मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळ अश्यांना 'पावा'यची नाही रे!

शाली · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
हॉटेल मध्ये बायकोला घेवून जो मिसळ खायला जातो आणि टेबलवर बसल्यावर "दोन मिसळ" अशी ऑर्डर देतो, सॅंपलला रस्सा म्हणतो, आमच्याकडील लहान पोर सुध्दा सांगेल की हा खरा 'मिसळखाऊ' नाही म्हणून. मिसळ खायची असेल तर चार जिवाभावाचे मित्र आणि 'आपले मिसळचे' हॉटेल असेल तरच खरी गम्मत. मिसळ खायला जावून बसले की दहा-बारा मिनिटात ऑर्डर न देता मिसळच्या प्लेट समोर यायला हव्यात. ज्याला फक्त शेव आणि सॅंपल हवा ती प्लेट त्याच्या समोर, ज्याला मिसळवर कांदा पेरुनही थोडा वाटीत हवा असतो ती प्लेट त्याच्या समोर, एक्सट्रा तर्री हवी असलेल्याच्या समोर तर्रीची वाटी, कुणाच्या प्लेटमध्ये लिंबाची जास्तीची फोड असं सगळं न सांगता आले की 'मिसळखाऊ' कसा लहाण मुलासारखा प्रसन्न हसतो. दर्दी मिसळखाऊ कधी आरोग्याचा विचार करत नाही. त्याला मिसळच्या नुसत्या वासावरुन कळते की मिसळमध्ये मिठ जास्त आहे की कमी. तो मिसळला तोंड न लावताच चिमुटभर मिठ मिसळमध्ये टाकतो. तो चुकनही मिसळवर असलेल्या कोरड्या शेव-पापडीतील शेव तोंडात टाकत नाही. दोन्ही चमचे दोन हातात घेवून, अतिशय एकाग्रतेने आणि मनापासून तो सर्व मिसळ एकजीव करतो. थोडा सॅंपल अजुन घेतो. मग ईतरांची प्रगती पहातो आणि पावाचा एक तुकडा फक्त सॅंपलमध्ये बुडवून हलक्या हाताने तोंडात घालतो. मग दोन्ही हात चमच्यासहीत अंतराळी तरंगत ठेवून, डोळे मिटून पहिला घास सावकाश तोंडात घोळवतो. त्या दोन-चार सेकंदाच्या तुर्यावस्थेतच त्याला पुढील पंधरा मिनिट चालणाऱ्या 'मिसळयज्ञात' किती सॅंपल, एक्सट्रा फरसाण आणि पावांची आहूती पडणार आहे याचा अंदाज येतो. चारही मित्र जरी जिवाभावाचे असले तरी 'मिसळ मनासारखी' कालवून, पहिला घास खाताच काही सेकंदासाठी तुर्यावस्थेत जाईपर्यंत ते एकमेकांचे कुणी नसतात. या समाधीतुन ते मिसळभुमीवर (टेबलवर) ऊतरले की मग एकमेकांबरोबर ओळखीचे हसुन गप्पा आणि मिसळीला एकदमच हात घालतात. काही जण चपातीने भाजी खावी तशी पावाने मिसळ खातात. हा मिसळचा घोर अपमान आहे. मिसळ खाताना ऊजव्या हातात पावाचा लहाणसा तुकडा घेवून मिसळमध्ये बुडवावा, डाव्या हातातल्या चमच्याने मोठ्या कौतुकाने मिसळला आधार देत पावाच्या तुकड्यावर ढकलावे आणि मग तो पावाचा तुकडा पानाचा विडा खावा तसा खावा. अस्सल ‘मिसळखाऊ’ फार तर तिन वेळा डोळे आणि दोन वेळा नाक पुसेल रुमालाने. यापेक्षा जास्त नाही. खऱ्या मिसळखाऊमध्ये काही गुण असणे फार आवश्यक असते. सगळ्यात पहिला म्हणजे कोडगेपणा. सॅंपल कितीही वेळा मिळत असला तरी ‘अस्सल मिसळखाऊ’ दोन पावानंतर “जरा फरसान टाका हो” अशी कोडगेपणाने मागणी करतोच करतो. नवख्या मिसळखाऊचे ते काम नव्हे. मग हॉटेल मालकही वैतागलेल्या चेहऱ्याने वाटीत वगैरे न देता सरळ मुठीत थोडे फरसान आणुन तुमच्या प्लेटमध्ये कुस्करुन टाकतो. आता हा हॉटेलमालकाचा वैताग पाहून नविन माणूस संकोचून जाईल. पण खरी गम्मत अशी असते की मिसळखाऊचा कोडगेपणा आणि मालकाचा वैताग यांचे विचित्र नाते असते. वासराने ढुशा दिल्याशिवाय गाय जसा पान्हा सोडत नाही, तसे गिऱ्हाईकाने कोडगेपणा केल्याशिवाय मालकही खुलत नाही. तो वैताग वगैरे त्या कौतुकाचाच भाग असतो. मनापासुन, चविने, पोटभर जेवणारा असला की खरी सुग्रण जशी खुष होते ना, तसेच आगावू फरसाण घेवून “मामा, सॅंपल द्या की जरा मोकळ्या हाताने” म्हणनारे गिऱ्हाईक असले की मालकही जाम खुष होतो. सुग्रण बाई आणि असा मालक या दोघांचा आनंद एकाच जातकुळीचा. “तर्री कमीच टाका किंवा नाही टाकली तरी चालेल, कांदा वेगळा द्या” असं म्हणून पाव निरखून निरखून खाणारा कुणी असला की मालक त्या ‘पांचट मिसळखाऊ’कडे ढुंकूनही पहात नाही. ‘अस्सल मिसळखाऊ’चा दुसरा गुण म्हणजे स्वच्छता. थांबा जरा. स्वच्छता म्हणजे अती स्वच्छता असलेल्या मिसळच्या हॉटेलकडे पक्का मिसळखाऊ सरळ पाठ फिरवतो. हॉटेल जरा असे तसेच हवे. जर हॉटेलमधले टेबल ‘सांडलेली तर्री’ पुसून पुसून किंचीत लाल झालेले असतील तर हमखास तिथे चवदार मिसळ मिळणार हे सांगायला कोणी भविष्यवाला नको. आणि हॉटेलच्या एंट्रीलाच जर भजीचा घाणा काढणारा बसला असेल तर ते हॉटेल ‘आंब्याच्या पानांचे तोरण’ बांधलेल्या घरापेक्षा सुंदर दिसते. अस्सल मिसळखाऊ फार स्वच्छतेच्या नादी लागत नाही. मिसळ खावून झाल्यावर टिशूपेपरला किंवा पेपर नॅपकीनला हात पुसणाऱ्याने खरी मिसळ खाल्लीच नाही. मिसळ खाऊन झाल्यावर हात धुवावेत आणि हवेतच चार पाच वेळा झटकून मांडीवर एकदा सुलटे मग ऊलटे दाबावे. खरा मिसळप्रेमी बायकोला न घाबरता सरळ खिशातला रुमाल काढून, त्याला डाग वगैरे पडतील याचा विचार न करता खसखसून हात पुसतो आणि काऊंटरवर “किती झाले?” विचारत तिथे ठेवलेल्या शेव-पापडी, फरसाणच्या थाळीतुन फरसाण घेवून, हातावर चुरडून त्याची फक्की मारतो. (कोडगेपणा) खरा मिसळखाऊ कधीच मिसळ खाल्ल्यानंतर ताक पित नाही. त्याला ‘ताक’ म्हणजे फॅड वाटते. मिसळ नंतर कडक आणि गोड चहाच हवा. तोही किती? तर फक्त ‘जिभेच्या शेंड्याला चटका’ ईतकाच. तोही बशीत. दोन कप चहा चारजणांना पुरतो. ‘अट्टल मिसळखाऊ’चा महत्वाचा गुण म्हणजे ‘आपल्या’ मिसळीचा सार्थ अभिमान. कोल्हापुरी मिसळ, पुणेरी मिसळ, नाशिकची मिसळ हे ढोबळ अभिमान झाले. मिसळखाऊ कधी गावाच्या नावाने मिसळला ओळखतच नाही मुळी. तो ओळखतो ‘तात्याची मिसळ’ ‘भाऊची मिसळ’ ‘रामाची मिसळ’ वगैरे. आणि तिचाच अभिमान बाळगतो. अर्थात अभिमान, मग तो कोणत्याही गोष्टीचा असो, वाद हा आलाच. मिसळखाऊंचे पण वाद होतात, खटके ऊडतात. पण ते इतरांशी नाही तर मिसळखाऊंबरोबरच. ‘भाऊची मिसळ’चा कट्टर भक्त जर ‘रामाची मिसळ’च्या अट्टल भोक्त्याला भेटला तर वाद अटळच. मग या वादावादीचा शेवट तर्रीच्या लाल ओघळातच मिटतो. दोघेही भक्त आलटून पालटून एकमेकांकडे मिसळ खायला जातात आणि “आमच्या इतकी भन्नाट नाही, पण तुमचीही मिसळ भारी आहे” असे एकमेकांना सांगून वाद मिटवतात. अर्थात वर वर्णन केलेले ‘मिसळखाऊ’ आणि अशी ‘मिसळ’ मिळणारी हॉटेल तुम्हाला पुण्यात, कोल्हापुरात किंवा नाशकात नाही मिळणार. हा, ऊपनगरात मिळाली तर मिळतील. पण गावाकडे मात्र तुम्हाला हमखास अशी ‘प्रसिद्ध मिसळ’ची हॉटेल मिळतीलच मिळतील. हे झाले मिसळपुराण. पण हे मिसळ वाले ‘भाऊ’ ‘तात्या’ ‘रामा’ हे एक वेगळेच आणि त्यांच्या मिसळसारखेच चटकदार प्रकरण असते. आमचा मिसळवाला रामाही त्याला अपवाद नाही. तर रामाविषयी पुन्हा कधीतरी, तोवर शोधा आपला मिसळवाला. काय……..

वाचने 25092 वाचनखूण प्रतिक्रिया 74

योगी९०० गुरुवार, 04/12/2018 - 09:11
खूप छान लेख... कोल्हापुरच्या फडतरे, चोरघे आणि बावडा मिसळ ची आठवण आली. पण आम्ही रस्सा किंवा सँपल बिपल म्हणत नाही. आम्ही तर्री म्हणतो..!!

In reply to by योगी९००

Sanjay Uwach गुरुवार, 04/12/2018 - 18:46
घराचा रंग पिवळा आणि चार चाकी गाडीचा रंग पांढरा ही जशी कोल्हापुरी माणसाची ओळख आहे , तशी मिसळ खाताना कट आण रे, पातळ भाजी आण रे , ही पण त्यांची एक ओळख,वेटरला चेहऱ्यावरुनच अट्टल मिसळ खाऊ ओळखता येतो. त्या नुसार कुणाला कपातून पातळ भाजी द्यायची की कुणा समोर मोठा मग भरून आणून ठेवायचा हे त्याच्या लगेचच लक्षात येते. चा बी पावडर उतरून दे रे अशी लगेचच अर्डर असते.

In reply to by उगा काहितरीच

जेम्स वांड गुरुवार, 04/12/2018 - 10:47
आमच्याकडे रश्याला सॅम्पल म्हणणाऱ्याला 'हे कोण च्यु* आलंय' अश्या नजरेने बघतात, बारा कोसाला भाषा बदलते ती अशी! आपण जिथे जसे असेल तसे राहावे, बी रोमन इन रोम अँड 'अय रांडेच्या' इन कोल्हापूर!. कोल्हापूरच्या बाहेर कोणाला असे म्हणले तर जीवावर बेतायची शक्यता जास्तच... कसे!

कंजूस गुरुवार, 04/12/2018 - 12:31
तर्री जमली आहे. मुगाची मिसळ फारच आजारी वाटते. ताकाचे फ्याड कोणी सुरू केले? कडक चाच हवा. दुधाट मसालेवाला अजिबात नको. पोट भरण्यासाठी पाव ठीक परंतू त्याचं खरं काम वड्याबरोबरच.

सस्नेह गुरुवार, 04/12/2018 - 14:34
खंग्री मिसळ ! बाकी ते पावाच्या तुकड्यावर मिसळ ढकलून खाण्याबद्दल असहमत ! मिसळीचा मजा, चमच्यात मावेल तितकी प्रथम तोंडात टाकून, तिच्या स्वादाची जिभेला ओळख पटली की उरलेल्या जागेत लगेच पावाचा लचका तोडून कोंबण्यातच आहे :)

पुंबा गुरुवार, 04/12/2018 - 16:58
वाह!! जिभेवर रेंगाळत राहणार या मिसळीची चव..

हा पदार्थ अत्यंत बोगस असून उगाचच्या उगाच ओव्हर-हाईप केलेला आहे. तो तयार करण्यात काहीही स्किल नाही. तो अभिमानाने विकण्यात तर काहीच नाही. तुम्ही एक गोष्ट करा. जे लोक मिसळीवर "बघा आम्ही खवय्ये" अशी चर्चा करतात त्यांना एकाच शहरातील चार प्रसिद्ध मिस्ळी आणून ब्लाइंड टेस्ट घ्या. कुणालाही काळे गोरे करता येणार नाही. जे पास होतील, त्यांना चार शहरातील मिसळी आणून टेस्ट घ्या.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

जेम्स वांड गुरुवार, 04/12/2018 - 17:46
आम्ही किती वेगळे अन क्रांतिकारी आहोत हे चौकात नाचून जाहीर केल्याबद्दल मग्गाभरून रश्याइतक्या शुभेच्छा!

In reply to by हणमंतअण्णा शंक…

मार्मिक गोडसे गुरुवार, 04/12/2018 - 18:20
हा पदार्थ अत्यंत बोगस असून उगाचच्या उगाच ओव्हर-हाईप केलेला आहे. तो तयार करण्यात काहीही स्किल नाही. हाहाहा , खरं आहे. मागे आम्ही पुण्यातील सुप्रसिध्द बाकरवडीच्या चाहत्याला ठाण्यातील भैयाच्या दुकानातील बाकरवडी 'ती' बाकरवडी म्हणून खायला दिली. काय फरक कळला नाही त्याला.

In reply to by मार्मिक गोडसे

जेम्स वांड गुरुवार, 04/12/2018 - 18:23
सॅम्पल स्पेसच असली धरली तर कसे होणार गोडसे साहेब, संगत सुधारा बुआ तुमची, एकतर अशी मंडळी त्यात बाकरवडी गेली ती गेलीच! आतबट्ट्याचा व्यवहार झाला की हा!!! (कृपया हलके घेणे)

In reply to by जेम्स वांड

मार्मिक गोडसे गुरुवार, 04/12/2018 - 18:53
म्हणजे पुण्यात स्मार्ट 'टेस्ट बड' नसणारे फुकाच्या बढाया मारणारेही आहेत तर? एक दोन तुकड्यात पुणेकराला धारातीर्थी पाडण्याचा आनंद तुम क्या जाणो?

In reply to by मार्मिक गोडसे

अभ्या.. गुरुवार, 04/12/2018 - 18:56
मिसळपाव हा अगदीच बोगस वगैरे आयटम नाही पण ओव्हरहाईप्ड आहे हे मात्र पक्के. त्यातल्या त्यात त्याला गावाचा, दुकानदाराचा हाबिमाण चिकटला की मग काय बोलायलाच नको. त्यातल्या त्यात कोल्हापूरची असली अन नगरची तसली हे कढ नोकरीनिमित्त पुण्यामुंबईत आले तरच येतात. खुद्द कोल्हापुरात फडतर्‍यांकडं गर्दी बाहेरच्यांचीच असते. पुणेरी मिसळ हा तर मिसळीचाच शुध्द आपमाण आहे. एखाद्या प्रदेशभागाची मसाल्यांची, चवींची जशी खासियत असते त्या मांदियाळीप्र्माणे तेथली मिसळ बनून येते आणि ती मेनूवर अधीमधी कुठेतरी असते. ह्या ओव्हरहाईपमुळे मिपाकरांच्या (आता आपली मिसळपाव ही साईट भारी आहे पण त्याचे नाव वडाशांपल किंवा डिस्कोभजी असते तरी तेवढेच आवडले असते हे महत्त्वाचे सांगू इच्छितो) शिफारशेने मामलेदार, अरिहंत, रामनाथ, काटाकिर्र, भिगवण, शिवनेरी वगैरे वगैरे बर्‍याच मिसळी चाखून झाल्या. फडतरे वगैरे आधीच खाऊन माहीत होत्या. आणि गावोगावचा मिसळपाव हा ओव्हरहाईप्ड आयटम आहे ह्या मतावर ठाम आहे. जाताजाता: ह्या सगळ्या मिसळीतली मोस्ट भंगार मिसळ म्हनजे मामलेदार. ह्या वाक्यासाठी आमचे परममित्र किसनाजी शिंदे ह्यांचे शत्रुत्व पत्करायला आपण तय्यार हौत. . ;)

In reply to by अभ्या..

मार्मिक गोडसे गुरुवार, 04/12/2018 - 19:06
मिसळीतली मोस्ट भंगार मिसळ म्हनजे मामलेदार. आसूदे आसूदे, वाघिणीचे दूध आहे ते. त्या दुधाला डिग्री लावायची नसते.

In reply to by अभ्या..

कपिलमुनी Mon, 04/16/2018 - 01:48
पुण्यात तर फार भंगार मिसळ मिळते , काटाकिर्रर्र किंवा रामनाथ ला लोक्स काय खातात देव जाणे ! बाकी पुण्यास आलास की सांग , आमच्या तळेगावला सर्वात भारी मिसळ मिळते ;)

In reply to by हणमंतअण्णा शंक…

पुंबा गुरुवार, 04/12/2018 - 19:01
मिसळ ओव्हरहाईप्ड पदार्थ असून तो बनवण्यात फारसे स्किल लागत नाही. तो अभिमानाने विकण्यात काहीच स्किल लागत नाही. हे कसे काय बुवा?

In reply to by पुंबा

आयत्या विकत घेतलेल्या फरसाणावर ओबड-धोबड केलेला तिखटजाळ रस्सा ओतून देण्यात काही कौशल्य आहे असं मला वाटत नाही. कोणतं मिसळीचं दुकान स्वतःचा पाव, स्वतःचे फरसाण तयार करते? रश्यात मटकीच्या ऐवजी मूग टाक, चटणीच्या ऐवजी हिरव्या मिरच्यांचा ठेचा टाक, किंवा ओल्याच्या ऐवजी सुकं खोबरं टाक हे यांचं आळशी इनोव्हेशन! मुळात मिसळ हा आळसाचा कळस प्रकार आहे. (अनुप्रास!) मिसळ माझ्या डोक्यात जायला लागली जेव्हा ऑफिसात फूडीत्व सिद्ध करायची चढाओढ लागायची. "काटा किर्रर्र वगैरे काहीतरी भन्नाट करताहेत आणि मी दोन दिवस न हागता येत्या रविवारी पहिल्या ऊताची मिसळ खाऊन रेक्टमास काशी दाखवणार आहे" या थाटाची कमिटमेंट लोक घ्यायला लागले तेव्हा मिसळीचं बौगस्य जाणवू लागले. झोमॅटो पाहून वडापाव खाणारे बहाद्दूर मिसळीबद्दल तावातावाने ज्ञान पाजळू लागल्यावर काय होईल? त्यात घराजवळ "चस्का चवीचा : एक भन्नाट मिसळ" की काय, अश्या नावाचं दुकान उघडल्यावर बोलूच नका. (-रॉनीज कोल्हापुरी कॅफे बिस्त्रो ,बाणेर येथे चुकून मिसळ खाल्लेला दुर्दैवी जीव)

In reply to by हणमंतअण्णा शंक…

विशुमित Fri, 04/13/2018 - 14:35
आयत्या विकत घेतलेल्या फरसाणावर >> ==>> एक्साक्टली. मला ह्या आयत्या फारसनावरच आक्षेप आहे. सगळं तेलकट वास सॅम्पल मध्ये उतरतो. ... मिसळ खाल्ली तर २ दिवस पोटात मला कसनुसं होते. खूपच भूक लागली असेल आणि जेवणासाठी किंवा दुसरा काही पर्याय नसला तरच मिसळ खातो.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

अभिजीत अवलिया Fri, 04/13/2018 - 14:49
सहमत. त्याचबरोबर आमची फडतरे/काटाकिर्र/मामलेदारच कशी जगात भारी म्हणून गाजावाजा करणे तर डोक्यात जाते. बिनकामाचा अभिमान.

In reply to by अभिजीत अवलिया

श्वेता२४ Fri, 04/13/2018 - 15:44
मलाही मिसळ फार काही आवडत नाही. आपलीच मिसळ (स्वत खात असलेली) कशी छान व इतर कशा फालतू यावर खूप चर्चा केली म्हणजे चर्चा करणारे खवय्ये असतात असा सर्वसाधारण समज असावा. त्यामुळे अशी मिसळीवर भांडणे करणे म्हणजे आपले खवय्येपण सिद्ध करण्याची संधी वाटत असावी. मलाही आजवर प्रसिद्ध आहेत म्हणून चाखलेल्या मिसळींपेक्षा घरचीच मिसळ छान वाटली. आणि अनेक प्रसिद्ध नसलेल्या ठिकाणी मला छान चवीची मिसळ खायला मिलाली आहे. मुळात मिसळ या विषयावर वाद घालण्यात माणसांना एवढे आकर्षण का आहे तेच कळत नाही. पण तरीही लेखामध्ये ज्या प्रकारे वर्णन केले आहे ते छानच आहे. जरी त्यातील बऱ्याच मतांशी मी सहमत नसले तरीही.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

पुंबा Fri, 04/13/2018 - 15:33
अहं.. मिसळीचं बोगस्य, मिसळचाहत्यांचं थैल्लर्य वगैरे ठीकच. पण असला कसलेही कौशल्य न लागणारा बोगस पदार्थ विकायला कसले कौशल्य लागत नाही हे कसे असे विचारायचेहोते. उलट अधिक कौशल्याचे नाही का ते काम?

In reply to by पुंबा

पण असला कसलेही कौशल्य न लागणारा बोगस पदार्थ विकायला कसले कौशल्य लागत नाही हे कसे असे विचारायचेहोते.
याचं कारण आहे ते स्युडो-हटकेपण. शक्यतो ते नावात असते. उदाहरण म्हणजे "काटा किर्रर्र". तसंच "चस्का चवीचा". आमदाराच्या कालिजात हाटील म्यानेजमेन्ट वगैरे शिकून स्मार्ट झाल्याली, किंवा "फॉलो युवर हार्ट" वाली पॅशन-पिळगी. क्वोरावर "काय बरं ठीवू मी हाटीलाच हटके नाव?" असा प्रश्न विचारून हॉटेलांची नावं ठेवणारी एक जमात उदयास आलेली आहे. कॅफे, आईस्क्रीम-हौस गेलाबाजार बेकरी काढून कॅपिटल जाळणारी. असलं काहीतरी "हटके" करून आपण १०० रुपयांना मिसळ विकू असा फाजील आत्मविश्वास या मंडळींना असतो. हेच त्यांचं "न-कौशल्य". खाण्याच्या व्यवसायात कन्सिस्टंसी खूप महत्वाची आहे हे यांना कधी कळणार देव जाणे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

अभ्या.. Fri, 04/13/2018 - 16:37
परफेक्ट. असली हटके नावं ठेवून, हजारोंचे बोर्ड आणि लाखोचे इंटेरिअर करुन, व्हाटसप चेपुवर रतीब टाकून, चार महिन्यात गाशा गुंडाळणारे हाटेल व्यावसायिक झालेत. कॅपिटल जाळणे ह्याशिवाय असल्या टुकार प्रकाराला दुसरे नावच नाही. हाटेलात निम्म्याला निम्मा प्रॉफिट असतो, प्रत्येक हाटेलात गर्दी दिसते असल्या लॉजिकने मोक्याच्या जागांना अव्वाच्या सव्वा पैसा मोजला जातो, क्रियेटिव्ह मेन्युच्या नावाखाली वैयक्तिक आवडीचे कैतरी प्रकार भरले जातात, फर्निचरवाले, इंटेरिअरवाले, अ‍ॅडव्हरटायझर्स असल्या लोकांची डोके खाऊन काहीतरी उभारले जाते. मार्केटात काय आजकाल वस्ताद, कॅप्टन्स, वेटर, हेल्पर, मोरीवाले, चपात्यावाल्या, तंदूरवाले, चायनीजवाले, सौथींडीयनवाले असले कामगार पुरवणारे ढीगभर एजंट झाले आहेत. पैसे टाकले की एका दिवसात ५० जणांचा स्टाफ उभा करतात. हाटेल चालू होते. नव्याचे नौ दिवस नातेवाईक, मित्र आणि काही गळाला लागलेले गरजू ग्राहक गर्दी करतात. तो भर ओसरला की रोजचा किराणा आणी भाजीबाजार करण्याइतका गल्ला होत नाही. मग कुठला आलाय प्रॉफीट आणि धंदा. शेवटी शेवटी कामगारांना खाऊ घालण्याकरिता भट्टी पेटवावी लागायची वेळ येते आणि हाटेलाची मृत्युघंटा वाजू लागते. सेम ह्याच टाईपची ५-६ उदाहरणे डोळ्यासमोर गेल्या वर्षात पाहण्यात आली. त्यातला एकजण तर सगळे विकून बाउंस चेकच्या प्रकरणात घरदार सोडून फरारी आहे.

In reply to by अभ्या..

विशुमित Fri, 04/13/2018 - 17:29
नवीन हॉटेल निघाले की काही दर्दी लोकं सुरवातीला आवर्जून हजेरी लावतात. नवीन असल्यामुळे नवी टेस्ट, हॉस्पिटॅलिटी, क्वालिटी, क्वांटिटी आणि डिस्काउंट सगळे मिळून जाते. नंतर भंगार हॉटेल आहे म्हणून कुप्रसिद्धी करून टाकतात. बोंबलतेय धंदा मग. ====

In reply to by अभ्या..

जेम्स वांड Fri, 04/13/2018 - 19:34
तंदूर रोटी ही कला मोठ्या प्रमाणावर (हॉटेल व्यवसाय वगैरे) मध्ये गढवाली लोकांची मोनोपोली असून, बहुतेक सगळे तंदूर कॅप्टन (पंजाब किंवा अति उत्तरेची एकदोन राज्य सन्माननीय अपवाद सोडून) गढवालीच असतात. ह्यात कितपत तथ्य असावे?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

इष्टुर फाकडा गुरुवार, 05/10/2018 - 23:34
"काटा किर्रर्र वगैरे काहीतरी भन्नाट करताहेत आणि मी दोन दिवस न हागता येत्या रविवारी पहिल्या ऊताची मिसळ खाऊन रेक्टमास काशी दाखवणार आहे" ख्या ख्या ख्या अगयाया लय हसलो लय हसलो. खरंय अगदी खरंय. पुण्यात हि फालतुगिरी रामनाथ मिसळीपासून सुरु झाली होती ती सध्या काटाकिरर वगैरे पर्यंत पोचली आहे. मी ९८ पासून 'श्री' मिसळ चा गिर्हाईक आहे. मिसळ छान आहे आणि इतर पदार्थही चविष्ट आहेत. बाकी अभिमान इत्यादी नथी छे.

चौकटराजा गुरुवार, 04/12/2018 - 17:39
हे लघु निबंधात्मक आवडले . काळाच्या ओघात " दही मिसळ " नावाचा प्रकार वाहून गेला . आमच्या आधीच्या पिढीत तो ही प्रकार लोकप्रिय होता . पूर्वी स्पेशल मिसळ व साधी मिसळ असे दोन प्रकार होते. माझ्या लहानपणी मिसळीत फरसाण घालण्याची पद्धत नव्हती . शेव चिवडा असे. आमच्या घरासमोर मिळणारी एक मिसळ अनेक मिपाकराना आवडते पण मला ती अति तीखट वाटते . मी कदाचित दर्दी मिसळ खाऊ नसेन. पण आठवड्यातून एक दिवस तरी घरीच मिसळ करून खातो . मिपावाले म्हणतात आम्हाला कधी बोलावणार पण हे साले सगळे तिखट मिसळवाले असल्याने त्याना थोपवून धरले आहे.

पैसा गुरुवार, 04/12/2018 - 20:14
माझी आजी मिसळीला आंबोण म्हणायची. लेख आवडला. पण अगदी जीव घालवण्यासरखे मिसळीत काय असते देव जाणे. कोणताही पदार्थ बदल म्हणून ठीक असतो. रोज उठून कोण खाणार! काही लोकांना तिखट जाळ मिसळ आवडते. तिखट ही खरे तर चव नाही. जीभ आणि तोंड भाजल्यासारखे होते. आणि तिखटाने इतर चवी मारल्या जातात.

साधा मुलगा गुरुवार, 04/12/2018 - 21:36
लेख उत्तम आहे , पण लेखातल्या आणि कॉमेंटीतील सर्व गोष्टी पटल्या नाहीत, 1) मिसळ खाल्ल्यानंतर ताक पिणे ही मी तरी कॉमन गोष्ट पहिली आहे, ते प्यायल्याने पाप करतो अथवा तो खरा मिसळभक्त नाही असे जे काही वर्णन केले आहे यात काही तथ्य नाही, शेवटी ज्याची त्याची आवड तुम्ही चहा प्या नाहीतर ताक प्या, मिसळीचा आनंद घेता हे महत्वाचे. 2) मिसळपाव ओव्हर रेटेड नाही पण काही मिसळपावची ठिकाणे मात्र नक्कीच ओव्हर आहेत, कालच कोल्हापूर मध्ये मिसळ खाल्ली, मामलेदार समोर काहीच नाही हो, तर्री (हो तर्रीच , सॅम्पल वगैरे तुमच्या लेखातून नवीन ज्ञान मिळाले) घालून सुदधा फार काही तिखट लागली नाही, मामलेदार ला मिडीयम सांगून मग बेताने तर्री घालतात, इथे तस काही नाही. 3) मिसळपाव ओव्हर रेटेड असेल तर मॅक डी, KFC, बर्गर किंग तर महा ओव्हर रेटेड आहेत, त्याहून पुढे जाऊन दारू पिणे हा तर मोठा फ्रॉड वाटतो, लोक दोन पेग मारून आपल्याला फार चढली आहे असा नाटक करतात.

In reply to by साधा मुलगा

पगला गजोधर गुरुवार, 04/12/2018 - 21:39
प्रतिक्रियेत दम आहे.
मिसळ खाल्ल्यानंतर ताक पिणे ही मी तरी कॉमन गोष्ट पहिली आहे, ते प्यायल्याने पाप करतो अथवा तो खरा मिसळभक्त नाही असे जे काही वर्णन केले आहे यात काही तथ्य नाही,
. दही मिसळ खाणारे मग् या डेफिनेशने महापापी कॅटेगरी त येतील.

मराठी कथालेखक Fri, 04/13/2018 - 13:20
लेखातून मिसळपाव खाण्याला खूप जास्त प्रमाणात स्टिरिओटाईप /चौकटबद्ध केलं गेलंय असं वाटलं. अस्सल / कमअस्सल मिसळखाऊ अशी विभागणी पटली.. जो तो आपापल्या पद्धतीने आपल्या आवडत्या पदार्थाचा आस्वाद घेत असतो.
खऱ्या मिसळखाऊमध्ये काही गुण असणे फार आवश्यक असते. सगळ्यात पहिला म्हणजे कोडगेपणा.
आता एखादा माणूस मुळातच थोडा बुजरा असेल त्याच्यात कोडगेपणा अजिबात नसेल तर मिसळ खाताना तो उसना कोडगेपणा कसा आणणार आणि मग तो खरा मिसळखाऊ नाहीच असं मानायचं का ?

नाखु Fri, 04/13/2018 - 16:50
वाटेल पण पुण्यातच २५-३० वर्षांपूर्वी मिसळीला अजिबात वलय प्राप्त झाले नव्हते आणि काही ठिकाणी चक्क वडा-भजींचा (शिल्लक तळण चुरा) मिसळीत दिला जात होता. मंडईतले महात्मा, स्वारगेट जवळचं दत्त दत्त भुवन ही वानगीदाखल उदाहरणे. पुण्याचा चार दशकांच्या सरमिसळ अनुभवी मिसळलेला नाखु

उपेक्षित Fri, 04/13/2018 - 19:18
माझा मित्र सुमित डोळे याचा 'सरमिसळ' नावाचा स्वतः चा ब्रांड आहे सेनापती बापट रोडला आणि आत्ता मागच्या आठवड्यात सिंहगड रोडला नवीन ब्रांच चालू झाली आहे. एकदा अवश्य भेट द्या.

मदनबाण Fri, 04/13/2018 - 21:19
१} मला मिसळ आवडते. २} करणारा तर्री मास्टर असेल तर मिसळ कुठलीही असो... फडशा अपोआप पडला जातोच ! ३} माझ्या मते तर्रीला सँपल म्हणणारे आणि लांडोराला मोर समजणारे एकच ! ४} नावाजलेल्या मिसळी बर्‍याच वेळा अगदी रद्दड असल्याचा अनुभव आहे. ५} का कोणास ठावूक पण हल्ली पुर्वीची चव असलेली मिसळ कुठेच मिळत नाही असं जाणवायला लागलं आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Indian Army BM-21 Grad Artillery Firing

मिसळीच्या धाग्यावर प्रतिसादांची सरमिसळ होऊन मानाचा फेटा कुठल्या पक्षाला द्यायचा हे अजून ठरले नसले तरी मराठी भाषेला काही तर्रीदार शब्दांची देणगी मिळत आहे, उदाहरणार्थ... फूडीत्व, बौगस्य, थैल्लर्य, इ. =)) =))

शाली Sun, 04/15/2018 - 20:42
मी हे सहज लिहिलय हो.असंच असावं असा बिल्कूल हट्ट नाही. प्रतिसाद वाचून घाबरल्यासारखं झालं चक्क. आणि हो काही गोष्टी क्लिअर करतो. मिसळ बनवायला खरच कौशल्य लागते. मी गावी जीथे मिसळ खातो ते स्वत: शेव आणि पापडी घरी बनवतात. मसाले अगदी घरचे असतात. नकारात्मक ज्यांनी लिहिलय त्यांनी खरी मिसळ खाल्ली नसावी. मी कोल्हापुर, पुणे, नाशिक अशी कोणतीही वर्गवारी केली नाहीये. आपापली मिसळ असे म्हटलंय. काहीही गांभीर्याने घ्यायची सवय घातकच. हलकं फुलकं लिहिलय हो मी.

गवि Mon, 04/16/2018 - 08:35
हलका फुलका लेख छान आहे. या लेखातली स्टाईल विनोदासाठी तशी घेतलेली स्पष्ट दिसतेय. ती फार सीरियस नजरेने पाहणं पटत नाही. तसं तर मग पुलंचा "पानवाला" आठवावा. त्यातही अमुक प्रकारे पान खाणारा अस्सल, तमुक खाणारा बावळट वगैरे असं पूर्ण लेखभर आहेच की.

मुक्त विहारि Mon, 04/16/2018 - 10:09
रविवारच्या खिम्यातला किंवा मटणातला रस्सा थोडा फार जास्तच करावा आणि मग त्या रश्यात फरसाण-पापडी-गाठीया-कांदा घातला की उत्तम मिसळ बनते. मटणाच्या रश्यातल्या आणि रस्सा जर ताजे घरगूती मसाले टाकलेला असेल तर अशा मिसळीला कुठेही तोड नाही. आणि अशा मिसळीबरोबर तांदळाची गरमगरम ट्म्म फुगलेली भाकरीच हवी. एकदा ट्राय करा आणि मग बोला.

गामा पैलवान Mon, 04/16/2018 - 18:05
हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर,
खाण्याच्या व्यवसायात कन्सिस्टंसी खूप महत्वाची आहे हे यांना कधी कळणार देव जाणे.
रोचक विधान आहे. तुम्हाला कन्सिस्टंसी म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे ते मला माहित नाही. मात्र मामलेदार मिसळीचा स्वाद कन्सिस्टंट आहे हे नक्की. आ.न., -गा.पै.

गामा पैलवान Mon, 04/16/2018 - 18:14
अभ्या..,
ह्या सगळ्या मिसळीतली मोस्ट भंगार मिसळ म्हनजे मामलेदार.
मामलेदार मिसळ एकतर जाम आवडते किंवा आजिबात आवडंत नाही लोकांना. मधलेअधले कोणी सापडंत नाहीत. मा.मि.मुळे मिसळीविषयीच्या संकल्पनांत पराकोटीचा फरक (=प्याराडिम शिफ्ट) पडतो. मग काय नावडलं तुम्हाला तिच्यातलं? जाणून घ्यायची उत्सुकता आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मुक्त विहारि Tue, 04/17/2018 - 11:03
नुसतेच जळजळीत आणि तेलकट.... अर्थात, जोपर्यंत मटणातल्या रश्यातल्या मिसळीची माहिती न्हवती, तोपर्यंत मामलेदार हा एकमेव पर्याय होता. सध्या मात्र घरीच मिसळ खाणे. डोंबोलीत पण मामलेदारची मिसळ मिळते पण तिथे उगाच अपमानास्पद वागणूक मिळते.शिवाय उगाच अंग चोरून मिसळ खायला लागते. टेबल खूर्ची वर खाणे, हाच मुळात अन्नाचा अपमान, असे मी समजतो. मस्त ऐसपैस मांडी घालून, एका हातात भाकरी आणि मग उजव्या हाताने भाजी-आमटी ओरपण्यातले सूख काही वेगळेच. असो, खाण्यात आणि पिण्यात मॅनर्स बाळगाणारी व्यक्ती चार हात दूर ठेवणेच उत्तम.

In reply to by मुक्त विहारि

गामा पैलवान Tue, 04/17/2018 - 11:55
रश्श्यावर तेलाचा नुसता तवंग होता की चवीलाही तेलकट होता? की फरसाण तेलकट होतं? की दोन्ही? कुतूहल म्हणून विचारतोय. -गा.पै.

In reply to by मुक्त विहारि

गामा पैलवान Tue, 04/17/2018 - 22:32
मला आवडणाऱ्या तवंग आणि तिखटजाळ या गोष्टी नेमक्या तुम्हांस आवडंत नाहीत. पिंडे पिंडे रुचिर्भिन्ना:. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मुक्त विहारि Wed, 04/18/2018 - 07:17
एकदा माझ्या हातची मिसळ खाऊन बघा.... मग ठरवा... अर्थात, माझ्या कडे टेबल-खूर्ची नसल्याने, जमीनीवर मांडा ठोकूनच जेवावे लागेल. तेलकट आणि तिखटजाळ, म्हणजेच चमचमीतपणा नाही.

In reply to by मुक्त विहारि

गामा पैलवान Wed, 04/18/2018 - 11:59
अर्थात तुमची मिसळ फक्कडच जमलेली असणार यावर वाद नाही. मात्र मिसळ चमचमीतच हवी असं बंधन नसावं (असा माझा अंदाज). पिंडे पिंडे रुचिर्भिन्ना:. -गा.पै.

वरुण मोहिते Tue, 04/17/2018 - 14:05
नुसता नावाजलेला प्रकार झालाय. मामलेदार कडे नावाखातीर लोकं जातात. तिखट रस्सा बास . आता ठाण्यात सुरुची मिसळ आलीये म्हणून मामलेदार फ्रांचायझी देतोय. मिसळ कधी पण सध्या ठिकाणी खावी. किंवा घरीच . हे ओव्हर रेटेड लोकांकडे नाही.

श्वेता२४ Tue, 04/17/2018 - 17:04
विषय मिसळीचा नाही मिसळखवय्यांबद्दल आहे. आता यावर अधीक चर्चा करण्यासारखे काही राहिलेलं नाही. चर्चेचा रोख भलतीकडेच गेला आहे.

गामा पैलवान Fri, 05/11/2018 - 17:26
हणमंत अण्णा, मी दोन दिवस न हागता येत्या रविवारी पहिल्या ऊताची मिसळ खाऊन रेक्टमास काशी दाखवणार आहे रेक्टमास काशी दाखवणार? हा खरंच भारी प्रकार दिसतोय. माझ्या माहितीप्रमाणे जिथे काशी दिसते त्यास अॅनस म्हणतात. ही काशी जर रेक्टमापर्यंत पोहोचणार असेल तर मिसळ लई म्हंजे लईच भारीये. शिवाय रेक्टमात रक्तमांस दाटून राहील ते वेगळंच! आ.न., -गा.पै.