मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रतिजैविके समज आणि गैरसमज.

सुबोध खरे · · काथ्याकूट
प्रतिजैविके समज आणि गैरसमज. सर्वप्रथम सूक्ष्म जीव म्हणजे काय? सर्वात सूक्ष्म म्हणजे विषाणू किंवा व्हायरस. हा सजीव आणि निर्जीव यांच्या सीमेवर असलेला, जीव आणि रसायन यामधील अवस्था. याचे स्फटिकिकरण करता येते आणि हे स्फटिक युगानू युगे तसेच राहू शकतात. हा फक्त दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागात सक्रिय होऊ शकतो अन्यथा एखाद्या रसायनासारखा मृतप्राय असतो. उदा पोलियो एड्स कांजिण्या इ यानंतरचे काही जीव रिकेटसिया आणि क्लॅमिडिया हे जिवाणू आणि विषाणू यांच्या मध्ये आहेत. यानंतर येतात ते जिवाणू (म्हणजे बॅक्टेरीया) हे एक पेशीय जीव असून यात चयापचय क्रिया (metabolism) चालू असते. उदा स्टॅफिलोकॉकस, टायफॉईड याचे जंतू. या बरोबरच एकपेशीय बुरशीची निर्मिती झाली. उदा यीस्ट/ किणव जगाची सुरुवात झाली तेंव्हा सर्व प्रथम एक पेशीय वनस्पती आणि प्राणी तयार झाले. आणि त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली. यात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपाय शोधण्यास सुरुवात केली. जिवाणू आणि बुरशी (fungus) यांनी त्याच अन्नासाठी स्पर्धा सुरू केली यावेळेस बुरशीच्या पेशींनी जिवाणूची वाढ होऊ नये म्हणून काही गुंतागुंतीची रसायने निर्मिती सुरू केली.आणि ही रसायने त्या आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचे पाझरून तेथे असणाऱ्या जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करीत हीच रसायने म्हणजे अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविके. यातील पाहिले प्रतिजैविक म्हणजे पेनिसिलीन. याचा शोध डॉ अलेक्झांडर फ्लेमिंग यांना योगायोगानेच लागला. जिवाणू जगत असताना त्याच्या पेशीभिंतीची(cell wall) ची झीज चालू असते. ही झीज तो जिवाणू दुरुस्त करीत असतो. पेनिसिलीन ही झीज दुरुस्त करण्याच्या कामात लागणाऱ्या रसायनांच्या कामात अडथळा आणते. यामुळे जिवाणूच्या भिंती सच्छिद्र बनतात त्यामुळे त्याची पेशी बाहेरील अतिरिक्त पाणी शोषून फुगून येते आणि जिवाणूंचा मृत्यू होतो. प्राण्यांच्या शरीरात पेशींना असलेली भिंत नसतेच तर फक्त एक पटल (membrane) असते त्यामुळे पेनिसिलिनचा प्राण्यांच्या( मानवाच्या) शरीरावर अजिबात परिणाम होत नाही. यामुळे पेनिसिलीन आणि त्याच्या गटातील किंवा तशाच तर्हेचे असलेलं केफ्लॉस्पोरीन गटातील प्रतिजैविकांचा मानवी शरीरावर परिणाम अत्यंत नगण्य होतो. १) विषाणू हे दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागातच सक्रिय असल्यामुळे त्यांच्यावर प्रतिजैविकांचा मुळीच परिणाम होत नाहीत. यामुळेच प्रतिजैविके ही फक्त जिवाणूजन्य रोगात वापरली जातात विषाणूजन्य रोगात नाही. २) आपल्याला झालेला रोग हा जिवाणूजन्य आहे की विषाणूमुळे आहे की बुरशीमुळे झालेला आहे हे समजून येण्यासाठी साडेपाच वर्षांचा एम बी बी एस हा कोर्स केलेले आणि त्यावर अनेक वर्षे अनुभव घेतलेले डॉक्टर असतात. दुर्दैवाने केवळ लक्षणे पाहून लोक स्वतः औषधे घेतात, कारण मागच्या वेळेस शेजारच्या गण्याला किंवा आपल्या बंडूला अशाच लक्षणांसाठी आपल्या डॉक्टरने हीच औषधे दिलेली असतात. काही लोक मागच्या वेळेस हगवण लागली असताना डॉक्टरांनी एंटेरो क्विनॉल किंवा तत्सम औषध दिले होते म्हणून दुसर्या वेळेसही "स्वतःच" ते औषध घेतात. दुर्दैवाने त्याच्या मागील कार्यकारण भाव माहीत नसल्याने ते काही वेळेस होमियोपथिक डोस घेतात जो झुरळाला किंवा डासाला पुरेल इतका असतो नाहीतर व्हेटरनरी डोस घेतात. ६० किलोच्या माणसाला लागणारा डोस ऐवजी ४०० किलोच्या रेड्याला लागणारा डोस घेतात. ३) किंवा जवळच्या केमिस्टकडे जाऊन त्याच्या कडून घसा फार दुखतो किंवा हगवण लागली आहे या लक्षणांसाठी अशी औषधे मागून घेतात. केमिस्ट सुद्धा आपलं धंदा चालवण्यासाठी किंवा स्वस्तात लोकप्रियता मिळवण्याच्या मागे असल्याने सर्रास अशी औषधे देतात. १००% डॉक्टर असे केमिस्टकडे अर्धवट औषधे घेऊन आलेले रुग्ण रोज पाहत असतात आणि जवळ जवळ १००% केमिस्ट अशी औषधे देतात. अर्ध्य हळकुंडाने पिवळे होण्याचे यापेक्षा दुसरे उदाहरण नाही. १० नंतर २ वर्षे डिप्लोमा केलेले (डी. फ़ार्म) केमिस्टच्या दुकानात बसून डॉक्टरकी करत असतात. ना त्यांना त्यातील रसायन शास्त्राचा गंध असतो ना त्यामागील जीवशास्त्रीय प्रक्रियेचा. ४) लोक सुद्धा अशी औषधे का घेतात. -सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे डॉक्टरच्या फी चे पैसे वाचवणे. यानंतरची कारणे -- तेथे लागणारा वेळ वाचवणे आणि कधी कधी डॉक्टर बाहेरचे अरबट चरबट खाल्ले, दारू पिऊन नको त्या गोष्टी केल्या म्हणून आपली हजेरी घेतील या भीती मुळे. ५) मुद्दामहून पसरविले गैरसमज - बहुसंख्य होमियोपॅथ (८०% च्या वर आपल्या पाथीचा प्रचार करण्यासाठी सर्रास असे सांगताना आढळतात की ऍलोपॅथीचे डॉक्टर अँटीबायोटिक्स देऊन रोग "तिथल्या तिथे दाबून टाकतात". होमियोपॅथी मध्ये आम्ही रोगाचा मुळापासून नायनाट करतो म्हणून आमची औषधे स्लो असली तरी परिणामकारक असतात. आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेषा लहान करण्याची ही हीन प्रवृत्ती आहे. याबद्दल मला अजून काही म्हणायचे नाही. ६) अँटीबायोटिक्स "उष्ण" पडतात. आयुर्वेदाच्या वैद्यांनी हा एक जाणून बुजून पसरविलेला गैरसमज आहे. ऍमॉक्सीसिलीन सारखेच प्रतिजैविक साधारण २५० ते ५०० मिग्रॅ (कॅप्सूल) दिवसात तीन वेळेस दिले जाते. परंतु गनोरिया सारख्या गुप्तरोगावर जेंव्हा रुग्ण परत येण्याची शक्यता कमी असे तेंव्हा आम्ही एक वेळेस ३.५ "ग्राम" म्हणजे २०५ मि ग्रॅम च्या १४ कॅप्सूलच्या समकक्ष औषध रुग्णास द्रवस्वरूपात देत असू शिवाय ते औषध (शरीरात जास्त काळ राहावे) मूत्रपिंडातून बाहेर पडू नये म्हणून २ ग्रॅम प्रोबेनेसीड हे दुसरे औषद्ध देत असू. शेकडो रुग्णांना असा एकच डोस देऊन त्यांचे गुप्त रोग बरे झालेले मी स्वतः पाहिलेले आहेत. सांगण्याचे तात्पर्य हे की औषध "उष्ण" पडते हा मुद्दाम पसरवलेला गैरसमज आहे. ७) आम्हाला अतिशय अशक्तपणा, चक्कर येणे, घाम येणे उलटीची संवेदना होणे किंवा तोंडाला चव नसणे अशी लक्षणे औषध घेतल्यावरच का होतात? आम्ही काय खोटं बोलतो का असे रुग्ण विचारतात. याचे साधे उत्तर असे आहे की आपल्या शरीरात जंतूंनी प्रवेश केलेला असतो तुमची प्रतिकार शक्ती जेंव्हा जंतूंचा नाश करण्यास कमी पडते तेंव्हाच तुम्हाला रोग होतो आणि हे शरीरात शिरलेले जंतू दर २४ तासात दुप्पट या वेगाने प्रजनन करीत असतात. तुमच्या शरीरातील खर्वनिखर्व जंतू जेंव्हा प्रतिजैविके दिल्यावर मृत्यू पावतात तेंव्हा त्यांच्या पेशीतील विषे तुमच्या शरीरात पसरतात. आणि यामुळे तुम्हाला अतिशय आजारी असल्याची ही सर्व लक्षणे दिसू लागतात. देवनारच्या कचरा मुंबई भर पसरलं तर मुंबईची काय परिस्थिती होईल तशीच ही परिस्थिती आहे. जोवर या सर्व कचर्याचा निचरा होत नाही तोवर आपल्याला आजारी असल्याची संवेदना असते. दुर्दैवाने बहुसंख्य आधुनिक डॉक्टरना या गोष्टी समजावून सांगायला (आणि रुग्णांना समजावून घ्यायला) वेळच नसतो. यामुळे काय होते रुग्ण दोनच दिवस औषध घेऊन बंद करतात आणि रोगाचे जंतू पूर्ण नष्ट व्हायच्या अगोदरच प्रतिजैविक बंद केल्याने शरीराच्या प्रतिकारशक्तीवर जंतुनाशाच्या अतिरिक्त कामाचा ताण पडतो आणि रुग्णाला अजूनच अशक्तपणा जाणवतो. या आगीत तेल ओतायला आणि आपली पोळी भाजून घ्यायला होमियोपाथ किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञ तयारच असतात. ८) प्रतिजैविके ही शेवटी रसायनेच असतात त्यांचा आपला जसा परिणाम असतो तसे काही दुष्परिणाम असतोच. पण हे साईड इफेक्ट्चे तुणतुणे इतर पॅथीचे लोक इतके वाजवतात की लोकांना तेच जास्त खरे वाटू लागते. काही प्रतीजैविके यकृत (लिव्हर) मूत्रपिंड (किडनी) वर परिणाम करतात. त्यामुळे कोणत्या रोगात कोणते औषध घ्यायचे हे सुशिक्षित डॉक्टर ला नक्की माहिती असते. अर्ध शिक्षित किंवा अशिक्षित केमिस्ट कडून किंवा सर्वज्ञ रुग्णाने स्वतः अशी प्रतिजैविके घेतल्यास त्याला जबाबदार कोण? "अँटी बायोटिक च्या सेवनाने कीडनि निकामी होऊ शकते".हे अत्यंत अपुऱ्या माहितीवर केलेले अज्ञान मुलक विधान आहे. हे जर खरे मानले तर मूत्रपिंडाच्या संसर्गाला(urinary tract infection-- UTI ) कोणते औषध देणार? हा रोग ३३% स्त्रियांना केंव्हाना केंव्हा तरी होतोच. ९) औषध कंपन्या , केमिस्ट आणि डॉक्टर यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. ही गोष्ट "नवीन" नाही. पण यात "अँटीबायोटिकच जास्त" घेतले जाते असे नसून बऱ्याच वेळेस झिंक सेलेनियम सारखी सूक्ष्म द्रव्ये किंवा जीवनसत्त्वे आणि खनिजे जिनसेंग, स्पायरुलीना सारखी सुपर फूड याचा मोठा वाटा आहे.शिवाय ही औषधे जीवनावश्यक वर्गात मोडत नसल्याने त्याच्या किमतीवर नियंत्रण नाही. याविरुद्ध बरीच प्रतिजैविके हिची जीवनावश्यक श्रेणीत असल्याने त्यांच्या किमतीवर निर्बंध आहेत. अशा टॉनिक सारख्या औषधांचा डोस कितीही दिवस देता/ घेता येतो. अँटीबायोटिक तुम्ही फार तर पाच दिवस घ्याल. यानंतर एक फार महत्त्वाचा विषय मी मांडू इच्छितो-- "अँटी बायोटिकला प्रतिकार करणाऱ्या जिवाणूंची वाढ" मुळात तुम्ही जेंव्हा दोन दिवस प्रतिजैविक घेता तेंव्हा सुरुवातीला त्याला सर्वात जास्त संवेदनशील(SENSITIVE) असणारे जिवाणू मरतात आणि जे जिवाणू त्या प्रतिजैविकाला कमी संवेदनशील(resistant) असतात ते जिवंत राहतात. यानंतर आपण जर प्रतिजैविक बंद केले तर हे कमी संवेदनशील(resistant)जिवाणू शरीरात जिवंत राहतात आणि त्यांची पुढची पिढी मुळात त्या प्रतिजैविकास कमी प्रतिसाद देणारी (resistant)जन्मास येते. ही प्रक्रिया वारंवार घडल्याने प्रतिजैविकास अजिबात दाद ना देणारे जिवाणू शिल्लक राहतात आणि जे संवेदनशील असतात ते जिवाणू नष्ट होतात. असे करत करत अनेक प्रतिजैविकाना दाद न देणारे(multi drug resistant) जिवाणू नैसर्गिक निवड तत्वाने(natural selection) जिवंत राहतात. अशा जिवाणूंचा फार वेगाने प्रसार होतो. अशाच जिवाणूची एक जात म्हणजे NDM १ पहा https://en.wikipedia.org/wiki/New_Delhi_metallo-beta-lactamase_1 १०) एकंदरीतच अँटी बायोटिक चे अनेक वाईट दूरगामी परिणाम असतात हा परत बऱ्याच इत्तर पॅथीच्या व्यावसायिकांनी जाणून बुजून पसरविलेला अत्यंत दुर्दैवी गैरसमज आहे. १९४२ मध्ये पेनिसिलिनचा वापर सुरू होण्याच्या अगोदर लोक शेकड्यानीच नव्हे तर हजारांनी प्लेग, कॉलरा, हगवण किंवा विषमज्वर या रोगांनी मरत होते. या काळात आयुर्वेद किंवा होमियोपॅथी सारख्या इतर पद्धती होत्याच परंतु त्यांना या कोणत्याही रोगाचा प्रसार थांबवता आला नाही ही वस्तुस्थिती आहे. कित्येक अकाली मृत्यू त्यांना थांबवता आले नाहीत ही वस्तुस्थिती नाकारून ते एकंदरीतच अँटी बायोटिकला शिव्या देताना आढळतात यापेक्षा दैवदुर्विलास दुसरा नसेल. बालविधवांच्या पिढ्याच्या पिढ्या अशा रोगांमुळे दुःखात खितपत पडलेल्या अशा कथा त्या कालच्या साहित्यात सहज वाचायला मिळतात.प्रत्येक एकत्र कुटुंबात अशी एखादी बालविधवा सर्रास असे. प्रतिजैविकांचा अतिरिक्त वापर करणार्यात केवळ इतर पॅथीचे व्यावसायिक केमिस्ट आणि स्वतः औषधे घेणारे रुग्णच नव्हे तर आधुनिक डॉक्टरही दिसतात याची काही कारणे १) रुग्णाला आजच्या झटपट काळात एक दिवसात बरे व्हायचे असते त्यामुळे तो डॉक्टरवर दबाव टाकताना दिसतो. :"डॉक्टर परवा माझे प्रेझेन्टेशन आहे तेंव्हा परवापर्यंत काहीही करून मला बरे करा. नवीन व्यवसाय सुरू केलेल्या डॉक्टरला याला नकार देणे शक्य नसते. आणि जुन्या डॉक्टरला नेहमी येणार माणूस असेल तर त्याला नकार देणे वैयक्तिक संबंधामुळे शक्य नसते २) जेंव्हा रोग निदान नक्की नसते की हा विषाणूमुळे रोग झाला आहे का जिवाणूमुळे अशा वेळेस डॉक्टर स्वतःच्या सुरक्षिततेचा उपाय( to be on safer side) अँटीबायोटिकचा एक कोर्स लिहून देतात.रुग्ण दोन दिवसात बरा झाला तर अर्ध्या वेळेस स्वतः हून औषध थांबवतो. ३) मोठ्या शल्यक्रियेनंतर सर्जन परत उगाच धोका( why take chances) नको म्हणून एकदम उच्च दर्जाचे प्रतिजैविक देतात. antibiotic resistanceची चिंता मी कशाला करू हा विचार त्यामागे असतो. ४) दीड शहाणे किंवा सर्वज्ञ रुग्ण डॉक्टरवर दबाव टाकतात आणि सांगतात की मला चांगले अँटी बायोटिक द्या. अशा वेळेस डॉक्टर "माझ्या बापाचे काय जाते" म्हणून लिहून देतात. हा विषय कित्येक पी एच डी करता येईल इतका खोल आणि विस्तृत आहे. त्यात खोलवर जाण्याची माझी लायकी नाही यास्तव इथेच थांबतो.

वाचने 129749 वाचनखूण प्रतिक्रिया 349

चौकटराजा Wed, 07/13/2016 - 07:28
इथे सेमी प्रर्मिअबल मेम्ब्रेन वापरून होमिओपदी व आलोपदी यांच्यातील वादाचे धागे वेगळे गाळून दुसर्या एका धाग्यात टाकता का ? प्लीज........आता सेमी पर्मिएबल मेंब्रेन म्हणजे काय याचे उत्तर होमेओवाले आयुर्वेदवाले वा अलोपदी वाले कोण देतील बरे .... ?

नयना डोन्गरे Wed, 07/13/2016 - 10:28
लेख छान आहे मला काही प्रश्न आहेत. १) माझा मुलगा ( वय ४) द्रव प्रतिजौविके घेतान्ना खुप त्रास देतो व उल्टी करतो. औषछा मधे साखर वा चोकलेट सीरप कालवल्यास त्याच्या उपयुक्तते वर काही परीणाम होतो का? त्याला प्रतिजौविकांचा वास सहनच नाही होत. २) मुलाला बाल दमा व ड्राय फ्रुट ऐलर्जी आहे त्यामुळे त्याचे आजारी पडण्याचे। प्रमाण जास्ती आहे. सतत प्रतिजौविकांचा वापर केल्याने भविष्यात त्याच्या प्रतिकार श्कती वर काही वाईट परीणाम होउ शकतो का?

In reply to by नयना डोन्गरे

सुबोध खरे Wed, 07/13/2016 - 12:04
लहानपणीचा दमा आणि मोठ्यांचा दमा यात गुणात्मक दृष्ट्या फरक नाही. परंतु मुलांचे आपले वेगळे प्रश्न असतात. त्यांची श्वास नलिका अरुंद असल्याने दम पटकन लागतो आणि त्यात जंतू संसर्ग पण लवकर होतो. आपले डॉक्टर असा जंतू संसर्ग झाल्यास प्रतिजैविके देतात. याचे मूळ कारण एक - मुलाचा दमा जंतूंना प्रतिक्रिया (ऍलर्जी) म्हणून अजूनच वाढतो आणि मुलाला बरे होण्यास वेळ लागतो दोन - श्वासनलिका कायमची अरुंद होऊ नये. वारंवार प्रतिजैविके घेणे यामुळे मुलाची प्रतिकारशक्ती काही काळासाठी थोडी कमी होऊ शकते. परंतु दूरवरचा विचार केल्यास मुलाच्या वाढीस अडथळा येऊ नये आणि कायम श्वास( ऑक्सिजन) चा कमी पुरवठा होऊन वाढ खुंटू नये यासाठी ती घेणे श्रेयस्कर आहे. राहिली गोष्ट साखर किंवा चॉकलेट मध्ये सिरप घालून दिल्यामुळे प्रतिजैविकांच्या क्षमतेत काही परिणाम होत नाही.

चौकटराजा Wed, 07/13/2016 - 11:18
माझ्या माहितीप्रमाणे बाल दमा व ब्रॉन्कायटिस हे वेगळे आजार आहेत. बालदमा अ‍ॅलर्जेन मुळे होत असेल तर त्याला प्रतिजैविकांचा उपयोग होंणार नाही. तर श्बास नलिकेचे स्नायु सैल करणारे काहीतरी ( हे काहीतरी डोक्टरही अगदी जपून देतात) घ्यावे लागेल. माहिती जालावर मिळालेल्या माहिती प्रमाणे मुलांसाठी खास स्त्रॉबेरी फ्लेवर असलेली पेय प्रतिजैविके असतात. त्यामुळे मुलाने चोकलेट बरोबर प्रतिजैविक घेतले तर काही अपाय होईल असे वाटत नाही. अनेक पेय औषधात साखर असतेच की . माझी मुलगी अगदी लहान असतात .स्वास नलिकेला आतून सूज येणे व ती मधे अ‍ॅलर्जेनने आकुंचन ( स्पॅझम) निर्माण होणे या वेगळ्या घटना आहेत असे डॉ नी समजावल्याचे आठवत आहे. तुमच्या मुलाची तक्रार चवी बद्द्ल आहे की वासाबाद्द्ल.... ?

In reply to by चौकटराजा

नयना डोन्गरे Wed, 07/13/2016 - 15:08
प्रतिजैविके दम्यासाठी दिली जात नसुन इन्फेकशन साठी दिले जात आहे. त्याला इन्फेकशन इन्डुस्ड दमा होतो त्या साठी तुम्ही सांगीतल्या प्रमाणे पफ / नेब्युलाइज करावे लागते. मोन्टेल्युकास्ट सिरपही द्यावे लागते. धन्यवाद

In reply to by दिग्विजय भोसले

संदीप डांगे गुरुवार, 07/14/2016 - 01:08
ओह... आय सी. माझ्या माहितीत अजून तरी एकही रुग्ण असा बघितलेला नाही ज्याने आधुनिक वैद्यकशास्त्र 'सोडून' इतर मार्ग अवलंबला.... इतर मार्ग अवलंबण्याची वेळ आधुनिक वैद्यकशास्त्राने आणलेली असते असे म्हटले तर अर्थाचा अनर्थ होईल. लोक आधी आपल्या नेहमीच्या एमबीबीएस डॉक्टरकडेच जातात. गुण आला तर चांगलेच. पण विशेषत: दिर्घकाळ चालणार्‍या आजारांमधे, अगदी बेडरिडन न करणार्‍या आजारांमधे 'ट्राय' म्हणून इतर मार्ग अवलंबणे आधुनिक वैद्यकशास्त्रावरचा अविश्वास नसून 'मला आराम पडावा' ह्या एकमेव उद्देशाच्या दिशेने आशेची वाटचाल असते. जानेवारी महिन्यात मला अचानक किडनीस्टोनचा असह्य त्रास सुरू झाला. चार दिवस हॉस्पीटलात आडवा होतो. सलाईन चालू असे पर्यंत आराम असे. सलाईन बंद की परत कळा. तो महाभयानक त्रास केवळ आधुनिक वैद्यकशास्त्रावर विश्वास होता म्हणून सुमारे चार दिवस गुणिले चोविसतास गुणिले साठ सेकंद सहन केला. चौथ्या दिवशी डॉक्टरला थेट विचारले बाबारे होईल का तुझ्याच्याने, तो म्हणे आहे ती ट्रीटमेंट चालू ठेवून बघु. खडा निघून जाईल लघवीवाटे. तो तसाच निघेल, तुकडे न होता. तुम्हाला प्रचंड त्रास होईल इत्यादी. शस्त्रक्रियेची जरुर नाही. चौथ्या दिवशी सोनोग्राफीत दिसले की खडा ढिम्म हलला नव्हता. मुकाट हॉस्पीटल सोडले. औषधे सोडली. घरी आलो. घराजवळच्याच आयुर्वेदिक चूर्ण देणार्‍याकडून चूर्ण आणले. पहिल्या सहातासात कळा थांबल्या. अठराव्या तासाला लघवीवाटे खड्याचे पेस्टसदृश्य चूर्ण होऊन निघून पडले. ते प्रत्यक्ष पाहिले. औषध घेतल्यापासूनच्या चोविस तासात मी खडखडीत बरा झालो, कामावर जाऊ लागलो. हा माझाच नव्हे तर इतर किमान शंभर जणांचा अनुभव आहे. माझ्या ओळखीतल्या एका सीएला किडनीस्टोनचा त्रास किमान दहा वर्ष होता. सर्व प्रकारचे सर्व आधुनिक वैद्य त्याने पालथे घात्ले. श्रीमंत असल्याने अगदी वेचून वेचून स्पेशालिस्ट बघितले. काहीच आराम पडला नाही. कर्मधर्म संयोगाने माझ्याकडे त्याने हे सांगितले. मी त्याला चूर्णाचा उपाय दिला. आता तो सीए केव्हाही भेटला की किमान दहावेळा तरी माझे आभार मानतो. हा केवळ काकतालीय न्याय असेल ह्यावर माझा विश्वास नाही. बाकी चिकित्सा करणारे काही म्हणू देत. 'मला आराम पडला' हे ढळढळीत अंतिम सत्य. ते कोणाच्या डोक्यात जात असेल तर असो बापडे. :) 'आधुनिक वैद्यकशास्त्र' ह्यावर माझेकडून अनेक धाग्यांवर खडाजंगी चर्चा झाल्या आहेत. ते सर्व पुन्हा नको. ;) (आणि हो, कुणाला किडनीस्टोनचा त्रास असेल तर कृपया कोणाकडूनही कसलेही चूर्ण असेच उचलून आणून घेऊ नका. व्यवस्थित चौकशी करा, खात्री करा मगच औषध घ्या. मी शंभरेक लोकांकडून खात्री करुनच औषध घेतले होते. कुणाला हवे असेल तर मला व्यनि करा. पण आमचे वैद्य केसपेपर बघितल्याशिवाय औषध देत नाहीत हे लक्षात असु द्या. मला आराम पडला तसा इतरांनाही पडो ही प्रामाणिक इच्छा.)

In reply to by संदीप डांगे

चौकटराजा गुरुवार, 07/14/2016 - 06:22
मी होमिओपाथी ची औषधे घेत नाही तरीही माझा खडा दोन वेळा होमिओपाथीचे औषध घेतल्यानंतर पडला आहे. एका केस मधे तर केवळ सहा तासात. विशेष म्हणजे दोन्ही वेळेस ज्यानी औषध दिले ते एकही दिवस मेडिकलकॉलेज ला गेलेले नव्हते. माझी पत्नी डेंगीने आजारी असताना तिचा प्लेटलेट काउंट ६००० पर्यंत खाली आला होता व ती आय सी यू होती. माझ्या जबाबदारीवर होमिओ चे औषध देतो असे आय सी यू च्या डॉ ला सांगितले. दुपारी दोन वाजता औषध दिले रात्री दहा वाजता च्या रिपोर्ट मधे रिव्हर्सल सुरू झाल्याचे दिसले( म्हणजे प्लेटलेट काउंट वाढायला सुरूवात झाली. ) माझा मेहुणा व्हरर्टिगोच्या विकाराने त्रस्त होता. अलोपथीची अत्यंत महागडी औषधे काही करेनात त्यावेळी त्याने होमिओपथी चालू केली. गेले सहा महिने त्याचा विकार जवळ जवळ पळालेला आहे. अर्थात औषधे साबुदाणा गोळ्या व लिक्विड चालू आहेत.

In reply to by संदीप डांगे

अप्पा जोगळेकर गुरुवार, 07/14/2016 - 10:59
साहेब, कशाला असे अडचणीत आणणारे प्रतिसाद देता ? आयुर्वेद, होमिओपथी वगैरे सगळ्या अंध विश्वास आहेत. अगदी थेट लिंबू-मिरचीसारखे हे विसरलात का ? इथे वैज्ञानिक कसोट्या, त्यांचे निकष, अन्य पॅथीवाल्यांची अक्कल, ते कसे बिनडोक आहेत वगैरेंच्या बड्या बड्या बाता झाल्या. विज्ञान नेहमीच नम्र असते, परिवर्तनीय असते,सेल्फ करेक्टिव्ह असते एवढी साधी बात दुर्लक्षित करायची की झाले. उगा कोणाच्या धंद्यावर पाय नको.

In reply to by संदीप डांगे

गामा पैलवान गुरुवार, 07/14/2016 - 17:32
संदीप डांगे, याबाबत तुमच्याशी सहमत. माझाही अनुभवच मुळी असा होता की आधुनिक वैद्यक फारसं काही करू शकलं नाही. आ.न., -गा.पै.

सही रे सई गुरुवार, 07/14/2016 - 04:00
लेख वाचला आणि खूप छान महिती मिळाली. पण बर्‍याच जणांची इतर पॅथी बद्धलची मते वाचल्यावर राहवलं नाही. होमिओपथी व आयुर्वेदावर लिहायला त्याचा अभ्यास केलेली मंडळी मिपा वर जास्त नसल्यामुळे त्यांना वाईट, निरुपयोगी ठरवले गेले. मी स्वत: आयुर्वेदिक औषधंच आत्ता पर्यंतच्या आयुष्यात घेतली आहेत अस म्हणल तर अतिशयोक्ती होऊ नये. न राहवून मी हा लेख एका कायप्पा समूहावर टाकला. तिथे बरेच वैद्य नातेवाईक आहेत. त्यांना यावर मत विचारले असता त्यातील एका वैद्य नातेवाईकने हे मत व्यक्त केले आहे: "What he says is true but modern science itself is still developing. जे दिसतं तेच खरं हे त्यांचं (अलोपॅथीवाल्यांच) तत्व आहे. न दिसणार्‍या अथवा अजून सिद्ध न झालेल्या गोष्टी आहेत अथवा असु शकतात ह्यावर त्याचा विश्वास नाही. आता अलोपॅथी डॉक्टर्स कडे आयुर्वेदा मुळे बरे झालेले पेशेंट्स जात नाहीत. त्यामुळे त्यांना फक्त फेल गेलेल्या केसस दिसतात. मॉडर्न मेडिसिन मधे फार्मास्युटिकल कंपनीज़चा प्रचंड पैसा आहे. ब्रिटीश राजवटीमधे त्यांची औषधं खपावी यासाठी देशी औषधांना मुद्दाम वाईट ठरवंं गेलं. पोलिटिकल लीडर्स वर दबाव, ब्राइब, एन केन प्रकारेण गेली 10 वर्ष मॉडर्न मेडिसिन चा नफा 300% पर्यंत गेला आहे. मोठी हॉस्पिटलस सध्या धंदा करायला बसले आहेत.आता मोदी साहेबांच्या कृपेने सर्व देशी उपचार पद्धतीना चांगले दिवस आले आहेत.रिसर्च साठी लागणारा प्रचंड पैसा आयुर्वेदला कोणी देत नव्हत. आता त्यात हळू हळू बदल होत आहे. मूळ प्रश्न हा आहे की अलोपथि त्यांचा चष्मा लावून सगळ्या पॅथाँकडे बघतात. यामधे गंमत अशी आहे की आयुर्वेद समजायला फक्त आयुर्वेद शिकायला पाहिजे. मॉडर्न अनॅटमी शिकून आयुर्वेद शरीर रचना समजणार नाही. आमवात म्हणजे Rheumatoid arthritis नाही. पंडू रोग अ‍ॅनीमिया नाही." इति त्याच मत.

In reply to by सही रे सई

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/14/2016 - 04:33
What he says is true but modern science itself is still developing. जे दिसतं तेच खरं हे त्यांचं (अलोपॅथीवाल्यांच) तत्व आहे.
हे विज्ञानाचं तत्त्व आहे. आधुनिक वैद्यक हे त्याच विज्ञानाचा एक भाग आहे. ह्यात 'जे दिसतं ...' त्यातही गंमत अशी आहे की डोळ्यांनाच दिसलं पाहिजे असा विज्ञानाचा आग्रह नसतो, स्पर्श, चव, वास, डोळ्यांना न दिसणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरी हे सगळं त्यात येतं. फार्मा कंपन्यांची लॉबी, ब्रिटीशांनी एतद्देशीय ज्ञानाला मागे ढकलणं ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरीही विज्ञान बदलत नाही. हळद, आल्याचे औषधी गुणधर्म विज्ञान नाकारत नाहीच.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चंपाबाई गुरुवार, 07/14/2016 - 08:28
इंग्रजानी अडुळसा लावू नका , आयुर्वेदाचे आध्रम बंद करा इ काही केले का ? इंग्रजी औषधे व उपचार काही रोगंआवर प्रभावी ठरल्याने लोकानी या औषधांचा स्वीकार केला.. भारतातील पहिले मेडिकल कॉलेज इंग्रजानेव्च सुरु केले. आयुर्व्व्द वाचा - शिका - आयुर्वेदिक झाडे लावा -औषधे खलबत्त्यात कुटा - ती खा - सोबत अ‍ॅलोपथी वापरा किंवा न वापरा - बरे व्हा किंवा न व्हा... यावर तेंव्हाही बंदी नव्हती , आजही नाही. उद्याही नसेल. उगाच इंग्रज ( मोघल) मध्ये नका आणू

कंजूस गुरुवार, 07/14/2016 - 05:44
प्रतिजैविकेवरून लेख पथी विरोधी पथी असा उगाचच भरकटवला.आपापल्या तारतम्याने औषधयोजना करवून घ्यावी.कित्येक डॅाक्टरही/वैद्य/होमिओपॅथ स्वत:च्या घरात इतर पॅथिंची औषधे वापरत असतात यातच काय ते समजून घ्या.

चंपाबाई गुरुवार, 07/14/2016 - 06:26
छान... इतर पॅथींचे अनुभवही चांगले असू शकतात

सुधीर कांदळकर Wed, 07/20/2016 - 08:21
@ kalash आपण कळीची माहिती विचारलेली आहे. माझ्याकडील डॉ. सातोस्कर डॉ. भांडारकर लिखित फार्मेकोलॉजॉजी आणि फारमेकोथेराप्यूटीक्सच्या १९८०च्या आवृत्तीत काही मिळाले नाही. परंतु अनेक चांगल्या आठवणींना मात्र उजाळा मिळाला. माझे एक जवळचे स्नेही, एक अधिकृत वैद्यकीय व्यावसायिक आणि काही काळ माझे वरिष्ठ सहकारी होते. कै. डॉ. प्रकाश सुखटणकर. अंधेरीला चार बंगला इथे त्यांचा होमिओपॅथीचा दवाखाना होता. परंतु वाचन आणि व्यासंग चतुरस्त्र होते. तत्कालीन आधुनिक वैद्यकशास्त्राचे अद्ययावत ज्ञान मिळविण्याचा ते प्रयत्न करीत. लोकप्रभामध्ये १९८५-८८च्या सुमारास एक सुरेख लेखमाला लिहिली होती. तेव्हा इरीटेबल बॉवेल सिंड्रोमबद्दल त्यांनी मला दिलेली माहिती खालीलप्रमाणे: मुले एक खेळ खेळतात. एखाद्या मुलाच्या कपाळावर नाणे काही मिनिटे दाबून धरतात. मग ते नाणे काढून घेतात. ज्या मुलाच्या कपाळावर नाणे दाबून धरतात त्याला नाणे काढलेले कळत नाही. त्याला सांगतात की नाणे काढ. तो प्रयत्न करतो. नाणे हाताला लागत नाही व कपाळावरून निघत नाही. मोठ्या आतड्याच्या पहिल्या भागात ज्याला कोलॉन म्हणतात तिथे असेच होते. खासकरून आमांश ऊर्फ अ‍ॅमिबिक डिसेन्ट्रीनंतर. आतड्याला झालेली जखम बरी होते. परंतु पुन्हा पुन्हा शौचाची भावना होऊन आमांश बरा झाला नाही असे रोग्यास वाटते. परंतु आव पडणे हे अमीबा किंवा प्रोटोझोअल इन्फेक्शनचे लक्षण किंवा फेस पडणे वगैरे इतर लक्षणे दिसत नाहीत. कधीकधी पोटात दुखणे, आतडी पिळवटून मुरडा होतो आहे असे वाटते. अशा वेळी पुन्हा मेट्रोनीडाझोल, टीनीडाझोल वगैरे औषधे वापरू नयेत. काहीही उपयोग होत नाही. आधुनिक वैद्यकशास्त्रात यावर आतापर्यंत (१९८०चे द्शक) औषध नाही. या लक्षणांपासून होमिओपॅथीने मात्र दोनतीन दिवसात मुक्तता मिळते. कोणते औषध ते ते इतर लक्षणावरून ठरवीत. नंतर आमच्या ३-४ वर्षांच्या चिरंजीवाला ही व्याधी झाली होती. तसे निदानच फॅडॉ. नी केले होते. इतर मुलांच्या घरी दूषित पदार्थ खाल्ल्यामुळे. तेव्हा डॉ. सुखटणकर हयात नव्हते म्हणून कुलाब्याच्या डॉ. रशीद वाडिया या अधिकृत होमिओपॅथिक व्यावसायिकांकडे त्याला नेले होते व त्यांनी 'मॅग फॉस' १०एम तीव्रतेचे दिले होते व दोन दिवसात त्याला पूर्ण बरे वाटले. एवढ्या लहान वयात हा काही प्लासिबो इफेक्ट म्हणता येणार नाही. अर्थात मी दिलेला हा आधार फक्त एका व्यावसायिकाच्या अनुभवावर आहे म्हणून अधिकृत तज्ञ मार्गदर्शनाखाली डबल ब्लाइन्ड कन्ट्रोल्ड वगैरे प्रयोग केल्याशिवाय आधुनिक औषधप्रणाली याला मान्यता देणे शक्य नाही आणि ते योग्यच आहे. परंतु आधुनिक वैद्यकाने 'इन व्हिट्रो' प्रयोगांचा प्रश्न प्रतिष्ठेचा बनवून होमिओपॅथीला वाळीत टाकल्यामुळे ते शक्य होत नसावे. डॉ. सुखटणकरांच्या मतानुसार बहुतेक सर्व होमिओपॅथीक औषधे आणि बाराक्षार ही इम्यून रीअ‍ॅक्शन करेक्टर असतात व ठराविक लक्षणे कमी करतात. तरी मग फेरम फॉसमुळे मेगॅलोब्लास्टीक अ‍ॅनिमिया कसा काय ताब्यात येईल यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हते. अ‍ॅनास्थेशियातून उद्भवणारी पोस्ट ऑपरेटीव्ह लक्षणांवर (उदा. उलट्या वगैरे) होमिओपॅथीने मात करता येते आणि आधुनिक वैद्यकाने होमिओपॅथीने साहाय्यक प्रणाली म्हणून वपरावी अशा मताचे ते होते. कापणे भाजणे इ. किरकोळ जखमांवर मी, सौ आणि पत्नी असे तिघेही घरच्या घरी होमिओपॅथीकच इलाज घेतो. आर्थरायटीसचे रुग्ण जर ऑर्थोपेडीक सर्जनकडे गेले तर त्याला सर्रास वेदशामकांचा आणि अ‍ॅडरीनल हार्मोन्सचा मारा करतात. आधुनिक वैद्यकातच वेगळी औषधयोजना असूनही. वॉटर मेमरी, होमिओपॅथी वगैरे संकल्पना पूर्ण थोतांड आहे असे मानण्याचे काही कारण नाही. गेल्या काही वर्षात याविषयातील आंतराष्ट्रीय संशोधनाबल व कोणत्यातरी प्रतिष्ठित पारितोषिकाबद्दल एक त्रोटक लेख मराठी वृत्तपत्रात वाचनात आला होता. संदर्भ सापडला की देईन. परिपूर्णतेचा ध्यास घेतलेले विज्ञान हे नेहमी अपूर्णच असते. प्रत्येक संशोधनाला मर्यादा असतात व त्यांचा स्पष्ट उल्लेख प्रत्येक प्रबंधात शेवटी 'लिमिटेशन्स ओफ थिस वर्क अ‍ॅन्ड स्कोप फॉर फर्दर स्टडीज' मध्ये केलेला असतोच. सबअ‍ॅटोमिक पातळीवर रासायनिक संशोधन पुढे कधीतरी होईल आणि नव्या संकल्पना नवे प्रश्न उभे राहतील.

In reply to by सुधीर कांदळकर

सुबोध खरे Wed, 07/20/2016 - 12:35
कांदळकर साहेब इतकं सोपं असतं तर मी नसता का लिहिलं ibs बद्दल. आपली बरीच विधाने चुकीच्या गृहीतकांवर आधारित आहेत. उदा. मोठ्या आतड्याच्या पहिल्या भागात ज्याला कोलॉन म्हणतात. अख्ख्या मोठ्या आतड्यालाच कोलॉन म्हणतात. IBS साधारण १०-१२ वर्षाच्या खालील मुलाला होत नाही तेंव्हा ३-४ वर्षाच्या मुलाला तो झाला असे म्हणणे फारच धारिष्ट्याचे आहे मग तो दोन दिवसात होमियोपॅथी ने बरे होणे कसे शक्य आहे. आपल्याला होमियोपॅथी ची औषधे घ्यायची तर घ्या पण चुकीची माहिती तरी प्रसारित करू नका एवढेच म्हणेन.

In reply to by आनंदराव

सुबोध खरे Tue, 08/02/2016 - 09:51
श्री "साधा मुलगा" यांनी IBS बद्दल वरील दुवा पाठवला आहे. आपण वाचून पहा. माहिती चांगली आहे. http://dic.mspcindia.org/Download/newsletter/IBS_MAR.pdf श्री साधा मुलगा याना धन्यवाद.

पिलीयन रायडर गुरुवार, 07/21/2016 - 21:23
कालच एक बातमी कळाली. आमच्या ओळखीच्या एक बाईंच्या मुलीचे नुकतेच निधन झाले. ती केवळ ३५-४० वयाची होती. अत्यंत हुषार. गळ्याशी एक गाठ आल्याचे निमित्त झाले. एक होमिओपथीचे डोक्टर त्यांच्या अगदी पुर्वीपासुन ओळखीचे होते. हिचा त्यांच्यावर फार विश्वास. तब्येत खालावत गेली, अंगावर रिअ‍ॅक्शन आणि जुलाब-उलट्या, खाल्लेलं पचत नाही अशी अवस्था तरीही डोक्टर बदलला नाही. तो हुषार माणुसही "होऊ दे जुलाब.. रोग बाहेर पडतोय" असलं काही तरी म्हणायचा. अगदी हाताबाहेर गेलं तेव्हा अ‍ॅडमिट केलं. पण १-२ दिवसातच ती गेली. लहान सहान गोष्टींना वेगवेगळे उपचार करणं एकवेळ ठिक आहे. पण इतकं सिरीयस असताना माणसाने कधीही मॉडर्न मेडिसिन शिवाय दुसरा मार्ग धरु नये असे माझे स्पष्ट मत झाले आहे.

सुधीर कांदळकर Fri, 07/22/2016 - 06:39
@ डॉ. खरे साहेब आपल्याला होमियोपॅथी ची औषधे घ्यायची तर घ्या पण चुकीची माहिती तरी प्रसारित करू नका एवढेच म्हणेन. हे पटले आणि आवडले देखील म्हणून माझ्याकडची माहिती पुन्हा तपासून पाहिली. १३-१४ वर्षापूर्वी एक प्रतिष्ठित मराठी वृत्तपत्रात एक बातमी वाचली होती. ‘अतिविरळ द्रावणाच्या संश्लेषणाची पद्धत सापडली. शास्त्रज्ञांना नोबेल. आता होमिओपॅथीतल्या व्यावसाययिकांना हायसे वाटले असेल’ अशा अर्थाची बातमी होती. अतिविरळ द्रावणातील विरघळलेल्या औषधी पदार्थाचे क्वान्टीटेटीव्ह विश्लेषण आता करता येईल असे वाटावे असा या बातमीचा रोख होता. (दुर्दैवाने मी मुंबईतील नोकरीत धकाधकीत होतो. मी औषधनिर्मिती क्षेत्र सोडल्याला साताठ वर्षे लोटली होती. त्यामुळे ते कात्रण जपून वगैरे ठेवायला गेलो नाही.) म्हणून काल डॉ. खरेसाहेबांच्या आवाहनाला अनुसरून आंजावर गेल्या इ.स. २००० पासूनच्या रसायनशास्त्रातल्या नोबेल लॉरिएटसची आणि त्यांच्या संशोधनविषयाची जुजबी माहिती काढली. आणि त्यातील एकही विषय या शिळ्या बातमीला पूरक नव्हता. म्हणून होमीओपॅथिक संशोधनाबद्दल गुगलून काही सापडते का ते पाहिले. तिथेही काही आढळले नाही. माझ्यासाठी हा एक मोठा धक्का आहे. मग होमिओपॅथीबद्दल खालील प्रश्न मनात उभे राहिले: १. होमिओपॅथीचे उद्गाते डॉ. हानिमान हे ऍव्होगॅड्रोच्या अगोदरचे. त्यानंतर ऍव्होगॅड्रोचे संशोधन पुढे आले. या संशोधनाचा वापर होमिओपॅथीने का करून घेतला नाही? म्हणूनच मग वॉटर मेमरी वगैरे धूसर हायपोथेसिस निर्माण झाल्या. २. औषधाचे द्रावण जेवढे विरळ तेवढी द्रावणाची पॉवर जास्त हा दावा आधुनिक विज्ञानाला छेद देणारा आहे. ऍव्होगॅड्रोची उपपत्ती आणि सध्याची स्पेक्ट्रोफोटोमीटरसारखी अत्याधुनिक साधने यांचा उपयोग करून कालानुरूप बदल किंवा पॉवर आणि विरलता याची वैज्ञानिक सांगड आपल्या औषधनिर्मितीशास्त्रात होमिओपॅथीने का बरे केले नाहीत? ३. विज्ञानातील कोणत्याही शाखेने इतर क्षेत्रातील आधुनिक प्रगतीचा उपयोग करून आपल्या शाखेचा विकास करावा की जुनेच कालबाह्य विज्ञान कवटाळून बसावे? तसे असेल हा वैज्ञानिक मूलतत्त्ववाद - फंडामेन्टॅलिझम नव्हे काय? असे अनेक प्रश्न. या संस्थळावर होमिओपॅथीची बाजू घेणार्‍यांना झोडपले जातांना वाचून मला वाईट वाटत असे. पण ते सकारणच आहे असे आता वाटू लागले आहे. परंतु माझे चि. संदर्भातले वरील अनुभव खरे आहेत हे मी प्रामाणिकपणे नमूद करू इच्छितो. डॉ. प्रकाश सुखटणकर आता हयात असते तर त्यांना मी भरपूर छळले असते हे नक्की. असो. वादे वादे .... या उक्तीमुळे माझे अज्ञान कमी झाले आणि डॉ. खरेसाहेबांबद्दलचा आदर दुणावला. धन्यवाद

In reply to by सुधीर कांदळकर

गामा पैलवान Fri, 07/22/2016 - 11:21
सुधीर कांदळकर, तुमच्याशी शंभर टक्के सहमत आहे. होमियोपथीची आधुनिक पद्धतीने (डबल ब्लाईंड वा तत्सम सांख्यिकीय कसोट्या वापरून) मापनचिकित्सा स्पष्ट व्हावी. पुढे काही शतकांनी लोकं आजच्या घडीच्या सर्व उपचारपद्धतींना 'प्राचीन आयुर्वेदिक' असं सरसकट नाव देतील! आ.न., -गा.पै.

In reply to by सुधीर कांदळकर

पिलीयन रायडर Fri, 07/22/2016 - 19:27
मिपाच्या इतिहासात इतका प्रांजळपणा कधी पाहिला नव्हता.. छान वाटलं.. इतक्या काथ्याकुटातुन कधीतरी कुणाचं तरी मत बदललं. अखेर खरेंनाच हे जमले! =))

In reply to by सुधीर कांदळकर

सुबोध खरे Fri, 07/22/2016 - 20:18
कांदळकर साहेब आपला प्रांजळपणा आवडला. मी तितका कर्मठ नाही कि होमियोपॅथी( किंवा इतर दुसरी चिकित्सा पद्धती) वापरूच नका असे म्हणणारा. माझे म्हणणे फक्त एकच आहे कि ज्या रोगांना आधुनिक वैद्यकशास्त्रात औषध आहे किंवा जे रोग गंभीर किंवा जीवघेणे आहेत त्यावेळेस तुम्ही होमियोपॅथी सारख्या "तत्वज्ञाना"वर आधारित चिकित्सापद्धती कडे जाऊ नका. बऱ्याच वेळेस गोष्टी घडतात पण त्याचा कार्यकारण भाव सांगता येत नाही. ( याचा अर्थ दुर्दैवाने होमियोपॅथ उलट घेतात कि बघा आम्ही हेच सांगत होतो). CHALAZION ( रांजणवडी सदृश) किंवा चामखिळीसारखे आजार मी होमीओपॅथीने बरे झालेले पाहिले आहेत. (काकतालीय न्यायहि असेल). त्याच बरोबर कित्येक रुग्णांत (काही उदाहरणे दिली आहेत त्याप्रमाणे) जीवघेण्या आजारात फार दिवस उशीर केल्यामुळे अक्षम्य अशी हेळसांड झालेली आणि रोग हाताबाहेर गेलेला पाहीलेला आहे. त्यामुळे मी त्या बाबतीत साधारणपणे टोकाची भूमिका घेत नाही. टोकाची भूमिका घेतली तर लोक तुमच्या कडून समजावून घेण्याऐवजी मनाची कवाडे बंद करतात हे मी अनुभवाने शिकलो आहे. तुम्ही रोगाचे अचूक निदान करून घ्या. तो गंभीर किंवा जीवघेणा नाही याची खात्री करा. आणि मग आपल्याला कोणते औषध घ्यायचे आहे ते ठरवा असा माझा सर्वसाधारण सल्ला असतो. हृदयाचे काम जेमतेम २० % चालले असेल आणि हट्टाने होमियोपॅथीच घेतली तर फोटो भिंतीवर चिकटवायला वेळ लागणार नाही हे ज्याला समजून घ्यायचंच नसेल त्याचे आपण काहीही करू शकत नाही. काही वेळेस रोग आपणहून बरा होणार असतो( उदा बीजांडकोशातील फॉलीक्युलर सिस्ट) तेंव्हा रुग्णाला तुम्ही काहीही करू नका हा सल्ला मानवणारा नसतो. तेंव्हा अशी औषधे घेतल्याने फरक पडत नाही. कारण दोन तीन महिने लागणार आहेत हेरुग्णाने स्वतः स्वीकारलेले असते. त्याकालावधीत या सिस्ट आपणहून बऱ्या होतातच. आणि रुग्णाला पण औषधोपचार केल्याचे समाधान असते. ( बऱ्याच लोकांना काहीच न करणे हा हलगर्जीपणा वाटत असतो). असो.

टीपीके Sat, 07/23/2016 - 11:41
सर्वात सूक्ष्म म्हणजे विषाणू किंवा व्हायरस. हा सजीव आणि निर्जीव यांच्या सीमेवर असलेला, जीव आणि रसायन यामधील अवस्था. याचे स्फटिकिकरण करता येते आणि हे स्फटिक युगानू युगे तसेच राहू शकतात. हा फक्त दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागात सक्रिय होऊ शकतो अन्यथा एखाद्या रसायनासारखा मृतप्राय असतो. उदा पोलियो एड्स कांजिण्या इ
मग , जर व्हायरस मरत नाही, तर पोलियो निर्मूलन केले म्हणजे नक्की काय केले ? उद्या १००० वर्षांनंतर पोलियोची लस बंद केली तर पोलियो परत होऊ शकतो का त्या पिढीला? की माझाच थोडा संकल्पनांमध्ये गोंधळ होतो आहे

In reply to by टीपीके

सुबोध खरे Mon, 07/25/2016 - 10:12
पोलियो ची लस तोंडावाटे दिली के ते विषाणू तुमच्या आतड्यात राहतात आणि तेथे त्यांची वाढ होते आणि कितीतरी पटीने त्यांचे प्रजोत्पादन होते. फरक एवढाच आहे की लस तयार केलेले विषाणूमुळे आपल्याला रोग( पाय लुळे पडणे इ) होत नाही. हेच विषाणू आपल्या शौचावाटे परत वातावरणात मिसळत असतात आणि तेच परत आपल्या पाण्यातून किंवा अन्नातून आपल्या पोटात जात असतात आणि त्यातून परत आपल्याला त्यांच्या विरुद्ध प्रतिकार करता येते. मोठ्या प्रमाणात लसीकरण केल्यामुळे जगातील बहुतेक देशांमध्ये रोगकारक विषाणूंची जागा अशा लसीकृत विषाणूनि घेतलेली आहे. तीस वर्षांपूर्वी दिसणारी बिया असलेली द्राक्षे आता जवळजवळ नामशेष होऊन आता मुख्यत्वेकरून बिनबियांची द्राक्षे दिसतात तसे. एक बातमी http://www.ndtv.com/telangana-news/polio-virus-resurfaces-in-hyderabad-after-5-years-1419179 अर्थात जगातील काही (१०-१२) प्रयोगशाळांमध्ये अजूनही लस तयार करण्यासाठी आवश्यक असलेले विषाणू आणि काही लसीचे अब्ज डोसेस साठवून ठेवलेले आहेत. जर काही कारणाने परत पोलियोचा प्रादुर्भाव झाला तर हि एक सुरक्षा म्हणून ठेवलेली प्रणाली आहे.

वरील काही लोकांनी होमीयोपॅथी/आर्युवेदाला वैज्ञानिक कसोटीवर सिद्ध करता येत नाही असा दावा करून सरळ बोगस म्हणून एकतर्फी निर्णय जाहीर केला. कुणा एक दोघांच्या चुकीच्या प्रॅक्टीस ने संपुर्ण शास्त्र कस काय बोगस ठरत ! ह्या न्यायाने तर पुण्या मुंबईचे अनेक हॉस्पीटल कम कत्तलखान्यांचा कारभार बघता अॅलोपॅथी वर तर फार पूर्वीच बंदी घालायला पाहिजे होती. होमीयोपॅथीचे जनक, जर्मनीचे डॉ. हनेमान(Hahnemann) हे स्वतः अॅलोपॅथीचे डॉक्टर (MD) होते. अज्ञानातुन सुर्यावर थुंकण्यापुर्वी एकदा हे जरूर वाचा https://en.m.wikipedia.org/wiki/Samuel_Hahnemann#Creation_of_homeopathy माझ्या मते होमीयोपॅथी/अॅलोपॅथी/आर्युवेद ह्या आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत व प्रत्येकीचे जसे फायदे आहेत तसे मर्यादा पण आहेत.

In reply to by महेश श्री देशमुख

सुबोध खरे Mon, 07/25/2016 - 10:27
Christian Friedrich Samuel Hahnemann (German: [ˈhaːnəman]; 10 April 1755[1] – 2 July 1843) तो काळ कुठला होता आणि तेंव्हा "ऍलोपॅथी"( Allopathic medicine is an expression commonly used by homeopaths and proponents of other forms of alternative medicine to refer to mainstream medical use of pharmacologically active agents or physical interventions to treat or suppress symptoms or pathophysiologic processes of diseases or conditions.[1] The expression was coined in 1810 by the creator of homeopathy, Samuel Hahnemann (1755–1843) स्रोत विकी https://en.wikipedia.org/wiki/Allopathic_medicine काय होती हे पहा. आज २०० वर्षाचा काळ उलटून गेला आणि आधुनिक वैद्यकशास्त्र आपल्या जुन्या चुकीच्या गृहीतकांना प्रमेयाना आणि सिद्धान्ताना तिलांजली देऊन आणि जी गृहीतके काळाच्या ओघात सिद्ध झाली त्यांना बरोबर घेऊन संगणकाचा वापर करून कुठच्या कुठे गेले. पण होमियोपॅथी आजही त्याच जुन्या गृहीतकांना कवटाळून दोनशे वर्षांपूर्वी च्या काळातच वावरत आहे. बाकी आपला विश्वास नसेल तर आधुनिक औषधांच्या आणि डॉक्टरांच्या वाटेल जाऊच नका. उगाच साईड इफेक्ट्सने त्रास होईल.

अमितदादा Wed, 07/27/2016 - 14:35
खरे साहेब खूप सुंदर लेख. एक अवांतर प्रश्न म्हणा किंवा माहिती म्हणा , 3 वर्षांपूर्वी एका प्राध्यापकाने mitochondrion बद्दल आस सांगितलं होतं की हा एक बॅक्टरीया आहे आणि खूप हजारो वर्षांपूर्वी तो सजीवांच्या सेल मद्ये मिसळून एकरूप जाला. आता तो आपल्या सेल चा powerhouse आहे. विकिपीडिया वरती माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याला पुष्टी असलेली एक थेअरी आहे जी सर्वसामान्य आहे. असे कुठले दुसरे उदाहरण आहे का शरीरामध्ये ? आणखी एक अवांतर माहिती काहि वर्षापूर्वीआस वाचनात आलेलं कि हैद्राबाद मध्ये फार्मसीटीकल कंपन्यांची ड्रेनेज जिथं एकत्र मिळते तिथे अशा जीवांणूंची वाड झालेली कि जी उपलब्द अँटिबायोटिक्स ना दाद देत नाही!

सामान्य वाचक Tue, 08/02/2016 - 16:26
माझ्यापुरते म्हणाल तर प्रतिजैवके खूपच कमी वेळा सर्दी खोकला ताप पित्त थकवा इ इ life threatening नसलेल्या विकारांना आयुर्वेदिक उपचार आणि गंभीर विकारांना आलोपॅथी

sudhir Mon, 08/29/2016 - 17:23
जीवाणु आणि विषाणु चे साध्या सोप्या भाषेत वर्गीकरण. डॉक्टर आपण afmc मधे mbbs md झालात असे समजले,तरी आपण आपल्या शैक्षणिक जिवनावर आधारित एखादा लेख लिहावा.

sudhir Mon, 08/29/2016 - 19:59
जीवाणु आणि विषाणु चे साध्या सोप्या भाषेत वर्गीकरण. डॉक्टर आपण afmc मधे mbbs md झालात असे समजले,तरी आपण आपल्या शैक्षणिक जिवनावर आधारित एखादा लेख लिहावा.

sudhir Mon, 08/29/2016 - 20:00
जीवाणु आणि विषाणु चे साध्या सोप्या भाषेत वर्गीकरण. डॉक्टर आपण afmc मधे mbbs md झालात असे समजले,तरी आपण आपल्या शैक्षणिक जिवनावर आधारित एखादा लेख लिहावा.

sudhir Mon, 08/29/2016 - 23:02
जीवाणु आणि विषाणु चे साध्या सोप्या भाषेत वर्गीकरण. डॉक्टर आपण afmc मधे mbbs md झालात असे समजले,तरी आपण आपल्या शैक्षणिक जिवनावर आधारित एखादा लेख लिहावा.

कायरा Wed, 08/31/2016 - 00:21
प्रतिजैविके बद्द्ल उत्तम माहिती. धन्यवाद ड़ाॅक्टर. आता थोडे अवांतर. होमिओपॅथीचा काही इफेक्टच मिळत नाही त्यामुळे साइड़ इफेक्टचा प्रश्नच उद्भवत नाही. अर आजार बरा होणे तर दूरच राहिले उलट गोळ्या प्रतिकार शक्ती वाढते असे जे म्हटले जाते त्यात सुद्धा काही तथ्य नाही. आजार वाढतच जातो. हळुहळु गुण येईल अशी खोटी आश्वासने देत पेशंट पकडून ठेवतात. पेशंट स्वर्गात पोहोचला तरी यांचा गुण येणे बाकी असते.