Skip to main content

आस्तिक वैज्ञानिक

लेखक यनावाला यांनी मंगळवार, 01/12/2015 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
काही वैज्ञानिक आस्तिक असतात हे खरे आहे. मात्र सर्व सामान्य जनतेत आस्तिकांचे प्रमाण 90% हून अधिक आहे; तर भौतिक शास्त्रज्ञांत ते 10% हून कमी आहे, असे अनेक विश्वासार्ह सर्वेक्षणे दाखवतात. म्हणजे 90% वैज्ञानिक नास्तिक असतात. ज्यांनी मूलभूत (बेसिक) विज्ञानाचा अभ्यास केला आहे त्यांत 100 तील 10 जण तरी आस्तिक का असावेत ? याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे देता येते.:- पूर्वी माणसाला निसर्गनियमांविषयी निश्चित असे ज्ञान नव्हते. नैसर्गिक घटनांचे कार्य-कारणभाव कळत नव्हते. अनुभवाने जेवढे समजत होते तेवढेच. भूकंप, वणवे, महापूर, वादळे अशा आपत्तींनी भेदरलेल्या माणसाला या संकटांत कुणाचा तरी आधार हवा होता. हे उत्पात कोण घडवतो हे समजत नव्हते. पण तो कोणीतरी महासामर्थ्यशाली, अलौकिक पुरुष असला पाहिजे असे वाटत होते. अशा परिस्थितीत माणसाला देवकल्पना सुचली असावी. या काल्पनिक देवाला त्याने आपला रक्षणकर्ता मानले. हे बारा/पंधरा हजार वर्षांपूर्वी घडले असावे. देवाने संकटातून वाचवायचे तर त्याला शरण जायला हवे. त्याची स्तुती करायला हवी. त्याला संतुष्ट ठेवायला हवे. त्यासाठी काही अर्पण करायला हवे. त्यांतून ईशस्तवन- देवपूजा-गंध-फूल-अक्षता-नैवेद्य-बळी- अशा प्रथा पडल्या. ही देवकल्पना माणसाला आश्वासक वाटू लागली. आवडली. ती मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होत गेली. बालपणी मुलगी जे पाहायची, ऐकायची, करायची ते आणि तसे पुढे आपल्या मुलांना सांगायची. आजही आई ,"देवबाप्पाला नमो कर . तो तुला बुद्धी देतो. यश देतो. आयुष्य देतो. संकटातून वाचवतो. " असे आपल्या मुलांना सांगते. कारण तिने तसे आपल्या आईकडून ऐकलेले असते. आपले माता-पिता काय करतात, काय सांगतात. आजूबाजूची मोठी माणसे काय बोलतात, काय करतात. ते बालक पाहाते. देवदर्शनासाठी जमलेल्या गर्दीची दृश्ये टी.व्ही.वर बघते. वर्तमानपत्रात भक्तांच्या गर्दीचे फोटो न्याहाळते. देवाचा जयजयकार ऐकते. मोठे झाल्यावर देवाविषयी वाचते, ऐकते, पाहाते. समाजात सर्वत्र देवाचा उदो उदो होतो असे त्याला दिसते. त्यामुळे मेंदूत संस्कार दृढ होतात. डोक्यावर चढलेले हे भ्रामक संस्कारांचे गाठोडे झुगारून देणे अवघड असते. जगप्रसिद्ध नास्तिक रिचर्ड डॉकिन्स म्हणतात, "आपल्या बाळाला देवा-धर्माच्या संस्कारांचे विष आई स्वमुखातून पाजते. त्याचा परिणाम आयुष्यभर टिकू शकतो." काही वैज्ञानिकांची देवावर श्रद्धा असते त्याचे कारण या लहानपणीच्या संस्कारात आहे. बालपणी मेंदूत कोरले गेलेले हे संस्कार दृढमूल होतात. मेंदूच्या एका कप्प्यात कायम राहातात. भांड्यावर कोरलेले नाव पुसून टाकणे जसे अवघड असते तसे हे मेंदूतील स्मृतिकेंद्रात कोरलेले संस्कार घालवणे दुरापास्त असते. या कारणाने बुद्धिमान वैज्ञानिकसुद्धा आस्तिक असू शकतात. ईश्वराची संकल्पना प्रामुख्याने दोन स्तरांवर आहे. एक म्हणजे जगनिर्माता, जगन्नियंता, पूजा-अर्चा-प्रार्थना-स्तवने यांनी प्रसन्न होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटसमयीं धावून येणारा देव. हा उपासनेचा देव होय. बहुसंख्य आस्तिक हाच देव मानतात. त्याच्या कृपेसाठी व्रत-वैकल्ये, हवने-अनुष्ठाने करतात. दुसरा म्हणजे विश्वनिर्माता, निर्गुण, निराकार ईश्वर. त्याने केलेल्या नियमांनुसार विश्व चालते. विश्वरहाटीत तो कोणतीही ढवळाढवळ करीत नाही. या ईश्वराशी माणूस कोणत्याही प्रकारे संपर्क साधू शकत नाही. त्याचे केवळ अस्तित्व मानायचे. असा ईश्वर मानणार्‍या आस्तिकांचे प्रमाण अल्प आहे. त्यांत या आस्तिक वैज्ञानिकांचा समावेश होतो. म.फुलेसुद्धा असे आस्तिक होते. त्यांनी या परमेश्वरासाठी "निर्मिक" असा शब्द आपल्या लेखनात योजला आहे. ईश्वराच्या अस्तित्वाविषयीं ज्यांचे कोणतेही ठाम मत नसते ते अज्ञेयवादी होत. विश्वनिर्माता परमेश्वर असेल अथवा नसेल असे ते म्हणतात. सुधारककार आगरकर अज्ञेयवादी होते. डार्विनपूर्वकालीन कांही वैज्ञानिक अज्ञेयवादी होते. कारण इतके आश्चर्यकारक वैविध्य असलेली जीवसृष्टी निसर्गत: निर्माण झाली हे त्यांना पटत नव्हते आणि कशी निर्माण झाली याचे बुद्धिगम्य स्पष्टीकरण मिळत नव्हते. डार्विनच्या उत्क्रांतिवादातील यादृच्छिक उत्परिवर्तन (रॅंडम म्युटेशन ) आणि अयादृच्छिक नैसर्गिक निवड (नॉन रॅंडम नॅचरल सिलेक्शन) या तत्त्वाने ते स्पष्टीकरण आता मिळते. किंबहुना या तत्त्वानुसार हे वैविध्य अपरिहार्य ठरते. डार्विनच्या तत्त्वांमुळे बौद्धिकदृष्ट्या समाधानी नास्तिक होता येते. म्हणून डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धान्तामुळे ज्ञानाच्या क्षेत्रातून ईश्वराची हद्दपारी अधोरेखित झाली असे म्हटले जाते.

वाचने 69541
प्रतिक्रिया 228

प्रतिक्रिया

In reply to by प्रकाश घाटपांडे

आपण हे सतत इथे मांडत आला आहात हे ही ज्ञात आहे. तरी अजूनही नास्तिक असणे म्हणजेच वैज्ञानिक विचारसरणी असणे ह्या घोर अंधश्रद्धेत प्रस्तुत लेखक व त्यांचे समर्थक वावरत आहेत ह्याबद्दल वाईट वाटते.

"इतरांना तुच्छ लेखण्यातून आपण ग्रेट असल्याची भावना त्यांना सुखावून नेते.इतरांचा उपहास करण्याची वा तुच्छ लेखण्याची संधी ते सहसा सोडत नाहीत.पहिलवानांना जशी 'रग' जिरवण्यासाठी 'आखाडा' लागतो तशा या बुद्धीदांडग्यांना आपली बौद्धिक माज/खुमखुमी जिरवण्यासाठी वैचारिक आखाडे लागतात. दगडाला टक्कर देणारा एडका ज्या जोशात वावरतो त्याच जोशात ही मंडळी वावरतात. जर अचानक या एडक्याचा दगड काढुन घेतला तर तो जसा सैरभैर होतो तशी काही अवस्था यांना 'खाद्य' वा 'टार्गेट' न मिळाल्यावर होते.मग ही मंडळी मिळेल त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. वैचारिक वाद प्रतिवादात या गोष्टी घडत असतात कारण भावना नावाचा फॅक्टर अस्तित्वात असतो. तो त्याला स्वस्थ बसू देत नाही. आपल्या विचारांशी सहमत नसणार्‍यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. मग साम दाम दंड भेद वगैरे नीती वापरुन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी विवेक वैगैरे सगळ्या गोष्टी टिंब टींब च्या टिंब टिंब मधे जाते."

In reply to by संदीप डांगे

आपल्या विचारांशी सहमत नसणार्‍यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. हां खरे तर आजार आहे एक प्रकारचा.

पृथ्वीवर असणार्या सर्व प्राण्यात प्राण किंवा चैतन्य कुठून येत आणि मृत्युनंतर ते कुठ जाते. यानावले कृपया उत्तर द्या. खूप वर्षापासून पडलेला प्रश्न आहे.

In reply to by सत्य धर्म

ह्या प्रश्नाचे उत्तर यनावालांपेक्षा घासु गुरुजी जास्त चांगल्या पध्दतीने देवु शकतील असा अंदाज आहे , यनावाला एकाही प्रतिवादाला उत्तर देत नाहीत हा आजवरचा इतिहास आहे !

शास्त्रज्ञ फक्त अगोदरच अस्तित्वात असलेल्या गोष्टी उलगडून इतरांपुढे मांडतात . शास्त्रज्ञांना स्वबळावर नवीन निर्मिती करता येत नाही .शास्त्रज्ञांना आजपर्यंत कधी माणसाचा मेंदू तयार करता आलाय का ? निसर्गात असे लाखो मेंदू रोज तयार होतात . हे कोण करतं? आकाशात उपग्रह सोडले म्हणून शास्त्रज्ञ भाव खातात . त्याही पूर्वी पासून लाखो वर्षे आकाशात ग्रह आपापल्या कक्षेत फिर्तायेत . एकदा मेलेला माणूस शास्त्रज्ञांना आजपर्यंत कधीही जिवंत करतं आला नाही . टेस्ट ट्यूब बेबी निर्माण केली म्हणून काय तो अभिमान . अहो पण त्यात स्त्री आणि पुरुषाच्या आवश्यक बाबींच मिलन शरीराबाहेर केलं जातं आणि गर्भ निर्माण होण्यासाठी फलित झालेलं बीज नंतर स्त्री च्याच शरीरात सोडलं जातं ना . स्त्री च्या गर्भाशयाची अगदी सेम तू सेम परिस्थिती शरीराबाहेर निर्माण करून बाळ का निर्माण करता आलं नाही शास्त्रज्ञांना ? मासा पाण्यातच जिवंत राहतो . त्याची श्वसन करण्याची सिस्टीम किती गुंतागुंतीची असते . अशीच सिस्टीम तयार करून एक तरी मासा शास्त्रज्ञांनी आज पर्यंत निर्माण केलाय का ? पृथ्वीवर असणार्या सर्व प्राण्यात प्राण किंवा चैतन्य कुठून येत आणि मृत्युनंतर ते कुठ जाते. यग्झ्याटली . ह्या प्रश्नाचं उत्तर शास्त्रज्ञ अजून देवू शकलेले नाहीत . आणि निसर्ग म्हणजे काय ? फक्त झाडं , वेली , हवा , पाणी , दगड -माती ? ह्या सगळ्यांमध्ये कुठं ,काय आणि कसं निर्माण करायचं हि अक्कल असते का ? ह्या सगळ्या निसर्गालाही कंट्रोल करणारी जी शक्ती आहे तीच देव. शास्त्रज्ञांनी भलेही न मानू दे . त्यांच्या मानण्यावर का कुठं देवाचं अस्तित्व अवलंबून आहे .

बाकी काहीही असो ह्या धाग्याच्या निमित्ताने आमचे दोन आवडते आयडी जे की गुरुदेव विवेक ठाकुर उर्फ संक्षी आणि निराकार गाढव उर्फ (___) हे परत अ‍ॅक्टीव्ह झाले हे पाहुन अम्हाला अत्यंत आणंद झाला आहे , किमान ह्याबद्दल तरी आम्ही यनावालांचे मनःपुर्वक आभारी आहोत :)

आजच झालेल्या हायकोर्टाच्या हुकुमानंतर (राहुल सोनिया - नॅशनल हेराल्ड केस) हे बघणं देखील रुचीपूर्ण ठरेल. Be patient while watching this. पुरेसा वेळ द्या हे बघायला. I can only say, it's too good! या धाग्याचा टि आर पी चांगला असल्याने हे टाकत आहे. अपेक्षाभंग झाल्यास माफी असावी.

ईश्श्य, काहितरीच काय!

*जे प्रश्न लेखाशी संबंधित असतील त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्‍न करतो. अन्य प्रश्नांची नाही. उदा. "आस्तिक वैज्ञानिक" या लेखावरील श्री.प्रगो यांचे प्रश्न:
१)आस्तिक म्हणजे काय ? खरा अर्थ काय ? २) देव म्हणजे काय ? खरा अर्थ काय ? ३) वैदिक तत्वज्ञानाचा बेस आधार जो की जैमिनीचे सांख्यदर्शन , तो देव ह्या संकल्पने विषयी काय म्हणतो ? ४) त्यापुढे विकसीत झालेल्या पातंजलीच्या योगदर्शनात देव ह्या संकल्पनेत काय बदल आहे ? ५) वैदिक धर्मातील देव कल्पना आणि मध्यपुर्वेतील देव कल्पना ह्यात काही फरक आहे की नाही ? ६)रीचर्ड डॉकिन्स आणि डार्विन ह्यांची मते ही मध्यपुर्वेतील देव ह्या क्लपनेला धरुन असतील तर ती हिंदु वैदिक देव ह्या कल्पनेला तशीच लागु पडतील काय ? ७) नासदीय सुक्तामधील ह्या शेवटच्या श्लोकाचा अर्थ काय ? इ॒यं विसृ॑ष्टि॒र्यत॑।आअब॒भूव॑ यदि॑ वा द॒धे यदि॑ वा॒ न । यो।आस्याध्यक्षः परमे व्योमन्त्सो।आङ्ग वेद यदि वा न वेद ॥ ७ ॥
... *वेदप्रामाण्य मानतो तो आस्तिक. असा मूळ अर्थ असला तरी तो आता लुप्त झाला आहे. ...एवंगुणविशिष्ट देव अस्तित्वात आहे अशी ज्याची दृढश्रद्धा असते तो आस्तिक असा अर्थ बहुरूढ झाला आहे. रूढ अर्थच खरा मानायचा असतो. आज ८०%+ लोकांच्या मनात देवाविषयी जी कल्पना आहे तोच खरा अर्थ. तो सर्वांना ठाऊक आहे. उर्वरित प्रश्न लेखाशी संबंधित नाहीत. माझ्याजवळ विद्वत्ता नाही. ** श्री. प्रगो म्हणतात "जैमिनीचे सांख्यदर्शन.." माझ्या समजुतीप्रमाणे सांख्यदर्शन कपिलमुनींचे आहे. आचार्य जैमिनी हे पूर्वमीमांसाशास्त्राचे प्रवर्तक आहेत. ते असो. मला वाटते वर्तमान काळातील समाजाचा विचार करावा. दोन हजार वर्षांपूर्वी रचलेल्या षड् दर्शनांचा आज अभ्यास करणे हा मला कालापव्यय वाटतो. (ज्यांना संशोधन करून पी.एच्.डी.मिळवायची असेल त्यांनी अवश्य करावा.) आज बहुसंख्य हिंदुबांधवांच्या देवा-धर्माविषयी ज्या कल्पना आहेत त्यांमुळे त्यांचा पैसा-ऊर्जा आणि वेळ मोठ्याप्रमाणात वाया जात आहे. त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार केल्यास त्यांची, आणि परिणामत: समाजाची, प्रगती होईल. देश पुढे जाईल असे प्रामाणिकपणे वाटते. म्हणून लिहितो. इथे वाचकवर्ग मोठा आहे. कुठेतरी विचार रुजेल. प्रसार होईल अशी आशा वाटते.( माझी कल्पना चुकीची असेल. कदाचित् इथले विद्वत्तापूर्ण प्रतिसाद वाचण्यासाठी इतके सहस्रावधी वाचक येत असतील.)