Skip to main content

आपला मानुसच्या निमित्ताने

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 09/02/2018 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
'आपला मानुस'च्या निमित्ताने आजच आपला मानुस प्रेक्षागृहात झळकला. सतीश राजवाडे दिग्दर्शित आणि नाना पाटेकर, सुमित राघवन आणि इरावती हर्षे अभिनित हा चित्रपट पहिल्याच दिवशी बघितलाच पाहिजे हे मी कधीच ठरवलं होत. अर्थात त्याच कारण अगदीच स्पष्ट आहे. सतीश राजवाडे सारखा सशक्त दिग्दर्शक साक्षात नाना पाटेकर सारख्या 'नटसम्राट' व्यक्तीला पडद्यावर कसं दाखवतो ही उत्सुकता तर होतीच. पण सोबत तेवढाच सशक्त अभिनय करणारा सुमित राघवन आणि स्वतःच वेगळेपण कायम सिद्ध करत आलेली इरावती हर्षे असे सशक्त कलाकार होते. खरच चित्रपट अप्रतिम जमून आला आहे यात वादच नाही. नानांच्या अभिनयाबद्दल काय बोलणार? ते जितके off screan खरे आहेत तितकेच ते on screan खरे आहेत. सुमित राघवनने मनात होणारी घालमेल अगदी लहान लहान कृतींमधून उत्तम दाखवली आहे. इरावती हर्षेने कुठेही नकारात्मक न होता देखील आपली भूमिका चोख बजावली आहे. अर्थात सुमित कात्रीत सापडल्याच सांगून आणि इरावती नकारात्मक असूनही नाही हे सांगून मी तुमच्या मनातली उत्सुकता वाढवली आहे अशी आशा करते. चित्रपटगृहात जाऊन पाहणायासारखा हा चित्रपट आहे हे नक्की. पण तरीही.... चित्रपट उत्तम जमला असला..... सर्व कलाकारांचा अभिनय A१ असला....... तरीही एकाच पिढीचा काहीसा एककल्ली विचार करून मांडणी आहे आहे अस माझ वय्यक्तिक मत आहे. पाहून आलात की नक्की आपलं मत कळवा.
लेखनप्रकार

वाचने 16367
प्रतिक्रिया 47

प्रतिक्रिया

नानाचा सिनेमा थेट्रात जाउनच पहाणार कारण शेवटी नाना आपलाच मानुस आहे. (नटसम्राट थेट्रात जाउन ३ वेळा पाहिलेला) पैजारबुवा,

काटकोन त्रिकोण नावाचे नाटक आहे. हे त्याचे नाट्य रुपांतर आहे. मूळ नाटकात गच्चीतून पडलेले आजोबा आणि डिटेक्टिव्ह् हे दोन्ही रोल डॉ. मोहन आगाशे करतात. यात नाना डिटेक्टिव्ह आहे .. मग आजोबा कोण आहे ?

In reply to by manguu@mail.com

नानाच.

In reply to by प्रचेतस

अजय देवगणही आहे ना ?

सिनेमाच्या नावात "मानुस" असण्याचे काही खास कारण आहे का ? म्हणजे चित्रपटाची बोलीभाषा वगैरे

In reply to by मराठी_माणूस

नाना पटेकरांच्या भाषेत सांगायचं तर कोकणात 'माणूस'पेक्षा मानुस म्हणतात. त्यात जास्त आपलेपणा जाणवतो. म्हणून 'मानुस' म्हंटल आहे

In reply to by मराठी_माणूस

मानुस म्हंटल की आपलेपणा वाटतो अस खुद्द नानांनी एका प्रमोशन मध्ये म्हंटल आहे. म्हणून 'मानुस' वापरलाय

असू दे किंवा माणुस आपला/strong> आहे हे महत्त्वाचे साधा सुधा सरळ नाखु माणसांच्या दुनियेतला

आता हा एक नवीन ट्रेंड येणार. नाटकवाले कलाकार रुपये दोन रुपये करत गावोगावी प्रयोग लावणार. त्याचा सिनेमा करुन दुसरेच लोक बक्कळ मिळवून घेणार.

In reply to by manguu@mail.com

हा मुद्दा अस्थानी वाटतोय. दोन्ही वेगवेगळी क्षेत्र आहेत.. मग, तुमच्या म्हणण्यानुसार नाटकावरून काढ्लेल्या सिनेमावर बंदी घालावी काय ? चला मग, कोणती तरी करणी सेने छाप नविन एखादी सेना काढुयात ! :-)

In reply to by manguu@mail.com

तुमचं निरिक्षण आहे ते ठीकाय, पण नाटकवाल्यांना "रुपये दोन रुपये" म्हणुन हिणवलेलं / कीव केलेली अस्थानी वाटली.

In reply to by चौथा कोनाडा

हिणवण्याचा उद्देश नाही. कीव म्हणण्यापेक्षा थोडे वाइट नक्कीच वाटते. कट्यारचे आर्थिक यश पाहिल्यानंतर वर्षानुवर्षे नाट्यप्रयोग करणार्याना सिनेमाइतका आर्थिक फायदा झाला असेल का , असा विचार येऊन थोडे वाईट वाटले होते. कुणालाही दुखावण्याचा उद्देश नाही. क्षमस्व.

In reply to by manguu@mail.com

भावना पोहोचल्या. धन्यवाद. नाटक व सिनेमा यांची प्रक्रिया, परिघ व अर्थकारण वेगवेगळे आहे, या पार्श्वभुमीवर वाईट वाटणे विस्मयकारक आहे.

काटकोन त्रिकोण पाहीले आहे. अत्यंत अप्रतीम आहे ते. विवेक बेळेंच्या इतर नाटकांप्रमाणेच अनेक शक्याता दाखवणारे व शेवट आपल्यावर सोडणारे, तरीही लेखकाला अपेक्षित शेवट ठळक करणारे. चित्रपट त्या उंची पर्यंत जाईल का नाही ही शंका आहे. पण कास्ट पाहुन चित्रपट उत्तम जमला असणार. त्या मुळे पाहीनच.

मलाही एकांगीच वाटला बर्‍यापै़की ठिकाणी. काटकोन त्रिकोण नावाचं नाटक या आशयाचं होतं माहीत नाही, तरी शेवटचं वाक्य मोहन आगाशेंच्या तोंडून कुठे ऐकलं होतं असं वाटत होतं.

सिनेमा एकांगी वाटला पण ती माध्यमाची गरज असावी. सिनेमी बराचसा नाटकासारखाच वाटतो, एकाच खोलीत आहे, भरपूर संवाद आहेत. पाच दहा मिनिटे सोडले तर प्रत्येक सीनमधे नाना आहे. कथा पटकथा संवाद डॉ विवेक बेळे यांचेच आहे.

आपला माणूसची बलस्थाने: १. चटपटीत संवादः संवाद अतिशय टाळ्याखेचू, खमंग आहेत. त्यामुळे सिनेमात शेवटपर्यंत इंटरेस्ट राहतो. २. सुमीत, इरावती आणि इन्स्पेक्टर झालेल्या नानाचा अभिनय ए वन. ३. एकाच घटनेकडे बघण्याचे तीन वेगवेगळे दृष्टीकोन मस्त दाखवलेत, तीनही शक्यता वेळोवेळी खर्‍या वाटतात. रहस्य बर्‍यापैकी टिकून राहते. कच्चे दुवे: १. म्हातार्‍याच्या भुमिकेतला नाना: डोस्क्यात जातो तो थेरडा. त्याची कुठलीही गोष्ट पटत नाही. जीभ कृत्रीमरित्या जड करून संवाद बोलण्याची नानाची लकब आता घाणेरडे रूप धारण करते आहे. माझ्या ओळखीतला एकही म्हातारा असं बोलत नाही. राजवाडेंनी त्याला 'नटसम्राट' मोडमधून बाहेर खेचायला पाहिजे होतं.. २. मेलोड्रामा: जाउ दे काय बोलावं.. निखळ रहस्य नाही चालत आपल्या लोकास्नी असं वाटतंय ३. अजय देवगनला कशाला आणलाय मरायला काय माहित?

आपल्या सर्वांच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद. मला देखील हा सिनेमा एकांगी वाटला. अर्थात सर्वांचा अभिनय best आहे. त्यामुळे शेवटपर्यंत सिनेमा खिळवून ठेवतो

अभिनय सगळ्यांचाच उत्तम झाला आहे. इरावति हर्षे माझ्या आवडत्या अभिनेत्री आहेत,त्यांना बघून छान वाटले. पण वर म्हणल्या प्रमाणे अतिशय एकांगी लेखन झालंय कथेचं(पट कथेचं..?). साधारण दहा वर्षांपूर्वी आलेल्या नाटकावर बेतलेल्या या सिनेमात आत्ताच्या काळानुरूप बदल करावेसे का वाटले नाहीत देवजाणे. त्या वेळेला जी 'मधली पिढी' होती, ती कदाचित सिनेमात दाखवल्या प्रमाणे 'मोठ्या पिढी'ला वागणूक देत असेल आणि vice versa. पण सिनेमातली जी म.पि. दाखवली आहे ती खरं म्हणजे आत्ताची नवी पिढी आहे पण त्यांचं वागणं पूर्वीच्या मधल्या पिढी सारखं आहे. आत्ताची न.पि. मोठ्या पिढीचं एवढं ऐकून घेईल? दुसरं म्हणजे आत्ताच्या न.पि. ला किती ठिकाणी तडजोडी कराव्या लागतात ते त्यांनाच माहितेय. स्वतःच्या मुलाला कोण सुखासुखी हॉस्टेल ला ठेवेल? दुसरं म्हणजे आत्ताची मोठी पिढी खूप मजेत जगते.आणि त्या आज्जी आजोबांना आपल्या मुला-सुनेचे कष्ट दिसतात, त्यांचं कौतुक सुद्धा आहे. लेखकाने या गोष्टीचा नीट विचार केला नाहीये. त्यांनी नुसता गोष्टीतला काळ बदलला पण लोकांचे विचार , राहणीमान यात फरक झाला आहे याकडे दुर्लक्ष केलं. आणखी खटकलेली गोष्ट म्हणजे स्वतः च्या वडलांच्या खुनाचा आरोप एक चांगला/यशस्वी वकील (आणि त्याची बायको सुद्धा )ऐकून कसा घेतो? बचावच नाही काही...हे नाही पटत. शिवाय चणे दाणे खातानाचे आणि पेयाचे घुटके गिळतानाचे आवाज ऐकवत नाहीत. साऊंड वाले डुलक्या घेत होते बहुतेक. एवढ्या अपेक्षा का ठेवल्या मी...असंही विचारतील लोक. पण एकतर नानाचा सिनेमा, त्याचे छोटे तुकडे जे दाखवत होते त्यांनी खरच वाटलं होतं की वेगळी गोष्ट आहे. असो.

तिन्ही मुख्य कलाकारांचे कसदार अभिनय या व्यतिरिक्त नावाजण्यायोग्य काही नाही. त्यातही नानाची संवाद फेकीची एकसुरी ढब आता कंटाळवाणी वाटू लागलीय. त्याला दुहेरी भूमिका देण्याचे प्रयोजनही लक्षात येत नाही. (मूळ नाटक मी पाहिलेलं नाही, तरी नाटकात मोहन आगाशेंनी दुहेरी भूमिका केली होती म्हणून चित्रपटात दुहेरी भूमिकाच असायला हवी असे नाही). राहुल (नायक) आणि भक्ती (नायिका) दोघांचाही मित्र असलेल्या नितीनचे आणि भक्तीचे लफडे असावे असा संदेहाचा आणखी एक भोवरा विनाकारण फिरवण्याचा केलेला प्रयत्न केविलवाणा वाटतो. एवढ्या अपेक्षा का ठेवल्या मी...असंही विचारतील लोक, लोक कशाला मीच स्वतःला विचारतोय.

एकदम मस्त, खुर्चीला खिळवून ठेवणारे रहस्य प्रभावीपणे मांडलंय . सतीश राजवाडेचा पहिलाच मला अतिशय आवडलेला चित्रपट. कलाकारांचा अभिनय, संवाद सगळं काही उत्तम. इरावती हर्षे सुंदर दिसतेय (कासवमध्ये दिसली त्यापेक्षा खूप उजवी... अर्थात कासव मधलं पात्र वेगळं होतं) सुंदर व्यक्तिमत्वाखेरीज तिचा आवाज आणि संवादफेक ही पण तिची सामर्थ्यस्थळं आहेत. बाकी चित्रपटातून दिलेला कौटुंबिक संदेश मात्र नेहमीचाच .. आणि वर म्हंटलंय तसा काहीसा एकांगी. पण त्याकरिता हा चित्रपट पाहिला जात नाहीये , तो रहस्य , अभिनय , संवाद यासाठी पाहिला जातोय असे मला वाटते. अलिकडच्या मराठी चित्रपटांत खूप अपेक्षा ठेवून बघितलेल्या कासवाने घोर निराशा केली तर किमान मनोरंजनाची अपेक्षा ठेवलेली असताना आपल्या मानसाने पुरेपुर मनोरंजन केले.

डॉ विवेक बेळे यांची नाटके A1 असतात पण सिनेमा रुपातंर नेहमीच फसतं

कलाकारांचा अभिनय वगळता चित्रपट आवडला नाही. कथा अतिशय ओढून ताणून उभी केल्यासारखी वाटली. आणि चित्रपटात म्हटल्यासारखं गुन्हेगार कोण आहे हे आधीच ठरवल्यावर हवे तसे पुरावे तयार करता येतात, तसं एकाच पिढीला गुन्हेगार ठरवूनच कथा उभी केल्यासारखी वाटते. कथेमध्ये अनेक लूपहोल्स राहिले आहेत. नानाच्या तोंडी दिलेली ग्राम्य भाषा अनावश्यक वाटते. आणि एंडला अजय देवगांचा पिक्चर असल्यामुळे तोही आलाच हे अपेक्षितच होते. सिनेमा पाहून आलेल्या अनेक जणांनी अगदी पुन्हा पुन्हा रेकमेंड केला म्हणूनच गेलो . लोकांना का आवडला पिक्चर कुणास ठाऊक. कदाचित आम्हीच तेवढं का सहन करायचा हा भाग अधिक असेल.. :D हाच मेसेज व्हेंटिलेटर मध्ये किती हटके पद्धतीने दाखवलाय..

तर किमान मनोरंजनाची अपेक्षा ठेवलेली असताना आपल्या मानसाने पुरेपुर मनोरंजन केले. >>>>> +१११ खिळवून ठेवतो हे नक्की.

आपला मानूस पाहिला. अडीच तासातले जवळ जवळ सव्वा-दोन तास अब्बास-मस्तान चा सिनेमा बघतोय असं वाटावं इतके ट्विस्ट्स होते. त्या मानानं शेवट अगदीच पकाऊ वाटला. तरूण पिढीचा, आई-वडिलांशी तुटलेला संवाद आणी तरूण पिढीचा बेजवाबदारपणा, हा विषय अनादि-अनंत आहे. नाना पाटेकर भावखाऊ रोल मधे चांगला वाटतो, पण त्या शेवटच्या patronizing टोन मधे उपदेश करायला लागला की पकायला होतं. अजय देवगण चा सुभाष घई झालाय (स्वतःच्या सिनेमा मधे एका फ्रेम पुरतं चमकायचं). अर्थात मराठी सिनेमासाठी तो मोठा एक्स फॅक्टर वगैरे असावा.

मुळात काटकोन त्रिकोण ज्या काळात लिहीली गेले त्या काळात हा विषय नुकताच आकारास येत होता. परंतु आताच्या काळात नव्या पिढीसोबत जुन्या पिढीचेही वागणे चुकत असते हे मान्य होत आहे. व प्रत्येक वेळी नव्या पिढीली दोष देणे योग्य नाही हे देखील सर्वमान्य होत आहे. मध्यंतरी लोकसत्तामध्ये एक संपादकीय वाचनात आलं की जागतिकीकीरणाबरोबर स्पर्धेत धावायला पालकच शिकवतात मग त्या बरोबर येणाऱ्या फायदा व तोट्याचीही जबाबदारी पालकांनी घेतली पाहिजे. आपणच मुलांना महत्वाकांक्षि बनवायचे आणि नंतर येणाऱ्या एकटेपणाबाबत नव्या पिढीला दोष द्यायचा हा पालकांचा दुटप्पीपणा आहे, असा काहीसा त्याचा सूर होता. मुळात जुन्या पिढीची जबाबदारी टाळू नये हे सर्वमान्य असले तरी याबाबत जुन्यापिढीनेदेखील नव्या पिढीसोबत अहंभाव बाजूला ठेवून जुलवून घेणे आवश्यक आहे. या सिनेमात नाना पाटेकर म्हणतो माझा मुलगा सिलिकॉन व्हॅलित आहे. पण त्याला तिथे जायची प्रेरणा कोणी दिली व तसंच तो तिथे एकटाच गेला असताना या माणसाला नोकरी सोडून तिथे त्याच्या मुलाला सोबत करण्याापासून कोणी रोखले होते असा विचार येतो.

विवेक बेळे यांच्या काटकोन त्रिकोणचा अगदी पहिला प्रयोग पाहिला होता. मोहन आगाशे, केतकी थत्ते आणि स्वतः डॉक्टर बेळे या सर्वांचाच अभिनय अतिशय उत्कृष्ट होता. बहुधा नाटकामधे गिरीश जोशी यांचाही काही सहभाग असावा. त्यामुळे गिरीश जोशी, रसिका जोशी यांची देखील तिथे येजा सुरू होती. प्रायोगिक स्वरूप होते. प्रतिसाद कसा मिळतो आहे हे पाहून मग व्यावसायिक प्रयोग सुरू झाले. माकडाच्या हाती शॅम्पेन हेदेखील विवेक बेळे यांचे उत्तम नाटक होते. ही दोन्ही नाटके माणसाच्या मनात आत डोकावणारी आहेत असे वाटते. ते नाटकही चित्रपटामधे रूपांतरित झाले होते. एकच शंका आहे आपला मानूस हा सदाशिव-ग्रामीण चित्रपट आहे का ? म्हणजे शहरी लोकांनी केलेला ग्रामीण भाषेतला चित्रपट.

In reply to by आशु जोग

उलट तो अगदीच शहरी चित्रपट आहे. त्यातील विषयही शहरी लोकांच्या जास्त जवळचा. केवळ नाना पाटेकर ग्रामीण बाजात बोलतात. पण ते मला काही आवडलेलं नाही. ते नैसर्गिक वाटलं नाही.