Skip to main content

अभाविपची आक्रमक धर्मांधता...

लेखक विकी शिरपूरकर यांनी रविवार, 26/10/2008 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षणक्षेत्रात आपल्या रचनात्मक आंदोलनामुळे आणि संस्कारशील तरुणांच्या संघटित ताकदीमुळे स्वतंत्र अस्तित्व तयार केलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे गंभीर आरोप लावले जात आहेत. मालेगाव शहरातील नूरानी मशीद भागातील भिकू चौकात गेल्या 29 सप्टेंबर 08 रोजी रात्री झालेल्या स्फोटात 5 जण ठार झाले होते. या स्फोटामागे 'अभाविप'चे कार्यकर्ते असल्याचा आरोप समोर आला आहे. आजवर दहशतवादी कारवायांमध्ये मुस्लिम समाजाचा हात असल्याचा आरोप केला जात असताना त्यात आता हिंदुत्ववादी विचारांच्या संघटनांचाही हात असल्याची माहिती प्रथमच समोर आल्याने देशभर या प्रकाराने खळबळ माजली आहे. विशेषतः या प्रकरणी अभाविपमध्ये 5 वर्ष पूर्णवेळ कार्य केलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांना अटक करण्यात आल्याने या स्फोटांना सरळ अभाविपशी जोडून पाहिले जात आहे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा नव्हे तर तो आजचाच नागरिक आहे. या नागरिकांमध्ये प्रखर राष्ट्रप्रेम, संस्कार आणि शिस्त भिनविण्याची गरज आहे. शिक्षणक्षेत्रातील सर्व घटक एक परिवारातील सदस्य तर विद्यार्थी हा त्यातील केंद्रबिंदू आहे, याच भूमिकेवर गेल्या 58 वर्षांपासून अभाविपचे काम चालले आहे. 9 जुलै 1949 रोजी मुंबईत काही प्राध्यापकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या या संघटनेने गेल्या 58 वर्षांच्या काळात विद्यार्थ्यांची आंदोलने आणि चळवळींना नवी दिशा दिली आहे. या सोबतच दहशतवाद या विषयावर नेहमीच जनजागृती करताना आक्रमक भूमिका घेतली आहे. संघटनेने केलेल्या या कामांना आता स्फोटाचा कलंक लागू पाहतो आहे. असे असले तरीही सुमारे 20-25 वर्षांपूर्वीचा आंध्र प्रदेशातील उस्मानिया विद्यापीठातील आणि केरळातीलही दहशतवादाशी लढा देऊन तो संपविण्याचे श्रेय आजही या संघटनेला जाते. किंबहुना या वेळी परिषदेच्या अनेक कार्यकर्त्यांना जीवही गमवावा लागला आहे. श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रध्वज फडकविण्याचे आव्हान असो, चंद्रपूर आणि गडचिरोलीतील नक्षलवाद असो किंवा सध्या परिषदेच्या माध्यमातून चालविले जाणारे बांग्लादेशी घुसखोरीच्या विरोधातील आंदोलन असो अभाविपने दहशतवादाच्या विरोधात नेहमीच कठोर पावले उचलली आहेत, अशा परिस्थितीत 'अभाविप'वर होणारा आरोप शंका निर्माण करणारा आहे. अभाविप सारख्या संघटनेचा यात प्रत्यक्ष संबंध नसेलही कदाचित पण एकेकाळी संघटनेत काम केलेल्या साध्वींमुळे तो जोडला जाणे साहजिकच आहे. एकदा संघटनेत काम करून गेलेली व्यक्ती वैयक्तिक आयुष्यात काय करते त्याच्याशी आमचा काय संबंध असा पवित्रा अभाविपने घेतला आहे. साध्वी प्रज्ञा यात खरोखर दोषी असल्यास तिला शिक्षा झालीच पाहिजे असेही जाहीर करून टाकले आहे. कोण या साध्वी? मालेगावच्या स्फोटात अटक करण्यात आलेल्या साध्वी प्रज्ञा या अभाविपच्या पाच वर्ष पूर्णवेळ कार्यकर्त्या होत्या. विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांच्या अनेक आंदोलनांचे त्यांनी नेतृत्व केले आहे. परिषदेत काम केल्यानंतर त्यांनी संन्यास स्वीकारला असून अतिशय प्रखर व जहाल वक्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. साध्वी प्रज्ञा यांच्यासह या कटात सहभागी असलेल्या आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर या कटासाठी प्रशिक्षण देणा-या माजी लष्करी अधिकारी मेजर प्रभाकर कुलकर्णी व मेजर रमेश उपाध्याय यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्व घडामोडींच्या बाबतीत आणि अटक करण्यात आलेल्याaबाबत दहशतवाद विरोधी पथकाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केली नसली तरीही सर्व जण हिंदू जनजागरण मंचचे सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा खरोखरच हिंदुत्ववादी संघटनांप्रणित दहशतवाद आहे की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. कुठे चाललोय आपण? जर या दहशतवादाचे रूप खरोखरच तसे असल्याचे सिद्ध झाले तर देशाच्या एकतेच्या दृष्टीने मात्र ते प्रचंड धोक्याचे ठरणार आहे. आजच्या घडीला जाती-धर्मातील तेढ प्रचंड वाढली असून रोजच वेगवेगळ्या भागांमध्ये दंगलींच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. त्यातच प्रांत व भाषिकवादही देशाच्या एकतेला धोकेदायक ठरत आहे. अशा परिस्थितीत यापूर्वी केवळ जातीय दंगलींच्या माध्यमातून या विषमतेच्या वादाला दिले जाणारे उत्तर आता बॉम्बस्फोट आणि दहशतवादी कारवायांतून दिली जाऊ लागले तर गांधीजींच्या अहिंसेची शिकवण संपूर्ण जगाला देणा-या भारतातच हिंसेचे तांडव माजण्यास वेळ लागणार नाही. दहशतवाद मग तो कोणताही जात आणि धर्माचा असो तो उखडून फेकलाच पाहिजे. यात अजिबात दुमत नाही मात्र शासनाचे त्याबद्दलचे मिळमिळीत धोरण या गोष्टींना कारणीभूत ठरत आहे. दहशतवाद्यांविरुद्ध आता तरी निर्णायक लढा देण्याची गरज आहे. अन्यथा जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या या देशाची एकता आणि अखंडता खिळखिळी होण्यास वेळ लागणार नाही.

वाचने 3694
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

काय करतात हे लोक कळत नाही.कोणत्याही दहशतवादाला आपला विरोध आहे. वेताळ

पुढिल वर्षी अपेक्षित असलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि सद्य परिस्थितीत काँग्रेसला सत्तेतुन पाय -उतार होण्यावाचुन दुसरा पर्याय नसल्याचे लक्षात घेता आणि या अनुशंगाने विचार करता हिंदुत्ववादी संघटनां व मुख्यत्वे करुन अखिल भारतिय विद्यार्थि परिषदेचा संबंध प्रकरणाशी जोडला जाणे हे सगळे अतिशय संशयास्पद वाटते. आणि त्याही पेक्षा काँग्रेसची सत्ता असलेल्या महाराष्ट्रात हे प्रकरण उघडकीस येणे ,शिवाय ११ जुलै रोजी मुंबईत रेल्वेमधे झालेले बाँबस्फोट व त्यामधे आधी एटिएस ने पकडल्यालेल्या आरोपीं बद्दल निर्माण झालेला संशय या सगळ्या पार्श्वभुमीवर विचार करता हे जरा पचनी पडण कठिण आहे. काही ही व कसेही करुन भाजपा आघाडिला सत्तेत येण्यापासुन रोखण्यासाठीचे हे कारस्थान नसेल कशावरुन? ज्या देशात आय बी वर रॉ सारख्या गुप्तहेर संघटनांचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करुन घेणारे राजकिय पक्ष असल्यावर काहीही होवु शकते. शेवटि काय तर पोलिस देखिल हुकमाचे ताबेदार आहेत या देशात्?स्वतःच्या सदसदविवेक बुद्धिला स्मरुन काम करणार्‍या अधिकार्‍यांची संख्या नगण्य आहे. चुकुन -माकुन जर यात तथ्य अढ्ळलेच तर त्यांना देखिल तोच न्याय द्यावा .कायदा हा सगळ्यांसाठी समान आहे.आणि इस्लामच्या नावाखाली कत्तली करणारे आणि हिंदुत्ववादाचा प्रसार आणि प्रचार करणारे यात मुलभुत फरक हा असायलाच हवा. "एकाने गाय मारली म्हणुन दुसर्‍याने वासरु" मारण्यात काय अर्थ आहे. पण मला मनातुन वाट्ते आहे की हे सगळ हेतुपुरस्सर घडवुन आणण्यात येत असावे. "सावरकरांचे हिंदुत्व मानणारी" "अनामिका" अनुदिनी-http://maharashtradharma.mywebdunia.com/ http://manalig.blogspot.com/

पोलिसांना अभाविप अथवा वि . हिं. प. वर मालेगाव प्रकरण शेकवता येउ श़कते याचि कल्पना असल्याने राष्टवादिच्या कार्यकर्त्यांनि तोडफोड केलि.फायदा १:आम्हि मुस्लिम धार्जिणे आहोत २:हिंदु वाइट नाहित्......ब्राम्हण समाज आहे. ३:२० हजारांचि भरपाइ दिल्याने आम्हि कसे धुतल्या तांदळाचे आहोत. ३: मराठिच्या मुद्द्यावरुन एक होउ पाहणार्‍या समाजाला पुन्हा जातियतेच्या खाइत लोटुन आपलि पोळि भाजुन घेणे. ३: राज ठाकरेंवरचा स्पॉट्लाइट आपल्याकडे वळ्वणे.

ही घटना कारस्थान आहे का हे आत्ताच सांगणे कठीण आहे. पण त्यामुळे एक अत्यंत वाईट गोष्ट झाली आहे. यापुढे मुस्लिम अतिरेकी स्फोट घडवतच रहातील आणि आळ हिंदु संघटनांवर घालतील. आणि त्यांच्या या कांगाव्याला आपले 'समाजवादी, ढोंगी कांग्रेसी नेते, आणि ह्युमन राईटस् चे लोक अगदी गळा काढून साथ देतील.

अनामिका, स्वामी व हेरंब, आपले प्रतिसाद पटले. सहमत. चर्चा सुरु करताना लेखकाने ज्या प्रकारे विषय मांडला त्यावरुन असे वाटत होते की हे महाशय सुद्धा मिडीया प्रमाणे केवळ गरळच ओकणार. पण त्यांना अभाविपने नेटाने चालवलेल्या राष्ट्रकार्याची आठवण झाली हे पाहून फार हर्ष झाला. कॉग्रेसी राज्यकर्यांनी हे मारुन मुटकुन काहीतरी कटकारस्थान उभे केले आहे यात आम्हाला तिळमात्र शंका नाही. त्यांच्या या हलकट राजकारणाने मात्र मुसलमान अतिरेक्यांना हिंदूंच्या विरोधात बोंबलायला आयतेच कोलीत मिळाले आहे. आता सर्व राष्ट्रप्रेमी संघटनांना अतिरेकी संघटना म्हणून घोषित केले गेले तरी नवल नको असे वाटायला लागले आहे. आरे हो एक सांगायचे राहिलेच - मी विद्यार्थी असताना विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) पूर्णवेळ कार्यकर्ता एक मुस्लिम होता. त्याने आम्हाला अभाविपची ओळख करुन दिली. तसेच अभाविप ही धार्मिक संघटना आहे असे आम्हाला तरी त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमातून जाणवले नाही. आपला, (राष्ट्रप्रेमी) भास्कर आम्ही येथे वसतो.

In reply to by भास्कर केन्डे

मी स्‍वतः सतत पाच वर्ष संघटनेचा प्रमुख कार्यकर्ता होतो. याकाळात संघटनेने दिलेले संस्‍कार माझ्या वैयक्‍तीक आयुष्‍यात कामी आले आहेत. मी आज जे काही आहे. ते अभाविपमुळेच.

In reply to by विकी शिरपूरकर

ही टॅक्ट बाकी आवडली म्हणा. म्हणजे कसे तर शिवसेनेतून फुटून निघणार्‍या कार्यकर्त्याप्रमाणे. शिवसेनेला यथेच्छ शिव्या द्यायच्या आणि म्हणायचे मी जुना शिवसैनिकच आहे. म्हणजे अशाना वाटते लोकाना आपलं म्हणणे पटेल. पण ही काही टॅक्ट जुनी नाही. आणि बिलकुल पुराव्या शिवाय लोक पकडायची ही काही आबांची पहीलीच वेळ नाही. मागे एक मुंबईचा मुलगा अल कायदाचा कार्यकर्ता म्हणून पकडला होता. पुढे काय झाले सुटलाच ना. पण यात मला गम्मत वाटते ती तुमचीच. तुम्ही तुमच्या लोकाना इतके पण ओळखू शकत नाही काय? पुण्याचे पेशवे

मी देखिल महाविद्यालयीन काळात अभाविप ची सदस्य होते. विधायक कार्यात सहभाग अभाविप मार्फत घेतला असल्या कारणाने हि संघटना धार्मिक आहे ह्या बाजारगप्पांवर मुळिच विश्वास बसत नाही आणि बसणार नाही. "अनामिका" अनुदिनी-http://maharashtradharma.mywebdunia.com/ http://manalig.blogspot.com/

पण अभाविप ला अतिशय जवळुन पाहिले. जरी पुर्ण वेळ सभासद नव्हतो तरी काश्मिर मधे झेंडा फडकवल्याची अभिमानास्पद घटना खोल प्रभाव करुन गेली आहे.

विकास आपण स्वतः पुर्वी अभाविपचे सभासद होतात असे नमुद केले असताना आपण "आक्रमक धर्मांधंता " हे शिर्षक बदलुन "अभाविपची आक्रमक धर्मांधता " असे केलेत . का त्याचे स्पष्टिकरण दिलेत तर उत्तम. कि तुमचे संघटनेशी संबंधित असुनही मतपरिवर्तन झाले आहे? "अनामिका" अनुदिनी-http://maharashtradharma.mywebdunia.com/ http://manalig.blogspot.com/