Skip to main content

राजकिय धागे आणि वाचक

Published on मंगळवार, 15/03/2016
बरेच लोक राजकिय चर्चांच्या नावाने बोटे मोडतात, मेगाबायटी प्रतिसादांबद्दल नाकं मुरडतात. त्यांना ते वाचल्याशिवाय समजत असेल काय? जर वाचण्याची आवड व गरज वाटते तर मग इथे अशा राजकिय चर्चा-प्रतिसादांबद्दल नाकं का मुरडतात? मला तर हा प्रकार म्हणजे कोंबड्यांच्या झुंजींची मजाही घ्यायची आणि मुक्या प्राण्यांवर अत्याचार म्हणून आरडओरडा करायचा, असा वाटतो. ;-) टु एवरी अ‍ॅक्शन, देअर इज अल्वेज इक्वल अ‍ॅण्ड अपोजिट रिअ‍ॅक्शन. कितीही चुकीचे असले तरी आपलेच म्हणणे रेटणार्‍यांबद्दल कुणी बोललेलं दिसत नव्हतं. त्यांना जशास तसा विरोध व्हायला लागल्यावर मिपा राजकिय आखाडा झाल्यासारखा वाटायला लागला. काही आयडी केवळ काही राजकीय पक्ष व संघटनांच्या भूमिकांना कसंही करून योग्य ठरवण्यासाठी मिपावर येतात. हे जेव्हा बंद होईल तेव्हा काही सदस्यांना बोचणार्‍या गोष्टीही मिपावर होणं बंद होईल. मिसळपाव संस्थळावर सगळ्याच प्रकारच्या अभिव्यक्तिला प्रकटनाचे स्वातंत्र्य आहे असे वाटते. आपल्याला हवे तसे होत नाही हा विचार बाजूला ठेवला तर प्रत्येकाला आपल्या अभिरुचीप्रमाणे व्यक्त होण्याचे, वाचण्याचे स्वातंत्र्य असायलाच हवे. मला पाकविभाग बोअरिंग वाटतो, बर्‍याच कविता अगदी बालिश वाटतात. भटकंती विभागात दोन-तीन सदस्य सोडले तर फक्त फोटो (पक्षी पाट्या) टाकणारे असतात. काही धागे मला अजिबात आवडत नाहीत. पण अशा कुठल्याही धाग्यांवर कवितांवर पाककृतींवर भटकंतीवर जाऊन मी किंवा माझ्यासारखा विचार करणारे विरोधात लिहित नाहीत. कारण मी ते वाचतच नाही. अहो रुपम् अहो ध्वनिम् प्रकारच्या लेख, धागे, प्रतिसादांवर जाऊन तसे लिहित नाही. त्यांना त्यात धन्यता वाटते, आनंद मिळतो तर असू देत. मिपा हे हजार चॅनेल असलेला टीवी आहे. उगा टाइम्स नाऊ लावायचं, बघायचं मग तो अरणव किती ओरडतो बघा बघा असं बोलायचं ह्याला काही अर्थ नाही. एकूणच राजकिय चर्चांच्या वातावरणात विचारसरणीपेक्षा व्यक्तिगत होण्याकडे चर्चा करणारे झुकले आहेत. मिपावरही तेच वातावरण झाले असेल तर नवल नाही. सगळे राजकिय धागे तात्पुरते बंद करुन हा "मिपावरील राजकिय चर्चा" विषय काथ्याकूटास घ्यावा का? ह्या चर्चांच्या उपयोगितेबद्द्ल, दर्जाबद्दल, गरजेबद्दल सर्व सदस्यांच्या प्रतिक्रिया, मते जाणून घेण्याच एखादा पोल घेता येईल काय?

वाचन संख्या 8637
प्रतिक्रिया 66

प्रतिक्रिया

:) मजा तर तेंव्हा येते जेंव्हा या असल्या धाग्यांना कंटाळलो, वैतागलो असे जिथे तिथे म्हणनारे स्वतः मात्र राजकीय बातम्या शोधून-शोधून आणून टाकत असतात. त्या बातम्या त्यांच्या पक्षाला फायद्याच्या असणार्‍या असतील :)

सहमत आहे. आधी मला राजकारणाच्या धाग्याबद्दल असेच वाटायचे. काय भांडत बसतात हे लोक्स म्हणून. आजकाल वाटते, करु दे त्यांना काय करायचे ते. आपल्याला कळते, वाचू वाटते ते वाचायचे. आपल्या कथांकडे कुठे फिरकतात हे पब्लिक. आपणही तसेच करायचे. कधी वाटते आम्ही सोशल नाहीत असा मॉरल हायग्राउंड घेउन वावरणार्‍या राजकारण एक्स्पर्टांना ललित, कथा, कविता अशा गोष्टीविषयी खरेच तिटकारा असतो का? समाजकारणाबद्दल धागे आले तर लिमिटेड बुध्दीनुसार कधी थोडेसे लिहू वाटते. लिहितो. पण उगी फॉर्म्यालिटी म्हणून +१ देऊ वाटत नाही. नुसते सहमत असे म्हणणे दृष्टीकोनच नसल्याचे लक्षण वाटते. कथा/कविता आवडतात. आवर्जून प्रतिसाद देतोच. भटकंती धाग्यावद्दलच्या विचारांना १०० टक्के सहमत असून त्यात फोटोज कॉम्प्रेस केलेले नसल्याने मेमरी जास्त वाया जाते हा स्वार्थी दृष्टीकोन असतो ;) पाकृमध्ये पेठकरकाका आणी सानिकाचे धागे आदर्श बघणेबल. पेठकरकाका एकच फोटो टाकतात पण पाकृ सविस्तर आणि स्पष्ट लिहितात. सानिका प्रेझेन्टेशन भारी करते पहिल्या आणि शेवटच्या फोटोत. मधले फोटो कॉम्प्रेस/कोलाज करते. असा रीडर अवेअरनेस पाकृच्या फार कमी धाग्यात पहायास मिळतो. कलादालनात तर आजकाल कुणीच नसते. तेव्हा आपणच कायतरी करावेसे वाटू लागलेय. ;) खरडफळ्यावरही हे फोटोचे अथवा चित्रांचे प्रमाण थांबवावे असे वाटते. वाटल्यास त्यांना एखादी गॅलरी टाइप करुन देता येईल. त्यात लिंका, जिफ इमेजेस, फोटो, चित्रे, वीडीओ असे साहित्य डकवता येईल.

In reply to by अभ्या..

खफ़वरील चित्रांबाबत सहमत. मात्र खफ़वर आंतरजालावरुन उधारउसनवार करून आणलेल्या छायाचित्रांपेक्षा स्वत: काढलेली छायाचित्रे साधी असली तरी पाहावयास नक्कीच आवडतील.

In reply to by प्रचेतस

मिपावर येणारी चित्रे व्हिडिओ सर्व्हर स्पेस खात नाहीत. त्यातून स्वतःचे नसलेले पण लोकांनी बघावे असे जे वाटते त्यासाठीच खफ आहे. स्वतःच्या फोटोंचे धागे टाकावेत. बरे खफवरचे २/३ दिवसात डिलिट करायचे असते. अगदी तात्पुरते मॅटर असते. वैयक्तिक शिव्या आणि अपमानास्पद टिप्पणी वगळता खफवर काय लिहावे किंवा काय टाकावे याला काही लिमिट नाही.

भटकंती विभागात दोन-तीन सदस्य सोडले तर फक्त फोटो (पक्षी पाट्या) टाकणारे असतात.
हे पटलं नाही बुवा...भटकंती विभागात भरपूर वाचण्यासारखे आहे. जाउन बघा एकदा !!

अगदी खरं आहे, मिपावर असहिष्णुता वाढली आहे.

In reply to by प्रदीप साळुंखे

खर आहे ! संस्क्रुती बुडाली.. आता असहिष्णुतेचे नीट संगोपन करुन वाढवली पाहिजे ;)

मला पाकविभाग बोअरिंग वाटतो, बर्‍याच कविता अगदी बालिश वाटतात. भटकंती विभागात दोन-तीन सदस्य सोडले तर फक्त फोटो (पक्षी पाट्या) टाकणारे असतात. म्हणजे जे प्रत्यक्ष जीवनानुभवाशी निगडीत आहे, करून पाहिले आहे, अनुभवले आहे ते बालिश, बोरिंग, पाट्या टाकणे वगैरे. आणि जे निवळ वर्तमानपत्रीय आहे, चेनेलीय चर्चा ऐकून किंवा विडिओ पाहून बनवलेले मत किंवा कुटलेला काथ्या आहे ते विद्वत्तापूर्ण. हाईट आहे राव. एखादी पाकृ गंडते, फोटो चुकतात, कविता बहिसटतात पण तो एक अटेम्ट आहे. एखाद्या माणसाला प्रत्यक्ष राजकीय आंदोलनाचा अनुभव असेल, राजकीय पक्षात काम केले असेल, चळवळींचा अनुभव असेल आणि मग त्या संदभात लिहिले असते तरी समजून घेण्यासारखे आहे. विश्लेषण म्हणावे तर लिखाणातून निदान दांडग्या व्यासंगाची तरी जाणीव व्हावी पण तेही नाही. बहुतांश राजकीय धाग्यांवर 'शब्द बापुडे, केवळ वारा' असा प्रकार आहे. नुसतेच गेगाबायटी प्रतिसाद. त्यामुळे रिकामटेकडे सदस्य कोण आणि खरोखर क्रिएटिव्ह साहित्य निर्मिती/कला निर्मिती करणारे कोण हे आताशा लगेचच ओळखता येऊ लागले आहे. तात्या असते तर यातले अर्धे लोक हाकलले गेले असते. असो. ह्या चर्चांच्या उपयोगितेबद्द्ल, दर्जाबद्दल, गरजेबद्दल सर्व सदस्यांच्या प्रतिक्रिया, मते जाणून घेण्याच एखादा पोल घेता येईल काय? एकेकाळी 'कौल' हा या संस्थळावरचा गाजणारा विभाग होता. पण तो आता बंद झाला आहे.

टु एवरी अ‍ॅक्शन, देअर इज अल्वेज इक्वल अ‍ॅण्ड अपोजिट रिअ‍ॅक्शन. कितीही चुकीचे असले तरी आपलेच म्हणणे रेटणार्‍यांबद्दल कुणी बोललेलं दिसत नव्हतं. त्यांना जशास तसा विरोध व्हायला लागल्यावर मिपा राजकिय आखाडा झाल्यासारखा वाटायला लागला.

काही आयडी केवळ काही राजकीय पक्ष व संघटनांच्या भूमिकांना कसंही करून योग्य ठरवण्यासाठी मिपावर येतात

. हे जेव्हा बंद होईल तेव्हा काही सदस्यांना बोचणार्‍या गोष्टीही मिपावर होणं बंद होईल.
हे निरिक्षण अतिशय जास्त पटलेले आहे ! ठळक अन मोठा केलेला भाग वाचनमात्र असल्यापासुन जाणवत आलेला आहे. विरोध व्हायला आला की काही आयडी चवताळतात , गटाने शिकारी होतात , असो आता हां प्रतिसाद देऊन मी सुद्धा संबंधितांच्या निशान्यावर येईल हे मला नीट माहित आहे तरीही निरिक्षण मांडतो आहे. असो! सगळ्यांचे भले होवो हीच प्रार्थना बाकी, अभ्या ह्यांनी +1 ची काढलेली घाऊक लाज अन विश्लेषण मनातल्या विचारांचा आरसा आहे! म्हणून त्यांची माफ़ी मागून परत एकदा

+1


मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली ही म्हण ज्याने कुणी काढली त्याची विनोदबुध्दी आणि निरीक्षणशक्ती किती अचूक होती त्याचं प्रत्यंतर आलं - येतं आहे. गर्दीच्या वेळी दादर स्टेशन असतं तसं मिपा आहे. उगाचच गाड्यांना गर्दी होते आणि धक्काबुक्की होते अशी तक्रार करण्यात काय अर्थ आहे?

आक्षेप राजकीय चर्चांना नाही. अनेकदा बरीच नवी माहिती मिळू शकते. पण शंभरात ऐंशीवेळा धागे भरकटतात किंवा मुद्दाम भरकटवले जार्तात. मग तेच तेच आयडी तेच तेच दळण दळत बसले आणि ज्यात काही निष्पन्न होणार नाही असे आरोप प्रत्यारोप, वैयक्तिक शिवेगाळ सुरू झाली की वैताग येतो. सर्वांनी जर वैयक्तिक काही न बोलण्याचे पथ्य पाळले किंवा एखाद्याचे मत पटले नाही तरी त्याची अक्कल काढणे, खवट टोमणे मारणे असे प्रकार टाळले तर बहुतेक चर्चा सुसह्य नव्हे तर वाचनीय होतील.

राजकीय चर्चा जर आवडत नसतील तर ते धागे उघडून न बघायचे स्वातंत्र्य सगळ्यांकडे असतेच.मी पाककृतीमधील एकही धागा आतापर्यंत उघडून बघितलेला नाही आणि कवितांपैकी २००९ मध्ये बिरूटे सरांनी लिहिलेला बालकवींवरील लेख आणि इतर फारच थोडे धागे (उदा. मोकलाया दाही दिशा वगैरे) उघडून बघितलेले आहेत. ज्या विषयाची आपल्याला आवड नाही आणि ज्या विषयात शून्य गती आहे त्या विषयांवरील धाग्यांकडे न फिरकलेले बरे. ज्यांना राजकीय चर्चा आवडत नाहीत त्यांनाही हे स्वातंत्र्य आहेच की.हे धागे उघडून बघा अशी जबरदस्ती कोणीही कोणावर केल्याचे ऐकिवात नाही.मग मधूनमधून राजकीय चर्चांविरूध्द असे काही का म्हटले जाते हे समजत नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

मुद्दा असा आहे की काही लोकं ओढुन ताणुन जिकडे तिकडे राजकिय चर्चा घुसडायचा प्रयत्न करतात. त्याचं काय? घरातील झुरळे पळवुन कशी लावायची? असा काकु काढला तर काही राजकाविळी लोकं लगेचं मोदी, RSS वगैरे मधे आणणार. लगेचं ऑपोझिशनवाले पप्पु, कन्हय्या, उमर वगैरे लोकांची लाईन लावणार. पर्यावसन= धाग्याचं सार्वजनिक शौचालय उद्या एखाच्या तैंनी केशरयुक्त श्रीखंडाचा धागा काढला तर लगेचं इथले सॅफ्रॉनी दहशतवाद नावाने ठणाणा करणारे स्युडो सेक्युलर तिथे ओकार्‍या काढणार. पर्यावसन= धाग्याचं सार्वजनिक शौचालय उद्या एखादा टेक्निकल विषयावरचा धागा काढला (झैरात करुन घेतो: वाहनविश्व). तरी लोकं गेल्या ६५ वर्षात काय झालं अता काय चाल्लयं त्यामुळे आपली लोकं तंत्रज्ञानात मागे असा ताबा घेणार तिथे. पर्यावसन= धाग्याचं सार्वजनिक शौचालय बरं राजकिय विषयांवरची चर्चा कंस्ट्रक्टिव्ह पद्धतीने करता येउ शकते ह्याची आम्हाला गंधवार्ताही नाही. फक्तं मीच्चं कसा बरोबर हे दाखवण्यासाठी मेगबायटी/ गीगाबायटी प्रतिसाद टाकत असतात. नुसता पानभर प्रतिसाद दिला म्हणजे तुम्ही बरोबर असा अर्थ होतं नाही. फिरवुन फिरवुन एशियन पेंट्सच्या लाल डब्याची झैरात विनामोबदला करणारे लोकं पाहिले ना कि हसायला येतो. ह्या असल्या लेखांपेक्षा हेमंत लाटकरांचे लेख ३००००००००००००००००००००००० पटीने चांगले होते. ह्या कारणांमुळे मला हल्ली मिपावर काहीही लिहायची इच्छा होत नाही. जे मिपाकर खासगीमधे भेटतात त्यांचही हेचं मत आहे. बेटर वे एकतर राजकिय कुस्ती आराखड्याला एक अनाहिता टैप बंदिस्तं विभाग मिळाला तरं बरं. काय एकमेकांची टाळकी फोडायचीयेत ती बंदिस्त दालनात करा. बंदिस्तं विभाग जर तांत्रिकीदृष्ट्या शक्य नसेल तर मालकांनी बराचं पैसा खर्च करुन व्यनि नामक सुविधा (ख.व. नको ती उघडी असते) दिलेली आहे. तिथे व्यनि गृप तयार करा आणि मनसोक्तं हाणामार्‍या करा कसं? किंवा चेपु वर डु आयडी काढा. एकमेकांना मित्रयादीत मिळवा आणि झुक्याला पिडा. हाकानाका. चालु द्या.

In reply to by नाना स्कॉच

ज्याचं त्याचं मत असतं ते. एक काकु चालु करा मिपावरच्या सध्याच्या राजकिय चर्चेचं स्वरुप पसंत आहे का म्हणुन. बघा मेजॉरिटी कोणाच्या मताला मिळते ते. एका मर्यादेपर्यंत ठिक असतं आता डोक्यावरुन पाणी गेलं.

In reply to by अभ्या..

ट्रोल करणारे डुआयडी ओळखतातच की. मुद्दाम चर्चा भरकटवणारे, किंवा कै च्या कै लिहून लोकांना भडकवणारे लोक हवेत कशाला मिपावर? एक सल्लागार मंडळ तयार करा. ट्रोल करणारा आयडी दिसला तर लगेच उडवा. फुलप्रूफ पद्धत नाहीये हे मान्य पण जे खरे आयडी आहेत आणि जे नेहमी लिहितात ते तर बहुतेक जणांना माहिती आहेतच. तुम्ही अधिकारी लोकांनी यासंदर्भात काहीतरी केले पाहिजे असे वाटते - काही मदत लागली तर जरूर कळवा. आमचा शाईस्तेखान शेकडो बेगमा भोगून अल्ला ला प्यारा झाला आणि तुमचा शिवाजी अल्पायुषी अतृप्त मेला. असे काहीतरी लिहिणारे लोक येथे ठेवायचे कशाला? हे लिहिणारा आयडी उडाला आहे पण प्रत्येक ट्रोल आयडीने असे काहीसे लिहिण्याची वाट कशाला पहायची? आणि त्यातून काय साध्य होणार आहे?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

'नुसता पानभर प्रतिसाद दिला म्हणजे तुम्ही बरोबर असा अर्थ होतं नाही. फिरवुन फिरवुन एशियन पेंट्सच्या लाल डब्याची झैरात विनामोबदला करणारे लोकं पाहिले ना.. ' याच्याशी खास सहमत.

सगळे राजकिय धागे तात्पुरते बंद करुन हा "मिपावरील राजकिय चर्चा" विषय काथ्याकूटास घ्यावा का? तुम्हाला (तजो साहेबांना) राजकीय चर्चा नको आहेत असे समजायचे का आम्ही?

तजो, तुमच्याशी या विषयावर शंभर टक्के सहमत आहे. आता कसंय की युद्धस्य कथा: रम्या: म्हणतात. राजकारण हे एक युद्धाच आहे. त्यामुळे त्याच्या कथा रम्य असणारंच! ज्यांना त्या कंटाळवाण्या वाटतात त्यांनी बारकावे समजून घेण्याचा प्रयत्न करणे इष्ट होय. असं आपलं माझं मत. आ.न., -गा.पै.

अनेकांनी इथे 'राजकीय चर्चा नको वाटतात ब्वॉ' असं म्हटलं आहे तर इतर अनेकांनी 'तुम्हाला वाचायच्या नसतील तर नका वाचू की' असं म्हटलेलं आहे. मला वाटतं की ज्यांना या चर्चा नकोशा वाटतात त्यांना त्या राजकीय विषयांवर आहेत, किंवा खूप प्रमाणात येत आहेत म्हणून विरोध नाही. तर चर्चेची पातळी वैयक्तिक होते, मुद्द्यांऐवजी गुद्दे येतात आणि एकमेकांना चुकीचं सिद्ध करणं यापलिकडे काही हाती लागत नाही याबद्दल तक्रार आहे. मिपावर पूर्वीही स्फोटक विषयांवर घणाघाती चर्चा व्हायच्या. पण जेव्हा चर्चेत एकमेकांबद्दल आदर ठेवून मतं मांडली जातात तेव्हा चर्चा वाचून, ज्यांना त्यात सहभाग घ्यायचा नाही अशांच्याही हाती काही नवीन आणि वेगवेगळे दृष्टिकोन दिसल्याचं समाधान मिळायचं. उदाहरणार्थ मला एक चर्चा आठवते - घरकाम/बालसंगोपन आणि जीडीपी - ती मीच सुरू केली होती म्हणून कदाचित जाहिरातीसारखं वाटेल - पण मला आणि इतर अनेकांनाही त्या चर्चेतून समाधान मिळालेलं होतं. तीत श्रावण मोडक, क्लिंटन, अदिती, इंद्रराज, धनंजय, मी यांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या होत्या, जवळपास सगळ्यांनीच मेगाबायटी प्रतिसाद दिले होते. पण एकमेकांच्या मताबद्दल आदर बाळगून, ध्रुवीकरण करण्यापेक्षा समन्वय साधण्याचा प्रयत्न केल्यामुळे ती चर्चा वाचनीय झाली होती. त्या चर्चेत सर्वांनीच एकमेकांना 'तुम्ही मांडलेला हा मुद्दा चांगला आहे. मात्र त्यात ही त्रुटी आहे' या स्वरूपाची विधानं केली होती त्यामुळे चर्चा चालू असतानाही वाग्युद्धापेक्षा एका टेबलाभोवती बसून बोलल्यासारखा फील आला होता. जर राजकीय चर्चांमध्येही एकमेकांना लेबलं लावण्याऐवजी आणि हेतूंवर शंका घेण्याऐवजी मूलभूत विषयांवर चर्चा झाल्या तर चर्चेत भाग न घेणारे इतर सदस्य तक्रार करणार नाहीत अशी खात्री वाटते.

In reply to by राजेश घासकडवी

आदर, ध्रुवीकरण वगैरे शब्द वाचून, डोळे पाणावलेले असतानाच अचानक मला गणेश गुणाकारावरील चर्चा आठवली... ;)

In reply to by राजेश घासकडवी

मूळ धागा चांगला असूनही प्रतिसादांमुळे वाचवेनासा होतो. वाचवत नाही तर फिरकू नका हे आज्ञायुक्त/सदृश म्हणणे तर्कनिष्ठ नाही. कारण धाग्याचा विषय, मांडणी आवडलेली असते पण प्रतिसाद वाचवत नाहीत, आवडत नाहीत. असे प्रतिसाद नसते तर कदाचित यावर लिहायला आवडले असते, असेही वाटून जाते.

In reply to by राही

मूळ धागा चांगला असूनही प्रतिसादांमुळे वाचवेनासा होतो. वाचवत नाही तर फिरकू नका हे आज्ञायुक्त/सदृश म्हणणे तर्कनिष्ठ नाही. कारण धाग्याचा विषय, मांडणी आवडलेली असते पण प्रतिसाद वाचवत नाहीत, आवडत नाहीत. असे प्रतिसाद नसते तर कदाचित यावर लिहायला आवडले असते, असेही वाटून जाते.
एखाद्या चित्रपटातील गाणी खूप आवडतात पण चित्रपटाचे पटकथा/कलाकार इत्यादी आवडत नाहीत (उदा. माझ्यासाठी चितचोर आणि फिर तेरी कहानी याद आयी हे चित्रपट असे आहेत).पण म्हणून आपल्याला आवडते त्या भागाला (गाण्यांना) आपण सोडून देत नाही. तद्वतच न आवडलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्याला आवडलेल्या/पटलेल्या मुद्द्यांवरच प्रतिसाद देता येणार नाहीत का?

In reply to by गॅरी ट्रुमन

चित्रपट पाहाणे ही एकतर्फी क्रिया असते. संस्थळावरील चर्चा ही तशी नसते. त्यात लोकांनी भाग घ्यावा अशी अध्याहृत अपेक्षा असते. निरामय (हेल्दी) चर्चेसाठी पोषक वातावरण असावे ही अपेक्षा वावगी नाही.

As if चर्चा व्यक्तिगत होणं हा अक्षम्य अपराध वगैरे आहे. मुळात जर लोकांची सगळ्या गोष्टींबद्दल सारखीच मतं असतील तर चर्चाही होणार नाहीत. जेव्हा मतं वेगवेगळी असतात तेव्हाच चर्चा होतात. इथे कुणीही कोणाला समोरासमोर पाहू शकत नाही. प्रत्येकजण दुस-या माणसाला त्याच्या/तिच्या मतांनीच ओळखतो. (अपवाद असतील.अनेक लोक कट्टे आणि इतर प्रकारे एकमेकांना भेटले असतील. मी त्यांच्याबद्दल बोलत नाहीये.)काही जणांची तर खरी नावंही माहित नाहीत. पण त्यांच्या मतांमुळे आणि त्यातून दिसणाऱ्या/ न दिसणाऱ्या व्यासंग/त्याचा अभाव आणि ज्ञान/अज्ञान यामुळेच लोक माहित होतात. दुस-या शब्दांत सांगायचं तर मिपावर तुमचं मत ही तुमची ओळख आहे आणि त्यामुळे एखाद्या मतावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ती त्या माणसावर होऊ शकते, होते. खोदकाम करणं शक्य असल्यामुळे आणि काही लोक त्यात निष्णात असल्यामुळे एखाद्याचं मत त्याने आधी व्यक्त केलेल्या मतापेक्षा वेगळं असलं तर ते लगेच पुरावा म्हणून मांडलं जातं. काही आयडी हा मुद्दा तुम्हाला समजलेला नाही आणि समजणारही नाही असा पवित्रा घेतात.त्यांना त्याच भाषेत उत्तरं द्यावी लागतात कारण त्यांना तीच भाषा समजते. अशा वेळी सौजन्य दाखवून फायदा नसतो. त्याचा अर्थ दुबळेपणा असा घेतला जाऊ शकतो. अशा वेळी त्या आयडीला भानावर आणावं लागतं. सांगण्याचा मुद्दा हा की जर संस्थळ जिवंत माणसं चालवत आहेत तर त्यांचे सगळे गुणदोष हे त्या संस्थळावर दिसणारच. त्याला विरोध कशाला? अगदीच वावगी भाषा वापरली गेली तर संंपादक प्रतिसाद संपादित करतात किंवा धागा वाचनमात्र करतात किंवा आयडी बॅन करण्याची अप्रिय पण अपरिहार्य कारवाई करतात. ती system इथे आहे. हे tension त्या system ला घेऊ द्या. टेन्शन द्यावं, घेऊ नये.

In reply to by बोका-ए-आझम

लॉजिक पटले पण लाइन अन शब्द नाहीत (का मला समजायला चुक झाली?) पुर्ण प्रतिसादात मॉरल पोलिसिंगचा गंध येतोय. शब्द योजना नाही आवडली वैयक्तिक न घेणे हे विशेष सांगतो -नाना

In reply to by बोका-ए-आझम

इथे मते सारखी असण्यानसण्याचा मुद्दा नाहीय, ती कशी व्यक्त होताहेत हा मुद्दा आहे. सौजन्य म्हणजे दुबळेपणा असे अनेकांना वाटते हे खरे आहे. (माझे उलट मत आहे. भांडखोरपणा, आक्रस्ताळा उद्द्दामपणा यालाही शेवटपर्यंत सौजन्याने तोंड देणे हेच खरे धैर्य असे मला वाटते, पण हे वैयक्तिक आणि अलाहिदा.)

In reply to by राही

माझे उलट मत आहे. भांडखोरपणा, आक्रस्ताळा उद्द्दामपणा यालाही शेवटपर्यंत सौजन्याने तोंड देणे हेच खरे धैर्य असे मला वाटते, हे मत योग्य आहे याला कोणताही प्रत्यवाय नाही. मात्र डुआयडींची फौज किंवा सो कॉल्ड विचारवंत आयडी येताजाता शिवाजी महाराज किंवा हिंदू धर्म यांना मुद्दाम शिव्या देतात त्यांच्याशीही सौजन्याने वागावे का?

In reply to by मोदक

कारण शिव्यांमुळे कोणताही विचार वाढत अथवा तगत नसतो. उलट शिव्या ह्या रिपल्सिव असतात, मारक असतात. देणार्‍याविषयी आणि त्याच्या विचारधारेविषयी अप्रीती निर्माण करतात.

In reply to by मोदक

सौजन्य हे एकतर्फी असले पाहिजे म्हणजे बघं असं समज की: तुझ्या इमारतीतला एक रहिवासी खाली तर्र्र होऊन रात्री २ वाजता बोलू लागला "या सोसायटीतील लोक हरामखोर आहेत मला शिव्या देतात !@!@$%^^ सगळे माजलेत #$%^& आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून अगदी एखाद्या माय-भगीनीने अरे बेवड्या-नालायका असा शब्द जरी वापरला तर तो लगेच म्हणणार बघा मी म्हणत होतो ना हे मला शिव्या देतात ते !!!"
तस्मात भारतात ते समाज विघातक्,समाज्कंटक्,विषवल्ली विचारांचे आहेत का हे महत्वाचे नाही तर कुठल्या जातीचे (सवर्ण असतील लगेच बेलगाम झोडपायचे) बहुजन असतील तर "जाऊ दे चुकीच्या मार्गाचे बळी आहेत बिचारे म्हणून दुर्लक्ष्यायचे आणि जर हिंदु असतील तर मज्जाच मज्जा मग थेट टिळक-सावरकरांपर्यंत नेऊन पोहोच्वायचे. आणि दुर्दैवाने अ-हिंदु असतील तर मग सोयीसर मौन बाळगायचे आणि वरील "रहिवासी" पवित्रा घेण्यासाठी साळसूद काडीकाम करायचे.
गेल्या ७-८ वर्षातील मिपावरचे समाजकारण-धार्मीक-राजकारण धागे याची साक्ष+प्रचीती देतील. वरपांगी कळवळा अंतरगी नाना कळा ला फाट्यावर नेऊन धुण्याची इच्छा असलेला नाखु

In reply to by नाखु

काकानु.. तुमचा प्रतिसाद राहींच्या प्रतिसादाला असेल तर त्यांचा रोख सोयीस्कर सौजन्यावर नसून खर्‍याखुर्‍या सौजन्यावर आहे असे माझे मत आहे. तुझ्या इमारतीतला एक रहिवासी खाली तर्र्र होऊन रात्री २ वाजता बोलू लागला "या सोसायटीतील लोक हरामखोर आहेत मला शिव्या देतात !@!@$%^^ सगळे माजलेत #$%^& आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून अगदी एखाद्या माय-भगीनीने अरे बेवड्या-नालायका असा शब्द जरी वापरला तर तो लगेच म्हणणार बघा मी म्हणत होतो ना हे मला शिव्या देतात ते !!!" यालाच सोयीस्कर दुटप्पीपणा / दांभीकपणा म्हणतात. गिरे तो भी टांग लाल वाली प्रवृत्ती. या लोकांचा किंवा निदान जे डुआयडी वाटत नाहीयेत त्यांचा प्रतिवाद (कोणतेही सौजन्य न ठेवता) केलाच पाहिजे, आणि त्यात पण जर ते विचारवंत माओवादी, कम्युनीस्ट वगैरे असतील तर त्याबाबत गणामास्तर किंवा क्लिंटनशी हजारवेळा सहमत आहे.

In reply to by मोदक

मात्र डुआयडींची फौज किंवा सो कॉल्ड विचारवंत आयडी येताजाता शिवाजी महाराज किंवा हिंदू धर्म यांना मुद्दाम शिव्या देतात त्यांच्याशीही सौजन्याने वागावे का?
अगदी याच न्यायाने काही आयडी एका मुख्यमंत्र्याबद्दल सतत कारण नसताना ओकार्‍या काढत असतात. आणि ते सुद्धा अतिशय पातळीहीन ! त्याबद्दल आपले मत काय आहे ? त्यांच्याशी सौजन्याने वागावे का ?
( राजकीय चर्चा नको असाच वाटत, पण चिखलाचा सगळा दोष पुरोगामी / सो कॉल्ड सेक्युलर यांचाच नाही. माझाच प्रतिसाद शेवटचा अशा उजव्या आयडींचा आहे. त्या विरोधात कोणीही बोलत नाहीये. )

In reply to by कपिलमुनी

त्याबद्दल आपले मत काय आहे ? श्रीगुरूजींबद्दल यापूर्वीच मत व्यक्त केले आहे. किंबहुना त्यांनी विचारलेले नसतानाही सल्लाही देवून झाला आहे. अगदी एकदा क्लिंटनलाही टोचेल असा प्रतिसाद दिला होता. ( राजकीय चर्चा नको असाच वाटत, पण चिखलाचा सगळा दोष पुरोगामी / सो कॉल्ड सेक्युलर यांचाच नाही. माझाच प्रतिसाद शेवटचा अशा उजव्या आयडींचा आहे. त्या विरोधात कोणीही बोलत नाहीये. ) येथे मी चिखलाचा दोष डुआयडींना देत आहे, ते डुआयडी व्यक्त करत असलेल्या मतांना तुम्ही पुरोगामी किंवा सो कॉल्ड सेक्युलर समजत असाल तर माझ्याकडून मुद्दे खुंटल्याने पास. (तुम्हाला नक्की हेच म्हणायचे आहे ना? हा पुरोगामी चळवळीचा अपमान आहे असे माझे स्पष्ट मत आहे.) ..आणि असे कितीसे उजवे आयडी शेवटच्या प्रतिसादासाठी अट्टहास धरून बसतात? माझ्या पाहण्यात फक्त गुरूजी आहेत आणि त्यांना बर्‍याच लोकांनी बर्‍याच कानपिचक्याही दिल्या आहेत.

In reply to by मोदक

ठिक आहे. पण मुद्दलातला प्रश्नच अप्रस्तुत वाटला त्यामुळे त्यावर चढलेले हे व्याज कसे समजून यायचे? वर मोदकरावांनी म्हटले -- मात्र डुआयडींची फौज किंवा सो कॉल्ड विचारवंत आयडी येताजाता शिवाजी महाराज किंवा हिंदू धर्म यांना मुद्दाम शिव्या देतात त्यांच्याशीही सौजन्याने वागावे का? तर त्यावर मुद्दलातला मुद्दा मांडला गेला---"एका मुख्यमंत्र्याबद्दल सतत कारण नसताना ओकार्‍या काढत असतात. आणि ते सुद्धा अतिशय पातळीहीन". शिवाजी महाराजांना शिव्या देणे आणि या मुख्यमंत्र्यांना शिव्या देणे याचा अर्थाअर्थी का संबंध जोडावासा वाटला असेल हे अनाकलनीय आहे.या मुख्यमंत्र्यांना युगपुरूष म्हणून उपहासाने म्हटले जाते हे तर त्यामागचे कारण नाही ना? बहुदा नसावे.कारण खरोखरचे युगपुरूष म्हणजे शिवाजी महाराज आणि तसेच ग्रेट लोक. त्यांच्यापुढे इतर कोणाही अगदीच कःपदार्थ. दुसरे म्हणजे "कारण नसताना" असाही शब्दप्रयोग झाला. कारण नसताना असे मुनीवर्यांना वाटत असेलही कदाचित. पण तसेच सगळ्यांना वाटावे असे अजिबात नाही. आणि तिसरे म्हणजे "ओकार्‍या काढणे" हा पण शब्दप्रयोग केला गेला. त्या मुख्यमंत्र्यांविषयी कोणाची मते चांगली असतील तर कोणाची मते वाईट.आणि स्वतः ते मुख्यमंत्रीच पंतप्रधानांना सायकोपाथ वगैरे म्हणत असतील तर त्यांनी इतरांकडून सौजन्याची अपेक्षा न ठेवलेली बरी. असो.

In reply to by गॅरी ट्रुमन

महाराज असो की कोणी मुख्यमंत्री ! माझा मत घाणेरडी टीकेच्या विरूद्धा आहे. पीएम ना सायकोपाथ म्हणने चुकीचे आहे (हे मला मान्य आहे) तर एके ४९ , पाकीस्तानी एजंट म्हणणे सुद्धा चुकीचा आहे. हे तुम्ही मान्य करणार आहात का ?

In reply to by कपिलमुनी

AK ४९ हे त्यांच्या अाद्याक्षरांवरुन आणि त्यांचं पहिलं सरकार ४९ दिवस टिकलं त्यावरून केली जाणारी टिप्पणी आहे. केजरीवालांनी त्या काळात ज्या गोष्टी केल्या त्याची चेष्टा करण्यात काही चुकीचं होतं का? शिवाय एके ४९ ही काही शिवी नव्हे.

In reply to by बोका-ए-आझम

"There are three AKs in Pakistan who are being admired. AK 47, AK Antony and AK49. This third one, AK 49, has just launched a political party," Modi said addressing a gathering of BJP supporters at Hiranagar, close to the India-Pakistan International Border, in Udhampur-Doda Lok Sabha constituency. असो ! एक मुद्दा प्रांजळपणे मान्य केलात याचा आनंद झाला.

In reply to by कपिलमुनी

सहमत आणि असहमत आहे तुमच्याशी. असाच प्रांजळपणा मला डाव्या किंवा सेक्युलर लोकांकडून दिसत नाही. राही ह्य्नाचे प्रतिसाद हे अतिशय संयत आणि माहितीने पूर्ण असतात. पण त्या पण आपले म्हणणे सोडत नाहीत असा माझा निरीक्षण आहे. एक प्रकारची उजव्या विचारांची खिल्ली उडवणे असा काहीसा प्रकार खुपश्या प्रतिक्रियनमधून दिसून येतो. (हे वाक्य राही ह्यांना नाहीये तर एक निरीक्षण आहे) तेच मग उजवीकडून केले गेले तर तो दांभिक पण ठरतो. असा काहीसा प्रकार चालू आहे. पण लिहिण्याची पातली खाली जाने हे योग्य नाही. मत बदलत नाहीच तर उलट अजून कडवट होत जाते.असे मला तरी वाटते

In reply to by मोदक

आरे दादा इथे डु आयडींच्या नावाने शंख करणारे अनेक जण डुआयडी बाळगुन आहेत त्याचं काय? त्यातले कैकजण मुळ आयडीने वेश असावा बावळा आणि अंगी नाना कळा असे वागतात त्याचं काय? नुकतचं एक झालेलं प्रकरण माझ्या दृष्टीने किरकोळ होतं. त्या व्यक्तीशी किमान माझ्या बाजुने चांगले संबध होते/ बहुतेक आहेत आणि रहावेत अशी प्रामाणिक इच्छा असल्याने थेट नावं घेउन बोलत नाही. बाकी रोचक चर्चा. बहुतेक मिपानिवृत्ती घ्यायची वेळ जवळ आली आहे.

शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी नव्हतेच, दादोजी कोंडदेव सुध्दा नव्हते असा नवा खुळचट प्रकार मधल्या काळात सुरु झाला होता. याची कारणे काय ते सांगणे नकोच. पण अद्याप तरी तुकाराम महाराज शिवाजी महाराजांचे गुरु होते यावर आक्षेप नाही. तुकाराम महारांजांनी म्हणले आहे. भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणु काठी. नाठाळ शोधुन काठीने नाही पण प्रतिसादाने हाणायला हरकत नसावी.

In reply to by गॅरी शोमन

हे तुकाराम महाराज म्हणाले आहेत. ते खरे वैष्णव होते. परंपरेने चालत आलेल्या कथांनुसार त्यांनी वैयक्तिकरीत्या अनेक अपमान शांतपणे सोसले. बरसणारे(पाणी देणारे) ढग वेगळे, गडगडणारे वेगळे.

In reply to by बोका-ए-आझम

माझ्या वरील प्रतिसादाचा एक अर्थ मी असा धरला होता की आपली जी विचारसरणी आहे त्याचेच पुष्टीकरण करणारे वचन आपण हुडकून काढतो. मग त्या संताची/साहित्यिकाची इतर कितीही विरोधी वचने त्याच्या साहित्यात किंवा आचरणात दिसेनात का. हे म्हणजे महापुरुषांना हाय्जॅक करणे झाले. गीतेमध्ये 'गुणकर्मविभागशः' आहे म्हणून गीतेला प्रतिगामी मानणार्‍यांनी फक्त तेव्हढेच उचलून गीतेला नाकारण्यासारखे आहे हे. गीतेतले अन्य कितीतरी उपदेश आचरणीय आहेत. मला सिलेक्टिव पेक्षा साकल्याने स्वीकृती योग्य वाटते.

In reply to by गॅरी शोमन

"तुकाराम महारांजांनी म्हणले आहे." इथ पासून प्रतिसाद सुरु केला असतात तरी फारसा फरक पडला असता का तुमच्या प्रतिसादाच्या अर्थात ? राजकीय चर्चा भटकतात ते अश्या गरज नसलेल्या ओळी नको त्या धाग्यावर आणल्या मुळे . मूळ मुद्दा काय लोक बोलतात काय .

चर्चा-विषय आवडला पण आशयाशी सहमत नाही. राजकीय चर्चा बंद होऊ नयेत. फॉर दॅट मॅटर कुठल्याच चर्चा बंद होऊ नयेत. अगदी हाणामारीवाल्या चर्चांमधूनही काहीतरी चांगलं हाती लागतच. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे नैसर्गिक मानवी स्वभावाचं प्रतिबिंब इथल्या लिखाणावर पडणारच. त्यामुळे सकारात्मक-नकारात्मक प्रतिसाद अथवा प्रतिसादांची चांगली-वाईट भाषा दिसून येणं हे अगदी नैसर्गिक आहे. वाचणार्याला हे असे प्रतिसाद टाळूनही चर्चेचा आनंद घेता येतोच. प्रतिसाद जास्त उजवीकडे सरकायला लागले की सरळ तेवढा भाग स्क्रोल करुन खाली यायचं :) अशा चर्चांमधे रसच नसेल तर धागा न उघडण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. आणि शेवटी, अगदीच पातळी सोडून लिखाण होत असेल तर त्यावर कारवाई करायला संमं समर्थ आहेच.

संयत चर्चेबद्दल आणि आपआपले मुद्दे मांडल्याबद्दल सर्व प्रतिसादक सदस्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद.

एकूणच राजकिय चर्चांच्या वातावरणात विचारसरणीपेक्षा व्यक्तिगत होण्याकडे चर्चा करणारे झुकले आहेत
. For this article, TJ 1+ Keep On...

In reply to by पगला गजोधर

माणसाबरोबरच, घोड्यानेसुद्धा, 'भारतमाता की जय' म्हटले नाही, तर त्याचे तंगडे मोडू.. किंवा 'भारतमाता की जय' म्हटले नाही, तर इसीस प्रमाणे गळ्यावरून सुरा फिरवू...... असे म्हणणार्या / अश्या मनोवृत्त्यीच्या काही भक्तांकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा आहे का TJ तुम्हाला ?

In reply to by पगला गजोधर

घोडेमार भाजपी नेत्याचा साधा निषेध्ही कुणी केला नाही इथे

सर्वत्रच चर्चा, विशेषत: राजकीय, व्यक्तिगत होवून कटुता वाढताना दिसते. ह्यावर अमिताभ बच्चन यांनी कुठल्याशा कार्यक्रमात त्यांच्या वडिलांचा सांगितलेला किस्सा आठवला. हरिवंशराय बच्चन यांनी विचा२ले की लोक चित्रपटाना एवढी गर्दी का करतात ? सामान्य माणसाला असं वाटत असतं की रोजच्या आयुष्यात असत्यावर सत्याचा विजय होताना दिसतच नाही जो चित्रपटात दिसतो. म्हणून चित्रपट बघताना त्याला काव्यत्मक न्याय मिळाल्यासारखा वाटतो मला काहिसे तसे वाटते की रोजच्या कटकटीना तोंड देताना अनेक गोष्टींचा राग काढण्यासाठी (स्वताच्या चुका झाकण्यासाठी) राजकारणी लोकांमधे खलनायक शोधतो. मग जो मला सोयीचा (जातीचा,गावचा,विचारसरणीचा)तो माझा, त्याला विरोघ करणार्यांच प्रत्यक्ष काही वाकड करू शकत नाही, मग विरोधकांची बाजु घेणारा सापडला की सगळी आग शाब्दिक शसत्रांनी शमवण चालू होत. तिकडे त्यांचे हीरो राजकारणी त्यांच्या लीला चालूच ठेवतात, ते त्यांचे देव काळाप्रमाणे बदलतात. पण दोष दुसर्याना का दयावा शेवटी राजकारणीतरी कोण असतात सामान्य माणसाचे बोल्ड, एनलार्जड आणि नग्न अवतार