श्रीगणेश लेखमाला: समारोप
नमस्कार मंडळी,
येणार येणार म्हणून वर्षभर आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत असतो ते गणराय आले, वाजत गाजत आले, या उत्सवी धामधुमीत दहा-बारा दिवस कुठे निघून गेले आणि बाप्पांचा निरोप घ्यायची वेळ कधी जवळ आली, कळलेही नाही. गणेशोत्सवाच्या काळात आपल्या घरांसारखंच पूर्ण शहरात, सगळ्या वातावरणातच एक भारलेपण, मंतरलेपण जाणवत असतं. आपलंच शहर तेव्हा ओळखू न येण्याइतपत बदललेलं दिसतं. अर्थात त्यात आता अफाट गर्दी, बेसुमार ट्रॅफिक इ. गोष्टींचीही भर पडत असते, पण त्याला इलाज नाही, गणेशोत्सवाचं स्वरूप दिवसेंदिवस पालटत चाललं आहे, त्यात चांगल्याबरोबर वाईटही आलंच. असो. बाप्पांना निरोप द्यायचा हा जो क्षण असतो, तो मात्र फार वाईट असतो. विसर्जन करून घरी येतांनाच मनात एक सुनेपण भरून येत असतं. घरी आल्यावर सजवलेला रिकामा देव्हारा पाहून ते आणखीनच दाटून येतं. अर्थात बाप्पा जातात ते पुढच्या वर्षी असाच आनंद सर्वांना सढळ हस्ते वाटायला परत येण्यासाठी, हे लक्षात ठेवून मनाचं समाधान करून घ्यायचं इतकंच आपल्या हातात.
गणेशोत्सवासोबतच श्रीगणेश लेखमालेचाही समारोप करण्याची वेळ आली आहे. लेखमालेसाठी आवर्जून लेख देणाऱ्या सर्व लेखकांचे परत एकदा मनःपूर्वक आभार, वेळात वेळ काढून लेखमालेतील तसेच इतरही उपक्रमांतील लेख प्रकाशित केल्याबद्दल मालकांचे आभार. तसेच आपण सर्वांनी लेखांना, लेखकांना दिलेल्या अमूल्य अभिप्रायांसाठी अनेक धन्यवाद. या वेळचे बहुतांश लेख कुणा मान्यवर, सिद्धहस्त लेखकांचे नसून सामान्य वाचक/लेखकांकडून आलेले होते, हे एक विशेष. जास्तीत जास्त लोकांना/वाचकांना लिहितं करण्याच्या मिपा धोरणाला यामुळे चालना मिळाली, ही एक चांगली गोष्ट.
या वेळी साहित्य संपादक म्हणून थोडं मनोगत आपल्यासमोर मांडावंसं वाटतंय. ही लेखमाला हा नवीन सा.सं.मं.चा कोणताही मोठा उपक्रम चालवण्याचा पहिलाच अनुभव. किंबहुना यापुढील उपक्रम ही त्यांची सुरुवातच असणार आहे. या सुरुवातीच्या काळात काही कसर राहून गेल्यास, काही चुका झाल्यास आपण सर्व जण सांभाळून घ्याल याची खातरी आहे. चुकतमाकत, अनुभवांतून शिकत आपल्यापर्यंत उत्तमोत्तम साहित्य पोहोचवण्याचा आमचा प्रयास कायमच असेल. आपल्या सूचनांचं आणि टीकेचंही कायम स्वागत आहे. त्यातूनच कुठे सुधारणेस वाव आहे, तेही आम्हाला कळतं. लवकरच आणखी नवनवीन विविध उपक्रम घेऊन आपल्यासमोर हजर असू आणि आपण त्यांसही असेच भरभरून प्रतिसाद द्याल, ही आशा आहे, तरी आपल्या संयमासाठी आणि प्रोत्साहनासाठी पुन्हा एकदा धन्यवाद.
श्रीगणेश लेखमालेचा आरंभ एका गीतातील ओळींसह केला होता, तसेच समारोपही या काही मनस्वी शब्दांसह.. (शब्दश्रेय: संत तुकाराम, क्षितिज पटवर्धन)
सावलीची आस ना, कोवळेसे ऊन मी सूर नाही संगती, एक तरीही धून मी ज्यात डोकावेन मी, ते मनाचे बिंब मी जन्म हेलावेल हा, ते उसासे चिंब मी नाव नाही ज्यास काही, तो अनोखा रंग मी जो पुरेल जन्म सारा, तो सोबतीचा चंग मी मीची मज व्यालो, पोटा आपुलिया आलो.. काळजात करुणेचा, उसळलेला डोंब मी हर क्षणाला कल्पनेचा, जन्मलेला कोंब मी शोधताना वाट माझी, होत माझा त्रास मी मोजताना श्वास माझे, अंतरीचे हास्य मी मीची मज व्यालो, पोटा आपुलिया आलो.. दोन्हीकडे पाहे, तुका आहे तैसा आहे.
याद्या
3115
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
उत्तम उपक्रम...
उत्तम उपक्रम..
समारोपाचे लेखन वाचले आणि खरच
छान निभावली आहे लेखमाला.
यथोचित समारोप.
सुरेख ओळी.
छान लेखमाला
उत्तम झाली लेखमाला.
सर्व लेखकांचे, वाचकांचे,
एक दोन लेख वगळता लेखमाला
जितकी सहजसुंदर प्रस्तावना
दोन तीन लेख सोडले ही तर ही
आभार