मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्रीशिवचरित्रावरील आक्षेपांचे सप्रमाण खंडन

कोकणप्रेमी · · काथ्याकूट
श्रीशिवचरित्रावरील आक्षेपांचे सप्रमाण खंडन -- ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. गजानन भास्कर मेहेंदळे यांनी भक्ती शक्ती संगमाच्या निमित्ताने पुण्याच्या जंगली महाराज मंदिरात दिलेले व्याख्यान लिखित स्वरुपात अभ्यासकांच्या माहितीसाठी मिसळपाववर देत आहे. अवश्य वाचा...अनमोल माहिती.. मी १९६९ मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल टाकलं...शिवचरित्राचा अभ्यास करायला...तेंव्हा माझं वय होतं २२...आता माझं वय आहे ६८...या एवढ्या प्रदीर्घकाळात मी शिवचरित्रविषयक कागदपत्रं वाचली नाहीत, असा दिवस गेलाच असला तर एखाद-दुसरा असेल, सहसा असं झालेलं नाही, की मी शिवचरित्रावर काही वाचलं नाही. त्यातुनं मी सुमारे अडीच हजार पानं.. मराठीचे दोन भाग शिवचरित्राचे लिहिले. त्या अडीच हजार पानात, संदर्भच मुळी ७००० आहेत. आता यंदा मी तिसरा भाग लिहिणार म्हणतो आणि पुढच्या वर्षी चवथा, शेवटचा. मी एक इंग्रजी शिवचरित्र पण लिहिलंय.. ते पूर्ण आहे, त्याच्यात सुमारे हजार एक पानं आहेत. अशी अडीच हजार मराठी, एक हजार इंग्रजी अशी साडेतीन हजार पानं लिहुन झालेली आहेत, आणखीही होतील. मी काही हे त्यागानं केलं नाही. शिवाजी महाराजांबरोबर रहाणं, ही आनंदाची गोष्ट आहे म्हणजे त्यात काही आपण घालवलं काहीच नाही. आणि मला या फ़ार मोठ्या पुरुषाबरोबर, गेली ४५ वर्षे मी कागदपत्रांच्या रुपानं रोज राहातोय त्यामुळे मला त्यांच्याविषयी चांगलंच माहिती आहे. मी आता मुख्य असं बोलणार आहे, त्यांच्याविषयी काही गैरसमज पसरवले जातात, मुद्दाम जातात म्हणा, अज्ञानामुळं जात असतील... उदहरणार्थ मला मध्ये असं कुणीतरी सांगितलं आणि विचारलं की शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली... मी सगळं शिवचरित्र…मी तुम्हाला सांगितलं, की किती दीर्घकाळ करतोय... आणि मी जे सांगीन ते खरं सांगीन, आणि खरं आहे ते सगळं सांगीन...शिवाजी महाराजांनी कधीही, कुठंही मशीद बांधली नाही. नाही याचा अर्थ ना आणि ही. तुम्हाला बाकी कोणीही मशीद बांधली असं सांगितलं तरी माझ्याकडं पाठवून द्या. दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो, अशी एक लोकांची समजूत आहे, की शिवाजी महाराजांनी मशीदींना इनामं दिली. त्यांनी जर दिली असती तर मी दिली असती म्हणून सांगितलं असतं...माझ्या पदरचं काहीच जात नाही हो, ते त्यांचीच देणार होते, दिली असती तर...एखाद्याला वाटू शकेल की द्यायला हवी होती...पण ते त्याचं मत झालं...मुद्दा असा आहे की शिवाजी महाराजांनी दिली का नाही दिली. तुम्हाला काय वाटतंय, मला काय वाटतंय आपण बाजूला ठेऊ. शिवाजी महाराजांनी मशिदीला नवीन इनाम करून दिलं असा कागदाचा एक कपटा सुद्धा नाही. तुम्हाला कोणीही काहीही सांगितलं तरी ते खोटं आहे. मी शिवचरित्रविषयक सर्व कागदपत्रं वाचलेली आहेत. सर्व...मराठी, फ़ारसी, पोर्तुगीज…सर्व...त्यांनी कुठल्याही मशिदीला कधीही, नवीन इनाम करून दिलं नाही. मी सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका, नवीन इनाम दिलं नाही. जसं, माझे गुरु होते, प्राध्यापक ग. ह. खरे. खूप मोठे होते. त्यांनी असं सांगितलंय आणि मला ते कागदपत्रांच्या रुपानं माहितीही आहे की एखाद्या मुसलमान बादशहानं हिंदु मंदिराला नवीन इना¬म करून दिलं, असं सहसा आढळत नाही.एखादंच उदाहरण असलं तर असेल. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो. इब्राहीम आदिलशहा म्हणून होता. तो हिंदूच व्हायचा शिल्लक होता. त्यानं गणपतीवर आरत्या केल्या! मी हिंदू... जन्मानं हिंदू असून अजून कधी गणपतीवर आरती केली नाही. आणि त्या इब्राहिमनं केली. आता तो कुठला आलाय मुसलमान हो, तो हिंदूच झाला होता...वर्तनानं तो हिंदूच झाला होता. तेंव्हा अशा एखाद्या बादशहानं हिंदू मंदिराला एखादं इनाम दिलंय, नाही असं नाही. पण सहसा नाही. मग जी इनामं चालू राहिली ती कशी राहिली? त्यांच्या (बादशहांच्या) पदरी हिंदू सरदार असायचे. हिंदू कारकून असायचे. शेवटी आपल्या घरचा नोकर असला तरी त्याला नाही दुखवता येत.त्यानं काम नीट करायला पाहिजे असेल तर सांभाळून घ्यायला लागतं. हे हिंदू परस्पर ती इनामं खाली चालू ठेवायचे म्हणून मुसलमानी आमदानीत काही हिंदू इनामं चालू राहिली. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत सुद्धा काही दोन तीन मशिदी अशा आहेत की ज्यांची इनामं चालू होती. म्हणजे पूर्वीपासून चालत आली ती...नवीन नाहीत...त्याला एक अपवाद असा आहे, इंदापुरची जी मशीद आहे, तिथल्या काझींनी असं म्हटलंय, कागदपत्रांमध्येच आहे, हे मी त्यांचे शब्द सांगतोय, माझे नहीत, की शिवाजी भोसल्यांच्या कारकिर्दीत आमचं इनाम चाललं नाही. शिवचरित्र साहित्य खंड तीन म्हणून आहे, कागदपत्रांचा खंड आहे, आपण काढून बघा...आता तो काझी आहे, काझी म्हणजे तर न्यायाधीश असतात, ते खोटं नाही बोलणार. ते सांगताहेत, त्यांच्या भाषेत मी सांगतो, त्यांच्या शब्दात सांगतो की शिवाजी भोसल्याच्या कारकिर्दीत आमचं इनाम चाललं नाही. तेंव्हा कुणी शहाणे जर असं म्हणतील की चालू होतं तर ते खोटं आहे. चालू नव्हतं...दोन तीन मशिदींचे चालू होतं तेवढेच..नवीन कुठलंही दिलं नाही. आता शिवाजी महाराजांच्या राज्याचा हेतू तरी काय होता? मी माझ्या इंग्लिश पुस्तकात सविस्तर लिहिलंय, मराठीत पुस्तकाच्या पुढच्या भागात येईल...म्हणून सांगतो. दोन तीन प्रकारे सांगता येईल. एक, शिवाजी महाराज स्वत: काय बोलले...आणि स्वत: त्यांनी काय केलं...शिवाजी महाराजांची उक्तीच सांगायची तर त्यांचा भाऊ आहे व्यंकोजी, त्याला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, की मी तुर्कांना....तुर्क हा शब्द मुसलमान अशा अर्थी वापरला जातो. (आजही तंजावरी मराठीत मुसलमानांना तुरुक म्हणतात)...जुन्या कागदपत्रांमध्ये....ते म्हणतात की मी तुर्कांना मारतो, आणि तुझ्या सैन्यात तुर्क आहेत तर तुझा विजय कसा काय होईल? ते होणं शक्य नाही. शिवाजी महाराजांनी सप्तकोटीश्वराचं देऊळ, नार्व्याला गोव्याजवळ आहे. ते पोर्तुगिजांनी पाडलं होतं, त्या पूर्वी मुसलमानांनी पाडलं होतं, अनेकांनी पाडलं होतं...त्याचा जिर्णोद्धार शिवाजी महाराजांनी केला. का बरं केला? आपण विचार करा. वास्तविक पुण्यात त्यांना देवळं बांधायला भरपूर जागा होती. तिथलंच कशाला बांधायचं? तुम्ही जसं हट्टानं पाडलं, तसं मी ते हट्टानं बांधणार. म्हणूनच बांधलेलं आहे ते, परत बांधलं ते. त्यांच्या आयुष्यात अशी अनेक उदाहरणं आहेत. मी तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगतो. कर्नाटक तेंव्हा म्हणायचे, आज तमिळनाडू आहे तो. तेथे तिरुवण्णामलाई, तिथे देऊळ आहे, शोणाचलपतीचं...ते पाडलेलं होतं. शिवाजी महाराजांनी ते हट्टानं परत बांधलं..तुम्हाला म्हणायचं तर हट्टी म्हणा.. पण बांधलं...परत बांधलं..एक फ़्रायर नावाचा इंग्रज प्रवासी होता. इंग्रज होता, डॉक्टर होता त्या काळातला, कॉलेजात जाऊन डॉक्टर झाला होता. त्यांच्याकडे तेंव्हा तशा शिक्षण संस्था होत्या. हा फ़्रायर कल्याण भिवंडीला आला होता. तो असं म्हणतो की तिथं मशिदी होत्या त्या महाराजांनी पाडल्याच असत्या, त्याच्या ऐवजी महाराजांनी त्याची धान्याची कोठारं केली आहेत. असं फ़्रायर सांगतो. एक मशीद ओस पडली होती, तिथला हवालदार म्हणजे आजच्या परिभाषेत मामलेदार... त्यानं सांगितली ती पडलीय तिथं जाऊन रहा तिथं.. म्हणून तो तिथं रहात होता..हे फ़्रायर सांगतो,, स्वत: सांगतो. तमिळनाडूत जेझुइट पाद्री जे असतात, ख्रिश्चन लोकांमध्ये पंथ आहे जेझुइट , ब्रह्मचारी रहातात ते... कडवे असतात, आयुष्य घालवतात लोकांना बाटवता यावं म्हणून, फ़ारसं यश येत नाही पण प्रयत्न करतात, त्या जेझुइटांनी लिहिलंय की इथल्या मशिदी महाराजांनी डेसिग्रेट केल्या म्हणजे भ्रष्ट केल्या.हे मी नाही सांगत, मी तुम्हाला जे जेझुईट पाद्री काय सांगतात ते सांगतोय, आणि हे देवाचे दास असतात, ते मला वाटतं खोटं नाही बोलणार. आता हे झालं शिवाजी महाराजांचं... उक्ती, व्यंकोजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात मी उक्ती सांगितली आणि कृती पण सांगितली. आता त्यांचे शत्रू काय म्हणतात, ते सांगतो. अलि अदिलशाहानं पाठवलेलं फ़र्मान आहे. त्या फ़र्मानात.. कान्होजी जेध्यांना पाठवलेलं आहे.त्यात असं लिहिलं आहे, मी ते फ़र्मान वाचलयं, मूळ फ़र्मान पाहिलयं, फ़ार्सी मध्ये आहे, मला फ़ारसी येतं, त्या फ़र्मानात त्यांनी म्हटलंय की शिवाजी महाराजांमुळं म्हणजे त्यांनी शिवाजी म्हटलंय कारण ते त्यांच्या फ़र्मानांमध्ये शिव्या देऊनच बोलतात, ते काही शिवाजी महाराज म्हणत नाहीत पण आपण म्हणावं, की शिवाजी महाराजांमुळं मुसलमानी धर्माची वाढ खुंटलेली आहे. असं त्यांनी म्हटलंय. त्या फ़र्मानात...आणि म्हणून मी अफ़झल खानाला त्यांच्याविरुद्ध पाठवलंय असं त्या फ़र्मानात म्हटलंय...अलि अदिलशाहाचं फ़र्मान...त्यांचे शत्रू काय म्हणतात, ते मी सांगितलं आणखी पण उदाहरणे देईन...आता त्यांचे मित्र काय म्हणतात, मित्र याचा अर्थ त्यांच्या बाजूचे लोक, काय म्हणतात ते सांगतो. संभाजी महाराजांचं दानपत्र आहे. संस्कृत मध्ये आहे, त्यांना संस्कृत येत होतं, त्या दानपत्रावर त्यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेला श्लोक आहे. कुठंय ते दानपत्र? कुणाला पहायचं असेल तर पुण्यात टिळक रोडला एस.पी. कॉलेज आहे, त्याच्या मागच्या बाजूला शिक्षण प्रसारक मंडळीचं कार्यालय आहे, तिथं ते दानपत्र आहे. त्याचा फोटो छापला गेलेला आहे. पूर्ण दानपत्राचा. बेंन्द्र्यांचं (वा.सी. बेन्द्रे) जे साधन चिकित्सा पुस्तक आहे त्यात आहे. त्या दानपत्रात ते आपल्या वाडवडलांचं वर्णन करतात, अशी पद्धत आहे, दानपत्रामध्ये आपल्या पूर्वजांची.... प्रशंसा करणं , त्यांचं मोठेपण सांगणं, त्यात असं म्हटलंय, कसे होते माझे वडील? “म्लेंछक्षयदीक्षित”!!! कुमारवयातच म्लेंछक्षयदीक्षित म्हणजे म्लेंछांचा क्षय करण्याची, नाश करण्याची दीक्षा यांनी घेतलेली आहे! असं कोण म्हणतं?? असं संभाजी महाराज म्हणतात! बापाला ओळखणार ना मुलगा! पण आजकाल लोकं जे आहेत ते वेगळाच अर्थ सांगतात, संभाजी महाराज वेगळं सांगतात, आपल्याला संभाजी महाराजांचा विश्वास जास्त ठेवला पाहिजे, आणि केवळ संभाजी महाराजच सांगतात असं नाही, संभाजी महाराजांचा अधिकारी होता, गोव्याजवळ...हाडपोळण म्हणून गाव आहे गोव्याजवळ...तिथं संभाजी महाराजांचा अधिकारी होता. त्याचा शिलालेख आहे.त्याच्याकडं गावक-यांनी काही कर माफ़ करण्याची विनंतीकेली, ती त्याने मान्य केलीय, ते शिलालेखात तिथं नमूद केलंय..काय शिलालेखात म्हटलंय? त्याचा फ़ोटो ही छापलाय हं! कमल गोखल्यांनी लिहिलेले जे संभाजी महाराजांचं चरित्र आहे त्यात त्या शिलालेखाचा फ़ोटो छापलाय, तुम्ही बघू शकता. त्यात असं म्हटलंय की आता हे हिंदू राज्य झालेलं आहे! हे संभाजी महाराजांच्या त्या अधिका-याला तिथल्या प्रजाजनांनी केलेल्या विनंतीतलं वाक्य आहे. हे माझं वाक्य नाही. तेंव्हा खुद्द शिवाजी महाराजांची उक्ती काय होती खुद्द शिवाजी महाराजांची कृती काय होती ते मी थोडक्यात सांगितलं. त्यांचे जे समकालीन लोक होते त्यांच्याबाजूचे, ते पण सांगितलं, त्यांचे शत्रू काय म्हणतात, अलि आदिलशाह सारखे ते पण सांगितलं, आता तुलनेनी तटस्थ असे लोक काय म्हणतात, ते सांगतो. हेन्री रेव्हिंग्टन हे नाव ब-याच जणांनी ऐकलं असेल, त्यांनी महराजांवर तोफ़ा डागल्या होत्या, पन्हाळ्यावर, ब-याच जणांनी नाव ऐकलं असेल, त्या हेन्री रेव्हिंग्टननं शिवाजी महाराजांना पाठवलेलं पत्र आहे. इंग्लिश रेकॉर्ड्ज ऑन शिवाजी म्हणून पुस्तक आहे. त्या पुस्तकात, ते पत्र छापलंय. पत्राची सुरुवातच अशी केलीये, शिवाजी महाराजांना अनुलक्ष्य़ून जनरल ऑफ़ द हिंदू फ़ोर्सेस! म्हणजे हिंदू सैन्याचे अधिपती! हिंदू सेनाधिपती! असं कोण म्हणतो? इंग्रज मनुष्य म्हणतो. फ़ार हुशार होता तो. तो महाराजांना ओळखून होता. इतका ओळखून होता, की इंग्रजांचं राज्य भारतात पुढं मागं कधीतरी स्थापन करता येईल अशी स्वप्नं पहिल्यांदा पडलेला इंग्रज म्हणजे हेन्री रेव्हिंग्टन, इतका तो हुशार होता, त्याने महाराजांना ओळखलं होतं. तो त्या वेळीच त्यांना म्हणतो, जनरल ओफ़ द हिंदू फ़ोर्सेस, हिंदु सैन्याचे अधिपती. तेंव्हा शिवाजी महाराजांची स्वत:ची उक्ती म्हणजे बोलणं, आणि कृती, शिवाजी महाराजांच्या शत्रूंचं सांगणं आणि कृती, शिवाजी महाराजांचे जे समकालीन होते, संभाजी महाराजांसारखे लोकं , कवी भूषणासारखे लोकं, त्यांना जवळून पाहिलेला त्यांचा चरित्रकार, परमानंद, तो म्हणतो, लहानपणापासून हे यवनांचा अपमान करीत आले आहेत! असं शिवभारतात नमूद आहे.तेंव्हा त्यांना जवळून पहाणारे परमानंद असोत, कवी भूषण असोत, मघाशी गुरुजी जे म्हणाले, सुन्नत होती सबकी ते काव्य ज्याचे आहे त्या भूषण कवीने शिवाजी महाराजांना पाहिलं, तो रायगडावर राहिला होता, हा हिंदी प्रदेशातला आहे. तर हे समकालीन लोक शत्रू आणि मित्र आणि त्यांच्या उत्तरकाळातील परंपरा, ही परंपरा सुद्धा हेच सांगते की मराठ्यांना आपलं राज्य काय कळलं होतं? ते उदाहरणानं सांगतो. त्र्यंबकेश्वरचं देऊळ आहे बघा, ते मशीद पाडून बांधलेलं आहे. माझे मित्र आहेत पांडुरंग बलकवडे ते आज बहुतेक आले नाहियेत अजून, त्यांच्याकडं त्या देऊळाच्या प्रारंभीपासून अखेरपर्यंतचे सर्व हिशोबाचे कागदपत्रं आहेत, अगदी पाया रचण्यापासून सगळे. ते त्र्यंबकेश्वरचं देऊळ मशीद पाडून बांधलेलं आहे. दुसरं एक देऊळ सांगतो.नाशीक गावामध्ये, कुणी नाशीकचं असतील तर, सुंदर नारायणाचं देऊळ आहे नाशिकमधे, ते देखील मुस्लीम बांधकाम पाडून बांधलेलं आहे, त्याचे ही कागदपत्रं आहेत. ते शिवचरित्र साहित्य खंड २ मध्ये छापलेले आहेत. तेंव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याचा काय हेतू होता? तर कुणी म्हणेल की असं नको करायला पाहिजे होतं त्यांनी, आपलं सर्वधर्मसमभाव त्यांनी ठेवायला पाहिजे होता, ते शक्य आहे असे वाटेल कोणाला, पण शिवाजीमहाराजांना काय वाटलं तुर्त आपण ते बघायचं, लोकांना काय वाटत, मला काय वाटतं, मला असं वाटतं त्यांनी सर्वांना सारखं वागवलं असतं तर बरं झालं असतं, पण त्यांची इच्छा नव्हती तशी, ते त्यांच्या इच्छेप्रमाणे वागणार, माझ्या किंवा तुमच्या किंवा आणि कुणी असतील त्यांच्या इच्छेप्रमाणे कसे वागणार? तेंव्हा त्यांचं वागणं हे असं होतं. आजच्या परिस्थितीत आज मी जेंव्हा आजुबाजुला बघतो, मला ७१-७२ मध्ये दिल्लीला जाण्याचं... दुर्भाग्य माझ्या नशिबी आलं. आणि तिथं मी बघितलं, तिथं औरंगजेब रस्ता मोठा रस्ता आहे. लोधी रोड आहे, लोधी कोण कुठला काढला लोधी? तर भला मोठा रस्ता हो, म्हटलं काही शिवाजी महाराजांच्या नावाने नाही वाटतं काही? मी नुकतीच अभ्यासाला सुरुवात केली होती, २ वर्षं झाली होती, ते म्हणाले एवढी लहान गल्ली ही, ही शिवाजी गल्ली ...चांगलयं म्हटलं..त्यांनी. तिथल्या एका करोल बागेत मराठी वस्ती आहे. तिथल्या मराठी माणसाला म्हटलं, काय हो तुमची दिल्ल्ली ही? हा औरंगजेब रस्ता, तो मला म्हटला तुमच्या स्वत:च्या महाराष्ट्रात बघा की, मी म्हटलं काय झालं? तो म्हणे, औरंगाबाद म्हणून एक शहर आहे ना तुमच्या महाराष्ट्रात, थुत तुमच्या जिंदगानीवर! मला असं झालं आपण जोड्यानं मार खाल्ला. आता माझ्या नशिबानं त्या शहरात मला कधी जायला लागलं नाही, कारण त्याला आज लोक जरी संभाजीनगर म्हणत असले तरी त्या शहराचे सरकारी नाव अजुन औरंगाबाद हेच आहे. आणि हे फ़ार मोठं पाप आहे. त्यांनी ज्यांनी संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं, इतकं मोठं निलाजरेपणाचं लक्षण कुठल्या समाजात असेल असं मला वाटत नाही. असे जगात कुठे ही नाही. उदाहरण मला तरी माहित नाही. तेंव्हा हा बदल केंव्हातरी सरकारला सुचेल मला असं वाटलं होतं जेंव्हा दिल्लीत गेलो मी तेंव्हा मला असं वाटलं होत की शिवाजी महाराजांच्या नावानी भव्य रस्ता असेल, हरीहर बुक्काच्या नावानेही मोठा रस्ता असेल, राणा प्रतापाच्या नावाने मोठा रस्ता असेल, रणजित सिंहाच्या नावानं मोठा रस्ता असेल, हे तर मोठे राजकीय राजे झाले. ज्ञानेश्वर तुकारामांच्या नावाने रस्ते असतील, तुळशीदासाच्या नावाने रस्ता असेल, नरसी मेहेतांच्या नावानं रस्ता असेल, ते बाजुलाच राहिलं आणि लोधी रोड, काय औरंगजेब रोड काय, हे आपण भारताच्या राजधानीत आलोय का कुठं लाहोर बिहोरला आहोत? आता शिवाजी महाराजांच्या पदरी बरेच मुसलमान लोक होते असं लोकं सांगतात. परवा एक दीड शहाणे म्हणाले की शिवाजी महाराजांच्या सैन्यात १ लाख मुसलमान होते. एक लाख! असं म्हणाले एक गृहस्थ असं मला कळलं, मी काही हजर नव्हतो, अशा लोकांच्या व्याख्यानाला मी कशाला जातोय, पण ऐकलं इतरांकडनं, तेंव्हा तुम्हाला कायमचं माहिती असावं म्हणून सांगतो, शिवाजी महाराजांच्या पदरी कोण कोण मुसलमान होते? त्यांची संख्या काय होती, सगळं सांगतो. एक त्यांच्या पदरी सत्तावन सालपर्यंत ४-५ मुसलमान होते. १६५८ सालचं अलिआदिलशहाचं शहाजी राजांना फ़र्मान आहे. की तुमच्या मुलाच्या कृत्याबद्दल आम्ही तुम्हाला जबाबदार धरणार नाही त्याचा तो जबाबदार आहे. हे काय कसलं फ़र्मान आहे? १६५८ सालपासनं शिवाजी महाराजांनी स्वराज्याची अधिकृत घोषणा केली. म्हणजे त्यांनी अदिलशाहीवर स्वत:हून आक्रमण केल्याची पहिली घटना १६५८ ची आहे. त्या पूर्वी १६४८ मध्ये त्यांचा अदिलशाही सैन्याशी लढा झाला. पण ते आदिलशाही सैन्याने केलेलं आक्रमण होतं. त्यांनी पुरंदरवर हल्ला केला होता फ़त्तेखान हा सगळ्यांना माहिती आहे. शिवाजी महाराजांनी आदिलशाही वर आक्रमण केलं असं घडलं १६५८ मध्ये. तर पूर्वी ते त्यांच्या वडिलांचे प्रतिनिधी म्हणून इथला कारभार बघत होते. वडिलांचे प्रतिनिधी, मोठी जहागीर होती ती त्यांना, १२०० गावे होती. शहाजीराजांच्या जहागिरीच्या मानानं लहान होती, त्यांच्या मोठ्या जहागिरी कर्नाटकात होत्या. इथली लहान होती. ती १२०० गावं महाराज बघत होते. त्यावेळेला इथं जे अधिकारी होते, १० मार्च १६५७ पर्यंत, त्याच्या मध्ये तुम्हाला नावं सांगतो. एकजण होता सिद्दी अंबर बगदादी. म्हणजे हा बगदादचा असेल. तुम्ही ऐकलं असेल अलिकडं मुंडकी कापतात बघा तिकडं, त्या बगदादजवळचा तोच भाग आहे तो जवळपासचाच भाग अहे, त्यांची प्रथा आहे तशी.. तर हा तो बगदादी. सिद्दी अंबर बगदादी, हा हवालदार होता पुण्याचा. जैना खान पिरजादे हा सरहवालदार होता म्हणजे आजच्या परिभाषेत कलेक्टर होता. बेहेलिम खान हा बारामतीचा हवालदार होता. ही तीन नावं मी तुम्हाला सांगितली, एवढी ३ आहेत. १६५७ नंतर यांचं नख सुद्धा कुठे दिसत नाही. हे कुठं अद्रुष्य झाले , मी तुम्हाला सांगितलं १६५८ साली स्वराज्याला शिवाजी महाराजांनी आधिकृत सुरुवात केली. १६५७ सालाच्या नंतर चुकून सुद्धा एक सुद्धा, मी एक सुद्धा म्हणतोय, परत परत सांगतो, एकही मुलकी अधिकारी, एक सुद्धा मुसलमान नाही! हे जे तुम्हाला ३ सांगितले, हे १० मार्च १६५७ नंतर दिसणार नाहीत. नाहीच आहेत. जो लोक खूप पुकारा करतात, कुणी काही नूर खान बेग म्हणून होता, नूर बेग, सरनोबत होता. तो या १० मार्च १६५७ च्या कागदपत्रात शेवटचा दिसतो. त्यानंतर नूर खान बेग गेला.म्हणजे कुठं अदृष्य झाला, त्याला काय केलं महारजांनी आपल्याला माहिती नाही.त्यानंतर जो सरनौबत होता पायदळाचा येसाजी कंक. नूर बेग नव्हे! आता मी तुम्हाला चार माणसं सांगितली. पाचवं सांगतो. त्याचं नाव होतं सिद्धी हिलाल.तो महाराजांकडं येऊन जाऊन होता. कधी अदिलशाहीतही होता, पण तो होता कोण मुळात? तो होता खेळोजी भोसल्यांचा क्रीतपुत्र. क्रीतपुत्र म्हणजे विकत घेतलेला गुलाम, पण मुलाप्रमाणे घरात वाढवलेला. त्याला क्रीतपुत्र म्हणतात. तुम्हाला मला प्रश्न पडेल की त्याला हिंदू का नाही करून घेतलं? बरोबर आहे का नाही? तर अडचण अशी होती की त्या काळांत जो जन्मानं हिंदू नाही त्याला हिंदू करता येत नव्हतं. एकोणीसाव्या शतकापर्यंत असा एकही माणुस नाही की जो जन्मानं हिंदू नाही... त्याला हिंदू केलं.. नाही, पूर्वी शक कुशाण हूण झाले पण ते कसे झाले? पिढ्यानपिढ्या, पिढ्यानपिढ्या वहिवाट पडून झाले. एकाएकी कुणी एक मुसलमान आणि ख्रिश्चन आलाय आणि तो म्हणलाय मला हिंदू करा, ते शक्य नव्हतं. कारण प्रश्न असा असायचा की त्याला जात कोणती द्यायची? हिंदू धर्मातली कुठली ही जात म्हणायची आमच्याकडे हा नको. त्यामुळं एखादा तयार झाला तरी त्याला हिंदू करता येत नव्हतं, नेतोजी पालकराच्या बाबतीत गोष्ट वेगळी आहे, नेतोजी पालकर स्वत: जन्मानं हिंदू होता.त्याला जबरदस्तीनं बाटवलं, त्याला पुन्हा हिंदू करता येतं. जो जन्मानं हिंदू नाहीच, किंवा ज्याचे वाडवडील पण हिंदू नाहीत त्याला हिंदू करता येत नव्हतं. नाहीतर सिद्दी हिलाल हा हिंदूच झाला असता. तेंव्हा हा झाला सिद्दी हिलाल. हा चौथा, आता शिवाजीमहाराजांचे २ नौसेनाधिपती , नौदलाचे अधिकारी मुसलमान होते. एक होता.दौलतखान आणि एक होता दर्यासारंग. त्या दर्यासारंगाला महाराजांनीच १६७९ साली अटक केली. १६७९ साली दर्यासारंगाला अटक केली म्हणजे त्याचाही हिशोब संपला. आता दौलतखान आहे, तो कशासाठी ठेवला होता तर तुम्ही काढून बघा, इंटरनेट वर खूप लोक बघतात, भारत जेंव्हा स्वतंत्र झाला १९४७ साली त्यानंतर १० वर्षं भारतीय नौदल आणि भारतीय हवाई सेना यांचे प्रमुख ब्रिटिश होते. भारतीय नव्हते. ब्रिटिश होते. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर १० वर्षे. का? कारण आपल्याकडं एवढे अनुभवी त्या क्षेत्रातले लोक नव्हते. इंग्रजांनी तेवढी वरची पदं आपल्याला दिलीच नव्हती. हीच परिस्थिती महाराजांच्या नौदलाच्या बाबतीत होती. की त्यावेळेला आपल्याकडे एवढे अनुभवी अधिकारी नव्हते म्हणून हा दौलतखान होता. त्यांच्या नियंत्रणात होता आणि त्यानंतर मात्र आंग्रे आणि धुळप होते, बाकी परत मुसलमान अधिकारी दिसत नाही.कधीही नाही, एकदाच तो सुरुवातीला होता , आपल्या लोकांना ट्रेनिंग मिळेपर्यंत, तेवढचं...नंतर नाही. आता मी तुम्हाला ४-५ नावं सांगितली. याच्या पलिकडं त्यांच्या... जेंव्हा....अफ़झलखान वध केला..तेंव्हा त्यांचे जे १० अंगरक्षक होते त्यात एक मुसलमान होता. सिदी इब्राहिम त्याचं नाव, त्याची स्थिती थोड्या बहुत प्रमाणात हा जो आता मी तुम्हाला सिद्दी हिलाल सांगितला ज्याला खेळोजी भोसल्यांना मुलाप्रमाणं वाढवलं होतं तशीच त्या सिद्दी इब्राहिमची स्थिती आहे,. तेंव्हा ही जी मी तुम्हाला नावं सांगितली, एखादं राहिलं असेल, राहता राहिलं,मदारी मेहेतरचं नाव, ते खोटं आहे, खो आणि ट....खोटं!! त्यात काही सुद्धा खरं नाही, १८०० सालानंतर हकीकत लिहिलेली अाहे आणि काय लिहिलय ? की सवाई जयसिंगाची स्वारी महाराजांवर झाली.हा सवाई जयसिंह कोण? अहो तो त्या मिर्झा राजे जयसिंहाचा खापरपणतु आहे. तेंव्हा महाराज स्वत: हयात नव्हते. त्या सवाई जयसिंगाची स्वारी झाली तेंव्हा हे मदारी मेहेतरानी केलं, आता हे कसं काय खरं मानायचं? यात काही खरं नाही, असं कुणीही सांगेल हो, की माझे पूर्वज शिवाजी महाराजांच्या काळात होते, मी सुद्धा सांगेन, पण त्याला आधार पाहिजे, त्याला कागदपत्रं पाहिजेत, हे त्या काळातले कागदपत्रं नाही, तेंव्हा एक ८-१० नावं सोडली तर शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान अधिकारी कोणीही नव्हते. एक.. दोन....त्यांच्या सैन्यात , त्यांच्या राज्यकारभारात मुल्की अधिकारी कोणीही मुसलमान नव्हते...शून्य होते. नव्हतेच... आणि लष्करामध्ये मी तुम्हाला सांगितलं हा सिद्दी हिलाल किंवा हा दौलतखान किंवा तो दर्यासारंग किंवा त्यांचा फ़ार्सी क्लार्क होता, कारकुन होता, फ़ारसी, त्याचं नाव काझी हैदर...आणि तो... त्यानं बरोबर केलं, तो संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला जाऊन मिळाला...८२ साली. म्हणजे तो कुठं जायचं तिथं योग्य ठिकाणी गेला... तेंव्हा काझी हैदर याला कसं काय मी महाराजांचा प्रामाणिक माणुस म्हणु? त्यांच्याकडे फ़ार्सी लिहायल कुणीतरी लगतं तसा होता...तेंव्हा जे लोक भलत्याच काहीतरी गोष्टी सांगतात, आता महाराजांनी जर मुसलमान नोकर ठेवले असते तर माझ्या पदरचा काही पगार जात नव्हता. त्यांच्याच पदरचा जाणार होता, तुम्हाला सांगायला माझं काहीच बिघडत नाही पण जे खरं आहे ते सांगणं हे इतिहासकाराचं काम आहे, लोकं तुम्हाला खोटं काहीतरी अलिकडं सांगत असतात म्हणून नाईलाजानं मला तुम्हाला हे खरं काय आहे ते सांगायला लागलं.... मला वाटतं गुरुजी थांबू का? (संभाजीराव भिडे गुरुजी) ५ मिनिटं बोलू?...बरं... मगाशी मी तुम्हाला सांगितलं, की शिवाजी महाराजांनी सप्तकोटीश्वराचं देऊळ हटकून परत बांधलं,, हटकून का म्हटलं? हट्टी पणानं का बांधलं? त्यांनी हट्टीपणानं पाडलं म्हणुन यांनी हट्टीपणानं बांधलं तशा आणखी २ गोष्टी त्यांच्या आयुष्यात अहेत. एकतरराजव्यवहारकोष...म्हणजे मराठी भाषेत फ़ारसी शब्द फ़ार आले होते...आणि कशामुळं आले होते?आपणहून देवाण स्वाभाविक देवाण घेवाणीतनं आले नव्हते ...जबरदस्तीनं त्यांचं राज्य असल्यामुळं आले होते. ते काढण्याकरता त्यांनी राजव्यवहारकोष रचून घेतला.. त्यात असं म्हटलंच आहे की यवनांच्या भाषेमुळं मराठी भाषा दुषित झाली आहे, ती शुद्ध करण्याकरिता राजव्यवहारकोष रचलाय... असं त्याच्या प्रस्तावनेत सांगितलंयं...२ गोष्टीतलं साम्य बघा..जबरदस्तीनं देऊळ पाडलं...त्यांनी जबरदस्तीनं देऊनळ बांधलं...जबरदस्तीनं भाषेत शब्द शिरले, त्यांनी जबरदस्तीनं बाहेर काढले आणि अशीच तीसरी गोष्ट आहे नेतोजी पालकर...राहिला असता मुसलमान, काय बिघडत होतं? सगळं धर्म सारखे आहेत ना, लोकं म्हणतात, नाहियेत! पूर्ण वेगवेगळे आहेत! अजिबात सारखे नाहीत... खोटं बोलतात. कुठल्याच धर्माची माहिती नसलेले लोक असं बोलतात. सर्व धर्म पूर्णपणाने वेगवेगळे आहेत. आणि मी जेंव्हा हिंदू म्हणतो, तेंव्हा भराताच्या राज्यघटनेच्या २५ व्या कलमात हिंदु शब्दाची जी व्याख्या आहे, ती काय व्याख्या आहे? त्यात हिंदू आहेत, म्हणजे पारंपारिक हिंदू, ग्यानबा तुकाराम करणारे तुमच्या माझ्यासारखे, शीख आहेत...जैन आहेत...बौद्ध आहेत....हे सर्व लोक हिंदू या शब्दाच्या व्याख्येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच घातलेले आहेत. आणि तोच अर्थ मला कायम सुरुवातीपासून आत्ता पर्यंत अभिप्रेत आहे, दुसरा कुठला अर्थ माझ्या मनात नाही. एवढाच अर्थ मला येतो. तेंव्हा तिसरी जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की राहिला असता नेतोजी पालकर मुसलमान, मुसलमान राहिला तर राहिला, सगळे धर्म सारखेच आहेत, असे काही लोकांना वाटू शकलं असतं पण महाराजांना तसं वाटलं नाही.तुम्ही त्याला जबरदस्तीनं मुसलमान केलं...तेंव्हा मी पण त्याला तितक्याच हट्टीपणानं परत हिंदू करणार! तीन गोष्टी आहेत बघा! तुम्ही भाषा दुषित केली ती मी शुद्ध करणार, तुम्ही माणुस दुषित केलात , मी शुद्ध करणार, तुम्ही धर्मस्थान दुषित केलंत, मी ते शुद्ध करणार...हा एक प्रकारचा चांगल्या अर्थानं हट्टीपणा महाराजांच्या स्वभावात होता म्हणून ते महाराज झाले, आपण सामान्य माणुस.... गुरुजी थांबतो. (समाप्त) श्रीराजाशिवछत्रपति-चरित्रकार इतिहासाचार्य श्री गजानन भास्कर मेहेंदळे व्याख्यान स्थळ : श्री सद्गुरु जंगली महाराज समाधी मंदीर, पुणे दिनांक: अधिक आषाढ वद्य नवमी शके १९३७, शिवशक ३४२ (१० जुलै २०१५)

वाचने 25381 वाचनखूण प्रतिक्रिया 146

कपिलमुनी 24/12/2015 - 14:51
लेख उत्तम आहे ! मिपावर मालोजीरावांसारखे इतिहास प्रेमी आहेत. आणि इतर अभ्यासक आहेत त्यांचे प्रतिसाद यावेत ही अपेक्षा ! चांगल्या चर्चेच्या प्रतीक्षेत !!

प्रदीप साळुंखे 24/12/2015 - 15:01
केवळ तीन-चार उदाहरणांवरून शिवाजी कट्टर हिंदूत्ववादी होते(मुस्लिमविरोधी) असे म्हणता येत नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

नाखु 24/12/2015 - 16:54
सध्या तुष्टीकरणाचे आणि दाढी कुरवाळण्याचे पुरावे नाहीत, तेव्हा (तयार केल्यावर) येतील ते.. बरीच खेडेकरांची पुस्तके+फुत्कारी संदर्भ गोळा करून मगच येणार आहेत. आहेस कुठे ????? प्र.मात्र गपगुमान नाखु

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रदीप साळुंखे 24/12/2015 - 17:11
स्वधर्माविषयी सर्वांनाच अभिमान असतो,तसा त्यांनाही होता. आपले राज्य असावे अशी त्यांची मनापासून इच्छा असायची,शिवाय चारी बाजूंना मुस्लिम शत्रू होते ही त्यावेळची परिस्थिती होती. पण याचा सोयीस्कर अर्थ आपण लावता कामा नये. आदिलशाही जेव्हा खिळखिळी झाली शिवाय तिकडे दुष्काळी परिस्थितीने हाल होत होते,तेव्हा शिवाजी महाराजांनी तिकडे धान्य पाठवले होते.(संदर्भ→ संभाजी-विश्वास पाटील) आणि महाराज-कुतूबशहा भेट ही विसरून चालणार नाही.(यासाठी संदर्भाची गरज नाही,तरीसुद्धा राजा शिवछत्रपती-बा.पुरंदरे) -शिवाय शहाजी हे नाव शहापीर या मुस्लिम पीरावरून ठेवले आहे याचा पुरावा सुद्धा→राजा शिवछत्रपती -स्वराज्य कार्यात जे कोणी आडवे आले त्यांचा बिमोड महाराजांनी केला. मग ते चंद्रराव मोरे,खंडोजी खोपडे,बाजी घोरपडे असोत अथवा कृष्णाजी भास्कर असोत.

In reply to by प्रदीप साळुंखे

प्रदीप साळुंखे 24/12/2015 - 17:15
खेडेकरांची पुस्तके+फुत्कारी संदर्भ गोळा करून मगच येणार आहेत.
नेमकं याच्या उलट मी तुमच्याविषयी बोलू शकतो.पण मी तसे करणार नाही कारण मी ब्रिगेडी नाही.

नाखु 24/12/2015 - 15:23
आणि हिंदू म्हणजे फक्त ब्राह्मण किंवा उच्चवर्णीयच असे अभिप्रेत नाहीत हेही सांगीतले ते बरे !! मालोजीरावांच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत.. (बॅट्या नाही तेव्हा तपशीलवार माहीती साठी फक्त मालोजीरावांकडेच तलवार-ढाल आहे). (बॅट्या बॅन असल्याची खंत अश्या धाग्यांवर जास्त प्रकर्षाने वाटणारा.) प्र.मात्र खंतावलेला नाखु.

In reply to by आदूबाळ

प्रचेतस 24/12/2015 - 16:51
+२

In reply to by प्रचेतस

कपिलमुनी 24/12/2015 - 17:02
+३

In reply to by कपिलमुनी

प्रसाद गोडबोले 24/12/2015 - 17:35
+४

In reply to by प्रसाद गोडबोले

मालोजीराव 24/12/2015 - 17:38
ब्याट्या को वापीस लाव

In reply to by मालोजीराव

नाव आडनाव 24/12/2015 - 17:51
+६

In reply to by नाव आडनाव

मी-सौरभ 24/12/2015 - 18:26
चर्चा वाचण्यास ऊत्सुक..

In reply to by मी-सौरभ

अभ्या.. 24/12/2015 - 19:48
+८ ब्याटया यायलाच हवा. अशा चर्चाना त्याच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादाशिवाय रंग नाही. तसे व्यासंगी प्रतिसाद दूसरे कोण देऊ शकेल असेही वाटत नाही.

In reply to by अभ्या..

किसन शिंदे 24/12/2015 - 22:00
+९ बँन उठवायला हवा आता मालकांनी.

In reply to by किसन शिंदे

संदीप डांगे 24/12/2015 - 23:12
+१० He's the hero Gotham deserves, but not the one it needs right now. So we'll hunt him. Because he can take it. Because he's not our hero. He's a silent guardian, a watchful protector. A dark knight.

In reply to by स्पा

अत्रुप्त आत्मा 25/12/2015 - 07:45
+१२२०००००००००००००००००००००
+++++ अजून +१२२००००००००००००००००००००० टू पां डुब्बा! हमारी मांगे पुरी करो,खाटूक म्यान कु वापिस लाओ!

In reply to by अत्रुप्त आत्मा

मदनबाण 26/12/2015 - 10:17
मालकांना { ज्या काही कारणांनी हे झाले असेल ते सुद्धा लक्षात घेउन } नम्र विनंती ! जे कोणी मिपाकर... उदा. बॅट्या, टक्या, विश्वनाथ मेहेंदळे इं बॅन झाले असतील तर त्यांना पुन्हा एकदा संधी ध्यावी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ला.ला.ला... :) :- Poi

In reply to by मदनबाण

+१४००००००००००००००००००००००००००००००००००० बॅट्ञाची अनुपस्थिती खुपच जाणवते आहे. झाले गेले त्यावर पडदा टाका आणि त्याला परत आणा. तद्वतच टक्याची अनुपस्थिती देखील जाणवते आहे (या धाग्यावर नाही हा) आणि हो विमे राहिले. त्यांच्या घरवापसीला देखील अनुमोदन.

प्रदीप साळुंखे 24/12/2015 - 17:27
म्लेंछक्षयदीक्षित”!!! कुमारवयातच म्लेंछक्षयदीक्षित म्हणजे म्लेंछांचा क्षय करण्याची, नाश करण्याची दीक्षा यांनी घेतलेली आहे! असं कोण म्हणतं?? असं संभाजी महाराज म्हणतात! बापाला ओळखणार ना मुलगा!
समजा चारी दिशांना जर राजपूत शत्रू असते तर कदाचित 'राजपूतक्षयदीक्षित' असंही लिहलं असतं.

In reply to by प्रदीप साळुंखे

प्रसाद गोडबोले 24/12/2015 - 17:37
समजा चारी दिशांना जर राजपूत शत्रू असते तर कदाचित 'राजपूतक्षयदीक्षित' असंही लिहलं असतं
काहीही हां प्रदीप ! =)))) महाराजांनी स्वतःच आपला वंश सिसोदिया वंशाशी अर्थात राजपुतांशी जोडलेला आहे हे राज्याभिषेकाच्या वेळेस दाखवुन दिले होते !!

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रदीप साळुंखे 24/12/2015 - 18:01
ते एक उदाहरण म्हणून दिलं आहे. राजपूत काढून पोर्तुगीज घ्या हवं तर! 'पोर्तुगीजक्षयदीक्षित' . . . आता त्यावेळी पोर्तुगीज कमी प्रमाणात होते असं म्हणू नका.it's only उदाहरण

मालोजीराव 24/12/2015 - 17:30
शिवछत्रपतींनी निर्माण केलेलं स्वराज्य हे हिंदू प्रो राज्य म्हणूनच स्थापित झालं , मेहेंदळे सर बरोबर सांगत आहेत. अनेक मराठे,राजपूत,ठाकूर,जाट मोगलांकडून मराठ्यांशी लढले तसेच अनेक मुस्लिम मराठ्यांकडून मोगलांशी हि लढ्लेत. शिवाजी महाराज सहिष्णू होते याची उदाहरणे सुरतच्या स्वारीत, दक्षिण स्वारीत पाहायला मिळतात. पण जिथे मंदिरांना क्षति पोचवून मशीद,दर्गे निर्माण झाले ते छत्रपतींनी जमीनदोस्त केले. उदाहरण बघायचं तर दक्षिणेतील प्रसिद्ध देवस्थान व्रीद्धाचलम म्हणता येईल. येथे मंदिराच्या आवारातील मशीद आणि दर्गा काढण्यात आले होते. छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा ओल्ड गोव्या जवळच्या जुवे बेटावरच महत्वाच धार्मिक ठिकाण असलेलं स्टीफन्स चर्च पेटवून दिलं होतं. इनिक्विसिशन च्या विरोधातली हि प्रतिक्रिया होती. हिंदुत्ववादी,पुरोगामी अश्या गोष्टीत शिवराय बांधण्यापेक्षा मी याला 'जशास तसे ' वर्तन म्हणेन .

In reply to by मालोजीराव

प्रदीप साळुंखे 24/12/2015 - 18:10
मराठ्यांच्या सैन्याने चर्च पेटवले हे खरं आहे,कारण गोव्यामध्ये पोर्तुगीज हिंदूचा फार छळ करीत होते. पण संभाजींनी तसा आदेश दिला होता का? विश्वास पाटील नाही असे म्हणतात, . . पण कदाचित आदेश दिला असेल कारण संभाजी महाराज फारच शीघ्रकोपी होते.

In reply to by प्रदीप साळुंखे

मालोजीराव 26/12/2015 - 10:51
पण संभाजींनी तसा आदेश दिला होता का? विश्वास पाटील नाही असे म्हणतात
विश्वास पाटील इतिहासकार आहेत काय ? कादंबरी म्हणून चांगली असली तरी संभाजी पुस्तकात अनेक चुका आहेत.
पण कदाचित आदेश दिला असेल कारण संभाजी महाराज फारच शीघ्रकोपी होते.
काय संबंध, संभाजी राजे उत्तम राजकारणी होते. एखादी मोहीम काढल्यावर युद्धखर्च निघून वर निधी साठत असेल तरच अश्या मोहिमा मराठे काढायचे. त्यामुळे गोव्याची स्वारी पूर्वनियोजित होती

प्रदीप साळुंखे 24/12/2015 - 17:42
शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत सुद्धा काही दोन तीन मशिदी अशा आहेत की ज्यांची इनामं चालू होती. म्हणजे पूर्वीपासून चालत आली ती...नवीन नाहीत
मग ती इनामं बंद सुद्धा पाडता आली असती पण महाराजांनी ती पाडली नाहीत.

कर्ण-२ 24/12/2015 - 17:54
अशा नकारतमक डोक्यानेच 'research' केलाय का आजोबा …… लेखात फ़्क़्त नाही,नाही अशीच वाक्ये आहेत … तुम्हाला लेख लिहायचा आहे तर तो माहितीप्रधान पाहिजे, 'धर्म'प्रधान नाही बरा आपण जदुनाथ सरकार वाचला आहे का …

In reply to by कर्ण-२

शैलेन्द्र 24/12/2015 - 20:45
Sorry, I cant write in Devnagari from here, Coming to the point, While nobody doubts Jadunath Sarkars contribution, It should also be noted that his work is primarily based on Mogul and British resources. secondly, His work is at least 100 year old, Thirdly Jadunath Sarkars research on Shivaji is a byproduct of his research on Aurangzeb, seen in the same light. Jadunath has no access to primary Maratha documents which is enjoyed by later researchers. Dr Mehandale is a serious researcher and placed atleast 3 generations after Jadunath Sarkar, obviously with more information and exposure. I have no doubt about the authenticity of information and proofs he is sharing. If you have anything contradictory, please share. You may have different opinion but it should be based on proofs and not on feelings.

In reply to by शैलेन्द्र

प्रचेतस 24/12/2015 - 20:52
सहमत आहे. ह्याशिवाय जदुनाथ सरकारांना मोडी लिपी येत नव्हती त्यामुळे समकालीन मराठी साधनांतून त्यांना संशोधन करता आले नव्हते.

In reply to by प्रचेतस

त्यांनी जदुनाथ सरकारांवर टीका केलेली आहे. संगमनेर हे नाव संगंनेर असं लिहिलेलं त्यांच्या लक्षात आलं नाही आणि त्यांनी शहानिशा न करता ते खुशाल राजपुतान्यामधील सांगानेर असं दडपलं असा काहीसा तो संदर्भ आहे. बाकी जदुनाथ सरकारना सर ही पदवी मिळाली यातच सगळं आलं. ब्रिटिशांचे बूट चाटल्याशिवाय त्यांना ती मिळाली असती का? त्यामुळे त्यांनी लिहिलेला इतिहास हा कितपत ग्राह्य धरायचा?

In reply to by बोका-ए-आझम

प्रचेतस 24/12/2015 - 21:31
बाकी जदुनाथ सरकारना सर ही पदवी मिळाली यातच सगळं आलं. ब्रिटिशांचे बूट चाटल्याशिवाय त्यांना ती मिळाली असती का? त्यामुळे त्यांनी लिहिलेला इतिहास हा कितपत ग्राह्य धरायचा?
ह्याच्याशी मात्र असहमत. तत्कालीन परिस्थितीतल्या उपलब्ध साधनांचा वापर करून त्यांनी इतिहास लिहिलाय. हा पूर्णपणे अचूक नाही तरीही जदुनाथ सरकारांचे एक अव्वल दर्जाचा इतिहासकार म्हणून असलेले मोल कमी होत नाही. मोडी लिपी न येणे, मराठा दफ्तर अभ्यासास न मिळणे, महाराष्ट्राचा भूगोल कमी प्रमाणात माहीत असणे, मुख्यत: औरंगजेबाचा इतिहास अभ्यासताना शिवाजी राजेंचा इतिहास एक बाय प्रॉडक्ट म्हणून अभ्यासणे ह्यामुळे त्यांच्या मराठेशाहीच्या इतिहासात काही त्रुटी आहेत. मात्र ह्यामुळे त्यांच्या कार्याचे महत्त्व कमी होत नाही. ते निश्चितपणे एक श्रेष्ठ दर्जाचे इतिहासकार आहेत. अगदी आपल्याकडे पाहता रियासतकार सरदेसाई ह्यांनी लिहिलेल्या मराठा रियासतीतही बऱ्याच त्रुटी आहेत. अगदी इतिहासाचार्य राजवाडे ह्यांनी लिहिलेली काही मतेही एकांगी आहेत मात्र ह्यामुळे त्यांनी केलेले कार्य गौण दर्जाचे ठरत नाही.

In reply to by प्रचेतस

सतिश गावडे 24/12/2015 - 21:57
इतिहास संशोधनाकडे काळ्या आणि पांढऱ्या या दोनच रंगात न पाहता इतिहासकारांच्या मर्यादा लक्षात घेऊन अशी सामंजस्याची भुमिका खचितच कुणी घेऊ शकेल. मानलं तुम्हाला आपण.

In reply to by किसन शिंदे

प्रसाद गोडबोले 25/12/2015 - 00:27
या एकाच गोष्टीसाठी तर फॅन आहोत आम्ही प्रचेतस (श्यॅ, काय नावे) सरांचे. ;)
एकाच ह्या शब्दावर तीव्र आक्षेप नोंदवण्यात येत आहे :-\

In reply to by प्रचेतस

पण सर ही पदवी निव्वळ त्यांच्या इतिहाससंशोधनामुळे त्यांना मिळाली असेल असं वाटत नाही. राजवाडे आणि शेजवलकर हे कमी दर्जाचे इतिहासकार नक्कीच नव्हते पण त्यांना सरकारी मानमरातब न मिळणं आणि जदुनाथ सरकारना मिळणं यामागे निःपक्षपाती दृष्टीकोन दिसत नाही.

In reply to by शैलेन्द्र

डॉ सुहास म्हात्रे 24/12/2015 - 21:52
You may have different opinion but it should be based on proofs and not on feelings. यासाठी २००% सहमती.

याॅर्कर 24/12/2015 - 20:48
छान व्याख्यानरूपी लेख! पण दोघांनी त्यातील हवाच काढली.

In reply to by याॅर्कर

रमेश आठवले 24/12/2015 - 22:16
खूप उपयुक्त माहिती दिली आहे. इतकी वर्षे एकच व्यक्तिच्या चरित्राचा एवढा सखोल व्यासंग करणारे दुर्मिळ असतात. असे श्री. मेहंदळे यांच्या कामाची त्यांनी स्वत: दिलेली माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. बऱ्याच गोष्टींचा भ्रमनिरास झाला .

किसन शिंदे 24/12/2015 - 21:56
मेहंदळे सरांच्या कार्याबद्दल बॅट्या, मालोजीराव, वल्ली आदींकडून खूप ऎकले आहे त्यामुळे त्यांच्या कार्याबद्दल आदर आहेच पण वरील लेख वाचताना महारांजाविषयीचा गैरसमज दूर करणे कमी हिंदू/मुस्लिम या गोष्टींकडे अधोरेखित करणारा जास्त वाटला. बाकी मालोजीराव म्हणतात तसं महाराजांची जशास तसे वृत्ती पटतेय या सर्व प्रकारांकडे पाहताना.

In reply to by किसन शिंदे

राही 25/12/2015 - 18:25
होय. किंचितसे तसेच वाटले. कदाचित या मर्यादित लेखाचा उद्देश तसाच असेल म्हणून भाषणातले तत्संबंधीचे उतारे दिले असतील. मेहेंदळ्यांनी अनेक अंगांनी महाराजांचे उत्कृष्ट चरित्र लिहिले आहे, अजून अपुरे असले तरी उपलब्ध चरित्रांमध्ये अधिक अचूक आणि विश्वसनीय आहे.

प्रदीप साळुंखे 24/12/2015 - 22:12
नेतोजी पालकर मुसलमान, मुसलमान राहिला तर राहिला, सगळे धर्म सारखेच आहेत, असे काही लोकांना वाटू शकलं असतं पण महाराजांना तसं वाटलं नाही.तुम्ही त्याला जबरदस्तीनं मुसलमान केलं...तेंव्हा मी पण त्याला तितक्याच हट्टीपणानं परत हिंदू करणार!
आता यामध्ये हट्टीपणाहा शब्द का वापरलायं तेच कळत नाही. नेताजीला यायचं होतं परत धर्मात तर त्याला घेतलं. आता यासाठी राजानेच पुढाकार घेतला म्हणून काय तो हट्ट आहे का? . . . अभ्यासू लोक सुद्धा अशा सोप्या गोष्टी कधीकधी फार क्लिष्ट करून काय पटवून देण्याचा यत्न करतात ते देवच जाणे.

हेमंत लाटकर 24/12/2015 - 22:14
शिवाजी महाराजांची कर्नाटक स्वारी म्हणजे धाडसी स्वारी होती. मोजक्या सैनिकासोबत कुतुबशाहाला भेटायला गेले तेव्हा कुतूबशाहच घाबरून गेला होता.

In reply to by हेमंत लाटकर

प्रदीप साळुंखे 24/12/2015 - 22:41
पंचवीस हजाराची फौज दिक्षिणविजयार्थ निघाली होती. प्रत्यक्ष भेटताना सोबत मोजकेच सैन्य असतात,सुरूवातीस कुतूबशाह दचकला होता हे खरे आहे. . . . . आता याबाबत बा.पुरंदरे काय म्हणतात ते पहा विजापूरच्या आदिलशाहीतील मराठे सरदार फोडून कुतूबशाहीच्या चाकरीत आणावे,आणि बहलोलादि पठाण दुर्बळ करून सोडावेत;सर्व हिंदू-मुसलमान तमाम दखणी मिलोन चालोन घेऊन पठाणास बुडवावा; हा पहिला हेतु पार पडावा.स्वराज्याच्या शत्रूंचा पाडाव करणे आणि तुंगभद्रेपासून कावेरीपर्यंत स्वराज्याचा विस्तार करणे,हाच या दक्षिणियांच्या एकजूट आघाडीमागे महाराजांचा अंतिम हेतू होता. . . मुद्दामहून पुरंदरेंचे संदर्भ देतोय.

मितभाषी 24/12/2015 - 22:21
Hindu muslim durava vadhavnyacha prayatn halli janivpoorvak hotana disto navhe toch chhupa ajenda distoy.

अनिरुद्ध.वैद्य 24/12/2015 - 22:42
छानच! एका दमात वाचून काढलं ... परत परत वाचावं असं!! पण हे सगळ आपलं सेक्युलर देशात कस्काय सांगायचं ब्वा ... खरे शिवाजीवाले कळवळतील न ...

हेमंत लाटकर 24/12/2015 - 23:06
पंचवीस हजाराची फौज बरोबर आहे. पण भेटीच्या वेळी दगाफटका होऊ शकला असता. बाबासाहेब पुरंदरेनी वागळेनी घेतलेल्या मुलाखतीत शिवाजी महाराजांनी केलेली चुक म्हणजे आग्रा भेट असे सांगितले. कारण कैदेत असताना शिवाजी महाराजांचे बरेवाईट होऊ शकले असते.

In reply to by हेमंत लाटकर

प्रदीप साळुंखे 24/12/2015 - 23:16
त्यावेळी कुतूबशाहशी वैर नव्हते,स्वराज्याच्या मार्गात त्याचा अडथळा नव्हता. शिवाय भौगोलिकदृष्ट्या तो दूर होतो. तसेच मादण्णा हा कुतूबशाहचा कारभारी होता,त्यांच्याकरवी भेट आधीच ठरली होती त्यामुळे तिथे दगाफटका होण्याची शक्यता नव्हती.

याॅर्कर 24/12/2015 - 23:07
अशाप्रकारे धाग्याचेच सप्रमाण खंडन झाले आहे. त्या कोंकणप्रेमींना बोलवा कुणीतरी.काहीतरी लिहा म्हणावं.

नगरीनिरंजन 25/12/2015 - 05:18
व्याख्यान नक्की कोणत्या हेतूने केले आहे ते कळले नाही. मुस्लिम राज्यकर्त्यांच्या जुलमी राजवटींविरुद्ध महाराजांचे युद्ध होते व त्याला धर्माचे अधिष्ठान होते हे बहुतेकांना माहित असतेच. महाराज सर्वधर्मसमभावी नसले तरी मुस्लिमद्वेष्टे नव्हते हे नक्की. त्यांची वागणूक काँग्रेस सरकारसारखी असणे शक्य नव्हते कारण तेव्हा राजकीय सीमा आणि आपले-परके याचे संदर्भ वेगळे होते. मुस्लिम राज्यकर्त्यांनी बाटवलेल्या नवमुस्लिम रयतेशी महाराजांचे वर्तन कसे होते याचा उल्लेख व्याख्यानात राहून गेला की मुद्दाम गाळला? एकदा स्वतःचे राज्य झाल्यावर राजांनी स्वराज्यातल्या मुस्लिमांविरुद्ध आघाडी उघडली नाही हेच त्या काळाच्या मानाने खूप आहे. उलट जाती-पातींमुळे ज्यांना परत धर्मात यायचे असेल अशा लोकांना येऊ न देण्यात हिंदू धर्मातील उच्चवर्णीय धर्ममार्तंड कारणीभूत आहेत. सहा सोनेरी पानेमध्ये सावरकर म्हणतात की अशा वृत्तीमुळे हिंदू धर्माचे तेव्हा फार नुकसान झाले. त्या धर्ममार्तंडांची टिनपाट पिलावळ आता घरवापसीच्या गप्पा करते पण आता सगळेच संदर्भ बदलले आहेत. बाटलेली जनता बाटूनही चार-पाचशे वर्षे झालीत आणि खरे परकीय तुर्क लोक उरलेच नाहीत तरीही आपले शत्रू अजूनही म्लेंच्छ लोक असल्याचे काही (ज्यांना धार्मिक ध्रुवीकरणातून फायदा आहे अशा) लोकांना वाटत असते आणि त्याला खतपाणी घालण्यासाठी जर कोणा विद्वानाचा व्यासंग वापरला जात असेल तर धिक्कार आहे अशा क्षुद्रपणाचा.

In reply to by प्रदीप साळुंखे

पैसा 25/12/2015 - 10:47
व्याख्यानात सांगितले आहे त्याच्या विरोधात काही पुरावे असले तर द्या. उगं कांगावा कशाला?

In reply to by पैसा

●'म्लेच्छक्षयदीक्षित' आणि नेताजी पालकरची घरवापसी या साध्या सोप्या गोष्टी आहेत यातून महाराजांचा हट्टीपणा दिसतो म्हणल्यास कोणालाही हसू येईल.ते वर मी सांगितलं आहे. ●मंदिरही हट्टीपणानं बांधलं म्हणतात ते,दोन-तीन उदाहरणेही दिली त्यांनी.आता ते हट्टीपणानं बांधलं कि लोकआग्रहास्तव हे बघायला त्या काळात जावं लागेल. ●सैन्यामध्ये मुसलमान किती? एकूणच त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रात मुसलमान लोकसंख्या किती होती?त्या अनुषंगाने त्यांची संख्या असणार,पण होते ना!कि नव्हतेच. ●दौलतखानला अनुभव होता म्हणून आरमारप्रमुख केलं म्हणतात ते, बरं ठीक आहे;पण केलं ना! ●मदारी मेहतर नव्हता? बरं ठीक आहे मग बाबासाहेब पुरंदरे चुकले असतील कदाचित. . . . स्पेसिफिक दोन-तीन उदाहरणांचे ढीगभर प्रेझेंटेशन करून एखाद्यी गोष्ट सिद्ध होत नाही. . . . महाराजांचा हिंदूत्ववादी हट्टीपणा सिद्ध करण्याचा एवढा हट्ट का?

In reply to by प्रदीप साळुंखे

पैसा 25/12/2015 - 12:45
ते खोडायचे असेल तर तुमच्या बाजूने पुरावे द्या ना. "असे असेल, तसे कसे असेल" असले इतिहासाचा अभ्यास करणार्‍याने म्हणून उपयोग नाही. द.मा.मिरासदारांची "शिवाजीचे हस्ताक्षर" कथा आठवतेय का?

In reply to by प्रदीप साळुंखे

शैलेन्द्र 25/12/2015 - 16:02
एकेका मुद्द्याचे उत्तर देतो,
  • संपूर्ण स्वराज्य निर्मितीचा अट्टाहास हाच मोठा हट्टीपणा होता, काही हट्ट सकारात्मक असतात
  • लोकांनी तरी का हट्ट केला, आदिलशाही किंवा पोर्तुगीज राज्य असताना का नाही केला
  • सैन्यात मुसलमान असल्याने काय होत, अधिकारावर किती होते, त्याचवेळी आदिलशाही कुतुबशाहीत किती प्रमाण होत
    • चुकले असतील बाबासाहेब, त्यात काय विशेष, त्यांना नवीन पुरावा नसेल मिळाला
जो राजा स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायचा अट्टाहास करायचा त्याला (आजच्या व्याख्येने) सेक्युलर ठरवायचा हट्ट का

In reply to by शैलेन्द्र

प्रदीप साळुंखे 25/12/2015 - 17:02
जो राजा स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायचा अट्टाहास करायचा त्याला (आजच्या व्याख्येने) सेक्युलर ठरवायचा हट्ट का
सेक्युलर ठरवायचा हट्ट मुळीच नाही, मात्र कट्टरवादी ठरवायचा हट्ट चालू असेल,तर मात्र नाईलाज आहे. मी आधीच सांगितलयं,दोन-चार उदाहरणांचे अवडंबर माजवून काही साध्य होत नाही. मग, ●शिवाजी-याकुतबाबा ●शिवाजी-कुतूबशाह सौदार्य संबंध ●शहाजी हे नाव शहापीर या मुस्लिम पीरावरून ठेवले. अजून बरीच उदाहरणे देता येतील, या दोन-तीन उदाहरणांवरून मी ते सेक्युलर होते असं म्हणू शकतो.

In reply to by शैलेन्द्र

अभ्या.. 25/12/2015 - 19:04
कट्टरता अन सेक्युलर हे शब्दच इतके संदिग्ध आहेत की समजावून सांगू म्हणता सांगता येत नाहीत. मग परफेक्ट व्याख्या तर दूरच राहीली. ;) . (ह. घे. रे शैलेन्द्रा, तुला काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम येतोय हे कळलेय)

In reply to by पैसा

मितभाषी 25/12/2015 - 22:27
@@@ व्याख्यानात सांगितले आहे त्याच्या विरोधात काही पुरावे असले तर द्या. उगं कांगावा कशाला?@@@@@ @@@@@ धार्मिक ध्रुवीकरणातून फायदा लाटण्यासाठी आणि त्याला खतपाणी घालण्यासाठी जर कोणा विद्वानाचा व्यासंग वापरला जात असेल तर ते गैर आहे. यात कांगावा काय आहे?

In reply to by मितभाषी

पैसा 26/12/2015 - 00:20
पण इथे काहींना व्याख्यान आवडलेलं आहे,त्यामुळे त्यांच्या हेतूवर संशय घेण्यास वाव आहे.
कोणाला निव्वळ मुद्दे मांडण्याची पद्धत आवडू शकते. हेतूंवर संशय वगैरे फारच जास्त झाले. बरे, धाग्याकर्त्याने फक्त व्याख्यान टाईप करून इथे टाकले आहे. त्याचे स्वतःचे मत काहीही दिलेले नाही. तरी त्याला हिंदुत्ववादी वगैरे लेबले कशासाठी लावली जात आहेत? का ते व्याखान देणारे मेहंदळे सर आणि ते ऐकणारे सगळ्यांनाच हे लेबल चिकटवायचे आहे? मेहंदळे सरांनी तरी फक्त ऐतिहासिक तथ्य मांडली आहेत. त्याच्या विरोधात काही लिखित पुरावे असतील तर जरूर द्या. ते न करता "हेतूंवर संशय" वगैरे बोलणार्‍या आणि विनाकारण आरडाओरडा करताना दिसलेल्या माणसाचाच जास्त संशय येतो.

In reply to by पैसा

प्रदीप साळुंखे 26/12/2015 - 09:20
समजा उद्या एखादा ब्रिगेडी धागा आला आणि त्यांनीही दोन-चार पुराव्यानिशी संदर्भ देवून शिवराय कसे ब्राह्मणविरोधी आणि पुरोगामी होते हे पटवून देण्याचा प्रयत्न केला, तसेच काही ऐतिहासिक तथ्ये सप्रमाण मांडली तर अशा धाग्यावर सुद्धा तुमची प्रतिक्रिया "लेखासाठी धन्यवाद" अशी असली पाहिजे. जर ती तशी नसेल तर? . . . त्यांनी दोन-चार उदाहरणांवरून जो तर्क केला आहे तो खोडण्यासाठी लिखित पुराव्यांची आवश्यकता नाही.तर्काला तर्कानेच उत्तर मी दिलेले आहे.

In reply to by प्रदीप साळुंखे

पैसा 26/12/2015 - 11:16
अब आया ऊंट पहाड के नीचे!
समजा उद्या एखादा ब्रिगेडी धागा आला आणि त्यांनीही दोन-चार पुराव्यानिशी संदर्भ देवून शिवराय कसे ब्राह्मणविरोधी आणि पुरोगामी होते हे पटवून देण्याचा प्रयत्न केला, तसेच काही ऐतिहासिक तथ्ये सप्रमाण मांडली तर अशा धाग्यावर सुद्धा तुमची प्रतिक्रिया "लेखासाठी धन्यवाद" अशी असली पाहिजे.
जरूर लिहा! लेख चांगला असेल तर दाद मिळेल. शिवाजी महाराज हे ब्राह्मणविरोधी आणि पुरोगामी होते हे दाखवायचा जरूर प्रयत्न करा. एकही पुरावा सापडणार नाही. शिवाजी महाराजांनी गुन्हेगारांना नेहमीच कठोर शिक्षा केल्या. तेव्हा त्याची जात धर्म पाहिला नाही तसेच कोणाच्या गुणांचे कौतुक करतानाही पाहिला नाही. एवढ्या मोठ्या युगपुरुषाला हे किंवा ते लेबल लावायची किंवा तुमच्या कोणत्याही सर्टिफिकिटाची गरज नाही. तरी तुमच्या समाधानासाठी जरूर प्रयत्न करा.

In reply to by पैसा

पैसा 26/12/2015 - 12:38
इथे तुम्ही मेहेंदळे सरांनी पुरावे दिलेत तरी ते नाकारताय आणि बाजीरावाच्या सिनेमात इतिहासाचे विकृतीकरण आहे त्याचं समर्थन करताय. जे घडलं तो इतिहास. नुसत्या सांगोवांगीच्या गप्पा नव्हेत. तुमची आमची वयं असतील तितकी वर्षे अभ्यास केलेला माणूस जर शेकडो हजारो कागदपत्रे वाचून काही बोलत असेल तर ते नाकारून किंवा नवा आपल्याला सोयीस्कर इतिहास लिहून तुम्हाला काय मिळवायचं आहे?

In reply to by पैसा

प्रदीप साळुंखे 26/12/2015 - 12:47
चित्रपट भव्य आणि दिव्य आहे म्हणून मी समर्थन करतोय वेळ मिळाला तर पहा जरूर. . . आपल्याला सोयीस्कर असा इतिहास लिहून काही मिळवायचं नाहीये,तो आहे तसा असावा हाच माझा पण मुद्दा आहे. . . मी त्यांचे पुरावे नाकारत नाही,त्यांचा व्यासंग दांडगा आहे त्याबद्दल आदर आहेच,पण त्यातून निघणारा तर्क मी नाकारत आहे. . . धन्यवाद

In reply to by पैसा

प्रदीप साळुंखे 26/12/2015 - 12:40
एवढ्या मोठ्या युगपुरुषाला हे किंवा ते लेबल लावायची किंवा तुमच्या कोणत्याही सर्टिफिकिटाची गरज नाही.
हाच प्रतिसाद आधी तुम्ही दिला असता तर,एवढा प्रतिवाद मी केला नसता. मी ब्रिगेडी नाही हे वर त्या नाद खुळाच्या प्रतिसादाखाली सांगितले आहे. . . स्पेसिफिक माझं आडनाव बघून जर कोणी माझी वृत्ती ठरवणार असेल तर अवघड आहे.(हा टोला नाद खुळा साठी) बाकि टोपन नाव घेवून धुमाकूळ घालण्याची इच्छा नाही. . . नै म्हणजे संपादक या जबाबदारीच्या पदावर तुम्ही होतात,म्हणून म्हणलं आपलं सहज. बाकि मिपावर आठ महिन्यांचा माझा अनुभव आहेच,कधीकधीच प्रतिसाद देतो,एरवी वाचनमात्रच असतो. _ _ _ _ जय हिंद

In reply to by नगरीनिरंजन

सुबोध खरे 25/12/2015 - 09:36
घर वापसी सोडा हो. साधे धर्मांतर विरोधी विधेयक आणायचे म्हटले तर पाद्री आणि मौलवी कडाडून विरोध का करतात?

In reply to by सुबोध खरे

प्रदीप साळुंखे 25/12/2015 - 10:22
त्यामध्ये ते आपला स्वार्थ बघतात. . . . आणि काय ते हिंदू कोड बिल,मुस्लिम लाॅ वगैरे सगळं बंद व्हायला पाहिजे. समान नागरी कायदा झालाच पाहिजे. धर्माआधारित कायदे असतील तर भारतीयांनी महासत्ता होण्याचे स्वप्न बघू नये. . . . शिवरायांनी कोणाचे लाडही केलं नाही आणि तुष्टीकरणही केलं नाही.

In reply to by प्रदीप साळुंखे

सुबोध खरे 25/12/2015 - 12:19
समान नागरी कायदा झालाच पाहिजे. धर्माआधारित कायदे असतील तर भारतीयांनी महासत्ता होण्याचे स्वप्न बघू नये. शिवरायांनी कोणाचे लाडही केलं नाही आणि तुष्टीकरणही केलं नाही. बाडीस

In reply to by नगरीनिरंजन

गामा पैलवान 25/12/2015 - 18:34
न.नि., व्याख्यानाचा हेतू उघड आहे. शिवाजीमहाराज कसे होते हा व्याख्यानाचा अंतस्थ हेतू नाहीच्चे मुळी. शिवाजीमहाराजांच्या उक्तीतून आणि कृतीतून हिंदूंनी आजच्या घडीला काय बोध घेतला पाहिजे हा व्याख्यानामागचा हेतू आहे. माझ्या मते हा हेतू सफल झाला आहे. आ.न., -गा.पै.

प्रकाश घाटपांडे 25/12/2015 - 09:27
पानसरे शिवाजी इस्लाम आणि इतिहास हा एक लेख वाचनात आला होता. इतिहास हे शेवटी उपलब्ध माहिती वर आधारित इंटरप्रिटेशन आहे. खरा इतिहास ही काय भानगड असते व तो कुणाला ठाउक असतो? या प्रश्नाच उत्तर मिळणे कठीण. इतिहासात किती अडकून पडायच? हा प्रश्न मला पडतो

सतीश कुडतरकर 25/12/2015 - 11:44
व्याख्यात्याने एक डिसक्लेमर टाकायला हवे! 'जे मी सांगणार आहे ते एका विचारसरणीच्या बाजूने'च' झुकलेले असेल.' म्हणजे लोकांना त्यांचा अजेंडा काय आहे याच्यावर आदळआपट न करता थेट मुख्य व्याख्यानाला प्रतिसाद देता येईल.

एक सामान्य मानव 25/12/2015 - 12:59
काही प्रतिसाद वाचून वाटले की आपण सर्वच खूप पूर्वग्रह्दुषित आहोत. आपल्याला शिक्षण व समाजातून काही मूल्ये शिकवली गेली आहेत व ती पटोत व न पटोत तिच सर्वश्रेष्ठ अशी आपली झापडबंद विचारसरणी झाली आहे. म्हणजे सर्वधर्मसमभाव, लोकशाही हीच अंतिम सत्ये आहेत असे आपल्याला वाटते व तिच मूल्ये आपण सर्व लोकांवर चिकटवतो आहोत. शिवाजी महाराज थोर पुरुष म्हणजे ते सेक्युलर असलेच पाहीजेत. किंबहुना सेक्युलर नसणारी व्यक्ती थोर कशी असेल असा काहीसा विचार समाजात रुजत आहे. पण सर्वधर्मसमभाव, लोकशाही यांचीही चिकित्सा व्हायला हवी. ह्या संकल्पना अस्तित्वात येउन जेमतेम २२५ वर्षे झालीत. पण मानवी इतिहास हा किमान ५००० वर्षाचा आहे. ही मुल्ये सुस्थापित नसतानाही राज्ये, साम्राज्ये बनली व लयाला गेली. वरील लेखात काही खूपच धक्कादायक तथ्ये मांडली आहेत (ती तथ्ये आहेत का?). उदा. मदारी मेहतरविषयी. ह्या गोष्टींचा प्रतिवाद कोणीच पुरावे देउन करत नाहीये. किंबहुना जर व्याख्यानात जर नेहमीची शिवाजी महाराज खूपच सेक्युलर होते. त्यानी मुसलमानांनाही नोकरीवर ठेवले, मशिदी बांधल्या असे सांगितले असते तर कोणीही पुरावे मागीतले नसते.

In reply to by एक सामान्य मानव

नगरीनिरंजन 25/12/2015 - 14:34
ऐतिहासिक व्यक्तींना (विशेषतः जेत्यांना) नव्या मूल्यव्यवस्थेतले अनेक गुण चिकटवणे नेहमीच होत आलेले आहे. त्यात नवीन काही नाही. आता मात्र विशिष्ट गुणांना विशिष्ट वर्गाकडून विशिष्ट हेतूंनी आक्षेप घेतला जात आहे एवढेच. जाताजाता: पीसीएमसीच्या वेबसाईटवर हा गमतीदार प्रकार आहे. आजकाल कशावरून काय सिद्ध होईल ते सांगता येत नाही.
चिंचवडच्या मोरया गोसाव्यांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांना अतिशय आदर होता. परंतु शिवाजी महाराज हे परखड होते. सिंहगडच्या किल्ल्यावर किल्लेदाराला सांगून चिंचवडच्या देवांनी दोन इसमांना परस्पर बंदिखान्यात ठेवले असल्याचे महाराजांना माहीत पडले. तेव्हा शिवाजी महाराज देव महाराजांना म्हणाले, च्तुम्ही आमच्या कारभारात ढवळाढवळ करता, तेव्हा तुमची बिरुदे आम्हाला द्यावीछ, आमची बिरुदे तुम्ही घ्यावी. किल्लेदाराला त्यांनी विचारले, तू चाकर कोणाचा ? देवांचा की आमचा ? असा उल्लेख द.ग.गोडसे लिखित च्समन्दे तलाशछ या पुस्तकात करण्यात आला आहे. यावरुन छत्रपती शिवरायांची चिंचवडच्या मोरया गोसावी व देव महाराजांवर नितांत श्रद्धा असल्याचे सिद्ध होते.
मेहेंदळे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे इतिहासकार आहेत. त्यांनी मांडलेली सर्व मते गंभीरतेने घेण्यासारखी आहेत . शिवाय त्यांचे खंडन वा समर्थन करण्यासही एक किमान दर्जा आवश्यकच आहे. वरील विचार वाचुन मी काहीसे आश्चर्य जरुर वाटले. या अगोदर जो शिवाजी महाराजां संदर्भातला इतिहास वाचला होता त्यावरुन ते सेक्युलर वाटले होते काहीसे सेक्युलर... मात्र वरील लेखाने तसे काही ते नव्हते असे दिसत आहे. हे माझ्यासाठी नविन आहे. मात्र काही मुद्दे क्रमाने नोंदवितो. १- साधारण शिवाजी महाराजांविषयी समजा १०० मुद्दे आहेत उदा. त्यांनी शेतसारा मध्ये केलेला बदल काठीने जमीन मोजुन आकारमानानुसार शेतसारा भरणे हा नविन नियम ( पुर्वी वतनदार इ. च्या हातात शेतसारा कीती घ्यावा असे काही होते ) चुक भुल देणे घेणे. किंवा नविन शस्त्र माझ्या आठवणी प्रमाणे मुस तोफा इ. संदर्भात नविन तंत्रज्ञान वापरांणे इ. प्रयोग त्यांनी केले सैन्यास झाडे तोडु नयेत शेत उध्वस्त करु नये युद्धा दरम्यान इ. नियम आदी समजा अनेक बाबी मुद्दे शिवरायांसंदर्भात आहेत. म्हणजे समजा एकुण १०० मुद्दे आहेत त्यातला एक असु शकतो की शिवाजी महाराजांचा मुस्लिम विषयक दृष्टीकोण वा गो ब्राह्मण विषयक दृष्टीकोण ते प्रतिपालक होते की नव्हते इ. इ. २- तर मेहेंदळे यांच्या अफाट ज्ञानाचा रीसर्चचा वापर जर वरील व्याख्यानात हा जो असे समज क्र.९७ चा मुद्दा शिवाजी ऑन मुस्लिम- गो- ब्राह्मण काय भुमिका इ.इ. पुरताच आयोजकांनी केलेला दिसतोय. व त्याहुन म्हणजे स्वतः मेहेंदळे यांना देखील क्रं ९७ च्या मुद्द्यात रस दिसतोय. तर ठीक आहे मात्र हा मेहेंदळे यांच्या रीसर्चचा इनएफीशीयंट युज म्हटला पाहीजे. संभाजी भिडें कडुन अपेक्षा नाही मात्र मेहेंदळे कडुन होती. कारण मेहेंदळे तसे दुर्मिळ आहेत म्हणजे त्यांचे विचार व्याख्याने पुरंदरें सारखी "मुबलक " प्रमाणात उपलब्ध नाहीत. जे कधीतरीच वेळ देतात त्यांना क्रं ९७ चा मुस्लिम गो ब्राह्मण प्रतिपालक मुद्दा देणे अत्यंत मर्यादीत करण्यासारखे वाटले पण मेहेंदळेंनाही रस आहे त्यांचेही काही आस्थाविषय आहेत असे दिसते. ३- सुरतेची लुट शिवाजीची अ‍ॅडमिनीस्ट्रेशन फंडींग आर्थिक विचार, शस्त्रे रणनीती इ. इ. अनेक ९९ मुद्दे होते. पण शक्ती आणि भक्ती मध्ये अर्थातच या विषयात रस कोणालाच नसावा. आता शक्ती व भक्ती त पुढील वेळेस मेहेंदळेंना पाचारण करुन आता शिवाजी महाराजांच्या जीवनातील गायीचे स्थान हा विषय दिल्यावर त्यांच्याकडे डेटा असेलच अमुक अमुक गो शाळेला अमुक अमुक इतके होन महाराजांनी दान दिले.

मारवा 25/12/2015 - 16:29
तर आजपर्यंत जी सेक्युलर शिवाजी मांडणी एका वर्गाकडुन केली जात होती त्याच्या विरोधात वरील "नव्हे शिवाजी हिंदुवादीच" ही नविन मांडणी वरील व्याख्यानातुन समोर येते. मात्र याचा उपयोग काहीच नाही. म्हणजे मुळात जुने संत राजे इ. फार आधुनिक विचार करणारे होते काळाच्या पुढे विचार करणारे होते. असे खटाटोप करुन सिद्ध करण्याचा एक सतत प्रयत्न होत असतो. प्रत्यक्षात त्या त्या व्यक्तीवर त्या त्या काळाचा जबरदस्त पगडा हा असतोच व ते स्वाभाविकच आहे. पण मला एक दिसत आहे की ते हिंदुवादीच होते हे सिद्ध झाल्याने काय फरक पडतो नेमका ? त्यांच्या आयुष्यातील खरोखर क्रांतीकारक अनुकरणीय अनेक गोष्टी आहेत अनेक रोचक व सुरत लुटी सारख्या काही खटकणारया बाबी पण आहेत. म्हणजे मला आयोजनाचे स्वातंत्र्य असते तर मी शिवाजी महारांजाविषयी अनेक दमदार मुद्दे सुचवु शकलो असतो. वरील मुद्दा देखील एका अर्थाने महत्वाचा पण इतर मुद्द्यांच्या तुलनेने फार कमी महत्वाचा आहे. मेहेंदळे सारख्या श्रेष्ठ अभ्यासकाला जो दुर्मिळ आहे त्यांच्या कडुन शिवाजी विषयी कीतीतरी अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांवर विवेचन जाणुन घेता येऊ शकते. नुसता शिवाजीची आर्थिक नीती किंवा शिवाजीची आरमार शस्त्र नीती इतका जरी तुकडा घेतला तर काय जबरदस्त रोचक महत्वपुर्ण माहीती मेहेंदळें कडुन काढुन घेता आली असती. व ती खरोखर रेलेव्हंट पण आहे. समकालीन महत्वाची आहे. आता शिवाजी सेक्युलर नव्हते संकुचित विशीष्ट धर्मवादी होते इतकेच नविन लक्षात आले त्याने काय फरक पडला ?

In reply to by मारवा

राही 25/12/2015 - 18:40
महाराजांची आरमारविषयीची रणनीती आणि दूरदृष्टी इतरांपेक्षा कितीतरी पुढे होती. त्यांनी नव्याने बांधलेले सागरी किल्ले ही त्यांची एक फार मोठी कर्तबगारी आणि खरेखुरे स्मारक आहे. पण दुर्दैवाने या बाबीचे आम जनतेमध्ये फारसे कौतुक दिसत नाही. डोंगरी किल्ल्यांमध्येच सगळे रमलेले दिसतात.

विवेकपटाईत 25/12/2015 - 19:44
शिवाजींनी हिंदवी स्वराज्य स्थापित केले याचा अर्थ ते मुस्लीम विरोधी होते, असा होत नाही. हे सत्य आहे त्या काळी हिंदुधर्मियांवर अत्याचार करणारे मुस्लीम शासक होते. त्यांच्या बिमोड करणे म्हणजे मुस्लीम विरोध होत नाही. आपल्या वर झालेल्या अत्याचारांचा विरोध करण्याचा अधिकार सर्वांना आहे. शिवाजी हिंदू असल्यामुळे अधिकांश अधिकारी हि हिंदू राहणार हे साहजिक आहे.

एक सामान्य मानव 25/12/2015 - 20:02
पण महाराज मुस्लीम विरोधी नव्हते हे सिद्ध करण्याचा एवढा अट्टहास का? आणि त्यासाठी पुरावे वा संदर्भ कोणिही देत नाही. मेहंदळेंनी मुस्लीम विरोधी सिद्ध करण्यासाठी पुरावे व संदर्भ दिलेत. त्यांचा प्रतिवाद व्हावा.

सुबोध खरे 25/12/2015 - 20:06
भारतात असलेले १७ कोटी मुसलमान काही स्वखुशीने धर्मांतर केलेले नाहीत. यातील बहुसंख्य जबरदस्तीने बाटवलेले आहेत. तेंव्हा त्या काळात( ३०० वर्षापूर्वी) जर एखाद्या राजाने आपल्या धर्मावरील आक्रमण थांबविण्याचा प्रयत्न केला तर त्यात काय चुकीचे आहे? आज एक मशीद पाडल्यावर एवढा गदारोळ होतो ती मुळात एक मंदिर पाडून बांधलेली आहे तर त्याकाळात असले सेक्युलर किंवा निधर्मी शब्दच अस्तित्वात नव्हते तर शिवाजी महाराजाना सेक्युलर ठरवण्याचा अट्टाहास कशासाठी. "देव, देश अन धर्मासाठी प्राण घेतले हाती" हे म्हणण्याची लाज कशाला?
शिवाजी सेक्युलर होते हे ठरविण्याचा इतका अट्टाहास कशासाठी हेच समजत नाही. हाच आक्षेप सर्वच बाबतीत सर्वच संताच्या बाबतीत संत अत्याधुनिक होते आधुनिक मुल्ये अंगात मुरवलेले होते इ.इ. अगदी सेम वरच्या सारखा अट्टाहास कशासाठी ? काहीच अर्थ नाही त्यात मला वाटत त्यात अहंकार तृप्त होत असावा बघा आम्ही कीती पुढारलेले होतो कीती काळाच्या पुढचा विचार करत होतो या अहं च्या तृप्ती व्यतिरीक्त अजुन काय असेल ? एका अर्थाने मेहेंदळे यांनी शिवाजींचा हा सेक्युलर मुखवटा फाडला हे बरेच केले. मात्र आयोजकांचा अजुन एक हेतु दिसतो अगोदर सेक्युलर नाही प्रथम पायरी - अगोदर सेक्युलर नाही मुस्लिम विरोधी आहे द्वीतीय पायरी- हट्टी ( कट्टर ऐवजी हा शब्द वापरलेला दिसतोय ) आहे जशास तसे ( काहींनी प्रेरणा पण लगेच घेतलेली दिसतेय इन्स्टंट इन्स्पायरेशन बघा कसे जशास तसे हट्टी ) हट्टी वा कट्टर हिंदु आहेत तृतीय पायरी- माझा अंदाज आता पुढील विषय गाय शिवाजीने गायींसाठी केलेले कार्य चतुर्थ पायरी- गो ब्राह्मण प्रतिपालक नंतर सत्य पंचतत्वात विलीन व्हावयास अवधी लागणार नाही.

अवतार 25/12/2015 - 20:27
हे दोघेही धर्मगुरू नसून राज्यकर्ते होते. राज्याच्या वाढीसाठी जे काही करणे आवश्यक होते ते दोघांनीही केले. आलमगीर स्वत:च्या सरदारांना आणि प्रजेला हट्टाने मुस्लिम करून घेण्याच्या फंदात पडला नाही की शिवराय स्वत:च्या मुस्लिम सैनिकांना आणि प्रजेला हट्टाने हिंदू करून घेण्याच्या भानगडीत पडले नाहीत. औरंगजेबाने जिझिया लादला, तेव्हा त्याला थेट पत्र पाठवून जाब विचारणारे शिवरायच होते. पण त्या पत्रातही शिवराय हे औरंगजेबाला त्याच्या पूर्वजांची आठवण करून देतात. सरसकट इस्लामला शिव्या घालत नाहीत. (गैर मुस्लिमांवर जिझिया लादणे खुद्द पैगंबराने दाखवून दिले असले तरीही) शिवरायांची प्रतिमा कट्टर हिंदू म्हणून बिंबवणे किंवा संपूर्ण धर्मनिरपेक्ष म्हणून बिंबवणे हे दोन्ही प्रकार त्यांना हायज्याक करण्याचेच आहेत. इतिहास आहे तसा स्वीकारणे हे समाजातील बुद्धिवादी आणि राज्यकर्त्या वर्गांच्या हितसंबंधांच्या विरोधात जात असेल तर इतिहासावर सोयीस्कर रंगकाम केले जाते. असा इतिहास स्वीकारतांना त्याची लिटमस टेस्ट करणे आवश्यक असते. शिवरायांना बाबू बजरंगीच्या पातळीवर नेणे जितके हास्यास्पद आहे तितकेच थोमस पेनच्या पातळीवर नेणे हास्यास्पद आहे. महापुरुषांनाही काळाच्या मर्यादा असतात ह्याचे भान सुटले की आत्मवंचना सुरु होते.

In reply to by अवतार

सुधीर 26/12/2015 - 10:12
प्रतिसाद आवडला. मेहेंदळे यांच्या व्याख्यानाचं ध्वनीमुद्रण ऐकायला आवडेल. कुणाकडे असेल तर शेअर करा.

याॅर्कर 25/12/2015 - 22:34
प्रत्येकांनी आपापल्या सोयीनुसार शिवाजी बनवला आहे. . . पण शिवाजीमहाराज कट्टर/हट्टी होते असं म्हणाल तर व्यापक स्वरूपात ही वृत्ती(कट्टरतावाद) कोणी आजच्या युगात स्विकारणार नाही. . . आजचं युग globalised आहे,आणि यासाठी काही आदर्श तत्वे आहेत.ज्याचा प्रगत राष्ट्रे स्विकार करतात उदा-समानता,धर्मनिरपेक्षपणा,शांतता इ. यामुळेच शिवरायांचे कट्टर स्वरूप दाखवण्याचा निरर्थक प्रयत्न या काळात करणे उचित नाही. . . परत ते कट्टर स्वरूप काही धर्ममार्तंड आपल्या सोयीनुसार विशिष्ठ धर्माविरूद्ध आज वापरतात,त्यामुळे या गोष्टींना खतपाणी घातल्यासारखे होईल. . . शेवटी मोदीसुद्धा बाहेरच्या देशात गांधीजींचं नाव घेतात,त्याशिवाय पर्याय नाही.कट्टरपणा हा कोणीही स्विकारणार नाही,कट्टरवादी देशांचे आज काय चित्र आहे ते स्पष्टचं आहे. . . शिवरायांनी तेव्हाच्या अनुरूप परिस्थितींनुसार भूमिका घेतल्या असतील,तेव्हा त्यांचे एकांगी चित्रण उचित नाही,मग ते डावे असो अथवा उजवे.

In reply to by याॅर्कर

एक सामान्य मानव 26/12/2015 - 09:45
"आजचं युग globalised आहे,आणि यासाठी काही आदर्श तत्वे आहेत.ज्याचा प्रगत राष्ट्रे स्विकार करतात उदा-समानता,धर्मनिरपेक्षपणा,शांतता इ." हे स्टेट्मेंट पूर्णपणे चुकीच्या समजुतींवर आधारीत आहे. ही तथाकथीत "आदर्श तत्वे" ही लोकांना उपदेश करण्यासाठी आहेत. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र कोणतेही प्रगत राष्ट् असे वागत नाही. आपण मात्र गोरे लोक काय म्हणतील ह्या विचारांनी उगाच कानकोंडे होत असतो. सर्व प्रगत राष्ट्रात निवडणूक प्रचारात उमेदवार उघड्पणे चर्चला भेटी देतात, आपण कसे चांगले ख्रिस्ती आहोत हे दाखवतात, जर्मनीत "ख्रिस्चन" डेमोक्राटीक पार्टी हे नांव खटकत नाही, अमेरीकेत रेशीअल प्रोफायलींग चालते, वर्णविद्वेष वगैरे तर आहेच. सर्व युरोपीय देशांनी सिरियन मुस्लीम निर्वासीत नकोत असे सरळ सांगीतले पण हीच भूमिका ख्रिस्ती निर्वासीत लोकांबद्द्ल ते घेणार नाहीत. धार्मिक बाबी सोडा इतर काही विषयांतसुद्धा हे चालू आहे. स्वतः अणुप्रकल्प चालवा पण भारत वगैरे देशात ग्रीनपीसकडून विरोध. हे तिथेही विरोध करतात पण कोणी त्यांना भाव देत नाहीत. नव्या सरकारने ह्या लोकांच्या ***वर लाथ घातली हे अभिनंदनीय आहे. ह्याच प्रकारे इतर बाबतीत हे शहाणपण शिकवतात ते बंद करायला हवे.

In reply to by एक सामान्य मानव

याॅर्कर 26/12/2015 - 10:24
मान्य, तुमचं म्हणणं ही काही खोटं नाही. मग भारत आणि इतर राष्ट्रांत काही फरक नाही म्हणायचा. मग आता, विविधतेत एकता,इन्स्क्रिडिबल इंडिया,विश्वबंधुत्व या गोष्टी गुंडाळून ठेवाव्या लागतील.

In reply to by याॅर्कर

नाखु 26/12/2015 - 10:34
त्या फक्त आणि फक्त भारतानेच पाळाव्यात म्हणून या शहाजोगांनी कोकलू नये इतकीच माफक इच्छा आहे "सामान्य मानवाची". भारताने कागाळीखोर्/भांडणारा/चिथावणी राहू नये असे वाटते तसेच अगदी बुळे/आणि नेहमीच पड्+रड धोरण वाले राहू नये हीच सदिच्छा !!!! प्र.मात्र नाखु.

In reply to by नाखु

याॅर्कर 26/12/2015 - 11:18
त्यासाठीच मोदी काल पाकिस्तानात उतरले होते. . . (मोदीभक्तांनी हलके घेणे)

In reply to by याॅर्कर

एक सामान्य मानव 26/12/2015 - 11:40
"मग भारत आणि इतर राष्ट्रांत काही फरक नाही म्हणायचा." मला अगदी याच्या उलट म्हणायचे आहे. भारत आणि इतर राष्ट्रांत फरक आहेच. किंबहुना प्रत्येक राष्ट्र हे वेगळेच आहे आणि प्रत्येक राष्ट्राला आपले वेगळेपण जपण्याचा आधिकार आहे. इतरांबद्द्ल आदर बाळगताना स्वतःचे आचार व सामाजिक संकेत जपण्याचा आधिकार प्रत्येक राष्ट्राला आहे. जागतिक प्रवाहांमुळे बदल हे नैसर्गिक रितीने होतातच पण जबरदस्तीने हे घड्वून आणणे तेही कोणाला तरी आवडणार नाही म्हणून करणे हे चूकच आहे. "विविधतेत एकता,इन्स्क्रिडिबल इंडिया,विश्वबंधुत्व या गोष्टी गुंडाळून ठेवाव्या लागतील." विविधतेत एकता-ह्यातिल एकता हा शब्दच नेहमी महत्वाचा का? विविधताही जपायला हवी का नको? इन्स्क्रिडिबल इंडिया-ही पर्यटन व्यवसायाची प्रमोशनल मोहीम आहे. ह्याचा इथे काय संबंध? विश्वबंधुत्व-हो चारचौघात बोलायला ठीक आहे. पण आपला स्वार्थ महत्वाचा. फारसा व्यवहारीक उपयोग नाही. म. गांधी, अहिंसा हे जगात चलती असणारे शब्द आहेत. तोंडावर सर्व सहमत होतात म्हणून नेहमी त्यांचा वापर करावा पण प्रत्यक्षात जे करायचे तेच करावे.

In reply to by एक सामान्य मानव

माहितगार 26/12/2015 - 11:50
म. गांधी, अहिंसा हे जगात चलती असणारे शब्द आहेत. तोंडावर सर्व सहमत होतात म्हणून नेहमी त्यांचा वापर करावा पण प्रत्यक्षात जे करायचे तेच करावे.
=))=)) त्याने काँग्रेसतयार होते ? =))=))

In reply to by माहितगार

एक सामान्य मानव 26/12/2015 - 12:31
काँग्रेसने हेच करून ६० वर्षं राज्य केलं. पण ही ट्रीक जागतीक राजकारणात वापरली नाही ही त्यांची घोड्चूक झाली. तिथे मात्र ही मूल्ये खरच आचरणात आणल्याने आपली एक कमकुवत राष्ट्र ही प्रतिमा बनली. मोदींनी ही चूक सुधारावी ही इच्छा आहे.

In reply to by एक सामान्य मानव

नगरीनिरंजन 26/12/2015 - 13:40
तुम्ही नक्की पृथ्वीवरच राहता ना? स्टेट आणि चर्चचे सेपरेशन करण्यासाठी पाश्चात्य देशांमध्ये चळवळी झालेल्या आहेत. पूर्वीच्या त्यांच्या नेत्यांनी गुलामगिरीचा आधार घेतला म्हणून आता थोडे मूर्ख लोक सोडले तर कोणीही गुलामगिरीचे समर्थन करत नाही. रेसिझम, जेंडर बायस इत्यादींविरुद्ध विरुद्ध तिथे कडक कायदे आहेत आणि त्यांची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात होते. उगीच नाही लोक धडपडत तिथे जायला. असल्या भेदभावाच्या प्रचाराला बळी पडणाराही गट तिथे आहे. उदा. अमेरिकेतल्या उजव्या रिपब्लिकन पक्षाचे मतदार बहुतेक कॉलेजलाही न गेलेले व फारसे कौशल्य नसलेले बिनडोक लोक असतात. आपल्याकडे मात्र चांगले शिकलेले व समाजातले अग्रणी लोक या उजव्या विचारधारेच्या विषारी प्रचाराला बळी पडतात हे भारताचे दुर्दैव आहे. यात बहुतेक उच्चवर्णीय लोक असतात असे निरीक्षण आहे. त्यांना बहुधा पूर्वीची त्यांची अत्यंत फायदेशीर वर्णव्यवस्था पुन्हा येईल अशी आशा वाटते की काय कोण जाणे? निम्नवर्णियांना हिंदु धर्माबद्दल इतका कळवळा नाही. आणि पूर्वीही झालेल्या धर्मांतरात निम्नजातीय लोकांनीच धर्मांतर केले व ते सग्ळेच्या सगळे जबरदस्तीने नव्हते. हिंदू धर्मात आपल्याच लोकांना कमी अपमानलारक वागणूक मिळालेली नाहीय. असो. चिंचवडच्या मोरया गोसाव्याला झापणार्‍या राजांचा धर्म व राज्यकारभार वेगवेगळे ठेवण्याचा प्रयत्न होता असे मला वाटते. बाकी तुमची पेरणी चालू द्या.

In reply to by नगरीनिरंजन

एक सामान्य मानव 26/12/2015 - 14:20
व सुदैवाने आजुबाजुचे जग चिकित्सकपणे पहातो स्वतःच्या विचारांनी व थोडंफार वाचनही करतो. प्रगत देशांचे कायदे, नियम हे स्वतःसाठी व इतरांसाठी नेहमीच वेगळे होते, आहेत व राहतील. इतकं सगळं आहे तर इराक्मधील हल्ला खोट्या माहीतीवर आधारीत कसा झाला? त्याबद्द्ल बुशवर काय कारवाइ झाली? ओसामाला मारणे कुठल्या कायद्यानुसार वैध होते? (मी अयोग्य होते असे म्हणत नाही पण कायदेशीर बाजू विचारतोय. त्याला ठेचला हे योग्यच.) चीन्मधील युद्ध कैद्यांवर रासायनीक व जैविक अस्त्रांच्या चाचण्या करणार्या जपानी संशोधकावर युद्ध गुन्हेगार म्हणून कारवाई न करता त्याला अमेरिकेत नेउन त्याला रासायनीक व जैविक अस्त्रांच्या संशोधनासाठी वापरले. ते सोडा भोपाळ दुर्घटनेबद्द्ल अमेरिकेत काय कारवाई झाली? तुम्ही म्हणाल भारत सरकार किंवा दुर्घटनाग्रस्त व्यक्तीनी तेथे केस का केली नाही? पण इतक्या मानवतावादी लोकशाही मानणार्या देशातील न्यायालये स्वतःहुन चौकशी करु शकत नाहीत? तेव्हा दाखवायचे व खायचे दात हे वेगळेच असतात हीच जागतिक नीती आहे. ज्यांना भाबड्या विचारांनी मूर्खांच्या नंदनवनात रहायचे आहे त्यांनी अवश्य रहावे.

In reply to by एक सामान्य मानव

नगरीनिरंजन 26/12/2015 - 14:43
इराकच्या हल्ल्यात धर्माचा काहीही संबंध नाही. चष्मा काढून वाचन करावे ही विनंती. धर्म, वर्ण, जात-पात याचा वापर करुन आपल्याला हवे तसे जनमत करुन घेणारा एक वर्ग आहे. त्या वर्गाला तुमच्या इतिहासाबद्दल काही देणे घेणे नाही फक्त लोकांचे लक्ष भलत्या गोष्टींकडे वळवून आणि काल्पनिक शत्रू निर्माण करुन स्वतःला हवे ते मिळवणे हे त्या वर्गाचे ध्येय असते. हे सध्याचे वास्तव आहे पण लोक आपसात भेदभाव आणि भांडणे करुन त्यांना हवे ते देत राहतात.

In reply to by एक सामान्य मानव

डॉ सुहास म्हात्रे 26/12/2015 - 14:05
+१ योग्य किंवा अयोग्य हा प्रश्न अलाहिदा, पण वस्तूस्थिती अशीच आहे ! माझा एक जर्मन मित्र अज्ञेयवादी, पण बराचसा बौद्धधर्माकडे झुकणारा आहे. त्याला सद्य जागतिक राजकारणात बराच रस आहे. त्याने मला एकदा विचारले, "आमचा देश सेक्युलर आहे. पण तेथे ख्रिस्चन बहुसंख्य असल्याने "आमचा देश ख्रिश्चन आहे" असे म्हणणे किंवा मोठ्या राजकीय पार्टीच्या नावात "ख्रिश्चन" हा शब्द असणे किंवा कोणी "मी ख्रिश्चन आहे" असे म्हणणे असे विचित्र किंवा वाईट समजले जात नाही. मग तुमच्या देशात "हिन्दूइझम" इतका वाळीत टाकल्यासारखा का आहे ? मी अर्थातच नि:शब्द !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नगरीनिरंजन 26/12/2015 - 23:33
हिंदूईझमलाला आक्षेप नाही. मूलतत्त्ववादी हिंदुत्वावर टीका केली जाते. वारी, गणशेत्सव, नवरात्र, दिवाळी हे व इतर हिंदू सण आणि हिंदू रितीरीवाज सुखैनैव चालू आहेत. उगाच हिंदू खतरेमें म्हणणार्‍या लोकांना विरोध आहे. हिंदूंना नाही. ज्यांना हिंदूंना विरोध होतो असे वाटते ते प्रोपागांडाचे बळी आहेत.

In reply to by नगरीनिरंजन

डॉ सुहास म्हात्रे 27/12/2015 - 00:27
"भारतातील सद्य राजकारणात इतर धर्माच्या लोकांनी छातीवर हात ठोकून मी अमूक धर्माचा आहे असे वारंवार म्हटलेले चालते. इतर धार्मिक नाव व अजेंडा असलेल्या पक्षांशी तथाकथित सेक्युलर पक्ष सहज गठबंधन करतात, पण केवल हिंदुत्ववादी असलेल्या किंवा आरोप असलेल्या व्यक्तीकडे व पक्षांकडे दुजाभावाने पाहिले जाते." याकडे त्या मित्राचा रोख होता. सर्वसाधारपणे सजग परदेशी व्यक्तिंना भारतातल्या "राजकारणातले राजकारण" समजते आणि ते त्याच्याकडे काहीश्या आश्चर्याने बघतात असा माझा अनुभव आहे... मग ते अर्थकारण असो, धर्मकारण असो, अथवा परदेशांशी व्यवहार करताना दाखवलेला कणखरपणा (अथवा त्याचा अभाव) असो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नगरीनिरंजन 27/12/2015 - 08:17
मग ते पुरेसे अभ्यासू नाहीत असे म्हणावे लागेल. कारण एनडीएमध्ये सगळेच पक्ष हिंदुत्ववादी नव्हते. उदा. नितीशकुमार आधी एनडीएलाच सपोर्ट करत होते. ते का दुरावले त्याची कारणे वेगळी आहेत. हिंदुत्ववादी व त्यांचे मित्रपक्ष अनेक राज्यांत व केंद्रात सत्तेवरही आलेत. बाकीचे धार्मिक पक्ष आले नाहीत. तरीही असा प्रचार करत राहणे ही गरज बनली आहे.

In reply to by नगरीनिरंजन

डॉ सुहास म्हात्रे 27/12/2015 - 13:09
तुम्हीच वर म्हटल्याप्रमाणे नितिशकुमार मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणुन जाहीर केले गेल्यावर आपल्या हितसंबंधाना (पंतप्रधानपदाच्या दाव्याला) धोका निर्माण झाला म्हणुन एनडीएतून बाहेर पडले हे उघड गुपित आहे. पण बाहेर पडताना त्यांनी हिंदुत्ववादीत्वाच्या (हे म्हणजे काही अस्पृश्य आहे असे दाखवत) मुद्द्यावरूनच गदारोळ केला होता. भारतात हितसंबंध असलेल्याना हे विसरणे सोपे जाते, पण त्रयस्थ अवलोकन करणार्‍याला हे दिसायला आणि दाखवायला करायला काहीच अडचण पडत नाही. तुमची मते तुम्हाला योग्यच वाटतील यात शंका नाही. मी माझ्या संपर्कात असलेल्या व सजगपणे आंतरराष्ट्रिय राजकारणाचे अवलोकन करत असणार्‍या काही जणांचे मत दिले आहे. त्यांचे भारतात कोणतेही हितसंबंध नसल्यामुळे त्यांची मते नि:पक्षपाती असण्याची जास्त शक्यता आहे. असो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नगरीनिरंजन 27/12/2015 - 21:10
माझेही काही हितसंबंध नाहीत. भाजप जाऊन काँग्रेस आल्याने मला घबाड मिळणार नाही. पण हिंदु धर्म धोक्यात आहे आणि हिंदुंवर अन्याय होतो अशा कंड्या पिकवण्यात व विकास सोडून भलतीकडे लोकांचे लक्ष वळवण्याय काही लोकांचे जरुर हितसंबंध आहेत. त्यासाठी आपल्याला सोयीस्कर अशी मतेच ग्राह्य धरणे हा कन्फर्मेशन बायस आहे पण अर्थातच तुम्हालाही ते चुकीचे वाटणार नाही. त्यामुळे वाद इथेच थांबवू.

In reply to by नगरीनिरंजन

डॉ सुहास म्हात्रे 28/12/2015 - 13:32
पण हिंदु धर्म धोक्यात आहे आणि हिंदुंवर अन्याय होतो अशा कंड्या पिकवण्यात व विकास सोडून भलतीकडे लोकांचे लक्ष वळवण्याय काही लोकांचे जरुर हितसंबंध आहेत. याबाबत सहमती आहेच. प्रत्येक धर्मात असे हितसंबंधी आहेत. पण, त्यांना सर्वांना एकाच तराजून तोलले जात नाही ही आजची मुख्य समस्या आहे. वरच्या मोदी-नितीशकुमार वादात नितिशकुमारांना एनडीएतून वेगळे होताना मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार झाल्याने कम्युनॅलिझम वाढेल या दिशाभूल करणार्‍या सोईस्कर (व निर्धोक) टीकेची मदत नितीशकुमारांना घ्यावीशी वाटली आणि त्याबाबत अपेक्षेप्रमाणे फारतर थातूरमातूर टीका झाली. त्याअगोदर अनेक वर्षे भाजपबरोबर एनडीएत सत्ता उपभोगताना तो पक्ष नितीशकुमारांना कम्युनल वाटत नव्हता ! भारतात प्रत्येक पक्षाने धार्मिक लांगुलचालनाचा आधार घेतलेला आहे. तसे करणे एखाद्या पक्षाच्या / एखाद्या धर्माच्या बाबतीत "सेक्युलर" तर दुसर्‍याच्या पक्षाच्या / धर्माच्या बाबतीत "कम्युनल ठरते", हा विरोधाभास ठळकपणे दिसतो, ते काही गुपित नाही... ते मानणे न मानणे प्रत्येकाच्या नजरेवर अवलंबून आहे. ते एखाद्या त्रयस्थ व्यक्तीने ओळखले तर आश्चर्य नाही व त्याचे मत "भारतिय पद्धतिने सोईस्कर कारणे देऊन" खोडून काढणे मला जमत नाही... कदाचित याच कारणासाठी मी कधीच कोणत्याही पक्षाला आपली निष्ठा कायमस्वरूपी वाहू शकणार नाही. त्यापेक्षा देश, देशाचा फायदा आणि सत्य यांच्याशी माझी बांधिलकी कायम ठेऊन सर्वच पक्षांना एकाच तराजूत तोलणे मला योग्य वाटते. सद्याच्या भारतिय राजकारणात मोदींच्या विकासाच्या मुद्द्याचे जेवढे नुकसान विरोधी पक्षाने केले आहे त्यापेक्षा जास्त "तथाकथित हिंदू धर्मरक्षकांनी" विरोधकांच्या हाती आपल्या उथळ कृती/वचनांच्या पेटलेल्या मशाली देऊन केले आहे. यामागे भाजपमधील व भाजपसंबंधीत संस्थांमधिल अंतर्गत हेवेदावे व सत्तासंघर्ष असावेत असा माझा अंदाज आहे. असे संघर्ष एक सामान्य व्यावहारीक सत्य असले तरी, त्याने देशाला नुकसान होत आहे व देशाचे नुकसान करणारे कोणचेही वचन अथवा कोणाचीही कृती माझ्यासाठी निषेधार्हच आहे व असेल. असो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नगरीनिरंजन 28/12/2015 - 14:47
कदाचित याच कारणासाठी मी कधीच कोणत्याही पक्षाला आपली निष्ठा कायमस्वरूपी वाहू शकणार नाही. त्यापेक्षा देश, देशाचा फायदा आणि सत्य यांच्याशी माझी बांधिलकी कायम ठेऊन सर्वच पक्षांना एकाच तराजूत तोलणे मला योग्य वाटते.
१००% सहमत. काँग्रेसच्या राज्यात त्यांनी केलेल्या अल्पसंख्यांक तुष्टीकरणाच्या राजकारणाचाही मला तिटकारा आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नगरीनिरंजन 28/12/2015 - 14:48
कदाचित याच कारणासाठी मी कधीच कोणत्याही पक्षाला आपली निष्ठा कायमस्वरूपी वाहू शकणार नाही. त्यापेक्षा देश, देशाचा फायदा आणि सत्य यांच्याशी माझी बांधिलकी कायम ठेऊन सर्वच पक्षांना एकाच तराजूत तोलणे मला योग्य वाटते.
१००% सहमत. काँग्रेसच्या राज्यात त्यांनी केलेल्या अल्पसंख्यांक तुष्टीकरणाच्या राजकारणाचाही मला तिटकारा आहे.

In reply to by नगरीनिरंजन

एक सामान्य मानव 27/12/2015 - 12:09
आपण मूलतत्त्ववादी हिन्दु संघटना कोण्त्या मानता. काही संघटना तशा असतील तर त्या फ्रिंज एलेमेंटस आहेत. पण हिन्दुत्ववादी संघटना ज्या कायद्याच्या चौकटीत काम करतात त्यांनाही त्याच चौकटीत टाकणे चूक आहे. उदा. भाजप, शिवसेना हे पक्ष किंवा रा. स्व. संघ ह्यांना मूलतत्त्ववादी म्हणणार का?

In reply to by एक सामान्य मानव

डॉ सुहास म्हात्रे 27/12/2015 - 13:41
"असणे" आणि "विरोधकांनी तसे सोईस्कर लेबल चिकटवणे" याबाबतीत त्यांचा गोंधळ झालाय बहुतेक :) बर्‍याच जणांचा असा गोंधळ होतो... कधी खरोखर, कधी सोईस्कर ;)

In reply to by एक सामान्य मानव

नगरीनिरंजन 27/12/2015 - 21:13
भाजप व शिवसेना तशा संघटना नाहीत पण राजकीय फायद्यासाठी बजरंग दल व तोगडियासारख्यांचा ते खुबीने वापर करुन घेतात. हेही तुम्हाला मान्य नसेल तर सोडून द्या.

मितभाषी 25/12/2015 - 22:53
सहमत. एवढय़ा मोठय़ा लेखाच्या फाफटपसार्यातून शेवटी हाती काहीच लागत नाही. =))

In reply to by मितभाषी

एक सामान्य मानव 26/12/2015 - 09:54
हाती काही लागावे म्हणून मिपावर येता की काय? अहो एव्हढे नवे विचार मिळाले, स्वतः फार वाचन न करता व पुण्याला न जाता व्याख्यान ऐकायला मिळाले खूप झाले.
जिथपर्यंत माझी व्यक्तीगत माहिती आहे भाषणांबाबतच्या तरतुदी कॉपीराइट कायद्यात इंटरनेटपुर्व कालापासून चालत आल्या आहेत. पब्लिक स्पीचेस कॉपीराईटेड असणे अभिप्रेत असावे (वृत्तसंस्थांना अपवाद केलेला असतो) . इंटरनेट आल्या नंतरच्या काळात ह्या संदर्भात काही बदल पाहण्यात आलेला नाही पण सहसा संसदेने बदल करे पर्यंत न्यायालय आहे त्या कायद्यानुसार चालते. हेच भाषण एखाद्या वृत्तपत्राने ऑनलाईन टाकले तर त्यांना परवानगी असावी इतरांना नसावी ह्यात काळानुसार विरोधाभास आला असेल असे वाटते. सर्वात महत्वाचे धागालेखकाने कॉपीराइट संदर्भात त्याच्या बाजूने काय काळजी घेतली ? मूळ वक्त्याकडून अथवा इतर श्रोत्यांकडून तो हेच बोलला आहे ह्याचा दुजोरा घेतला आहे का ? असे काही प्रश्न उपस्थीत होतात असे वाटते. (चुभूदेघे उत्तरदायकत्वास नकार-हा प्रतिसाद म्हणजे कायदेविषयक सल्ला नाही, कायदे विषयक सल्ल्यांसाठी अधिकृत तज्ञ सल्लागारांशी संपर्क साधणे उचित असते.)

ए ए वाघमारे 26/12/2015 - 15:41
लेख वाचला आणि प्रतिक्रियाही वाचल्या. लेखकाच्या मताच्या विरोधी मत मांडणार्‍यांनी लेखकाच्या मताचे ‘सप्रमाण खंडन’ केले आहे असे जाणवले नाही. मी काही इतिहासतज्ज्ञ नाही त्यामुळे मी ऐतिहासिक तपशीलात शिरू शकत नाही. तरी राजकारण मग ते शिवाजीराजांचे असो वा आधुनिक राजकीय पक्षांचे असो ते पर्सेप्शनवर बेतलेले असते.उदा. दादरी केसमुळे देशात असहिष्णू वातावरण झाल्याचे पर्सेप्शन तयार झाले. त्याचा विरूद्ध बोलणारे हिंदुत्ववादी म्हणतात तसे एक-दोन घटनांवरून असे निष्कर्ष काढणे योग्य नाही पण सेक्युलर म्हणतात तसे पर्सेप्शन आहे. असो. इथे तो मुद्दा नाही.अवांतराबद्दल क्षमस्व. शिवाजीराजांचे राज्य हिंदू राज्य होते की नाही हा एक नेहमीचा प्रश्न. इथेही तीच चर्चा चालू आहे. यात दोन-तीन मुद्दे आहेत असे वाटते. १.धर्माधिष्ठित राज्यसत्ता म्हणजे काय ? जेव्हा कोणी शिवाजीराजांचे राज्य हिंदू राज्य होते असे म्हटले की सेक्युलर पुरोगामी चवताळतात. याचे कारण म्हणजे हे सेक्युलर बहुतांश वेळा जन्माने हिंदू असतात (देशात ८०% हिंदू असल्याने सेक्यूलरातही हिंदूंचे प्रमाण जास्त असणारच) आणि भारताची धर्मावर झालेली फाळणी, अरब मुस्लीम देशातील इस्लामी राज्याच्या सुरस,क्रूर आणि चमत्कारिक कथा, त्यानंतर तालिबान, इस्लामी दहशतवाद , आताशा आयसिस वगैरे अशा वेगवेगळ्या रूपात धर्माधिष्ठित राज्याचे भयावह चित्र आपण पाहिलेले असते. आणि वर सर्व धर्म सारखेच अशा खुळचट कृत्रिम कल्पना आपल्यावर लादल्या गेल्या आहेतच. त्यामुळे धर्माधारित राज्य म्हणजे काहीतरी भयंकर पाप अशी आपली समजूत झाली आहे. कारण या राज्याबद्दलची आपली कल्पना ही प्रामुख्याने वर म्हटलेल्या इस्लामी राजवटी पाहून झाली आहे हे लक्षात घ्यायला हवे. इतर धर्माधारित राज्यांशी उदा. रोमन साम्राज्याशी आपला दैनंदिन पातळीवर संपर्क आला नाही. ब्रिटीश सत्तेने जरी ख्रिश्चन धर्मप्रसाराला मुक्तहस्त दिला असला तरी व्यावहारिक अंमलबजावणीच्या पातळीवर त्यांचे राज्य आधुनिक होते. या सत्तेने आपल्याला कायद्याच्या आधुनिक राज्याची सवय लावली. त्यामुळे आज कोणी हिंदू राज्य असे म्हटले की लगेच हिंदू तालिबान वगैरे शब्द ऐकू येतात. मग शिवाजीराजांचे राज्य हिंदू राज्य होते किंवा संघाचे प्रस्तावित राज्य हिंदूराज्य आहे असे म्हटले की समीक्षकी भाषेत सांगायचे तर त्यावर आपण तालिबानीकरणाचा आरोप करतो. अर्थात या भीतीला हिंदू आततायी आणि त्यांना मिळणारी अवास्तव प्रसिद्धीही एक कारण आहे. पण असे करताना हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन आदींना एकाच पातळीला आणून (अफूची गोळी न्याय) ,त्यांची विचारपरंपरा आणि धार्मिकतेच्या इतिहासाकडे सोयीस्कर कानाडोळा करतो. जणू काही हे तीनही धर्म म्हणजे मोबाईल फोन सर्विस प्रोवायडर आहेत आणि त्यांच्यात गुणात्मक फरक नसून कधीही इकडून तिकडे जाण्याची पोर्टाबिलिटी आहे. २.दुसरा मुद्दा शिवाजीराजांना सेक्युलर ठरवण्याच्या अट्टाहासाचा. भारतीय परंपरेतले ते सगळे वाईट हा नेहरूवियन समाजवादी विचार आपल्यात पद्धतशीरपणे भिनवला गेला आहे. म.गांधींची हत्या एका हिंदू मराठी ब्राहमणाने केली हे दिवसातून शंभरवेळा ऐकवले जाते मात्र भारताची फाळणी धार्मिक आधारावर झाली हेही पद्धतशीरपणे विसरायला लावले गेले आहे. तेच कश्मीरी हिंदूंच्या हकालपट्टीबाबत.जणू असे काही कधी घडलेच नाही. याचे कारण म्हणजे नव्या पिढीने समजा फाळणीबद्दल चिकित्सा करायचा प्रयत्न केला,'अखंड भारत का नाकारला' असे प्रश्न उभे केले की त्याला सेक्यूलर उत्तरे शोधणे अडचणीचे होते. फाळणी कितीही दुर्दैवी घटना असली तरी माणसाच्या इतिहासातील एक महत्वाची घटना म्हणून निव्वळ अॅकेडमिक हेतूने तरी आपण त्याचे काही स्मारक केले आहे का, मला माहिती नाही. हीच गोष्ट १९७५ च्या आणीबाणीबाबत. या वर्षी प्रथम मी सरकारी डीडी न्यूजवर आणीबाणीविषयी सविस्तर डॉक्युमेंटरी सीरीज पाहिली. जो जतन करणे सहज शक्य आहे/होते अशा आधुनिक इतिहासाबद्दलच आपली इतकी अनास्था आणि लपावाछपवी करणारी अप्रामाणिक भूमिका असताना शिवाजीराजांच्या इतिहासाबाबत आपण आपल्या आजच्या राजकीय भूमिकेशी सुसंगत अशी सोयीस्कर भूमिका घेतो यात नवल ते काय ? याबद्दल महाराष्ट्रभूषण पुरस्कारवादानंतर मुक्ता दाभोलकरांच्या पत्राला उत्तर म्हणून लोकसत्तेत पत्र दिले होते. ते इथे वाचता येईल. त्यातील एक मुद्दा असा-
ज्याप्रमाणे संघ परिवारावर स्वत:चे ‘हिरो’ नसल्यामुळे सरदार पटेल, नेताजी बोस, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर आदींचा वारसा पळवण्याचा आरोप होतो त्याचप्रमाणे पुरोगामी चळवळीचेही होऊ घातले आहे की काय अशी शंका येते. शाहू-फुले-आंबेडकर आदी युगप्रवर्तक विचारवंतांना त्यांच्याच अनुयायांनी आणि पुरोगामी राजकारण्यांनी जातींच्या क्षुद्र बंधनात अडकवल्यामुळे त्यांचे ‘अपील’ मर्यादित झाले आहे याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे आता ‘मास अपील’ असलेल्या शिवाजीराजांना आपल्या धर्मनिरपेक्ष कळपात ओढण्याचे आणि त्यानिमित्ताने हिंदुत्ववादी राजकारण्यांच्या हातून एक हुकमी मुद्दा काढून घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे हेही ‘संधिसाधू’ राजकारणच आहे.
मग उदा. ज्याप्रमाणे शिवाजीराजांचा उदोउदो करणारे हिंदुत्ववादी पक्ष त्यांच्या किल्ल्यांच्या जतनासाठी काही करत नाही अशी ओरड होते त्याचप्रमाणे स्वत:ला अभ्यासू, सुशिक्षीत,विवेकवादी, अभिजन वगैरे म्हणवून घेणारे शिवाजीराजांबद्दल प्रेम दाखवणारे जे पुरोगामी (हा शब्द वापरल्याशिवाय आजकाल पुढे जाता येत नाही) आहेत त्यांनी शिवाजीराजांचा इतिहास जपण्याबद्दल , त्याचा अभ्यास करण्याबद्दल कुठले ठोस प्रकारचे काम केले ? उलट जेम्स लेन प्रकरण आणि त्यानंतरचे भांडारकर संस्था जळीतकांड वगैरे प्रकरणात भूमिका घ्यायची वेळ आली तेव्हा मात्र हेच लोक एकतर गप्प राहिले किंवा जे बोलले ते सेक्युलर शिवाजींबद्दल असलेली आपली अॅकेडमिक चिकित्सेची भूमिका सोडून शिवाजीराजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, त्यांच्याबद्दल अवमानकारक गोष्टींनी भावना दुखावतात वगैरे जस्टीफिकेशन देत राहिले आणि वेळ मारून नेली. ३.हिंदुत्ववादी असोत वा सेक्यूलर असोत ,प्रत्येकजण आपण शिवलेल्या अंगरख्यात शिवाजीराजांना बसवून पाहण्याचा प्रयत्न करत राहणार आणि तात्पुरते राजकारण करत राहणार. शिवाजीराजांबद्दल एकवेळ ठोस माहिती मिळेल आणि सर्वजण एक कॉमन भूमिका घेऊ शकतील पण आधुनिक भारतातले नेहरू, गांधी, बोस, मोदी इ.बाबत खरी माहिती लोकप्रिय माध्यमे, शैक्षणिक अभ्यासक्रम इ.द्वारे कधीही समोर यायची शक्यता नाही. तोवर पुतळे व स्मारके आहेतच.

In reply to by संदीप डांगे

ए ए वाघमारे 26/12/2015 - 17:21
खरेच तसे दिसते.कम्युनिस्टांचा आवडता शब्द वापरायचा तर हा एक नवा वर्गसंघर्ष आहे. विशेषत: पुरोगामी नावाची छत्री तर इतकी मोठी आहे की निधर्मी,समाजवादी,मानवतावादी,विवेकवादी,बुद्धिप्रामाण्यवादी,अज्ञेयवादी,नास्तिक,अंधश्रद्धाविरोधी,सत्यशोधक इ.इ.अनेक वादी-संवादीस्वर आपला 'विवेकाचा आवाज बुलंद'करत या पुरोगामित्वाच्या वळचणीला जाऊन उभे राहतात आणि आपण पुरोगामी असल्याचा दावा करतात.मात्र पुरोगामित्वाच्या प्राबल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या एका मराठी संस्थळावर मी 'पुरोगामी होण्यासाठी मला नेमके काय 'करावे' लागेल?'असा प्रश्न विचारल्यावर नेमके उत्तर मात्र कोणी दिले नाही.असो.हे अवांतर होते आहे (आणि कंटाळवाणे तर आहेच आहे.)

In reply to by संदीप डांगे

एक सामान्य मानव 26/12/2015 - 17:28
ज्याप्रमाणे धर्मात चिकित्सा व विरोधी मताला विरोध असतो तसच ह्या पुरोगामी व सेकुलर लोकांचं आहे. उजव्या विचारांचा म्हणून ब्रांडेड माणूस काहीही बोलला की तो काय बोलतोय हे ऐकूनही न घेता ठरलेल्या प्रतिक्रिया येतात. जशा वरील लेखावर. एकही पुरावा न देता वा मुद्याला स्पर्श न करता थेट मतप्रदर्शन. धर्ममार्तंड तरी दुसरं काय करतात?

In reply to by एक सामान्य मानव

संदीप डांगे 26/12/2015 - 17:49
खरं आहे तुमचं. कोणत्याही विचारांचा असो, सगळ्यांचीच असहिष्णुता वाढली आहे. काय कारण असावे बरे..? (जगण्याच्या मूलभूत विवंचना संपल्यात की वर्गसंघर्ष तीव्र केला जातोय मुद्दाम..?)

एक सामान्य मानव 26/12/2015 - 20:05
संदीपजी खरं पहाल तर पुरोगामीच जास्त असहिष्णु असतात. म्हणजे पहा एखादा हिंदुत्ववादी म्हणेल की मला इतर धर्मांबद्द्लही तितकाच आदर आहे. वाजपेयींसारखा अत्यंत सहिष्णु नेता उजव्या भाजपमधुन पंतप्रधान झाला. पण उलट कधी शक्य आहे का? एखाद्या समाजवादी किंवा पुरोगामी नेत्याने म्हणले की मी हिंदु असल्याचा मला अभिमान आहे तर तो दुसर्या दिवशी पक्षाबाहेर जाईल किंवा मी बोललोच नाही अशी सारवासारव करावी लागेल. सर्व पुरोगामी नेते (आणि भाजपाईसुद्धा) इफ्तारला टिपिकल मुस्लीम टोपी घालतात. पण कोणी पुरोगामी नेता भगवा साफा, टिळा अशा वेशात पाहिलाय का? अवांतरः चेपुवर एक फोटो आला होता इफ्तारचा. त्यात हमीद अन्सारी, ओमर अब्दुल्ला, सलमान खुर्शीद इ. साध्या वेषात म्हणजे विदाउट टोपी पण झाडुन सारे पुरोगामी हिंदु असुन टोप्या घालुन. कदाचित ह्यालाच सहिष्णुता म्हणत असावेत.

भिकापाटील 26/12/2015 - 23:17
मिपा राॅक्स. चांगली चर्चा. वर्णवर्चस्वाचा फूकाचा दांभिकपणा इथे चालत नाही. नाहीतर मायबोली आणि मिपा त काय फरक राहिला असता?

माहितगार 27/12/2015 - 10:59
भारतीय परंपरेतले ते सगळे वाईट हा नेहरूवियन समाजवादी विचार आपल्यात पद्धतशीरपणे भिनवला गेला आहे.
जवाहरलाल नेहरू यांच्या व्यक्ती आणि विचारांना मर्यादा असतील, किंवा प्रत्येकाने सहमत व्हावे असे नाही, नेहरुंवरील राग-लोभ राजकीय विरोध हे सगळे समजूनही भारतीय परंपरेतले ते सगळे वाईट अस नेहरुंनी सरसकटीकरण केलं आहे ? आणि आमच्या वाचण्यात आले नाही असे झाले आहे का ? याच्या साठी कृपया संदर्भ उपलब्ध होऊ शकेल का ? चिकित्साकरणे हा मिपाकर म्हणून आमचा आपद्धर्म आहे म्हणून हे जरा संदर्भासहीत इस्कटून सांगीतल्यास आभारी असू sandarbha hava

In reply to by ए ए वाघमारे

माहितगार 28/12/2015 - 11:41
ते माझे मत आहे.
नक्कीच प्रत्येकाला आपले व्यक्तीगत मत बनवण्याचा ठेवण्याचा अधिकार आहे आणि त्या बद्दल आदरही. पण आपण असे सरसकटीकरण असलेले मत बनवताना जवाहर नेहरुंच्या काही साहित्याचे वाचन वगैरे केले आहे, का इतर कुणाच्यातरी एक तर्फी दृष्टीकोणावर आधारले आहे ? व्यक्तीपूजा टाळणे श्रेयस्कर आणि त्यासाठी गरज असल्यास मुद्दाम उकरुनही हेतुपुरस्सर टिका करण्यास अथवा राजकीय कारणाने एकतर्फी टिकाकरण्यास मुळीच हरकत नाही. अर्थात व्यक्तीगत मत बनवताना आणि एकतर्फी टिका करताना तसे करण्यासाठी पुरेसे सयुक्तीक आधार असतील तर इतरांसमोर केलेल्या मांडणीस विश्वासार्हता येऊ शकते किंवा कसे ?