✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

यांगोंमधलं श्री. मोदी यांचं भाषण : भाग १

आ
आतिवास यांनी
Tue, 09/05/2017 - 14:30  ·  लेख
लेख
जून २०१६ मध्ये मी यांगोंला आले. तेव्हापासून दोन वेळा इथल्या भारतीय दूतावासात जाणं झालं. २०१६ चा स्वातंत्र्यदिन समारंभ आणि २०१७ चा प्रजासत्ताक दिन समारंभ या निमित्ताने जाणं झालं होतं. बाकी तसा माझा दूतावासाशी काही संबंध येत नाही. दूतावासाला फेसबुकवर ‘लाईक’ केलं होतं, त्यामुळे घडामोडी कळत राहतात. ऑगस्टच्या दुस-या आठवड्यात कधीतरी ‘पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी म्यानमा भेटीवर येत आहेत आणि यांगोंमध्ये ते जनतेशी संवाद साधतील’ असं फेसबुकवर कळलं. ‘अधिक माहितीसाठी दूतावासाशी संपर्क साधावा’ असंही एक आवाहन जाहीर झालं. मग मी दूतावासाशी संपर्क साधला. ऑगस्टच्या अखेरीस पंतप्रधानांच्या भेटीची तारीख जाहीर झाली. ६ सप्टेंबर रोजी पंतप्रधान यांगोंमधल्या Thuwunna Indoor Stadium (तुवन्ना स्टेडियम) मध्ये जनतेशी संवाद साधतील असं जाहीर झालं. या स्टेडियमची आसनक्षमता बत्तीस हजार आहे (Economic Times च्या पाच सप्टेंबरमधल्या बातमीनुसार मात्र ही क्षमता आठ हजार आहे.) आणि एरवी या स्टेडियममध्ये ‘युवा क्रीडा प्रशिक्षण केंद्र’ चालतं. इथं फुटबॉलचे सामने होतात, ऍथलेटिक्सच्या स्पर्धा होतात. २०१३ मध्ये दक्षिण आशियाई स्पर्धेतले फुटबॉल सामने इथं झाले होते. स्टेडियम अद्ययावत आहे असं ऐकून होते. म्यानमामध्ये फुटबॉल सामन्यांना स्त्रिया हजेरी लावत नाहीत, त्यामुळे माझंही तिथं अद्याप जाणं झालं नव्हतं. १ सप्टेंबर रोजी दूतावासाकडून आमंत्रण पत्रिका आली. invite प्रत्येक व्यक्तीला एक आमंत्रण क्रमांक दिला होता. गंमतीची गोष्ट अशी की दूतावासाकडं माझे दोन इमेल पत्ते होते – पर्यायी पत्ता त्यांनीच मागितला होता, त्यामुळे दोन पत्ते होते. मला या दोन्ही पत्त्यांवर आमंत्रणं आली आणि दोन्ही ठिकाणी वेगळे आमंत्रण क्रमांक होते. एक क्रमांक होता १२००० + तर दुसरा होता २३,००० +. इतके लोक भाषण ऐकायला खरंच येणार होते की नंबर दहा हजारपासून द्यायला सुरूवात केली आहे – असा एक प्रश्न मनात आला. पण गर्दी असण्याची शक्यता भरपूर आहे कारण यांगोंमध्ये भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाचे म्यानमा नागरिक मोठ्या संख्येने आहेत. पंतप्रधानांचं भाषण मी अलीकडं फारसं ऐकत नाही. शिवाय या सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांचं मी समर्थन करत नाही. वेळोवेळी पंतप्रधान कार्यालयाला मी इमेल करून माझी विरोधी मतं कळवलेली आहेत. (त्या विरोधी मतांना पंतप्रधान कार्यालय काही दाद देत नाही हा भाग वेगळा!) हे ज्यांना माहिती आहे त्या माझ्या मित्रमैत्रिणींना मी पंतप्रधानांचं भाषण ऐकायला चालले आहे याबद्दल आश्चर्य वाटत होतं. माझी भूमिका स्पष्ट आहे (होती आणि राहिलही). मी सध्या यांगोंमध्ये राहते आहे. भारतीय पंतप्रधानांचा यांगोंमध्ये जाहीर कार्यक्रम आहे. मी त्याला जात आहे कारण ते आपल्या देशाचे लोकनियुक्त पंतप्रधान आहेत. अन्य कोणत्याही पक्षाचे पंतप्रधान असते आणि त्यांच्या निर्णयांना माझा कितीही विरोध असला असता तरीसुद्धा मी भाषण ऐकायला गेलेच असते आणि जाईनही. आपले आपापसात कितीही मतभेद असले तरी आपण ‘एक’ आहोत, आपण एकमेकांचे शत्रू नाही याचं भान जपणं महत्त्वाचं आहे. ‘अरे वा, मोदी साहेबांना मानलं पाहिजे. चीनचा धोका लक्षात घेऊन म्यानमाला भेट देण्याची दूरदृष्टी दाखवणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत ना ते’ असे गौरवोद्गार दोन-तीन लोकांनी काढल्यावर मी चकित झाले. मोदींनी काहीही केलं तरी अनेक भारतीय लोकांना ‘हे पहिल्यांदाच घडतं आहे’ असं वाटतं. (सोशल मीडिया झिंदाबाद किंवा जनतेची विस्मरणशक्ती झिंदाबाद!) पण भारत आणि म्यानमा यांच्यात गेली अनेक वर्ष सातत्याने ‘स्टेट विजिट्स’ होत आहेत. विद्यमान पंतप्रधानांची ही काही पहिली म्यानमा भेट नाही, स्टेट विजिट मात्र पहिली आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये आसिआन (ASEAN- Association of South-East Nations) आणि अन्य बैठकांच्या (ASEAN Summit and Related Summits) निमित्ताने श्री. मोदी म्यानमामध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी नेपिटॉ (Nay Pyi Taw) या राजधानीच्या शहरात सुमारे तीनशे भारतीय नागरिकांशी संवादही साधला होता. किंबहुना म्यानमाला भेट देणारे मोदी काही पहिले भारतीय पंतप्रधान नाहीत, ते पाचवे पंतप्रधान आहेत. मार्च २०१४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी म्यानमाला भेट दिली होती. मे २०१२ मध्येही डॉ. सिंह म्यानमात आले होते. उपराष्ट्रपती श्री. हमीद अन्सारी २००९ मध्ये आले होते तर राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम मार्च २००६ मध्ये तीन दिवसांच्या म्यानमा दौऱ्यावर आले होते. श्री. राजीव गांधी १९९८७ मध्ये बर्मात (बर्माचं म्यानमा असं नामांतरण १९८९ मध्ये झालं.) येऊन गेले. तत्पूर्वी श्रीमती इंदिरा गांधी जून १९६८ आणि मार्च १९६९ अशा दोनवेळा बर्मामध्ये येऊन गेल्या आहेत. त्याच्याही आधी श्री. लालबहादुर शास्त्री १९६५ मध्ये आले होते तर श्री. नेहरू १९५४ मध्ये आले होते. फेब्रुवारी २०१३ मध्ये लोकसभा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाने म्यानमाला भेट दिली होती. श्रीमती सुषमा स्वराज २०१७ मध्ये आल्या होत्या तर श्री अजित डोवल २०१५ मध्ये आले होते. श्रीमती निर्मला सीतारामनही येऊन गेल्या आहेत. अशा भेटींची मोठी यादी देता येईल. म्यानमा (बर्मा) नेत्यांच्याही अनेक भारतभेटी झाल्या आहेत. जुलै २०१७ मध्ये म्यानमाचे लष्करप्रमुख मी आँग लाय (Min Aung Hlaing) आठ दिवसांच्या भारतभेटीवर आले होते. म्यानमाच्या परराष्ट्रमंत्री आणि स्टेट कौन्सेलर आँग सान सू ची (Aung San Suu Kyi) ऑक्टोबर २०१६ मध्ये तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या होत्या. ऑगस्ट २०१६ मध्ये म्यानमाचे राष्ट्राध्यक्ष ठिन च्यो (Htin Kyaw) भारतात येऊन गेले. लष्करप्रमुख तान् श्वे (Than Shwe) (तान हा शब्द चुकीचा आहे खरं तर – Tha चा उच्चार देवनागरीत कसा करायचा ते मला माहिती नाही) हे २००४ मध्ये आणि जुलै २०१० मध्ये भारतात आले होते. ऑक्टोबर २०११ आणि डिसेंबर २०१२ मध्ये म्यानमा राष्ट्राध्यक्ष तै सै (Thein Sein) भारतभेटीवर आले होते. १९८० मध्ये ने विन भारतात येऊन गेले. साधारणपणे प्रत्येक स्टेट विजिटमध्ये दोन-तीन करार होतात असं दिसतं. उदाहरणार्थ डॉ. सिंह यांच्या २०१२ च्या भेटीत बारा द्विपक्षीय करारांनर सह्या झाल्या. म्यानमा आणि भारत यांच्यात आजवर किती करार झाले हे शोधायला लागेल. १९८७ ते २०१२ या कालखंडात फारशा भेटी झाल्या नाहीत हे खरं, पण त्याला ऐतिहासिक कारणं आहेत. म्यानमामध्ये १९६२ मध्ये लष्करी उठाव झाला होता आणि त्यानंतर थेट २०१६ मध्ये लोकनियुक्त सरकार सत्तेवर आलं (निवडणूक नोव्हेंबर २०१५ मध्ये झाली) हे आपल्याला माहिती असेलच. ‘लोकशाही मार्गाने निवडून न आलेल्या सरकारशी जवळीक निर्माण न करण्याचं’ भारत सरकारचं धोरण त्या काळात होतं असं वाटतं. लष्करी दडपशाहीमुळे जगाने या काळात बर्मा-म्यानमाला वाळीत टाकलं होतं हे विसरता कामा नये. याचा पुरेपूर फायदा चीनने घेतला. आणि हे लक्षात घेऊन की काय पण १९९० मध्ये भारताच्या धोरणात बदल होऊन म्यानमामधल्या लष्करी सरकारशी भारत सरकारने संपर्क वाढवला. भारत-म्यानमा संबंधांवर काही लिहिण्याचा मोह टाळून मी परत पंतप्रधानांच्या भाषणाकडं येते. J पंतप्रधानांचा म्यानमा दौरा अडीच दिवसांचा आहे. त्यात नेपिटॉमध्ये म्यानमा सरकारबरोबर अधिकृत बैठका, बगान परिसरात आनंद मंदिराला भेट (२०१६ च्या भूकंपानंतर या मंदिराच्या पुनरूज्जीवनाचं काम Archeological Survey of India करत आहे) आणि मग यांगोला आगमन. यांगो शहरात श्वेडगो पगोडा, बोज्या आँग सान म्युझियम आणि संध्याकाळी नागरिकांशी संवाद असा कार्यक्रम आहे. दरम्यान दूतावासाकडू उद्याच्या कार्यक्रमाविषयी सविस्तर सूचना आल्या आहेत. त्यानुसार दुपारी साडेतीनला प्रवेशद्वार उघडेल, खाण्या-पिण्याचे पदार्थ, कॅमेरा वगैरे गोष्टी आणायला परवानगी नाही (पाणीही नाही), ओळखपत्र आणि दूतावासाचं आमंत्रणपत्र सोबत आणावं .. वगैरे अकरा सूचना आहेत. साडेसहाला नागरिकांना प्रवेश बंद केला जाईल आणि सात वाजता पंतप्रधानांचं भाषण सुरू होईल असं दिसतं आहे. दूतावासाकडून आमंत्रण आलेल्या सर्व व्यक्तींना पंतप्रधान कार्यालयाकडून इमेल पाठवण्यात आली. हे पत्र मात्र मला एकाच इमेल पत्त्यावर आलं -) ----------------------------------------------------------------------------------------------------------------------- From: Narendra Modi | Add to Address book |This is not spam To: ------------------- ........... Subject: Namaste from Narendra Modi! Date: Mon, 04 Sep 2017 17:07:23 IST Dear Savita .......Ji, It is with great delight and enthusiasm that I begin my Myanmar visit from 5th September 2017. This two-day visit is my first bilateral visit to Myanmar, a valued neighbour and a close friend of India’s. My visit to Myanmar includes programmes in the historic city of Bagan and Yangon. On the evening 6th September, I will be addressing the Indian community in Yangon, where I look forward to seeing you. We take immense pride in our diaspora, which has made India proud on the global stage. The Indian diaspora in Myanmar has brought India and Myanmar a lot closer in the past decades. Do write to me on a specially created open forum on the Narendra Modi Mobile App with your thoughts and ideas. I would refer to some of the ideas received during my speech at the community programme. See you in Yangon on the 6th! Yours, Narendra Modi ---------------------------------------------------------------------------------------------------------------- मी ‘नरेंद्र मोदी’ अॅपवर ‘भारतात शिकणा-या म्यानमा विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारने विशेष शिष्यवृत्ती जाहीर कराव्यात’ असं सुचवलं. यातून दोन देशातल्या नव्या पिढ्यांमध्ये चांगले संबंध निर्माण होतील असं मला वाटतं. अशी योजना अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांसाठी आहे हे मला माहिती आहे आणि त्यातून अफगाण-भारत संबंध स्थिरावायला मदत होते असं मला अफगाणिस्तानमध्ये आलेल्या अनुभवांवरून वाटतं. Sir, we need to declare special scholarships for Myanmar students studying in India. It will help to build bridges between the young generations of both the countries. In addition to this Myanmar needs a good pool of trained Civil Servants, which will help strengthening democracy. (via NMApp) माझ्याकडून तयारी सगळी झाली आहे. आता सहा सप्टेंबरची वाट पाहते आहे. :-)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
26435 वाचन

💬 प्रतिसाद (119)

प्रतिक्रिया

सहमत.

यशोधरा
Fri, 09/15/2017 - 13:21 नवीन
सहमत. करे तर अतिवासताईंकडून अशी भूमिका घेतली जाईल असे वाटले नव्हते. अजूनही दुसरा भाग त्यांनी टाकावा. लेखावर टीका होणार, कौतुक होणार..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

सध्या होत असलेल्या

श्रीगुरुजी
Wed, 09/13/2017 - 15:32 नवीन
सध्या होत असलेल्या विचारवंताच्या हत्या आणि मिपा वरील मोदी विरोधी लिखाण केल्यावर आयडीच्या झालेल्या हत्या किन्वा सन्यास यात कमालीचे साम्य जाणवत आहे. सध्या कोणकोणत्या "विचारवंतांच्या" हत्या होत आहेत म्हणे? पप्पू अमेरिकेत उधळत असलेली मुक्ताफळे आणि मिपावर काही सदस्य उधळत असलेली मुक्ताफळे यात देखील कमालीचे साम्य जाणवत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

वैचारिक विरोधास हत्या म्हणणे

arunjoshi123
Wed, 09/13/2017 - 17:22 नवीन
वैचारिक विरोधास हत्या म्हणणे डाव्या विचारांचे व्यवच्छेदक लक्षण आहे काय? अगोदर दुर्लक्षिण्याइतका विरोध व्हायचा, आता इतका भन्नाट विरोध होतो कि सहनच होत नाही. वैचारिक विरोधाची सवय असायला पाहिजे. संन्यास इ घेणारे मूर्ख आणि पळपूटे आहेत. शिवाय गजबचे एकांगी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

सध्या होत असलेल्या

सुबोध खरे
Wed, 09/13/2017 - 20:39 नवीन
सध्या होत असलेल्या विचारवंताच्या हत्या आणि मिपा वरील मोदी विरोधी लिखाण केल्यावर आयडीच्या झालेल्या हत्या किन्वा सन्यास यात कमालीचे साम्य जाणवत आहे. ह ह पु वा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

http://www.firstpost.com

सुबोध खरे
Wed, 09/13/2017 - 19:46 नवीन
http://www.firstpost.com/india/by-not-calling-out-aung-suu-kyi-over-rohingya-crisis-narendra-modi-has-chosen-logic-over-morals-4035039.html
  • Log in or register to post comments

दुर्दैवी!

एस
Wed, 09/13/2017 - 20:40 नवीन
आतिवास ताईंना लेखाचा पुढील भाग मिपावर टाकावासा वाटला नाही याचे थोडे वाईट वाटते आहे. त्याचे कारण त्यांनाच माहीत असले तरी मिपावर त्यांनी लिहीत राहिले पाहिजे अशी मनापासून इच्छा आहे.
  • Log in or register to post comments

मी दुसरा भाग वाचला. जर

पिलीयन रायडर
Wed, 09/13/2017 - 21:15 नवीन
मी दुसरा भाग वाचला. जर पहिल्या भागाने इतकी चर्चा होत असेल तर दुसर्‍यावरुन गदारोळ झाला असता हे नक्की. लेख का नाही टाकला हे समजू शकते. दंगा नको म्हणून धागच न टाकावा वाटणे हे काही चांगले नाही. इथे वैयक्तिक टीका झाल्याने ते परत आल्या नसाव्यात. एरवी त्यांना चर्चेशी काही प्रॉब्लेम असेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मिपावर त्यांनी लिहीत राहिले

पगला गजोधर
गुरुवार, 09/14/2017 - 09:40 नवीन
मिपावर त्यांनी लिहीत राहिले पाहिजे
१+ अनुमोदन, त्यांनी लिहिलेल मला तरी एकांगी दिसत नाही, उलट अतिशय संयत शब्दात कुठलाही आव न आणता, लिहिला लेख आहे. भक्त एकीकडे सहिष्णु असल्याचा आव तर आणतात, कंस्ट्रक्टिव टिका केली तर मुद्देसुद उत्तर देवू असेही म्हणतात. आता अतिवास यांचा लेखही कंस्ट्रक्टिव वाटत नाही त्यांना !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

वर दिलेला दुवा वाचला तर एक

सुबोध खरे
गुरुवार, 09/14/2017 - 10:00 नवीन
वर दिलेला दुवा वाचला तर एक लक्षात येत आहे कि श्री मोदी हे या बाबतीत तारेवरची कसरत करीत आहेत. रोंहिंज्या शरणार्थी हा भारताला डोकेदुखी होऊ शकेल असा विषय आहे आणि त्याच बरोबर आता सुद्धा आसाम मध्ये हे शरणार्थी आले तर आसामी लोकांना आपण तेथे अल्पसंख्य होऊ हि सार्थ भीती वाटत आहे. आसाम मधील काँग्रेसी नेते यांनी आम्ही रोहिंज्यांचे स्वागत करू असे भाषण करत होते. आता त्यांनी घुमजाव केले आहे. अनधिकृत बांगलादेशी घुसखोरांमुळे आसाम मध्ये अनेक जिल्हे मुस्लिम बहुल झाले आहेत. या शरणार्थींमुळे होणाऱ्या भारतीय लोकांना त्रास हा एकीकडे मुद्दा असताना म्यानमार मध्ये चीनचा वाढत प्रभाव हा दुसरा मुद्दा आहे. यात म्यानमारच्या सरकारशी सौहार्दपूर्ण संबंध साधून आपला प्रभाव वाढवणे आणि चीन कडे त्यांचा झुकाव कमी करणे हेही आवश्यक आहे. यामुळे श्री मोदी यांनी ठोस असा कोणताही मुद्दा सार्वजनिक भाषणात मांडला नाही हे साहजिक आहे. बाकी अतिवास ताईंच्या अनुदिनीवर दुसरा भाग वाचला आणि त्यात खास असे काही त्यांनी लिहिलेले मला तरी आढळले नाही. ( काही तरी राहून गेले असेल हि ) असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

रोहिंग्या मुसलमानांना

श्रीगुरुजी
गुरुवार, 09/14/2017 - 20:10 नवीन
रोहिंग्या मुसलमानांना म्यानमारमध्ये परत पाठवण्याप्रकरणी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. रोहिंग्या मुसलमान भारतात राहू शकत नाहीत. ते देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहेत. सरकारला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार काही रोहिंग्या हे दहशतवादी संघटनांबरोबर मिळालेले असून सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी हस्तक्षेप करू नये कारण मुलभूत अधिकाराखाली हे येत नसल्याचे केंद्र सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. http://www.loksatta.com/desh-videsh-news/rohingyas-are-threat-to-national-security-central-government-file-an-affidavit-in-supreme-court-1550933/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बेकायदेशीररित्या भारतात राहणाऱ्यांना

ट्रेड मार्क
गुरुवार, 09/14/2017 - 21:27 नवीन
बेकायदेशीररित्या भारतात राहणाऱ्यांना, मग ते कुठल्याही धर्माचे/ वंशाचे असो, कोणी समर्थन कसे देऊ शकतं? रेफ्युजींना आपल्या देशात घ्यायचं का नाही हा त्या त्या देशाचा प्रश्न असायाला पाहिजे. भारताने १९५१ च्या United Nations Refugee Convention or its 1967 Protocol वर सही केलेली नाही. त्यामुळे भारतीय कायद्यानुसार रोहिंज्यांना भारतात राहण्याची परवानगी देऊ नये. अगदी मानवतेचा विचार करून या लोकांना भारतात राहायची परवानगी दिली तरी ते पुढे डोकेदुखी होणार नाहीत याची काय गॅरंटी आहे? त्यांच्या धर्मानुसार आणि स्वभावानुसार वागायला लागले तर ते अवघड जागेचं दुखणं होऊन बसेल. युरोपिअन देश रेफ्युजींना घेऊन पस्तावले आहेत त्याचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. ज्या म्यानमार मध्ये त्यांच्या काही पिढ्या राहिल्या आहेत तोच म्यानमार त्यांना बांगलादेशमधून स्थलांतरित झालेले बेकायदेशीर रहिवासी मानतोय. जगात एवढे मुस्लिम देश आहेत, त्यातले बरेच देश श्रीमंत आणि अजून लोक सामावून घेऊ शकतात असे आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन या मुस्लिमांना सामावून घ्यावे, तेवढंच ते कसे मानवतावादी आणि दयाळू आहेत हे जगाला दाखवता येईल. टीप: गुरुजी हे तुमच्या प्रतिसादाखाली लिहिलेलं असलं तरी तुमच्या प्रतिसादाला उत्तर किंवा तुम्हाला उद्देशून अजिबात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मुळात जर आपल्या भारतीय

सुबोध खरे
गुरुवार, 09/14/2017 - 23:01 नवीन
मुळात जर आपल्या भारतीय नागरिकांचे च मूलभूत अधिकार आणि हक्क सर्वोच्च न्यायालय प्रस्थापित करू शकत नाही तर या बाहेरच्या लोकांचं घोंगडं कशाला गळ्यात बांधून घेताय? जमाते इस्लामी सारख्या संघटना त्यांची पाठराखण करत आहे. हे मूळ बांग्लादेशी मुसलमान म्यानमार मध्ये राहत आहेत. त्यांचा पुळका असण्याचे आपल्याला कारणच काय?तुमच्या जनतेला अन्न वस्त्र निवारा पुरवता येत नाही तिथे अगोदर पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

काही दिवसांपूर्वी वाचले. एक

श्रीगुरुजी
गुरुवार, 09/14/2017 - 23:27 नवीन
काही दिवसांपूर्वी वाचले. एक रोहिंग्या मुस्लिम कुटुंब बेकायदा भारतात घुसले. त्यांना आधीच ३ मुले होती व बायको पुन्हा गरोदर होती. हे कुटुंब दिल्लीत झोपडीत राहते. काम मिळत नाही. मिळेल ते खाऊन अर्धपोटी राहतात. दरम्यान चवथे मूल झाले. मुलांना शाळा, दोन वेळचे पुरेसे अन्न, कपडे इ. मिळत नाही. तरीही पठ्ठ्याने वर्षभरात पाचव्या मुलाला जन्म दिला. एव्हाना सहावे सुद्धा झाले असेल. Not for nothing, muslim refugees are hated all over the world.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हा हा हा

चिर्कुट
Fri, 09/15/2017 - 11:24 नवीन
लेखाचा विषय काय...त्यावर चर्चा कसली आणि ही प्रतिक्रिया तर कळस. दंडवत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

या लेखाचा आणि रोहिंग्य

एस
गुरुवार, 09/14/2017 - 23:46 नवीन
या लेखाचा आणि रोहिंग्य निर्वासितांचा काहीतरी संबंध आहे का लोकहो? काय कुठे आणि किती अवांतर करायचं ह्याचं तारतम्य बाळगा की. तुम्ही दुसरा धागा काढा काथ्याकूट विभागात आणि करा तिथे चर्चा. कोणी अडवलं आहे का? (डिस्क्लेमर: माझा अशा निर्वासितांना भारतात प्रवेश देण्यास विरोध आहे, भलेही ते कोणत्याही धर्माचे असोत.)
  • Log in or register to post comments

एक कळले नाही.

जेम्स वांड
Fri, 09/15/2017 - 08:06 नवीन
अतिवास ह्यांनी लेख लिहिलाय, यांगो मधल्या भाषणावर, त्यांनी माफक मोदी टीका केली आहे. ती चुकीची आहे हे गृहीत धरलं तरी त्यांनी रोहिंग्या मुसलमान शरणार्थी भारतात घ्या असं म्हणणार किंवा सुचवणार काही (ह्या धाग्यात तरी) लिहिल्याचे दिसून आले नाही. तरी मग रोहिंग्या/रोहिंज्या मुसलमान, शरणार्थी , त्यांची प्रजोत्पादन रितभात वगैरे विषय ह्या धाग्यावर चर्चिण्याचे काही कारण कळत नाहीये, ह्या सगळ्यासाठी तर 'ताज्या घडामोडी सिरीज' आहे न वेगळी?
  • Log in or register to post comments

श्री मोदी हे काही म्यानमार

सुबोध खरे
Fri, 09/15/2017 - 09:56 नवीन
श्री मोदी हे काही म्यानमार मध्ये पर्यटनासाठी गेलेले नाहीत. सध्या भारत आणि म्यानमार यांच्यातील रोहिंज्या शरणार्थी हाच सर्वात कळीचा मुद्दा आहे मग तो आणि चीन शी जवळीक विरुद्ध भारताशी सामंजस्य हे मुद्दे सोडले तर इतर भाषण "चान चान" च होणार यात शंका नाही. मग रोहिंज्या बद्दल लिहू नका म्हणण्याला काय अर्थ आहे? आतिवास ताईंनी हा लेख काय म्यानमार मधील प्रेक्षणीय स्थळे यावर लिहिलेला नाही अतिवास ताईंनी श्री मोदींवर टीका केली (असेल) तरी तो त्यांचा हक्क आहेच. श्री मोदींच्या भाषणात या (रोहिंज्या) प्रश्नाचा उल्लेख असेल असे वाटले होते तो तसा का नाही हे एका डावीकडे झुकणाऱ्या पत्रकाराचा लेख वर मी दिलेल्या दूव्यात आहे. भारत आणि म्यानमार याबद्दल सर्व लोकांना काय माहिती आहे याची देवाण घेवाण करणे हा मूळ हेतू आहे.
  • Log in or register to post comments

विपर्यास न झालेला बरा खरे सर

जेम्स वांड
Fri, 09/15/2017 - 10:51 नवीन
'रोहिंग्या/रोहिंज्याबद्दल लिहू नका' असे मी बोललेलो नाहीये, मोदींच्या भाषणाच्या धाग्यावर ते बोलणे बरोबर कसे हे कळलं नाही असं बोललोय, सोबत प्रश्नचिन्ह सुद्धा लावलं होतं.... चालायचंच चर्चा कशी संयुक्तिक आहे त्याचं पटण्यासारखं कारण दिल्याबद्दल आपला मनःपूर्वक आभारी आहे मी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

भारताचे कुठलेही

पगला गजोधर
Fri, 09/15/2017 - 11:51 नवीन
भारताचे कुठलेही पूर्वप्रधानमंत्रीही पदावर असताना पर्यटनासाठी परदेशी गेलेले नव्हते, परंतु मोदींनी काहीही केलं तरी अनेक भारतीय लोकांना ‘हे पहिल्यांदाच घडतं आहे’ असं वाटतं. स्वयंप्रेरित ( proactive) परराष्ट्रीय धोरण काय ते हेच (चाणक्यानंतर.... ) अश्या..... किंवा अतिवास ह्या आपल्या दुसऱ्या लेखात लिहितात त्या प्रमाणे "
लोकांचं मोदींवर प्रेम आहे, लोकांच्या मोदी सरकारकडून अपेक्षा आहेत हे खरं आहे. पण म्हणून ‘आधी जणू काही अंधारयुग होतं आणि सगळं काही चांगलं फक्त मे २०१४ नंतर घडलं आहे’ या मोदी सरकारच्या (आणि खासकरून त्यांच्या समर्थकांच्या) बोलण्याला लोक वैतागलेही आहेत
" अश्या प्रकारच्या वाक्यांमुळे .... त्यांना मिपा वर त्यांच्या विरुद्ध गॅंगअप झाल्यासारखं वाटलंही असेल कदाचित ...... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा