मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मंगळ कार्य !

साळसकर · · काथ्याकूट
आज पत्रिका आली एका मंगळ कार्याची. एका मित्राच्या लग्नाची. म्हटलं तर माझा मित्र, म्हटलं तर माझ्या वडीलांचा मित्र. माझ्यापेक्षा बारा वर्षे मोठा तर माझ्या वडीलांपेक्षा बारा वर्षे लहान. जुन्या वाडीतला जुना मित्र. आतासे राहायला आणखी कुणीकडे. लग्न त्याचे आजवर झाले नव्हते हे पत्रिका बघूनच समजले. अन नाही म्हटले तरी धक्काच बसला. अजून झाले नव्हते की एक मोडून हे दुसरे? पहिले कोणाशी झाले, कधी झाले, का मोडले? कि झालेच नाही ! पण मग एवढे उशीरा का? भावांची लग्ने झाली असे कानावर होते. एकाचे सहकुटुंब फोटोही फेसबूकावर बघून झाले होते. मग तीनही भावांत देखणा हा, याचेच कसे राहिले? अवाजवी अपेक्षा? कि आजकाल काय ते म्हणतात ते करीअर ओरीएंटेड? ईतक्यात आईच म्हणाली, "बरे झाले, जमले एकदाचे. मंगळ असल्याने राहिले होते.." हा मला दुसरा धक्का .. ! एखादे तिसरेच कारण ऐकायला आवडले असते, पण हे कारण ! अजूनही आपण नक्की कोणत्या जमान्यात जगतोय. एखादी गोष्ट चांगली व्हावी यासाठी चांगला मुहुर्त बघणे (आता हि श्रद्धा असो वा अंधश्रद्धा) हे समजू शकतो. शेवटी करणार्‍याची नियत चांगलीच असते तर का उगाच वाद घाला. मात्र एखाद्या अंधश्रद्धेपोटी एखाद्याला लग्नापासून वंचित ठेवणे? हे कितपत पटते? लोकांना मुलं होत नाहीत तेव्हा किती हवालदिल होतात, उपासतापास, नवसप्रार्थना, औषधोपचार, आणि एवढेही करून न भागल्यास दत्तक घेण्याची तयारी. पण इथे तर एखाद्याला ती संधीच नाकारली जातेय. मूल तर दूरची गोष्ट पण आयुष्याच्या जोडीदारापासून वंचित ठेवले जातेय. ते देखील एका कपोकल्पित कारणासाठी? शप्पथ वाईट वाटले एका तरुणासाठी.. स्मार्ट बंदा, एकेकाळी मैत्रीणीही बर्‍यापैकी राखून होता. पुढे जाऊन मुली फिरवण्याबाबत याचाच आदर्श ठेवावा असेही कैकदा त्या किशोरवयात मनात आले होते. पण हा गडी स्वता मात्र लग्नाच्या बाजारात मागे पडला. जरी मधल्या काळातली त्याची काही खबर नसली तरी नक्कीच कुठेतरी त्याने जमवले असणार हा त्याच्या इमेजला पाहता विश्वास पण त्या मुलीच्या घरून याच कारणास्तव नकार पचवावा लागला असणार. मग पुढे स्वतालाच लग्न करायची इच्छा राहिली नसणार. ज्या मुलीवर प्रेम होते तीच अश्या कारणामुळे मागे हटली तर ठरवून लग्न करणार्‍यात काय कोण भेटणार आणि भेटलीच तर कशी भेटणार या विचारांनीच आत्मविश्वास डळमळीत झाला असणार. काय रिअ‍ॅक्ट झाला असेल तो या सर्व परिस्थितीवर? आपलेच दुर्दैव म्हणून नशीबाला दोष देत बसला असेल की बंड करून उठावेसे वाटले असेल? आजूबाजुच्या मित्रांची, स्वताच्या भावंडांची लग्ने होताना काय वाटले असेल त्याला? च्यायला, मी त्याच्या जागी असतो तर मी काय केले असते अश्या परिस्थितीत? लोकांच्या नाकावर टिच्चून लग्न करण्यासाठी समोरून एखादी मुलगी तरी तयार व्हायला हवी. त्याचे लग्न आज एवढ्या उशीरा होत होते याचा अर्थ ती अशी सहजासहजी मिळत नाही, त्याला तरी मिळाली नाही.. नुसते विचार ओसंडून वाहू लागले माझ्या चार बाय चार च्या डोक्यात. पण हे माझ्या घरच्यांसमोर बोलण्यात काही अर्थ नव्हता हे जाणून मी मुद्दामच म्हणालो, "चला फायनली एक मुलगी, एक घर तरी त्याला असे मिळाले ज्यांचा या भाकड गोष्टींवर विश्वास नाही.." तर कसले काय, आई म्हणाली, "हं, मुलीला पण मंगळ असेल ..... " माझी बोलती बंद !

वाचने 14434 वाचनखूण प्रतिक्रिया 56

आत्मशून्य 28/02/2014 - 00:22
विशेषत: मुलीचा मंगळ... फार वाईट. एकीने शेवटी मुस्लिम मुलासोबत विवाह केल्याचे उदाहरण पाहिले आहे. :( अर्थातच त्यात तिचे माहेरही कायमचे संपले.

In reply to by आत्मशून्य

उपास 28/02/2014 - 08:44
तर्रीच.. कडक मंगळ होता म्हणून शेवटी तिला घरच्यांविरुद्ध जाऊन परधर्मात लग्न करण्याची बुद्धी झाली तर!

In reply to by उपास

आत्मशून्य 28/02/2014 - 16:27
म्हणुन तर अतिशय उच्च शि़क्षीत व ९० च्या सरत्या दशकात भरगोस पगार मिळणारी नोकरी असुनही तिला स्विकारण्याची स्वधर्मीयांना बुध्दी झाली नाही.

In reply to by आत्मशून्य

उपास 28/02/2014 - 17:43
अहो शिक्षण आणि पैसा ह्यांच्याशिवाय इतर गोष्टींचा (जसा की 'घराने की इज्जत' वगैरे) विचार करणारी माणसं असतिल ती.. त्यांना त्यांच्या कर्माने चालू द्यावे!

In reply to by आत्मशून्य

साळसकर 28/02/2014 - 20:37
आधीच मुलींच्या वाट्याला तुलनेत उपेक्षाच असते (कोणीही कितीही आधुनिकतेचा आव आणला तरी) त्यात मंगळ असेल तर मग दुर्दैवाची एखादी म्हणच आठवायला लागेल. पण मुलांनाही याचा फटका बसावा, सुशिक्षित अन शहरातल्या.. अवांतर - मुसलमानांमध्ये नसतो का मंगळ? आय मीन हा मंगळ फंडा युनिवर्सली अ‍ॅप्लीकेबल नाही होत का?

In reply to by साळसकर

आदूबाळ 28/02/2014 - 21:06
पुलंच्या लेखनात कुठेतरी "अमुकतमुक साहेब सर्वपित्री अमावस्येला विलायतेला जायच्या बोटीत बसला. काहीपण झालं नाही त्याला." असं काहीतरी आहे त्याची आठवण झाली. एका क्लायंटने खंडेनवमीला अवायाच्या व्हॉईप फोनला हार घातला होता, त्याचीही (किंचित अवांतर पण) आठवण झाली.

In reply to by आयुर्हित

आत्मशून्य 28/02/2014 - 01:01
विशेषत: मुलीचा मंगळ... फार वाईट. एकीने शेवटी मुस्लिम मुलासोबत विवाह केल्याचे उदाहरण पाहिले आहे. Sad अर्थातच त्यात तिचे माहेरही कायमचे संपले.
यात मुलीचे लग्न मंगळ आहे म्हणून वर्षानुवर्षे जमले नाही. शेवटी ऑफिस मधील मुस्लिम मुला सोबत सूत जुळले. घर्च्यांचा विरोध पत्करून लग्न झाले पण घरच्यांनी अर्थातच तिला डिस इन्हेरिट केले. त्यांना मुलगी होती/ आहे याचा साधा उल्लेखहि आता करत नाहित .

In reply to by आत्मशून्य

आयुर्हित 28/02/2014 - 01:44
आपणास नाही हो, क्षमस्व. प्रश्न आहे साळसकर साहेबांना, कारण त्यांनीच अंधश्रद्धा हा शब्द वारला आहे.

In reply to by आयुर्हित

ह्या गोष्टी अंधश्रद्धेत मोडतात अशी पुसटशी शंका सुद्धा तुम्हाला आलेली नसेल तर मग अवघड आहे बुवा! ज्योतिष"शास्त्र" नावाच्या थोतांडाने किती नुकसान केलंय आपल्या लोकांचं त्याची गणतीच करता येणार नाही. अशा पार्श्वभूमीवर असले विचार फार घातकी आहेत अस केवळ सुचवू शकतो.

In reply to by बाळकराम

आयुर्हित 28/02/2014 - 04:48
आपल्या लोकांचं नुकसान सोडा, तुमचे काही झाले आहे का ते सांगा! ह्या गोष्टी अंधश्रद्धेत मोडतात असे आपणांस वाटते आहे, तर यावरचा आपला अभ्यास तर नसेलच! कि आहे काही? घातकी विचार कोणाचे? ज्याचा काहीही अभ्यास नाही त्याचे? केवळ सुचवू नका, सर्वात आधी पुर्ण माहिती घ्या आणि विचार मांडा!

In reply to by आयुर्हित

साळसकर 28/02/2014 - 20:40
अगदी इयत्ता चौथीपासून, मंगळ बुध गुरू शुक्र सारे ग्रह आणि त्या ग्रहांची वैशिष्ट्ये तोंडपाठ अन परीक्षेत गुण पैकीच्या पैकी. पण मंगळावर अवकाशयान गेले आणि त्यांनी त्याचा काय काय अभ्यास केला हे डिटेल माहीत नाही. तरी या धाग्याच्या निमित्ताने ते समजले तर आवडेल.

In reply to by साळसकर

ज्योतिष हे एक खूप महत्त्वाचे व दूरदर्शी शास्त्र आहे. आपण भारतीय खूप नशिबवान आहोत. आपल्याकडे मागील ८००० वर्षांपासून केलेले निरीक्षणे आपल्या ऋषी मुनींनी सांगून/लिहून ठेवले आहेत व ते खूप अचूक आहेत. माझ्या मते या शास्त्राचा सखोल अभ्यास करणारे खूप कमी लोक आहेत व बऱ्याच लोकांचा हा व्यवसाय असल्याने त्यात व्यावसायिक फायदे/तोटे असणारच. जर आपण सर्वांमिळून जर या अभ्यासात भाग घेतला तर या शास्त्राचा आपणा सर्वांना याचा भरघोस फायदा होईलच. ज्याप्रमाणे दिवाळीच्या/उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपण सहलीचे नियोजन करण्यासाठी दिनदर्शिकेचा (कॅलेंडरचा) वापर करतो, त्याच प्रमाणे आपल्या आयुष्याचे नियोजन करण्यासाठी ज्योतिष शास्त्राचा खूप फायदा होत असतो. थ्री इडीएट मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या आवडी निवडी पाहून आपण आपला/मुलांचा अभ्यासक्रम(discipline) निवडून त्याप्रमाणे व्यवसायात पूर्ण यशस्वी होऊ शकतो. हे आपल्याला जन्मकुंडलीत पाहूनही ठरवता येते व मुले लहान असतांना त्यांना त्याप्रमाणे शाळेत/अभ्यास क्रमाला पाठविणे जास्त सोयीस्कर असते यामुळे त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाची वर्षे आपण वाचवू शकतो. मोठ्या कंपन्यात/सैन्यात मनुष्य बळ (Human Resource)नेमतांनाही ज्योतिषाचा वापर करून चांगले उत्पादनशील कामगार व विचारवंत अधिकारी शोधून नेमता येतील आणि त्यामुळेही देशाची उत्पादन क्षमता वाढू शकेन.यासाठी HR मॅनेजर ला हा अभ्यास सक्तीचा केला पाहिजे. आजच्या जमान्यात, जोपर्यंत रुग्णाला तो त्रास सुरु होत नाही, तोवर त्याचे pathological reports त्याबद्दल काहीच माहिती पुरवत नाहीत. ज्या दिवशी pathological reports हाती येतात व अचूक निदान होतो तोपर्यंत केस हाताबाहेर गेलेली असते व फक्त हळहळ करण्या पलीकडे तज्ञ फारसे काही करू शकत नाहीत. यासाठी ज्योतिषाचा/जन्म कुंडलीचा वापर करून रुग्णाचे भवितव्य काय असू शकेल, त्याला कितपत व कोणत्या अवयवाला त्रास/नुकसान होवू आहे/शकते हे पाहू शकतो व त्याला त्यासाठी आधीपासूनच (in advance)मार्गदर्शन करू शकतो.

In reply to by आयुर्हित

वरील प्रतिसाद नवीन धाग्यात बदलला आहे.ज्योतिषशास्त्राचा फायदा त्यामुळे येथे यावर प्रतिसाद देणे टाळावे हि विनंती. संपादक मंडळाला विनंती कि माझा "यासाठी संपूर्ण कुंडलीचा अभ्यास आवश्यक आहे" हा प्रतिसाद उडवावा.

स्पंदना 28/02/2014 - 04:19
देव जाणे ब्वा! आमच्या घरात एकही लग्न पत्रिका बघुन झालं नाही. आमच स्वतःचही नाही. आता बघावी म्हणतेय.

In reply to by स्पंदना

खटपट्या 28/02/2014 - 08:33
हि आयडिया चांगली आहे. माझे पण लग्न पत्रिका बघून झाले नाहीये. आता मी पण बघतो. अरे पण त्यासाठी पत्रिका काढावी लागेल. कशी काढतात ?

In reply to by स्पंदना

साळसकर 28/02/2014 - 20:45
ज्यांनी पत्रिकाच बनवली नसते ते सर्वात सुखी. कमाल म्हणजे प्रेमविवाहातही जेव्हा पत्रिका बघतात तेव्हा नक्की त्यामागे काय भावना असतात? एकमेकांवर प्रेम आहे म्हणजे गुण जुळले आहेत हे उघड दिसत असूनही जन्माच्या वेळी केलेले ग्रहतार्‍यांचे हिशोब प्रमाण मानायचे का?

In reply to by जेपी

साळसकर 28/02/2014 - 20:48
ओह, आपल्या लक्षात आहे ती अर्धवट कथा. पण खरेच अनिश्चित कालासाठी क्षमस्व. त्यावेळी माझ्या जे डोक्यात होते ते पुढच्या लिखाणात उतरतेय की नाही याची खात्री न वाटल्याने थांबलो. ते नाहीच पुर्ण करू शकलो तर खंत राहील. मात्र यापुढे काही लिहिताना क्रमश: फंडा न वापरता ते पुर्ण करूनच प्रसिद्ध करावे याची काळजी घेईन.

कंजूस 28/02/2014 - 07:09
पत्रिकेतला मंगळ असणे ,त्यावरची अंधश्रध्दा ,ज्योतिषावर विश्वास यामुळे त्याचे लग्न लवकर झाले नाही वगैरे विचार थोडावेळ बाजूला ठेवू .जी मुले आर्मी /नेव्हीत गेली आहेत त्यांना कुठे शहरातल्या मुली मिळतात . सैनिकहो तुमच्यासाठी घास अडतो वगैरे गाण्यापर्यँतच ठीक वाटते लोकांना . मुलाच्या मंगळापेक्षा मुलीच्या मंगळाची फारच धास्ती घेतात .

In reply to by कंजूस

सुबोध खरे 28/02/2014 - 09:36
साहेब, काही तरी गल्लत होतेय. आर्मी नेव्ही मधल्या अधिकाऱ्यांच्या बायका जास्त करून शहरातल्या असतात. कारण सर्व मुलीना माहित असते कि आपण नवर्याबरोबर राजाराणी सारखे वेगळे राहणार आणी सासूचा जाच नाही. आजचा जमाना बदलला आहे. शहरातील मुली उलट अशा जायला तयार आहेत. शहरात घर घेणे परवडत नाही म्हणून एकत्र राहायला लागेल यामुळे कितीतरी मुलांची लग्ने खोळंबली आहेत.

कंजूस 28/02/2014 - 15:53
आर्मी नेव्हीतली स्थळे नको म्हणतात मुली .माझ्या चुलतभावाला कित्येकांनी साफ विचारपण करायचा नाही हे सांगितले .त्याला मोठे घर ,तीन नोकरही दिले होते ."शहरातल्या" हा मुद्दा माझा चुकला असेल . पुरुषाला थोडा मंगळ असावाच .अगदी धाडसी नसले तरी धारिष्ट्य असावे .हे धारिष्ट्य रंगकर्मीँना फार उपयोगी असते .याचे कार्यकत्व मंगळाला दिले आहे . मंगळाकडे(मुलीच्या कुंडलीत)वैधव्य योग आणतो असे ज्योतिषशास्त्र मानते .या योगाला लोक फार घाबरतात .( भास्कराचार्य लिलावती कथा) . या मंगळाचा वाईट प्रसंग आणण्याची शक्ति ३६ वयानंतर फारच कमी होते .मंगळाचा जोर १४ ते ३६ असतो .मिलिट्रीत ३५ नंतर मनुष्य तरुण धरला जात नाही असे ऐकून आहे ."दुनिया को हिला दूंगा" प्रवृत्ती नंतर बोलण्यापुरतीच राहाते . प्रत्येक ग्रहाचे प्रभाव काही काळापुरते असतात .त्याकाळांत काही झाले नाही तर नंतर काहीही होत नाही .बुध(व्यवहार) आणि चंद्र(मन)आयुष्यभर प्रभावी असतात .रवि(शरीर ,मोठा नोकर)अठ्ठावन नंतर अस्ताला जातात .गुरू(मान सन्मान)२४ नंतर , शनी (नम्रपणा ,दूरदृष्टी)५८नंतर लक्षात येतात . लग्नाच्या बाबतीत ट्रायल अॅंड एरर करता येत नाही . व्यवहार/कुंडली ?

शिद 28/02/2014 - 16:17
पैसे देऊन पत्रिका मॅनेज करायची ना... मग झटक्यात निघाला असता मंगळ पत्रिकेतून... हाकानाका... ;) उगाच एवढी वर्षे वाया घालवली...

In reply to by शिद

साळसकर 28/02/2014 - 20:51
खरेच सोप्पय की, पण या आधी असे करताना पकडले गेल्यास ती फसवणूक म्हणता येईल की नाही वा म्ह्टल्यास कायद्यात काय शिक्षा आहे यावर जाणकार प्रकाश टाकतील तर बरे :)

कवितानागेश 28/02/2014 - 17:00
मूळ जन्मपत्रिकेत १,४,७,८,१२ या स्थानात मंगळ असला तर 'तो मंगळ दोषपूर्ण आहे असं मानतात. म्हणजे एकूण १२ स्थानांपैकी ५ ठिकाणी मंगळ असेल तर 'मंगळ आहे'! म्हणजे १२ लग्नाळू मुलामुलींपैकी ५ जणांना 'मंगळ आहे' असं ढोबळ्मानानी म्हणता येइल. मग लग्न जमण्यात अडथळा कसा काय येतो?

In reply to by कवितानागेश

आदूबाळ 28/02/2014 - 21:18
असं नसावं मौतै. बारा घरात इव्हन डिस्ट्रीब्यूशन नसतं. कधीकधी दोनतीन ग्रह एकाच घरात गर्दी करून बसतात आणि काही घरं मोकळीच बोंबलत पडलेली असतात. (एकाच घरात "बु गु ने ह" वगैरे वाचल्याचं आठवतंय.) म्हणजे डिनॉमिनेटर वाढला आणि प्रोबॅबलिटी कमी झाली ना?

In reply to by आदूबाळ

कवितानागेश 28/02/2014 - 21:29
१२ राशींमध्ये ३६० अंश विभागलेले असतात. प्रत्येक राशीला ३० अंश. इलिप्टिकल ऑर्बिटल मोशन्मुले थोडा फरक पडतो दर वर्षी सगळ्या राशींमधून एक फेरी पूर्ण करताना. पण सरासरी प्रत्येक राशीत मंगळ ३० दिवस असतो. क्वचित कधी वक्री/ स्तंभी गतीमुळे थोडा इकडे तिकडे. पण आपण मंगळाचे स्थाने पाहत आहोत, कुठल्या राशीत आहे हे नाही. तर दिवसात २/२ तासानी पूर्वक्षितिजावरची राशी बदलते , त्याप्रमाने ग्रह देखिल पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या स्थानात सरकतात. त्यामुळे दिवसभरात १२ लग्नांपैकी म्हणजे २४ तासांपैकी ५स्थाने म्हणजे एकूण १० तास इतक्या काळात जन्मणार्‍या मुलांना 'मंगळ असतो!'

In reply to by कवितानागेश

साळसकर 28/02/2014 - 21:40
तुम्ही म्हणता तसे असेल तर असेल पण कडक मंगळ असेही काही ऐकून आहे, त्याचे काही निकष असतील. कदाचित मग गृहित धरले जात असतील.

In reply to by कवितानागेश

श्रीगुरुजी 01/03/2014 - 23:14
>>> मूळ जन्मपत्रिकेत १,४,७,८,१२ या स्थानात मंगळ असला तर 'तो मंगळ दोषपूर्ण आहे असं मानतात. म्हणजे एकूण १२ स्थानांपैकी ५ ठिकाणी मंगळ असेल तर 'मंगळ आहे'! २ र्‍या स्थानात मंगळ असला तरी ती मंगळाची पत्रिका मानतात. >>>> म्हणजे १२ लग्नाळू मुलामुलींपैकी ५ जणांना 'मंगळ आहे' असं ढोबळ्मानानी म्हणता येइल. मग लग्न जमण्यात अडथळा कसा काय येतो? ज्योतिषशास्त्रानुसार 'मंगळ' असलेल्या व्यक्तींची कामेच्छा 'मंगळ' नसलेल्यांच्या तुलनेत खूप तीव्र असते. त्यामुळे 'मंगळ' असलेल्या मुलाला 'मंगळ' असलेली पत्नीच योग्य जोडीदार ठरू शकते. दोघांपैकी एकाला मंगळ असेल व दुसर्‍याला नसेल तर वैवाहिक जीवनात अडथळे येऊ शकतात.

रेवती 01/03/2014 - 00:21
अगं मौ, पण एक मंगळधारक दुसर्‍या मंगळाशी लगीन करू शकतो/ शकते ना? १२ पैकी ५ असे चांगले मुलामुलींचे प्रमाण असेल तर हा सगळा मंगळवर्षाव कुठे गायब झाला? हे सगळे बाळ जलमल्यावर पत्रिका करतानाच समजत असेल ना? अशांचा एक क्लब स्थापन व्हावयास हवा. ;) लोकांच्या डोक्यातून हे प्रकार जायचे तेंव्हा जातील पण तोपर्यंत अनेक मुलामुलींना शहीद व्हावं लागतय ना!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

रेवती 01/03/2014 - 17:59
आता तुम्ही एवढं सुचवताय आणि अपर्णाही मदतीला तयार आहे तर 'मंगळ्ये विवाहोत्सुक मंडळ' सुरु करावे व मंगळवार पेठेमध्ये दर मंगळवारी एक मिटींग भरवावी असा विचार आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

आयुर्हित 01/03/2014 - 18:44
अगदी PHD साठी लिहिलेली लेखमाला वाटते आहे. जुनी व नवीन पुस्तकांचे संदर्भ उपयोगी ठरतील. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा नव्हेच ती तर अंधश्रद्धा ठरते. प्रबोधन करण्याचा उत्तम प्रयत्न आहे. पण अजूनही भरपूर scope आहे त्यात सुधारणा करण्याचा व जास्त उपयोगी बनवण्याचा. ज्योतिष काय किंवा धर्म काय मनुष्यजातीला/समाजाला एका उच्च दर्जा प्रदान करण्याचे एक साधन आहे व त्याचा तसाच उपयोग करण्यातच खरी धन्यता आहे. जर ते समाज जीवनाला खाली खेचत असतील, तर त्यात सुधारणा ही हवीच.

पैसा 01/03/2014 - 20:14
दगड, माती, वायु यांचे बनलेले आणि काहीवेळा "राहू केतू" असे अस्तित्त्वात नसलेले ग्रह माणसावर कसे काय परिणाम करतात ब्वॉ?

In reply to by पैसा

आयुर्हित 01/03/2014 - 20:34
मी पण आधी काहीही मानण्याच्या परिस्थितीत नव्हतो. पण जसेजसे अनुभव आलेत,त्यावरून मला तर १०१%खात्री पटली आहे कि काही तरी तथ्य आहे. आपल्याला खात्री करायची असेल तर नक्की आपली कुंडली ज्योतिषाला दाखवून पहाच एकदातरी.

In reply to by पैसा

आयुर्हित 01/03/2014 - 20:36
मी पण आधी काहीही मानण्याच्या परिस्थितीत नव्हतो. पण जसेजसे अनुभव आलेत,त्यावरून मला तर १०१%खात्री पटली आहे कि काही तरी तथ्य आहे. आपल्याला खात्री करायची असेल तर नक्की आपली कुंडली ज्योतिषाला दाखवून पहाच एकदातरी.

मृगजळाचे बांधकाम 01/03/2014 - 20:47
आमच्या घरासमोर संजय कुलकर्णी नावाचा ब्राम्हण मुलगा राहायचा ,चांगला एम ए पर्यंत शिकला होत,पूजा वगैरे सांगायचा.बिचाऱ्याला कडक मंगळ होता.३२ वर्षाचा झाला तरी लग्न जुळत नव्हते.मंगळ आहे म्हणून सगळीकडून नकार येत त्याला,शेवटी त्याने संतापात स्वताची पत्रिका बदलून टाकली,हीरोचे दोनच महिन्यात लग्न ठरले,आणि सुंदर बायको मिळाली,आता त्याला २ गोंडस मुले आहेत.या गोष्टीला आता १२ वर्षे झाली,चं संसार सुरु आहे दोघांच,आता बोला!!

In reply to by मृगजळाचे बांधकाम

साळसकर 01/03/2014 - 23:12
जर त्याने पत्रिका बदलली आहे हे तुम्हाला माहीत आहे, इथेही तुम्ही उघडपणे सांगत आहात तर हे त्याच्या सासरच्यांना कसे नाही समजले? की सात-आठ वर्षे सुखाचा संसार झाल्यावर त्याने हे उघड केले? मुळात मुद्दामहून उघड करायची गरज नव्हतीच कारण त्याने समोरच्या पार्टीला नाही म्हटले तरी फसवणूक झाल्यासारखे वाटणारच. असो, तरीही उघड केल्यावर मग त्याच्या सासरच्यांनी हे सहजपणे सिकारले का? अविश्वास दाखवतोय असे समजू नका, पण प्रश्न तर पडलेत इतके सारे..

मृगजळाचे बांधकाम 02/03/2014 - 22:39
लग्न झाल्यावर त्याला मी विचारले होते,कसे काय ठरले वगैरे ,मंगळाची अडचण आली नाही का,,तेव्हा त्याने सांगितले कि मी पत्रिकाच बदलून घेतली आहे.त्याच्या सासरी तो सांगून कशाला संकट ओढून घेईल.अजून एक घडलेला प्रकार सांगतो तुम्हाला मी तेव्हा दापोलीला नोकरी निम्मित होतो,माझ्यासोबत माझ्या सहकारी होत्या mrs धामणे म्हणून देवरुख च्या.त्यांना त्यांच्या लग्नाच्या वेळी एक नाड दोष सांगितला होता,आता त्यांच्या लग्नाला २६ वर्षे पूर्ण झाली,त्यांना हि २ हुशार अपत्ये आहेत,त्यांचे पती आदर्श शिक्षक होते ते कायम आम्हाला हि गोष्ट सांगत,आता बोला

बॅटमॅन 06/03/2014 - 14:26
पत्रिका बदलून जीवन सुखी झालेली उदा. तर माझ्याही पाहण्यात आलेली आहेत. असे फशीवगंडीव करता येत असेल तर त्या ज्योतिषाची सुरळी करून त्याला धुरी द्यायला हर्कत नसावी!

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 06/03/2014 - 14:46
इथं ज्योतिषाची सुरळी, वर मंगळाची सुरळी... त्यावरुन आठवलं 'सुरळीच्या वड्या' खाल्ल्या नाहीत बर्‍याच दिवसात! ;)

पैसा 06/03/2014 - 14:52
हे काय प्रकरण आहे म्हणून शोधले तर जुन्या ज्योतिषांमधे 'मंगळदोष' असले काही प्रकरण मानत नव्हतेच असे वाचायला मिळाले. हे नंतरच्या लोकांनी काहीतरी पूजा बिजा करून दक्षिणा मिळवण्यासाठी काढलेले प्रकरण दिसते आहे. अशाच आणखीही काही लिंक्स उपलब्ध आहेत. त्यात आणखीही बर्‍याच गोष्टी असतील तर मंगळाचा दोष असे म्हटले आहे. http://simpleastroguide.blogspot.in/2013/03/manglik-dosha-patrika-matching.html http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/2012/04/blog-post_20.html मंगळदोष वगैरे असल्या समजुती कोण पसरवतो त्यांना शोधून पोकळ बांबूचे फटके द्यायला पाहिजेत!

कंजूस 07/03/2014 - 15:26
कोणी पसरवत नाही . त्या मंगळ असलेल्या वधुवरांच्या याद्या सूचक मंडळांत वेगळ्या ठेवलेल्या असतात ."Handle with Care".