागुंतीचे आहे. जे रोगी या आजारातून बरे झाले आहेत, त्यांच्या रक्तातील विशिष्ट प्रथिनांचा (antibodies) चा अभ्यास केला जातो. ही प्रथिने दोन प्रकारची असतात : 1. मारक (Neutralizing) 2. अ-मारक यापैकी फक्त पहिल्याच प्रकारची प्रथिने त्या विषाणूने पुन्हा हल्ला केल्यास उपयुक्त ठरतात. ज्या रुग्णांत ही प्रथिने भरपूर तयार झाली असतील, त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असेल. (अर्थात अशी प्रथिने किती काळ रक्तात टिकू शकतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही). पण ज्यांच्यात दुसऱ्या प्रकारची प्रथिने जास्त असतील, त्यांना हा फायदा होणार नाही. कारण ही प्रथिने त्या विषाणूचा (पुढच्या संसर्गात) नाश करू शकत नाहीत. ........................................................................................................................ १३. “ आपला विशिष्ट रक्तगट (A) आणि कोविड१९ होण्याची शक्यता यांचा खरंच संबंध आहे का ? या संदर्भात मोजके अभ्यास युरोपमध्ये झालेले आहेत. त्यामध्ये ‘ए’ रक्तगट असणाऱ्या रुग्णांचा विशेष अभ्यास केला गेला. या गटाच्या माणसांना जर कोविड झाला, तर त्यांच्यात श्वसनकार्य मोठ्या प्रमाणावर ढासळू शकते (failure). इतकाच सध्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. अर्थात रक्तगट आणि हा आजार होण्याची अधिक शक्यता, यावर अजून पुरेसे संशोधन झालेले नाही. तेव्हा घाईने या मुद्द्याचे सरसकटीकरण करता येणार नाही. १३ ब. ओ (positive,निगेटिव्ह) रक्तगट आणि covid 19 च्या आजाराची तीव्रता ह्याचा काही संबंध आहे का ? २००८ मधील करोना-१ या विषाणू संदर्भात असे काही जुजबी संशोधन प्रयोगशाळेत झाले होते. तूर्त सध्याच्या करोना-२ बाबत मात्र असे संशोधन बाल्यावस्थेत आहे. ‘ओ’ गटाच्या लोकांमध्ये काही विशिष्ट antibodies तयार होत असतात. त्यांच्यामुळे या विषाणूला पेशीत शिरण्यास प्रतिबंध होतो, असे एक गृहीतक आहे. पण सध्या कुठलाही निष्कर्ष काढलेला नाही. ........................................................................................................................................................ १४. हा आजार उच्चरक्तदाबाच्या रुग्णांना जेवढा वाईट आहे तेवढा दम्याच्या लोकांना नाही, असे वाचले. हे खरं आहे का ? होय त्यात काही तथ्य आहे. या आजाराचा विषाणू पेशीत शिरताना एका विशिष्ट एंझाइमला चिकटतो आणि मग पुढील प्रक्रिया होतात. त्यातून आजार उद्भवतो. रक्तदाबाच्या आणि हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये या एंझाइमचे प्रमाण जास्त असते. याउलट ते प्रमाण दम्याच्या बऱ्याच रुग्णांमध्ये कमी असते. सध्या हे गृहितक चर्चेत आहे. अधिक संशोधन होत आहे. दम्याचे रुग्णांना अजून एक फायदा होतो. हे रुग्ण तोंडावाटे steroids चा फवारा घेत असतात. या औषधामुळे श्वसनमार्गात विशिष्ट प्रथिनांचे ( ACE२) प्रमाण कमी होते. त्यामुळे अशा लोकांना कोविड झाल्यास तो बऱ्यापैकी नियंत्रणात राहतो. ................................................................................................................................................................................. १५. रुग्णाचा कोविड’मुळे’ मृत्यू झाला की अन्य आजार आणि कोविड’सह’ मृत्यू झाला, हे कसे ठरवायचे ? मृत्यूचे निदान ही अचूक गोष्ट असते. पण, मृत्यूचे खरे कारण ही मात्र काही वेळेस (विशेषतः साथींच्या काळात ) वादग्रस्त गोष्ट ठरते. बऱ्याच वेळा मृत्यूचे कारण हे संबंधित डॉक्टरांचा अनुभव आणि परिस्थितीजन्य पुरावा यावरून दिले जाते. मृत्यूनंतर काही मृतदेहांचे अभ्यासासाठी शवविच्छेदन केले जाते. त्यातच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होते. अर्थात ही प्रक्रिया सर्वांचे बाबतीत केली जात नाही; तसे शक्यही नसते. ............................................................................................................. १६. “कोविड१९ हा आजार दीर्घकालीन होऊन त्याचे भविष्यात मोठे दुष्परिणाम होतील का?” हा प्रश्न १ महिन्यापूर्वी माझ्या या आधीच्या धाग्यात विचारला गेला होता. आता हा आजार समाजात उद्भवल्याला सहा महिने उलटलेत. त्यादृष्टीने काही माहितीची भर: १. असे काही रुग्ण तब्बल तीन महिने अंथरुणात खिळून आहेत. २. काहींना उपचारानंतर लक्षणे अजिबात नाहीत, पण दोन महिने उलटल्यावरही त्यांच्या चाचणीचे निष्कर्ष होकारात्मकच आहेत. ३. काहींमध्ये कालांतराने विशिष्ट प्रकारचा न्युमोनिया होऊ शकेल. ................................................................................................................................... १७. कोविडविरोधी लसीचा संरक्षक कालावधी कमी असणार आहे का ? लस तयार करण्याच्या पारंपरिक पद्धतीनुसार तिचा संरक्षक कालावधी (सं का) ठरतो. १. काही लसी ( देवी, पिवळा ताप) या सौम्य केलेल्या जिवंत जंतूंपासून बनविल्या होत्या. देवीलसीचा ‘सं का’ पन्नास वर्षांहून अधिक काळ होता. २. करोना २ च्या बाबतीत त्या विषाणूच्या एका प्रथिनाचा वापर लस तयार करण्यासाठी होतो. ते प्रथिन पूर्णपणे की अंशतः वापरायचे यावर मतभेद आहेत. त्यानुसार संबंधित लसीच्या संकात फरक पडेल. ३. वरील प्रकार २ च्या लसींचा सं का १ पेक्षा खूप कमी असतो. म्हणून त्यांना बूस्टर द्यावे लागतात. ४. सारांश : लस तयार करताना संशोधकांना तराजूच्या एका पारड्यात प्रभावीपणा तर दुसऱ्यात सुरक्षितता ठेवावी लागते. तो समतोल साधणे जिकिरीचे असते. ........................................................................................................................................................... १८. “करोना- २ विरोधी औषध शोधायला एवढा वेळ का लागतोय?” या संदर्भात काही मूलभूत माहिती: विषाणूंच्या रचनेनुसार त्यांचे DNA व RNA असे दोन प्रकार आहेत. करोना- २ RNA या प्रकाराचा आहे. अशा प्रकारच्या विषाणूंची काही वैशिष्ट्ये: १. त्यांचा जनुकीय संच खूप लहान असतो. २. त्यामुळे त्यांचे जनक जनुकीय बदल वेगाने आणि वारंवार होतात. ३. त्यांची रचना बरीच भिन्न स्वरूपाची असते. ४. त्यांची उत्क्रांती वेगाने होत राहिल्याने औषधांना त्यांचा पाठलाग करणे तुलनेने अवघड जाते. ५. म्हणून त्यांच्याविरोधी नवनवी औषधे लवकर निष्प्रभ होऊ शकतात. ( याउलट वैशिष्ट्ये DNA गटातील विषाणूंची असतात). ........................................................................................................................ १९. वाफ घेणे व रोगप्रतिबंध वाफ आणि श्वसनसंस्था याबद्दल काही मूलभूत माहिती: कुठल्याही श्वसनविकारात जेव्हा नाक चोंदणे, घशात खूप द्राव साठणे असे होते, तेव्हा वाफेने ते स्वच्छ व मोकळे होण्यास मदत होते. सूक्ष्म श्वासनलिकांपर्यंत वाफ पोचत नाही. तेव्हा ‘वरच्या’ श्वसनमार्गाची स्वच्छता हा वाफेचा खरा उपयोग आहे. तो कुठल्याही विशिष्ट सूक्ष्मजंतूच्या विरोधातील उपाय असत नाही. त्याचे महत्व श्वसनविकारातला पूरक उपचार इतकेच आहे. ......................................................................................................... २०. रेमडेसीविर आणि इटोलीझुमॅब यात काय फरक असतो ? १. रेमडेसीविर हे थेट विषाणूविरोधक आहे. ते आपल्या पेशींतील या विषाणूची तुफान वाढ थांबवते. ( अशा सर्व औषधांच्या नावात अंत्य ‘विर” असते. Antiviral या अर्थी) २. इटोलीझुमॅब ही मुळात विशिष्ट प्रकारची antibody आहे. (अशा सर्व औषधांच्या नावात अंत्य ‘मॅब’ असते). जेव्हा विषाणू पेशीत हल्ला चढवतो, तेव्हा त्याला प्रतिकार म्हणून तिथे प्रचंड दाहप्रक्रिया होते. काही वेळेस ही अनियंत्रित होते >> गंभीर आजार >> मृत्यू. हे औषध दाहप्रक्रिया नियंत्रित करते. ........................................................................ २१. कोविड आणि हृदयाचा त्रास यासंबंधी दोन प्रकारची निरीक्षणे आहेत: १. जे रुग्ण या आजारातून बरे झाले त्यांना पुढे काही दिवसांनी हृदयस्नायू कमकुवत होण्याचा त्रास दिसून आला. यांच्यातील काहींना पूर्वी मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता, तर काहींना नव्हता. २. काही मृतांच्या शवविच्छेदनात या विषाणूने हृदयस्नायूला इजा केल्याचे आढळून आले आहे. ............................................................... २२. इंटरफेरोन्सचे उपचार : इंटर्फेरोन्स (IF) ही सजीवांच्या पेशींनी विषाणू विरोधात तयार केलेली प्रथिने असतात. ती औषधरूपात प्रयोगशाळेत देखील तयार केली जातात. मुळात ती विषाणूंची वाढ रोखतात (interfere with). कोविड संदर्भात त्यांचे विविध रुग्णप्रयोग अजून चालू आहेत. एका अभ्यासात हा मध्यम आजार झालेल्या रुग्णांना IF अधिक अन्य दोन विषाणू विरोधी औषधे एकत्र दिली गेली. तिथे परिणाम चांगले दिसले आहेत. अर्थात यावर अजून पुरेशी तज्ञ चिकित्सा व्हावयाची आहे. अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. .......................................................................... २३. किरणोत्सर्गाचे उपचार : न्यूमोनियातील दाह कमी करण्यासाठी किरणोत्सर्गाचे उपचार शंभर वर्षांपूर्वीही दिले जात. आता हा उपचार पुन्हा चर्चेत आला आहे. यामध्ये किरणोत्सर्गाचा सौम्य डोस शरीरावर दिला जातो. हा १ डोस साधारण सिटीस्कॅनच्या डोसपेक्षा थोडा अधिक असतो. तो थेट विषाणू विरोधक म्हणून काम करत नाही, पण फुफ्फुसातील दाहप्रक्रिया कमी करतो. सध्या भारतासह सहा देशात त्याचे प्रयोग चालू आहेत. हा उपचार गंभीर आजार असलेल्या आणि ऑक्सिजन द्याव्या लागणाऱ्या रूग्णांसाठी केला जात आहे. काही निष्कर्ष चांगले आहेत मात्र किरणोत्सर्गाचे संभाव्य दीर्घकालीन दुष्परिणाम ध्यानात घ्यावे लागतील. त्यामुळे हा उपचार मर्यादित रुग्णांपुरताच विचाराधीन आहे. ..................................................................................... २४. मृतदेहाद्वारा या रोगाचा प्रसार होतो का ? या विषयावर बरेच संदर्भ पाहिल्यावर एक स्पष्ट होते. ते म्हणजे याबाबत समाधानकारक शास्त्रीय पुरावा किंवा विदा उपलब्ध नाही. काही उल्लेखनीय मुद्दे : १. इतिहासात अन्य महासाथींच्या दरम्यान मृतदेह हाताळण्याची काही ठाम तत्त्वे पाळली गेली आहेत. त्याला अनुसरून सध्याही तशात अंतरिम सूचना जाहीर झाल्या. २. व्यक्ती मृत्यू झाल्यावर शरीरात कुजण्याची प्रक्रिया सुरू व्हायला थोडा वेळ लागतो. एकदा ती सुरू झाली, की शरीरातील विषाणू वगैरे सर्व नष्ट होतात. ३. त्या ‘मधल्या’ वेळात विषाणू बाहेर पोहोचू शकतील असे गृहीतक मांडले गेले. प्रत्यक्ष सार्स-२ बाबत तसा काही ठोस अभ्यास झालेला नाही. ४. रेडक्रॉसच्या अंतरराष्ट्रीय फॉरेन्सिक समितीचे प्रमुख डॉ. Oran Finegan आहेत. त्यांचे उद्गार असे आहेत, “रोगप्रसाराचा सर्वात मोठा धोका जिवंत बाधिताकडून आहे, मृताकडून नाही”. ५. व्यक्तिगत पातळीवर मृतदेह काळजीपूर्वक हाताळले जाणार नाहीत, या गृहितकामुळे ते ताब्यात न देण्याचा शासकीय निर्णय झालेला दिसतो. एक संदर्भ: https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7290165/ ........................................................... २५. कोविड आणि अस्पिरीनचा उपयोग अस्पिरीनला दाहप्रतिबंधक आणि रक्तगुठळीप्रतिबंधक असे दोन्ही गुणधर्म आहेत. सध्याच्या आजारात अनेक लोकांमध्ये रक्त गोठण्याच्या प्रक्रिया बऱ्यापैकी झालेल्या दिसून आल्या आहेत. रुग्णाचे एकंदरीत रिपोर्ट पाहून संबंधित डॉक्टर अस्पिरीनचा निर्णय घेतात. बऱ्याच प्रयोगांमध्ये असे दिसले आहे, की ज्या रुग्णांना ऍस्पिरिन चालू होती त्यांचा हा आजार नियंत्रणात राहिला व गंभीर झाला नाही. तसेच अशा एकूण रुग्णांचा मृत्यूदरही कमी राहिलेला आहे. यावर अधिक संशोधन अभ्यास चालू आहेत. .......................................... २६. भविष्यात कोविडचा समूळ नाश होइल का ? मानवी संसर्गजन्य आजारांच्या इतिहासात समूळ नाश झालेला एकमेव आजार म्हणजे देवी. तो नष्ट होण्यामागे दोन कारणे होती: १. माणूस सोडून अन्य प्राण्यांत देवीच्या जंतूंचा साठा (reservoir) नसणे. २. प्रभावी लसीकरण कोविडच्या बाबतीत वटवाघळात साठा असणे ही कटकटीची बाब आहे. लसीकरण सध्या प्रायोगिक अवस्थेत आहे. म्हणून…. समूळ नाश होणे कठीणच. आजार सौम्य करणे व साथ नियंत्रणात आणणे हे ध्येय. ..................................
वर्गीकरण
वर्गीकरण

164 टिप्पण्या 118,338 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

शाम भागवत नवीन

नविन प्रश्नोत्तरे धाग्यातच अंतर्भूत करता आली, तर कालांतराने एक चांगला लेख तयार होईल. त्यासाठी लेखकाला या लेखाचे संपादन करण्याची सुविधा प्रशासनाने प्रदान केली पाहिजे. मात्र असे एखाद्या विशीष्ट लेखापुरते करता येऊ शकते की नाही ते माहीत नाही. किंवा नविन प्रश्नोत्तराच्या स्वरूपातील प्रतिसाद प्रशासकांनीच धाग्यांत अंतर्भूत केले तरी चालतील. या प्रकारच्या प्रक्रीयेसाठी कायम स्वरूपाच्या व्यवस्थेबद्दल विचार व्हावा असे सुचवावेसे वाटते.

संजय क्षीरसागर नवीन

In reply to by शाम भागवत

करण्याच्या पूर्वी असलेल्या सोयीचा पुरेपूर दुरुपयोग करुन संपूर्ण काँटेक्स बदलला गेला आहे. `मी तसं म्हटलंच नव्हतं ' इतपत तयारी लोकांनी दाखवली आहे तस्मात, ती सुविधा, अशाप्रकारच्या किंवा इतर कोणत्याही लेखनाबद्दल नसणंच योग्य आहे. लेखात करायची सर्वोपयोगी आणि विधायक अ‍ॅडिशन साहित्य संपादक विनंतीनुसार करतात.

शाम भागवत नवीन

In reply to by शाम भागवत

करोनाबाबत संशोधन चालू आहे. सतत नविन माहिती येतीय. जुनी रद्दबातल ठरतीय किंवा त्यात सुधारणा करायला लागतीय. हे काही महिने चालूच राहाणार आहे. त्यामुळे हा धागा पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाचा आहे. यास्तव प्रतिसादात उत्तर असेलच. पण त्याच बरोबर मूळ गाभ्यांत नवीन माहिती भरली जाईल. जुनी माहिती न खोडता, त्या जुन्या माहीतीच्यखालीच तारीख घालून नवीन माहीती जोडता येईल. जमल्यास सोर्सलिंकही चिकटवता येईल. पण...... डाॅक्टरांचा या संकेतस्थळावरचा वावर तपासून पाहता, (संक्षी यांनी व्यक्त केलेल्या शक्यतेप्रमाणे) त्यांच्याकडून नक्कीच दुरूपयोग होईल असे प्रशासनाला वाटत असल्यास, माझे काही म्हणणे नाही. मदनबाणसाहेब, परिस्थिती कशीकशी बदलत गेली हे नंतर तपासता यावे यासाठी “जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण” या धागा मालिकेत हेच करत असतात, त्यावरून मी प्रशासनाला सुचवणी केली होती.

शाम भागवत नवीन

लेख आवडला. हेतू नेहमीप्रमाणेच स्तुत्य आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

In reply to by प्रचेतस

डॉक्टर साहेब, लेखन माहितीपूर्ण आहे. सध्या घ्यावयाची काळजी म्हणून काय करावेआणि प्रतिकारशक्ति वाढावी म्हणून फळ आहार किंवा काही मॉडर्न औषधी डोस घ्यावीत न घ्यावीत त्याबद्दलही माहिती दिली तर अजुन उपयोगी होईल असे वाटते. -दिलीप बिरुटे

हेमंतकुमार नवीन

धन्यवाद !
लेखकाला या लेखाचे संपादन करण्याची सुविधा प्रशासनाने प्रदान केली पाहिजे.
>>> +१११११. हीच संपादकांना विनंती.

Prajakta२१ नवीन

उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद मास्क उपयुक्त आहे पण सलग खूप वेळ मास्क वापरणे अवघड आहे कळत नकळत नाकाला मास्कला डोळ्यांच्या मधल्या भागात हात लागतोच असे observe केलं आहे मास्क ऐवजी फेसशील्ड जास्त चांगले पण अजून एवढे उपलब्ध झाले नाहीये एवढ्या मोठ्या प्रमाणावर. सर्व डॉक्टरांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना खरंच कडकडीत सलाम तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याचे पण धन्यवाद आणि कौतुक आहे (सगळे ते घालून दिवस भर काम करत आहेत म्हणून ) तसेच भाजी,फळे ,खाद्यसामुग्री (पॅकबंद तसेच एक किलो साखर अशी प्लास्टिक पिशवीतून येणारी सामग्री -तिथे किराणावाला ती पिशवी हाताने किंवा फुंकर घालून उघडतो आणि त्यात रवा ,तांदूळ,इ. भरतो ), नळाखाली धुण्याचा पर्याय सध्या खूप जण वापरत आहेत पण नळाखाली जास्त वेळ धरले जात नाही साबणाचे पाणी खायच्या वस्तूंना उपयुक्त नाही काही जण एक दिवस तसेच ठेऊन दुसऱ्या दिवशी वापरत आहेत इलेक्ट्रॉनिक उपकरणे -मोबाइल,बॅटरी ,रिमोट कीबोर्ड ह्यांचे डिसइन्फेकशन कसे करावे? सध्या लायझॉल ची जाहिरात सारखी दाखवतात पण इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि नोटा ,पावत्या,वर्तमानपत्रे निर्जंतुक कशी करावी? तसेच सारखे घरी बसून असल्यामुळे थोडी बेफिकिरी येते (घरीच तर आहोत ह्या भावनेने )आणि बाहेर गेल्यावर समोरच्याचा संशय ह्याचा सुवर्णमध्य कसा साधावा? मागेही आपण मार्गदर्शन केले होते परत एकदा करावे हि विनंती https://www.esakal.com/desh/plasma-therapy-and-acterma-these-two-treatments-are-proving-successful-302846 ह्या लिंक मध्ये संधिवातावरील औषध प्रभावी ठरत असल्याचे म्हटले आहे धन्यवाद अवांतर -काशीच्या कालभैरव मंदिरात करोनानाशक तेल देणार येण्यात असल्याची बातमी वाचली https://www.nationalheraldindia.com/national/corona-cure-at-kaal-bhairav-temple-in-kashi धार्मिक आहे कि वैज्ञानिक कळले नाही मस्टर्ड ऑइल (मोहरी तेल) वापरणार असल्याची बातमी आहे बहुतेक धार्मिकच वाटतेय

हेमंतकुमार नवीन

आता क्रमाने शंका निरसन.
प्रतिकारशक्ति वाढावी म्हणून फळ आहार किंवा काही मॉडर्न औषधी डोस घ्यावीत न घ्यावीत त्याबद्दलही माहिती दिली तर
>>>>> सामान्य नागरिकांनी रोगप्रतिबंधक म्हणून कुठलेही “औषध” घेण्याची गरज नाही. खालील गोष्टी करता येतील : १. समतोल व चौरस आहार : यात प्रथिने आणि जीवनसत्वांकडे विशेष लक्ष द्यावे. २. नियमित व्यायाम ३. मनातील भीती काढून टाकून मोकळेपणाने जगायला लागणे. नवीन वाचकांसाठी माझ्या जीवनसत्वे आणि खनिजे या लेखमालांचे अनुक्रमे दुवे : अ. ब.

प्रकाश घाटपांडे नवीन

In reply to by हेमंतकुमार

३. मनातील भीती काढून टाकून मोकळेपणाने जगायला लागणे.
म्हणजे प्रतिकारशक्तीचा मानसिक आरोग्याशी थेट संबंध आहे हे बरोबर आहे का?

हेमंतकुमार नवीन

In reply to by प्रकाश घाटपांडे

म्हणजे प्रतिकारशक्तीचा मानसिक आरोग्याशी थेट संबंध आहे हे बरोबर आहे का?
प्रकाश, होय. मानवी भावना (affect) आणि प्र-शक्ती यांचा संबंध आहे. या अभ्यासासाठी ‘भावनिक प्रतिकारविज्ञान’ (affective immunology) अशी एक विशेष विज्ञानशाखा उदयास आलेली आहे. त्यातले संशोधन अजून अपुरे आहे. पण २ निरीक्षणे वैद्यकात नोंदवली आहेत: १. प्र-शक्ती बिघडलेल्या काही रुग्णांत भावनिक विकार अधिक दिसतात २. काही मनोविकारांत प्र-शक्तीशी संबंधित बिघाड बऱ्यापैकी दिसतात्त. (इच्छुकांसाठी संस्थळ : www.affectiveimmunology.com)

हेमंतकुमार नवीन

*
इलेक्ट्रॉनिक उपकरणे -मोबाइल,बॅटरी ,रिमोट कीबोर्ड ह्यांचे डिसइन्फेकशन
एकंदरीत निर्जीव वस्तू हाताळण्यात बाबत माझे मत सांगतो. कुठल्याही दुकानदाराने त्या देताना हातात स्वच्छ आणि रोज बदलण्याजोगे मोजे घालावेत. आपण घरी अशा वस्तू हाताळल्यानंतर आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत. हाताला वारंवार अल्कोहोल युक्तद्रव लावल्याने त्वचेच्या काही समस्या काही लोकांत उद्भवल्या आहेत. ............. **
ह्या लिंक मध्ये संधिवातावरील औषध प्रभावी ठरत असल्याचे म्हटले आहे
हे औषध म्हणजे एक विशिष्ट प्रकारची अँटीबॉडी असते. त्याचे पुरेसे रुग्णप्रयोग झाल्यानंतरच योग्य ते निष्कर्ष बाहेर येतील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

कोरोनाबाधीतांवर आयुर्वेद युनानी व होमियोपॅथी उपचार करण्यासंदर्भात टास्क फोर्स ऑन आयुष फोर कोविड१९ समितीने राज्य सरकारला मार्गदर्शक सुचना केल्या होत्या त्यानुसार सरकारने या उपचार पद्धतींचा अवलंबर करावा असे म्हटले आहे. आणि महाराष्ट्र शासनाचं दिनांक ०८ जून २०२० चं एक पत्रही आहे त्यात काही सुचना आहेत आणि त्या पत्रात शेवटी ''उपरोक्त उपाय योजना कोविड १९ या आजाराच्या प्रतिबंधास तसेच अलाक्षणिक रुग्णांवरील पूरक उपचारास फायदेशीर ठरु शकतात तथापि कोविड १९ या संसर्गजन्य आजाराची लक्षणे जाणवल्यास राज्यातील आरोग्य यंत्रणेकडून तात्काळ चाचणी करुन घेणे व त्यांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे आवश्यक राहील '' असे म्हटले आहे. -दिलीप बिरुटे

मधुका नवीन

हॅण्ड ग्लोव्ज वापरावे की नाही? याबद्दल काय माहिती आहे? एखादा दुकानदार सर्व वस्तू हॅण्ड्ग्लोव्ज घालून देतो तर त्याच्या हॅण्ड्ग्लोव्ज द्वारा "क्ष" स्रोताचे विषाणू "य" पर्यन्त जाउ शकतात का? शिवाय दुकानदारासाठी हॅण्ड्ग्लोव्ज चांगले की ते न वापरता नुसते हात वारंवार धुणे अधिक योग्य?

मधुका नवीन

In reply to by मधुका

माझ्या प्रश्नाचे अर्धे उत्तर वर येऊन गेले आहे. परन्तु दुकानदाराने काय करावे जेणेकरून तो सुरक्षित राहील?

सतीशम२७ नवीन

कुमार सर, नोटा ,पावत्या,वर्तमानपत्रे निर्जंतुक कसे करावे ?? अनेकदा मी बहेरून आणलेली वस्तू एक दवस न वापरता तशीच ठेवतो.....२४ तासांनंतर वापरतो.... पण नोटा, वर्तमानपत्रे .....

बाप्पू नवीन

In reply to by सतीशम२७

मला देखील हाच प्रश्न पडतो.. सध्या तरी मी नोटा शक्य असल्यास धुवून किंवा इस्त्री ने तापवून घेतो. वर्तमान पत्र देखील इस्त्री ने तापवून मग वापरता येईल का पहा. यामागे लॉजिक एवढेच कि 50-55 डिग्री तापमानाच्या वर कोणताच विषाणू किंवा जिवाणू राहू शकत नाही . डॉक्टर कुमार सर प्लीज या प्रश्नाचे उत्तर दया.

हेमंतकुमार नवीन

असंख्य सूक्ष्मजंतू हे जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी आहेत. आपण विविध प्रकारे स्वच्छता बाळगून त्यांचे शरीरात जाणारे प्रमाण कमी करू शकतो; त्यांच्यापासून पूर्ण सुटका नाहीच ! शेवटी आपली प्रतिकारशक्ती राखणे हेच महत्वाचे ठरते. ती कशी राखावी हे वर सांगितले आहेच. दुकानदाराने मोजे वापरावे की वारंवार हात स्वच्छता करावी, यावरही मतभेद आहेत. निर्जीव वस्तूंबाबत बाऊ करू नये ,असे मला वाटते.

बाप्पू नवीन

सध्या कोरोना असल्याने बर्याचश्या बालकांचे लसीकरण शेड्युल कोलमडले आहे. माझा 1.5 वर्ष्याच्या 2 लसी वेळापत्रकानुसार पेंडिंग आहेत. डॉक्तरांना विचारले असता कोरोना संकट कमी होत नाही तोवर लहान मुलांना बाहेर आणू नका असे सांगतायत. काय करावे समजत नाहीये ? एखादी लस थोडी उशिरा दिली तर बाळाला काही धोका आहे का?? इतर मिपाकर आपल्या लहान मुलांच्या लसीकरणाचे मॅनेजमेंट कसे करतायेत. ?

हेमंतकुमार नवीन

In reply to by बाप्पू

बाप्पू, तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे. सध्या जगातील ७० देशांत नित्यनेमाने करायचे मुलांचे लसीकरण थंडावले आहे. हा मुद्दा जवळपास ८ कोटी मुलांना लागू होतोय. या संदर्भात युनिसेफने चिंता व्यक्त केली आहे. पोलिओ, घटसर्प आणि गोवर यांच्या लसी वेळच्या वेळी देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमित लसीकरणातून व्यक्तिगत संरक्षण तर मिळतेच आणि त्याच बरोबर संबंधित आजारांची समूह प्रतिकारशक्ती निर्माण होत असते. तेव्हा अशी नियमित लसीकरणे लवकरात लवकर चालू केली पाहिजेत, असे मत युनिसेफने व्यक्त केले आहे.

शेखरमोघे नवीन

नेहेमीसारखाच माहितीपूर्ण आणि सन्तुलित (त्यामुळे सामान्यपणे चित्रवाणीवरच्या "तज्ञान्च्या" ज्ञानप्रदर्शनापेक्षा वेगळा) लेख! आवडला आणि उपयुक्त वाटला. "समज आणि गैरसमज" या प्रकारातच क्लोरॉक्स, लायसॉल, डेटॉल इ.इ. बनवणार्‍या कम्पन्यानी आपले भले करून घेतलेले आहे. त्यान्च्या उत्पादनाचा खरोखरच कितपत उपयोग होतो? कुठलीही रोग प्रतिबन्धक लस किन्वा रोग झाल्यानन्तरचे औषध तयार होऊन, पुरेशा प्रमाणात जागतिक बाजारात मिळू लागण्यास नेहेमी काही वर्षे लागतात. कोरोनाच्या बाबतीत "जलद कार्य पद्धती" वापरून हे काही महिन्यात साध्य करण्याचा "आत्मविश्वास" काही कम्पन्या दाखवत आहेत, तो कितपत रास्त आहे?

हेमंतकुमार नवीन

In reply to by शेखरमोघे

तुम्ही लसीचा मुद्दा उपस्थित केला हे छान झाले. सध्या या संदर्भात माध्यमांतून काही उलटसुलट आणि अर्धवट बातम्या आलेल्या आहेत. या निमित्ताने काही अधिकृत माहिती इथे देतो. कुठलीही लस प्रत्यक्ष वापरात येण्यापूर्वी ती सुरक्षित आणि प्रभावी अशी सिद्ध व्हावी लागते. हे दीर्घकालीन काम असते. एखाद्या लसीवरील संशोधन परिपूर्ण व्हायला तब्बल वीस वर्षे जावी लागतात. आता सध्याच्या आजारावरील लस्सीबद्दल पाहू. ही लस जर घाईघाईत तयार केली तर तिच्या संशोधनातील बरेच टप्पे नजरेआड करावे लागतात. कुठलीही लस तिच्या संशोधनादरम्यान अनेक लोकांना देऊ पहावी लागते, तसेच तिचे निरनिराळे डोस देखील देऊन पहावे लागतात. त्यानंतर संबंधित लोकांचे दीर्घकाळ निरीक्षण केल्यावरच योग्य निष्कर्ष निघतात. हे सर्व पाहता सुरक्षित आणि प्रभावी अशी लस लवकर वापरात येणे अवघड दिसते. म्हणून कोविडशी सामना करीतच बराच काळ जावा लागेल असे दिसते. कंपन्यांचे दावे कितपत सत्यात उतरतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

सतीशम२७ नवीन

वर्तमान पत्र देखील इस्त्री ने तापवून मग वापरता येईल का पहा. ===> २ दिवसापासून सुरु झालेले वर्तमान पत्र बंद करण practically परवडेल....तसही epaper आहेतच....

सतीशम२७ नवीन

मी जमेल तेथे digital mode of payment करतो.... नोटा शक्यतो कमी वापरतो, नोटा बदलण्याची शक्यता टाळतो...तरीही नोटा येतात त्यांना एका डब्ब्यात ठेवून देतो...for for next time use after 2-3 days...

पाषाणभेद नवीन

आमच्या कंपनीत पॅन्ट्रीवाले कापडी किंवा रबरी हातमोजे घालत असतात. त्या हातमोजा असलेल्या हाताने ते चहाचा कप, कागदी कप, थाळ्या, वाट्या चमचे किंवा अन्नपदार्थ वाटप करत असतात. तर प्रश्न असा आहे की असे करणे योग्य आहे काय? कारण अशा व्यक्ती कंपनीत अनेक ठिकाणी जात असतात. अनेक ठिकाणी त्यांच्या हाताचा स्पर्श होत असतो. कोरोना जरी नसेल परंतु इतर जिवाणू विषाणू त्यांच्या हातमोज्याला लागलेले असू शकतात. हातमोज्यामुळे त्या अन्नपदार्थ, वस्तू हाताळणार्‍याला बाधा होणार नाही परंतु त्याच्या हातमोज्याला लागलेले जिवाणू विषाणू त्या त्या अन्नपदार्थ किंवा कप, थाळ्या, चमचे, वाट्या आदींना लागू शकतील ना? मग असे करणार्‍या व्यक्तींनी हातमोजे वापरणे कितपत योग्य आहे? त्या पेक्षा त्यांनी हातमोजे न घालता वारंवार हात सॅनीटाईज करणे योग्य आहे ना?

सतीशम२७ नवीन

कापडी हातमोजे घालून काही उपयोग होत नसावा. ==> मलाही असच वाटत.... कापडला जिवाणू विषाणू सहज चिटकू शकतात अस मला वाटत.... WHO ने सध्या ३ आवरणाचे मास्क वापरणे सुचवले आहे... who recommended 3 layer mask of 3 different materials....

हेमंतकुमार नवीन

मग असे करणार्‍या व्यक्तींनी हातमोजे वापरणे कितपत योग्य आहे? त्या पेक्षा त्यांनी हातमोजे न घालता वारंवार हात सॅनीटाईज करणे योग्य आहे ना?
मंडळी, हा लाखमोलाचा आणि काथ्याकूटाचा विषय आहे. यात दोन्ही बाजूंनी बोलणारे समसमान तज्ञ सापडतील. म्हणूनच एक मूलभूत गोष्ट लक्षात घ्यावी. स्वच्छ धुतलेले काय किंवा कुठलेही मोजे घातलेले हात काय, ते अगदी थोड्या वेळातच जंतूयुक्त होतात. त्यामुळे याचा बाऊ न करता आपल्या प्रतिकारशक्तीवर भिस्त ठेवावी, असे मला वाटते. सूक्ष्मजीवांचा ‘ यत्र तत्र सर्वत्र’ असा संचार बघता या विषयावर पूर्ण समाधानकारक उत्तर मिळणार नाही.

संजय क्षीरसागर नवीन

In reply to by हेमंतकुमार

> असे मला वाटते. सौ टके की बात ! डे वनपासून व्यक्तिगत जीवनात, हर्ड इम्युनिटी हाच पर्याय वापरला ! त्यामुळे लॉकडाऊन, लॉकओपन यांनी काहीही फरक पडला नाही.

गवि नवीन

In reply to by संजय क्षीरसागर

??? व्यक्तिगत जीवनात, एकट्याने 'हर्ड इम्युनिटी' हा पर्याय कसा वापरता येईल? हर्ड इम्युनिटी म्हणजे मोठ्या प्रमाणात समाजातली लोकसंख्या इम्युन होणे (इन्फेक्शन होऊन जाऊन किंवा लसीकरण होऊन).

संजय क्षीरसागर नवीन

In reply to by गवि

तरी अप्रोच व्यक्तिगतच आहे. मुद्दा असा होता की करोनाचा सामना लॉकडाऊननी का (स्वत:ची) इम्युनिटी वाढवून ? सरकारी निर्बंध पाळून (मास्क, सोशल डिस्टन्सींग) जर आपण बिनधास्त फिरलो तर रस्त्यावर चिटपाखरु नव्हतं. फक्त खिशात पिशवी असली (नित्योपयोगी वस्तुंसाठी) की झालं.

चौकटराजा नवीन

In reply to by हेमंतकुमार

पुन्हा इथे लिहितो ...... बॉडी अ‍ॅट वॉर ची अर्पण पत्रिका...... He stood up and asked the God ,Lord what shall I do to lead healthy life ... "Choose your parents wisely " आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती दुसरे तिसरे काही नसून काही विशिष्ट प्रकारच्या पान्ढर्‍या पेशी व अ‍ॅन्टीबॉडीज . माझ्या मते त्या सकारात्मक विचार यानी काही वाढत नाहीत. आहार व अनुवान्शिकता या दोन घटकावर ते अवलम्बून आहे. मला असा रिपोर्ट मिळाला आहे की डेन्गी प्रमाणेच यात लागण व मरणाचे प्रमाण गरीबात कमी आहे. बळी मध्यम वर्गीयच जास्त करून व ते सुद्धा मधुमेहवाले आहेत .अर्थात ही माहिती पिम्परी चिन्च्वड इतकीच मर्यदित आहे !

पाषाणभेद नवीन

In reply to by हेमंतकुमार

नाही तसे नाही. हातमोजे घालून ते घालणारे सुरक्षित होत जातात पण इतरांना लागण देणारे ठरू शकतात. म्हणून असले खानावळ, पॅन्ट्री, कॅन्टीन आदी ठिकाणी दिखावूपणा न दाखवता त्या त्या कारागिरांना मोजे वापरायला प्रतिबंधच करायला हवा आणि त्यांनी वारंवार हात साबणाने धुणे हे तेथल्या मुकादमने अनिवार्ह करावे असा निष्कर्ष निघतो. काय डॉक्टर साहेब, बरोबर ना?

हेमंतकुमार नवीन

सौ टके की बात !
>>>> मनातील भीती काढून टाकण्याने (कुठल्याही संकटाला) प्रतिकार क्षमतेला चांगली मदत होते. ............
मरणाचे प्रमाण गरीबात कमी आहे. बळी मध्यम वर्गीयच जास्त करून व ते सुद्धा मधुमेहवाले आहेत
>>> नाही हो ! देशोदेशींचा विदा येगयेगळा आहे .

हेमंतकुमार नवीन

कुठल्या प्रकारची जनुकीय रचना असलेल्यांना हा आजार जास्त होतो, याचे अभ्यास चालू झाले आहेत. अर्थात या पंचवार्षिक योजना असतात ! अखेरीस त्या बहुधा “ Choose your parents wisely“ यावरच येऊन ठेपतील . बघूया....

हेमंतकुमार नवीन

In reply to by Nitin Palkar

नि पा, त्याचा अर्थ लक्षणेने घ्यायचा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती जन्मते, तेव्हा तिला आपल्या पालकांकडून जनुकांची कायमची भेट मिळते. त्यांच्यामध्येच भविष्यातील विविध आजारांची बीजे रोवलेली असतात. त्यामुळे, काही ही आजारांच्या बाबतीत असे दिसते, की आपण कितीही चांगली जीवनशैली ठेवली तरीही ते आपल्या बोकांडी बसतातच.

चित्रगुप्त नवीन

In reply to by हेमंतकुमार

प्यारंटांबरोबरच किंवा त्यापेक्षाही आपल्या जन्माची वेळ आणि स्थळ हे पण सूज्ञपणाने निवडा.... या दोन्ही गोष्टीवरूनच जन्मकुंडली मांडली जाते, आणि निष्णात ज्योतिषी त्यावरून जीवनातील सर्व घटना आणि मृत्यूची वेळही जाणून घेऊ शकतात, हा स्वानुभव आहे. मृत्यूची वेळ, कारण, जागा हे सर्व निश्चितच आहे, उगाच भ्यायचे कारण नाही ..... अर्थात ज्याप्रमाणे या गोष्टी निवडणे आपल्या हातात नाही, तसेच मृत्यूची वेळ, कारण, जागा हे निवडणेही नाही...

प्रकाश घाटपांडे नवीन

In reply to by चित्रगुप्त

या दोन्ही गोष्टीवरूनच जन्मकुंडली मांडली जाते, आणि निष्णात ज्योतिषी त्यावरून जीवनातील सर्व घटना आणि मृत्यूची वेळही जाणून घेऊ शकतात, हा स्वानुभव आहे. मृत्यूची वेळ, कारण, जागा हे सर्व निश्चितच आहे,
चित्रगुप्त साहेब एकदा यावर स्वतंत्र धाग्यात सविस्तर लिहाच. स्वानुभव असल्याने कदाचित अधिक चिकित्सा होणार नाही.

चौकटराजा नवीन

In reply to by Nitin Palkar

याचा अर्थ असा आहे की "तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस" हे खरेच आहे पण १०० टक्के खरे नाही .पराधीन आहे जगति पुत्र मानवाचा हे देखील तितकेच खरे आहे ! तू कितीही काळजी घेतलीस ,हातमोजे ,मास्क ,सनिटयझर वापरलेस तरीही सर्वानी ते वापरले नाही तर ते व तू देखील "बळी"ठरू शकतोस !

चौकटराजा नवीन

जगातील सर्व सरकारना जाग येऊन पुतळे उभारणे ,स्मारके करणे, धार्मिक यात्राना अनुदाने देणे यापेक्शा सूक्श्मजीवशास्त्र संशोधनास जास्त अनुदाने मिळायला लागण्याची शक्यता आहे. डोळ्याना न दिसणारे शत्रू गप्प बसणारे नाहीत, प्रुथ्वी केवळ वनस्पती, प्राणी यान्च्याच मालकीची नाही याची जाणीव वाढीस लागेल. विषाणूना होस्ट मिळण्याची सोय निसर्गानेच केली आहे. व तो आपल्यापेक्षा फार मोठा आहे.

शकु गोवेकर नवीन

बहुदा यावर लस किंवा काहीतरी औषध येईल असे वाटते पण मुझीलँड new zealand देशाचे उदाहरण पाहिले तर यावर उपाय आहे व तो म्हणजे तपासणी आणि तपासणी चा गेल्या अठरा दिवसात तेथे एकही मृत्त्यू व रुग्ण नाही आंब्याच्या पेटीत समजा शंभर आंबे आहेत व तुम्हाला वाटते पाच खराब आहेत तर तुम्ही बाजूला ठेवता व त्यातील दोन कदाचित दोन दिवसांनी इतके खराब होतात कि ते फेकून द्यावे लागतायत कारण तपासणी शिवाय काही कळत नाही हाच प्रकार करून किंवा तपासणी करून कोरोना बाबत करता येईल असे वाटते

लई भारी नवीन

लेख बघायला उशीर झाला. अर्थातच माहितीपूर्ण लेख!

हेमंतकुमार नवीन

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार ! जेडी, चांगला प्रश्न. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात किती प्रमाणात विषाणू शिरतात त्यावर हे अवलंबून असते. जेव्हा हे प्रमाण कमी असते , तेव्हा त्या व्यक्तीस लक्षणे दिसत नाहीत. पुढे जेव्हा या विषाणूंची एका प्रमाणाबाहेर वाढ होते, तेव्हा तिला लक्षणे दिसतात. या दोन्ही घटनांच्या दरम्यान एक Presymptomatic अवस्था देखील असते थोडक्यात विषाणूने बाधित झाल्यानंतर घटना क्रम असा असतो : Asymptomatic >>> Presymptomatic >> Symptomatic.

Rajesh188 नवीन

लाखो करोडो विषाणू मधील covid 19 हा एक किरकोळ विषाणू आहे. त्या पेक्षा पण भयंकर विषाणू ,जिवाणू पृथ्वी वर अस्तित्वात असतील आणि ते कधी ही मानवत संक्रमित होतील. त्या मुळे खूप पुढे गेलेल्या विज्ञान नी परत kg पासून विज्ञान शिकण्याची गरज आहे. पायाच कच्च्या आहे आपला. म्हणूनच corona virus ni तोंडाला फेस आणला.

अनिंद्य नवीन

कुमार, छान संकलन होते आहे तुमच्या सत्वर updates नी. काल एका डॉ. नी सांगितले की लक्षणे अजिबात नसलेल्या लोकांच्या Random tests मधे त्यांच्यात करोनाच्या anti bodies सापडल्या म्हणे !

हेमंतकुमार नवीन

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार ! १.
त्या पेक्षा पण भयंकर विषाणू ,जिवाणू पृथ्वी वर अस्तित्वात असतील आणि ते कधी ही मानवत संक्रमित होतील
>>>>> होय, हे शक्य आहे. २.
लक्षणे अजिबात नसलेल्या लोकांच्या Random tests मधे त्यांच्यात करोनाच्या anti bodies सापडल्या म्हणे !
होय, बरोबर. असे होऊ शकते. याला अजून एक बाजू आहे. ‘करोना’ हे विषाणूंचे एक कुटुंब आहे. त्यातील (करोना-२ सोडून) अन्य एखाद्याचा संसर्ग झाला असेल तरीही या antibodies सापडू शकतात. म्हणूनच त्या मोजणे ही ‘रोगनिदान’ चाचणी नसते.

गवि नवीन

In reply to by हेमंतकुमार

करोना’ हे विषाणूंचे एक कुटुंब आहे. त्यातील (करोना-२ सोडून) अन्य एखाद्याचा संसर्ग झाला असेल तरीही या antibodies सापडू शकतात.
मला वाटतं ही टेस्ट चालू रोगनिदानासाठी आहे असं कुठे म्हटलं नसावं. ती होऊन गेलेल्या आजाराबद्दल आहे असंच सर्वत्र लिहून आलेलं आहे. आणि आता तुम्ही म्हणालात तसं कोणत्याही जुन्या कोरोनाव्हायरस गटातल्या अन्य विषाणूनेही नोव्हेल कोरोनाव्हायरससारख्याच अँटिबॉडीज तयार होत असतील आणि नोव्हेल कोरोनाव्हायरस होऊन गेला की अन्य कोरोना फॅमिली व्हायरस होऊन गेला याची काही विशिष्टताच त्यात नसेल (जे तुमच्या प्रतिसादात ध्वनित होतंय, चुभुद्याघ्या) तर मग या टेस्टचा शून्यच उपयोग म्हणावा लागेल.

हेमंतकुमार नवीन

In reply to by गवि

गवि, चांगला मुद्दा. अँटीबॉडी चाचणीचा उपयोग शून्य नाही; तो मर्यादित स्वरूपाचा आहे. काही बाबतीत असेही चित्र दिसले आहे. रुग्णांना ठराविक लक्षणे होती पण त्यांची swab ही रोगनिदान चाचणी नकारात्मक होती. त्यांची प्रत्यक्ष तपासणी केल्यावर ( क्ष किरण वगैरे) तपासणीत हा आजार दिसून आला. तसेच अन्य काही कोविडचे पुरावेही मिळाले. त्यांच्या काही दिवसांनी केलेल्या रक्ततपासणीत अँटीबॉडी चे प्रमाण बऱ्यापैकी होते. आता अशा केसेस मध्ये सर्व गोष्टी एकत्रित तपासल्या (correlation), तर या तपासणीचा उपयोग झाला असे म्हणता येईल. तसेच हा आजार होऊन बरा झालेल्या रुग्णांत या चाचणीचा उपयोग भविष्यकालीन अभ्यासात (prognosis) होतो. या चाचणीचा ‘निव्वळ एकट्याने’ असा उपयोग नसतो. रुग्णाचे इतर सर्व घटक पाहणे महत्वाचे.

हेमंतकुमार नवीन

मध्यंतरी बऱ्याच परिचितांकडून हा प्रश्न विचारला गेला. “ आपला विशिष्ट रक्तगट (A) आणि कोविड१९ होण्याची शक्यता यांचा खरंच संबंध आहे का ? या संदर्भात मोजके अभ्यास युरोपमध्ये झालेले आहेत. त्यामध्ये ‘ए’ रक्तगट असणाऱ्या रुग्णांचा विशेष अभ्यास केला गेला. या गटाच्या माणसांना जर कोविड झाला, तर त्यांच्यात श्वसनकार्य मोठ्या प्रमाणावर ढासळू शकते (failure). इतकाच सध्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. अर्थात रक्तगट आणि हा आजार होण्याची अधिक शक्यता, यावर अजून पुरेसे संशोधन झालेले नाही. तेव्हा घाईने या मुद्द्याचे सरसकटीकरण करता येणार नाही.

गवि नवीन

या गटाच्या माणसांना जर कोविड झाला, तर त्यांच्यात श्वसनकार्य मोठ्या प्रमाणावर ढासळू शकते (failure). इतकाच सध्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
हाही निष्कर्ष पुरेसा महत्वाचा नाही वाटत का?

हेमंतकुमार नवीन

हाही निष्कर्ष पुरेसा महत्वाचा नाही वाटत का?
त्याला उपचारांच्या दृष्टीने महत्व नसते. मुळात संबंधित अभ्यास फक्त इटली व स्पेन मधल्या काही मोजक्या रुग्णांवर झालेला आहे. जगभरात अनेक वंशांची माणसे आहेत. अशा असंख्य लोकांवर जेव्हा पुरेसे प्रयोग होतील तेव्हाच भविष्यात त्यावर अधिक बोलता येईल. विविध रक्तगट आणि काही आजार होण्याचे प्रमाण यावर गेल्या ५० वर्षांत बरेच संशोधन झाले आहे. मात्र त्यातील बरीच गृहीतके पुरेश्या पुराव्याअभावी सिद्ध झाली नाहीत. अशा बऱ्याचशा अभ्यासांचा, रोगनिदान आणि उपचार या दृष्टीने उपयोग नसतो. वैद्यकातील पूरक अभ्यास इतकेच त्यांचे महत्त्व असते. ‘रक्तगट व आजार’ असे अनेक अभ्यास आतापर्यंत गृहितके याच पातळीवर राहिलेले आहेत.

मराठी_माणूस नवीन

https://www.loksatta.com/desh-videsh-news/medical-experts-view-on-coronavirus-spread-zws-70-2186891/ ह्या बातमीत एके ठीकाणी असे म्हटले आहे की , "जेव्हा रुग्णाचा संपर्क कुणाशीच आला नसताना तो बाधित होतो, तेव्हा त्याला समूहसंक्रमण म्हणतात". हे कसे शक्य आहे ?

हेमंतकुमार नवीन

म मा , चांगला प्रश्न आहे. काही वेळेस इंग्लिशचे मराठी करताना अर्थहानी होऊ शकते. तसे इथे दिसतेय. आधी मूळ इंग्लीश व्याख्या पाहू : The term community transmission means that the source of infection for the spread of an illness is unknown. त्यातल्या त्यात सोपे करतो: १. एखाद्या बाधित क्षेत्रात भरपूर रुग्ण होते. २. अन्य एखाद्या ठिकाणी रुग्ण (म्हणजे सिद्ध झालेले) अजिबात नव्हते. ३. समजा, वरील २ मधील लोक भरपूर हिंडू लागले. ते ठरलेली काळजी घेताहेत. तरीपण अचानक या भागात रुग्ण निर्माण होऊ लागले. पण इथल्या व्यक्तीस कोणापासून संसर्ग झाला हे काही जाम शोधता येत नाही. ४. याला म्हणायचे, की आता ‘समूहसंक्रमण’ चालू झाले. (A link in terms of contacts between patients and other people is missing).

शेखरमोघे नवीन

सध्या उपलब्ध असलेल्या (अमेरिकेत असल्यामुळे अम्मळ विस्तारित) वाचनातून या कोरोना साथीचा नक्की उगमस्रोत कुठला आणि त्याचा प्रसार नक्की कसा झाला असावा यावर जगभर उलट सुलट मते आहेत. अमेरिकेने केलेल्या आरोपातून असे भासते की चीनने हा विषाणू (आपल्या घरातील उडाणटप्पूला "काय उपद्व्याप करायचे ते बाहेर जाऊन कर" अशी ताकीद देऊन बाहेर पिटाळल्यासारखा) इतरत्र हेतुपूर्वक पसरवला असावा. चीनने हा विचार अमान्य केला आहे. एक सत्य मात्र असे दिसते की या विषाणूबद्दलच्या अपुर्‍या ज्ञानात त्याची खात्रीशीर चाचणी पद्धत अजून उपलब्ध नसणे आणि ज्या काही पद्धती उपलब्ध आहेत त्या सर्वदूर उपलब्ध नसणे या निदान सुरवातीच्या काळातल्या तरी अतीशय मोठ्या अडचणी होत्या. त्यामुळे असेही झाले असणे शक्य आहे की १. एखाद्या बाधित क्षेत्रात भरपूर रुग्ण होते - पण त्यान्ची चाचणीच न झाल्याने तो भाग "बाधित" गणलाच गेला नाही. २. अन्य एखाद्या ठिकाणी रुग्ण (म्हणजे सिद्ध झालेले) अजिबात नव्हते - आणि हे तिथल्या सगळ्या लोकान्च्या चाचणीतून सिद्ध झाल्याने तो भाग "बाधित" नाही याची काही काळाने १००% खात्री करून घेता आली. कुमारजीनी "(म्हणजे सिद्ध झालेले)" हा अगदी महत्वाचा पैलू - फक्त थोडक्या उल्लेखानेच- दाखवला आहे. या विषाणूची आणि बाधितान्ची माहिती गोळा करण्याची परिपूर्ण पद्धत जशी विकसित होत गेली, त्याप्रमाणे अमेरिकेसकट अनेक देशानी आधी जाहीर केलेली "आपल्या देशातला पहिला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याची तारीख" (तसेच तो "बाधित" धरण्याची विचारपद्धती) यात बदल करून जास्त खात्रिलायक माहिती उपलब्ध केली आहे आणि तरीही पुढील काळात त्यातही बदल होऊ शकतात. भारतातील एकूणच व्याप्ती लक्षात घेता "या विषाणूची आणि बाधितान्ची माहिती गोळा करण्याची परिपूर्ण पद्धत" हा एक स्वतन्त्र लेखनविषय होऊ शकेल.

शेखरमोघे नवीन

सध्या उपलब्ध असलेल्या (अमेरिकेत असल्यामुळे अम्मळ विस्तारित) वाचनातून या कोरोना साथीचा नक्की उगमस्रोत कुठला आणि त्याचा प्रसार नक्की कसा झाला असावा यावर जगभर उलट सुलट मते आहेत. अमेरिकेने केलेल्या आरोपातून असे भासते की चीनने हा विषाणू (आपल्या घरातील उडाणटप्पूला "काय उपद्व्याप करायचे ते बाहेर जाऊन कर" अशी ताकीद देऊन बाहेर पिटाळल्यासारखा) इतरत्र हेतुपूर्वक पसरवला असावा. चीनने हा विचार अमान्य केला आहे. एक सत्य मात्र असे दिसते की या विषाणूबद्दलच्या अपुर्‍या ज्ञानात त्याची खात्रीशीर चाचणी पद्धत अजून उपलब्ध नसणे आणि ज्या काही पद्धती उपलब्ध आहेत त्या सर्वदूर उपलब्ध नसणे या निदान सुरवातीच्या काळातल्या तरी अतीशय मोठ्या अडचणी होत्या. त्यामुळे असेही झाले असणे शक्य आहे की १. एखाद्या बाधित क्षेत्रात भरपूर रुग्ण होते - पण त्यान्ची चाचणीच न झाल्याने तो भाग "बाधित" गणलाच गेला नाही. २. अन्य एखाद्या ठिकाणी रुग्ण (म्हणजे सिद्ध झालेले) अजिबात नव्हते - आणि हे तिथल्या सगळ्या लोकान्च्या चाचणीतून सिद्ध झाल्याने तो भाग "बाधित" नाही याची काही काळाने १००% खात्री करून घेता आली. कुमारजीनी "(म्हणजे सिद्ध झालेले)" हा अगदी महत्वाचा पैलू - फक्त थोडक्या उल्लेखानेच- दाखवला आहे. या विषाणूची आणि बाधितान्ची माहिती गोळा करण्याची परिपूर्ण पद्धत जशी विकसित होत गेली, त्याप्रमाणे अमेरिकेसकट अनेक देशानी आधी जाहीर केलेली "आपल्या देशातला पहिला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याची तारीख" (तसेच तो "बाधित" धरण्याची विचारपद्धती) यात बदल करून जास्त खात्रिलायक माहिती उपलब्ध केली आहे आणि तरीही पुढील काळात त्यातही बदल होऊ शकतात. भारतातील एकूणच व्याप्ती लक्षात घेता "या विषाणूची आणि बाधितान्ची माहिती गोळा करण्याची परिपूर्ण पद्धत" हा एक स्वतन्त्र लेखनविषय होऊ शकेल.

हेमंतकुमार नवीन

विश्लेषण आवडले. सहमत.
बाधितान्ची माहिती गोळा करण्याची परिपूर्ण पद्धत" हा एक स्वतन्त्र लेखनविषय होऊ शकेल.
बरोबर. येत्या काही वर्षांत या आजारावर बरेच काही लिहीले जाईल.

हेमंतकुमार नवीन

टाळेबंदी पूर्णपणे उठवून जनजीवन पूर्ववत करावे का, हा सध्याचा कळीचा प्रश्न आहे. लोक जेवढे जास्त एकमेकांच्या संपर्कात येतील, तेवढी समूह प्रतिकारशक्ती लवकर निर्माण होईल. यासंदर्भात देवी, कांजिण्या आणि रूबेला या आजारांच्या बाबतीत इतिहासात एक रोचक प्रकार घडलेला आहे. ते आजार मध्यम स्वरूपात झालेले रुग्ण आणि निरोगी लोक मुद्दाम एकत्र जमत. अशा संमेलनातून निरोगी व्यक्तीस तो संसर्ग होई आणि त्यातूनच त्याविरोधी प्र-शक्ती प्राप्त होई. कांजिण्यासारख्या आजारात बहुतेक लोकांना एकदा तो झाला, की आयुष्यभर पुन्हा होत नसे. या तत्वास अनुसरून असे प्रयोग एकेकाळी झालेले आहेत. आता मुद्दा असा आहे, की असा प्रयोग सध्या कोविडसाठी करावा का ? वरवर मोह झाला तरी या प्रश्नाचे उत्तर सरळ नाही. त्याचे कारण पुढच्या प्रतिसादात लिहितो……

हेमंतकुमार नवीन

कांजिण्याच्या धर्तीवर “कोविड संमेलने” भरवणे इष्ट नाही कारण : १. अशा संसर्गातून मिळालेली प्रतिकारशक्ती कितपत उपयुक्त आणि दीर्घकालीन असेल, याची शंका आहे. २. असा संसर्ग झालेल्याने चौदा दिवस स्वतःहून विलगीकरण पाळायचे आहे. त्याची खात्री देता येत नाही. ३. अशाप्रकारे बाधित झालेल्या काही लोकांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना हा आजार गंभीर होऊ शकतो. ४. अजून या रोगावर प्रभावी उपचार नाही.

हेमंतकुमार नवीन

अ आ, सुंदर चित्र. धन्यवाद. ................................ जगात सर्वत्र आग्रहाने टाळेबंदी लागू केली गेली होती, तेव्हा स्वीडनने मात्र बरेचसे मुक्त धोरण स्वीकारले होते. त्यांचा दृष्टिकोन लवकरात लवकर समूह प्रतिकारशक्ती निर्माण करण्याकडे होता. आज त्यांची परिस्थिती अशी आहे: १. समूह प्रतिकारशक्तीची संपूर्ण देशाची सरासरी टक्केवारी फक्त ६ % २. देशाच्या विविध भागात ५ ते २२ % पर्यंत फरक आहे.

हेमंतकुमार नवीन

“कोविड१९ हा आजार दीर्घकालीन होऊन त्याचे भविष्यात मोठे दुष्परिणाम होतील का?” हा प्रश्न १ महिन्यापूर्वी माझ्या या आधीच्या धाग्यात विचारला गेला होता. आता हा आजार समाजात उद्भवल्याला सहा महिने उलटलेत. त्यादृष्टीने काही माहितीची भर: १. असे काही रुग्ण तब्बल तीन महिने अंथरुणात खिळून आहेत. २. काहींना उपचारानंतर लक्षणे अजिबात नाहीत, पण दोन महिने उलटल्यावरही त्यांच्या चाचणीचे निष्कर्ष होकारात्मकच आहेत. ३. काहींमध्ये कालांतराने विशिष्ट प्रकारचा न्युमोनिया होऊ शकेल.

हेमंतकुमार नवीन

“हा आजार झाल्यानंतर रुग्णास मिळणारी प्रतिकारशक्ती किती काळ टिकते?” या विषयावरील काही ताजी माहिती: १. हा आजार जगभरात फैलावलेला आहे. त्यामुळे कुठल्याही एका देशातील ठराविक रुग्णांच्या अभ्यासातून या प्रश्नाचे अंशतःच उत्तर मिळते. २. आजारातून मिळणारी प्रतिकारशक्ती दोन प्रकारची असते: a. अँटीबॉडीज निर्मितीमुळे, आणि b. विशिष्ट प्रकारच्या पांढऱ्या पेशींच्यामुळे ( T cells) ३. वरील २ पैकी बहुतांश अभ्यासांत फक्त अँटीबॉडीज मोजतात, कारण ते सोपे असते. दुसऱ्या प्रकारचा पेशींचा अभ्यास हा संशोधन पातळीवर सावकाश करावा लागतो. ४. एका अभ्यासात काही रुग्ण बरे झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी त्यांच्यातील अँटीबॉडीजचे प्रमाण पुन्हा मोजले गेले. तेव्हा त्या प्रमाणात ७०% टक्‍क्‍यांपर्यंत घट झालेली आढळली.. ................... सारांश : काही ठोस उत्तरांसाठी बरीच वाट पहावी लागेल.

स्रुजा नवीन

मी तुमचा हा धागा अगदी रोज च्या रोज वाचते आहे, प्रतिसाद देणं होत नाही कारण मोबाईल वरुन अजुन टाईप करणं जमत नाहीये. आज मात्र बर्‍याच दिवसांपासून मनात असलेला प्रश्न विचारायला खास लॉगिन केलंय. डॉक्टर्स आणि इतर हेल्थ केअर कर्मचारी पी पी ई ज घालुन आणि इतर सॅनिटरी काळजी घेऊन देखील आजारी का पडतायेत? जर पूर्ण काळजी घेऊन आणि सर्जिकल लेव्हल चे प्रोटेक्टीव गिअर्स वापरुन सुद्धा ते आजारी पडत असतील तर आपल्या मास्क घालून बाहेर पडण्याला काहीच अर्थ नाही का? हेल्थ केअर वर्कर्स चा नंबर इथे कॅनडात पण खुप मोठा आहे त्याने जरा घाबरायला झालंय.

हेमंतकुमार नवीन

सृजा,
तर आपल्या मास्क घालून बाहेर पडण्याला काहीच अर्थ नाही का? >>>
> १.सर्व प्रकारचे रोगजंतू हे अतिसूक्ष्म असल्याने काही प्रमाणात का होईना आपल्या शरीरात जाणारच. आपण अवरोध साधने वापरून त्यांचे प्रमाण कमी करू शकतो. २. आता डॉक्टर आणि सामान्य नागरिकांची तुलना करू. डॉक्टर ज्या रुग्णालयात रोग्यांच्या समवेत काम करतात, तिथल्या वातावरणात जंतूंची घनता कित्येक पट जास्त (उदाहरणार्थ काही कोटीत) असते. त्यामुळे दीर्घकाळ त्याच वातावरणात काम केल्यावर त्यांच्या शरीरात जाणाऱ्या जंतूंची घनताही बऱ्यापैकी राहते. ३. आता सामान्य मुखपट्टीचा मुद्दा. यावर तज्ञांत बरेच मतभेद आहेत. आपण जेव्हा ती घालून वावरतो, तेव्हा आपले बोलणे, शिंकणे आणि खोकणे यातून बाहेर पडणाऱ्या जंतूकणांची संख्या कितपत कमी होते यावर उलट-सुलट निष्कर्ष निघालेले आहेत. त्यामुळे या पट्टीपेक्षाही शारीरिक अंतर राखणे अधिक महत्त्वाचे आहे. पट्टी आणि अंतर या दोघांचा मिळून परिणाम फायदेशीर होतो.

स्रुजा नवीन

In reply to by हेमंतकुमार

सविस्तर उत्तरासाठी धन्यवाद डॉ. खुप दिवसांपासून अस्वस्थ करत होता हा प्रश्न. तुम्ही फार च छान समजावुन सांगता___/\___

हेमंतकुमार नवीन

कोविडविरोधी लसीचा संरक्षक कालावधी कमी असणार आहे का ? लस तयार करण्याच्या पारंपरिक पद्धतीनुसार तिचा संरक्षक कालावधी (सं का) ठरतो. १. काही लसी ( देवी, पिवळा ताप) या सौम्य केलेल्या जिवंत जंतूंपासून बनविल्या होत्या. देवीलसीचा ‘सं का’ पन्नास वर्षांहून अधिक काळ होता. २. करोना २ च्या बाबतीत त्या विषाणूच्या एका प्रथिनाचा वापर लस तयार करण्यासाठी होतो. ते प्रथिन पूर्णपणे की अंशतः वापरायचे यावर मतभेद आहेत. त्यानुसार संबंधित लसीच्या संकात फरक पडेल. ३. वरील प्रकार २ च्या लसींचा सं का १ पेक्षा खूप कमी असतो. म्हणून त्यांना बूस्टर द्यावे लागतात. ४. सारांश : लस तयार करताना संशोधकांना तराजूच्या एका पारड्यात प्रभावीपणा तर दुसऱ्यात सुरक्षितता ठेवावी लागते. तो समतोल साधणे जिकिरीचे असते.

हेमंतकुमार नवीन

वर धाग्यात प्र क्र ५ मध्ये कोविड१९ साठी रक्तद्रव उपचार याची माहिती आहे. त्यात आता अभ्यासातून काही भर पडली आहे. ती अशी: या उपचारांसाठी कोविड होऊन बरा झालेला रुग्ण दाता असतो. यासंदर्भात खालील निकष पूर्ण करणारा दाता सुयोग्य असतो: १. वय १८ ते ५५ दरम्यान. २. १०१.३ अंश F च्यावर ताप येऊन तो तीन दिवस वा अधिक टिकलेला असणे. ३. पहिले लक्षण आलेल्या दिवसानंतर एक महिन्याने त्याच्या रक्तातील IgG अ‍ॅन्टीबॉडीजचे प्रमाण चांगले असते. ४. रक्त देताना त्याच्यात पूर्वीचे कुठलेही लक्षण नसावे.

हेमंतकुमार नवीन

म मा
प्राणी आणि कोविड
चांगला प्रश्न. बहुधा हा आजार प्राण्यांमधून माणसात आलाय. तो प्राण्यांनाही होऊ शकतो (likely) असे वैद्यकीय संदर्भ सांगतो. वृत्तपत्रीय संदर्भानुसार काही प्राण्यांना तो झालाय. (https://news.cgtn.com/news/2020-05-15/How-is-COVID-19-affecting-animals-around-the-world--QvreEAyXN6/index.html) खात्रीशीर माहितीसाठी प्राणीशास्त्रज्ञ व्यक्तीचे मत लागेल.

गोंधळी नवीन

जगभरातील शास्त्रज्ञ यांनी संशोधन करुन सांगीतले आहे की हा वायरस हवेतुनही पसरु शकतो.

हेमंतकुमार नवीन

गोंधळी, चांगला प्रश्न विचारलात. यावर डॉ. सौम्या स्वामीनाथन ( वैज्ञानिक WHO) यांचे स्पष्टीकरण असे आलेले आहे: १. हा विषाणू हवेतून पसरतो, पण अत्यंत मर्यादित वातावरणात. २. मुख्यता हवेतून पसरणारे जे विषाणू (उदाहरणार्थ गोवर) असतात, त्या तुलनेत करोनाचे पसरणे बरेच कमी आहे. ३. करोनाचे वातावरणात उडालेले कण 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ राहत नाहीत. ४. जर तो वरील २ प्रमाणे मुख्यतः हवेतून पसरणारा असता, तर एव्हाना आपणा सर्वांनाच त्याचा संसर्ग झाला असता. ……… या विषयावर वैज्ञानिकांत अर्थातच एकमत नसल्याने जगभरात काथ्याकूट चालू आहे.

माहितगार नवीन

In reply to by हेमंतकुमार

३. करोनाचे वातावरणात उडालेले कण 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ राहत नाहीत.
ब्रिटीश एक्सपर्ट प्रा. वेंडी बार्कलेंच्या म्हणण्यानुसार वीषाणू तासाभरापेक्षा अधिककाळ हवेत राहू शकतो. संदर्भ , २ (युट्यूब बीबीसी मला पडणारे दोन प्रश्न असे की वादळात मोठ मोठ्या वस्तु उडून जाऊ शकतात, काही मायक्रॉनचा साईज असलेल्या वीषाणूंना साठी हवेचे सामान्य चलनवलन एखाद्या वादळासारखे नसेल का ? दुसरा प्रश्न जर पंधरा मिनीटात सुक्ष्मकण जमिनीवर बसत असतील तर सामान्यपणे बंद घरातील सर्व धूळ दिवसाभरात तरी खाली बसावयास हवी ती दिवसेंदीवस वाढत जाते म्हणजे हवेतून खाली बसण्यास वेळ घेते. अर्थात हे वीषाणू बाकी मोठ्या द्रव्य तुषारांसोबत आहेत असे गृहीत धरतो म्हणून जरासे लौकर बसण्याची शक्यता गृहीत धरली जाते पण छोट्या तुषारांसोबतच्या वीषाणूंचे काय होत असावे. असिम्प्टॉमॅटीक लोकांचे प्रमाण अधिक असणे लक्षणे लपवणे आणि कमी टेस्टींगमुळे वीषाणू समाजात अधिक असूनही मान्य केले जात नसण्याची शक्यता बाकी रहात नाही ना अशी साशंकता वाटते.

कपिलमुनी नवीन

कोविड च्या व्हाट्सअपीय विद्यापीठातून वाफ घेतल्याने नाकातून , घशातून होणारे इन्फेक्शन कमी होऊ शकते किंवा विषाणू नाकात, घशात मरतात, फुफ्फुसात पोचत नाहीत असे मेसेज आले आहेत. वाफ घेण्याचा काही फायदा होईल का ?

हेमंतकुमार नवीन

In reply to by कपिलमुनी

वाफ आणि श्वसनसंस्था याबद्दल काही मूलभूत माहिती: कुठल्याही श्वसनविकारात जेव्हा नाक चोंदणे, घशात खूप द्राव साठणे असे होते, तेव्हा वाफेने ते स्वच्छ व मोकळे होण्यास मदत होते. सूक्ष्म श्वासनलिकांपर्यंत वाफ पोचत नाही. तेव्हा ‘वरच्या’ श्वसनमार्गाची स्वच्छता हा वाफेचा खरा उपयोग आहे. तो कुठल्याही विशिष्ट सूक्ष्मजंतूच्या विरोधातील उपाय असत नाही. त्याचे महत्व श्वसनविकारातला पूरक उपचार इतकेच आहे.

मराठी_माणूस नवीन

नुकत्याच काही ठीकाणी टाळेबंदीला दिलेल्या मुदतवाढीच्या पार्श्वभूमीवर आज वाचलेली बातमी https://www.loksatta.com/desh-videsh-news/british-pm-boris-johnson-appeals-to-leave-home-without-fear-zws-70-2213449/

हेमंतकुमार नवीन

काही रोचक माहिती: स्वीडनमध्ये कोविड होऊन बरे झालेल्या रुग्णांचा हा अभ्यास आहे. त्यांच्यात अँटीबॉडीज काही सापडल्या नाहीत, परंतु T cells या संरक्षक पेशी बऱ्यापैकी वाढलेल्या होत्या. याचे पुरेसे विश्लेषण अजून व्हायचे आहे. अजून एका संशोधनात गेल्या तीन वर्षात जुन्या करोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या काही रुग्णांचा अभ्यास झाला. या जुन्या संसर्गामुळे त्यांच्यात काही T पेशींची निर्मिती झाली होती. या पेशींमुळे या लोकांना सध्याच्या विषाणू विरोधात प्रतिकारशक्ती आपसूक मिळाली असावी. त्यामुळे असे लोक सध्या संसर्ग होऊनही लक्षणविरहित असावेत. यावर अधिक अभ्यास होत आहे. हे नक्कीच आशादायक चित्र आहे.

Prajakta२१ नवीन

कपड्यातून पसरतो का ? बाहेरचे कपडे आपण धुतो किंवा कोपऱ्यात बॅग मध्ये वगैरे ठेवतो पण कपाटात घडी घालून ठेवलेले कपडे ,बेडशीट्स हाताळल्याने पसरू शकतो का? कपड्यांशेजारी अन्य एखादी वस्तू पैशाचे पाकीट वगैरे ठेवली गेली तर कपडे दूषित होऊ शकतात का? तसेच सामान्य व्यक्तीने एकदा बाहेर वापरलेले कपडे नुसते बाजूला ठेवून दुसऱ्या दिवशी घातलेले चालतील का?(फक्त दूध आणण्यापुरतेच बाहेर जाणे जवळच) सध्या अजूनही dettol चा सगळीकडे तुटवडा आहे तर कुठले डिसइन्फेक्टन्ट वापरता येईल? माझ्या एका नातलगाला आर्सेनिक अल्बम चा ३ दिवसाचा डोस घेऊनही झाला आयुष्य मंत्रालयाचा काढा हि चालू होता (दुसऱ्या शहरात असल्यामुळे केवळ फोनवर संपर्क) चांगली गोष्ट म्हणजे ते सर्व बरे झाले आहेत यावरून alternate मेडिसिन चा फक्त रोग झाला तर रिकव्हरी होण्यास उपयोग होत असावा असे वाटते

माहितगार नवीन

In reply to by Prajakta२१

@ Prajakta२१ श्वसन प्रणालींचे वीषाणूजन्य संसर्ग ही नवी बाब नाही, प्रत्येक सर्वसामान्य मानवी व्यवहार होताना वीषाणू संसर्ग होतो किंवा नाही यावर गेल्या दशकांमध्येच संशोधन होऊन जावयास हवे होते. माणसे लगेच मरत नाहीत ना मग कशाला हवे संशोधन असा दृष्टीकोण आधुनिक वैद्यकाने का बाळगला असावा याचे आश्चर्य वाटते. (संशोधनाचा अभाव असेल तरीही), दोन पर्यायी कृतींमधील अधिक सुरक्षीत असण्याची शक्यता कोणती हे सांगणे सामान्य ज्ञानाचा भाग असावयास हवे पण त्यातही तज्ञ मंडळी हेळसांड का करतात ह्याची कल्पना नाही. असाच खेळ श्वसन/नाकातोंडावाटे बाहेर पडणार्‍या मोठ्या आणि बारीक तुषारांबद्दल चालू आहे. मोठ्या तुषारांनी संसर्ग होऊ शकतो यावर संशोधक आणि वैद्यकात अधिक सहमती आहे. छोट्या तुषारांनी वीषाणू पसरू शकतात का यावर सहमती होणे बाकी आहे. पण छोट्या तुषारांनी संसर्ग होण्याची शक्यता समजा ०.०१ टक्के आहे पण ०.०१ टक्क्याची शक्यता टाळणे शक्य असेल तर तसे टाळणे अधिक सयुक्तिक नाही किंवा कसे. पण तज्ञ मंडळी नेमकी इथे सयुक्तिक मार्गदर्शनात कच खातात. हिच गोष्ट तुम्ही वर विचारलेल्या प्रश्नांबाबत होत असल्याची शक्यता मलातरी वाटते. समजा डॉक्टर श्यामवर दुसरा डॉक्टर राम शल्यचिकित्सा करणार असेल तर डॉक्टर श्यामला शल्यचिकित्सक डॉ. रामने निर्जंतुकीकरण न केलेले किंवा साबणाच्या पाण्याने न धुतलेले कपडे चालतील का ? किंवा निर्जंतुकीकरण केलेल्या / धुतलेल्या कपड्यांना दुसरी निर्जंतुकीकरण प्रक्रीया न केलेला वस्तुचा किंवा मानवी स्पर्ष चालेल का? जी स्वच्छतेची काळजी शल्यचिकित्से दरम्यान घेतली जाते ती सामान्य जिवनातही घेतल्याने संसर्गाच्या शक्यता आणि प्रमाण कमी राहील किंवा कसे. वीषाणू संसर्ग शेवटी एक अपघात आहे आणि अपघात टाळणारी प्रत्येक उपाययोजना जर सुरक्षीतता वाढवत असेल तर अशा उपाययोजना आमलात आणणे अधिक श्रेयस्कर नाही का?

हेमंतकुमार नवीन

हा विषाणू कपड्यामधून एकमेकात पसरत नाही हे तीन महिन्यांपूर्वीच तज्ञांनी स्पष्ट केले होते. जरी तो काही पृष्ठभागांवर काही काळ राहत असला तरी तिथून त्याने दुसऱ्याला संसर्ग करण्याची क्षमता ही खूपच कमी झालेली असते. तेच अन्य निर्जीव वस्तूंबाबत. वैद्यकाच्या अन्य उपचार पद्धतींच्याबाबत माझा अभ्यास नाही. संबंधित तज्ञाने मत व्यक्त केल्यास बरे होईल.

माहितगार नवीन

In reply to by हेमंतकुमार

जर सर्वसाधारण कापड वीषाणूंशी यशस्वी संघर्ष करत असेल तर पर्सनल प्रोटेच्टीव्ह ड्रेस आणि एन-९५ मास्क मध्ये वेगळे मटेरीअल कशासाठी हवे ? हे पुरेसे क्लिअर वाटत नाही, डॉक्टर साहेब कुठे गफलत होत नाहीए ना ?

हेमंतकुमार नवीन

In reply to by माहितगार

माहितगार, नीट लक्षात घ्या. बाजारातील सामान्य प्रकारच्या मुख्यपट्टीने फक्त ६५% पर्यंत विषाणू संरक्षण मिळते विशिष्ट प्रकारच्या मुखपट्ट्या, म्हणजे एन- ९५, ९८ , पी१०० इ. या चढत्या % क्रमाने विषाणू संरक्षण वाढवतात. अर्थात या आरोग्यसेवकांकरिताच शिफारस केलेल्या आहेत. त्यांची उपयुक्तता सामान्य पट्ट्यापेक्षा खूप जास्त आहे. आरोग्यसेवकांनी सर्वोत्कृष्ट दर्जाची अवरोध साधने वापरायची आहेतच. प्रश्न आहे तो सामान्यांनी सामान्य प्रकारच्या मुख्यपट्ट्या किती काळ वापरत राहायच्या, हा. .............
जर सर्वसाधारण कापड वीषाणूंशी यशस्वी संघर्ष करत असेल
कापड संघर्ष नाही करत ! सामान्य माणसाच्या कपड्यावर बाजारहाट करताना जे काही विषाणू उडले असतील, त्यांची संसर्गक्षमता क्षीण असते. मुळात ते कपड्यावर चिकटणे वगैरे आपल्यला वाटते तितके होत नाही. आपल्या चालण्याच्या हालचालीबरोबर बरेच असे कण वातावरणांतच विखुरले जातात.

माहितगार नवीन

In reply to by हेमंतकुमार

...आपल्या चालण्याच्या हालचालीबरोबर बरेच असे कण वातावरणांतच विखुरले जातात...
म्हणजे आपण आपल्या कपड्यावरून उडालेल्या वीषाणूंनी तेवढे प्रभावित होणार नाही इथ पर्यंत लक्षात घेतले तरी इतरांच्या कपड्यांवरून उडालेल्या वीषाणूंचे काय ? हा प्रश्न छिद्रन्वेषीपणा वाटले पण भारतातील गर्दीची ठिकाणे आणि कपड्यांच्या दुकानात कपडे वापरून पहाणे प्रकार आहे किंवा कपडे ऑनलाईन मागवलेले कुणि वापरून पाहिलेले असू शकतात कारण ते सहज बदलून मिळतात. या बाबींची जोखीम कितपत असू शकेल.
...आरोग्यसेवकांनी सर्वोत्कृष्ट दर्जाची अवरोध साधने वापरायची आहेतच. प्रश्न आहे तो सामान्यांनी सामान्य प्रकारच्या मुख्यपट्ट्या किती काळ वापरत राहायच्या, हा.....
एक डॉक्टर जसा स्वतःला बाधा होऊ नये म्हणून मुखपट्टी बांधतो तेव्हा तो दुसर्‍यालाही आपल्या वीषाणूंची बाधा होऊ नये म्हनून बांधतोच ना ? डॉक्टर म्हणतात का आम्ही किती काळ मुखपट्टी वापरणार किती वेळा हात धुणार ? एखाद्या ड्रायव्हरने किती काळ 'न पिता' गाडी चालवणार म्हटले तर चालेल का ? आपल्यातील वीषाणूंनी इतरांना अपघात होऊ नये असे वाटत असेल तर मुखपट्टी वापरावी किंवा संपूर्ण विलगीकरण करावे अथवा अधिकतम शारीरीक अंतर राखावे हे सयुक्तिक असणार नाही का? रुग्ण आणि डॉक्टरांना उत्तम दर्जाच्या मुकपट्ट्या कमी पडू नयेत म्हणून प्राधान्य देणे समजण्यासारखे आहे पण खरे म्हणजे जर वीषाणू संसर्ग साथ वास्तव असेल तर शक्य तेवढ्या लोकांना म्हणजे सामान्यांनाही उत्तम दर्जाच्या मुखपट्ट्या उपलब्ध व्हावयास नको का ? -उत्पादन आणि वितरणात बॉटलनेक असतील तर त्या निस्तरावयास हव्यात- किमानपक्षी दिवसातून दहा वीस लोकांशी संवाद साधावा लागणार्‍यां (व्यावसायिक इत्यादीं)ना उत्तम दर्जाच्या मुखपट्ट्या नको का? या बद्दल कुणिच का काही बोलत नाही. *** बाकी मी मुद्यांचे समर्थन करताना आणि साशंकता व्यक्त करताना आपल्या लेखनाची दखल घेतलेलीच असते. कुठे रहात असल्यास पुन्हा तपासून बघेन, अनेक आभार.

हेमंतकुमार नवीन

In reply to by माहितगार

शक्य तेवढ्या लोकांना म्हणजे सामान्यांनाही उत्तम दर्जाच्या मुखपट्ट्या उपलब्ध व्हावयास नको का ?
जरुर व्हाव्यात , अनुमोदन !

माहितगार नवीन

In reply to by हेमंतकुमार

टॉवेल आधी साबणाने आणि नंतर गरम पाण्यात डेटॉल टाकून काळजीपुर्वक धुतलेला टॉवेल जरी तोंडपुसल्यानंतर वापरल्यास मला शिंका येतात हे बरीच वर्षे चालू आहे (टॉवेल मटेरीयल ते साबण सर्व बदलून पाहीले आहे). पण आता शिंक आली की आसपासचे लोक शंका घेतात -आणि मलाही प्रत्येक शक्यता टाळायची असते- म्हणून मी गेली चारेक महिन्यापासून चेहरा व्यवस्थित धुतो पण टॉवेल चेहर्‍याला न लावता आपसूक वाळेपर्यंत थांबावे लागते आहे. फॅमिली डॉक्टर अँटीअ‍ॅलर्जी टेब्लेट लिहून देतात, त्याचे साईड इफेक्ट ऑनलाईन वाचल्यावर अँटीअ‍ॅलर्जी घेण्यास मन धजावत नाही.

हेमंतकुमार नवीन

In reply to by माहितगार

* चारेक महिन्यापासून चेहरा व्यवस्थित धुतो पण टॉवेल चेहर्‍याला न लावता आपसूक वाळेपर्यंत थांबावे लागते आहे. >>>> चांगलेच की, अगदी नैसर्गिक !

हेमंतकुमार नवीन

हा विषाणू खरेच मानवनिर्मित असु शकेल का
हा प्रश्न रोचक आहे पण तो जीवशास्त्रज्ञाच्या अखत्यारित येतो. थोडेफार गुगल केल्यावर मला समजले ते असे: प्रयोगशाळेमध्ये एखाद्या जिवाणूचा डीएनए कृत्रिम पद्धतीने तयार करतात. मग तो एखाद्या जिवाणू मध्ये घालतात. थोडक्यात अंशतः कृत्रिम जिवाणू प्रयोगशाळेत तयार केलेले आहेत असे दिसते. इथे काही माहिती आहे: https://www.reuters.com/article/us-science-synthetic-life/u-s-scientists-take-step-toward-creating-artificial-life-idUSKBN1DT2ZB https://www.sciencedaily.com/releases/2008/01/080124175924.htm मात्र सध्याच्या विषाणूबाबत अधिकृत माहिती संबंधित जीवशास्त्रज्ञाने सांगावी हे बरे.

हेमंतकुमार नवीन

In reply to by हेमंतकुमार

करोना-२ हा विषाणू निसर्गनिर्मित असून तो वटवाघूळ किंवा अन्य प्राण्यांमधूनच मानवात आला, असे प्रतिपादन करणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञाचे एक चांगले विवेचन इथे वाचता येईल .

Gk नवीन

1. मोठी सरकारी हॉस्पिटल व खाजगी हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल म्हणून जाहीर केली आहेत, तिथे कोविड चे उपचार होतात. सामान्य सेंटर मध्येही किमान 200 - 300 बेड असतात , 100 आय सी यु त व 100 - 200 वॊर्ड मध्ये , त्यासाठी सरकारी दवाखान्यात इतर वोर्ड सध्या बंद आहेत व फक्त कोविड पाहिले जाते, मोठ्या खाजगी हॉस्पिटलनि मंगल कार्यालये , बेंकवेट हॉल वगैरे घेतले आहेत. 2. जनरल वोर्डातही ऑक्सिजन असतो, आयसीयूत इतर उपकरणे व्हेंटि वगैरे असतात, ऑक्सिजनची डिमांड प्रचंड आहे, म्हणून बाहेर राक्षसी आकाराचे सिलेंडर बसवले जातात. ब 3. प्रत्येक लोकेशन ला 2-4 डॉकटर , 5-10 नर्सेस , 4- 5 आया , वोर्ड बॉय वगैरे असतात, शिवाय फोन वरून कन्सल्टंट उपलब्ध असतात, लॅब , एक्स रे वगैरे उपलबंध असतात, जनरल वोर्डात केवळ टेस्ट पॉझिटिव्ह पण त्रास नाही , पासून ते थोडेफार धापणारे , पण ऑक्सिजन लावून बरे आहेत , अशी मोठी रेंज असते, यापेक्षा गंभीर रुग्ण आयसीयु त जातात 4. सर्व स्टाफ ppe घालतात , यात शूज कव्हर , गाऊन , ग्लोज , दोन मास्क , केप, गॉगल किंवा फेस शिल्ड असते, ते घालणे व काढणे यासाठी दोन स्वतंत्र कक्ष असतात व शेजारीच गरम पाण्याचे शॉवर सोय असते, ड्युटीला आले की सर्व घालणे , अंगात टी शर्ट व बर्म्युडा असेल तर ते घालणे सोयीचे जाते, ppe घालणे याला donning म्हणतात , एकदा ते चढवले की काहीही खाता पिता येत नाही, टॉयलेट वगैरे नाही, फक्त ड्युटी. ड्युटी झाली की ppe काढणे ह्याला doffing म्हणतात,आधी हातावर सॅनिटायझर लावायचे, काढताना एकेक वस्तू उलटी गुंडाळत काढायची म्हणजे तिचा बाह्यभाग व आपले अंग , कपडे कुठे एकमेकाला लागणार नाही , अशी खबरदारी घेऊन करावे लागते. एका मोठ्या यलो पॉलिथिन पिशवीत ते घालून पिशवीला गाठ घालून ती डिसपोज करायला द्यायची , मग लगेच गरम पाण्याने शॉवर घ्यावी लागते 5. रुगणाच्या नातेवाईकास आत यायची परवानगी नसते, मोबाईल वरून किंवा बाहेरील काउंटर च्या माध्यमातून संपर्क केला जातो. 6. साधारण 8 दिवसाने पुन्हा घशाचा स्वेब तपासतात, निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असूनही त्रास नसेल तर पुढच्या उपचाराचा सल्ला प्रिस्क्रिप्शन लिहून डिस्चार्ज देतात, हे निर्णय कन्सल्टंट घेतात, उपचारानंतरही घरी 7 ते 21 दिवस आयसोलेशन चा सल्ला देतात ग

हेमंतकुमार नवीन

जीके, उपयुक्त माहिती. .................................. सामान्यांनी मुख्यपट्ट्या वापराव्यात की नाही”, यावर आज सहा महिन्यांनी देखील तज्ञांचे मतैक्य नाही. या मुद्द्यावर त्यांचे तीन गट पडलेले दिसतात: १. होय, जरूर वापराव्यात. अगदी सामान्य कापडाच्या पट्टीनेही वापरकर्त्याला ६५ टक्के प्रमाणात विषाणू संरक्षण मिळते. अर्थात याच बरोबर शारीरिक अंतर राखणे अधिक महत्त्वाचे. २. सर्वांना नेहमीच वापरायची शिफारस नको. बाजारातील विविध पट्ट्यांतील छिद्रांचा आकार २० ते १०० मायक्रॉन या टप्प्यात असतो. या विषाणूच्या आकार ०.१ मायक्रॉन च्या घरात आहे. मग त्यांचा कितपत उपयोग ? सर्वांनी सतत मुख्यपट्ट्या लावून सर्वांनाच एक प्रकारचे फसवे समाधान मिळते. ३. समाजाने दीर्घ काळ नाक तोंड झाकून वावरणे निसर्गविरोधी आहे. त्यातून आपण आपल्या प्रतिकारशक्तीला आव्हान देणे थांबवतो. त्यातून ती कालांतराने दुबळी होईल. याशिवाय सततच्या या अनैसर्गिक दृश्यामुळे समाजात मानसिक अनारोग्याची भावना बळावते. प्रत्येक गटाच्या म्हणण्यात काही प्रमाणात तथ्य आहेच. या विषयावर तज्ञांची ही मतभिन्नता पाहिल्यावर सामान्य माणूस भंजाळला नाही तरच नवल !

मराठी_माणूस नवीन

https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-response-email-letter-abn-97-34-2216461/ "मुखपट्ट्या आणि माहीती " ह्या शिर्षकाखाली एक पत्र प्रसिध्द झाले आहे. त्यात मुखपट्ट्या आणि ६ फूट अंतर ह्याच्या परीणामकारीकते बद्दल शंका उपस्थित केली आहे. ह्या बद्दल काय मत आहे ?

हेमंतकुमार नवीन

सामान्य मुखपट्टीच्या उपयुक्ततेबाबाबत तज्ञांत बरेच मतभेद आहेत. आपण जेव्हा ती घालून वावरतो, तेव्हा आपले बोलणे, शिंकणे आणि खोकणे यातून बाहेर पडणाऱ्या जंतूकणांची संख्या कितपत कमी होते यावर उलट-सुलट निष्कर्ष निघालेले आहेत. त्यामुळे या पट्टीपेक्षाही शारीरिक अंतर राखणे अधिक महत्त्वाचे आहे. पट्टी आणि अंतर या दोघांचा मिळून परिणाम फायदेशीर होतो. .... वरील अन्य काही प्रतिसादांत याचे स्पष्टीकरण दिलेले आहे.

मराठी_माणूस नवीन

In reply to by हेमंतकुमार

धन्यवाद. पण अशा पट्ट्या वापरल्याने खरेच विषाणूंना रोखले जाउ शकते का , ह्याच्या चाचण्या घेण्यात आल्या का , त्याचा काही अहवाल आहे का , हा मुद्दा आहे

हेमंतकुमार नवीन

असे विविध देशांचे बरेच क्लिष्ट वैद्यकीय अहवाल आहेत. वादग्रस्त मुद्दा आहे खरा. जरा वेळाने त्याचा सारांश लिहितो. यावर सखोल लिहिण्याला इथे मर्यादा आहेत.

हेमंतकुमार नवीन

In reply to by हेमंतकुमार

मुखपट्टी आणि विषाणू संरक्षण : १. २०२० पूर्वीचे अभ्यास : हे सर्दी, फ्लू आणि अन्य करोनाविषाणू ( म्हणजे जुने) यांच्यावर केले होते. हे आजार झालेल्या रुग्णांचे तोंडावर पट्टी लावून त्यांचे उच्छवास आणि खोकल्यातून उडालेले द्रव यांची तपासणी झाली. तेव्हा त्या बाहेर पडलेल्या तुषारांमध्ये विषाणूंचे प्रमाण खूप कमी होते. २. म्हणून या पूर्वीच्या अनुभवावर आधारित मत जानेवारी २०२० मध्ये चालू साथीसाठी दिले गेले. >>> मुखपट्टी वापरावी. ३. covid-19 रुग्णांवर असे काही प्रयोग सुरुवातीला कोरियात झाले. त्यात सामान्य मुखपट्ट्यांनी विशेष उपयोग होत नाही असा निष्कर्ष निघाला. परंतु, या प्रयोगातील पद्धती पुरेशा शास्त्रीय नव्हत्या, असा त्यावर आक्षेप घेतला गेला आहे. ४. एकूण काय उलट-सुलट बरेच आहे - एकमत नाही !

माहितगार नवीन

https://www.livemint.com/science/health/fenofibrate-can-downgrade-covid-19-threat-to-common-cold-level-researcher-11594770400514.html इज्रायली संशोधकांकडून fenofibrate वराच्या प्राथमिक संशोधना बद्दल वृत्त येते आहे. यात फुप्फुसात फॅट बर्नींगचा उल्लेख आहे. फुप्फुसात फॅट बर्नींग काय प्रकरण असते ?

हेमंतकुमार नवीन

माहितगार, तूर्तास ती वृत्तपत्रीय बातमी आहे. त्या प्रयोगावर अन्य तज्ञांची समीक्षा होऊन तो शोधनिबंध प्रकाशित झाल्यावरच त्यावर शिक्कामोर्तब होईल. तोपर्यंत सबुरीने घेऊ. त्यांची थिअरी अशी आहे: १. कुठल्याहीपेशी प्रमाणे फुप्फुसाच्या पेशीत देखील मेद असतो. या विषाणूला त्याची प्रचंड वाढ होण्यासाठी त्या मेदाची नितांत गरज असते. २. जर fenofibrate या मेदविरोधी औषधाने आपण पेशीतला मेद कमी करून टाकला, तर विषाणूची आपल्या पेशींवरील ‘पकड’ नष्ट होईल. परिणामी त्याची वाढ थांबेल. …………………….. चांगल्या चर्चेबद्दल सर्वांना धन्यवाद. जिथे सविस्तर उत्तरे दिलीत तिथे संबंधिताने ती वाचल्याची बारीकशी पोच दिल्यास बरे वाटेल. :))

हेमंतकुमार नवीन

कोविडमधून ‘बर्‍या’ होऊन घरी पाठवलेल्या काही रुग्णांचे एक महिन्याने पुन्हा निरीक्षण केले गेले. त्यातून अशी माहिती मिळाली: १. आजाराच्या सुरुवातीचे (२ महिन्यांपूर्वीचे) एखादे लक्षण तरी टिकून राहते. २. थकवा बऱ्यापैकी असतो. ३. काहींना धाप लागल्यासारखी होते तर काहींना छातीत दुखते. ४. काहींमध्ये सांधेदुखीही आढळली. ५. कोणाला पुन्हा ताप मात्र आलेला दिसला नाही. अजून काही महिन्यांनीच आजाराचे दीर्घकालीन परिणाम स्पष्ट होतील.

Gk नवीन

In reply to by हेमंतकुमार

मला डिचार्ज नंतर दोन मजले चढले की धाप लागायची , एकदम जोरदार, मग हळूहळू एकेका आठवदयाने धाप , तीसरा मजला , चौथा मजला अशी वर वर गेली, आता सहा मजले चढले तरी व्यवस्थित असते

हेमंतकुमार नवीन

आता सहा मजले चढले तरी व्यवस्थित असते >
>> छान प्रगती, शुभेच्छा !

माहितगार नवीन

१) इंडियन मेडीकल अ‍ॅसोसिएशनच्या म्हणण्यानुसार १३०० च्या आसपास डॉक्टर स्वतः कोविडग्रस्त झाले आणि त्यातील ९९ जणांनी जीव गमावला हे प्रमाण सर्वसामान्यांच्या मृत्यूदरापेक्षा अधिक येते आहे. दोष मुख्यत्वे पर्सनल प्रोटेक्टीव्ह किट्सवर ढकलला जातोय. पर्सनल प्रोटेक्टीव्ह किट्स चांगल्या दर्जाच्या असणे गरजेचे आहेच पण एन-९५ मास्क व चांगले चष्मे आणि चेहरा कव्हर असताना एवढी जोखीम पर्सनल प्रोटेक्टीव्ह किट्सच्या मर्यादांमुळेच येते का ? वीषाणू म्हणजे गॅस नव्हे की बारीकशा कुठल्याही भेगेतन घुसला. पर्सनल प्रोटेक्टीव्ह किट्सवर बद्दल चर्चा करताना इतर आरोग्य कर्मचार्‍यांच्या आणि आपापल्या परिवार जनांच्या काटेकोरपणाचे पालनाकडे दुर्लक्ष होत नाही ना हेही पहाणे जरूरी असावे हे ल़क्षात घेतले जात असेल का ? २) दुसरी बातमी तेलंगाणा सरकार हैदराबादमधील मृत्यूची आकडेवारी कमी कशा पद्धतीने दाखवते याची डेक्कन क्रॉनीकलची बातमी होती. कोविडचे लक्षण आणि शंका असलेल्यांना एकत्र कोंबण्याचा प्रकार सर्रास चालू आहेच आणि विलगीकरण केंद्रेच साथीची केंद्रे बनू शकतात हा एक भाग झाला. पण सोबतच विलगीकरण कक्षात झालेले मृत्यूंचीआकडेवारी कोविड मृत्यूच्या एकुण आकडेवारीत जोडण्याचे तेलंगाणा सरकार टाळून आकडेवारी कमी दाखवते आहे. मला वाटते आकडेवारी कमी दाखवण्याचा प्रताप सर्वच राज्यसरकारांकडून कमी अधिक प्रमाणात होणार. जनता किमान अंतराच्या पथ्या बाबत जुमानत नाही सरकारे तरी काय करतील. खरी आकडेवारी कबुल केली तर दोषमात्र सरकारच्या अकार्यक्षमतेवर जाऊन सरकार अस्थीर होणे कोणत्याही महापौर आणि मुख्यमंत्र्याला नकोसे असते. ३) पुण्यात २००च्या आयसीयू बेड १०० व्हेंटीलिएटर आसपास आत्ताच कमी पडताहेत.-एका संशोधकालाही मृत्यूपुर्वी बेडची संधी मिळाली नाही अशी सुद्धा बातमी होतीच- सोबत डॉक्टर्स आणि स्टाफही आजारी पडत असल्याने त्यांचाही तुटवडा असणार आहे. दुसरीकडे जनता रोज मरे त्या कोण रडे म्हणून शारीरीक अंतर गांभीर्याने पाळण्यास तयार नाही. भारतात हिंदू मृतदेहांचे दहन होण्याचा जनता आणि सरकारांना एक फायदा आहे पुरण्याच्या खड्डे वाढल्याचे विदेशातील फोटो त्यांच्या वाढत्या मृत्यूदराचा पुरावा डोळ्यासमोर उभाकरतात, दहन प्रकरणात किती गेले तरी खड्ड्यांचे फोटो येत नाहीत. असो.

Gk नवीन

पी पी इ किट मध्ये हातापायाच्या sleeve ना घट्ट इलेस्टिक असते, सतत वापरून हातापायावर जखमा होतात Ppe

हेमंतकुमार नवीन

अगदी खरे आहे. ते घालून वावरतानाचे हाल तर संबंधितच जाणे. नाईलाज ......

हेमंतकुमार नवीन

पीपीइ संचात हवा खेळती राहावी यासाठीच्या आवरणाचे संशोधन आणि उत्पादन पेटंट प्राप्ती : बातमी : https://epaper.esakal.com/FlashClient/Client_Panel.aspx#currPage=7 (पान ७) प्रा. तुषार देशपांडे व चमूचे अभिनंदन !

Prajakta२१ नवीन

लोकसत्ता मधून प्रतीक्षा संपली! ऑक्सफर्डच्या लसीचा रिपोर्ट अखेर 'द लॅन्सेट'मध्ये झाला प्रसिद्ध https://www.loksatta.com/desh-videsh-news/oxfords-covid-19-vaccine-candidate-is-safe-early-results-show-dmp-82-2222187/

माहितगार नवीन

In reply to by Prajakta२१

बातमी चांगली असली तरी, बारकवे महत्वाचे असतात, अधिक परिपूर्ण बातमीसाठी हे बीबीसी वृत्त अधिक सयुक्तीक असावे. बारकाईने बघीतल्यास काही गोष्टी अजून सिद्ध होणे बाकी आहे. लसिंची उपलब्धता काही किमान प्रमाणात होण्यास अद्याप सहा एक महीने आणि सर्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास अजून ८-९ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे अजून वर्षभर निष्काळजीपणा टाळत दक्षता घेण्याची जरूरी आहे .

हेमंतकुमार नवीन

सहमत.
बारकावे महत्वाचे असतात,
+११

हेमंतकुमार नवीन

आता काही करोना- सार्स २ च्या बाजूने लिहितो. १. तो अनेक वर्षे वटवाघूळ व खवलेमांजरांत सुखाने नांदत होता. २. बहुधा खवलेमांजरांत असताना त्याने मोठा जनुकीय बदल केला. त्यामुळे त्याला माणसात उडी मारणे सोपे गेले. ३. माणसात आल्यावर त्याने अजून काही बदल केले, ज्यांच्यामुळे त्याला या ‘नव्या घरात’ पाय घट्ट रोवता आले. हीच पायरी त्याच्या दृष्टीने फायद्याची आणि आपल्या दृष्टीने महात्रासाची ठरली. ४. आता कुठल्याही जंतूप्रमाणे त्याचे ध्येय “वाढ, वाढ आणि वाढ” हेच असते. ५. जर का त्याने सुरवातीच्या रुग्णांना खूप गंभीर आजार करून मारून टाकले, तर ते त्याच्या दृष्टीने नुकसानीचेच असते ! कारण जिवंत माणसातच तो वाढू शकतो. सार्स १ बऱ्यापैकी असाच वागला. त्यामुळे त्याची महासाथ घडवण्याआधीच संपला. ६. पण, सार्स २ हा बेटा शहाणा व चतुर आहे. त्याने अधिकतर लोकांत हल्ला सौम्यच ठेवला आणि त्यामुळे तो अधिकाधिक लोकांत पसरत गेला. ७. मग काय ......वाढता वाढता वाढे असे त्याचे स्वरूप झाले !! ८. आता त्याला आपल्याशी मैत्री करून आपल्यातच शांतपणे जगायचे आहे खरे, पण त्यासाठी तो बराच वेळ घेतोय बेटा ...

मराठी_माणूस नवीन

In reply to by हेमंतकुमार

८. आता त्याला आपल्याशी मैत्री करून आपल्यातच शांतपणे जगायचे आहे खरे, पण त्यासाठी तो बराच वेळ घेतोय बेटा ... म्हणजे ज्या माणसात तो आहे , तो माणुस जगतोय आणि विषाणू पण जगतोय असे का ?

हेमंतकुमार नवीन

होय, म्हणजे तो आपल्यातच इतक्या सौम्यपणे राहू लागतो, की हळूहळू आपल्याला त्याचा काही त्रासही जाणवत नाही. जसे की अनेक सर्दीचा सर्दीच्या विषाणूंचे झालेले आहे. बहुतेक विषाणूंच्या उत्क्रांतीचा साधारण असाच मार्ग असतो.

हेमंतकुमार नवीन

कोविड-मृतांच्या शवविच्छेदनातून शरीरातील बिघाडावर अधिक प्रकाश पडत आहे. काही मुद्दे: १. विषाणूविरोधी दाह प्रक्रिया >> रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणाला इजा >>> छोट्या रक्तगुठळ्या >> फुफ्फुसे आणि आणि अन्य काही इंद्रियांच्या कार्यात बिघाड. रक्तगुठळ्याची प्रक्रिया जे रुग्ण अति गंभीर झाले त्यांच्यात अधिक आढळली. सर्वांमध्ये नाही. 2. दाह प्रक्रिया >> थेट फुफ्फुसाचा आजार. सारांश : हा विषाणू रक्तवाहिन्या आणि फुफ्फुसे अशा दोन्हींचा आजार घडवू शकतो. रुग्णानुसार यात काही फरक राहतात.

हेमंतकुमार नवीन

काही रोचक: सुमारे २२०-२५० विषाणू माणसाला संसर्ग करतात. पण त्यांपैकी निम्म्याहून कमी एकातून दुसऱ्या माणसात पसरतात. जे पसरतात, त्यातलेही बरेच क्षीण असतात. तर काही संसर्ग झाल्यावर नाशही पावतात. आता जे काही जोरदार असतात ते जनुकीय बदल करून माणसात स्थिरावतात. अशी ‘यशस्वी’ मंडळी मग साथी घडवतात.

माहितगार नवीन

आई ते नवजात-बाळ प्लॅसेंटा मार्फत कोविड-१९ चा संसर्ग होत असल्याचा दावा ससून च्या डॉक्टरांनी केलेला दिसतो. बाळाला जन्मताच ऑक्सीजन देऊन वाचवले गेले असे टाईम्स ऑफ इंडीया वृत्तावरून दिसते. हे बरोबर असेल तर प्रेग्नंट स्त्रीयांची काळजी वाढवणारी बाब म्हणावी लागेल. पण हे बरोबर असेल तर लक्षात येण्यासाठी एवढे महिने का लागले हे नीटसे समजले नाही

हेमंतकुमार नवीन

संबंधित मातेला तिच्या गरोदरपणाच्या शेवटच्या आठवड्यात ताप आला होता. तसेच तिची स्वाब चाचणी नकारात्मक होती. मात्र तिच्या रक्तात संबंधित अँटीबॉडीज सापडल्या. मुळात गरोदरपणाच्या अगदी शेवटच्या टप्प्यातच हे लक्षात आलेले होते. बाळाची जन्मताच स्वाब चाचणी होकारात्मक आली.

माहितगार नवीन

In reply to by हेमंतकुमार

डॉ. कुमारजी, माझा प्रश्न जरा वेगळा आहे, मी महिने ससून मध्ये बाळंत झालेल्या महिलेचे विचारत नाहीए. १) गेल्या सहा महिन्यात जगभर अनेक महिला शेवटच्या महिन्यात कोविड होऊन डेलीव्हर झाल्या असतील आणि प्लॅसेंटातून कोविड जात असेल तर त्यांच्या ही बाळांना गेला असेल. प्लॅसेंटातून कोविड संक्रमण होत असल्याचे जगातल्या इतर डॉक्टर व संशोधकांचे गेली सहा महिने दुर्लक्ष झाले असा या बातमीचा अर्थ निघतोय. २) बाळंतीण महिलांसाठी अ‍ॅडव्हायजरी काय होत्या मला माहित नाही पण त्या ऊपरोक्त शक्यता लक्षात घेऊन दिलेल्या होत्या का ? हे खरे असेल तर,खरे म्हणज, लोक व्यवहारातील निष्काळजीपणा बघता लस ऊपलब्ध होई पर्यंत फॅमिली प्लानिंगची अ‍ॅडव्हायजरी जास्त सयुक्तीक ठरत नाही का असाही प्रश्न मनात आला.

माहितगार नवीन

In reply to by माहितगार

माझ्या अनभिज्ञतेबद्दल माफ करा. पण ताप वीषाणू संसर्ग गर्भा पर्यंत पोहोचत असतील आणि शेवटच्या महिन्याच्या आधीच्या कोणत्यातरी महिन्यात संसर्ग होऊन गेला तर गर्भावर आणि नव्या जन्मणार्‍या बाळांवर काही परिणाम संभाव्य असू शकतात का ? कोविड काळात इनफँट मोर्टॅलिटी रेट कमी जास्त झाला असे काही दिसून आले आहे का ?

हेमंतकुमार नवीन

In reply to by माहितगार

नव्या जन्मणार्‍या बाळांवर काही परिणाम संभाव्य असू शकतात का ?
चांगला प्रश्न. काही अहवाल : १.. काही कोविड- मातांच्या बाळांना जन्मल्यावर श्वसन अवरोध झाला आणि त्यांच्या यकृताचे कामात बिघाड होता २. काही बाळांना न्यूमोनिया झाला पण तो बराही झाला. ३. तर काही माता मुदतपूर्व प्रसूत झाल्या

हेमंतकुमार नवीन

निष्काळजीपणा बघता लस ऊपलब्ध होई पर्यंत फॅमिली प्लानिंगची अ‍ॅडव्हायजरी जास्त सयुक्तीक
>>> अगदी बरोबर. * जगातल्या इतर डॉक्टर व संशोधकांचे गेली सहा महिने दुर्लक्ष झाले बघूया, जगातील काही संदर्भ मिळाले तर सांगतो.

हेमंतकुमार नवीन

निष्काळजीपणा बघता लस ऊपलब्ध होई पर्यंत फॅमिली प्लानिंगची अ‍ॅडव्हायजरी जास्त सयुक्तीक
>>> अगदी बरोबर. * जगातल्या इतर डॉक्टर व संशोधकांचे गेली सहा महिने दुर्लक्ष झाले बघूया, जगातील काही संदर्भ मिळाले तर सांगतो.

हेमंतकुमार नवीन

या घटनेपूर्वीचे काही परदेशी संदर्भ वाचले. १. काही घटनांत आईला कोविड सिद्ध झालेला असूनही बाळे जन्मानंतर १० दिवसांपर्यंत निगेटिव्ह होती. २. अन्य काही घटनांत आईला कोविड असून तिचे बाळ ३६ तासानंतर + आले होते. ... म्हणजेच सदर घटनेत बाळ जन्मतःच + आहे. तसेच या चाचण्या बाळाचा नाकातील swab, मातेची वार आणि बाळाची नाळ या सर्वांवर + आल्या हे विशेष दिसते.

रात्रीचे चांदणे नवीन

In reply to by हेमंतकुमार

समजा एखादी महिला ५-६ महिन्याची गर्भवती आहे आणि तिला कोविड १९ झाला तर काय? कदाचित महिला बरी होईलही पण पोटा मधल्या गर्भाचे काय होईल?

हेमंतकुमार नवीन

वर माझ्या ३.११ वाजताच्या प्रतिसादात याचे उत्तर दिलंय.

हेमंतकुमार नवीन

हर्ड इम्युनिटी विकसित झाली आहे हे कसे ठरवितात?
हा विषय सामाजिक वैद्यकातला असून त्याच्याशी क्लिष्ट संख्याशास्त्रीय संकल्पना निगडित आहेत. मी त्यातला तज्ञ नसल्याने एका मर्यादेत उत्तर देतो. समूह प्रतिकारशक्ती मोजण्याच्या दोन पद्धती असतात : १. अप्रत्यक्ष : यात त्या आजाराच्या नव्याने निर्माण होणाऱ्या रुग्णसंख्येचा विचार करतात. परंतु यात लक्षणविरहित लोकांची मोजदाद होत नाही. ही याची महत्त्वाची मर्यादा आहे. २. प्रत्यक्ष: यासाठी मोठ्या प्रमाणावर समाजातील लोकांच्या रक्तातील संबंधित अँटीबॉडीज चे प्रमाण मोजावे लागते. ( काही आजारांत अन्य चाचण्या देखील).

माहितगार नवीन

२. प्रत्यक्ष: यासाठी मोठ्या प्रमाणावर समाजातील लोकांच्या रक्तातील संबंधित अँटीबॉडीज चे प्रमाण मोजावे लागते. ( काही आजारांत अन्य चाचण्या देखील).
दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबई, चे सेरॉलॉजीकल सर्वेंचे रिझल्ट मागच्या आठवड्याभरात आले त्या बद्दलचा वृत्तपत्रीय माहिती आधारीत धागा मी काढला आहे. हर्ड इम्युनिटी संदर्भाने केलेल्या वाचनातून मला ज्या गोष्टींचे आकलन झाले त्यात पहिले हर्ड इम्युनिटीसाठी टक्केवारी वीषाणूच्या संसर्ग फैलाव क्षमते नुसार आणि लोक व्यवहार पद्धतीनुसार बदलती असते. दुसरे नव्या वीषाणूची साथ चालू असताना या स्पेक्युलेशनचा उपयोग नसतो कारण किती लोकांपर्यंत पोहोचल्या नंतर साथीला उतार पडेल ते साथ संपल्या नंतरच कळते. तिसरे त्या पेक्षाही महत्वाचे लस उपलब्ध नसलेल्या वीषाणूची साथ हर्ड इम्युनिटी मिळवण्यासाठी जाणीवपुर्वक पसरवण्याचा विचार आणि प्रयत्न -कुणालाही प्रत्यक्ष आजाराने ग्रस्त करुन प्रयोग करणे अनैतिक असल्यामुळे- अनैतिक ठरतात.

हेमंतकुमार नवीन

दुसरे नव्या वीषाणूची साथ चालू असताना या स्पेक्युलेशनचा उपयोग नसतो
>>> +११ या मागे Seroepidemiology विज्ञान असते. यामध्ये हे साथ वगैरे नसताना निरोगी माणसांच्या मूलभूत तपासण्या मोठ्या प्रमाणावर कराव्या लागतात. त्यातून त्या भौगोलिक प्रदेशातील काही आजारासंबंधीची प्रतिकार शक्ती लोकांत कितपत अस्तित्वात आहे याचा प्राथमिक अंदाज येतो.

हेमंतकुमार नवीन

आम्ही मुखपट्टी वापरणारच आणि मुखदर्शन पण देणार ! पारदर्शक प्रकार. हाकानाका ok (सौजन्य : npr ).

Rajesh188 नवीन

Covid19 चे मूळ माहीत नाही. तो कसा माणसात आला ठाम पने काही ही माहीत नाही मास्क तुम्हाला वाचवू शकतो का. ठाम पने माहीत नाही. उपचार करताना कोणती औषध वापरायची ठाम पने माहीत नाही हवेतून पसरतो का ठाम पने माहीत नाही. शरीराचे कायमस्वरूपी काय नुकसान करतो. ठाम पने माहीत नाही. डास पसरवतात का. ठाम पने माहीत नाही प्रतीपिंड किती दिवस टिकतात. ठाम पने माहीत नाही सामूहिक प्रतिकार शक्ती निर्माण होते का ठाम पने माहीत नाही. लस निर्माण होवू शकते का ठाम पने माहीत नाही फक्त एकच गोष्ट ठाम पने माहीत आहे कोणत्याच व्यक्ती chya संपर्कात येवू नका. Covid तुम्हाला 100% होणार नाही.

माहितगार नवीन

In reply to by Rajesh188

निसर्गासारखेच विज्ञान त्याच्या त्याच्या नियमांनुसार काम करत असते विज्ञान गोंधळलेले नसते. संशोधक गोंधळलेले असू शकतात किंवा सामान्य माणूस गोंधळलेला असू शकतो विज्ञान गोंधळलेले नसते. विज्ञानाचा अभ्यास गोंधळलेला असू शकतो लॉजीक गोंधळलेले असू शकते विज्ञान गोंधळ लेले नसते. विज्ञान विज्ञान असते संशोधकांना जेवढे समजले तेवढे नीट समजावून घ्यायचे असते माणसांचा सबंध ईतिहास माहित नसला तरी माणसांचे अस्तीत्व नाकारता येत नसते. तसेच आहे वीषाणूंचा ईतिहास पूर्ण माहित नसला तरी अस्तीत्व नाकारता येत नसते. माणसे कोण कोणत्या पाण्यात पोहून वाचली माहित नसले तरी माणसे कशी पोहतात माहिती असते कालचा वीषाणू कोणत्या मार्गाने आला माहित नसले तरी वीषाणू संक्रमणांचे मार्ग माहित असतात किमान शारिरीक अंतर + मास्क + निर्जंतुकीकरण वीषाणू संक्रमण रोखण्याचा सध्या ऊपलब्ध राजमार्ग आहे हे ठामपणेच माहित असते.

चौकस२१२ नवीन

In reply to by माहितगार

सह्म्त +१ विज्ञान कधी दावा करीत नाही कि सर्व समजले आहे .. ते एखाद्या प्रथेच्या / प्रणालीचा वयवस्थित अभ्यास करायची शिस्त लावते पण मग आपले भांडे फुटेल या भीतीने भोंदू बिसिनेस वाले मग त्याला विरोध करतात !

Ajit Gunjal नवीन

COVID 19 WHO is bringing the world’s scientists and global health professionals together to accelerate the research and development process, and develop new norms and standards to contain the spread of the coronavirus pandemic and help care for those affected. Rahata News

हेमंतकुमार नवीन

स्वागत. इथे मराठीत लिहावे ही विनंती. शुभेच्छा !

गामा पैलवान नवीन

माहितगार, तुम्ही म्हणता की
विज्ञान गोंधळ लेले नसते.
तर विज्ञान म्हणजे नेमकं काय? आणि ते गोंधळलेलं नसतं म्हणजे काय? आ.न., -गा.पै.

Gk नवीन

हर्ड इम्युनिटी हे आजारापासून मिळणारे अप्रत्यक्ष संरक्षण आहे. हर्ड इम्युनिटी लोकसंख्येला आजारापासून वाचवते पण लस तयार होईल तेव्हाच हर्ड इम्युनिटी तयार होईल किंवा नागरिकांना करोनाची लागण होऊन ते त्यातून बरे झाले, तर हर्ड इम्युनिटी तयार होते. भारतासाठी हर्ड इम्युनिटी पर्याय असू शकत नाही. लस दिल्यानंतरच हर्ड इम्युनिटी तयार होऊ शकते” असे आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. https://www.loksatta.com/desh-videsh-news/covid-19-herd-immunity-not-an-option-in-a-country-like-india-says-centre-dmp-82-2232507/ मै व्यापारी हूं यथा राजा तथा वैद्यराजा

गामा पैलवान नवीन

In reply to by Gk

Gk, ऑस्ट्रेलियामधल्या आदिवासींच्या अंगात नैसर्गिकरीत्या पोलियोची प्रतिकारशक्ती अस्तित्वात होती. पोलियोचं परिचयकाठीण्य नैसर्गिक रीत्या विकसित झालं होतं. त्यासाठी लस हवीच असं काही नाही. त्या आदिवासींना पोलियो माहीतही नव्हता. गोरे लोक तिथे आल्यावर पोलियोच्या साथी सुरू झाल्या. आ.न., -गा.पै.