Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by nanaba on Tue, 05/29/2018 - 18:19
औद्योगिकरणाच्या विमानाचे कोसळणे टाळा. औद्योगिकरणाचे विमान मानवजातीला व जीवसृष्टीला विनाशाकडे वेगाने नेत आहे. ते कोसळणार हे तर निश्चित आहे. ते कोसळण्याआधी सुरक्षितपणे उतरवावे. थोडक्यात क्रॅशलॅडिंग टाळावे. ते, त्यातील प्रवासी म्हणजे मानवजात वाचवण्यासाठी आवश्यक आहे. औद्योगिकरण थांबण्याबाबतची भीती अनाठायी आहे. आजही औद्योगिकरण कुणालाही जगवत नाही. इतर प्राणिमात्रांप्रमाणेच मानवही हवा पाणी व अन्नामुळे जगतो. औद्योगिक उत्पादनांमुळे नाही. औद्योगिकरणामुळे जीवन संपुष्टात येणार हे नक्की झाल्यावरही ते चालू ठेवणे यामागे औद्योगिकरण जगवते असा निर्माण झालेला गैरसमज कारण आहे. आपण करोडो वर्ष पृथ्वीवर आहोत. औद्योगिकरण बुडबुड्यासारख्या अत्यल्प कालावधीत आले. दारिद्र्य ही संकल्पना नीट समजून घेतली पाहीजे. ज्या पृथ्वीवर करोडो वर्षे हत्ती, गेंडा, व्हेल सारखे महाकाय जीव व्यवस्थित जगले ती पृथ्वी माणुस नावाच्या तुलनेने टीचभर पोट असलेल्या प्राण्याला जगवू शकत नाही काय ? जीवन व जीवनशैली यात गल्लत करू नये. पृथ्वी जीवनासाठी आहे. जीवनशैलीसाठी नाही. बाकी सर्व प्राणिमात्र उदरनिर्वाह करतात. आधुनिक माणुस नाही. तो कार, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, फ्लॅट, बंगला, वीज इ. निर्वाह करतो. त्यासाठी पैसा लागतो. करोडो वर्षे व कृषियुगात हजारो वर्षे पैसा लागला नाही. तेव्हा माणुस जगत नव्हता काय? हे माणसाचे भरकटणे झाले औद्योगिकरणामुळे. त्याच्या कृत्रिम जगण्यासाठी लागणारी वस्तुनिर्मिती व वापर पृथ्वीच्या पध्दतीच्या विरोधात आहे. ते केले गेले हीच मुळात चूक झाली. पैशांचा अभाव म्हणजे दारिद्र्य काय ? मग ती गोष्ट मानवी व्यवस्थेशी संबंधित आहे. मानवी शोषण किंवा चूक त्याला कारण आहे. त्याचा पृथ्वी किंवा निसर्गाशी संबंध नाही. १५० ते २५० वर्षात औद्योगिकरणाने दारिद्र्य दूर झाले नाही. उलट पृथ्वीची जीवांचे पोषण करण्याची क्षमता औद्योगिकरण शहरीकरण व अर्थव्यवस्थेमुळे नष्ट होत गेली. पृथ्वी बकाल होत गेली. लढाया व युध्द ही मानवी मनातून घडतात. औद्योगिकरणामुळे कच्चा माल बाजारपेठांवरील ताबा इ. कारणांमुळे महायुद्धे झाली. तणाव वाढले. उदा. बंदुकनिर्मिती उद्योगाच्या हितसंबंधांमुळे अमेरिकेत दर वर्षी शाळा महाविद्यालयांतील हजारो तरूण गोळीबारात मरतात. अमेरिकेचे सुमारे ७५ ते ९० % उत्पन्न शस्त्रास्त्रांच्या निर्यातीतून येते. त्यामुळे जगात तणाव असण्यात त्या देशाचे व पर्यायाने औद्योगिकरणाचे हितसंबंध आहेत. हे फक्त एक उदाहरण आहे. यंत्र व तंत्रज्ञान जगात धुमाकूळ घालत आहे. धरणे, खाणी, वीजनिर्मिती, मोटार - वाहन निर्माण, सीमेंट, स्टील, रासायनिक खते, कीटकनाशके इ. यांच्यामुळे आपण जगतो काय ? ही उत्पादने बनवणाऱ्या उद्योगांत नोकर्‍या करून चलन म्हणजे पगार मिळवणे व अशा व्यवस्थेसाठी मंत्रालये, महापालिका, काॅर्पोरेटस् चालवणे याचा खऱ्या जीवनाशी संबंध नाही. उलट हे कोट्यावधी वर्षे चाललेल्या जीवनाविरूध्द आहे. औद्योगिकरण सुरू होण्यापूर्वी कुणी बेकार नव्हता. युनोच्या बाॅन येथे नोव्हेंबरमधे झालेल्या जागतिक वातावरण बदल परिषदेत हे जाहीर झाले की, यापृढे तापमान न थांबता वाढत राहणार आहे. मानवजात या शतकात नष्ट होत आहे. अशावेळी वातावरणातील साठलेला कार्बन पृथ्वीला निर्जीव करणार असल्याने नवे प्रकल्प तर सोडाच पण चालू औद्योगिकरण थांबवणे अनिवार्य बनले आहे. हा कार्बन शोषणारे हरितद्रव्य तात्काळ वाढू लागले पाहिजे. तरच जीवसृष्टी वाचण्याची शक्यता आहे. अशावेळी नोकरी, उद्योग आपल्याला जगवतात या भ्रमामुळे ही समस्या कार्बनरहित तंत्रज्ञान वापरून सोडवता येईल असे वाटणे हे जीवनशैली व जीवन यात फरक न केल्याने घडत आहे. कोणतेही तंत्रज्ञान वाचवणार नाही. मानवजातीला आता तातडीने अडीचशे वर्षे मागे जावे लागेल. मनात प्रगती व विकासाचे गंड बाळगले तर पृथ्वीवरून उच्चाटन अटळ आहे. आजही सर्व औद्योगिक व इतर लोकसंख्या पृथ्वी जगवते. शहरे शेतीमुळे जगतात. पृथ्वी शेत पिकवते. मात्र औद्योगिक जग क्षणोक्षणी पृथ्वीविरूध्द व तिच्या जीवन देण्याच्या क्षमतेच्या विरूद्ध वागते. हे थांबवावे. शहरे विसर्जित करावी . प्रत्येकाने आपले अन्न स्वतः पिकवावे. तो पृथ्वीचा नियम आहे. त्याच्या विरोधात जाणारी आधुनिक मानवी व्यवस्था गुंडाळावी. ती भ्रामक व्यवस्था टिकवण्याच्या अट्टाहासाने पूर्ण विनाश ओढवेल. धन्यवाद, आपला अॅड. गिरीश राऊत निमंत्रक भारतीय पर्यावरण चळवळ ९८६९०२३१२७ व्हाॅ. अॅप. कृपया सर्वत्र पाठवा. --------------------------- सदर लेख लेखकाच्या परवानगीने प्रसिद्ध केला आहे.
  • Log in or register to post comments
  • 7818 views

प्रतिक्रिया

Submitted by कपिलमुनी on Tue, 05/29/2018 - 18:46

Permalink

चू ** लेख

चूकीचा लेख औद्योगिकरणाच्या बोंब का मारतात ? मेडिकल क्षेत्र , वाहतूक क्षेत्र , कम्युनिकेशन , मनोरंजन यांनी जीवनमानाचा स्तर वाढला आहे. आयुष्यमान वाढले आहे. १०० -२०० मैल प्रवास करता येतो. व्हिडिओ कॉल करून एकमेकांना पाहता येते. बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले अहे अशा हज्जारो गोष्टी सांगता येतील. अश्मयुगात जाउन काय करायचे ? मलेरियाचा डास चावला तरी मरायचे .
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Wed, 05/30/2018 - 09:41

In reply to चू ** लेख by कपिलमुनी

Permalink

सहमत.

सहमत. लोकसंख्या स्फोटामुले निर्माण झालेल्या समस्येसाठी औद्योगीकरणाला जबाबदार धरणे हे म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असला प्रकार आहे. आम्हाला सर्व सूखसोयी हव्यात मात्र त्यसाठी आवश्यक ती शिस्त आम्हाला नको हे कसे चालेल. हवेच्या प्रदुषणाला वाहनांची संख्या या बरोबरच बेशीस्त वाहतूकही जबाबदार आहे. औद्योगीकरणाची आवश्यकता ही फार मोठ्या प्रमाणावर असलेल्या शहरीकरणामूळे उद्भवते. आपल्या उर्जेच्या गरजा कमी होणार नाहीत. पण सध्या असलेले खनीज उर्जेवरचे अवलंबीत्व कमी झाले. पर्यायी स्त्रोत शोधले तर औद्योगीकरणाचे तोटे पर्यायाने प्रदुषण नक्कीच कमी होईल. सगळ्या समस्येचे मूळ अमाप वाढलेली लोकसंख्या कमी कशी होईल यावर कोणीच लक्ष्य देताना दिसत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Tue, 05/29/2018 - 18:47

Permalink

शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात!

बाकीच्यांनी पर्यावरण वाचवावे, मोबाईल (1 जीबी डेटा सकट) पाण्यात बुडवावेत. मी मात्र व्हॉट्सऍपवाला मोबाईल वापरात राहणार. त्याच्यात बॅटरी असते, पण मानव प्राणी व हे जग वाचवण्यासाठी मला ती वापरावी लागेल. तुम्ही सर्व धोतरं अन बंड्या घालून जगा, मला जीन्स घालायचीय, झालंच तर गरम होत असून पण काळाकोट घालून फिरायचंय. कार्बन वाढतोय, सगळ्यांनी आपापल्या गाड्या पेटवून टाका. मला पर्यावरण वाचवण्यासाठी प्रवास करावा लागतो, तेव्ह मी माझी स्कुटर, मोटारसायकल, कार, एसटी वापरणार. कुणी आपल्या पोरांना लसीकरण करू नका, थोडी लोकसंख्या कमी करायला हातभार लावा. मला आमच्या बाळाला बूस्टर डोस द्यायला जायचंय. हो, हे पर्यावरण वाचवलंच पाहिजे, अडीचशे वर्षे मागे गेलंच पाहिजे, पैसे कमावणे बंद केलंच पाहिजे........तुम्ही!!
  • Log in or register to post comments

Submitted by nanaba on Tue, 05/29/2018 - 19:02

Permalink

पर्यावरण क्षेत्रात काम करणारी अनेक मंड ळी हे करतात

१००% शक्य नसेल तरी जमेल त्या प्रमाणात. फोन शिवाय हा मेसेज लोकांपर्यन्त पोचणार नसेल तर कसे करणार? असेही लोक आहेत जे सगळे सोडून सस्टेनेबल लाईफ स्टाईल साठी छोट्या गावात जाऊन राहिलेत. पण मग मेसेज तिथेच थांबतो! किंवा छोट्या प्रमाणात सरक्युलेट होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिदेश on Tue, 05/29/2018 - 19:09

In reply to पर्यावरण क्षेत्रात काम करणारी अनेक मंड ळी हे करतात by nanaba

Permalink

अहो..

पण तुमचा विरोध तर ओद्योगीकीकरणाला आहे ना. फोन वगैरे सगळी त्याचीच अपत्ये आहेत. हा विरोधाभास नाय का ? आणि हा लेख तुम्ही टाकलाय ते इंटरनेट ? ज्यावर वाचला जातोय तो संगणक ? त्याचं काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by nanaba on Tue, 05/29/2018 - 19:44

In reply to अहो.. by अभिदेश

Permalink

लेखाचे लेखक

लेखक वेगळे आहेत. लेख मी लिहिलेला नाही हे लक्शात आलंच असेल पूर्ण लेख वाचला अस ल्यास आपल्या. लेखक जो बदल नमूद करतायतय तो सोसायटी लेवल ला होणे गरजेचे आहे. त्याकरता विचार समाजाच्या सर्व स्तरांवर पोहोचणे गरजेचे आहे. त्याकरता माध्यम म्हणून हे वापरणे गरजेचे आहे. जिथे बदल शक्य आहे तिथे सुरुवात स्वतःपासूनच करावी. प्रत्येक प्रामाणिक माणूस हे करतोच. पण उद्दिष्टाच्या जास्तीत जास्त जवळ पोहोचण्याकरता उपलब्ध चॅनल्स वापरले नाहीत तर अंतिम उद्दिष्टापर्यंत पोहोचता येत नाही हे लक्शात घ्यावं. दिलीप कुलकर्णी १९८० च्या दशकात प र्यावरणावर अभ्यास करत होते- आधुनिक जीवनशैली विनाशाकडे घेऊन जाते हे लक्शात आल्यावर टेल्को मधली उत्तम पगाराची नोकरी सोडून कोकणात जाऊन राहिले. पर्यावरण क्षेत्रात लिखाण करत राहिले. २०१५ साली त्यांची भेट झाली तेव्हा त्यांना विचारलेलं की हे सगळे बदल (मातीचे घर, घरात फक्त बल्ब, पूर्ण रहाणीमान जास्तीत जास्त सस्टेनेबल, अगदी आईस्क्रीम खूप एनर्जी खातं म्हणून आईसक्रीम ही खात नाहीत. ) हे अगदी पटले तरी लगेच कसे जमणार आम्हाला? त्यांचे उत्तर छान होते. माझ्या शब्दात त्यांच उत्तर मांडतेयः डायरेक्ट सगळे बदलता आले नाही तरी एक गोष्ट पकडून महिनाभर करून बघावी. जमतीये वा टलं तर पुढे जावं. ते म्हण तात आम्ही ही इत का प्रयत्न करतो तरी काही गोष्टी वापरतोच आम्ही (उ दा. पावसाळ्यात प्रवास करताना कागदपत्रांसाठी पिशवी. ) आपल्या तुलनेत ह्या फॅमिलीचा कार्बनफूटप्रिंट इतका कमी आहे तरी ते अ से म्हणाले! ( ते एसटीनेच प्रवास करतात. जवळ पाण्याची बाटली (प्लॅ स्टिक नव्हे). चहा पिण्यासाठी स्टील चे ग्लास घेऊन फिरतात वगैरे). मला ते पटले, आवडले. हे आणि असे अ नेक बदल स्वतःत करण्याचा प्रयत्न करून मग च लोकांना सांगण्याचा प्रयत्न असतो. वाटचाल चालू आहे. "बनत बनत बन जायेगा" हे अनुभवायला यावं म्हणून प्रयत्नशील आहे. पर्यावतरणाच्या क्षेत्रात काम करताना १. अभ्यास २. स्वतःत बदल ३. जनजागृती ४. घटनात्मक बदल ५. अ‍ॅक्च्युअल फिल्ड वर्क - हे आणि असे अनेक टप्पे असतात. स्वतः अभ्यास केल्यावर (आकडे वारी, फिल्ड ट्रि प्स, विषयातले ज्ञान वगैरे) डोळे उघडतात. त्यानंतर अस्वस्थतेचा काळ असतो. मग तुम्ही आतून आणि मग बाहेरून (वाईटपणा पत्करूनही ह्या विषयावर बोलणे, वागणे) बदलता. त्यानंतर प्रत्येकजण आ पापल्या आवडी प्रमाणे आणि वकुबाप्रमाणे काम निवडतो. काही सपोर्ट , काही लीड करतात. मग जनजागृती करायची, घटना त्मक बदलासाठी प्रय त्न करायचा, ह्या फंदात न पडता आपलं आपण एकटं काम करायचं ( उदा नदी स्वच्छता, ईकॉलॉजिकल रिस्टोरेशन वगैरे) वगैरे वगैरे अनेक टप्पे असतात. अ‍ॅड गिरिष राऊत जनजागृती आणि घटनात्मक बदल ह्यात काम करताहेत, अ‍ॅक्च्युअल फिल्डवर्कही करताहेत. माहिती ज्यांच्यापर्यंत पोचवायची त्यांना जे मार्ग ठावूक आहेत तेच वापरावे लागतात. अंतिम उद्दिष्टापर्यं त पोचण्यासाठी ही गरजेची गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by nanaba on Tue, 05/29/2018 - 19:09

Permalink

संपादक टीम

लेखाच्या शिर्षकात " लेखक - अ‍ॅड. गिरीष राऊत" हे अ‍ॅड करता येऊ शकते का?
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर मुतालीक on Tue, 05/29/2018 - 19:35

Permalink

रोख चुकतोय !

पर्यावरणवाद्यांचा रोख चुकतोय. बऱ्याचदा अतिरेकी होतोय. औद्यगिकरण झालच नसतं तर काय स्थिती असती हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. म्हणजे उदाहरणार्थ इसवी सन १७००. या सुमारास अनेक आजार ज्यावर आज सहज उपाय आहेत किंवा जे आजार आज किरकोळ वाटतात त्या आजारांनी एखादा लोक समूह वा आख्खा देश गारद व्हायचा. उदाहरणार्थ हगवण. स्वीडन मधले ९०% लोक हागवणीमुळे हालहाल होऊन या सुमारास मेले. लेखात उल्लेखल्या प्रमाणे माणसाने कावळे चिमण्या हत्ती वाघ यांच्या प्रमाणे समस्त सृष्टीचा एक घटक म्हणून जीवन व्यतीत केले असते तर सृष्टीच्या नियमानुसार "Lifelessness is a rule, life is an accident" अशी परस्थिती निर्माण झाली असती. ९०% वनस्पती जन्मून लगेच न वाढता मरण पावतात वगैरे. सिंधू संस्कृती लुप्त झाली त्यावेळी कुठे औद्योगिकरण झाले होते ? ती लुप्त होण्यामागे कारण पर्यावरणाचेच होते - अनेक वर्षे दुष्काळ ! हजारो माणसे मेली. औद्योगिकरणाने खरेतर अशा समस्यांवर उपाय शोधले. क्वचित पाऊस पडणारे किंवा पाण्याचे स्रोत दुर्मिळ असणारे लोकसमूह आज समृद्ध जीवन जगतात. एका बाजुला पर्यावरणाचा माणसाकरवी विध्वंस होतो हे मान्यच आहे. त्याला माणसातली त्याच्या उत्पत्ती तगून राहिलेली रानटी वृत्ती कारणीभूत आहे. ती खूप मोठ्याप्रमाणात खरीतर शमली आहे - ते ही औद्योगिकरणामुळेच. माणसाला माणूस म्हणून जगण्याची आणि जगवण्याची मुभा यांत्रिकीकरणा नंतर जोमाने फोफावली. कारण उद्योगातून अर्थ निर्मिती करण्याची संधी मिळाली. पैसा हे विनिमयाचे साधन माणसाने शोधून नसते काढले तर गुलामगिरी नाहीशी नसती झाली. भाकरीच्या तुकड्यासाठी आणि वित्तभर कपड्यासाठी पोरीबाळी माणसे आजही माणसांनीच जनावरासारखी वापरली असती. औद्योगिककरणानंतर श्रमाचे मूल्य देऊन वस्तू खरेदीकरण्याची मुभा निर्माण झाली आणि आम माणसाला माणूसपण बहाल झालं. धोके माणसातल्या आजही उरलेल्या रानटीपणामुळे आहेत. पर्यावरणाला औद्योगिकरणामुळे धोका निर्माण झाला ही ओरड काही अंशी बरोबर असली तरी त्याचे उत्तर आणि उपाय माणूस अखंड शोधतो आहे, काही शोधांमुळे त्यातले बरेच धोके टळले आहेत. इथूनपुढेही टळतील. आता माणुस हरण्यासाठी जन्माला येत नाही. जगून काही भलं करण्यासाठी जगतो. डायनासोर नाहीसे झाले ते माणसामुळे नाही. आणखी कुठले प्राणी जे आज अस्तित्वात नाहीत ते खूप पूर्वी औद्योगिकरणाच्या पूर्वी. पण आजचा प्रगत मानव वाघ नाहीसे होऊ नयेत म्हणून अतोनात प्रयत्न करतो ना ? कुत्री आजारी पडली की पदरचे पैसे खर्च करून दवाखान्यात नेतो ना ? गेल्या अडीचशे वर्षात माणसातला माणूस जागा झालाय. छान जगायचं. मजा करायची. आपण नालायक नाही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 05/29/2018 - 19:55

In reply to रोख चुकतोय ! by सुधीर मुतालीक

Permalink

प्रतिसाद आवडला मुतालिक साहेब.

प्रतिसाद आवडला मुतालिक साहेब.
  • Log in or register to post comments

Submitted by nanaba on Tue, 05/29/2018 - 20:34

In reply to रोख चुकतोय ! by सुधीर मुतालीक

Permalink

छान प्रतिसाद

पण वाघ आपल्यामुळे नामशेष होत असल्याने आपण ती ज वाबदारी घेणे नैतिक आहे. तरीही आपण सहाव्या मास एक्स्टिंन्क्शन च्या कडे वा टचाल केली आहे. रोज ज्ञात/ अज्ञात अशा अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. (समूळ नष्ट). अन्न साखळी नष्ट झाली किंवा बि घडली तर फटका अपेक्स प्रेडिटर ला बसतो (महापूरे झाडे जाती.. न्यायाने) - ह्या मध्ये अपेक्स प्रे डिटर माणूस आहे. डायनॉसोर नष्ट झाल्याने आपल्याला फरक पडला नव्हता. पण आपल्या मुला बाळांना, आपल्याला वाईट हालतीत जगावे लागले/मरावे लागले तर आपल्याला फरक पडतो, म्हणून तरी कळकळ वाटतरी, असे वाटते.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Tue, 05/29/2018 - 21:03

In reply to रोख चुकतोय ! by सुधीर मुतालीक

Permalink

एकदम नेमका प्रतिसाद

सुधीर मुतालिक, एकदम नेमका प्रतिसाद. अगदी मनातलं बोललात. हे वाक्यं सार आहे :
धोके माणसातल्या आजही उरलेल्या रानटीपणामुळे आहेत.
औद्योगीकरण दोषी नसून निसर्गाला ओरबाडण्याची वृत्ती माणसाला विनाशाकडे नेते आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 05/29/2018 - 21:25

In reply to रोख चुकतोय ! by सुधीर मुतालीक

Permalink

+१००

+१०० मानवी विकासाची प्रत्येक गोष्ट दुधारी तलवार असते. मानवाने आपली बुद्धी वापरून त्या दोन धारांमध्ये समतोल साधत पुढे जायचे असते. मात्र, एकांगी विचार करून जेवढे खळबळजनक व नेत्रवेधक बोलता-लिहिता-करता येते तेवढे समतोल विचार करून करता येत नाही. त्यामुळे, एकांगी विचारांचा (व पर्यायाने मिळणार्‍या सहज प्रसिद्धिचा उर्फ 'फिईव्ह मिनिट्स ऑफ फेम'चा) मोह टाळणे बर्‍याच जणांना कठीण पडते ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 05/29/2018 - 21:40

In reply to +१०० by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

१. हे थांबवावे. शहरे विसर्जित

१. हे थांबवावे. शहरे विसर्जित करावी . प्रत्येकाने आपले अन्न स्वतः पिकवावे. तो पृथ्वीचा नियम आहे. त्याच्या विरोधात जाणारी आधुनिक मानवी व्यवस्था गुंडाळावी. हे बोलायला सोपे आहे. हे बोलणार्‍यांनी हातात केवळ लाकडी सोटा, तीरकमान किंवा (औद्योगीकरणाने दिलेली साधने सोडून) नैसर्गिकरित्या मिळणारे इतर कोणते साधन घेऊन जंगलात राहून, आधुनिक जगातील माणसांशी कोणताही संपर्क न ठेवता, "हंटर-गॅदरर" जीवनप्रणाली तीन महिने अनुभवून पहावी. मग, त्यांचे मत काय आहे हे सांगावे. २. प्रत्येकाने आपले अन्न स्वतः पिकवावे. तो पृथ्वीचा नियम आहे. हे पृथ्वीवर कोणत्या तरी काळात घडले होते काय, किंवा हे व्यवहारात शक्य आहे काय ??? हा विनोद कोणत्या पायावर उभा आहे ? त्यासंबंधीचा एखादा तरी पुरावा पहायला आवडेल. =)) लेखातला दर मुद्दा विचारात घेतला तर, "लेखापेक्षा प्रतिसाद मोठा असे होईल." ;) तेव्हा, असो.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Wed, 05/30/2018 - 14:40

In reply to १. हे थांबवावे. शहरे विसर्जित by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

अतीव सहमत. स्वावलंबीकरणाचे

अतीव सहमत. स्वावलंबीकरणाचे प्रयोग सदैव फसत आले आहेत. अगदी शहरातला क्रिमीलेयर जो असतो ना तो अशा विचाराच्या आकर्षणाने खेड्यात बिड्यात जमीन बुक करून ठेवतो (अशा योजनाही येत असतातच) आणि नंतर तिथे क्वचित एक घरबीरही बांधतो. पाच किलोमीटरमध्ये उपलब्ध मटेरियल वापरूनच वगैरे दयनीय आदर्शवादी नियम पाळत. आणि मग तिथे जाऊ कधीतरी असं करत करत घरांचे पोखरलेलेले सापळे वाळवी खात राहतात आणि यांचं पुणं मुंबई सुटत नाही. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 05/29/2018 - 20:00

Permalink

.......शहरे विसर्जित करावी .

.......शहरे विसर्जित करावी . प्रत्येकाने आपले अन्न स्वतः पिकवावे.
प्रतिव्यक्ती शेतकी जमिनीची आवश्यकता is 0.5 of a hectare - उत्तर आमेरीकेची जेमतेव एवढी शिल्लक आहे, लोक्संख्या वाढीच्या सद्य दराने दोनचार वर्षात त्यांचीही 0.5 पेक्षा कमी होईल. बाकी जगाची प्रति हेक्टर जमिनीची उपलब्धता ०.२ हेक्टर पेक्षा कमी २०१४ मध्येच झाली . संदर्भ प्रत्येकाला ०.५ हेक्टर जागा कशी देता येईल कारण त्याच्या अर्धीसुद्धा उपलब्धच नाही. ज्यांच्याकडे शेतीच नाही आणि वाट्याला येण्याची सुतराम शक्यता नाही त्यांच्या हाताला काम आणि उत्पन्नाचे साधन कसे देणार ?
The minimum amount of agricultural land necessary for sustainable food security, with a diversified diet similar to those of North America and Western Europe (hence including meat), is 0.5 of a hectare per person. This does not allow for any land degradation such as soil erosion, and it assumes adequate water supplies. Very few populous countries have more than an average of 0.25 of a hectare. It is realistic to suppose that the absolute minimum of arable land to support one person is a mere 0.07 of a hectare–and this assumes a largely vegetarian diet, no land degradation or water shortages, virtually no post-harvest waste, and farmers who know precisely when and how to plant, fertilize, irrigate, etc. [FAO, 1993] From the FAO (the Food and Agriculture Organization of the United Nations Note: .07 hectare = .17 acres संदर्भ
  • Log in or register to post comments

Submitted by nanaba on Tue, 05/29/2018 - 20:30

In reply to .......शहरे विसर्जित करावी . by माहितगार

Permalink

दाभोळकर - प्रयोग परिवार

प्रयोग परिवार दहा गुन्ठ्यात एका कुटुंबाची गरज पूर्ण हो ऊ शकते (मीठ सोडून हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे. ते म्हणतात, जमी न हार्वेस्ट करायची नाहिये, सूर्य हार्वेस्ट करायचा आहे . त्यांचे गच्चीतले प्रयोगही भारी आहेत. मी ह्या क्षेत्रात अगदीच नवीन असल्याने हे स्वानुभव सिद्ध नाही, पण पुण्यातच अनेक लोक गच्चीवर नारळांपर्यंत काहीही घेतायत. रेफरन्स : प्लेंटी फॉर ऑल / विपुलाच सृष्टी , शिरीष पवार ह्यांच्या शेताला भेट. (लोकसंख्या मर्यादित करण्याची गरज मान्य करून.) आता लगेच सगळ्यांना उत्तर देता येणार नाही कदाचित. यथा शक्ती प्रयत्न करेन. तसेच लेखकाला ही इथे भेट द्यायला सांगेन. विचार करायची आणि मांडायची संधी दिल्याबद्दल सगळ्या प्रतिसाद कर्त्यांचे आभार!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 05/29/2018 - 21:45

In reply to दाभोळकर - प्रयोग परिवार by nanaba

Permalink

पण पुण्यातच अनेक लोक गच्चीवर

पण पुण्यातच अनेक लोक गच्चीवर नारळांपर्यंत काहीही घेतायत. "पुण्यातले गच्ची असलेले घर" हा औद्योगीकरणाचाच भाग/परिणाम नाही काय ? औद्योगीकरण पूर्णपणे टाळायचे तर ते "गच्ची असलेले घर" सोडावे, ही सर्वप्रथम करायची कृती असेल, नाही का ? दहा गुन्ठ्यात एका कुटुंबाची गरज पूर्ण हो ऊ शकते औद्योगीकरणाला खलनायक ठरवणार्‍यांपैकी किती जण, शहर सोडून दहा गुंठ्यांच्या शेतावर सकुटुंब रहायला तयार आहेत, याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे !
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on Tue, 05/29/2018 - 22:29

In reply to दाभोळकर - प्रयोग परिवार by nanaba

Permalink

दहा गुन्ठ्यात एका कुटुंबाची

दहा गुन्ठ्यात एका कुटुंबाची गरज पूर्ण हो ऊ शकते (मीठ सोडून हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे)
कुठे बघायला मिळेल हा प्रयोग?
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Tue, 05/29/2018 - 22:48

In reply to दहा गुन्ठ्यात एका कुटुंबाची by अभिजीत अवलिया

Permalink

दहा गुंते !

आणि ती टेलको सोडली तेंव्हा किती मिळाले होते ? त्याच्या व्याजाचे उत्पन्न धरायचे की नाही ?
  • Log in or register to post comments

Submitted by nanaba on Wed, 05/30/2018 - 07:52

In reply to दहा गुंते ! by manguu@mail.com

Permalink

कुलकर्णी द हा गुंठे वाले नाहीत

त्यांचे मत सस्टेनेबिलिटीचा मार्ग कमीतकमी गरजा आणि वनाधारीत जीवनशैली असा आहे - शेती नाही ( शेती पण आर्टिफिशिय ल प्रकार आहे, तसे बघता, आणि एकॉलॉजीवरचा पहिला हल्ला), म्हणून.) त्यांचे मत निसर्गाचे शोषण नको, दोहन हवे (विन विन फॉर ऑल). ह्या लेखकाचे मत शेती हवी.
  • Log in or register to post comments

Submitted by nanaba on Wed, 05/30/2018 - 07:49

In reply to दहा गुन्ठ्यात एका कुटुंबाची by अभिजीत अवलिया

Permalink

शिरीष पवार

म्हणून शेतकरी आहेत जे नैसर्गिक शेती करताहेत. कराड जवळ त्यांचे गाव आहे. पण ते फोन वापरत नाहीत. त्यामुळे तुम्ही गेलात आणि ते भेटले नाहीत असे होऊ शकते. सातार्‍याजवळ प्रयोग परिवा रातील लोक हे करतात. मी दाभोळकरा न्ची पुस्तके वाचली आहेत, त्यात हे क से करू शकता ह्याचे डिटे ल्स आहेत. ते त्यांच्या प्रयोगावर आधारीत आहेत.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Wed, 05/30/2018 - 19:25

In reply to शिरीष पवार by nanaba

Permalink

त्यामुळे तुम्ही गेलात आणि ते

त्यामुळे तुम्ही गेलात आणि ते भेटले नाहीत असे होऊ शकते.
काही हरकत नसावी.. तसेही चालत किंवा बैलगाडीने किती दूर जातील. आणी ज्यांना भेटायचं आहे ते आधी पिंपळाच्या पानावर लिहिलेलं पत्र पाठवून कळवतीलच ना
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Wed, 05/30/2018 - 21:27

In reply to त्यामुळे तुम्ही गेलात आणि ते by मराठी कथालेखक

Permalink

पिंपळाच्या पानावर लिहिलेलं पत्र

आणी ज्यांना भेटायचं आहे ते आधी पिंपळाच्या पानावर लिहिलेलं पत्र पाठवून कळवतीलच ना
:)) का हो निसर्गप्रेमींची असली थट्टा करताय :)_
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on Wed, 05/30/2018 - 08:33

Permalink

गावाचे नाव सांगा ना.

गावाचे नाव सांगा ना. मी महिन्यातून एकदा तरी कराडला जातो. कधी तरी जाऊन बघून येईन कसे करतायत ते.
  • Log in or register to post comments

Submitted by यशवंत पाटील on Wed, 05/30/2018 - 09:32

Permalink

हे बरय राव.

हे बरय राव. हे चळवळवाली लोक पुस्तक लिवणार (त्येंचा कागद झाडापासुन नसल तयार होत), विमानाने जाणार इकडंतिकडं, मोबाईलवर, इंटरनेटवर लेख लिहिणार (ते भौतेक सुर्याची विज वापरत असणार)..... आन आमच्यावानी लोकं किरकोळ कायतरी करून जीव रमवत असतात तर आमालाच डोस पाजणार. ज्यांना चळवळ करायची आहे, लोकांना जागरूक करायचय, त्यांनी खेडोपाडी आन शहरातबी झोपडीवाल्या एरियात लोकांना भेटाव. मंग कळलं की विज अन पाणी आधी द्येवा तर खर, वाचवायची बाब पुढची. नायतर सरकारला धोरण बदलायला लावाव. उगा किरकोळ माणसांच्या पाठी लागुन काय होणार म्हणतो मी. लेख अन पुस्तक लिहुन जनजाकरूकता करणारी लोक पाहुन लई हासायला येत. हे लिहायलाबी मी उलिसक विज खर्च केलीच म्हणा. असु द्या. डेनाईट आयपीएलच्या जमान्यात हे काय नाही. हां, दम असलं तर इतकी विज खाणारी आन पाणी पिणारी आयपीएल बंद करून दावावा. लई उपकार व्हतील.
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Wed, 05/30/2018 - 12:01

In reply to हे बरय राव. by यशवंत पाटील

Permalink

आणि

आणि ते टेलकोच्या पगाराच्या / फंडाच्या व्याजाचे उत्पन्न किती , ते सांगत नाहीत
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on गुरुवार, 05/31/2018 - 08:22

Permalink

मूळ प्रश्न औद्योगीकरणाचा नाहि...

मूळ प्रश्न व्यवहार्यतेचा आहे. मूलभूत विज्ञानाचा शोध घेण्यात काहि लोकांनी आपलं आयुष्य वेचलं. त्यापेक्षा जास्त लोकांनी वै़ज्ञानीक सिद्धांतांपासुन टेक्नॉलॉजी बनवली. आणखी जास्त लोकांनी त्याचा व्यापार बनवला. उर्वरीत जनता उपभोक्ता बनुन राहिली. हि लिनीअ‍ॅरिटी माणसाला शाप ठरली. आपले व्यवहार लिनीयर न होता स्पायरल व्हायला हवेत. विज्ञान-तंत्रज्ञान-व्यापार-उपभोग-परिणाम-बॅक टु विज्ञान अशा पद्धतीने जगण्याचं स्ट्रक्चरींग झालं तर बॅलन्स पूर्ववत होतोच. जमिनीतुन उपसलेला कोळसा, पोलाद, पेट्रोल वेगवेगळ्या रुपात परत जमीनीत जातपर्यंतच्या संपूर्ण प्रवासात माणसाने त्याची सोबत करायला हवी. हाती येणारं कुठुन आलं-माहित नाहि, कुठे जाणार-माहित नाहि, मधल्यामधे मी काहि मॅनिप्युलेशन करणार... जगण्याची हि पद्धत जुगारासारखी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वधर्म on Fri, 06/01/2018 - 17:55

In reply to मूळ प्रश्न औद्योगीकरणाचा नाहि... by अर्धवटराव

Permalink

प्रतिसाद खूप अावडला

अर्धवटराव, ते स्पायरल व्यवहार ही कल्पना जरा स्पष्ट करून सांगा ना. अापल्या प्रचंड लांबीच्या पुरवठा साखळीत ते कसे अाणायचे? काही अाॅनलाईन संदर्भ असतील, तर अवश्य द्या. बाकी, मी शिरीष पवारांना बर्याचदा भेटलो अाहे. ते वल्ली अाहेत. कधीतरी त्यांच्याबद्दल लिहायचे मनात अाहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Fri, 06/08/2018 - 09:21

In reply to प्रतिसाद खूप अावडला by स्वधर्म

Permalink

स्पायरल व्यवहार

कुठल्याही व्यवहाराचे, रिसोर्स वापराचे सध्याचे नियम हे (पैशाचा) मोबदला <-->रिसोर्स असे आडवे चालतात. याच पद्धतीने आपण वीज वापरतो, गाडीत पेट्रोल भरतो, अगदी आपले अन्न-वस्त्र सुद्धा असेच मोबीलाइझ होतात. आपला व्यवहार रिसोर्सेच्या विनीमयाशी निगडीत असतो. या पद्धतीत रिसोर्सेसचे आगम-निगम दुर्लक्षीले जातात. वस्तुतः रिसोर्सेसचा वापर जेव्हढा परिणामकारक असतो तेव्हढच त्याचं येणं आणि जाणं महत्वाचं असतं. आपण विनीमयाबाबत (आडवी गती) जागरुक असतो पण आगम-निगमाला (उभी गती) महत्व देत नाहि. ऑप्टीमल कंझम्प्शन करायला आपण तयार असतो, ऑप्टीमल युटीलाझेशनच्या बाबतीत मार खातो. या दोन्ही गतींचा एकत्रीत विचार म्हणजे स्पायरल व्यवहार. अन्नाचा साधा विचार करताना त्याची किंमत, चव आणि कॅलरी या गोष्टींनाच महत्व देतो. त्यातच अन्न निर्मीतीची प्रोसेस, कॅलरी खर्च करायची पद्धत आणि सिवेज सिस्टीमचा विचार अंतर्भूत केला कि झाली स्पायरल पद्धत.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Fri, 06/01/2018 - 18:01

Permalink

लेख बराच एकांगी असला तरी

लेख बराच एकांगी असला तरी लेखकाची कळवळ विचारात घेण्यासारखी आहे. औगद्योगिकरण बंद करणे शक्य नाही. पण उपभोग घेताना माणसांनी तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. माझ्या सोसायटीत मी कितीतरी दुचाकी /चारचाकी वाहने बघतो जी वापराविना अनेक वर्षे पडून आहेत. त्या ऐवजी ती विकली असती तर बरं नसतं का झालं ? शेवटी कधीतरी भंगारातच विकली जाणार. नसेल तुम्हाला त्या पैशांची फारशी गरज पण म्हणून चांगले वाहन असेच सडू का देता ? कंपनीने ते भंगारात विकण्यासाठी तयार केले होते का ? त्यामुळे एक वाहन जास्त बनवावे लागले ना. त्याप्रमाणात लोखंड , इतर साहित्य , वीज , रंग, रसायने जास्त लागलेत. वाहनाचे एक उदाहरण दिले .. आपल्या जीवनात अजून किती उत्पादनांच्याबाबतीत ते लागू होते ते प्रत्येकाने बघावे. बरं औगद्योगिकरणाची अजून एक बाजू पण विचारात घ्यायला हवी. युरोप , अमेरिका खंडांनी एकोणिसाव्या , विसाव्या शतकात मोठी औगद्योगिक क्रांती केली, अनेक नवीन तंत्रज्ञान विकसित केलेत. पण या सर्वात प्रचंड प्रमाणात शस्त्रास्त्रेही निर्माण केलीत. हजारो/लाखो लढाऊ विमाने , रणगाडे, बंदूका , पाणबूड्या, जहाजे युद्धात निकामी झाली, त्यांनी लाखो-करोडो इमारती उध्वस्त केल्यात , विमाने , रणगाडे चालवण्यासाठी लाखो लिटर्स तेल जळाले.. ह्या सगळ्यांतून अखेर जगाला काय मिळाले ? अर्थात प्रश्न फक्त औगद्योगिकरणाचा नाहीये , एक व्यक्ती म्हणून तसेच एक समूह म्हणून आपण अधिकाधिक प्रगल्भ होत जाणे महत्वाचे...ते तसे होत जाईल तसे प्रश्न सुटू लागतील.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com