Skip to main content

मुलीचा संपत्तीतला वाटा आणि समाज.

Published on रवीवार, 20/11/2016
कायद्या प्रमाणे मुलगा आणि मुलीला सामान हक्क आहे.पण खरंच समाजाची मानसिकता बदलली आहे का ? निमित्त होते माझ्या मावस बहिणीच्या घरात सध्या सुरु असलेले संपत्तीच्या वाट्यातले वाद. ती तिच्या आईवडिलाची एकुलती एक लेक.आणि तिच्या पाठचा एकाच भाऊ.तिचे कुटुंब तसे पुण्यातल्या एका प्रतिष्ठित गोतावळ्यातले, सध्या लोक ' पाटील' लावतात त्या प्रकारातले. घरची परिस्थिती जरी बेताची असली तरी स्थावर मालमत्ता,शेती भरपूर. माझी मावस बहिणीच्या वडिलांचे निधन तिच्या लग्ना आधी झाले.तिच्या लग्न जो काही खर्च येईल तो तिच्या चुलत्यांनी उचलला. आता यात त्यांचे खरंच पुतणीच्या बापाचे कर्तव्य पार पडणे असा उद्देश असू शकतो का यावर प्रश्नचिंन्ह कारण तिचे लग्न होऊन दोन वर्ष झाले तरी दोन वर्षात फक्त दोनदाच ते तिच्या सासरी जाऊन तिची तिच्या घरच्यांची भेट घेऊन आले आहेत. कदाचित आज ना उद्या जर मालमत्तेतील काही भाग जर विकला गेला तर लग्नाचा खर्च वळता केला जाऊ शकेल अशी अपेक्षा असू शकते,किंवा समाजात आपले स्थान राहावे म्हणून देखील असेल. आता तिचे लग्न व्हायच्या आधी चुलत्यांनी सर्वांच्या मिळून वाटल्यातला काही जमीन एका नामांकित बिल्डरला विकली आणि फ्लॅट घेतले.आता ते परस्पर म्हणतात कि तिचा लग्ना आधी केलेल्या कोणत्याही व्यवहारात तिचा वाटा नाही. आणि राहिला इतर मालमत्तेचा भाग तर,त्यांच्या मते घरातल्या कोणत्याही मुलीने तिचा वाटा ते देतील तेवढा घ्यावा आणि स्वतःहून मागू नये. तिच्या माहेरच्यांचा अस म्हणणं आहे कि लग्नाचा खर्च केलाय,लग्नात जो काही खर्च केला तिथेच तो विषय संपला असं चुलत्यांचा आणि तिच्या आईचही म्हणणं आहे . पण संपत्तीतच्या मूल्याचा विचार केला तर लग्नाचाचा खर्च अगदीच नगण्य आहे. आणि भावाचा उदरनिर्वाह जर शेतीवरच चालत असेल तर वाटा मागणं एकवेळेस रास्त नसेल. खरंच आज कायदा झाला तरी इतकी वेळ का यावी कि मुलीला तिचा वाटा मागावा लागावा ? दोन मुलं असली तर असा प्रश्न येत नाही मुलांना सामान वाटा दिल्या जातो ,पण मुलींना मागितला तरच वाद होऊनच मिळते असं का ? मुलीने वाटा मागितला तर ती वाईट होते असे का ?

याद्या 9449
प्रतिक्रिया 36

प्रतिक्रिया

आमच्या आईने काहीच न विचारता सही केली. वडीलांच्या प्रामाणिक सहमतीने. मावशीने एका मुद्द्यावर अडविले तर ती वेगळी ठरली. तसा तिचा मुद्दा योग्यच होता... पण आपण म्हणता ते खरेच आहे.

तुमच्या आईने सही का केली,त्याचे तिच्या कडे काही स्पष्टीकरण असेलही. पण मला असा म्हणायचंय जर दोघं जर भाऊच असते तर कोणी भाऊ असा म्हणेल का कि माझा वाट त्याला मिळू देत म्हणून ? आणि जर मुलाबाळांसाठीच जर आपण संचय करत असू तर बहिणीची मुलं आणि भावाची मुलं असा भेदभाव का ?

मुलीच्या लग्नाचा आणि संपत्तीतल्या वाट्याचा काहीही संबंध नाही. लग्न झालेलं असो, नसो.. कधीही झालेलं असो.. वाटा समानच मिळायला हवा. नसेल मिळत तर कोर्टात जाऊन बहुदा तो घेता येईलच.

मुलीच्या लग्नाचा आणि संपत्तीतल्या वाट्याचा काहीही संबंध नाही. लग्न झालेलं असो, नसो.. कधीही झालेलं असो.. वाटा समानच मिळायला हवा. नसेल मिळत तर कोर्टात जाऊन बहुदा तो घेता येईलच.

In reply to by पिलीयन रायडर

हेच म्हणतो, वकील गाठा, जोवर मुलगी स्वतः लेखी प्रतिज्ञापत्र देत नाही तोवर तिचा हक्क संपत नाही.

In reply to by संदीप डांगे

तिला वाटतं आपल्या भावाला आपल्याशिवाय कोण आहे ? तो जेवढ देईल तेवढ्यात हो म्हणेल.वाद होतील अस वाटलं तर काही न विचारता सही करेल .

In reply to by स्वतन्त्र

ह्याच भावनेच्या खेळामुळे अनेक बहिणींना त्यांचे हक्काचे वाटे मिळत नाहीत, पण ही एकतर्फी नाती सांभाळण्याचा मक्ता बहिणींनी का घेतलाय? खरंतर, आईवडिलांनी रीतसर मृत्युपत्र करून ठेवावे पाल्यांच्या लग्नाच्या खूप आधी. नव्या नात्यांना गोंधळ घालायचा चान्स मिळत नाही. माझ्या ओळखीतल्या चार बहिणींनी सुमारे पन्नास लाखांची संपत्ती एकुलता एक भाऊ म्हणून सोडून दिली,(हा भाऊ महिन्याला दीड लाख पगार सत्तर लाखाचे दोन फ्लॅट बाळगून) त्यातली एक बहीण अगदी 60 वर्षाची असूनही पोटापाण्यासाठी दारोदार पेपर वाटणे, एका डॉक्टर कडे 5 तास उभं राहून मदत करणे अशी कष्टाची कामे करते, तिला फक्त 50 हजार देऊन भावाने बोळवण केली, तिचा नवरा अपंग व जास्त कमाई वाला नाही. तिच्या हक्काचा पैसा तिला मिळाला असता तर वणवण भटकून जेवढं ती कमावते त्यापेक्षा दुप्पट व्याज तिला घरबसल्या मिळाले असते. त्यांना खूप समजावले पण बंधुप्रेमापुढे काही समजत नाही.. पैसा व संपत्तीची हाव नसावी पण जे आपले आहे ते अजिबात सोडू नये, भले नातेवाईक दुरावलेत तरी कारण जे ह्या कारणासाठी दुरावतील ते खरे नातेवाईकच नव्हे.

In reply to by संदीप डांगे

मला वाटतं नुसता कायदा करण्यापेक्षा तो सर्वांनी अमलात आणून,मुलींनाही हक्क आहे ज्या प्रमाणे मुलाचा असतो असा पायंडा पडला पाहिजे,जेणेकरून संपत्तीची विभागणी झाल्यावर बहिणींसमोरचा हा पेच प्रसंग आपोआपच सुटेल.

In reply to by स्वतन्त्र

माझा व्यक्तीगत अनुभव, कायदा तर आहेच आहे, पण तरी देखील अनेक वेळा मुख्य (अर्थिक) कारण न देता फसवणे हा मुख्य मुद्दा आहे. कायदा फक्त पुरावे ते देखील असलेले दृश्यमान, स्पष्ट करता योग्य असलेले आणी लिखित पुरावे पाहतो. आपण आपल्या समाजामध्ये नात्याचे एवढे अवढंबर माजवून ठेवले आहे की, बाहूबीज मध्ये आलेली ओवाळणी देखील अनेक बहिणीच्या नशिबी नसते.

आमची आई आणि तिचे ३ भाऊ दोन बहिणी अशी सहा अपत्ये आमच्या जिल्हा परिषदेत गुरुजी म्हणून काम करणाऱ्या बाबांनी मोठी केली. त्या काळातील शाळेत जाणाऱ्या ब्राह्मण, मराठा समाजाव्यतिरिक्त याच बहिणी. शिकवुन माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षिका म्हणुन तीनही बहिणी सक्षमपणे मोठ्या झाल्या. आज आईचे वय ६० वर्ष आहे. मोठ्या भावाने आपली केलेली मदत आणि पुर्वीचे संस्कार यामुळे बहिणींना आणि आमच्या वडिलांना दुसऱ्याचे नको या विचाराने सही केली.

In reply to by जानु

बहीण भावांमधे आपले आणि दुसऱ्याचे असे वेगवेगळे हिस्से कसे काय होतात practically सांगा, उद्या जर तुमच्या मोठ्या भावाने तुमच्यासाठी बरच काही केल म्हणून त्याची फारशी निकड नसतानाहि तुमचा वडिलोपार्जित हिस्सा तुम्ही देऊन टाकाल का ? आणि हा नियम फक्त आणि फक्त बहीण -भाऊ या नात्यालाच का लागू होतो ?त्याच वेळेस 'इतका काही केल' टाईप हिशोब कसे काय मांडले जातात ?

मुलींनाही बरोबरीने वाटा मिळायला हवा हे योग्य आहेच (खरंतर तो चर्चेचा विषयही होऊ नये) पण कोर्टात जाय्ला लागणे न लागणे हे संपत्ती किती आहे, त्यासाठी आपल्याला किती झीज सोसायला लागू शकते हे पाहण्याची वेळ येऊ शकते. जसे, वाटणी फारशी नसणार पण केवळ हक्क हक्क म्हणून वकीलांचे व कोर्टाचे काम यात एनर्जी घालवणे. आपली परिस्थिती बरी असताना त्या थोडक्या पैशांसाठी आतापर्यंत बरे असलेले नाते बिनसवणे वगैरे. आता यातील दोन गोष्ती स्वार्थीपणाने सांगितल्यात हे मान्य आहे. उदा. उगीच चार सहा लाख सोडून दिले पण माहेरी जाण्याचा हक्क शाबूत ठेवला गेला, शेतीतून धान्य दरसाल येत राहिले, आईवडिलांच्या घरी येण्याजाण्यासाठी मोकळेपणा आला वगैरे गोष्टी आहेत. त्यापायी कोर्टाच्या चकरा मारणे वाचले तर सासरच्यांवर ताण येत नाही. यातही अनेक बारीक खाचाखोचा असू शकतात. हे एक उदाहरण म्हणून आपण घालून दिले व त्यामुळे बाकी बहिणींवर अन्याय झाला असे व्हायला नको. ते काही असो आज मिपावर धाग्यांचा उत्सव चालू आहे असे वाटतेय. ;)

In reply to by रेवती

आटा जो संपत्ती चा हिस्सा विकला तो एकूण संपत्ती च्या 1/5 भाग असून ,एकूण संपत्ती कित्येक कोटीत आहे. मला वाटतं व्यवहार हा व्यवहार ठेवावा आणि नातं हे नातं.धान्य,माहेरलाला जाण्याची मोकळीक ह्या गोष्टी पैशात तोलता कामा नये.

In reply to by स्वतन्त्र

हे मान्य आहेच! जर काही कोटींचा (किंवा आर्थिक परिस्थिती बरी नसताना काही हजारांचा- म्हणजे मह्त्वाचा) मामला असेल तर सोडू नयेच पण तसे आपले हक्क हे घेतले तर अनेकिंना माहेराला मुकावं लागतं. खरंतर व्यवहार हा त्याच्या जागी असावा पण होताना दिसत नाही. म्हणून त्यातील रक्कम जर सोडून देण्याजोगी असेल तर? हा एक विचार म्हणून सांगितला पण त्यानंतर मात्र प्रामाणिक राहणे हे माहेरच्यांचे काम आहे. एकंदरीतच विश्वास, प्रेम असेल तर कोर्टाच्या झंझटींपासून सुटका व आनंद मिळतो. हे प्रत्येक केसमध्ये बदलते. माझ्या आजोबांनंतर त्यांच्या काळाप्रमाणे जी रक्कम राहिली होती ती आजकाल इतकी साधी होती पण ती माझ्या मामांनी पै न पै आपल्या बहिणींना कागदपत्रे दाखवून सारखी वाटली, अगदी नातवंडांनाही काही शे रुपये आले. रक्कम कितीही असो, प्रामाणिकपणा महत्वाचा.

या हक्कासोबत पालकांना सांभाळण्याची जबाबदारीही तेवढ्याच हक्काने (विभागून) घेतली तर कुणाला प्रॉब्लेमच नसला पाहिजे.

In reply to by पिलीयन रायडर

फक्त संपत्ती साठी आई वडिलांना सांभाळणे कितीपात योग्य आहे? आणि सध्या मुली आईवडिलांच अगदीच बघत नाहीत असा कुठे आहे,आणि मुलं देखील आईवडिलांना 'व्यवस्थित' सांभाळतात असे केसेस सद्या कमीच दिसतात.

In reply to by स्वतन्त्र

मला वाटतं तुम्ही गैरसमज करुन घेताय. 'फक्त' संपत्तीसाठी सांभाळावे असे कुठेही म्हटलेले नाही. पण वृद्धापकाळ आणि त्यातली आजारपणे यासंदर्भाने सर्व प्रकारच्या हक्कांसोबत, जबाबदारी ही हक्काने घ्यायला हवी (मुलांकडून ही सामाजिकरित्या अपेक्षिली जाते तसेच चर्चाविषयाच्या अनुषंगाने म्हणून फक्त मुलींचा उल्लेख केलाय.)
सध्या मुली आईवडिलांच अगदीच बघत नाहीत असा कुठे आहे,आणि मुलं देखील आईवडिलांना 'व्यवस्थित' सांभाळतात असे केसेस सद्या कमीच दिसतात.
उडदामाजि काळे गोरे. सरसकटीकरण आणि मोघम वाक्यांस तसा काही अर्थ नाही. तुमच्या उदाहरणाच्याबाबतीत इतर माहिती नसल्याने, जे समोर मांडलेय त्यावरुन तरी 'वाटणी मिळावी, घ्यावी' असेच म्हणता येईल. (भावाशी शांतपणे कसलाही अपराधीभाव न बाळगता बोलता यावे. भविष्यात आईस सांभाळण्यास, आजारपणात भावाबरोबर अगदी बरोबरीने, हक्काने सहभाग घ्यावा.)

In reply to by सच्चिदानंद

हक्काबद्दल जागरूक असावेच. कर्तव्याच्या वेळेस ही मागे नसावे. ते ही तितक्याच आतून करावेसे वाटावे. त्यावेळेस माझा संसार - नवऱ्याला चालत नाही वगैरे कारणे न सुचावीत

फक्त संपत्ती साठी आई वडिलांना सांभाळणे कितीपात योग्य आहे? आणि सध्या मुली आईवडिलांच अगदीच बघत नाहीत असा कुठे आहे,आणि मुलं देखील आईवडिलांना 'व्यवस्थित' सांभाळतात असे केसेस सद्या कमीच दिसतात.

या हक्कासोबत पालकांना सांभाळण्याची जबाबदारीही तेवढ्याच हक्काने (विभागून) घेतली तर कुणाला प्रॉब्लेमच नसला पाहिजे.>>>>> इस्टेटीत पुरतं माहेरी सम्बंध ठेवलेली उदाहरण पाहिली आहेत.आईवडिल जिवंत असताना क्वचित संबंध ठेवले सठी सहामाशी पत्र लिहुन, पण वाटणीच्या वेळी दहा चकरा मारल्या. अशी अनेक उदाहरण आहेत. तुम्ही म्हणता त्यप्रमाणे मुली जबाबदारी घेऊ इच्छिणार्‍या असल्या तरी आईवडिल प्राधान्य मुलाला देतात. फक्त मुली असल्या तर वाटून घेतात हे ढोबळ निरीक्षण आहे.

In reply to by मंजूताई

+१

जी मुलगी स्वतःच्या वडिलांकडे किंवा भावाकडे हिस्सा मागत आहे तिला एकदा विचारा कि जर तिच्या नवर्याच्या बहिणीने जर हिस्सा मागितला तर तिचे काय म्हणणे असेल ? सर्व साधारण पणे मुलीचे लग्न हे स्वतः पेक्षा बड्या घरामध्ये लावून दिले जाते (काही अपवाद असू शकतात ) उद्देश हाच कि तिला कशाचीही कमतरता असू नये. आता त्यामुळे ती तिच्या नवर्याच्या संपत्ती मध्ये अर्धी हिस्सेदार होते . मग जर समजूतदारपणे भाऊ अपेक्षा ठेवत असेल कि बहिणीने हक्क सांगू नये तर त्यात वाईट काय आहे ?

In reply to by amit१२३

जी मुलगी स्वतःच्या वडिलांकडे किंवा भावाकडे हिस्सा मागत आहे तिला एकदा विचारा कि जर तिच्या नवर्याच्या बहिणीने जर हिस्सा मागितला तर तिचे काय म्हणणे असेल ?}}}}}} आपल्याकडे हेच वाईट आहे की मुलींना हिस्सा मागणं हे या प्रकारे का पहिल जात.दोन भावांपैकी एका भावानेच आई वडिलांच्या सांभाळ केला तर दुसरा हिश्श्या मागण्या साठी अपात्र कसा ? आणि राहता राहिला प्रश्न भावाच्या बायकोचा तर तिने पण माहेरचा हिस्सा घ्यावा.

In reply to by amit१२३

नवर्‍याची बहीण नवर्‍याचा बाप किंवा आई यांच्या संपत्तीत हिस्सा मागणार ना ? नवर्‍याच्या संपत्तीवर नवर्‍याच्या बहिणीचा अधिकार नाही. इथे नवर्‍याच्या बापाची संपत्ती म्हणजे नवर्‍याची संपत्ती नाही हे ल्क्षात असू द्या. आणि ल्ग्न केल्यावर बायको नवर्‍याच्या संपत्तीत अर्धी हिस्सेदार कशी काय होते ? काहीच्या काही. ती फक्त नैसर्गिक नॉमिनी आहे.

बहिणीच्या लग्नात खर्च करणारे, प्रसंगी कर्ज काढणारे भाऊ आहेत. अनेकदा भाऊ वेळोवेळी बहिणीला /मेहूण्याला भेटवस्तू देतो. याशिवाय आई-वडीलांचा सांभाळ करणे,त्यांची आजारपण वगैरे यांत खर्च करणे हे सगळे भाऊ करतो. असे असताना 'व्यहवार व्यहवाराच्या जागी' असे म्हणत जर बहीण रेटून निम्मा वाटा मागू लागली तर भाव-बहिणीचे प्रेम संपून फक्त व्यहवार उरेल. बाकी प्रेम/नाती आणि व्यहवार यात कशाला जास्त महत्व द्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न.

In reply to by मराठी कथालेखक

जरी बहिणी रेटून मागत नसल्या तरीही प्रेम आणि व्यवहार ह्यांची गफलत होऊ नये असा वाटतं.म्हणजे एका अर्थाने इतके दिवस बहिणीवर प्रेम केल तर तिने भावनिक होऊन हक्क सोड द्यावा असा अर्थ होतो. मग हा व्यवहारच नाही का ?

In reply to by स्वतन्त्र

हो ..व्यहवारच. पण व्यहवार एकतर्फी नसावा. म्हणजे भावाने संपत्तीत अर्धा वाट द्यावा , बहिणीच्या लग्नात खर्च पण करावा, दरवर्षी रक्षा बंधन /भाऊबीजेला बहिणीला महागड्या भेटवस्तूपण द्याव्यात अशा सगळ्या अपेक्षा फक्त भावाकडूनच का ? कायद्याने मुलींना संपत्तीत अधिकार दिला आहे हे चांगलेच आहे. फक्त आपला अधिकार कधी वापरावा , कधी सोडावा याचा निर्णय मुलीने परिस्थितीनुसार भान ठेवून घ्यावा ही अपेक्षा. नाहीतर मग भाऊ पण बहिणीच्या लग्नातला खर्च, भाऊबीजेच्या भेटी ईत्यादींच्य नोंदी ठेवू लागतील.

In reply to by सच्चिदानंद

हल्ली लग्नाचा खर्च अर्धा अर्धा होतो.त्यामुळे बहिणीच्या लग्नाला जो खर्च झाला तो भावाच्या लग्नाला सुद्धा झाला.आणि भेटवस्तूंचाच म्हणाल तर बहीण भावासाठी काहीच करत नाही का ???

In reply to by स्वतन्त्र

हल्ली लग्नाचा खर्च अर्धा अर्धा होतो.त्यामुळे बहिणीच्या लग्नाला जो खर्च झाला तो भावाच्या लग्नाला सुद्धा झाला
बहिणीच्या लग्नाचा खर्च भाऊ करतो. म्हणजे भावाच्या लग्नाचा खर्च बहीण करते का ? बहूधा मुलगे स्वतःच्या लग्नाचा खर्च (स्वतःच्या बाजूचा) स्वतःच करतात. क्वचित श्रीमंत घरात किंवा मुलाचे लग्न घरचे फार कमी वयात (२२-२३) लावून देत असतील तर मुलाचे आई-वडिल करतात.
भेटवस्तूंचाच म्हणाल तर बहीण भावासाठी काहीच करत नाही का ???
बहुतांशी नाही. अपवाद असतीलच एकूणातच सरसकटीकरण करण्यात अर्थ नाही. म्हणूनच मी एका प्रतिसादात म्हंटले आहे की कायद्याने हक्क दिला हे योग्य आहेच फक्त तो कधी वापरावा , कधी सोडावा याचा परिस्थितीनुरुप विचार करावा. त्यामुळे प्रत्येक प्रकरणात उत्तर बदलेल...म्हणून व्यक्तीशः बोलणं योग्य : माझ्याबद्दल बोलायचं झाल्यास मला बहीण नाही त्यामुळे हा प्रश्नच येत नाही. आता माझ्या पत्नीला एक भाऊ आणि तीन बहिणी (म्हणजे एकूण चार बहिणी). त्यांच्या वडीलांचा पगार फारसा नव्हता. माझ्या मेहूण्याने दोन बहिणींच्या शिक्षणाचा भार उचलला. त्यांच्या आईच्या आजारपणात झालेली कर्जे फेडलीत. बहिणींना बाईक घेवून दिली वगैरे वगैरे... आताही सर्व बहिणींना बर्षातून एखाद वेळेस साडी वगैरे देणे, गरजेप्रमाणे काही आधार देणे हे तो करत असतो. माझी सांपत्तिक स्थिती माझ्या मेहूण्यापेक्षा अधिक चांगली आहे. माझी पत्नीही नोकरी करते. बहिणींपैकी दोघींची सांपत्तिक स्थिती फारशी चांगली नाही. तर त्यांच्या वडीलांकडे आता स्वतःची व बायकोची पेन्शन यामुळे बर्‍यापैकी बचत होत असावी. मग अशा परिस्थितीत भविष्यात वडीलांच्या पश्चात माझ्या पत्नीने वडीलांच्या संपत्तीत (जी काही थोडीफार असेल) वाटा मागणे कितपत ठीक राहिल ? माझ्या मते तरी तिने तो मागू नये. त्या संपत्तीचा लाभ मेहूण्याला आणि त्यांच्या गरजू बहीणींना मिळावा हेच योग्य ; नाही का ?

जरी बहिणी रेटून मागत नसल्या तरीही प्रेम आणि व्यवहार ह्यांची गफलत होऊ नये असा वाटतं.म्हणजे एका अर्थाने इतके दिवस बहिणीवर प्रेम केल तर तिने भावनिक होऊन हक्क सोड द्यावा असा अर्थ होतो. मग हा व्यवहारच नाही का ?

तुमच्या लिहिंयावरुन मुलीची आई अजून हयात असावी असे दिसते. त्या हयात असताना मुलगा, मुलगी यांच्यातल्या वाट्याचा प्रश्न येतोच कुठे ? निधन झालेल्या माणसाची पत्नी यानुसार सगळा वाटा त्यांचाच असणार. मुलांचा. मुलींचा वाटा वगैरे मुद्दे त्यांच्या प्श्चात उद्भवतात. शिवाय, स्वकष्टार्जित संपत्ती असेल तर मुलांना मागण्याचा हक्क वगैरे नसतो. हा मुद्दा वडिलोपार्जित संपत्तीच्या वेळेसच उद्भवत असावा.