Skip to main content

सार्वजनिक सणांचे करायचे तरी काय?

Published on गुरुवार, 25/08/2016
दहीहंडी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात पण लोक गेलेत. सर्वोच्च न्यायालयाला न जुमानता लोकांनी मनोरे रचले( माणसांचे आणि डीजेचे पण) आपण तरी का मागे राहा म्हणून काही लोकांनी निळी हंडी पण साजरी केली! निळी हंडी साजरी करून आपण बाबासाहेबांनी ज्या कर्मकांडापासून आपल्याला स्वतंत्र करायचा प्रयत्न केला त्यांच्यातच गुरफटून जात आहोत का? (निळ्या हंडीच्या आयोजनाला कुणी गेले असतील तर त्यांनी ती पण डीजेच्या तालात झाली काय हे सांगावे. ) आपण वाईट गोष्टी उचलायला एवढे उत्सुक का असतो? सार्वजनिक जीवन शांत सुस्थिर असावे असे वाटते. घरात काय करायचे ते करा. सार्वजनिक आयोजनांना एक निश्चित जागा उपलब्ध करून द्यावी, रस्त्यावर नको. खेळाडू आले की ट्राफिक जाम करून ओपन टॉप रॅली पण मला आवडत नाही. उगाच उन्माद! विदेशातून आपण हे उचलले. ते करतात म्हणून लगेच हे स्वीकारार्ह होत नाही.( स्पॅनिअर्ड्सचा टोमॅटिना सणही मला व्यक्तिशः आवडत नाही. ) त्यांच्यासारखी पर्यायी व्यवस्था आपण करतो का? कोणाला आणीबाणी आली असेल तर फुकट जीव जातो आपल्याकडे. रस्ते बंद करून सण काय काहीच साजरे करू नये आपल्या देशात. रस्त्याला पर्याय सार्वजनिक मैदानं वगैरे आहेत. दहीहंडी आपण देवळाच्या प्रांगणात किंवा शाळेच्या आवारात करू शकतो. आमच्याकडे आज सुट्टी असते आणि मला आठवते गावात एकच दहीहंडी आणि ती पण शाळेच्या मैदानात फोडली जायची. ( अजूनही तसेच असावे.) माझ्या गावी एकच कोजागिरी पौर्णिमा व्हायची , ती पण मैदानात आणि कोजागिरी म्हणजे गाणी वाजवून रात्र जागवणे ही संकल्पनाच नव्हती आमच्याकडे. कोजागिरी पौर्णिमेला गच्चीवर गाणी वाजवायची असतात हे मला पहिल्यांदा नागपुरात कळले. गावी एकच दुर्गा बसायची, तीसुद्धा मैदानात आणि गाणी वाजत ती फक्त संध्याकाळी ठराविक वेळेतच. फक्त धार्मिक गाणी. गणपती बसत नव्हते आमच्या गावी. गावात जे शक्य होते ते शहरात शक्य होणे कठीण आहे याची जाणीव आहे. नवरात्रीत मैदानाचा फक्त एक कोपरा( कायमस्वरूपी स्टेज होते गावात, तेवढेच) फक्त व्यापले जाई. बाकी मैदान मोकळे असे. गावातले व्यवहार सुरळीत राहत. आम्ही पोट्टे खेळत बसू. एखादा सिक्सर देवीच्या कुशीत जायचा, पण तिला वाईट नव्हते वाटत! शहरात मोठी मैदानं असतीलच असे नव्हे. मोकळ्या जागाच सापडणे कठीण! तर प्रश्न हा आहे की मोठ्या शहरातल्या कळपाला शिस्त लागावी हा स्वच्छ हेतू कसा पुरा करता येईल? सार्वजनिक सण सार्वजनिकही राहतील आणि लोकांना शून्य त्रासदायक राहतील हे कसे साध्य करायचे?

याद्या 11883
प्रतिक्रिया 53

प्रतिक्रिया

जो सगळ्या लोकांनी एकत्र येण्याचा हेतू होता त्यालाच हरताळ फासला गेलाय....जुलमाचा रामराम कशाला ? ज्यांना यायचं आहे ते येतील आपापल्या जागा ठरवून...अखंड समाजाला कशाला वेठीला धरायचं...बंद करून टाकलं पाहिजे हे सगळं !

हे दही हंडीतलं शेलिब्रिटी प्रकरण फारच खटकतं. केवढा भयानक पैसा ओतला जातो ह्या शेलिब्रिटीन्वर. आणि लोकही त्यांच्या पाच मिनिटांच्या दर्शनासाठी दोन दोन तास वाट बघत थांबलेली असतात. भयंकर आहे सगळं

व्यर्थ डोके शिणवू नका. आपल्याला ज्या लायकीचे नेतृत्व मिळालेले आहे ते लक्षात घ्या. त्यांना काही शिकायचेच नाही आहे. पुन्हा काही बोलायची चोरी. 'तुम्ही हिंदूच आहात ना?' असे विचारले जाते. (मग एकाद्या अहिंदूंची काय हिम्मत आहे प्रश्न विचारायची?) हे मी स्वानुभवावरून लिहितोय. जे हिंदुत्वाच्या नावाने हा सगळा शिमगा करतात त्यांना अशाने खरे तर हिंदू धर्माचेच नुकसान होते आहे हेदेखील समजत नाही - किंवा समजून घ्यायचे नाही. वर पैशाचे पाठबळ आणि भरपूर वेळ, जो तुम्हा आम्हांकडे नसतो. लोकशिक्षण (काय असते ते?) करावयाचे असते हे सर्व पक्ष विसरलेले आहेत. आता उरला आहे फक्त लोकानुनय आणि/किंवा दादागिरी.

In reply to by रविकिरण फडके

ज्यांना खरंच धिंगाणा- मज्या करायची ना त्यांनी सरळ म्हणा ना आम्हाला मजा-एन्जॉय करायचंय, धर्माचा दाखला देऊन धर्म का बदनाम करता. मागील 10-15 वर्ष पहिली तर असा समजतंय कि सर्वात जास्त हिंदू धर्माला कोणी बदनाम केलं असेल तर ते कथित हिंदुत्ववाद्यांनी. आधी सर्व लोक गुण्या गोविंदानी सर्व सण आपापल्या परंपरेनुसार शांततेत साजरे करायचे. पण जेव्हा पासून या कथित धर्मरक्षकांचा हस्तक्षेप वाढीला लागला त्या पासून सणांचं महत्त्व कमी होत गेलं आहे.आणि तो ढोल तरी किती बडवायचा. कुठली ही गोष्ट मर्यादित असली की बरं वाटतं अतिरेक झाला तर पुन्हा ते ऐकण्याची इच्छाच राहणार नाही.

सहमत. दहीहंडी उत्सवाचं उदाहरण घेतलं तर हा मानवी मनोरे उभारण्याचा खेळ मूळचा बाल्यांचा असे. त्यात अशी थरांवर थर चढवण्याची स्पर्धा नसे. इतर काही ठिकाणी देव-बिव अंगात येणारी व्यक्ती दहीहंडी फोडत असे. थर-बिर काही नसत. अद्यापही काही गावांमधून ही प्रथा चालू असावी. (अंगात येणे ही अंधश्रद्धा आहे. येथे केवळ प्रथेचा उल्लेख माहितीसाठी केला आहे.) थोडक्यात आज उत्सवांना बाजारी स्वरूप आलं आहे ते त्यांचं खरं रूप नव्हे आणि हे कोणालाच स्वीकारायचं नाहीये, बदलायचं नाहीये ही खरी क्लेशदायक बाब आहे.

गणेशोत्सवाचा उद्देश कधीच बाजूला पडला. नंतर फक्त बाजार सुरू आहेत. गणेशोत्सव मंडळांप्रमाणे देणग्या गोळा करणे आणि मग सगळा त्या पैशाचा खेळ हेच इतर सर्व उत्सवात सुरू झाले असावे. नवरात्रात नाच वगैरे माझ्या आठवणीत सुरू झालेत. रत्नागिरीला नवरात्र फक्त मारवाडी गुजरात्यांपुरते मर्यादित होते. त्याचा इतर कोणाला त्रास नव्हता. वाणी लोकांचे नवरात्र राधाकृष्णाच्या देवळात उत्तमोत्तम शास्त्रीय गायकांच्या मैफली आयोजित करून साजरे व्हायचे. आता ते गाण्याचे कार्यक्रम बंद होऊन गरबा सुरू झाल्याचे ऐकले. दहीहंडी हा मजेचा आणि आनंदाचा उत्सव होता. त्यात सगळेच भाग घ्यायचे. गावात रात्री कीर्तन व्हायचे आणि सकाळी देवळाच्या आवारात दहीकाला आणि त्यात ओल्या पोह्यांचा प्रसाद. रत्नागिरीला दहीहंड्या असायच्या. पण त्या २०/२२ फुटांवर गेल्याचे आठवत नाही. कारण तेव्हा मुळात दोन मजले ही बिल्डिंग बांधायची कमाल उंची होती. कालाय तस्मै नमः या सगळ्याच्या पाठीशी बाजार आणि इतर बरेच मोठे अर्थकारण असल्याने आपण काही करू शकत नाही. जे जे होईल ते ते पहावे. बस.

In reply to by पैसा

बाळगोपाळच हंडी फोडत.तीन थरात काम फत्ते. आणि दहीकाला आणि गावात सर्वांना काल्याचा प्रसाद. साधंसोपं सगळं.

मुर्खपणाचा कळस!!! हा विडीओ पाहताना मनात आला की ह्यासगळ्या च्युगिरीमूळे कितीतरी जणांना ऑफिसला/शाळेत जायला उशिर झाला असेल, इंटरव्यूला जायला उशिर झाला असेल, कुठल्या महत्वाच्या कामाला जाण्यासाठी उशिर झाला असेल व महत्वाचं म्हणजे एखादी अ‍ॅम्ब्यूलंस अडकल्यामूळे तत्पर वैद्यकीय सेवा मिळायला उशिर झाला असेल. :(

In reply to by शिद

कोणता गणपती आहे हा ? गणपती तर अजून यायचेत ? आणि ते डी जे वर वाजत असलेलं "झिंगाट" गाणं तर 4-5 महिन्या पूर्वीच आलंय म्हणजेच मागच्या वर्षीची मिरवणूक असण्याची शक्यता नाही . मग ही कधीची गणपती मिरवणूक ?

In reply to by सॅगी

होय, बरोबर, ही मिरवणूक गणपती विसर्जनाची नसून आगमनाची आहे. आजकालच्या फॅशनप्रमाणे आता पब्लिक तितक्याच जल्लोशात आगमनाची मिरवणूक काढतेय...आता ह्यावर आपण काय बोलणार हताश होण्यापलिकडे?

In reply to by शिद

रिकामटेकडी माणसेच अशा ठिकाणी जास्त जमतात. काम-धंदा असणारा माणूस, धार्मिक स्थळांवर फार अभावानेच आढळतो.किंबहूना माणूस आपापले आर्थिक नियोजन करूनच अशा ठिकाणी जातो. जावू दे... कोळसा कितीही उगाळला, तरी काळाच. आणि धार्मिक स्वैराचाराच्या बाबतीत, आपण कितीही कंठशोष केला तरी, रिकामटेकड्या माणसांवर त्याचा ढिम्म फरक पडत नाही. अजकाल मंदिरात पण, घरातून हकललेल्या म्हातार्‍या मंडळींचीच गर्दी जास्त असते.

.....मोठ्या शहरातल्या कळपाला शिस्त लागावी हा स्वच्छ हेतू कसा पुरा करता येईल? सार्वजनिक सण सार्वजनिकही राहतील आणि लोकांना शून्य त्रासदायक राहतील हे कसे साध्य करायचे?" हे अजिबात शक्य नाही.

In reply to by मुक्त विहारि

हे अजिबात शक्य नाही.
मुवि असं म्हणालातच कसं ? तुमचं देशावर प्रेम उरलेलं नाही तेव्हा आता देश सोडून बाहेर जा.. ;)

In reply to by हाडक्या

सल्याबद्दल मनापासून धन्यवाद... पण.... गेल्या १००-१२५ वर्षापासून सण-आणि उत्सवांनी फारच वेगळे आणि समाजविघातक स्वरूप धारण केलेले आहे. भारतात, धर्म आणि सण-वार, ही मतांची पेटी आहे.

गेल्या पाच-सहा वर्षात मुलांना एकही सार्वजनीक (नट नट्यांनी आमंत्रीत) दही हंडी दाखवायला घेऊन गेलो नाही,किंबहुना त्यांनी तसा हट्टही केला नाही. चौकातील छोटेखानी दहिहंडी दाखवली असेल एक दोनदा.पण या निमित्ताने मुलाशी दोन दिवसांपुर्वी झालेला संवाद आठवला. मी:दादा कशाला बोलावतात हे नट्यांना उगाच्,पेपरात पहा एक एक नटी दहीहंडीला यायचे २ ते ५ लाख घेते. दादा:असतील मंडळाकडे पैसे. मी:कुठुन येतात वर्गणीतूनच ना? आणि हेच पैसे त्याच भागातील गरजूंच्या शिक्षणावर/बागेच्या/वाचनालयाच्या कामावर खर्च करता येतील की? दादा: करू शकतील पण मग नट्यांनीच नाही म्हणायचे यायला मग कशाला होतील खर्च ? मी:पैसे मिळत असतील तर कुणाला नको आहेत्,त्यांना त्यांच्या उमेदीच्या काळात्च तर पैसे मिळतील ,म्हातारर्पणी कुणी बोलवेल काय? दादा : असेल पण लोकांना पण त्यांच्या बरोबर फोटो काढायचा अस्तो ना !!! ता.क. पिंपरी चिंचवडमध्ये हेट स्टोरी ३ पासून ते काहीही हं श्री पर्यंतच्या सार्या "तारकांनी" सुपार्या घेतल्या होत्या.भोसरी आघाडीवर. हिंदु धर्म की जीवनप्द्धाती(?) चा अवमान/हेळसांड/कुचेष्टा अश्या झुंडशाहीनेच होत आहे इतरांनी काही बोलले तर मिर्च्या झोंबू नयेत.

In reply to by नाखु

भोसरीतल्या राड्याबद्दल तर बोलायचंच काम नाही, उत्सव किती गलिच्छ प्रकारे साजरा केला जाऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण आहे ते गुंडगिरी , बेवड्या लोकांचा तमाशा , चेंगराचेंगरी , मारामारी असले प्रकार सर्रास चालू असतात. बर ह्या सगळ्याला लोकांचा हि पाठिंबा असतो , हे जमलेल्या गर्दीवरून दिसून येते. मग गुंडांचेही फावते.

माझ्या निरिक्षण आणि अंदाजानुसार हे प्रकार अजून किमान पंधरा-सोळा वर्ष चालतील, त्यानंतर उतरती कळा लागेल. २०३५ पर्यंत हे झेलणे अनिवार्य आहे. असे का वाटते ह्यावर लिहितो थोडा वेळ मिळाला की.

In reply to by संदीप डांगे

.....हे प्रकार अजून किमान पंधरा-सोळा वर्ष चालतील, त्यानंतर उतरती कळा लागेल." असे झाले तर उत्तमच...पण सध्या ३ महाराजांचे उदात्तीकरण सुरु असल्याने, दर गुरुवार आणि शनिवार, धांगडधिंगा सुरु होईल... डोंबोलीत तरी, सध्या देवा पेक्षा महाराज मोठे होत आहेत.

In reply to by संदीप डांगे

* हे सरसकटीकरण नाही. जनरल निरीक्षण आहे. यात सहभागी होणारी जी मंडळी आहेत, त्यात बहुतेक सगळे न शिकलेले, कमी शिकलेले, अर्धवट शिकलेले, शाळा/कॉलेज सोडलेले, घरचे पाठवतात म्हणून कॉलेजला जाण्याचं नाटक करणारे असे असतात. ( सगळेच असे असतात असे नाही. सुशिक्षित, सुसभ्य लोकही असतात, पण ते बर्‍याच कमी प्रमाणात, नियम सिद्ध करण्यापुरते अपवाद म्हणून). अशांना उद्याची काळजी नसते, किंवा करायची नसते. भविष्याचा विचार , वगैरे गोष्टींपासून ते कित्येक योजने दूर असतात. आज, आत्ता कसा एन्जॉय करायचा हे महत्वाचं असतं. कित्येकांना स्वत:ची, स्वतःच्या कुटुंबाची चिंता नसते, तर समाज, देश वगैरे दूरच्या गोष्टि झाल्या. आणि हे सर्वत्रच दिसतं. शिवाजी महाराजांची जयंती आहे... दिवसभर ठणाणा पोवाडा लावा, संध्याकाळी एक छोटीशी मूर्ती घेऊन दोनमजली स्पीकर्सच्या भिंतीसमोर झिंग झिंग झिंगाट.... संभाजी महाराजांची जयंती/पुण्यतिथी: दिवसभर ठणाणा पोवाडा लावा, संध्याकाळी एक छोटीशी मूर्ती घेऊन दोनमजली स्पीकर्सच्या भिंतीसमोर झिंग झिंग झिंगाट....शिवाय जमेल तिथून मशाल आणून जमेल तिथे नेताना एक जण पळणारा व सोबत २०-४० जण ट्रिपलसीट मोटारसायकलींवर जिजाबाई जयंती/पुण्यतिथी: दिवसभर ठणाणा पोवाडा लावा, संध्याकाळी एक छोटीशी मूर्ती घेऊन दोनमजली स्पीकर्सच्या भिंतीसमोर झिंग झिंग झिंगाट.... (हो! जिजाऊ जयंती-पुण्यतिथीला मिरवणूका निघतात... स्पीकर्सच्या भिंतीसहित!!) आंबेडकर जयंती-पुण्यतिथी: दिवसभर स्पीकर्सच्या भिंती चालू, रात्री दोनमजली स्पीकर्सच्या भिंतीसमोर झिंग झिंग झिंगाट.... आणि काही दिवसांपूर्वी हे सुद्धा पाहिलं: 'रथात' म. फुले व सावित्रीबाई फुले यांचे फुटभर उंचीचे फोटो ठेऊन दोनमजली स्पीकर्सच्या भिंतीसमोर झिंग झिंग झिंगाट.... अहिल्याबाई होळकर जयंती/पुण्यतिथी: 'रथात' त्यांचा फुटभर उंचीचा फोटो ठेऊन दोनमजली स्पीकर्सच्या भिंतीसमोर झिंग झिंग झिंगाट.... आता फक्त ज्ञानेश्वर-तुकाराम-पांडूरंग यांच्या मिरवणुका (डीजेच्या तालावर) निघालेल्या पाह्याच्या बाकी आहेत.

In reply to by तुषार काळभोर

अण्णाभाऊ साठे पण आले आता. प्रत्येकच जात आपण का मागे रहा म्हणून आपला एक महापुरुष शोधून डिजेच्या भिंती चालवत आहे. पुण्यात मला मुस्लिमांची डिजेच्या तालावर धांगडधिंगा जाणारी कसलीशी मिरवणुक दिसली होती. कप्पाळावर हात मारला. मौसिकि हराम आहे बाबांनो आपल्या धर्मात! सगळे एकमेकांपासून वाईट गोष्टीच तेवढे शिकत आहेत.

In reply to by स्वामी संकेतानंद

वेडा आहेस! मौसीखी हराम नाही तर अल्लाह ने दिलेली एक देणगी आहे, अधिक संदर्भाकरीता नेट वर "दाऊद" (इब्राहिम कासकर नाही तर प्रेषित दाऊद) अन खुदा के लिये नामक पाकिस्तानी सिनेमा रेफर कर स्वाम्या! ;)

या ठणठणाटात हल्ली एक बरं झालंय की ती मुलं देखील वर्गणी मागून कंटाळली. हल्ली दोन चार 'आधारस्तंभ' सगळा खर्च करतात. आपण कानात बोळे घालून शक्य तोवर दुर्लक्ष करावं. रच्याकने, 'निळी हंडी' हा काय प्रकार आहे?

In reply to by स्वीट टॉकर

निळी हंडी माहीत नाही? मुंबईच्या एका उपनगरात एक 'आधारस्तंभ" गेली कित्येक वर्षे निळी हंडी साजरी करतोय. नावावरून तुम्हाला साधारण कल्पना आली असेल की इथे कोणाला कान्हा बनवलाय! बाहेरच्या भागातली निळी पाखरे विरोध करतात पण तो विरोध दबक्या आवाजात अस्ल्याने त्याला काही फरक पडत नाही. त्याच्या भागातली माणसे त्याच्याविरुद्ध बोलू शकत नाही.

एका मोठ्या मैदानात उत्सवप्रिय लोकांची सोय करून द्यावी सरकारने तिकडेच टॉयलेट बाथरूम ठेवावे....आणि सकाळी 9 ला एन्ट्री देऊन रात्री 12 ला एक्सिट ठेवावी...जर कोणी आधी परत आला तर "आधारस्तंभा"कडून त्याप्रमाणात दंड वसूल करावा ....ज्यांना खाज आणि माज आहे असेच जातील तिकडे....कानाचा आणि डोक्याचं भुगा करून परत येतील......मैदानाच्या सभोवार मोठे साऊंड ऍबसॉर्बेर्स लाऊन घ्यावे जेणे करून बाहेर आवाज येणार नाही....इनकम टॅक्स वाल्यांना पण बोलाऊन सगळं हिशेब जागच्या जागी तपासून टॅक्स जमा करून घ्यावा तो पण कॅश मध्ये ..इतर सुविधांचा पण खर्च वसूल करावा (.मंडळाकडून किंवा आधारस्तंभाकडून.)...बाकी ज्यांना डीजे न लावता उत्सव साजरा करायचा आहे ते सार्वजनिक ठिकाणी ट्रॅफिक ला कोठलाही अडथळा न येऊ देता साजरा करू शकतात

In reply to by मिपापन्खा

उपाय चांग्ला आहे, आवडला. मैदानापेक्शा इन्डोअर स्टेडिअम उभारावे. याला लागणारे पैसे पण आधारस्तंभांकडून 'देणगी' म्हणून घ्यावे.

एका मित्राच्या बर्थडे पार्टी होती.एका छानशा बँक्वे हॉल मध्ये ही पार्टी ठेवली होती.मित्राचे बरेच ओळखीचे आणि परिचयाचे लोक तिथे आले होते.."हाय हॅलो "वगैरे सगळं झालं.मलाही माझे कॉलेज मधले कॉमन मित्र भेटले..पार्टी रंगात येऊ लागली होती.मग जेवणाच्या आधी 'ड्रिंक्स & डान्स ' चं आयोजन होतंच. सगळ्यांचे हात ग्लासांनी भरले..डी.जे चं सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं..नाचायला पूर्ण तयार झालेली लोक, आता कुठलं गाणं हा डी.जे लावेल आणि त्यावर कुठल्या स्टेप्स वर नाचायचं ह्यावर काही उत्साही मंडळी चर्चा करत होती.आणि गाणं सुरु झालं.. "गजानना श्री गणराया,आधी वंदू तुज मोरया ..मंगलमूर्ती...."सगळे आलेले लोक अवाक होऊन एकमेकांकडे बघू लागले.बर्थडे पार्टी,हातात दारूचे ग्लास आणि कसलं हे गाणं ? " गजानना गणराया ? " लोकांची कुजबुज जाणवण्याएवढी वाढली..शेवटी त्या उत्साहावर पाणी पडलेल्या एकाने विचारलं, "ए हे काय..पार्टीत काय हे गाणं लावता ? कोई पार्टीवाला गाना लगाओ यार "- तसा माझा मित्र, ज्याचा वाढदिवस होता, हातात माईक घेऊन स्टेजवर चढला.. "मित्रांनो..माझी बर्थडे पार्टी आहे.आता पार्टी म्हंटली कि त्यात कुठचंतरी पार्टी सॉन्ग वाजेल अशीच तुमची अपेक्षा होती ना ? अर्थात असणारच..पण जसं एखाद्या पार्टीत, हे 'गजानना गणराया 'गाणं शोभत नाही ना,तसंच एखाद्या गणपतीच्या मांडवात देखील एखादं पार्टी सॉन्ग शोभत नाही..पण त्यावेळेस आपण आपला विरोध दर्शवतो का? नाही..' आपल्याला काय करायचंय ' म्हणून सोडून देतो..पण हे चुकीचं आहे..गणेशोत्सव हा 'उत्सव 'आहे आणि गणपती हा आपण देव मानतो.त्याला ' Show -Piece 'करून ठेवू नका..आत्ता ह्या पार्टीत जसा विरोध दाखवलात ना,तसंच विरोध एखाद्या गणपतीच्या मांडवात सुद्धा दाखवा..D.J फक्त पार्टीची शोभा वाढवतो..उत्सवाची नाही..हे लक्षात ठेवा..हातात दारूचे ग्लास,पार्टीत बरे वाटतात..गणपतीच्या मिरवणुकीत नाही..विरोध दर्शवा.आपण गप्प बसतो म्हणून हे खूळ बोकाळलंय..सगळीकडे दारू आणि डी.जे चालणार नाही हे कळूदे ना गणेशोत्सव मंडळांना.. अशा उत्सव मंडळांना वर्गणी,देणगी जाहिरात देऊ नका जिथे असला थिल्लरपणा चालत असेल..मग बघा परिवर्तन होतं कि नाही ते..आणि..सो सॉरी.मला ही गोष्ट खटकते..गणपती यायला आता फक्त 10-12 दिवस उरलेत..आणि आज तुमच्यापर्यंत माझा विचार पोचावा अशी माझी इच्छा होती.,म्हणून हे सगळं मीच घडवून आणलं..Now enjoy your Party Friends .." -म्हणत हा खाली उतरला..टाळ्यांचा कडकडाट झाला.. मी मात्र नाचण्या ऐवजी ड्रिंकचा आस्वाद घेणं prefer केलं ..हा माझा मित्र माझ्या शेजारी येऊन उभा राहिला आणि खांद्यावरहात ठेवत म्हणाला, "काळे, लोकांना ना ज्या भाषेत समजतं, त्याच भाषेत समजवावं लागतं..कशी वाटली आयडिया ? " -तसं मी हसत म्हटलं, " साल्या, डोक्याचा उपयोग अगदीच उशीवर ठेवण्याकरता करत नाहीस.ग्रेट.चियर्स ".. व पु काळे.

In reply to by स्वामी संकेतानंद

वपु २००१ साली गेले. शेवटपर्यंत ते लिहिते होते. डिजे संस्कृती आणि स्पिकर्स वॉल्स हे प्रकार त्या आधीपासून होते.

In reply to by प्रभाकर पेठकर

काका.. हे लिखाण वपुंच्या (मी वाचलेल्या) कोणत्याही पुस्तकात मला आढळलेले नाही. हे निव्वळ एक ढकलपत्र आहे. वपुंच्या नावावर खपवत आहेत याची खात्री आहे. वपुंचे लिखाण असल्यास खरंच रेफरन्स बघायला आवडेल.

In reply to by मोदक

मोदकराव, मी फक्त वपुंच्या काळात डिजे आणि स्पिकर्स वॉल्स होत्या एव्हढाच मुद्दा अधोरेखित केला आहे. मुळ उतार्‍याच्या सत्यतेबद्दल कांहीही म्हंटलेले नाही. गैरसमज नसावा.

In reply to by प्रभाकर पेठकर

काळे साहेबांचा नाव टाकला त्या बद्दल क्षमस्व , मला माहित नाही हा लेख नक्की कोणी लिहला, मला कोणीतरी पाठवला आणि मला सुंदर वाटलं , म्हणून जसा मला आला तास कदाचित तुम्हाला सुद्धा आवडेल हे अपेक्षा ठेवली. कालसाहेबांच्या नावासंहीताच लेख जसा होता तास फॉरवर्ड केला. कोणाचा अनादर करायचा हेतू नव्हता , म्हणून पुन्हा एकदा माफी.

लोकशाहीचे कमी फायदे व जास्त तोटे आहेत. त्यातल्या त्यात ज्या ठिकाणी "विविधतेने नटलेला " समाज आहे त्या देशात लोकशाही ही एक भंकस गिरी आहे. कारण अशा अर्ध शिक्षित लोकशाहीत स्वैराचार हाच शिष्टाचार असणार. भाकरी हवी की देव हवा यात देव हा पर्यात जिथे निवडला जातो. तिथे असेच घडायचे. देवावरून धर्मावरून वर्गयुद्धे आपण पाहिली आहेत. कांदा अति महाग वा अति स्वस्त झाला तर ग्राहक विरूद्ध शेतकरी असे वर्गयुद्ध आपण कधी पाहिले आहे काय ?

न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध बोलून चमकोगिरी करणारे राज ठाकरे आणि कन्न्हैयाकुमार यांच्यात काडीचाही फरक नाही.

सिरियसली लिहू का? उपाय सिंपल आहे, पण सोपा नाही. इफेक्टिव्ह आहे, पण इन्स्टन्ट नाही. असं बघा, वरच्या प्रतिसादांत पूर्वीच्या आठवणी आल्यात. त्याकाळी उत्सव छोटे होते वगैरे. ३०-४० वर्षांपूर्वी होणार्‍या उत्सवांचे आयोजक कोण असायचे? व आज कोण असतात? आपल्या सोसायटी, गल्ली, कॉलनीतल्या उत्सवाचे आयोजन आपण गल्लीगुंडांच्या ताब्यात जाऊ दिले आहे का? रात्री चौकात, कट्ट्यावर, अशा ठिकाणी जमा होणारी आपल्याच भागातली तरूण मुलं कोण असतात नक्की? आपल्यातलीच असतात. आपणही तरूणपणी हूडपणा केलेला असतो. सार्वजनिक उत्सवांचे आयोजन करणे हा एक चांगला अनुभव असू शकतो. फक्त गाईडलाईन देणारे सभ्य लोक दूर जाऊ लागलेत, अन स्वार्थाची, राजकारणाची पोळी भाजून घेणारे लोक आयोजनात घुसलेत. आपल्या भागात होणार्‍या रोजच्या घटनांत सहभागी होऊन त्याला योग्य मार्ग देण्याचा प्रयत्न केला, तर तो नक्कीच यशस्वी होतो. प्रेमाने समजवून सांगितले तर भडकणार्‍या मुलांना समजते. फक्त कंटीन्यूअस प्रीचींग करायचे नाही, अन स्टीम लेटडाऊन करू द्यायची. मग आपल्या भागात गणपती चांगल्या पद्धतीने साजरा होतो. त्याचा हिशोबही मुलं सगळ्यांना देतात, उरलेल्या पैशांतून काही कन्स्ट्रक्टिव्ह, उदा. नेहेमी पाणी जमणार्‍या खड्ड्यात मुरूमाची भर वगैरे करता येतं. करायचंच असेल, तर हे करता येईल. ट्राय अँड बी द चेंज विदीन. बाहेरून कायदे करून दादागिरीने काही होत नाही. शेजारपाजार्‍यांशी बोलायला, चांगले संबंध ठेवायला सुरुवात केली, की आपोआप एक लोकल नेटवर्क तयार होतं, अन ते हळूवारपणे पॉझिटिव्हली गाईड करता येतं. च्याय्ला, गावगुंड तथाकथित लोकल 'नेते' जे करू शकतात, व या उत्सवांना घाण वळण लावतात, तेच आपल्याला करायला व वेगळं पॉझिटिव्ह वळण लावायला का नाही जमत?

In reply to by आनंदी गोपाळ

100 टक्के सहमत, गावगुंडांमध्ये धमक असते त्यामुळे ते यशस्वी होतात, पण धमक नसलेले लोक असे सोयीस्कर समजून घेतात कि गुंड अवगुणांमुळे यशस्वी होतात,

In reply to by संदीप डांगे

समाजात चांगली माणसेही असतात त्यांच्यात एक अलौकिक असा अवगूण असतो की ती एकमेकांशी परकेपणा साधून असतात.GOOD PEOPLE ARE ALWAYS DIVIDED AND BAD ONES HAVE HANDS TOGETHER.

In reply to by चौकटराजा

शासन, प्रशासन ,न्यायव्यवस्था व विधीमंडळ यांचे नको तिथे असलेले सलोख्याचे संबंध (हॅन्डस टुगेदर ) व हवे तेथील दुराव्याचे संबंध .

In reply to by आनंदी गोपाळ

ट्राय अँड बी द चेंज विदीन. बाहेरून कायदे करून दादागिरीने काही होत नाही. १००+ "The only thing necessary for the triumph of evil is for good men to do nothing." - Edmund Burke जवळपास सर्वच प्रतिसादकांना या परिस्थितीत बदल हवा आहे, अनिष्ट प्रवृत्ती वाढीला लागू द्यायच्या नसतील तर सुष्ट, विचारी लोकांनी विवेकाने, पण सातत्याने अशा गोष्टींना ब्रेक लावायला हवा असं वाटतं.

In reply to by आनंदी गोपाळ

लोक गुंडांच्या विरोधात जास्त नातील कारण जीवाची भीती!

कोर्टाने मनाई करूनसुद्धा उल्हासनगर येथे एक 12 वर्षाचा मुलगा दहीहंडी उत्सवात सामील झाला व तो 6व्या थरावरून खाली पडला . पालकांचा मूर्खपणा दुसरे काय? ठीक झाला तर ठीक नाहीतर आहेच नशीबाला दोष.

In reply to by कायरा

काय नाय ओ, लक्ष सुध्दा द्यायचे नाही. मरेना का. अति कौतुक केल्याने शेफारल्यासारखे करतात सगळेच. चर्चा काय, फेस्बुकावर लाइक्स काय, व्हाटसपवर प्रसिध्दी काय. कोर्टात गेले प्रकरण तरी त्याचा इश्श्यु करणारे लोक. कोर्टाचा अवमान केल्याचे सुध्दा मिरवणारे लोक म्हणल्यावर अजुन काय? काही का होईना. आपले माणूस नावाचे बेट सांभाळायचे बस्स.