Skip to main content

राख !

लेखक चिनार
Published on सोमवार, 12/12/2016
स्मशानातील गर्दी आता सरली होती.पण आजच्या घटनेमुळे, चिरनिद्रेत विश्रान्ती घेणाऱ्या बनाबाईचा आत्मसुद्धा दोन क्षण का होईना पण सुखावला असेल.............. ************************************************************************************* शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या त्या आश्रमात पहाटे चार वाजता हलकल्लोळ माजला होता. त्याला कारणही तसंच होतं. आश्रमात एका साध्वीचा अचानक मृत्यू झाला होता. काही वेळापूर्वी साध्वीच्या खोलीत आगेच्या ज्वाळा दिसल्याने आश्रमातले सगळे तिकडे धावले. पण आग लागल्याचे उशीरा लक्षात आल्याने आता काहीही उपयोग नव्हता. पाण्याने आग विझवण्यात आली पण आता खोलीत केवळ साध्वीच्या शरीराची हाडं आणि राख उरली होती. आता पोलिसांना बोलावणाशिवाय पर्याय नव्हता. थोड्याश्या नाखुशीनेच पण नाईलाज म्हणून आश्रमप्रमुखांनी पोलिसांना पाचारण केले. प्राथमिक तपासावरून साध्वीने आत्महत्या केली असे दिसत होते. कारण आग लागण्यासाठी कुठलाही ज्वलनशील पदार्थ खोलीत नव्हता. शॉर्ट सर्कीट वगैरे भानगडसुद्धा वाटत नव्हती. पण पोलिसांसमोर दोन प्रश्न होते. एक म्हणजे, फक्त हाडं आणि राख यावरून मृत्यू झालाय हे कसं ठरवायचं ? आणि एकवेळ ते जरी मान्य केलं तरी आगपेटी,रॉकेल असं काहीही जवळपास नसताना आग लागली किंवा लावली तरी कशी ? "साध्वीने आत्मदाह तर केलं नसेल ?", कोणीतरी कुजबजलं. झालं ! साध्वीच्या आत्मदाहाची बातमी शहरभर वाऱ्यासारखी पसरली. आश्रमासमोर एकचं गर्दी लोटली. आत्मदाह म्हणजे काय असं प्रश्न लोकं दबक्या आवाजात विचारू लागले. काही धर्मगुरूंनी आत्मदाह विषयावर लगेच वक्तव्य द्यायला सुरु केलं. एका योगगुरूने तर," योगशक्तीने आत्मदाह संभव!" हे बोलून खळबळ माजविली. दुपारी बारा वाजेपर्यंत देशभरात बातमी पोहोचली होती. साध्वीला संतपद देण्याची चर्चा सुरु झाली. तिच्या देहाचे अवशेष अंत्यसंस्कारासाठी सुपूर्द करण्यासाठी पोलिसांवर दबाव आला. नाईलाजाने पोलिसांनी ते सुपूर्द केले पण तपास चालूच ठेवला. संध्याकाळी सहा वाजता, स्मशानात हजारोंच्या उपस्थितीत समाजातील मोठ्या व्यक्तींच्या हातून साध्वीचे अंत्यसंस्कार पार पडले. ******************************************************************************* त्या शहरापासून अंदाजे तीनशे किमी दूर असलेल्या गावातल्या एका लॉज मध्ये तो तिला घेऊन पोहोचला. ती जरा घाबरली होती. "सुटलो एकदाचे", तो म्हणाला. "पकडल्या गेलो तर", ती म्हणाली. "काहीही होणार नाही. आपण निसटलोय ! आता फक्त तू आणि मी !," असे म्हणत त्याने तिला जवळ घेतले. ****************************************************************************** तीन-चार दिवसांपूर्वी मरणासन्न अवस्थेत असताना बनाबाई आपल्या नशिबाला दोष देत होती. आयुष्यभर लोकांची घरातील धुणी-भांडी करता करता बनाबाई चार पैसे तर जोडू शकलीच नाही पण म्हातारपणी आधार देतील अशी चार माणसंसुद्धा जमवता आली नाहीत ह्याची तिला खंत होती. आता मेल्यावर 'चार खांदे' तरी गोळा होतील का ह्याविषयी ती साशंक होती. शेवटी व्हायचे तेच झाले. झोपडीत मृतावस्थेत सापडलेल्या बनाबाईच्या देहाला म्युनीसीपाल्टीच्या गाडीने स्मशानात पोहोचवले. तिसऱ्या दिवशीसुद्धा बनाबाईचं 'तिसरं' करायला कोणीही आलं नाही. अर्थात मेल्यानंतर बनाबाईला ह्या गोष्टीने काहीही फरक पडत नव्हता. रात्र झाल्यावर स्मशानाचा रखवालदार झोपायला गेला. मध्यरात्री खुडबुडीने त्याला जाग आली. पण मढ्यावर नेहमीप्रमाणे कुत्रं चढलं असेल ह्या विचाराने तो परत झोपी गेला. त्याचा अंदाज काही फार चुकला नाही. कुत्रंच होतं पण पिसाळलेलं आणि मानवी रुपातलं ! वीस-बावीस वर्षाचं एक पोरगं धडपडत मढ्याच्या ओट्यापाशी आलं. चिता शांत झाली असली तरी धग अजूनही कायम होती. तो दुसऱ्या ओट्यापाशी आला. बनाबाईच्या देहाची हाडं आणि थोडी राख त्याने जवळच्या पोत्यात भरली. आणि तिथून पसार झाला. आजच्या रात्रीत अजून त्याला बरीच कामं पार पाडायची होती! ******************************************************************************** बऱ्याच वेळ त्याच्या कुशीत झोपल्यावर तिला जाग आली. डोके जड झाले असले तरी आपण स्वतंत्र झालोय ह्या भावनेमुळे तिला मोकळे वाटत होते. एव्हाना त्यालाही जाग आली होती. तेव्हढ्यात कोणीतरी दरवाजा ठोठावला. दरवाज्यावर पोलिसांना बघून दोघेही घाबरले ! ******************************************************************************** पण आजच्या घटनेमुळे, चिरनिद्रेत विश्रान्ती घेणाऱ्या बनाबाईच्या देहाची राखसुद्धा मनात सुखावली असेल ........कारण 'चार खांद्यांची' तिची अंतिम इच्छा चार हजार खांदे पूर्ण करत होते !! **************************************************************************** समाप्त (सत्यघटनेवर आधारित)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 3649
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

भारी लिहिलंय. या घटनेबादल हल्लीच मिपावर वाचलं होतं.

In reply to by संदीप डांगे

ही घटना तीच असावी...पण माझ्या कथेतली घटना अमरावतीला घडली आहे. आमच्या घराजवळच्या जैन आश्रमात. बहुतेक ती साध्वी प्रियकरासोबत सांगलीला पळून गेली होती असं काहीसं स्मरतंय. शिवाय बनाबाईची कथा खरी आहे. बनाबाई माझ्या आजोळी कामाला होती खूप वर्षे (तिचं नाव बनाबाई नव्हतं) . तिच्याच अस्थी ठेवल्या होत्या त्या पोराने साध्वीच्या खोलीत. असो..हे मिपावर आधी आलंय हे माहिती असतं तर कथा लिहीलीच नसती.

In reply to by चिनार

अरे आप तो बुरा मान गये चिनारभाऊ! तुमची कथा छान लिहिली आहे, बनाबाईची गोष्ट माहित नव्हती, साध्वीची राख हि बातमी वेगवेगळ्या ठिकाणी तपशील बदलून आल्याने बऱ्याच लोकांना माहिती आहे.

In reply to by संदीप डांगे

अरे नाही हो संदीप भाऊ..राग वगैरे काही नाही...ही कथा मी २-३ वर्षांपूर्वीच लिहिली होती पण काही कारणाने कुठेही posT केली नाही. आज खूप दिवसांनी संग्रहात सापडली. पण मिपावर अगदी लेटेस्टमध्ये ह्यावर चर्चा झाली असल्यामुळे पोस्ट करण्याचे टायमींग चुकले असे वाटून गेले.

मस्त लिहिलंय...!

तुमचं घर राजापेठेत का हो? तिकडेच झाली होती न बहुदा ही केस, का साईनगर जवळची ? बाकी स्टोरी लैच झकास!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

माझं घर राजापेठजवळ शारदा नगरात आहे. ही घटना राजापेठ ते अंबादेवी मंदिर रस्त्यावर असलेल्या आश्रमात घडली होती. लय गाजली होती गावात..

In reply to by चिनार

माहिती आहे कारण सहाय्यक पोलीस आयुक्त असलेला आमचा एक दूरचा काका ह्या केसचा तपास अधिकारी होता, च्यायला राजापेठ एक अचाट वस्ती हाय बाकी!