Skip to main content

कॅशलेस अर्थव्यवस्था आणि चोरी/भ्रष्टाचार

लेखक मिल्टन यांनी मंगळवार, 24/10/2017 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण चार महिन्यांपूर्वीची गोष्ट. संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतत होतो आणि कुर्ला स्टेशनवर नव्या मुंबईकडे जाणार्‍या लोकल ट्रेनची वाट बघत होतो. बर्‍याचदा संध्याकाळी भूक लागली की मी स्टेशनवरून खायला एखादा बिस्किटाचा पुडा घेतो.त्याप्रमाणे त्या दिवशी मी एक बिस्किटाचा एक पुडा घेतला. तो पुडा होता १० रूपयाचा. मी त्या स्टॉलवाल्याला १०० ची नोट दिली. वरचे पैसे परत देताना त्याने ५० ची एक नोट दिली आणि २० रूपयाच्या दोन नोटा दिल्या. तेवढ्यात माझी गाडी आली त्यामुळे त्या नोटा घेऊन घाईघाईतच मी गाडीत चढलो. नंतर लक्षात आले की त्या ५० रूपयाच्या नोटेला एका बाजूला पूर्ण भागावर लाल रंग लागला होता आणि त्यामुळे कोणीही ती नोट घेणे शक्य नव्हते. दुसर्‍या दिवशी मी त्या स्टॉलवाल्याला त्या नोटेविषयी विचारले असता त्याने अपेक्षेप्रमाणे ती नोट दिल्याचेच नाकारले. विनाकारण ५० रूपयाचा खड्डा पडला. हा प्रकार म्हणजे माझी झालेली फसवणूकच होती. त्याची चांगली ४ दिवस चुटपुट लागून राहिली होती. वास्तविकपणे ५० रूपये ही ४ दिवस चुटपूट लागावी इतकी मोठी रक्कम होती का? नक्कीच नाही. तरीही चुटपूट लागायची ती लागलीच. आपल्या चुकीने पैसे गमाविण्यापेक्षा दुसर्‍या कोणी फसविल्यामुळे पैसे गमावायला लागले त्याचे दु:ख कितीतरी जास्त असते. ते कारण होते का? तर तसेही वाटत नाही. कारण अशाप्रकारे इतर कोणी फसविल्यामुळे यापूर्वीही असे पैसे गमावले होते आणि त्यावेळी इतकी चुटपूट लागली नव्हती. अशाप्रकारची दोन उदाहरणे पटकन लक्षात आली. पहिले उदाहरण होते २००८ मधील. माझ्या आईच्या फोनवरील प्रिपेड कार्ड रिचार्ज करायला मी आय.सी.आय.सी.आय बँकेच्या खात्यातून १०० रूपये ऑनलाईन बँकिंगद्वारे भरले होते. माझ्या खात्यातून पैसे तर गेले पण रिचार्ज शेवटपर्यंत झालेच नाही. बँकेत विचारले तर ते म्हणत होते की फोन कंपनीला विचारा आणि फोन कंपनी म्हणत होती बँकेला विचारा. मधल्यामध्ये माझे मात्र नुकसान झाले. २००८ मधील माझी एकूण परिस्थिती आणि उत्पन्न लक्षात घेता त्यावेळच्या १०० रूपयांचे मला २०१७ मधील ५० रूपयांपेक्षा कितीतरी जास्त महत्व होते. तरीही त्या फसवणुकीची मला ४ दिवस चुटपूट लागल्याचे लक्षात नाही. दुसरे उदाहरण म्हणजे २०१५ मधील. फोनवर मी यु.टी.एस म्हणून एक अ‍ॅप डाऊनलोड केले होते. त्या अ‍ॅपद्वारे फोनवर मुंबईतील लोकल ट्रेनची तिकिटे काढता येतात. फोनवरील जी.पी.एस वरून आपण नक्की कुठे आहोत हे ट्रॅक करून आपण जर स्टेशनच्या १ किलोमीटर त्रिज्येच्या अंतरात असू तर तिकिट फोनवर काढता येईल असे त्या अ‍ॅपविषयी ऐकले होते. त्या अ‍ॅपवरील वॉलेटमध्ये मी २०० रूपये टाकले. माझे घरही स्टेशनच्या १ किलोमीटर त्रिज्येच्या अंतरात असल्यामुळे माझी कल्पना होती की मला घरूनही तिकिट काढता येईल. अगदी घरून नाही तरी स्टेशनला जात असताना तरी तिकिट नक्कीच काढता येईल अशी माझी अपेक्षा होती. पण कुठचे काय. कुठेही असले तरी 'स्टेशनच्या जवळ जा आणि मग तिकिट काढा' हेच पालुपद त्या अ‍ॅपने चालू ठेवले. शेवटी वैतागून मी ते अ‍ॅप अन-इन्स्टॉल करून टाकले. अर्थातच त्या अ‍ॅपच्या वॉलेटमधील २०० रूपयेही गेले. या गोष्टीची मला किती वेळ चुटपूट लागली होती? तर फार वेळ नाही. या तीन उदाहरणात झालेली फसवणुक हा एक समान घटक असला तरी एक महत्वाचा फरक आहे. पहिल्या उदाहरणात मी रोख पैसे दिले होते आणि मला फटका बसला होता तो रोख स्वरूपात बसला होता. तर उरलेल्या दोन उदाहरणात बसलेला फटका कॅशलेस होता. हा फरक वगळता तीनही उदाहरणात फार फरक नव्हता. उलट बसलेल्या फटक्याची रक्कम पहिल्या उदाहरणात बरीच कमी होती तरीही त्याची चुटपूट मला कितीतरी जास्त प्रमाणात लागली होती. हे का होत असावे? कुर्ला स्टेशनवर फटका बसण्यापूर्वी मी एम.आय.टी चे प्राध्यापक डॅन एरिअली यांचे Predictably Irrational हे एक नितांतसुंदर पुस्तक वाचले होते. त्या पुस्तकात त्यांनी केलेल्या प्रयोगाचा उल्लेख केला आहे. त्यांनी एम.आय.टी च्या विद्यार्थ्यांच्या डॉर्ममधील फ्रिजमध्ये एक डॉलर किंमतीच्या दहा कोकच्या बाटल्या ठेवल्या. आठवड्याभराने त्यांनी त्या बाटल्या तिथे आहेत का हे तपासले असताना एकही बाटली तिथे राहिली नव्हती. याचाच अर्थ कोणीतरी त्या बाटल्या लंपास केल्या होत्या. दुसर्‍या प्रयोगात त्याच फ्रिजमध्ये त्यांनी एक डॉलरच्या दहा नोटा ठेवल्या. आठवड्याभराने परत तपासले असताना त्यांना आढळले की सगळ्या नोटा जिथल्या तिथे होत्या. एकही नोट लंपास झाली नव्हती. म्हणजेच एक डॉलर किंमतीच्या कोकच्या बाटल्या हातोहात लंपास झाल्या पण नोटा मात्र जशाच्या तशा राहिल्या. एक डॉलरच्या कोकच्या बाटलीची चोरी करण्यात संबंधित व्यक्तींना आपण फार काही वावगे करत आहोत असे वाटलेही नसावे पण एक डॉलरच्या नोटेची चोरी करताना मात्र ती नोट घेऊन आपण काहीतरी चुकीचे करू असे त्यांना नक्कीच वाटले असणार. अन्यथा त्या नोटा तशाच तिथे राहिल्या याची कारणमिमांसा देता येणार नाही. याचा अर्थ काय?प्राध्यापक डॅन एरिअली म्हणतात की रोख रक्कम आणि तितक्याच किंमतीची वस्तू या दोन गोष्टींविषयी आपली मानसिकता वेगळी असते. जेव्हा रोख रकमेचा संबंध असतो तेव्हा आपल्या विवेकाची अधिक टोचणी आपल्याला लागते. पण एखादी गोष्ट जितक्या प्रमाणात रोख स्वरूपापासून दूर जाते तेवढ्या प्रमाणात आपल्या विवेकाचे आपल्यावरील नियंत्रण कमी होत जाते. कुर्ला स्टेशनवरील त्या घटनेनंतर मला जाणवले की नुसत्या चोरीच्या बाबतीत नाही तर नुकसानीच्या बाबतीतही नेमके असेच घडत असावे. म्हणजे रोख नुकसान झाल्याची चुटपूट आपल्याला कॅशलेस नुकसान झाल्यापेक्षा जास्त लागते का? बहुतेक तसेच असावे. अर्थात माझ्या या लेखाचा विषय नुकसान हा नाही तर भ्रष्टाचार (म्हणजे चोरीच) हा आहे. ही घटना त्या दृष्टीने विचार करायला लावणारा केवळ एक ट्रिगर होता. मी त्या पुस्तकातील संबंधित भाग परत एकदा वाचून काढला. कुर्ला स्टेशनवरील घटना घडण्यापूर्वी केवळ एक चांगला (आणि मनोरंजक) अभ्यास यापेक्षा जास्त महत्व मी त्या भागाला देत नव्हतो. त्यातील अनेक गोष्टी नंतर अधिक प्रमाणात पटायला लागल्या. प्राध्यापक डॅन एरिअली म्हणतात त्याप्रमाणे आपण ऑफिसच्या स्टेशनेरीमधून पेन घेतले आणि आपल्या स्वतःच्या कामांसाठी वापरले असे किती वेळा होते? ऑफिसचे पेन घेऊन ते आपल्या स्वतःच्या कामांसाठी वापरले तरी ती कंपनीमधून केलेली चोरीच असते. तरीही आपण तसे करताना काही चुकीचे करत आहोत हा विचारही आपल्या मनाला बर्‍याचदा शिवत नाही. समजा आपण घेतलेले पेन १० रूपयांचे आहे असे धरून चालू. आपल्यापैकी किती जण कंपनीमधील पेटी कॅशमधून १० रूपयाची नोट उचलून ती आपल्या खिशात घालतील? मला वाटत नाही की आपल्यापैकी कोणीही तसे करेल. म्हणजेच काय तर रक्कम सारखीच असली तरी तेवढ्याच रकमेच्या नोटेची चोरी करायचा आपण विचारही करू शकणार नाही. याचे कारण आपली विवेकबुद्धी रोख रक्कम आणि रोख रकमेपेक्षा दूर असलेली गोष्ट यांच्यात फरक करते. मी नक्की कोणत्या रोखाने बोलत आहे हे एव्हाना मिपाकरांच्या लक्षात आलेच असेल. एखादी गोष्ट जेवढी रोख रकमेपेक्षा दूर जाते तितक्या प्रमाणात आपल्याच विवेकबुध्दीचे आपल्यावरील नियंत्रण कमी होते. बरं आतापर्यंत मी जी उदाहरणे दिली आहेत त्यातील रक्कम किरकोळ होती (५० रूपये, १० रूपये इत्यादी). मोठ्या रकमेचा संबंध असेल तर आपली (आपली म्हणण्यापेक्षा माणसाची) विवेकबुध्दीची टोचणी जास्त लागून ती चोरी टाळण्याकडे कल असेल का? असेलही कदाचित. प्राध्यापक डॅन एरिअलींनी आणखी एक प्रयोग केला होता आणि त्यात निष्कर्ष निघाला की संधी मिळाल्यास आणि पकडले जाणार नाही याची बर्‍यापैकी खात्री असेल तर बहुतांश लोकांचा फसविण्याकडे कल असतो. पण असे फसविणे अमर्याद नसते. म्हणजे बहुसंख्य लोकांचा फसविण्याकडे कल जरी असला तरी ते मऊ लागले म्हणून कोपरापासून खणत नाहीत आणि थोडेसेच फसवितात. याचे कारण काय---तर एका मर्यादेपेक्षा जास्त फसवणुक करताना माणसाच्याच विवेकबुध्दीची टोचणी लागते असे म्हणायला हरकत नसावी. म्हणजे हा निष्कर्ष म्हणजे मी म्हणत आहे त्याचा विरोधाभास झाला का? वरकरणी तसे वाटू शकेल. पण यातही काही गोष्टींचा विचार करायला हवा. सगळ्यात महत्वाचे म्हणजे 'एका मर्यादेपेक्षा कमी' ही बरीच फसवी संकल्पना आहे. समजा ५ रूपयांची चोरी ही ती मर्यादा असेल आणि ती एकदा गाठल्यावर ५ रूपयांची मर्यादा वाढून १० मग २० मग ५० मग १०० रूपये व्हायची शक्यता आहेच. आपल्यासारख्यांना (किमान माझ्यासारख्यांना) चोरी करायचीच असेल तर फार तर एखादे पेन चोरणे किंवा गेलाबाजार खोट्या रिसीट्स देणे, इकॉनॉमी क्लासने जाऊन बिझनेस क्लासचे तिकिट घेणे यापेक्षा फार मोठी उडी सध्या तरी मारता येणार नाही. पण मोठ्या अधिकाराच्या व्यक्तींकडे चोरी करायच्या बर्‍याच जास्त संधी उपलब्ध असतात. आणि जर का 'एका मर्यादेपेक्षा जास्त' चोरी करायची नसेल तरी ती मर्यादा अमर्याद वाढू शकेल इतके अधिकार आणि संधी त्यांच्याकडे असतात. याचे सर्वात योग्य उदाहरण म्हणजे एनरॉनचा घोटाळा.कॉर्पोरेट अमेरिकेमधील २००१ मधील तोपर्यंतचा हा सर्वात मोठा घोटाळा होता. हा घोटाळा काही शे बिलिअन डॉलर्सचा होता. अर्थातच इतका घोटाळा काही एका रात्री झालेला नाही. अकाऊंटिंगमधील घोटाळे त्यापूर्वी कित्येक वर्षे सुरू झाले होते. आपली चोरी पकडली जात नाही म्हटल्यावर हळूहळू धीर चेपून आधीचे घोटाळे पचवून केनेथ ले आणि इतरांनी अधिकाधिक मोठे घोटाळे केले असतील हे म्हणायला नक्कीच जागा आहे. भारतातही रामलिंग राजूने सत्यममध्ये प्रत्यक्षात कंपनीत कामाला नसलेले १२ हजार कर्मचारी दाखवून त्यांचे खोटे सॅलरी अकाऊंट तयार करून त्या खात्यांमध्ये येणारे पैसे स्वतःच्या खिशात घातले होते असे म्हणतात. आता रामलिंग राजूने अशी चोरी एका रात्रीत सुरू केली का? तसे वाटत नाही. सुरवात कदाचित १०० खोट्या सॅलरी अकाऊंटमधून झाली असेल. मग हळूहळू धीर चेपून आणखी खोटे अकाऊंट त्याने तयार केले असतील हे म्हणणे अधिक सयुक्तिक वाटते. तेव्हा 'एका मर्यादेपेक्षा' जास्त मोठी चोरी करताना विवेकबुध्दीची टोचणी लागते हे म्हणणे 'त्या मर्यादेपर्यंतच' लागू ठरेल. महत्वाची गोष्ट म्हणजे ती मर्यादा अधिकाधिक वाढत जायची शक्यता आहेच. आपल्यापैकी कोणी मोठा रामलिंग राजू होईल याची शक्यता फारच थोडी. पण माझा मुद्दा हा आहे की असे छोटे रामलिंग राजू आपल्या अवतीभोवती (कदाचित आपल्यातच) लपलेले असतात. मी अमेरिकेत असताना (२००३ मध्ये) मी ज्या विद्यापीठात होतो त्या विद्यापीठातील भारतीय विद्यार्थ्यांना डॉट. कॉम क्रॅशमधून नुकत्याच सावरणार्‍या अमेरिकन अर्थव्यवस्थेत भारतातील पूर्वीचा आय.टी अनुभव नसेल तर नोकरी मिळणे कठिणच होते. खोटे सी.व्ही बनविणार्‍या एजंटांचे प्रस्थ त्यावेळी तितक्या प्रमाणात आमच्या विद्यापीठात आलेले नव्हते. अशावेळी अनेक भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत नोकरी न मिळाल्यामुळे भारतात परत जावे लागले होते. जाताना अशा अनेकांनी क्रेडिट कार्डावरील बिले न भरताच भारतात प्रयाण केले होते (काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही रक्कम एकापेक्षा जास्त कार्डांवर मिळून १० हजार ते १५ हजार डॉलर्सपर्यंत होती) हे भारतीय विद्यार्थ्यांच्या कम्युनिटीमध्ये अगदी उघडे गुपित होते. अशा काही विद्यार्थ्यांना मी स्वतः ओळखतो. त्यांनी १० ते १५ हजार डॉलर्स काय तर इतरांचे १० रूपयेसुध्दा रोखीमध्ये चोरले नसते. तरीही असे काही हजार डॉलर्स चोरण्यात आपण काही चुकीचे करत आहोत ही जाणीव त्यांच्याकडे असली तरी ती जाणीव ती कृती करण्यापासून रोखण्याइतकी प्रबळ नव्हती. वॉलमार्टमध्ये एखादी वस्तू वापरायची आणि मग ती परत करायची असे करणारे लोक आपणही आजूबाजूला बघितले असतीलच. ती पण एका अर्थी चोरी झाली नाही का? पण तरीही असे लोक २०-५० डॉलरची रोखीत चोरी कधीच करणार नाहीत हे आपल्यालाही जाणवेलच. एनरॉन घोटाळ्यात समजा अमेरिकेतील प्रत्येक माणसामागे सरासरी १०० डॉलर्सचे नुकसान झाले असे समजू. केनेथ ले आणि इतरांनी रस्त्यात दिसलेल्या कोणाही माणसाचे पाकिट मारून त्यातील १०० डॉलर्स चोरले असते हे जरा असंभवनीयच वाटते. आता वळू कॅशलेस जगताकडे. मागच्या वर्षी ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी जाहिर केली आणि त्यामागे कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देऊन भ्रष्टाचार कमी करणे हे एक कारण आहे असे म्हटले गेले होते. पण माझा दावा असा आहे की वर दिलेल्या उदाहरणांवरून आपल्याला दिसते की रोख रक्कम आणि रोख रकमेपेक्षा दूर असलेल्या गोष्टी (वस्तू किंवा ऑनलाईन नेटबँकिंगद्वारे केलेले व्यवहार) यांच्यात आपल्याच विवेकबुध्दीचे आपल्यावरील असलेल्या नियंत्रणाचे प्रमाण वेगळे असते. अशावेळी समजा सगळे व्यवहार कॅशलेस झाले (भारतात सध्या तरी तसे होणे कठिणच आहे पण समजा अजून ५० वर्षांनी ते शक्य झाले) तर भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढू शकेल का? आपण अगदी लहानपणापासून रोख रकमेला पैसा म्हणूनच ओळखतो आणि वर दिलेल्या उदाहरणांवरून लक्षात येईल की ऑनलाईन/कॅशलेस व्यवहारांमध्ये आपल्या विवेकबुध्दीचे आपल्यावरील नियंत्रण रोख रकम हाताळताना असते तितक्या प्रमाणात नसते. तरीही आपल्यावर ऑनलाईन/कॅशलेस व्यवहारात विवेकबुध्दीचे जितके कितके नियंत्रण असते त्यात 'हा पण पैसाच आहे' ही भावना असेल का? आणि जर मुळात रोख रक्कम हाताळलीच नाही तर 'हा पण पैसाच आहे' ही भावना आणखी कमी होऊ शकेल का? सुरवातीला जर लहान कॅशलेस चोरी केलेली पकडली गेली नाही म्हणून धीर चेपत मोठ्या चोर्‍या व्हायला लागल्या आणि मुख्य म्हणजे रोख रक्कमेचा संबंध नसेल तर अजून जास्त मोठे घोटाळे केले जायची शक्यता आहे का? कोणी म्हणेल की अकाऊंटिंग मधील घोटाळे पहिल्यापासूनच 'कॅशलेस' होते. मग कॅशलेस अर्थव्यवस्था आणल्यामुळे त्यात होणार्‍या भ्रष्टाचारात काय मोठा फरक पडेल? त्यावर माझे म्हणणे असे की जर पूर्ण कॅशलेस व्यवहार झाल्यास पूर्वीपेक्षा अधिक लोकांना असे घोटाळे करायची संधी मिळेल कारण पूर्वी असे मार्ग मोठ्या पदांवरील लोकांनाच खुले होते पण सगळे कॅशलेस झाल्यास नेटवर्क आणि आय.टी यामुळे जास्त लोकांना तो मार्ग खुला होईल. त्यातच रोखीत व्यवहार नसतील तर अनेक लोकांच्या विवेकबुद्धीचे नियंत्रण ढिले पडेल. हे करता येणे कसे शक्य होईल? मी काही चोर नाही त्यामुळे असे करता येणे कसे शक्य होईल याविषयी माझ्या कल्पनाशक्तीची उडी मर्यादितच असेल. तरीही आपण जिथेजिथे पैसे भरतो (स्टोअरमधून सामान विकत घेताना किंवा अन्य कुठेही) तिथेतिथे संबंधीत व्यवसाय करणार्‍या कंपनीला आपल्याला गंडा घालायची संधी अधिक प्रमाणात मिळेल ही भिती आहे.आपण महिन्याभरात कित्येक व्यवहार करत असतो. समजा हे सगळेच व्यवहार कॅशलेस असतील तर त्याचे कुठेतरी (बँक खात्यात किंवा क्रेडिट/डेबिट कार्डात) स्टेटमेन्ट येईल. असे कित्येक व्यवहार असतील तर काही व्यवहारात आपल्याला गंडा घातला गेला तरी तो आपल्याला लक्षातही येणार नाही. आणि त्यातून सगळे कॅशलेस असेल तर गंडा घालणार्‍यावर त्याच्या विवेकबुध्दीचे नियंत्रण काही प्रमाणावर ढिले पडलेले असेल ही शक्यता आहे आणि कॅशलेस गंडा पडल्यास आपल्यालाही त्याविषयी तितक्या प्रमाणावर दु:ख न वाटल्यास आपणही ते प्रकरण तडीस न्यायचा प्रयत्न करूच असेही नाही. असा गंडा घालण्यासाठी फार काही करायला लागेल का? कदाचित आय.टी सिस्टिममध्ये बॅक-एन्डला थोडे फेरफार केले तरी तसा गंडा घालता येऊ शकेल. आतापर्यंत असे घोटाळे करणार्‍यांनी घोटाळे करायचे नवेनवे मार्ग शोधून काढले आहेतच. १९९५ मध्ये नीक लिसन या एकट्या ट्रेडरने २३० वर्षे जुनी बेरिंग्ज बँक बुडवली. ज्या ट्रेडमध्ये तोटा होईल असे ट्रेड तो ८८८८८८८८ या खोट्या खाते क्रमांकात तो पोस्ट करत असे आणि ज्या ट्रेडमध्ये फायदा होईल असे ट्रेड तो कंपनीच्या अकाऊंटमध्ये पोस्ट करून कंपनीला मोठा फायदा करून दिल्याचे श्रेय घेऊन स्वतः गलेलठ्ठ बोनस घेत असे. जोसेफ जेट या ट्रेडरने किडर पीबॉडी कंपनीतील सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या बगचा गैरफायदा उठवून कंपनीने न केलेला फायदा दाखवून त्यानेही त्याचे श्रेय स्वतःकडे घेऊन असाच गलेलठ्ठ बोनस घेतला होता. नीक लिसन आणि जोसेफ जेट यांचे ग्रह फिरले म्हणून त्यांचे कृत्य उघडकीस आले. पण कदाचित त्यांच्या नंतरच्या ट्रेडमध्ये फायदा झाला असता तर ते आपले चोरीचे कृत्य लपवूही शकले असते आणि ते कोणाला समजलेही नसते. आजही असे किती नीक लिसन आणि जोसेफ जेट आहेत कुणास ठाऊक. माझी भिती ही आहे की सगळ्या गोष्टी कॅशलेस झाल्यास पूर्वी मूठभर ठिकाणी अशा फसवणुक करायच्या संधी उपलब्ध होत्या त्या इतर अनेकांना उपलब्ध होतील. त्यातून रोखीत व्यवहार कधी केलेच नसतील आणि त्यामुळे विवेकबुध्दीचे नियंत्रण ढिले पडले तर त्यामुळे अधिक प्रमाणावर आणि वेगवेगळ्या पध्दतीने भ्रष्टाचार होऊ शकेल ही भिती वाटते. घोटाळे करणारे प्रत्येकवेळी नवीन नवीन मार्ग शोधून काढतीलच. तो मार्ग आजही उपलब्ध असला तरी सध्या रोखीत व्यवहार केल्यामुळे काही प्रमाणात तरी विवेकाची टोचणी असते. तीच जर का कमी झाली तर मात्र मोठ्या समस्या निर्माण होतील ही भिती वाटते. कदाचित हे सगळे स्वप्नरंजन असेलही.कदाचित यापैकी काहीही प्रत्यक्षात उतरणारही नाही. तसे झाल्यास फारच उत्तम. पण असे व्हायची शक्यता आहे का? याविषयी आपले मत काय?

वाचने 24726
प्रतिक्रिया 98

प्रतिक्रिया

In reply to by मिल्टन

हे तथाकथित सुशिक्षित आणि उच्चभ्रू लोक मात्र कोणाचे पाकिट मारताना दिसणार नाहीत पण कित्येक पटींनी मोठे घोटाळे मात्र बेमालूमपणे करतील.पाकीट मारण्यासाठी लागणारे हस्त कौशल्य त्यांच्या कडे कुठून येईल? प्रत्येक जण आपल्याला असलेल्या कौशल्याचा वापर करूनच दुसऱ्याला थुका लावत असतो. एखादा सर्जन तुम्हाला गंभीर आजार आहे असे सांगूनच अनावश्यक शल्यक्रिया करेल. किंवा एखादा वकील प्रतिपक्षाच्या वकील बरोबर साटेलोटे करून केस लांबवत नेईल आणि आपला मीटर चालू ठेवेल. तो सायबर फ्रॉड करायला जाणार नाही कारण त्यासाठी लागलेले कौशल्य त्याच्या जवळ नाही.

In reply to by सुबोध खरे

नोटा फ्रिजमध्ये ठेवल्या तर त्यात काहीतरी झोल आहे असे वाटून फ्रिजमधल्या नोटा घेतल्या नाहीत. नोटा रस्त्यावर ठेवून पहा. दोन मिनिटात लंपास होतील. तोच कोकचा कॅन ठेवून पहा साधारण कोणी त्याला हात लावणार नाही. हो, कारण असा रस्त्यावर असलेला कॅन पिऊन उगाच काही झाले तर काय हि भीती असेल पण हेच मॉल मधल्या फ्रिज मध्ये असेल तर कोणी पाहत नाही हे पाहून लंपास नक्की होईल. कोणताही आर्थिक गुन्हा आपण पकडले जाण्याची शक्यता किती आणि त्यातून होणार त्रास किती यावर अवलंबून असतो ( वैमनस्यातून केलेला खून किंवा बलात्कार असे भावनेच्या भरात केलेले गुन्हे यात धरू नका).

In reply to by सुबोध खरे

पाकीट मारण्यासाठी लागणारे हस्त कौशल्य त्यांच्या कडे कुठून येईल?
आणि समोरच्याचे पाकिट पॅन्टच्या खिशातून अगदी डोकावत जरी असले, पडत असले तरी उच्चपदस्थ लोक (जे कदाचित अकाऊंटींगमध्ये फ्रॉड करतील) ते मारायला जाणार नाहीत.
किंवा एखादा वकील प्रतिपक्षाच्या वकील बरोबर साटेलोटे करून केस लांबवत नेईल आणि आपला मीटर चालू ठेवेल. तो सायबर फ्रॉड करायला जाणार नाही कारण त्यासाठी लागलेले कौशल्य त्याच्या जवळ नाही.
वकिल नाहीच जाणार हो. पण आता कित्येक लोक आपली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी थाटून, त्याचे अ‍ॅप/वेबसाईट बनवून स्वतःचे बिझनेस काढत आहेत. अर्थात ही चांगलीच गोष्ट आहे. पण त्याबरोबरच अनोळखी, ज्यांचे अन्यथा कधीही तोंडही बघणार नाही अशा लोकांना स्मॉल टिकेट कॅशलेस फसवायची संधी त्यातून उपलब्ध होत आहे हाच मुद्दा आहे.

In reply to by मिल्टन

ऑफिसमधील नोट मात्र कधीच घेणार नाही याचे मुख्य कारण म्हणजे ऑफिस मधील प्रत्येक पैशाचा हिशेब असतो आणि तो हिशेब लागला नाही तर त्याची शहानिशा होण्याची शक्यता असते. पेन किंवा पेन्सिल या व्यय होणाऱ्या ( expendable) गोष्टी आहेत आणि एकदा त्या एखाद्याला इशू झाल्या कि त्याचा हिशेब(audit) संपतो. त्यामुळे त्या गोष्टी खिशात टाकल्या तर त्याचा गहजब होण्याची शक्यता नसते. ज्याचे पेन किंवा पेन्सिल आहज्या, ती गहाळ झाली म्हणून सोडून देण्याची शक्यता जास्त आहे. हेच ५०० ची नोट सोडून देण्याची शक्यता कमी आहे आणि २ हजाराची तर नाहीच नाही. शेवटी वस्तूची किंमत आणि त्याची जबाबदेही(अकाऊंटॅबिलिटी) हि फार महत्त्वाची आहे. पोलिसात किंवा लष्करात ५०० ची नोट हरवली तर चालते पण एक बंदुकीची गोळी हरवली तर गहजब होतो. एक ७.६२ सेल्फ लोडींग रायफल हरवली तर सैनिकाचे कोर्ट मार्शल होते आणि त्याला शिक्षा होते पण बंदुकीची किंमत म्हणून ११०० रुपये फक्त त्याच्या पगारातून वसूल होतात.

In reply to by मिल्टन

तुम्ही नक्की समस्या काय आहे ते एकदा पक्कं ठरवा हो... कारण तुमच्या प्रतिसादात पण नक्की तुम्ही कुठली बाजू घेताय हे ठरवणे कठीण जातंय.

नोटा आणि कॅशलेस ह्या दृश्य-अदृश्यतेचा फरक आहे. त्यामुळे तुम्ही म्हणताय तो प्रकार होणारच. नुसती चोरीच असं नाही पण कॅशलेस व्यवहारात आपण आपसुकच थोडे सहज (किंवा निष्काळजीपण) होतो, आणि त्यात फसवणुकीचा चान्सदेखील असतो.. मी फेसबुकच्या अ‍ॅड्समध्ये आलेल्या एका ऑफरनुसार एक पॉवरबॅन्क, जी कि फारच आकर्षक किंमतीत होती, खरेदी केली. त्यासाठी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले. ती पॉवरबॅन्क मला कधीच आली नाही. हा कॅशलेस फसवणुकीचा नमुना. दुसरं उदाहरण म्हणजे एक मिपाकर पुर्वी पुस्तकांचा व्यवसाय करायचे. त्यांनी मी ऑनलाईन विकत घेतलेली पुस्तके मला काही पाठवली नाहीत. मी 'पैसे परत करा किंवा पुस्तके परत करा' म्हटल्यावरही 'करतो, करतो..', पण अद्याप काही झालेले नाही. आता ह्यातदेखील रक्कम फारशी नाहीये, पण प्रत्यक्ष रोखीतल्या व्यवहारात हेच झालं असतं, तर जास्त झोंबलं असतं हे नुकसान.. त्यामुळे 'जोर का झटका धीरे से लगे' हे कॅशलेस व्यवहारात होण्याचे चान्सेस जास्त.. ह्यातीलच एक उदाहरण आणखी.. (हे फसवणुकीबद्दल नाही, तर 'कॅशलेसच्या अदृश्यतेमुळे सौम्य होणार्‍या' खर्चाचे आहे.) आयफेल टॉवरची टुर मी ऑनलाईन बुक केली, ८३ युरोमध्ये. आता ह्यालाच मी रोखीत दिले असते, त्यातल्या त्यात भारतीय रकमेत, तर ८३*७६ = ६,३०८ रुपये रोख मी नक्कीच मोजले नसते, आणि त्याऐवजी कमी दराचं टिकीट काढून पायर्‍या चढून वर गेलो असतो... ;-) ह्या वृत्तीचा फायदा घेऊन कॅशलेस फसवणुक किंवा चोर्‍या वाढण्याचे चान्सेस आहेत. मात्र त्याने भ्रष्टाचार वाढेल, असं वाटत नाही..

In reply to by चिगो

आपण भ्रष्टाचार नक्की कशाला म्हणतो यावर बरेच काही अवलंबून असेल. अशी फसवाफसवी किंवा चोरी हा पण एका प्रकारे भ्रष्ट असा आचारच आहे की.

In reply to by चिगो

हा कॅशलेस फसवणुकीचा नमुना. आता केवळ तंत्रज्ञान सुधारले आहे म्हणून असे होते. पूर्वी VPP ने वस्तू मागवल्या आणि आलाय नाही असे सर्रास होत असे. याच मिपाकरानी आपल्याकडून रोख पैसे घेऊन पुस्तके पाठवतो म्हणून पाठवली नाही तर तो रोखीतील घोटाळा म्हणून गणला जाईल. हा मूळ विश्वासाचा (किंवा विश्वासघाताचा) प्रकार आहे. तेंव्हा याचा आणि कॅशलेसचा संबंध नाही.

In reply to by सुबोध खरे

एक भला मोठा प्रतिसाद टाईपला होता, पण तो गंडला मिपावर. आता संक्षेपात सांगतो. कॅशलेस = अदृश्यता / तुलनात्मक बेफिकीरी as compared to cash transaction. दृष्टीआड सृष्टी attitude. कॅशलेस > COD (COD is costlier than cashless in most of the cases) ऑनलाईन = जास्त पोहच / स्केल + अनामिकता/ अदृष्यता / Out of direct physical reach ----> Easier to cheat Hence, Cashless plus online transactions give an easier opportunity with better chances of escaping culpability. This may encourage the fraudsters more. Cashless + Online transactions also provide opportunities for 'Small ticket but more voluminous' cheating. I think that is what the author wanted to say.. लेखक महोदय, तुम्हारा भी चुक्याच.. कसं आहे, 'भ्रष्टाचार' ह्या संज्ञेला लोक सरकार किंवा सरकारी लोकांशीच जोडतात.. प्रायव्हेट कंपन्या किंवा सामान्य जनतेचा तो प्रांतच नव्हे जणू.. म्हणूनच तुमच्या 'कॅशलेस'ला चोरी/घोटाळ्याशी जोडल्या जाण्याच्या संभावनेला लोकांचा कडाडून विरोध आहे. कारण की कॅशलेस तर ८ नोव्हेंबर २०१६ नंतरच आलंय, आणि सद्य सरकार तर प्रचंड भ्रष्टाचारविरोधी आहे.. तर अशी गफलत पुन्हा करु नका. (ता.क.) मी दिलेली दोन्ही उदाहरणे ८/११/२०१६ पुर्वीच घडलेली आहेत.

In reply to by चिगो

आईशप्पथ!!!! अनेक वेळा हे लिहायला घेतलं... पण इतके नेमके शब्द न सुचल्याने पोस्ट कलं नाही!!! अगदी परफेक्ट! धन्यवाद!!!

In reply to by चिगो

खरं आहे. गमतीची गोष्ट अशी कि पैसा हा प्रकारचं अस्तित्वात नसता तर ? म्हणजे आज बार्टर सिस्टीम मध्ये समाज असता तरी घोटाळे कमीच झाले असते नाही का ? १०० रुपये असणारं खिशातलं पाकीट चोरुन नेणं १-२ किलो तांदूळ चोरण्यापेक्षा सोपेच आहे. चेक सिस्टीम आली म्हणून त्या फ्रॅंक अबिग्नाली ने घोटाळा केला ना ? सगळं कॅश मध्ये असत तर चेक फ्रॉड करतांच आले नसते. एकदम सहमत.

In reply to by sagarpdy

म्हणजे आज बार्टर सिस्टीम मध्ये समाज असता तरी घोटाळे कमीच झाले असते नाही का ?/code> असाच काहीसा व्यवहार मी करायला गेलो होतो :)

In reply to by चिगो

यात पण एक फरक आहे. आपण फ्लिपकार्ट वरून काही गोष्टी मागवल्या तर तो ऑनलाईन व्यवहार होतो पण कॅश ऑन डिलिव्हरी केल्यास तो कॅशलेस होत नाही. मग आपण मोबाईल फोन मागवला आणि पाठवणाऱ्याने साबणाची वडी पाठवली( अशा केसेस झाल्या आहेत) तर हा रोखीचा व्यवहार( कॅशलेस नसताना) असून भ्र्रष्टाचाराचाच होतो. अशा बऱ्याच केसेस मध्ये अमेझॉन किंवा फ्लिपकार्टने पैसे हि परत केले आहेत. यातही एका डांबरट बाईंनी या २४ तासात वस्तू परत करण्याच्या नावावर अमेझॉनच्या ७० लाख रुपयाचा गंडा घातला (आता ती पकडली गेली हा भाग वेगळा) थोडक्यात काय भ्रष्टाचार आणि कॅशलेस याचा काहीही संबंध नाही.

In reply to by चिगो

एक मिपाकर पुर्वी पुस्तकांचा व्यवसाय करायचे. त्यांनी मी ऑनलाईन विकत घेतलेली पुस्तके मला काही पाठवली नाहीत. मी 'पैसे परत करा किंवा पुस्तके परत करा' म्हटल्यावरही 'करतो, करतो..', त्यांचं नाव किंवा आयडी कळेल का? म्हणजे पुढे सावधानगिरी बाळगता येईल.

In reply to by चिगो

जे मी केले त्याला फसवणूक याच गणले गेले पाहिजे व ते मी मान्य करतो कारण ती रक्कम भले एक रुपये असो की 300 किंवा 3 लाख, अथवा तीन करोड! चोरी ही चोरीच असते व ती माझ्याकडून झाली आहे, फक्त त्यात तुम्ही एकटे नाही आहात, त्यात दुर्दैवाने अनेक ओळखीचे लोक देखील आहेत, का, कसे इत्यादी कारण देत नाही ना देण्याची इच्छा आहे, पण सगळेच चोर असतात अशी तुमच्यासारख्या सहदय व्यक्तीची, समाजाची गैरसमजुत होऊ नये एवढीच इच्छा!

In reply to by दशानन

दशानन, मी पुस्तकांबद्दल जे उदाहरण दिले, ते 'फसवणुक' म्हणून दिलेले नाही. पॉवरबॅन्कच्या उदाहरणासोबतच ते देत असल्याने ती समजुतीची गफलत झाली असावी. मला त्या उदाहरणाद्वारे फक्त हेच म्हणायचे होते कि रोखीचा व्यवहार थेट असतो, 'इस हाथ ले, उस हाथ दे'.. ह्याउलट ऑनलाईन केलेला कुठलाही व्यवहार हा 'इनडायरेक्ट' असतो. तुम्ही पुस्तकांचा व्यवसाय का सोडलात, ह्याची पुर्णतः नसली तरी अंधुकशी कल्पना आहे. मी दिलेल्या उदाहरणामुळे आपणास त्रास झाला त्याबद्दल क्षमस्व..

@ मिल्टन
सर्वांना धन्यवाद........................................
मुद्दा क्र १. -- नोटा कुठे ही ठेवा त्याची चोरी शक्य आहे. जेंव्हा पासुन बँक .. एटिएम.. सुरु झाले तेंव्हा पासुन पाकीटमारी हा व्यवसाय जवळ जवळ बंद पडायला आला आहे. याअर्थी एटिएम मुळे फायदा झाला आहे. पुढे कॅशलेस ने सुध्दा होईल. एटिएम मधुन पण चोरी होते पण प्रमाण खुपच अल्प आहे मुद्दा क्र २ ह्यत जी फसवा फसवी होते ती ब-याचदा फ्री अ‍ॅफर च्या मागे गेल्यामुळे, सरळ सरळ मार्गाने गेलेतर फसवणुक होत नाही. एसबीआय किंवा भिम अ‍ॅप वापरावी. कॅशलेस मध्ये फसवणुक झाली तर ट्रेस करता येते आणि मुळा पर्यंत जाता येते ता. क. :- येथुन पुढे रुपया सहज येईल पण आणि तसाच सहज जाईल पण, पुर्वी सारखं २-५ रु. साठी जीवाला खात बसायची गरज नाही. आज समजा १० रु ची नोट रेल्वेतुन जतांना खाली पडली तर कीती जणं विनाकारण १० रूपयाचा खड्डा पडला म्हणुन जीवाला खात बसतील.

मिल्टन, तुम्हाला माहितीये की आपण व्यवहारात वापरतो तो पैसा एम-४ प्रकारचा असतो. याला रोखीचा पैसा म्हणतात. जरी प्रत्यक्षात कार्ड वापरलं तरी तो पैसा एम-४ च असतो. आस्थापनीय स्तरावरचे मोठमोठे घोटाळे होतात ते एम-३ वा एम-२ मधले असतात. त्यांचा प्रत्यक्ष रोख रकमेशी थेट संबंध फारसा येत नाही. सांगायचा मुद्दा काये की क्याशलेस पद्धतीमध्येच घोटाळ्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे रोखीचे व्यवहार निरोख झाले तरी घोटाळ्याची शक्यता राहतेच. किंबहुना घोटाळ्यांचे नवेनवे मार्ग शोधले जातील. माझ्या अंदाजाप्रमाणे निरोख पैसा हा एखाद्या अडथळ्यासारखा प्रस्तुत करून त्यात पैसे मारले जाण्याचं प्रमाण वाढेल. एक उदाहरण देतो. आंतरजालावर उत्तानचित्रादि करमणुकीची असंख्य स्थळं आहेत. त्यांतल्या काही स्थळांवर एक ढाचा दिसून येतो. त्यांत सुरुवातीला काही चित्रं फुकट दाखवून मनोरंजन केलं जातं. नंतर तो साठा संपला की सदस्यत्व घ्यायला लावतात. ते तसं सरळपणे न लिहिता अधिक मनोरंजनाची लालूच दाखवली जाते. नवीन मनोरंजन सुरू होणार म्हणून ग्राहक भलताच खुशीत आलेला असतो. अशा वेळेस नेमका केएलपीडी करून त्याला क्रेडिट कार्डची माहिती भरायला लावतात. सबब अशी की ग्राहक १८ वर्षांपेक्षा मोठा आहे हे पडताळून पहायचंय. ग्राहकाच्या मनात अशा वेळेस निरोख पैसा हा एक अडथळा आहे अशी भावना रुजते. इतर व्यवहारांतही अशीच भावना रुजवण्याचं धोरण अंगिकारला जाईलसं वाटतं. आ.न., -गा.पै.

मिल्टन साहेब, तुमचा लेख आणि वरील सर्व प्रतिसाद वाचले. मी तुमच्या निरीक्षणाशी बऱ्यापैकी सहमत आहे. मला आकलन झालेले तुमचे दोन प्रमुख मुद्दे हे आहेत असं मला वाटतं. १) रोखीच्या व्यवहारात आपली सदसदविवेकबुद्धी जास्त जागरूक असते, त्यामुळे साधारण मनुष्यप्राणी कोणाला फसवायला धजत नाही तसेच स्व:ता फसलो तर ते दु:ख जास्त टोचते. २) कॅशलेस व्यवहारात प्रत्यक्ष कॅश हाताळावी न लागल्यामुळे अशा सदसदविवेकबुद्धीची टोचणी कमी होते व त्यामुळे अशा व्यवहारात फसवणुकीचे प्रसंग जास्त होऊ शकतात. तुमचे दोन्ही मुद्दे पटण्यासारखे आहेत, फक्त तुमच्या शीर्षकातील 'भ्रष्टाचार' ह्या शब्दामुळे संभाषणाची गाडी थोडीशी मूळ मुद्द्यापासून दूर गेली. साधारणत: 'भ्रष्टाचार' हा शब्द सरकारशी जोडला गेला आहे. त्यात मोदी सरकारने कॅशलेस व्यवहाराची पुष्टी केली आहे त्यामुळे त्याविरुद्ध कोणी बोलल्यास ते मोदींच्या धोरणां विरोधात बोलल्याचा संशय येतो व संभाषणाची गाडी भरकटते. शीर्षकात 'भ्रष्टाचार' च्या ऐवजी 'लबाडी' किंवा 'फसवणूक' हे शब्द असते तर चर्चा अपेक्षित मुद्द्यांवर झाली असती असं वाटतं. वरील दोन मुद्द्याव्यतिरिक्त, पकडले गेल्यास शिक्षेचे भय, समाजात होणारी नाचक्की आणि त्या अनुषंगाने होणारे सामाजिक दुष्परिणाम ह्या गोष्टी देखील सदसदविवेकबुद्धीवर परिणाम करतात. रोखीच्या व्यवहारात देणाऱ्या-घेणाऱ्याची चूक जरी झाली तरी ती सिध्द करणे कठीणच जाते. १) एकदा मी माझ्या बारा वर्षाच्या मुलाला शंभर रुपयाची नोट देऊन एक लिटर दुध आणायला पाठवले. दुधाची किंमत त्यावेळी २५ रुपये लिटर होती. तो दुधवाला ओळखीचा होता. त्याने मुलाला एक लिटर दुध दिले व पंचवीस रुपये परत दिले, मुलाने ७५ रुपये परत मागितले असता, "तुमने तो सिर्फ पचास रुपये दिये" असं सांगून हुज्जत घालू लागला. मुलगा रडवेला होऊन परत आला, त्याला घेऊन मी परत त्या दुधवाल्याकडे गेलो असता त्याने तेच सांगायला सुरवात केली. शेवटी कटकट नको म्हणून उरलेल्या ५० रुपयांवर पाणी सोडून परत घरी आलो. आता ह्या व्यवहारात त्या दुधवाल्याची खरोखरीच समजण्यात चूक झाली होती की त्यानी लहान मुलगा बघून फसवणूक करायचे ठरवले हे सिद्ध करणे कठीण आहे. त्या दिवसापासून कधीही कोणालाही रोखीने पैसे दिले असता ती रक्कम तोंडी सांगायला कधीच विसरलो नाही. उदा.: "भैया, ये लो सौ रुपये" कधी कधी बँकेतून पैसे घेऊन आपण बाहेर पडलो आणि लगेच लक्षात आले की आपल्याला पैसे कमी आले आहेत व आपण परत जाऊन सांगितले तरी त्या दिवसाची कॅश टॅली झाल्या शिवाय बँकही आपल्याला पैसे देत नाही. कॅशलेस व्यवहाराचे मला आलेले दोन अनुभव इथे शेअर करू इच्छितो. १) माझ्या माहितीतील एका गृहस्थाने इथे अमेरिकेत एक ग्रोसरी स्टोर विकत घेतले. दुकानात येणारे कस्टमर त्यांना हव्या त्या वस्तू घेऊन रजिस्टरवर आले की हे गृहस्थ समोर असलेल्या कस्टमरच्या एकूण रंगरूपाकडे बघून एखादा ग्रोसरीचा आयटम दोनदा मारत असे. उदा.: एकच ब्रेड घेतला असेल तरी तो जिन्नस दोनदा दाखवायचा. बहुतेक सर्व कस्टमर सामान आणि रिसीट घेऊन निघून जात, जर एखाद्या कस्टमरने रिसीट नीट पाहिली व दुकानातून बाहेर पडायच्या आधी चूक निदर्शनास आणली तर साळसूदपणे, "I am sorry" म्हणून ते दोनदा चार्ज केलेले पैसे परत करायचे. दिवसाच्या शेवटी असे लबाडीने कमावलेले २०-२५ डॉलर्स तो सहज घेऊन जायचा. आणि हे सर्व त्या गृहस्थानेच मला सांगितले. २) एकदा माझ्या क्रेडीट कार्डावर ३५० डॉलर्सचा फ्रॉड झाला, क्रेडीट कार्ड कंपनीने लगेच माझे जुने कार्ड बंद केले व मला नवीन कार्ड पाठवून दिले. पण असे करताना त्यांनी फ्रॉड झालेली रक्कम माझ्या स्टेटमेंटमधून बाद केली नाही. नेहेमीप्रमाणे पुढच्या महिन्यात मी पूर्ण पैसे भरले व ही गोष्ट विसरून गेलो. ही माझी चूक होती, हलगर्जीपणा होता हे मला मान्य आहे, पण ते घडण्यामागे तो 'कॅशलेस व्यवहार' होता हे ही एक कारण असावे. जवळजवळ सहा महिन्यांनी एकदा स्टेटमेंटस फाईल करत असता ही गोष्ट माझ्या ध्यानात आली, सहा महिन्यांनी क्रेडीट कार्ड कंपनीकडे ते पैसे परत मागणे मला प्रशस्त वाटेना त्यात ते मिळतील ह्याची खात्री देखील नव्हती. तरी प्रयत्न करायला काय जातं असं म्हणून फोनवर बोलणी केली. आणि आश्चर्य म्हणजे माझे पूर्ण ३५० डॉलर्स मला परत मिळाले. ह्यात क्रेडीट कार्ड कंपनीची चूक झाली होती, त्यांचा फसविण्याचा उद्देश नव्हता त्यामुळे 'कॅशलेस व्यवहार' होता म्हणूनच सहा महिन्यांनी का होईना तो सिद्ध करता आला. माझ्या स्व:ताच्या ह्या अनुभवांवरून मी तुमच्या निरीक्षणाशी सहमत आहे.

तुमच्या शीर्षकातील 'भ्रष्टाचार' ह्या शब्दामुळे संभाषणाची गाडी थोडीशी मूळ मुद्द्यापासून दूर गेली. साधारणत: 'भ्रष्टाचार' हा शब्द सरकारशी जोडला गेला आहे. त्यात मोदी सरकारने कॅशलेस व्यवहाराची पुष्टी केली आहे त्यामुळे त्याविरुद्ध कोणी बोलल्यास ते मोदींच्या धोरणां विरोधात बोलल्याचा संशय येतो व संभाषणाची गाडी भरकटते.
सहमत आहे. भ्रष्टाचार हा केवळ सरकारमध्येच होतो आणि इतर ठिकाणी जी काही होते ती फसवणुक असे अनेकांना वाटत असते. खरं तर भ्रष्टाचार ही पण एक फसवणुकच असते आणि फसवणुक/चोरी हा पण एक प्रकारचा भ्रष्टाचार असतो आणि दोन्हींचा परिणाम सारखाच असतो. दुसरे म्हणजे कोणत्याही मुद्दाला लगेच मोदी समर्थन आणि विरोध अशाप्रकारे स्वरूप प्राप्त होते हे तुमचे म्हणणे पूर्ण मान्य. त्यातून नोटबंदीनंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर सोशल मिडिया आणि इतर ठिकाणी (मिपावर सुध्दा) घमासान चालू होते त्यातून कॅशलेस म्हणजे भ्रष्टाचारावर रामबाण उपाय असेच काहीसे वातावरण निर्माण झाले होते की निर्माण केले गेले होते. समजा भ्रष्टाचार आणि फसवणुक यांच्यात फरक करायचाच असेल तर समजा कॅशलेसमुळे भ्रष्टाचार कमी झाला तरी फसवणुकीचे मार्ग आणि शक्यता अजून वाढू शकतील याविषयी काय? असो.

कॅशलेसमुळे भ्रष्टाचार कमी झाला तरी फसवणुकीचे मार्ग आणि शक्यता अजून वाढू शकतील याविषयी काय? कॅशलेस मुळे भ्रष्टाचार कमी होईल असे नाही तर भ्रष्ठाचार शोधून काढणे सोपे जाईल. मूळ मानवी स्वर्थी वृत्ती बदलत नाही तेंव्हा जुने मार्ग बंद झाले तरी लोक नवे नवे मार्ग शोधून काढणारच. तेंव्हा भ्रष्टाचाराचे मार्ग वाढणार नाहीत तर फक्त बदलतील. ( जुने बंद होऊन नवे सुरु होतील) त्यामुळे जर भ्रष्टाचाराला शिक्षा तात्काळ झाली तरच भ्रष्ठाचार कमी होईल. यासाठी तपास संस्था पोलीस आणि न्यायसंस्था अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करणारे गरजेचे आहे.

कॅशलेस = अदृश्यता / तुलनात्मक बेफिकीरी as compared to cash transaction. दृष्टीआड सृष्टी attitude. कॅशलेस > COD (COD is costlier than cashless in most of the cases) ऑनलाईन = जास्त पोहच / स्केल + अनामिकता/ अदृष्यता / Out of direct physical reach ----> Easier to cheat
मी थोडा विचार करत होतो. की स्वतःच्याच पैशाच्या बाबतीत फक्त डोळ्याला दिसत नाही म्हणून माणूस बेफिकिर होइल का? माझ्या मते अजून एक मुद्दा विचारात घ्यायला हवा- एखाद्या व्यक्तीकडे हातात असलेली रोख रक्कम ही सहसा खात्यातील रकमेपेक्षा कमी असते. ती हातातून गेली की शिल्लक राहिलेली रोख रक्कम कमी होते. म्हणजे समजा, मला शंभर रुपये खर्च करायचे आहेत आणि हातात दोनशे रुपये रोख आणि डेबिट कार्डच्या खात्यात दहा हजार रुपये शिल्लक आहेत. आता जर मला रोखच द्यायची असेल, तर मी दहा वेळा विचार करीन, कारण माझी शिल्लक रोख रक्कम एकदम निम्मी होणार आहे. कार्डवरून शंभर रुपये खर्च करताना मी अगदीच विचार करणार नाही!! कारण त्यातून शंभर गेले तरी भरपूर रक्कम शिल्लक राहिलेली असेल! माझा असा अनुभव आहे, की जेव्हा केव्हा माझ्याकडे खात्यात कमी आणि हातात रोख रक्कम जास्त होती(!), तेव्हा मी कार्ड वापरताना जास्त विचार करायचो!! (पण अशा वेळा कमी होत्या हेही खरं! ) समजा तुमच्या इमारतीच्या पाण्याची मोटर बंद पडली. आता खालच्या टाकीत कितीपण पाणी असो, घरातलं पाणी तुम्ही जपूनच वापरताल!!! पुन्हा मोटर चालू झाल्यावर मनसोक्त (भसाभस!) पाणी वापरल्यावर कसा आनंद झाला असेल आठवून बघा....

In reply to by असंका

हो हा पण एक मुद्दा असू शकेल. एकूणच अशाप्रकारचे व्यवहार करताना नक्की मानसिकता काय असते हा संशोधनास मोठा वाव असलेला विषय आहे. रोखीत व्यवहार करताना खर्च बेताचेच केले जातात पण कार्ड असेल तर भराभर स्वाईप करून मोठी बिले होऊन अडचणीत आलेले कित्येक लोक असतात. ही नक्की काय मानसिकता आहे? कशामुळे हे होते? बराच रोचक विषय असेल हा.

आवडला. 'प्रेडिक्टेबली इरॅशनल'ची (हे शीर्षक बर्‍याचशा जालचर्चांनाही लागू पडावे म्हणा!) वाचायच्या यादीत भर घातली आहे. सहज होणारी, कुठलाही वाईट हेतू नसताना केली जाणारी अगदी छोट्या स्वरूपाची ऑनलाईन पायरसी (इ-पुस्तके किंवा चित्रपट/मालिका जालावर अनधिकृतपणे वाचणे/पाहणे/उतरवून घेणे) हीदेखील बहुधा याच स्वरूपाच्या 'दृष्टीआड सृष्टी'त मोडावी.

विपुलतेमुळे वस्तूचे उपयोगित्व कमी होते. वस्तूपासून मिळणारा आनंदही कमी होतो. वस्तूला क्षुल्लकत्व येते. त्यामुळे वस्तू हरवली/ चोरीला गेली तरी हळहळ वाटत नाही आणि उलट्या बाजूने आपण कुणाची तरी वस्तू हिरावली/ लुबाडली तरी अपराधी वाटत नाही पण रोकडीची विपुलता असताना दुसऱ्याचा एक रुपयासुद्धा उचलताना मात्र खंत वाटते हे निरीक्षण रोचक वाटले.

लेखाच्या आशयाशी सहमत आहे. लेख वाचताना १० वर्षांपूर्वी अर्धवट वाचलेल्या एका पुस्तकाचे स्मरण झाले. पुस्तक आहे स्पीड ऑफ ट्रस्ट. रोख रकमेऐवजी इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात पेमेंट्स होऊ लागल्यास मनी लाँडरींगसारख्या प्रकारांची व्याप्ती वाढेल असे मला वाटते.