दिपोटी यांच्या कोड्याशी संलग्न नवं कोडं.
दिपोटी यांच्या ह्या कोड्याशी संलग्न एक नवं कोडं...
एकदा वसिष्ठ ऋषींना निबीड आवर्तारण्यात जाऊन महान आत्मविशुद्धी यज्ञ करायचा असल्याने आपल्या शिष्यांपैकी काही शिष्यवर्य निवडायचे होते. पण हा यज्ञ बराच कठीण असल्याने हुशार, प्रामाणिक, निष्ठावान, साहसी आणि सर्व शास्त्रांचा यथोचित अभ्यास केलेले काहीच शिष्यच त्यांना निवडायचे होते. आपल्या सर्व शिष्यांमध्ये ती क्षमता असल्याचे वसिष्ठांना ठाऊक होते म्हणूनच त्यांनी आपल्या शिष्यांची परीक्षा घ्यावयाचे ठरवले. त्यात सफल होणारे शिष्यच ते आपल्यासोबत नेणार होते.
त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना त्या दिवशी सायंकाळी कामधेनुचे मंतरलेले गोदुग्ध तीर्थ म्हणून प्यावयास दिले आणि ते म्हणाले,
"मी आज तुम्हाला जे कामधेनूचे दुध तीर्थ म्हणून दिले त्यामुळे तुम्हास आज रात्रीपुरता एक शक्ती प्राप्त होणार आहे.
परार्थ!
म्हणजेच समोरच्याची अलग क्षमता मोजण्याची शक्ती.
या शक्तीमुळे तुम्हाला रात्रीच्या ४ चंद्रप्रहरांत तुमच्या पैकी काही शिष्यांच्या कपाळावर ॐ चे अक्षर उमटलेले दिसेल. हे अक्षर त्या शिष्यांना मात्र स्वत:च्या कपाळावर उमटलेले जाणवणार नाही. तुम्हालाच आपल्यापैकी असे शिष्य निवडायचे आहेत आणि त्यांना माझ्या पर्णकुटीत पाठवायचे आहेत. जेव्हा चंद्रप्रहर सुरू होईल तेव्हा तुम्ही आश्रमाच्या अंगणात जमावे आणि एकमेकांना न्याहारून पाहावे. एकदा सर्वांना पाहून झाले की तुम्ही मौनधारण करून आपापल्या कुट्यांत परतावे आणि पुढच्या प्रहरासाठी नमन करावे. हे मौनव्रत अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचं कठोर पालन करणं सर्वांना गरजेचे आहे. ह्यात बोलून, हाव भाव करून, हात वारे किंवा कुठल्याही इशार्यांनी एकमेकांना दर्शावू नये की समोरच्याच्या कपाळावर ॐ उमटला आहे. जेव्हा नमन करताना तुम्हाला स्वतःला उमगेल की तुमच्या कपाळावर ॐ उमटला आहे तेव्ह तुम्हीच तडक माझ्या कुटीत हजर व्हावे.
अर्थातच जर तुमच्या आत्मनिरीक्षणात चूक झाली तर ज्या कार्यासाठी मी ह्या परीक्षेची योजना केलीय ते साद्ध्य होणार नाही आणि आपण सर्व एका महान सिद्धीस मुकू."
असे म्हणताच वसिष्ठ आणि माता आरुंधती यांनी मौन नमन सुरू केले आणि ते आपापल्या कुट्यांत परतले.
********************************
सकाळी वसिष्ठांनी आपल्या तीन शिष्यांसोबत आत्मविशुद्धी यज्ञ पूर्ण केला आणि अद्वैतसिद्धी प्राप्त केली.
********************************
आता मिपाकरांनी आपापल्या कपाळावरचे ॐ शोधावेत आणि ते तीन शिष्य कितव्या चंद्रप्रहरात आणि वसिष्ठांकडे कसे परतले हे सांगावे.
वाचन
5599
प्रतिक्रिया
0