मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भारतीय इंजिनिअरिंग क्षेत्र

नितिन थत्ते · · काथ्याकूट
नुकतीच विकास यांच्या "गोईंग फॉरवर्ड" या धाग्यावर जी चर्चा झाली त्या निमित्ताने भारतातल्या इंजिनिअरांची गुणवत्ता वगैरे गोष्टींची चर्चा झाली. त्यानिमित्ताने इंजिनिअरिंगच्या व्यवसायाविषयी आणि शिक्षणा*विषयीचे माझ्या मनात आलेले फुटकळ विचार. इंजिनिअरिंग हे क्षेत्र डॉक्टरी, अकाउंटन्सी, वकिली यांसारखेच व्यावसायिक क्षेत्र समजले जाते. परंतु या इतर व्यवसायांमध्ये आणि इंजिनिअरिंगच्या व्यवसायामध्ये मुख्य फरक हा की या इतर व्यावसायिकांची एक अ‍ॅपेक्स संघटना असते. आणि ती त्या त्या व्यावसायिकांचे आणि व्यवसायांचे नियंत्रण करते. इंजिनिअरांची अशी संघटना नाही. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स ही संस्था आहे पण ती इंजिनिअरांचे नियंत्रण करीत नाही. डॉक्टर, सीए, सीडब्लूए यांची व्यावसायिक नीतिमत्तेची नियमावली असते. तशी इंजिनिअरांची नसते. इंजिनिअरिंग व इतर क्षेत्रांतल्या शिक्षणातला एक महत्त्वाचा फरक म्हणजे त्या कोर्सेस मध्ये फील्डवर्क चे प्रमाण खूप जास्त असते. डॉक्टरांना दुसर्‍या वर्षापासून प्रत्यक्ष वॉर्डांमध्ये रुग्ण तपासणी वगैरे करावी लागते. सीएंना ३ वर्षे आर्टिकलशिप करावी लागते. शिवाय डॉक्टरांना एक वर्षाची इंटर्नशिप केल्यावरच प्रॅक्टिस करता येते. सीएंना पास झाल्यावर ३-४ वर्षे दुसर्‍या सीएच्या हाताखाली काम केल्यावरच सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस मिळते. वकीलालाही असेच काहीसे असते. इंजिनिअरिंगच्या शिक्षणात हे फिल्डवर्क फार फार कमी असते. कॉलेजमधील लॅबमधील आणि वर्कशॉपमधील काम हे काही फील्डवर्क म्हणता येणार नाही. अगदी शेवटच्या वर्षीचे प्रॉजेक्ट हे सुद्धा फील्दवर्क म्हणायला मी धजावणार नाही. येऊनजाऊन तिसर्‍या वर्षाच्या उन्हाळी सुट्टीत महिनाभर एखाद्या कंपनीत काम केले तर तेवढेच. पण ते सुद्धा कंपल्सरी नसते. त्यामुळे इतर व्यवसायाचे शिक्षण घेतलेला विद्यार्थी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तो 'मार्केट रेडी' असतो. इंजिनिअर तसा नसतो. त्याला बहुधा वर्षभराचे कंपनी ट्रेनिंग करायला लागते. ते तो पहिला जॉब ज्या कंपनीत करतो तिथेच मिळते. म्हणजे त्याचे फील्डवर्कचे क्षेत्र एकदम लिमिटेड होते. शिक्षणातला दुसरा मोठा फरक म्हणजे शिकवणारे शिक्षक. डॉक्टरांना शिकवणारे शिक्षक प्रॅक्टिसिंग डॉक्टर असतात. ते दररोज रुग्णोपचार आणि शस्त्रक्रिया करीत असतात. सीएंना शिकवणारे प्रॅक्टिसिंग अकाउंटंट असतात. वकीलांना शिकवणारे प्रॅक्टिसिंग वकील असतात (चूभूदेघे). पण इंजिनिअरिंग कॉलेजात शिकवणारे शिक्षक मात्र प्रॅक्टिसिंग इंजिनिअर नसतात. ते केवळ प्राध्यापक असतात. क्वचित प्रसंगी काही व्हिजिटिंग प्राध्यापक इंडस्ट्रीमधून येतात. मी सीओईपीला होतो तेव्हा अनेक प्राध्यापक तिथूनच इंजिनिअरिंग शिकलेले आणि इंजिनिअर होताच एकीकडे एम् ई करीत प्राध्यापक म्हणून लागलेले होते. म्हणजे त्यांनी इंडस्ट्रीचे तोंडही कधी पाहिले नव्हते. :( [काही हुन्नरी प्राध्यापक बाहेर इंडस्ट्रीशी कोलॅबोरेशन करीत असत आणि इंडस्ट्रीचा अनुभव मिळवीत + स्वतःचा काही फायदा करून घेत असावेत :) . कारण इतर प्राध्यापकांमध्ये ते 'वरकमाई' करीत असल्याची चर्चा असे ;) ]. दुसर्‍या शब्दात इंजिनिअरिंग कॉलेजेस ही व्यावसायिकांची कॉलेज असल्यासारखी न चालवली जाता ती आर्टस किंवा कॉमर्स कॉलेजासारखीच चालवली जातात. अशा वातावरणामुळे परीक्षार्थीपणा वाढीस लागून क्रिएटिव्हिटी आणि व्यावसायिकता कमी होत असावी का? *टीप : बरीचशी माहिती मी २६ वर्षांपूर्वी अनुभवलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिक्षणावर आधारली आहे. सीओईपीच नव्हे तर व्हीजेटीआय आणि सरदार पटेल कॉलेजात सुद्धा अशीच परिस्थिती होती. पण यात आजही फार फरक झाला असेल असे वाटत नाही. तसेच आय आय टी मधल्या शिक्षणप्रणालीविषयी माहिती नाही. कदाचित परकीय देशांच्या सहकार्याने उभारलेल्या असल्यामुळे सिस्टिम वेगळीही असू शकेल. इथे सदस्य असलेल्या आणि हल्ली किंवा पूर्वी इंजिनिअर झालेल्यांकडून भर घातली जावी अशी अपेक्षा.

वाचने 35140 वाचनखूण प्रतिक्रिया 88

संजय अभ्यंकर Tue, 09/28/2010 - 23:26
थत्ते साहेबांनी म्हटल्या प्रमाणे आजही स्थीती २६ वर्षांपूर्वी सारखीच आहे. इंजीनीयरींगचे शिक्षण आजही भारतात व्यवसायाभीमूख नाही. कॉलेजात थियरी पेक्षा प्रत्यक्ष व्यवसायईक शिक्षणाला महत्व यायला हवे. अभ्यासक्रमात मुलभूत बदल न केल्यास, भारतातले इंजीनीयरींग शिक्षण आर्ट्स, कॉमर्स सारखे च राहील.

कुंदन Tue, 09/28/2010 - 23:52
प्रॅक्टिसिंग इंजिनिअर तर फारच दुरची गोष्ट. बर्‍याचदा , इतर काही जमत नाही म्हणुन इंजिनिअरिंग कॉलेजात शिकवणारे शिक्षकही कमी नाहीत.

In reply to by नितिन थत्ते

Nile Wed, 09/29/2010 - 07:12
सहमत. पण पुणे विद्यापिठात (ऐकिव माहिती नुसार) लेक्चररांना कितीसा पगार मिळतो? त्यामुळे अनुभव असलेले इंजिनीअर लोक कशाला शिकवायला येतील? हाच प्रश्न सद्ध्या सगळीकडे आहे.

विलासराव Tue, 09/28/2010 - 23:58
मी ९४ ला पासआऊट झालो. तेंव्हा एकही इंडस्ट्रीयल व्हिजिट झाली नव्हती. मला तर ईंजिनिअरींग झाल्यावर आपण नेमके काय काम करणार असा प्रश्न पडला होता. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. मी इंडस्ट्रीयल ईंजिनिअरींग केले होते. पण काम कम्युनिकेशन मधे मिळाले. मग थोडाफार आयटी साठी प्रयत्न केला पण डाळ शिजली नाही. मग कम्युनिकेशन मधेच रमलो.

चतुरंग Wed, 09/29/2010 - 00:29
(साधारण १९८० च्या आसपास असावे) सँडविच कोर्स असा काहीतरी प्रकार इंजिनिअरिंगमध्ये आणण्याचा अयशस्वी प्रकार झाला होता (असे ऐकून आहे चूभूदेघे) - त्यात तिसर्‍या आणि चौथ्या वर्षीची दुसरी सहामाही ही इंडस्ट्रीमधे ट्रेनिंग घेत करायची आणि मग परीक्षा द्यायची असा काहीतरी प्रकार होता. परंतु ते सगळे दोनेक वर्षातच बंद पडले असावे. थत्त्यांनी मांडलेले मुद्दे योग्य आहेत. प्रत्यक्ष इंडस्ट्रीचे तोंडही न बघता शिकवणे म्हणजे खरंतर जोकच आहे! निदान प्रत्येक विषयाचा एकेक विजिटिंग लेक्चरर तरी असलाच पाहिजे त्याशिवाय बाहेर पडल्यावर फारच अवघड होते. सुदैवाने आमचे काही शिक्षक हे इंडस्ट्रीमधूनच आलेले होते किंवा बाहेर कन्सल्टन्सी करणारे होते त्यामुळे त्याचा फार फायदा झाला. मुख्य म्हणजे अमूक एका गोष्टीचा व्यवहारात उपयोग का आणि कसा होतो ह्याबद्दलच्या काही संकल्पना तरी नक्कीच पक्क्या झाल्या. आमच्या शेवटच्या वर्षाचा प्रोजेक्टसुद्धा आम्हाला चांगला निवडू दिला आणि त्याला शक्य ते सर्व पाठबळ पुरवले त्यातून आम्ही जे शिकलो ते कायमसाठी उपयोगी पडते आहे. माझे काही अनुभव मासलेवाईक आहेत -क्राँप्टन ग्रीव्जससाठी मी काही ऑटोम्याटिक वोल्टेज रेग्युलेटरचे काम करुन देत होतो. शॉपफ्लोअरवर काम चालू होते. एक मोटर खोलून ठेवली होती. स्टेटरच्या वाईंडिंगला काही प्रॉब्लेम होता. तिथला टेक्नीशिअन इंजिनिअर बाईंना म्हणाला "मॅडम, स्टेटरला प्रॉब्लेम आहे". बाईंचा पहिला प्रश्न "स्टेटर कुठे आहे?" मी आणि टेक्नीशिअन एकमेकाकडे बघत राहिलो आपल्याच साहेबाची आणखी लाज निघू नये म्हणून तो टेक्नीशिअन म्हणाला "मी बघतो मॅडम." आणि बाई तिथून पुढे गेल्या! मी आणि तो गालातल्या गालात अर्थपूर्ण हासलो.. एक शुगर फॅक्टरी - सीझन सुरु होतानाची वेळ. टर्बाईन सुरु करायचे होते. तिथेही ऑटोम्याटिक वोल्टेज रेग्यूलेटर बसवले होते. टर्बाईन सुरु झाले की पूर्ण स्पीडने फिरेपर्यंत अल्टरनेटरचे वोल्टेज हळूहळू वाढत जाते. एकदाका पूर्ण वेग आला की मग स्टेबल होते. रेगूलेटरच्या एका थायरिस्टरने दम टाकला आणि अचानक वोल्टेज ड्रॉप झाले. मी ओरडलो "अर्रर्र्..व्होल्टेज गेले रे खाली गेले!" तिथले इलेक्ट्रिकल इंजिनिअर वाकून टेबलाखाली बघू लागले!!!! (ह्यात एका शब्दाचीही अतिशयोक्ती नाहीये - माझी हहपुवा - आणि हसताही येईना शेवटी काम संपवून गेस्टहाऊसला आलो आणि आधी हसून घेतले!! =)) =)) ) अजून बरेच आहेत पण पुन्हा कधीतरी. एकूण बॉटमलाईन काय तर इंडस्ट्रिअल ट्रेनिंग हे अत्यावश्यक!! (ऑटोमॅटिक्)रंगा

In reply to by चतुरंग

मिसळभोक्ता Wed, 09/29/2010 - 01:48
मी ओरडलो "अर्रर्र्..व्होल्टेज गेले रे खाली गेले!" तिथले इलेक्ट्रिकल इंजिनिअर वाकून टेबलाखाली बघू लागले!!!! जबरा ! ह ह पु वा....

In reply to by मिसळभोक्ता

गांधीवादी Wed, 09/29/2010 - 05:09
असाच एक किस्सा, लेथ मशिनावर ४-४ पाने लिहून काढ्नार्याला एकदा प्रत्यक्षत लेथ मशीन चालवावी लागली, हाथ थरथर कापीत त्याने विचारले की बटन कुठे आहे ? (बटन समोरच दिसत होते.)

In reply to by चतुरंग

Nile Wed, 09/29/2010 - 07:14
सँडविच कोर्स असा काहीतरी प्रकार इंजिनिअरिंगमध्ये आणण्याचा अयशस्वी प्रकार झाला होता (असे ऐकून आहे चूभूदेघे) - त्यात तिसर्‍या आणि चौथ्या वर्षीची दुसरी सहामाही ही इंडस्ट्रीमधे ट्रेनिंग घेत करायची आणि मग परीक्षा द्यायची असा काहीतरी प्रकार होता. परंतु ते सगळे दोनेक वर्षातच बंद पडले असावे.
सँडविच कोर्सेस अजुनही सुरु आहेत (पुणे विद्यापिठात) आणि माझ्या मते सँडविच कोर्सेस हे नॉर्मल पेक्षा अजुनही चांगले. तुम्ही तेव्हढेच कोर्सेस करता पण सहा महिन्यांच्या ऐवजी १ वर्ष तुम्हाला व्यावसायिक अनुभव मिळतो. मी तर म्हणेन, चारही वर्षे मुलांना इंटर्नशीप मिळण्याची सोय आपल्या इंडस्ट्रीत झाली तर उत्तम व्यावसायीक अभियंते बाहेर पडण्यास मदत होईल.

In reply to by चतुरंग

संजय अभ्यंकर Wed, 09/29/2010 - 17:32
सँडविच कोर्स (डिग्री साठी) माझ्या माहीती नुसार केवळ पुणे विद्यापीठात आहे. तसेच हा कोर्स देणारे एकाद दुसरेच कॉलेज पुणे विद्यापीठात आहे. परंतु मुंबईत डीप्लोमा (सँडविच) दोन - तीन संस्थांत मिळतो. १९८२ साली मी व्ही.जे.टी.आय. मधून केलेला डीप्लोमा सँडविच होता. ह्यात ६वे व ७वे सत्र इंडस्ट्रीत केले. ह्या काळात बरेच काम करायला मिळाले. विशेषतः अनेक प्रकारची यंत्रे प्रत्यक्ष चालवायला मिळाली. ह्या अनूभवाचा खूप उपयोग आयुष्यभर झाला.

हुप्प्या Wed, 09/29/2010 - 00:29
मी एका प्रख्यात इंजिनियरींग कॉलेजमधून डिग्री (कशीबशी) मिळवली आहे. इतक्या वर्षानंतर जेव्हा मागे वळून त्या प्राध्यापकांच्या वागण्याकडे वा अभ्यासक्रमाकडे बघतो तेव्हा ह्या त्रुटी जाणवतात. १. प्राध्यापक मंडळी हस्तीदंती मनोर्‍यात असत. अभ्यासक्रमात वर्षानुवर्षे बदल होत नसे. सरकारी नोकरी असल्यामुळे ती गमवायची, प्रमोशन नसण्याची भीती नसे. त्यामुळे जगात काय चालले आहे ते बघून आपला अभ्यासक्रम सुधारावा असे कुणाला फारसे वाटत नसे. २. बहुतेक अभ्यासक्रम हा अत्यंत थियोरेटिकल अर्थात पुस्तकी, पंडिती छापाचा होता. कम्युनिकेशन थियरी, वेव्ह थियरी, सॉलिड स्टेट डिव्हायसेस, इलेक्ट्रिकल मशीन्स वगैरे विषय हे अत्यंत गणिती छापाचे होते. त्याचा व्यवहारात काहीही उपयोग झालेला नाही. क्वांटम मेकॅनिक्स, मटिरियल सायन्स, सोशिओलॉजी, मानसशास्त्र असले अगम्य विषय आम्हाला सक्तीने का शिकवले ह्याचा उलगडा आजतागायत झालेला नाही! ३. इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग हा विषय मोटर्स, रेझिस्टर, कपॅसिटर, वायर, अँटेना असल्या मूर्त वस्तूंशी जास्त निगडित आहे असे वाटायचे. पण ह्या अभ्यासक्रमामुळे हा विषय मॅट्रिक्स, व्हेक्टर्स, डिफरन्शियल इक्वेशन्स, रियल व कॉम्प्लेक्स इंटिग्रल्स, लाप्लास वा फूरियर ट्रान्स्फॉर्म, बेसेल्स फंक्शन, लिनियर प्रोग्रॅमिंग, ऑप्टिमायझेशन असल्या अमूर्त दैत्यांच्या जास्त जवळचा वाटला. खुद्द कामात मात्र ह्यातले कुठलेही ज्ञान जवळपास कधीही वापरावे लागले नाही. ४ बर्‍याचदा आपल्या विषयाची व्यवहाराशी सांगड घालणे हे प्राध्यापकांना कमीपणाचे वाटत असे. शुद्ध विज्ञान वा गणित विषयात हा गंड समजू शकतो पण इंजिनियरिंगमधे जरा अजब वाटतो. ५. राजकारण. विविध प्राध्यापकांमधे शीतयुद्ध चालायचे आणि त्याचा त्रास विद्यार्थांना व्हायचा. अमक्या डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्याला तमक्या डिपार्टमेंटमधे कोर्स करू द्यायचा नाही. अमका विषय सक्तीचा म्हणून तमकाही सक्तीचा करायचा वगैरे सर्रास चालायचे. अहंकारी प्राध्यापकांचा त्रास अनेकदा झाला आहे. पण प्राध्यापक मंडळी कष्टाळू होती. बहुतेक लोक पेपर काढताना विचारपूर्वक काढत. किंबहुना पेपर बनवणे ही आपली परीक्षा आहे असे अनेक शिक्षक मानत आणि आचरत. थियरी शिकून पाया भक्कम केला पाहिजे हे मान्य आहे. पण कुठेतरी व्यवहाराशी सांगड घातली गेली पाहिजे असे वाटते.

In reply to by हुप्प्या

चित्रा गुरुवार, 09/30/2010 - 04:31
१. सहमत २. अंशतः सहमत. थिअरीची गरज असतेच. आम्हाला मानसशास्त्र वगैरे विषयच नव्हते. ते का नव्हते असे मला आता वाटते. इंजिनीअरचे काम दिवसातून ५०% हून अधिक वेळ हे इतरांबरोबरचे काम असते. ग्रूपमध्ये आणि तरी थोडेसे अलिप्त असे काम त्याला/तिला करावे लागते. यापैकी नक्की कशाचा विचार प्राध्यापकांनी केलेला असतो? ग्रूप प्रॉजेक्ट आमच्या वेळी फक्त शेवटच्या वर्षी होता, आणि त्यात आम्हाला कामासाठी तयार करण्याचा कसलाही विचार प्राध्यापकांनी केलेला नव्हता, हे आता जाणवते. साधी परमिशन कुठून काढायची हेही माहिती नव्हते. हॉस्पिटलाचे डिझाईन करा यावरून तेव्हाच्या मुंबईतल्या एका हॉस्पिटलवरून काहीतरी डिझाईन केल्याचे आठवते! लांब लांब पॅसेजेस आणि आजूबाजूने काही रूम्स, असेच काही बाही. स्पेस प्लॅनिंग वगैरे कल्पनांबद्दल एक वाक्यही शिक्षकांनी सांगितले, डेटा कुठे मिळेल, कोणाशी जाऊन भेटा असे सांगितले, असे आठवत नाही. त्याबद्दलच्या काही कल्पनाही मनात न रूजल्याने प्रोजेक्ट हा अतिशय कंटाळवाणा झाला. ३. हे तेवढे मान्य नाही. शिकलेल्या सगळ्याचा उपयोग होऊ शकतो, तुमचे काम कशात आहे यावर काही गोष्टी अवलंबून आहेत. ४. कमीपणाचे वाटत असेल असे मला वाटत नाही. आपले अज्ञान उघडे पडेल अशी उगाचच भिती असते. प्रत्येक विषयातले सगळे शंभर टक्के ज्ञान तोंडपाठ हवे, ते नसल्यास, प्रश्न विचारल्यास आपल्याला मूर्ख धरतील अशा भितीने प्रोफेसर तोंडच उघडत नसावेत. उदा. शॉपमध्ये काम प्रत्येकानेच केलेले असते असे नाही. मी मुंबईला कन्सल्टिंग कंपनीत काम करत असताना साईटवरचे इंजिनीअर वेल्डिंगचे डीटेल यांना काय कळतात, अशा प्रकारे बोलतवागत असत ते आठवले. खरे तर थिअरी म्हणून वेल्ड साईझ, वेल्ड लेंग्थ सगळे कसे काढायचे ते शिकवलेले असते. पण साईटवर कधीकधी थोड्या अ‍ॅडजस्टमेंट होतात, हे डीटेल माहिती नसले आणि विचारले तर मूर्खात काढण्याची गरज काय असते हे मला अजूनही कळलेले नाही. तेव्हा हेच प्रोफेसरांचेही होत असेल. त्यापेक्षा दुसर्‍याचे काम कमी मोलाचे नाही, त्यालाही विचारात घेऊ, एवढे जरी मनात गृहितक धरले तरी सर्वांचीच कामे बरोबर होतील. ५. सहमत. प्राध्यापकही अहंकारी असतात, आणि बाहेर मिळणारे उत्तम इंजिनीअरही अनेकदा असतात असा अनुभव आहे. अमूर्त दैत्य! हाहा. मस्त!

गोरिला Wed, 09/29/2010 - 00:38
इंडिअन इंगीनीर स्वताला खूपच शाहने समजतात का त्यांना एवढा इगो असतो तेच काळात नाही त्या ऐवजी जेर्मोन अभियंते बह्घा म्हणजे कळेल कि आपण किती पाण्यात आहोत . स्व अनुभव सांगतोय .

In reply to by गोरिला

अनिल २७ Wed, 09/29/2010 - 09:55
एक सिनियर जेर्मोन ईंजिनीअर आला होता आमच्या एका प्रोजेक्टला विजिट करायला... त्याला ईंजिनीअरींगची बाराखडी शिकवूण परत पाठवला.. जाताना मराठीत 'अभार्री हाये' म्हणून गेला...

In reply to by अनिल २७

नितिन थत्ते Wed, 09/29/2010 - 10:03
प्रिसाईजली हाच विचार या काथ्याकुटाच्या मागे होता. ज्ञानाच्या आणि कुवतीच्या बाबतीत बहुधा फरक नसावाच. पण मग असे काय आहे ही ज्याने फंडामेंटल किंवा ब्रेकथ्रू काम भारतीयांकडून फारसे होत नाही - अगदी ज्यात भारत पुढे आहे अशा आयटी इंडस्ट्रीतही ? शिक्षणपद्धतीतला फरक हे एक कारण असू शकते.

In reply to by नितिन थत्ते

संजय अभ्यंकर Wed, 09/29/2010 - 17:57
(१) प्रॅक्टीकल ज्ञानाचा अभाव. आजही अनेक सिनीअर इंजीनीयर हाताने काम करणे कमी पणाचे मानतात. हाताने कधी काम न केल्याने आत्मविश्वास नाही. (२) ज्याच्यात नविन काही करायची इच्छा आहे त्याला भारतात स्कोप कमी. आमचे भांडवलदार संशोधनावर कोट्यावधी रू. खर्चण्यापेक्षा, रेडीमेड - कोलॅबरेशनवर जास्त भीस्त ठेवतात. आजतर कोलॅबरेशन पेक्षा जर्मन, जापानी कंपन्यांनी चीन मध्ये बनवलेला तयार माल भारतात आणून विकायचे प्रस्थ वाढले आहे. अशा महाभागांमुळे भारतीयांतली उरली सुरली सृजनशीलता ही संपुन जाईल. आजही आमच्या भांडवलदारांची नविन संशोधनावर पैसे खर्चायची कुवत नाही (टाटा सारखे लोक अपवादात्मक आहेत). (३) संरक्षण उत्पादनात जेथे नविन संशोधन, सॄजनशीलतेला वाव आहे, तेथे लाल फीत, दिरंगाई मुळे कोणी धडाडीचा इंजीनीयर टीकत नाही. (भारत सरकार संरक्षण संशोधनावर पुरेसा पैसा नेहमीच उपलब्ध करून देते. तरिहि दिरंगाई, खुर्ची टिकवण्यासाठी लाटलंगोटं करणे, प्रकल्प वर्षानुवर्षे उबवणे इ. प्रकार चालू असतात) भारतीय लढाऊ विमानासाठी बनवले जाणारे 'कावेरी' इंजीन २५ वर्षांनंतरही विकसित होऊ शकले नाही, शेवटी सरकारने तो विकास प्रकल्प बंद केला. आता तसले इंजीन अमेरीके कडून आयात होईल. अर्जुन रणगाड्याला लागणारे ५०००+ हॉ.पावरचे इंजीन आम्ही विकसीत करू शकलो नाही. आता अर्जुन प्रकल्प मोडीत काढून आम्ही रशीया कडून रणगाडे तंत्रज्ञान घेणे चालू ठेवले आहे.

In reply to by संजय अभ्यंकर

चतुरंग Wed, 09/29/2010 - 21:25
लालफीत, भ्रष्टाचार, दिरंगाई हे कायमचे शत्रू आहेत. अर्जुन रणगाड्यासाठी माझ्या मित्राने परकीय पॉवरसप्लायला रिप्लेस करणारा डीसी पॉवरसप्लाय विकसित केला होता. (आयात सप्लायच्या बर्‍याच कमी किमतीत हा तयार केला होता!) अतिशय दणकट असा सप्लाय चेन्नै जवळच्या आवडी येथील रणगाडा केंद्रातून सर्व तर्‍हेच्या टेस्ट्स व्यवस्थित उत्तीर्ण झाला. मोठी ऑर्डर मिळण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या. त्यानंतर कुठे माशी शिंकली ते माहीत नाही (पण अंदाज करु शकतो आपण!) ही सगळी प्रक्रिया अचानक रद्द झाली. काही कळवले नाही. हे अनुभव त्याला खाजगी कंपन्यातून सुद्धा आले. अशाच लालफितीच्या इतर कारभाराला कंटाळून त्याने शेवटी त्याचे पुण्यातले वर्कशॉप १५ वर्षे चालवून बंद केले. त्याने १२-१५ लोकांना रोजगार दिलेला होता त्यात बरेच इंजिनिअर्स होते. त्याचाही अनुभव असाच होता की इंजिनिअर्स शिकायला कचरतात, ऑन दि जॉब ट्रेनिंग घेणे, प्रत्यक्ष उपकरणे हाताळण्यासाठी जादा वेळ काम सुरुवातीला करावेच लागते त्याला फारसे राजी नसणे, सतत घड्याळाकडे पाहून कामे करणे, पगारवाढीची अपेक्षा करत राहणे. आणि एवढे करुन दोन वर्षात सोडून दुसरीकडे जाणे! सध्या तो फिलिपाईन्समधे एकामोठ्या कंपनीत लीड डिझाईन इंजिनिअर म्हणून काम करतोय!

In reply to by चतुरंग

संजय अभ्यंकर Sat, 10/02/2010 - 21:25
चतुरंगजी, प्रतिक्रीया उशीरा देतोय या बद्दल क्षमस्व.. आपल्या मित्राने बनवलेले इंपोर्ट सबस्टिट्युट स्विकारले गेले नाही. केवळ भ्रष्टाचार हे कारण असणे कठीण आहे. माझा अनुभव सांगतो की, भारतीय बनावटीची उपकरणे संरक्षण साधनात वापरायला स्वतःवर विश्वास असलेले अधिकारी लागतात. परकीय उपकरण फिल्डमधे फेल गेले तर इतका गहजब होत नाही. परंतु भारतीय बनावटीचे उपकरण फेल गेले तर, त्याव्यक्तीला (उपकरण निवडणार्‍या) जीव नकोसा होईल इतक्या चौकशा कमीटी बसवून करतात. आपल्या देशात गोर्‍याकातडीच्या सायबाला देवाचा दर्जा आहे. त्याचा चूका माफ होऊ शकतात. आमच्या नाही.

In reply to by संजय अभ्यंकर

चतुरंग Sat, 10/02/2010 - 22:14
ह्यासाठीच चाचण्या असतात. उदा. रणगाड्यात वापरले जाणारे इलेक्ट्रॉनिक्स हे तीव्र धक्के सहन करणारे हवे. 'जी शॉक टेस्टिंग' नावाचा एक प्रकार असतो. त्यात त्या उपकरणाला अतिशय तीव्र धक्के दिले जातात आणि मग ते पुन्हा तपासले जाते. अशा अतिशय कठिण चाचण्यामधून हा सप्लाय पार पडलेला होता. एवढे करुनही काही फेल्युअर्स होऊ शकतात पण ते कोणत्याही उपकरणाबाबत असू शकते आणि चुकेल म्हणून करायचेच नाही असे ठरवले तर सुधारणा करणार कशात? असो. गुंतागुंतीचे प्रश्न आणि उत्तरे आहेत हे खरे.

"इथे सदस्य असलेल्या आणि हल्ली किंवा पूर्वी इंजिनिअर झालेल्यांकडून भर घातली जावी अशी अपेक्षा." ~~ जरी श्री.नितिन थत्ते वरील वाक्यातून विशिष्ट विषयाच्याच 'रसिकास चेतावणी' दिली असली, तरी शिक्षणक्षेत्रातील विविध घडामोडीविषयी मला एक चळवळ्या या नात्याने उत्सुकता असल्याने व जरी मी कला शाखेचा पदव्युत्तर विद्यार्थी असलो तरी हा धागा विषय व त्यावरील अभ्यासपूर्ण प्रतिसाद मुद्दाम वाचले. इथे जरी फक्त इंजिनिअरिंग टीचिंग फॅकल्टी आणि अभ्यासक्रमाच्या उदासनेतेविषयी चर्चा घडत असली, तरी या राज्यातील कला आणि वाणिज्य शाखेतील अ‍ॅट पार सिच्युएशन अजिबात वेगळी नाही, इतकेच म्हणतो. ८०% मुले-मुली "मी पदवीधर आहे" या लेबलसाठीच येत असल्याने या दोन शाखेतील (काही सन्मानयीय अपवाद वगळता) प्राध्यापकांच्या ज्ञानलालसेविषयी आनंदीआनंदच आहे. एक वैचारिक धागा आहे हे निश्चित. इन्द्रा

राजेश घासकडवी Wed, 09/29/2010 - 02:53
इतर व्यावसायिकांमध्ये - विशेषतः डॉक्टरांमध्ये एक मूलभूत गाभा कायम आहे - मनुष्याचं शरीर बदलत नाही. त्यावर इलाज करताना येणारे प्रश्न काळाबरोबर विस्तृत होतात, पण वेडेवाकडे पसरत नाही. इंजिनियर किंवा तंत्रज्ञांच्या बाबतीत तसं नाही - प्रश्न बदलतात, तंत्रज्ञान बदलतं. त्यामुळे एका अर्थाने इंजिनियरींगचे कोर्स म्हणजे कॉमर्स, आर्ट्ससारखे अधिक व्यापक कोर्स आहे असं मला वाटतं. त्यामुळे काही प्रमाणात ऑन द जॉब ट्रेनिंग होणं हे बरोबर वाटतं. अर्थात सिव्हिल इंजिनियरिंगसारख्या शाखेबाबत हे तितकंसं लागू होत नाही. त्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणाऱ्यांनी शिकवावं हा मुद्दा पटला.

In reply to by राजेश घासकडवी

केशवसुमार Wed, 09/29/2010 - 21:27
अतिशय उत्तम काथ्याकुट काढल्याबद्दल थत्तेशेठ, मनापासून अभिनंदन.. प्रतिसाद ही खूप उत्तम आले आहेत.. एक अभियंता या नात्याने ह्या प्रश्नाकडे बघताना घासकवडीशेठशी काही प्रमाणात सहमत.. डॉक्टर, वाकील काही प्रमाणात कॉमर्स ह्या विषयाचे ऍप्लिकेशन (वापर? )तसा मर्यादित क्षेत्रात आहे.. पण सापेक्षतेने अभियांत्रिकीचा वापर, आवाका खूप मोठा आहे.. त्यामुळे वापराच्या दृष्टीने नक्की कशा कशाचे प्रात्यक्षिक अध्यायानं अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये घेतले पाहिजे असा प्रश्न मला नेहमी पडतो.. अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्णं केल्यावर मिळणार्‍या अभियांत्रिकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्याची लॉजिकला थिंकिंग (तर्कशुद्ध विचार? ) करायची क्षमता इतर अभ्यास क्रमां पेक्षा जास्त वाढते असे वाटते.. आणि त्याच मुळे आयटी क्षेत्राची कवाडे जेव्हा उघडली तेव्हा अभियंत्यांना त्यात प्राधान्य देण्यात आले(आयटी मधले काही ही येत नसताना). त्याच बरोबर हे ही तितकेच सत्य आहे की विद्युत अभियांत्रिकीच्या ४ वर्षात मी जे काही शिकलो ते टाय्मर ,कॉंटाक्टर आणि मशिन्स मला आज पर्यंत कधीच दिसले नाही तंत्रज्ञान फार पुढे गेले होते.. अभियांत्रिकी अभ्यासक्रमात फिल्डवर्क जरी नसले तरी निदान, जे व्यावसायिक क्षेत्रात वापरले जाते त्या तंत्रज्ञानाचा समावेश असावा. ज्या वेगाने तंत्रज्ञान बदलते आहे त्याच वेगाने अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम अद्ययावत करायला हवेत.

In reply to by केशवसुमार

चतुरंग Wed, 09/29/2010 - 21:39
अभ्यासक्रम अद्ययावत करायला हवेत म्हणजे पर्यायाने प्राध्यापकांनाही सातत्याने नवीन शिकणे आवश्यक राहील! ;)

शुचि Wed, 09/29/2010 - 04:08
शिक्षणाने इंजिनीअर नसतानाही प्रतिसाद देते आहे - वकील, डॉक्टर, सी ए - यांच्या चूकांना क्षमा नाही त्यामुळे त्यांना आधीच भरपूर सराव देत असावेत. आणि भरपूर प्रकल्प देखील उपलब्ध असतात हेदेखील कारण असेल. मरीन इंजीनीअरस ना भरपूर अ‍ॅप्रेन्टिसशिप करावीच लागते. कारण वन्स ऑन द शिप, यु आर ऑन युअर ओन. सिव्हील इंजीनीअरस ना का नाही देत भरपूर सराव (फिल्ड वर्क चा) कोणास ठाऊक. कदाचित तितके प्रकल्प उपलब्ध नसतील की प्रत्येक विद्यार्थ्याला पाठवून शिक्षण देता येईल "रेडी फॉर मार्केट" करण्यासाठी. ________________ प्राध्यापकांची ज्ञानलालसा - फर्ग्युसन रॉक्स!!! द बेस्ट फॉर प्रोफेसरस. पुणं खरच विद्येचे माहेरघर आहे. खूप मनापासून शिकवणारे, तळमळीने शिकवणारे, क्रिएटीव्ह प्राध्यापक मिळाले. ते नसते तर आयुष्यात काहीतरी चांगलं हरवलं असतं आणि ते हरवलय हे कळलही नसतं. ज्ञानदान या व्यवसायाबद्दलच आदर आहे.

In reply to by शुचि

बेसनलाडू Wed, 09/29/2010 - 05:17
वकील, सीए इ. प्रमाणे इंजिनिअर्सच्या चुकांनाही क्षमा नसते, असे वाटते. उदा. पुरेसे आणि आवश्यक सुरक्षानियंत्रक नियम नीट न वापरल्याने कित्येक कोटी डॉलरमूल्य असलेला कंपनीच्या ग्राहकांचा खाजगी विदा जालकंटकांच्या हाती पडून नुकसान झाल्याची उदाहरणे आहेत. या 'अक्षम्य' चुकीबद्दल संबंधित सॉफ्टवेअर अभियंत्यांच्या गटप्रमुखाची हकालपट्टी झाल्याचे एक उदाहरण डोळ्यांसमोर आहे. त्यावरून हे विधान करीत आहे. असो. (अनुभवी)बेसनलाडू डॉक्टरांचा - विशेष करून शल्यविशारदांचा - मानवी जीवनाशी थेट, प्रत्यक्ष संबंध जितका येतो, तितका इतर कोणत्याही व्यावसायिकाचा येत नसावा. नाही म्हणायला स्थापत्य अभियंते, आर्किटेक्ट वगैरेंचा संबंध येतोच; त्यांनी बांधलेल्या इमारती, पूल कोसळल्यास होणारी जीवितहानी व वित्तहानी हे मोठेच नुकसान आहे. त्यामुळे अभियंत्यांच्या चुका क्षम्य असतीलसे वाटत नाही. हीच गोष्ट विद्युत अभियंते, विद्युत दळणवळणा अभियंते, संगणक अभियंते यांच्याही बाबतीत सिद्ध करता येईलच. (अभियंता)बेसनलाडू मला वाटते ही क्षम्याक्षम्यता स्थलकालसापेक्ष, व्यक्तीसापेक्ष आहे. एका ठराविक व्यावसायिकांच्या गटास सरसकट लागू करण्यात हशील नाही. (निरपेक्ष)बेसनलाडू निदान संगणकशास्त्राशी संबंधित ज्ञानशाखांमध्ये तरी उपयोजनाभिमुख प्रकल्पांचा तुटवडा नसावा, असे वाटते. माझे संगणकशास्त्राचे पदवी शिक्षण २००१ - २००५ आणि पदव्युत्तर शिक्षण २००५ - २००७ या कालावधीत झाले. निदान या सहा वर्षांच्या शैक्षणिक कालखंडात एक विद्यार्थी म्हणून अशा प्रकल्पांचा तुटवडा मला भारतीय माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात, त्या क्षेत्रात काम करणार्‍या उद्योगांत दिसला नाही. मात्र विद्यार्थ्यांची शैक्षणिक कुवत, आत्मविश्वास, व्यावसायिक म्हणून होणारा निरोगी व्यक्तीमत्त्वविकास आणि अशा उद्योगाभिमुख प्रकल्पांमध्ये काम करण्याची वैकल्पिक किंवा अनिवार्य संधी हे सगळे घटक उत्तम व्यवसायाभिमुख शिक्षण मिळण्यास कारणीभूत असावेत, असे वाटते. (व्यवसायाभिमुख)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

Nile Wed, 09/29/2010 - 07:03
सीए इ. प्रमाणे इंजिनिअर्सच्या चुकांनाही क्षमा नसते,
+१. प्रत्येक शाखेनुसार याचे नियम बदलतात. काही शाखांत कायदेशीर कारवाईही होउ शकते. अमेरीकेचे उदाहरण द्यायचे तर तुम्हाला डिझाईन सारख्या महत्त्वाच्या कामासाठी पी. ई. ची परिक्षा पास करावी लागते. इथे तुमच्या चुकीमुळे मोठी (जिवीत अथवा इतर) हानी झाली तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होउ शकते. विमान अभियंत्यांमध्ये विमानाच्या मेंटेनन्सचे लायसन्स घ्यावे लागते. विमान उडण्यास सुस्थितीत आहे अशी सही ह्या लायसन्स इंजिनीअरने केल्याशिवाय विमान उडु शकत नाही. हे लायसन्स मिळवणे बरेच वेळखाउ आणि कष्टाचे काम असते.

Nile Wed, 09/29/2010 - 06:58
बर्‍याच अंशी सहमत आहे. इंजिनिअरींग मध्ये पुस्तकी ज्ञानावरच पुष्कळ भर असतो (ते ज्ञान महत्त्वाचे आहेच). मी स्वतः इंजिनीअरींग करुन प्रथम इंटर्न म्हणुन लागलो तेव्हा माझ्या मनात आलेले विचार अश्याच प्रकारचे होते. मला दिलेल्या कामात (बेसिक सोडले) तर मी शिकलेल्यातले फारसे उपयोगाचे नव्हतेच. मात्र विद्यार्थ्यांनीच स्वतःच्या इंटरेस्टने बर्‍याच गोष्टी शिकुन घ्यायला हव्यात असे माझे मत आहे. जे काही वर्कशॉपचे तास असतात त्याचा उपयोग करुन घेतला पाहिजे(जवळजवळ सर्वच जण, मी कुठे लेथ वगैरे वापरणार आहे आयुष्यात म्हणुन कसेबसे वर्कशॉप आवरतात). इंडस्ट्रीअल अनुभव पुरेसा मिळणे शक्य नाहीच, त्याच अक्रीता इंटर्नशीप -फायनल इअर प्रोजेक्ट वगैरेंचा फायदा घेउन शक्य तितक्या गोष्टी शिकाव्यात. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुस्तकी ज्ञान तरी किमान नीट मिळवावे, तेही जमले नाही (अनेकांना जमत नाही हे स्वानुभवाने सांगतो, अनेक शिक्षकांनाही नसते म्हणा) तर मात्र तेलही गेले अन तुपही गेले.

मी ६७ चा मेक्यानिकल इंजिनिअर असुन कारखान्यात शोप फ़्लोअर वर काम केलेला माणुस आहे... खरा अनुभव तुम्हाला शोप फ़्लोअर वर काम केल्यावरच मिळतो..हि लाईन कष्टाची असुन त्यात खुप मानसिक समाधान मिळते..क्रिएटिव्हिटीला खुप वाव असतो..टूल्स व जिग्ज्स फ़िक्स्चर्स च्या कामात.. परंतु ९५ नंतर कंप्युटर ची लाट आली व व तरुण पिढिला हात काळे करण्याची व १० तास उभे राहुन काम करण्याची व कामगारांशी हुज्जत घालुन उत्पादन चे लक्ष गाठणे हा मार्ग कष्ट प्रद वाटु लागला. व त्या मुळे बी.ई झाले कि सी ड्याक सारखा एखादा कोर्स करुन कधि अमेरिकेला पळतो अशी तरुणांना घाई झाली. व ह्या क्षेत्रात करीअर करणार्यांची संख्या घटली... त्या पेक्षा बी.ई होऊन एखादा सोफ्ट वेअर चा कोर्स करुन ८ तास मस्त थंड हवेच्या ए.सी वातावरणात कळ फलक बडवणे व मोठा पगार घेणे फायदेशिर वाटु लागले.. मेक्यानिकल इंजिनिअरींग हि सर्व इंजिनिअरींग लानईची आई आहे..व नोकर्या निर्माण करण्याची क्षमता फक्त मेक्यानिकल इंजिनिअरींग मधे आहे..पण मुक्त अर्थ व्यवस्था आली अन ह्या क्षेत्राची वाट लागली..लाखो कामगार बेकार झाले.. आज सोफ्ट वेअर हा परवलीचा शब्द आहे..व तरुणांचा तिकडे ओढा जास्त आहे... त्या मुळे आज श्रम व श्रम प्रतिष्टा हे शब्द इतिहास जमा झाले आहेत.. काळाचा महिमा...उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे...

In reply to by अविनाशकुलकर्णी

भाऊ पाटील Wed, 09/29/2010 - 13:40
>>मेक्यानिकल इंजिनिअरींग हि सर्व इंजिनिअरींग लानईची आई आहे.. बाप कोण आहे ते पण सांगा हो. तेवढीच आमच्या सामान्यज्ञानात भर :)

In reply to by अविनाशकुलकर्णी

संजय अभ्यंकर Wed, 09/29/2010 - 19:43
मेकॅनिकल इंजीनीयरींगची उपयुक्तता पुन्हा लोकांना कळेल. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व सिवील इं. ह्या शाखांतुन अर्हता प्राप्त विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅजुएट शाखांचे जास्त पर्याय उपलब्ध असतात.

In reply to by नितिन थत्ते

बेसनलाडू Wed, 09/29/2010 - 23:17
थत्ते काका, एक छोटीशी सुधारणा करतो - अमेरिकेतील शिक्षणव्यवस्थेत एम एस आणि पी एच डी हे ग्रॅज्युएशन आणि बॅचलर डिग्री (बी एस, बी ए वगैरे) हे अन्डरग्रॅज्युएशन समजले जाते. हे भारतीय शिक्षणव्यवस्थेच्या तुलनेत वेगळे आहे. असो. (छिद्रान्वेषी)बेसनलाडू येथे बॅचलर, मास्टर्स आणि पी एच डी सर्वच शिक्षणास्तरांवर इन्टर्नशिप (साधारण ३-४ महिने) आणि को-ऑप (साधारण ६-८ महिने) अशा दोन माध्यमांतून विद्यार्थ्यांना थेट उद्योगक्षेत्रातील प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळते. कंपनीमध्ये काम करताना त्या इन्टर्नशिप किंवा को-ऑप च्या मुदतीत मुदतीत पूर्ण होऊ शकेल, विद्यार्थ्यांचे अनुभव, ज्ञान, ज्ञानोपयोजनक्षमता व व्यवसायाभिमुख व्यक्तीमत्त्व यांचा विकास होईल, अशा स्वरूपाचे छोटेमोठे काम मिळते. बव्हंशी तांत्रिक स्वरूपाचे आणि विद्यार्थ्याच्या शिक्षणशाखेशी थेट संबंध असणारे असे हे काम असून त्याबद्दलचा एक सविस्तर अहवाल विद्यार्थ्याला ते काम पूर्ण झाल्यावर त्याच्या विद्यापिठाकडे सुपूर्त करावा लागतो. असाच एक लिखित अहवाल किंवा छोटे प्रेजेन्टेशन त्याला कंपनीमध्येही द्यावे लागते. मात्र असे असले, तरी स्वानुभवावरून इतके सांगता येईल की असे करतानादेखील 'मार्केट स्टडी' तितकासा होत नाही; तो पूर्णवेळ काम करतानाच अधिक परिणामकारकपणे करता येतो. भारतात अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना अशी इन्टर्नशिप किंवा को-ऑप ची संधी मिळत नाही. नाही म्हणायला शेवटच्या वर्षी जे प्रोजेक्ट करायचे असते, ते कॉलेजबाहेर कंपनीत करता येते; पण सर्वच विद्यार्थ्यांना तशी संधी उपलब्ध होईलच याची शाश्वती नसते. तसेच इन्डस्ट्रिअल टूर नावाचा जो एक निरर्थक खेळ खेळला जातो, त्यानेही फार फायदा काही होत नाही. आठवडाभराच्या इन्डस्ट्रिअल टूर मध्ये आम्ही बंगलोरमध्ये याहू आणि विप्रो ला एक दिवसाची भेट देऊन उरलेले पाचेक दिवस उटीमध्ये थंड हवेत घालवले होते ;) याव्यतिरिक्त उत्तम अभियांत्रिकी शिक्षणासाठी खाजगी उद्योग तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांनी (पक्षी सरकारने) विद्यापिठांमधील संशोधनांत गुंतवणूक करणे, उद्योग क्षेत्रातील अधिकाधिक व्यावसायिकांनी महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष शिकवणे, सेवाक्षेत्रातून निवृत्ती पत्करल्यानंतर महाविद्यालयांमध्ये अध्यापन हे कळीचे मुद्दे आहेत, असे मला वाटते. येथे दिलेल्या माझ्या एका प्रतिक्रियेत मी यावर मत मांडले होते. (अनुभवी) बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विकास Wed, 09/29/2010 - 23:22
इन्टर्नशिपच्या बाबतीत काही जणांकडून ऐकलेले आहे की कंपन्या घेतात पण काम करायलाच देत नाहीत. कधी कधी फायली लावयला सांगतात...

In reply to by विकास

बेसनलाडू गुरुवार, 09/30/2010 - 02:04
इन्टर्नशिप चा चांगला अनुभव आला आहे. दिलेले काम आवडीचे, महत्त्वाचे (कंपनीसाठी तसेच आमच्यासाठी) होते. कंपनीच्या मुख्य प्रकल्पाशी थेट संबंध नसलेले असल्यास पूरक तरी असायचेच. फायली लावायला लागण्याइतका वाईट (?) अनुभव कुणाकडून ऐकला नाही. 'मॅन्युअल टेस्टिंग' हा त्यामानाने वाईट ठरणारा अनुभव मात्र मी स्वतः घेतला आहे :) (अनुभवी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

मिसळभोक्ता गुरुवार, 09/30/2010 - 02:06
आय टी कंपनीत इंटर्नशिप आणि इतर कंपन्यांतली इंटर्नशिप ह्यात हाच मूलभूत फरक आहे. व्हाईटहाऊस मधील इंटर्नशिप आणखीच रोचक असल्याचे ऐकले आहे ;-)

विकास Wed, 09/29/2010 - 08:11
चर्चा विषय चांगला आहे - चर्चेची मांडणी आणि प्रतिसाद देखील आवडले. खालील प्रतिसाद हा चर्चा आणि प्रतिसादांना (व्यक्तीगत नावे न घेता) आहे. काही मुद्दे आले असले तरी महत्वाचे वाटतात म्हणून लिहीत आहे: इंजिनियरींगच्या संदर्भात अमेरिकेत, कॅनडात तसेच इतरत्र कदाचीत सर्वच प्रगत राष्ट्रात "प्रोफेशनल इंजिनियर" (पी.ई. / पी. इन्ज.) सारख्या प्रमाणपत्राची गरज असते. त्या शिवाय ते कायम ठेवण्यासाठी काही ठिकाणी रिफ्रेशर कोर्सेस पण करावे लागतात. अमेरिकेत पी.ई. हा प्रकार प्रत्येक राज्यात वेगळा आहे! त्यामुळे उ.दा. म्हणून न्यू यॉर्क राज्यातील पी.ई.स मॅसॅच्युसेट्स मध्ये पि.ई. म्हणून काम करता येणार नाही. शिवाय त्यांच्या परीक्षांची पद्धत पण वेगळी असते. एक गंमत म्हणून जाता जाता उदाहरण देतो: सर्वत्र समान असलेली इंजिनियर इन ट्रेनी ही परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला पिईच्या हाताखाली डिझाईनचा अनुभव असल्याचे सिद्ध करावे लागते. मॅसॅचुसेट्स मध्ये ते दाखवायला रिपोर्ट लिहावा लागतो. त्याची किमान काही वर्षांपुर्वीची अट होती की हा रीपोर्ट ८.५"क्ष११" कागदावर असला पाहीजे आणि त्याचे वजन १ पौंडापेक्षा कमी असले पाहीजे! (कागद किती ते महत्वाचे नाही!). असो. सिव्हील इंजिनियरींग मधे पिई ही स्ट्रक्चरल, जीओटेक, पर्यावरण, आणि सिव्हील इंजियरींग म्हणून (कन्स्ट्रक्शन) वेगवेगळी असते. एका टोपीने दुसर्‍या टोपीचा व्यवहार करता येत नाही.. असे एक ना अनेक... मला हा प्रकार जबाबदारी (लायाबिलीटी) पेक्षा प्रोटेक्शनचा जास्त वाटतो. सध्याच्या काळात भारतात, माझ्या माहीतीप्रमाणे स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून नगरपालीकेत नाव नोंदवताना अनुभव दाखवावा लागतो वगैरे प्रकार आहे. भारतात पण सध्या असेच सर्टीफिकेशन आणायचे चालले आहे. मात्र एकीकडे गरज आहे असे नक्की वाटत असताना हेच उत्तर आहे का हे कळत नाही, विशेष करून त्यातील ढुढ्ढाचार्यांच्या वापराच्या प्रकारामुळे... इंजिनियरींगच्या क्षेत्रात फिल्डवर्क कमी असते हे जसे सत्य असते, तसेच वर संबोधिलेलेल ढुढ्ढाचार्य पटकन नवीन मुलाला कामे देऊन अनुभव घेण्यास मदत करत नाहीत तर आपल्या हाताखालचा एक इंजिनयर तयार करतात असे वाटते. भारतात मला या संदर्भात खूप चांगला अनुभव आला आहे, त्यामुळे हा आरोप करत असलो तरी मी स्वतःला अपवाद समजतो. दुसरे अपवाद अर्थातच लहान कंत्राटदार अथवा कन्सल्टंट्स. पण त्यांच्याकडे क्वालीटी कामापेक्षा काम कसे करून घेयचे हेच जास्त प्रॅक्टीकल म्हणून शिकता येते... हे अर्थातच मी जास्त करून सिव्हील इंजिनियरींगच्या संदर्भात बोलत आहे. पुर्वीच्या काळात प्राध्यापकांना काहीना काही बाहेरचा फिल्ड एक्पिरीयन्स असायचा आणि मुलांना प्रॅक्टीकल गोष्टी शिकवल्या जात. अनेकांचे प्रॉजेक्ट्स हे पेपरवरचेच न राहता फिल्डवर करावे लागत. त्यातील अनेकजण यशस्वी सिव्हील इंजिनियर्स झालेली मी पाहीलेली आहेत. पण आमच्या पिढीपर्यंत सगळे बदलले होते. त्यावर लिहीणे म्हणजे अतिअवांतर होईल म्हणून तुर्तास इतकेच... बाकी सँडविच कोर्स हा प्रकार भागुभाई आणि व्हिजेटीआयच्या डिप्लोमामधे आहे. तेथील डिप्लोमा इंजिनियर्सना चांगले प्रॅक्टीकल ज्ञान असायचे. १२ वी नंतर हा डिप्लोमा केलेले काही अमेरिकेत डायरेक्ट एम एसला पण आलेले ऐकलेले आहेत.. अमेरिकेसंदर्भातः मी एम एस झालो असल्याने त्याचा अनुभव हा वेगळा आहे. बॅचलर्स हा प्रकार जरा वेगळाच आहे. कारण तुम्हाला विविध विषय शिकण्याची मुभा असते. अर्थात इंजिनियरींगमधील प्रमुख विषय शिकावे लागतातच. मुलांना खर्‍या अर्थाने प्रॅक्टीकल प्रॉजेक्ट्स करावे लागतात. स्ट्रक्चरल अथवा मेकॅनिकलमधे कसे असते माहीत नाही. फक्त मी शिकत असताना इंजिनियरींगच्या विद्यार्थाना गणित शिकवण्याची जेंव्हा वेळ आली तेंव्हा किमान त्यावेळेस माझ्या अनुभवापुरते बोलायचे तर ते खूपच मागे दिसले. तेच रसायनशास्त्रासंदर्भात. पण खर्‍या अर्थाने शिकून पुढे येण्याची जिद्द जास्त होती...

In reply to by विकास

Nile Wed, 09/29/2010 - 09:37
मी अमेरिकेत एम एस करत असलो तरी बॅचलर्स लोकांना काही विषय शिकवले आहेत, त्यावरुन काही निरिक्षणे नोंदवु शकतो.
मुलांना खर्‍या अर्थाने प्रॅक्टीकल प्रॉजेक्ट्स करावे लागतात.
इथे खर्‍या अर्थाने म्हणजे काय तर अगदी व्यावसायिक प्रोजेक्टस करता तुम्ही. उदाहरण द्यायचं तर, इंजिनीअरींगच्या चौथ्यावर्षाला सिनीअर प्रोजेक्ट करावयाचे असते. सहसा ही प्रोजेक्ट्स कंपन्यांची असतात आणि पैसेही कंपन्या देतात. बरेचदा ह्याच मुलांना कंपन्या तेच प्रोजेक्ट् पुर्णत्वाला नेण्यासाठी पुढे ग्रॅज्युएशन नंतर पुर्णवेळ नोकरीही देतात. (उदा. म्हणुन, काही विद्यार्थी फास्टेस्ट सायकल बनवत आहेत. अपेक्षित खर्च १५ हजार डॉलर्सच्या वर. सायकलच अश्या प्रकारची असेल. संपुर्ण सायकल विद्यार्थ्यांनीच बनवायची आजे, डिझाईन पासुन असेंबली पर्यंत. त्यासाठी योग्य असे अलॉय शोधण्यापासुन सगळे विद्यार्थीच करतात.)

In reply to by Nile

अशा प्रकारची सायकल पाहिल्यावर आधी मला हसायला आलं होतं. पण हवेमुळे होणार्‍या घर्षणामुळे सायकलचा वेग किती कमी होतो हे ती सायकल पळताना पाहून लक्षात आलं. मी पाहिलेली अश्या प्रकारची सायकल बंद नव्हती. एक मध्यमवयीन बाई ती सायकल चालवत होती. आणि आम्हां दोन पंचविशीच्या लोकांना ती चढावावर एवढ्या सहज मागे टाकून पुढे गेली की हवेमुळे होणारं घर्षण आणि प्रतिरोध या दोन्ही गोष्टी दोन खगोलाभ्यासकांना लगेच समजल्या. विज्ञानातही थोड्याबहुत प्रमाणात आपल्याकडे हेच होत आहे. आम्हाला एमेस्सीला शिकवणारे बरेचसे लोकही आपापल्या क्षेत्रात संशोधन करणारे नव्हते. सिरीयस काम करणारे काही लोक शिकवायचे आणि त्यांच्या वागण्या-बोलण्या-शिकवण्यातला फरक लगेच दिसून यायचा. भारतात विज्ञान शाखांसाठी आता IISER सुरू झाल्या आहेत, तिथे बारावीनंतर पाच वर्षांसाठी मुलं शिकायला येतील. तिथे शिकवायला संशोधकच आहेत, तेच लोकं कोर्सवर्क ठरवणार आणि या विद्यार्थ्यांना तिसर्‍या आणि चौथ्या वर्षात, आपल्या आवडीच्या विषयात संशोधनपर प्रकल्प करावा लागणार अशी व्यवस्था आहे.

अनिल २७ Wed, 09/29/2010 - 10:00
मला जे सांगायचे होते तेच सर्व प्रतिक्रियांमधून प्रतिबिंबीत झाले आहे... एक चांगला चर्चाविषय व प्रतिक्रियाही छान आहेत... वाचतोय..

प्रमोद्_पुणे Wed, 09/29/2010 - 11:13
मी वकीली आणि सी एस अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. साधारण वकीली शिक्षण घेणारे लोक आधी वाणिज्य किंवा कला शाखेची पदवी घेतात. म्हणजेच वयाच्या साधारण २१व्या वर्षी ते वकीली अभ्यासक्रमाची सुरुवात करतात. तो पर्यंत थोडा अनुभव आलेला असतोच. पुण्यापुरते सांगायचे झाले तर इथली महाविद्यालये चांगली आहेत. बी एम सी सी आणि लॉ कॉलेज मध्ये पदवी शिक्षण घेताना खूप चांगले अनुभव आले, चांगले प्राध्यापक मिळाले. बी एम सी सी वाणिज्य महाविद्यालय असूनसुधा इथे बरेच इवेंटस व्हायचे (जसे की मॉक बोर्ड मिटींग्ज, मॉक ए जी एम, मॉक स्टॉक एक्स्चेंज ई). लॉ कॉलेज मध्ये तर वीकली काही ना काही असायचेच. लॉ मधे मूट कोर्ट हा १०० मार्कांचा एक विषयच आहे. आता तर ईंटर्नशीपचे लोण आले आहे. वकीली पूर्ण होईपर्यंत मुले निदान ५-६ ईंटर्नशीप पुर्ण करतात... आणि हो वेगवेगळ्या शहरात (मुंबई, कोलकता, दिल्ली ई). सी एस ला तर ईंटर्नशीप करावीच लागली कारण तिथे प्रॅक्टीकलला खूपच महत्त्व आहे. केवळ थीओरी वर पास होणे अवघडच आहे. ह्या सर्वांचा प्रत्यक्ष काम करत्ताना खूप फायदा झाला, होतो आहे. असे असले तरीही प्रत्यक्ष काम करतो तेव्हाचे अनुभव वेगळे असतात. आणि आपण जसे जसे त्या क्षेत्रात रमत जातो तस तसे अजून प्रगल्भ होत जातो.

विनायक प्रभू Wed, 09/29/2010 - 11:26
सर्व प्रतिसादांचा आदर राखुन मला इथे नम्रपणे नमुद करावेसे वाटते ते अशाप्रमाणे: विद्यार्थ्यांनी जर थोडासा पुढाकार घेतला तर त्रुटींवर मात करुन कॉलेजमधे प्रॅक्टीकल इंजिनियर बनणे सहज शक्य आहे. पण विद्यार्थ्यांचा कल नसतो.

In reply to by विनायक प्रभू

गांधीवादी Wed, 09/29/2010 - 12:14
>>पण विद्यार्थ्यांचा कल नसतो. असे सगळ्या विद्यार्थ्यांना नावे नका ठेऊ हो, आमच्या नशिबी BE ची फ्री सीट असून सुद्धा घेता आली नाही. आमची आमचे BE EQ. (AMIE). पूर्णवेळ काम करून ७ वर्ष आणि १० हजार रुपयांत पूर्ण केले आहे. आणि त्याबळावर आज एक योग्य पदावर रुजू आहे. सगळे तुम्ही म्हणता तसे नसतात हो.

In reply to by विनायक प्रभू

विकास Wed, 09/29/2010 - 16:58
विद्यार्थ्यांनी जर थोडासा पुढाकार घेतला तर त्रुटींवर मात करुन कॉलेजमधे प्रॅक्टीकल इंजिनियर बनणे सहज शक्य आहे. पण विद्यार्थ्यांचा कल नसतो. अगदी पूर्ण सहमत. फक्त विद्यार्थ्यांना कल नसतो तशीच ती दिशा देखील नसते. पालक-विद्यार्थी एका विचित्र चक्रात अडकलेले असतात. जणू काही याच्या बाहेरचे काहीच नाही असे वाटत. ह्यात मी बाजू घेत नाही पण जी वस्तुस्थिती वाटत आहे ती सांगत आहे इतकेच. बाकी आपल्या प्रतिसादावरून अजून एक गोष्ट आठवली: आमच्या इंजिनियरींगच्या पहील्या वर्षात सिव्हील इंजिनियरींग स्टूडंट असो. चे फ्रेशर्स सोशल होते. त्यात वेगळे काय करायचे ह्याचा विचार करताना आम्ही, "मी माझी इंजि. लाईन का सिलेक्ट केली" या वर शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांतील प्रतिनिधींना बोलायला सांगितले. (एस पी असल्याने तीनच शाखा). हे अर्थातच सगळे माहीती-तंत्रज्ञान-संगणक क्षेत्र क्रांतीच्या आधीचे. इलेक्ट्रीकल चा मुलगा त्याची शाखा कशी ग्रेट सांगत त्यात कसे जॉब्ज आहेत म्हणून मी त्यात गेलो म्हणाला. मेकॅनिकलच्या विद्यार्थ्याने मी आधी कसा सिव्हील मध्ये होतो पण मेकॅ. मधे जॉब्ज असल्याने कसा फर्स्ट इयरला कसा झटलो आणि शाखा बदलली हे सांगितले. सिव्हीलच्या विद्यार्थ्याने अपराधी भावना लपवत सिव्हील कसे ग्रेट आहे आणि त्यात पण कसे जॉब्ज आहेत हे सांगितले... त्यानंतर एक गुजराथी आणि विद्यार्थीप्रिय ज्येष्ठ प्राध्यापक उभे राहीले आणि "उपदेशोही मुर्खाणाम प्रकोपाय न शांतये" असे म्हणत पुढे म्हणाले की, "engineers duty is to create jobs not demand one!". अर्थातच त्यात त्यांना प्रत्येकाने धंदे सुरू करा असे म्हणायचे नव्हते पण रिसोअर्सफुल आणि उद्यमशील असणे महत्वाचे हे सांगायचे होते. ते सगळे ऐकल्यावर, मनापासून टाळ्या वाजवत सर्व विद्यार्थी परत सब्मिशन आणि ग्लास ट्रेसींगचा विचार करत हॉल मधून बाहेर पडले... ;) (कारण एका वाक्याने आणि एका प्राध्यापकाने सुधारण्याची ही गोष्ट नाही. अख्खा नसेल पण ९०% समाज हा अंधश्रद्धेप्रमाणेच अ‍ॅडमिशन आणि अ‍ॅडमिशन मिळाले की लाईफ बनगयी या विचारांच्या चरखात अडकलेल आहे...)

विनायक प्रभू Wed, 09/29/2010 - 12:19
सध्या ची गोष्ट बोलतोय. १९४२ ची नाही. ही संख्या हल्ली फारच कमी झाली आहे. इंजिनियरिंग च्या वर्षात कॅट ची तयारी होती का १९४२ मधे?

मितभाषी Wed, 09/29/2010 - 13:12
चर्चाप्रस्ताव आणि प्रतिसाद उत्तम. अशा वातावरणामुळे परीक्षार्थीपणा वाढीस लागून क्रिएटिव्हिटी आणि व्यावसायिकता कमी होत असावी का? माझ्यासकट बरोबरचे बरेचजण सबमिशन झाल्यावर २-३ महिने अभ्यास करायचो. तेही नोट्सवरुन. अत्यंत बेसीक कन्सेप्टही फिल्डमध्ये आल्यानंतरच माहीत झाले. फिल्डमधील असंख्य किस्से आहेत सागण्यासारखे. कमर्शिअल बाजु पक्की असणारेच उत्तम व्यवसायिक होउ शकतात. कारण आपापल्या क्षेत्रात अत्यंत तज्ञ असलेले अभियंतेदेखील नोकरीच्या आणि मोठ्या पॅकेजच्य मागे पळताना दिसतात. विरोधाभास म्हणजे अनेक मोठे उद्योजक इंजिनिअर नाहीयेत.

क्लिंटन Wed, 09/29/2010 - 14:40
शिक्षणक्षेत्र हा माझा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे हा विषय चर्चेस आणल्याबद्दल नितीन थत्ते यांना धन्यवाद. मला वाटते की इंजिनियरींग क्षेत्राची जी वाट लागली आहे त्याला अनेक घटक कारणीभूत आहेत. १. विद्यार्थ्यांमध्ये माहितीचा अभाव: साधारणपणे डॉक्टर नक्की काय काम करतात याची विद्यार्थ्यांना लहानपणापासून माहिती असते कारण प्रत्येकावर कधिनाकधी डॉक्टरकडे जायची वेळ आलेली असते. पण मेकॅनिकल इंजिनियर नक्की काय काम करतात हे दहावीतल्या विद्यार्थ्याला विचारले तर त्याला ते सांगता येणार नाही. २. पालकांचे दडपण: बहुसंख्य पालकांना असे वाटते की आपला पाल्य इंजिनियर झाला नाही तर त्याचे आयुष्य खड्ड्यात जाईल.त्यामुळे पाल्याची आवड असो वा नसो इंजिनियरींगला जायची सक्ती केली जाते. वेगळे मत मांडल्यास--’तू गप्प बस तुला काही कळत नाही’ असे म्हणत पाल्याला गप्प बसवले जाते. ३. गतानुगतिकता: कारण १ आणि २ मुळे मुळात इंजिनियरींगल्या जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे दुसरा करतो तेच मी करणार या ’गतानुगतिक’ मनोवृत्तीतून विद्यार्थ्यांनाही आवड असो वा नसो, इंजिनियरींगलाच जावे लागते. महाराष्ट्रात आज दोनशेच्या वर इंजिनियरींग कॉलेज आहेत.त्यात सरासरी ३०० याप्रमाणे दरवर्षी ६० हजार विद्यार्थी इंजिनियरींगची पदवी घेऊन दरवर्षी बाहेर पडतात. त्या ६० हजारपैकी किती विद्यार्थी मुळात स्वयंप्रेरणेने इंजिनियरींगला गेलेले असतात हा अभ्यासाचा विषय ठरेल.जर मुळातच आवड नसेल आणि आपण ज्या फिल्डमध्ये जात आहोत तिथून बाहेर पडल्यावर काय करावे लागेल याचा पत्ता नसेल तर इंजिनियरींगला गेल्यानंतर एकामागोमाग एक धक्के विद्यार्थ्याला बसायला लागतात. मला सर्वात मोठा धक्का बसला होता तो वर्कशॉपमध्ये! मुळात कोणतेही मशीन हाताळणे हा माझा पिंडच नाही.माझी आवड Analytical कामात. त्यातून सुतारकाम, लोहारकाम यासारखी कामे इंजिनियरींगला गेल्यावर करायला लागली.मेकॅनिकलला गेल्यानंतर असले प्रकार करायला लागतील हेच बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या गावी नव्हते.त्या कामांची खरे म्हणजे मला अजिबात आवड नव्हती.त्यातच अंगावर वसकन ओरडणारे वर्कशॉप instructors आजूबाजूला. थोडक्यात त्या कामात आवड निर्माण व्हायची जराही शक्यता नव्हती. दुसरे म्हणजे जर्नल लिहिणे हे अगदी जीवावर येणारे काम. कोणतीही गोष्ट करायची म्हणून करायची (पाट्या टाकायच्या) या प्रकाराचा मला मनस्वी तिटकारा पहिल्यापासूनच होता. तेव्हा Lapping, honing सारखी आयुष्यात कधीही न बघितलेल्या प्रोसेसेसविषयी या जर्नलमध्ये माहिती लिहावी लागे. इंडस्ट्रियल व्हिजिट तीन-चार झाल्या. पण त्यात एका मशीनभोवती ६०-७० जणांचा गराडा आणि चला पुढे असा प्राध्यापकांचा दबाव! त्यातून काय शिकायला मिळणार? परीक्षांविषयी तर बोलायलाच नको.मला वाटते पेपर सेट करताना अशा पध्दतीने केले पाहिजेत की त्या विषयातील महत्वाची संकल्पना कळली नाही तर तो पेपर निघताच कामा नये. पण इथे तर काय इंजिनियरींगच्या पेपरात Short notes आणि जितके लांबलचक उत्तर तितके मार्क जास्त! आणि मुख्य म्हणजे एखादी महत्वाची संकल्पनाच option ला टाकली तरी तो पेपर सुटू शकतो असा सगळा बोगस कारभार. आम्हाला शेवटच्या वर्षाला Computer Integrated Manufacturing नावाचा एक विषय होता. अजिबात अतिशयोक्ती नाही पण त्यात कोणत्याही प्रश्नाचे उत्तर एकच असे. Computer Integrated Manufacturing मधील एखाद्या पध्दतीवर प्रश्न विचारला की आमचे उत्तर-- या पध्दतीमुळे ’Direct labour cost reduces, indirect labour cost reduces, direct material cost reduces, indirect material cost reduces......’ आणि 'Efficiency increases, Workers' morale increases, Production speed increases.......'. म्हणजे कॉस्ट किंवा लागणारा वेळ यासारखी गोष्ट आली तर ती कमी करायची आणि efficiency सारख्या गोष्टी वाढवायच्या! असला बोगसपणा इंजिनियरींगला असताना करावा लागला होता! तेव्हा इंजिनियरींगची मुळात आवड असलेल्याची आवडही नष्ट होईल असेच हे वातावरण होते.त्यातून आय.टी. कंपन्या अगदी मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनाही घ्यायला तयार होत्या.अजून कोणाला शिकायची इच्छा असेल तर द्या कॅट आणि जा आय.आय.एम मध्ये किंवा इतर ठिकाणी असे पर्याय उपलब्ध झाले. क्लिंटन

In reply to by क्लिंटन

प्रमोद्_पुणे Wed, 09/29/2010 - 15:07
पालकांचा हा हट्ट का असतो ते मला अजूनही समजले नाहीए. १०-१२ वी चा निकाल लागल्यावर इंजिनियरींग हाच एक अभ्यासक्रम आहे असेच वातावरण असते. मला शाळेत असताना ८ ते १० वी टेक्निकल हा विषय होता. मी टर्नर होतो. ८वी तच त्या लेथची अशी काही तिडीक बसली होती ना.. ती बर, लुब्रीकंट, चटके, तडातड तुटणारे टूल्स आणि त्यावर मास्तरांचा बसणार मार...आठवले तरी भ्या वाटते.. लेखी परीक्षेला तर मी नर्लिंग, व्ही-बेड, लेथ, व्ही-टूल असल्या सगळ्या संज्ञा पाठच करून जायचो रामरक्षा आणि अथर्वशीर्ष पाठ करावे तसे.. कळस म्हणजे इंजिनियरींग ड्रॉईंग हा अगम्य विषय सुधा टेक्निकलचाच भाग होता. त्यात तर मला काहीच गती नव्हती. माझी ९०% शीटं माझ्या मित्रांनीच पूर्ण केली. त्या विषयाचे मास्तर समोर एखादा लाकडी ठोकळा ठेवायचे आणि विचारायचे आता बघा काय दिसते आहे तुम्हाला? ज्यांना खरेच गती होती त्यांना बरेच काही काही दिसायचे माझ्यासारख्या ठोकळ्याला मात्र ठोकळाच दिसायचा. ह्या टेक्निकल विषयाने माझी झोप उडवली होती. आणि तेव्हाच ठरवले होते काही झाले तरी इंजिनियरींग नको रे बाबा...

In reply to by प्रमोद्_पुणे

संजय अभ्यंकर Wed, 09/29/2010 - 21:30
आपल्या दोघांच्या प्रतिसादावरून दिसते की आपणास वर्कशॉपची आवड नव्हती. माझ्याबाबतीत सांगायचे झाले तर परिस्थीती उलट होती आणी आहे. मला वर्कशॉपच्या कामांची आवड सुरवाती पासुन होती. आपले करीयर मे.क. इंजिनियरिंग मध्ये करायचे हे ७वी पासून्च निश्चित केले होते. मी इ. ८वी पासून टेकनिकल शाळेत गेलो. १०वी १२वी सुद्धा टेक्नीकल शाळेत केली. डीप्लोमा मेक. मध्ये केला. मेंटेनन्स मध्ये नोकरी करताना इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रोनिक्सची आवड निर्माण झाली व त्याचेही खाजगी कोर्सेस केले. इलेक्ट्रोनिक्स, मायक्रोप्रोसेसर्स वरची पुस्तके वाचून काढ्ली. नंतर CNC मशिन टूल्स मध्ये सर्विस इंजीनीयर म्हणून कामकरायला लागल्यावर ह्या सर्वांचा उपयोग होऊ लागला. माझ्या मते इंजीनियरिंगच्या कूठल्याही शाखेत (अगदी मॅनेजमेंट करणार्‍याने सुद्धा) शॉपफ्लोअर)वर (सिविल / स्ट्रक्चरल च्या बाबतीत प्रत्यक्ष प्रकलसिविल) काही वर्षे अनुभव घेणे आवश्यक आहे. शॉपचा अनुभव इंजीनियरला नसणे आणी सैन्याधिकार्‍याला युद्धभूमीचा अनुभव नसणे ह्यासिविल)फरक नाही.

In reply to by संजय अभ्यंकर

हेम गुरुवार, 09/30/2010 - 00:16
आमच्याकडे अगदी गेल्या दशकापर्यंत सिनियर फोरमन्ससुद्धा स्वतः मशिनशी झटया घेत, पण हल्ली शॉपफ्लोअरवर येणारी ट्रेनी मुलेसुद्धा ऑईलमध्ये हात घालायला बघत नाहीत. हल्लीच्या नविन शॉप इंजिनियरचे कामही मशिन्सच्या प्रॉब्लेमपेक्षा, आजची प्रॉड. कमिटमेंट, मिटींग्ज, प्रेझेंटेशन्स यालाच प्राधान्य देत चालू असते. मोठी कं आहे, २ वर्षे काढूया - एमबीए करुया व भुरर्र्र होवूया किंवा इथेच काही जॅक लावून क्वालिटी/टुलरूम्/ट्रेनिंग प्रोग्रॅ. सारख्या नॉनप्रॉड. मध्ये बसून लठ्ठ पगार घेवूया अशीच धारणा वाढते आहे. शॉप फ्लोअरवर कामगारांशी डोकं लावत काम?....नको रे बाप्पा!

In reply to by हेम

संजय अभ्यंकर Fri, 10/01/2010 - 19:24
जन्माचार्यजी, ह्याला कंपनीची संस्कृती कारणीभूत असते. दक्षीणेकडे टी.व्ही.एस. ग्रूपच्या कंपन्यां मध्ये आजही इजीनीयर मशीनशी झटापट करत असतो. मिटिंग कशी असावीतर ह्याच गटाच्या टर्बो एनर्जी लि. ह्या कंपनी सारखी. सकाळी आठ वाजता शॉप फ्लोअर वर जी.एम. साहेब येतात. छाती एवढ्या उंचीच्या टेबला भोवती सगळे उभे रहातात (बसायला स्कोप नाही). कालपर्यंतच्या कामाचा आढावा व आजची योजना ह्यावर केवळ १५ ते २० मिनिटे चर्चा होते. आणी सगळे आपापल्या कामा कडे पांगतात. अधिक माहीती हवी असल्यास जी.एम. साहेब स्वतः त्या व्यक्तीकडे जाऊन माहीती घेतात. लोकांना केबीन मध्ये मिटींगला बोलवून लोकांचे तासनतास खाणे एकदम वर्ज्य. तर एकदा पुण्यातल्या एका प्रख्यात फोर्जिंग कंपनीत, मी काही तास मेंटेनन्स इंजीनीयरची वाट पहात ताटकळत होतो. अगदी संध्याकाळी साहेब भेटले. त्यांनी सांगीतले की, उद्या व्ही.पी. यायचेत, त्यांच्यासाठी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन बनवत होतो. टी.वी.एस. गटाच्याच टि.व्ही.एस. मोटर्स कंपनीत शॉपफ्लोअरला सुपरवायजरच्या टेबला समोर खुर्ची नसते. आपले म्हणणे उभ्यानेच सांगून तेथुन निघायचे. माणूस एकदा बसला की गप्पांना तोंड फुटते. एका साध्या गोष्टीतून वेळेचा अपव्यय निकालात निघाला.

In reply to by संजय अभ्यंकर

चतुरंग Sat, 10/02/2010 - 19:10
खुर्ची असली की गप्पांना तोंड फुटते, मानवी स्वभावाचा उत्तम अभ्यास! शेवटी खुर्चीचा मोह हा कसाही झाला तरी वाईटच! ;) चतुरंग

In reply to by संजय अभ्यंकर

अविनाशकुलकर्णी गुरुवार, 09/30/2010 - 05:06
शॉपचा अनुभव इंजीनियरला नसणे आणी सैन्याधिकार्‍याला युद्धभूमीचा अनुभव नसणे ह्यासिविल)फरक नाही. संजय अभ्यंकर .................................................................. जुग जुग जिओ मेरे लाल..क्या बात कहि है......हल्लीच्या ईंजिनिअरना उभे राहुन काम नको करायला...ए.सी मधे बसायचे व कळफलक बडवायचा...सारे पांढरी कॉलर वाले झाले आहेत

In reply to by संजय अभ्यंकर

क्लिंटन गुरुवार, 09/30/2010 - 09:23
अनेकांना इंजिनिअरींगची आवड आपल्याला नाही आणि आपली आवड वेगळ्या क्षेत्रात आहे हे पक्के माहित असतानाही इंजिनिअरींगला जावे लागणे हीच आपल्या शिक्षणव्यवस्थेची आणि कुटुंबव्यवस्थेची शोकांतिका आहे.तुमचे शॉपफ्लोअरवच्या कामाचा अनुभव असावा हे म्हणणे योग्यच आहे.पण आपल्या शिक्षणव्यवस्थेत तसा अनुभव दिला जात नाही.आणि खरोखरच इंजिनिअरींगची आवड असलेलेच स्वत: प्रयत्न करून चार ठिकाणी जाऊन शॉप फ्लोअरचा अनुभव घ्यायची धडपड करतील.मुळातच ज्यांना आवड नाही आणि ज्यांना आपल्या इच्छेविरूध्द इंजिनिअरींगला जावे लागले आहेत असे विद्यार्थी केवळ परीक्षेत पास होण्यापुरतेच कष्ट करतील. They will not go extra mile. आणि असेच विद्यार्थी पुढे कंपनीत कामाला लागल्यावर तेलात हात घालायला, मशिन हाताळायला नाखूष असतील यात काही शंका नाही. तेव्हा अशा इंजिनिअर्सना दोष देण्यापेक्षा आपल्या एकूणच शिक्षणपध्दतीला आणि घरोघरी इंजिनिअरींगला जायची सक्ती चालते त्याला दोष दिला गेला पाहिजे असे मला वाटते. क्लिंटन

In reply to by क्लिंटन

प्रमोद्_पुणे गुरुवार, 09/30/2010 - 11:21
सहमत.. आवड नसतानाही ते करायला लागणे फार त्रासदायक आहे. मला त्या मशीन्स कधी आवडल्याच नाहीत. पण संजय म्हणत आहेत त्यात सुधा तथ्य आहे. जर एखाद्याला त्यामधेच स्वखुशीने करीअर करायचे असेल तर त्याने तो अनुभव घेणे गरजेचे आहेच. माझे शालेय मित्र ज्याना खरेच इंजिनिअरींगची आवड होती त्यांचे करीअर उत्तम चालले आहे आणि त्याना शाळेतच मशीन्सवर काम करायचा जो अनुभव मिळाला तो उपयोगी पडलाच (असे एकले आहे की फर्स्ट इअर इंजिनिअरींगला मशीनवर्क असते). इंजिनिअरींगची एवढी प्रचंड नावड असूनसुधा केवळ वडिलांच्या इच्छेखातर १०वी नंतर मी टेल्कोची apprenticeship exam सुधा दिली होती . लेखी परीक्षेत पास झालो. नंतर interview झाला तेव्हा मी त्या साहेबाला सांगितले साहेब मला मशीन वर काम नाही करायचे आणि मला इंजिनिअरींगची सुधा आवड नाहीए. तुम्ही computers हा ट्रेड शिकवता का? ते नाही म्हणाले. आणि माझी सुटका झाली... सांगायचा मुद्दा एकच की इंजिनिअरींगची प्रचंड craze आहे. आणि आपल्या पाल्याने सुधा (गती असो वा नसो) इंजिनिअर बनावे असे बहुतांश पालकांना वाटते.

In reply to by क्लिंटन

विसुनाना गुरुवार, 09/30/2010 - 11:59
मला मेक्यानिकलची प्रचंड आवड आहे. इंजिनियरिंग ड्रॉईंग हा तर अत्यंत आवडीचा विषय. थर्ड अँगल, आयसोमेट्रिक, पर्स्पेक्टीव्ह, डेव्हलपमेंट ऑफ सरफेसेस आणि क्रॉस सेक्शन हे फारफार आवडीचे. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगला असतानाच सीएनसीवर महिनाभर प्रत्यक्ष काम केले. (तिथे नवी सीएनसी मशीन्स निर्माण होत असत.) हात, तोंड आणि कपडे काळे करायला मजा येत असे/येते. चुकून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर झालो असे वाटते. आता तेही आवडते म्हणा. पण लेथ,सीएनसी यावर अजूनही काम करायला आवडेल. जमेल तेव्हा लेथ चालवत असतो.

In reply to by क्लिंटन

विलासराव Wed, 09/29/2010 - 17:09
आम्हाला शेवटच्या वर्षाला Computer Integrated Manufacturing नावाचा एक विषय होता. अजिबात अतिशयोक्ती नाही पण त्यात कोणत्याही प्रश्नाचे उत्तर एकच असे. Computer Integrated Manufacturing मधील एखाद्या पध्दतीवर प्रश्न विचारला की आमचे उत्तर-- या पध्दतीमुळे ’Direct labour cost reduces, indirect labour cost reduces, direct material cost reduces, indirect material cost reduces......’ आणि 'Efficiency increases, Workers' morale increases, Production speed increases.......'. म्हणजे कॉस्ट किंवा लागणारा वेळ यासारखी गोष्ट आली तर ती कमी करायची आणि efficiency सारख्या गोष्टी वाढवायच्या! असला बोगसपणा इंजिनियरींगला असताना करावा लागला होता! मी नेहमी किती विषयाचे पेपर द्यायचे ते आधिच ठरवुन ठेवत असे. एटिकेटि वगैरेचा विचार करुन. एसई ला असताना मि एम-३ आनी ईसीएम हे विषय ऑप्शनला टाकले होते. जे पेपर देणार होतो ते सुट्णे अनिवार्य होते टीई ला प्रवेश मिळवण्यासाठी. परंतु एक पेपर अवघड गेला असे वाटल्याने मी ऑप्शनला टाकलेला ईसीएम ह्या विषयाचा पेपर फक्त ओव्हरनाईट वाचन करुन दिला. पेपर लिहिताना सगळं काही अंधुकसं आठवायचं, एकवेळ तर वाटलं होत सरळ पेपर सोडून बाहेर यावं. मग विचार केला तसही वर्ष वाया जाणारच आहे तर लिहू काहितरी. पुर्ण थियरी असल्याने जे काही थोडेसे वाचलेले आठवत होते त्या अनुशंगाने अक्षरशः ठोकुन दिले तेच तेच परत परत. फक्त मोठ्ठी उत्तरे दिसतिल याची काळजी घेतली. निकाल आला तेव्हा न दिलेला एक विषय सोडुन बाकीचे ९ विषय सूट्ले होते त्यात फक्त एक रात्र वाचलेला ईसीएम हा विषयही होता. हा विषय फारसा अवघड होता असे नाही तर पुर्ण थियरी अस्ल्याने मी नंतर देऊ असा विचार केलेला होता.

ऋषिकेश Wed, 09/29/2010 - 14:41
चांगला विषय.. हे असे आहेच, यावर दुमत नाही. तेव्हा यावर फार चर्चा करण्यासारखे काहि वाटत नाही.. मात्र ह्यावर उपाय काय? यावर चर्चा घडाविशी वाटते. सरकारी उपाययोजना होतील तेव्हा होतील (किंवा होणारच नाहीत) पण मग तोपर्यत एखाद्याला व्यावसायिक प्रात्यक्षिकाभिमुख सिक्षण हवे असेल तर काय करता तेईल? यावर उहापोह होणे गरजेचे आहे. सरकार काहि करणार नाही हे गृहित धरून(केले तर उत्तम आहे) कंपन्यांनीच उमेदवार निवडीचा वेळी स्वतः अशी प्रात्यक्षिकाधारित परिक्षा सुरू केली तर मुले आपोआप त्या दिशेने प्रयत्न करतीलसे वाटते.

मिहिर Wed, 09/29/2010 - 17:13
सँडविच इंजिनिअरींग COEP, MIT सारख्या काही कॉलेजमध्ये आहे. माझे मित्र आहेत सध्या तिथे.

अन्या दातार Wed, 09/29/2010 - 18:57
सध्या तरी भारतात प्रॅक्टीकल इंजिनीअर ही संज्ञा रुढ नाही आणि अजून अनेक वर्षे तरी तशी चिन्हे नाहीत. :( मी सध्या आय.आय.टी. खरगपुर येथे इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग्मधे एम.टेक. करत आहे. मला इथले स्ट्रक्चर बर्‍यापैकी ठिक वाटले. अनेक विषयांचा इंडस्ट्रीत कसा उपतोग आहे हे शिकवतानाच समजावले जाते. विद्यार्थी त्यावर शिक्षकांबरोबर चांगल्यापैकी वादविवाद करतात. लॅब्जमध्ये जर गणिते असतील तर ती एखाद्या प्रॅक्टीकल गोष्टीबरोबर रिलेट केलेली असतात. जे विद्यार्थी टेस्टमध्ये वगैरे चांगले मार्क मिळवू शकत नाहीत, त्यांच्यासाठी असाईनमेंटस देतात, ज्यायोगे विद्यार्थ्याची चांगली तयारी होईल. शिकवण्याची पद्धत वगैरे आणि शिक्षकांचा अनुभव बघून माझ्या कोल्हापुरच्या कॉलेजाचे तोंडही पहावे वाटत नाही. ज्ञान, शिकवण्याची हातोटी आणि प्रत्यक्ष अनुभव याचा अभूतपूर्व संगम इथे मी अनुभवतोय.

मोहन Wed, 09/29/2010 - 21:44
नितीन थत्ते. सर्व प्रथम अभिनंदन. खुप छान चर्चा विषय सूरू केल्या बद्दल. बहूतेक वेळा विद्द्यार्थी आपली आवड न लक्षात घेता मिळणारी नोकरी, मिळणारे गुण , पालकांचे प्रेशर, पीअर प्रेशर इत्यादी कारणांनी कोर्स निवडतात. आवडी प्रमाणे कोर्स निवडण्याची मूभा असल्यास बर्याच समस्या सुटू शकतील. इंजीनियरींग कॉलेजेस मधे ईंडस्ट्रीशी ईंटीग्रेट करून प्रोजेक्टस आणायची जबाबदारी फॅकल्टी वर असते. बहूतेक कॉलेजेस मधे या बद्दल आनंदच असतो. समर ट्रेनींग कोणीच सिरिअसली घेत नाही. विद्द्यार्थ्यांनाच ते अरेंज करायला सांगितले जाते. कॉलेजमधे खूप पैसे खर्च करून इक्विपमेंटस् / फॅसिलीटीज आणल्या जातात. त्याचा प्रॉडक्टीव्ह किंवा ट्रेनिंग करता उपयोग शून्य असतो. असे आणि वरच्या चर्चेत आलेले अनेक मुद्दे विचारात घेतले तर सध्याच्या टेक्नीकल एज्युकेशनमधे अमूलाग्र बदल हवा हीच गोष्ट प्रर्कषाने जाणवते.

एक Wed, 09/29/2010 - 22:00
कळकळ दाखवणारे कितीजण कॉलेजमधे शिकवायला जायला तयार आहेत? .. मिळेल त्या पगारात.. शेवटी हे सगळं मिळणार्‍या मोबदल्याशी रिलेटेड आहे असं वाटतं. कॉलेज चालवणार्‍यांना ईंडस्ट्री ट्रेन्ड, अनुभवी लोकं ठेवणं परवडणारं नसेल तर असेच अनुभव न॑सलेले, नुकतेच डिग्री मिळवलेले लोक प्राध्यापक म्हणून ठेवले जाणार. बाहेरच्या इंडस्ट्री मधे कामाला भरपूर वाव आणि भरपूर मोबदला मिळणार असेल तर लोकं तोच पर्याय प्रथम निवडणार. व्यावसायिक जीवनात भरपूर पैसा कमवून झाला, सगळ्या गरजा भागल्या आता मोबदल्याची अपेक्षा न ठेवता कॉलेज मधे शिकवायला जाऊ (गिव्हींग बॅक टू कम्युनिटी!!) असा विचार करणारे फार थोडे असतात. हे जर आपण करू शकत नसू तर वर वर्णन केलेली परिस्थीती कितीही खरी असली तरी नावं ठेवण्याचा नैतिक अधिकार आपल्याकडे रहात नाही. असं वाटतं.

In reply to by एक

मिसळभोक्ता Wed, 09/29/2010 - 22:12
साध्या ज्युनियर कॉलेज (११वी-१२वी) च्या लेक्चररचा पगार महिन्याला सत्तर हजार रुपये आहे, हे नुकतेच कळले. कामाची वेळ सकाळी ११ ते ३. त्यात दोन तासाची लेक्चर्स. आठवड्याला दहा तासाचे काम. महिन्याला ४० तास. म्हणजे इतरांच्या कामाच्या तुलनेत, महिन्याला २.८ लाख रुपये पगार. कुठल्या आयटी वाल्याला मिळतो हो ? उरलेल्या वेळात इतर जोडधंदे. ट्यूशन्स संध्याकाळी. कॉलेज मध्ये शिकवणे म्हणजे "गिव्हिंग बॅक" वगैरे काही नाही.

In reply to by मिसळभोक्ता

बेसनलाडू Wed, 09/29/2010 - 23:19
साध्या ज्युनियर कॉलेज (११वी-१२वी) च्या लेक्चररचा पगार महिन्याला सत्तर हजार रुपये आहे, हे नुकतेच कळले. कोणते कॉलेज आहे? रेज्युमे पाठवावा की काय म्हणतो ;) (संधीसाधू)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

मिसळभोक्ता गुरुवार, 09/30/2010 - 01:26
सहावा वेतन आयोग मंजूर झाल्यानंतरचे सर्वांचे पगार आहेत हे. बाय द वे, आमच्या कॉलेजात, नवीन प्राध्यापक नियुक्ती करण्यासाठी २५ लाख "डोनेशन" घेतले जाते उमेदवाराकडून. आणि बरेच लोक देतात. ७० हजाराचा महिन्याला पगार, म्हणजे ३ वर्षांचा पगार हा डोनेशन म्हणून देतात. यावरून लक्षात यावे. गणिताच्या बारावीच्या ट्यूशनचा रेट सध्या वर्षाला ३० हजार रुपये आहे, लहान गावांत. पि-सी-एम पॅकेजला ७५००० रुपये. २५ लाख डोनेशन देणारा प्राध्यापक, वर्गात काहीच शिकवत नाही. त्यामुळे १०० विद्यार्थ्यांना त्याची ट्यूशन लावावी लागते. म्हणजे, वर्षाचे ३० लाख रुपये मिळतात. करा गणित. इकडे नुसती आय टी वाल्यांच्या पगारांच्या नावाने खडे फोडणारी मंडळी, ह्या द्रोणाचार्यांबद्दल "पवित्र शिक्षकी पेशा" म्हणून मूग गिळून बसतात की नाही, ते बघा.

In reply to by मिसळभोक्ता

विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 09/30/2010 - 04:48
>>साध्या ज्युनियर कॉलेज (११वी-१२वी) च्या लेक्चररचा पगार महिन्याला सत्तर हजार रुपये आहे, हे नुकतेच कळले ही पक्की माहिती आहे कि शुद्ध लोणकढी ?? (एरवी शंका नसती घेतली, पण आजच दुसऱ्या एका धाग्यावर अशीच एक थाप वाचली आहे) थांबा १-२ दिवस, थेट अश्वमुखातून माहिती काढतो (straight from the horse's mouth)

In reply to by मिसळभोक्ता

सहज गुरुवार, 09/30/2010 - 08:38
सरकारी कॉलेज, पूर्ण अनुदानीत किंवा महागड्या उच्चभ्रु शिक्षणसंस्थेत कायमस्वरुपी तसेच विद्यापीठातील शिक्षकांना असे दांडगे पगार आहेत. सर्वच कॉलजमधील शिक्षकांना नाही असे वाटते. बरेचसे शिक्षणमहर्षी आपापल्या अभियांत्रीकी शिक्षणसंस्थेत मुद्दाम नवखे, कमी पैशावर त्या त्या सेमिस्टरचा / वर्षाचा अभ्यासक्रम उरकतील असे लोक नेमतात.

In reply to by सहज

मिसळभोक्ता गुरुवार, 09/30/2010 - 08:47
सहावा वेतन आयोग हा केंद्र सरकारने स्थापला असल्याने, सरकारी अनुदाने असलेल्या महाविद्यालयातच सदर आयोगाने निर्दिष्टकेलेली वेतने दिली जात असावीत हे स्वाभाविक आहे. परंतु मूळ मुद्दा हा "पवित्र शिक्ष्हकी पेशा" स्वीकारायला किती लोक तयार आहेत, हा श्री. एक ह्यांच्या प्रश्नावर आधारित होता, त्यामुळे शिक्षकी पेशाचे आजचे अनुभव सांगावे हे उद्देष्य. हल्लीच एका शिक्षिकेने एका ब्लॉगवरून एक निबंध मिपावर कॉपी-पेस्ट करून, स्वतःचा म्हणून ठोकून दिल्याचे (आणि त्याचे उदात्तीकरण करण्याचे) उदाहरण समोर आहे. आय टी वाल्यांच्या मेहनतीच्या कमाईवर तुटून पडणारे किती जण ह्या सडलेल्या (आणि पुढच्या पीढीला, आपल्या भविष्याला सडवणार्‍या) धंद्यावर तुटून पडताहेत हे बघायचे. आणखी एक उदाहरण देतो. पुण्याचे आबासाहेब गरवारे महाविद्यालय. यंदा अकरावीचे नवीन १२० विद्यार्थी येथे प्रवेश घेते झाले. अकरावीच्या वर्गात बाके आहेत ८०. शिकवणीच्या प्राध्यापकांनी सांगितले: बघा, तुम्ही कॉलेजात जाऊ नये, हीच कॉलेजाची इच्छा आहे. मग उगाच कशाला जाता ?

In reply to by मिसळभोक्ता

सहज गुरुवार, 09/30/2010 - 09:00
गरवारेचे कॉलेजचे उदाहरण तर घरातले आहे. पूर्ण सहमत.

गणपा गुरुवार, 09/30/2010 - 02:38
हल्ली ५०-६० च्या वर प्रतिसाद दिसले की मी शक्यतो ते काथ्याकुट/चर्चा वाचायचे टाळतो. आज चुकुनच हा धागा उघडला. आणि कधी कधी चुका ही चांगल्या असतात हे पटल. :) थेत्तेसाहेब एवढा चांगला विषय तेवढयाच चांगल्या रितीने चर्चेस आणल्या बद्दल धन्यवाद. निकोप पणे ही चर्चा तडीस नेतायत म्हणुन समस्त प्रतिसाद कर्त्यांचे ही आभार. खुप दिवसांनी चांगली चर्चा वाचायला मिळाली. (शिक्षण एकात, करियर दुसर्‍यात आणि आवड तिसर्‍यात असलेला) -गणपा

सुधीर काळे Sat, 10/02/2010 - 08:21
नितिन, लेख छान लिहिला आहेस. मनापासून आवडला. इतरांच्या प्रतिक्रिया न वाचता मी माझी प्रतिक्रिया लिहितो आहे. कदाचित ही प्रतिक्रिया आधीच कुणी लिहिलीही असेल..... ४६ वर्षांपूर्वीच्या स्वतःच्या शिक्षणावर आधारित अशा माझ्या मतानुसार इंजिनियरिंग कॉलेजे इंजिनियर्सना तर्कशुद्धपणे विचार करायलाच शिकवतात, इतर कांहीं फारसे नाहीं. त्यामुळे व्यावसायिक क्षेत्रात त्याचा प्रवेश एकाद्या 'नव्या नवरी'सारखाच होतो! त्यानंतर मुकुंद कंपनीच्यावतीने अनेक वर्षें campus interviewसाठी जाण्याचे भाग्य लाभले त्यात माझ्या कॉलेजमधील अगदीच सुमार वाटत. फक्त I. I. T. Powai मधील विद्यार्थी well-educated & well-trained वाटत. इतर I. I. T मधील विद्यार्थी so-so असत! आपल्या व्यावसायिक अनुभवाचा फायदा आपल्या तरुण मित्रांना द्यावा या विचाराने मी मध्यंतरी मोकळा होतो म्हणून मी माझ्याच कॉलेजमधे 'चकटफू' ferrous metallurgy शिकविण्यासाठी माझी सेवा देऊ केली, head of deptt यांनी त्याचे स्वागत केले व मला ferrous metallurgyच्या प्राध्यापकाकडे पाठविले पण तेथील कुणीच माझ्या विनंतीकडे गांभिर्याने पाहिले नाहीं. त्यावेळी मी सेवानिवृत्तीच्या पलीकडील वयोगटात होतो (म्हणजे कुणाचाही प्रतिस्पर्धी नव्हतो) तरीही दुर्लक्षच करण्यात आले. (कदाचित) त्यांच्या शिकवण्यातील त्रुटी चव्हाट्यावर येतील या भीतीपलीकडे मला इतर कुठलेच कारण दिसले नाहीं. मग मी पुन्हा नोकरीनिमित्त्य परदेशी गेलो व ते स्वप्न तसेच राहिले. व्यावसायिक इंजीनियर्सना कॉलेजांत निमंत्रित करून त्यांच्या ज्ञानाचा फायदा तरुण विद्यार्थ्यांना दिला गेला पाहिजे या तुझ्या मताशी मी १०० टक्के सहमत आहे. आणखी एक गोष्ट अशी कीं इंजिनियरिंगचे शिक्षण तसे १६ वर्षांत संपायचे ते आताअ १७ वर्षांत संपते. त्या मानाने वैद्यकीय व CA यांचे शिक्षण लांबते!

विनायक प्रभू Sat, 10/02/2010 - 16:10
मिभो म्हणताहेत ते फारसे चुक नाहीये. पण एक त्रुटी -जे दर महीना म्हणताहेत ते फक्त सिनियर्स ना ते सुद्धा सहाव्या वेतन आयोगानंतर सुमारे ६०००० रुपये. ज्यानी कॉलेज मधे १५ वर्षे काढली आहेत त्यांना. ट्युशन शिकवणार्‍यांचे(कॉलेज करुन) महीना सरासरी उत्पन्न सुमारे ८०००० ते १५०००० सिनियॉरिटी प्रमाणे.

योगप्रभू Mon, 10/04/2010 - 11:01
स्टेट बँक ऑफ इंडियाने कारकुनांच्या २७००० जागा भरण्यासाठी जाहिरात दिली होती. त्यासाठी ३८ लाख जणांनी ऑनलाईन अर्ज केले आणि २७ लाख जण लेखी परीक्षेला बसले. निवड झालेल्या २७ हजार उमेद्वारांत ३८०० जण इंजिनिआरिंगचे पदवीधर असून २०० जण तर इंजिनिरिंगचे पदव्युत्तर पदवीधर आहेत. रिसेशनमुळे सध्या इंडस्ट्रीत जॉब नसल्याने किंवा जॉब कधीही जाण्याच्या भीतीने सुरक्षित पगाराची नोकरी म्हणून हे लोक बँकेत कारकून म्हणून काम करायला तयार झाले आहेत. स्टेट बँकेच्या मनुष्यबळ विभागाला या बदलत्या ट्रेंडचे आश्चर्य वाटत आहे, पण टेक्निकल ज्ञान असलेले कर्मचारी मिळाले म्हणून ते खूशही आहेत. -मेरा भारत महान-

In reply to by योगप्रभू

नितिन थत्ते Mon, 10/04/2010 - 14:33
ह्म्म्म. इंजिनिअर्सनी बँकेत काम करने हे काही नवे नाही. अनेक बँका आणि फायनान्शिअल इन्स्टिट्यूशनना प्रकल्पांना कर्ज वाटप करताना प्रकल्पाची तांत्रिक बाजू तपासण्यासाठी इंजिनिअर लागतातच. अर्थात या इंजिनिअर्सनी कोणत्या पदांशाथी अर्ज केले आहेत हे माहिती नाही.

हा आमच्या कॉलेज मधला किस्सा . आमच्या मास्तरांनी मोटोर चालू करून आवाज होतोय पाणी वर जात नाही म्हणून electrical department च्य नावाने खडे फोडले.म्हणे तुम्ही फेज उलट्या जोडल्या मुळे मोटर उलटी फिरते आहे.तिकडून माणूस आणला तो म्हणला कि “हि तर सिंगल फेझ मोटर आहे”.इथे पहिला पचका आणि नंतर त्याने फक्त मोटोर चे कवर जरा हलवले आणि मोटर सुरु .हा किस्सा अजून कॉलेज मध्ये गाजतोय