Skip to main content

दिलीपकुमार आणि चंदेरी वर्ख निघालेले अन्य कुणी....

लेखक मुक्तसुनीत यांनी मंगळवार, 20/04/2010 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
आज एका धाग्यावरील दिलीपकुमारच्या उल्लेखाने , एकेकाळच्या टॉपच्या असलेल्या या अभिनेत्याच्या नाण्याची आजकालची किंमत काय असावी याचा अंदाज आला. या निमित्ताने लोकप्रियतेचे तात्कालिक स्वरूप , व्यक्टींच्या आवडीची व्यक्तीसापेक्षता या सर्वांबद्दल विचार दाटून आले. इतर अनेक गोष्टींप्रमाणे दिलीपकुमार या नटालाही या गोष्टी लागू होणार हे निश्चित होतेच. परंतु , त्याबद्दलच्या मतभिन्नतेच्या संदर्भात इतके टोकाचे ऐकायला मिळावे हे रोचक वाटले. दिलीपकुमारबद्दलच्या विरोधी शेरेबाजीकरता पवारसाहेबांचा चित्रपटविषयक धागा उघडून पाहता येईल. त्या नटाची योग्यता वर्णन करणारा सन्जोप राव यांचा खालचा परिच्छेद वाचनीय आहे. ( त्यावर कणेकरादि लेखकांची छाया आहे हे खुद्द त्यानीच मान्य केलेले असले तरीही.) 'वो शादी के रास्ते चली गयी और मै बरबादी के वास्ते' हे खोलपणे म्हणणारा आणि 'मितवा' अशी तलतच्या आवाजात आर्त हाक घालणारा , रफीच्या भावभीन्या आवाजात 'सुख के सब साथी दुख में न कोय' मधील एकेक भाव चेहर्‍यावर आणणारा, 'आठ बजनेमें अब जादा देर नही है रायसाहब' अशा साध्या वाक्यात जान ओतणारा, 'ऐसे वीराने में इक दिन घुटके मर जायेंगे हम' या शब्दांचे, संगीताचे आणि मुकेशच्या आवाजाचे सोने करणारा, 'तुझे चांद के बहाने देखूं, तू छत पर आजा गोरिये' मधली सगळी नटखट अदा एका क्षणात पेश करणारा, 'चैन कैसा जो पहलू में तूही नही' यातली विरहाची आग अत्यंत सहजपणे चेहर्‍यावर दाखवणारा, ''आयी है मेरे गम पे जवानी' म्हणत परत हातात जाम घेताना एका व्यसनी माणसाचा कुणाला न कळालेला दर्द दाखवणारा 'हम इस खून से आसमां पर इन्किलाब लिख देंगे, क्रांती लिख देंगे' म्हणून मनामनांत शोले चेतवणारा, 'मार डालो उसे, कर डालो उसका खून लेकिन मैं अपने फर्ज से गद्दारी नही करुंगा' असे एकीकडे सुनावणारा तर दुसरीकडे 'हाथ तो गर्म है डाक्टरसाब' असे आर्तपणे म्हणणारा..... असो. या निमित्ताने कुठली नाणी चलनाबाहेर गेलेली आहेत याचा परामर्ष घेता येईल असे वाटले म्हणून हा धागा.

वाचने 11507
प्रतिक्रिया 53

प्रतिक्रिया

दिलिपसाब आमचे आवडते कलाकार आहेत... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

माझेही. मला एकेकाळी दिलीप कुमार अजिबात आवडत नसत. पण राम और श्याम पाहिला तेव्हा हा माणूस का पॉप्युलर झाला असेल ते चांगलेच कळले. नंतर मशालमध्ये एकदा रस्त्यात आक्रोश करताना केला त्या अभिनयाने अंगावर काटा आणला. नंतर त्यांचे बरेच चित्रपट पाहिले.

हा विषय मोठा आहे परंतु या निमित्ताने अन्य सुचलेले विचार. प्रत्येक कलाकाराची शक्तीस्थाने जशी असतात तसा उमेदीचा काळही असतो. जोवर कामगिरीमधे बनचुकेपणा येत नाही तोवर प्रत्येक काम उल्लेखनीय होतच असते. दिलीपकुमारचे असे झाले असावे. (त्याचीच परिणती म्हणजे बैराग सारखा भीषण सिनेमा.) प्रत्येकाचे झेनिथ आणि नादिर असतात. तुम्ही कशावरून योग्यता ठरवता यावर बरेच अवलंबून आहे.

:) दिलीप कुमार ऑनेस्टली खुप बोर मारायचा राव :) अटल बिहारी वाजपेयीचा बापच जणु संवादफेकीत =)) मनोजकुमार तोंडझाकवी हा त्याच्या खालोखाल ... =)) जितेंद्रा (द जंपिंग जॅक का काय तो) ला पाहिलं की त्याचं बेनं असं का आहे ? ह्याची साक्षंच पटते. हतिम ताई किंवा पातालभैरवी तर बाप पिक्चर्स आहेत त्यांच्या मुव्हीज आज कधी लागल्या की तुफान कॉमेडी म्हणुन पाहातो :) प्राण , जवान अमिताभ बच्चन , धर्मेंद (अँ संपली का लिष्ट) .. एवढीच आमची जुण्या काळातली आवडती लोकं - धर्मेंद्र डान्सदगडी

In reply to by टारझन

>>प्राण , जवान अमिताभ बच्चन , धर्मेंद (अँ संपली का लिष्ट) .. एवढीच आमची जुण्या काळातली आवडती लोकं अरे अशी कशी संपेल लिस्ट? टिना मुनीम, विद्या सिन्हा, सायरा बानो, मुनमुन सेन, सिम्मी गरेवाल, नीतू सिंग बेस्ट होत्या

In reply to by सुचेल तसं

आणि यातली नीतू सिंग तर अजूनही बेस्ट आहे! -अनामिक

In reply to by सुचेल तसं

विद्या सिन्हा ???? निषेध !

दिलीपकुमार हा आमच्या आईवडिलांच्या गळ्यातला ताईत. प्रचंड आवडायचा. मला तो अॅक्टर म्हणून कधीच विशेष मनात भरला नव्हता. अगदी भारतभुषण-ठोकळ्याला मधुबालाशेजारी पाहून जिवाची काहिली होत असे तसं दिलीपकुमारबाबतीत होत नसे. (मुगलेआजमच्या 'त्या' गाण्यात मधुबालाशिवाय काहीच दिसत नाही.) पण मशाल, शक्ती वगैरेमध्ये बापाची कामं करायला पुन्हा आला. आमच्या बाबांनी, अहा, त्याने काय काम केलंय, आणि मारामाऱ्या सुद्धा काय केल्याहेत, आणि अमिताभला सुद्धा कसं खाऊन टाकलंय वगैरे म्हटलं. मला शक्तीमध्ये तर त्याचा नाक खाजवून नैसर्गिक अभिनय करण्याचा प्रयत्न काही विशेष आवडला नाही. मशालमधला गाजलेला सीनदेखील खरं तर दिग्दर्शक व लेखक यांची करामत अॅक्टर खाऊन जातो त्यातला वाटला. थोडक्यात बरेच हिरो आपल्या चेहेऱ्यामुळे येतात आणि ठोकून ठोकून काही वर्षांनी अभिनय शिकतात. तसं दिलीपकुमारचं झालं असावं. आता मुन्नाभाईमधला संजय दत्त देखील त्याच्या अगदी जुन्या पिक्चरांपेक्षा थोडा तरी बघवतो. दिलिपकुमार तितका वाईट नव्हताच. निदान हसरा खेळकर तरी होता. पण संजीवकुमार, अमिताभ यांच्या रांगेत बसत नाही. मग नसरुद्दीन वगैरेंची रांग सोडूनच द्या. एकंदरीत व्यापक मुद्दे तितकेसे सुचत नाहीत. मुसुंनी थोडा विस्तार करावा असं वाटतं.

In reply to by राजेश घासकडवी

व्यापक मुद्दे असे माझ्याकडेही काही नाहीत. खरे तर दिलीपकुमारचा काळ माझ्या आधीचा. माझा जन्म होईपर्यंत दिलीपकुमारचे तारुण्य, त्याचे सर्वोत्तम गणले गेलेले चित्रपट करून झालेले होते. अशा गोष्टींबद्दल जे वाटते त्याचे वर्णन "आठवणीची आठवण" , "प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट" अशा प्रकारे केले जाऊ शकेल. आपल्या आवडीनिवडी कधीकधी परपुष्ट असू शकतात. माधव मोहोळकर , राजू भारतन, अमीन सयानी , शिरीष कणेकर, इसाक मुजावर अशा कितीतरी लोकांनी "गुजरा हुआ जमाना"बद्दल लिहिले आहे. हे सारे (मला ) वाचायला रोचक वाटते. इतरांना नॉस्टाल्जिक होताना त्याबद्दल थोडे कुतुहलही वाटते. बालगंधर्वांवरचे पुलंचे लिखाण मी आधी वाचले. जेव्हा त्यांचे गाणे ऐकले तेव्हा त्या लिखाणाचा नि प्रत्यक्ष अनुभवाचा सांधा जोडता येईना. कुसुमाग्रजांची सैगलवरची सुरेख कविता वाचली पण तोपर्यंत जे सैगलला ऐकले होते त्याची भुरळ पडू शकली नव्हती. दिलीपकुमारचे असे झाले नाही. त्यावरचे कणेकरादि लोकांचे लेख वाचत असताना त्याचे चित्रपट अधूनमधून पहायला मिळत होते. आणि वाईट डबिंगच्या, वाईट प्रिंट्स च्या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमामांमधूनही "अंडरप्ले" करणार्‍या या नटाचा प्रभाव पडत राहिला. यातल्या बर्‍याचशा जुन्या चित्रपटांचा पोत बटबटीत होता, मेलोड्रमॅटिक होता. परंतु या माणसाने रंगविलेल्या दु:खाच्या तर्‍हा काळजावर चरचरल्या होत्या. दीर्घ पॉज सारख्या याच्या लकबी तेव्हाही होत्याच. पण लकबी कुणाला चुकल्या आहेत ? अर्थात, दिलीपकुमारचाच काळ का रोचक वाटावा ? त्या आधीचा का नाही ? याला काही उत्तर पुन्हा माझ्याकडे नाही. अलिकडेच अंबरीष मिश्र यांचे "सुंदर ती दुसरी दुनिया " नावाचे अतिशय सुंदर पुस्तक राजहंसने काढलेले आहे. सुदीर्घ अशा या (सचित्र) लेखसंग्रहातून काळ उभा राहिला आहे तो चाळीस साला आधीच्या चित्रसृष्टीचा. मिश्र यांची मराठी भाषा अतिशय सुंदर आहे आणि छ्यायाचित्रांमुळे हे सारे खूप रोचक आहे. परंतु त्या काळच्या चित्रपटांच्या मी वाटेला जाणार नाही हे निश्चित आहे. तेव्हा, दिलीपकुमारच्या माझ्या लेखी मोठ्या असण्याच्या पुष्ट्यर्थ कसलेही "व्यापक मुद्दे" नाहीत. दिलीपकुमारला त्याच्या काळाच्या संदर्भात जोखावे, कदाचित तो आवडू शकतो. "कसल्या बाबा आदमच्या गोष्टी करता राव" असे कुणी म्हण्टले तर त्यापुढे बोलणे थांबते.

In reply to by मुक्तसुनीत

मुसुशी (पुन्हा एकदा) तहे-दिल से सहमत. दिलीपकुमार चे जे थोडे चित्रपट बघितले (त्यात काही जुने ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट ही येतात) त्यातला दिलीपकुमार सहन झाला नाही. लाऊड/भडक वाटला... कर्मा, सौदागरचा तर उल्लेखही नको. तसाच तो राजकुमार - लोकांना कसा आवडायचा काय माहित? चालायचेच...आजही शाहरुख खान आवडणारे लोकं आहेतच की! (मी त्यात येत नाही! क्लीअर केलेलं बर असत!) जे काही ऐकले/वाचले आहे ते कणेकरसारख्या लोकांकडूनच, आणि त्याबद्दल मुसु म्हणतात तसेच वाटते - ऐसा वो कहा जैसा मेरी गजल मे नजर आयें, सब हुस्न है उसका मेरे अंदाज-ए-बयाँ से| देवाला पहायचे तर ते भक्ताच्या डोळ्यातुनच, आणि मला तरी दिलीपकुमार बाबत ते जमत नाही. जुन्यातले आवडणारे अभिनेते सांगायचे तर मोतीलाल आणि बलराज साहनी. बाकी राज-दिलीप-देव ह्या त्रिकुटामधे अभिनेता म्हणून मला तरी कोणी आवडत नाही. पण त्यांच्या कित्येक चित्रपटांतील गाणी आजही जीव का प्राण आहेत, ते श्रेय अर्थातच गीतकार, संगीतकार आणी गायक/गायिका ह्या त्रिकुटाचे! :)

In reply to by मनिष

खरे म्हणता,मोतिलाल,बलराज हे मोठेच होते.पण दिलिपहि डोळ्यातुन भाव व्यक्त करत असे हे मला जाणवते.

In reply to by मुक्तसुनीत

मुसूंशी सहमत. दिलीपकुमार मलाही आवडत नव्हता. माझ्या तर तो कितीतरी काळ आधीचा. म्हणजे सौदागरही (तोच तो मनीषा कोईराला-विवेक मुश्रनचा) मी दहावी व्हायच्याही आधी आलेला. त्यामुळे दिलीप कुमार एकेकाळचा सुपरस्टार म्हणून त्याची मनात काही इमेज असायचे कारण नव्हते. पण 'गुजर गया जमाना' छाप लेख आवडीने वाचताना त्यात ममत्वाने केलेल्या दिलीपकुमारच्या वर्णनाविषयी आश्चर्य वाटायचे. त्यातच फेमिनाच्या विमला पाटील या संपादिकेने एकदा 'दिलीपकुमार नि त्याच्या पाकिस्तानी निष्ठा'संदर्भात एक लेख लिहिला होता. तो अमृतमध्ये भाषांतरीत झालेला वाचला. तेव्हा कुणास ठाऊक एक अढी बसली मनात. तरीही त्याचा त्या काळातल्या पिढीवर असलेला परिणाम आश्चर्यकारक वाटायचा. तरीही त्याचे काही चित्रपट पाहिले. मधुमती, गंगा-जमना, देवदास वगैरे. अगदी परवा परवा शाहरूख खानचा देवदास चॅनेल फिरवाफिरवी करत असताना लागला आणि दिलीपकुमारचे मोठेपण लख्खपणे जाणवले. देवदासमधला न झाकता येणारा शाहरूख पाहून दिलीपने देवदास कसला उभा केलाय ते जाणवले. बाकी. कणेकरांच्या एका लेखात, दिलीपकुमारच्या आधीची पिढी सैगलच्या देवदासविषयी असेच आसूसून उद्गारायची ते आठवले. बाकी राज-दिलीप-देव या त्रिकुटातला देव आनंद विशेषतः कृष्ण धवल मला आवडतो. तो त्याच्या राजबिंड्या रूपामुळे. अभिनेता म्हणून पाहायचे असेल तर बलराज सहानी, प्राण वगैरे मंडळी बाप होती यात काही शंका नाही. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव

हा एक लिमिटेड अभिनेता आहे असं माझं मत आहे. तो टाकाऊ नक्कीच नाही पण त्याच्या अभिनयात खोलीची वानवा मला कायम जाणवत आली आहे. तो आणि त्याची भूमिका ह्यात कुठेतरी पॅरॅलॅक्स असल्यासारखी अवस्था असते. मी तरी त्याची फारच थोडी कामं मनापासून आवडली असं म्हणू शकेन. उदा.शक्ती. मशालमधेही तसा तो थोडा लाऊडच वाटला. माझ्या बाबांना तो आवडतो. वरती राजेश म्हणतो तसं 'अमिताभला खाऊन टाकलं' वगैरे त्यांचीही आवडती वाक्यं आहेत! :) पण मला व्यक्तिशः तसं वाटत नाही. त्याकाळी कदाचित अभिनेत्यांची वानवा आणि लोकांमधलं एकूणच सिनेमाचे वाढते आकर्षण ह्यामुळे हे अभिनेते चालून गेले असे मला प्रामाणिकपणे वाटते. चतुरंग

दिलीपकुमार हा माझाही आवडता नट आहे. मला वाटतं त्याने मोजक्या ऐंशी चित्रपटातच काम केले आहे. त्याचे मी पाहिलेल्या खालील चित्रपटातील त्याचा अभिनय उत्कृष्ट आहे (निदान मला तरी वाटला) मधुमती, यहुदी, संगदिल, तराना, देवदास, कोहिनूर, गंगा-जमना, मुघले आझम, राम और श्याम इ. दिलीपचा मला व्यक्तिशः खूप आवडलेला अभिनय म्हणजे मधूबन में राधिका' ह्या गाण्यात त्याने सतार वाजविण्याचा पर्फेक्ट सीन! त्यासाठी बिचार्‍याने बरीच मेहेनत घेतलेली समजून येते http://www.youtube.com/watch?v=TIWtdQwaoz0

भारत भूषण, राजकुमार, मनोज कुमार ह्यांचे सिनेमे बघा... दिलीप कुमार आवडेल. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

भारत भूषण, राजकुमार, मनोज कुमार हे तीघेही माझे आवडते आहेत.. :) राजकुमार तर खासच! :)

In reply to by विसोबा खेचर

राजेन्द्रकुमार, विश्वजित, जॉय मुखर्जी यांना विसरलात का? या सर्वजणांत राजेन्द्रकुमार जरा चांगला होता. खादाडमाऊ

In reply to by योगी९००

राजेन्द्रकुमार, विश्वजित, जॉय मुखर्जी यांना विसरलात का?
हो, ते विसरण्यासारखेच आहेत.. :)

मल तर ब्वॉ कधीच नाही आवडला... नाक खाजवत कुजबुजत कुठेतरी शुन्यात बघत अगम्य बोलणे हेच कायम माझ्या मनावर कोरले गेलेले त्याचे रूप. बाकी जुन्या जमान्यातला होता म्हणून आवडत नाही वगैरे तर नाहीच नाही.... उलट जुने चित्रपट / जुने नट / जुनी गाणी आवडतातच. सैगलसुद्धा आवडतो... पण दिलिपकुमार अज्जिबात नाही आवडत... काय करू? शक्ति वगैरे पण बघितला, पण ऊंहूं... नहीच जम्या. वरती राजेश आणि मिभोंनी लिहिलेल्या प्रतिसादांशी सहमत आहे. बिपिन कार्यकर्ते

शक्ती आणि नया दौर माझे आवडते सिनेमे आहेत... पण ते श्रेय लेखक दिग्दर्शकाचे असावे... ( हे सिनेमे दिलीपमुळेच आवडतात का यावर शंका आहे...... म्हणजे दोन्ही मुन्नाभाई आवडतात ते अभिनेता संजूबाबामुळे आवडतात असे नाहीये... त्याप्रमाणे)

In reply to by भडकमकर मास्तर

संबंधीचा एक किस्सा सांगितला जातो तो असा की त्याच्या प्रीमीयर शोनंतर ओ.पी. दिलीपकुमारला म्हणाला, 'अरे,ये तो नय्यर दौर है!'. त्यानंतर (म्हणे) दिलीपकुमार व नय्यर ह्यांचे संबंध बिघडले! किस्सा जाउ दे; मुद्दा हा की 'नया दौर' मधून नय्यरच्या अफाट संगीताचा भाग वगळता येत नाही!

In reply to by प्रदीप

दिलीपकुमार व ओपी नय्यर यांचा आम्ही ऐकलेला किस्सा असा की नया दौर च्या पार्टीत दिलिपसाब ओपीसाबना म्हणाले, बघितलं, नाचताही येतं मला, त्यावर ओपीसाब म्हणाले की " ओपीका म्युझिक सुनकर बंदर भी नाचने लगते है "...... मग त्यानंतर दिलिप - ओपी असे सिनेमे झाले नाहीत....

माझा उतारा मुद्दाम इथे दिल्याबद्दल मुसुंचे आभार मानून थांबतो. या विषयावर काही दीर्घ लिहावेसे वाटते, पण या धाग्यातले पोरकट प्रतिसाद वाचून काहीही लिहू नये असेही वाटते. दिलीपकुमारला भाभू, प्रकु, राकु (राजेंद्रकुमार आणि राजकुमार), मकु वगैरेंच्या पंक्तीत बसवणार्‍यांना ईश्वर सद्बुद्धी देवो. दरम्यान मी पुन्हा एकदा 'गंगा जमना ' पाहीन. 'चंदेरी वर्ख निघालेले' हा शब्दप्रयोग दिलीपकुमारच्या बाबतीत वापरण्याबद्दल थोडेसे दुमत आहे. 'ते केशर कधी किडले नाही, ते मिरे कधी नासले नाही' असा हा दिलीपकुमार आहे ('बैराग', सौदागर', 'किला' हे माहिती असूनही). त्याचा वर्ख वगैरे निघू शकत नाही. सन्जोप राव 'मैने तुम्हे यहां अपनी कोई जाती मुश्किल हल करने के लिये नही बुलाया है. ना.....मैने तुम्हे ये कहने के लिये बुलाया है की तुम्हारी मां... बहोत बीमार है. वो मुझसे कहती नही है लेकिन मै जानता हूं वो तुम्हे बहोत याद करती है.मेरा और तुम्हारा रिश्ता तो खैर खत्मसा हो गया है लेकिन तुम्हारे मां के लिये अगर तुम्हारे दिल मे कोई जगह हो, तो मेरा मशवरा है की एक बार उसे मिल आओ'

In reply to by सन्जोप राव

तुम्ही लिहाच, अगदी भरभरून तुमच्या शैलीत दीर्घ लेख लिहाच. जसे उथळ प्रतिसाद आहेत तसेच "चिंतातूरजंतू" सारखे समंजस प्रतिसाधी आहेतच ना. तुम्हाला आवडलेला, भावलेला दिलीपकुमार आणि त्याचे चित्रपट ह्यावर नक्की लिहा. कदाचित सहमन नाही होणार माझ्यासारखे काहिजण, पण तुम्हाला (आणि कित्येकांना) तो का आणि कुठल्या चित्रपटांमधे आवडतो हे समजुन घ्यायला आवडेल मला. (खाली उल्लेख केलेला 'मुसाफिर' बद्दल आता कुतुहल आहे) दिलीपकुमारचा 'अंडरप्ले' बद्दल उत्सुकता आहे..मला जो दिलीपकुमार तो अगदीच लाऊड, शैलीबद्ध आणि ओव्हरअ‍ॅक्टींग करणारा वाटतो..कदाचित मी चुकीचे चित्रपट पाहिले असतील (नया दौर मधे मला तरी तो नाही आवडला). अवांतर - मध्यंतरी शाहरुख खानने गावस्करला वन-डे क्रिकेट मधले काय कळते असे विचारले होते, (स्वतःची क्रिकेट्मधली लायकी लक्षात न घेता). माझा शाहरुख होऊ नये ही इच्छा आहे! ;-) अवांतर २ - आपल्याकडे बॉलीवुड आणि क्रिकेट ह्या दोन 'पॅशन' आहेत, स्वत: गल्ली क्रिकेटही न खेळलेले विनधास्त सचिनला सल्ला देतात, तेंव्हा फार मनावर घेऊ नका...

In reply to by मनिष

>>दिलीपकुमारचा 'अंडरप्ले' बद्दल उत्सुकता आहे..मला जो दिलीपकुमार तो अगदीच लाऊड, शैलीबद्ध आणि ओव्हरअ‍ॅक्टींग करणारा वाटतो.. हा हा हा. तुम्ही गोपीकृष्ण आणि संध्याचे सिनेमे पाहिले नाही वाटतं. त्यांची संपूर्न शरीरे हलत असत. शांतारामबापूंचे बरेच सिनेमे तशा प्रकारचे असत. अवांतरः भाभू वगैरे अंडरप्लेच्या बाबतीत दिलिपमारच्या पुढे गेलेले समजायचे का? ;) नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

हा हा हा. तुम्ही गोपीकृष्ण आणि संध्याचे सिनेमे पाहिले नाही वाटतं. त्यांची संपूर्न शरीरे हलत असत. शांतारामबापूंचे बरेच सिनेमे तशा प्रकारचे असत. अवांतरः भाभू वगैरे अंडरप्लेच्या बाबतीत दिलिपमारच्या पुढे गेलेले समजायचे का? Wink
संध्याचा (फक्त) नवरंग अर्धवट पाहिला कधीतरी, फारच त्रास व्हायला लागला तेंव्हा उठून गेलो...भाभू हा ठोकळा होता हे अगदी आद्य ठोकळा प्रदिपकुमारलाही मान्य होते (म्हणे)! ;) ये भाई..पण युसुफसाब च अस नाही ना, तो लई भारी होता असे जेंव्हा नावजलेले लोक सांगतात तेंव्हा बुचकाळ्यात (डुबु़क डुबुक असे) पडायला होते!

In reply to by नितिन थत्ते

शांतारामच्या सिनेमात तमाशा बघायला आलेले, नाच बघायला आलेले हे सगळे लोक अगदी सतत हलत असतात. आणि तेही सिंक्रोनाईझ्ड! असे दाखवायची कल्पना बापूंना कुठून स्फुरली ते देवच जाणे. अगदीच विनोदी वाटते बघायला.

In reply to by मनिष

सन्जोप रावांच्या शैलीत असेल तर मला दिलीप कुमार काय कोण्याही टॉम-डिक-हॅरी अर्थात सोम्यागोम्या बद्दल वाचायला आवडेल. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Music and poetry only reach the ears of those in anguish.

In reply to by सन्जोप राव

सन्जोपरावांशी संपूर्ण सहमत! दिलीपकुमारला नांवे ठेवणारे बघून आश्चर्य वाटले. असो, काळाचा महिमा!!! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

मला दिलीपकुमार आणि त्यांचा अभिनय दोन्ही आवडतात... त्यांच हे गाणं मला फार आवडत... (दिलीपकुमार यांची आणि माझी जन्म तारीख (वर्ष नव्हे !!!) सारखीच आहे... ;) ) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama

वाईट डबिंगच्या, वाईट प्रिंट्स च्या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमामांमधूनही "अंडरप्ले" करणार्‍या या नटाचा प्रभाव पडत राहिला. यातल्या बर्‍याचशा जुन्या चित्रपटांचा पोत बटबटीत होता, मेलोड्रमॅटिक होता. परंतु या माणसाने रंगविलेल्या दु:खाच्या तर्‍हा काळजावर चरचरल्या होत्या. दीर्घ पॉज सारख्या याच्या लकबी तेव्हाही होत्याच. पण लकबी कुणाला चुकल्या आहेत ?
जुन्या काळातील एखाद्या गोष्टीचे मूल्यमापन करताना थोडा कालसापेक्ष विचार करणे गरजेचे असते. चाळीसच्या दशकात दिलीपकुमार जेव्हा अभिनेता म्हणून उदयास आला, तेव्हा नुकत्याच अस्तास गेलेल्या मूकपटांचा अभिनयशैलीवर फार मोठा आणि अनिष्ट प्रभाव होता. जोरकस हातवारे, ठळक मुद्राभिनय अशा गोष्टी अवास्तव आणि अनैसर्गिक असूनही मूकपटांच्या अंगभूत मर्यादांमुळे प्रस्थापित झाल्या होत्या. त्या बोलपटांमध्ये अत्यावश्यक नव्हत्या, पण तरीही त्यांचा प्रभाव कायम राहिला होता. याउलट संवादफेकीत असणारी ठणठण नाट्यमयता ही 'शेवटच्या रांगेत आवाज पोचला पाहिजे' सारख्या त्या काळच्या नाटकांमधल्या गरजांपोटी आली होती. तिचीही चित्रपटात गरज नव्हती. हे सर्व लक्षात घेऊन स्वतःची अभिनयशैली 'घडवणारा' आणि त्यांद्वारे चित्रपट माध्यम अधिक वास्तवदर्शी बनवणारा नट ही दिलीपकुमारची खरी ओळख आहे. अशी अभिनयशैली ही अर्थात गंभीर आशय व्यक्त करण्यास अधिक उपयुक्त होती. त्यामुळे एकाच वर्षी आलेल्या (गंभीर) देवदास आणि (हलकाफुलका) आझाद यांपैकी देवदासमध्ये तो ती वापरतो, पण आझादमध्ये वापरत नाही. हे ही अनोखे होते. त्या काळात 'स्टार'ने स्वतःच्या विशिष्ट लकबींद्वारे पडद्यावर स्वतःला सारखे मिरवत राहायचे, अशी पध्दत होती. (मग त्याचा प्रसंगातल्या आशयाशी संबंध असो नसो). अजूनही अनेक तथाकथित 'स्टार' असेच करतात. याउलट 'मुसाफिर'सारख्या वेगळ्या चित्रपटात छोटी भूमिका स्वीकारणे आणि ती भूमिकेस साजेशा अभिनयाने उजळून काढणे असे प्रकारही दिलीपकुमारने केले. हे ही वेगळे होते. अर्थात, तरीही त्याच्या अभिनयशैलीच्या अखेर लकबी बनल्याच आणि त्याला एकसुरी भूमिकांमध्ये अडकूनही राहावे लागले. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनयापेक्षा 'स्टार'पणाच उचलला जातो. भल्याभल्यांनाही त्यातून बाहेर पडणे कठीण जाते. दिलीपकुमारची कारकीर्द हे त्याचेच उदाहरण आहे, पण त्याचा दोष चित्रपटसृष्टीकडे आणि प्रेक्षक म्हणून आपल्याकडेही जातो. वेगळा प्रयोग म्हणून राज कपूरने केलेला 'तीसरी कसम' थोडा जरी चालता, तर कदाचित त्याचीही उत्तर कारकीर्द वेगळी होती, आणि शैलेंद्रही अधिक जगता. जाताजाता: जर दिलिपकुमारसारखे अनेक अभिनेते प्रस्थापित झाले असते, तर कदाचित गंभीर आशयाच्या, वेगळ्या अभिव्यक्तीच्या चित्रपटांची मुख्य प्रवाहात सातत्याने सवय राहिली असती, आणि मग आज "विहीर कळला नाही" असे झाले नसते, असेही वाटल्यावाचून राहात नाही. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

In reply to by चिंतातुर जंतू

सुंदर प्रतिसाद. >>याउलट संवादफेकीत असणारी ठणठण नाट्यमयता ही 'शेवटच्या रांगेत आवाज पोचला पाहिजे' सारख्या त्या काळच्या नाटकांमधल्या गरजांपोटी आली होती. तिचीही चित्रपटात गरज नव्हती. सिनेमा हे नाटकापेक्षा वेगळे माध्यम आहे हे अजून मराठी दिग्दर्शकांना व अभिनेत्यांना कळलेले दिसत नाही त्यामुळे मराठी नट बहुधा ओरडून बोलत असतात. तसेच मेनस्ट्रीम मराठी सिनेमांची पटकथाही बर्‍याचदा पडद्यावरचे नाटक अशीच असते. असो. दिलीपकुमार आमच्या काळातला नसल्याने तेवढे प्रेम नाही. पण इथे अनेकांनी म्हटल्यासारखा टाकाऊ नक्कीच वाटत नाही. त्याचा व उषा किरणचा एक सिनेमा पाहिला होता. नाव आठवत नाही. त्यात डेव्हिडच्या घरात एका मागून एक रहायला आलेल्या तीन भाडेकरूंची कथा होती. त्यातले तिसरे भाडेकरू दिलिपकुमार आणि उषा किरण होते. त्यातला अभिनय मला आवडला होता. शक्तीमधला अभिनयही आवदला होता. म्हणजे अमिताभ कमी पडल्याचे वाटले होते. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

त्याचा व उषा किरणचा एक सिनेमा पाहिला होता. नाव आठवत नाही. त्यात डेव्हिडच्या घरात एका मागून एक रहायला आलेल्या तीन भाडेकरूंची कथा होती. त्यातले तिसरे भाडेकरू दिलिपकुमार आणि उषा किरण होते. त्यातला अभिनय मला आवडला होता.
हाच वर उल्लेख केलेला 'मुसाफिर' नावाचा चित्रपट. ऋषिकेश मुखर्जी त्याचे दिग्दर्शक होते. प्रख्यात उर्दू लेखक राजेंद्रसिंह बेदी व आज अभिजात मानले जाणारे बंगाली दिग्दर्शक ऋत्विक घटक यांच्या संवाद-पटकथेवर तो आधारित होता. हिंदी चित्रपटात एक वेगळा प्रयोग मानता येईल, असे त्याचे कथानक होते. त्यात पठडीनुसार नायक-नायिका नव्हत्या, तर तीन कथा एका धाग्यात गुंफल्या होत्या. असा चित्रपट दिलीपकुमारसारख्या 'स्टार'ने स्वीकारणे तेव्हा अनोखे होते, कारण त्याची व्यक्तिरेखा तीनपैकी एका कथेतच होती, त्यामुळे तो निव्वळ दिलीपकुमारचा चित्रपट होऊच शकला नसता. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

In reply to by चिंतातुर जंतू

आज अभिजात मानले जाणारे बंगाली दिग्दर्शक ऋत्विक घटक
याच्याविषयी अधिक लिहलेत तर आणखी काही कळू शकेल. मला वाटतं, मधुमतीची पटकथा की संवाद ऋत्विक घटक यांचे होते. सामाजिक चित्रपटांकडून घटक एकदम फिल्मी कथांकडे वळल्याने बासूदा (चटर्जी की भट्टाचार्य? नेहमी गोंधळ होतो दोघांत.) चिडल्याचा किस्सा कुठेतरी वाचल्यासारखा आठवतोय. वरील विशेषणाला तोच संदर्भ असावा काय? (भोचक) हा आहे आमचा स्वभाव

In reply to by भोचक

आज अभिजात मानले जाणारे बंगाली दिग्दर्शक ऋत्विक घटक
आपण ज्या काळाविषयी बोलत आहोत, त्या काळी घटक यांचा परिचय फार मर्यादित वर्तुळात होता. सत्यजित राय यांनी घटक यांची स्तुती केली, पण ती मुख्यतः 'अजांत्रिक', 'मेघे ढाका तारा' वगैरे चित्रपटांनंतर. दिग्दर्शक म्हणून घटक यांचे योगदान भारतीय चित्रपटांच्या इतिहासात आज फार महत्त्वाचे मानले जाते, पण या सर्व 'मुसाफिर' व 'मधुमती'नंतरच्या गोष्टी आहेत. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

In reply to by भोचक

सामाजिक चित्रपटांकडून घटक एकदम फिल्मी कथांकडे वळल्याने बासूदा (चटर्जी की भट्टाचार्य? नेहमी गोंधळ होतो दोघांत.) चिडल्याचा किस्सा कुठेतरी वाचल्यासारखा आठवतोय. बासू भट्टाचार्यच. तुम्ही हे बहुदा बासूदांच्या 'अनुभव' या पुस्तकात वाचले असावे. सन्जोप राव इसे रोकिये महिंदरबाबू, क्या आप अपने तमाशे के लिये एक आदमी की जान ले लेंगे? शेरसिंग, राजू आदमी नही, जोकर है. ये जियेगा भी यही, मरेगा भी यही. मरेगा भी यही, जियेगा भी यही.

In reply to by चिंतातुर जंतू

चिंतातुरजंतू, अतिशय उत्तम, नेमका व नेटका प्रतिसाद ! युसूफभाईच्या अभिनयशक्तीचं एक थोडक्यात पण अचूक निरीक्षण. आजच्या संदर्भात दिलीपकुमारला मापण्याची चूक समजण्यासारखी असली तरी स्वीकारण्यासारखी निश्चितच नाही ... दिलीपकुमार असो वा ब्रॅडमन असो वा कोणीही इतर असो - कोणत्याही अभिनेता/खेळाडू/लेखक वा एखाद्या इतर कलाप्रांतातील कलाकाराचे श्रेष्ठत्व वा योग्यता जोखण्यासाठी त्याच्या/तिच्या कामगिरीचे मापन त्याच्या/तिच्या काळाच्या व समकालीनांच्या पार्श्वभूमीवर करणे आवश्यक आहे ... त्या वेळी रुढ वा प्रचलित झालेल्या विचारधारा / सवयी / संकेत आणि त्या काळात असलेल्या मर्यादा यांच्या चौकटी / बंधने फोडून आपली स्वतःची नवी व स्वतंत्र मळवाट शोधून काढतो तोच स्वयंभू ! - दिपोटी

In reply to by दिपोटी

बरोबर बोललात. मि आज हरि नारायण आपट्यान्च्या कादम्बर् या वाचायला गेले तर असेच होइल.त्या त्या काळात ते ते श्रेश्ठच होते.

In reply to by चिंतातुर जंतू

जुन्या काळातील एखाद्या गोष्टीचे मूल्यमापन करताना थोडा कालसापेक्ष विचार करणे गरजेचे असते. वाह... क्या बात कही!!! पण असे होत नसते, कारण त्यालाच तारतम्य म्हणतात. तारतम्य ही 'कॉमन सेन्स'सारखी 'रेअर' चीज आहे ना!

In reply to by चिंतातुर जंतू

चिंतातुर जंतु यांचा प्रतिसाद आवडला. जुन्या काळातील एखाद्या गोष्टीचे मूल्यमापन करताना थोडा कालसापेक्ष विचार करणे गरजेचे असते. बाकी, दिलीपकुमार आवडत नाही, आवडला नाही. कदाचित हे मत पोरकटही असेल. पण, कधी दिलीपकुमारचा चित्रपट आवर्जून पाहिल्याचे आठवत नाही. कारण एकच माझीही आवड आजच्या पिढीचीच आहे. मात्र गेली पिढी त्यांच्या अभिनयाबद्दल फार भरभरुन बोलते आणि काळाची तुलना करत बोललेही पाहिजे. -दिलीप बिरुटे

In reply to by चिंतातुर जंतू

अगदि बरोबर. angry young man चि भुमिका करुन एकन्दरित सिनेमाला अनिश्ट वळण लावणारा अमिताभ सुद्धा दिलिपकुमारचि नक्कल करायचा मोह टाळु शकला नाहि.

@) दिलीपकुमार या अतिशय गुणी कलाकाराच्या आठवणीने हरवून गेलो.

मला दिलीपकुमारचे उर्दू बोलणे आवडते. अगदी अस्खलित. मला नया दौर आवडला होता. राम और शाम ठीक वाटला. पण मुघले आझम मधला दिलीप कुमार अगदी भयाण वाटत होता. ते भुरके केस काय नि बाकी दिसणे काय. अजून एक दिल दिया दर्द लिया. ह्याचे टोपणनाव पैसा दिया और सरदर्द लिया असे शोभेल. ह्याचा एक नमुना सिनेमा म्हणजे दाग. ह्यातली गाणी उत्तम आहेत. पण गोष्ट इतकी बिनडोक की काही विचारू नका. नायक (दिकु) गटागटा दारू पितो, भसाभसा सिगरेटी फुंकतो आणि ढसाढसा रडतो. काम धंदा काही करत नाही. जे काही काम जमत असते त्याचीही वाट लावतो आणि मग दु:खाचा अभिनय. असले सिनेमे लोक आवडीने का बघायचे हे एक अनाकलनीय आहे.

In reply to by हुप्प्या

बरोबर!!! हेच नाव सकाळपासून आठवत होतो. मलाही हा सिनेमा नव्हता आवडल...खासकरून कर्मा, सौदागर ने खराब केलेली पाटी कोरी करुन दिलीपकुमारचा जुना चित्रपट म्हणून खूप अपेक्षा ठेवून पाहिला, पण वैताग आला...तसच नया दौर आणि थोड्या प्रमाणात मधुमतीलाही झाले होते. त्यानंतर नाद सोडला तो आजतागायत... :(

दिलीप कुमार बद्दल इतक्या मोठ्या प्रमाणावर वाचल्यानंतर मला असे वाटू लागले आहे की, काही का असेना डाव्या वा उजव्या बाजूने हा महान कलाकार चर्चेच्या योग्यतेचा आहे, आणि मला वाटते हीच त्याच्या मोठेपणाची एक खूण आहे. नाहीतर "त्याच्यात अभिनय नावाचा कोणताही गुण नाही" हे सांगण्यासाठी शेकडो सदस्य पुढे सरसावले नसते. असो. ज्याला दिलीप कुमार आवडतो तो त्याना आवडत राहणारच, भले मग आवडणा-यांचे आणि न आवडणा-यांचे प्रमाण हे एकास नऊ असे असले तरी फरक पडत नाही. मी इथे त्याच्या चित्रपटांची जंत्री देणार नाही की, ज्या संवाद फेकीसाठी तो फेमस होता त्या संवादाविषयीही काही लिहित नाही, शिवाय तसे लिहिणे व्यर्थ आहे कारण येथील प्रत्येक सदस्याला दिलीपकुमारच्या त्या लकबी माहित आहेत. मी स्वत: त्याचा एकमेव चित्रपट "शक्ती" हा मोठ्या पडद्यावर पहिला आहे, अन्यथा जे काही पहिले ते प्रथम सीडी स्वरूपात आणि त्याच्याविषयी आमच्या येथील "सिने क्लब" वरिष्ठ सदस्यांकडून विस्ताराने ऐकले, वाचले, चर्चा केली, त्यावेळी असे वाटू लागले की हा अभिनेता निव्वळ एक चित्रपट पाहून मत बनविण्याच्या पलीकडील स्थितीचा आहे. त्यावेळीही त्याच्या बाजूने वा विरुद्ध बोलणारे, लिहिणारे कमी नव्हते, किंबहुना तो अशा चर्चेच्या केंद्रस्थानी कायम राहिला होता. राज कपूर आवडणारे लोक होते, देव आनंदचे प्रेमी होते, पण एकाच वेळी आवडतोही आणि आवडतहि नाही असा असणारा एकमेव कलाकार म्हणजे दिलीप कुमार. त्याच्या अभिनय क्षमतेबाबत मी काय बोलणार? कोल्हापुरात चित्रपट (मराठी, हिंदी, इंग्लिश) या विषयावर चर्चा करणारे, भरभरून बोलणारे, अनुभव वाटणारे, हमरीतुमरीवर येणारे यांची संख्या अजिबात कमी नाही. कित्येकांना तर महाराष्ट्र कर्नाटका सीमा वादापेक्षा "लता मोठी कि आशा", "शंकर जयकिशन पेक्षा ओ. पी. नय्यर किती आवडीचा", "दिलीपकुमार आणि राज कपूर यांच्यात उजवा कोण?" यावर अथक चर्चा झडत असतात. यांच्यात बसून बसून मलाही तीव्रतेने वाटू लागले कि निदान एखाद्या कलाकारावर टीका करण्यापूर्वी त्याच्या कलाकृती एकदा तरी पाहिल्या पाहिजेत. ज्यावेळी शक्य होते तेथून सी. डी. मिळविल्या, आणि नंतर डीव्हीडी चा जमाना आला त्यावेळी तर खजिना खुला झाला. नेटचे साहाय्य तर मिळत होतेच. मग एका पाठोपाठ मी दिलीप कुमार याचे जवळपास सर्वच चित्रपट पाहिले (सर्व म्हणजे त्यांचे नायक या भूमिकेतील). त्या वरून माझे निश्चित असे मत झाले आहे की या कलाकाराला त्याच्या काळात तर अजिबात तोड नव्हती. आजच्या कलाकाराबरोबर तुलनाच करायची झाल्यास मी प्रथम आमीर खानला पहिली पसंती देईन. ही तुलना राहू दे एक वेळ. पण त्याच्या जमान्यातील प्रत्येक नायिकेची दिलीप कुमार बरोबर काम करण्याची कामना असायची, हे कशाचे प्रतिक आहे? वर्षाला एक चित्रपट करणे, व पहिला पूर्ण झाल्याशिवाय दुसरा चित्रपट साईन करायचा नाही हे प्रौढपण फक्त दिलीपकुमारच दाखवू शकत होता. गुरु दत्त यांना इतराप्रमाणे मी देखील मानतो, पण याच गुरु दत्त यांनी "प्यासा" साठी सर्व प्रथम दिलीप कुमारची विजयच्या भूमेकेसाठी निवड केली होती, ही त्याच्या अभिनयाला दिलेली पावती म्हणावी लागेल. प्रत्येक दिग्दर्शकाचे स्वप्न असायचे की एकदा तरी दिलीप कुमार यांना घेऊन आपण चित्रपट तयार करायचा. तीच गोष्ट संगीतकारांची.... मीना कुमारीची हळहळ होती कि आपण दिलीप कुमार बरोबर फक्त पोशाखी चित्रपटातच काम केले.... नूतन, माला सिंह, या त्या त्या वेळेच्या प्रसिद्ध अभिनेत्रींची हीच खंत होती. दुर्दैवाने राजकीय पटलावर दिलीप कुमारची ओळख ही एक कलाकार या नात्यापेक्षा तो पाकिस्तानचा हस्तक आहे अशा काना नसलेल्या प्रचारामुळे जास्त झाली. आता यात सत्य किती कपोलकल्पित किती हा वादाचा मुद्दा होऊ शकतो, पण एक रसिक प्रेक्षक म्हणून या नात्यानेच आपण चित्रपट अभिनेत्याकडे पाहिले तर दिलीप कुमार या नावाला दुसरा पर्याय नाही. धन्यवाद मुक्त सुनीत, या सुंदर धाग्याबद्दल ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"