Skip to main content

साखर खाल्लेला माणूस - एक शुगरकोटेड ब्लॅक कॉमेडी अर्थात एक प्रसन्न नाट्याविष्कार

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 23/08/2017 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
विलास व माधवी देशपांडे हे एक मध्यमवर्गीय जोडपं. यांना २२-२३ वर्षांची ऋचा ही एकुलती एक मुलगी. ती जाहिरात क्षेत्रात पाय रोवण्यासाठी धडपडतेय. विलास एका खाजगी विमा कंपनीत व्यवस्थापक आहे. जास्त वेतनाच्या अपेक्षेमुळे सरकारी नोकरी सोडून तो खाजगी क्षेत्रात आला आहे. लठ्ठ वेतनाबरोबरच तिथे असलेले विक्रीचे चढते लक्ष्य, व्यवसायवृद्धीची जबाबदारी, त्यामुळे येणारे ताणतणाव या सर्वांचा त्याच्या प्रकृतीवर व वागणुकीवर परीणाम झाला आहे. त्यामुळे त्याचा स्वभाव बराचसा चिडचिडा व उतावळा झाला आहे. कामाबरोबरच येणार्‍या दारू पार्ट्या, धूम्रपान, जागरणे याने तो त्रस्त आहे. तरूण मुलीचे बिनधास्त वागणे हे देखील त्याच्या तणावाचे अजून एक कारण आहे. अत्यंत वेगवान जीवनशैली, प्रचंड काम, कुटुंबासाठी फार वेळ देता न येणे या टीपिकल गोष्टींचा तो बळी आहे. अशा परिस्थितीत एक दिवस त्याला तपासणीतून समजते की त्याला मधुमेह झाला आहे व डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याची जीवनशैलीच त्यासाठी कारणीभूत आहे. मधुमेहामुळे आता त्याला आता नियमित औषधोपचार घेणे, नियमित तपासण्या, नियमित व्यायाम, जागरणे, धूम्रपान, मद्यपान इ. सोडून देणे हे करावे लागणार आहे. यामुळे तो त्रस्त झाला आहे. त्यात भर पडते ती त्याची पत्नी मधुमेहाबद्दल रोज नवीन ज्ञान मिळवून त्याच्यावर करीत असलेल्या प्रयोगांची. त्याच्या सासूबाई तसेच इतर सर्वजण त्याला आपापल्या परीने मधुमेहासाठी अनेक गोष्टी सुचवित राहतात व त्यामुळे तो पूर्ण वैतागतो. एक दिवस ओंकार आपटे नावाचा एक तरूण त्याला भेटायला येतो. ऋचाच्या सांगण्यावरून आपण आलो आहोत व आपण डॉक्टर असून मधुमेहासंबंधी सल्ला देण्यासाठी ऋचाने मला सांगितले आहे असे तो सांगतो. अनेकांकडून ऐकलेल्या त्याच त्याच गोष्टी पुन्हा एकदा ओंकारकडून ऐकल्यावर विलास वैतागतो व तो ओंकारची खिल्ली उडवून त्याला घालवून देतो. आपल्याला सल्ले देणार्‍या सासूचीही तो खिल्ली उडवितो. काही काळाने पुन्हा एकदा ओंकार येतो व ॠचा व आपण लग्न करणार आहोत असे सांगितल्यावर विलासला ते मान्य होत नाही कारण त्याला ओंकार आवडलेला नसतो. त्यांच्या लग्नात मोडता घालण्यासाठी तो ओंकारला ऋचाच्या बीअर पिण्याविषयी, मुलांच्या आवडीविषयी अनेक नकारात्मक गोष्टी सांगून ऋचाचेच मन त्याच्याविषयी कलुषित करतो व शेवटी ऋचाच लग्नाला नकार देते. माधवीला ओंकार जावई म्हणून आवडलेला असतो, परंतु ती काहीच करू शकत नाही. निराश झालेला ओंकार निघून गेल्यानंतर अचानक ऋचा आपण गर्भवती असल्याचे सांगून धक्का देते. त्या धक्क्यामुळे विलासला रूग्णालयात दाखल करावे लागते. यानंतर पुढे काय होते व नाटकाचा शेवट सुखान्त होतो का दु:खान्त हे रंगमचावरच बघायला हवे. विद्यासागर अद्यापक यांनी 'साखर खाल्लेला माणूस' हे नाटक प्रचारकी स्वरूपाचे न बनविता अत्यंत खेळकर स्वरूपात लिहिले आहे. एका गंभीर विषयावरील नाटक त्यांनी अत्यंत मिष्कील ढंगात, खेळकर शैलीत फुलविले आहे. नाटकात अक्षरश: क्षणाक्षणाला हशा पिकतो इतके चटकदार संवाद त्यांनी लिहिले आहेत. विषय गंभीर असूनसुद्धा नाटक अजिबात मेलोड्रामाटिक, गंभीर होत नाही. विलासच्या भूमिकेत प्रशांत दामलेने अक्षरशः धमाल केली आहे. त्याचे वाचिक विनोद व देहबोलीतून प्रचंड करमणूक होते. एका गंभीर विषयावरील नाटक त्याने अतिशय प्रसन्न करून टाकले आहे. रंगमंचावर इतक्या सहजतेने वावरणारा दुसरा मराठी कलाकार अपवादानेच सापडेल. शुभांगी गोखलेने विलासच्या पत्नीच्या माधवीच्या भूमिकेत तर प्रेक्षकांना धक्काच दिला. छोट्या पडद्यावर कायम गंभीर भूमिका करणारी शुभांगी गोखले एका अत्यंत वेगळ्या विनोदी स्वरूपाच्या भूमिकेत आहे. विलासची मुलगी झालेली ऋचा (कलाकार ऋचा आपटे) व डॉक्टर ओंकार आपटे (संकर्षण कर्‍हाडे) यांनी देखील भूमिकेला न्याय दिला आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9442
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

नाटक पाहिलेले नाही. असेल चांगलेही. मात्र प्रशांत दामलेचेही सचिन तेंडुलकर प्रमाणे आता अती कौतुक होतेय. बरेचदा लेखक दिग्दर्शकांच्या मेहनतीचे व टॅलंटचे श्रेय अभिनेत्याला सहजरित्या आयते मिळते. मराठी नाटक वा हिंदी सिनेमा या बाबतीत सारखाच. सहजपणे रंगमंचावर वावरणे यात आता विशेष काही राहिलेले नाही. राजा गोसावींच्या जमान्यात याचे कौतुक झालेले समजू शकतो. हल्ली अगदी कॉलेज पातळी वा एकांकिका स्पर्धातुनही रंगमंचावर सहजपणे वावरणारी कितीतरी तरुण मुले दिसतात. त्याना उत्तम सन्हिता संधी व प्रसिद्धी नसते इतकेच. एकदा कुणी प्रसिद्ध झाला वा झाली कि त्याचेच मिडीयातून कौतुक सुरु होते. खरे कलागुण पारखी लोक दुर्मिळ असतात. मग सचिन वर कुणी टिप्पणी केली कि अख्खा देश त्या माणसावर सोशल मिडीयातून तुटुन पडतो. आता येथे माझी काय गत होते ते बघु(च) या.

In reply to by खाबुडकांदा

नाटक पाहिलेले नाही. असेल चांगलेही. मात्र प्रशांत दामलेचेही सचिन तेंडुलकर प्रमाणे आता अती कौतुक होतेय. नाटक स्वतः पाहून नंतर टिप्पणी केलीत तर जास्त योग्य ठरेल. बरेचदा लेखक दिग्दर्शकांच्या मेहनतीचे व टॅलंटचे श्रेय अभिनेत्याला सहजरित्या आयते मिळते. मराठी नाटक वा हिंदी सिनेमा या बाबतीत सारखाच. सहजपणे रंगमंचावर वावरणे यात आता विशेष काही राहिलेले नाही. राजा गोसावींच्या जमान्यात याचे कौतुक झालेले समजू शकतो. हल्ली अगदी कॉलेज पातळी वा एकांकिका स्पर्धातुनही रंगमंचावर सहजपणे वावरणारी कितीतरी तरुण मुले दिसतात. त्याना उत्तम सन्हिता संधी व प्रसिद्धी नसते इतकेच. एकदा कुणी प्रसिद्ध झाला वा झाली कि त्याचेच मिडीयातून कौतुक सुरु होते. खरे कलागुण पारखी लोक दुर्मिळ असतात. कितीही चांगली संहिता असली तरी संहितेला पेलणारा अभिनेता/अभिनेत्री नसेल तर ते नाटक यशस्वी ठरत नाही. परंतु संहिता फार चांगली नसली तर उत्तम अभिनेते/अभिनेत्री आपल्या अभिनयाच्या बळावर नाटक यशस्वी करून दाखवितात. उत्तम संहिता व सुमार अभिनय किंवा उत्तम अभिनेते व सुमार संहिता असेल तर ते नाटक यशस्वी ठरत नाही. नाटक यशस्वी ठरण्यासाठी संहिता व अभिनय या दोन्हीची भट्टी व्यवस्थित जमावी लागते.

नाटक पाहिले..चांगले आहे पण ब्लॅक कॉमेडीवगैरे नाहीये.. प्रशांत सर असले की धमाल असतेच पण या नाटकात 'मी प्रत्येक वाक्यावर टाळी घेईलच' असा अट्टाहास जाणवतो. शुभांगी गोखले ही अतिशय ओव्हररेटेड अभिनेत्री आहे. तिने केलेली "अतिगृहिणी" इरिटेट करते. मध्यंतरानंतर नाटक अतिशयच प्रेडिक्टेबल आहे.

नाटक ही ठराविक लोकांची मक्तेदारी आहे,त्यांनाच असला प्रकार आवडतो.बाकीचे नाटकांना केराची टोपली दाखवतात.मी ही त्यातलाच.

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

मग तुमची आवड काय? "करंट ४४०", "नाद करायचा नाय", "शांताबाईचा जलवा" असले सांस्कृतिक कार्यक्रम का?

In reply to by श्रीगुरुजी

का? त्यातले कलाकार कलाकार नाहीत का? कोणत्याही क्षेत्राची उतरंड करायची हौस लोक काही सोडत नाहीत?

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, कीती टोकाला नेता हो? आता दामले अन शांताबाई ह्यांच्यामधेअधे काही नसतेच का? आणि आमची अभिरुची तेवढी उच्च, ते एका वर्गाला नाही आवडत तर त्यांच्या सार्‍या आवडी सवंग थिल्लर ही विचारसरणी तर फारच एकांगी झाली.

In reply to by श्रीगुरुजी

मग तुमची आवड काय? "करंट ४४०", "नाद करायचा नाय", "शांताबाईचा जलवा" असले सांस्कृतिक कार्यक्रम का? >>> तुमची ती संस्कृती आणि दुसर्याची ती विकृती का???? बायदवे अश्या उपरोक्त कार्यक्रमाला जाण्यासाठी अंगात आणि रक्तात विशीष्ट गुण लागतात ,तसे गट्स लागतात.ज्यांच्यात असे गट्स नसतात ते मालतीबाई जोशी यांचे भजन आणि सुगम संगीत ऐकत बसतात

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

कुठलाही अनियंत्रित कैफ हा नंतर त्रासदायक होतो. म्हणून मग बंगलोरसारख्या ठिकाणी ३१ डिसेंबर च्या रात्री अनुचित प्रकार घडतात. गटस् नको तितके वाढत जाण्याचा धोका असतो. शास्त्रीय कलाप्रकार आत्मसात करायला प्रचंड मेहनत करावी लागते त्यामुळे वेगळ्या प्रकारचे गटस् असलेले लोक्स त्यात प्राविण्य मिळवतात. ज्याने त्याने आपल्याला रूचेल तो कलाप्रकार आस्वादावा.

In reply to by श्रीगुरुजी

मला अस वाटत की कुठलाही कलाप्रकार आपल्यापरीने श्रेष्ठ असतो़. जोपर्यत कला सादरीकरण प्रेक्षकांना/श्रोत्याना आणि कलाकारांनाआनंददायी आहे तोपर्यंत प्रत्येक कलाप्रकार समान आहे.

माझी टिप्पणी नाटकावर नाहीच आहे त्यामुळे नाटक न पहाता करायला हरकत वाटत नाही. प्रशांत दामलेला मी छोट्या मोठ्या पडद्यावर व प्रत्यक्ष स्टेजवर ही पाहिलेला आहे. मला त्याने हसवले आहे मात्र इतरानीही तसे खुप हसवले आहे रिझवले आहे. नथींग स्पेशल अबाऊट हिम. आणि माझी टिप्पणी ही त्याच्या अभिनयावर नसून उगीचच उदो उदो करणे किंवा हल्ली मुळीच दुर्मिळ नसलेल्या गुणांचे अती कौतुक करणे या आपल्या समाजाच्या सवयींवर आहे हे नीट वाचल्यास लक्षात येइल. बाकि मतभेदाना काहीच हरकत नाही. मजा येते ती मतभेदामुळेच.

In reply to by खाबुडकांदा

माझी टिप्पणी ही त्याच्या अभिनयावर नसून उगीचच उदो उदो करणे किंवा हल्ली मुळीच दुर्मिळ नसलेल्या गुणांचे अती कौतुक करणे या आपल्या समाजाच्या सवयींवर आहे हे नीट वाचल्यास लक्षात येइल. मी काय उदोउदो केलाय? प्रशांत दामलेने या नाटकात अतिशय सहजसुरेख अभिनय केला आहे. त्याविषयी कौतुकाची १-२ वाक्ये लिहिली आहेत. १-२ वाक्यात कौतुक केले की लगेच उदोउदो होतो का? बादवे, रंगमंचावर अत्यंत सहजतेने वावरणे हा दुर्मिळ गुणच आहे. सर्वच कलाकारांना हे जमतेच असे नाही. काही कलाकार रंगमंचावर अवघडलेल्या अवस्थेत असतात किंवा प्रेक्षकांविषयी इतके सावध असतात की त्यांचा अभिनय म्हणजे ओव्हरअ‍ॅक्टिंग व्हायला सुरूवात होते. मी नियमित नाटके बघतो. प्रशांत जाधव आणि भरत जाधव यांच्याइतका सहज अभिनय करणारे व प्रेक्षक किंवा रंगमंचाचे कोणतेही दडपण न घेता अतिशय सहजपणे रंगमंचावर वावरणारे फारसे कलाकार नाहीत.

आपण साखरही खावी व तिखट रस्साही चापावा देवाने भरले असे 'मग' हे आम्हास प्राशावया दामल्यांचा प्रशांत वा लाडांची कविता सविता दामोदर वा शांताबाईचा कार्टा माधुरी अन वर्षा नाना अन लक्षा असती अमुचे लाडके एक एकापेक्षा भांडती फॅन , रंगकर्मी करती मस्त धंदा आपण पोटकर्मी, गेला सांगुन खाबुडकांदा

मथळा वाचून मला वाटले श्रीगुरुजींनी राकाँ च्या लोकांनी सिमला ऑफिसमधे साखरेचे पोते नेउन ठेवले त्यावर उपरोधीक धागा लिहीलाय की काय :-)

नाटक सुंदर आहे. ह्ल्ली इअतकी निर्भेळ करमणूक पहायला मिळत नाही ! प्रशांत दामले नेहमी प्रमाने अप्रतिम ! होय , आम्हाला प्रशांत दामले आणि सचिन तेन्डुलकर दोन्ही आवडतात ! सचिन आमचे दैवत आहे. तुमचं काय म्हणने आहे त्याच्यावर ? लोकांना काय सनी लिओन पण आवडते ... परवा केरळात तिला पहायला अफाट जनसागर लोट्ला होता ... ज्याची त्याची आवड ! फुल्ल रिस्पेक्ट भावड्या अशा लोकांना ! खूश का ?

In reply to by विटेकर

होय , आम्हाला प्रशांत दामले आणि सचिन तेन्डुलकर दोन्ही आवडतात ! सचिन आमचे दैवत आहे. तुमचं काय म्हणने आहे त्याच्यावर ? +१००

प्रशांत दामल्यांचा अभिनय मला आवडतो... एक सीन तो बनता हय भाई ! बाकी गुरुजींची दुसर्‍याची आवड काय असावी या बद्धलची टिप्पणी आवडली नाही... करंट ४४० बद्धल माहित नाही, पण ४४० करंट माझा हे गाणं आपल्याला बाँ आवडतं... तर शांताबाई बरोबरच कांताबाईचा जलवा सुद्धा आवडतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राँझा राँझा करदी वे मैं आपे राँझा होई, राँझा राँझा सद्दो नी मेनू हीर नु आखो कोई... :- Raavan