Skip to main content

निकाल : महाराष्ट्र दिन २०१७ - चारोळी स्पर्धा

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 01/05/2017 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, महाराष्ट दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या खास दिवसाच्या निमित्ताने घेतलेल्या चारोळी स्पर्धेचा निकाल आज जाहीर करीत आहोत. इतक्या कमी मुदतीत सुद्धा आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आणि उत्तमोत्तम रचना पाठवल्याबद्दल सगळ्या स्पर्धकांचे मन:पूर्वक आभार. सर्वच प्रवेशिका खरोखर सुरेख होत्या. स्पर्धेतल्या तीन विजेते खालील प्रमाणे ~~~~~ प्रथम स्थान : उल्का महाराष्ट्राचा परिचय संस्कृतीने घडावा मराठीचा पडघम कर्तृत्वाने वाजावा (टिप : आधीच जाहीर केल्याप्रमाणे या चारोळीला आजच्या बॅनरमध्ये स्थान देण्यात आले आहे) Banner ~~~~~ द्वितीय स्थान : राघव कर्मभूमी अन् ज्ञानभूमी ही अजोड इथली नाती! फुलवायाला माती इथली अगणित तुटली पाती.. "महा"न इतिहासाने नटते "राष्ट्र"भिमानी छाती!! समृद्धतेच्या आकांक्षांच्या लक्ष उजळती वाती!! ~~~~~ तृतीय स्थान : माम्लेदारचा पन्खा "हर हर महादेव" नाद गुंजता सह्याद्री बाहूंना स्फुरण चढे . . . . माऊलीहूनही मृदू होती ते महाराष्ट्राचे या उत्तुंग कडे ! ~~~~~ विजेत्यांचे अभिनंदन आणि स्पर्धकांचे आभार! यापुढेही वेगवेगळ्या उपक्रमांना आपण अशीच उत्स्फूर्त साथ द्याल अशी अपेक्षा ठेवून स्पर्धेची सांगता होत आहे हे जाहीर करतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 20886
प्रतिक्रिया 45

प्रतिक्रिया

अरे वा ! छान !!!! उत्तम बॅनर आणि साजेशा चार ओळी !!!! विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !!! :)

आणि विजेत्यांचे विशेष कौतुक!!! इतक्या अल्पकालीन सुचनेवर भरभरून उत्स्फूर्त चारोळ्या आल्या. मिपाकरांच्या उत्साहाला, कल्पनाशक्तीला, परीक्षकांच्या आयोजनाला, परीक्षकांच्या निवडीला सलाम!!!!

तिन्ही चारोळ्या खूप सुंदर. विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! महाराष्ट्र दिनाच्या मिपाकरांना शुभेच्छा..

कृपया चारोळ्या कुठल्या निकषांवर निवडल्या हे सांगाल तर बरे होईल. महाराष्ट्राची महती गायची होती ना मिपाकरांनी? विषय "महाराष्ट्र" आणि उच्च दर्जाची मराठी भाषा, चारोळीचे व्याकरण, महाराष्ट्राच्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन वगैरे पाहिले तर निवडलेल्या चारोळ्या का निवडल्या गेल्या हे अजिबात कळाले नाही....

In reply to by शार्दुल_हातोळकर

नमस्कार. स्पर्धेतल्या चारोळ्यांचं गुणांकन खालील निकषांवर केलं गेलं: १. विषय २. शब्दसंख्या ३. प्रमाणलेखन ('शुद्ध'लेखन नव्हे) ४. गेयता ५. अर्थ परीक्षण शक्य तितकं वस्तुनिष्ठ असावं असा प्रयत्न होता. पण अर्थात सगळ्याच निकषांत वस्तुनिष्ठता आणता येत नाही. वैयक्तिक 'बायस' येऊ नये म्हणून तीन साहित्य संपादकांनी केलेल्या गुणांकनाची सरासरी काढण्यात आली. विजेत्या तिन्ही चारोळ्यांना तिन्ही परीक्षकांनी दिलेल्या गुणांत विशेष फरक नव्हता.

In reply to by साहित्य संपादक

महाराष्ट्राची महती गायची असा विषय होता, कशाने काय व्हावे आणि पडघम वाजावा हे अपेक्षित होते काय? एकुणच परिक्षणाच्या दर्जाबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मग अशा सुमार दर्जाचे परिक्षण होणार असेल तर इथुन पुढे लोकांनी साहित्य संपादकांच्या विनंतीला मान देऊन सहभाग कसा घ्यायचा? केवळ मी स्वतः सहभाग घेतला होता आणि मला कसा नंबर दिला नाही म्हणुन वादविवाद करतो असे अजिबात समजु नका, पण एक साहित्यप्रेमी आणि महाराष्ट्रभक्त म्हणुन मी माझे म्हणने मांडतो आहे. आता वाचकांनाच ठरवु द्या की वरील तीन निवडलेल्या चारोळ्यांच्या तुलनेत खालील चारोळी कशी वाटते ती (केवळ उदाहरणादाखल). काही अलंकारीक भाषा, महाराष्ट्राचा गुणगौरव, खोल अर्थ वगैरे असते की नाही? बहुविध राज्ये आसेतुहिमाचल जरी नांदती या राष्ट्रामधे नसे तोड शौर्या कलासंस्कृतीला सुखे नांदे जी महाराष्ट्रामधे खरी ज्ञानभक्ती धर्मक्षात्रतेजा मनी जागविते ही पुण्यभूमी चला वंदुया मराठी देवलोका मोहिनी जयाची जगा नेहमी - शार्दुल हातोळकर (लेखन - २८ एप्रिल २०१७)

In reply to by शार्दुल_हातोळकर

आपण दिलेल्या विषयावर सुंदर चारोळी लिहीलेली आहे ! आपल्या 'महाराष्ट्रावर' त्याच्या गुणवैशिष्ट्यांवर लिहीताना आपली मायमराठी अलंकार लेवून सजली - नटली तर ते सुरेख दिसते ! " जय महाराष्ट्र " !!

In reply to by शार्दुल_हातोळकर

तुमची चारोळी खुप आवडली ! अत्यंत उत्कृष्ट आणि अलंकारिक भाषेत स्पर्धेसाठी दिलेल्या विषयास अनुसरुन महाराष्ट्राचे यथार्थ वर्णन....

विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! सा.सं.मंडळी आणि परिक्षकांचे आभार! सर्व मिपाकरांना महाराष्ट्र दिनानिमित्त अनेक शुभेच्छा!

इतर विजेत्यांचे व सर्व स्पर्धकांचे अभिनंदन.

सगळ्या स्पर्धकांचे अभिनंदन ,परीक्षकांचेेे मनापासून आभार . . . . . . . मनाला खूपच उभारी मिळाली . . . .

सर्व मिपाकरांना मनःपूर्वक धन्यवाद! उल्कातै आणि माम्लेदारचा पन्खा दोघांचेही अभिनंदन. बॅनरला अगदी शोभेशा ओळी आहेत!! :-)

सगळ्यांचे. ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचे . विजेत्यांचे तर खास अभिनंदन . अतिशय कमी काळात मिपाकरांनी चारोळ्या लिहिल्या . मजा आली वाचून .

चारोळी स्पर्धेत विजेत्या आणि सहभागी सदस्यांचे अभिनंदन! सर्व चारोळ्या 'एक से बढकर एक' होत्या. महाराष्ट्र दिनानिमित्त 'महाराष्ट्र' ह्या विषयावर चारोळी स्पर्धा घेण्याचा उपक्रम अतिशय आवडला. मिपाचा बॅनरही एक नंबर झालाय.

महाराष्ट्र आणि मराठीवरील 'अतुट विश्वास' या निकष जोडून मी सासं ने निवडलेल्या चारोळ्या पुन्हा वाचल्या तर दोन क्रमांकावर आलेली राघव यांची चारोळी कर्मभूमी अन् ज्ञानभूमी ही अजोड इथली नाती! फुलवायाला माती इथली अगणित तुटली पाती.. "महा"न इतिहासाने नटते "राष्ट्र"भिमानी छाती!! समृद्धतेच्या आकांक्षांच्या लक्ष उजळती वाती!! अधिक उजवी वाटली. पहिल्या आलेल्या चारोळीचे स्वरुप महाराष्ट्राचा परिचय संस्कृतीने घडतो मराठीचा पडघम कर्तृत्वाने वाजतो असे असते तर कदाचीत अधिक भावले असते का असे वाटून गेले.

In reply to by माहितगार

महाराष्ट्राचा परिचय संस्कृतीने घडावा मराठीचा पडघम कर्तृत्वाने वाजावा या स्वरूपात कविला सांस्कृतिक narrative विशीष्ट पद्धतीचा असावा अशी इच्छा आहे. सद्य स्थिती हि सुद्धा एक narrative असते सद्य स्थिती च्या narrative बद्दल प्रश्न विचारणारे आणि मार्गदर्शन करणार्‍या काव्यांचाही सांस्कृतीक narrative वर लाँग टर्म मध्ये प्रभाव पडत असू शकतो पण साशंकता शिल्लक ठेऊन पेक्षा तसा विश्वास असल्याचे सांस्कृतीक narrative तसे वागण्यास आणि संस्कृती तशी घदवण्यास अधिक प्रवृत्त करू शकतात असे माझे व्यक्तिगत मत.

सर्व सहभागींचे अभिनंदन! विजेत्यांचे खास अभिनंदन! शार्दुल हातोळकर यांची ओळीही आवडल्या.

सर्व सहभागींचे अभिनंदन! विजेत्यांचे खास अभिनंदन! शार्दुल हातोळकर यांची ओळीही आवडल्या.

चारोळी स्पर्धेत विजेत्या आणि सहभागी सदस्यांचे अभिनंदन! मिपाचा बॅनरही एक नंबर झालाय.

मिपा बॅनर नेहमीप्रमाणेच उत्तम जमला आहे. विजेत्यांचे अभिनंदन. सगळ्याच चारोळ्या एकसे बढकर एक होत्या. शार्दुल हातोळकर यांची चारोळीही छानच होती. कदचित शब्द संख्येमुळे तिचा विचार झाला नसावा असे वाटते. तांत्रिकरित्या पहिलं तर उल्का यांची चारोळी २ च ओळींची (वाक्य या स्वरुपात पाहिले तर) आहे असे दिसते. त्या २ ओळी ४ ओळींमधे लिहिल्या मुळे तिला चारोळी म्हणावी का असा प्रश्न पडला आहे. अर्थात परिक्षकांचे मत अंतिमच आहे. आणि ते मान्यच आहे.

In reply to by सही रे सई

स्पर्धेच्या नियमानुसार जास्तीत जास्त चार ओळी आणि प्रत्येक ओळीत जास्तीत जास्त आठ शब्द असायला हवे होते. माझ्या चारोळीमधे वर लिहीलेल्या स्पर्धेच्या त्या नियमांचे कुठेही उल्लंघन झालेले नाही. शिवाय चारोळी महाराष्ट्राची महती सांगणारी, गेय आणि विषयानुसारच होती. माझी चारोळी आवडल्याचे नमुद करणाऱ्या सर्व रसिक वाचकांचे मनापासुन धन्यवाद. __/\__

In reply to by शार्दुल_हातोळकर

मित्रा एवढे मनाला लावून घेऊ नकोस, निवड करणारे देखील शेवटी हाड मास असलेली व्यक्ती आहेत, तुझी रचना छान आहे पण जेव्हा स्पर्धा असते तेव्हा आलेला निकाल खुल्या मनाने मान्य करणे व परत नव्या स्पर्धेची तयारी करणे हेच योग्य आहे, कधी कधी आपल्याला निर्णय मान्य होत नाही, म्हणून काही सगळे विरुद्ध मताचे आहेत असे होत नाही ना? अनेकांना तुझी रचना आवडली व मला देखील, पण पंच निर्णय हा निर्णय आहे, त्यांना आवडल्या पटल्या त्यांना त्यांनी क्रमांक दिला पण तू तुझ्या लेखनाची मोजमाप त्यावर का करतोय आहेस?

In reply to by शार्दुल_हातोळकर

मला वाटते, तुमच्या चारोळीमध्ये अजून ओळी वाढवल्यात तर कविता म्हणून ती खरोखरच सुरेख वाटेल. चारोळी हा प्रकार सहसा सुटसुटीत असावा. क्लिष्ट आणि लांबलचक शब्द योजना नसावी. तुम्ही रॉय किणीकर ह्यांचं अतिशय उच्च असं उत्तर रात्र - ह्या अथवा , गेला बाजार चंगोंच्या चारोळ्या वाचल्या असतील. त्या काव्यामध्ये जसा सहजपणा आणि सुटसुटीतपणा आहे, तसा तुमच्या चारोळीत जाणवला नाही. कला संस्कृती हा एक शब्दही होऊ शकत नाही :) - ही तीट समजा. अवांतरः मी परीक्षक नाही पण मिपाकरांचे मत तुम्हांला हवे होते म्हणून लिहिले.

In reply to by यशोधरा

सर्वप्रथम हे स्पष्ट करतो की तुमचे वैयक्तिक मत आम्हाला मान्य आहे, पण..... साध्या चारोळ्या आणि महाराष्ट्रासाठीच्या अर्थगर्भ चार ओळी यांची तुलना कशी काय होऊ शकेल? महाराष्ट्राच्या चार ओळी या ऐकताच रक्त सळसळेल अशाच पाहिजेत. शिवाय हातोळकरांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलेले दिसते आहे कि त्यांचा आक्षेप हा त्यांचा नंबर आला नाही म्हणुन नाहीये. आणि कलासंस्कृती हा एक शब्द कसा काय असु शकत नाही? प्रत्येक गोष्टीला संस्कृती(culture) असते. मराठीत वाचनसंस्कृती, क्रिडासंस्कृती असे इतरही शब्द आहेत. मग इथे कवीला कलासंस्कृती म्हणजे कलेची संस्कृती असे कदाचित अभिप्रेत असावे. राघव यांची चारोळी वगळता इतर दोन रचना या काही महाराष्ट्राचे फार काही वर्णन करत नाहीत.

In reply to by देशप्रेमी

शार्दुलजी पुर्ण कविता लिहा. चारोळीपेक्षा उत्तम जमेल.

सर्व चारोळीकरांचे आणि विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! बॅनरही एक नंबर आहे !

हार्दिक अभिनंदन, विजेत्यांचे ! क्रियाशिल मिपाकरांचा प्रशंसनिय उपक्रम ! मजा आली चारोळ्या वाचायला ! नंबरात न आलेलया, पण उल्लेखनियअसलेल्या चारोळ्यांना मिपाच्या बॅनरवर योग्य त्या निमित्ताने ( दसरा, दिवाळी, साहित्यिकांचे वाढदिवस इ. निमिताने) स्थान देण्यात यावे ही संमंला आग्रहाची विनंती !

सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन!! लावणी अन अभंग सुखे नांदती तसेच तलवार अन बोरूही महाराष्ट्र माझा सदैव पुढेच राहील उज्वल भवितव्याची ग्वाही ही