मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रतिजैविके समज आणि गैरसमज.

सुबोध खरे · · काथ्याकूट
प्रतिजैविके समज आणि गैरसमज. सर्वप्रथम सूक्ष्म जीव म्हणजे काय? सर्वात सूक्ष्म म्हणजे विषाणू किंवा व्हायरस. हा सजीव आणि निर्जीव यांच्या सीमेवर असलेला, जीव आणि रसायन यामधील अवस्था. याचे स्फटिकिकरण करता येते आणि हे स्फटिक युगानू युगे तसेच राहू शकतात. हा फक्त दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागात सक्रिय होऊ शकतो अन्यथा एखाद्या रसायनासारखा मृतप्राय असतो. उदा पोलियो एड्स कांजिण्या इ यानंतरचे काही जीव रिकेटसिया आणि क्लॅमिडिया हे जिवाणू आणि विषाणू यांच्या मध्ये आहेत. यानंतर येतात ते जिवाणू (म्हणजे बॅक्टेरीया) हे एक पेशीय जीव असून यात चयापचय क्रिया (metabolism) चालू असते. उदा स्टॅफिलोकॉकस, टायफॉईड याचे जंतू. या बरोबरच एकपेशीय बुरशीची निर्मिती झाली. उदा यीस्ट/ किणव जगाची सुरुवात झाली तेंव्हा सर्व प्रथम एक पेशीय वनस्पती आणि प्राणी तयार झाले. आणि त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली. यात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपाय शोधण्यास सुरुवात केली. जिवाणू आणि बुरशी (fungus) यांनी त्याच अन्नासाठी स्पर्धा सुरू केली यावेळेस बुरशीच्या पेशींनी जिवाणूची वाढ होऊ नये म्हणून काही गुंतागुंतीची रसायने निर्मिती सुरू केली.आणि ही रसायने त्या आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचे पाझरून तेथे असणाऱ्या जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करीत हीच रसायने म्हणजे अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविके. यातील पाहिले प्रतिजैविक म्हणजे पेनिसिलीन. याचा शोध डॉ अलेक्झांडर फ्लेमिंग यांना योगायोगानेच लागला. जिवाणू जगत असताना त्याच्या पेशीभिंतीची(cell wall) ची झीज चालू असते. ही झीज तो जिवाणू दुरुस्त करीत असतो. पेनिसिलीन ही झीज दुरुस्त करण्याच्या कामात लागणाऱ्या रसायनांच्या कामात अडथळा आणते. यामुळे जिवाणूच्या भिंती सच्छिद्र बनतात त्यामुळे त्याची पेशी बाहेरील अतिरिक्त पाणी शोषून फुगून येते आणि जिवाणूंचा मृत्यू होतो. प्राण्यांच्या शरीरात पेशींना असलेली भिंत नसतेच तर फक्त एक पटल (membrane) असते त्यामुळे पेनिसिलिनचा प्राण्यांच्या( मानवाच्या) शरीरावर अजिबात परिणाम होत नाही. यामुळे पेनिसिलीन आणि त्याच्या गटातील किंवा तशाच तर्हेचे असलेलं केफ्लॉस्पोरीन गटातील प्रतिजैविकांचा मानवी शरीरावर परिणाम अत्यंत नगण्य होतो. १) विषाणू हे दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागातच सक्रिय असल्यामुळे त्यांच्यावर प्रतिजैविकांचा मुळीच परिणाम होत नाहीत. यामुळेच प्रतिजैविके ही फक्त जिवाणूजन्य रोगात वापरली जातात विषाणूजन्य रोगात नाही. २) आपल्याला झालेला रोग हा जिवाणूजन्य आहे की विषाणूमुळे आहे की बुरशीमुळे झालेला आहे हे समजून येण्यासाठी साडेपाच वर्षांचा एम बी बी एस हा कोर्स केलेले आणि त्यावर अनेक वर्षे अनुभव घेतलेले डॉक्टर असतात. दुर्दैवाने केवळ लक्षणे पाहून लोक स्वतः औषधे घेतात, कारण मागच्या वेळेस शेजारच्या गण्याला किंवा आपल्या बंडूला अशाच लक्षणांसाठी आपल्या डॉक्टरने हीच औषधे दिलेली असतात. काही लोक मागच्या वेळेस हगवण लागली असताना डॉक्टरांनी एंटेरो क्विनॉल किंवा तत्सम औषध दिले होते म्हणून दुसर्या वेळेसही "स्वतःच" ते औषध घेतात. दुर्दैवाने त्याच्या मागील कार्यकारण भाव माहीत नसल्याने ते काही वेळेस होमियोपथिक डोस घेतात जो झुरळाला किंवा डासाला पुरेल इतका असतो नाहीतर व्हेटरनरी डोस घेतात. ६० किलोच्या माणसाला लागणारा डोस ऐवजी ४०० किलोच्या रेड्याला लागणारा डोस घेतात. ३) किंवा जवळच्या केमिस्टकडे जाऊन त्याच्या कडून घसा फार दुखतो किंवा हगवण लागली आहे या लक्षणांसाठी अशी औषधे मागून घेतात. केमिस्ट सुद्धा आपलं धंदा चालवण्यासाठी किंवा स्वस्तात लोकप्रियता मिळवण्याच्या मागे असल्याने सर्रास अशी औषधे देतात. १००% डॉक्टर असे केमिस्टकडे अर्धवट औषधे घेऊन आलेले रुग्ण रोज पाहत असतात आणि जवळ जवळ १००% केमिस्ट अशी औषधे देतात. अर्ध्य हळकुंडाने पिवळे होण्याचे यापेक्षा दुसरे उदाहरण नाही. १० नंतर २ वर्षे डिप्लोमा केलेले (डी. फ़ार्म) केमिस्टच्या दुकानात बसून डॉक्टरकी करत असतात. ना त्यांना त्यातील रसायन शास्त्राचा गंध असतो ना त्यामागील जीवशास्त्रीय प्रक्रियेचा. ४) लोक सुद्धा अशी औषधे का घेतात. -सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे डॉक्टरच्या फी चे पैसे वाचवणे. यानंतरची कारणे -- तेथे लागणारा वेळ वाचवणे आणि कधी कधी डॉक्टर बाहेरचे अरबट चरबट खाल्ले, दारू पिऊन नको त्या गोष्टी केल्या म्हणून आपली हजेरी घेतील या भीती मुळे. ५) मुद्दामहून पसरविले गैरसमज - बहुसंख्य होमियोपॅथ (८०% च्या वर आपल्या पाथीचा प्रचार करण्यासाठी सर्रास असे सांगताना आढळतात की ऍलोपॅथीचे डॉक्टर अँटीबायोटिक्स देऊन रोग "तिथल्या तिथे दाबून टाकतात". होमियोपॅथी मध्ये आम्ही रोगाचा मुळापासून नायनाट करतो म्हणून आमची औषधे स्लो असली तरी परिणामकारक असतात. आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेषा लहान करण्याची ही हीन प्रवृत्ती आहे. याबद्दल मला अजून काही म्हणायचे नाही. ६) अँटीबायोटिक्स "उष्ण" पडतात. आयुर्वेदाच्या वैद्यांनी हा एक जाणून बुजून पसरविलेला गैरसमज आहे. ऍमॉक्सीसिलीन सारखेच प्रतिजैविक साधारण २५० ते ५०० मिग्रॅ (कॅप्सूल) दिवसात तीन वेळेस दिले जाते. परंतु गनोरिया सारख्या गुप्तरोगावर जेंव्हा रुग्ण परत येण्याची शक्यता कमी असे तेंव्हा आम्ही एक वेळेस ३.५ "ग्राम" म्हणजे २०५ मि ग्रॅम च्या १४ कॅप्सूलच्या समकक्ष औषध रुग्णास द्रवस्वरूपात देत असू शिवाय ते औषध (शरीरात जास्त काळ राहावे) मूत्रपिंडातून बाहेर पडू नये म्हणून २ ग्रॅम प्रोबेनेसीड हे दुसरे औषद्ध देत असू. शेकडो रुग्णांना असा एकच डोस देऊन त्यांचे गुप्त रोग बरे झालेले मी स्वतः पाहिलेले आहेत. सांगण्याचे तात्पर्य हे की औषध "उष्ण" पडते हा मुद्दाम पसरवलेला गैरसमज आहे. ७) आम्हाला अतिशय अशक्तपणा, चक्कर येणे, घाम येणे उलटीची संवेदना होणे किंवा तोंडाला चव नसणे अशी लक्षणे औषध घेतल्यावरच का होतात? आम्ही काय खोटं बोलतो का असे रुग्ण विचारतात. याचे साधे उत्तर असे आहे की आपल्या शरीरात जंतूंनी प्रवेश केलेला असतो तुमची प्रतिकार शक्ती जेंव्हा जंतूंचा नाश करण्यास कमी पडते तेंव्हाच तुम्हाला रोग होतो आणि हे शरीरात शिरलेले जंतू दर २४ तासात दुप्पट या वेगाने प्रजनन करीत असतात. तुमच्या शरीरातील खर्वनिखर्व जंतू जेंव्हा प्रतिजैविके दिल्यावर मृत्यू पावतात तेंव्हा त्यांच्या पेशीतील विषे तुमच्या शरीरात पसरतात. आणि यामुळे तुम्हाला अतिशय आजारी असल्याची ही सर्व लक्षणे दिसू लागतात. देवनारच्या कचरा मुंबई भर पसरलं तर मुंबईची काय परिस्थिती होईल तशीच ही परिस्थिती आहे. जोवर या सर्व कचर्याचा निचरा होत नाही तोवर आपल्याला आजारी असल्याची संवेदना असते. दुर्दैवाने बहुसंख्य आधुनिक डॉक्टरना या गोष्टी समजावून सांगायला (आणि रुग्णांना समजावून घ्यायला) वेळच नसतो. यामुळे काय होते रुग्ण दोनच दिवस औषध घेऊन बंद करतात आणि रोगाचे जंतू पूर्ण नष्ट व्हायच्या अगोदरच प्रतिजैविक बंद केल्याने शरीराच्या प्रतिकारशक्तीवर जंतुनाशाच्या अतिरिक्त कामाचा ताण पडतो आणि रुग्णाला अजूनच अशक्तपणा जाणवतो. या आगीत तेल ओतायला आणि आपली पोळी भाजून घ्यायला होमियोपाथ किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञ तयारच असतात. ८) प्रतिजैविके ही शेवटी रसायनेच असतात त्यांचा आपला जसा परिणाम असतो तसे काही दुष्परिणाम असतोच. पण हे साईड इफेक्ट्चे तुणतुणे इतर पॅथीचे लोक इतके वाजवतात की लोकांना तेच जास्त खरे वाटू लागते. काही प्रतीजैविके यकृत (लिव्हर) मूत्रपिंड (किडनी) वर परिणाम करतात. त्यामुळे कोणत्या रोगात कोणते औषध घ्यायचे हे सुशिक्षित डॉक्टर ला नक्की माहिती असते. अर्ध शिक्षित किंवा अशिक्षित केमिस्ट कडून किंवा सर्वज्ञ रुग्णाने स्वतः अशी प्रतिजैविके घेतल्यास त्याला जबाबदार कोण? "अँटी बायोटिक च्या सेवनाने कीडनि निकामी होऊ शकते".हे अत्यंत अपुऱ्या माहितीवर केलेले अज्ञान मुलक विधान आहे. हे जर खरे मानले तर मूत्रपिंडाच्या संसर्गाला(urinary tract infection-- UTI ) कोणते औषध देणार? हा रोग ३३% स्त्रियांना केंव्हाना केंव्हा तरी होतोच. ९) औषध कंपन्या , केमिस्ट आणि डॉक्टर यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. ही गोष्ट "नवीन" नाही. पण यात "अँटीबायोटिकच जास्त" घेतले जाते असे नसून बऱ्याच वेळेस झिंक सेलेनियम सारखी सूक्ष्म द्रव्ये किंवा जीवनसत्त्वे आणि खनिजे जिनसेंग, स्पायरुलीना सारखी सुपर फूड याचा मोठा वाटा आहे.शिवाय ही औषधे जीवनावश्यक वर्गात मोडत नसल्याने त्याच्या किमतीवर नियंत्रण नाही. याविरुद्ध बरीच प्रतिजैविके हिची जीवनावश्यक श्रेणीत असल्याने त्यांच्या किमतीवर निर्बंध आहेत. अशा टॉनिक सारख्या औषधांचा डोस कितीही दिवस देता/ घेता येतो. अँटीबायोटिक तुम्ही फार तर पाच दिवस घ्याल. यानंतर एक फार महत्त्वाचा विषय मी मांडू इच्छितो-- "अँटी बायोटिकला प्रतिकार करणाऱ्या जिवाणूंची वाढ" मुळात तुम्ही जेंव्हा दोन दिवस प्रतिजैविक घेता तेंव्हा सुरुवातीला त्याला सर्वात जास्त संवेदनशील(SENSITIVE) असणारे जिवाणू मरतात आणि जे जिवाणू त्या प्रतिजैविकाला कमी संवेदनशील(resistant) असतात ते जिवंत राहतात. यानंतर आपण जर प्रतिजैविक बंद केले तर हे कमी संवेदनशील(resistant)जिवाणू शरीरात जिवंत राहतात आणि त्यांची पुढची पिढी मुळात त्या प्रतिजैविकास कमी प्रतिसाद देणारी (resistant)जन्मास येते. ही प्रक्रिया वारंवार घडल्याने प्रतिजैविकास अजिबात दाद ना देणारे जिवाणू शिल्लक राहतात आणि जे संवेदनशील असतात ते जिवाणू नष्ट होतात. असे करत करत अनेक प्रतिजैविकाना दाद न देणारे(multi drug resistant) जिवाणू नैसर्गिक निवड तत्वाने(natural selection) जिवंत राहतात. अशा जिवाणूंचा फार वेगाने प्रसार होतो. अशाच जिवाणूची एक जात म्हणजे NDM १ पहा https://en.wikipedia.org/wiki/New_Delhi_metallo-beta-lactamase_1 १०) एकंदरीतच अँटी बायोटिक चे अनेक वाईट दूरगामी परिणाम असतात हा परत बऱ्याच इत्तर पॅथीच्या व्यावसायिकांनी जाणून बुजून पसरविलेला अत्यंत दुर्दैवी गैरसमज आहे. १९४२ मध्ये पेनिसिलिनचा वापर सुरू होण्याच्या अगोदर लोक शेकड्यानीच नव्हे तर हजारांनी प्लेग, कॉलरा, हगवण किंवा विषमज्वर या रोगांनी मरत होते. या काळात आयुर्वेद किंवा होमियोपॅथी सारख्या इतर पद्धती होत्याच परंतु त्यांना या कोणत्याही रोगाचा प्रसार थांबवता आला नाही ही वस्तुस्थिती आहे. कित्येक अकाली मृत्यू त्यांना थांबवता आले नाहीत ही वस्तुस्थिती नाकारून ते एकंदरीतच अँटी बायोटिकला शिव्या देताना आढळतात यापेक्षा दैवदुर्विलास दुसरा नसेल. बालविधवांच्या पिढ्याच्या पिढ्या अशा रोगांमुळे दुःखात खितपत पडलेल्या अशा कथा त्या कालच्या साहित्यात सहज वाचायला मिळतात.प्रत्येक एकत्र कुटुंबात अशी एखादी बालविधवा सर्रास असे. प्रतिजैविकांचा अतिरिक्त वापर करणार्यात केवळ इतर पॅथीचे व्यावसायिक केमिस्ट आणि स्वतः औषधे घेणारे रुग्णच नव्हे तर आधुनिक डॉक्टरही दिसतात याची काही कारणे १) रुग्णाला आजच्या झटपट काळात एक दिवसात बरे व्हायचे असते त्यामुळे तो डॉक्टरवर दबाव टाकताना दिसतो. :"डॉक्टर परवा माझे प्रेझेन्टेशन आहे तेंव्हा परवापर्यंत काहीही करून मला बरे करा. नवीन व्यवसाय सुरू केलेल्या डॉक्टरला याला नकार देणे शक्य नसते. आणि जुन्या डॉक्टरला नेहमी येणार माणूस असेल तर त्याला नकार देणे वैयक्तिक संबंधामुळे शक्य नसते २) जेंव्हा रोग निदान नक्की नसते की हा विषाणूमुळे रोग झाला आहे का जिवाणूमुळे अशा वेळेस डॉक्टर स्वतःच्या सुरक्षिततेचा उपाय( to be on safer side) अँटीबायोटिकचा एक कोर्स लिहून देतात.रुग्ण दोन दिवसात बरा झाला तर अर्ध्या वेळेस स्वतः हून औषध थांबवतो. ३) मोठ्या शल्यक्रियेनंतर सर्जन परत उगाच धोका( why take chances) नको म्हणून एकदम उच्च दर्जाचे प्रतिजैविक देतात. antibiotic resistanceची चिंता मी कशाला करू हा विचार त्यामागे असतो. ४) दीड शहाणे किंवा सर्वज्ञ रुग्ण डॉक्टरवर दबाव टाकतात आणि सांगतात की मला चांगले अँटी बायोटिक द्या. अशा वेळेस डॉक्टर "माझ्या बापाचे काय जाते" म्हणून लिहून देतात. हा विषय कित्येक पी एच डी करता येईल इतका खोल आणि विस्तृत आहे. त्यात खोलवर जाण्याची माझी लायकी नाही यास्तव इथेच थांबतो.

वाचने 129749 वाचनखूण प्रतिक्रिया 349

एस Wed, 07/06/2016 - 20:02
उत्तम लेख. (फारच अवांतर - अशाच आमच्या फॅमिली डॉक्टरांनी गेली कित्येक वर्षे चालू असलेला दवाखाना बंद करून निवृत्ती स्वीकारली तेव्हा आता अशी सखोल व योग्य माहिती कोण देणार असे वाटून दु:ख झाले.)

मिसळपाव Wed, 07/06/2016 - 20:34
संपादक, त्या आधीच्या धाग्याच्या (http://misalpav.com/node/36577) सुरूवातीला या धाग्याची लिंक देउ शकाल का? तो धागा वाचून चुकीचे समज व्ह्यायची शक्यता आहे ती टाळण्यासाठी?? धन्यवाद. टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

धनंजय माने Wed, 07/06/2016 - 20:44
नेहमीप्रमाणेच उत्तम लेख. समांतर- (या निमित्ताने) डॉक्टर खरे यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि आयुष्यभर राहीन. निव्वळ मिपाच्या ओळखीवर डॉक्टर साहेबांनी माझ्या अवघड प्रसंगात आर्थिक रक्कम देण्याची तयारी दाखवली होती आणि आजवर त्याची कुठेही वाच्यता देखील केलि नाही. रात्री १२ वाजता देखील त्यांना मेसेज टाकले आणि त्यांनी त्याचं समाधान केलं आहे. निव्वळ वैद्यकीय नाही तर अनेक आर्थिक बाबतीत सुद्धा डॉक्टर साहेब योग्य ते सल्ले देत असतात. Thanks a tonne! U rock!!!

चौकटराजा Wed, 07/06/2016 - 20:49
हा लेख आला हे बरे झाले . कारण सर्वसामान्य माणसाला मुळात विषाणू व जिवाणू यातील फरकच माहीत नसतो.इथे खरे साहेबानी म्हटल्याप्रमाणे एखादी समस्या जिवाणू मुळे झाली की विषाणूमुळे याची माहिती डॉ नाच असते. सबब आपल्याला डिसेन्ट्री झाली तर रोग्याने तिचे यथास्थित वर्णन डॉ कडे करणे गरजेचे आहे. काही वेळेस अति प्रॅक्टीसच्या घाईने डॉ जरा गडबड करीत असतील तरीही फार तपशीलवार लक्षणे रोग्याने वर्णिली पाहिजेत. आपल्याला अचूक निदानाचा लाभ हा आपल्यावर सर्वात जास्त अवलंबून असतो. कारण बाह्य लक्षणे सर्वानाच दिसत असतात.शौचातून शेंब पडणे, रक्त पडणे व फेस पडणे याचे अर्थ फार वेगवेगळे आहेत अशा गोष्टी लपवून ठेवून काय फायदा ? डॉ खरे -- या बरोबरच प्रोबायोटिक्स बद्द्ल काही सांगाल काय साहेब ?

खटपट्या Wed, 07/06/2016 - 20:55
नेहमीप्रमाणे ज्ञानवर्धक लेख. अत्यंत सोप्या भाषेत कठीण विषयाची माहीती. बाकी मानेंनी सांगीतल्याप्रमाणे आम्ही डॉ़कचा पंखा आहोतच...

John McClain Wed, 07/06/2016 - 20:57
डॉक साहेब, फार छान लेख. माझ्या काही शंका.... १. आपल्या शरीरात खूप सारे जीवाणू असतात जे आपल्याला मदत करत असतात जसे अन्न पचन, अजून काही चयापचय वगरे.... हे खरे आहे का? 2. असल्यास, antibiotics मुळे त्यांच्या कार्यक्षतेवर परिणाम होतो का? 3. बरेच डॉक antibiotics सोबत antacid prescribe करतात ते का? 4. काही संस्थळ(ऑनलाइन वाचलेले...सॉरी प्रत्यक्ष संस्थळ आठवत नाही) सांगतात कि अर्ध्यावर अँटिबायोटिक्स बंद केले तरी जीवाणू resistent होत नाहीत

In reply to by John McClain

सुबोध खरे गुरुवार, 07/07/2016 - 10:36
John McClain साहेब हा विषय फारच मोठा आहे आणि इतके सविस्तर लिहिने शक्य नाही. खालील दुवा वाचून पहा https://en.wikipedia.org/wiki/Gut_flora थोडक्यात सांगतो. आतड्यात असंख्य तर्हेचे सहजीवी जिवाणू असतात. यात दुग्धजन्य जिवाणू (लॅकटोबॅसिलस) हे महत्त्वाचे आहेत. ते तेथे अन्नपचनापासून काही संप्रेरके आणि जीवनसत्त्वे तयार करण्यापर्यंत काम करीत असतात. ते रोगकारक जीवाणूंना तेथे सहज वस्ती करू देत नाहीत. जेंव्हा बरेच दिवस प्रतिजैविके घेतली जातात तेंव्हा या आतड्यातील सहजीवी जिवाणूंची वस्ती विस्कळीत होते आणि आपल्याला शौचाच्या तक्रारी सुरू होऊ शकतात. अशा वेळेस डॉक्टर वरील दुग्धजन्य जिवाणू (लॅकटोबॅसिलस) आणि इतर जिवाणू कॅप्सूल स्वरूपात देतात. किंवा याला साधा घरगुती उपाय म्हणजे जरासे आंबट झालेले ताक किंवा दही. प्रतिजैविकांबरोबर अँटासिड देण्यासाठी कोणतेच तर्कशास्त्र नाही. बरेच वेळेस सुदृढ प्रकृतीच्या बैठी कामे करणाऱ्या लोकाना( ही जमात आताशा फारच वाढलेली आहे) "अशीच" ऍसिडिटी होत असते त्यामुळे नंतर कटकट नको म्हणून आणि भरपूर औषधे दिली नाहीत तर लोकांना हा डॉकटर बरोबर नाही असेही वाटत असते त्यासाठी डॉक्टर सर्रास अँटासिड लिहून देत असतात. माझा एक अत्यंत हुशार, उत्कृष्ट असा हाडांचा डॉक्टर असलेला आणि नैतिक आणि प्रामाणिक व्यवसाय करणारा वर्गमित्र प्रत्येक रुग्णाला अँटासिड लिहून देतो. या मागे कोणतेही तर्कशास्त्र नाही. यावर चर्चच ही झाली आहे केवळ त्याचे वैयक्तिक मत.

सतिश गावडे Wed, 07/06/2016 - 21:08
धन्यवाद डॉक्टर या अतिशय माहितीपूर्ण लेखासाठी. मुळ विषयाबरोबरच तुम्ही Over-the-counter (OTC) drugs बद्दल अतिशय मोलाची माहीती दिली आहे.

अजया Wed, 07/06/2016 - 21:22
१ हो.आपल्या आतड्यात आपल्या पचनाला मदत करणारे जीवाणू असतात.एखाद्या मोठ्या इंफेक्शनमध्ये प्रतिजैविक घ्यायला लागल्यास काही वेळा जुलाब होतात.त्याचे कारण प्रतिजैविकामुळे हे मदत करणारे जीवाणू पण कमी होतात.यासाठी काहीवेळा प्रतिजैविकासोबत हे बॅक्टेरिया देणारी औषधं ,पावडर असे दिले जाते उदा rinifol,vitagut etc असाच प्रकार अतिसारामुळेही होतो.तेव्हाही शौचाची तरलता कमी व्हावी यासाठी या बॅक्टेरियांची औषधे दिली जातात. वारंवार तोंड येणे हेसुद्धा काही वेळा या बॅक्टेरियांच्या कमतरतेने होते.तेव्हाही झींक आणि बॅक्टेरिया हे काँबिनेशन असणाऱ्या गोळ्या दिल्या जातात. २. अँटासिड हे बहुधा सोबत जी पेन किलर इ गोळी दिली आहे तिच्याने जळजळ होऊ शकते म्हणून तसेच काही गोळ्या उदा oflox ornidazole आदि काँबिनेशन असणार्या ,त्या घेतल्यावर मळमळते.त्यासाठी दिले जाते. ३.तुम्ही अॅंटिबायोटिक घेतले.की ते त्या बॅक्टेरियाला मारणे किंवा त्याची वाढ रोखणे हे काम करण्यासाठी ठराविक डोस जो तुमच्या इंफेक्शनची तीव्रता ,तुमचे वजन,तुमचे वय,अॅलर्जीज इ विचार करुन तसेच लहान मुलांचे तर सरळ वजनाचे गणित करुन विभागीत डोस मध्ये दिले जाते. कमी डोसमधले अॅन्टीबायोटिक सर्व बॅक्टेरिया मारणार पण नाहीच तर रेझिस्टंट बॅक्टेरिया तयार करणार जे दादच देणार नाहीत त्या औषधाला पुढच्या वेळी.त्यामुळे त्या त्या डोसमध्ये प्रशिक्षित MBBSव तत्सम डाॅ जे मेडिसिन शिकलेले आहेत(अन्य पॅथीबद्दल मी बोलत नाही) जेव्हा घ्यायला सांगतात,घेणे अत्यावश्यक आहे.

सुंदर थोडक्यात चपखल माहिती असलेला लेख. (मात्र, हा लेख वाचूनही, वेळ आल्यावर लोकांनी शेजारी/मित्र-मैत्रिण-आजीबाई-काकूबाई/स्वयंघोषित तज्ञ/आंतरजाल वाचून तयार झालेला तज्ञ/'न'-आधुनिक वैद्यक तज्ञ/स्वतःचा 'अंदाज'/इत्यादींवर भरवसा ठेऊन कृती करू नये, हीच इश्वरचरणी प्रार्थना ! :) )

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/07/2016 - 00:33
अतिषय माहीतीपुर्ण लेख ! मला पुढील काही प्रश्न पडले पडले: १. समजा अ‍ॅन्टीबायोटिक घेतले नाहीत तर एका नॉर्मली हेल्दी बॉडी नॅचरली रिक्वहर होवु शकते का ? २. समजा आपण शरीराला नॅचरली रिअव्हर होण्याची संधीच दिली नाही , छोट्या मोठ्ठ्या बॅक्टेरियल इन्फेशन्स वरही अ‍ॅ.बा. घ्यायला लागलो तर शरीराच्या नॅचरल रेसेस्टन्स पॉवर वर दुरगामी परिणाम पडेल का ? ३. हा परिणाम पुढे जेनेटिक होवुन भविष्यात( म्हणजे लै लै वर्षांनी) एकुणच मानव प्रजाती अशक्त होवु शकते का ? ४. होमिओपॅथीचे माहीत नाही पण आयुर्वेदिक औषधे घेवुन बॅक्टेरियल इन्फेक्शन बरे झाल्याचा अनुभव आहे , मग अशावेळेस आयुर्वेदिक मेडीसिन ट्राय करायला काय हरकत असु शकते ? ५. अ‍ॅ.बा. घेण्यापेक्षा शरीराची नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढवण्याची औषधे ( वॅक्सीनेशन टाईप ) उपलब्ध्द आहेत का की जेणे करुन बॅक्टेरियल इन्फेक्शन्स होणारच नाहीत ? ६.अ‍ॅ.बा. चा फार्मासुटिकल मार्केट मधील किति टक्के शेयर घेतात ? अशा प्रकारचा डेटा अंतर्जालावर कोठे उपलब्ध्द असु शकतो काय ? आपला विनम्र सीझर मार्कस ऑरेलियस अ‍ॅन्टोनियस ऑगस्टस् Vi Veri Veniversum Vivus Vici

In reply to by प्रसाद गोडबोले

अजया गुरुवार, 07/07/2016 - 09:02
१ ते तुमची प्रतिकारशक्ती, इंफेक्शनची तीव्रता ,डायबेटिस सारखा आजार नाही ना अशा घटकांवर अवलंबून आहे.तसंच अगदी छोट्या सर्जरीज किंवा दात काढणे इ व्यवस्थित स्टरिलाइज्ड हत्यारांनी केल्यास बारीक सारीक इंफेक्शन विना प्रतिजैविक बरी होऊ शकतात. पण उद्या एखाद्या माणसाला दात किडुन पू होऊन सूज आलीये.ताप आहे.घासही गिळता येत नाही.सूज पसरत चालली आहे.आणि तो मी अँटिबायोटिक वगैरे घेणार नाही.सगळी थेरं आहेत.असे करत बसला तर ते इंफेक्शन त्याच्या जीवावर बेतु शकते. २ उगाच प्रतिजैविके घेतल्यास आपण आपली स्वतःची इम्युनिटी वापरणारच नाही.पण प्रतिजैविक रेझिस्टन्स मात्र नक्की येईल.यासाठीच व्हायरल आजार उदा सर्दी, फ्लु यात प्रतिजैविकाचा काहीच रोल नाही.म्हणून घेऊ नयेत. ४ आयुर्वेदिकला पास ५आपण बिसिजी, टिटि इ लसी घेतो त्या याचसाठी.

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबोध खरे गुरुवार, 07/07/2016 - 10:14
मार्कस ऑरेलियस साहेब १)एक लक्षात घ्या जेंव्हा प्रतिजैविके नव्हती तेंव्हा सुद्धा माणसे १०० वर्ष "पर्यंत" जगतच होती याचा सरळ अर्थ असा आहे की आपली प्रतिकारशक्ती हा रोग बरा होण्यासाठी आवश्यक असा एक "सर्वात महत्त्वाचा" घटक आहे. एड्स होतो तेंव्हा ही प्रतिकारशक्तीच खच्ची होते म्हणून माणूस अनेक रोगांना बळी पडतो. तुम्हाला साधे कापले खरचटले तर कोणतेही औषध न घेता तुम्ही बरे होताच की. प्रत्येक पेशींच्या पृष्ठभागावर त्यांच्या आतील रासायनिक रचनेचा आलेख लिहिलेला असतो. हा आपल्या पासपोर्ट सारखा असतो. आपल्या शरीरात दर सेकंदाला असंख्य जंतू प्रवेश करत असतात. या येणाऱ्या प्रत्येक जंतू अथवा पेशीचा "पासपोर्ट तपासणे" हे पांढऱ्या पेशीतील काही विविक्षित तर्हेच्या पेशींचे काम असते. पेशी हा पासपोर्ट तपासून तुमची "स्व" आणि "परकीय" अशी विभागणी करतात आणि ज्या पेशी परकीय आहेत त्यांना दुसऱ्या सैनिक पांढऱ्या पेशींकडे सुपूर्द करतात. या सैनिक पेशी परकीय पेशींचा नाश करीत असतात. तेंव्हा शरीरात शिरलेले जंतू हे ताबडतोब नष्ट केले जातात. जेंव्हा शिरले जंतू हे पांढऱ्या पेशींपेक्षा संख्याबलाने "फारच जास्त" असतात तेंव्हा ते पटकन शरीरभर पसरतात आणि आपल्याला रोग होतो. या वेळेत तूमचे शरीर काही स्वस्थ बसलेले नसते, ते नवीन पांढऱ्या पेशी तयार करण्याचे काम जोमाने करत असतात. ज्यावेळेस नवीन मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागतात तेंव्हा नैसर्गिक रित्या रोग आटोक्यात येऊ लागतो. जेंव्हा पांढऱ्या पेशींचे वाढलेले प्रमाण सुद्धा जंतूंना अटकाव करू शकत नाही अशा वेळेस शरीराची प्रतिकारशक्ती कमी पडते आणि माणूस मृत्युमुखी पडू शकतो. प्लेग, कॉलरा, विषमज्वर इ रोगांनी माणसे मरत असत ती या कारणाने. या मधल्या काळात शरीराला हानी पोचू नये म्हणून हे अतिरिक्त जंतू प्रतिजैविके देऊन मारले जातात आणि रोग पटकन आटोक्यात येतो. यामुळेच प्रतिजैविकांचा शोध लागला आणि लक्षावधी अपमृत्यू टाळता आले. जन्म मृत्यू चे हे प्रमाण संतुलित होते त्यामुळे १९५० पर्यंत जगाची लोकसंख्या आटोक्यात होती दुर्दैवाने मागच्या तीन पिढ्यानि सरासरी सात ते आठ मुलांना जन्म दिला आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने जगाची लोकसंख्या गेल्या साठ वर्षात तिप्पट झाली. कर्करोगाच्या पेशींचाही पासपोर्ट बदललेला असतो त्यामुळे अशा ९९ % कर्करोगाच्या पेशी आपोआप आपले शरीर नायनाट करीत असते. उरलेल्या १% पेशींचा पासपोर्ट आपल्या "स्व" पासपोर्टशी मिळताजुळता असल्याने त्या पेशींचे "परकीय" म्हणून निदान होत नाही आणि त्या पेशींपासून कर्करोग होतो. ऑटो इम्यून डिसीज मध्ये आपल्या प्रतिकारशक्तीत बिघाड होतो आणि "स्व" च्या पेशी परकीय समजून त्यावर हल्ला चढवला जातो. २) सतत प्रतिजैविके घेण्यामुळे नैसर्गिक प्रतिकारशक्ती नीट विकसित होत नाही हे सत्य आहे. त्यातून आजकाल जरा काही झाले की डॉक्टरकडे बाळाला घेऊन जाणारे आणि लगेच प्रतिजैविक द्या असा आग्रह धरणारे "अति जागरूक" पालक फार मोठ्या प्रमाणावर दिसतात. याची मुले " साजूक" असतात आणि जरा बाहेर काही खाल्ले किंवा पावसात भिजली की लगेच आजारी पडतात. आजारी पडला की एक दोन दिवस धीर धरा हे यांना समजतच नाही. दोन तास ताप आटोक्यात येत नाही म्हणून लगेच इंजेक्शन द्या म्हणणारे कित्येक पालक दिसतात. एक मूल आणि त्याची काळजी वाहायला दोन आई बाप आणि चार आजी आजोबा या मुळे हे सर्रास दिसत्ते आहे. नुसते तेवढेच नव्हे तर डॉक्टरकडे गेले की परत ताप येत कामा नये किंवा हगवण ताबडतोब थांबली पाहिजे हा आग्रह असतो. औषध दिले आणि त्यानंतर दोनदा शौचास झाले की डॉक्टर बदलणारे पालक आज काल भरपूर दिसतात. मुलाच्या आजारपणासाठी आज रजा काढली आहे उद्या रजा मिळणार नाही तेंव्हा आज संध्यकाळपर्यंत मूल खडखडीत बरे झाले पाहिजे हा आग्रह -कम- धमकी असल्यावर नवशिका डॉक्टर प्रतिजैविकांचा मारा करतो. ३) मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक आजारावर औषध/ प्रतिजैविक घेतलेच पाहिजे असे मुळीच नाही. बहुसंख्य आजार स्वतः हून बरे होतील मग आयुर्वेदिक औषध घ्या अथवा घेऊ नका. बाकी अनुभव म्हणाल तर लोकांना "बाहेरची बाधा" "भूत" "साक्षात्कार" यांचाही "अनुभव" येत असतोच. शास्त्रीय कसोट्यांवर टिकला तर तो पुरावा म्हणता येईल. आले, हळद, कांदा लसूण यात जंतुनाशक गुण आहेत परंतु त्यावर पूर्ण संशोधन होऊन त्याचे औषधात रूपांतर अजून तरी झालेले नाही. तोवर याचे जंतुनाशक गुण आयुर्वेदाला माहीत होतेच म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात काय हशील आहे? १२ व्या शतकानंतर वाढ खुंटलेले आणि दुराग्रहामुळे आधुनिक विज्ञानाची कास न धरता आपल्या दैदिप्यमान इतिहासातच रमलेले ते एक जुने शास्त्र आहे एवढेच मी म्हणेन. बहुसंख्य आयुर्वेदिक आणि होमियोपॅथी चे लोक आम्ही प्रतिकार शक्ती "वाढवतो" त्यामुळे रोग होणारच नाही असा दावा करतात. दुर्दैवाने यातील एकही दावा पुराव्याने अजून तरी शाबीत झालेला नाही. यांचे बहुसंख्य दावे राजकारणी लोकांच्या दाव्यांसारखे असतात आणि शास्त्रीय कसोटीला टिकत नाहीत.

In reply to by सुबोध खरे

अस्वस्थामा गुरुवार, 07/07/2016 - 19:19
दणदणीत प्रतिसाद, डॉक..
१२ व्या शतकानंतर वाढ खुंटलेले आणि दुराग्रहामुळे आधुनिक विज्ञानाची कास न धरता आपल्या दैदिप्यमान इतिहासातच रमलेले ते एक जुने शास्त्र आहे एवढेच मी म्हणेन.
खासकरून यासाठी +११११.. आजच बातमी वाचली की भारतातला "आयुष" प्रकल्प, जो आयुर्वेदातल्या औषधे, उपचार पद्धतींवर आधुनिक पद्धतीने संशोधन करून शास्त्रीय स्वरुपात संकलित करणार होता, तो पुरेश्या फंडीगच्या अभावामुळे गुंडाळण्यात आला आहे (भारतातली मूलभूत शास्त्रीय संशोधनाबद्दल उपेक्षा, अजून काय).

फेरफटका गुरुवार, 07/07/2016 - 00:46
माझा मेडिकल क्षेत्राशी दूरान्वयाने देखील संबंध नाही (कन्झ्यूमर म्हणून क्वचित येतो ते जाऊ दे). पण आत्तापर्यंत जवळच्या अनेक लोकांना कळकळीनं मेडिकल सायन्स ने सांगितलेली च औषधं घ्या, सप्लिमेंटल / पॅरलल मेडिसीन च्या नादी लागू नका म्हणून सांगितलं आहे. आज तुमच्या लेखानं माझ्या विश्वासावर शिक्कामोर्तब झालं. अ‍ॅलोपॅथी असा शब्दच नाहीये आणी होमिओपॅथी वाल्यांनी मेडिकल सायन्स साठी तयार केलेलं एक हेटाळणीसदृश संबोधन आहे, हे बरोबर आहे का? "अँटीबायोटिक्स देऊन रोग "तिथल्या तिथे दाबून टाकतात". होमियोपॅथी मध्ये आम्ही रोगाचा मुळापासून नायनाट करतो म्हणून आमची औषधे स्लो असली तरी परिणामकारक असतात." - ह्यावर थोडा प्रकाश टाकणार का? हे मान्य आहेच, पण विस्तृत माहिती द्याल का?

In reply to by फेरफटका

सुबोध खरे गुरुवार, 07/07/2016 - 10:19
फेरफटका साहेब अ‍ॅलोपॅथी असा शब्दच नाहीये आणी होमिओपॅथी वाल्यांनी मेडिकल सायन्स साठी तयार केलेलं एक हेटाळणीसदृश संबोधन आहे, हे बरोबर आहे का? https://en.wikipedia.org/wiki/Allopathic_medicine हा दुवा पहा. "अँटीबायोटिक्स देऊन रोग "तिथल्या तिथे दाबून टाकतात". होमियोपॅथी मध्ये आम्ही रोगाचा मुळापासून नायनाट करतो म्हणून आमची औषधे स्लो असली तरी परिणामकारक असतात." हा दावा "होमियोपाथ" करतात त्यांच्यापैकी एखाद्याला विचारा ते मोठ्या उत्साहात सांगतील.

In reply to by सुबोध खरे

फेरफटका गुरुवार, 07/07/2016 - 19:42
धन्यवाद डॉ. खरे. "हा दावा "होमियोपाथ" करतात त्यांच्यापैकी एखाद्याला विचारा ते मोठ्या उत्साहात सांगतील." - त्यांच्या अ‍ॅनालॉजीज ऐकुनच हा प्रश्न विचारला. ते सरळ उत्तर न देता उगाच काहीतरी एका खोलीत आग लागली तर आम्ही ती विझवतो, म्हणून वेळ लागतो. "अ‍ॅलोपॅथ्स" फक्त दार लावतात वगैरे शेंडीकाम करतात. मला ते कधीच पटलेलं नाही, म्हणून तुम्हाला विचारलं. पण जर दुसर्या शास्त्राविषयी बोलणं अन-एथिकल असेल, तर राहू द्या. मी आग्रह करणार नाही.

In reply to by फेरफटका

सुबोध खरे गुरुवार, 07/07/2016 - 20:21
http://edzardernst.com/2015/03/the-final-verdict-on-homeopathy-its-a-placebo/ https://www.nhmrc.gov.au/guidelines-publications/cam02? ज्याला होमियोपॅथी बद्दल शास्त्रीय माहिती हवी आहे त्याने हे वरील दुवे वाचावे. असे असंख्य दुवे आहेत. आम्ही अमुक तमुकला बरे केले अशा तर्हेच्या "सुरस आणि चमत्कारिक गोष्टी" बरेच होमियोपॅथ आणि त्यांचे चाहते सांगत असतात. परंतु आतापर्यंत झालेली एकही शास्त्रीय चाचणी सज्जड पुराव्यानिशी हे सांगत नाही की होमिओपॅथी ही नक्कीच काम करते. बाकी मी म्हणतो तसे ज्याला जे पचते ते त्याने खावे आणि रुचते ते बोलावे. लोकांचा बाहेरची बाधा, नजर लागणे ( आणि यासाठी नजर सुरक्षा कवच) किंवा श्रीयंत्र इ ने जीवनातील सर्व दुःखे दूर होतील असा छातीठोक दावा असतो. तो त्यांच्या वैयक्तिकी श्रद्धेचा भाग आहे.

In reply to by सुबोध खरे

फेरफटका Fri, 07/08/2016 - 02:21
हत्या / आत्महत्या हा जसा कायद्यानं गुन्हा आहे (सोशल फॅब्रिक चं नुकसान होतं असं कायदा म्हणतो), तसंच ह्या वैय्यक्तिक श्रद्धेपोटी जेव्हा जीव जायची वेळ येते, तेव्हा तिच्याकडे वैय्यक्तिक श्रद्धा म्हणून बघवत नाही. एका कॅन्सर चं निदान झालेल्या जवळच्या नातेवाईकाने जेव्हा किमो टाळण्यासाठी वर्षभर आयुर्वेदिक/होमिओपॅथी ई. उपचार घेतले तेव्हा राग + दु:ख अशा मिश्र भावना होत्या. त्या अवधीत रोग आणखी बळावला आणी शेवटी किमो करावीच लागली. पुढचा हास्यास्पद भाग म्हणजे किमो चे 'साईड ईफेक्ट्स टाळण्यासाठी पुन्हा आयुर्वेदीक / होमिओपॅथी सुरू केलं तेव्हा मात्र हताश झालो. कुठल्याही शास्त्रीय कसोटीवर सिद्ध न झालेल्या औषधयोजनेला निदान सरकारमान्यता तरी नसावी असं माझं मत आहे.

In reply to by फेरफटका

अप्पा जोगळेकर Fri, 07/08/2016 - 11:49
साहेब, आपल्या विधानाचा पुनर्विचार करावा. कुठल्याही शास्त्रीय कसोटीवर सिद्ध न झालेल्या औषधयोजनेला निदान सरकारमान्यता तरी नसावी असं माझं मत आहे. याचा अर्थ काय ? आयुर्वेद किंवा होमिओपाथ यांना आपण बाबा, बुवा, भगत यांच्या रांगेत बसवणार का ? डॉ. खरे मॉडर्न मेडिसिनचे तज्ञ आहेत आणि त्यांनी पुराव्यानिशी लिहिले आहे. तुमच्याकडे पुरावे असतील तर लिहा अन्यथा फेकाफेकी बंद करा अशी विनंती आहे. जसे काही होमिओपाथ, वैद्य भोंदू असतात तसे काही मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टरही भोंदू असतात. मग मॉडर्न मेडिसिनलाही खोटे म्हणाल. 'प्रास' यांनी येथे सविस्तर प्रतिसाद दिला असता तर बरे झाले असते.

In reply to by अप्पा जोगळेकर

अनुप ढेरे Fri, 07/08/2016 - 12:40
आयुर्वेद किंवा होमिओपाथ यांना आपण बाबा, बुवा, भगत यांच्या रांगेत बसवणार का ?
आयुर्वेद माहिती नाही पण होमिओपदी आणि बाबा बुवा भगत यांच्यात फरक नाही. इन्फॅक्ट जे बाबाबुवा चुकून माकून औषधी वनस्पती देतही असतील ते होमिओपदीपेक्षा बरे.

In reply to by अप्पा जोगळेकर

फेरफटका Fri, 07/08/2016 - 19:40
अप्पा, शास्त्रीय कसोट्यांवर होमिओपॅथी सिद्ध झाली नाहीये, हे डॉ. खर्यांनी वर म्हटलेलच आहे. त्या पद्धतीत evidence based proof आहे. ही फेकाफेकी वाटत असेल, तर पुराव्याने खोडून काढा आणी मी ते मोकळेपणाने मान्य करीन. विषयातील तज्ञ नसताना त्या विषयात अधिकारवाणीनं बोलू नये हे मान्य. पण मत सुद्धा व्यक्त करू नये हा दावा पोकळ आहे. सध्या माझ्याकडून हे तीन आंतरजालीय दूवे घ्या. https://www.sciencebasedmedicine.org/reference/homeopathy/ https://www.sciencebasedmedicine.org/homeopathy-failing-randomized-controlled-trials-since-1835/ https://nccih.nih.gov/health/homeopathy प्रश्न प्रॅक्टीस करणार्यांच्या भोंदुगिरी चा नाहीये. तो वेगळा विषय आहे. प्रश्न त्या उपचार पद्धतीच्या validity चा आहे.

मयुरा गुप्ते गुरुवार, 07/07/2016 - 01:15
डॉ. तुम्ही सोप्या शब्दातील उपयुक्त माहिती दिलीत ...पण लेख वाचुन असं वाटलं कि हा फक्त एक हॅप्पी पाथ सिनॅरियो सांगितलात. अर्थात हे मान्य आहे कि व्यक्ती तितक्या प्रकृती, वेगळे पेशन्ट्स वेगळे उपचार. माझी लेक लहान असताना आम्ही अँटीबॉयॉटीक पुढे बाकी खरचं हात टेकले होते. सुरुवात तापाने झाली होती.. १०२ पर्यंत ताप झाल्यावर्च डॉ. कडे जायचं असा इथला नियम, तोपर्यंत नर्स ला सगळे सिम्ट्मस सांगुन ऑव्हर द काउंटर जे काही ताप कमी कराय्चे औषध मिळतात ते देउन बघायचे. तेव्हा लेक ११ महिन्यांची होती. ताप उतरेना म्हणुन मग डॉ कडे गेलो. निदान झालं इयर इंफेकश्न. सुरुवत अ‍ॅमॉक्सिसीलीन १० दिवसाचा कोर्स. ते १० दिवस बरे गेले. परत एक आठवड्यात तोच प्रकार..ताप, कान ठणकतोय, मग परत डॉ. तेव्हा अजुन जास्त तिव्रतेचं अँटीबॉयॉटीक दिलं...त्याचे १० दिवस गेले. परत २ आठवडे होत नाहीत तर इयर इंफेकश्न, ह्यावेळी डॉ ने अजुन जास्त तीव्रतेचं औषध दिलं... परत ५ का १० दिवस. अजुन एकदा इयर इंफेकश्न... आता डॉ. नी स्ट्रोंग डोस दिला व दवाखान्यात २ तास ठेउन घेतलं. त्यानंतर बाकि आम्ही हवालदिल झालो... नशिबाने बाळ बरं होतं. शेवटी बाकि आम्ही तिच्या कानात ट्युबस टाकुन घेतल्या. त्यानंतर इयर इंफेकश्न प्रकरण थांबलं. खूप वर्ष झाली ह्या गोष्टीला पण लेखाच्या निमित्ताने आठवण झाली एवढचं. तरी परत एकदा.. व्यक्ती तितक्या प्रकृती, वेगळे पेशन्ट्स वेगळे उपचार. --मयुरा

In reply to by मयुरा गुप्ते

आनंदी गोपाळ गुरुवार, 07/07/2016 - 22:12
तुमच्या बाळाला सिक्रीटरी ओटायटीस मिडिया. "ग्लू इयर" होत होता, तो कानात शिट्टी बसवून बरा झाला. याला कारणीभूत अँटीबायोटिक्स नव्हेत, तर तिच्या कानाची व कान घशाशी जोडणार्‍या युस्टॅशिअन ट्यूबची आकार/संरचना आहे. तिची सर्दी पटकन कानात पोहोचत होती. अशा वेळी हातात सुरी कात्री घेण्याआधी आम्ही औषध-गोळ्यांनी काम करायचा प्रयत्न करतो. त्याने जमत नसेल, तर सर्जन सुरी कात्री हातात घेतो. केलेल्या ऑपरेशनचे नांव myringotomy (मायरिंगॉटॉमी) ˌmɪrɪnˈdʒɒtəmi,-ˈɡɒtəmi/ अर्थः surgical incision into the eardrum, to relieve pressure or drain fluid. व ट्यूब = ग्रोमेट, अर्थात, http://www.kidshealth.org.nz/grommets-tympanostomy-or-ventilation-tubes तात्पर्य, "आम्हाला अँटिबायोटिक्सचा काहीच उपयोग झाला नाही हो! कित्ति वैट्ट नं अँटीबायोटिक्स!" अशी जर थॉट प्रोसेस असेल तर ती चुकीची आहे, असे नोंदवितो.

In reply to by आनंदी गोपाळ

गंम्बा Fri, 07/08/2016 - 12:45
मयुरा, असे शास्त्रशुद्ध एक्प्लेनेशन तुम्ही कोणा होमिओपाथ ला देताना बघितले आहे का? किंवा आयुर्वेदचार्याला? होमिओपाथ आणि आयुर्वेदाची प्रॅक्टीस करणार्‍यांना अंधश्रद्धा निर्मुलन कायदा लावायला पाहिजे, किंवा त्यांना आयुष्यात कधीही मॉडर्न मेडीसीन चा स्वतावर किंवा कुटुंबावर वापर करण्यास बंदी केली पाहिजे.

In reply to by गंम्बा

अप्पा जोगळेकर Fri, 07/08/2016 - 15:08
होमिओपाथ आणि आयुर्वेदाची प्रॅक्टीस करणार्‍यांना अंधश्रद्धा निर्मुलन कायदा लावायला पाहिजे, तुम्ही मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर आहात आणि तुमची प्रॅक्टिस चालत नाही असा प्रकार तर नाही ना ?

In reply to by अप्पा जोगळेकर

गंम्बा Fri, 07/08/2016 - 15:21
नाही हो आप्पा, मी डॉक्टर नाहीये. कुठल्याही औषध कंपनीशी संबंधीत नाहीये. कुठल्याही प्रकारचा फायदा मला होणार नाही होमिओ किंवा आयुर्वेद बंद केले तर. माझे जे मत आहे ते लिहीले, नसेल पटत तर सोडुन द्या.

सुधीर कांदळकर गुरुवार, 07/07/2016 - 07:46
सुरेख लेख. खास करून इतर चिकित्सापद्धतींबद्दल संयत प्रतिक्रिया देणे आवडले. प्रतिजैविकांचा थेराप्यूटीक इन्डेक्स इतर वर्गातील औषधी द्रव्यांच्या तुलनेत जास्तीत जास्त आहे. तसेच ती लाईफ सेव्हिंग आहेत या दोन बाबींबद्दल विवेचन दिले तर आवडेल.

In reply to by सुधीर कांदळकर

आनंदी गोपाळ गुरुवार, 07/07/2016 - 22:16
त्यांचे ते संयत प्रतिसाद माझ्यासारख्या नास्तिकाला अनेकदा जमत नाहीत. मी लै खडूस लिहून जातो. स्पेशली होम्योपदीबद्दल. थेरप्युटिक इंडेक्सबद्दल तुमचे बरोबर आहे. प्रतिजैविके, ही सर्वात सेफ औषधे आहेत, कारण मुळातच ती जंतूंच्या शरिरावर काम करतील अशी बनवलेली आहेत. अगदी डोकेदुखीची साधी गोळी , सर्वाधिक तीव्रतेच्या अँटीबायोटिकपेक्षा तुमच्या शरीरावर जास्त केमिकल मॉडिफिकेशन्स करते.

In reply to by आनंदी गोपाळ

सुबोध खरे Fri, 07/08/2016 - 13:26
थेरप्युटिक इंडेक्स म्हणजे त्याच्या मृत्यू होईल इतक्या डोस आणि एखाद्या औषधाचा गुणकारी डोस चे गुणोत्तर. मृत्यू होईल इतका डोस जितका जास्त तितके ते औषध जास्त सुरक्षित. https://en.wikipedia.org/wiki/Therapeutic_index उदा पेनिसिलीन V हे औषध २५० मिग्रॅ दिवसात ३ वेळेस दिले जाते आणि याचा लिथल डोस ४००० mg/kg आहे. म्हणजेच एखाद्या ७० किलो च्या माणसाला मरण्यासाठी त्याला २८० ग्राम( ११२० कॅप्सूल्स) औषध देणे आवश्यक आहे. उंदरांना २४०० mg/kg औषध १४ दिवस सतत दिले तरीही त्यांच्या वर कोणताही वाईट परिणाम दिसून आला नाही. http://www.pfizer.com/files/products/material_safety_data/00230796.pdf यास्तव साईड इफेक्ट्स चा हा प्रचार इतर लोकांनी चालवलेला आहे तो किती खोटा नि बिनबुडाचा आहे हे सिद्ध होईल.

In reply to by सुबोध खरे

थोडं अवांतर होईल पण आपल्या अनयत्र झालेल्या चर्चेच्या संबंधाने एक प्रश्न विचारु का ?
थेरप्युटिक इंडेक्स म्हणजे त्याच्या मृत्यू होईल इतक्या डोस आणि एखाद्या औषधाचा गुणकारी डोस चे गुणोत्तर.
गांजाचा थेरप्युटिक इंडेक्स काय आहे हो ? ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबोध खरे Fri, 07/08/2016 - 18:38
गांजाचा थेरप्युटिक इंडेक्स बराच जास्त आहे १०००० ते ३०००० आहे म्हणजेच आपण दीड दोन किलो गांजा खाल्ला तरी त्यामुळे मरणार नाही. गांजाचे दुष्परिणाम त्याच्या विषारी पणामुळे नव्हे तर गांजा प्यायल्यावर माणूस ज्या "माकडचेष्टा" करतो त्यामुळे होतात. आम्हाला असलेला एक "सुपर" सिनियर( ए एफ एम सी मध्ये साडे चार वर्षात एम बी बी एस पूर्ण करण्याऐवजी "सात आठ" वर्षात पूर्ण करणाऱ्याला हे नामाभिमान होते) याने एकदा गांजा पिऊन I AM FLYING TO LADIES HOSTEL म्हणून तिसऱ्या मजल्यावरून हात पसरून उडी मारली. जे व्हायचे तेच झाले. पाठीचा कणा धरून चौदा हाडे मोडली.सहा महिने रुग्णालयात पडून होता मग तीन वर्षांनी आमच्या बरोबर एम बी बी एस ची परीक्षा दिली. अर्थातच लष्करात भरती होणे शक्यच नव्हते. यांच्या "चरसी गॅंगने" होस्टेलच्या मागच्या बागेत चरसचे झाडही लावले होते. परंतु टॉक्सिकोलॉजिचेच प्राध्यापक वार्डन होते त्यांनी एकदा राउंड मारताना ते पाहिले आणि झाड मुळापासून उपटून काढले. गांजा, चरस आणि हेरॉईन च्या अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा नौदलाच्या व्यसन मुक्ती केंद्रात ऐकायला आणि पाहायला मिळाल्या. त्याबद्दल परत केंव्हातरी.

प्रसाद भागवत गुरुवार, 07/07/2016 - 08:41
.व्वा डॉक्टर साहेब.. अत्यंत आवश्यक अशा विषयावर तितकेच माहितीपुर्ण विवेचन केल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद..आपणासारखे अभ्यासु डॉ. प्रत्येक कुटुंबास, प्रत्येक रुग्णास मिळो.

In reply to by वेल्लाभट

सुबोध खरे गुरुवार, 07/07/2016 - 11:25
पूर्वी करत नसे परंतु जशी वर्षे जाताहेत तसे अनेक रोग जे बरे होऊ शकले असते ते होमियोपॅथी च्या लोकांनी बरेच महिने "चोळल्या"मुळे हाताबाहेर गेलेले दिसून येत आहेत. केस वाढवण्याची खात्री देणाऱ्या मुकेश बात्रामुळे बीजांडकोषाचा कर्करोग( ovarian cancer) असलेल्या( मीच निदान केलेल्या) ४५ आनि ४७ वयाच्या दोन स्त्रिया डोळ्यासमोर मरताना पाहिल्या आहेत. "कॉन्स्टीट्युशनल डिसऑर्डर" म्हणून फेरम फॉस आणि फॉसम फेर देऊन सहा महिने चोळून झाले. या कालावधीत कर्करोग शरीरभर पसरला आणि पोटात पाणी झाल्यावर ते रुग्ण परत आले तोवर रोग हाताबाहेर गेला होता. साधारण महिना किंवा दोन महिन्यात एक या दराने मूत्रपिंडातील खडे काढून देतो सांगून चोळ्त बसल्याने मूत्रपिंड खराब झालेले रुग्ण मी पाहतो आहे. मुतखडा किंवा पित्ताशयातील खडा याचे काहीही फायदा न झालेले रुग्ण माझ्या रोजच्या पाहण्यात गेली २५ वर्षे आहेत. पुण्यातील प्रथितयश डॉक्टर हबू आणि इतरही प्रतिष्ठित डॉक्टर यांचे मुतखडा किंवा पित्ताशयातील खडा याचे लष्करातील ६० रुग्ण( ज्यांना शल्यक्रिया करायची नव्हती) मी ३ वर्षे पर्यंत सोनोग्राफी करून पाहिले आहेत एकही रुग्णाचा एकही खडा गेलेला मी पाहिला नाही. पण आम्ही हे रोग बरे करून देतो हे छाती ठीकपणे सांगतात आणि ते सुद्धा "साईड इफेक्ट् शिवाय" या मूलमंत्रासकट. बीजांडकोशातील साधी सिस्ट (follicular cyst) ला कर्करोग म्हणून रुग्णाला सांगायचे ( ही सिस्ट ३-४ महिन्यात स्वतःहून बरी होते) आणि सहा महिन्यात कर्करोग बरा केला म्हणून शेंडी लावायची. हे पण कित्येक दिवस पाहत आलो आहे. स्वमग्नता एकलकोंडेकर यांच्या धाग्यावर एक होमियोपाथचा अनुभव मी मांडला आहे. आमच्या वर राहत असलेल्या आता अमेरिकेत असलेल्या मुलाची मुलगी ऑटिझम या रोगाची शिकार आहे. त्याच्या औषधाचे ५०००/- रुपये सांगितले जेंव्हा बाप "एन आर आय" आहे हे समजले तेंव्हा फी ५००० डॉलर्स झाली. या बापाने संतापाने सांगितले मी ५००० रुपये देईन औषध द्यायचे तर द्या. डॉलर्स मिळवण्यासाठी आम्ही किती कष्ट करतो तुम्हाला माहीत नाही. गपचूप औषध दिले. दुर्दैवाने फायदा काही झाला नाहीच. छदम शास्त्र असूनही एथिक्स आणि प्रामाणिकपणाचा आव आणण्याचा हा प्रयत्न पचत नाही. पूर्वी मी गप्प राहत असे परंतु आता स्पष्टपणे बोलल्यामुळे काही रुग्णांचा फायदा झालेला पाहिला आहे म्हणून हे बोलतो.

In reply to by सुबोध खरे

धनंजय माने गुरुवार, 07/07/2016 - 11:37
वाईचे डॉ. शन्तनु अभ्यंकर आधी BHMS करुन त्यात तथ्य न आढळल्याने पुन्हा MBBS करुन (नंतर पीजी पण केलं बहुतेक)आता हॉस्पिटल चालवतात. (त्यांचे वडील सुद्धा डॉक्टर)

In reply to by सुबोध खरे

वेल्लाभट गुरुवार, 07/07/2016 - 12:43
तुमची कळकळ कळते. परंतु विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, इतर औषधोपचार थकल्यावर होमिओपॅथी घेऊन पूर्ण बरे झालेली ही प्रच्चंड उदाहरणं आहेत. मी वादात पडत नाही, पण तुम्ही म्हणता त्यानुसार होमिओपॅथी थोतांड मुळीच नाही. गैरसमज 'त्या' बाजूने पसरले असतीलही, पण तुम्ही उलट पसरवू नका इतकी विनंती करेन. ज्याला जे लागू पडतं ते औषध त्याने घ्यावं. आणि तुम्ही नमूद केल्याप्रमाणे भोंदू (हाच शब्द वापरतो) डॉक्टर जे मशरूम सारखे उगवत असतात त्यांच्यापासून लांब रहावं असं सर्वांना सुचवेन. माझा एक मित्र आहे, तो आज हा ब्रँड ट्राय करू.... अशा प्रकारे डॉक्टर बदलत असतो. दोन डोसात बरं नाही वाटलं की त्याला ** ठरवून दुसर्‍याकडे जातो. असा अ‍ॅप्रोच ठेवू नये असं मनापासून सांगावंसं वाटतं; सगळ्यांनाच. बाकी डोक्टरांच्या म्हणण्याला चॅलेंज न करता सांगतो, आजवर होमिओपॅथीच घेत आलोय; रादर, फ्यामिली डॉक जे देतात ते घेत आलोय आणि त्यांच्या औषधाने म्हणा किंवा हातगुणाने म्हणा; बरा होत आलोय. होमिओपॅथीवर माझा तरी विश्वास आहे आणि अनुभव चांगला आहे. माझं शरीर त्याला उत्तम प्रतिसाद देतं.

In reply to by वेल्लाभट

सुबोध खरे गुरुवार, 07/07/2016 - 13:02
गैरसमज 'त्या' बाजूने पसरले असतीलही, मुकेश बात्रा यांचा एक तरी लेख "साईड इफेक्ट् शिवाय" हे शब्द नसलेला दाखवून द्या. प्रत्येक होमियोपॅथ हेच रडगाणे गात असतो. तुम्ही तुमचे धुणे धुवा की आधुनिक वैद्यकशास्त्राला शिव्या दिल्याशिवाय यांना जेवण घशाखाली उतरत नाही. आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेषा लहान करण्याची ही प्रवृत्ती शिसारी आणणारी आहे. अगोदर आम्ही सर्व रोग बरे करून देतो असा दावा करायचा. स्वतःला क्षयरोग झाला की मात्र आधुनिक औषधे घ्यायची. हे करणारे दोन होमियोपॅथ माझ्या आसपास व्यवसाय करीत आहेत. त्यांची परिस्थिती पाहून त्याना "साबुदाण्याच्या गोळ्या" घ्या असे सांगायचं मोह मी आवरला. बाकी ज्याचा अंगारे धुपारे यावर विश्वास आहे त्याने ते पण करावे. ज्याला जे पटेल त्याने ते करावे. सांगणारा मी कोण? अब्जावधी लोक प्लेग कॉलरा विषमज्वर यांना बळी पडले किंवा देवी रोगाचे बळी जात होते तेंव्हा होमियोपॅथी होतीच की पण प्रतिजैविके/ देवीची लस आल्यावर लोकांचे प्राण वाचले ही वस्तुस्थिती कशी नाकारणार? आजही हेच होमियोपॅथ "लस टोचून घेऊ नका" हे सांगताना पाहतो तेंव्हा मात्र संताप आणि हतबल झाल्याची मिश्र भावना येते.

In reply to by सुबोध खरे

मन१ गुरुवार, 07/07/2016 - 14:56
"लस टोचून घेऊ नका"
असं सांगणं हा फौजदारी की काय गुन्हा आहे ना म्हणे ? ( आणि नसेल तर असं म्हण्णार्‍याचं डाक्टरकीचं लायसन रद्द करता येत असेल ना ) . बाकी मूळ धागा/लेख माहितीपर आहे, उपयुक्त आहेच. त्याबद्दल मनःपूर्वक आभार .

In reply to by वेल्लाभट

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/07/2016 - 20:13
मी वैद्यकीय डॉक्टर नाही. पण विज्ञान आणि वैज्ञानिक पद्धती मला समजल्या आहेत, असं मला वाटतं. म्हणून डॉ. खरे आणि इतर डॉक्टरांच्या क्षेत्रात थोडी घुसखोरी.
इतर औषधोपचार थकल्यावर होमिओपॅथी घेऊन पूर्ण बरे झालेली ही प्रच्चंड उदाहरणं आहेत.
इतर औषधोपचार घेऊन थकल्यावर असं तुम्ही म्हणता. वर कुठेतरी डॉ. खऱ्यांनीही लिहिलेलं आहे की औषध घ्यायला लागल्यावरही एक-दोन जुलाब होणं, एखादा ताप चढणं अशा गोष्टी होऊ शकतात. थोडक्यात औषध घेतलं आणि दुसऱ्या क्षणाला फायदा झाला असं ताप, पोट बिघडणं ह्या तुलनेत कमी गुंतागुंतीच्या आजारांमध्येही होतं. जे आजार, विकार बरेच अधिक गुंतागुंतीचे असतात आणि शरीरावर मोठा परिणाम करणारे असतात, ते बरे व्हायला बराच जास्त वेळ जाऊ शकतो. इतर औषधोपचार प्रभावी आहेत हे दिसण्यासाठी जो अधिकचा वेळ लागतो, त्याच काळात बरोब्बर होमेपदी सुरू केली आणि रुग्ण खडखडीत बरे झाले, अशीही एक शक्यता असते. ह्याचा पूर्ण अभ्यास झाल्याखेरीज रोग नक्की कशामुळे बरा झाला हे सांगता येत नाही. 'मी बरेच रुग्ण होमेपदीने बरे झालेले बघितलेले आहेत', ह्याला विज्ञानात काहीही अर्थ नाही. ह्याला सांगोवांगीच्या गोष्टी (anecdotes) म्हणतात. लेखाबद्दल आभार.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वेल्लाभट गुरुवार, 07/07/2016 - 20:48
'मी बरेच रुग्ण होमेपदीने बरे झालेले बघितलेले आहेत', ह्याला विज्ञानात काहीही अर्थ नाही. ह्याला सांगोवांगीच्या गोष्टी (anecdotes) म्हणतात.
असं की काय? तर मग
विज्ञान आणि वैज्ञानिक पद्धती मला समजल्या आहेत, असं मला वाटतं.
यालाही विज्ञानात काहीही अर्थ नाही. तेंव्हा राहू द्या तुमचं तुमच्याकडे.

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 07/07/2016 - 11:11
सोप्या भाषेत समजावून सांगणारा असा लेख मी पहिल्यांदा वाचला. मार्कस ऑरेलियस यांचे प्रश्नही तितकेच महत्वाचे. आयुर्वेद व होमिओपॅथी बद्दल काही लोकांच्या मते ते जर उपयुक्त नसते तर कालाच्या ओघात ते नामशेष झाले असते असा युक्तिवाद केला जातो. जो ज्योतिषाबाबतही असतो.

स्पा गुरुवार, 07/07/2016 - 11:16
उत्तम माहितीपुर्ण लेख डाॅक साहेब्स. प्रि आणि प्रो बायोटीक हा काय प्रकार असतो? याने पचन संस्था सुधारते असे बरेच सायटीवर वाचण्यात आले

In reply to by स्पा

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/07/2016 - 20:16
प्रोबायोटिक अन्न म्हणजे पोटातल्या, पचनात मदत करणाऱ्या जीवाणूंना पोषक किंवा असे जीवाणू असणारं अन्न. उदाहरणार्थ दही, ताक. वेगवेगळ्या संस्कृतींमधले पारंपरिक आणि आंबवलेले अन्नपदार्थ ह्या प्रकारात मोडतात. कोंबुचा, किमची असे पदार्थ अमेरिकन फार्मर्स मार्केटात हातोहात आणि प्रचंड किमतीला विकले जातात.

In reply to by स्पा

सुबोध खरे गुरुवार, 07/14/2016 - 12:18
prebiotic प्रीबायोटिक हे एक तर्हेचे कार्बोहायड्रेट पदार्थ असतात जे आपल्या शरीरात पचन होत नाही(nondigestible fiber) की शोषून घेतले जात नाहीत परंतु आतड्यात पुढे गेल्यावर त्याचा उपयुक्त जिवाणू अन्न म्हणून वापर करतात आणि या जिवाणूंच्या संख्येत वाढ होते. यामुळे आपोआप अपायकारक जंतूंची वाढ थांबते आणि आपली पचनसंस्था सुधारते. यात कांदा,कांद्याची पात, लसूण, गव्हाचा कोंडा, कच्चं केळं, गव्हाचं पीठ इ. पदार्थ येतात. प्राथमिक संशोधनात याचे बऱ्याच रोगांमध्ये फायदे दिसून आले असले तरी थेट कार्यकारण भाव अजून दाखवता आलेला नाही. त्यावर अजून संशोधन चालू आहे. probiotic प्रोबायोटिक हे एक तर्हेचे जिवाणू आहेत ज्यांचे सेवन केले असता आतड्यात त्यांची वसाहत तयार होते. हे सर्वसाधारणपणे मानव शरीराला अपायकारक नसून या वसाहतीमुळे इतर अपायकारक जिवाणू आतड्यात वसाहत करू शकत नाहीत. या मध्ये आईच्या दुधातून बाळाला येणारे bifidobacteria आणि दुधाचे दही बनवण्यासाठी जबादार असलेले दुग्धजन्य जिवाणू lactobacillus हे येतात. पोट बिघडले असेल किंवा बराच काळ प्रतिजैविक घेतल्यामुळे पचनशक्तीत बदल होऊन वारं वर शौचास होत असेल( antibiotic induced diarrhoea) यासाठी हे उपयुक्त आहेत. रक्तदाब कोलेस्टिरॉल वाढणे ऍलर्जी एक्झिमा आणि इत्तर प्रतिकारशक्तीचे आजार यात थोडा फार फायदा दिसून आला आहे. परंतु याबद्दल अजूनही खात्रीलायक किंवा निर्णायक पुरावा सापडलेला नाही. तसा पुरावा सापडेपर्यंत अनुभवातून आलेले शहाणपण म्हणून पोट बिघडलेल्या किंवा पचनशक्ती कमी असणाऱ्या माणसांनी ताक भात किंवा दही भात घेण्याने फायदा होईल. शिवाय पहिले सहा महिने मुलाची प्रतिकार शक्ती विकसित होईपर्यंत मुलाला फक्त "आईचे दूध" पाजणे श्रेयस्कर ठरेल. इतर खडाजंगी मध्ये आपला प्रश्न पाहायचा राहून गेला याबद्दल क्षमस्व.

सस्नेह गुरुवार, 07/07/2016 - 11:24
सोप्या भाषेतील अत्यंत उपयुक्त माहितीसाठी धन्यवाद डॉक. काही मुद्द्यांबाबत लेखात नमूद केल्यापेक्षा विपरीत अनुभव आहे. १. पेशंट किंवा त्यांचे नातेवाईक डॉक्टरांकडे अँटि-बायोटिक्स देण्याचा आग्रह धरतात. सर्वसामान्यत: पेशंट किंवा नातेवाईकांना अँटि-बायोटिक्स या उपचारपद्धतीची फारशी माहिती नसते. डॉक्टर देतील ते औषध प्रामाणिकपणे घेण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे असा काही आग्रह डॉक्टरांना पेशंट किंवा नातेवाईकांकडून होत असेल हे खरे वाटत नाही. आणि झाला तरी त्यांना समजावून/ दटावून योग्य ते औषध डॉक्टरांनी दिले पाहिजे. २. आतापर्यंत जेव्हा जेव्हा अँटि-बायोटिक्स घेण्याची वेळ आली तेव्हा सर्व डॉक्टरांनी सोबत न चुकता अँटासिड घेण्यास बजावले होते. एकदा घेतले नाही तेव्हा जबरदस्त रिअ‍ॅक्शन आली. जनरली कोणतेही औषध न घेता नुसत्या आहाराने मला आजवर कधीच अ‍ॅसिडिटि झालेली नाही. पण अँटि-बायोटिक्स घेतल्यावर हमखास होते, असा अनुभव आहे. ३. खरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पेशंटसाठी योग्य असा अँटि-बायोटिक्स डोस किती हा विचार करून डोस लिहून देणारे डॉक्टर आढळात नाहीत. चाइल्ड डोस आणि अ‍ॅडल्ट डोस असे सरसकट वर्गीकरण करूनच देतात. पर्टिक्युलरली माझी ड्रग-सेन्सिटिव्हिटी जास्त असल्यामुळे एक्सेस अँटि-बायोटिक्स डोसचा अनेकदा जबरी धक्का खाल्ला आहे.

In reply to by सस्नेह

आनंदी गोपाळ गुरुवार, 07/07/2016 - 22:30
१. पेशंट किंवा त्यांचे नातेवाईक डॉक्टरांकडे अँटि-बायोटिक्स देण्याचा आग्रह धरतात. सर्वसामान्यत: पेशंट किंवा नातेवाईकांना अँटि-बायोटिक्स या उपचारपद्धतीची फारशी माहिती नसते. डॉक्टर देतील ते औषध प्रामाणिकपणे घेण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे असा काही आग्रह डॉक्टरांना पेशंट किंवा नातेवाईकांकडून होत असेल हे खरे वाटत नाही. आणि झाला तरी त्यांना समजावून/ दटावून योग्य ते औषध डॉक्टरांनी दिले पाहिजे.
त्यांनी, पेशंट लग्गेच, आत्ताच, तात्काळ "बरे" होण्याचा आग्रह धरतो, व हे होण्याची शक्यता, जहाल प्रतिजैविकांच्या मार्‍याने कमी होते, हीच फॅक्ट फक्त नोंदविलेलि आहे. नातेवाईक अ‍ॅंटीबायोटिक्स मागत नाही, इन्स्टन्ट रिझल्ट मागतो. माझ्या खुर्चीत बसून समजावू/दटावून योग्य ते औषध देण्याचे काम आपण सालग १ महिना करावे, ही नम्र विनंती करतो. ;) नंतर होणारे नुकसान (शारिरीक व आर्थिक, मी भरून देईन)
२. आतापर्यंत जेव्हा जेव्हा अँटि-बायोटिक्स घेण्याची वेळ आली तेव्हा सर्व डॉक्टरांनी सोबत न चुकता अँटासिड घेण्यास बजावले होते. एकदा घेतले नाही तेव्हा जबरदस्त रिअ‍ॅक्शन आली. जनरली कोणतेही औषध न घेता नुसत्या आहाराने मला आजवर कधीच अ‍ॅसिडिटि झालेली नाही. पण अँटि-बायोटिक्स घेतल्यावर हमखास होते, असा अनुभव आहे.
अ‍ॅसिडिटी हा अ‍ॅंटीबायोटिकचा सामान्य साईड इफेक्ट नसून, बहुदा त्यासोबत दिलेल्या पेन किलर/ सूजनाशक/ तापाच्या औषधाचा असतो.
३. खरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पेशंटसाठी योग्य असा अँटि-बायोटिक्स डोस किती हा विचार करून डोस लिहून देणारे डॉक्टर आढळात नाहीत. चाइल्ड डोस आणि अ‍ॅडल्ट डोस असे सरसकट वर्गीकरण करूनच देतात. पर्टिक्युलरली माझी ड्रग-सेन्सिटिव्हिटी जास्त असल्यामुळे एक्सेस अँटि-बायोटिक्स डोसचा अनेकदा जबरी धक्का खाल्ला आहे.
असे मूर्ख नक्कीच आधुनिक वैद्यकाचे पदविधर नव्हेत. तुमचे वय, वजन, लिंग, पूर्वेतिहास, सोबत लिहिलेल्या औषधांशी संभाव्य क्रॉस रिअ‍ॅक्शन याचा विचार न करता पेन कधीच चालत नाही. तसा तो चालत असेल, तर त्या सद्गृहस्थांनी डिग्री सरळ नेऊन चोरबाजारात विकावी, व तुमच्यासारख्या पेशंटांनी त्यांच्याकडे जाणे थांबवावे, हा सल्ला. माफ करा, हा तुम्हाला वैयक्तिक प्रतिसाद नसून, तुमच्या समजूतींना आहे.

In reply to by आनंदी गोपाळ

सस्नेह Fri, 07/08/2016 - 12:03
अज्ञानमूल व पूर्वग्रहदूषीत प्रतिसाद
???? सदर प्रतिसाद हे माझे 'ज्ञान' अगर समजूत नसून अनुभव आहे, आनंदी गोपाळसाहेब. एखादा पेशंट, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, 'लवकर बरे करा' असे डॉक्टरांना निश्चितच म्हणेल पण 'मला अँटिबायोटिक्सच द्या' असे म्हणेल, हे अतिज्ञानी पेशंटच्या बाबतीत खरे असेल कदाचित, पण सर्वसामान्य पेशंटबद्दल मी लिहिले आहे, त्या वर्गातले नक्कीच म्हणणार नाहीत.
असे मूर्ख नक्कीच आधुनिक वैद्यकाचे पदविधर नव्हेत. तुमचे वय, वजन, लिंग, पूर्वेतिहास, सोबत लिहिलेल्या औषधांशी संभाव्य क्रॉस रिअ‍ॅक्शन याचा विचार न करता पेन कधीच चालत नाही. तसा तो चालत असेल, तर त्या सद्गृहस्थांनी डिग्री सरळ नेऊन चोरबाजारात विकावी, व तुमच्यासारख्या पेशंटांनी त्यांच्याकडे जाणे थांबवावे, हा सल्ला.
डॉक्टर लोकांवरील प्रामाणिक टिप्पणीबद्दल धन्यवाद !!

अप्पा जोगळेकर गुरुवार, 07/07/2016 - 11:34
अत्यंत उपयुक्त लेख. प्रतिजैविके विषाणू मारताना त्याबरोबर शरीरातील प्रथिनेही मारतात आणि त्यामुळे अशक्तपणा येतो हे खरे आहे का ? प्रथिन हे रसायन असते किंवा असावे. मग प्रथिने मरतात म्हणजे काय ? बाकी, ताप अंगावर काढणे चांगलेच असे वाटू लागले आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

सुबोध खरे Fri, 07/08/2016 - 13:02
अप्पासाहेब ताप आल्यामुळे शरीरातील रासायनिक क्रिया जलद होऊ लागतात( जितके तापमान वाढते तितक्या जास्त) हा रसायनशास्त्राचा मूळ सिद्धांत आहे. याप्रमाणे आपली प्रतिकारशक्ती सुद्धा जास्त सक्रिय होते परंतु एक विशिष्ट पातळीपेक्षा जास्त तापमान वाढल्यामुळे उपयोगापेक्षा नुकसानच जास्त होते. ( आपली प्रतिकारशक्ती एक विशिष्ट पातळीपेक्षा जास्त सक्रिय होऊ शकत नाही). एकदा फ्लू झाला असताना मी हा प्रयोग स्वतःवर करून पहिला. ताप बराच वाढला तरीही औषध घेतले नाही. चार दिवसांनी ताप स्वतःहून बरा झाला. पण न भूतो न भविष्यति असा अशक्तपणा आला. तेंव्हा पासून ताप जास्त झाला तर जास्त शहाणपणा न करता मी औषध घेतो. लहान बाळाबाबत ( ५ वर्षा खालील) असा प्रयोग कोणीही चुकूनही करू नये याचे कारण लहान बाळाचा मेंदू पूर्ण विकसित झालेला नसतो आणि ताप जास्त वाढला तर मेंदूत जाऊन बाळाला फिट्स येऊ शकतात.

राजाभाउ गुरुवार, 07/07/2016 - 11:53
अत्यंत महत्वपुर्ण विषयावरील खुप सोप्या भाषेत नेहमी प्रमाणे समजाउन सांगणारा लेख. प्रतिजैविके बद्दलचे खुप गैरसमज यामुळे दुर होण्यास मदत होइल. मुळ धाग्यात आणि प्रतीसादां मघुन इतकी उत्तम माहीती दिल्या बद्दल मनापासुन धन्यवाद. एक शंका बर्याच वेळेला डॉ. कल्चर चाचणी करायला सांगतात. साधारण पणे जिवाणुं जिवाणुं मध्ये असणारे सुक्ष्म फरक समजाउन घेउन उपाययोजना करणे असा या चाचणीचा उपयोग असतो असा माझा समज आहे. तर कल्चर चाचणी या बद्दल थोड सांगु शकाल का डॉ. साहेब ?

In reply to by राजाभाउ

सुबोध खरे गुरुवार, 07/14/2016 - 11:39
राजाभाऊ कल्चर चाचणी-- यात आपल्याला ज्या भागाला जंतू संसर्ग झाला आहे तेथे कोणत्या विशिष्ट जिवाणू मुळे हा संसर्ग झालेला आहे हे समजणे भाग आहे. उदा एखाद्या मधुमेहाच्या रुग्ण असलेल्या स्त्रीला वारंवार मूत्र मार्गाचा दाह आणि जळजळ( जंतू संसर्ग) होत असेल तर डॉक्टर आपल्याला मुत्रचाचणी आणि लघवीचे कल्चर करायला सांगतात. यात प्रयोगशाळेत आपली लघवी जिवाणू वाढतील अशा काचेच्या डबीत ठेवून उबवली(incubate) जाते. २४ ते ४८ तासांनी त्यात तयार होणारे जंतू सूक्ष्म दर्शकाखाली पाहून कोणत्या तर्हेचे जिवाणू आहेत हे पाहिले जाते. शिवाय हे जन्तु कोणत्या प्रतिजैविकाला दाद देणार नाहीत आणि कोणते प्रतिजैविक त्याविरुद्ध सर्वात प्रभावी ठरेल हीही तपासणी केली जाते (antibiotic sensitivity test). समजा आपल्या लघवीत इ कोलाय हे जंतू सापडले आणि ते जर सिप्रोफ्लोक्ससीन या प्रतिजैविकाला रेझीस्टंट असतील तर हे प्रतिजैविक कितीही दिवस दिले तरीही रुग्णाला त्याचा काहीच फायदा होणार नाही. अशा वेळेस या चाचणीत समजा ते जिवाणू अँपिसिलिनला सर्वात जास्त संवेदनशील( sensitive) असतील तर सिप्रोफ्लोक्ससीन बंद करून अँपिसिलिन हे प्रतिजैविक चालू केलं असता त्यांचा रोग पटकन आटोक्यात येईल. या गदारोळात आपल्या प्रश्नाकडे लक्ष गेले नाही याबद्दल क्षमस्व.

अद्द्या गुरुवार, 07/07/2016 - 12:44
उत्तम माहिती डॉक्टर, वर विचारल्या प्रमाणे . अति औषधे घेतल्याने प्रतिकार शक्ती कमी होते हे बघितलंय . खरं की खोटं तुम्हीच जाणे . शाळेतला वर्गमित्र. आई वडील दोघेही डॉक्टर . घरातलेच डॉक्टर असल्यामुळे वेळच्यावेळी सगळी औषधे असत. पण अति काळजीवाहू पालक होते . याचा परिणाम असा की आम्ही बाहेर गेलो कुठे फिरायला / खेळण्यासाठी कुठल्या दुसऱ्या शहरात गेलं . की लगेच हा आजारी पडायचा. फक्त घरचंच "प्युरिफाइड " पाणी प्यायचा. त्याची कुठलीही जखम मी आपल्या आपण भरून निघताना पाहिलेली नाही . जरा कुठे कापलं खरचटलं तरी लगेच ड्रेसिंग करायचे..

शि बि आय गुरुवार, 07/07/2016 - 12:46
अत्यंत उपयुक्त लेख. सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत तो सादर केल्याबद्दल डॉक्टरांचे आभार.. मार्कस ऑरेलियस हयांना दिलेला प्रतिसाद वाचला आणि आपले शरीर निमूटपणे किती काय काय करत असतं ह्याची जाणीव झाली.

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/07/2016 - 13:13
ज्या तळमळिने ही माहिती साध्या सोप्या शब्दात दिलेली आहे.. त्या तळमळिला आधी एक नमस्कार, आणी दुसरा माहिती देण्याला. __/\__

प्रमोद देर्देकर गुरुवार, 07/07/2016 - 13:23
सर्व प्रथम तुमच्या धाडसाचे कौतुक आहे डॉ. साहेब. बाकी लेख आणि प्रतिसादही नेहमीप्रमाणेच मस्त. सोप्या भाषेतला माहितीपुर्ण.

स्वीट टॉकर गुरुवार, 07/07/2016 - 13:25
नेहमीप्रमाणेच सोप्या भाषेत अवघड विषय तुम्ही सहज समजावून सांगता. असं म्हणतात की प्रत्येक कुटुंबात एक डॉक्टर आणि एक वकील असावा. आम्हा मिपाकरांच्या नशीबानी आमच्या या कुटुंबात तुमच्यासारखे चांगले चांगले डॉक्टर आहेत ! वकीलही असतीलच पण अजून ओळख झालेली नाही. धनंजय मानेंनी आम्हाला तुमचे आणखी पैलू दाखवले ! धनंजय +१००

चौकटराजा गुरुवार, 07/07/2016 - 13:56
मी स्वतः मुळात फार कमी औषधे घेतलेला मनुष्य आहे. अर्थात मला बी पी व डायबेटीस दोन्ही असल्याने त्याची औषधे घ्यावीच लागतात.अलिकडे किडनी रक्षणासाठी एक ए सी इन्हिबिटर पण चालू झाले आहे. मला १९७९ पासून आजतागायत ९८ चे वर ताप आलेला नाही. त्याचे कारण मी उठ्सूट डॉ कडे जात नाही. मग प्रतिजौविक द्या असा आग्रह करण्याचा प्रश्नच नाही. खरे तर परिपूर्ण निष्कर्ष येण्यासाठी एलीमिशन मेथड वापरून विविध पॅथीचे मुल्पमापन करता येते पण हरेक माणसाचे शरीर वेगळे आहे ते दुनियेत कोणत्याही शाखेतील डॉ ला वा लॅबला पुरते कळलेले नाही. त्यामुळे सर्व बाबतीत कितीही अभ्यास केला तरी शेवटी व्यक्ती तितक्या प्रकृति हे सत्य उरतेच. त्यामुळे क्लिनिकली डेथ कॅन्डीडेट असणारे सुद्धा पुन्हा संजिवनीकडे वळलेले दिसतात. मग विल पावर वगैरे प्रवाद अपरिहार्यपणे प्रस्थापित होतात. डॉ डॉयर यानी आपल्या पुस्तकात माईन्ड द अनेक्प्लोअरड अलाय असे एक प्रकरणच यावर लिहिलेय. त्या पुस्तकाची अर्पण पत्रिकाच अशी आहे त्याने ईश्वराला विचारले ... देवा मी उत्तम आरोग्य युक्त आयुष्य मिळविण्यासाठी काय करावे...... " आपले आईवडील काळजीपूर्वक पणे निवड " ईश्वराने उत्तर दिले. मला मिळालेली बर्‍यापैकी प्रतिकारशक्ती ही माझ्या आईकडून मिळाली असावी असा माझा कयास आहे. ता.क. पुण्यातले एक डॉ ह्याना धनवन्तरी पारितोषिक मिळाले त्यावेळी सत्कार प्रसंगी त्यानी एक वाक्य सांगितल्याचे आठवते ते असे " उठसूट डॉ कडे न जाणे हे रोग्याचे पहिले कर्तव्य आहे..... !"

In reply to by चौकटराजा

मुक्त विहारि गुरुवार, 07/07/2016 - 20:37
+ १ त्याच बरोबर, चौरस आहार, आहार आणि विहारात नियमितपणा, ह्या पण गोष्टी तितक्याच महत्वाच्या असतात.

In reply to by मुक्त विहारि

सुबोध खरे गुरुवार, 07/07/2016 - 20:44
+ १०० चौरस आहार, आहार आणि विहारात नियमितपणा, ह्या पण गोष्टी तितक्याच महत्वाच्या असतात. मी यात थोडी सुधारणा करून एवढेच म्हणेन चौरस आहार, आहार आणि विहारात नियमितपणा, ह्या गोष्टीच "जास्त" महत्वाच्या असतात.

In reply to by चौकटराजा

चतुरंग गुरुवार, 07/07/2016 - 20:41
शरीराला बरं होण्यासाठी वेळ द्या.. विश्रांती आणि योग्य खाणे याने रोग आपापताच चटकन बरे होतात...

In reply to by चौकटराजा

आनंदी गोपाळ गुरुवार, 07/07/2016 - 22:37
तुमच्या चरणकमलांईचा फोटू पेस्ट करा हो! प्रिंटॉट काढून ल्यांमिनेट करून ओपीडीतल्या देवार्‍यात ठिवतो आन तीर्थ पेशंटांना वाटतो बगा! काब्रं इच्चारताय?
खरे तर परिपूर्ण निष्कर्ष येण्यासाठी एलीमिशन मेथड वापरून विविध पॅथीचे मुल्पमापन करता येते पण हरेक माणसाचे शरीर वेगळे आहे ते दुनियेत कोणत्याही शाखेतील डॉ ला वा लॅबला पुरते कळलेले नाही.
हेच्च बोल्डवलेले तुम्हाला कळले, त्यासाठी इतका खटाटोप हो! दुसरं कैनै. हरेक माणूस टीवीएस सुझ्कीच्या गाडीला १२ नंबरचा पाना अमुक स्क्रूला लागतो तसंच हे सगळे बिन्डोक डाक्टर समजतात, ह्ये तुमचं संशोदन नोबेल प्राईजला रेकम्येंड करायला हवं!!

बाळ सप्रे गुरुवार, 07/07/2016 - 13:59
अप्रतिम माहितीपूर्ण लेख.. होमिओ/ आयुर्वेद यांवरील मते देखिल मार्मिक.. जालावर अनेक चर्चांमधे त्यातल्या विवादास्पद मुद्द्यांवर (विरलीकरण /पदार्थांची उष्ण, थंड प्रकृती / इ ) प्रामाणिकपणे शास्त्रीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न सर्व चर्चा 'आलेले अनुभव' यावर घसरल्याने वृथा ठरल्याचेच पाहिलेत..

चतुरंग गुरुवार, 07/07/2016 - 20:07
सविस्तर माहितीपूर्ण लेखाबद्दल आणि तळमळीने जनांचे भले चिंतण्याच्या भावनेबद्दल शतशः धन्यवाद डॉक! __/\__ -रंगा

आदिजोशी Fri, 07/08/2016 - 12:39
कोणत्याही पॅथीमधे चांगल्या वाईट गोष्टी असतात. त्यामुळे ज्याला जे लागू पडते ते त्याने घावे हे माझे मत आहे. जोपर्यंत एखाद्या विषयात सरकारमान्य अभ्यासक्रम / पदवी मिळत आहे तोवर त्या गोष्टीला खोटे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. आयुर्वेद/होमिओपॅथीमधे रुग्णांना खोटं नाटं सांगून फसवण्यात येत असेल तर अ‍ॅलोपॅथीचे डॉक्टरही सलाईन लावण्यात आणि फुकटच्या टेस्ट करवण्यात पटाईत आहेत. डॉक्टरच्या चुकीच्या निदानामुळे जीव गेल्याच्या घटना दोन्हीकडे आहेत तसेच एका पॅथीमुळे बरे न होणारे रोग दुसर्‍या पॅथीमुळे बरे झाल्याची उदाहरणं सगळीकडे आहेत. त्यामुळे एका डॉक्टरने दुसर्‍या डॉक्टरला नावे ठेवणे म्हणजे काचेच्या घरात राहणार्‍याने दुसर्‍याच्या काचेवर दगड मारण्यासारखे आहे. त्यामुळे माझ्या मते पॅथी कुठलीही असो, न फसवणारा डॉक्टर मिळणे हे सगळ्यात महत्वाचे आहे.

In reply to by आदिजोशी

चौकटराजा Fri, 07/08/2016 - 13:47
डॉ स्वतः होऊन फसवत नाहीत ना ज्योतिषी. आपण विशिष्ट मानसिकतेने त्यांच्याकडे जात असतो.डिफरन्शियल डायग्नोसिस हे अधुनिक वैद्यकाचे वैशिष्ट्य आहे. ते अलोपथिक मेडिसिन पद्धतीचेच वैशिष्ट्य आहे असे नव्हे. आपली पॅथी ही सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे व ती समस्या मुळापासून नष्ट करण्यात पटाईत आहे असा दावा प्रायः अल्टर्नेट मेडीसिन या सदराखाली मोडणार्‍या सर्वांचा असतो. अलोपथीची प्रॅक्टीस करणारे बहुशः असा दावा करताना दिसत नाहीत. म्हणून डेंगीवर हुकमी उपाय नाही अशी कबुली द्यायला ते कचरत नाहीत. सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट देताना त्याना कमीपणा वाटत नाही. अलीकडे काही सॉफ्टवेअर अशी निघाली आहेत की ती कोणतीही जोडतोड न करता मदरबोर्डमधील खराब झालेल्या सुट्या भागाची यादी सादर करतात. तसेच काहीसे एम आर आय करीत असतात. या सोयी जितक्या स्वस्त होतील तितके डिफरन्शीयल डायग्नोसिस अधिक करावे लागणार नाही. ते स्वस्त होतील की नाही हे काळच ठरवेल.पण अतिअनावश्यक चाचण्या डॉ करायला सांगत असतीत असे खूप प्रॅक्टीशनर आपल्या तरी पाहण्यात नाहीत बुवा. पोटाला पर्कशन करून मुतखडा शोधा अशी अपेक्षा आपण करायचीच कशाला ?

सुबोध खरे Fri, 07/08/2016 - 13:09
इतर पॅथी वाले आमच्या औषधांनी कर्करोगात प्रतिकारशक्ती वाढते किंवा केमोथेरपीचे साईड इफेक्ट्स कमी होतात असा दावा करतात त्यासाठी एक धोक्याची सूचना आपण घेत असलेली औषधे नैसर्गिक किंवा हर्बल असली तरीही ती केमोथेरपी मध्ये अडथळा आणू शकतात. तेंव्हा अशी औषधे घेण्यापूर्वी आपल्या कर्करोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. http://cancer.northwestern.edu/press_releases/2011/07_july/herbal.cfm http://www.cancer.gov/about-cancer/treatment/cam Clinically-relevant chemotherapy interactions with complementary and alternative medicines in patients with cancer. http://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/20653549

वेल्लाभट Fri, 07/08/2016 - 13:42
http://health.spectator.co.uk/the-war-on-homeopathy-isnt-working-we-need-to-call-a-truce/ https://www.theguardian.com/commentisfree/2010/jul/15/homeopathy-works-scientific-evidence https://www.homeopathic.com/Articles/Introduction_to_HomeopathyA_Great_Introductory_Article_for_Advocates_O.html http://pib.nic.in/newsite/PrintRelease.aspx?relid=138690 अजून अनेक आहेत. देशा परदेशातले रिसर्च आहेत. जुने ताजे सगळे आहेत. सावकाश टाकेन.

In reply to by शलभ

वेल्लाभट Fri, 07/08/2016 - 14:23
शलभ, धाग्यात होमिओपॅथीला थेट चुकीचं ठरवलं गेलेलं असताना वेगळा धागा काढण्याचा प्रश्नच येत नाही.

In reply to by वेल्लाभट

शलभ Fri, 07/08/2016 - 15:32
तुम्हाला जे चुकीचं वाटतय ते होमिओपॅथीवाले प्रतिजैविके संबंधी काय गैरसमज पसरवतात हे आहे आणि ते कसं चुकीचे आहे ते सांगितलय. तुम्हाला चांगले अनुभव असतील होमिओपॅथी चे. मान्य. पण दुसर्‍या धाग्यावर येऊ द्या. हा आता तुम्हाला होमिओपॅथीवाले प्रतिजैविके वापरतात का ? असल्यास कशा प्रकारे ? नसल्यास जिवाणूजन्य रोगाचा ईलाज कसा करतात? ह्यावर माहिती येऊ द्या.

In reply to by शलभ

वेल्लाभट Fri, 07/08/2016 - 15:45
हाह! शंभरवेळा धाग्या-प्रतिसादात होमिओपॅथी होमिओपॅथी म्हणा आणि होमिओपॅथी बद्दल माहितीला वेगळा धागा?? तुमच्यात कोर्टात एकावेळी एकाच बाजूच्या व्यक्तीला प्रवेश असतो का?

In reply to by वेल्लाभट

सुबोध खरे Fri, 07/08/2016 - 21:56
@ वेल्लाभट "लोल" म्हणणे सोपे आहे. एक उदाहरण म्हणून संशोधन कसे असते हे दाखवत आहे. http://annonc.oxfordjournals.org/content/15/12/1798.full "Abstract" Background: Chemotherapy with ABVD (doxorubicin, bleomycin, vinblastine and darcarbacine) schedule is the standard treatment for advanced Hodgkin's lymphoma. In the present study, we prospectively evaluated the long-term efficacy and toxicity of six cycles of ABVD as treatment for early-stage Hodgkin's lymphoma. Patients and methods: From January 1990 to June 2002, 95 patients with stage I and II Hodgkin's lymphoma were treated with six ABVD cycles. Fifteen patients who met the criteria for mediastinal bulky disease also received further radiotherapy on the mediastinum. Results: After six cycles, 89 patients (94%) showed a complete response (CR) and six patients (6%) showed a partial response (PR). These PRs became CRs after radiotherapy. After a median follow-up of 78 months, 14 patients had relapsed and three had died. Overall survival and progression-free survival rates at 7 years were 96% and 84%, respectively. For patients with stage IA and IIA without mediastinal bulky disease, the survival rates were 97% and 88%, respectively. Conclusions: The administration of six ABVD cycles is an effective and safe treatment in patients with stage I and II Hodgkin's lymphoma. अशी एखादी सबळ पुरावा असलेली चाचणी दाखवा. ऐकीव माहिती द्यायची किंवा खाली दिलेली बातमी पुरावा( चौथा दुवा) म्हणून दिलीत. हे सोडुन द्या President Shri Pranab Mukherjee to inaugurate the International Convention on World Homoeopathy Day on 9th April, 2016. केविलवाणा प्रयत्न उद्या ज्योतिषाची कॉन्फरन्स मध्ये सादर होणारे पेपर्स पुरावे म्हणून द्याल. ते शास्त्रीय कसोटीवर टिकले पाहिजेत तर ते ग्राह्य धरले जातील. मी दिलेल्या सर्वच दुव्यांमध्ये आढळेल की होमियोपॅथी ने दिलेले बहुसंख्य संशोधन पेपर्स हे शास्त्रीय कसोटीवर "नापास" झाले म्हणून ऑस्ट्रेलिया युरोप आणि इंग्लंडात आता होमियोपॅथी च्या औषधांना विमा किंवा सरकारी परतावा देणे बंद झाले आहे किंवा होऊ पाहत आहे.

In reply to by सुबोध खरे

वेल्लाभट Sat, 07/09/2016 - 08:43
डॉक्टर तुम्हाला कुठलेही दुवे दिले तरीही तुम्ही हेच म्हणणार आहात हे माझ्या लक्षात केंव्हाच आलेलं आहे. दॅट्स व्हॉट आय मेन्ट बाय बींग रिसेप्टिव्ह अँड नॉट अ‍ॅडमन्ट. पण ठीक आहे तसंच असेल तर मग अजून दुवे देऊनही उपयोग नाही. @पिरा @डॉक आपला तो रिसर्च आणि दुसर्‍याचं ते सांगोपांग ही नवीन म्हण इथे वापरतो. चालू द्या.

In reply to by वेल्लाभट

पिलीयन रायडर Fri, 07/08/2016 - 23:20
ह्या तर बातम्या आहेत. लेख आहेत. I don't know how, but homeopathy really does work ह्या टायटलचा एक लेख आहे. हे दुवे कसे चालतील? रिसर्च पेपर्स लागतील ना. मागे म्हात्रे काकांनी कुठे तरी डिट्टेलमध्ये लिहीलं होतं की ह्या चाचण्या कशा होतात. तसे पेपर्स आहेत का? असल्यास नक्की द्या. अजुन एक कुतुहल. तुम्ही जेव्हा म्हणता की तुम्हाला ह्या पॅथीचा चांगला अनुभव आहे तेव्हा नक्की कोणत्या आजारांबाबत तुम्ही बोलत आहात? कारण आता वर वाचल्याप्रमाणे, सर्दी-ताप असे आजार शरीर स्वतःच दुरुस्त करते. एखाद्या मेजर आजारावर कुणी हे औषध घेतले आहे का?

In reply to by पिलीयन रायडर

असंका Sat, 07/09/2016 - 07:16
सर्दी-ताप असे आजार शरीर स्वतःच दुरुस्त करते.
मग मॉडर्न मेडिसीन्वाले ह्या आजारांसाठी औषधं देत नाहीत का? आणि देत असतील तर का देतात?

In reply to by असंका

सुबोध खरे Mon, 07/11/2016 - 13:52
विषाणूजन्य रोग -- यात सर्दी आणि बऱ्याच तर्हेचे खोकले येतात हे मर्यादित (self limiting)असतात. यात तीन ते दहा दिवसात रुग्ण स्वतःहून बरा होतो. हे रोग हवामान बदलले तर होणारे रोग आहेत. या रोगांमध्ये रुग्णाला आराम वाटावा म्हणून औषधे दिली जातात. उदा. फुफुसातील नसांचा दाह झाल्यामुळे वारंवार कोरडा खोकला येत असेल तर खोकला कमी/ बंद होण्यासाठी(antitussive) उदा. कोडीन सारखे औषध दिले जाते. पण जर खोकला जर घट्ट असेल तर तो प्रवाही होऊन त्यातील कफ बाहेर टाकणे सुकर व्हावे यासाठी (expecotrant) उदा. अडुळसा सारखी औषधे दिली जातात.आपल्या खकळ्यातून कफ पडून जाणे हे श्रेयस्कर असते कारण त्यातून जिवाणू किंवा विषाणूंचा शरीरातून निचरा होत असतो. जर विषाणूजन्य खोकला वाढून त्यात जिवाणूंचा प्रादुर्भाव झाला आणि आपल्याला हिरवा पिवळा कफ पडायला लागला तर त्यात प्रतिजैविक दिले जाते आणि नुसताच ऍलर्जी मुळे (उदा. काँग्रेस गवताची खोकला असेल तर antiallergy औषधे दिली जातात. सर्दी मध्ये पण अशाच तर्हेने औषधे दिली जातात. यामध्ये काही वेळेस रुग्णाची इतर परिस्थिती पाहूनही औषधे दिली जातात. उदा एखादा तरुण नोकरीसाठी मुलाखत देण्यास जाणार असेल तर सतत गळणारे नाक "काही काळासाठी" बंद कारण्यासाठी औषधे देतात. अगदी लहान मुलांना सर्दी झाली तर त्यांचे नाक फारच लहान असल्याने पटकन पटकन बंद होते आणि त्यामुळे ती दर अर्ध्या तासाने उठतात. मुलाला झोपवून आई बापानं झोप लागेपर्यंत परत आडवे ठेवल्याने नाक बंद होते आणि बाळ उठते. या कारणाने बाळ आणि त्याचे आईबाप रात्रभर जागे राहतात . आई बापानं दुसऱ्या दिवशी कामावर जायचे असले तरी रात्रभर झोप लागत नाही. मग बापाची बायकोवर आणि बायकोची बाळावर चिडचिड होते. अशावेळेस बाळाचे नाक उघडे ठेवण्यासाठी आणि झोप लागण्यासाठी त्याला sedative antiallergy औषध दिले जाते ज्यामुळे बाळ नाक कोरडे राहून रात्रभर झोपते. त्यामुळे आईबाप सुद्धा रात्रभर झोपून बाळाची काळजी जास्त चांगली घेऊ शकतात. अशा आजारांमध्ये आजार स्वतःहून बरा होईपर्यंत रुग्णाला आराम मिळेल( आणि जेणेकरून त्याची रजा फुकट जाणार नाही) अशा तर्हेची उपाययोजना केली जाते. दुर्दैवाने आपण भारतीय लोक खूप हुशार आहोत त्यामुळे कोरड्या खोकल्यासाठी दिलेले औषध आपण आपल्या नातेवाईक किंवा मित्रांना फुकट देतो सुचवतो यातून फुफ्फुसात असलेला कफ आतच राहून रुग्णाचा खोकला वाढतो. मग लोक आधुनिकी औषधांचे इफेक्ट्स जास्त आहेत म्हणून बोंब मारतात आणि इतर पॅथी वाले लोक आधुनिक वैद्यक रोग तिथल्यातिथे दाबून टाकतात असा अपप्रचार करायला हिरीरीने पुढे येतात

In reply to by सुबोध खरे

असंका Tue, 07/12/2016 - 07:56
डॉक्टरसाहेब, एवढा दीर्घ प्रतिसाद आपण दिला आहेत त्याबद्दल मःपूर्वक धन्यवाद. अनेक नवीन गोष्टी त्यातून कळल्या. खाली एखादा वावगा शब्द गेल्यास आगाउ क्षमस्व- डॉक्टरसाहेब मुद्दा हा नव्हता की नक्की काय उपाय केले जातात आणि तो उपाय करून काय साध्य होते. प्रश्न हा होता की हे सगळे उपाय अनावश्यकच आहेत तर का केले जातात ? वरचे दोन तीन प्रतिसाद वाचल्यावर काय अर्थ निघतोय बघा- १. होमिओपॅथी औषधं घेउन बरे झालात? त्यात काय शरीर स्वतःच बरं करतं...औषधांनी केलं काय? २. मॉडर्न मेडिसीन घेउन बरे झालात? हे झालं अमुक अमुक औषधांमुळे...ही औषधं मात्र आवश्यक होती.. हे असं म्हणणं अयोग्य वाटतं... (गैरसमज नको म्हणून भूमिका स्पष्ट करतो- एका मर्यादेपर्यंत होमिओपॅथी उपयुक्त आहे असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.)

In reply to by असंका

सुबोध खरे Tue, 07/12/2016 - 10:28
असं का साहेब होमिओपॅथी औषधं घेउन बरे झालात? त्यात काय शरीर स्वतःच बरं करतं...औषधांनी केलं काय?. यात एकच गोष्ट सांख्यिकीच्या दृष्टीने सांगू इच्छितो.. जर औषध घेतल्याने १०० पैकी ९० माणसे बरी होत असतील आणि औषध न घेता ८९ माणसे बरी होत असतील तर १०० माणसांना औषध देऊन एकच जास्त माणूस बरा होणार असेल तर तो काकतालीय न्याय( कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक गाठ पडणे) असू शकेल. शिवाय एक माणूस बरा करण्यासाठी १०० माणसांना औषध द्यावे लागेल. या उलट जेंव्हा एखादे औषध घेऊन १०० पैकी ९० माणसे बरी होणार असतील आणि औषध न घेता फक्त २५ माणसे बरी होणार असतील तर हा फरक अतिशय महत्त्वाचा आहे.(statistically significant) म्हणणे लक्षात येण्यासाठी मी टोकाचे उदाहरण दिले आहे. सध्या उपलब्ध असलेल्या सांख्यिकीनुसार जगभरात झालेल्या असंख्य चाचण्यांत होमियोपॅथीची औषधे कोणतेही औषध नसलेली पांढऱ्या गोड गोळी (प्लासिबो)पेक्षा जास्त परिणामकारक नाहीत असे सिद्ध झालेले आहे. यामुळेच बहुतेक युरोपीय देशात, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत त्या उपचाराला सरकारी अनुदान किंवा विम्याचा परतावा दिला जात नाही किंवा बंद होण्याच्या मार्गावर आहे. ज्याचा विश्वास आहे त्याने स्वतःचे पैसे खर्च करून हवा तो इलाज करावा. पण जेंव्हा सरकारने आम्हाला हा उपचार स्वस्तात किंवा फुकटात उपलब्ध करून द्यावा ही मागणी येते तेंव्हाच हा प्रश्न येतो. ( हा प्रश्न मिसळपाव वर नाही) जेंव्हा सरकार तुमच्यासाठी पैसे खर्च करते तेंव्हा सरकारकडे असलेल्या मर्यादित साधनांचा सर्वोत्तम उपयोग झाला पाहीजे(optimum utilisation of resources.)या बद्दल दुमत असायचे कारण नाही. मुलाची फी भरायची आहे की नवा मोबाईल घ्यायचा आहे यामध्ये साधारणपणे वाद असणार नाही. वैयक्तिक पातळीवर गेलात तर कुणाला कुठच्या उपचार पद्धतीवर विश्वास आहे आणि कुणाला कुठल्या उपचार पद्धतीने फायदा होईल हे त्या व्यक्तीच्या प्रकृतीप्रमाणे असेल. बापूसाहेबाना लिहिलेल्या प्रतिसादात मी म्हणालो आहे की आजाराचे पूर्ण निदान झाल्यावर त्यावर कोणती उपचार पद्धती वापरावी हे त्या माणसाला ठरवु द्या. आज इतर पॅथी वाले विविध चाचण्या करूच नये आणि केल्या तर त्या केवळ पैसे काढण्यासाठीच असतात हा प्रचार( त्यात थोडेफार तथ्य आहे याबद्दल शंका नाहीच) आपली टिमकी वाजवण्यासाठी चालवला आहे त्यामुळे जनतेचे नुकसान होत आहे. उदा. जुन्या पाठदुखीबद्दल एक्स रे न करता इलाज करणे हे चूक आहे कारण त्यामुळे गंभीर आजाराकडे दुर्लक्ष होऊ शकते. पूर्ण निदान झाल्यावरच आणि खोटा दावा न करता वस्तुस्थिती समजावून देऊन इलाज करणारे होमियोपॅथ किंवा आयुर्वैद्य संख्येने फार कमी आहेत. आम्ही एड्स, कर्करोगासारखे गंभीर आजारसुद्धा खात्रीने बरे करून देतो हा अपप्रचार चालवला आहे याबद्दल माझा आक्षेप आहे. महाराष्ट्रात ८ कोटी लोक आहेत यात ५ % लोक जरी इतर पॅथीचा वापर करत असतील आणि यातील ५ % लोक जरी बरे झाले तरीही ते २ लक्ष लोक होतात. त्यामुळे आमच्या पॅथीने बरी झालेली "प्रच्चंड" उदाहरणे आहेत हा दावा सांख्यिकीवर कुठे उभा आहे ते सहज लक्षात येईल. आधुनिक वैद्यकशास्त्राची स्वतःच्या मर्यादा फार मोठ्या आहेत. आणि या मर्यादा उघडपणे सांगण्यास त्यांना लाज वाटत नाही. परंतु शास्त्र म्हणून एखादा रोग "बरा करतोच" असे आधुनिक वैद्यकशास्त्र म्हणत नाही. हाच आधुनिक आणि प्राचीन उपचार पद्धतीत फरक आहे. मी त्या प्रणालींच्या व्यावसायिकांच्या दाव्याबद्दल बोलत नाही.( उदा डॉ बात्रा साहेब टकलावर केस उगवण्यापासून, कर्करोग, वंध्यत्व, एड्स वर सगळ्यावर "खात्रीने" तो सुद्धा "साईड इफेक्टस शिवाय" इलाज करण्याचा दावा करतात). डॉ. बात्रा हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. मूळ मुद्दा असा आहे की आपल्याला जुनी सर्दी आहे किंवा शरीरावर चामखीळ आहे. एकदा निदान बरोबर झाले की त्यावर आपण कोणता इलाज करता हा आपली वैयक्तिक निवड (चॉईस). होमियोपॅथी किंवा आयुर्वेदिक उपचारांनी बरे झालेले अनेक रुग्ण मीसुद्धा पाहिलेले आहेत. तेंव्हा या पॅथी निरुपयोगी आहेत असे माझे म्हणणे नाही. आधुनिक वैद्यकशास्त्र हे जास्त खर्चिक आहे आणि जशी जशी त्यात प्रगती होत आहे तसे तसे उपचार जास्त उत्तम होत आहेत परंतु या सर्वांसाठी एक किंमत मोजायला लागते ती मोजण्याची मानसिकता भारतीय माणसांची नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून या पॅथी भारतात मोठ्याप्रमाणावर चालतात हीही एक वस्तुस्थिती आहे. आपल्या कार ला ABS प्रणाली (ANTI LOCK BRAKE SYSTEM) लावण्यापेक्षा आपण लिंबू आणि मिरची ( ५ रुपयात रोज नवी) लावण्यात समाधान मानतो हीच मनोवृत्ती आहे. परंतु जेवढ्या मोठ्या प्रमाणावर राजकारणी लोकांनी होमियोपॅथी आणि आयुर्वेदिक कॉलेज काढली आहेत आणि त्यातून बाहेर पडणारे अर्ध शिक्षित डॉक्टर यांचे पेव फुटले आहे. यामुळे त्यांनी आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर अपप्रचार चालवला आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो आधुनिक औषधांचे साईड इफेक्ट्स या विषयाला होमियोपॅथीच्या तिसऱ्या वर्षात २० गुण ठेवलेले आहेत. हे म्हणजे "भारतीय सेना काश्मिरी मुसलमानांवर अत्याचार करते यावर पाकिस्तानात शाळेच्या इतिहासाच्या सातवीच्या पुस्तकात धडा आहे" तसेच आहे. संवेदनशील मुलांचे मन कलुषित करणे यासारखी हीन वृत्ती दुसरी नसेल. यामुळे होमियोपॅथीचा विद्यार्थी बाहेर पडला की पहिल्या दिवसापासून साईड इफेक्टसचा पारायण करायला सुरुवात करतो. ज्याने ज्या इतर पॅथीचा वापर करायचा आहे त्यानं तो डोळस पणे करावा इतकेच माझे म्हणणे आहे.

In reply to by सुबोध खरे

असंका Tue, 07/12/2016 - 11:03
अरे देवा...उगाळावा तितका काळाच होत चाललाय की.... असो..हे परत काहीच माहित नव्हतं (विशेष करून २० मार्कांबद्दल). पण हे असं असलं तरी हा अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव भाग झाला. माझी होमिओपॅथीबद्दलची भूमिका अशी नाही. माझ्या माहितीतले होमिऑपॅथ काय होतंय ते लिहून घेउन औषध लिहून देतात इतरांबद्दल एक शब्द बोलत नाहीत. झालंच तर आमच्या घरीच होमिओपॅथीची खंडीभर पुस्तकं आहेत. यात एक गोष्ट अशी होते की सगळे उपाय थकल्यावर होमिओपॅथीकडे आम्ही जात नाही. होमिओपॅथी थकल्यावरच आम्ही इतर ठिकाणी जातो. त्यामुळे इतर उपायांनीच तुम्ही बरे झाले असं म्हणायला माझ्याकडे तरी स्कोप नाही. टेक धिस विथ अ पिंच ऑफ सॉल्ट, कारण "अर्र तुम्ही आधीच यायला पाहिजे होतंत" असंही डॉक्टर (मॉडर्न वाले) आम्हाला म्हणालेत. प्राणघातक ठरू शकतील अशा आजारांमध्ये मॉडर्न मेडिसीनकडेच वळलेलो आहे. तुमच्या अधिकार क्षेत्रात लुड्बूड केली त्याबद्दल क्षमस्व... परत एकदा धन्यवाद...

In reply to by सुबोध खरे

वेल्लाभट Tue, 07/12/2016 - 11:21
होमियोपॅथी किंवा आयुर्वेदिक उपचारांनी बरे झालेले अनेक रुग्ण मीसुद्धा पाहिलेले आहेत. तेंव्हा या पॅथी निरुपयोगी आहेत असे माझे म्हणणे नाही.
धिस इज अ हाइट डॉक. आमचं म्हणणं वेगळं नव्हतं काही. तुम्हाला हेच म्हणत होतो, की सरसकट खोटं तुम्ही कसं ठरवू शकता एखाद्या औषधाला जे गेली २०० वर्ष लोक घेतायत व बरे होतायत, आजही. तुमचा मुद्दा धरून इतरांना खोटं म्हणेपर्यंत ठीक होतं, पण तुमच्याकडून किमान हा दुतोंडीपणा अपेक्षित नव्हता. आता स्पष्ट आहे, वेळ कुणी कुणाचा फुकट घालवला ते.

In reply to by वेल्लाभट

सुबोध खरे Tue, 07/12/2016 - 13:26
वा वेल्लाभट दुतोंडीपणा वेळ कुणी कुणाचा फुकट घालवला ते. काय भाषा आहे आपली? बैलगाडी सुद्धा हजारो वर्षे चालू आहे म्हणून ती तुम्ही मुंबईत किंवा दिल्लीत वापरता का? केवळ एखादे औषध २०० वर्षे चालू आहे म्हणून ते वापरावे याला काय आधार आहे. एखादे औषध परिणामकारक आहे हे सिद्ध करून दाखवा म्हणालो तर भराभर चिंध्या पाठवल्यात. आबासाहेबांनी त्याचे चिकाटीने विच्छेदन केले त्यावर उडवाउडवीची प्रतिसाद दिलेत. आपल्या सर्व प्रतिसादात लोकांनी काही घ्यावे असे काही निघाले का हे ही तपासून पहा. मग कुणी वेळ फुकट घालवला ते विचारा. आधुनिक औषधात केवळ २०० वर्षे चालू आहे म्हणून औषध दिले जात नाही तर परिणामकारक असेल आणि त्याहूनही अधिक परिणामकारक औषध नसेल तरच ते दिले जाते. मी जे म्हणालो आहे की इतर पाठी मध्ये साचलेपण आलेले आहे ते तुम्हीच आड मार्गाने म्हणता आहात. होमियोपॅथी निरुपयोगी आहे हे मी कुठे म्हणालो आहे हे सांगाल का? मी फक्त एवढेच म्हणतो की एकदा नक्की निदान झाल्यावर रुग्णाने ठरवावे की कुठली पॅथी वापरावी. आधुनिकी निदान तंत्रज्ञान हे केवळ पैसेकाढूपणाचे धंदे आहेत हा अपप्रचार चालवला आहे याबद्दल मी टिप्पणी केली. आजमितीस झालेल्या संशोधनात होमियोपॅथी ही प्लॅसिबोपेक्षा जास्त परिणामकारक सिद्ध झालेली नाही हे मी पुराव्यासकट दिले आहे. त्याचा लोकांना उपयोग होतो की नाही यावर मी बोलत नाही. याची अनेक कारणे आहेत. (तुम्ही वेगळा धागा काढा त्यावर मी सविस्तर चर्चा करेन असे मी तुम्हाला आव्हान देतो) सद्यस्थितीत होमियोपॅथी कोणत्याही संसर्गजन्य रोगात उपयुक्त ठरलेली नाही हे काळानेच सिद्ध केले. बाकी सोडा हो -- हा धागा प्रतिजैविकांवरच आहे तरी प्रतिजैविके येण्यापूर्वीच आपली २०० वर्षे घेत असलेली औषधे होतीच ना मग जगभरात कॉलरा, देवी, प्लेग विषमज्वर याला कोट्यवधी लोक बळी का पडले याचे साधक बाधक उत्तर आपण देऊ शकाल का? उगाच आक्रस्ताळे प्रतिसाद देऊन काहीही निष्पन्न होत नाही. आपला इगो दुखावला गेला आहे यामुळे आपण असे करत आहात असे मी समजतो.पण तो दुखावला जाईल असा माझ्याकडून कोणताही वैयक्तिक प्रतिसाद गेलेला नाही. जर तसे झाले असेल तर क्षमस्व. असो.

In reply to by सुबोध खरे

जाऊ द्या डॉक साब,समजणे समजावणे अन संयमाच्या पलीकडले आहेत काही लोक, तुम्ही बोलून उपयोग नाहीये, असे सुचवतो. (अनुभवाचे बोल) बाप्या अवांतर :- डॉक्टर साहेब, आधुनिक किंवा कुठल्याही इतर औषधशास्त्रात 'तिरसटपणाला' औषध आहे का हो? :P

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सुबोध खरे Tue, 07/12/2016 - 15:20
बापूसाहेब प्रसिद्ध खगोलशास्त्र विशेषज्ञ श्री दा कृ सोमण यांनि माझ्या लहानपणी मला सांगितलेले एक वाक्य मी आजही उद्धृत करतो. मी त्यांना विचारले की एवढ्या कोट्यवधी किमी वर असलेल्या ग्रहांचा मानवी आयुष्यावर परिणाम होतो काय? त्यावर ते म्हणाले ग्रहांचा होतो की नाही ते माहीत नाही पण दुरा"ग्रहाचा" मात्र होतो

In reply to by सुबोध खरे

वेल्लाभट Tue, 07/12/2016 - 14:37
हे नमूद करून तुमचीच दोन वाक्य डकवतो डॉक्टर. - आतापर्यंत झालेली एकही शास्त्रीय चाचणी सज्जड पुराव्यानिशी हे सांगत नाही की होमिओपॅथी ही नक्कीच काम करते. - होमिओपॅथी काम करीत नाही हे सिद्ध करण्यासाठी पुरावे ढीगभर मिळतील. AND - होमियोपॅथी किंवा आयुर्वेदिक उपचारांनी बरे झालेले अनेक रुग्ण मीसुद्धा पाहिलेले आहेत. तेंव्हा या पॅथी निरुपयोगी आहेत असे माझे म्हणणे नाही. ही उघड विसंगती जर दिसत नसेल कुणाला, तर कठीण आहे. चालू द्या. आमचाही वेळ अमूल्यच आहे, कुणाला वाटला नाही तरी.

In reply to by वेल्लाभट

सुबोध खरे Tue, 07/12/2016 - 15:16
विसंगती-- माझ्या जन्माच्या वेळेस केलेल्या पत्रिकेमध्ये हा डॉक्टर होईल लष्करात जाईल आणि तो सर्व मानमरातब सोडून येईल असे "लिहिलेले" आहे. मला दुर्दैवाने मुंबईत एम बी बी एस मध्ये प्रवेश साठी ०२ गुण कमी पडले. ए एफ एम सी मध्ये प्रवेश मिळाला म्हणून मी तेथे गेलो आणि नंतर लष्कर सोडूनही आलो. याला आपण काय म्हणाल योगायोग? फलज्योतिष हे जर सांख्यिकीच्या जोरावर सिद्ध करायचा प्रयत्न केला तर ते अनुमान धपक्याच्या पेक्षा जास्त चान्गले आहे हे सिद्ध झालेले नाही. पण माझ्या दृष्टीने ते भविष्य बऱ्याच प्रमाणात खरं ठरलं या बद्दल काय म्हणायचं ? म्हणून आयुष्यात एखादा महत्त्वाचा निर्णय हा केवळ ज्योतिषावर अवलंबून घ्यायचा का ? याला तुम्ही विसंगती म्हणा नाही तर दैवगती. या पेक्षा जास्त काही मी आपल्याला समजावू शकत नाही. परत मी एकच म्हणेन. आपला आजार काय आहे याचे नक्की निदान आधुनिक तंत्रज्ञानाने करून घ्या. यानंतर डोळे उघडे ठेवून कोणत्या पॅथीकडे जायचे ते ठरवा. जीवाशी येईपर्यंत उशीर करू नका. बाकी आपली मर्जी

In reply to by वेल्लाभट

अनुप ढेरे Tue, 07/12/2016 - 13:32
अहो वेल्लाकाका, ते म्हणतायत की जे लोक बरे होतात ते प्लसिबो इफेक्टमुळे होतात. औषधांमुळे नाही. बाकी एवढं संयत भाषेत समजवणार्‍या माणसाबद्द्ल ही भाषा वापरलेली पाहून वाईट वाटलं.

In reply to by अनुप ढेरे

वेल्लाभट Tue, 07/12/2016 - 14:29
सॉरी ढेरे सर, त्याला माझा इलाज नाही. खरे साहेबांच्या युक्तिवादातल्या विसंगतीकडे बोट दाखवलं तर त्यात मि 'अशी भाषा' वगैरे काही वापरलेली मला वाटत नाही.

In reply to by पिलीयन रायडर

वेल्लाभट Sat, 07/09/2016 - 08:46
तुम्ही दुवे नीट वाचलेले दिसत नाहीत. त्यात मेजर म्हणायला कॅन्सरपासून रोगांबद्दल लिहिलेलं आहे आणि होमिओपॅथी बद्दल. आता तेही सांगोपांग वाटू शकतं म्हणा.

In reply to by वेल्लाभट

आबा Sun, 07/10/2016 - 20:39
१) पहिली लिंक हेल्थ स्पेक्टेटर मधले हे आर्टिकल निरर्थक आहे, लेखाची सुरुवात "आय अ‍ॅम नॉट अ बिलिवर इन होमिओपथी... बद आय लव्ह द टेस्ट..." वगैरे अशी काहीतरी आहे पुढे होमिओपॅथी नष्ट होत नाही असा मुद्दा सिद्ध करण्यासाठी होमिओपथीची तुलना डूम्स डे या कार्टून व्हिलनशी केली आहे, तोच तर्क पुढे चालवला तर अ‍ॅलोपथीची तुलना "सुपरमॅनशी" करावी लागेल,.. असो at least he isn't guilty of over thinking his metaphors... सहाव्या पराग्राफ मध्ये त्या लेखामधलं एकमेव कोहेरंट वाक्य आहे "research is only as good as the hypothesis and the methodology used to prove or disprove that hypothesis"... वॉटर मेमरी सारखं नॉन अ‍ॅव्हॅगॅड्रो हायपॉथिसीस तर सोडाच पण एखाद्या होमिओपॅथिक औषधाचा प्लासिबोच्या पलिकडे परिणाम होतो हे सुद्धा यांना एफिकेशसली सिद्ध करता आलेलं नाही, याची लेखकाला कल्पना नसावी. या लेखामध्येच दिलेली चाचणीची एकमेव लिंक सुद्धा निगेटिव्ह रिजल्ट्स दखवते आहे. :) शेवटचा पराग्राफ तर आणखीच विनोदी आहे "होमिओपॅथीच्या टेस्ट्स घ्या, पॉजिटिव्ह आल्या तर ठीक, निगेटिव्ह आल्या तर ऊद्धटपणे होमिओपथी बंदी घालण्याऐवजी ब्रिटिश नॅशनल हेल्थ ऑर्गनायजेशनने (एन.एच.ए.) त्यांना पैसे द्यावेत की नाही यावर चर्चा करावी"... निगेटिव्ह निकाल आले तर पैसे द्यावेत की नाही याची चर्चा करावी ??!, या लेखकाने दुसर्‍याला ऊद्धट म्हणावं यासारखी मजा नाही... :) असो... "होमिओपथीच्या औषधांचा प्लासिबो पलिकडे परिणाम होत नाही हे ब्रिटिश होमिओपॅथीक असोसियेशन (बी.एच.ए.) स्वतःच अनेक टेस्ट्स नंतर कबूल केलेलं आहे", तरीही एन.एच.ए. त्यांना वर्षाला पाच दहा मिलियन पौंड देते, याच्या सारखा निर्लज्जपणा नाही. आता आयुष सुरू करून भारतही त्याच रांगेत जाउन बसला आहे... २) दुसरी लिंक लेखिका रॉबर्ट्स पूर्वी न्यूरोसायन्स मध्ये पी.एच.डी. करत होत्या, त्यांनी ते क्षेत्र सोडून होमिऑपथीची पदवी घेतलेली आहे. गार्डियन मधल्या या लेखात स्पष्टपणे मांडलेला (पण चुकीचा) असा एकच मुद्दा आहे, तो म्हणजे ब्रिटिश होमिओपथीक असोसियेशनने (बी.एच.ए.) , ब्रिटिश सरकारला दिलेल्या मेमॉरेंडमची लिंक (एच.ओ. १२). "होमिओपथी ला वैद्यक शास्त्राचा दर्जा मिळावा की नाही? (आणि एन.एच.ए. ने त्यांना पैसे द्यावेत की नाही?)" या प्रश्नावर संशोधन करण्या साठी ब्रिटिश सरकारने २००९ मध्ये एका समितीची स्थापणा केली होती, तिच्या अहवाला सोबत हे मेमॉरेंडम जोडलेले आहे (बाकिचा अहवाल वगळून फक्त हे मेमॉरेंडमच जोडण्यामधली लबाडी सोडून देऊ). अशीच मेमॉरेंडम्स अनेक डॉक्टर्स आणि संघटनानी दिलेली आहेत, ऊदा. होमिओपॅथेक फार्मासिसस्टस् असोसियेशन, रॉयल फार्मासिसस्टस् असोसियेशन (ती सर्व वरच्या अहवालासोबत जोडलेली आहेत). असो, तर अनेक पेपर्स वाचून डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांच्या साक्षी घेऊन या समितीने "होमिओपथी हे मिथक आहे" असा निकाल दिला होता, एन.एच.ए. ने त्यांना पैसे देऊ नयेत अशीही सूचना केली होती (पान नं बेचाळीस). या अहवालाची लिंक लेखामध्ये न देण्यामागचे कारण समजण्यासारखे आहे, परंतू बी.एच.ए.च्या मेमॉरेंडमचा उल्लेख करताना त्यामध्ये दिलेले संदर्भ तरी वाचण्याचे कष्ट घ्यायचे (मी सर्व संदर्भ वाचलेले आहेत)! "५ पैकी ४ रेव्हूज मध्ये पॉजीटीव्ह निकाल येतात" अशी धडडीत खोटी माहिती इंटरनेट्च्या काळात देण्याची हिम्मत वाखाणन्याजोगी आहे, या दाव्यामधला खोटेपणा प्रोफेसर अर्न्स्टने सप्रमान दाखवला आहे (पान नं Ev 51). हा अहवाल मुळातून वाचावा अशी आपल्याला विनंती आहे, विषेशतः त्यामध्ये दिलेल्या वैज्ञानिकांच्या साक्षी. या लेखामधली पुढची थाप म्हणजे होमिओपथीचे मुख्य हायपोथिसिस हे प्रयोगातून सिद्ध करता येते. हे हायपॉथिसिस म्हणजे प्रचंड प्रमाणात विरल केलेल्या द्रावणामध्ये द्राव्याचे गुणधर्म शिल्लक राहतात. खरी गोष्ट अशी आहे की हे गृहीतक सिद्ध करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न आजपर्यंत झाले आहेत. अनेक शास्त्रज्ञांनी आटोकाट प्रयत्न करूनही त्यांना थोडेही यश मिळालेले नाही. परंतु यातला एक उल्लेखणिय प्रयोग केला होता तो "जॅक बेन्वेनीस्त" (Jacques Benveniste) नावाच्या एका फ्रेंच शास्त्रज्ञाने इ.स. १९८८ मध्ये. बेन्वेनीस्तचा (अर्थातच चुकीचा) दावा असा होता की होमिऑपॅथीच्या औषधांइतक्या प्रचंड विरल केलेल्या द्रावणामध्ये सुद्धा विरघळवलेल्या पदार्थाचे गुणधर्म शिल्लक राहतात. जसे काही ते पाणी, त्यामध्ये पूर्वी विरघळवलेल्या (आणि अतिषय विरल केलेल्या) पदार्थांना लक्षात ठेवते. या गुणधर्माला बेन्वेनीस्तने "वॉटर मेमरी" म्हणजेच पाण्याची स्मरणशक्ती असे नाव दिले. बेन्वेनीस्तचा दाखला देऊन होमिओपॅथीचे व्यावसायिक असं सांगू लागले, की होमिओपॅथीच्या औषधांचा परिणामही वॉटर मेमरी मुळेच होतो. परंतु हा प्रयोग बेन्वेनीस्तला परत करून दाखवायला सांगितला असता त्याला तो अर्थातच कधीही जमला नाही. नंतर असेही समोर आले की बेन्वेनीस्तच्या गटामधल्या काही शास्त्रज्ञांना होमिओपॅथीच्या व्यावसायिकांनीच लाच दिली होती. नेचर मासिकामध्ये प्रसिद्ध झालेला हा पेपर कधीही माघारी घेतला नाही. अभूतपूर्व टीका झाल्यानंतर स्वतः नेचरच्या संपादकांनी तो प्रयोग पुन्हा करून पहिला (रिजल्ट अर्थातच निगेटिव्ह आला). या दरम्यान झालेल्या प्रचंड चर्चेवर संपादकांनी स्वतःही नंतर एक लेख लिहिला ज्यात सर्व प्रयोगाचा उहापोह केलेला आहे. वॉटर मेमरी तपासण्याचे अनेक प्रयत्न त्यानंतर झाले, परंतु असा कोणताही गुणधर्म अस्तित्वात नाही हेच वारंवार सिद्ध झाले. "वॉटर मेमरी" हा शब्दही विज्ञानाच्या क्षेत्रात आजकाल फक्त एक चेष्टेचा विषय म्हणून शिल्लक राहिला आहे. अनेक वेळा तोंडावर आपटूनही परत परत तीच टेप वाजवण्याएवढी हिम्मत कोठून येते कळत नाही. पण यांच्या थापा ऐकून आणि एकून विचार करण्याची क्षमता पाहून यांनी न्यूरोसायन्स सोडून दिलं हे बरं झालं असं वाटतं. एकून एक दावा खोटा असणारे असले लेख गार्डियन सारख्या ठिकाणी कसे छापतात असा प्रश्न मला पडला, परंतू विज्ञान विभागात न देता "Life and style" सेक्शन मध्ये दिला आहे ते पाहून प्रश्नाचे उत्तर मिळाले. होमिओपथी ही फक्त एक फॅशन आहे याचीच ती कबूली आहे. ३) तिसरी लिंक The page you requested could not be found. असा मेसेज येत आहे. मी बाकीची वेबसाईट चाळून पाहीली आणि त्यातले लेख वाचले. परंतू त्यातही वरती दिलेल्या थापा आणि टिपिकल जाहिराती आहेत. एखादे औषध काम करते असे कळाले की एफ.डी.ए. च अ‍ॅप्रूव्हल घेउन प्रमाणित करून घेण्याऐवजी पुलाखाली बसण्यार्‍या वैदू सारखी "मिरॅक्युलस", "मॅजीकल" वगैरे जाहीरात करत बसायची, आणि कोणी अंधश्रद्धा म्हणालं बोंबाबोंब करायची यामागचं लॉजिक कळत नाही. ४) चौथी लिंक बहुतेक तुम्हाला दुसरं काही सापडलं नसावं... अहो हे आयुषच्या उद्घाटना निमित्त दिलेले प्रणव मुखर्जींचे प्रेस रिलीज आहे. त्यातून काय सिद्ध होणार? माझा मुख्य मुद्दा असा आहे की होमिओपॅथीचा उपयोग होतो की नाही ही फार पुढची गोष्ट झाली (अर्थात यातही होमिओपथी नापासच होते). मुळात होमिओपथीचे औषध काम करू शकते हा दावा १० वी च्या केमेस्ट्रीच्या बेसीसवर सुद्धा नापास होतो. होमिओपाथ्सचं ठिक आहे, त्यांना धंदाच करायचा आहे, परंतू शिकले सवरलेले लोक सुद्धा बुद्धीभेद करतात तेंव्हा हसावे की रडावे कळत नाही.

In reply to by मिहिर

पिलीयन रायडर Mon, 07/11/2016 - 18:13
+११ खरंच मस्त प्रतिसाद. मी सुद्धा त्या चारही लिंक्स उघडुन पाहिल्या होत्या. आणि वर साधारण तेच विचारलं होतं. पण आबांनी जशी पिसं काढली आहेत, तसं अजिबात मांडता आलं नसतं!! कुणी चार लिंक्स दिल्या की लगेच मुद्दा बरोबर होत नसतो ह्याचे हे उत्तर उदाहरण आहे. पण चर्चा पुढे जाण्यासाठी मात्र उपयोगी आहे असे दिसत नाही. इयत्ता दुशली ब सोबत बोलायला इतक्या सुंदर प्रतिसादांची गरजच नाहीये ना! =))

In reply to by पिलीयन रायडर

आबा, अभ्यासाबद्दल नमस्कार. पण थोडं गांभीर्याने, हे वाचन टाईमपास म्हणून केलं असेल तर काहीच म्हणणं नाही. पण महत्त्वाचा आणि मौल्यवान वेळ ह्यासाठी दवडू नका अशी विनंती. तरीही वरवर विसंगत वाटेल असं वाक्य - ह्या लिंका आणि त्याला दिलेला प्रतिसाद ह्याचा स्वतंत्र लेख बनवा आणि तो प्रकाशित करा. पुढच्या वेळेस होमेपदीसाठी एवढा वेळ खर्च करावा एवढं त्याचं महत्त्व नाही. तरीही हे अधूनमधून दाखवत राहावं लागणार. काठावरचे, तळ्यात-मळ्यात करणारे बरेच लोक असतात. त्यांना ह्या अभ्यासाचा फायदा होईलच.

In reply to by आबा

वेल्लाभट Sun, 07/10/2016 - 23:13
कस्स्सली मेहनत घेतलीत राव ! जाम हसायला येतंय. सॉलिड चिकाटी. वाह. ही कुठल्या प्रतिजैविकाने आली म्हणायची? :) करा. अजून प्रयत्न करा आपलं चांगलं म्हणताना दुसरं खोटं (वाईट पण नाही) म्हणा. माझं काय जातं. जगातली क्रमांक २ ची अवलंबली जाणारी उपचार पद्धती आहे होमिओपॅथी. तुमच्याच त्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन नुसार. याला पण खोटं म्हणणार का?

In reply to by वेल्लाभट

आबा Sun, 07/10/2016 - 23:42
मी खोटं का म्हणालो त्याची कारणंही दिलीत, तुम्ही काय केलंत? :) आणि क्र. २ ला काही विषेश महत्व आहे का? क्रमांक १७ किंवा ५०० ची असती तर काय झालं असतं ? गोष्टी त्यांच्या अ‍ॅबसोल्यूट मेरीटवर खर्‍या किंवा खोट्या ठरवता येतात, त्याला वैज्ञानिक पद्धत म्हणतात (विसाव्या शतकात जन्माला आल्याबद्दल अभिनंदन). ३ पेक्षा २ मोठा हे कारकुनी दर्जाचं अ‍ॅनालिसिस झालं (ते कारकुनी लेव्हललाच ठीक आहे). होमिओपथी क्र. १ ची उपचार पद्धती जरी असली असती तरी ती खोटीच असली असती.

In reply to by आबा

क्र. २ ला काही विषेश महत्व आहे का? क्रमांक १७ किंवा ५०० ची असती तर काय झालं असतं ?
बराच फरक पडतो, आबा. साखरेच्या गोळ्या खाऊन बरे होणाऱ्या 'उपचार'पद्धतीवर विश्वास ठेवणारे भोळसट एवढ्या प्रमाणात असतील तर त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. दोन-चार लोक भक्त असणं निराळं आणि मोठेच्या मोठे लोंढे भजनी लागणं निराळं. वैज्ञानिक पद्धतीवर विश्वास न ठेवणारे लोक किती मोठ्या प्रमाणावर आहेत ही गोष्ट नाकारता येण्यासारखी नाही.

In reply to by आबा

वेल्लाभट Sun, 07/10/2016 - 23:26
https://www.homeopathic.com/Articles/Homeopathic_research/Scientific_Evidence_for_Homeopathic_Medicine.html सिरियसली. ही लिंक काम करते. http://www.britishhomeopathic.org/evidence/the-evidence-for-homeopathy/ यातला भाग पेस्ट करतोय British Homeopathic Association > Evidence > The evidence for homeopathy The evidence for homeopathy There is a growing body of clinical evidence to show that homeopathy has a positive effect. Randomised placebo-controlled trials The widely accepted method of proving whether or not a medical intervention works is called a randomised controlled trial (RCT). One group of patients, the control group, receive placebo (a “dummy” pill) or standard treatment, and another group of patients receive the medicine being tested. The trial becomes double-blinded when neither the patient nor the practitioner knows which treatment the patient is getting. RCTs are often referred to as the “gold standard” of clinical research. Up to the end of 2014, a total of 104 papers reporting good-quality placebo-controlled RCTs in homeopathy (on 61 different medical conditions) have been published in peer-reviewed journals. 41% of these RCTs have reported a balance of positive evidence, 5% a balance of negative evidence, and 54% have not been conclusively positive or negative. For full details of all these RCTs and more in-depth information on the research in general, visit the research section of the Faculty of Homeopathy’s website. Also, see 2-page evidence summary with full references. The above figures are strikingly similar to data obtained from an analysis of 1016 systematic reviews of RCTs (and therefore of many more than that number of RCTs) in conventional medicine: 44% of the reviews concluded that the interventions studied were likely to be beneficial (positive); 7% concluded that the interventions were likely to be harmful (negative); and 49% reported that the evidence did not support either benefit or harm (non-conclusive). [El Dib RP, Atallah AN, Andriolo RB (2007). Mapping the Cochrane evidence for decision making in health care. Journal of Evaluation in Clinical Practice; 13:689–692.] Systematic reviews The most solid evidence for a treatment comes from critically assessing more than one RCT in a carefully defined way. This is known as a systematic review. Six out of seven major systematic reviews of RCTs in homeopathy have concluded (with important caveats) that homeopathy has an effect greater than placebo. Systematic reviews of RCTs in specific medical areas have presented positive conclusions for homeopathy in six: childhood diarrhoea, hay fever, post-operative ileus, respiratory tract infection, rheumatic diseases and vertigo (see Faculty of Homeopathy website for details). For full details of all 104 placebo-controlled RCT papers and more in-depth information on the research, visit the research section of the Faculty of Homeopathy’s website. This includes details of those RCTs that were either negative or non-conclusive. A grant-funded systematic review programme is providing further insight into these research findings.

In reply to by वेल्लाभट

आबा Sun, 07/10/2016 - 23:51
परत परत त्याच गोष्टी दाखवत आहात, मागच्या मेमोरँड्म मध्ये हेच पेपर्स आहेत. एकदा खोटं सिद्ध होउनही परत परत तेच सांगण्यामागचा ब्रिटिश होमिओपथीक असोसियेशनचा उद्देश समजण्यासारखा आहे, परंतू पुढचा अभ्यास वगैरे शहाजोगपणा करण्याआधी या लिंक तुम्ही स्वतःही वाचत नाही असं दिसतंय. एकूणच चिकाटीने विचार करण्याचीही तुम्हाला सवय असावी असं वाटत नाही... तस्मात शुभेच्छा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सुबोध खरे Tue, 07/12/2016 - 10:32
आबासाहेब दंडवत स्वीकार करा पामराचा. असेच म्हणतो. आपल्या चिकाटीचा आणि निगुतीने प्रतिवाद करण्याच्या पद्धतीचे आदर वाटतो परंतु झोपलेल्याला उठवणे सोपे आहे झोपेचे सोंग घेतलेल्याला उठवणे कठीण आहे. त्यामुळे आपण आपला वेळ वाया घालवू नका अशी विनंती आहे.

In reply to by सुबोध खरे

गंम्बा Tue, 07/12/2016 - 10:44
झोपेचे सोंग घेतलेल्याला उठवणे कठीण आहे. त्यामुळे आपण आपला वेळ वाया घालवू नका अशी विनंती आहे.
डॉक्टर साहेबांनी हा सल्ला देणे फार रोचक आहे.

शान्तिप्रिय Fri, 07/08/2016 - 16:11
धागा भरकटू न देणे महत्त्वाचे आहे हे सर्वांनी समजुन घ्या. प्रतिजैविके बदद्ल अनेक शंका दूर झाल्या आहेत. आंटी बायोटिक्स योग्य सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात घेतल्यावर निश्चितच ती "आजार संपवतात" याबद्दल आता दुमत नाही.तसेच अलोपाथी ही उपचार पध्धती जास्तीत जास्त पारदर्शक आहे हे खरे. अवांतर : माझी आई, किडनी फेल्युअर ने दोन वर्षांपूर्वी गेली. आम्ही तेव्हा तिचे डायलिसिस चालू ठेवले होते .सुमारे ८ महिने सतत आठवड्यातुन दोनदा असे डायलिसिस चालू होते. तसेच होमिओ पाथी व आयुर्वेदिक अनेक उपचार केले.पण काहिहि उपाय झाला नाहि. परंतु, होमिओपाथ आणि आयुर्वेदिक डॉक्टरांनी डायलिसिस वर अशास्त्रिय टीका केली व आम्हीच कसे योग्य उपचार देतो असे सांगण्याचा प्रयत्न केला. किडनी फेल्युअर वर सुध्धा हुकुमी औषध अजुन कुठेच नाही व ऑरगन डोनेशन बद्दल जागरुकताहि कमी पडते.