Skip to main content

क्रिकेट विश्वचषक स्पर्धा - २०१५

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 09/02/2015 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेटच्या मर्यादित षटकांच्या एकदिवसीय सामन्यांची ११ वी विश्वचषक स्पर्धा शनिवार १४ फेब्रुवारी २०१५ या दिवशी सुरू होत आहे. १४ फेब्रुवारीला न्यूझीलँड वि. श्रीलंका हा स्पर्धेतील सर्वात पहिला सामना खेळला जाईल. १८-२१ मार्च या चार दिवशी ४ उपांत्यपूर्व फेरीचे सामने आहेत, उपांत्य फेरीचे २ सामने २१ मार्च व २४ मार्च रोजी आहेत व अंतिम सामना रविवार २९ मार्च या दिवशी खेळला जाईल. ही स्पर्धा न्यूझीलँड व ऑस्ट्रेलिया हे दोन देश संयुक्तपणे आयोजित करीत आहेत. यापूर्वी १९९२ मधील ५ वी विश्वचषक स्पर्धा याच देशांनी संयुक्तपणे आयोजित केली होती. पहिल्या १० स्पर्धांची संक्षिप्त माहिती अशी आहे. (१) वर्ष - १९७५, यजमान - इंग्लंड, विजेता - वेस्ट इंडीज, उपविजेता - ऑस्ट्रेलिया (२) वर्ष - १९७९, यजमान - इंग्लंड, विजेता - वेस्ट इंडीज, उपविजेता - इंग्लंड (३) वर्ष - १९८३, यजमान - इंग्लंड, विजेता - भारत, उपविजेता - वेस्ट इंडीज (४) वर्ष - १९८७, यजमान - भारत व पाकिस्तान, विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - इंग्लंड (५) वर्ष - १९९२, यजमान - ऑस्ट्रेलिया व न्यूझीलँड, विजेता - पाकिस्तान, उपविजेता - इंग्लंड (६) वर्ष - १९९६, यजमान - भारत, पाकिस्तान व श्रीलंका, विजेता - श्रीलंका, उपविजेता - ऑस्ट्रेलिया (७) वर्ष - १९९९, यजमान - इंग्लंड, विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - पाकिस्तान (८) वर्ष - २००३, यजमान - द. आफ्रिका, विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - भारत (९) वर्ष - २००७, यजमान - वेस्ट इंडीज, विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - श्रीलंका (१०) वर्ष - २०११, यजमान - भारत, बांगलादेश व श्रीलंका, विजेता - भारत, उपविजेता - श्रीलंका (११) वर्ष - २०१५, यजमान - ऑस्ट्रेलिया व न्यूझीलँड, विजेता - ?, उपविजेता - ? ________________________________________________________________________________ १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेचा विजेता भारतीय संघ बसलेले (डावीकडून) - दिलीप वेंगसरकर, सय्यद किरमाणी, कपिलदेव (कर्णधार), मोहिंदर अमरनाथ (उपकर्णधार), सुनील गावसकर, मदनलाल उभे (डावीकडून) - पी आर मानसिंग (संघ व्यवस्थापक), यशपाल शर्मा, कृष्णम्माचारी श्रीकांत, बलविंदरसिंग संधू, रवी शास्त्री, संदीप पाटील, रॉजर बिन्नी, कीर्ति आझाद, सुनील वॉल्सन ________________________________________________________________________________ २०११ च्या विश्वचषक स्पर्धेचा विजेता भारतीय संघ (डावीकडून) - झहीर खान, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), मुनाफ पटेल, गौतम गंभीर, श्रीशांत, सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, सुरेश रैना, पियूष चावला, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, युवराज सिंग, आशिष नेहरा, रविचंद्रन अश्विन, युसुफ पठाण ________________________________________________________________________________ पूर्वीच्या स्पर्धांवर नजर टाकली तर काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी दिसतात. - ऑस्ट्रेलिया सर्वाधिक म्हणजे ४ वेळा विजेते ठरले आहेत. त्याखालोखाल भारत व वेस्ट इंडीजने ही स्पर्धा प्रत्येकी २ वेळा जिंकली आहे. - ऑस्ट्रेलिया २ वेळा उपविजेता सुद्धा आहे. म्हणजे ऑस्ट्रेलिया १० पैकी ६ वेळा अंतिम फेरीत पोहोचलेले आहेत. - इंग्लंड ३ वेळा अंतिम फेरीत पोहोचून सुद्धा त्यांना विजेतेपद मिळविता आलेले नाही. श्रीलंका व भारत देखील ३ वेळा अंतिम फेरीत पोहोचले होते. श्रीलंकेने एकदा तर भारताने दोन वेळा अंतिम फेरीत विजय मिळविला आहे. - पहिल्या ३ स्पर्धात वेस्ट इंडीजचा जबरदस्त दबदबा होता. तीनही स्पर्धात ते अंतिम फेरीत पोहोचले व २ वेळा विजेते झाले. त्यानंतर त्यांची कामगिरी एकदम ढेपाळली व नंतरच्या ७ स्पर्धात ते एकदाच १९९६ मध्ये उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले होते. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या २०८ धावांचा पाठलाग करताना जेमतेम ५ धावांनी त्यांचा पराभव झाला होता. - न्यूझीलँड १० पैकी ६ स्पर्धात उपांत्य फेरीत पोहोचले होते. परंतु उपांत्य फेरीचा अडथळा त्यांना पार करता आलेला नाही. - १९९२ पासून स्पर्धेत सामील झालेल्या द. आफ्रिकेने खेळलेल्या ६ पैकी ३ स्पर्धात उपांत्य फेरी गाठली. परंतु त्यांना देखील उपांत्य फेरीचा अडथळा पार करता आलेला नाही. महत्त्वाच्या सामन्यात मोक्याच्या वेळी नेहमीच कच खाल्ल्यामुळे त्यांचा संघ चोकर्स म्हणून ओळखला जातो. - पाकिस्तानचा जावेद मियांदाद (१९७५-१९९६) व भारताचा सचिन तेंडुलकर (१९९२-२०११) हे दोघे प्रत्येकी ६ स्पर्धा खेळलेले आहेत. वेस्ट इंडीजचा शिवनरीने चंद्रपॉल, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग, श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन व केनयाचा थॉमस ओडोयो हे प्रत्येकी ५ स्पर्धा खेळलेले आहेत. - कोणत्याही स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्या करण्याचा मान कॅनडाकडे आहे. कॅनडाचा संघ दोन वेळा (एकदा श्रीलंकेविरूद्ध व १९७९ मध्ये इंग्लंडविरूद्ध) ४५ धावसंख्येवर बाद झाला होता. स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या भारताने केलेली आहे (२००७ मध्ये बर्म्युडाविरूद्ध ४१३ धावा). - भारत व पाकिस्तान एकमेकांविरूद्ध एकूण ५ सामने खेळलेले आहेत. सर्व सामने भारताने जिंकले आहेत. ४ सामन्यात प्रथम फलंदाजी करून व एका सामन्यात धावसंख्येचा पाठलाग करून भारताने विजय मिळविला होता. या सर्व ५ सामन्यात सचिन तेंडुलकर खेळला होता व त्यापैकी २ सामन्यात त्याला सामनावीराचा बहुमान मिळाला होता. या स्पर्धेतसुद्धा भारत वि. पाकिस्तान ही लढत होणार आहे व प्रथमच भारत सचिनशिवाय सामन्यात खेळेल. - मागील ५ स्पर्धांमध्ये अंतिम फेरीतील किमान १ संघ हा आशियातील संघ आहे. - २००७ मध्ये श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने द. आफ्रिकेविरूद्ध लागोपाठ ४ चेंडूवर ४ बळी मिळविले होते. _________________________________________________________________________________ २०१५ मधील विश्वचषक स्पर्धा एकूण १४ संघात खेळली जाईल. संघांची विभागणी २ गटात करण्यात आली आहे. 'अ' गट - न्यूझीलँड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, स्कॉटलँड, अफगाणिस्तान, बांगलादेश 'ब' गट - द. आफ्रिका, भारत, वेस्ट इंडीज, पाकिस्तान, झिंबाब्वे, आयर्लँड, संयुक्त अरब अमिराती _________________________________________________________________________________ स्पर्धेचे वेळापत्रक असे आहे.

प्राथमिक फेरीतील सामने

(१) शनिवार १४ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. श्रीलंका, स्थळ - ख्राईस्टचर्च (२) शनिवार १४ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड, स्थळ - मेलबोर्न (३) रनिवार १५ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. झिंबाब्वे, स्थळ - हॅमिल्टन (४) रनिवार १५ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), भारत वि. पाकिस्तान, स्थळ - अ‍ॅडलेड (५) सोमवार १६ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), आयर्लँड वि. वेस्ट इंडिज, स्थळ - नेल्सन (६) मंगळवार १७ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. स्कॉटलँड, स्थळ - ड्यूनेडीन (७) बुधवार १८ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), अफगाणिस्तान वि. बांगलादेश, स्थळ - कॅनबेरा (८) गुरूवार १९ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), यूएई वि. झिंबाब्वे, स्थळ - नेल्सन (९) शुक्रवार २० फेब्रुवारी, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. इंग्लंड, स्थळ - वेलिंग्टन (१०) शनिवार २१ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), पाकिस्तान वि. वेस्ट इंडीज, स्थळ - ख्राईस्टचर्च (११) शनिवार २१ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश, स्थळ - ब्रिस्बेन (१२) रविवार २२ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), अफगाणिस्तान वि. श्रीलंका, स्थळ - ड्यूनेडीन (१३) रविवार २२ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), भारत वि. द. आफ्रिका, स्थळ - मेलबोर्न (१४) सोमवार २३ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), इंग्लंड वि. स्कॉटलँड, स्थळ - ख्राईस्टचर्च (१५) मंगळवार २४ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), वेस्ट इंडीज वि. झिंबाब्वे, स्थळ - कॅनबेरा (१६) बुधवार २५ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), आयर्लँड वि. यूएई, स्थळ - ब्रिस्बेन (१७) गुरूवार २६ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), अफगाणिस्तान वि. स्कॉटलँड, स्थळ - ड्यूनेडीन (१८) गुरूवार २६ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), श्रीलंका वि. बांगलादेश, स्थळ - मेलबोर्न (१९) शुक्रवार २७ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. वेस्ट इंडीज, स्थळ - सिडने (२०) शनिवार २८ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ६:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. ऑस्ट्रेलिया, स्थळ - ऑकलँड (२१) शनिवार २८ फेब्रुवारी, वेळ - सकाळी १२:०० (भाप्रवे), भारत वि. यूएई, स्थळ - पर्थ (२२) रविवार ०१ मार्च, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), इंग्लंड वि. श्रीलंका, स्थळ - वेलिंग्टन (२३) रविवार ०१ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), पाकिस्तान वि. झिंबाब्वे, स्थळ - ब्रिस्बेन (२४) मंगळवार ०३ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. आयर्लँड, स्थळ - कॅनबेरा (२५) बुधवार ०४ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), पाकिस्तान वि. यूएई, स्थळ - नेपिअर (२६) बुधवार ०४ मार्च, वेळ - सकाळी १२:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान, स्थळ - पर्थ (२७) गूरूवार ०५ मार्च, वेळ - सकाळी ३:३० (भाप्रवे), बांगलादेश वि. स्कॉटलँड, स्थळ - नेल्सन (२८) शुक्रवार ०६ मार्च, वेळ - सकाळी १२:०० (भाप्रवे), भारत वि. वेस्ट इंडीज, स्थळ - पर्थ (२९) शनिवार ०७ मार्च, वेळ - पहाटे ६:३० (भाप्रवे), पाकिस्तान वि. द. आफ्रिका, स्थळ - ऑकलँड (३०) शनिवार ०७ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), आयर्लँड वि. झिंबाब्वे, स्थळ - होबार्ट (३१) रविवार ०८ मार्च, वेळ - सकाळी ०३:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. अफगाणिस्तान, स्थळ - नेपिअर (३२) रविवार ०८ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका, स्थळ - सिडने (३३) सोमवार ०९ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), इंग्लंड वि. बांगलादेश, स्थळ - अ‍ॅडलेड (३४) मंगळवार १० मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), भारत वि. आयर्लँड, स्थळ - हॅमिल्टन (३५) बुधवार ११ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), स्कॉटलँड वि. श्रीलंका, स्थळ - होबार्ट (३६) गूरूवार १२ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. यूएई, स्थळ - वेलिंग्टन (३७) शुक्रवार १३ मार्च, वेळ - सकाळी ०६:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. बांगलादेश, स्थळ - हॅमिल्टन (३८) शुक्रवार १३ मार्च, वेळ - पहाटे ९:३० (भाप्रवे), अफगानिस्तान वि. इंग्लंड, स्थळ - सिडने (३९) शनिवार १४ मार्च, वेळ - पहाटे ६:३० (भाप्रवे), भारत वि. झिंबाब्वे, स्थळ - ऑकलँड (४०) शनिवार १४ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. स्कॉटलँड, स्थळ - होबार्ट (४१) रविवार १५ मार्च, वेळ - सकाळी ०३:३० (भाप्रवे), यूएई वि. वेस्ट इंडीज, स्थळ - नेपिअर (४२) रविवार १५ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), आयर्लँड वि. पाकिस्तान, स्थळ - ओव्हल _______________________________________________________________________________

उपांत्यपूर्व फेरीतील सामने

(१) बुधवार १८ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), उपांत्यपूर्व फेरीतील पहिला सामना ('अ' गटातील प्रथम क्रमांकाचा संघ वि. 'ब' गटातील चौथ्या क्रमांकाचा संघ) , स्थळ - सिडने (२) गुरूवार १९ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), उपांत्यपूर्व फेरीतील दुसरा सामना ('अ' गटातील द्वितीय क्रमांकाचा संघ वि. 'ब' गटातील तृतीय क्रमांकाचा संघ) , स्थळ - मेलबोर्न (३) शुक्रवार २० मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), उपांत्यपूर्व फेरीतील तिसरा सामना ('अ' गटातील तृतीय क्रमांकाचा संघ वि. 'ब' गटातील द्वितीय क्रमांकाचा संघ) , स्थळ - अ‍ॅडलेड (४) शनिवार २१ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), उपांत्यपूर्व फेरीतील चौथा सामना ('अ' गटातील चौथ्या क्रमांकाचा संघ वि. 'ब' गटातील प्रथम क्रमांकाचा संघ) , स्थळ - वेलिंग्टन ________________________________________________________________________________

उपांत्य फेरीतील सामने

(१) मंगळवार २४ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), उपांत्य फेरीतील पहिला सामना, स्थळ - ऑकलँड (२) गुरूवार २६ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), उपांत्य फेरीतील दुसरा सामना, स्थळ - सिडने ________________________________________________________________________________

अंतिम सामना

रविवार २९ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), स्थळ - मेलबोर्न ________________________________________________________________________________ २०११ व २०१५ मधील विश्वचषक स्पर्धेतील नियमातील फरक खालीलप्रमाणे - (१) २०११ ची स्पर्धा - २०११ मध्ये सुरवातीला १० षटकांचा पॉवरप्ले असायचा. या १० षटकात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त २ क्षेत्ररक्षक ठेवता येत होते. नंतर षटक क्रमांक ११ ते ५० या दरम्यान ५ षटकांचे २ पॉवरप्ले असायचे व त्यात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ३ क्षेत्ररक्षक ठेवता येत होते. पॉवरप्ले नसलेल्या उर्वरीत ३० षटकात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ५ क्षेत्ररक्षक ठेवता येत होते. २०१५ ची स्पर्धा - २०१५ च्या स्पर्धेत सुरवातीला १० षटकांचा पॉवरप्ले असेल. या १० षटकात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त २ क्षेत्ररक्षक ठेवता येतील. नंतर षटक क्रमांक ११ ते ४० या दरम्यान ५ षटकांचा एकच पॉवरप्ले असेल व तो फलंदाजी करणार्‍या संघाला आपल्या सोयीने घेता येईल. ३६ व्या षटकाच्या आधी पॉवरप्ले घेतलाच नाही तर षटक क्रमांक ३६-४० ही पॉवरप्लेची षटके असतील व त्यात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ३ क्षेत्ररक्षक ठेवता येतील. पॉवरप्ले नसलेल्या उर्वरीत ३५ षटकात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ४ क्षेत्ररक्षक ठेवता येतील. ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ४ क्षेत्ररक्षक असल्याने फलंदाज वर्तुळाच्या बाहेर उंच फटके मारण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे अर्धवेळ गोलंदाज तसेच फिरकी गोलंदाज कमी वापरले जातील. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या तशाही फिरकी गोलंदाजांना फारशी साथ देत नाहीत. त्यामुळे फिरकी गोलंदाज एकंदरीतच कमी वापरले जातील. (२) २०११ ची स्पर्धा - एकच पांढरा चेंडू ५० षटके वापरला जात असे. जलदगती गोलंदाजांना रिव्हर्स स्विंगसाठी व फिरकी गोलंदाजांना चेंडू जुना झाल्यावर फायदा मिळे. जर खराब व्हायला लागला किंवा खूप ओला झाला तर ३४ षटकानंतर तितकाच झिजलेला वेगळा चेंडू वापरला जात असे. २०१५ ची स्पर्धा - - विकेटच्या दोन्ही बाजूने २ नवीन पांढरे चेंडू वापरले जातील. ५० व्या षटकापर्यंत कोणताही चेंडू जास्तीत जास्त २४-२५ षटके वापरला गेला असेल. जलदगती गोलंदाजांना याचा फायदा मिळेल. फिरकी गोलंदाजांना व जलदगती गोलंदाजांना रिव्हर्स स्विंगसाठी फारसा फायदा नाही. ________________________________________________________________________________

स्पर्धेतील संघ

(१) भारत महेंद्रसिंग धोनी*, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहीत शर्मा, मोहम्मद शमी भारताने २०११ मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. सर्वात धक्क्कादायक बातमी म्हण्जे त्या विजयी संघातील १५ खेळाडूंपैकी फक्त ४ च खेळाडू या संघात आहेत (धोनी, कोहली, रैना, अश्विन). इतर कोणत्याही देशाच्या संघात मागील स्पर्धेतील संघातील इतके कमी खेळाडू आताच्या संघात नसावेत. या चौघांपैकी रैना ९ पैकी फक्त ४ सामने खेळला होता तर अश्विन फक्त २ सामने खेळला होता. कोहली व धोनी सर्व ९ सामने खेळले होते. भारताची फलंदाजी बर्‍यापैकी दिसत असली तरी गोलंदाज अत्यंत निष्प्रभ आहेत. या संघात स्टुअर्ट बिन्नीची निवड सर्वात धक्कादायक आहे. त्याचे वडील रॉजर बिन्नी निवडसमितीत आहेत हा योगायोग नसावा. स्टुअर्ट बिन्नीऐवजी सध्या रणजी स्पर्धेत असलेला युवराज सिंग संघात हवा होता. परदेशात सातत्याने अपयशी ठरत असलेल्या शिखर धवनऐवजी सध्याच्या रणजी स्पर्धेत चांगली कामगिरी करत असलेला सेहवागला घेता आले असते किंवा ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत यशस्वी ठरलेल्या मुरली विजयला घेता आले असते. तसेच रायडूऐवजी रॉबिन उथप्पा हवा होता. रविंद्र जडेजा सध्या जायबंदी आहे. जायबंदी असल्याने त्याला ऑस्ट्रेलियातील कसोटी व तिरंगी स्पर्धेतील ४ पैकी ३ एकदिवसीय सामने खेळता आले नाहीत. जो एकमेव सामना तो खेळला त्यातही तो अपयशी ठरला. यावर्षीच्या रणजी स्पर्धेतील एकही सामना तो खेळलेला नाही. थोडक्यात गेले अनेक महिने तो एकही स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. अनेक महिने सरावाशिवाय असलेल्या या जायबंदी खेळाडूला कशाला घेतले? स्पर्धा सुरू होईपर्यंत तो तंदुरूस्त झाला नाही तर पंचाईत आहे. अश्विन, रोहीत शर्मा हे परदेशात फारसे यशस्वी ठरलेले नाहीत. त्यांच्याऐवजी इतर खेळाडूंचा विचार करायला हवा होता. भारत यावेळी उपांत्य फेरीत प्रवेश करू शकेल का याविषयी मी साशंक आहे. (२) ऑस्ट्रेलिया मायकेल क्लार्क*, जॉर्ज बेली, पॅट कमिन्स, झेव्हियर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॅडीन, जॉश हॅझलवूड, मिचेल जॉन्सन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन ऑस्ट्रेलियाचा संघ अत्यंत समतोल आहे. या संघात स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श, शेन वॉटसन, मिचेल जॉन्सन, मायकेल क्लार्क, जेम्स फॉकनर अशा अनेक अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ हे फलंदाजीत तुफान फॉर्मात आहेत, तर गोलंदाजीत मिचेल जॉन्सन आणि मिचेल स्टार्क फॉर्मात आहेत. तरीसुद्धा या संघात रायन हॅरिस व नेथन लायन ची उणीव जाणविते. ऑस्ट्रेलिया यावेळी उपांत्य फेरीत नक्की प्रवेश करेल असा माझा अंदाज आहे. (३) इंग्लंड ऑईन मॉर्गन*, मोईन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलन्स, ईयान बेल, रवी बोपारा, स्टुअर्ट ब्रॉड, जॉस बटलर, स्टिव्हन फिन, अ‍ॅलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, जो रूट, जेम्स टेलर, जेम्स ट्रेडवेल, ख्रिस वोक्स मॉर्गन, जो रूट, ईयान बेल आणि जॉस बटलर हे चांगले फलंदाज इंग्लंडच्या संघात आहेत. जेम्स अँडरसन, फिन आणि ब्रॉड हे चांगले गोलंदाज देखील आहेत. मोईन अली व रवी बोपारा हे उपयुक्त अष्टपैलू खेळाडू आहेत. इंग्लंड उपांत्य फेरीत प्रवेश करू शकेल का याविषयी मी साशंक आहे. (४) न्यूझीलँड ब्रँडन मॅकलम्*, कोरी अँडरसन, ट्रेंट बोल्ट, ग्रँट ईलियट, मार्टिन गप्टिल, टॉम लॅथम, मिचेल मॅकलेंघॅन, नेथन मॅकलम्, कायल मिल्स, अ‍ॅडम म्लाईन, ल्यूक राँकी, टीम साउदी, रॉस टेलर, डॅनियल व्हिटोरी, केन विल्यमसन किवीज सध्या तुफान फॉर्मात आहेत. ब्रँडन मॅकलम् ने २०१४ मध्ये २ त्रिशतके, १ द्विशतक, एकदा १९५ अशी तुफान वेगवान शतके केली आहेत. केन विल्यमसन देखील जबरदस्त फॉर्मात आहे. कोरी अँडरसन, टॉम लॅथम, ल्यूक राँकी हे देखील भरात आहेत. तुफान फटकेबाज रॉस टेलर हा माझा अत्यंत आवडता खेळाडू. परंतु तो अजून फारसा भरात नाही, परंतु घरच्या मैदानावर तो कधीही फॉर्मात येऊ शकतो. किवींची गोलंदाजी फलंदाजीच्या तुलनेत जरा दुर्बळ वाटते. बोल्ट बर्‍यापैकी फॉर्मात आहे. परंतु इतर गोलंदाज तितके चांगले वाटत नाहीत. तरीसुद्धा जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलँड यावेळी चमत्कार करून दाखवतील असं वाटतंय. न्यूझीलँड यावेळी उपांत्य फेरीत नक्की प्रवेश करेल असा माझा अंदाज आहे. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात यावेळी प्रथमच न्यूझीलँड अंतिम फेरीत दिसेल असाही माझा अंदाज आहे. (५) पाकिस्तान मिसबाह उल हक*, अहमद शेहझाद, एहसान आदिल, हॅरिस सोहेल, नासिर जमशेद, मोहम्मद इरफान, सर्फराजअहमद, शाहीद आफ्रिदी, सोहेब मकसूद, सोहेल खान, उमर अकमल, वहाब रियाझ, यासीर शाह, युनिस खान या संघात बर्‍याच वयस्कर मंडळींचा भरणा आहे. कर्णधार मिसबाह हा ४० वर्षांचा असून युनिस खान (३७ वर्षे), मोहम्मद हफीझ (३४ वर्षे), मोहम्मद इरफान (३२ वर्षे), शाहीद आफ्रिदी (३४ वर्षे), सोहेल खान (३० वर्षे) असे अनेक ३०+ वयाचे खेळाडू या संघात आहेत. पाकिस्तान हा अत्यंत बेभरवशाचा संघ आहे. हा संघ एखाद्या दिवशी तुफान कामगिरी करून लगेच दुसर्‍याच दिवशी अत्यंत खराब कामगिरी करून दाखवू शकतो. अत्यंत गुणी खेळाडू असूनही सातत्याचा अभाव व खेळाडूंना बेटिंग आणि मॅचफिक्सिंगचे लागलेले ग्रहण यामुळे या संघाबद्दल कोणताच अंदाज करता येत नाही. दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच या संघाकडे देखील जबरदस्त वेगवान गोलंदाज आहेत. शाहीद आफ्रिदीसारखा जबरदस्त फटकेबाज असलेला अष्टपैलू या संघात आहे. परंतु अत्यंत बेभरवशाची फलंदाजी असल्याने पाकिस्तान कधीही अपेक्षित कामगिरी करीत नाही. १९९२ मध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलँड मधील ५ वी विश्वचषक स्पर्धा पाकिस्तानने नशीबाची जबरदस्त साथ मिळाल्याने जिंकली. त्या स्पर्धेत प्रत्येक संघाला ८ सामने खेळायचे होते. पहिल्या ५ सामन्यांपैकी पाकिस्तान ४ सामन्यात पराभूत होता. इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची अवस्था सर्वबाद ८७ अशी दयनीय होती. पाकिस्तानच्या सुदैवाने मध्यंतरापासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने इंग्लंडला फलंदाजी करताच आली नाही व सामना अनिर्णित घोषित होऊन दोन्ही संघांना १-१ गुण मिळाला होता. पाकिस्तानने नंतर उर्वरीत तीनही सामने जिंकले. परंतु उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी इंग्लंडविरूद्ध नशीबाने मिळालेल्या १ गुणाचा फायदा झाला होता. आतापर्यंत झालेल्या १० विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान ५ वेळा एकमेकांशी लढले आहेत व सर्व सामने भारताने जिंकले आहेत. या सर्व ५ सामन्यात सचिन तेंडुलकरचा सहभाग होता. या विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानविरूद्ध १५ फेब्रुवारीला आहे व यावेळी सचिन नाही. या सामन्याची तिकिटे ऑनलाईन विक्री सुरू झाल्यावर काही मिनिटातच संपलेली आहेत. बघूया यावेळी काय होतंय ते. अत्यंत बेभरवशाचा संघ असल्याने यावेळी पाकिस्तान उपांत्य फेरीत प्रवेश करेल की नाही हे नक्की सांगता येणे अवघड आहे. (६) दक्षिण आफ्रिका एबी डी व्हिलिअर्स*, हशीम आमला, कायल अ‍ॅबॉट, फरहान बेहार्डिअन, क्विंटन डी कॉक, जीन पॉल ड्युमिनी, फाफ डू प्लेसि, इम्रान ताहीर, डेव्हिड मिलर, मॉर्नी मॉर्केल, वेन पार्नेल, एरॉन फांगिसो, व्हरनॉन फिलँडर, रिली रॉसॉ, डेल स्टेन अत्यंत समतोल आणि जबरदस्त संघ. याही संघात बर्‍याच वयस्कर मंडळींचा भरणा आहे. तब्बल ९ खेळाडू ३०+ वयाचे आहेत. अत्यंत जबरदस्त गोलंदाज व जबरदस्त फलंदाज हे या संघाचे वैशिष्ट्य. एबी डी व्हिलिअर्स, आमला, फाफ डू प्लेसि, रॉसॉ, डेव्हिड मिलर इ. फलंदाज तुफान फॉर्मात आहेत, तर मॉर्नी मॉर्केल, डेल स्टेन, फिलँडर हे फलंदाजांना धडकी भरविणारे वेगवान गोलंदाजही भरात आहेत. या संघाचे क्षेत्ररक्षण देखील अत्यंत उच्च दर्जाचे आहे. अत्यंत गुणी खेळाडू असूनही महत्त्वाच्या सामन्यात आयत्यावेळी कच खाऊन अनेकवेळा या संघाने सामने गमाविलेले आहेत. अनेकवेळा नशीबाने देखील या संघाला तडाखा दिलेला आहे. विश्वचषक स्पर्धेत १९९२ पासून ६ वेळा सहभागी होऊन त्यात ३ वेळा उपांत्य फेरी गाठूनही या संघाला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आलेले आहे. आतापर्यंत झालेल्या १० विश्वचषक स्पर्धेत भारत-द. आफ्रिका ३ वेळा एकमेकांशी लढले आहेत व सर्व सामने भारताने गमावले आहेत. या सर्व ३ सामन्यात सचिन तेंडुलकरचा सहभाग होता. या विश्वचषक स्पर्धेत भारताचा दुसरा सामना द. आफ्रिकेविरूद्ध आहे आणि यावेळी सचिन नाही. बघूया यावेळी काय होतंय ते. या स्पर्धेत हा संघ नक्कीच उपांत्य फेरीत प्रवेश करेल. बहुतेक प्रथमच अंतिम फेरीत सुद्धा असेल आणि कदाचित यावेळी प्रथमच विश्वचषकावर आपले नाव कोरेल असा अंदाज आहे. (७) श्रीलंका अँजेलो मॅथ्यूज*, लाहिरू थिरीमाने, दिनेश चंडीमल, तिलकरत्ने दिलशान, रंगाना हेराथ, माहेला जयवर्धने, दिमुथ करूणारत्ने, नुवान कुलसेकरा, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, जीवन मेंडीस, थिसारा परेरा, धम्मिका प्रसाद, कुमार संगक्कारा, सचित्र सेनानायके श्रीलंका संघाची कामगिरी लक्षात घेताना १९९२ पूर्वी व १९९२ नंतर (म्हणजे १९९६ पासून) असे दोन वेगळे कालखंड लक्षात घेतले पाहिजेत. १९९२ पर्यंत श्रीलंका हा एक अत्यंत दुर्बल व अतिसामान्य संघ म्हणून ओळखला जात होता. परंतु अचानक नशीबाची साथ मिळून १९९६ ची विश्वचषक स्पर्धा श्रीलंकेने जिंकली आणि त्या संघाने एकदम कात टाकली. तेव्हापासून हा संघ एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. १९९६ पासून झालेल्या ५ विश्वचषक स्पर्धांमध्ये ४ वेळा हा संघ उपांत्य फेरीत पोहोचला. त्यापैकी ३ वेळा अंतिम फेरीत पोहोचला व एकदा अंतिम फेरी जिंकली. आताच्या संघात एकाहून एक जबरदस्त फलंदाज आहेत. कुमार संगक्कारा व दिलशान जबरदस्त फॉर्मात आहेत. यांच्या जोडीला अत्यंत शैलीदार व सभ्य फलंदाज जयवर्धने सुद्धा आहे. जयवर्धने हा माझा अत्यंत आवडता फलंदाज आहे. संघात अँजेलो मॅथ्यूज, थिसारा परेरा व कुलसेकरा सारखे अष्टपैलू आहेत. मलिंगासारख्या अत्यंत भेदक यॉर्कर टाकून हमखास बळी घेणारा गोलंदाज आहे. हेराथ सारखा खडूस फिरकी गोलंदाजही आहे. परंतु या संघाची गोलंदाजी खूपच दुर्बल वाटते. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल असा माझा अंदाज आहे. (८) वेस्ट इंडीज जेसन होल्डर*, मर्लॉन सॅम्युअल्स, सुलीमान बेन, डॅरेन ब्राव्हो, जोनाथन कार्टर, शेल्डन कॉटरेल, ख्रिस गेल, दिनेश रामदीन, केमार रोच, आंद्रे रसेल, डॅरेन सॅमी, लेंडल सिमन्स, ड्वेन स्मिथ, जेरोमी टेलर वेस्ट इंडीज संघाची कामगिरी लक्षात घेताना १९८३ पूर्वी व १९८३ नंतर (म्हणजे १९८७ पासून) असे दोन वेगळे कालखंड लक्षात घेतले पाहिजेत. १९८३ पर्यंत विंडीज हा एक एकदिवसीय तसेच कसोटी सामन्यातील सर्वाधिक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जात होता. १९७५ व १९७९ अशा दोन्ही विश्वचषक स्पर्धा या संघाने जिंकल्या. १९८३ च्या स्पर्धेत देखील हा संघ अंतिम फेरीत आला होता. परंतु अचानक दुर्बल समजल्या जाणार्‍या भारताने तो सामना जिंकला आणि तेव्हापासूनच विंडीजची सर्व प्रकारच्या सामन्यात घसरण सुरू झाली. १९८७ पासून २०११ पर्यंत फक्त एकदाच १९९६ मध्ये हा संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. इतर सर्व स्पर्धात हा संघ उपांत्य फेरीपूर्वीच गारद झालेला आहे. आताच्या संघात खरं तर जबरदस्त खेळाडू आहेत. परंतु एक संघ म्हणून त्यांची एकत्रित कामगिरी होताना दिसत नाही. ख्रिस गेल, ड्वेन स्मिथ, डॅरेन सॅमी हे अत्यंत स्फोटक फलंदाज आहेत. आंद्रे रसेल, सॅम्युअल्स यासारखे तुफानी अष्टपैलू खेळाडू आहेत. डॅरेन ब्राव्हो, लेंडल सिमन्स हे उपयुक्त फलंदाज आहेत. परंतु गोलंदाजी अत्यंत कमकुवत आहेत. नियामक मंडळाशी झालेल्या मतभेदामुळे ड्वेन ब्राव्हो व किरॉन पोलार्ड या अत्यंत जबरदस्त अष्टपैलू खेळाडूंना संघात स्थान न देण्याचा धक्कादायक निर्णय अनेकांच्या पचनी पडलेला नाही. त्यात भर म्हणून जादूभरा फिरकी गोलंदाज सुनील नारायण त्याच्या शैलीविषयी शंका व्यक्त केली गेल्यामुळे स्वतःहूनच बाहेर पडला. या ३ खेळाडूंची अनुपस्थिती विंडीजला खूपच महागात जाणार आहे. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची फारशी शक्यता वाटत नाही.

लिंबूटिंबू संघ

(९) बांगलादेश मुश्रफ मोर्तझा*, अल-अमीन होसेन, अनामूल हक, अराफत सनी, महंमदुल्ला, मोमिनूल हक, मुशफिकर रहीम, नासिर होसेन, रुबेल होसेन, सब्बीर रहमान, शकीब अल हसन, सौम्य सरकार, तैजुल इस्लाम, तमीम इक्बाल, टस्किन अहमद बांगलादेश कडे काही चांगले खेळाडू आहेत. कर्णधार मुश्रफ मोर्तझा, शकीब अल हसन, तमीम इक्बाल, मुशफिकर रहीम, महंमदुल्ला या खेळाडूंवरच या संघाची मदार आहे. तसा हा लिंबूटिंबू संघ आहे, परंतु काहीवेळा या संघाने बलाढ्य संघांना धक्के दिले आहेत. २००७ मध्ये पहिल्याच सामन्यात बांगलादेशाकडून झालेला पराभव व त्यामुळे प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागलेला भारतीय संघ ही कटू आठवण भारतीय कधीच विसरणार नाहीत. तरीसुद्धा हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही. फारतर एखाद्या बलाढ्य संघाला अपसेट करू शकेल इतकेच. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. (१०) आयर्लँड विल्यम पोर्टरफील्ड*, अँडी बॅलबर्नी, पीटर चेस, अ‍ॅलन कुसॅक, जॉर्ज डॉकरेल, एड जॉईस, अँडी मॅकब्राईन, जॉन मूनी, केव्हिन ओ'ब्रायन, नील ओ'ब्रायन, मॅक्स सोरेनसेन, पॉल स्टर्लिंग, स्टुअर्ट थॉम्पसन, गॅरी विल्सन, क्रेग यंग, टीम मर्टाघ आय्रलँडने २००७ व २०११ या दोन्ही स्पर्धात काही बलाढ्य संघांना धक्के दिले आहेत. २००७ मध्ये पाकिस्तान व बांगलादेशाला पराभूत करून झिंबाब्वेबरोबर सामना बरोबरीत सोडवून त्यांनी धक्के दिले होते. २०११ मध्ये इंग्लंडच्या ३२८ धावांचा यशस्वी पाठलाग करताना केव्हिन ओ'ब्रायन ने केवळ ५० चेंडूत शतक झळकाविले होते. यांच्याकडे ब्रायन बंधू, पोर्टरफील्ड, कुसॅक, जॉन मूनी इ. चांगले खेळाडू आहेत. हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही. फारतर एखाद्या बलाढ्य संघाला अपसेट करू शकेल इतकेच. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. (११) झिंबाब्वे एल्टन चिगुंबुरा*, रेजिस चकाब्वा, टेंडाई चटारा, चामू चिभाभा, क्रेग एरविन, टफाड्झ्वा कामुंगोझी, हॅमिल्टन मसाकाड्झा, स्टुअर्ट मॅट्सिकेन्येरी, सॉलोमन माईर, तवांदा मुपारिवा, तिनाशी पन्यानगारा, सिकंदर रझा, ब्रेंडन टेलर, प्रॉस्पर उत्सेया, शॉन विल्यम्स झिंबाब्वेने कधी कधी बलाढ्य संघांना धक्के दिले आहेत. परंतु हा संघ लिंबूटिंबू संघच आहे. हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. (१२) अफगाणिस्तान मोहम्मद नबी*, अफसर झझाई, अफताब आलम, अश्गर स्टानिकझाई, दौलत झद्रान, गुलबदीन नैब, हमिद हसन, जावेद अहमदी, मिरवैस अश्रफ, नजीबुल्ला झद्रान, नासिर जमाल, नवरोझ मंगल, समीउल्ला शेनवारी, शापूर झद्रान, उस्मान घनी, हशमतुल्ला शैदी, इझातुल्ला दौलतझाई, शफीकुल्ला, शराफुद्दीन अश्रफ अफगाणिस्तानचा संघ प्रथमच विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे. मागील वर्षी ट-२० विश्वचषक स्पर्धेत या संघाने बांगलादेश संघाला हरवून धक्का दिला होता. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. (१३) स्कॉटलँड प्रेस्टन मॉमसेन*, कायल कोएटझर, रिची बेरिंगटन, फ्रेडी कोलमॅन, मॅथ्यू क्रॉस, जॉश डेव्ही, अ‍ॅलासडेर इव्हान्स, हॅमिश गार्डिनर, मजिद हक, मायकेल लीस्क, मॅट मॅकन, कॅलम मॅकलीऑड, सफयान शरीफ, रॉब टेलर, ईयान वॉर्डलॉ हा संघ लिंबूटिंबू संघ आहे. हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. (१४) युनायटेड अरब अमिराती मोहम्मद तकीर*, खुर्रम खान, अमजद अली, अमजद जावेद, अ‍ॅंड्री बेरेंगर, फहाद अल्हाश्मी, मंजुळा गुरूगे, कामरान शहजाद, कृष्णा चंद्रन, मोहम्मद नवीद, नासिर अझीझ, स्वप्निल पाटील, रोहन मुस्तफा, सकलेन हैदर, शैमन अन्वर हा संघ लिंबूटिंबू संघ आहे. हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही. या संघात ठाण्याचा मराठमोळा स्वप्निल पाटील हा यष्टीरक्षक आहे. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. ________________________________________________________________________________ लिंबूटिंबू संघांकडून फारसे अपसेट्स होतील असे वाटत नाही. विश्वचषक स्पर्धेच्या आजपर्यंतच्या इतिहासात आजतगायत अंदाजे ३२५ हून अधिक सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी फक्त १४ सामन्यात (म्हणजे फक्त ४ टक्के सामन्यात) अनपेक्षित निकाल लागलेला आहे. खालील यादीवरून हे लक्षात येईल. (१) १९७९ - भारत वि. श्रीलंका (श्रीलंका विजयी) (२) १९८३ - ऑस्ट्रेलिया वि. झिंबाब्वे (झिंबाब्वे विजयी) (३) १९९६ - वेस्ट इंडीज वि. केनया (केनया विजयी) (४) १९९९ - भारत वि. झिंबाब्वे (झिंबाब्वे विजयी) (५) १९९९ - बांगलादेश वि. पाकिस्तान (बांगलादेश विजयी. हा सामना फिक्स केलेला होता असा दाट संशय आहे.) (६) २००३ - केनया वि. झिंबाब्वे (केनया विजयी) (७) २००३ - केनया वि. श्रीलंका (केनया विजयी) (८) २००७ - भारत वि. बांगलादेश (बांगलादेश विजयी) (९) २००७ - पाकिस्तान वि. आयर्लँड (आयर्लँड विजयी) (१०) २००७ - द. आफ्रिका वि. बांगलादेश (बांगलादेश विजयी) (११) २००७ - झिंबाब्वे वि. आयर्लँड (सामना बरोबरीत) (१२) २००७ - बांगलादेश वि. आयर्लँड (आयर्लँड विजयी) (१३) २०११ - इंग्लंड वि. आयर्लँड (आयर्लँड विजयी) (१४) २०११ - बांगलादेश वि. इंग्लंड (बांगलादेश विजयी) २००७ मध्ये सर्वाधिक धक्कादायक निकाल लागले होते. आतापर्यंत बांगलादेश, केनया, आयर्लँड व झिंबाब्वे यांनीच सर्वाधिक अपसेट्स केलेले दिसताहेत. एकंदरीत २०१५ मध्ये लिंबूटिंबू संघ एखाददुसरा अपसेट करू शकतील. परंतु त्या निकालाने फार फरक पडेल असे वाटत नाही. ________________________________________________________________________________

माझे अंदाज

१९८७ पासून भारताची कामगिरी एकाआड एक स्पर्धेत चांगली होत आहे. भारताने १९८७ मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला, १९९२ मध्ये भारताला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले. भारताने नंतर १९९६ मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला, पण १९९९ मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले. २००३ मध्ये भारत चक्क अंतिम फेरीत पोहोचला, पण २००७ मध्ये भारतावर प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळण्याची नामुष्की आली. त्यापाठोपाठ २०११ मध्ये भारत चक्क विजेता बनला. हाच क्रम सुरू राहिला तर भारताला २०१५ मधील विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची आशा नाही. याच्या बरोबर उलटा क्रम दक्षिण आफ्रिकेचा आहे. दक्षिण आफ्रिकेने १९९२, १९९९ व २००७ च्या स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली, तर १९९६, २००३ व २०११ मध्ये ते उपांत्य फेरीपूर्वीच गारद झाले. या इतिहासावरून असं वाटतंय की २०१५ मध्ये हा संघ नक्की उपांत्य फेरीत पोहोचणार. यातला योगायोगाचा भाग सोडला तरी भारताची गेल्या काही काळातील कामगिरी पाहिली तर या स्पर्धेत भारत उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्याची शक्यता धूसर दिसतेय. २०११ च्या तुलनेत भारताचा संघ खूपच दुर्बल वाटतो. २०११ च्या संघातील तब्बल ११ खेळाडू या संघात नाहीत. त्यांच्या जागी जे आले आहेत ते तितके चांगले नाहीत. शिखर धवन, जडेजा, रायडू, अक्षर पटेल, स्टुअर्ट बिन्नी, अश्विन इ. खेळाडूंच्या कामगिरीबद्दलच शंका आहे. त्यांच्याऐवजी मुरली विजय, रॉबिन उथप्पा, सेहवाग, युवराज सिंग इ. खेळाडू हवे होते. मुरली विजय इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर चांगला खेळल होता. रॉबिन उथप्पा, सेहवाग, युवराज हे स्थानिक स्पर्धेत चांगली कामगिरी करीत आहेत. अक्षर पटेल, धवन, अश्विन हे तिघेही ऑस्ट्रेलियात संपूर्ण अपयशी ठरले आहेत. रायडूलाही फारसा प्रभाव पाङता आलेला नाही. जडेजा जवळपास साडेतीन महिने दुखापतीमुळे क्रिकेटपासून लांब होता. तो नंतर एकच सामना खेळला व त्यातही अपयशी ठरला. स्टुअर्ट बिन्नी २ सामने खेळला. त्यातल्या एक सामन्यात त्याने बर्‍यापैकी फलंदाजी केली व दुसर्‍या सामन्यात बर्‍यापैकी गोलंदाजी केली. परंतु त्याच्याऐवजी युवराज सिंग कधीही जास्त योग्य ठरला असता. भारतीय गोलंदाजांबद्दल काहीच बोलण्यासारखं नाही. स्वतः धोनी निवृत्तीच्या मूडमध्ये असल्याने त्याच्या देह्बोलीतून उत्साहाचा पूर्ण अभाव जाणवितो. हे सर्व लक्षात घेता भारत या स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचणार नाही असे मला वाटते. माझ्या अंदाजानुसार द. आफ्रिका, न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया व श्रीलंका हे चार संघ उपांत्य फेरीत असतील. अंतिम लढत न्यूझीलॅंड व द. आफ्रिकेत होऊन द. आफ्रिका विजेता होईल. न्यूझीलँड, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया 'अ' गटात व द. आफ्रिका 'ब' गटात असल्याने उपांत्यपूर्व फेरीतच द. आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया किंवा द. आफ्रिका वि. न्यूझीलॅंड किंवा द. आफ्रिका वि. श्रीलंका असा सामना होण्याची ७५ टक्के शक्यता आहे. तसे झाले तर उपांत्य फेरीतील संभाव्य ४ संघातील एक संघ उपांत्यपूर्व फेरीतच पराभूत होईल व त्यामुळे इंग्लंड, भारत किंवा पाकिस्तानला उपांत्य फेरीत जायची संधी मिळू शकेल. कदाचित त्यामुळे अंतिम फेरीत अंदाजापेक्षा एखादा वेगळाच संघ असेल. ________________________________________________________________________________ विनंती - वरील लेखातील तपशिलात काही चुका असल्यास निदर्शनास आणून द्याव्यात.

वाचने 98819
प्रतिक्रिया 361

प्रतिक्रिया

विंडीजने लागोपाठ तिसर्‍या सामन्यात ३००+ केल्या. गेल प्रदीर्घ कालखंडानंतर मोठा डाव खेळून गेला. एकदिवसीय सामन्यातले हे ५ वे द्विशतक आणि भारताव्यतिरिक्त इतर देशाच्या खेळाडूने केलेले हे पहिलेच द्विशतक. वेस्ट इंडीजची निव्वळ धावगती खूपच सुधारली आहे. आता पाकड्यांची पंचाईत झाली आहे. पाकडे द. आफ्रिकेविरूद्ध हरणार हे निश्चित. त्यांनी लिंबूटिंबू संघांबरोबरचे तीनही सामने जिंकले तरच त्यांचे ६ गुण होतील. विंडीजचेही ६ गुण होणार (पाकडे आणि झिंबाब्वे विरूद्ध जिंकलेले आहेत आणि यूएईविरूद्ध आरामात जिंकतील). आयर्लँडचेही ६ गुण होतील (विंडीजला हरवले आहे आणि यूएई व झिंबाब्वेविरूद्ध जिंकतील). पाकड्यांची निव्वळ धावगती अत्यंत कमी आहे. त्यामुळे विंडीज व आयर्लँड पुढील फेरीत जातील. अर्थात आयर्लँड झिंबाब्वेविरूद्ध हरावे अशीच पाकडे प्रार्थना करत असतील.

यूएईच्या २७८/९ धावसंख्येचा पाठलाग करताना आयर्लँड २२ षटकात २ बाद ८८. उर्वरीत २९ षटकात प्रतिषटक ६.८२ धावांच्या गतीने तब्बल १९७ धावा पाहिजेत. आज यूएई विश्वचषकातला आपला पहिला विजय नोंदविणार असं दिसायला लागलंय. आज आयर्लँड हरले तर पाकडे सुटकेचा निश्वास टाकतील.

या स्पर्धेतील सर्वाधिक आणि आतापर्यंतचा एकमेव चुरशीचा सामना आज झाला. आयर्लँडने फक्त २ गडी व ४ चेंडू राखून सामना जिंकला. परंतु यूएई संघाने दिलेली झुंज कौतुकास्पद होती. पाकिस्तानला आता यूएई, झिंबाव्बे आणि आयर्लँड विरूद्धचे सामने जिंकावे लागतील आणि त्याचवेळी झिंबाब्वे आयर्लँडविरूद्ध जिंकावे अशी प्रार्थना करावी लागेल. अन्यथा पाकडे बाद फेरीत जाणार नाहीत. उद्या २ सामने आहेत. (१७) गुरूवार २६ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), अफगाणिस्तान वि. स्कॉटलँड, स्थळ - ड्यूनेडीन (१८) गुरूवार २६ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), श्रीलंका वि. बांगलादेश, स्थळ - मेलबोर्न श्रीलंका बांगलादेशविरूद्ध सहज जिंकेल. परंतु अफगाणिस्तान विरूद्ध स्कॉटलँड हा सामना चुरशीचा होईल. बहुतेक स्कॉटलँड जिंकेल असं वाटतंय.

In reply to by श्रीगुरुजी

पाकिस्तानने मोठ्या धावगतीने यूएई, झिंबाव्बे आणि आयर्लँड विरूद्धचे सामने जिंकले तर ते जाउ शकतील

In reply to by कपिलमुनी

बरोबर आहे. पण पाकडे पहिले दोन सामने ७६ आणि १४० अशा मोठ्या फरकाने हरले आहेत. वेस्ट इंडीजने तीनही सामन्यात ३००+ धावा केल्यात तर आयर्लंडने दोन सामने जिंकताना मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केलेला आहे. त्यामुळे या दोन्ही संघांची निव्वळ धावगती पाकड्यांच्या तुलनेत खूपच जास्त आहे (विंडीज +१.३३९ आणि आयर्लँड +०.३३८, पाकडे - २.२६). पाकड्यांना आपली निव्वळ धावगती उंचाविण्यासाठी उर्वरीत ४ पैकी ३ सामने खूप मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. ४ था सामना सुद्धा जिंकला तर धावगतीची समस्याच नाही. परंतु ४ था सामना हरला तरी तो खूप थोड्या फरकाने हरावा लागेल. आयर्लँड किंवा विंडीज २ सामन्यांपेक्षा जास्त सामने जिंकू शकले नाहीत तरी सुद्धा पाकड्यांना संधी मिळेल. सद्यपरिस्थिती बघता पाकड्यांची परिस्थिती अवघड झालेली आहे.

१७. अफगाणिस्तान वि. स्कॉटलँड - स्कॉटलँड (१८) श्रीलंका वि. बांगलादेश - श्रीलंका

अफगाणिस्तान वि. स्कॉटलँड सामना भलताच रंगला होता. ७ बाद ९७ वरून अफगाणिस्तानने चुरशीची झुंज देऊन सामना जिंकला. स्कॉटलँडने शेवटच्या ३-४ षटकात केलेला स्वैर मारा त्यांना चांगलाच भोवला. सामना अत्यंत चुरशीचा होऊन स्कॉटलॅंड जिंकेल असे वाटले होते. जेमतेम २११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा डाव १७ षटकांत २ बाद ७८ इतक्या मजबूत स्थितीतून एकदम ७ बाद ९७ असा कोसळल्यावर स्कॉटलँडचा विजय निश्चित वाटायला लागला होता. परंतु अफगाणिस्तानच्या तळाच्या फलंदाजांनी धीर न सोडता सामना जिंकून दिला. दुसरीकडे श्रीलंकेच्या फलंदाजांनी बांगलाच्या गोलदाजांची कत्तल केली आहे. ५० षटकांत १ बाद ३३२ असा धावांचा डोंगर उभा आहे. श्रीलंकेच्या विजयाची फक्त औपचारिकता शिल्लक आहे. बांगला किती धावांनी हरतात एवढीच फक्त उत्सुकता आहे. उद्याचा सामना - (१९) शुक्रवार २७ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. वेस्ट इंडीज, स्थळ - सिडने उद्या द. आफ्रिका अगदी सहज जिंकेल. वेस्ट इंडीजचे उर्वरीत सामने अवघड आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

काय म्हंता अफगाणिस्तान जिंकले!!!! त्यांचे सात गडी बाद झाले तेव्हाच बोरींग म्हणून मॅच बघणे बंद केले होते...चुकलंच की राव!!

ए बी च्या ६६ बॉलमध्ये १६२ धावा....भारतासारख्या टीम कडून हार खाल्लेले स्पर्धा फेवरीटस पेटलेले दिस्तायत आता.

In reply to by असंका

भारतावरचा राग आफ्रिकन्सनी विंडीजवर काढला. विंडीज १२ षटकांत ५ बाद ५३. खूप मोठ्या फरकाने विंडीज हरणार असं वाटायला लागलंय. आधीच्या दोन सामन्यात जे कमावलं ते विंडीज एकाच सामन्यात गमावणार आणि निव्वळ धावगती खूप कमी होणार. पाकड्यांच्या आशा प्रज्वलित होणार.

उद्याचे सामने - (२०) शनिवार २८ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ६:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. ऑस्ट्रेलिया, स्थळ - ऑकलँड (२१) शनिवार २८ फेब्रुवारी, वेळ - सकाळी १२:०० (भाप्रवे), भारत वि. यूएई, स्थळ - पर्थ भारत यूएई विरूद्ध अगदी सहज जिंकेल. किवीज वि. ऑसीज सामना रंगतदार होईल. दोन्ही संघ तगडे आहेत. परंतु सामना न्यूझीलँडमध्ये होत आहे. किवीजचे पारडे जड वाटते. न्यूझीलँड थोड्या फरकाने जिंकेल असा अंदाज आहे.

या विश्वचषकात आयर्लंड ने उपान्त्यपूर्व/ उपांत्य फेरीत धडक मारावी अशी माझी अपेक्षा आहे.

अपेक्षे प्रमाणॅ अफ्रिका जबरदस्त पणे जिंकली. येथे लॉग इन नव्हतो. अंदाज न्युजिलंड वि ऑस्ट्रेलिया = न्युजिलंड विल्यमसन आणि बोल्ट चांगले खेळतील भारत वि. यु.ए.ई = भारत रोहित शर्मा या मॅच मध्ये मॅन ऑफ थे मॅच असेन असे वाटते

अबी डिलिव्हर्स ने जी खेळी विंडीज विरूद केली त्यातील काही फटके केवळ उपरवालाच मारू शकतो. आज अफ्रिदी, जयसूर्या, विव रिचर्डस , ख्रिस केर्स्न सहवाग सर्वाना त्याने पुसून टाकले.

नजर हटी दुर्घटना घटी.... आता बोरिंग आहे म्हणून बघणं बंद केलं आणि तेव्ढ्यात सगळी अ‍ॅक्श्न आटोपली सुद्धा. तेही दोन वेळा. :-(

अपेक्षेप्रमाणे न्यूझीलँड वि. ऑस्ट्रेलिया सामना अत्यंत चुरशीचा झाला आणि अपेक्षेप्रमाणेच न्यूझीलॅंड विजयी झाले. ऑस्ट्रेलियाच्या १५१ धावांना न्यूझीलॅंडच्या फलंदाजांनी गांभिर्याने न घेता आपण सहज जिंकू या भ्रमात राहून बेजबाबदार खेळ करून सामना जवळपास घालविला होता. शेवटी नशिबानेच जिंकले. दुसरीकडे यूएई विरूद्धचा सामना अपेक्षेप्रमाणे एकतर्फी होऊन भारत अगदी सहज जिंकण्याच्या मार्गावर आहे. उद्याचे सामने - (२२) रविवार ०१ मार्च, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), इंग्लंड वि. श्रीलंका, स्थळ - वेलिंग्टन (२३) रविवार ०१ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), पाकिस्तान वि. झिंबाब्वे, स्थळ - ब्रिस्बेन इंग्लंड व पाकिस्तान जिंकतील असा अंदाज आहे.

In reply to by श्रीगुरुजी

तब्बल ३१० धावा करूनसुद्धा इंग्लंडला सामना जिंकता आला नाही. थिरीमानेचा शून्यावर स्लिपमध्ये सोडलेला झेल भयंकर महाग पडला. आता इंग्लंडची परिस्थिती अवघड आहे. तीनही तगड्या संघाविरूद्ध ते हरले. उरलेल्या ३ लिंबूटिंबू संघापैकी स्कॉटलँड विरूद्ध ते जिंकलेले आहेत. ४ सामन्यात त्यांचे फक्त २ गुण आहेत. त्यांचे उरलेले सामने बांगला व अफगाणिस्तान विरूद्ध आहेत. बांगलाचे ३ सामन्यात ३ गुण आहेत. बांगलाचे उर्वरीत सामने न्यूझीलँड, इंग्लंड व स्कॉटलँड विरूद्ध आहेत. इंग्लंड अफगाणिस्तानला व बांगला स्कॉटलॅंडला नक्की हरवेल. बांगला न्यूझीलँडविरूद्ध नक्की हरेल. त्यामुळे ५ सामन्यात बांगलाचे ५ गुण असतील तर इंग्लंडचे ४ गुण असतील. इंग्लंड व बांगलाचा शेवटचा एकमेकांविरूद्धचा सामना 'अ' गटातील ४ था संघ ठरवेल. तो सामना बांगलाने जिंकला किंवा बरोबरीत सुटला किंवा पावसामुळे अनिर्णित राहिला तरी बांगलाचे ६ किंवा ७ गुण होतील व इंग्लंडचे ४ किंवा ५ गुण होऊन बांगला बाद फेरीत जाईल. तो सामना इंग्लंडने जिंकला तर इंग्लंडचे ६ व बांगलाचे ५ गुण होऊन इंग्लंड बाद फेरीत जाईल. जर बांगला-न्यू झीलँड, बांगला-स्कॉटलँड आणि इंग्लंड-अफगाणिस्तान या ३ सामन्यापैकी एकतरी सामन्याचा अनपेक्षित निकाल लागला तर चित्र एकदम वेगळे होईल. त्यामुळे सध्या तरी 'अ' गटातून न्यूझीलँड प्रथम क्रमांकाने, ऑस्ट्रेलिया/श्रीलंका दुसर्‍या/तिसर्‍या किंवा तिसर्‍या/दुसर्‍या क्रमांकाने आणि इंग्लंड वि. बांगलादेश सामन्यातील विजेता ४ थ्या क्रमांकाने बाद फेरीत येईल. दुसरीकडे 'ब' गटातही अनिश्चितता आहे. भारत व द. आफ्रिका पहिल्या व दुसर्‍या क्रमांकावर असतील हे निश्चित. वेस्ट इंडीजचे ४ सामन्यात ४ गुण असून त्यांचे उर्वरीत सामने भारत व यूएई बरोबर आहेत. ते भारताविरूद्ध नक्की हरतील व यूएई विरूद्ध नक्की जिंकतील व शेवटी त्यांचे ६ गुण असतील. त्यांची निव्वळ धावगती अजूनही पाकड्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे. त्यामुळे विंडीज बहुतेक तिसर्‍या क्रमांकाने बाद फेरीत नक्कीच येतील. पाकड्यांचे ३ सामन्यात २ गुण असून त्यांचे उर्वरीत सामने द. आफ्रिका, आयर्लँड व यूएई विरूद्ध आहेत. आफ्रिकेविरूद्ध ते नक्की हरतील व यूएईविरूद्ध नक्की जिंकतील. त्यामुळे त्यांचे ५ सामन्यात ४ गुण असतील. आयर्लँडचे २ सामन्यात ४ गुण असून उर्वरीत ४ सामन्यांपैकी ते भारत व आफ्रिकेविरूद्ध ते नक्की हरतील. झिंबाब्वेविरूद्ध ते बहुतेक जिंकतील. त्यामुळे त्यांचे ५ सामन्यात ६ गुण होतील. पाकडे वि. आयर्लँड या सामन्यातील विजेता हा 'ब' गटातून बाद फेरीत जाणारा ४ था संघ असेल. अर्थात काही उर्वरीत सामन्यांचा अनपेक्षित निकाल लागला तर 'ब' गटातील उर्वरीत दोन संघ वेगळे असतील. झिंबाब्वे व यूएई बाद फेरीत येण्याची जवळपास काहीच शक्यता नाही. त्यामुळे विंडीज, आयर्लँड व पाकडे यापैकी २ संघ बाद फेरीत येतील. भारत 'ब' गटात पहिला संघ असेल. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत भारताची गाठ 'अ' गटातल्या ४ थ्या संघाशी पडेल (इंग्लंड किंवा बांगलादेश). बांगलादेश 'अ' गटातून बाद फेरीत आल्यास भारताची उपांत्य फेरी नक्की. अर्थात इंग्लंड लागोपाठच्या पराभवाने इतके खचलेले आहेत की त्यांच्याविरूद्ध सुद्धा भारत नक्कीच जिंकेल.

In reply to by श्रीगुरुजी

विश्लेष बरोबर, तरी एक अंदाज चुकीचा वाटत आहे.
पाकडे वि. आयर्लँड या सामन्यातील विजेता हा 'ब' गटातून बाद फेरीत जाणारा ४ था संघ असेल. अर्थात काही उर्वरीत सामन्यांचा अनपेक्षित निकाल लागला तर 'ब' गटातील उर्वरीत दोन संघ वेगळे असतील. झिंबाब्वे व यूएई बाद फेरीत येण्याची जवळपास काहीच शक्यता नाही. त्यामुळे विंडीज, आयर्लँड व पाकडे यापैकी २ संघ बाद फेरीत येतील.
जरी पाकिस्तान ने आयर्लंड ला हरवले ह्या सामन्यात तरी त्यांचे जास्तीत जास्त ६ गुण होतील(द. अफ्रिकेविरुद्ध हरतील हे गृहित धरुन) पण आयर्लंड जर आधीच झिंबाब्वे बरोबर जिंकलेला असेन तर निव्वळ धावगतीवरती सुद्धा हा संघ बाद फेरीत जाईल. अश्या परस्थीती मध्ये पाक - आयर्लंड आणि वेस्ट इंडिज यांचे ६ गुण असतील. त्यामुळे रिझल्ट पाक - आयर्लंड या मॅच वर तेंव्हा डिपेंड असेन जेंव्हा आयर्लंड जिम्ब्वावे कडुन हरलेले असतील. उलट आता असे वाटत आहे. आयर्लंड हा जिंब्वावे किंवा पाकड्यांना हारवुन ८ गुणांसह तिसर्या नंबरला जातात का काय ? आयर्लंड हा बाद फेरीत जावा असे वाटत आहे. ---------------------------- बाकी सुरवातीला सांगितल्या प्रमाणे न्युजिलंड आणि आफ्रिका यांच्यात अंतिम सामना होइल असे वाटत होते, परंतु यावेळेस ही अफ्रिकेला वर्ल्ड कप जिंकायचे असेन तर खडतर प्रवास असेन असे वाटते. या तीन्हीतला नक्की फायनला कुठले दोन संघ जातील हे सांगणॅ कठीण होउन बसल्याने फायनल मध्ये ऑस्ट्रेलिया निदान पोहचेल असे वाटते आहे. कारण (न्युजिलंड आणि अफ्रिका कदाचीत सेमी फायनल ला समोरा समोर येतील)

In reply to by नया है वह

जाहिरात जबरदस्त UAE vs India या सामन्यापेक्षा पुढे जाहिरातीमधे काय याची जास्त उत्सुकत

आत्तापर्यंतच्या सर्व सामन्यांत आजची ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझिलंड मॅच जबरदस्त झाली. आपल्या टीमची कुठलीही लढत न्यूझिलंड बरोबर त्यांच्या होमपीचवर व्हायला नको.

In reply to by तिमा

अखेरच्या क्षणापर्यंत कुठेही झुकू शकली असती अशी अप्रतिम मॅच! व्यत्यासः फायनलला न्यूझीलंड खेळले तर..आणि ती MCG वरची मॅच ऑस्ट्रेलियाच नव्हे तर इतर कुठल्याही टीमविरुद्ध असली तरी, ऑस्ट्रेलियन प्रेक्षक न्यूझीलंडच्या खेळाडूंना हतोत्साही करणार हेही नक्की!

आजच्या मॅच सोप्प्या आहेत असे वाटत असेन तरी काहीच रोख ठोक प्रेडिक्ट करता येणार नाही असे वाटते, तरीही २२. इंग्लंड वि. श्रीलंका, = इंग्लंड इंग्लंड बॉलिंग जबरदस्त झाल्याने जिंकतील असे वाटते, Anderson विकेट घेईन जास्त असे वाटते. श्रीलंकेला पुन्हा एकदा महेला जयवर्धनेचाच आधार सापडेन असे वाटते. २३. पाकिस्तान वि. झिंबाब्वे = पाकिस्तान मनातुन तर वाटत आहे झिंबाब्वे बॅटींह चांगली करेल पाकिस्तान पेक्षा. उमर अकमल मुळॅ पाकडे वाचतील असे वाटते. चतारा च्या बॉलिंग मुळे झिंबाब्वे ला थोड्या आशा वाढतील. उमर अकमल मॅन ऑफ द मॅच असु शकतो

In reply to by गणेशा

मॅच चांगली चालु आहे, ज्यो रुट वरती १०० पॉइंट लावले होते मिळाले. मस्त. आता विकेट पडल्या पाहिजेत इंग्लंड ला, अपेक्षित बॉलिंग इफेक्ट जानवला नाही

In reply to by गणेशा

हारला इंग्लंड. इंग्लंड मला वाटते बाहेर जाईन स्पर्धेतुन.. विनाकारण अपेक्षा ठेवल्या गेल्या या संघाकडुन असे वाटते आहे

इंग्लंडला अजूनही संधी आहे. पुढले सामने बांगलादेश आणि स्कॉटलंडशी आहेत. जर दोन्ही जिंकले तर ते पुढे जाण्याची शक्यता आहे. कारण ते नाही तर मग बांगलादेश. त्यांचे तीन सामने बाकी आहेत. इंग्लंड , स्कॉटलंड आणि न्यूझीलंड. त्यापैकी ते स्कॉटलंडशी जिंकतील. न्यूझीलंड आणि इंग्लंडशी कठीण आहे. बांगलादेशचे नशीब म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध पावसामुळे एक गुण मिळाला. जिथे त्यांना भोपळा मिळाला असता. run rate वर आता सगळे अवलंबून आहे. इंग्लंड वि. बांगलादेश हा सामना निर्णायक ठरेल असे वाटते. दोघांनाही पेपर कठीण आहे.

In reply to by गणेशा

भारत आणि साउथ आफ्रिका हे सोडले तर बाकीच्याचे सांगणे कठीण आहे. सर्वांना समान संधी वाटते. १) वेस्ट इंडीज दोन सामने बाकी , भारत आणि युएइ, सध्याचा आपला form पाहता आपल्याशी हरतील आणि युएईशी जिंकतील असे वाटते. तरीही त्यांच्या खात्यात ६ गुण जमा होतात. ८ नाही , त्यामुळे पुन्हा run rate शी संबंध येतो. तरीही यांना चांगली संधी आहे असे वाटते. तिसर्या क्रमांकावर यायला हरकत नाही. २) झिम्बाब्वे पेपर कठीण आहे. राहिलेले सामने भारत आणि आयर्लंडशी आहेत. यातील एक जरी जिंकले तर त्यांना ४ गुण मिळतात. चुकून दोन्ही जिंकले तरी run rate चे गणित आहेच. यांच्यावर फुली मारायला हरकत नाही. ३) पाकिस्तान राहिलेले सामने युएई , साउथ आफ्रिका आणि आयर्लंडशी आहेत. युएईशी जिंकून ४ गुण जमा होतात. त्याच्यापुढील दोन्हीपैकी एकात तरी त्यांना जिंकावेच लागेल. एवढे करून ६ गुण जमा होतात. पुढे run rate नावाचा राक्षस उभा आहेच. आणि run rate च म्हणालात तर त्यांचा अतिशय वाईट म्हणजे -१.३७३ आहे. त्यामुळे सध्या जो काही खेळ करत आहेत ते पाहून मला यांचा काही भरवसा वाटत नाही. ४) आयर्लंड या संघाकडून मला खूप अपेक्षा आहेत. यांनी पहिले दोन्ही सामने जिंकून ४ गुण खिशात टाकले आहेत. त्यांचा run rate +०.३३८ आहे. पण पुढील सर्व सामने मोठ्या अथवा तुल्यबळ संघांशी आहेत. सा.आफ्रिका,झिम्बाब्वे,भारत आणि पाकिस्तान अश्यांचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. त्यापैकी झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध त्यांना संधी आहे. त्यांनी झिम्बाब्वे विरुद्ध विजय मिळवला तर त्यांचा उपान्त्यपूर्व फेरीतील विजय सुकर होतो. सध्याचा त्यांचा form पाहता त्यांना चांगले संधी आहे आणि ते या संधीचे सोने करतील असे वाटते. शेवटी आयर्लंड वि. झिम्बाब्वे आणि आयर्लंड वि. पाकिस्तान या दोन सामन्यांच्या निकालावर सर्व अवलंबून आहे.

In reply to by साधा मुलगा

बरोबर वाटते आहे, म्हणजे वेस्ट इंडिज आण आर्यलंड ला जास्त चान्स आहे. आणि तसेच व्हावे असे वाटते पण झिंब्वावे ने भारत आणि आर्यलंड ला जास्त फरकाने हरवले तर त्यांचा ही चान्स वाढत आहे. पाकड्यांचे मात्र अवघड वाटत आहे.

In reply to by साधा मुलगा

दोन्ही गृप निट अनालिसीस करुन पाहिले तुम्ही म्हणता तसे ए गृप मधुन अनुक्रमे १. न्युजिलंड २. ऑस्ट्रेलिया ३. श्री लंका ४ इंग्लंड आणि ब गृप मधुन अनुक्रमे १. इंडिया २. द. अफ्रिका ३. वेस्ट इंडिज ४. आर्यलंड असे ८ संघ पुढे जातील असे वाटते. त्यामुळे या गृहितकाला धरुन च पूढील मॅच कडे बघितल्यास मजा येइन. धन्यवाद.

In reply to by गणेशा

असे जर झाले, तर मात्र सेमी फायनल दणक्यात होणार. त्या अश्या असु शकतील न्युझिलंड विरुद्ध द. आफ्रिका ऑस्ट्रलिया विरुद्द भारत ( किंवा इग्लंड २० % चांन्स)

In reply to by गणेशा

आयर्लंडने जर झिम्बाब्वे आणि पाकिस्तान अशा दोघांनाहि हरवले तर त्यांचे ८ गुण होऊन ते तिसर्या क्रमांकावर जातील. आणि मग सेमीज मध्ये त्यांची गाठ पडेल ती ऑस्ट्रेलियाशी तरी पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणेच सेमी फायनल होतील. शक्यता दुसरी जर ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका सामन्यात जर श्रीलंका जिंकली आणि जर श्रीलंकेचा run rate जास्त असेल तर ए गृप मधुन अनुक्रमे १. न्युजिलंड २.श्रीलंका ३.ऑस्ट्रेलिया ४ इंग्लंड असे चित्र होईल.

In reply to by साधा मुलगा

हो. तुम्ही म्हणता तसे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया च्या ऑर्डर मध्ये काहीसांगता येत नाही, आणि वेस्ट इंडिज चापण रन रेट कमी आहे. त्यामुळॅ अवघड आहे. आणि ते ही बे भरवाशाचे आहेत. त्यात कोण फायनल मध्ये जाईन हे कळत नाहीये आताच. मी न्युजिलंड आणि अफ्रिका असे गृहित धरले होते पण ते सेमी फायनलाच एकत्र येणाअर. आणिचुकुन ऑस्ट्रेलिया ३ र्‍या कंमाकावर गेली तर ऑस्ट्रेलिया वि अफ्रिका कॉर्टर फायनलाच समोरा समोर ठाकणार. (नशीब इंडियाचे, दोन्ही यजमानाबरोबर त्यांना कॉर्टर फायनल मध्ये नाही लढायचे) विजेता कोण असेल असे सांगताना. फायनल कोणाच्यात होइल हाच प्रश्न पडला आहे. न्युजिलंड वि ऑस्ट्रेलिया फायनल किंवा अफ्रिका वि ऑस्ट्रेलिया हे कळत नाहिये. आणि जर ऑस्ट्रेलिया ३ र्‍या नं ला आली तर न्यिजिलंड वि. अफ्रिका फायनल पण होउ शकते. म्हणजे या तीन मधील कोणती टीम शक्यतो फायनल मध्ये नसेल ? (आज हे सगळॅ प्रेडिक्शन क्रमा़आनुसार द्यायचे आहे येतेह कंपणीत ) काहीच कळत नाही. कुठली एक टीम मी निवडु जी फायनल मध्ये जाईन.

झिंबाब्वे फक्त २० रन्सनी हरले. पाकिस्तानला जर झिंबाब्वे विरुद्ध एवढे झगडावे लागताय तर साउथ अफ्रिकेविरुद्ध कसे होणार? वैयक्तिक राग नाही पण बहुतांशी पाकिस्तानी खेळाडुंची देहबोली अतिशय वाईट आहे. त्यामुळेच, ते हरावे असं वाटतं.

In reply to by तिमा

झिंबाब्वे जिंकता जिंकता हरले येडपट साले. २७ चेंडुत ३७ धावा हव्या होत्या. तो येडपट ढोला काय नाव त्याचं त्याने शाहिद आफ्रिदीची ओव्हर मेडन घातली आणि म्याच गेला. पाकडे फुकट जिंकले. :( -दिलीप बिरुटे (दु:खी)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> तो येडपट ढोला काय नाव त्याचं त्याने शाहिद आफ्रिदीची ओव्हर मेडन घातली आणि म्याच गेला. त्याचे नाव "पान्यंगारा". मूर्खासारखे ४७ वे षटक निर्धाव खेळून सामना जिंकण्याची उरलीसुरली आशा सुद्धा धुळीला मिळविली.

पुढील सामने - (निकाल अपेक्षितच लागतील) (२४) मंगळवार ०३ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. आयर्लँड, स्थळ - कॅनबेरा द. आफ्रिका (२५) बुधवार ०४ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), पाकिस्तान वि. यूएई, स्थळ - नेपिअर पाकडे (२६) बुधवार ०४ मार्च, वेळ - सकाळी १२:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान, स्थळ - पर्थ ऑस्ट्रेलिया (२७) गूरूवार ०५ मार्च, वेळ - सकाळी ३:३० (भाप्रवे), बांगलादेश वि. स्कॉटलँड, स्थळ - नेल्सन बांगलादेश

आपण आपल्या गटात एक नंबरला आणि इंग्लंड त्यांच्या गटात चौथ्या नंबरावर तर येत नाहित ना.... दोन्दा धुत्लाय इग्लंडने आपल्याला इतक्यात....

In reply to by असंका

ते बरोबर आहे. त्यामुळेच थोडीशी धाकधूक आहे. परंतु विश्वचषक स्पर्धा सुरु झाल्यावर दोन्ही संघात एकदम बदल झालाय. द. आफ्रिका आणि पाकड्यांना हरवून भारत एकदम प्रखर आत्मविश्वासाने तळपायला लागलाय तर दुसरीकडे इंग्लंड तीनही तगड्या संघाविरूद्ध हरल्याने एकदम खच्ची झाल्यासारखे वाटताहेत. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध आता आपले पारडे जड झाले आहे.

In reply to by असंका

इंग्लंड ला आपण सहज हरवु असे वाटत आहे. आधीचे रीझल्ट जरी वेगळॅए असले तरी आपली बॉलिंग पण आता त्यांचय पेक्षा चांगली वाटत आहे. बॅटींग तर आहेच

द. आफ्रिका वि. आयर्लँड = द. आफ्रिका डेल स्टेन, इम्रान ताहिर आणि हासिम आमला मॅच विनर ठरतील असे वाटते. प्रथम बॉलिंग असल्यास डेल स्टेन मॅन ऑफ द मॅच ही असु शकतो.

द. आफ्रिकेने तब्बल ४११ धावा केल्या. लागोपाठ दुसर्‍या सामन्यात आफ्रिकेने ४००+ धावा केल्या. आयर्लँड जिंकणे अशक्य आहे. निदान ३००+ धावा करून पराभवाचे अंतर कमी करून निव्वळ धावगती फार कमी होउ नये हीच अपेक्षा. वेस्ट इंडीजप्रमाणे आयर्लँड स्वस्तात बाद झाले तर निव्वळ धावगती खूप कमी होऊन ते पाकड्यांना फायदेशीर ठरेल.

In reply to by श्रीगुरुजी

सध्या पाकड्यांना सगळंच अवघड आहे. त्यांना पण दक्षिण आफ्रीकेविरुद्ध खेळायचंय. त्यामुळे तो सामना गेलाच त्यांचा. यूएई विरुद्ध जिंकतील... मग त्यांचे ४ गुण होतात. यानंतरही पाकीस्तानला पुढच्या फेरीत जाण्यासाठी आयर्लंड झिंबाब्वे विरुद्ध हरण्याची प्रार्थना करावी लागेल आणि मग त्यांना हरवावंही लागेल.

२५. पाकिस्तान वि. यु.ए.ई = पाकिस्तान हॅरीस सोहेल मॅच विनर असु शकतो. बॉलिंग मध्ये इरफान चांगली बॉलिंग करेन २६. ऑस्ट्रेलिया वि. अफगणिस्तान = ऑस्ट्रेलिया जॉन्सन, वॅटसन चांगले परफार्मर असतील. फिन्च आणि वॉर्नर दोघातील एक जन चांगलीच खेळी करेन

पाकड्यांनी यूएई विरूद्ध चक्क ३३९ धावा केल्या. शाहजादचा १० वर असताना पॉईंटवर सोडलेला झेल फारच महागात गेला. सुदैवाने यूएईचे फलंदाज बर्‍यापैकी झुंज देत आहेत (३४.४ षटकांत १३१/४). यूएई हरणार हे नक्की, परंतु २०० च्या पुढे जाऊन पाकड्यांना खूप मोठ्या फरकाने विजय मिळू देणार नाहीत असं दिसतंय. विंडीजने व आयर्लँड आफ्रिकेविरूद्ध तब्बल २५७ आणि २०१ धावांनी हरून स्वतःची निव्वळ धावगती खूपच कमी करून घेतली व त्यामुळे पाकड्यांच्या आशा प्रज्वलित झाल्या. आज पाकडे जिंकतील पण २००+ धावांच्या फरकाने ते जिंकणार नाहीत. त्यामुळे पाकड्यांची निव्वळ धावगती प्रचंड प्रमाणात वाढणार नाही. त्यातून यूएईने २५०+ धावा केल्या तर सोन्याहून पिवळं.

In reply to by श्रीगुरुजी

यूएई चा प्रशिक्षक अकिब जावेद आहे . याचा परीणाम म्हणून पर्थ सारख्या वेगवान खेळपट्टीवर यूएईने प्रथम फलंदाजी करून पायावर धोंडा मारला आणि आता मात्र पाकिस्तान संघाला प्रथम फलंदाजी देवून त्यांचा रन रेट उंचावण्यास मदत केली आहे. हे.मा.वै.म.

'ब' गटात भारत व द. आफ्रिका प्रथम दोन क्रमांकावर आहेत. प्राथमिक फेरीनंतर बहुतेक हाच क्रम राहील. भारत विंडीज/आयर्लँड कडून हरले किंवा द. आफ्रिका पाकड्यांकडून हरले तरच बदल होऊ शकेल. ४ सामन्यानंतर विंडीजची निव्वळ धावगती -०.३१३ व पाकड्यांची निव्वळ धावगती -०.३८५ आहे. आयर्लँडची निव्वळ धावगती -१.१३७ असली तरी त्यांचे अजून ३ सामने शिल्लक आहेत (पाकडे, भारत व झिंबाब्वेविरूद्ध). पाकड्यांचे उर्वरीत सामने द. आफ्रिका व आयर्लँड विरूद्ध आहेत. विंडीजला अजून भारत व झिंबाब्वेविरूद्ध खेळायचे आहे. विंडीज बहुतेक बाद फेरीत येईल. 'ब' गटातला बाद फेरीत जाणारा ४ था संघ हा पाकडे वि. आयर्लँड या सामन्यातला विजेता असेल. 'अ' गटात न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया व श्रीलंका नक्कीच बाद फेरीत येतील. बांगलादेश वि. इंग्लंड या सामन्यातला विजेता 'अ' गटातील ४ था संघ असेल.

बांगलाच्या फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी करून स्कॉटलँडच्या ३१८ धावांचा यशस्वी पाठलाग करून सामना जिंकला. हातात तब्बल ३१८ धावा असूनसुद्धा स्कॉटलँडच्या गोलंदाजांनी अत्यंत खराब गोलंदाजी करून सामना घालविला. आजचा सामना बांगलादेश हरला असता तर त्यांचा पुढील मार्ग बंद होऊन इंग्लंडची वाट सुकर झाली असती. परंतु आजच्या विजयामुळे बांगलादेशाला बाद फेरीत जाण्याची अजूनही आशा आहे. अर्थात हा निकाल भारतासाठी चांगलाच आहे. बांगलादेश 'अ' गटातून ४ थ्या क्रमांकाने बाद फेरीत आल्यास त्यांची 'ब' गटात प्रथम असणार्‍या भारताशी गाठ पडून भारत उपांत्य फेरीत नक्कीच जाईल. मात्र उपांत्य फेरीत भारताला ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलँडला टाळता येणार नाही. दोन्ही संघ अत्यंत भरात असल्याने भारत त्यांच्याविरूद्ध जिंकणे अत्यंत अवघड आहे. तरीसुद्धा भारत न्यूझीलँडविरूद्ध ऑस्ट्रेलियामध्ये किंवा ऑस्ट्रेलियाविरूद्ध न्यूझीलँडमध्ये खेळल्यास भारत जिंकण्याची शक्यता वाढते.

आतापर्यंत झालेल्या २७ सामन्यांपैकी १ पावसामुळे रद्द झाला. उर्वरीत २६ सामन्यांसाठी केलेल्या भाकितामध्ये २२ सामन्यांच्या निर्णयाचे भाकीत बरोबर आले आणि ४ सामन्यांचे भाकीत चुकले. पुढील सामने - (२८) शुक्रवार ०६ मार्च, वेळ - सकाळी १२:०० (भाप्रवे), भारत वि. वेस्ट इंडीज, स्थळ - पर्थ भारत नक्की जिंकणार. गेल अपयशी ठरेल. सॅम्युअल्स, डॅरेन ब्राव्हो, सिमन्स हेच फलंदाज चांगले खेळतील. विंडीजचे बहुतेक सर्व गोलंदाज अपयशी ठरतील. रोहीत शर्मा "सामनावीर" असेल. किमान शतक ... कदाचित द्विशतकही करेल. (२९) शनिवार ०७ मार्च, वेळ - पहाटे ६:३० (भाप्रवे), पाकिस्तान वि. द. आफ्रिका, स्थळ - ऑकलँड द. आफ्रिका निर्विवादपणे मोठ्या फरकाने जिंकेल. (३०) शनिवार ०७ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), आयर्लँड वि. झिंबाब्वे, स्थळ - होबार्ट अत्यंत चुरशीचा सामना होईल. आयर्लँड थोड्या फरकाने जिंकेल.

In reply to by श्रीगुरुजी

संघर्षपूर्ण सामन्यात भारत जिंकला. हा एकच अंदाज खरा ठरला. गेल अपयशी ठरणार हा अंदाज वगळता इतर सर्व अंदाज चुकले. भारत जोपर्यंत जिंकत आहे तोपर्यंत अंदाज चुकले तरी दु:ख नाही. पर्थच्या खेळपट्टीने आज आपले रंग दाखविले. विंडीजने २२५+ धावा केल्या असत्या तर ते नक्कीच जिंकले असते. आज एकवेळ भारत हरेल अशी कुशंका मनात यायला लागली होती. परंतु धोनी व अश्विनने शांतपणे फलंदाजी करून सामना जिंकला. विंडीजच्या गोलंदाजांनी अनेक वाईड व नो-बॉल टाकून भारताच्या विजयाला हातभार लावला. भारताचे क्षेत्ररक्षण फारसे चांगले झाले नाही. गेल चे ३ झेल सुटले, परंतु ते झेल खूपच अवघड होते. जडेजा व रोहीत शर्माने मात्र दोन सोपे झेल सोडले. या विश्वचषकातील ज्या ज्या सामन्यात रोहीत शर्मा अयशस्वी होतो त्या त्या सामन्यात भारत विजयी होतो हा एक सिद्धांत आज पुन्हा एकदा सिद्ध झाला. रोहीत शर्मा ४ पैकी ३ सामन्यात अयशस्वी आहे. धवन पहिल्या दोन सामन्यानंतर उर्वरीत दोन सामन्यात चांगला खेळलेला नाही. आज बर्‍याच दिवसांनी धोनीने चांगली फलंदाजी केली. विंडीजची निव्वळ धावगती ५ सामन्यानंतर -०.५११ आहे व गुण ४ आहेत. पाकड्यांची निव्वळ धावगती ४ सामन्यानंतर -०.३८५ आहे व गुण ४ आहेत, तर आयर्लँडची निव्वळ धावगती ३ सामन्यानंतर -१.१३७ असून गुण ४ आहेत. विंडीजचा शेवटचा सामना यूएई बरोबर असून विंडीजला तो खूप मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. पाकड्यांचे उर्वरीत २ सामने द. आफ्रिका व आयर्लँड विरूद्ध असून ते आफ्रिकेबरोबर नक्कीच हरतील. त्यामुळे त्यांना आयर्लँडविरूद्ध जिंकावेच लागेल. आयर्लँडचे उर्वरीत सामने भारत, झिंबाब्वे आणि पाकड्यांबरोबर असून त्यांना झिंबाब्वे व पाकड्यांविरूद्ध जिंकावेच लागेल. सध्या तरी आयर्लँडची उपांत्यपूर्व फेरीत जाण्याची शक्यता पाकडे आणि विंडीजच्या तुलनेत कमी आहे.

In reply to by श्रीगुरुजी

रोहित शर्मा वाला सिद्धांत अजून एक दोन्दा खरा ठरला तर हा सिद्धांत पूर्णपणे बेकार ठरेल कारण अपयशी रोहित शर्मा किती दिवस संघात राहिल....

In reply to by असंका

२०१२ मध्ये त्याला १३ सामन्यात खेळविण्यात आले होते. १३ सामन्यात एकूण धावा १६८ होत्या. त्यापैकी एका सामन्यात ८३ व उर्वरीत १२ सामन्यात मिळून ८५ धावा होत्या. श्रीलंकेविरूद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत पहिल्या ४ सामन्यात एकूण १४ धावा करूनसुद्धा त्याला ५ व्या सामन्यात खेळविण्यात आले होते व त्यात त्याने ४ धावा केल्या होत्या. लागोपाठ ५ सामन्यात अपयशी ठरल्यानंतर सुद्धा त्याला त्याच मालिकेतल्या ट-२० सामन्यात घेतलेले होते. अनेकवेळा एक आकडी धावसंख्येवर बाद होऊन सुद्धा त्याला तेव्हा इतके सामने खेळावयास मिळत असतील तर, सध्याच्या काळातही अजून अनेक सामन्यात अपयशी ठरूनसुद्धा तो संघात टिकून राहील.

अपेक्षेप्रमाणे बांग्लादेश जिकले. अंदाज भारत वि. वेस्ट इंडीज = भारत ( वेस्ट इंडिज पण चांगला खेळ करेन आणि गेम पालटवु शकतो ) अजिंक्य रहाने सर्वात चांगला खेळेल इंडिया कडुन असे वाटते. गेल चा ऑल राउंड परफॉर्मन्स आणि टेलर च्या गोलंदाजीने वेस्ट इंडिज ला पण चान्स आहे.

India 2 out

शनिवार ते सोमवार च्या मॅचेस : १. अफ्रिका वि. पाक : अफ्रिका (प्लेअर ओफ मॅच : अमला, मॉर्केल,एबी) २. झिंब्वावे वि आयर्लंड : आयर्लंड (स्टर्लिंग, मसक्दजा, जॉइसे, चतारा) ३. न्युझीलंड वि अफगान : न्युझीलंड ( विल्यमसन, साउदी, मॅक्युलम) ४. ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका : ऑस्ट्रेलिया ( पुन्हा वार्नर, स्टार्क, स्मिथ) ५ इंग्लंड वि बांग्ला : इंग्लंड ( मोईन अली, फिन , बेल्/रुट) मी कॉर्टर फायनल मध्ये इंग्लंड आणि आयर्लंड ला पाठवले आहे त्यामुळे तेच जिंकावेत अशी अपेक्षा)

आफ्रिकेने माती खाल्ली. एबीने थोडा आणखी संयम दाखवला असता तर हिरो झाला असता.

सा. अफ्रिकेला एवढी घाई कसली होती ? रन रेट चांगला होता, तर धोनीसारखं शांतपणे खेळून जिंकता आली असती मॅच. ते हरल्यापेक्षा पाकडे जिंकले याचं जास्त दु:ख झालं!

श्या! आफ्रिकेने दगा दिला. पूर्ण अंदाज चुकला. आता पाकड्यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश बराचसा नक्की झालाय आणि विंडीज व आयर्लंड दोघेही संकटात सापडलेत. पाकडे सुरवातीचे दोन सामने हरल्यावर एकदम बदलले आणि लागोपाठ ३ सामने जिंकलेत. त्यांनी चक्क द. आफ्रिकेला हरवलं. पाकडे आणि विंडीजचे ५ सामने झालेत आणि आयर्लंडचे ४ झालेत. उर्वरीत सामने - पाकडे वि. आयर्लँड, भारत वि. आयर्लँड आणि विंडीज वि. यूएई. निव्वळ धावगती - पाकडे: -०.१९४, विंडीज: -०.५११, आयर्लंड: -०.८२०, गुण - पाकडे: ६, विंडीजः ४, आयर्लंडः ६ पाकडे पुढील फेरीत येऊ नयेत ही माझी इच्छा आहे. परंतु पाकडे बहुतेक येतील असं दिसतंय. विंडीज यूएई विरूद्धचा सामना नक्की जिंकेल. परंतु त्यांना तो मोठ्या फरकाने जिंकावयास हवा. तरच त्यांचे ६ गुण होऊन निव्वळ धावगती वाढेल. सामना: भारत वि. आयर्लंड - भारत हरला किंवा जिंकला तरी भारताला फार फरक पडणार नाही. आयर्लँड जिंकल्यास त्यांचे ८ गुण होतील आणि ते उपांत्यपूर्व फेरीत जातील व विंडीजची परिस्थिती अजूनच अवघड होईल. सामना: विंडीज वि. यूएई- यूएई जिंकल्यास विंडीजची वाट बंद होईल. विंडीजला कोणत्याही परिस्थितीत हा सामना मोठ्या फरकाने जिंकावाच लागेल. सामना जिंकल्यास विंडीजचे ६ गुण होतील. सामना: पाकडे वि. आयर्लँड - आयर्लंड जिंकल्यास विंडीजची परिस्थिती अत्यंत अवघड होईल. पाकडे जिंकल्यास ते उपांत्यपूर्व फेरीत जातील. म्हणजे आयर्लंड भारताविरूद्ध जिंकले व पाकड्यांविरूद्ध हरले तर विंडीजच्या शेवटच्या सामन्याला महत्त्व राहणार नाही. समजा आयर्लँड ने दोन्ही सामने जिंकले तर आयर्लंड कदाचित दुसर्‍या क्रमांकाने उपांत्यपूर्व फेरीत जाईल व विंडीजच्या आणि पाकड्यांच्या आशा यूएई विरूद्धच्या सामन्यावर अवलंबून राहतील. विंडीज यूएई विरूद्ध हरला तर सगळाच गोंधळ संपतो आणि पाकडे व आयर्लंड पुढील फेरीत जातील. पाकडे: पुढील फेरीसाठी आयर्लंडविरूद्धचा सामना जिंकणे किंवा हरल्यास विंडीज यूएई विरूद्ध हरावे किंवा त्यांची निव्वळ धावगती कमी रहावी यासाठी प्रार्थना करावी लागेल. हा सामना अनिर्णित राहिल्यास किंवा बरोबरीत सुटला तर विंडीज बाहेर जाऊन हे दोघेही आत येतील. विंडीजः पुढील फेरीसाठी आयर्लंड पाकड्यांविरूद्ध जिंकावे ही प्रार्थना करावी लागेल आणि यूएईविरूद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकावाच लागेल. आयर्लंड: भारत किंवा पाकड्यांविरूद्ध जिंकावे लागेल (यातला एकही सामना अनिर्णित राहिला किंवा बरोबरीत सुटला तरी चालेल). जर दोन्ही सामने हरले तर विंडीज यूएईविरूद्ध हरावे किंवा त्यांची निव्वळ धावगती आपल्यापेक्षा कमी रहावी अशी प्रार्थना करावी लागेल. एकंदरीत पाकड्यांची स्थिती पुष्कळ बरी आहे. विंडीज व आयर्लँड मध्येच आता चुरस आहे.