Skip to main content

आपण देव दर्शनाला का जातो?

लेखक शशिधर केळकर यांनी रविवार, 26/10/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आपण देवाला का जातो? खरेच हा प्रश्न माझ्या मनात फार पूर्वीपासून आहे. लोक देवाला का जातात? देवाला म्हणजे देव दर्शनाला, मंदिरात, वगैरे वगैरे - कुठेही, सर्वत्र. चोर लोक चोरी करायला, आंधळे, भिकारी, बैरागी भीक मागायला, विक्रेते विक्रीला, पुजारी पूजेला, कामगार कामाला इ. लोक सोडले, तर बाकी शेकडा ९० लोक देवाला दर्शनाला, नवसाला, दानधर्माला, कर्मकांडाला, जपतपादि साठी, मन्त्रपाठाला, अभिषेकाला वगैरे ढोबळपणे जातात. अनेक जण लग्नमुंज, इतर मंगल कार्याच्या निमित्ताने देव दर्शन, यात्रादि करतात. विविध धार्मिक स्थळाना, काशी आदि यात्राना वार्षिक, नैमित्तिक सहली करणारे कित्येक असतात. मनात काही योजना करून, सर्वांचे भले व्हावे म्हणून म्हणा सतत कार्यरत असणारे काही असतात. या सर्व कारणांमधे जे वर म्हटलेले शेकडा ९० लोक आहेत, त्यातल्या किती लोकाना देवदर्शनाचे खरे सुख मिळते हा माझ्या मनातला मूळ प्रश्न आहे. मंदिरात देवाला भेटायला, बघायला यातले कोणी लोक येतात का? की सगळे तसेच असतात? मला माझा एक जिवलग मित्र नेहमी सांगतो त्याच्या विविध यात्रांची माहिती - 'परवा आम्ही अष्टविनायक करून आलो! काय धमाल आली. 'शनिवारी सक्काळी पहाटे निघालो घरचे सगळे नातेवाईक - २ सुमो केल्या होत्या. रविवारी रात्रीला ठाण्यात परत!' मी विचारतो - कसे झाले दर्शन? 'शनिवार रविवार म्हणजे तुफान गर्दी रे; पण तुला सांगतो, काय हाणलीय् गाडी साल्याने. अरे हे तर काहीच नाही. मागच्या वेळी तर मी एका दिवसात पूर्ण अष्टविनायक केले होते.' दोन तीन दिवसात पुण्याहून निघून अक्कलकोट एका टोकाला आणि तिरुपति तिरुमाला देवस्थानम् दुसर्र्या टोकाला उरकून येणारे काही महावीर मला चांगले परिचित आहेत. देव दर्शनाला जाऊन तिथे सर्व प्रकारचे 'कुपथ्य' करणे तर बघायलाच नको! माझा प्रश्न - हे असे का? यातून कोणाला समाधान मिळते का? की हेच योग्य आहे? ज्याला देवाची जशी पूजा करायची असेल तशी ती करायला आपल्याकडे मुभा आहे. कदाचित हा प्रश्न वगैरे पडणे हेच चुकीचे असेल.

वाचने 2292
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

होय मी नेहमी म॑दिरात जातो,पण मला देव काहि भेटला नाहि,पर॑तु मन मात्र हलक॑ होत॑.का कुणास ठाऊक मनात कितीहि राग असला,दु:ख असलं ,tension असलं तर ते थोड वेळ का होईना कुठे जातं तेच कळत नाहि.मला वाटतं याचा अनुभव देवळात जाणार्‍या प्रतेकाला आला असेल.देवळात मनात कधिच वाईट विचार येत नाहित असं का?मग खरंच देव आहे का?नाहि तर असं का होतं?आहे तर कोठे आहे? नितिन नवले लासुर स्टेशन

देवाच्आ दर्शनला जाताना भाव हवा.जर देव मानता तर भाव असालाच पाहिजे नाहि तर तुमच्या मित्रा प्रमाने ति एक मजेचि त्रिप होइल

In reply to by सुहास कार्यकर्ते

जर देव मानता तर भाव असालाच पाहिजे... तो भाव हा मनातील देवावरील श्रद्धा या अर्थाने असावा. नाहीतर पुजार्‍याच्या भावात, पंढरपूरच्या बडव्यांच्या भावात अडकलात तर देवळात जाण्याचा काही उपयोग नाही... आता ऐकून आहे की तिरूपती दर्शनासाठी अपॉईंटमेंट घेता येते आणि त्यासाठी विविध शहरात त्या देवस्थानाने कचेर्‍या उघडल्या आहेत. त्यात बोटांचे ठसे वगैरे घेतले जातात... हे जरा अतिच आहे. त्या पेक्षा मग "देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई" असे म्हणले तर बरे असे वाटते.

अतिशय योग्य प्रश्न.......ह्याचे उत्तर प्रत्येकाने ईतरांपेक्षा स्वत:लाच द्यायला हवे