मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्रिकेट विश्वचषक स्पर्धा - २०१५

श्रीगुरुजी · · काथ्याकूट
क्रिकेटच्या मर्यादित षटकांच्या एकदिवसीय सामन्यांची ११ वी विश्वचषक स्पर्धा शनिवार १४ फेब्रुवारी २०१५ या दिवशी सुरू होत आहे. १४ फेब्रुवारीला न्यूझीलँड वि. श्रीलंका हा स्पर्धेतील सर्वात पहिला सामना खेळला जाईल. १८-२१ मार्च या चार दिवशी ४ उपांत्यपूर्व फेरीचे सामने आहेत, उपांत्य फेरीचे २ सामने २१ मार्च व २४ मार्च रोजी आहेत व अंतिम सामना रविवार २९ मार्च या दिवशी खेळला जाईल. ही स्पर्धा न्यूझीलँड व ऑस्ट्रेलिया हे दोन देश संयुक्तपणे आयोजित करीत आहेत. यापूर्वी १९९२ मधील ५ वी विश्वचषक स्पर्धा याच देशांनी संयुक्तपणे आयोजित केली होती. पहिल्या १० स्पर्धांची संक्षिप्त माहिती अशी आहे. (१) वर्ष - १९७५, यजमान - इंग्लंड, विजेता - वेस्ट इंडीज, उपविजेता - ऑस्ट्रेलिया (२) वर्ष - १९७९, यजमान - इंग्लंड, विजेता - वेस्ट इंडीज, उपविजेता - इंग्लंड (३) वर्ष - १९८३, यजमान - इंग्लंड, विजेता - भारत, उपविजेता - वेस्ट इंडीज (४) वर्ष - १९८७, यजमान - भारत व पाकिस्तान, विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - इंग्लंड (५) वर्ष - १९९२, यजमान - ऑस्ट्रेलिया व न्यूझीलँड, विजेता - पाकिस्तान, उपविजेता - इंग्लंड (६) वर्ष - १९९६, यजमान - भारत, पाकिस्तान व श्रीलंका, विजेता - श्रीलंका, उपविजेता - ऑस्ट्रेलिया (७) वर्ष - १९९९, यजमान - इंग्लंड, विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - पाकिस्तान (८) वर्ष - २००३, यजमान - द. आफ्रिका, विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - भारत (९) वर्ष - २००७, यजमान - वेस्ट इंडीज, विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - श्रीलंका (१०) वर्ष - २०११, यजमान - भारत, बांगलादेश व श्रीलंका, विजेता - भारत, उपविजेता - श्रीलंका (११) वर्ष - २०१५, यजमान - ऑस्ट्रेलिया व न्यूझीलँड, विजेता - ?, उपविजेता - ? ________________________________________________________________________________ १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेचा विजेता भारतीय संघ बसलेले (डावीकडून) - दिलीप वेंगसरकर, सय्यद किरमाणी, कपिलदेव (कर्णधार), मोहिंदर अमरनाथ (उपकर्णधार), सुनील गावसकर, मदनलाल उभे (डावीकडून) - पी आर मानसिंग (संघ व्यवस्थापक), यशपाल शर्मा, कृष्णम्माचारी श्रीकांत, बलविंदरसिंग संधू, रवी शास्त्री, संदीप पाटील, रॉजर बिन्नी, कीर्ति आझाद, सुनील वॉल्सन ________________________________________________________________________________ २०११ च्या विश्वचषक स्पर्धेचा विजेता भारतीय संघ (डावीकडून) - झहीर खान, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), मुनाफ पटेल, गौतम गंभीर, श्रीशांत, सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, सुरेश रैना, पियूष चावला, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, युवराज सिंग, आशिष नेहरा, रविचंद्रन अश्विन, युसुफ पठाण ________________________________________________________________________________ पूर्वीच्या स्पर्धांवर नजर टाकली तर काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी दिसतात. - ऑस्ट्रेलिया सर्वाधिक म्हणजे ४ वेळा विजेते ठरले आहेत. त्याखालोखाल भारत व वेस्ट इंडीजने ही स्पर्धा प्रत्येकी २ वेळा जिंकली आहे. - ऑस्ट्रेलिया २ वेळा उपविजेता सुद्धा आहे. म्हणजे ऑस्ट्रेलिया १० पैकी ६ वेळा अंतिम फेरीत पोहोचलेले आहेत. - इंग्लंड ३ वेळा अंतिम फेरीत पोहोचून सुद्धा त्यांना विजेतेपद मिळविता आलेले नाही. श्रीलंका व भारत देखील ३ वेळा अंतिम फेरीत पोहोचले होते. श्रीलंकेने एकदा तर भारताने दोन वेळा अंतिम फेरीत विजय मिळविला आहे. - पहिल्या ३ स्पर्धात वेस्ट इंडीजचा जबरदस्त दबदबा होता. तीनही स्पर्धात ते अंतिम फेरीत पोहोचले व २ वेळा विजेते झाले. त्यानंतर त्यांची कामगिरी एकदम ढेपाळली व नंतरच्या ७ स्पर्धात ते एकदाच १९९६ मध्ये उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले होते. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या २०८ धावांचा पाठलाग करताना जेमतेम ५ धावांनी त्यांचा पराभव झाला होता. - न्यूझीलँड १० पैकी ६ स्पर्धात उपांत्य फेरीत पोहोचले होते. परंतु उपांत्य फेरीचा अडथळा त्यांना पार करता आलेला नाही. - १९९२ पासून स्पर्धेत सामील झालेल्या द. आफ्रिकेने खेळलेल्या ६ पैकी ३ स्पर्धात उपांत्य फेरी गाठली. परंतु त्यांना देखील उपांत्य फेरीचा अडथळा पार करता आलेला नाही. महत्त्वाच्या सामन्यात मोक्याच्या वेळी नेहमीच कच खाल्ल्यामुळे त्यांचा संघ चोकर्स म्हणून ओळखला जातो. - पाकिस्तानचा जावेद मियांदाद (१९७५-१९९६) व भारताचा सचिन तेंडुलकर (१९९२-२०११) हे दोघे प्रत्येकी ६ स्पर्धा खेळलेले आहेत. वेस्ट इंडीजचा शिवनरीने चंद्रपॉल, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग, श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन व केनयाचा थॉमस ओडोयो हे प्रत्येकी ५ स्पर्धा खेळलेले आहेत. - कोणत्याही स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्या करण्याचा मान कॅनडाकडे आहे. कॅनडाचा संघ दोन वेळा (एकदा श्रीलंकेविरूद्ध व १९७९ मध्ये इंग्लंडविरूद्ध) ४५ धावसंख्येवर बाद झाला होता. स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या भारताने केलेली आहे (२००७ मध्ये बर्म्युडाविरूद्ध ४१३ धावा). - भारत व पाकिस्तान एकमेकांविरूद्ध एकूण ५ सामने खेळलेले आहेत. सर्व सामने भारताने जिंकले आहेत. ४ सामन्यात प्रथम फलंदाजी करून व एका सामन्यात धावसंख्येचा पाठलाग करून भारताने विजय मिळविला होता. या सर्व ५ सामन्यात सचिन तेंडुलकर खेळला होता व त्यापैकी २ सामन्यात त्याला सामनावीराचा बहुमान मिळाला होता. या स्पर्धेतसुद्धा भारत वि. पाकिस्तान ही लढत होणार आहे व प्रथमच भारत सचिनशिवाय सामन्यात खेळेल. - मागील ५ स्पर्धांमध्ये अंतिम फेरीतील किमान १ संघ हा आशियातील संघ आहे. - २००७ मध्ये श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने द. आफ्रिकेविरूद्ध लागोपाठ ४ चेंडूवर ४ बळी मिळविले होते. _________________________________________________________________________________ २०१५ मधील विश्वचषक स्पर्धा एकूण १४ संघात खेळली जाईल. संघांची विभागणी २ गटात करण्यात आली आहे. 'अ' गट - न्यूझीलँड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, स्कॉटलँड, अफगाणिस्तान, बांगलादेश 'ब' गट - द. आफ्रिका, भारत, वेस्ट इंडीज, पाकिस्तान, झिंबाब्वे, आयर्लँड, संयुक्त अरब अमिराती _________________________________________________________________________________ स्पर्धेचे वेळापत्रक असे आहे.

प्राथमिक फेरीतील सामने

(१) शनिवार १४ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. श्रीलंका, स्थळ - ख्राईस्टचर्च (२) शनिवार १४ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड, स्थळ - मेलबोर्न (३) रनिवार १५ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. झिंबाब्वे, स्थळ - हॅमिल्टन (४) रनिवार १५ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), भारत वि. पाकिस्तान, स्थळ - अ‍ॅडलेड (५) सोमवार १६ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), आयर्लँड वि. वेस्ट इंडिज, स्थळ - नेल्सन (६) मंगळवार १७ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. स्कॉटलँड, स्थळ - ड्यूनेडीन (७) बुधवार १८ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), अफगाणिस्तान वि. बांगलादेश, स्थळ - कॅनबेरा (८) गुरूवार १९ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), यूएई वि. झिंबाब्वे, स्थळ - नेल्सन (९) शुक्रवार २० फेब्रुवारी, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. इंग्लंड, स्थळ - वेलिंग्टन (१०) शनिवार २१ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), पाकिस्तान वि. वेस्ट इंडीज, स्थळ - ख्राईस्टचर्च (११) शनिवार २१ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश, स्थळ - ब्रिस्बेन (१२) रविवार २२ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), अफगाणिस्तान वि. श्रीलंका, स्थळ - ड्यूनेडीन (१३) रविवार २२ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), भारत वि. द. आफ्रिका, स्थळ - मेलबोर्न (१४) सोमवार २३ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), इंग्लंड वि. स्कॉटलँड, स्थळ - ख्राईस्टचर्च (१५) मंगळवार २४ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), वेस्ट इंडीज वि. झिंबाब्वे, स्थळ - कॅनबेरा (१६) बुधवार २५ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), आयर्लँड वि. यूएई, स्थळ - ब्रिस्बेन (१७) गुरूवार २६ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), अफगाणिस्तान वि. स्कॉटलँड, स्थळ - ड्यूनेडीन (१८) गुरूवार २६ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), श्रीलंका वि. बांगलादेश, स्थळ - मेलबोर्न (१९) शुक्रवार २७ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. वेस्ट इंडीज, स्थळ - सिडने (२०) शनिवार २८ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ६:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. ऑस्ट्रेलिया, स्थळ - ऑकलँड (२१) शनिवार २८ फेब्रुवारी, वेळ - सकाळी १२:०० (भाप्रवे), भारत वि. यूएई, स्थळ - पर्थ (२२) रविवार ०१ मार्च, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), इंग्लंड वि. श्रीलंका, स्थळ - वेलिंग्टन (२३) रविवार ०१ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), पाकिस्तान वि. झिंबाब्वे, स्थळ - ब्रिस्बेन (२४) मंगळवार ०३ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. आयर्लँड, स्थळ - कॅनबेरा (२५) बुधवार ०४ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), पाकिस्तान वि. यूएई, स्थळ - नेपिअर (२६) बुधवार ०४ मार्च, वेळ - सकाळी १२:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान, स्थळ - पर्थ (२७) गूरूवार ०५ मार्च, वेळ - सकाळी ३:३० (भाप्रवे), बांगलादेश वि. स्कॉटलँड, स्थळ - नेल्सन (२८) शुक्रवार ०६ मार्च, वेळ - सकाळी १२:०० (भाप्रवे), भारत वि. वेस्ट इंडीज, स्थळ - पर्थ (२९) शनिवार ०७ मार्च, वेळ - पहाटे ६:३० (भाप्रवे), पाकिस्तान वि. द. आफ्रिका, स्थळ - ऑकलँड (३०) शनिवार ०७ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), आयर्लँड वि. झिंबाब्वे, स्थळ - होबार्ट (३१) रविवार ०८ मार्च, वेळ - सकाळी ०३:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. अफगाणिस्तान, स्थळ - नेपिअर (३२) रविवार ०८ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका, स्थळ - सिडने (३३) सोमवार ०९ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), इंग्लंड वि. बांगलादेश, स्थळ - अ‍ॅडलेड (३४) मंगळवार १० मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), भारत वि. आयर्लँड, स्थळ - हॅमिल्टन (३५) बुधवार ११ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), स्कॉटलँड वि. श्रीलंका, स्थळ - होबार्ट (३६) गूरूवार १२ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. यूएई, स्थळ - वेलिंग्टन (३७) शुक्रवार १३ मार्च, वेळ - सकाळी ०६:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. बांगलादेश, स्थळ - हॅमिल्टन (३८) शुक्रवार १३ मार्च, वेळ - पहाटे ९:३० (भाप्रवे), अफगानिस्तान वि. इंग्लंड, स्थळ - सिडने (३९) शनिवार १४ मार्च, वेळ - पहाटे ६:३० (भाप्रवे), भारत वि. झिंबाब्वे, स्थळ - ऑकलँड (४०) शनिवार १४ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. स्कॉटलँड, स्थळ - होबार्ट (४१) रविवार १५ मार्च, वेळ - सकाळी ०३:३० (भाप्रवे), यूएई वि. वेस्ट इंडीज, स्थळ - नेपिअर (४२) रविवार १५ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), आयर्लँड वि. पाकिस्तान, स्थळ - ओव्हल _______________________________________________________________________________

उपांत्यपूर्व फेरीतील सामने

(१) बुधवार १८ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), उपांत्यपूर्व फेरीतील पहिला सामना ('अ' गटातील प्रथम क्रमांकाचा संघ वि. 'ब' गटातील चौथ्या क्रमांकाचा संघ) , स्थळ - सिडने (२) गुरूवार १९ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), उपांत्यपूर्व फेरीतील दुसरा सामना ('अ' गटातील द्वितीय क्रमांकाचा संघ वि. 'ब' गटातील तृतीय क्रमांकाचा संघ) , स्थळ - मेलबोर्न (३) शुक्रवार २० मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), उपांत्यपूर्व फेरीतील तिसरा सामना ('अ' गटातील तृतीय क्रमांकाचा संघ वि. 'ब' गटातील द्वितीय क्रमांकाचा संघ) , स्थळ - अ‍ॅडलेड (४) शनिवार २१ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), उपांत्यपूर्व फेरीतील चौथा सामना ('अ' गटातील चौथ्या क्रमांकाचा संघ वि. 'ब' गटातील प्रथम क्रमांकाचा संघ) , स्थळ - वेलिंग्टन ________________________________________________________________________________

उपांत्य फेरीतील सामने

(१) मंगळवार २४ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), उपांत्य फेरीतील पहिला सामना, स्थळ - ऑकलँड (२) गुरूवार २६ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), उपांत्य फेरीतील दुसरा सामना, स्थळ - सिडने ________________________________________________________________________________

अंतिम सामना

रविवार २९ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), स्थळ - मेलबोर्न ________________________________________________________________________________ २०११ व २०१५ मधील विश्वचषक स्पर्धेतील नियमातील फरक खालीलप्रमाणे - (१) २०११ ची स्पर्धा - २०११ मध्ये सुरवातीला १० षटकांचा पॉवरप्ले असायचा. या १० षटकात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त २ क्षेत्ररक्षक ठेवता येत होते. नंतर षटक क्रमांक ११ ते ५० या दरम्यान ५ षटकांचे २ पॉवरप्ले असायचे व त्यात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ३ क्षेत्ररक्षक ठेवता येत होते. पॉवरप्ले नसलेल्या उर्वरीत ३० षटकात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ५ क्षेत्ररक्षक ठेवता येत होते. २०१५ ची स्पर्धा - २०१५ च्या स्पर्धेत सुरवातीला १० षटकांचा पॉवरप्ले असेल. या १० षटकात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त २ क्षेत्ररक्षक ठेवता येतील. नंतर षटक क्रमांक ११ ते ४० या दरम्यान ५ षटकांचा एकच पॉवरप्ले असेल व तो फलंदाजी करणार्‍या संघाला आपल्या सोयीने घेता येईल. ३६ व्या षटकाच्या आधी पॉवरप्ले घेतलाच नाही तर षटक क्रमांक ३६-४० ही पॉवरप्लेची षटके असतील व त्यात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ३ क्षेत्ररक्षक ठेवता येतील. पॉवरप्ले नसलेल्या उर्वरीत ३५ षटकात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ४ क्षेत्ररक्षक ठेवता येतील. ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ४ क्षेत्ररक्षक असल्याने फलंदाज वर्तुळाच्या बाहेर उंच फटके मारण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे अर्धवेळ गोलंदाज तसेच फिरकी गोलंदाज कमी वापरले जातील. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या तशाही फिरकी गोलंदाजांना फारशी साथ देत नाहीत. त्यामुळे फिरकी गोलंदाज एकंदरीतच कमी वापरले जातील. (२) २०११ ची स्पर्धा - एकच पांढरा चेंडू ५० षटके वापरला जात असे. जलदगती गोलंदाजांना रिव्हर्स स्विंगसाठी व फिरकी गोलंदाजांना चेंडू जुना झाल्यावर फायदा मिळे. जर खराब व्हायला लागला किंवा खूप ओला झाला तर ३४ षटकानंतर तितकाच झिजलेला वेगळा चेंडू वापरला जात असे. २०१५ ची स्पर्धा - - विकेटच्या दोन्ही बाजूने २ नवीन पांढरे चेंडू वापरले जातील. ५० व्या षटकापर्यंत कोणताही चेंडू जास्तीत जास्त २४-२५ षटके वापरला गेला असेल. जलदगती गोलंदाजांना याचा फायदा मिळेल. फिरकी गोलंदाजांना व जलदगती गोलंदाजांना रिव्हर्स स्विंगसाठी फारसा फायदा नाही. ________________________________________________________________________________

स्पर्धेतील संघ

(१) भारत महेंद्रसिंग धोनी*, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहीत शर्मा, मोहम्मद शमी भारताने २०११ मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. सर्वात धक्क्कादायक बातमी म्हण्जे त्या विजयी संघातील १५ खेळाडूंपैकी फक्त ४ च खेळाडू या संघात आहेत (धोनी, कोहली, रैना, अश्विन). इतर कोणत्याही देशाच्या संघात मागील स्पर्धेतील संघातील इतके कमी खेळाडू आताच्या संघात नसावेत. या चौघांपैकी रैना ९ पैकी फक्त ४ सामने खेळला होता तर अश्विन फक्त २ सामने खेळला होता. कोहली व धोनी सर्व ९ सामने खेळले होते. भारताची फलंदाजी बर्‍यापैकी दिसत असली तरी गोलंदाज अत्यंत निष्प्रभ आहेत. या संघात स्टुअर्ट बिन्नीची निवड सर्वात धक्कादायक आहे. त्याचे वडील रॉजर बिन्नी निवडसमितीत आहेत हा योगायोग नसावा. स्टुअर्ट बिन्नीऐवजी सध्या रणजी स्पर्धेत असलेला युवराज सिंग संघात हवा होता. परदेशात सातत्याने अपयशी ठरत असलेल्या शिखर धवनऐवजी सध्याच्या रणजी स्पर्धेत चांगली कामगिरी करत असलेला सेहवागला घेता आले असते किंवा ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत यशस्वी ठरलेल्या मुरली विजयला घेता आले असते. तसेच रायडूऐवजी रॉबिन उथप्पा हवा होता. रविंद्र जडेजा सध्या जायबंदी आहे. जायबंदी असल्याने त्याला ऑस्ट्रेलियातील कसोटी व तिरंगी स्पर्धेतील ४ पैकी ३ एकदिवसीय सामने खेळता आले नाहीत. जो एकमेव सामना तो खेळला त्यातही तो अपयशी ठरला. यावर्षीच्या रणजी स्पर्धेतील एकही सामना तो खेळलेला नाही. थोडक्यात गेले अनेक महिने तो एकही स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. अनेक महिने सरावाशिवाय असलेल्या या जायबंदी खेळाडूला कशाला घेतले? स्पर्धा सुरू होईपर्यंत तो तंदुरूस्त झाला नाही तर पंचाईत आहे. अश्विन, रोहीत शर्मा हे परदेशात फारसे यशस्वी ठरलेले नाहीत. त्यांच्याऐवजी इतर खेळाडूंचा विचार करायला हवा होता. भारत यावेळी उपांत्य फेरीत प्रवेश करू शकेल का याविषयी मी साशंक आहे. (२) ऑस्ट्रेलिया मायकेल क्लार्क*, जॉर्ज बेली, पॅट कमिन्स, झेव्हियर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॅडीन, जॉश हॅझलवूड, मिचेल जॉन्सन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन ऑस्ट्रेलियाचा संघ अत्यंत समतोल आहे. या संघात स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श, शेन वॉटसन, मिचेल जॉन्सन, मायकेल क्लार्क, जेम्स फॉकनर अशा अनेक अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ हे फलंदाजीत तुफान फॉर्मात आहेत, तर गोलंदाजीत मिचेल जॉन्सन आणि मिचेल स्टार्क फॉर्मात आहेत. तरीसुद्धा या संघात रायन हॅरिस व नेथन लायन ची उणीव जाणविते. ऑस्ट्रेलिया यावेळी उपांत्य फेरीत नक्की प्रवेश करेल असा माझा अंदाज आहे. (३) इंग्लंड ऑईन मॉर्गन*, मोईन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलन्स, ईयान बेल, रवी बोपारा, स्टुअर्ट ब्रॉड, जॉस बटलर, स्टिव्हन फिन, अ‍ॅलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, जो रूट, जेम्स टेलर, जेम्स ट्रेडवेल, ख्रिस वोक्स मॉर्गन, जो रूट, ईयान बेल आणि जॉस बटलर हे चांगले फलंदाज इंग्लंडच्या संघात आहेत. जेम्स अँडरसन, फिन आणि ब्रॉड हे चांगले गोलंदाज देखील आहेत. मोईन अली व रवी बोपारा हे उपयुक्त अष्टपैलू खेळाडू आहेत. इंग्लंड उपांत्य फेरीत प्रवेश करू शकेल का याविषयी मी साशंक आहे. (४) न्यूझीलँड ब्रँडन मॅकलम्*, कोरी अँडरसन, ट्रेंट बोल्ट, ग्रँट ईलियट, मार्टिन गप्टिल, टॉम लॅथम, मिचेल मॅकलेंघॅन, नेथन मॅकलम्, कायल मिल्स, अ‍ॅडम म्लाईन, ल्यूक राँकी, टीम साउदी, रॉस टेलर, डॅनियल व्हिटोरी, केन विल्यमसन किवीज सध्या तुफान फॉर्मात आहेत. ब्रँडन मॅकलम् ने २०१४ मध्ये २ त्रिशतके, १ द्विशतक, एकदा १९५ अशी तुफान वेगवान शतके केली आहेत. केन विल्यमसन देखील जबरदस्त फॉर्मात आहे. कोरी अँडरसन, टॉम लॅथम, ल्यूक राँकी हे देखील भरात आहेत. तुफान फटकेबाज रॉस टेलर हा माझा अत्यंत आवडता खेळाडू. परंतु तो अजून फारसा भरात नाही, परंतु घरच्या मैदानावर तो कधीही फॉर्मात येऊ शकतो. किवींची गोलंदाजी फलंदाजीच्या तुलनेत जरा दुर्बळ वाटते. बोल्ट बर्‍यापैकी फॉर्मात आहे. परंतु इतर गोलंदाज तितके चांगले वाटत नाहीत. तरीसुद्धा जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलँड यावेळी चमत्कार करून दाखवतील असं वाटतंय. न्यूझीलँड यावेळी उपांत्य फेरीत नक्की प्रवेश करेल असा माझा अंदाज आहे. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात यावेळी प्रथमच न्यूझीलँड अंतिम फेरीत दिसेल असाही माझा अंदाज आहे. (५) पाकिस्तान मिसबाह उल हक*, अहमद शेहझाद, एहसान आदिल, हॅरिस सोहेल, नासिर जमशेद, मोहम्मद इरफान, सर्फराजअहमद, शाहीद आफ्रिदी, सोहेब मकसूद, सोहेल खान, उमर अकमल, वहाब रियाझ, यासीर शाह, युनिस खान या संघात बर्‍याच वयस्कर मंडळींचा भरणा आहे. कर्णधार मिसबाह हा ४० वर्षांचा असून युनिस खान (३७ वर्षे), मोहम्मद हफीझ (३४ वर्षे), मोहम्मद इरफान (३२ वर्षे), शाहीद आफ्रिदी (३४ वर्षे), सोहेल खान (३० वर्षे) असे अनेक ३०+ वयाचे खेळाडू या संघात आहेत. पाकिस्तान हा अत्यंत बेभरवशाचा संघ आहे. हा संघ एखाद्या दिवशी तुफान कामगिरी करून लगेच दुसर्‍याच दिवशी अत्यंत खराब कामगिरी करून दाखवू शकतो. अत्यंत गुणी खेळाडू असूनही सातत्याचा अभाव व खेळाडूंना बेटिंग आणि मॅचफिक्सिंगचे लागलेले ग्रहण यामुळे या संघाबद्दल कोणताच अंदाज करता येत नाही. दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच या संघाकडे देखील जबरदस्त वेगवान गोलंदाज आहेत. शाहीद आफ्रिदीसारखा जबरदस्त फटकेबाज असलेला अष्टपैलू या संघात आहे. परंतु अत्यंत बेभरवशाची फलंदाजी असल्याने पाकिस्तान कधीही अपेक्षित कामगिरी करीत नाही. १९९२ मध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलँड मधील ५ वी विश्वचषक स्पर्धा पाकिस्तानने नशीबाची जबरदस्त साथ मिळाल्याने जिंकली. त्या स्पर्धेत प्रत्येक संघाला ८ सामने खेळायचे होते. पहिल्या ५ सामन्यांपैकी पाकिस्तान ४ सामन्यात पराभूत होता. इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची अवस्था सर्वबाद ८७ अशी दयनीय होती. पाकिस्तानच्या सुदैवाने मध्यंतरापासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने इंग्लंडला फलंदाजी करताच आली नाही व सामना अनिर्णित घोषित होऊन दोन्ही संघांना १-१ गुण मिळाला होता. पाकिस्तानने नंतर उर्वरीत तीनही सामने जिंकले. परंतु उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी इंग्लंडविरूद्ध नशीबाने मिळालेल्या १ गुणाचा फायदा झाला होता. आतापर्यंत झालेल्या १० विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान ५ वेळा एकमेकांशी लढले आहेत व सर्व सामने भारताने जिंकले आहेत. या सर्व ५ सामन्यात सचिन तेंडुलकरचा सहभाग होता. या विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानविरूद्ध १५ फेब्रुवारीला आहे व यावेळी सचिन नाही. या सामन्याची तिकिटे ऑनलाईन विक्री सुरू झाल्यावर काही मिनिटातच संपलेली आहेत. बघूया यावेळी काय होतंय ते. अत्यंत बेभरवशाचा संघ असल्याने यावेळी पाकिस्तान उपांत्य फेरीत प्रवेश करेल की नाही हे नक्की सांगता येणे अवघड आहे. (६) दक्षिण आफ्रिका एबी डी व्हिलिअर्स*, हशीम आमला, कायल अ‍ॅबॉट, फरहान बेहार्डिअन, क्विंटन डी कॉक, जीन पॉल ड्युमिनी, फाफ डू प्लेसि, इम्रान ताहीर, डेव्हिड मिलर, मॉर्नी मॉर्केल, वेन पार्नेल, एरॉन फांगिसो, व्हरनॉन फिलँडर, रिली रॉसॉ, डेल स्टेन अत्यंत समतोल आणि जबरदस्त संघ. याही संघात बर्‍याच वयस्कर मंडळींचा भरणा आहे. तब्बल ९ खेळाडू ३०+ वयाचे आहेत. अत्यंत जबरदस्त गोलंदाज व जबरदस्त फलंदाज हे या संघाचे वैशिष्ट्य. एबी डी व्हिलिअर्स, आमला, फाफ डू प्लेसि, रॉसॉ, डेव्हिड मिलर इ. फलंदाज तुफान फॉर्मात आहेत, तर मॉर्नी मॉर्केल, डेल स्टेन, फिलँडर हे फलंदाजांना धडकी भरविणारे वेगवान गोलंदाजही भरात आहेत. या संघाचे क्षेत्ररक्षण देखील अत्यंत उच्च दर्जाचे आहे. अत्यंत गुणी खेळाडू असूनही महत्त्वाच्या सामन्यात आयत्यावेळी कच खाऊन अनेकवेळा या संघाने सामने गमाविलेले आहेत. अनेकवेळा नशीबाने देखील या संघाला तडाखा दिलेला आहे. विश्वचषक स्पर्धेत १९९२ पासून ६ वेळा सहभागी होऊन त्यात ३ वेळा उपांत्य फेरी गाठूनही या संघाला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आलेले आहे. आतापर्यंत झालेल्या १० विश्वचषक स्पर्धेत भारत-द. आफ्रिका ३ वेळा एकमेकांशी लढले आहेत व सर्व सामने भारताने गमावले आहेत. या सर्व ३ सामन्यात सचिन तेंडुलकरचा सहभाग होता. या विश्वचषक स्पर्धेत भारताचा दुसरा सामना द. आफ्रिकेविरूद्ध आहे आणि यावेळी सचिन नाही. बघूया यावेळी काय होतंय ते. या स्पर्धेत हा संघ नक्कीच उपांत्य फेरीत प्रवेश करेल. बहुतेक प्रथमच अंतिम फेरीत सुद्धा असेल आणि कदाचित यावेळी प्रथमच विश्वचषकावर आपले नाव कोरेल असा अंदाज आहे. (७) श्रीलंका अँजेलो मॅथ्यूज*, लाहिरू थिरीमाने, दिनेश चंडीमल, तिलकरत्ने दिलशान, रंगाना हेराथ, माहेला जयवर्धने, दिमुथ करूणारत्ने, नुवान कुलसेकरा, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, जीवन मेंडीस, थिसारा परेरा, धम्मिका प्रसाद, कुमार संगक्कारा, सचित्र सेनानायके श्रीलंका संघाची कामगिरी लक्षात घेताना १९९२ पूर्वी व १९९२ नंतर (म्हणजे १९९६ पासून) असे दोन वेगळे कालखंड लक्षात घेतले पाहिजेत. १९९२ पर्यंत श्रीलंका हा एक अत्यंत दुर्बल व अतिसामान्य संघ म्हणून ओळखला जात होता. परंतु अचानक नशीबाची साथ मिळून १९९६ ची विश्वचषक स्पर्धा श्रीलंकेने जिंकली आणि त्या संघाने एकदम कात टाकली. तेव्हापासून हा संघ एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. १९९६ पासून झालेल्या ५ विश्वचषक स्पर्धांमध्ये ४ वेळा हा संघ उपांत्य फेरीत पोहोचला. त्यापैकी ३ वेळा अंतिम फेरीत पोहोचला व एकदा अंतिम फेरी जिंकली. आताच्या संघात एकाहून एक जबरदस्त फलंदाज आहेत. कुमार संगक्कारा व दिलशान जबरदस्त फॉर्मात आहेत. यांच्या जोडीला अत्यंत शैलीदार व सभ्य फलंदाज जयवर्धने सुद्धा आहे. जयवर्धने हा माझा अत्यंत आवडता फलंदाज आहे. संघात अँजेलो मॅथ्यूज, थिसारा परेरा व कुलसेकरा सारखे अष्टपैलू आहेत. मलिंगासारख्या अत्यंत भेदक यॉर्कर टाकून हमखास बळी घेणारा गोलंदाज आहे. हेराथ सारखा खडूस फिरकी गोलंदाजही आहे. परंतु या संघाची गोलंदाजी खूपच दुर्बल वाटते. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल असा माझा अंदाज आहे. (८) वेस्ट इंडीज जेसन होल्डर*, मर्लॉन सॅम्युअल्स, सुलीमान बेन, डॅरेन ब्राव्हो, जोनाथन कार्टर, शेल्डन कॉटरेल, ख्रिस गेल, दिनेश रामदीन, केमार रोच, आंद्रे रसेल, डॅरेन सॅमी, लेंडल सिमन्स, ड्वेन स्मिथ, जेरोमी टेलर वेस्ट इंडीज संघाची कामगिरी लक्षात घेताना १९८३ पूर्वी व १९८३ नंतर (म्हणजे १९८७ पासून) असे दोन वेगळे कालखंड लक्षात घेतले पाहिजेत. १९८३ पर्यंत विंडीज हा एक एकदिवसीय तसेच कसोटी सामन्यातील सर्वाधिक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जात होता. १९७५ व १९७९ अशा दोन्ही विश्वचषक स्पर्धा या संघाने जिंकल्या. १९८३ च्या स्पर्धेत देखील हा संघ अंतिम फेरीत आला होता. परंतु अचानक दुर्बल समजल्या जाणार्‍या भारताने तो सामना जिंकला आणि तेव्हापासूनच विंडीजची सर्व प्रकारच्या सामन्यात घसरण सुरू झाली. १९८७ पासून २०११ पर्यंत फक्त एकदाच १९९६ मध्ये हा संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. इतर सर्व स्पर्धात हा संघ उपांत्य फेरीपूर्वीच गारद झालेला आहे. आताच्या संघात खरं तर जबरदस्त खेळाडू आहेत. परंतु एक संघ म्हणून त्यांची एकत्रित कामगिरी होताना दिसत नाही. ख्रिस गेल, ड्वेन स्मिथ, डॅरेन सॅमी हे अत्यंत स्फोटक फलंदाज आहेत. आंद्रे रसेल, सॅम्युअल्स यासारखे तुफानी अष्टपैलू खेळाडू आहेत. डॅरेन ब्राव्हो, लेंडल सिमन्स हे उपयुक्त फलंदाज आहेत. परंतु गोलंदाजी अत्यंत कमकुवत आहेत. नियामक मंडळाशी झालेल्या मतभेदामुळे ड्वेन ब्राव्हो व किरॉन पोलार्ड या अत्यंत जबरदस्त अष्टपैलू खेळाडूंना संघात स्थान न देण्याचा धक्कादायक निर्णय अनेकांच्या पचनी पडलेला नाही. त्यात भर म्हणून जादूभरा फिरकी गोलंदाज सुनील नारायण त्याच्या शैलीविषयी शंका व्यक्त केली गेल्यामुळे स्वतःहूनच बाहेर पडला. या ३ खेळाडूंची अनुपस्थिती विंडीजला खूपच महागात जाणार आहे. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची फारशी शक्यता वाटत नाही.

लिंबूटिंबू संघ

(९) बांगलादेश मुश्रफ मोर्तझा*, अल-अमीन होसेन, अनामूल हक, अराफत सनी, महंमदुल्ला, मोमिनूल हक, मुशफिकर रहीम, नासिर होसेन, रुबेल होसेन, सब्बीर रहमान, शकीब अल हसन, सौम्य सरकार, तैजुल इस्लाम, तमीम इक्बाल, टस्किन अहमद बांगलादेश कडे काही चांगले खेळाडू आहेत. कर्णधार मुश्रफ मोर्तझा, शकीब अल हसन, तमीम इक्बाल, मुशफिकर रहीम, महंमदुल्ला या खेळाडूंवरच या संघाची मदार आहे. तसा हा लिंबूटिंबू संघ आहे, परंतु काहीवेळा या संघाने बलाढ्य संघांना धक्के दिले आहेत. २००७ मध्ये पहिल्याच सामन्यात बांगलादेशाकडून झालेला पराभव व त्यामुळे प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागलेला भारतीय संघ ही कटू आठवण भारतीय कधीच विसरणार नाहीत. तरीसुद्धा हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही. फारतर एखाद्या बलाढ्य संघाला अपसेट करू शकेल इतकेच. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. (१०) आयर्लँड विल्यम पोर्टरफील्ड*, अँडी बॅलबर्नी, पीटर चेस, अ‍ॅलन कुसॅक, जॉर्ज डॉकरेल, एड जॉईस, अँडी मॅकब्राईन, जॉन मूनी, केव्हिन ओ'ब्रायन, नील ओ'ब्रायन, मॅक्स सोरेनसेन, पॉल स्टर्लिंग, स्टुअर्ट थॉम्पसन, गॅरी विल्सन, क्रेग यंग, टीम मर्टाघ आय्रलँडने २००७ व २०११ या दोन्ही स्पर्धात काही बलाढ्य संघांना धक्के दिले आहेत. २००७ मध्ये पाकिस्तान व बांगलादेशाला पराभूत करून झिंबाब्वेबरोबर सामना बरोबरीत सोडवून त्यांनी धक्के दिले होते. २०११ मध्ये इंग्लंडच्या ३२८ धावांचा यशस्वी पाठलाग करताना केव्हिन ओ'ब्रायन ने केवळ ५० चेंडूत शतक झळकाविले होते. यांच्याकडे ब्रायन बंधू, पोर्टरफील्ड, कुसॅक, जॉन मूनी इ. चांगले खेळाडू आहेत. हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही. फारतर एखाद्या बलाढ्य संघाला अपसेट करू शकेल इतकेच. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. (११) झिंबाब्वे एल्टन चिगुंबुरा*, रेजिस चकाब्वा, टेंडाई चटारा, चामू चिभाभा, क्रेग एरविन, टफाड्झ्वा कामुंगोझी, हॅमिल्टन मसाकाड्झा, स्टुअर्ट मॅट्सिकेन्येरी, सॉलोमन माईर, तवांदा मुपारिवा, तिनाशी पन्यानगारा, सिकंदर रझा, ब्रेंडन टेलर, प्रॉस्पर उत्सेया, शॉन विल्यम्स झिंबाब्वेने कधी कधी बलाढ्य संघांना धक्के दिले आहेत. परंतु हा संघ लिंबूटिंबू संघच आहे. हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. (१२) अफगाणिस्तान मोहम्मद नबी*, अफसर झझाई, अफताब आलम, अश्गर स्टानिकझाई, दौलत झद्रान, गुलबदीन नैब, हमिद हसन, जावेद अहमदी, मिरवैस अश्रफ, नजीबुल्ला झद्रान, नासिर जमाल, नवरोझ मंगल, समीउल्ला शेनवारी, शापूर झद्रान, उस्मान घनी, हशमतुल्ला शैदी, इझातुल्ला दौलतझाई, शफीकुल्ला, शराफुद्दीन अश्रफ अफगाणिस्तानचा संघ प्रथमच विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे. मागील वर्षी ट-२० विश्वचषक स्पर्धेत या संघाने बांगलादेश संघाला हरवून धक्का दिला होता. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. (१३) स्कॉटलँड प्रेस्टन मॉमसेन*, कायल कोएटझर, रिची बेरिंगटन, फ्रेडी कोलमॅन, मॅथ्यू क्रॉस, जॉश डेव्ही, अ‍ॅलासडेर इव्हान्स, हॅमिश गार्डिनर, मजिद हक, मायकेल लीस्क, मॅट मॅकन, कॅलम मॅकलीऑड, सफयान शरीफ, रॉब टेलर, ईयान वॉर्डलॉ हा संघ लिंबूटिंबू संघ आहे. हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. (१४) युनायटेड अरब अमिराती मोहम्मद तकीर*, खुर्रम खान, अमजद अली, अमजद जावेद, अ‍ॅंड्री बेरेंगर, फहाद अल्हाश्मी, मंजुळा गुरूगे, कामरान शहजाद, कृष्णा चंद्रन, मोहम्मद नवीद, नासिर अझीझ, स्वप्निल पाटील, रोहन मुस्तफा, सकलेन हैदर, शैमन अन्वर हा संघ लिंबूटिंबू संघ आहे. हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही. या संघात ठाण्याचा मराठमोळा स्वप्निल पाटील हा यष्टीरक्षक आहे. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. ________________________________________________________________________________ लिंबूटिंबू संघांकडून फारसे अपसेट्स होतील असे वाटत नाही. विश्वचषक स्पर्धेच्या आजपर्यंतच्या इतिहासात आजतगायत अंदाजे ३२५ हून अधिक सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी फक्त १४ सामन्यात (म्हणजे फक्त ४ टक्के सामन्यात) अनपेक्षित निकाल लागलेला आहे. खालील यादीवरून हे लक्षात येईल. (१) १९७९ - भारत वि. श्रीलंका (श्रीलंका विजयी) (२) १९८३ - ऑस्ट्रेलिया वि. झिंबाब्वे (झिंबाब्वे विजयी) (३) १९९६ - वेस्ट इंडीज वि. केनया (केनया विजयी) (४) १९९९ - भारत वि. झिंबाब्वे (झिंबाब्वे विजयी) (५) १९९९ - बांगलादेश वि. पाकिस्तान (बांगलादेश विजयी. हा सामना फिक्स केलेला होता असा दाट संशय आहे.) (६) २००३ - केनया वि. झिंबाब्वे (केनया विजयी) (७) २००३ - केनया वि. श्रीलंका (केनया विजयी) (८) २००७ - भारत वि. बांगलादेश (बांगलादेश विजयी) (९) २००७ - पाकिस्तान वि. आयर्लँड (आयर्लँड विजयी) (१०) २००७ - द. आफ्रिका वि. बांगलादेश (बांगलादेश विजयी) (११) २००७ - झिंबाब्वे वि. आयर्लँड (सामना बरोबरीत) (१२) २००७ - बांगलादेश वि. आयर्लँड (आयर्लँड विजयी) (१३) २०११ - इंग्लंड वि. आयर्लँड (आयर्लँड विजयी) (१४) २०११ - बांगलादेश वि. इंग्लंड (बांगलादेश विजयी) २००७ मध्ये सर्वाधिक धक्कादायक निकाल लागले होते. आतापर्यंत बांगलादेश, केनया, आयर्लँड व झिंबाब्वे यांनीच सर्वाधिक अपसेट्स केलेले दिसताहेत. एकंदरीत २०१५ मध्ये लिंबूटिंबू संघ एखाददुसरा अपसेट करू शकतील. परंतु त्या निकालाने फार फरक पडेल असे वाटत नाही. ________________________________________________________________________________

माझे अंदाज

१९८७ पासून भारताची कामगिरी एकाआड एक स्पर्धेत चांगली होत आहे. भारताने १९८७ मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला, १९९२ मध्ये भारताला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले. भारताने नंतर १९९६ मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला, पण १९९९ मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले. २००३ मध्ये भारत चक्क अंतिम फेरीत पोहोचला, पण २००७ मध्ये भारतावर प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळण्याची नामुष्की आली. त्यापाठोपाठ २०११ मध्ये भारत चक्क विजेता बनला. हाच क्रम सुरू राहिला तर भारताला २०१५ मधील विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची आशा नाही. याच्या बरोबर उलटा क्रम दक्षिण आफ्रिकेचा आहे. दक्षिण आफ्रिकेने १९९२, १९९९ व २००७ च्या स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली, तर १९९६, २००३ व २०११ मध्ये ते उपांत्य फेरीपूर्वीच गारद झाले. या इतिहासावरून असं वाटतंय की २०१५ मध्ये हा संघ नक्की उपांत्य फेरीत पोहोचणार. यातला योगायोगाचा भाग सोडला तरी भारताची गेल्या काही काळातील कामगिरी पाहिली तर या स्पर्धेत भारत उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्याची शक्यता धूसर दिसतेय. २०११ च्या तुलनेत भारताचा संघ खूपच दुर्बल वाटतो. २०११ च्या संघातील तब्बल ११ खेळाडू या संघात नाहीत. त्यांच्या जागी जे आले आहेत ते तितके चांगले नाहीत. शिखर धवन, जडेजा, रायडू, अक्षर पटेल, स्टुअर्ट बिन्नी, अश्विन इ. खेळाडूंच्या कामगिरीबद्दलच शंका आहे. त्यांच्याऐवजी मुरली विजय, रॉबिन उथप्पा, सेहवाग, युवराज सिंग इ. खेळाडू हवे होते. मुरली विजय इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर चांगला खेळल होता. रॉबिन उथप्पा, सेहवाग, युवराज हे स्थानिक स्पर्धेत चांगली कामगिरी करीत आहेत. अक्षर पटेल, धवन, अश्विन हे तिघेही ऑस्ट्रेलियात संपूर्ण अपयशी ठरले आहेत. रायडूलाही फारसा प्रभाव पाङता आलेला नाही. जडेजा जवळपास साडेतीन महिने दुखापतीमुळे क्रिकेटपासून लांब होता. तो नंतर एकच सामना खेळला व त्यातही अपयशी ठरला. स्टुअर्ट बिन्नी २ सामने खेळला. त्यातल्या एक सामन्यात त्याने बर्‍यापैकी फलंदाजी केली व दुसर्‍या सामन्यात बर्‍यापैकी गोलंदाजी केली. परंतु त्याच्याऐवजी युवराज सिंग कधीही जास्त योग्य ठरला असता. भारतीय गोलंदाजांबद्दल काहीच बोलण्यासारखं नाही. स्वतः धोनी निवृत्तीच्या मूडमध्ये असल्याने त्याच्या देह्बोलीतून उत्साहाचा पूर्ण अभाव जाणवितो. हे सर्व लक्षात घेता भारत या स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचणार नाही असे मला वाटते. माझ्या अंदाजानुसार द. आफ्रिका, न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया व श्रीलंका हे चार संघ उपांत्य फेरीत असतील. अंतिम लढत न्यूझीलॅंड व द. आफ्रिकेत होऊन द. आफ्रिका विजेता होईल. न्यूझीलँड, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया 'अ' गटात व द. आफ्रिका 'ब' गटात असल्याने उपांत्यपूर्व फेरीतच द. आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया किंवा द. आफ्रिका वि. न्यूझीलॅंड किंवा द. आफ्रिका वि. श्रीलंका असा सामना होण्याची ७५ टक्के शक्यता आहे. तसे झाले तर उपांत्य फेरीतील संभाव्य ४ संघातील एक संघ उपांत्यपूर्व फेरीतच पराभूत होईल व त्यामुळे इंग्लंड, भारत किंवा पाकिस्तानला उपांत्य फेरीत जायची संधी मिळू शकेल. कदाचित त्यामुळे अंतिम फेरीत अंदाजापेक्षा एखादा वेगळाच संघ असेल. ________________________________________________________________________________ विनंती - वरील लेखातील तपशिलात काही चुका असल्यास निदर्शनास आणून द्याव्यात.

वाचने 98702 वाचनखूण प्रतिक्रिया 361

धाग्याची त्रिशतकी खेळी झाल्याबद्दल श्रीगुरुजींना वर्ल्ड कप ट्रॉफीची उल्हासनगर मेड कॉपी, एक किटकॅटचा चेंडु,एक खडकी दापोडी बॅट व शालजोडी देउन सत्कार करण्यात येत आहे. (जेपी संन्यासी मंडळ संचालित अखिल मिपा मापंकाढे समिती)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

श्रीगुरुजी Tue, 03/24/2015 - 10:40
>>> धाग्याची त्रिशतकी खेळी झाल्याबद्दल श्रीगुरुजींना वर्ल्ड कप ट्रॉफीची उल्हासनगर मेड कॉपी, एक किटकॅटचा चेंडु,एक खडकी दापोडी बॅट व शालजोडी देउन सत्कार करण्यात येत आहे. धन्यवाद! या अमूल्य भेटींचा विनम्रतेने स्वीकार करीत आहे! *LOL* परंतु ........... आम्हाला खडकी-दापोडी बॅट देऊन आमची अवहेलना केल्याबद्दल "अखिल भारतीय समस्त खडकी-दापोडी ग्रामस्थ महासंघातर्फे" आपला जाहीर निषेध करण्यात येत आहे. :YAHOO:

In reply to by श्रीगुरुजी

परंतु ........... आम्हाला खडकी-दापोडी बॅट देऊन आमची अवहेलना केल्याबद्दल "अखिल भारतीय समस्त खडकी-दापोडी ग्रामस्थ महासंघातर्फे" आपला जाहीर निषेध करण्यात येत आहे.
खडकी दापोडी "ग्रामस्थ"?????????? शहरी भाग आहे की तो. आणि खडकी दापोडी बॅट बेष्ट असतात गल्ली क्रिकेट साठी. किमान ४ बॅट तोडल्यात तश्या. =))...स्वस्त मस्त आणि सहज उपलब्ध =))

In reply to by श्रीगुरुजी

खडकी-दापोडी पुण्याच्या तुलनेत गावठीच की!
खडकी दापोडीकर नसल्याने प्रत्युत्तर देत नाही =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कपिलमुनी Tue, 03/24/2015 - 10:54
या खडकी दापोडी बॅट या प्लॅस्टिक बॉलवर अतिशय उत्तम असतात . पूर्वी या बॅट दिवसभर छतावर उन्हात वाळवायचो . असे महिनाभर केले की बॅट मस्त हलकी होते आणि स्विंग जास्त मिळतो . बादवे, खडकी दापोडी येथील प्लास्टीक बॉल टूर्नामेंट हा एक मनोरंजक खेळ असतो

In reply to by कपिलमुनी

अगदी अगदी. माझ्याकडे अजुन दिड बॅट पडुन आहेत. =))...त्यातली अर्धी बॅट तुटल्यानंतर क्रिकेट खेळणं बंद झालं.. :(

श्रीगुरुजी Tue, 03/24/2015 - 10:45
३८ षटकांत आफ्रिकन्स ३ बाद २१६. डी व्हिलिअर्स आणि फाफडू हे दोघेही जोरदार फलंदाजी करीत आहेत. किवीजने सुरवातीला आफ्रिकन्सना खूपच रोखले होते. आफ्रिकन्स २२ षटकात फक्त २ बाद ८८ धावा करू शकले होते. परंतु आता आफ्रिकन्स जोरात आहेत. आफ्रिकन्स ५० षटकात ३५० पर्यंत जातील असं वाटतंय. पावसामुळे सामना बराच वेळ थांबलेला आहे. पाऊस थांबून परत सामना सुरू होईल तेव्हा षटके कमी झालेली असतील. मैदान खूप छोटे आहे. त्यामुळे ३५० धावा सुद्धा सुरक्षित नसतील. जर सामना ४६ षटकांचा झाला तर न्यूझीलँडसमोर अंदाजे ३०० धावांचे आव्हान असेल. न्यूझीलॅंडची तगडी फलंदाजी बघता हे आव्हान अवघड असले तरी अशक्य नसेल.

तिमा Tue, 03/24/2015 - 15:45
मॅच जबरदस्त झाली. दुर्दैवी सा. अफ्रिका इतके चांगले खेळूनही हरले. डकवर्थ-लुईस नियम नडला त्यांना. नाहीतर त्यांनी ३५० सुद्धा केला असता.

गणेशा Tue, 03/24/2015 - 15:52
प्रेडिक्शन खरे ठरुन ही पहिल्यांदा वाईट वाटत आहे. मिस द. अफ्रिका इन फायनल. १९९३ हिरो कप ( द. अफ्रिका वि. भारत) पासुन मी मॅच पाहण्यास सुरवात केली होती. १९९९ पासुन मी द.अफ्रिकेला बर्याच मॅच ला वर्ल्ड कप ला फेवरेट टीम म्हणुन सपोर्ट केला होता. क्रोनिये असो.. हर्षल गिब्ज.. पॉल अ‍ॅडम, क्लुसनर.. पोलाक, डोनाल्ड .. स्मिथ .. अशी असंख्य नावे आहेत की त्यांच्या मॅच पहाताना मजा यायची आणि यात एक नाव पुन्हा अ‍ॅड झाले होते ते म्हणजे ए.बी डीव्हीलियर्स. त्यांना हारलेले पाहुन मनापासुन वाईट वाटले. मॉर्केल ची बॉलिंग लाजवाब अशीच झाली. वर्ल्ड कप सुरु होण्याआधी सर्वांनी याच दोन टीम्स ना सर्वात जास्त पसंती दाखवली होती. ऑल द बेस्ट न्युजिलंड.

श्रीगुरुजी Tue, 03/24/2015 - 16:26
काय जबरदस्त सामना झाला! बघताना खूप मजा आली. न्यूझीलॅंड जिंकल्याचा आनंद झाला पण त्याचवेळी आफ्रिकन्स हरल्याचे वाईट वाटले, कारण दोन्ही संघ आवडते संघ आहेत. न्यूझीलॅंडला ५०.०१ आणि आफ्रिकेला ४९.९९ असे गुण देता येतील. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा आफ्रिकन्स ३८ षटकात ३ बाद २१६ इतक्या भक्कम स्थितीत होते. उरलेल्या १२ षटकांत त्यांनी किमान १२० धावा नक्की केल्या असत्या. त्यानंतर न्यूझीलॅंडला ५० षटकात किमान ३३६ धावांचे आव्हान खूपच अवघड गेले असते. पावसाचा फायदा नेहमीच धावांचा पाठलाग करणार्‍या संघाला मिळतो. तसं पाहिलं तर ४३ षटकात २९८ धावा हे आव्हानही अवघडच होते. अपेक्षेप्रमाणे मॅकलम् ने जबरदस्त सुरुवात करून दिली. पहिल्या ५ षटकातच न्यूझीलँडची धावसंख्या नाबाद ७१ होती. मॅकलम् बाद झाल्यावर मात्र लगेच वेग मंदावला. मॅकलमने जास्त वेळ खेळपट्टीवर थांबण्याचा प्रयत्न केला पाहिजे. २६ चेंडूत ५९ धावा करून बाद होण्याऐवजी ७०-८० चेंडू खेळून शतकापर्यंत पोहोचला तर न्यूझीलँडला जास्त फायदा होईल. आफ्रिकेने जबरदस्त झुंज दिली. शेवटच्या षटकापर्यंत कोण जिंकेल हे सांगता येत नव्हते. खूपच रोमहर्षक सामना झाला. Criket at its Best! अत्यंत आनंददायी सामना झाला. संपूर्ण सामन्यात एकमेकांना शिवीगाळ, एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, कुत्सित हातवारे करून चिडविणे असे एकदाही झाले नाही. दोन्ही संघांनी पुरेपूर प्रयत्न केले. आता परवा भारताची परीक्षा आहे. सिडनेमध्ये आज सकाळ्पासून पाउस पडत असून एकदाही सूर्यदर्शन झालेले नाही. पुढील ४८ तासात हवामान पावसाळी व ढगाळ राहणार आहे. सिडनेची खेळपट्टी फिरकीला अनुकूल समजली जाते. मागील आठवड्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या याच मैदानावर झालेल्या सामन्यात आफ्रिकेच्या ताहीर व ड्युमिनी या फिरकी गोलंदाजांनी कमाल करून ७ बळी मिळवून श्रीलंकेला किरकोळीत हरविले होते. गुरूवारच्या सामन्यात ढगाळ/पावसाळी वातावरण असले तर भारतीय फिरकी गोलंदाजांना पुरेशी मदत मिळणार नाही.

एखाद्याच्या कुंडलीमधे कसा राहु आणि केतु घात लाऊन बसलेले असतात? अगदी तस्सं सौथ आफ्रिकेच्या कुंडलीमधे डकवर्थ आणि लुईस बसलेत. :( सौथ आफ्रिका जिंकायला हवी होती. वेल प्लेड न्युझिज..आता ऑस्ट्रेलिया सोडुन कोणालाही वर्ल्ड कप मिळाला तरी हरकत नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

श्रीगुरुजी Tue, 03/24/2015 - 20:37
पावसाने आणि त्यामुळे नंतर डकवर्थ-लुईस जोडगोळीने द. आफ्रिकेचा कायमच घात केलाय. आज द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकली होती. आज पावसाची ६०% शक्यता होती. धावांचा पाठलाग करणार्‍या संघाला नेहमीच पावसाचा फायदा होतो हे लक्षात घेऊन द. आफ्रिकेने पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करायला हवे होते. परंतु याच स्पर्धेत आफ्रिकन्स २ वेळा धावांचा पाठलाग करताना हरलेले आहेत हे लक्षात ठेवून आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचा योग्य तोच निर्णय घेतला, पण दुर्दैवाने ते हरले. खरं तर आफ्रिकन्स हरलेले नाहीत, किवीज जिंकलेले आहेत असाच योग्य निष्कर्ष ठरेल. मॉर्नी मॉर्केल व डीव्हिलिअर्सला रडताना बघून वाईट वाटले. पण न्यूझीलँड हरले असते तर त्यांचेही खेळाडू आणि जमलेले ४५,००० प्रेक्षक सुद्धा रडले असते आणि तेसुद्धा पाहवले नसते.

In reply to by श्रीगुरुजी

सुटी टाकलीय....रंगतदार सामना व्हावा आणि आपण जिंकावं. शक्यता तशी कमीच...पण भारतीय टीम कडून काहीही होऊ शकतं म्हणजे किरकोळ संघाकडून पराभूत होऊ शकतात आणि बलाढ्य संघाला पाणी पाजू शकतात. दिलीप बिरुटे

In reply to by श्रीगुरुजी

डकवर्थ-लुईस आणि स्टर्न पण आला आहे जोडीला. आधिक माहितीसाठी गुगलून पहा Duckworth Lewis and Stern Method. मला काहीही समजले नाही कि काय फरक पडला याने.

In reply to by अविनाश पांढरकर

श्रीगुरुजी Wed, 03/25/2015 - 21:15
फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुईस यांनी शोधलेला मूळ फॉर्म्युल्यात स्टर्न सॉफ्टवेअर कंपनीने नोव्हेंबर २०१४ मध्ये सुधारणा केली व तेव्हापासून हा फॉर्म्युला आता डकवर्थ-लुईस-स्टर्न फॉर्म्युला असा ओळखला जातो. परंतु या विश्वचषक स्पर्धेत जुनाच फॉर्म्युला वापरला जात आहे. त्यामुळे डकवर्थ-लुईस हेच नाव अजूनही वापरात आहे. नवीन फॉर्म्युला बहुतेक विश्वचषक संपल्यानंतर भविष्यात वापरला जाईल.

गणेशा गुरुवार, 03/26/2015 - 00:01
इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया - विजेता ऑस्ट्रेलिया प्लेअर ऑफ द मॅच स्टीव्ह स्मिथ, अश्विन आणि मॅक्सवेल. मॅन ऑफ द मॅच मे बी वॅटसन

In reply to by खटपट्या

गणेशा गुरुवार, 03/26/2015 - 11:29
जसे न्युजिलंड ला प्रेडिक्ट करुन मी अफ्रिकेला सपोर्ट केला , तसे इंडिया ला पण करतोयच. पण आधी सांगितल्या प्रमाणे, टीम मध्ये पोइंट्स ( आणि पर्यायाने थोड्या पैश्यावर खेळतोय) त्यामुळे जे वाटले ते लिहिले. आता ३ नंबर वर आहे, जर जिंकलो तर पहिल्या नंबर वर जाण्याची शक्यता आहे. स्टीव स्मिथ प्लेअर लावल्याने बोनस नक्की. बाकी, खेळ मस्त झाला पाहिजे. पैसे लावुन ऑस्ट्रेलिया.. अआणि मनाने इंडिया दोन्ही जिंकले तरी आनंड आहेच. स्मिथ ची बॅटींग ..फिल्डिंग नेहमी आवडते मला.

In reply to by गणेशा

स्रुजा गुरुवार, 03/26/2015 - 01:10
खरंच हो. वचने किं दरिद्रता? तसं सकाळ्पासून हेच मत (MOM नाही पण यजमान जिंकणार असं ) मांडून शिव्या खाल्ल्यात पण आशा ही की आपण जिंकू.

In reply to by होबासराव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/26/2015 - 14:34
विराटला म्हणावं गेम तर काही दिसला नै फुकट विकेट दिली जा म्हणावं आता फिरायला. ८१/२ - १६.४

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/26/2015 - 14:44
धवन, विराट आणि आता रोहित शर्मा परतले. ९१/३- १८ ओव्हर. सामना आता जवळ जवळ गेला आहे येथून विजयाकडे जाणे केवल अशक्य, केवळ अशक्य... -दिलीप बिरुटे

कपिलमुनी गुरुवार, 03/26/2015 - 14:49
आता केवळ पराभवाचे अंतर किती कमी होणार एवढच ! शिखर माज करून आउट झाला बॅड लक फॉर रोहित ! कोहलीसाठीचे शब्द लिहू शकत नाही. #@*&क्ष

कपिलमुनी गुरुवार, 03/26/2015 - 14:51
आज रैनाला एकही ओव्हर दिली नाही याचे फार आश्चर्य वाटले. बाकी जडेजाला हाकला आता ! कांबळीच्या वळणावर चालला आहे

In reply to by कपिलमुनी

गणेशा गुरुवार, 03/26/2015 - 15:05
खरे तर , आपण ग्रुप च्या सगळ्या मॅचे जिंकलो होतो, त्यावेळेस किमान एकदा तरी, गेला बाजार यु.ए.ई किंवा तत्सम टीम समोर तरी जडेजा च्या एवजी अक्षर पटेल किंवा बिन्नी ला चान्स द्यायला हवा होता. आज हारतोय म्हणुन लिहित नाही जिंकत होतो तरी माझे हेच म्हणणे होते. अक्षर पटेल चांगला खेळतो असे वाटते

होबासराव गुरुवार, 03/26/2015 - 15:10
ह्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत ह्यांचा सामना अशा कुठल्याहि टिम शी झाला नव्हता... हे घाण करणार असे वाटतच होते...पण तरीहि वाटतेय आपण ऑस्ट्रेलियाला हरवायला हवे होते...बघुया नॉट गिव अप येट..

तिमा गुरुवार, 03/26/2015 - 17:01
व्हायचे तेच झाले. प्रत्येक वेळेला एकच कोणीतरी खेळत होता तेंव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती. यावेळेस सगळे चांगले खेळण्याऐवजी सगळेच वाईट खेळले. धोनी एकटा काय करणार ? असो. ऑस्ट्रेलिया सर्वच बाबतीत आपल्यापेक्षा सरस आहे. ते न्यूझिलंडलाही हरवतील असे वाटते. कारण फायनल ऑस्ट्रेलियात आहे.

श्रीगुरुजी गुरुवार, 03/26/2015 - 17:51
शेवटी हरलो. हरणारच होतो. ऑसीजचा संघ आपल्यापेक्षा सर्व दृष्टीने बलवान आहे. परंतु ९५ धावांच्या मोठ्या फरकाने हरू असे वाटले नव्हते. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर हरवणे अत्यंत अवघड आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. विश्वचषक स्पर्धा सुरू होताना फारश्या अपेक्षा नव्हत्या. भारत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करेल पण त्याच फेरीत हरेल असा अंदाज होता. परंतु पाकडे आणि चक्क द. आफ्रिकेला अपेक्षा नसताना हरवून भारताने अपेक्षा मोठ्या प्रमाणावर वाढवून ठेवल्या. भारत उपांत्य फेरीत प्रवेश करेल अशी सुरवातीला अपेक्षाच नव्हती. परंतु एकदा उपांत्य फेरीत आल्यावर समोर ऑस्ट्रेलिया असल्याने जिंकण्याची शक्यता कमीच होती. त्यामुळे भारत हरल्याचे दु:ख निश्चित आहे, परंतु फारसा अपेक्षाभंग झाला नाही. सुरवातीला वॉर्नरला स्वस्तात बाद करून भारताने चांगली सुरूवात केली होती. परंतु नंतर गोलंदाजी ढेपाळली. प्रत्येक षटकात २ बाउन्सरला परवानगी असताना भारतीय गोलंदाजांनी बाऊन्सर्स क्वचितच टाकले. यॉर्कर्स सुद्धा क्वचितच टाकले. त्यात भर म्हणून स्मिथ व फिंच हे दोघेही पायचित झालेले असताना पंचांनी त्यांना नाबाद ठरविले. यादवचे १ षटक शिल्लक असताना शेवटचे ५० वे षटक मोहीत शर्माला द्यायचा निर्णय अनाकलनीय होता. अर्थात भारताला २७५ धावांचा पाठलाग सुद्धा जमला नसता. भारताने फलंदाजी सुरूवात केल्यावर सुरवातीला १२ षटकांत नाबाद ७३ अशी चांगली सुरूवात केली होती. परंतु धवन बाद झाल्यावर एकदम रंग बदलला आणि काही वेळातच ४ बाद १०८ अशी अवस्था झाली तिथेच सामन्याचा निर्णय निश्चित झाला. कोहली व रैनाने पूर्ण निराशा केली. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात उपांत्य फेरीतील सामना कधीही न हरण्याची सशक्त परंपरा ऑस्ट्रेलियाने याही स्पर्धेत सुरूच ठेवली. असो. ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वच दृष्टीने भारताच्या संघापेक्षा बलवान असल्याने भारत हरणार हाच अंदा़ज अपेक्षित होता. आता अंतिम सामन्यात कोणाच्या बाजूने पाठिंबा द्यायचा याविषयी काहीही संभ्रम नाही. न्यूझीलँडच जिंकावे अशी तीव्र इच्छा आहे. न्यूझीलँड संपूर्ण स्पर्धेत प्रथमच ऑस्ट्रेलियात खेळणार आहे. त्यामुळे अंतिम सामना न्यूझीलॅंडसाठी फारसा सोपा नाही. अंतिम सामना जिंकण्याची दोन्ही संघाना जवळपास समान संधी आहे. ऑस्ट्रेलियाला ५५ टक्के आणि न्यूझीलँडला ४५ टक्के संधी आहे.

In reply to by श्रीगुरुजी

गणेशा गुरुवार, 03/26/2015 - 18:18
त्यात भर म्हणून स्मिथ व फिंच हे दोघेही पायचित झालेले असताना पंचांनी त्यांना नाबाद ठरविले
एक शंका : थोडी थोदी मॅच पाहिली आहे मी. फिंच चे पायचित पाहिले नाही. पण स्मिथ जे जे पायचीत अपिल आहे, त्यात चेंडु लेग स्टंप ला लागला असता, तो पायचित आऊट नसतो. परंतु रिव्हिव्ह चा नियम असा आहे, की जर अंपायर ने ऑउट दिला असेन तर आउट आणि नसेल दिला तर नॉट ऑउट. (ते अंपायर च्या फेवर मधेय डीसीजन असते) परंतु स्मिथ आउट होता असे म्हणणे पुर्ण पणे बरोबर नाही. कारण चेंडु लेग स्टंप ला लागत असल्याचे दिसत होते

In reply to by गणेशा

श्रीगुरुजी गुरुवार, 03/26/2015 - 21:12
पायचितच्या अपिलवर मैदानातील पंच जो निर्णय देतो त्याविरूद्ध तिसर्‍या पंचांकडे दाद मागितली तर सुरवातीला रिव्ह्यू बघून चेंडू नोबॉल नाही व चेंडू पायावर आदळण्याआधी बॅटला लागलेला नाही याची तिसरा पंच खात्री करून घेतो आणि मग चेंडू यष्ट्यांच्या रेषेत पडला आहे का नाही ते बघून खालीलप्रमाणे निर्णय होतो. (१) चेंडू यष्ट्यांवर जाऊन आदळत असला तरी चेंडूचा टप्पा लेगस्टंपच्या पूर्ण बाहेर पडला असेल किंवा टप्पा पडताना चेंडूचा अर्धा किंवा त्याहून अधिक भाग लेगस्टंपच्या बाहेर असेल तर फलंदाज नाबाद आहे असा निर्णय तिसरा पंच देतो. (२) चेंडू यष्ट्यांवर जाऊन आदळत असला तरी चेंडूचा टप्पा ऑफस्टंपच्या पूर्ण बाहेर पडला असेल किंवा टप्पा पडताना चेंडूचा अर्धा किंवा त्याहून अधिक भाग ऑफस्टंपच्या बाहेर असेल तर मैदानावरील पंचाने दिलेला निर्णय कायम राहतो. म्हणजे मैदानावरील पंचाने फलंदाजाला नाबाद दिले असेल फलंदाज नाबाद आहे असा निर्णय तिसरा पंच देतो आणि म्हणजे मैदानावरील पंचाने फलंदाजाला बाद दिले असेल फलंदाज बाद आहे असा निर्णय तिसरा पंच देतो. (३) चेंडूचा टप्पा यष्ट्यांच्या रेषेच्या आत पडला असेल किंवा टप्पा पडताना चेंडूचा अर्धा किंवा त्याहून अधिक भाग यष्ट्यांच्या रेषेच्या आत पडला असेल आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्ट्यांवर आदळत नसेल तर फलंदाज नाबाद आहे असा निर्णय तिसरा पंच देतो. (४) चेंडूचा टप्पा यष्ट्यांच्या रेषेच्या आत पडला असेल किंवा टप्पा पडताना चेंडूचा अर्धा किंवा त्याहून अधिक भाग यष्ट्यांच्या रेषेच्या आत पडला असेल आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्ट्यांवर आदळत असेल तर फलंदाज बाद आहे असा निर्णय तिसरा पंच देतो. आज एरॉन फिंच आणि स्टिव्हन स्मिथला पायचितच्या अपिलावर मैदानावरील पंचाने नाबाद ठरविले होते. फिंचविरूद्धचा निर्णय धोनीने रिव्ह्यू केल्यावर चेंडू यष्ट्यांवर जाऊन आदळत असल्याचे स्पष्ट दिसले. परंतु चेंडूचा टप्पा पडल्यावर चेंडूचा अर्ध्याहून अधिक भाग ऑफस्टंपच्या रेषेच्या बाहेर असल्याने वरील क्रमांक (२) प्रमाणे मैदानावरील पंचाने दिलेला नाबादचा निर्णय तिसर्‍या पंचाने कायम राखला. त्यामुळे भारताने आपला एकमेव रिव्ह्यू गमाविला. नंतर स्टिव्हन स्मिथविरूद्धचे पायचितचे अपिल पुन्हा एकदा मैदानावरील पंचांनी फेटाळले. परंतु भारताकडे रिव्ह्यू शिल्लक नसल्याने धोनीला रिव्ह्यू घेता आला नाही. तो चेंडू स्लोमोशन मध्ये बघितल्यावर यष्ट्यांवर जाऊन आदळत असल्याचे स्पष्ट दिसले. अशा तर्‍हेने पंचांचे दोन निर्णय भारताविरूद्ध गेले आणि त्याचा मोठा फटका भारताला बसला.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी गुरुवार, 03/26/2015 - 21:20
क्रिकइन्फोवरील धावते वर्णन 22.4 Jadeja to Finch, no run, huge lbw shout, given not out, but Dhoni has gone against his instinct to review this. Finch is sweeping, is beaten, and the umpire reckons he is outside the line of off. Dhoni thinks the same too, but Jadeja is persistent that he has hit him in the line. Dhoni asks him where he hit him on the pad. Jadeja says the inside part of the bat. Dhoni finally gives in. You can see this is just a risk. Dhoni is not convinced about it. Replays show umpire's call. Desperate review. Wrong review 30.4 MM Sharma to Finch, no run, that's close. Big shout for lbw. Short of a length, nips back in, hits just above the knee roll. It is hitting the stumps, but the impact seems outside off. Replays show umpire's call on impact and also that is only clipping the top of the stumps दोन्ही अपिले फिंचविरूद्ध होती. वर मी चुकून स्मिथचे नाव लिहिले. पहिल्या अपिलाच्या वेळी फिंच ४२ वर होता आणि दुसर्‍या अपिलाच्या वेळी तो ५६ वर होता. पंचांचे चुकीचे निर्णय भारताला महागात गेले.

वेल्लाभट गुरुवार, 03/26/2015 - 19:02
मुळातच क्रिकेट बघत नसल्याने विशेष कौतुक नव्हतेच. ऑफिसात स्क्रीनिंग अरेंज केल्याने मॅच बघणं झालं. धोनी; रहाणे वगळता थर्ड रेट बेजबाबदार बॅटिंग बघायला मिळाली आपल्याकडून. ऑस्ट्रेलियाची बॉलिंग सुपर्ब होती. थ्रूआउट. त्यांनीच जिंकायला हवं होतं अशात. ते जिंकले. गुड. आता जमिनीवर यावं आपल्या लोकांनी. कॅप्टन कूल काय; रन मशीन काय; #wontgiveitback काय... हे सगळे चोचले आपल्याइथेच होत असावेत.

बहुगुणी Fri, 03/27/2015 - 03:20
वार्ताहराच्या तीक्ष्ण प्रश्नाला धोनीने दिलेलं खुमासदार उत्तर या प्रश्नोत्तरांच्या अखेरच्या भागात (१४:४४ पासून शेवटपर्यंत) पाहण्यासारखं आहे!

सौंदाळा Fri, 03/27/2015 - 10:23
आपला संघ तसा नविन होता. आधीच्या वाटचालीमुळे या संघाकडुन फारशा अपेक्षा पण नव्हत्या. तरी अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली. अर्थात कालची मॅच खुपच स्वस्तात हरलो. थोडी टक्कर द्यायला पाहिजे होती. या विश्वचषकाचे आउट्कम म्ह्णजे आपली जलदगती गोलंदाजी आतापर्यंतची सर्वोत्तम आहे असे माझे मत. आता डंकन फ्लेचर गेल्यावर नविन कोचवर बरेच अवलंबुन असेल. संघात काही राजकारण / कंपुबाजी होणार नाही हि अपेक्षा. स्थिरावायला थोडा वेळ दिला तर संघ खुपच चांगला होईल. पुढील वाटचालीसाठी संघाला शुभेच्छा.

श्रीगुरुजी Mon, 03/30/2015 - 13:14
शेवटी ऑस्ट्रेलियाच जगज्जेते ठरले. त्यांचा भारताबरोबरचा उपांत्य फेरीचा सामना आणि न्यूझीलँडबरोबरचा अंतिम सामना अगदीच एकतर्फी झाला. दोन्ही संघांनी फारसा प्रतिकार केलाच नाही. न्यूझीलॅंड अंतिम फेरीतील सामन्याच्या व घरच्या आणि जगभरातील असंख्य चाहत्यांच्या दबावाचे बळी ठरले. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, नेतूत्व अशा सर्व क्षेत्रात ऑसीज उत्तम खेळले यात वादच नाही. २००७ मधील ९ व्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत यजमान ही स्पर्धा जिंकू शकले नव्हते (१९९६ मधील श्रीलंकेचा विजय हा तांत्रिकदृष्ट्या यजमानांचा विजय मानता येईल. परंतु अंतिम सामना श्रीलंकेत नसून पाकिस्तानमध्ये खेळला गेला होता आणि श्रीलंकेत यजमान या नात्याने फक्त ४ सामने आयोजित केले होते व त्यातले २ च प्रत्यक्षात खेळले गेले होते.). परंतु २०११ पासून ही परंपरा बदलून यजमान देश मायदेशात विजयी होताना दिसत आहेत. असो. संपली एकदाची विश्वचषक स्पर्धा. भारताची कामगिरी माझ्या दृष्टीने अपेक्षेपेक्षा चांगली झाली. गेले ४-५ महिने खूप क्रिकेट झाले. आता आयपीएल सुरू होईल. त्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही. ऑक्टोबर पासून क्रिकेट, राजकारण, निवडणुका इ. विषयांवर बरेच लेखन केले. आता जरा विश्रांती घेणार आहे. पुढील महिनाभर काहीही न लिहिता मिपा पासून दूर राहणार आहे. मधूनमधून मिपावर येईन, परंतु रोमात असेन. हा लेख वाचणार्‍यांचे व प्रतिसाद देणार्‍यांचे आभार!

In reply to by श्रीगुरुजी

श्रीरंग_जोशी Tue, 03/31/2015 - 09:17
विश्वचषकावर तुमचे तपशीलवार विश्लेषण खूप आवडले. क्रिकेटवरचे तुमचे सगळेच लिखाण आवडते. रोम सहलीसाठी शुभेच्छा. परतल्यावर प्रवासवर्णन आवर्जून लिहावे ही विनंती.

In reply to by श्रीरंग_जोशी

आजानुकर्ण Tue, 03/31/2015 - 18:45
राजकारण सोडून इतर विषयांवरचे श्रीगुरुजींचे लेखन आवडले. हल्ली क्रिकेटचे सामने पाहत नसलो तरी जुन्या सवयीमुळे विश्वचषकाची खबरबात घेण्यासाठी श्रीगुरुजींचे भावविश्व उपयुक्त वाटले.