Skip to main content

मराठी माध्यम की इंग्लिश मिडीयम

लेखक नर्मदेतला गोटा यांनी शुक्रवार, 26/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील सगळ्या घरात सध्या एक अगदी चर्चेचा मुद्दा असतो. तो म्हणजे मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचे की इंग्लिश मिडीयमच्या शाळेत. याचे नेमके उत्तर कुणाकडेच नसते. इंग्लिश माध्यमामधे मुलाला घालणारे पालक काही स्वतः फाडफाड इंग्लिश बोलत नसतात. त्यांना मराठीचे प्रेम नसते असेही नाही पण यामुळे मुलाचे भले होइल असा एक विचार मात्र असतो. मराठी काय मुद्दाम शिकायला लागत नाही. ती आसमंतात असतेच पण व्यवहारामधे, नोकरीसाठी इंग्लिश आवश्यक आहे असा एक समज या पालकांचा असतो. इंग्लिशचा पोटापाण्याशी फार पूर्वीपासून संबंध जोडण्यात आला आहे. आता राज्यकर्त्यांमुळे अनेक गोष्टी बदलतात. हेही खरे. आज शाळेत अरबी फारसी किंवा तुर्की कंपलसरी केले तर ? पण एके काळी अरबी फारसी आणि काही प्रमाणात तुर्की या भाषा गरजेच्या होत्या. इंग्रजी अंमलानंतर अनेक गोष्टी बदलल्या. इंग्रजीचे आगमन झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांविरुद्ध लढणार्‍या अनेक स्वातंत्र्ययोद्ध्यांना इंग्रजीचे उत्तम ज्ञान असे. खरी पंचाइत स्वातंत्र्यानंतर झाली. इंग्रज गेल्यानंतर इथल्या राज्यकर्त्यांपैकी काही हटवाद्यांनी इंग्रजांच्या अनेक गोष्टींबरोबरच इंग्रजीही हटविली. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पिढीला अनेक शैक्षणिक प्रयोग अनुभवायला लागले. परिणाम त्यांच्या इंग्रजीवर झाला. तोपर्यंत महाराष्ट्रातील अनेक शासकीय कार्यालयांचेही बर्‍यापैकी मराठीकरण झाले होते. याला कोणतेच शासकीय खाते अपवाद नाही. त्यामुळे किमान शासकीय सेवेत नोकरी मिळायला अडचण येत नसे. पण इंग्रजीचा न्यूनगंड निर्माण झालाच. मग आपल्याला नाही तर मुलांना तरी हे हाल भोगायला लागू नयेत. या विचाराने इंग्रजीकडे वळणारेही काही पालक आहेत. या सगळ्यातून असे दिसते की पाल्याला इंग्रजी / मराठी माध्यमाच्या शाळेत घालताना आपली संस्कृती टिकवायची किंवा बुडवायची यापेक्षा उद्याच्या जगात पाल्य नीटपणे आपल्या पायावर उभा रहावा एवढाच विचार असतो. काही जणांना वाटते मराठीमुळे भले होइल, काहींना वाटते इंग्रजीमुळे भले होइल. अनेकजण जे दहावीपर्यंत मराठीतून शिक्षण घेतात ते पुढे अकरावी सायन्सला विनातक्रार इंग्लिशमधून अभ्यास करतात. गुजरातमधे गुजरातीतून इंजिनयरींग करण्याची सोय आहे. तसे महाराष्ट्रात नाही. आजूबाजूला नजर टाकली तर आयुष्यात यश मिळवलेल्या अनेक यशवंतांपैकी अनेकजण मराठीमधे शिकलेले आढळतात तर अनेकजण इंग्रजीमधे शिकलेले. म्हणजे मराठी कि इंग्रजी या निश्कर्षापर्यंत येणेही अवघड होऊन बसते. बरं सामान्य माणसाला दोन्ही माध्यमांचे समर्थन खरे वाटते आणि कन्फ्युजन आणखी वाढते. इंग्रजीमधे शिकलेल्या अनेक लोकांना मराठी साहित्य वाचताना अडचणी येतात. मराठी मधले बारकावे, अलंकार समजत नाहीत. पण रोजीरोटी मराठीवर अवलंबून नसल्याने त्यांचे काही अडत नाही भले त्यांचे सगळे आयुष्य इंग्लंडमधे नव्हे तर महाराष्ट्रातच जाते. आता पुण्यामंबईत पूर्वीसारख्या दर्जेदार मराठी शाळा राहील्या आहेत कुठे ? असा प्रश्नही कानी पडतो. यातही महाराष्ट्र सरकारचे धोरणही मराठी शाळांबाबत दुजाभावाचे आहे. नव्या मराठी शाळांना परवानगी मिळत नाही. मिळाल्यास अनुदानापाशी अडते. त्यामुळे लोकांनाच मराठी नको आहे यापेक्षा शासनालाच मराठी शाळा नकोशा झाल्या आहेत. अजून एक गोष्ट. आमच्या परिचयातील एक मुलगी. तिला कंपनी फ्रान्सला पाठवणार होती. याकरीता जुजबी फ्रेंच ती शिकत होती. तिचे एकच म्हणणे असे, इंग्लिशशी झगडण्यात इतकी वर्षे गेली. ते पुरेसे नाही म्हणून आता फ्रेंच शिकावे लागते आहे. त्यामुळे पडलेला प्रश्न हा आहे की संस्कृती कशी टिकेल यासाठी नव्हे मुलांच्या रोजीरोटीसाठी कोणते माध्यम योग्य ? इंग्रजी माध्यमात शिकले तरी पुढच्या पंधरा वीस वर्षांनंतर इंग्रजीचे तितके महत्त्व शिल्लक राहील का ? की उद्या जर्मन, फ्रेंच, जपानी, चीनी इ. भाषा शिकाव्या लागणार आहेत! तेव्हा नेमके कोणते माध्यम निवडावे ? हा मोठा प्रश्न आहे.

वाचने 55303
प्रतिक्रिया 151

प्रतिक्रिया

कोणत्याही भाषेत शिकावे, पाया पक्का पाहिजे. नाहीतर एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था होते.

निर्णय घेण्यास माझी मी मुखत्यार असते तर माझी मुलगी मराठी मिडीअम मध्ये शिकली असती. तिला मराठीचा गोडवा पूर्ण कळणार नाही ही एक सल राहून गेलेली आहे. मराठी मिडीअम मध्ये शिकून माझा काडीचाही तोटा झालेला नाही उलट मी कविता वाचून, जयवंत दळवी, पुलं, जी ए अशा लेखकांचे साहीत्य वाचून खूप खूप श्रीमंत झाले असे म्हणेन.

In reply to by भावना कल्लोळ

माझी पण हीच साल आहे.
याच विषयावरच्या धाग्यावर दिलेल्या प्रतिसादातला भाग चिकटवण्याचा मोह होतोय. अवांतरः एक स्नेही अगदी नाईलाजाने अमेरिकेत रहायला गेले. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणजे त्यांना तिथलच नागरिकत्व मिळालं. तिथंच मुलंही झाली. आता त्यांची कितीही इच्छा असली तरी तिथे मराठी माध्यमातली शाळा असणं शक्यच नाही. त्यामुळे मनावर दगड ठेउन त्यांना मुलांना नरक यातना भोगायला इंग्रजी शाळेत घातलं. बिचारे, सगळ्या आप्तांना मराठी विषयीची कळकळ बोलून दाखवतात, पण दैवाचं दान थोडंच मनाप्रमाणे पडतं? पण अमेरिकन.. नाही बृअहन्महाराष्ट्रातलं विश्वमराठी साहित्य संमेलनाला वगैरे हजेरी लाउन थोडं बरं वाटतं म्हणतात. असो.

In reply to by भावना कल्लोळ

माझी पण हीच साल आहे.
भावनाताई, भावना पोहचल्या.. पण जरा टायपतांना बघा हो. आणि मला वाटतं, हे वाक्य "मला पण तोच सल आहे." असं असायला हवं.. :-) (सेमीइंग्लीश माध्यमातला मराठी) चिगो

मराठी'च'. संबंधच नाही दुस-या 'मिडियम' चा. घातलं धोतर सोडून दुस-याच्या जीन्स च्या मागे लागण्याचा हा जो काही खुळचट पणा या देशात फोफावलाय, तो देशाचा (पूर्णपणे) घात करेल. देश सोडा, मराठी माणसं का अशी विचारदरिद्री होत आहेत, हे अनाकलनीय आहे. हॅप्पी गुढीपाडवा म्हणणा-यांच्या जशी मुस्काटात वाजवावीशी वाटते तशीच आपल्या मुलांच्या आयसीएसई आणि सीबीएसई शाळांचे गोडवे मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू ची थोरवी गात आसल्यागत गाणा-यांच्याही वाजवावीशी वाटते. आणि मग साने, जोशी, कुलकर्णी अशी आडनावं असलेली ही (नावाला मराठी) मुलं चार लोकात म्हणतात, 'सॉरी माझं मराठी इतकं चांगलं नाही.' 'मोगरा फुलला' सारखी गाणी त्यांना 'हाय फाय मराठी' वाली गाणी वाटतात. कारण त्यांची मजल कोंबडी पळाली च्या पुढे जातच नाही. ते तरी कळतं का कुणास ठाऊक. हे म्हणजे चोर घर लुटून नेतायत; आणि मंडळी एक एक कुलुप स्वतः उघडून देतायत, असं झालं. कमॉन! आपली भाढा आहे. शिक्षण आपल्या मातृभाषेतून आणि आपल्या मातृभाषेतूनच झालं पाहिजे. परदेशी असाल, इलाज नसेल तर ठीक; पण त्या जागी तुमची जबाबदारी इतरांपेक्षा दुप्पट असते. कारण तुम्हाला मराठी शाळा नसूनही त्या मुलाला मराठीत 'रुजवायचं' असतं. झाडं आभाळात वाढली तरी बीज हे मातीतच रुजलेलं असतं. मुळं जमिनीतच वाढलेली असतात. तीच झाडं मजबूत असतात. बाकी सगळी बांडगुळं. - अ. ज. ओक

महाराष्ट्रातील सगळ्या घरात सध्या एक अगदी चर्चेचा मुद्दा असतो. तो म्हणजे मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचे की इंग्लिश मिडीयमच्या शाळेत.
बहुदा तुम्ही हा लेख २०-२५ वर्षे उशीरा लिहिला आहात असे वाटते.सध्या कुठेही (निदान शहरांमध्ये तरी) या विषयावर चर्चा चालत असेल असे वाटत नाही.आता याविषयीचा निर्णय म्हणजे मुलांना इंग्लिश शाळेतच घालायचा पक्का आहेच. आमच्या घरी कामाला येणार्‍या बाईची मुलगी इंग्लिश मिडियममध्येच जाते.आता बोला. मी शाळेत असताना अगदी कट्टर मराठीवाला होतो.आता मला जाणविते की मी भविष्यात नोकरीनिमित्त महाराष्ट्राबाहेर किंवा देशाबाहेरही जाऊ शकेन.अशा परिस्थितीत माझ्या मुलांना मराठी शाळेत टाकणे म्हणजे गाढवपणा ठरेल. असो.

In reply to by क्लिंटन

क्लिंटनसाहेबांशी सहमत. माझ्या पहाण्यात तरी निदान शहरी महाराष्ट्रात या विषयावर आगगाडी ठेसन सोडून कधीच निघालेली आहे (मराठीत, "द ट्रेन हॅज लेफ्ट द स्टेशन!!") एक पालक म्हणून विचार करायचा झाला तर आपला/ली पाल्य ज्या वातावरणात वाढत आहे आणि त्याहीपेक्षा ज्या वातावरणात त्याने भविष्यात वावरावं असं त्याला आणि आपल्याला वाटतं त्या वातावरणात वापरात असलेली भाषा त्या पाल्यासाठी योग्य होईल. हे फक्त आमचं मत आहे, कुणाला पटत नसल्यास सोडून द्यावं, आजकाल वादावादी करायचा उत्साह राहिलेला नाही.... आणि आजकालच्या दृक-श्राव्य (मराठीत "ऑडिओ-व्हिज्युअल") जमान्यात मुलांना संस्कृती कळण्यासाठी भाषेची फारशी अडचण येत नाही असा अनुभव आहे... "फॅविट्रा रिष्टा मधली फूर्वी ही ओव्हीपेक्षा जास्त क्यूट आहे!" हे ज्ञान आमच्या चिरंजीवांनी आम्हां उभयतांना ऑलरेडी दिलेलं आहे!!! त्याला संस्कृतीमधलं मुद्द्याचं ते सगळं कळतं हे पाहून आम्ही आनंदी झालो आहोत!! :)

कोणत्याही शाळेत टाकलं तरी शेवटी आजची परिस्थितीनुसार पाल्याला जागतीक बाजारपेठेत तग धरायचा असेल तर इंग्रजी वाचून पर्याय नाही. कोणी जपान जर्मनीचं उदाहरण देऊन पाहिल, पण आपल्या देशाची परिस्थीति वेगळी आहे. शिवाय शाळेत असताना पाल्य पुढे कोणत्या क्षेत्रात जाणार आहे हे आपण (किंवा पाल्य) ठरवू शकत नाही. अशा वेळी त्याला जास्तित जास्त संधी उपलब्ध होतील हे पाहणे पालकांच्या हातात असते. मराठी माध्यमातील मुलांना कॉलेजमधे अचानक इंग्रजीतून शिक्षण घ्यावे लागल्याने त्यांच्यात न्यूनगंड किती बळावतो हे मी स्वतः अनुभवलेले आहे. शाळेत असताना हुशार म्हणून गणलेला मुलगा/मुलगी पुढे पास होण्यासाठी सुद्धा धडपडतो ह्याच्या फार विचित्र परिणाम होऊ शकतो. विषेशतः त्या आडनिड्या वयात मुलं पालकांशी यावर बोलतीलच असं नाही. मग अशातून काही मुलं फारच निराश होऊन जातात किंवा कोडगी होतात. अर्थात सगळी अशी होतात असं नाही. पण होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.

In reply to by मराठे

मला तरी सध्या जागतिक अर्थकारण हे जास्त प्रभावी आहे असं वाटतं. कारण मी स्वतः रोज पाह्तो आहे की उर्वरीत युरोपातून बरेच लोक सध्या 'स्वित्झर्लंड्'मधे नोकरी करायला आलेले आहेत, आणि ते आपपल्या भाषेचा अभिमान बाळगून जर्मन भाषा (झुरिच मधे जर्मन भाषेचा प्रभाव जास्त म्हणून) शिकत आहेत. पण येथील बहुसंख्य उद्योगांमधे कार्यालयीन कामकाज हे मात्र इन्ग्लिश मधूनच चालते ... नव्हे तसं ते इन्ग्लिशमधेच चालावे यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. आता ह्यमागील अर्थकारण असं की इन्ग्लिशमधून कामकाज आणि संपर्कयंत्रणा चालवल्यास 'नजीकच्या भविष्यात' आउट्सोर्सिंग करणे आणि त्या अनुषंगाने खर्च कमी करणे सोपे ... मला स्वतःचा अनुभव सांगतो. मी सेमी इंग्लिश मधून आणि नंतर फर्गसन मधून पूर्ण इंग्लिश्मधून शिक्शन घेतले. पण अवतीभवतीच्या तर्खडकरी सांस्कृतिक वातवरणामुळे शालेय शिक्षणाच्या काळात इंग्लिश 'बोलण्या'चे कौशल्य विकसित झालेच नाही. शिवाय कॉलेज संपल्यानंतर सुद्धा ३/४ वर्षे सदाशिवपेठी वातवरणातील उद्योगातच नोकरी, त्यामुळे इंग्लिश संभाषणाची वानवा ... नंतर जसजसे बहुसांस्कृतिक उद्योगांत कामं करू लागलो तसतसे इंग्लिशचे तर्खडकरी ज्ञान किती तोकडं पडतं त्याची जाणीव व्हायला लागली ... मग रोज २/३ तास 'टाइम्स' आणि 'एक्सप्रेस्' वाचून शब्दसंग्रह वाढवत शेवटी कुठे थोडं थोडं इन्ग्लिश बोलायला लागलो. पण दरम्यानच्या काळात 'अमराठी' सहकारी फारसं वेगळं कौशल्य नसून सुद्धा उगाचच 'चमकून' गेले. आता एवढा स्वानुभव गाठिशी असताना मी माझ्या पुढील पिढीला त्याच दुष्ट्चक्रात कशाला ढकलावे? सांस्कृतिक मराठी जडणघडण करण्यासाठी मराठी बोलणे, तू-नळीवरील पु.ल. देशपांडे ह्यांचे कथाकथन वगैरे कार्यक्रम तसेच बोली मराठीतील म्हणी, वाक्प्रचार इतपत पुरेअसे वाटते. माझ्या मुलीला आता पु.ल. देशपांडे, प्रा. लक्ष्मण देशपांडे, हसवाफसवी मुळे दिलीप प्रभावळकर हे सर्व माहिती आहेत. शिवाय झुरिचमधील जर्मन शाळेत शिकत असल्यामुळे ती जर्मन देखील बोलू लागली आहे. नुसतेच साहित्यिकदृष्ट्या मराठी भाषेची श्रीमंती काय उपयोगाची? त्यापेक्षा बहुभाषिक बनून जागतिक स्तरावर पोचून अधिक अधिक अर्थार्जन करून मराठी अस्मितेला उंचावर नेऊन ठेवण्यास काय हरकत आहे?

In reply to by sagarparadkar

झुरिचमधील मराठी मित्रपरीवारात एक छोटी मुलगी अशीही भेटली जिची आई मराठी आहे आणि वडील 'स्विस' आहेत. तिच्या बाबांनी अनेक वर्षं भारतात राहून भरत्नाट्यम आणि इतर पारंपारिक भारतीय शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं आहे, आणि ती मुलगी अस्खलित मराठी, जर्मन आणि इंग्लिश्सुद्धा बोलतेय, तेसुद्धा वयाच्या १२ ते १४ य वयोगटात असतानाच !

ह्याचं एकच एक उत्तर देणं (म्हणजे हे किंवा ते) हे चुकीचेच नाही तर वेडेपणाचं आहे. मुख्यतः कुटुंबातिल वातावरणावर खूप अवलंबून आहे. बरेचदा लोकं असे प्रश्न सोडवताना व्यावसायिक यश, समाधान, संधी ह्यांची साहित्यातून मिळणार्‍या आनंदाशी/ संसकृतीशी अनाठायी तुलना करू लागतात. संस्कार हे घरातून आधी आणि शाळेतून नंतर येतात, हे ध्यानात ठेवायला हवं! सामान्यतः वाचनाची/ भाषेची आवड ही घरातल्या परिस्थितीवर/ वातावरणावर अवलंबून असल्याचं दिसतं. (कुठल्याही कारणाने म्हणा) इंग्रजी ही व्यवहाराची, प्रगतिची, जागतिक भाषा असल्याने ज्यांच्या कक्षा विस्तारल्यात ते इंग्रजीतूनच शिक्षण घेणार, प्रगतीशील समाजात तसं होणारच!. माझा वैयक्तिक अनुभव असा की, दहावीतून अकरावीत गेल्यावर इंग्लिश माध्यमातून गणित/ विज्ञान विषय शिकण्याचा सराव करण्यात सहा-आठ महिन्याचा अमूल्य वेळ गेल्याने (आणि मग बारावी समोर उभी ठाकल्याने) आय आय टी तत्सम परिक्षांची तयारी करायला वेळच मिळाला नाही, अशी कैक हुशार मराठी मुले आहेत! * ह्यात आठवी, नववी, दहावी इंग्रजी माध्यमातून हा प्रकार नक्कीच स्तुत्य वाटतो!

भारतात राहून इंग्रजी शाळेत गेलेल्या माझ्या भाच्या पुतण्यांना चांगलं मराठी वाचता येतं. अगदी कादंबर्‍या वाचत असतील असे माझे म्हणणे नाही पण "सॉरी, माझं मराठी एवढं चांगलं नाही, यु नो!" असंही नाही. माझा मुलगा इंग्रजी माध्यमात शिकतो पण छोट्या मराठी गोष्टी वाचू शकतो. आताच्या वयात त्याने चिंवि, पुल वाचावेत असा आग्रह धरणे चुकीचे आहे. माझ्या इथे उपलब्ध असलेले, वयाला साजेसे चांगले इंग्रजी बालसाहित्य (आणि वयानुसार जे पुढे असेल ते) त्याने वाचावे असा आग्रह राहिलच. मराठीशिवाय इतरही भाषेत चांगले साहित्य आहे. तुम्ही ज्या देशात रहात असाल, मुले ज्या माध्यमातून शिकत असतील त्यातले चांगले वाचायलाच हवे. यासाठी भारतातील पालक किती आग्रही असतात हे माहित नाही पण माझ्या आजूबाजूला (मित्र) आहेत ते बर्‍यापैकी आग्रही असतात. आता माझे जे नातेवाईक पंजाबात, दिल्लीत राहतात आणि तिथेच राहणार आहेत ते इंग्रजीबरोबरच हिंदी आणि पंजाबी साहित्य वाचतात. त्यातील चांगल्या उतार्‍यांचे भाषांतर असलेल्या इ मेल्स कधीतरी आम्हाला येतात. त्यांच्याकडे इंग्रजीबरोबरच पंजाबी वर्तमानपत्र रोज घरी येते. बंगळुरास राहणार्‍या मराठी लोकांची मुले कन्नड वाचायला लागतात. माझी कोकणी मैत्रिण उत्तम कन्नड साहित्य वाचते. आता ती कोकणात राहू नाही शकली त्याला काय करणार. आईवडील जिथे राहतात तिथेच आपण लहानपणी राहतो. फक्त चांगले वाचण्याबद्दल आग्रही असण्याशी कारण! अगदी मराठी माध्यमात शिकणारी आजची मुले मुली तरी किती आणि काय वाचत असतील हा संशोधनाचाच विषय आहे.

In reply to by रेवती

भारतात राहून इंग्रजी शाळेत गेलेल्या माझ्या भाच्या पुतण्यांना चांगलं मराठी वाचता येतं. अगदी कादंबर्‍या वाचत असतील असे माझे म्हणणे नाही पण "सॉरी, माझं मराठी एवढं चांगलं नाही, यु नो!" असंही नाही.
माफ करा; पण यात कौतुक नाही. ते यायलाच हवं.

In reply to by वेल्लाभट

तुम्हाला कदाचित ते कौतुकास्पद वाटत नसेल, नसू द्या. ते माझे भाचे, पुतणे आहेत म्हणून मला काय वाटायचे ते मलाच ठरवू द्या.

In reply to by रेवती

महाराष्ट्रात असतील ते तुमचे भाचे पुतणे तर, शाळेत मराठी विषय असतो. त्यामुळे कित्येक अमराठी मुले सुद्धा मराठी व्यवस्थित वाचतात. शिवाय लिपी देवनागरी आहे ना. हिंदीची पण तीच असते. घरी मराठी बोलत असतील आणि शाळेत हिंदी वाचायला शिकवले तर मराठी वाचणे फार अवघड नाही ना ? कौतुक वाटण्याला आक्षेप नाही आहे. अवांतर :- माझा १० वर्षाचा भाचा आहे. सर्दी झाली कधी तर आपला शेंबूड आपणच पुसतो. अगदी कुण्णाकुण्णाची मदत न घेता. या गोष्टीचे मला भयंकर कौतुक वाटते ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

सहमत. परदेशी रहाणार्‍यांना आपली मुलं भारतातल्या... आय माय स्वारी इंडीयातल्या आजी-आजोबांशी मराठीत बोलतात याचंही कौतिक देखिल असतं विमे, आहात कुठं, व्हेअर आर यू? ;)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

विश्वनाथ मेहेंदळे, तुमचा उपप्रतिसाद आवडला नाही. तुमच्याशी आपण होऊन संवाद साधणे नेहमी टाळत आले आहे. अर्थातच तुम्हाला ते माहित हवे असा आग्रह नाही. यापुढे मला उपप्रतिसाद न दिल्यास उत्तम. द्यायचा असेलच तर निदान बर्‍या उद्देशाने द्यावा हे सांगणे, त्यातील असह्मती व्यक्त करायची असल्यासही चालेल. तुमच्या उपप्रतिसादाने आणखी चारजणाचे फावलेले मी बघतीये. मला ते आवडलेले नाही हे स्पष्टपणे सांगतीये. नुसते बरे शब्द वापरले की काम झाले असे नसते. मला वाटते पुरेसे स्पष्ट सांगितलेले आहे.

In reply to by रेवती

विश्वनाथ मेहेंदळे, तुमचा उपप्रतिसाद आवडला नाही. तुमच्याशी आपण होऊन संवाद साधणे नेहमी टाळत आले आहे. अर्थातच तुम्हाला ते माहित हवे असा आग्रह नाही.
हे मला माहित असण्याचे काही कारण नव्हते आणि अजूनही त्यामागचे कारण माहित नाही. तुम्हाला वैयक्तिक दृष्ट्या माझ्याबद्दल काय तक्रार आहे ते मला माहित नाही. तुम्हाला सांगायचे असेल तर ऐकायला माझी हरकत नाही. सांगायचे नसेल तरी काहीही हरकत नाही. एकतर कुणाला आवडावे म्हणून मी प्रतिसाद देत नाही. मी माझा मुद्दा मांडतो. तो तुम्हाला आवडला नाही हा तुमचा प्रश्न आहे.
यापुढे मला उपप्रतिसाद न दिल्यास उत्तम. द्यायचा असेलच तर निदान बर्‍या उद्देशाने द्यावा हे सांगणे, त्यातील असह्मती व्यक्त करायची असल्यासही चालेल.
मुळात मी प्रतिसाद कुणी दिला आहे हे पाहून खाली लिहित नाही. या पुढेही तसे करण्याची इच्छा नाही. सबब ही सूचना/विनंती मान्य करता येणार नाही. आज्ञा असेल तरीही नाही. माझा प्रतिसाद बऱ्या उद्देशाने दिला नव्हता हे तुम्हीच ठरवलेत ?? वैयक्तिक राग तुमचा आहे माझ्यावर. माझा तुमच्यावर नाही. त्यामुळे मला मुद्दाम वाईट उद्देशाने लिहिण्याचे काही कारण नाही. मला तर कधी तुमच्याशी वाद झालेला पण आठवत नाही.
तुमच्या उपप्रतिसादाने आणखी चारजणाचे फावलेले मी बघतीये. मला ते आवडलेले नाही हे स्पष्टपणे सांगतीये.
त्याला संकेत स्थळाचा format कारणीभूत आहे. मी काय करु ?? शिवाय तुमच्या आवडीनिवडी जोपासायला मी इथे येत नाही.
मला वाटते पुरेसे स्पष्ट सांगितलेले आहे.
स्पष्टपणा आवडला. माझाही तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

तुम्ही माझ्या प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊ नये हे सुचवल्यावर आलेला हा प्रतिसाद पाहून खरेच उद्धटपणाची कमाल झाली आहे असे म्हणते.

In reply to by रेवती

मी सद्गुणांचा पुतळा आहे असा दावा कधीच केला नाही. उद्धट तर उद्धट. Frankly, I don't give a damn. माझ्या आयुष्यातले निर्णय मी तुम्हाला विचारून घेत नाही. माझ्यापुरता विषय संपला... Rhett विमे Butler

मी स्वतः इंग्रजी माध्यमात शिकले आहे तरी मला मराठी साहित्य वाचायला खूप आवडतं. माझी आई इंग्रजी माध्यामात शिक्षिका होती तरीही ती मला व माझ्या मोठ्या बहिणाला लहानपणापासून मराठी पुस्तकं, कांदबर्‍या वाचायाला लावायची. इंग्रजीइतकेच मला मराठी वाचनाची आवड आहे किंबहुना जास्तचं आहे. मिसळपावावर माझे येणं त्याच कारणासाठी झाले. माझी भाची इंग्लडात राहते, शाळा अर्थातच इंग्रजी माध्यम आहे पण घरी आई-बाबांशी ती शुध्द मराठी बोलते. आपल्या भाषेची ओळख तिला लहान असताना दादा-वहिनीने करुन दिली . बाराखडी तिच्याकडून गिरवून घेणं, बालगीते शिकवणं, लहान मुलांच्या गोष्टी वाचायला देणं, आपले श्लोक म्हणवून घेणं, सणासुदीचे महत्व समजावून सांगणे, ह्यामुळे ती जसे फाडफाड इंग्रजी बाहेर बोलते तसेच अस्खलित मराठी घरी बोलते. भारतवारीत तिला तिथे नातलंगाशी अगदी व्यवस्थित बोलता येतं न लाजता न अडखळता. माझा नवरा मराठी माध्यमात शिकला असून त्याला इंग्रजीशी जुळवून घेताना कठिण गेले नाही . शेवटी ते आपल्यावर आहे आपण जसे शिकत गेलो तसेच आपण आपल्या मुलांना शिकवू /घडवू शकतो.असो.

खरं हे आहे की निरर्थक आणि सोयीस्कर कारणांसाठी इंग्रजीची वकीली करणा-यांना मराठी म्हणवण्याचा कमीपणा वाटतो. दुर्दैवी आहे हे. त्यांना याचा बोध होईल तोवर खूप उशीर झालेला असेल; त्यांच्यासाठी. आपल्या मातेचं नाव घ्यायला ज्याला कमीपणा वाटतो तो करंटा होय.

अलबत इंग्रजी भारतात अनेक भाषा ह्या राज्य भाषा असल्या तरी महाराष्ट्रात दहावीनंतर इंग्रजीतून शिक्षण अनिवार्य आहे. जर्मनीत सर्व शिक्षण जर्मनीतून होते कारण संपूर्ण देशात एकाच भाषा बोलली जाते. जर भारताची फाळणी झाली असती व महाराष्ट्र एक स्वतंत्र राष्ट्र असते तर मराठीतून शिक्षण ही संकल्पना समजू शकतो. पण आपल्या भारतात प्रत्येकाचा प्रांतिक भाषिक अभिमान कम दुराभिमानाचे दाखले इतके वेळा निदर्शनाला येतात की त्यामुळे परकीय भाषा इंग्रजी ही खरे तर एक समान भाषा म्हणून देशात प्रचलित झाली पाहिजे. माझे काही आफ्रिकन मित्र मला सांगतात. त्यांच्याकडे बहुतेक लोक हे त्यांची स्थानिक भाषा व इंग्रजी बोलतात. अर्थात हे खुपदा हे इंग्रजी खेडवळ इंग्रजी ह्या प्रकारातले असते त्यांच्यात व्याकरणाचे ,नियम हे खुपदा गैरलागू असतात. फ्रेंच वसाहत असणारे मोरिशश किंवा आफ्रिकन राष्ट्रे त्यांची स्थानिक भाषा व फ्रेंच अस्स्खलित बोलतात. भारतात अनेक राज्यात हिंदीला संपर्क भाषा असण्याच्या बाबतीत असलेला रोष पाहता इंग्रजी त्याला उत्तम पर्याय होऊ शकते. राहिला प्रश्न मराठी साहित्य व कवितेचा तर माझ्या मते ही पालकांची जबाबदारी आहे. आज आम्हाला पालकांनी इंग्रजी सिनेमे ,कादंबर्‍या , कविता वाचायला प्रोत्साहन दिले नाही आम्ही मराठी माध्यमात असलो तरी ह्या भाषेचे साहित्य , सिनेमे आम्हाला जसे जमेल तसे आत्मसात करत राहिलो. माझ्या दोन वर्षाच्या अबुधाबी च्या वास्तव्यात तेथे व दुबई मधील जन्मलेल्या मुलांचे मराठी भाषेवर प्रभुत्व विस्मयकारी होते. जो पर्यंत आपल्या समाजात विज्ञान व वाणिज्य उच्च व कलाशाखा कनिष्ठ मानण्याचा प्रकार चालू राहीन तो पर्यंत भाई म्हणतात तसे आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. "उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुरी घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवतील., पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल." हे नावापुरता उरले आहे. आपल्याकडे घोका आणि परीक्षेत ओका ह्या न्यायाने शिक्षणाचा उपयोग शिक्षित होण्यासाठी करतो , सुसंस्कृत होण्यासाठी नाही. शेवटी ब्रीद वाक्य हे कशासाठी पोटासाठी एवढेच जर असेल. अश्या अवस्थेत तुम्ही कोणत्याही माध्यमात शिकले तर फरक पडत नाही. शेवटी भाई म्हणतात त्या प्रमाणे माझ्या एक सामान्य आर्थिक परिस्थितीतले स्नेही आपल्या आठनऊ वर्षांच्या मुलाला घेऊन गाण्याच्या बैठकीला आले होते. मी विचारले, "मुलाला गाण्याची... आवड आहे वाटतं?" ते म्हणाले, "नक्की सांगता येणार नाही मला, पण लागावी अशी इच्छा आहे. गेल्या खेपेला कुमार गंधर्वाच्या गाण्याला घेऊन गेलो होतो. आज ह्या गाण्याला यायचंय का, असं विचारलं आणि 'हो' म्हणाला, म्हणून आणलं. त्याला लागलीच चांगल्या गाण्याची आवड तर आनंदाचा धनी होईल. दुसरी काय इस्टेट देणार मी त्याला? आयुष्यभर बरोबर बाळगील अशा चार चांगल्या आठवणी देतो-" 'संस्कार' ह्याचा अर्थ ह्या बापाला कळला असे मला वाटते. मराठी अभिजात व नवजात साहित्य श्राव्य पुस्तकात रूपांतर होणे गरजेचे आहे. मी मातृभाषेतून शिक्षण घेतले. माझी पुढची पिढी तिच्या मातृभाषेतून येथे शिक्षण घेईन, ह्याचेच काहीसे समाधान मानायचे. .

स्वताच्या भाषेचा अभिमान जपण्याच्या नादात मुलांच्या भविष्याशी खेळू नका. उद्या पंधरा-वीस वर्षांनी तुमच्या मुलांनी तुम्हाला मराठी माध्यमात घातल्याबाबत दोष दिला तर मग पश्चाताप करायची वेळ ही निघून गेली असेल. ईंग्रजी माध्यमात शिकणारे मराठी संस्कार आणि संस्कृतीपासून दूर जातील ही कल्पना देखील खुळचटच. उलट अश्यांमार्फत महाराष्ट्रीयन संस्कृती देशोदेशी पोहोचेल मराठी ही मातृभाषा असल्याने मराठीशी नाळ जुडलेली असणारच, अट फक्त एकच - घरून तशी शिकवण द्या.

In reply to by तुमचा अभिषेक

ईंग्रजी माध्यमात शिकणारे मराठी संस्कार आणि संस्कृतीपासून दूर जातील ही कल्पना देखील खुळचटच.
+१.अशी मराठी संस्कार आणि संस्कृतीविषयी भिती वाटणे म्हणजे न्यूनगंडाचे लक्षण आहे.आणि लहानसहान कारणांवरून धर्म बुडेल अशी बकवास करणार्‍यांपेक्षा अशा लोकांची मानसिकता फार वेगळी आहे असे वाटत नाही फक्त ते धर्माच्या ऐवजी भाषा बुडेल असे म्हणतात.

In reply to by तुमचा अभिषेक

माफ करा पण बरेचसे मुद्दे पटले नाहीत.
स्वताच्या भाषेचा अभिमान जपण्याच्या नादात मुलांच्या भविष्याशी खेळू नका.
मराठी माध्यमात घालणे म्हणजे मुलांच्या भविष्याशी खेळणे?
उद्या पंधरा-वीस वर्षांनी तुमच्या मुलांनी तुम्हाला मराठी माध्यमात घातल्याबाबत दोष दिला तर मग पश्चाताप करायची वेळ ही निघून गेली असेल.
मुलं काय कशाबद्दलही दोषी धरतील एकुलतं एक मूल त्याच्या एकटेपणाबद्दल दोषी धरेल. मूलं नाचवतील तसं नाचायचं का हा प्रश्न आहे.
ईंग्रजी माध्यमात शिकणारे मराठी संस्कार आणि संस्कृतीपासून दूर जातील ही कल्पना देखील खुळचटच. उलट अश्यांमार्फत महाराष्ट्रीयन संस्कृती देशोदेशी पोहोचेल
कशावरनं सगळी इंग्रजी माध्यमातील मूलं देशांतर करतीलच अन कशावरनं मराठी माध्यमातील मूलं ते करणार नाहीत?

In reply to by शुचि

माझ्या आजुबाजुला ईंन्लिश मिडेयम मधुन शिकलेली अशी जनता आहे की त्यांना मराठीचं काही घेणं देणं नसतं, "बोलता येत आहे ना, तेवढं पुष्कळ झालं" असाही सुर असतो अनेकांचा.. आजच यांची अशी अवस्था आहे तर १० वर्षांनी पुढली पिढी काय करेल बरं?? :( कधी कधी वाटतं सेमी इंग्लिश हा पर्याय उत्तम. मातृभाषेची नीट ओळख होतेच, शिवाय सायन्स मधे करियर कराय्चं असेल तर सोन्याहुन पिवळे..

In reply to by कोमल

अहो कोमल ताई, वरती उपास दादानी हेच सागितले आहे. ह्याचं एकच एक उत्तर देणं (म्हणजे हे किंवा ते) हे चुकीचेच नाही तर वेडेपणाचं आहे. मुख्यतः कुटुंबातिल वातावरणावर खूप अवलंबून आहे. बरेचदा लोकं असे प्रश्न सोडवताना व्यावसायिक यश, समाधान, संधी ह्यांची साहित्यातून मिळणार्‍या आनंदाशी/ संसकृतीशी अनाठायी तुलना करू लागतात. संस्कार हे घरातून आधी आणि शाळेतून नंतर येतात, हे ध्यानात ठेवायला हवं! सामान्यतः वाचनाची/ भाषेची आवड ही घरातल्या परिस्थितीवर/ वातावरणावर अवलंबून असल्याचं दिसतं. (कुठल्याही कारणाने म्हणा) इंग्रजी ही व्यवहाराची, प्रगतिची, जागतिक भाषा असल्याने ज्यांच्या कक्षा विस्तारल्यात ते इंग्रजीतूनच शिक्षण घेणार, प्रगतीशील समाजात तसं होणारच!.

In reply to by शुचि

माफ करा पण बरेचसे मुद्दे पटले नाहीत.
माफ करा कशाला, मी मुद्दाम मुद्देच असे मांडतो की ते प्रथमदर्शनी पटू नयेतच, कारण चर्चेला सुरुवात इथूनच होते. मराठी माध्यमात घालणे म्हणजे मुलांच्या भविष्याशी खेळणे? मी मराठी माध्यमात शिकलोय, माझे बरेच मित्र मराठी माध्यमातील आहेत, सन्माननीय अपवाद वगळता थोडीफार बोंब लागलीच आहे सर्वांची. अन ही आजची स्थिती, पंधरा वर्षांनी तर ईंग्लिशला पर्याय नसेल. अर्थात हे माझे वैयक्तिक मत माझ्या अनुभव आणि निरीक्षणावरून बनवले आहे,जर आपले मत असे नसेल तर मराठी माध्यमाची कास धरण्यात हरकत नाही पण माझा मूळ मुददा हाच की तुम्हाला वाटत असेल की मराठीत शिक्षण घेतल्याने नुकसान न होता फायदाच होइल तरच तसे करा... मातृभाषेचा अभिमान वगैरे अश्या भावनिक गोष्टींच्या आहारी जाऊन तो निर्णय घेतलेला नसावा.
कशावरनं सगळी इंग्रजी माध्यमातील मूलं देशांतर करतीलच अन कशावरनं मराठी माध्यमातील मूलं ते करणार नाहीत?
थोडीशी गल्लत होतेय.. मराठी संस्कार अन संस्कृती पसरवणे साठी देशांतर गरजेचे नाही.

In reply to by तुमचा अभिषेक

थोडीशी गल्लत होतेय.. मराठी संस्कार अन संस्कृती पसरवणे साठी देशांतर गरजेचे नाही.
खरय!!

In reply to by तुमचा अभिषेक

मी मराठी माध्यमात शिकलोय, माझे बरेच मित्र मराठी माध्यमातील आहेत, सन्माननीय अपवाद वगळता थोडीफार बोंब लागलीच आहे सर्वांची.
तुमच्या मित्रांची बोंब लागली तर दोष मराठी माध्यमाचा कसा काय ?? मी पण स्वतः मराठी शाळेत शिकलो आहे. माझेही बरेच मित्र मराठी माध्यमातीलच आहेत. सगळ्यांचे उत्तम चालले आहे. माझ्याच शाळेतल्या वर्गातील मित्र आर्किटेक्ट पासून डॉक्टर, इंजिनीअर ते थेट चित्रपट निर्माता म्हणून काम करत आहेत. माझा एक मित्र जेजेतून कमर्शियल artist झाला आणि मग पुढील शिक्षणाला अमेरिकेत गेला. तिथे शिकताना अनेक स्पर्धात भाग घेऊन पहिला क्रमांक पटकावला. त्याचे जाहिरात क्षेत्रातील काम मी पाहिले आहे. मराठी माध्यमाचा कुठेही त्रास नाही झाला. माझ्या १-२ batch मागे पुढे असणारे अनेक जण असे कर्तृत्व दाखवत आहेत. शाळा तीच, कालखंड तोच आणि मित्रही त्याच विभागातले (गिरणगाव). तरीही इतका फरक का पडावा ??? थोडक्यात, चष्मा बदला... कुणाच्या नाकर्तेपणाचे खापर माध्यमावर फोडू नका.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

कोणत्याही शाळेत तुकडी अ पासून तुकडी फ पर्यंतचे विद्यार्थी असतात तसेच प्रत्येकाची ईंग्लिश कॅपचर करायची क्षमता भिन्न असते. तुम्ही जसे मित्र म्हणत आहात तसे माझेही मित्र आहेत. पण तशे मित्र आणि असे मित्र यांचे गुणोत्तर पाहता मी या निष्कर्शावर आलोय. थोडक्यात चष्मा बदलूच नका तर घालूच नका. उघड्या डोळ्यांनी जग बघा म्हणजे त्यात सारेच दिसतील. :)

In reply to by तुमचा अभिषेक

कोणत्याही शाळेत तुकडी अ पासून तुकडी फ पर्यंतचे विद्यार्थी असतात तसेच प्रत्येकाची ईंग्लिश कॅपचर करायची क्षमता भिन्न असते.
मग याचा परिणाम बालवाडी किंवा पहिलीत नाही का होणार ??? जो त्रास पाचवीत, आठवीत किंवा अकरावीत होतो तो बालवाडीत झालेला जास्ती वाईट. प्रॉब्लेम भाषेचा नाही. अनाठाई न्युनगंडाचा आहे.
थोडक्यात चष्मा बदलूच नका तर घालूच नका. उघड्या डोळ्यांनी जग बघा म्हणजे त्यात सारेच दिसतील.
तेच म्हणतो आहे मी. पण कधीकधी डोळ्यातच दोष असतो त्याचे काय करायचे ??

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

>>>प्रॉब्लेम भाषेचा नाही. अनाठाई न्युनगंडाचा आहे. ह्याच मुद्द्यावर आक्खे च्या आक्खे (सगळे नाही म्हणत) पक्ष चालतात, चालवले जातात विमे, आहात कुठं? तेच व्हेअर यु आर?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

नाही होत... लहानवयात काहीही शिकायची अन कॅप्चर करायची क्षमता जास्त असते.. तसेच मुलांना ईंग्लिश शाळेत पाठवून आपण त्याला मराठी घरी शिकवू शकतो.. उलटे करने तितकेसे सोपे नाही.. न्यूनगंडाचे म्हणाल तर मला सांगा, हा न्यूनगंड आला कुठून हो, नाही म्हणजे कोणी बाजारात अफवा उठवल्यात की ईंग्लिश आले तरच स्पर्धेत टिकाल, मराठी डाऊनमार्केट आहे वगैरे वगैरे.. जी आहे ती सत्य परिस्थिती आहे आणि त्यानुसार स्वताला तयार करणार नाही तर न्यूनगंड हा आपसूकच येणार.

In reply to by तुमचा अभिषेक

लहानवयात काहीही शिकायची अन कॅप्चर करायची क्षमता जास्त असते..
आणि
तसेच मुलांना ईंग्लिश शाळेत पाठवून आपण त्याला मराठी घरी शिकवू शकतो.. उलटे करने तितकेसे सोपे नाही..
या तुमच्या लागोपाठच्या वाक्यात किती विरोधाभास आहे. शिकवणारा चांगला असला की झालं. आम्ही (सेमी) मराठी माध्यमात शिकलो. घरी कुणी इंग्रजी बोलत नसे. पण तरीही जुजबी बोलण्या पुरता इंग्रजी शाळेत असतानाच शिकलो. पुर्व पुण्याईने आमच्या काळी शिक्षक चांगले होते.

In reply to by गणपा

विरोधाभासाची एक गंमत सांगतो बघा.. जर आईवडील मराठी शाळेत शिकलेले असतील तर त्यांना मुलांना मराठी शाळेत पाठवून घरी ईंग्लिश शिकवणे जडच जाणार. तसेच जर आईवडील ईंग्लिश माध्यमात शिकले असतील तर मुलांना मराठी मिडीयममध्ये शिकवायचा पर्याय त्यांच्या डोक्यात येणेही कठीण आहे. ;)

मी शाळेत असताना एका मुलीच्या घरी (त्यांना परवडत होते म्हणून) इंग्लीश शिकवण्यासाठी ट्युटर येत असे. तिला व तिच्या भावंडाना शिकवण्यासाठी! शाळेतर्फे अनेक स्पर्धांमध्ये ती भाग घेत असे. मराठी माध्यमात असूनही ती फाडफाड इंग्लीश बोलत असे. असे बरेच कमी ठिकाणी होत असल्याने ती चर्चेचा विषय ठरली होती. ;) पण असलेल्या चांगल्या आर्थिक परिस्थितीचा असा उपयोग करणं मला आवडलं.

आजकाल इंग्लिश फ्लुएंट आले पाहिजे अश्या अपेक्शा लग्नासाठी मुलींकडुन यायला सुरवात झालेली आहे...

लाल हिरव्या रंगाचं, चमचमणारं, खेळणं एखाद्याच्या हातात दिसलं, की आपल्या हातातलं आई बाबांनी आणून दिलेलं लाकडी खेळण टाकून ते लाल हिरवंच चांगलं; मला तेच हवं हा हट्ट करणा-या मुलासारखी गत झालीय बहुतांश मराठी म्हणवणा-यांची. 'म्हणवणारे' यासाठी कारण त्याबद्दलचं प्रेम जर खुंटीवर टांगूनच ठेवायचं असेल तर ते बाळगू नये असं माझ स्पष्ट मत आहे. आणि तसंही चालेल. व्यक्तीस्वातंत्र्य आहे. पण मग एका दगडावर पाय ठेवावा. एकीकडे 'इंग्रजी हेच भविष्यातलं हत्यार आहे' वगैरे अशा वायझेड कल्पनांची वकीली करत फिरणं आणि दुसरीकडे 'आम्हाला मराठी वाचन पण अस्खलित येतं, अगदी कादंब-या वगैरे नाही...' अशी स्पष्टीकरणात्मक उक्ती करून मराठी भाषेचा अवमान करू नये. भुलली आहेत ही माणसं रे! भुलली आहेत.

या वरुन आठवले... सुटीत बहिणीची मुले रहायला आली होति..दोघेहि कोन्व्हेंट मधे शिकत होति गप्पा मारताना त्याना म्हटले" काहि म्हणा तुम्हा कोन्व्हेंट च्या पोरांच मराठी कच्च असत.." त्या वर छोट्यानी त्याच्या दादाला विचारले "दादा कच्च म्हणजे काय?" दादा म्हणाला "अरे कच्च म्हणजे रॉ" मला हसु आले मनात आले ह्या मुलांच्या लेखि कच्च फळ..कच्च वय..व कच्च मराठी यातले सारे "कच्चे" म्हणजे "रॉ" च

In reply to by अविनाशकुलकर्णी

काका, जसे तुम्ही त्यांचे मराठी चुकल्यावर हसता ना तसे मराठी मुलांचे ईंग्लिश चुकल्यावर जग हसतं... आता कोणाचे हसणे परवडले हे आपले आपणच ठरवायचे आहे..

प्राथमिक शिक्षण मातृभाषेत झाले पाहिजे यावर जगभरातील शास्त्रज्ञांचे एकमत आहे. त्याप्रमाणे जर पूर्वीच्या काळात( माझ्या वडिलांच्या) जसे मराठी सातवीनंतर इंग्रजी पहिली ते चौथी असे शिक्षण होते त्यात दोन्ही भाषा मुलांना अकरावीत उत्तम येत असत. पूर्ण मराठी माध्यमातून शिकलेली पण हुशार असलेली मुले आपल्या हुशारीवर पुढचा मार्ग सहज काढतात पण हुशार नसलेली मुले पूर्ण मराठी माध्यमाच्या शाळेत शिकून शिक्षित होतात पण बाजारात नोकरी मिळवण्यात अपात्र ठरतात त्यामुळे चार वर्षे मी मुंबईत विविध कॉर्पोरेट संस्थामध्ये मराठी मुलांची पीछे हाट होताना पहिली आहे आणि पाहतो आहे. मराठी मुले म्हणून फक्त मॉल मध्ये किंवा तत्सम ठिकाणी सेल्स बॉय किंवा सिक्युरिटी गार्ड म्हणून दिसतात. जेथे जनसंपर्क येतो तेथे इंग्रजी न आल्यामुळे त्यांना नोकर्या मिळत नाहीत हि वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहिल्यामुळे मोलकरीण रिक्षाचालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालताना आढळतात. कारण केवळ इंग्रजी बोलता किंवा लिहिता येते या कारणावरून त्यांना बँकेत किंवा कार्यालयात तृतीय श्रेणी कर्मचारी, लेखनिक इत्यादी पांढरपेशा नोकर्या मिळतात हि वस्तुस्थिती आहे. उत्तम मराठी न आल्यामुळे मराठी माणसे हिंदी किंवा इंग्रजी बोलताना का दिसतात याचे हे एक कारण आहे. मराठी संस्कृती जपण्याचा कितीही टाहो फोडला तरी उत्तम इंग्रजी बोलत आले नाही तर जागतिक बाजारपेठेत मराठी माणसाचा टिकाव लागणार नाही हे सत्य आहे. मी स्वतः पूर्ण मराठी माधमातून शिक्षण घेतले आहे. (लष्करात असल्यामुळे माझ्यामुलाना केंद्रीय विद्यालयात इंग्रजी मध्यम घ्यावे लागले अहे. परंतु मी मुंबईत असतो तरी पूर्ण मराठीतून मुले शिकली असती काय हे सांगणे मला आजही कठीण वाटते. माझी बायको कोन्व्हेन्ट शिक्षित आहे पण आम्ही घरात पूर्ण मराठी बोलतो आणि माझी मुले (लौकिकार्थाने) शुद्ध मराठी बोलतात. आणि टी व्ही वर मराठी कार्यक्रम पाहतात किंवा मराठी वाचतात. सर्व सामान्य माणसाला इंग्रजी माध्यमातून १० वि पास होऊन पांढरपेशी नोकरी मिळू शकते हि वस्तुस्थिती आहे तशी वस्तुस्थिती इंग्रजी न येणाऱ्या मुलाची आजतरी नाही. जोवर प्राथमिक शिक्षण मराठीत आणि नंतरचे शिक्षण इंग्रजीत असे नाही तोवर मराठी शाळा बंद पडून इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढणार हि वस्तुस्थिती आहे. कल्याणकारी राज्यकर्त्यांना याकडे लक्ष द्यायला केंव्हा वेळ मिळेल तो सुदिन.

In reply to by सुबोध खरे

सर्व सामान्य माणसाला इंग्रजी माध्यमातून १० वि पास होऊन पांढरपेशी नोकरी मिळू शकते हि वस्तुस्थिती आहे डॉक्टर साहेब - पांढरपेशी नोकरी म्हणजे नक्की काय म्हणावयाचे आहे...?

In reply to by मोदक

वातानुकुलीत कार्यालयात बसून (पांढरी कापडे खराब न करता) करता येण्यासारखी मग ती स्वागत कक्षात सहाय्यक का असेना किंवा कारकुनी असेल व कॉल सेंटर असेल तरी. चार वाक्ये इंग्रजी बोलता आली पाहिजेत (पोपटपंची सुद्धा) म्हणजे झाले.(good morning sir how may I help you?) अकलेचा संबंध नाही.

In reply to by सुबोध खरे

पांढर्‍या कपड्यांची व १० वी पास चालू शकेल अशी एकच नोकरी (माझ्या अत्यल्पानुभवानुसार) अस्तित्वात असावी.. ती म्हणजे खाजगी शोफरची - यातही गाडी चालवण्याचे कौशल्य महत्त्वाचे ठरते. (आणखी कोणती असेल तर जरूर कळवावी) मोठ्या हॉटेलांमध्ये बहुतांश उच्चपदस्थांशी / परदेशी लोकांशी रोजचे बोलणे असल्याने १० वी पासला ड्रायव्हर म्हणून घेतील का हाही प्रश्न आहेच! स्वागत कक्षात सहाय्यक का असेना किंवा कारकुनी असेल व कॉल सेंटर असेल तरी अशा ठिकाणी अधिक शिक्षणाची आवश्यकता असते. किमान १०+२ किंवा १२ वी नंतर एक दोन वर्षे ग्रॅज्यूएशन वगैरे. मध्ये एका वर्तमानपत्रामध्ये सरकारी कार्यालयांमध्ये चपराशांच्या जागेसाठी किती ग्रॅज्यूएट्स, किती पोस्ट ग्रॅज्यूएट्स व खेळाडूंनी अ‍ॅप्लाय केला अशी यादी आली होती.. अधिक माहिती आहे का कुणाकडे..?

मुळात पोरांना शाळेत घालायचेच कशाला ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

शाळेत जावून काडीचाही फायदा झाला नाही. जगाचे टक्के-टोणपे खातच जगत आहे.. आणि त्यातच खरी मजा आहे..

माझे शालेय शिक्षण मराठी माध्यमातुन झाले. नाही म्हणायला ८ वी पासुन सेमी इंग्रजी होते. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. झालच तर तोटाच झाला. पण एकुणात मराठी माध्यमात शिकलेलो असल्याने काही तोटा झालासे वाटत नाही. इंग्रजी उत्तम येते. लिखित स्वरुपात तर शष्प त्रास होत नाही. कार्यालयीन लिखित इंग्रजी मध्ये मी कित्येक इंग्रजी माध्यमातुन शिकलेल्या लोकांपेक्षा सरस आहे हे नक्की सांगु शकतो. इंग्रजी बोलतानाही कधी त्रास जाणवत नाही. मी माझे विचार समोरच्यापर्यंत उत्तम पोचवु शकतो. फाडफाड येत नाही. पण त्याची गरजही नाही. (उलट योग्य त्या टोनमध्ये बोलल्याने मी लोकांना अभ्यासू आणि विचारी वाटतो ;) ). आणि हे मी जगभरातल्या इंग्रजी आणि इतर भाषिक लोकांशी बोलल्यानंतर खात्रीपुर्वक सांगु शकतो. ज्या गोर्‍यांशी निवांत बोलण्याचा वेळ मिळाला त्यांना मी आवर्जुन सांगतो की मी मातृभाषेतुन शिकलो आणी आजवर एकही गोरा असा भेटला नाही की जो म्हणाला नाही की " तुझे इंग्रजी बघुन असे वाटत नाही". थोडक्यात कार्यलयीन, कायदेविषयक, खाजगी अश्या कुठल्याही संभाषणात किंवा लिखाणात् मी मराठी माध्यमात शिकलेलो असल्याने इंग्रजीमध्ये कमी पडलो नाही. माझे बरेच शालेय सहाध्यायी परदेशात स्थायिक झालेले आहेत. आणि मला माहिती आहे की त्यांचे इंग्रजी अतिशय उत्तम आहे. अश्या परिस्थितीत जर कोणी म्हणत असेल की मराठी माध्यमात शिकल्याने पोरांचे इंग्रजी कच्चे राहिल तर ते मला अजिबात मान्य नाही. पण तरीही पोरांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालताना मी नक्कीच कचरेन. सध्याच्या मराठी माध्यमाच्या शाळा अतिशय वाईट स्थितीत आहे. शिक्षक अतिशय सुमार दर्जाचे आहेत. मी शाळेत असताना अत्त्युत्तम शिक्षक होते. ते जाउन जे लोक आले आहेत ते कीव करण्याजोगे आहेत. मराठी शाळा अजुनही शिक्षणाच्या जुनाट पद्धतीत अडकुन पडल्या आहेत. सर्वांगीण विकासाच्या सोयी सुविधा मराठी शाळांमध्ये अतिशय गचाळ आहेत. आपण सग्ळे याच वातावरणात वाढलो आणि या सोयिसुविधांशिवायच शिक्षण घेतले. पण त्यावेळेस किमान शिक्षक चांगले होते. आता ते ही नाही. शिवाय जग फार वेगाने पुढे चालले आहे. आता मुलांना काळानुरुप चालले पाहिजे. जुनाट शिक्षणपद्धतीत शिकत बसले तर काळ फार वेगाने पुढे निघुन जाइल. त्यामुळे अनिच्छेने का होइना मुलांना इंग्रजी माध्यमातुन शिकवले पाहिजे असे म्हणेन.

In reply to by मृत्युन्जय

>>सध्याच्या मराठी माध्यमाच्या शाळा अतिशय वाईट स्थितीत आहे. शिक्षक अतिशय सुमार दर्जाचे आहेत. मी शाळेत असताना अत्त्युत्तम शिक्षक होते. ते जाउन जे लोक आले आहेत ते कीव करण्याजोगे आहेत. केवळ ह्याच कारणांमुळे मी मराठी मिडिअम मध्ये मुलांना घालु नका म्हणुन म्हणतो. बाकी मराठी शाळांमध्ये सुमार शिक्षक कोणत्या धोरणाने आले ते सर्वश्रुत आहे.

In reply to by मृत्युन्जय

मुक्तपीठ होत चाललेल्या धाग्यावर अखेर एक उत्तम प्रतिसाद दिसला म्हणून लिहावंसं वाटलं. मृत्युंजयाच्या बहुतेक सर्व मतांशी बाडीस. पण ८ वी ते १०वी इंग्रजीने काही तोटा झाला नाही. थोडा फार फायदाच झाला विशेषतः त्याच गणित शास्त्र विषयात ११वी / १२वी आणि अर्थात भारतीय डिग्री जी पूर्ण इंग्रजीतून असते तिथे. कुठल्याही गोर्‍याला असा विश्वास होत नाही की मी माझ्या मातृभाषेत ८-१० वर्षे शिकलो आहे. इतकेच काय परदेशात शिक्षण घेताना बरोबरचे २० भारतीय विद्यार्थी बहुधा इंग्रजी आणि शक्यतो कॉन्व्हेंट मध्ये शिकलेले आणि बरेच बड्या घरातले होते. त्यांना वर्षाच्या शेवटी एकदा विषय निघाला गप्पांमध्ये तर विश्वास बसला नाही की मराठी माध्यमात शिकलो आहे. यात माझा बडेजाव काही नाही. माझ्या वर्गातली असंख्य मुले याच अनुभवातून गेली असतील. म्हणजे मराठी माध्यमात शिकल्याने इंग्रजीत कुठल्याही स्वरुपात (कार्यालयीन, कायदा जसे अ‍ॅग्रीमेंट वगैरे, इतर देशातील लोकांशी संभाषण यात इंग्रजी देश याबरोबर इतर मुख्य भाषा असलेले इटली, जर्मनी हेही आले.) आमचे शाळेतले इंग्रजी म्हणजे मराठि माध्यमातले लोअर इंग्रजी अगदी बाळबोध आणि शुद्ध तुपातले होते. त्याचा विशेष फायदा झाला नाही आणि खूप तोटाही नाही. अभिषेकच्या प्रश्नांना उत्तर सरळ आहे - शिक्षणाच्या दर्जाची खात्री असेल तर खुशाल मराठी शाळेत जाऊदे मुलांना. प्रबोधिनी सारखी मराठी पण आणि संस्कृती जपणारी शाळा असेल तर उत्तम. म्हणजे एकीकडे गणपतीमध्ये पथके आणि दुसरीकडे शाळेत सीबीएसई. अशा ठिकाणी काही एक एकांगीपणा असतो तो चालवून घेता येत असेल तर प्रबोधिनीमधल्या माझ्या मित्र मैत्रिणींचा तिथे जाउन फायदाच झाला आहे. जेव्हा एनटिस ला सर्व शाळा एकत्र येतात तेव्हा बहुतेक वेळा प्रबोधिनीचे विद्यार्थी पुढे होते. अर्थात या गोष्टिला फार वर्ष झाली. सद्यपरिस्थिती माहीत नाही. अक्षरनंदन/ गुरुकुल अशा शाळा हा एक दुसरा पर्याय आहे. मराठी माध्यमात शिकला नाही तर वाचन बंद होणार हे मात्र सत्य आहे आणि अजून एक दोन पिढ्यांमध्ये शहरी उच्च मध्यमवर्गातून जुन्या साहित्याचे उच्चाटन होणार. याला भाषेइतकाच मराठी शाळांचा खालावता दर्जा कारणीभूत आहे. माझ्यासारखे नूमवि, भावेस्कूल, गरवारे, इ. चा कितीही अभिमान असणारे पालक मुलांना त्या शाळेत घालण्याचा विचार करू शकणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आणि ज्यांच्या नोकरी व्यवसायात एका ठि़काणी राहण्याचा पर्याय नाही / शक्यता कमी आहे त्यांना इंग्रजी माध्यम सोय म्हणून स्वीकारावे लागेल. तरिही घरात असंख्य पुस्तके असतील, व्याख्याने सभा यांची आवड असेल, पुलंचे कथाकथन वगैरे आवड असेल तर मुलांना किमान गोडी तरी राहील. माझ्या माहितीत अशि काही मुले माझ्या वयाची पण आहेत. महाराष्ट्राबाहेर कायम राहून किमान शक्य तेवढी आवड जोपासणारे..

पण माझे असे एक निरीक्षण आहे कि मराठी माध्यमातून शिकलेली मुले तुलनेने जास्त बहुश्रुत..गमते..खोडकर..परिस्थिती बद्दल तक्रार न करता त्या वर मात करणारी असतात

एक लहान मुलानी मराठीत लिहिलेला निबंध मिळाला..तो चिकटवत आहे.... न बोलता बरच काहि सांगुन जातो तो निबंध ========================================================== खूप long ago असताना गणपतीची एक tragedy झाली होती. त्याच्या ममाला बाथ घ्यायला जायचं होतं. तेंव्हा त्याचे पप्पा कुठेतरी बाहेर गेले होते. मग त्याच्या ममानी आपल्या बॉडीवरचा डस्ट एकत्र करून एक artificial बॉय बनवला. ...आणि त्याला बाथरूमच्या डोअरवर वॉच ठेवायचा जॉब दिला. मग त्याची ममा बाथ घ्यायला गेली. थोडया टाईम नंतर त्याचे पप्पा गॉड शंकर तिथे आले. मग आपला जो artificial बॉय होता नां, त्यानी शंकरला आत येऊ दिलं नाही. डोअरच्या तिथेच अडवून धरला. त्यामुळे शंकर खूप angry झाला. शंकरला खूप इंसल्टी झाल्याचा फील आला. त्यांनी गणपतीचा हेट केला. मग त्याने रागात जावून गणपतीचा नेक कापला. त्यामुळे गणपतीचं बॉडी आणि हेड सेपरेट झालं. थोडया वेळानी त्याची ममा बाथ घेऊन आली. गणपतीचा तुटलेला नेक बघून तिला खूप शॉक बसला. तिनी angry होऊन गॉड शंकरला खूप scold केलं. माझा गणपती मला जिवंत करून दे म्हणून सांगितलं. मग गॉड शंकरनी थोडा वेळ थिंक केलं, आणि जिवंत करतो म्हणून तिला प्रॉमिस केलं. मग गॉड शंकरनी गणपतीला नवीन नेक आणण्यासाठी सगळीकडे खूप लोकं पाठवली. त्यांना सर्च करता करता जंगल मधून एक एलिफंट जात असलेला दिसला. मग त्यांनी त्या एलिफंटचा फेस गणपतीला बसवण्याचं प्लानिंग केलं. ...आणि त्या एलिफंटचा नेक कापून गॉड शंकरला आणून दिला. गॉड शंकरनी तो नेक हातात घेतला आणि magic करून गणपतीला फिट करून टाकला. मग रिअल गणपती तयार झाला. पप्पांकडून त्याला गिफ्ट म्हणून माऊस प्रेझेंट मिळाला. गणपती खूप मोठ्ठा गॉड आहे. मला गणपती खूप आवडतो. आय लव्ह यु गणपती.

आमच्यावेळी प्रयोग फक्त विज्ञानाच्या बाई प्रयोगशाळेत आम्हाला करायला द्यायच्या. आता शिक्षणमंत्री विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत दरवर्षी नित्यनियमाने प्रयोग करतात

In reply to by निनाद मुक्काम …

आमच्यावेळी प्रयोग फक्त विज्ञानाच्या बाई प्रयोगशाळेत आम्हाला करायला द्यायच्या.
__/\__ कहर !!

बायदवे पुण्यातली ज्ञानप्रबोधिनी शाळा कशी आहे? चांगली आहे असे ऐकून आहे.

In reply to by बॅटमॅन

=)) =)) =)) बॅट्या आपल्यासार्ख्यांना भरपूर वेळ हाय बे हा विचार करायला. आणि जेंव्हा वेळ येईल तोपर्यंत घरीच शिकवायची सुविधा पण असेल भौतेक. तवा तू अभ्यास चालू ठेव. ;)

In reply to by बॅटमॅन

ज्ञानप्रबोधिनी हिंदी माध्यमाची शाळा आहे (असं ऐकून आहे). त्यामुळे ये आपका प्रतिसाद धागे को किसी और ही मोड पे लेके जायेगा :)

In reply to by बॅटमॅन

>>> बायदवे पुण्यातली ज्ञानप्रबोधिनी शाळा कशी आहे? चांगली आहे असे ऐकून आहे. ज्ञानप्रबोधिनी ही उत्तम शाळा आहे. शाळा फक्त ५ वी ते १० वी साठीच आहे. चवथीतून पाचवीत जाणार्‍या इतर शाळेच्या विद्यार्थ्यांची फेब्रु-मार्चमध्ये प्रवेशपरीक्षा घेऊन त्या आधारे ४० मुले व ४० मुली ५ वी साठी निवडले जातात. शाळेचा अभ्यासक्रम हा सीबीएसईचा अभ्यासक्रम आहे. त्यामुळे गणित, शास्त्र व इभूना हे विषय संपूर्ण इंग्लिशमध्ये आहेत. याव्यतिरिक्त इंग्लिश, मराठी, हिंदी व संस्कृत ५ वी पासून आहे. मराठी फक्त ८ वी पर्यंत आहे. जरी इंग्लिश माध्यमाची शाळा असली तरी शाळेत संपूर्ण मराठी वातावरण आहे. शाळेत ५ वीत प्रवेश घेणार्‍या ८० विद्यार्थ्यांपैकी अंदाजे २०-२५ विद्यार्थी हे मराठी माध्यमाच्या शाळेतून आलेले असतात. ५ वी पासून सर्व विषय अचानक इंग्लिशमध्ये सुरू झाल्याने ही मुले गांगरतात. पण या मुलांना इंग्लिश माध्यमात सामावून घेण्यासाठी शाळा मदत करते व पुरेसा वेळही देते. साधारणपणे ७ वीत गेल्यावर हे विद्यार्थी इंग्लिश माध्यमाला सरावतात. शाळेत सर्व हिंदू व मराठी सण साजरे केले जातात. गीता पाठांतर, गणेशोत्सव इ. मुख्यत्वः हिंदू उपक्रम शाळा चालविते व त्यात सर्व विद्यार्थ्यांना सहभागी केले जाते. शाळेच्या संचालक मंडळात अविनाश धर्माधिकारींसारखे नामवंत आहेत. शाळा सुटल्यावर रोज दीड तास सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा दलात सहभागी व्हावे लागते. एकंदरीत शाळा उत्तम आहे, पण शाळेचे वेळापत्रक व उपक्रम विद्यार्थ्यांना दमविणारे आहेत. शाळेत फक्त ८० विद्यार्थी घेतले जात असल्याने प्रवेश मिळणे खूप अवघड आहे.

मी शाळेत पहिली ते १० वी प्रथम क्रमांक कधी सोडला नाही. मराठी माध्यम. मला कॉलेजात गेल्यावर प्रोफेसरांचे काही समजत नसे.मी त्याही विषयात पहिला होतो तरी. पुढे कालक्रमाने अनुभवाने इ़ग्रजी सुधारत गेले पण अजूनही शब्दसंग्रह वाचन करण्याच्या दृष्टीने मर्यदितच.मला ग्रामर उत्तम येते उत्त्म रित्या शिकवताही येते. पण मी स्वता: ला एकूण ईंग्रजी भाषेच जेमतेमच दर्जाचा विद्यार्थी मानतो. कारण त्या भाषेत अफाट शबदसंचय आहे. अनावश्यक एवढा. बालवाडी पासून परके माध्यम सुरू करणारा शिक्षण तज्ञ मजसमोर आलाच तर मी त्याच्या थोबाडीत मारेन मग मला दोन दिवसाची कैद झाली तरी चालेल. हे माझे मत या बाबत आहे. आपल्याकडे इतिहास, भूगोल. प्रगत गणित, रसायन विज्ञान हे विषय घुसवून मुलांचे फार मोठे नुकसान आपण करीत आहोत. पण त्याविषयी येथेच थांबतो कारण तो वेगळा धागा ठरू शकतो. परकीय भाषेत शिकलेली सर्वच मुले असंवेदनक्षम असतात असे नाही. पण बरीच असतात असे माझे निरिक्षण आहे. जगात कोणतीच भाषा परिपूर्ण नाही. उच्चारानुसार लेखन हा कोणत्याही भाषेचा महत्वाचा गुण मी मानतो. सबब स्पेलिंग ही कल्पना मला किळसवाणी वाटते. त्यात कर्नल लेफ्टनंट हे प्रकार तर भयानक आहेत.इंग्लीश बरी अशी फ्रेच भाषा आहे . ते त्या भाषांना चिकटून आहेत कारण स़ंस्कृत भाषा जननी असलेल्या भाषा या आदर्श भाषेच्या जवळ कशा जाउ शकतात याचा विचार कदाचित झाला नसावा. मला इंग्रजी येते हा माझ्या अभिमानाचा विषय आहे पण मराठीची लज्जत अजोड !

In reply to by चौकटराजा

चौरा यांच्या प्रतिसादाच्या आशयाशी सहमत. माझ्या स्वतःच्या शिक्षणप्रवासाबद्दल इथे लिहिले आहे. मी स्वतः ७वी पर्यंत पूर्ण मराठी व ८वी पासून सेमी इंग्रजी माध्यमात शिकलेलो आहे. विद्यार्थीदशेत असताना इतरांसारखे फाडफाड इंग्रजी बोलता येत नव्हते पण त्याबद्दल फार वाईट कधी वाटले नाही. कारण हेच की हळू हळू का होईना आपल्याला जमतय हे कळत होतंच. आज काम करताना कधी कधी माझ्या इंग्रजीचे कौतुक होते व काही वेळा मी थोडा कमी पडतो हे मला स्वतःला कळते. बाकी मराठी माध्यमात शिकल्याने माझ्या करियरमध्ये कसलेही नुकसान झाले नाही. मला खंत याची वाटते की निम्न मध्यमवर्गीय असल्याने चांगले गूण मिळाल्याखेरीज आपली काही खैर नाही याचे सततचे दडपण व ८वी पासून शिक्षण संपेपर्यंत आवडीच्या व व्यावहारीक उपयोगाच्या विषयांखेरीज अनेक नावडीचे विषय व व्यावहारीकदृष्ट्या बिनकामाचे विषय शिकण्यात उमेदीचा काळ वाया गेला. शिकत असताना माझा लहरी स्वभाव व आळशीपणा या दुर्गूणांमुळेही वैयक्तिक नुकसान झालेच. मला त्या सह-विद्यार्थ्यांचे असुयारूपी कौतुक वाटायचे जे अभ्यासासोबत खेळ, कला यामध्यही पारंगत असायचे. एकाच वेळी त्यांना अभ्यास व खेळ / कला कसे झेपायचे हे माझ्यासाठी आजही कोडेच आहे. आता माझा वैयक्तिक अनुभव बाजूला ठेवला तरी भारतीय शिक्षणव्यवस्थेतील बहुतांश गोष्टी जसे अभ्यासक्रम, परीक्षापद्धती या विद्यार्थ्याला तो जे काही चांगले शिकू शकतो त्यापासून दूर ठेवण्यात मोठा हातभार लावतात. संगणकशास्त्रांत शिकणार्‍यांनासुद्धा अनेक जुनकट तंत्रविषय शिकावे लागतात. प्रत्यक्ष कामाच्या वेळी कराव्या लागणार्‍या गोष्टींपेक्षा दर वर्षी वेगवेगळ्या प्रोग्रामिंग भाषांमधून ते त्रिकोण, चौकोन, फिबोनाकी सिरीज, क्वाड्रॅटीक इक्वेशनचे प्रोग्राम लिहायला लावतात. यातून मुलभूत बाबी शिकायला मदत होत असेलही पण पहिले एक दोन वर्षे हे करून झाल्यावर अधिक व्यावहारिक अप्लिकेशन प्रोग्राम्सचे कोड लिहायला लावले पाहिजे. बरं संगणकशास्त्रात नोकरी / व्यवसाय करण्यासाठी विद्यार्थ्याने त्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असतो तर त्यातही संख्याशास्त्र, अकौंटन्सी वगैरेचा अभ्यास करायला लावून अभ्यासक्रमापलिकडे प्रोग्रामिंग वगैरेमध्ये विद्यार्थीदशेत नैपुण्य मिळवण्याची संधी हिरावून पंखच कापले जातात. भविष्यात माझ्या मुलांनी कोणत्या माध्यमांतून शिक्षण घ्यावे यापेक्षा ८वी पासून वगैरे त्यांच्या आवडीनुसार हव्या त्या विषयांमध्येच झोकून देऊन मेहनत करावी व नावडत्या विषयांमध्ये उत्तीर्ण होण्यापूरते गूण मिळवण्याच्या धोरणाला मी प्रोत्साहन देईन. अभ्यासच नाही तर खेळ व कला क्षेत्रांत त्यांना शिकायचे असेल तर त्यासही मी प्रोत्साहन देईन. मी विद्यार्थीदशेत असताना मला माझ्या पालकांनी चांगले गूण मिळवण्यासाठी सतत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या दडपणात ठेवले असेल व त्यामागची भावना जरा असुरक्षिततेची असली (आपल्याला शिक्षणाशिवाय कोण विचारणार) तरी त्याबाबत मी त्यांना कधीही दोष देणार नाही. त्या आर्थिक परिस्थितीत बहुधा तोच सर्वोत्तम पर्याय होता. त्यांनी खालेल्या खस्तांमुळे निम्न-मध्यमवर्गीय ते मध्यम-मध्यमवर्गीय प्रवास होऊ शकला अन देवाची कृपा राहिली तर उच्च-मध्यमवर्गीयतेकडे प्रवास होईलच पण माझी मुले अभ्यास व परिक्षांचे दडपण घेणार नाहीत यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन.

In reply to by चौकटराजा

इ़ग्रजी सुधारत गेले पण अजूनही शब्दसंग्रह वाचन करण्याच्या दृष्टीने मर्यदितच.मला ग्रामर उत्तम येते उत्त्म रित्या शिकवताही येते.
इंग्रजी माध्यमात शिकलेले शब्दसंग्रहात काय उजेड पाडत असतात हे ठाउक आहे का ?! तिथे आनंदच असतो. त्यापेक्षा मराठी माध्यमातली मुलं जास्त संपन्न असतात शब्दसंग्रहात. आणि व्याकरणात इंग्रजी माध्यमात शिकलेल्यांनी लावलेले दिवे बघतोच आपण जिथेतिथे. अहो इंग्रजी माध्यमात शिकलेल्या मराठी मुलांची अवस्था 'धड इथलं नाही धड तिथलं नाही' अशी असते.... समजलं?

In reply to by चौकटराजा

आपल्याकडे इतिहास, भूगोल. प्रगत गणित, रसायन विज्ञान हे विषय घुसवून मुलांचे फार मोठे नुकसान आपण करीत आहोत. मग उरलं काय ??थोड्या प्रमाणात स्पून फिडींग विषयाच्या सुरुवातीला गरजेचेच आहे. त्या शिवाय आवडतं काय कळणार तरी कसं??आवडी आठवी वगैरे मध्ये कळत नसाव्यात, कारण डिग्री झाल्यावर पण आख्खा ट्रॅक बदलणारं भरपूर पब्लिक असतंय..इंजिनिअरिंग घ्यायच्या आधी मेक काय सिव्हील काय कॉम्प काय हे पण बऱ्याच पब्लिकला बारावी नंतर माहिती नसतं. अन् प्रत्येक गोष्ट रिझल्ट ओरियन्टेड असावी असं हट्ट का ?? तसं म्हणायला या शिक्षणापेक्षा एखादी गोष्ट कशी शिकावी हे जरी इतक्या वर्षाच्या शिक्षणातून शिकलो तरी लै झालं. प्रत्येक पुस्तकी गोष्ट वापरली जातेच असं नाहीये.

In reply to by लॉरी टांगटूंगकर

>>> आपल्याकडे इतिहास, भूगोल. प्रगत गणित, रसायन विज्ञान हे विषय घुसवून मुलांचे फार मोठे नुकसान आपण करीत आहोत. इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र या विषयांची परीक्षा घेऊ नये. माहिती म्हणून हे विषय शिकवावेत. खरं तर अभ्यासक्रमातून हे विषय काढून टाकले तरी हरकत नाही. पण ते शक्य नसेल तर निदान या विषयांची परीक्षा तरी टाळावी. त्याचबरोबरीने फक्त इंग्लिश व मराठी या दोनच भाषा सक्तीच्या असाव्यात. त्रिभाषासूत्राने महाराष्ट्राचे व मराठीचे खूप नुकसान केले आहे. हिंदीभाषिक राज्यात हिंदी व इंग्लिश व्यतिरिक्त तिसरी भाषा सक्तीची नाही. दाक्षिणात्य राज्यात हिंदी सक्तीची नाही. फक्त महाराष्ट्र व इतर काही राज्यात विनाकारण हिंदी सक्तीची केली आहे. हिंदी, संस्कृत, जर्मन, फ्रेंच इ. इतर भाषा या ऐच्छिक विषय म्हणून असाव्यात.

In reply to by चौकटराजा

आपल्याकडे इतिहास, भूगोल. प्रगत गणित, रसायन विज्ञान हे विषय घुसवून मुलांचे फार मोठे नुकसान आपण करीत आहोत.
या विषयाला पूर्णविराम दिलेला असला तरी मला हे वाक्य पटलेले नाही. विज्ञानाचं मला माहीत नाही. पण इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र इ. विषय ह्युमॅनिटीस मधे करियर करणार्‍या मुलांसाठी अत्यावश्यक आहेत.

In reply to by पिशी अबोली

विषय सगळेच महत्वाचे अगदी भंगीकाम सुद्धा पण ते ज्याला आकडेमोडीत रस आहे आहे त्याला कशाला शिकवायचे ?

In reply to by चौकटराजा

पाठांतरावर भर न देता या सर्व विषयांची माहिती असावीच. सध्या दहावीपर्यंत जे कंपल्सरी समान शिक्षण आहे त्याच्या घटकांमध्ये तर नक्कीच काहिच चूक आहे. आठवीतल्या मुलांना आपल्याला नक्की कशात रस आहे हे माहीत असतं / समजत असतं ( थोड्या मुलांना नाही तर किमान ७०-८०% मुलांना.. शाळेतल्या ८ तुकड्यांमध्ये ५-१० मुलांना माहीत असणं नक्कीच पुरेसे नाही.) तरच विकल्प असावेत. ते नाहीत हे सत्य आहे त्यामुळे इतिहास भूगोल शिकवूच नये हे तर बरोबर नाही. म्हणजे कोणी भूगर्भशास्त्र / हवामान खाते / इतिहास संशोधन / पुरातत्व आणि इतर अनेक विभागात जाऊच नये. शाळेत किमान माहितीच नसेल तर काय मुलांना आपोआप स्फूर्ती येणार आहे का नंतर ? परीक्षार्थी बनवू नये इतकंच खरं..

In reply to by मैत्र

बारावीत मुलाला आपल्याला काय व्हायचे आहे याची जाणीव फक्त व्यावहारिक व भावनिक पातळीवर झालेली असते. त्याही वयात त्याला आपली बौद्धिक क्षमता काय खरे तर इंटलेक्च्यल अ‍ॅप्टीट्यूड कळलेली नसते. बाजारात कशाला भाव आहे व राहील या विषयी पालक व मित्र यांच्या मतांच्या भडीमाराने त्याचे एक मत बनत जात असते. व्यवसायात वा नोकरीत खरेच यशस्वी होण्यासाठी कुटील राजकारण , चिकाटी, पी आर ओ, गटबाजी हे ही यावे लागते. तसेच प्रत्येक व्यवसायाची काही मजबूरी असते. उदा डोक्टरना संध्याकाळचे टीव्हीचे कार्यक्रम पहाता येत नाहीत. अनिमेटरना रात्र रात्र जागून चिकाटीने काम करावे लागते. मरीन करीयर मधे रोजचे कौटुम्बिक जीवन लाभत नाही,. ई. हे सारे माध्यम, बुद्धी यांच्या पेक्षाही ही व्यापक आहे. इतिहासाची भूगोलाची तोंड ओळख ठीक आहे पण हे विषय सातवी नंतर रॅपिड रिंडिंग साठी देखील नकोत. मुलांची तीच वाचलेली उर्जा त्यांचा कल असलेल्या दिशेतील महत्वाच्या संकल्पना ( उदा . डेबिट दे रिसिव्हर क्रेडेट द गिवर ही कॉमर्ससाठी, कॉझर्वेशन ऑफ एनर्जी हे सायन्स साठी,प्रपोर्शन सिमेट्री हे फाईन आर्ट साठी ई) अधिक ठळकपणे मनात रुजविण्यासाठी करता येईल.

जोशी साहेब आपला लेख वाचला त्यावर इतरांच्या प्रतिक्रिया हि वाचल्या. लोकांबद्दल वाईट हि वाटले. क्लिंटन यांचा १४ वर्षाचा"वनवास" सुद्धा वाचला. इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली कि माझ्या शाळेत माझ्या १० वीत व्यवसाय मार्गदर्शन चाचण्या झाल्या होत्या त्यात माझा काळ वैद्यकीय व्यवसायाकडे आला होता. दहावी नंतर मी कॉमर्स ला जावे असे माझ्या आई वडिलांचे मत होते तरीही मी सायन्स ला गेलो आणी त्यानंतर मेडिकल ला. परंतु माझ्या वडिलांनी तेंव्हा जवळजवळ ७५ वेगवेगळ्या CAREER व्यवसाय मार्गाचे फॉर्म आणी माहिती आणून ठेवली होती. आपल्याला कोणता मार्ग हवा आहे यात गल्लत होऊ नये म्हणून १ ९८२ साली त्यांनी यावर जवळ जवळ २ हजार रुपये खर्च केले.जवळ फार पैसे नव्हते तरीही. पण मेडिकल ला जायच्या निर्णयावर मी ठाम होतो ( माझ्या आईचा त्याला विरोध होता कारण डॉक्टरचे खाजगी आयुष्य संकुचित होते म्हणून) परंतु माझ्या स्वतःच्या निर्णयाला त्यांनी पूर्ण पाठींबा दिला. आज या व्यवसायात मी ३० वर्षे आहे परंतु एकदाही मला असे वाटले नाही कि मी डॉक्टर का झालो? आजही माझ्या मुलांना काय करायचे आहे याचे मी पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे माझी मुलगी कॉमर्स ला गेली आहे आणि मुलगा अभियांत्रिकीला. आम्ही दोघे हि डॉक्टर असूनहि आणि मुलांनी काय आणि केंव्हा अभ्यास करावा हे मी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. वर्गात पहिल्या दहात यावे इत्यादी अपेक्षा माझ्या नाहीत फक्त पास व्हा नाहीतर पुढचे एक वर्ष तोच अभ्यास परत करावा लागेल एवढेच माझे म्हणणे आहे. पुस्तकी शिक्षणातील यश हे आयुष्यात यशस्वी होण्यात जास्तीत जास्त १० टक्के जबाबदार असते असे माझे मत आहे. त्यामुळे पुस्तकी शिक्षणाला अवास्तव महत्त्व देऊ नये असे माझे स्पष्ट मत आहे( हा कोल्ह्याला द्राक्षे आंबट हा प्रकार नाही)

In reply to by सुबोध खरे

त्यामुळे पुस्तकी शिक्षणाला अवास्तव महत्त्व देऊ नये असे माझे स्पष्ट मत आहे( हा कोल्ह्याला द्राक्षे आंबट हा प्रकार नाही
) सहमत, आणि तुम्ही अधोरेखित स्पष्टीकरण देण्याची गरज नव्हती असे वाटते. इथे कोणी तुमच्यावर तसा संशय घेईल असे वाटत नाही.

In reply to by सुबोध खरे

सुबोधराव, तीन दशकांपूर्वी आपल्या पालकांनी दाखवलेल्या औदार्याचे व दुरदृष्टीचे कौतुक वाटत आहे व आपणही त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा उपयोग अभिमान वाटावा अशी कामगिरी करून दाखवली आहे. माझा लेख वाचून त्यावर विचार व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद.

भाषेचं माध्यम कुठलंही असू द्या पण पोरांचा इ क्यू (इमोशनल कोशंट) स्ट्राँग व्हावा याची काळजी घ्या. नुस्ता आयक्यू जास्त असून उपयोग होत नाही. (आमच्या प्रतिसादांना पंख लागत आहेत हल्ली. काय भानगड आहे कळेना ब्वा!)

In reply to by प्यारे१

बुद्धी = ईंटेलिजन्स कोशंट (आयक्यू), जाण = ईमोशनल कोशंट (ईक्यू) हे व्यक्तीगणिक कमी जास्त असू शकतात. आपल्या आयक्यू आणि ईक्यूची नेमकी जाणिव असणारे आयुष्यात खुप सुखी असतात. जरी हे दोन कोशंट सरासरीच्या थोडेफार खाली असले तरी.
इथंच मिपावर एका लै भारी माणसाकडून मिळालेली, लै भारी वाक्ये. बाकी माझ्या होणार्‍या मुलांना प्राथमिक शिक्षण मी स्वतःच घरी शिकवावं म्हणतो. ते होमस्कूलींग चे वाचले होते कुठेतरी.

In reply to by प्यारे१

इ क्यू हा अतिशय कमी समजलेला पण अतिशय महत्त्वाचा विषय आहे. एक साधे उदाहरण मी नेहेमी देतो. आय आय टी तील मुले आत्महत्या का करतात? ती लौकिकार्थाने अतिशय हुशार असतात आणि चार वर्षानंतर सहा आकडी पगार सुरु होणार असतो तरीरही ती मुले आत्महत्या का करतात याचे कारण तेथे असणारे तणावपूर्ण वातावरण मानसिक दृष्ट्या त्यांना हाताळण्याच्या पलीकडे असते आणि अपयश पचवणे हे त्यांना अशक्य असते. आयुष्यभर केवळ यश हातात लागल्यावर अपयश पचवण्याची ताकद नसल्यामुळे ते मानसिकदृष्ट्या कोलमडून जातात यासाठी हा इ क्यू काय आहे हे समजणे आवश्यक आहे.

In reply to by सुबोध खरे

इ क्यू हा अतिशय कमी समजलेला पण अतिशय महत्त्वाचा विषय आह पण मग मराठीवाल्यांचा इ क्यू चांगला असतो असे म्हणायचे आहे का ..

पाचवीपासून सायन्स, गणित हे विषय इंग्रजीतून होतात आणि इतर विषय मराठीतून चांगले समजतात. अर्थात त्यासाठी सायन्स शिकवणारा शिक्षक मराठी माध्यमाचा नसावा. फार लहान वयात मुलांचा कल समजणे अवघड असते.त्यामुळे पुढे सायन्सला जायचे झाल्यास त्यांना याचा उपयोग होऊ शकतो. मला खरं तर मुलाने व्यवसायात पडू नये असे मनापासून वाट्ते. पण त्याच्या पणजोबांपासून घरात तेच वातावरण आहे. आठ्वीची परीक्षा झाल्यावर तो मला विचारतोय, आई दुकानात बसायचे असेल तर कुठली साईड घेऊ? अर्थात त्याचा मार्ग त्यानेच निवडायचा आहे. पण आत्तापासून तो वेगवेगळ्या कंपन्याच्या प्रॉडक्ट्सची माहिती घेऊन त्यावर बाबांशी चर्चा करत असतो.

ह्या धाग्यावर अनेकांचे प्रतिसाद वाचून गंमत वाटली , त्यांच्यामते त्यांनी मराठीमध्ये शिकून त्यांचे घोडे कुठे अडले नाही असा आशयाचा प्रतिसाद लिहून प्रतिसादाच्या शेवटी मात्र सध्या इंग्रजी माध्यमाला पर्याय नाही असे लिहितात. त्यांना लेखाचे शीर्षक व त्यांचा हेतू कळला आहे का की कळून न कळल्यासारखे करत आहेत. माझ्यामते सध्यस्थितीत पाल्याला इंग्रजी किंवा मराठी मीडियम मध्ये घालावे असा सरळ प्रश्न आहे. त्यांचे उत्तर अनेकांनी सध्या इंग्रजी माध्यम योग्य आहे असे लिहितांना आपल्या वेळी आपण मराठीतून शिकलो ,आपल्याला त्रास झाला नाही ही मखलाशी करण्याची काय गरज आहे , त्यांच्या सध्याच्या परिस्थितीची काय संबंध आहे , लेखाचा विषय मराठीतून का इंग्रजीतून शिकावे असा नाही आहे. मातृभाषेतून शिक्षण सर्वोत्तम हे तर सार्‍या जगाला माहिती , पण ह्या देशात १५ वर जास्त राष्ट्र भाषा व कितीतरी अनेक उपभाषा आहेत , म्हणूनच शिक्षणात समानता आणण्यासाठी सरकारने दहावी नंतर शिक्षण इंग्रजीतून फार पूर्वी केले. सध्या सी बी एस इ व राज्य सरकारांच्या शिक्षण मंडळांची साठेमारी होते, त्यात गुणांची खैरात केली जाते. आता आय बी शाळा सुद्धा भारतात आल्या आहेत , पुढील दशकात त्यांचा प्रभाव वाढणार आहे. माझ्या मते लेखकाने मराठी का इंग्रजी माध्यम असा प्रश्न विचारण्यापेक्षा सी बी एस सी बोर्ड कि राज्याचे बोर्ड स्वीकारावे असा असावा. आठवी पर्यंत परीक्षा नसणे अश्या प्रकारांचे अनेक प्रयोग शिक्षण मंत्री करतात. त्यात वावगे असे काहीच नाही मात्र ह्या प्रयोगात सातत्य राखले जात नाही , नियम बनवले जातात , त्यात वारंवार बदल केले जातात. माझ्या मते येथे अनेकांनी त्याकाळाच्या ते मराठी भाषेतून शिकले ह्यांचा आवर्जून उल्लेख केला, माझ्या वेळी म्हणजे १९९६ साली मी मराठीतून शालांत परीक्षा पास झालो त्यावेळी ह्या मराठी माध्यमात शिकून घोका आणि परीक्षेत ओका थोडक्यात गुणवंत होऊ नका ,गुण मिळवणारे मशिन निर्माण व्हा असा तो काळ होता. बोर्डात येणे , मेरीट मध्ये येणे ह्या प्रकाराला अवास्तव महत्त्व प्राप्त झाले होते. सारे कोचिंग क्लासेस च्या अधीन गेले होते. चाटे क्लासेस हा शिक्षणाच्या बाजाराचा व व्यापारीकरण ह्याचा आदर्श नमुना राज्यभर ओळखला जाऊ लागला. गुणवत्ता सोडून गुण वाढण्यासाठी पॅटर्न निर्माण झाले. उदा लातूर पॅटर्न संस्कृत वर परदेशात संशोधन होते, आमच्यासाठी संस्कृत म्हणजे १०० मार्काचे ज्याचा प्रमुख उपयोग टक्के वाढवण्यात होतो असा व्यवहारिक ,व्यापारी अर्थ होता, बिचारे इंग्रजी माध्यमातील मुले ५० चे हिंदी घेतल्याने त्यांना टक्के मिळवता येत नसत. मग ह्याचे उट्टे ते ११ वीत काढत. उच्च शिक्षण संपूर्णतः परकीय भाषेत घेणे असा अजब कारभार मराठी माध्यमातील मुलांच्या नशिबी असायचा . आज परदेशात मुलांना शाळेत लहानपणापासून परकीय भाषा म्हणून इंग्रजी म फ्रेंच ,रशियन शिकवल्या जातात.म्हणून जर त्यांना ह्या परकीय भाषेत उच्च शिक्षण घेण्यास त्यांचे सरकार सक्ती करत नाही. इंग्रजीतून उच्च शिक्षण घ्यायचे तर सुरवातीपासून ते इंग्रजीतून घेण्यास काहीच हरकत नसावी, मात्र राज्य व केंद्र सरकारने असा कायदा केला पाहिजे की सर्व प्रकारच्या बोर्डांना त्यांच्या शाळेत पहिलीपासून त्या त्या राज्याची स्थानिक भाषा शिकवली पाहिजे. भारतात सगळ्याच मुलांनी पहिलीपासून इंग्रजीतून शिक्षण घेणे व त्याचवेळी आपापल्या मातृ भाषेतून शिक्षण घेतले हा पर्याय मला योग्य वाटतो , सध्यातरी इंग्रजीला पर्याय नाही. डोंबिवलीतील मराठी माध्यमाची प्रख्यात शाळा. आमची मुले नेहमीच गुणवत्ता यादीत यायची , आचार्य अत्रे सुवर्ण पदक आमच्याकडे अनेकदा आले , मात्र आज माझ्या मैत्रिणीच्या मुलाला त्या शाळेत घालायची वेळ आली तेव्हा शाळेतील आमच्या शिक्षकांनी तसे करण्यास परावृत्त केले. आता शेवटी आता पूर्वीची शाळा राहिली नाही तिचा दर्जा राहिला नाही, तेव्हा इंग्रजी माध्यमांची कास धरा असा सल्ला मराठी शाळेतील बाईंना द्यावा लागला.

इंग्रजीचे तितके महत्त्व शिल्लक राहील का ? की उद्या जर्मन, फ्रेंच, जपानी, चीनी इ. भाषा शिकाव्या लागणार आहेत!
माहित नाही. पण मराठीचे महत्व फार वाढणार अशी चिन्हे नाहीत, अगदी राजसाहेब सत्तेवर आले तरी. थोडक्यात... कंच्याबी शाळेत घाला हो हिथं आता पैलीपासुन इंग्रजी असतं सायड बाय सायड.

माझ्या मते हा त्या त्या आईवडिलांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यांनीच त्यावर निर्णय घ्यायचा आहे..

मूलांची शेती....भाग ४...संस्कार या विषयात रस असणार्‍या सदस्यांनी विषयाशी संबंधित लेखमालिका अवश्य वाचा. लेखक आहेत - मुक्त विहारि.

हि बातमी वाचा................ ------------------------ मुंबई महापालिकेच्या नऊ मराठी शाळाना टाळे लागणार आहे.यंदाच्या शैक्षणिक वर्षात एकही विघार्थी नसलेल्या नऊ शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.या शाळा बंद होण्यास मराठी शाळामध्ये विघार्थ्यांना पालकाची शिकवण्याची उदासीनता जवाबदार असल्याच मुंबईच्या महापौरानी म्हटलयं. मुंबई महापालिकेन विघार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी व्हर्च्यअलक्लास,सुंगधी दूध आणि २७ शैक्षणिक वस्तू मोफत मोफत देऊनही पालिकेच्या नऊ मराठी शाळाना टाळे लागणार आहे.मराठी शाळामध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षात एकही विघार्थी नसलेल्या नऊ शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.सहा वर्षात तब्बल ५६ हजार विघार्थ्यांनी पालिकेच्या शाळा सोडल्या आहेत.या शाळा बंद होण्यास मराठी शाळामध्ये विघार्थ्यांना पालकाची शिकवण्याची उदासीनता जवाबदार असल्याच मुंबईच्या महापौर आणि शिक्षणधिकारीनी म्हटलयं. विघार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर सकस आहार मिळण्यासाठी पालिका १४० कोटी रूपये खर्च करते.शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते.मात्र पालिकेच्या शाळांमधील गळती कमी होऊ शकलेली नाही.यात मराठी शाळा बंद होत असल्यान मराठीवर राजकारण करणारे सत्ताधारी शिवसेना आणि मनसेचे नगरसेवक मूक गिळून गप्प आहेत.

In reply to by अविनाशकुलकर्णी

बातमी वाईट वाटायला लावणारी असली तरी अनपेक्षित नक्कीच नाही. बाकी शालेय शिक्षण धोरण आखणे व त्याची अंमलबजावणी हा पूर्णपणे राज्यसरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. महापालिकेचे काम केवळ शाळा चालवणे हे आहे. आघाडी सरकार आल्यापासून प्रत्येक शालेय शिक्षण मंत्री स्वतंत्र संस्थानिक असल्यासारखे धोरण राबवतोय. त्यात कसलीही सुसूत्रता, तारतम्य नसल्याने अगोदर अवघड परिस्थितीतून जात असलेल्या या क्षेत्राला खोल गर्तेत ढकलले आहे.

In reply to by अविनाशकुलकर्णी

मुंबई महापालिकेन विघार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी व्हर्च्यअलक्लास,सुंगधी दूध आणि २७ शैक्षणिक वस्तू मोफत मोफत देऊनही पालिकेच्या नऊ मराठी शाळाना टाळे लागणार आहे विद्यार्थ्यांना नव्हे ठेकेदारांना आकर्षित करण्यासाठी...

एवढी सोन्या सारखी पोरं आहेत काञ त्यांच्या मागे लागायचं... मी अगदी १००% अनुभवतुन सांगतेय.. तुमचं मुलं तुमच्यापाशी धडधाकट, हसत खेळत आहे.. बास झालं.. आता प्रश्न माध्यमाचा.. १. मला वाटत नाही की काहीही फरक पडतो. मराठी माध्यमात घातलं तर संस्क्रुती टिकेल आणि ईंग्रजी मध्ये घातलं तर बुडेल.. असं मला वाटत नाही. मुलं त्या संस्क्रूती मध्ये वाढतिल जी त्यांच्या घरात आहे. २. मराठी माध्यम पाया पक्का करण्याच्या दृष्टीने उत्तम. पण जर तुम्ही फिरतीवर असाल / किंवा पुढे मागे स्थलांतर केलेत तर इंग्रजी बरे... ३. मुलांना त्रास होइल पुढे जाऊन म्हणुन आताच इंग्रजी मध्ये घाला हि पालकांची पळवाट आहे. शाळांवरच सगळं शिक्षण सोडलं तर कुठल्याही माध्यमात घाला.. काही उपयोग होणार नाही.. ४. घरात नाही तर शाळेत इंग्रजी येणं महत्वाच आहेच.. ते जर मुल घरात शिकणार असेल तर घरात.. पण शिकवाव जरुर.. कारण सध्यातरि इंग्रजीला पर्याय नाही.. कुठेना कुठे भिडावं लागतच..

आपल्या भवतालच्या भाषेच्या मध्यमातून आपण जगणे जाणून घेउ लागतो. त्या भाषेचे पुरेसे ज्ञान आल्यानंतरच परकीय भाषा शिकणे योग्य आहे. आता कोणी म्हणेल गणित व विज्ञान हे इंग्रजीतून शिकणेच योग्य आहे कारण पारिभाषिक शब्दांची प्रचंड संपत्ती तेथे आहे. कबूल पण प्रगत गणित व प्रगत विज्ञान आपणसर्वानीच शिकायचेच कशाला ? जनरल गणित व जनरल विज्ञान यात कितीशा पारिभाषिक शब्दांची आवश्यकता आहे ???? समाजातील एकूण रोजगारात इतिहास, भूगोल, चित्रकला, संगीत , प्रगत विज्ञान ( उदा . फायलम, नॉन सेक्सुअल प्रोपागेशन्,ओहम लॉ. बॉईल्स लॉ, थिअरी ऑफ रिलेट्व्हेटी, सुपर कंडक्टीव्हिटी,मेंडेल्स लॉ, पिरिऑडीक टेबल) प्रगत गणित ( सर्डस, कॅल्क्यलस, सेट थेरी, ट्रीग्नॉमेंट्री, इडायसेस, को ऑर्डीनेट जॉमेट्री ) ई चे गुणोत्तर काय. मग हे सारे शिकवणे कशासाठी.... मी म्हणतो सरसकट कशासाठी ... ?

Friends, How I met your mother, Two and half men, Prison Break, Heroes, The big bang theory आणि असंख्य इंग्रजी चित्रपट, एवढे जर नियमित पणे पहिले तर इंग्रजी नक्कीच चांगले सुधारते. (स्वानुभावाने सांगतो) राहिता राहिला माध्यमाचा प्रश्न, कोणतेही मध्यम असू दे काही फरक पडत नाही कारण आपल्या शिक्षण पद्धतीचाच ह्रास होत चालला आहे. म्हणून माध्यम कोठलेही असो, घरीच व्यवस्थित शिकवा .. मग जरी आपल्या पाल्याचे शिक्षण मराठी माध्यमात झाले तरी आपला पाल्य उच्च शिक्षण स्वताहाच समजून घेईल.

इंग्रजी शाळेत शिकलेली मुले मोठी झाल्यावर अत्यंत गचाळ इंग्रजी बोलतात,लिहितात. बाकी आपापल्या पोरांटोरांना कोणत्या शाळेत पाठवायचे तो प्रत्येकाचा खाजगी मामला झाला.

नावाला जागलात साहेब (ह.घ्या.) ! अहो यासाठी एवढा का.कु. का करायचा ? तुमचे लग्न झाले आहे का ? असेल तर बायकोलाच विचारायचा हा प्रश्न व निर्णय घ्यायचा. जेवढे तुमच्या बायकोला कळेल तेवढे कुण्णाला कळणार नाय बगा ! लग्न नसेल झाले तर झाल्यावर विचारा !

मी संपूर्ण मराठी माध्यमातूनच शिकलो - पहिली ते दहावी. नंतर एखाद वर्ष त्रास झाला असेल भाषेचा....पण नंतर काही नाही. आणि हे मखलाशी म्हणून सांगत नाहीये...मी फार काही जुन्या काळातला नाही. माझ्या स्वतःच्या मुलांनाही मराठी/सेमी-इंग्रजी माध्यमातच घालावं अशी माझी तरी इच्छा आहे...पण ह्यात बेटर हाफला काय वाटतं ते पाहून, चर्चा करून मगच ह्यावर अंतिम निर्णय घ्यावा लागेल. (ह्या सगळ्या खूपच भविष्यकाळातल्या गप्पा आहेत पण माझे विचार तेव्हाही असेच असतील असं वाटतं म्हणून हा प्रतिसाद प्रपंच)

भरत जाधव मराठी चित्रपटासृष्टीचा सुपरस्टार प्रत्येक चित्रपटामागे मिळकत 10 लाख. अमीर खान हिंदी चित्रपटासृष्टीचा सुपरस्टार प्रत्येक चित्रपटामागे मिळकत 30 ते 35 करोड. टाॅम क्रुझ इंग्रजी चित्रपटासृष्टीचा सुपरस्टार प्रत्येक चित्रपटामागे मिळकत अंदाज नाही. येथे मराठीचा अट्हास करणारे एक तर सरकारी कर्मचारी, गृहिणी, छोटासा व्यवसाय करणारा, मराठी नेता आणि इतर असेच ज्यांना पोटापाण्याचा प्रश्न मराठीने सुटला आहे हेच असावेत. शिक्षण इंग्रजी घेउन (अर्थात नुसत शिक्षण असून काय चालत नाही यशस्वी होण्यासाठी इतर गुणाचीही आवश्यकता असते) मराठी संस्कृती, मराठी भाषा जपता येतेच.

In reply to by NiluMP

येथे मराठीचा अट्हास करणारे एक तर सरकारी कर्मचारी, गृहिणी, छोटासा व्यवसाय करणारा, मराठी नेता आणि इतर असेच ज्यांना पोटापाण्याचा प्रश्न मराठीने सुटला आहे हेच असावेत.
या वाक्यात तर्काचा इतका अभाव आहे की प्रतिवाद करायला पण मन धजत नाही.
शिक्षण इंग्रजी घेउन मराठी संस्कृती, मराठी भाषा जपता येतेच.
मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन पण उत्तम इंग्रजी बोलता/लिहिता/वाचता/ऐकता येते.

बरं, पण माझया तुलनात्मक तक्त्याला तुम्ही सोयईस्करपणे बगल दिलीत. असो मराठीचा सार्थ अभिमान असावा फाजिल नव्हे.

In reply to by NiluMP

१ पौंड= ८० रुपये. १ रियाल=१४० रुपये. या तुलनेला बगलच नाही, तर कंप्लीट साईड द्याल असे वाट्टे, पण स्टिल...असो. तेव्हा ठरवा इंग्रजी श्रेष्ठ की अरबी. इंग्रजीचा सार्थ अभिमान असावा फाजिल नव्हे.

In reply to by NiluMP

त्या तक्त्याला सदर चर्चेत काडीची किंमत नाही म्हणून बगल दिली. यात रजनीकांत चे मानधन पण टाका आणि उद्यापासून "एप्पडी इरकिंगा...नल्ला इरुकेन" सुरु करूया... काय म्हणता?? मराठी बोलणारी माणसे किती, हिंदी बोलणारी किती, इंग्लिश बोलणारी किती, किमान याचा काही अंदाज. चित्रपटसृष्टीतील मानधनाचे आकडे हा काय निकष झाला काय?? इंग्रज होऊन इतकी प्रगती होते ना. नाव बदलून मिस्टर ब्लू वगैरे ठेवा, लगेच पगार दसपट करतील तुमच्या नोकरीत.
येथे मराठीचा अट्हास करणारे एक तर सरकारी कर्मचारी, गृहिणी, छोटासा व्यवसाय करणारा, मराठी नेता आणि इतर असेच ज्यांना पोटापाण्याचा प्रश्न मराठीने सुटला आहे हेच असावेत.
मी मराठीचा अट्टाहास करतो असे तुम्ही समजत असलाच. मी संगणक शास्त्रात उच्चशिक्षण घेतले आहे आणि एका नामवंत आयटी कंपनीत काम करतो. ना माझ्या महाविद्यालयीन शिक्षणात मराठीचा काही फायदा होता ना माझ्या नोकरीच्या ठिकाणी. काहीतरी बादरायण संबंध जोडायचे आणि विधाने करायची याला काही अर्थ नाही. दर वेळेला प्रतिवाद करण्यात वेळ नी शक्ती वाया घालवणार नाही

वास्ताविक इथे नुसत्या चिंतनांपेक्षा आपले अनुभव सांगावेत जे मार्गदर्शक ठरतील.

अफूवर ज्याप्रमाणे बंदी आणली गेली, त्याप्रमाणे इंग्रजी भाषेच्या शाळांवर बंदी आणली पाहिजे, अशी रोखठोक मागणी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी येथे केली. इंग्रजी भाषेच्या वाढत्या वर्चस्वास साम, दाम, दंड पद्धतीने विरोध करण्यासाठी सर्वाना एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. साभार लोकसत्ता: इंग्रजी शाळांवर बंदी आणावी - भालचंद्र नेमाडे

In reply to by आयुर्हित

म्हणण्यामागची भावना योग्य असली तरी हे टोकाचं झालं त्यामुळे याचं हसं जास्त होईल. आणखी एक गोष्ट त्यांनी या भाषणात सांगितली. म्हणे ब्राह्मणी वर्चस्ववाद मराठीच्या शिक्षणात नको. याचा तीव्रतम निषेध नोंदवू इच्छितो. मुळात यात जातीला आणायची गरजच नाही. शाळेत शुद्ध मराठी शिकवावी यात गैर काहीच नाही. बोली भाषा या घरात शिकाव्यात; पण प्रमाण मराठी जी आहे तीच शाळेत शिकविली गेली पाहिजे. उगीच निरर्थक वळण या ईष्ट मुद्द्याला देऊन नेमाडे यांनी काय साधलं किंवा सुचवलं हा चर्चेचा मुद्दा आहे. उद्या शाळेत पेन भेटलं किंवा दगडं मारली असं शिकवलं जाणार असेल तर त्यापेक्षा महाराष्ट्रात इंग्रजीची सक्ती झालेली परवडेल.

In reply to by वेल्लाभट

'भाषेतून शिक्षण' आणि 'भाषेचे शिक्षण' यात आपला घोळ झालेला दिसतोय. मराठी 'भाषा' म्हणून इंग्रजी शाळेत शिकवली जातेच की. प्रश्न मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा आहे. मग त्या मातृभाषेत पेन भेटलं किंवा दगडं मारली असलं काही असेल तरी विद्यार्थ्यास अर्थाचे आकलन होणे, त्याला विचार करता येऊन तो समर्थपणे मांडता येणे हे जास्त आवश्यक आहे. जे इंग्रजी सद्यस्थितीत करत आहे म्हणजे 'अभिजात'तेचा, 'उच्चभ्रू'पणाचा दबाव आणून कनिष्ठ वर्गातल्या विद्यार्थ्यांना न्यूनगंडग्रसित करणे, तेच मराठी करू लागली तर फरक काय राहीला? 'अभिजात'तेचा, 'उच्चभ्रू'पणाचा शिक्का आपल्यावर बसावा म्हणून जनता उरस्फोड करून आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत अव्वाच्या सव्वा फिया भरून शिकवायला मरमर करत आहे. शिक्षणाचा हाच अर्थ सर्वत्र प्रस्थापित झाला आहे. माझा मावसभाऊ पार खेड्यातला, इलेक्ट्रॉनिक्स आणि सिविल इंजिनीअरींगचं उपजत ज्ञान भन्नाट होतं. लहान असल्यापासून त्याच्या ह्या खटपटी चालूच असायच्या. न्यूनगंडामुळे बारावीत इंग्रजी भाषेचा चक्रव्यूह ३-४ वेळा प्रयत्न करूनही भेदू शकला नाही. आता गावी शेती करतो. तो जात्याच हुशार असल्याने पैसा कमावतो बर्‍यापैकी. पण पात्रता असून इंजिनीअर होऊ शकला नाही. माझे तर स्पष्ट मत आहे की इंग्रजीचा हा अडसर जाणून बुजून निर्माण करून मागास भागातल्या मुलांना मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखण्याचा काहीतरी कट आहे. कारण मुंबई सोडून इतर विद्यापीठांमधे पदवीपर्यंतचे शिक्षण संपेपर्यंत इंग्रजी भाषा अनिवार्य आहे. त्याची काहीच गरज नसतांना. जाणकारांनी अधिक माहिती द्यावी. जर्मन इंजिनीअरींगचे, जॅपनीज तंत्रज्ञानाचे गोडवे जगभर गायले जातात. ती लोकं आपल्या मातृभाषेतच शिकतात. एवढी भक्कम उदाहरणे समोर असतांना पुन्हा भाषेच्या शुद्धीकरणाचा मुद्दा पुढे करून मूळ विषयाला बगल दिली जाते हे बरोबर नाही. नेमाड्यांसारखे लोक मुद्दा बरोबर असला तरी भावनेच्या भरात भलत्याच पद्धतीने मांडून गांभिर्य कमी करतात.

In reply to by संदीप डांगे

माझे तर स्पष्ट मत आहे की इंग्रजीचा हा अडसर जाणून बुजून निर्माण करून मागास भागातल्या मुलांना मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखण्याचा काहीतरी कट आहे.
हे फार चुकीचे वाक्य आहे...

In reply to by टवाळ कार्टा

ते वाक्य अतिशयोक्ती असेलही. पण खेड्यापाड्यातल्या मुलांवर इंग्रजीची दहशत स्वतः बघितली आहे. शालेय शिक्षणात इतिहास भूगोलाइतकेच इंग्रजीचे महत्त्व असते तर समजू शकले असते. पण ही 'साहेबी' भाषा 'नेटीव्ह' पोरांस झेपणार नाही असा माहोल तयार केला गेलेला आहे. इंग्रजीस अवास्तव महत्त्व देऊन 'तीच्यावर प्रभुत्व मिळवणे येरागबाळ्याचे काम नाही' असा काही भ्रम आहे. त्याचबरोबर त्यांना शिकवणारे शिक्षकही दर्जेदार नाहीत. कारण तेही याच व्यवस्थेतून शिकले आहेत. त्यामुळे इंग्रजी हे काहीतरी भयंकर प्रकरण असल्याचे या मुलांमधे रूजलेले असते. (इथे अपवादांबद्दल बोलून उपयोग नाही.) माझे स्वतःचे शिक्षण आधी ३ वर्षे (केजी) कॉन्वेंटमधे, नंतर झेडपीत चौथीपर्यंत, नंतर बर्‍यापैकी मराठी शाळेत उर्वरीत दहावीपर्यंत सेमी-इंग्रजीमधून झाले. माझ्या इंग्रजीकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात आणि इतर मुलांच्या दृष्टीकोनात बराच फरक होता. नववीमधे मी इंग्रजीतून कविता करू लागलो होतो तर सोबतच्या मुलांचे व्याकरण, स्पेलींग पक्के झाले नव्हते. त्याचे कारण त्यांना इंग्रजी ही कठीण भाषा आहे असे वाटायचे. बर्‍याचदा खुद्द शिक्षकांपेक्षा माझे इंग्रजीचे आकलन चांगले आहे असे मला जाणवायचे. त्याबद्दल आगावूपणा करून कानही शेकून घेतला आहे. यात कॉन्वेन्टची भलामण करण्याचा हेतू नसून एखादया गोष्टीचा संस्कार मनावर कसा केल्या जातो हा मुद्दा मांडणे आहे. आपल्या संस्कृतीशी नाळ तोडून शिक्षण देणार्‍या कॉन्वेंट्सना माझा कायम विरोध आहे. उदा.: रेन रेन गो अवे, बा बा ब्लॅकशीप, वैगेरे. पण कॉन्वेंटची इंग्रजीचे शिक्षण देण्याची पद्धत आणि इतरांची पद्धत यात फरक आहे हेही तितकेच खरे आहे. पुढे पहिलीपासून इंग्रजीचा चांगला उपक्रम सुरू झाला. पण त्यात काही चांगले घडायची वाट बघेपर्यंत पालकांनी इंग्रजी शाळांची वाट धरायला सुरुवात केली. या सर्व अनुभवावरून मला असे वाटते की भाषेचा बागुलबुवा निर्माण करून मुलांना पुढे येण्यापासून वंचित ठेवले जात आहे किवा त्यांना जास्त महाग अशा इंग्रजी शाळांकडे पिटाळले जात आहे किंवा इंग्रजांच्या कारकून तयार करण्याच्या व निवडण्याच्या पद्धतीलाच शिक्षण समजून बसल्यामुळे हे सगळे होते आहे.

In reply to by संदीप डांगे

असे असते तर मत मराठी मिडियम मध्ये शिकलेले प्रत्येक पोर किमान १ कादंबरी लिहायला हवे होते...मी स्वतः पुर्णपणे मराठी मिडियम मध्ये शिकलेलो आहे आणि शाळेतून कॉलेजात गेल्यावर कशी काशी होते याचा स्वतः अनुभव घेतला आहे...पहिली नोकरी लागून २ वर्षे झाल्यावर मला थोडेफार ईंग्लिशमध्ये बोलणे जमत होते आपल्या देशात जौदे...राज्यात शिक्षणासाठी २ मिडियम आहेत हेच मुळात चुकीचे आहे...आणि इतकी वर्षे महाविद्यालयीन शिक्षण इंग्लिशमध्ये आहे यात कट वगैरे काही नाही...ते तसे होणारच होते कारण मातृभाषेत महाविद्यालयीन शिक्षण देण्यासाठी ते सगळे ज्ञान आधी मातृभाषेत आणले पाहिजे...आणि भारतात किती मातृभाषा आहे याचा विचार केल्यास (इथे राष्ट्रभाषा कोणती यावरच किती वाद होतात) कोणत्या भाषेत शिक्षण असावे याला किती गोंधळ घातला गेला असता...परत ज्या राज्यात शिकलो तिथेच रहावे लागणार...म्हणजे प्रगत राज्यातले डॉक्टर दुसर्या राज्यांत जाउन औषधे सांगूच शकणार नैत वर परत गोर्यांचे ते सगळेच चांगले (हे असे वाटण्यात सगळ्याच जाती येतात) त्यामुळे जर सगळ्यांना समान शिक्षण हवे असेल तर भारतासारख्या अठरापगड जातींच्या देशात इंग्लिशला पर्याय नाही...जर शिक्षण घ्यायचेच नसेल तर ती प्रवृत्ती कोणत्या जातीची मक्तेदारी नै

In reply to by टवाळ कार्टा

तू म्हणालास तो भाग व्यक्तिसापेक्ष आहे बर का. मी सुद्धा १००% मराठी माध्यमातून शिकलो. गणित आणि विज्ञान सुद्धा. कॉलेजमधे मला एक कणही अडसर झाला नाही त्याचा. मी शाळेत असतानापासून इंग्रजी गाणी ऐकत आलो. आणि माझे काही मित्र आजही 'तुला कळतं तरी का ते काय गातायत?' असं विचारणारे आहेत. इच्छेचा भाग आहे, आणि प्रोत्साहनाचा. शिवाय घरी त्यास पूरक वातावरण असेल तर अजून उत्तम. त्यामुळे मराठीत शिकून पुढे कॉलेजात काशी बिशी होतेच असं मुळीच नाही.

In reply to by वेल्लाभट

मी जे लिहिले ते व्यक्ती सापेक्ष आहेच पण मला माझ्यासारखी परिस्थिती असणारी मुले बहुसंख्येने दिसली...जो तुझा अनुभव आहे तो सुध्धा व्यक्तीसापेक्षच आहे पण "१००% मराठी माध्यमातून शिकलो. गणित आणि विज्ञान सुद्धा. कॉलेजमधे मला एक कणही अडसर झाला नाही त्याचा." हे असे बहुसंख्य मराठी मिडियमच्या मुलांच्या बाबतीत नाही होत...आणि त्याचे मुख्य कारण "शाळेत इंग्रजी व्यवस्थित न शिकवणे" हे सुध्धा असू शकते "इच्छेचा भाग आहे, आणि प्रोत्साहनाचा. शिवाय घरी त्यास पूरक वातावरण असेल तर अजून उत्तम." हा नशिबाचा भाग झाला...सगळ्यांच्या घरात सारखीच परिस्थिती असेलच असे नै... "मराठीत शिकून पुढे कॉलेजात काशी बिशी होतेच असं मुळीच नाही." काशी व्हायलाच हवी असेही नाही...तरीसुध्धा ती होते...तेसुध्धा बहुसंख्य मराठी मिडियमच्या मुलांच्या बाबतीत...असे का?

In reply to by टवाळ कार्टा

मराठी मिडियमच्या मुलांच्या बाबतीत नाही होत...आणि त्याचे मुख्य कारण "शाळेत इंग्रजी व्यवस्थित न शिकवणे" हे सुध्धा असू शकते
दोन्ही शक्यता. न शिकवणे आणि न शिकणे (स्वतःहून). कुणाच्या बुद्धीवर मी काहीही म्हणत नाहीये हं. उदाहरण देतो. आमच्या शाळेत काही इंग्रजी भाषापंडित नव्हते शिकवायला. मला एकदा 'अ‍ॅन इंजिनियर' असं उत्तर चूक देऊन 'अ इंजिनियर' असं लाल पेनाने लिहून दिलं होतं सरांनी. म्हणून मी ते नाही शिकलो. मी अ‍ॅन इंजिनियरच शिकलो. घरचं वातावरण पूरक असणं नशिबाचा भाग. ठीक आहे मी कुठे म्हटलं असायलाच हवं? मी म्हटलं असेल तर उत्तम.
तरीसुध्धा ती होते...तेसुध्धा बहुसंख्य मराठी मिडियमच्या मुलांच्या बाबतीत...असे का?
पुन्हा तेच. इच्छाशक्तीचा अभाव म्हटलं तर आवडणार नसेल तर मग काय म्हणावं? मित्रांशी मुद्दाम इंग्रजीतून बोललं संध्याकाळी जरा वेळ तरीही प्रचंड फायदा होतो. स्वानुभवातून सांगतो. असो.

In reply to by वेल्लाभट

दोन्ही शक्यता आहेतच
आमच्या शाळेत काही इंग्रजी भाषापंडित नव्हते शिकवायला. मला एकदा 'अ‍ॅन इंजिनियर' असं उत्तर चूक देऊन 'अ इंजिनियर' असं लाल पेनाने लिहून दिलं होतं सरांनी. म्हणून मी ते नाही शिकलो. मी अ‍ॅन इंजिनियरच शिकलो.
हेच्च म्हणतोय...तुला शाळेत चुकीचे शिकवले गेले तरी तुला "शाळेत शिकवलेले चुकीचे आहे असे सांगणारे दुसरे भेटले"...सगळ्यांच्या बाबतीत हे लागू पडत नै...विशेषतः खेड्यांत...त्यांनी काय करावे
इच्छाशक्तीचा अभाव म्हटलं तर आवडणार नसेल तर मग काय म्हणावं?
हा ईच्छाशक्तीचा अभाव सुध्धा असू शकतो किंवा शाळेत इंग्रजीची गोडी लावण्यात शिक्षक कमी पडले असे सुध्धा असू शकते...कारण सगळ्याच शाळांमध्ये इंग्रजी शिकवण्याची क्वालिटी सारखी असू शकत नाही...
मित्रांशी मुद्दाम इंग्रजीतून बोललं संध्याकाळी जरा वेळ तरीही प्रचंड फायदा होतो.
कचकून सहमत

In reply to by टवाळ कार्टा

अगदी सहमत. इंग्लिश शिकून शेक्सपिअरवर पिएचडी करायला सांगत नैये कुणी तर बेसिक शिकणं अभिप्रेत आहे. इतकेही श्रम घ्यायची तयारी नसेल आणि आपल्या असमर्थतेचं तुणतुणंच वाजवायचं असेल तर त्याला कै अर्थ नाही. अलीकडे अशा रडारडीला भाव मिळायचे दिवस संपलेत ते बरंच आहे. गावाकडचे असा नैतर शहराकडचे, न्यूनगंडाच्या ओझ्यांचा अहंगंड वाहण्याची ही प्रेरणा मिळते कुठून तेच कै कळत नाही. याचा अर्थ मी इंग्लिशचा चाटू पुरस्कर्ता आहे असा कोणी काढू नये. मुद्दा इतकाच आहे की सध्याच्या काळातली बळजोर भाषा जी अख्खे जग वापरते-समजते ती शिकण्यात आळस दाखवला तर स्वतःसाठी संधी कमी होतात. त्याबद्दल व्यवस्थेला श्या घालत बसणे आणि इंग्लिश शिकणे यांपैकी कुठला मार्ग तुलनेने सोपा वाटतो ते पाहणं गरजेचं आहे.

In reply to by बॅटमॅन

इंग्रजी शिकणे आणि अरबी शिकणे यात माझ्यामते अरबी जास्त कठीण असेल. पण इंग्रजी येण्याभोवती जो ग्लॅमरवजा गवगवा आहे त्याचं बर्‍याच लोकांना दडपण येतं. त्यामुळे ती शिकायला मन कचरतं. मनोबल कमी पडलं की सगळंच बोंबलतं. इतर विषयांबाबत (गणित, विज्ञान) कुठलाच असा त्रास होतांना दिसत नाही. भाषेपेक्षा हे विषय जास्त कठीण आहेत तरी यात आपली पोरं कुठेच कमी पडत नाहीत. शत्रूकडे भयंकर अस्त्रे आहेत, त्यांना जिंकणे कठीण आहे असा प्रचार सैन्यात झाला की पुढे १००:१ अशा प्रमाणात शत्रु आला तरी हरतात. कारण मनोबल, प्रतिमा. तशीच 'प्रचंड हुशार लोकांची भाषा' म्हणून इंग्रजीचे महत्त्व चुकीच्या पद्धतीने वाढवून आपल्याच लोकांनी 'जिंकण्यास अशक्य' अशी तीची प्रतिमा बनवली आहे. ज्यांना सत्य कळतं ते चटकन सुटतात. तेव्हा इंग्रजीचे दडपून टाकणारे वातावरण हटवले तर खेड्यापाड्यातला लुंग्यासुंग्यासही सुपारी चघळल्यासारखं इंग्रजी बोलता येइल. पण मग उच्च्भृ शाळेत दण्दणीत फिया देऊन फाडफाड इंग्रजी बोलणारे कशाच्या जिवावर मिरवतील?

In reply to by संदीप डांगे

हुच्चभ्रूपणा सर्व काळी सर्व ठिकाणी आढळतो. बाकी इंग्लिश माध्यमाच्या सर्वच शाळांत असे वातावरण असते असे नाही. खेडोपाड्यातले लोकही इंग्रजी नीट शिकले तर हुच्चभ्रू मिरवायला अजून दुसरे काहीतरी शोधून काढतील. तो खेळ अनादिसिद्ध आणि न संपणारा आहे.

In reply to by टवाळ कार्टा

सगळ्यांना समान शिक्षण हवे असेल तर भारतासारख्या अठरापगड जातींच्या देशात इंग्लिशला पर्याय नाही समान शिक्षण आणि समान भाषेत शिक्षण ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. चीनपासून जापानपर्यंत, जर्मनीपासून स्पेनपर्यंत भाषा किती वेगळ्या असल्या तरी डॉक्टरला डोकेदुखीवर औषध देतांना भाषेचा अडसर येत असावा असे वाटत नाही किंवा रोग्याच्या हृद्याचे ठोके विशिष्ट भाषेतच ऐकू येतात असेही नसावे. शिक्षकांना पायथागोरसचा नियम आपआपल्या भाषेत विद्यार्थ्यांना शिकवायला अडचण येत नसावी. इतिहास भूगोल आपल्याच भाषेतून शिकले तरी मूळ संकल्पनांचा गोंधळ होत नसावा. इथे जातीचा विषय नव्हताच मुळात. भाषेच्या शुद्ध असण्याचा अट्टाहासाचा आहे. केळाच्या सालीपासून प्लास्टीक बनवण्याचा प्रयत्न करणाराला त्या प्रयोगाच्या कौतुकापेक्षा तो केळाला 'क्याळं' म्हणतो म्हणून हिणवलं जाणार असेल तर अशा देशात प्रगतीची स्वप्नं पाहणारांनी सरळ झोपून जावं. काही मूठभर लोकांना (पक्षी: नेहमीप्रमाणे सरकार आणि गळेकाढू विचारवंतांना) मेहनत करायचा कंटाळा येतो म्हणून कोट्यावधी जनतेने पिढ्यान् पिढ्या अनावश्यक मेहनत करावी आणि न्यूनगंडाखाली आयुष्य कंठावे हे बरोबर वाटत नाही. पदव्युत्तर शिक्षणापर्यंत लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य, कुठल्याही ज्ञानशाखेचे असले तरी ते प्रमाण मराठीत उपलब्ध करावे. त्याचे सोप्या सामान्य भाषेत रुपांतर करावे. ते ज्ञान मुलांना त्यांच्या मातृभाषेतून त्यांच्या रोजच्या जिवनातल्या घटनांचा संदर्भ देऊन प्रदान करावे. हे वाटते तितके सोपे काम नसल्याने टाळल्या जात आहे. पण याचे दुष्परिणाम आपण भोगतो आहोत. अजून भोगणार आहोत. लाखो लोक वैज्ञानिक दृष्टीकोनाचे असतील तर त्यातून काही हजार शास्त्रज्ञ मिळतात. त्या हजारोंमधून मूठभर अलौकीक बुद्धीमत्तेचे मिळतात. मूठभरांमधून कुणी न्यूट्न, आईंन्स्टाईन निपजतो. आपल्याकडे भाषेच्या अडचणींमुळे विज्ञान म्हणजे काहीतरी रॉकेट्सायंस आहे. ते इंग्रजी येणार्‍यांनाच कळते असा भ्रम आहे. त्यामुळे मुळातच मूठभर शास्त्रज्ञ मिळतात. न्यूटन, आईन्स्टाईन तर अप्राप्यच. इंग्रजी ही जागतिक पातळीवर आंतराष्ट्रीय व्यवहारांसाठी आवश्यक आहे हे ठीक आहे पण जागतिक पातळीवर आवश्यक असणारी इंग्रजी गावखेड्याच्या पातळीवरही का आवश्यक ठरते हे कुणी सांगत नाही. प्रत्येकालाच तीची सक्ती करून काय साधते? त्यामुळे इंग्रजीचा अट्टाहास हा ज्ञानभाषेसाठी होणे देशासाठी मारक आहे. ज्या वेगाने प्रगती व्हायला हवी तीला प्रचंड अडथळे आले आहेत. सोबतचः इंग्रजी येत नसणार्‍यांची खिल्ली उडवण्यामागे फक्त भारतीयच असतात असा अनुभव आहे. इंग्रजी बोलता येत नाही म्हणून न्यूनगंड वाटून घेणार्‍यांमधेही भारतीयच असतात असाही अनुभव आहे. बाकीचे लोक मोडके तोडके इंग्रजी येत असेल तर बोलतात व दुसरे त्यांना हसत नाहीत. हे इतके नैसर्गिक असते जसे मला बंगाली येत नाही तर कुणी बंगाली माझी खिल्ले उडवत नाही किंवा कुणाला कन्नड माणसाला मराठी येत नाही म्हणून मी त्याची खिल्ली उडवत नाही. कारण त्याचा आपण हुशारीशी संबंध लावत नाही. जे इंग्रजीच्या बाबतीत आपल्याकडे सर्रास होते.

In reply to by संदीप डांगे

यातील काही मुद्द्यांबाबत सहमत असलो तरी चर्चा एका विशीष्ठ विशयाकडे जात आहे त्यामुळे माझा पास अवांतर - चीनचा डॉक्टर स्पेनमध्ये जाउ शकत नाही कारण भाषा वेगळी....जे जातात त्यांना इंग्रजी येते अती अवांतर -
इंग्रजी येत नसणार्‍यांची खिल्ली उडवण्यामागे फक्त भारतीयच असतात असा अनुभव आहे
अतिशय सहमत

In reply to by संदीप डांगे

आपल्या संस्कृतीशी नाळ तोडून शिक्षण देणार्‍या कॉन्वेंट्सना माझा कायम विरोध आहे.
तुम्ही विरोधाचं म्हणताय, मराठी बोलला म्हणून एका मुलाला पुण्यात एका कॉन्व्हेंट शाळेत झोडपला शिक्षकाने. काय आणि कसं करायचं यांना? विरोध हा फार सौम्य शब्द झाला. हे जे चालू आहे ना त्याचं गांभीर्य कळंत नाहीये इंग्रजीप्रेमात वेड्या झालेल्या मराठी माणसांना, आणि शासनाला. हे बघा

In reply to by वेल्लाभट

हे जे चालू आहे ना त्याचं गांभीर्य कळंत नाहीये इंग्रजीप्रेमात वेड्या झालेल्या मराठी माणसांना, आणि शासनाला.
सहमत. हे असं करू धजतात कारण खोट्या प्रतिष्ठेसाठी पालक आंधळे झाले आहेत म्हणून. अफूच्या धुंदीसारखी इंग्रजीची धुंदी चढली आहे लोकांना. त्याचे परिणाम बिचारी मुलं भोगतायत.

In reply to by संदीप डांगे

माझा मुळीच गोंधळ झालेला नाही.
मराठी 'भाषा' म्हणून इंग्रजी शाळेत शिकवली जातेच की. प्रश्न मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा आहे. मग त्या मातृभाषेत पेन भेटलं किंवा दगडं मारली असलं काही असेल तरी विद्यार्थ्यास अर्थाचे आकलन होणे, त्याला विचार करता येऊन तो समर्थपणे मांडता येणे हे जास्त आवश्यक आहे.
हे जरा नीटपणे बघू..... नंबर १. मातृभाषेतून शिक्षणास प्राधान्य, महत्व देण्यास मुळीच हरकत नाही. मी त्याच मताचा आहे. नंबर २. आता आला मुद्दा जी 'मराठी' भाषा शाळेत शिकवली जावी तिचा. तर ती शुद्ध असावी इतकीच अपेक्षा आहे. नेमाड्यांच्या म्हणण्यानुसार हा ब्राह्मणी वर्चस्ववाद आहे. आणि इतर बोलीभाषांनाही महत्व आहे. या आरोपाचा नक्कीच निषेध आहे. तेच मी प्रतिसादात म्हटलं की यात जातीला आणण्याची गरज नाही. नंबर ३. अर्थाचे आकलन होणे महत्वाचे आहे हे जरी मान्य असलं, तरीही ज्या माध्यमातून; म्हणजेच मराठीतून तो अर्थ पोचतो आहे, ते माध्यम उत्तम दर्जाचं असावं, ती भाषा शुद्ध असावी यात काय चुकीचं आहे? तेंव्हा माझ्या मते माझा घोळ झालेला नाही. आणि पेन भेटत नाही :)

In reply to by वेल्लाभट

तुमचे पहिले दोन्ही मुद्दे संपूर्णपणे मान्य आहेत. प्रश्न तिसर्‍याबद्दलच आहे. माध्यम 'उत्तम दर्जा'चे असावे हा जो आग्रह आहे त्यामुळे माध्यम महत्त्वाचे की ज्ञान असा प्रश्न उभा राहतो. 'भाषा शुद्ध असावी' या अपेक्षेत कुठेतरी वर्गसंघर्ष जाणवतो. 'आमची भाषा शुद्ध, तुमची अशुद्ध' असा कलह जाणवतो. जातीचा प्रश्न तर अजिबात येत नाही कारण शुद्ध भाषेचा आग्रह धरणार्‍यांच्या भाषेवरही भौगोलिक भाषावैविध्याचा प्रभाव जाणवतोच. त्यामुळे ज्ञानभाषा शुद्ध असण्यापेक्षा 'प्रमाण' असावी अशी माझी धारणा आहे. बोलीभाषांमधून जे काही ज्ञान संकलीत होईल ते मराठी प्रमाणभाषेत रुपांतरीत करून सर्वांना समान पातळीवर उपलब्ध करून देण्यास मदत होईल. तेच प्रमाणभाषेतलं ज्ञान आपआपल्या बोलीभाषेत पुन्हा रुपांतरीत करून वापरता येइल. गाडगेबाबा हे याचं एक उत्तम उदाहरण आहेत. ते उच्च तत्त्वज्ञान सामान्य बोलीभाषेत, सामान्य लोकांच्या आकलनक्षमतेप्रमाणे मांडून त्यांच्या विचारात बदल घडवत असत. हीच पद्धत इतर वैज्ञानिक, तांत्रिक विषयांसोबत वापरता येइल. पण भाषा 'शुद्ध किंवा विशिष्ट असावी' म्हटले की आधी त्या माध्यमाचा पूर्ण अभ्यास आणि आकलन होण्यातच अर्धा मेंदू थकून जातो. त्यानंतर त्यातून सांगितलेलं ज्ञानाचे आपल्या भाषेत विश्लेषण करून विषयाचे समग्र आकलन होईस्तोवर मेंदूचा पार भुगा होतो. त्यापेक्षा मातृभाषेत थेट विचारविनिमय करता येत असल्याने पूर्ण लक्ष संकल्पना समजून घेण्याकडेच राहील. यास्तव ज्ञानग्रहणाचे माध्यम मातृभाषा असावी, 'शुद्ध भाषा' असू नये असे मत आहे. असो. चला, एक किस्सा सांगतो. मी मूळ विदर्भातला. भाषेवर हिंदीचा प्रभाव. जेजेमधे अगदी सुरवातीच्या १०-१५ दिवसांतली घटना. एका कारकुनाकडून काहीतरी पत्र/पावती घ्यायला गेलो. बोलता बोलता त्याला म्हटले, 'ठीक आहे, जसे असेल तसे देऊन द्या'. तो बहुधा कोकण भागातला पण जन्म मुंबईत गेलेला, पावती हातातच ठेवून मला चिडवत म्हणाला, "अरे, तुला देऊन परत काय देऊ". मला काही समजला नाही त्याचा रोख. तसा तो बोलला, "अरे जरा 'शुद्ध' बोलत जा, 'देऊन द्या' काय?". मग माझी ट्युब पेटली. म्हटले, ""महाशय, जसे तुम्ही मुंबईत शुद्ध भाषेत देऊन टाक, घेऊन टाक म्हणता तशाच शुद्ध भाषेत आम्ही देऊन द्या म्हणतो." असेच भाषेवरून शिक्षकांकडून चिडवल्या गेल्यामुळे आमच्या एका सिनिअरने 'जांगळबुत्ता' ह्या अस्सल वर्‍हाडी शब्दावर आपले जाहिरात कॅम्पेन बनवून ते असाइन्मेंट म्हणून सबमिट केले होते.

In reply to by संदीप डांगे

त्यामुळे ज्ञानभाषा शुद्ध असण्यापेक्षा 'प्रमाण' असावी अशी माझी धारणा आहे
यू सेड इट. मी तेच म्हणतोय. प्रमाण भाषेवर एकमत का होऊ नये हे मला कळत नाही. यात जात-पात, प्रांत, प्रदेश येतच नाहीत; आणि न येवोत. पण मग पुण्याचं मराठी प्रमाण, की विदर्भाचं, की खांदेशचं, की कोकणचं... हे व्हायला लागलं तर मग अंतच नाही या गोष्टीला. A logic can be agreed to. A consensus can be arrived at. Hopefully in an unbiased way and with no pre-conceived notions. असो. हा आपला प्रश्न नव्हे. मराठी कुठली, आणि कशी शिकवावी हे शिक्षण मंत्रालय ठरवणार... तुम्ही आम्ही फक्त मिपावर बोलू शकतो. पण नेमाड्यांप्रमाणे सुरुवातच हे ब्राम्हणी हे कोकणी हे वैदर्भीय अशा जनरलायझेशन्स नी झाली की विषयच संपला मग.

In reply to by वेल्लाभट

म्हणून मी आधीच म्हटलं की भावनेच्या भरात टीनपाट प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे लोक काहीबाही बरळतात आणि मुद्द्याला नको ते फाटे फुटतात. याच भाषणात त्यांनी समोर शेतकरी आहेत हे पाहून अट्टल राजकारण्यासारखं शहरी नागरिकांवर 'शेतकरी कर' लावावा सारखे मुक्ताफळे उधळली. मला नेमकं नेमाडेंचं प्रोफेशन कळलेलं नाही. ते नक्कीच लेखक आहेत की राजकारणी. हे लोक बोलून जातात, ऐकणार्‍याच्या मनात ठिणगी टाकून. असो. मराठीची स्वत:ची अशी 'प्रमाण' भाषा आहे. ती टिकवलीच पाहिजे. प्रांतांनी आपापले अहंकार बाजूला ठेवले तर ती सगळ्यांना विना-अडथळा समजण्यासारखी आहे. निदान इंग्रजीसारखी डोकेफोड आणि न्यूनगंडाचा प्रादुर्भाव करणारी तरी नक्कीच नाही. तरीसुद्धा बोलीभाषेवरून कुणाचीही हेटाळणी करणे याला तीव्र विरोध आहे. पेन भेटलं काय किंवा दगडं मारली काय, आपल्या नेहमीच्या ऐकण्यातले नसले की वेगळे वाटते पण ते चूक नसते. आपल्यासारखे नाही म्हणून इतरांना हिणवणे हे माणुसकीहीन वर्तन आहे. मला व्यक्तिशः मराठीच्या सगळ्या बोलीभाषा खूप आवडतात. एकाच शब्दाचे वेगवेगळे उच्चार, लय, हेल, एकाच वस्तूला वेगवेगळी नावं, अर्थ, संदर्भ हे सगळं गोड वाटतं. त्यामुळेच मराठी भाषेचा अभिमान वाटतो कारण एवढं वैविध्य आपल्याला मिळालंय. केळी म्हणो वा केळं वा क्याळं, हे शुद्ध ते अशुद्ध अशी लेबलं लावू नये. कारण प्रत्येक शब्दाच्या उच्चाराला काळाचा शाप आहे. बाराशे वर्षाआधी एखादा शब्द कसा उच्चारला जात होता याचा आपल्याकडे कोणताच पुरावा नाही. त्यामुळे आमचाच उच्चार पूर्ण शुद्ध आहे हा निव्वळ अहंकार वाटतो. त्यामुळे ब्राह्मणीवर्चस्व सारखे आरोप करायला नेमाड्यांसारख्यांना कारण मिळतं.

In reply to by संदीप डांगे

तरीसुद्धा बोलीभाषेवरून कुणाचीही हेटाळणी करणे याला तीव्र विरोध आहे.>> ह्याला फार अनुमोदन. नुसते मराठीच काय सगळ्या जगात असेच आहे. अगदी इंज्राजाच्या देशातच इंग्लंड सोडला तर स्कॉटिश आणि वेल्श भाषा पण वेगळ्या आहेत. जसे उत्तरेला जाऊ तशी इंग्लिश बरीच बदलते. फाईलला फील आणि फाईन ला फिन म्हटलेले स्कॉटलंडमध्ये आईकलेले आहे. कोणी हसत नाही. स्कॉटिश लोक बोलायला लागली आणि सवय नसेल तर ३०% संभाषण डोक्यावरून जाते.

In reply to by संदीप डांगे

आता तुम्ही पुन्हा स्पेसिफिकली उल्लेख केलात म्हणून... एक सांगू का? 'पेन भेटलं' ही बोली भाषा म्हणून समर्थली जात असेल तर म्हणजे.... प्लीजच! व्याकरण दृष्ट्या बघा. शब्दकोषात 'भेटणे' या क्रीयापदाचा अर्थ बघा. आणि मग ठरवा. आणि हिणवण्याचा तुम्ही पुनरुच्चार का करत आहात तुम्हालाच माहीत.
केळी म्हणो वा केळं वा क्याळं, हे शुद्ध ते अशुद्ध अशी लेबलं लावू नये.
मग प्रमाण कसं ठरवायचं? आवडतं/नावडतं अशी लेबलं लावून? का काय, म्हणजे व्याकरण दृष्ट्या बघायचं नसेल प्रमाणाकडे तर कसं? असो. यापुढे माझा पास.

In reply to by वेल्लाभट

शब्दकोषात 'भेटणे' या क्रीयापदाचा अर्थ बघा. आणि मग ठरवा.
शब्दकोषात 'क्रीयापद' हा शब्द क्रियापद असा लिहिला जातो.

In reply to by वेल्लाभट

प्रत्येक बोलीभाषेवर आजूबाजूच्या प्रांतीय भाषेचा प्रभाव आहे. 'भेटलं' हे क्रियापद वर्‍हाडी भाषेत 'मिळणे' याअर्थी वापरलं जातं. त्यावर हिंदीच्या "मिलना" या शब्दाचा उलटसुलट काहीतरी प्रभाव आहे कारण हिंदीत सगळ्या भेटण्या-मिळण्याला एकच 'मिलना' हा शब्द आहे. तसाच वर्‍हाडीत सगळ्या भेटण्या-मिळण्याला एकच 'भेटणे' हा शब्द आहे. जुन्या ऐतिहासिक मराठीतही 'भेटणे' या शब्दास 'मिळणे' हा शब्द वापरलेला आठवतो. जसे अमक्या फौजेने तमक्या फौजेस जाऊन मिळणे. यात मिळणे म्हणजे एकत्र होणे असा आहे. वस्तू मिळणे याअर्थी नाही. जाणकार अधिक योग्यपद्धतीने सांगतील. बोलीभाषा म्हणून काय समर्थलं जावं याचे कायदे 'प्रमाणभाषा आणि तीचा शब्दकोष' बघून ठरवायचे हेही जरा अतिच. हे म्हणजे म्हशीच्या दुधाला गायीच्या दुधाची परिमाणं लावून त्याची पौष्टीकता ठरवण्यासारखं आहे. बोलीभाषा हा एक वाहता प्रवाह आहे. त्याचे आपले सौंदर्य आहे. त्यालाही प्रमाणात बसवायचं तर मग कुठलीच बोलीभाषा नको फक्त प्रमाणभाषाच असावी. स्पेसिफिकली व परत परत उल्लेख करण्याचे कारण हेच आहे की बोलीभाषा आणि प्रमाणभाषा या दोघींचे स्वतंत्र अस्तित्व एकत्रितपणे अजुनही बर्‍याच लोकांना मान्य नाही. त्यातूनच सामान्य जीवनात अनेकांना डीवचणे, अपमान करणे असा अनुभव येतो. म्हणून ही कळकळ. बाकी काही नाही. असो. यावरच एक घरगुती किस्सा: माझी बायको अस्सल मुंबईकर. मी वर्‍हाडी. कधी कधी किचनमधे भांड्यांच्या नावांवरून जाम घोळ होतात. बरेचदा तीला चटकन समजावे म्हणून मुंबईकर-मराठीतला शब्द आठवता आठवता मी ब्लँक होऊन जातो. कारण जन्मापासून ऐकलेला शब्द सुटत नाही, नवीन लवकर आठवत नाही. अचानक कधी 'गळवाभर पाणी दे पटकन' म्हटले की तीची दांडी गुल होते. तीने 'लोटीत आहे ते पाणी घे' म्हटले की माझी दांडी गुल. एकदा तर 'ते' घड्याळ का 'ती' घड्याळ यावरून जबरा खडाजंगी झाली होती. थोडक्यात काय तर आपले भाषेचे संस्कार फार रुतलेले असतात. वेगळं काही आलं की धडपडायला होतं.

In reply to by आयुर्हित

मराठीच्या भविष्याविषयी आत्यंतिक काळजी व्यक्त करणार्‍या सर्वांना एकदा विचारले पाहिजे की तुम्ही मराठी आंतरजाल पाहिले आहे का? माझा असा अंदाज आहे की मराठी आंतरजालाची वाचकसंख्या किमान अर्धा कोटी तरी असावी. यात मराठी संस्थळे, वृत्तपत्रांच्या जालिय आवृत्त्या, ब्लॉग्ज व समाजमाध्यमांतून उपलब्ध असणारे मराठी लेखन इत्यादी. त्यावर लेखन करणार्‍यांची संख्या किमान पंधरा वीस हजार तरी असावी. अन दिवसेंदिवस हे आकडे वाढतच आहेत असे निरिक्षण आहे. हे सर्व जाणून घेऊनही कुणाला मराठीच्या भविष्याची आत्यंतिक काळजी वाटत असेल तर ती गंभीर बाब असेल.

मराठीच्या भविष्याची आत्यंतिक काळजी
ज्यावेळी एखाद्या भाषिक व्यक्तीसमुहातील बहुसंख्य व्यक्तींचे असे मत होउ लागते की दुसर्‍या एखाद्या भाषेचा वापर केल्याने आपल्या आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रगतीची शक्यता जास्त आहे, तेव्हा त्या व्यक्तीसमुहातील मुळ भाषेचा अंत समीप आला आहे असे समजतात- अशा अर्थाचं मी काहीतरी कुठेतरी वाचलंय. मला ते पटलं. आजकाल अगदी अल्प उत्पन्न गटातील व्यक्तीही इंग्रजी शाळेत आपल्या पाल्याला घालायला धडपडत असतात. आमच्या सोसायटीत देखरेखीसाठी असलेली बाई आम्हाला विचारून गेली की तुमची मुलगी ज्या शाळेत जाते तिथे जागा शिल्लक आहेत का? आहेत म्हणून सांगितल्यावर पुढे म्हणाली की शाळा इंग्रजीच आहे ना!! बायकोने सांगितले की इंग्रजी वर्ग पण आहेत, तेव्हा चेहरा विचित्र करून म्हणाली की मग तुमची मुलगी इंग्रजी माध्यमाच्या वर्गात जात नाही का!! ( तिला इंग्रजी माध्यम हवे असावेच, कारण ती काय मराठी नव्हती. पण त्यात आमचा कशाला उद्धार!!) माझा एक क्लायंट तर माझी मुलगी मराठी माध्यमात जाणार म्हणल्यावर कळवळला होता की अहो काळजी करू नका, माझ्या सगळीकडे ओळखी आहेत, म्हणताल त्या शाळेत अ‍ॅडमिशन होइल!! जसं की आम्च्या लेकीला इंग्रजीवाले नाकारतच होते आणि अत्यंत नाइलाजाने मी तिला मराठी शाळेत घालत होतो... माझ्या ओळखीच्या आणि नात्यातल्या फारच थोड्यांची मुलं मराठी शाळेत जातायत (स्व-संपादित). हे किती दिवस चालु शकेल? आमच्या वेळच्या पैकी फक्त १० टक्के मुलांची मुलं मराठी माध्यमात जातायत. समजा हे प्रमाण इथे स्थिर राहिले तरी लवकरच अशी वेळ येइल की मराठी माध्यमाच्या शाळाच बंद पडतील...कितीही इच्छा असली तरी शाळा चालु तर हवी तिथे कुणी जायला... तेव्हा मराठीच्या भविष्याची काळजी अगदीच अनाठायी नाही. आंतरजालावर मराठीत गप्पा मारता येणे ही एक नक्कीच आशादायी घटना असेल. पण पुरेशी आहे असे वाटत नाही.

In reply to by असंका

जेव्हा मी मुलाला मराठी शाळेत घातलंय असं कुणाला सांगतो तेव्हा ऐकणार्‍याच्या चेहर्‍यावरचे भाव असे असतात की जणू, 'अरेरे, काय अधोगती करून घेतली आहे बिचार्‍याने, कसे कळत नाही यांना?' वैगेरे वैगेरे. इतक्या काळजीने ही लोकं बोलतात की जणू आता इंग्रजीत न शिकणार्‍यांना जगण्याचा हक्क मिळणार नाही. आणि मी, परवडत नाही तरी इंग्रजीच्या अट्टाहासाने घराचे बजेट बिघडवून घेणार्‍यांना हसतो. याच अट्टाहासावर आधारीत क्राईम पेट्रोलमधे एक एपिसोड पाहिला होता.

In reply to by असंका

श्रीमंत घरची मुले श्रीमंत इंग्रजी शाळेत जातात म्हणून माझीही मुले तीथेच शिकतील असा एक गरीब घरातली बाई निर्णय घेते. नवर्‍याची कमाई इतकी नसल्याने त्यावर प्रचंड दबाव आणते. घरातले सगळे वातावरण बिघडते. पण पैसे जमू शकत नसल्याने प्रवेश हुकतो आणि ती आत्महत्या करते असा काहीसा शेवट आहे. नेमकं आठवत नाही आता. पण पिळवटून टाकणारा प्रसंग होता. अशी मरमर करणारी कुटूंबं प्रत्यक्ष बघितली आहेत. त्यांच्यावर हसावे का रडावे तेच कळत नाही.

नैसर्गिक बाबाींमध्ये लुडबुड करण्याची मानवाची खोड जुनिच, मुल ज्या घरी जन्मले, ज्या राज्य /देश (परिसरात) आनंदाने वाढते तिच मुलाची भाषा ठरते. मुख्य म्हणजे लहान बालकांचा मेंदू आजूबाजुचे आवाज टिपून त्यातुन स्वयं स्वर/नाद ऊच्चार करते, म्हणजे शिकणे हि बाळाची नैसर्गिक प्रक्रिया आहे, आणि बाळ ते लक्षपूर्वक आत्मसात करते. जन्म ते शाळा प्रवेश ४ वर्ष मुल जे काही त्याच्या मातृभाषेत अथवा परिसर भाषेत शिकते तिच जर शालेय शिक्षणाची भाषा उपलब्ध असल्यास परमभाग्य, अन्यथा कोमल बाल मन नवीन अनोळखी भाषा ज्यातुन त्याला शिकवणार आहेत (फरक लक्षात घ्या शिकणे नाहीं) दडपणाखाली येते. मराठी शाळा अस्तित्वात असतांना आपली मुले आपण जन्माला घातली (मुद्दाम घातलीत, आपोआप झालेली नाहीं)तर ते आपलेहीं परमभाग्यच, नाहीं तर बसावे लागले असते पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ऊर्दु, फारसी भाषा शिकत, तर असे जे अनायास मिळते त्याची किंमत नसते हा मूळ मानवी स्वभाव. पुढे पर्यावरण बदल घडले ते मानवाचे निसर्गावर आक्रमण झाले, ज्याला आपण प्रगती म्हणतो तिच्या व्यक्ति सापेक्षता सहित विभिन्न रूपांत उपयोगी वाटुन होणारे परिणाम नजरेआड करतो तेव्हा खरंच प्रश्न पडतो की सर्वसमावेशक विकास घडविताना अभिप्रेत असलेल्या परिणामाहून भयंकर, निरंतर टिकणारे दुष्परिणाम जाणिव करुन देतात की मानवा तुझे काहितरी चुक्याच. यालाच अनुसरुण असे म्णावे वाटते की सध्या उपलब्ध मराठी माध्यमात आपण जाणुनबुजुन जन्माला घातलेल्या मुलांना त्यांच्या कलाने ऊमलु देणे, व आपल्या उच्च भाषिक संस्करांने बहरु द्यावे, त्यातच बालकांचा आनंद आहे. आपल्या सुप्त, अतृप्त, अवाजवी, ईर्ष्यालु मागण्या पूर्ण करने हा हेतु ठेवून आपण संतति निर्माण केली का? याचा एकदा मनाशी पडताळा केला, आपल्या आकांक्षी मनाचा धांडोळा घेतला व तरीही असे प्रश्न उपस्थित झालेच तर नैसर्गिक तत्व पालन करावे. राग, लोभ, काम, क्रोध, मत्सर,ईर्ष्या या षड़रिपूंना आपल्या निर्णय प्रक्रियेत प्रभाव पाडू देऊ नये. माध्यम कुठलेही असले तरी काही फरक पडत नाहीं असा युक्तीवाद ऐकला की मला त्या इवल्या जीवाला दावणीला बांधल्याचे चित्र दिसते, मुलांना लहान वयातंच सवय लागली तर पुढे त्रास होत नाहीं, लहान वयात मुले सर्व शिकतात मग जुंपा त्याला- खोंडाला पण शेतकरी वयात आल्यावरंच जुंपतो पण आजचे आधुनिक सर्वज्ञानी पालक हे आपला मालकी हक्क गाजवताना मूलभूत मानवाधिकार मात्र पायदळी तुडवतायत. मुख्य भूमिका एकच मुले शिकतात ती मनस्वी असतात पण आपल्याला ती यशस्वी हवी असतात. असंख्य प्रतिक्रिया असे व्यक्त करतात की मुले शाळेत (इंग्लिश) गेली (शिकली नव्हे) की भावी आयुष्यात हमखास यशाची किल्ली त्याला आपण देतोय व फार मोठे उपकार करतोय (ऐपत असता/नसता दर्जेदार? शिक्षणाची सोय केली व आता उच्च पगाराची नौकरीपेशा जागा पटकावुन पालकांच्या दूरदर्शी पणाची फलश्रुती. याच कारणासाठी जन्मदाता झालो का? आता जुने ते सारे सोने होते आणि आजचे सारे पितळे बंधु. सरकारी ते भिकारी अन् खाजगी ते ताजगी. ज्याची किंमत फार ते भारी, ठरवुन शिक्षक होणारे किती अन् ठरवुन आपल्या पाल्याचे शैक्षणिक ध्येय शिक्षकी पेशा ठेवणारे किती? आॅ!! हे व काय? एकूण काय तर पैसा फेका जबाबदारी शून्य, जर जबाबदारी आहे/असेल तर मग आपले २५-३० वयोमान ज्ञान (फक्त इंग्लिश भाषा बोलणे इतपत) स्वतः निभावू की साशंकता तर मग कशाला हवे इतर माध्यम? उत्तर आहे- सगळे तेच करतायत, सामाजिक दबाव, घरुन भूणभूण, नातेवाईकांची टोचणी, सामाजिक स्तर/प्रतिष्ठा इ. इ. मग या सर्वापासून सुटकेचा सोपा मार्ग - घाला महागड्या /विदेशी छापाच्या शाळेत आपल्या अजाण, कोवळ्या पाडसांना, निसर्ग मानवाला लाखो वर्षों पासून जे संचित पुरवतोय ते सर्व सोडुन आजचा मुर्ख मानव लागलाय कचकड्या च्या मागे.