मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[एक्स्ट्रा शशक] किनारे

भृशुंडी · · जनातलं, मनातलं
"तुला जमेल ना?", अरिकूर्म्याने वृष्णीला प्रश्न केला. "न जमायला काय झालं?", वृष्णीचा सूर दुखावलेला होता. "तसं नाही, ही पहिलीच मोहीम आहे अज्ञातात. आजवर आपल्यापैकी कोणीही हा किनारा ओलांडून पलीकडे गेलं नाही. तू पहिलाच आहेस, म्हणून.." अरिकूर्म्याने स्पष्टीकरण दिलं. "तेही खरंच. आजवर आपण कधीही किनारे ओलांडले नाहीत. पण आता ती वेळ आली आहे. बरंय, येतो मी." वृष्णीने घुमटाची काच बंद केली. अरिकूर्माचे डोळे भरून आले. आजवरच्या कित्येक पिढ्यांनी पाहिलेलं स्वप्न होतं हे. अनेकांनी त्यासाठी बलिदान दिलं, कित्येक जण बेपत्ता झाले. आता गणती संपत आली होती. "दोन-एक-शून्य!" तत्क्षणी पाण्यातून एका अवाढव्य यंत्राने उसळी घेतली आणि ते किनार्‍यावरच्या वाळूतून जमिनीच्या दिशेने धावू लागलं!

वाचने 2022 वाचनखूण प्रतिक्रिया 4

आषाढ_दर्द_गाणे 29/03/2017 - 03:58
कलाटणी आवडली! पण 'किनारा ओलांडणे' म्हणजे कश्या अर्थाने? त्यापलीकडे काय आहे की ज्यासाठी ओलांडायचा आहे किनारा? कोण आहेत अरीकूर्मा आणि वृष्णी? धावणारे यंत्र म्हणजे यंत्रमानव का? नुसती उत्तरं देऊ नका, पुढचे शशक लिहायला घ्या.... :)