✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जप

न
निनाद यांनी
Tue, 10/11/2016 - 05:15  ·  लेख
लेख
इशारा: सदर लेख धार्मिक लिखाण या प्रकारात येऊ शकतो. ज्यांना या लिखाणाची अ‍ॅलर्जी असेल त्यांनी येथेच थांबावे, पुढे वाचू नये. तसेच या लेखात प्राचीन भारतीय विचारांची भलामणही आहे. ज्यांना याचा त्रास होतो त्यांनीही त्यांनी येथेच थांबावे, पुढे वाचू नये. या लेखातील दावे काही जणांना वैज्ञानिक स्वरूपाचे वगैरे वाटू शकतील. तर ते दावे तसे नसतीलच अथवा असतीलच असेही नाही. इशारा संपला! --- हा लेख येथे का? पैसा ताईंनी प्राचीन भारतीय वेद पुराणे विज्ञान हा कायप्पा समुह काढताना सांगितले होते की तेथे काही चांगली चर्चा झाली तर ती येथे ही यावी. त्यांची आज्ञा पाळून हे लिखाण येथे देत आहे. ते गोड मानून घ्यावे. लिखाण करताना ते कायप्पा साठी केलेले असल्याने त्यात विस्तारभय आलेलेले आहे म्हणून लेखाची लांबी कमी आहे. यातील अनेक मुद्दे विस्ताराने चर्चा करण्याजोगे आहेत. तशी मुद्द्याला धरून चर्चा झाल्यास विषय अधिक उलगडला जाऊ शकतो. मिपा वर या विषयावर अनेक अधिकारी व्यक्ती आहेत त्यांनी उदार मनाने यावर अधिक लिहावे. तसेच माझ्या लेखनात काही चुका झाल्या असल्यास दाखवून द्याव्यात व त्यासाठी माफ करावे. गुरूदेवांच्या कृपेने हे लिखाण झाले, यात माझे असे काही नाही. त्यामुळे कोणताही प्रताधिकार नाही. (तुम्ही हा लेख आनंदाने कॉपी पेस्ट करून शेयर करू शकता. मात्र लेखनात बदल करण्यापुर्वी माझी परवानगी आवश्यक राहील) जप प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान व त्यातील पद्धती वापरल्यास हे मनुष्याचा सर्वांगिण विकास करण्यास मदत करते करते. त्यातले अगदी छोटेछोटे उपायही सबळ असतात आणि मोठा परिणाम करून जातात. उदाहरणार्थ जप. आता जप केल्याने कसला काय फरक पडणार म्हणून झिडकारून टाकणे सहज शक्य आहे. पण याच वेळी 'करून तर पाहू या' असा विचारही करता येईल. निव्वळ मनाला शांतता म्हणून हवा असल्यास जप कुठे ही करता येतो. जप केला की चटकन मन एकाग्र व्हायला मदत होते. काही वेळा जप केल्याने आपला आत्मविश्वास वाढला असेही अनुभवास येते. जप हा भक्ती मार्गातला साधनेचा सर्वात सोपा प्रकार आहे. फक्त इष्टदेवतेचे स्मरण, असा जप सहज शक्य असतो. किंवा हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हा सर्वगुरू मान्य जपही करता येतो. पण जप करण्या आधी त्याची पद्धती व्यवस्थित माहिती करुन घेणे आवश्यक राहील. जपाचे अनेक प्रकार आहेत. त्यातील तीन प्रमुख प्रकार आपण पाहू या. खालील माहिती वाचल्या नंतर लगेच जप करण्याची घाई करू नये. ज्या प्रकार चा जप गुरू ने दिला असेल तोच करावा. यासाठी योग्य गुरू फार महत्त्वाचा असतो. मन एकाग्र करून जप केला पाहिजे. जप ही एक प्रकारची सिद्धी आहे आणि ती साधनेतून मिळवावी लागते हे ध्यानात ठेवावे. तर अशा या जपाचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी प्रमुख जपांचे प्रकार व परिणाम आपण पाहू या. वाचिक जप - वाचेने केलेला जप म्हणजे वाचिक जप. म्हणजे मोठयाने उच्चार करून मंत्रांचे पठण. प्रत्येक शब्द त्यातील वर्ण सुयोग्य प्रकारे अनेकवार उच्चारले जातात. अत्यंत साधी आणि सोपी क्रिया असते. परंतु मनाची एकाग्रता यात अपेक्षित आहे. वाचिक जप केल्याने मेंदु मध्ये काही घटना घडू लागतात. यामुळे मेंदूतील Broca या विभागावर परिणाम होतो. हा विभाग जप केल्याने उद्दीपित होती असे म्हणतात. ब्रोका हा विभाग मेंदू मध्ये फ्रंटल लोबच्या खाली असतो. ब्रॉडमन एरिया 44 आणि 45 असे त्याचे दोन भाग आहेत. ब्रोका आणि फ्रंटल लोब यांचे एकमेकातील संबंध अजून पूर्णपणे सुस्पष्ट झालेले नाहीत. परंतु ते उद्दिपीत होतात हे आढळते. पण एरिया 45 हा प्रि फ्रँटल कॉर्टेक्सला जास्त जोडलेला आहे. यांचा संबंध अर्थात भाषा या विषयाशी आहे. आणि वाचिक जप हा भाषेतूनच केला जातो. त्याच वेळी निर्णय क्षमता हे महत्त्वाचे कार्य फ्रंटल लोब करतो. आणि निर्णय शब्दबद्ध करण्यासाठी ब्रोका विभाग मदत करतो असा त्यांचा एकमेकांशी संबंध आहे हे सिद्ध झाले आहे. यानुसार वाचिक जपाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. जप कसा करावा याची शास्त्रशुद्ध विवेचन आपल्या ऋषींनी केलेले आहे. ते ग्रंथ शोधून त्याचे अधिक अध्ययन आपण केले पाहिजे असे वाटते. उपांशु जप मन एकाग्र करणे आणि भाषिक केंद्राची मदत म्हणून वाचिक जप कार्य करतो. आता उपांशु जप आणि त्याचे परिणाम पाहू या. वाचिक जपामध्ये मन एकाग्र होण्याची प्राथमिक सवय झाली आहे. त्या पलिकडे पोहचण्याची साधना झाली की मग उपांशु जपाची साधना सुरू होते. वाचिक जप ही जप साधनेतील पहिली पायरी आहे उपांशु जप ही पुढील. हा जप करतांना जिभेची हालचाल होते परंतु स्वर मात्र निव्वळ आपल्याला ऐकु येतील इतके कमी असतात. याचे कारण म्हणजे आता बाह्य आवाज 'दाबून टाकण्याची आवश्यकता' उरलेली नसते. मनाचा ताबा अधिक प्रबळ झालेला असतो. अर्थात बाह्य जगात कितीही कोलाहल असला तरी मन स्थिर व एकाग्र असल्याने त्याचा आपल्या साधनेवर परिणाम होत नाही. आणि स्थितप्रज्ञता हे कोणत्याही भारतीय अध्यात्मिक साधनेतील उद्देश्य असते. उपांशु जप करत असताना मेंदुच्या सर्व भागांवर परिणाम होतो. कारण सर्व भाग आपल्याला एकाग्रतेसाठी मदत करतात. परंतु त्यातीलही मेंदुतील पुढील भागावर म्हणजे फ्रंटल लोबवर जास्त परिणाम होते असे आढळते. हा विभाग स्वतः वरील नियंत्रण राखण्याचे कार्य करतो. या शिवाय मनाची एकाग्रता ठेवण्यासही हा भाग मदत करतो. रोज केलेल्या उपांशु जपाने या भागात कायमचे बदल घडतात. हे बदल एकाग्रता आणि स्व-नियमन यासाठी उपयोगी पडतात. या शिवाय काही प्रमाणात सेरेबेलम या स्मरणशक्तीचे नियंत्रण करणार्‍या भागावरही या जपाचा परिणाम होतो. तसेच ब्रेन स्टेम म्हणजे मेंदुचा मध्य भाग, हा संदेशांची देवाणघेवाण नियंत्रित करतो. हा भाग उपांशु जपात कार्यरत होतो. उपांशु जपामध्ये हा विभाग एकाग्रतेचे संदेश फ्रंटल लोबला देतो आणि मग फ्रंटल लोबला तसे कार्य करण्याची सवय लागते. मानस जप अतीव आनंदही नको आणि दु:खी मन:स्थिती ही नको. स्थितप्रज्ञपणे समत्वाने जगाकडे पाहण्याची दृष्टी आणण्यासाठी आपल्या ऋषींनी अनेक साधना विकसित केल्या होत्या त्यातली प्राचीन साधना म्हणजे जप! स्थितप्रज्ञतेकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. पण स्थितप्रज्ञ राहणे फार अवघड आहे. पण मनाला सवय करून जास्तीत जास्त काळ स्थितप्रज्ञ राखता यावे यासाठी सामान्यजनांचा मार्ग जप हा आहे. वर आपण वाचिक जप, उपांशु जप व त्याचे मेंदूवरील परिणाम पाहिले आहेत. आता आपण सर्वात उच्च कोटींचा जप म्हणजे मानस जप याचा विचार करू या. हा जप करताना आपल्याला मिळालेल्या गुरूमंत्रावर संपूर्ण एकाग्रता अपेक्षित आहे. त्यातील प्रत्यके अक्षराचा विचार करायचा आहे. वाचिक जपात इतर आवाज आपल्याला येऊ नयेत म्हणून आपण मोठ्याने जप करून स्वतः ला या भौतिक जगापासून वेगळे करतो. उपांशु जप करताना बाहेरील आवाजापेक्षा मनातील प्रभावी एकाग्रता वाढलेली असते. पण मानस जपात निव्वळ विचारांच्या आधारे आपण स्वतःला स्थितप्रज्ञतेकडे नेतो. या एकाग्रतेचा उपयोग आपल्या मेंदुला अनेक प्रकारे होतो. वाचिक जपामध्ये भाषेचे केंद्र उद्दीपित, उपांशु जपात फ्रंटल लोब कार्यरत तसा मानस जपात प्रि फ्रंटल कॉर्टेक्स आणि इन्फेरियर फ्रंटल जायरस हे विभाग काम उद्दिपित होत असावेत. हे दोन्ही विभाग मेंदुमध्ये विचार प्रोसेस करतात. प्रि फ्रंटल कॉर्टेक्स कपाळापासून ते ब्रह्मरंध्रा पर्यंत हा पसरलेला असतो. हे दोन्ही मिळून आपल्या विचारांना प्रोसेस करण्याचे कार्य करतात. तसेच यांच्या खालचा भाग स्मृती म्हणूनही काम करतो. इन्फेरियर फ्रंटल जायरस हे आपल्या विचारांचा पैलू बदलण्याचे काम करतात. म्हणजे कल्पना सुचण्यासाठी आवश्यक बाबी पुरवत असते. प्रि फ्रंटल कॉर्टेक्स आणि इन्फेरियर फ्रंटल जायरस हे दोन्ही मिळून अतिशय प्रभावी कल्पना सुचू शकतात. या जपात बहुदा ब्रेन स्टेमही काम करत असावा कारण ब्रेन स्टेम सर्वच मेंदुतील कार्याचे नियोजन करत असतो. अशा रितीने मानस जपाने आपण आपल्या विचार पद्धतीला अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी वापरू शकतो. मेंदुतील न्युरॉन्स जपाने कसे प्रभावित होतात हे सुद्धा तपासून पाहिले पाहिजे. परंतु त्यावर ठाम असे काही लेखन सहजतेने हाती लागले नाही. तज्ञांनी यावर अधिक प्रकाश टाकावा ही विनंती. नियम आता या माहितीमुळे 'आपणही जप करावा' असे वाटत असेल तर लगेच तसे करू नका. कारण याचे काही नियम आहेत. त्याविषयी अधिक विवेचन पुढील भागात. जप हा कुठेही करता येतो. परंतु साधना म्हणुन करत असल्यास नियम आवश्यक असतात. म्हणून जप नेहमी गुरूदेवांच्या सल्ल्यानेच करावा. जप या साधनेचे तीन प्रकार वाचिक, उपांशु आणि मानस हे आपण पाहिले. अजुनही जपाचे प्रकार आहेत परंतु ते योग साधनेत मोडतात व प्राणायाम सहीत करावयाचे आहेत जसे रेचक कुंभक इत्यादी. जप करून मनाची एकाग्रता साधण्याची सोपी युक्ती वापरायची आहे. आपली प्रज्ञा आणि बुद्धी तेज करण्यासाठी याचा वापर व्हायला हवा आहे. जप आणि त्याचा मेंदुच्या भागांवर होणारे परिणाम पाहिले आहेत. तेव्हा भारतीय ऋषींनी जप हा साधन म्हणून वापरला आहे असेही कदाचित म्हणता येईल. आपले गुरू या जप साधना संदर्भात देतील तो मंत्र जपावा. आपल्या गुरूदेवांच्या मार्गदर्शनानुसार जप करावा. जप शक्यतो सकाळच्या वेळी करावा. आधी गार पाण्याने स्नान करावे. जप करण्यासाठी एक जागा असेल तर उत्तम. ही जागा नित्य स्वच्छ असावी. या जागेवर बसण्यासाठी सुती वस्त्र असावे. जप करण्याचा संख्या संकल्प सोडणार असल्यास संकल्प सोडल्यानंतर त्याची कोणतीही वाच्यता करू नये. कारण एकदा संकल्प सोडला की सोडला! जपाआधी कुणाचीही निंदा करू नये. हिंसा क्रोध काम मोह आणि असत्य या विकारातून दूर असण्याचा प्रयत्न असावा. भुक अथवा तहान लागलेली नसावी. मन विचारांवर वाहू लागले तर तर त्याला परत एकाग्रतेकडे आणावे. जपा आधी कुणाशी वाद असू नये तसेच कुणाचे आशिर्वाद घेऊनही जपास बसू नये. काही प्रसंगी जप पुर्ण होत नाही. सर्वांना संसारीक बंधने असतात. अशावेळी मनाला त्रास असु नये. चित्त स्थिर असु द्यावे. जप झाला नाही अशी रुखरुखही असू देऊ नये. जे झाले ते ईश्वर चरणी सोडावे आणि स्वस्थ मनाने कार्यास लागावे. जी नियतीची इच्छा त्या प्रमाणे होणार आहे हे ध्यानात असावे. परत पुढील वेळी शांतपणे जपास बसावे. जप करण्या आधी मन निर्भय असावे. थोडक्यात निर्विकार मनाने जपास बसावे. परंतु ईश्वर आणि गुरू यांच्या प्रति श्रद्धा व विश्वास मनात असावा. माळ जपा साठी माळ वापरणार असल्यास माळ एकशे आठ मण्यांची असावी असे म्हणतात. माळ सिद्ध करून घेतल्यास उत्तम. यासाठी निरनिराळे मंत्र आहेत. आपले गुरूजी ही माळ सिद्ध करून देऊ शकतील. जप करताना माळेचा स्पर्श जमिनीला होऊ देऊ नये. तसेच माळेचा मध्य - या सुमेरू म्हणतात- तो पार करू नये. त्यावेळी माळ सुलट करून जप पुढे न्यावा. काही वेळा माळ वस्त्राखाली झाकलेली असावी असे म्हणतात. परंतु यावर मतांतरे आहेत. टिपः माळ कशी वापरावी, कोणत्या बोटांचा कसा स्पर्श करावा या विषयी काही पाठभेदही आहेत. त्यासाठी आपल्या गुरूदेवांचे किंवा गुरुजींची मार्गदर्शन घ्यावे. कदाचित येथे सदस्य ही यावर लिहू शकतील. काही वेळा जप करताना मनावर काही ताण येत आहे असे वाटल्यास जप थांबवावा! मन शांत झाल्यावर परत सुरू करावा. जप हा आपल्या इष्टदेवतेसाठी आहे तसाच आपल्या आनंदासाठीही आहे हे नित्य ध्यानात ठेवा. अशा रितीने जप लेख संपन्न झाला. आपल्याला आपला जप आणि त्यातून मिळणारा आनंद लाभू देत हीच प्रार्थना! ||जय श्री गुरूदेव दत्त||
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
धर्म
समाज
तंत्र
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
सद्भावना
माहिती

प्रतिक्रिया द्या
44766 वाचन

💬 प्रतिसाद (101)

प्रतिक्रिया

तुमच्या प्रतिसादात "कुठेही

संदीप डांगे
गुरुवार, 10/27/2016 - 11:33 नवीन
तुमच्या प्रतिसादात "कुठेही वाचलेले नाही" हा शब्दप्रयोग सतत वाचून विचित्र वाटले, कुठेतरी कोणी लिहिलं म्हणून ते ग्राह्य , कोणतरी लिहिलं आणि "तुम्ही" वाचलं म्हणून ते ग्राह्य, इथे कोणा 'सदस्या'ने लिहिलंय पण 'तुम्ही' पूर्वी वाचलं नसलेलं अग्राह्य... अंमळ अहंकारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

:)

निनाद
Fri, 10/28/2016 - 00:53 नवीन
बरं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अती नाही म्हणजे नक्की किती ?

संजय क्षीरसागर
गुरुवार, 10/27/2016 - 17:54 नवीन
१. तुम्ही म्हणतायं `जसे देव पुजा केल्यावर दहा मिनिटे स्वस्थ बसून केलेला जप वगैरे' परंतु वाचिक > उपांशु > मानस या लेखातल्या स्थिती, दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण साधनेशिवाय अशक्य आहेत. वर एका सदस्यानं म्हटल्याप्रमाणे `जप होणं' (अजपा) ही तर त्यापुढची स्थिती आहे. माझ्या अनुभवानं; विचार करायचा नसतांना, झेन संप्रदायात म्हणतात ती `नो माइंड' स्टेट ही सर्वात श्रेयस स्थिती आहे. नो माइंड म्हणजे आकाशस्थ झालेली जाणीव, संपूर्ण शांतता. अष्टावक्र याला `अनावधानस्य सर्वत्र' (अनफोकस्ड काँशसनेस) म्हणतो. कोणत्याही जपापेक्षा ही सर्वात उत्तम आणि नैसर्गिक स्थिती आहे. २) साधारणतः व्यक्तीच्या मनात अविरत विचार चालू असतात. रात्री दोन ते चार या दरम्यान मेंटल अ‍ॅक्टीविटी संपूर्ण थांबते या अवस्थेला सुषुप्ती असं म्हटलंय. त्या कालावधीत निसर्ग (कॉस्मिक इंटेलिजन्स) संपूर्ण शरीराची (मेंदूसहित) दुरुस्ती करतो त्यामुळे आपल्याला झोपेतून उठल्यावर प्रसन्न वाटतं. ३) अजपामधे बॅकग्राउंडला मंत्र चालूच राहातो, म्हणजे रेडिओवर एक स्टेशन कायम चालू असतं. त्यात स्वेच्छेनं विचार करतांना एका वेळी दोन स्टेशन्स लागतात. जप न करणार्‍याला किमान वेगवेगळी स्टेशन्स लागतात पण अजपात एकच स्टेशन कायम लागलेलं आणि सुषुप्ती नाही. साधा आणि सोपा विचार केला तरी शांतता ही परम विश्रांत अवस्था आहे. त्यामुळे मेंदू जास्त सक्षम, आणि सृजनशील होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

दणदणीत! वेलकम ब्याक सर!!

संदीप डांगे
गुरुवार, 10/27/2016 - 18:17 नवीन
दणदणीत! वेलकम ब्याक सर!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

बरं!

निनाद
Fri, 10/28/2016 - 00:52 नवीन
बरं! अगदी अशक्य वाटत असेल तर करू नका जप मग. इथे काय आग्रह चाललेला नाही. एकाग्र होण्यास मदत करणारी एक पद्धत आणि त्याची माहिती दिली आहे. वापरायची तर वापरा, नसेल वापरायची तर सक्ती थोडीच आहे? झेपत असेल तर करा. नसेल तर नका करू. झोप आणि विश्रांती घेऊन सक्षम वाटत असेल तर तर तसे सही. मर्जी अपनी अपनी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

जप अशक्य नाही, अनावश्यक आहे.

संजय क्षीरसागर
Fri, 10/28/2016 - 01:08 नवीन
आणि त्याची सकारण मिमांसा वरच्या प्रतिसादात केलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

हे

निनाद
Fri, 10/28/2016 - 02:37 नवीन
अनावश्यक कि योग्य हे ज्याचे त्याला ठरवू देत. मला अनुभव चांगला आहे. मन प्रसन्न आणि स्थिर होणे, एकाग्रता वाढणे आणि विपरीत परिस्थितीत धीर वाटणे, सगळ्या स्तरांवर उपयुक्त ठरला आहे. शेवटी जप हे एक तंत्र आहे कसे वापरायचे ते आपण ठरवायचे. जग ट्रक वापरताना सामान वाहून उपयुक्त गोष्टी बनवण्यासाठी वापरते. पण काही मूर्खांनी त्याचा वापर माणसे चिरडण्यासाठीही केला. म्हणून ट्रक वाईट ठरत नाही. मी तर महत्त्वाच्या कामांना जाताना. सकाळी पाच मिनिटे त्या कामा संबंधित सगळ्या टप्प्याचे एकदा मनन करतो, कार्य सफल होऊ दे असा काही वेळ जप करतो आणि मग निश्चिन्त मनाने कामाला लागतो. हे केल्याने माझ्या कडून प्रयत्नात काही कमी राहणार नाही याचा आत्मविश्वास असतो . यापुढे जे होईल ते होईल. बाकी अति सर्वर्त्र वर्ज्ययेत हे तर सर्वमान्य आहे, तसे आधी बोलून झाले आहेच. बाकी मेंदूला रात्रीची विश्रांती वगैरे गोष्टींशी सहमत आहे. तसे पाहायला गेले तर 'जप अनावश्यक आहे' असा तुम्ही ही एका प्रकारे जपच चालवला आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

निनाद, तुम्हांला जप करण्यात

यशोधरा
Fri, 10/28/2016 - 10:06 नवीन
निनाद, तुम्हांला जप करण्यात आनंद असेल तर तुम्ही नक्कीच जप करावा. :) खरे तर ५ मिनिटेही 'एकाग्र' होऊन निर्विचार जप करणेही कठीण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

सहमत!

वैभव पवार
Fri, 10/28/2016 - 14:42 नवीन
खरे तर ५ मिनिटेही 'एकाग्र' होऊन निर्विचार जप करणेही कठीण.
सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

जप वेगळा आणि कामाची मानसिक रिहर्सल वेगळी

संजय क्षीरसागर
Fri, 10/28/2016 - 10:33 नवीन
मी तर महत्त्वाच्या कामांना जाताना...... वरची मानसिक प्रक्रिया निश्चितच उपयोगी आहे कारण त्यामुळे मनात प्रोसेसचा एक ब्लू प्रींट तयार होतो आणि मग शरीर त्याबरहुकूम काम करते. पण जप ही पूर्णपणे वेगळी प्रक्रिया आहे आणि त्यानं मनाला बधीरत्व येतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

जप करणे व होणे या दोन

शाम भागवत
गुरुवार, 10/27/2016 - 07:31 नवीन
जप करणे व होणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मात्र तो धाग्याचा विषय नसल्यामुळे माझ्याकडून पूर्णविराम.
  • Log in or register to post comments

नाम संकीर्तन ... साधन पै सोपे

पाणक्या
गुरुवार, 10/27/2016 - 10:19 नवीन
नाम संकीर्तन ... साधन पै सोपे ... जळतील पापे ... जन्मांतरीची .... न लगे सायास ... न जावे वनांतरा ... सुखे येतो घरा .. नारायण ...
  • Log in or register to post comments

प्रतिसादातल्या दोन्ही मुख्य गोष्टी अधांतरी आहेत

संजय क्षीरसागर
गुरुवार, 10/27/2016 - 23:57 नवीन
जळतील पापे ... जन्मांतरीची .... एकतर पुनर्जन्म ही निराधार कल्पना आहे. शिवाय पापांचा निरास ( गिल्ट फ्री फिलींग) ही स्थिती जपामुळे असंभव आहे कारण जप थांबला की अपराधभाव उसळी मारेल. त्यासाठी एकतर धारणा निरास (पाप-पुण्याबद्दलच्या व्यक्तिगत कल्पनांचे निराकरण) व्ह्यायला हवे किंवा मग स्वत:ला माफ करण्याची जबरदस्त क्षमता हवी. थोडक्यात, व्यक्तिगत मनसिकतेतला सॅडिजम (स्व-पीडन) संपायला हवा. सुखे येतो घरा .. नारायण नारायण ही सुद्धा कल्पना आहे. जर कधी नारायण घरी आलेला दिसला तर ते ऑप्टीकल इल्यूजन असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाणक्या

अजपाजप म्हणजे...

अर्धवटराव
Fri, 10/28/2016 - 00:25 नवीन
माझ्या माहितीनुसार जप म्हणजे मनाचं चैतन्याशी जाणीवपूर्वक कनेक्शन. त्यातल्या आनंदाशी मन व्यवस्थीत इंट्रोड्युस झालं कि मग विनासायास ति आनंदस्पंदनं मनात येत राहातात. तोच अजपाजप. साधना म्हणुन बघता १००% मुक्या, बहिर्‍या, कुठलिही शारीरीक जाणीव नसणार्‍या व्यक्तीला सुद्धा उपलब्ध असलेली हिच एक साधना आहे. बाकी राम जाने.
  • Log in or register to post comments

जप करण्याने काही काळ विचार,

मनीषा
Fri, 10/28/2016 - 07:35 नवीन
जप करण्याने काही काळ विचार, बुद्धी स्थिर होते हे बरोबर आहे. अर्थात ते जप करणार्‍यावर देखिल अवलंबून आहे. काहींना तेही साधत नाही. परंतु मनःशांती लाभते, वगैरे काही खरे नाही. जप संपल्यावर बहुतांशी स्थिती जैसे थे असते. ज्यांना फायदा होत असेल त्यांनी जरूर जप करावा.. पण अतिरेक करू नये.
  • Log in or register to post comments

तिचा नाव

कपिलमुनी
Fri, 10/28/2016 - 09:23 नवीन
तिचा नाव'लक्ष्मी'असता तर जपानेच मी कुबेर झालो असतो
  • Log in or register to post comments

जप(नाम) महात्म्य

llपुण्याचे पेशवेll
Fri, 10/28/2016 - 10:43 नवीन
नामजप(नामस्मरण) सतत करत रहावा असे अनेक संतांनी अगदी तुकाराम, रामदास आजच्या काळात गोंदवलेकर महाराजांनी सांगितले आहे. तस्मात जपामुळे मेमरी लॉस होतो, भ्रमिष्ट होतो वगैरे सगळा उथळांचा भंपकपणा आहे. माझ्या पाहण्यात गायत्री पुरश्चरण केलेले अनेक लोक आहेत. त्यांना मेमरी लॉसही झालेला नाही किंवा ते भ्रमिष्टही झालेले नाहीत. त्यामुळे संतवचनांवर विश्वास ठेऊन नामस्मरण भरपूर करावे. बाकी सगळे द्या सोडून.
  • Log in or register to post comments

संपूर्ण सहमत

श्रीगुरुजी
Fri, 10/28/2016 - 14:07 नवीन
संपूर्ण सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

असो,

संजय क्षीरसागर
Fri, 10/28/2016 - 17:00 नवीन
कोणत्याही जपापेक्षा शांतता प्राथमिक आहे हे निर्विवाद. शिवाय शांतता अनिर्मित आणि व्यापक आहे तर ध्वनी निर्मित आणि कालबद्ध आहे. कोणताही ध्वनी शांततेप्रत नेऊ शकत नाही कारण शांतता म्हणजे निरवता. तस्मात, ज्यांना मनःशांती (नो माइंड)ही श्रेयस स्थिती हवी आहे त्यांनी जपामागे न लागणे उत्तम. शिवाय संतांनी जपाची फलश्रुती ... सुखे येतो घरा .. नारायण ...वगैरे सांगितली आहे. मूळात नारायण किंवा तत्सम गोष्टी या व्यक्तिगत आणि निराधार कल्पना आहेत. त्यामुळे जर कधी नारायण घरी आलेला दिसला तर ते ऑप्टीकल इल्यूजन असेल. याउप्पर ज्यांना जप करायचा त्यांनी करावा. ज्यांना जपसाधनेतला उघड विरोधाभास कळला आहे त्यांनी स्वतः काय तो निर्णय घ्यावा.
  • Log in or register to post comments

मी तरी जप करणार बॉ.

शाम भागवत
Fri, 10/28/2016 - 17:23 नवीन
मी तरी जप करणार बॉ. २५ वर्षे झाली आता जपाला सुरवात करून. मस्त चाललय. जरी कोणी विरोधात बोलले, हिणवले किंवा माझ्या पोस्टचा चुकुन / मुद्दामहून विपर्यास केला तरी आतल्या शांततेला फारसा धक्का लागत नाही. त्यामुळे भाषेतला ठामपणा तसाच राहिला तरी कोणाचा अपमान होईल असे अपशब्द वापरले जात नाहीत. मला शाब्दिक तत्वज्ञानातील शांतता नकोय. मला कायम डोळे मिटून ती मिळवायची नाही आहे. तर मला ती दैनंदिन जिवनात रोज व ती सुध्दा जागेपणी उपभोगायची आहे. गेली २५ वर्षे माझे शत्रूंची संख्या कमी कमी होतीय. कित्येक तर शत्रूंचे मित्र झाले आहेत. तोटा तर अजिबात झालेला नाही. पण तरीपण मी तुमच्या विचारांचा आदर करतो. कारण जेवढ्या व्यक्ति असतील तेवढे मार्ग असू शकतात यावर माझा विश्वास आहे. असो. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अनुभव आवडला.

श्रीगुरुजी
Fri, 10/28/2016 - 20:59 नवीन
अनुभव आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

संक्षी,

श्रीगुरुजी
Fri, 10/28/2016 - 21:01 नवीन
संक्षी, या धाग्यात जपाविषयी चांगली माहिती आहे. जप करणे हे योग्य का अयोग्य का थोतांड हा या धाग्याचा विषय नाही. तुमचा जप या संकल्पनेवर विश्वास नसेल तर इथे जपाविरूद्ध लिहिण्यापेक्षा त्या विषयावर एक वेगळा धागा काढावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

माझेच खरे असा अट्टाहास का?

nanaba
Fri, 10/28/2016 - 21:33 नवीन
तुम्ही मते सांगितलीत हे उत्तम पण त्यातला अट्टाहास पटला नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

हा रिप्लाय क्षिरसागरांसाठी होता

nanaba
Fri, 10/28/2016 - 21:37 नवीन
ATTaahaas
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nanaba

जपामुळे भ्रमिष्टावस्था येते

_मनश्री_
Fri, 10/28/2016 - 17:49 नवीन
जपामुळे भ्रमिष्टावस्था येते किंवा मेमरी लॉस होतो ह्यात काहीही तथ्य नाही मी स्वतः गेली दहा वर्षे नियमित 'श्रीराम जय राम जय जय राम ' हा जप करतीये , रोज किमान अकरा माळा तरी होतातच कधी कधी जास्त सुद्धा , ना मला मेमरी लॉस झालाय ना मी भ्रमिष्ट झालीये , उलट घरातल्या इतरांपेक्षा माझी मेमरी जास्त शार्प आहे , जप करण्याने मला फायदाच झाला पूर्वी माझा स्वभाव खूप तापट होता पण जप करायला लागल्यापासून तापटपणा बराच कमी झालाय.
  • Log in or register to post comments

ये हुई ना बात

शाम भागवत
Fri, 10/28/2016 - 18:11 नवीन
जप करण्याने मला फायदाच झाला पूर्वी माझा स्वभाव खूप तापट होता पण जप करायला लागल्यापासून तापटपणा बराच कमी झालाय
माझाही हाच अनुभव आहे. बरेच शत्रू निर्माण करून ठेवले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

सांगु इच्छीतो

वैभव पवार
Fri, 10/28/2016 - 18:24 नवीन
असे सांगु इच्छीतो की भ्रमिष्टअवस्था प्राप्त करण्यासाठी 11 माळा पुरेश्या नाहीत! दिवस दिवस जप केल्याने ती प्राप्त होते. (विनोद मनावर घेवु नये,_\_ मी तुमच्या जपसाधनेचा मनापासुन आदर करतो_\_)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

जपामुळे भ्रमिष्टावस्था येते

श्रीगुरुजी
Fri, 10/28/2016 - 20:58 नवीन
जपामुळे भ्रमिष्टावस्था येते किंवा मेमरी लॉस होतो ह्यात काहीही तथ्य नाही
+१ नामस्मरणाचे मलाही खूप चांगले अनुभव आले आहेत. परंतु ते सर्व व्यक्तिगत अनुभव आहेत. मला जसा अनुभव येईल अगदी तसाच अनुभव दुसर्‍यांना येईलच असे सांगता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

तापटपणा कमी करण्याचा एक जपापेक्षा सोपा उपाय !

संजय क्षीरसागर
Fri, 10/28/2016 - 18:42 नवीन
An Empty Boat A monk decides to meditate alone, away from his monastery. He takes his boat out to the middle of the lake, moors it there, closes his eyes and begins his meditation. After a few hours of undisturbed silence, he suddenly feels the bump of another boat colliding with his own. With his eyes still closed, he senses his anger rising, and by the time he opens his eyes, he is ready to scream at the boatman who dared disturb his meditation. But when he opens his eyes, he sees it’s an empty boat that had probably got untethered and floated to the middle of the lake. At that moment, the monk achieves self-realization, and understands that the anger is within him; it merely needs the bump of an external object to provoke it out of him. From then on, whenever he comes across someone who irritates him or provokes him to anger, he reminds himself, “The other person is merely an empty boat. The anger is within me.” Take time for introspection & search for answer: Empty boat is a famous & fabulous metaphor. Its value lies in its implementation.
  • Log in or register to post comments

ती जपाची मशीन असते, काय फायदा

संदीप डांगे
Fri, 10/28/2016 - 18:43 नवीन
ती जपाची मशीन असते, काय फायदा होतो त्याने?
  • Log in or register to post comments

जपाची मशीन तीन प्रकारच्या असू

सतिश गावडे
Fri, 10/28/2016 - 20:47 नवीन
जपाची मशीन तीन प्रकारच्या असू शकतातः १. मशीन स्वतःच जप करते. म्हणजे रेकॉर्डेड जप वाजवते. आपण श्रवणभक्ती करायची. उदा. गायत्री मंत्र. मात्र या मशीन एक छोटेखानी इलेक्ट्रॉनिक सर्कीट असते. आणि आवाज चांगल्या प्रतीचा नसतो. २. जपाची ध्वनीफीत जी दुसर्‍या उपकरणात वाजवता येते. ३. यांत्रिक जपमापकः यात एकदा मंत्र म्हटला/नाम घेतले की यंत्राचा खटका दाबायचा. यंत्रातला आकडा एकाने वाढतो. हा प्रकार खुप पूर्वी मुंबईत लोकलमध्ये पाहीला होता. हेच लोक राम राम लिहून वह्याच्या वह्या भरायचे. नामजपाची ती अभिनव पद्धत होती. सश्रद्धांमध्ये असे एक प्रचलित मत आहे की नामजप स्वतः करणे किंवा दुसर्‍याने केलेला नामजप ऐकणे हे समतुल्य असतात. त्यामुळे जो फायदा स्वतः नामजप करण्याचा तोच फायदा कानाने नामजप ऐकण्याचा असे असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

सश्रद्धांमध्ये असे एक प्रचलित

संदीप डांगे
Fri, 10/28/2016 - 22:04 नवीन
सश्रद्धांमध्ये असे एक प्रचलित मत आहे की नामजप स्वतः करणे किंवा दुसर्‍याने केलेला नामजप ऐकणे हे समतुल्य असता ^^^ हे भारी आहे, नवीन आहे माझ्यासाठी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

जप ही जप

चित्रगुप्त
Fri, 10/28/2016 - 22:12 नवीन
नामजप स्वतः करणे किंवा दुसर्‍याने केलेला नामजप ऐकणे हे समतुल्य असता
तेवढेही कष्ट नकोत करायला. तिकडे तिबेट वगैरें मधे जप लिहीलेली चक्रेच लावून ठेवलेली असतात, हाताने झटका देऊन ती फिरवली, की पडलीच तुमच्या पुण्यात भर. हाय काय अन नाय काय. आता तर काय विजेची मोटरच लावून ठेवत असतील दिवसरात्र. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

आता तर काय विजेची मोटरच लावून

यशोधरा
Fri, 10/28/2016 - 22:15 नवीन
आता तर काय विजेची मोटरच लावून ठेवत असतील दिवसरात्र. > तिथले लोक अजून खूप साधे असल्याने त्यांना हे अजून सुचलेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

शिवलीलामृत नावाच्या ग्रंथात

सतिश गावडे
Fri, 10/28/2016 - 22:19 नवीन
शिवलीलामृत नावाच्या ग्रंथात एक कथा आहे ती पुसटशी आठवते. ती सांगतो. कथा मी शाळेच्या दिवसात ऐकलेली आहे पारायण चालू असताना त्यामुळे तपशिलात चूक असू शकते. एक शिकारी जंगलात फीरत असताना रात्र होते म्हणून झाडावर चढून बसतो. ती शीवरात्र असते. ते झाड बेलाचे असते. झाडाखाली शीवलिंग असते. आणि दूर कुठेतरी गावात शीवरात्रीनिमित्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जप चालू असतो तो शिकार्‍याच्या कानावर पडतो. शिकारी झोप लागून झाडावरुन पडू नये म्हणून स्वतःला जागे ठेवण्याच्या तो प्रयत्न करत असतो. त्यासाठी तो झाडाची एक एक पाने खूडून खाली टाकतो. ही (बेलाची) पाने खाली शीवलींगावर) पडतात. शीवरात्रीला बेलाची पाने शीवनामाचा जप ऐकत शीवलिंगावर टाकणे याने तो कैलासाला जातो हे सुज्ञांस सांगणे न लगे. कुणास नेमकी कथा माहिती असेल तर सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

कथा अशीच आहे पण काहीतरी हरीण

संदीप डांगे
Fri, 10/28/2016 - 22:32 नवीन
कथा अशीच आहे पण काहीतरी हरीण माता व पाडसाचा अंतर्भव आहे ते अंधुक आठवते, त्याचे हत्येचे पाप बेल वाहिल्याने नष्ट होते की कायसे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

अवांतर : पुनर्जन्म

गामा पैलवान
Fri, 10/28/2016 - 19:03 नवीन
संक्षी,
एकतर पुनर्जन्म ही निराधार कल्पना आहे.
हे खोटं आहे. पुनर्जन्माची चिक्कार उदाहरणं सापडली आहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

पुनर्जन्म या विषयावर ठामपणाने

सतिश गावडे
Fri, 10/28/2016 - 21:10 नवीन
पुनर्जन्म या विषयावर ठामपणाने काहीच बोलता येत नाही. डॉ. इयान स्टीवन्सन आणि त्यांचा सहकारी जिम टकर यांनी या विषयावर खुप संशोधन केले आहे. या संशोधनाची चांगली गोष्ट म्हणजे ते कुठेही "या उदाहरणावरुन पुनर्जन्म आहे हे सिद्ध होते" असा स्टँड घेत नाहीत. ते फक्त तशा केसचे रिपोर्टींग करतात. इतरांचेही यावर बरेच लेखन आहे. भारतात मात्र यावर कुणी फार खोलात जात नाही. कारण पुनर्जन्म आहे भारतीयांनी गृहीतच धरले आहे. त्याच्या सुरस कहाण्या रचण्यात भारतीय आघाडीवर असतात. कधी काळी पुनर्जन्म हा माझ्या आवडीचा विषय होता. अगदी पुर्णपणे विज्ञानवादी दृष्टीकोण असूनही. खुप वाचलं या विषयावर. पुनर्जन्म हा हो की नाही असे निसंदिग्ध उत्तर देता येईल असा मुद्दा आहे. मात्र विज्ञान नाही म्हणते. आणि काहींचा अभ्यास उलट सांगतो. यात भारतीयांच्या सुरस कहाण्या अभिप्रेत नाहीत. भारतीय सुक्ष्मदेहाने मंगळावर जाऊन आलो अशा अतिशय उच्च कोटीच्या थापा मारतात. त्या वाचनावरुन मी अशा निष्कर्षाला आलो की पुनर्जन्म ही गुरुत्वाकर्षणाईतकीच नैसर्गिक बाब असू शकेल. आपल्या पूर्वीच्या जन्मांबद्दल न आठवणे हे ही नैसगिक असू शकेल. ज्यांना ते आठवते, ते त्यांच्यातील जन्मवैगुण्य असू शकेल. पूर्वीचे जन्म न आठवणे ही निसर्गाचीच रचना असू शकते. याचा पुढचा भाग असा की पुनर्जन्म हा सिद्धांत स्विकारला की आत्म्याचे अस्तित्वही स्विकारावे लागते. कारण आत्म्याशिवाय पुनर्जन्म संभवत नाही. मग भगवदगीतेतील
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि । तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ।।
हा श्लोक सत्य म्हणून स्विकारावा लागतो. मात्र माझा अंदाज इथेच थांबतो. पुढचे सारे म्हणजे पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, मोक्ष, कर्माचा सिद्धांत या सार्‍या या लोकांच्या कल्पनेच्या भरार्‍या असाव्यात. संत तुकारामांच्या शिष्या बहिणाबाई यांना त्यांचे पूर्वीचे चौदा जन्म आठवत होते असे वर्णन त्यांच्या अभंगांमध्ये आहे. असो. विषयांतर झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

पुनर्जन्म जर खरा असेल तर

प्रचेतस
Fri, 10/28/2016 - 21:45 नवीन
पुनर्जन्म जर खरा असेल तर आत्म्यांमध्ये विभाजन होऊन नवीन नवीन आत्मे तयार व्हायला लागले आहेत का? कारण १७ व्या शतकात जगाची लोकसंख्या ३२ कोटी होती तर आज सुमारे ७ अब्ज. तेव्हा इतके आत्मे नवीन आले असतील हे म्हणणे भाग आहे. मग हे नवीन आत्मे कुठून आले? आत्मविभाजन होऊन नवनवीन आत्मे तयार होतात हे मानले तर भगवद्गीतेतल्याच ' नैनं छिन्दन्ती शस्त्राणी' ह्या श्लोकाला बाधा पोहोचते आणि मग 'वासांसि जीर्णानि'हा श्लोक विसंगत भासू लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

माझं म्हणणं हा केवळ कयास आहे.

सतिश गावडे
Fri, 10/28/2016 - 21:58 नवीन
माझं म्हणणं हा केवळ कयास आहे. तुमचा पहिला मुद्दा मी लिहीणार होतो. मात्र आळस केला. तो प्रश्न मलाही पडतो. वर्षागणिक जगाची लोकसंख्या वर्षागणिक वाढते आहे त्यामुळे नविन आत्मे कुठून येतात हा प्रश्न आहेच. तुमचा दुसरा मुद्दाही तर्काच्या दृष्टीने बरोबर आहे. अर्थात माझे मत हा केवळ कयास (speculation) असल्याने तुमचे शंका निरसन करण्यास मी असमर्थ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आत्मा म्हणजे फक्त

संदीप डांगे
Fri, 10/28/2016 - 22:02 नवीन
आत्मा म्हणजे फक्त मनुष्यप्राण्याची लोकसंख्या नव्हे! एक चौरस फूटात सात अब्ज बॅक्टेरिया असतील तर सात अब्ज आत्मे झाले की, साधना करत पुढच्या टप्प्यावर जातात, काही परत पहिल्यापासून सुरुवात करतात, Energy निर्माण होत नाही नष्ट होत नाही फक्त रूप बदलते हे आत्म्याला लागू होत असावे, त्यामुळे जगातली सर्व आत्म्याची संख्या कायम राहत असावी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=))

प्रचेतस
Fri, 10/28/2016 - 22:15 नवीन
=)) सात अब्ज बॅक्टेरियांचे आत्मे साधना करताहेत हे दृश्य डोळ्यांसमोर आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

=)) =))

संदीप डांगे
Fri, 10/28/2016 - 22:25 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आत्म्याला साधनेची आवश्यकता

सतिश गावडे
Fri, 10/28/2016 - 22:21 नवीन
आत्म्याला साधनेची आवश्यकता नसावी. रँडम सिलेक्शनने फ्री आत्मा कुठेही जन्म घेत असावा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

बुद्ध जातक कथा, चैतन्यप्रभु

संदीप डांगे
Fri, 10/28/2016 - 22:29 नवीन
बुद्ध जातक कथा, चैतन्यप्रभु इत्यादी मागचे सर्व जन्म आठवणाऱ्या महात्म्यांनी सर्व रुपात साधना करत असल्याचे सूचित केले आहे, जन्म घेण्याचा आणि साधनेचा नेमका संबंध नाही पण कर्म आणि जन्माचा आहे व त्यात सिलेक्शन random वाटत असले तरी कर्माधिष्ठित आहे हे 'मानले' जाते... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

पुनर्जन्म आणि कर्म यांचा

सतिश गावडे
Fri, 10/28/2016 - 22:37 नवीन
पुनर्जन्म आणि कर्म यांचा संबंध जोडला जाऊ लागला की मी त्या विषयावर लिहीणे थांबवतो. कारण तिथे त्या कल्पनेचा नैसर्गिकपणा संपतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

इ हमका पता रहीब... =))

संदीप डांगे
Fri, 10/28/2016 - 22:53 नवीन
इ हमका पता रहीब... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

सतराव्या

वैभव पवार
Fri, 10/28/2016 - 23:44 नवीन
सतराव्या शतकात वाघ, सिंहाचा संख्या किती असेल साधारणतः?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

शिवसैनिकांएवढी

कपिलमुनी
Sat, 10/29/2016 - 00:41 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव पवार

पुनर्जन्म, ८४ लक्ष योनींचा फेरा वगैरे

चित्रगुप्त
Fri, 10/28/2016 - 21:54 नवीन
पुनर्जन्म जर खरा असेल तर आत्म्यांमध्ये विभाजन होऊन नवीन नवीन आत्मे तयार व्हायला लागले आहेत का? कारण १७ व्या शतकात जगाची लोकसंख्या ३२ कोटी होती तर आज सुमारे ७ अब्ज. तेव्हा इतके आत्मे नवीन आले असतील हे म्हणणे भाग आहे. मग हे नवीन आत्मे कुठून आले?
पुनर्जन्म, ८४ लक्ष योनींचा फेरा वगैरे सर्व डीटेलवार समजून घ्यायला खालील लेख वाचा: http://www.misalpav.com/node/23698
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा