गिरीश कुबेर ह्या माणसाबद्दल आपल्याला लई आदर.(होता) त्याची सगळी पुस्तक अगदी घरी घेऊन वाचली. “एका तेलियाने” , “हा तेल नावाचा इतिहास आहे” , “हे युद्ध जीवांचे” “अधर्म युद्ध” ते अगदी हल्ली आलेले “टाटायन”. एकसो एक भारी पुस्तक. मराठीत तरी तेल आणि त्याच्या संघर्षाच्या इतिहासाबद्दल इतर कुणीही काहीही लिहिलेले मला माहित नाही. भाऊने आचार्य रजनिशांची जी बिन पाण्याने केली ते पाहून आपण खुश, माणूस समाजवादी. म्हणजे तसे आपण समाजवादी नाही पण एकंदरीत समाजवाद्यांचे विचार अगदी सगळे नाहीतरी बऱ्याच प्रमाणात आपल्याला पटतात. पण माणूस मदर तेरेसांवरचा लेख मागे घेऊन आणि परत वर किरीस्ताव लोकांच्या पाया पडून पवित्र झाला आणि आपला त्याला विटाळ होईल अशे वाटून आपण जरा लांब राहून मजा बघायला लागलो.
मी शाळेत असताना जरा बरा विद्यार्थी होतो. म्हणजे अगदी कायम पहिला नाही तरी पहिल्या १०त यायचो, आपला एक लय जिगरी फ्रेंड होता. तो पण तसा आपल्यावाणी हुशार, घरी येण्या जाण्यातला आई बापाला चांगला म्हाहीत. एकदा घटक चाचणी होती, बहुधा ५वी असेल.त्याला इंग्रजीचा पेपर थोडा अवघड जात होता, त्याने समोर बसलेल्या अनघा बापट नावाच्या पोरीच्या पेपर मध्ये तोंड घातलं अन मास्तर न धरलं. पोरग या आधी कधी कॉपी न केलेलं त्यामुळे त्याला कुणाला न कळत बघायची ट्रीक माहित नव्हती . मास्तरनी लय हाणला. परत वर पेपर फाडला. आपण घरी येऊन आईला आणि बाबांना सगळी ष्टोरी तिखट मीठ लाऊन सांगितली. दोघांना जरा आश्चर्य वाटल थोडा राग आला, तसाआपल्याला लय चेव चढला अजून काही बाही बोललो असेल ते लक्षात नाही, पण बाबा जे म्हटले ते मात्र कायमच लक्षात राहीलं.
ते म्हणाले, “तू हुशार आहेस, चांगले मार्क पडतात. पेपर सोपे जातात म्हणून तुला कॉपी करायचा मोह होत नाही हे चांगलच. त्याचा अर्थ तू शुद्ध चारीत्र्याचाच आहेस हे खरं. पण तसाच राहशील कि नाही हे कसे कळणार? कधी तुला पेपर अवघड आला आणि आता कमी मार्क पडतील. कदाचित नापास हि होऊ, मास्तर, मित्र, आई, बाबा रागावतील, छी थू होईल असे वाटून समोरच्याचा पेपर बघायचा मोहही जेव्हा होईल तेव्हा तू कसा वागतोस ह्याच्यावर तुझा खरं चारित्र्य ठरेल.”
गिरीश कुबेरचे हि तसेच झाले असावे. नरेंद्र मोदी, भाजप, हिंदुत्ववादी हे तसे SOFT TARGETS, त्यांना लाथा घातल्या तरी तुम्हाला लोक पुरोगामी म्हणणार, पण किरीस्ताव, मुस्लीम तसे नाहीत.( ते इसीस बद्दल लिहिताना पिगी बँक च्या फोटू वरून माशा उठल्या होत्या तेव्हा असच शेपूट घातलं होतं) त्यांच्या निरीला हात घातला आणि वाट लागली कि राव. लय दबाव आला असल. आपण समजू शकतो पण आमच्या बाबांनी म्हटल्या प्रमाणे कठीण परिस्थितीत तू कसा वागतोस ह्याच्यावरच तर तुझे खरे चारित्र्य ठरते भाऊ.
---आदित्य
प्रतिक्रिया
17 Nov 2016 - 11:11 pm | सतिश गावडे
तुमचे बाबा दवणेंचे फॅन होते का? की तुम्हीच दवणेंची शैली ढापलीत? ;)
रच्याकने या लेखात तुम्ही बाबांचा उल्लेख देशपांडे असा केला नाही.
याचा नेमका संदर्भ सांगू शकाल का?
17 Nov 2016 - 11:28 pm | संदीप डांगे
पिगी बँक वाला किस्सा लोकमत चा आहे
18 Nov 2016 - 2:56 am | स्रुजा
संदर्भ काय आहे? गिरिश कुबेरांच्या कोणत्या विधानाचा, तो मागे घेतल्याचा वगैरे?
ज्यांना काही माहिती नाही त्यांना आधी व्हर्जिनल घोळ वाचुन मग तुमचं भाष्य वाचल्यास बरं पडेल.
18 Nov 2016 - 12:08 pm | अनुप ढेरे
मदर टेरेसांवर टीका करणारा लेख लिहिला होता. दोन दिवसांनी बिन्शर्त माफी मागितली कुबेरांनी.
18 Nov 2016 - 3:14 am | अनन्त अवधुत
कुबेरांबद्दल आदर पण काही राहिला नाही. (माझा आदर नाही म्हणून त्यांना काही फरक पडत नाही, ना मला. पण ते एक असो.)
तो पिगी बँक वाला किस्सा लोकमत चा आहे. त्याबद्दल मिपावर घमासान चर्चा झाली होती.
त्या केस मध्ये चूक लोकमत ची पण होतीच. कसलेही सांस्कृतिक संदर्भ लक्षात न घेता तो फोटो छापला होता. content management मध्ये geo-cultural संदर्भ प्रचंड महत्वाचे असतात. आणि हे माध्यमातल्या लोकांना कळायला हवे होते. त्यामुळे तशी प्रतिक्रिया आली. मी प्रतिक्रियेची समर्थन करत नाही पण चूक माध्यमाने केली होती त्यांनी माफी मागितली.
18 Nov 2016 - 6:23 am | आदित्य कोरडे
ओ चूकच झाली खरी ..... दुरुस्त करतो लवकरच , धन्यवाद!
18 Nov 2016 - 12:27 pm | मराठी कथालेखक
मागे घेतला तरी ePaper वर अजून वाचू शकता.
हा दूवा
20 Nov 2016 - 2:53 am | अगोचर
कोणीतरी या माहितीवर लेख लिहिला हे बरे झाले. त्यांना माफ़ी मागावी लागावी हे दुर्र्दैव.
18 Nov 2016 - 1:06 pm | वरुण मोहिते
आमच्या घरच्यांचे स्नेही आहेत जवळचे . बाकी अग्रलेख आणि पुस्तक हा वेगळा प्रकार आहे .त्यांची पुस्तक चांगली असतात काहीवेळा अग्रलेख चुकतात . संपादकीय लिहावं तर गडकरी, तळवलकर, टिकेकर, असे आमचे मत बाकी परंपरा पाहिल्यात तर खूप जबरदस्त लोक आहेत .हिंदू पेपर चे संपादक आणि त्यांचा लिखाण पहा . किंवा इकोनॉमिक टाइम्स चे संपादक .असे खूप आहेत त्यावर स्वतंत्र लेख होईल . पण पुस्तक आणि संपादक याची गल्लत नको .बाकी संपादकीय मागे घेण्याची आधीही काही उदाहरणे आहेत .चर्चा झाली तर सांगतो नक्की .
18 Nov 2016 - 1:15 pm | सतिश गावडे
वृत्तपत्रांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत असताना लोकसत्ता हा मराठी वृत्तपत्रांमध्ये एकमेव आशेचा किरण होता. आता त्यालाही ग्रहण लागू पाहत आहे.
लोकसत्ताची शनिवारची चतुरंग आणि रविवारची लोकरंग या पुरवण्या वाचकांसाठी वाट पाहण्याची गोष्ट असायची.
20 Nov 2016 - 8:34 am | बोका-ए-आझम
या दोन वेगळ्या व्यक्ती असाव्यात इतका फरक आहे. कदाचित पुस्तकं लिहिताना जे स्वातंत्र्य लेखकाला असतं ते संपादकाला उपलब्ध नसावं. टीव्ही आल्यापासूनच वृत्तपत्रांचा दर्जा खालावायला सुरुवात झाली होती. इंटरनेटने तर अनेक पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत त्यामुळे वृत्तपत्रांची पंचाईत झाली आहे.