Skip to main content

आजकालचे ग्रामीण चित्रपट

लेखक आशु जोग यांनी रविवार, 03/07/2011 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही वर्षापासून मराठीमधे अनेक ग्रामीण चित्रपट येऊ लागले आहेत मराठीतले काही ठराविक कलाकार तर दिवसेंदिवस ग्रामीण चा रतिब घालू लागले आहेत. हे सर्व चित्रपट पाहताना नेहमी प्रश्न पडतो ग्रामीण म्हणजे नेमके काय ? खटकणारी गोष्ट म्हणजे यातील कलाकारांचे ग्रामीण बोलणे जे त्यांना जमत नाही धोतर टोपी घातली किंवा नऊवारी लुगडं नेसलं की जमलं ग्रामीण असा एक भ्रम दिसतो या कलाकारांचा. आणि मग ग्रामीण म्हणून जी भाषा बोलली जाते त्यामधे आत्ता, आत्ता ग बया, कंच, वाइच, व्हय व्हय या शब्दांची नुसती भरमार होत राहते शिवाय ग्रामीण म्हणून एक विचित्र हेल काढून आणि अंमळ ओरडून हे कलाकार बोलतात तो सगळाच प्रकार तापदायक होतो. कृत्रिमता असह्य होते. आपला अनुभव काय आहे याबद्दल !

वाचने 30740
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

मराठीला ग्रामीण चित्रपट ही गोष्ट नवी नाही, सुर्यकांत चंद्रकांत, निळुभाऊ फुले यांनी ते गाजवून ठेवले आहे त्यांचा अभिनय सहज, नैसर्गिक वाटत असे. त्या तुलनेत आजचे कलाकार कुठे आहेत

नटरंग मध्ये अतुल कुलकर्णीने साकारलेले पात्र सुरवाती सुरवातीला ग्रामीण भाषा बोलत असते पण शेवटी शेवटी शुध्द आणि शहरी बोलायला लागते. अतुल कुलकर्णीसारख्या अभ्यासु अभिनेत्याने अशी चूक कशी केली हा प्रश्न मला चित्रपट पाहील्यानंतर पडला होता.

In reply to by कानडाऊ योगेशु

शेवटी शेवटी शुध्द आणि शहरी बोलायला लागते. हेच म्हणते. नटरंगमध्ये अजूनही काही चुका सहजपणे दिसत होत्या. त्यावेळी फार अपेक्षा ठेवून हा सिनेमा पाहिला आणि म्हणावे तसे मनोरंजन झाले नाही.

In reply to by कानडाऊ योगेशु

नटरंग मध्ये अतुल साहेब ग्रामीण बोलण्याचा अभिनय करतात फक्त. बोलायला जमलं नाहीये त्यांना :)

फार काय बघितले नाहीत त्यामुळे पाआआआआआआआआआअ स

जर एखादा ग्रामीण चित्रपट करायचा असेल तर त्यानी तिथे जाउन सवय करायला हवी.. तरच ते नीट्स जमेल..

"हा पन चित्रपटामधी तो जी भाषा बोलत व्हता ती क्वनची ग्रामीन ?" चित्रपटात दाखवली जाणारी ग्रामीन भाषा ही फार नाटकी असते प्रत्यक्षात ती तशी कुठेच ऐकू येत नाही. न चा ण करा, ण चा न करा आत्ता ग बया, आगं बाबो, आंग आश्शी, आरं बाबा असले काही बोला टकुरं डोसकं, मेल्या मुडद्या, बिगी बिगी हे शब्द वापरा की झालं ग्रामीन खेड्यामधे राहीलेला कुणीही माणूस सांगेल ही भाषा खोटी आहे, यांच्या स्वत:च्या मनातली आहे पण शहरात राहीलेल्या माणसांना फसवायला बरी असते ही चित्रपटातील ग्रामीन बोली ग्रामीन म्हणून काही दाखवा, त्यांना ते पटतं

In reply to by आशु जोग

मिसळ पावच्या काही मान्यवर सदस्याना कधी कधी ग्रामीण भाषेत प्रतिसाद लिहिण्याची हुक्की येते. त्यांच्या अशा प्रतिसादात बरेच वेळा दिसणारा एक शब्द म्हणजे निषेध च्या ऐवजी णिशेध .

ग्रामीण भाषा या सदराखाली मकरंद अनासपुरे जे काही बोलतो त्यावरून तर वाटते की तो कॉकने , गेलीक , या भाषा देखील तितक्याच ग्रामीण पणे सहज बोलू शकेल

मराठी सोडा हो जरा भोजपुरी बघायला जाम मज्जा येते आई मिलन कि बेला.

ग्रामीण चित्रपटच कशाला, आजकाल ज्या तथाकथित मराठी सिरीयल धुमाकूळ घालताहेत त्यातल्या सासुला किंवा सुनेला त्रास देण्यासाठी जे खलपात्र घुसवलं जातं ते सुध्दा आत्ता ग बया अश्याच ढंगाची ग्रामीण मराठी बोलतं. उदाहरणादाखल बरेच आहेत...कुंकू, मन उधान वारयाचे...

In reply to by किसन शिंदे

एक नवी मालीका झी वर येत आहे. पैलवानाच्या जीवनावर आधारीत असावी असे वाटते. त्या मालीकेतील प्रमुख पात्र अस्सल ग्रामीण भाषा बोलते.

सहमत आहे. आपले बरेचसे कलाकार एकाच साच्यामध्ये बोलत असतात. पात्र बदलले तरी लकबी त्याच राहतात. उदा.सचिन खेडेकर शिवाजीराजे मध्ये जसे बोलतात अगदी तसेच ता-यांचे बेट मध्ये. इकडे पात्राला थोडी ग्रामीण पार्श्वभूमी असूनही टोन मध्ये अजिबात फरक जाणवत नाही. भरत जाधव यांच्या ब-याच भूमिकांमध्ये एकच टोन वाटतो. सचिन खेडेकर व तत्सम लोकांच्या बोलण्याच्या लकबी बद्दल थोडा प्रश्न पडतो. त्यांच्याकडून काही शब्दांमध्ये विनाकारण अ लांबवला जातो. उदा. व्यासपीठ चा उच्चर ते व्यासsपीठ असा करतात. इथे स चा उच्चर विशेष लांबवला जातो. स हलंत नसला तरी तो पूर्ण उच्चरला जात नाही. तो लांबवला म्हणजेच बोली शुद्ध होते असा काही त्यांचा व इतरांचा समज आहे का? तुमची कारs घेऊन तुम्ही आजs कोठे जाणार? असं आपण म्हणतो का? मग शब्दांमध्ये हे असे लांबवलेले हेल कशासाठी? बाकी मकरंद अनासपुरे जे बोलतो ती मराठवाड्याची बोली नक्कीच नाही. फक्त ग्रामीणच नव्हे तर प्रत्येक भूमिकेप्रमाणे भाषा, उच्चार, लकबी बदलतात. मराठी कलाकरांना या क्षेत्रात सुधारणा करण्यास बराच वाव आहे असे वाटते.

बाकी मकरंद अनासपुरे जे बोलतो ती मराठवाड्याची बोली नक्कीच नाही तिकडच्या माणसांच्या बोलण्याचा बाज असाच असतो

In reply to by मराठी_माणूस

मराठी मानूस हाही सदाशिव ग्रामीण चित्रपट वाटतोय

बाकी मकरंद अनासपुरे जे बोलतो ती मराठवाड्याची बोली नक्कीच नाही तिकडच्या माणसांच्या बोलण्याचा बाज असाच असतो
-१ मराठवड्यात पण जिल्हा बदलला कि बाज बदलतो.सगळ्यांचा बाज १ सारखा नाहीये.

In reply to by मुलूखावेगळी

>>> मराठवड्यात पण जिल्हा बदलला कि बाज बदलतो.सगळ्यांचा बाज १ सारखा नाहीये. अगदी-अगदी, आणि स्पेशल अशी ’मराठवाडी’ बोली नाहीहे राव.....! (आणि असेल अशी बोली तर घ्या बरं काथ्याकूटाला विषय) ग्रामीण चित्रपटातील बोली आणि वेषभूषा संशोधनाचे विषय ठरावेत. -दिलीप बिरुटे

बोलीभाषा तशीच्या तशी सिनेमात आणणे शक्य आहे असे मला वाटत नाही. महाराष्ट्रात दर १२ कोसावर बोली बदलते असे म्हणतात. आता साधे कोकणातले उदाहरण घ्यायचं झालं तर. कोकणात राहीलेला दुसर्‍या कोकणी माणसाच्या बोलीवरून तो माणूस कोकणातल्या कोणत्या भागातील आहे हे सहज ओळखू शकतो. कोकणी नसलेल्या माणसाला देखील पोलादपूर, संगमेश्वर, कणकवली, मालवण इथल्या मराठी - कोकणी बोलीचे प्रकार सहज ओळखता येतात.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

कोकणात राहीलेला दुसर्‍या कोकणी माणसाच्या बोलीवरून तो माणूस कोकणातल्या कोणत्या भागातील आहे हे सहज ओळखू शकतो. कोकणी नसलेल्या माणसाला देखील पोलादपूर, संगमेश्वर, कणकवली, मालवण इथल्या मराठी - कोकणी बोलीचे प्रकार सहज ओळखता येतात.
अगदी योग्य म्हणालात... (माणगांव, महाड, रोहा तालुक्यांमधील ग्रामिण मराठी बोलणारा) धनाजीराव वाकडे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मान्य, की दर बारा मैलाला बोली बदलते, बाज बदलतो. त्याबाबत प्रत्यवाय नाहीच. परंतु, प्रत्येक सिनेमा हा कोणत्या ना कोणत्या ठिकाणी घडणार्‍या वास्तव/काल्पनिक घटनांवर आधारित असतो. तर 'त्या ठिकाणची बोली' ही तर एकमेवच असेल ना? वानगीदाखल असं म्हणूया की अबक नावाच्या सिनेमाचा हिरो हा मालवणचा आहे. सिनेमाचा पुर्वार्ध मालवणातला आहे. तर मग त्या हिरोची, त्याच्या आजूबाजूच्या पात्रांची संवादफेक ही मालवणातल्या मराठी लहेजाचीच हवी ना? की ती नगरी चालेल? कानाला खटकणार ना? प्रस्तुत लेखामध्ये लेखकाचे म्हणणेही असेच आहे असे दिसते. केवळ ण चा न केला, आत्ता, आत्ता ग बया, कंच, वाइच, व्हय व्हय आणि विचित्र हेल काढून हे सगळं 'प्याकेज' ग्रामिण मराठी म्हणून माथी मारण्याचा जो उद्योग चालू आहे त्याबद्दल लेखकाने उद्वेग व्यक्त केलेला दिसतो आहे. >>बोलीभाषा तशीच्या तशी सिनेमात आणणे शक्य आहे असे मला वाटत नाही. ह्याबाबत असहमती वर नोंदवली आहेच. कोल्हापूर जिल्ह्याच्या पार्श्वभूमीवर घडणार्‍या सिनेमामध्ये मराठवाड्यातला औरंगाबादी किंवा बीडचा लहेजा योग्य नसतो. पण कोल्हापूरातली मराठी बोली जशीच्या तशी आणणं मात्र १०१%शक्य असतं. अर्थात....दिग्दर्शक, अभिनेते ह्यांची निरनिराळ्या बोलीभाषांवर कष्ट करण्यची तयारी असेल तर आणि निर्मात्याला तेव्हढा वेळ असेल तरच! नाही का?

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सहमत, चिपलुन , रत्नाग्री, ची मालवणी वेगळिय, आणी तळ कोकणातली मालवणी वेगळिय, सातार्डा-पेडण्यातली मालवणी वेगळिय.

छान चर्चा ... सध्या मराठी शी णे मे एवढ्या ढिगाने येत आहेत कि बापरे .... सगळा अनुदान लाटायचा खेळ आहे बास... प्रेक्षकांशी काही देणघेण नसत

In reply to by परिकथेतील राजकुमार

ऑह्ह गॉड ! व्हाय व्हाय ? तुम्ही मराठी मूव्हिज का वॉच करता ? -महेश कोठारे तळहातावर मूठ आपटून "डॅम इट्" म्हणतो ते ऐकायला. -अशोक सराफ आणि निवेदिता हेल मोगॅम्बो पोजमधे एक हात वर धरून तिरतिरतिर करत एकमेकांपासून दूर तिरके तिरके पळत जातात ती कोरियोग्राफी बघायला. -कोल्हापूरच्या कर्दळीच्या फुलांनी भरलेल्या म्युनिसिपल गार्डन्स बघायला. -"तुझी माझी जोडी जमली ग झक्कास पोरगी पटली" अशासारख्या अद्वितीय रचना ऐकायला आणि त्यावर हिरो हिरविणीचा झिम पोरी झिम डान्स बघायला -वैभवलक्ष्मीच्या व्रताने सुटलेली संकटे बघायला -कुंकवाच्या बळकटीच्या साक्षात् अनुभव घ्यायला. आणि किती कारणं सांगू.. ????? आता वेगळे मराठी सिनेमे निघतात असे ऐकतो, पाहतो. त्याविषयी विशेष भाष्य काही नाही.

In reply to by गवि

अशोक सराफ आणि निवेदिता हेल मोगॅम्बो पोजमधे एक हात वर धरून तिरतिरतिर करत एकमेकांपासून दूर तिरके तिरके पळत जातात ती कोरियोग्राफी बघायला. हे एक नंबर :D :D :D :D अजुन एक- केवळ स्वतःच्याच सिनेमात महागुरु पिळगावकरांनी हट्टाने गायलेली गाणी ऐकायला.

In reply to by किसन शिंदे

हे सर्वात उत्तम गाणं आहे मराठी कोरिओग्राफीच्या इतिहासातलं असं माझं ठाम मत आहे. :) त्यामुळे गविंना +११११

पहिला प्रश्न हा की आज काल एवढे ग्रामीणच चित्रपट का निघतात? त्याकरता काही जास्तीचे अनुदान वगैरे आहे का? या ग्रामीण चित्रपटांत भाषा तर नाटकी असतेच पण त्यातल्या हिरवणी सुद्धा मुंबईमध्ये उच्चवर्गीय भागात राहणार्‍या मुली वाटतात. कित्येक अश्या चित्रपटात दाखवतात की नायक खेडवळ, कमी शिकलेला आणि 'सो कॉल्ड' गावराण भाषा बोलणारा असतो तर नायिका मात्र अगदी नेहमीच कॉकटेल ड्रेसेस घालून, इंग्रजाळलेलं मराठी बोलणारी बोल्ड मुलगी असते. अगदी मुंबई-पुण्यातही मुली पार्टी वगैरे सोडल्यास रोजच्या व्यवहारात असले कपडे घालत नाहीत आणि ग्रामीण भागात राहणार्‍या मुली मात्र कायम अश्या कश्या?

वस्तुस्थिती आहे हे खरं. आता त्यात सत्रा लफडी आहेत बघा. म्हणजे कसंय ना, पुर्वीचे ग्रामिण सिनेमे होते त्यात कामं करणारे बहुतांश कलाकार ग्रामिण पार्श्वभूमी असलेल्या ठिकाणांचे होते. (मी बहुतांश म्हणतोय..लगेच राजा परांजपे वगैरे नावं तोंडावर फेकायला यायची घाई करु नये.) हा एक मुद्दा आहे. आता मला सांगा, मुंबई अन पुण्यात आयुष्य गेलेल्यांना नवखी बोली कितपत घोळवता येणं शक्य आहे? मग कुठंतरी (कुठंतरी कसलं, सत्राठिकाणी) फाफलतोच बाज. पुर्वी माडगुळकर, मिरासदार, शंकर पाटील अशी दिग्गज मंडळी होती जे कथा-पटकथा लिहायचे. ज्यांना ग्रामिण जिवन, तिथल्या भाषेचा बाज, तिथला लहेजा ह्यांची पुरेपूर माहिती होती. आज आहे का त्या ताकदीचा कथा-पटकथाकार? 'सामना'च्या वेळी हिंदूरावांच्या रोलसाठी निळूभाऊंची शंकर पाटलांनी अस्सल कोल्हापूरी गावठाणांमधल्या बोलीची शिकवणी घेतली होती. आज आहे का कुणाला एव्हढा वेळ आणि सवड? आणि इच्छा? मग कचरा होईल नाहीतर काय चंदन?

In reply to by धमाल मुलगा

>>>पुर्वी माडगुळकर, मिरासदार, शंकर पाटील अशी दिग्गज मंडळी होती जे कथा-पटकथा लिहायचे. ज्यांना ग्रामिण जिवन, तिथल्या भाषेचा बाज, तिथला लहेजा ह्यांची पुरेपूर माहिती होती. आज आहे का त्या ताकदीचा कथा-पटकथाकार? आहेत ना.. चार दिवस पुस्तकं वाचली नाहीत की लगेच घंटाभर मुलाखती देणारे. ... आणि दोन लावण्या काय गाजल्या की गावोगावी जाऊन तोंड नको इतकं उघडं ठेऊन गाणं म्हणणारे गायक पण आहेत..

In reply to by पल्लवी

पुर्वी माडगुळकर, मिरासदार, शंकर पाटील अशी दिग्गज मंडळी होती जे कथा-पटकथा लिहायचे. ज्यांना ग्रामिण जिवन, तिथल्या भाषेचा बाज, तिथला लहेजा ह्यांची पुरेपूर माहिती होती. आज आहे का त्या ताकदीचा कथा-पटकथाकार? 'सामना'च्या वेळी हिंदूरावांच्या रोलसाठी निळूभाऊंची शंकर पाटलांनी अस्सल कोल्हापूरी गावठाणांमधल्या बोलीची शिकवणी घेतली होती. आज आहे का कुणाला एव्हढा वेळ आणि सवड? आणि इच्छा? मग कचरा होईल नाहीतर काय चंदन?

In reply to by मंदार कात्रे

भाषा शिकून येत असती तर काय पाहिजे होतं सदाशिवपेठेतल्यांनी सदाशिव भाषा बोलावी.. तरच ती नॅचरल वाटेल

पूर्वीचे कलाकार हे आपल्या कलेबाबत मेहनती आणि दक्ष होते. याची अनेक उदाहरणे आहेत. १)'शेजारी' या प्रभातच्या चित्रपटात गजानन जागीरदार यांना मुस्लिम मिर्झाची भूमिका साकारायची होती. त्यांनी चित्रीकरणाच्या काळात एका मुसलमान मौलवीची शिकवणी लावून नमाज काटेकोर कसा अदा करायचा आणि भाषेत उर्दू लहेजा कसा आणायचा याचे धडे घोटले. परिणामी त्यांचा अभिनय पाहून मुस्लिम प्रेक्षकांनीही तारीफ केली. २) सुलोचनाबाईंनी स्वतःच्या आठवणीत नमूद केले आहे, की सुरवातीला त्यांचे उच्चार ग्रामीण असल्याने शहरी/ब्राह्मणी वळणाची मराठी बोलणे त्यांना कठीण जाई. भालजींनी त्यांना एकदा समजाऊन सांगितले, की खर्‍या कलाकाराला सर्व भूमिका कराव्या लागतात. त्यामुळे शुद्ध उच्चार आणि विविध भाषा शिकून घ्याव्यात. सुलोचनाबाईंनी आपल्या भाषेवर मेहनत घेतली. पुढे त्या अगदी हिंदी चित्रपटांतही सहजपणे रुळल्या. ३) लता मंगेशकरांच्या मराठी साजूक वळणाच्या उच्चारांचा कुणीतरी (बहुधा दिलीपकुमार. चू. भू. दे. घे) उल्लेख केल्यानंतर लताबाईंनी परिश्रमाने आणि हिंदी चित्रपट दुनियेतील उर्दू जाणकारांशी बोलत आपला लहेजा परफेक्ट केला. नंतर त्यांनी विविध भारतीय भाषांमधील गाणी गाताना आपले उच्चार त्या भाषेप्रमाणे आहेत ना, याची कायम द्क्षता घेतली. आजकालच्या कलाकारांना कुठे एवढा वेळ असतो? सगळे कसे प्रोफेशनल. डायरेक्ट स्क्रिप्ट बोलायला तय्यार.

पक पक पकाक, वळू, खबरदार हे चित्रपट खरोखरच वेगळ्या अर्थाने अंगावर काटा आणतात. बाबांनो झेपत नाही ती भाषा बोलता कशाला, आईने शिकवली असेल ती भाषा बोला ना. खबरदारमधे संजय नार्वेकर रसिका जोशी पक पक पकाक - उषा नाडकर्णी आणि बाकी संधी मिळेल तिथे अमृता सुभाष, ज्योती सुभाष या मायलेकी, फेटा घातलेले मोहन आगाशे, जितेन्द्र जोशी, नंदू माधव हे लोक ग्रामीण बोलीचा जो रतीब घालतात तो डोक्यात जातो

आम्ही खेड्यापाड्यातला / ग्रामीण / शहरी / निमशहरी असा कोणताही मराठी चित्रपट बघत नाही. एवढा पेशन्स आणि मह्त्तवाचे म्हणजे वेळ नाही आमच्याकडे. - इंट्या इंग्लिश.

In reply to by इंटरनेटस्नेही

कामातिरेकामुळे बर्‍याच मराठी लोकांना मराठी चित्रपट बघाण्यास वेळ मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे खरी.

In reply to by बॅटमॅन

ग्रामीण भागातला कामातिरेक हा एक वेगळाच विषय आहे. १९६७ च्या कोयना भूकंपामध्ये बर्‍याच घरांची पडझड झाली. एकदा आमचे तीर्थरुप बोलता बोलता बोलून गेलेले... ६७ च्या भूकंपामुळं नेमकं कोण कुणाचं कोण ते समजलं. ;)

..पण मला "अग्निहोत्र" ही मालिका आणि त्यातलं मुक्ता बर्वेचं काम आठवलं.. फार घसेफोड न करता , बळचकर हेल न काढताही तिने ग्रामिण मुलीची भुमिका छानच वठवली होती. बाकी, कुणीतरी वर सचिन खेडकरांबद्दल केलेल्या विधानाशी सहमत. त्यांच्या अभिनयात्/बोलण्यात तोच तो पणा आलाय खरा..

>>अतुल कुलकर्णीने साकारलेले पात्र सुरवाती सुरवातीला ग्रामीण भाषा बोलत असते पण शेवटी शेवटी शुध्द आणि शहरी बोलायला लागते. शहरी बोलला तर चालेल पण रेकत रेकत आणि अस्तित्वात नसलेली ग्रामीण मात्र फारच हे वाटते

>>प्रस्तुत लेखामध्ये लेखकाचे म्हणणेही असेच आहे असे दिसते. केवळ ण चा न केला, आत्ता, आत्ता ग बया, कंच, वाइच, व्हय व्हय आणि विचित्र हेल काढून हे सगळं 'प्याकेज' ग्रामिण मराठी म्हणून माथी मारण्याचा जो उद्योग चालू आहे त्याबद्दल लेखकाने उद्वेग व्यक्त केलेला दिसतो आह धमाल मुलगा तुमचे म्हणणे अगदी पटले

पोपट नावाचा एक मराठी चित्रपट येवून गेला त्यातही हाच प्रकार

In reply to by आशु जोग

अरे असले कसले चित्रपट बघतोस रे? असले चित्रपट येवून जातात तेच बरे आहे. (नाटकप्रेमी) माई

आजो, तुमचा आक्षेप योग्य आहे. ग्रामिण सिनेमा ग्रामीण वाटतच नाही. नटरंग बघताना तर डोकंच उठलं होतं. त्यातले तमासगीर तर तमासगीर वाटलेच नाहीत. झी च्यानेलचे पेड आर्टिस्ट वाटले. एव्हड्यात चांगला ग्रामिण सिनेमा म्हटलं तर फॅन्ड्रीने खुपच वेगळा असा सुंदर अनुभव दिला. क्लास अन मास दोन्हीचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला सिनेमाला. अंतरराष्ट्रीय प्रेक्षकांची या कलाकृतीविषयी उत्सुकता शमवायला, दिग्द. नागराज मंजुळे निघाले युरोप दौरयावर . . . . !

In reply to by चौथा कोनाडा

आजो, तुमचा आक्षेप योग्य आहे. ग्रामिण सिनेमा ग्रामीण वाटतच नाही. नटरंग बघताना तर डोकंच उठलं होतं. त्यातले तमासगीर तर तमासगीर वाटलेच नाहीत. झी च्यानेलचे पेड आर्टिस्ट वाटले.
सहमत!!.. सोनाली कुलकर्णीचा आवाज तुपात भिजवलेल्या आणि नन्तर पाण्यात बुडवून मग पेटवायला घेतलेल्या वातीसारखा वाटतो. :) :) :) 'अतुल कुलकर्णी'ने या पिक्चरसाठी खूप मेहनत घेतलीये... ते त्याच्या बॉडीवरून जाणवतेही.... पण "नाच्या"च्या भूमिकेचा खरंतर त्याने पूर्ण विचका केलाये.. असं वाटतं... त्याचा मुद्दाम काढलेला किरटा आवाज, रसभंग करतो... बाकी "जैत रे जैत" मधली स्मिता पाटील .. परफेक्ट वाटते. अर्थात तिचा चेहरा आणि एकन्दर देहबोली आणि भाषा ग्रामीण बाजाला साजेशी होती. आणि त्यांच्याबरोबर डॉ. मोहन आगाशे!!!... आsssssहाssss.. अजुनही म्हणजे त्यांच्या वयाच्या ८० व्या वर्षी ते इतके हॅन्डसम दिसतात...तर 'जैत रे जैत' मधले मोहन आगाशे.... खरोखर कातर-जमातीतला एक रांगडा गडी म्हणून शोभले. हिन्दी आणि मराठी दोन्हीमधला स्मिता पाटलांचा वावर सहज होता. 'उंबरठा' मधल्या स्मिता पाटील..म्हणजे एक करारी स्त्री!!!! आजच्या कोणत्याच अभिनेत्रीत ही प्रतिभा नाही. अपवाद फक्त "धोबीपछाड" मधल्या मुक्ता बर्वे'ची "सुलक्षणा दांडगे".. तिची ती गावठी पद्धतीने "दादाss" म्हणण्याची स्टाईल........ अ प्र ति म !!! तिचं एकन्दर सिनेमातलं बोलणं हे शहरात वाढलेल्या गावंढळ तरूण मुलीचं होतं. तिचं गावंढळ हिन्ग्लिश.. अत्यंत मोहक वाटलं!!!... तिचे ते दोन दात पुढे काढून हसणं.. आणि राग आल्यावर ते दात पटकन आत घेऊन डोळे भिरभिरवणं........ केवळ अप्रतिम!!!!! तसंच "जोगवा" मधली देवदासी- मुक्ता आणि तिची बोली आणि देहबोली.... म्हणजे या सगळ्यावर कळस्स्स्स!!!!..... :) रंगीत पिक्चर्स'मधली सगळ्यात पर्फेक्ट ग्रामीण भाषा वाटते, ती मधू कांबीकरांची!!.. अर्थात येवढ्यात कुठला त्यांचा ग्रामीण बाजा'चा पिक्चर आलेला आठवत नाही. पण "झपाटलेला" मधली त्यांची "लक्ष्याची आई" मनाला खूप भावली. ग्रामीण भाषेला एक सहज लय असते. आणि ती लय पकडण्यासाठी ती अंगात मुरावी लागते. या पिक्चरमधल्या मधू'जींच्या "गप्पे.ए.ए.ए माकडतोंड्या".. सारख्या शिव्या खरोखर नॅचरल वाटतात.. आणि उचित परिणाम साधतात.... काही वर्षांपूर्वीच्या.. कुठल्याश्या पिक्चरमध्ये - बहुधा "घराबाहेर" असावा... त्यात "रीमा लागू" यांच्या तोंडी पण बर्‍यापैकी गावरान भाषा आहे.. पण तितकीशी प्रभावी वाटत नाही. तीच गोष्ट- "स्मिताजी तळवलकर" यांची!!!... खरं सांगायचं तर या दोघींच्याही तोंडी ग्रामीण भाषा तितकीशी शोभत नाही. या दोघी ग्रामीण भाषेत बोलत असतानाही त्यांची ओरिजिनल शुद्धता जाणवल्यावाचून राहत नाही. सध्या काही पिक्चर आणि सिरियल्स मध्ये काम करणार्‍या "सुरेखा कुडची" ऑल्सो व्हेरी इम्प्रेस्सिव्ह!!!!!! कजाग सासू, मुलीला सासूविरूद्ध भरवणारी आई, नवर्‍याला मुठीत ठेवणारी बायको... या सगळ्या त्यांच्या भूमिका बर्‍याचदा ग्रामीण भाषेत बघायला आणि ऐकायला मिळतात...... खूप सुन्दर!!!!!!!!!

In reply to by मृगनयनी

जैत रे जैत मध्ये कातकरी लोक असणे अपेक्षित आहे परंतु जे दाखवले आहेत त्यांची भाषा, गाणी वगैरे काहीही कातकरी वाटत नाही. गाणी तर ना धो महानोरांची वर्‍हाडी भाषेतली आहेत. वेषभूषा तरी कातकरी लोकांची आहे का शंकाच आहे.

In reply to by हुप्प्या

होय तो ही एक सदाशिव ग्रामीणच चित्रपट होता

भाषेचा वेगळा लहेजा आत्मसात करण्यासाठीसुध्दा काही स्किल्स अपेक्षित असावेत. निव्वळ याच कारणासाठी आशुतोष गोवारीकरने "लगान" मधे एकही मराठी कलाकार घेतला नाहीये. जितक्या मराठी कलाकारांची ऑडिशन घेतली गेली त्यांना अवधी हिंदी अपेक्षितरित्या बोलताच आली नाही.तसेही MTI (Mother Tounge Influence) कमी करणे सर्वांना शक्य नसतेच. त्यामुळेच इंग्रजी सुद्धा तमिळ, तेलुगु, गुजराती (आणि मराठी पण) लोकांची ओळखू येते :)

In reply to by आशु जोग

त्यांचे मराठी हे एक हिंदी भाषिक कलाकाराचे वाटते. एखाद्या भाषेचा लेहेजा , उच्चार शिकून ती बोलणे हे कुठल्याही कलाकाराच्या दर्जावर अवलंबून असते. नसरुद्दिन शहा देऊळ सिनेमात उपकार केल्याच्या थाटात छोटी भूमिका हिंदी उच्चारात मराठी संवाद म्हणून करतो तर नाही म्हणा त्याने राजपूत व्यक्ती रेखा उत्कृष्ट केल्या आहेत. नाना भोजपुरी व्यक्तीरेखा उत्कृष्ट करतो, दिलीप कुमार भोजपुरी उत्कृष्ट बोलतो. तर मंगेशकर कुटुंबीयांनी उर्दू भाषा शिकण्यासाठी ,खास शिक्षक नेमले होते.

हाच अनुभव येतो जवळपास सगळ्या ग्रामीण ढंगाच्या मराठी चित्रपटात! त्यामानाने "७२ मैल एक प्रवास" ह्या चित्रपटात स्मिता तांबे यांचा अभिनय मला (चांगला) अपवाद वाटला. तुमचे काय मत लोकहो?

मित्रानो ७२ मैल एक प्रवास हा सिनेमा मात्र ह्याला अपवाद होता......

एक डाव धोबीपछाड मध्ये मुक्ता लैच आवडली . :D सगळा पिच्चरच आवडला . बाकी लेखकाच्या विचारांशी / प्रश्नांशी सहमत . ( ग्रामीण भाषा ऐकूण माहिती असलेली . )

In reply to by दिव्यश्री

एकदम.. ए भुसनळ्या.. :) एकूण चित्रपट हा स्पूफच्या मार्गाने जाणारा आणि विनोदी असल्याने तिचं बोलणं झकास जमून गेलं आहे. पण परवाच दे धक्का मधले काही धमाल सीन - उदा. "सेनापती आमचे अश्व कुठे आहेत" पाहताना, सक्षम कुलकर्णीचं अतिशय ओढून ताणून ग्रामीण अगदी डोक्यात गेलं.. यायाम.. टिंग्या हा चित्रपट, त्यातली वर्‍हाडी बोली आणि एकूण साधा गाव शोभेल असं दिग्दर्शन आणि कला दिग्दर्शन जास्त अपील (मराठी?) झालं..

In reply to by मैत्र

अपील (मराठी?) झालं..>>> मनाला भावलं अतिशय ओढून ताणून ग्रामीण अगदी डोक्यात गेलं..>>>++++++++++++++++++++++++++++++++++ 111111111111 हे नेहमीच होत . उदाहरणे आत्ता आठवत नाहीत . नंतर लिहिते . एक आठवल महेश मांजरेकरची बायको, मकरंद अनास्पुरेंची झालेली बायको त्याच शिनेमात . *DASH* माझ तर अजूनही डोक उठत . त्या उलट काकस्पर्श मध्ये ती जास्त आवडली . :)

In reply to by मैत्र

टिंग्या हा चित्रपट, त्यातली वर्‍हाडी बोली आता वर्‍हाडी कुठून कहाडलं

>> टिंग्या हा चित्रपट, त्यातली वर्‍हाडी बोली टिंग्या हा जुन्नरजवळच्या नारायणगावचा आहे... वर्‍हाडी असेल तर ... प्रश्नच आहे

In reply to by आशु जोग

मपलं तुपलं ऐकून मला तसं वाटलं. वर्‍हाडी किंवा अस्खलित अहिराणीचा मी काही जाणकार नाही. आणि बहुधा जुन्नर तालुक्यात असं बोलत नसावेत.

In reply to by मैत्र

बहुधा जुन्नर तालुक्यात असं बोलत नसावेत
जुन्नर-आंबेगाव तालुक्यात असेच बोलतात (आंबेगाव तालुक्यातला) आजानुकर्ण

In reply to by मैत्र

हो टिंग्यामधली भाषा जुन्नर्/मंचर भागात ऐकलेली आहे. त्यामुळे त्यातील संवाद चपखल वाटले. मला 'देऊळ' मधली गावाकडची भाषासुद्धा अस्सल वाटली होती, जरी ती सहसा चित्रपटांत गावाकडचे लोक बोलताना दाखवतात तशी नव्हती. हायवे वर असलेल्या गावांमधल्या बोलीभाषेत अनेक इंग्रजी, पॉप कल्चर मधले शब्द असतात. तसे बरोब्बर दाखवले आहेत त्यात.

मला वळू आवडतो… हा चित्रपट मी कधीही कितीही वेळा पाहू शकते. तो डायलॉग ``किती चटणी खाता…. उगा लोकाच्या चेष्टेला भर …`` *lol* तसाच देऊळ चा पहिला अर्धा भाग आवडतो. डायलॉग ``पिंकी पडली… पिंकी….`` आणि ``ये येडा फोफाटा`` *lol*

In reply to by स्वरालि

आपण कधी स्वतः खेड्यात राहिला आहात का नसला तर या चित्रपटावर अवलंबून राहू नका सदाशिवातल्या गिरीश उमेश कुलकर्ण्यांनी काढलेले चित्रपट म्हणजे ग्रामीण असा एक सोयीस्कर समज अनेकांचा झालेला दिसतोय पण हा शॉर्ट कट योग्य नाही

खटकणारी गोष्ट म्हणजे यातील कलाकारांचे ग्रामीण बोलणे जे त्यांना जमत नाही सहमत, फारच कमी कलाकारांना म्हणजे बहुतेक सद्ध्या भारत गणेशपुरेलाच वऱ्हाडी नीट बोलता येत असावी, बाकीचे उगाच वऱ्हाडीतसुद्धा ते उचक्या लागल्यागत की की की घुसडत असतात. असो