मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाकिस्तानवरचा सर्जिकल स्ट्राईक आत्ताच का केला गेला ?

डॉ सुहास म्हात्रे · · काथ्याकूट
पाकिस्तानवरचा सर्जिकल स्ट्राईक्स हा केवळ लोकक्षोभामुळे, राजकिय प्रतिस्पर्ध्यांवर ब्राऊनी पॉईंट्स मिळविण्यासाठी किंवा केवळ मतपेटीकडे पाहून केले गेले, असे अनेक प्रवाद सद्या ऐकू येत आहेत. याबद्दलचे माझे विचार खालीलप्रमाणे आहेत. जनक्षोभ : लोकशाहीत कोणत्याही लोकाभिमुख नेत्याला "जनतेची तगमग" दुर्लक्षून जमत नाही. त्याला राजकारणात शिल्लक राहण्यासाठी लोकमताची कदर करावीच लागते. परंतू, अंतिमतः त्याबाबत काय कारवाई केली जाईल व ती कोणत्या स्वरूपात केली जाईल हे अनेक घटकांवर अवलंबून असते. राजकिय इच्छाशक्ती व ती वापरण्याची धमक : सर्जिकल स्ट्राईक सारखी (ज्याचा परिणाम (इस्कॅलेशन) सर्वंकष युद्धामध्ये होऊ शकतो) कोणतीही आक्रमक कृती डोके गरम करून किंवा केवळ स्वतःचा पुरुषार्थ दाखवण्यासाठी केल्यास बाजू आपल्यावर उलटून देशाचे, आपल्या पक्षाचे आणि नेत्याच्या स्वतःच्या राजकिय जीवनाचे न भरून येणारे नुकसान होऊ शकते.यासाठी "राजकिय इच्छाशक्ती व ती वापरण्याची धमक" असावी लागते. जी भारतातर्फे आजपर्यंत १९६५, १९७१, कारगिल ही युद्धे आणि आताचा सर्जिकल स्ट्राईकचा अपवाद सोडता दिसलेली नाही. आंतरराष्टिय संघर्ष आणि मित्रराष्ट्रे : जागतिक स्तरावर राजकिय इच्छाशक्ती व ती वापरण्याची धमक असणे इतकेच पुरेसे नसते. कारण, कोणत्याही मोठे युद्धाचे स्वरूप केवळ दोन देशांतले युद्ध असे राहत नाही तर ते दोन विचारसरणींमधे विभागलेल्या देशांचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष सहभाग असलेले युद्ध असे बनते. म्हणजे ज्या देशाच्या गटाचे वजन जास्त तो अंतिमतः जिंकतो. उदा. भारत-पाक युद्धात पाकच्या पारड्यात चीनचे वजन (पक्षी : राजकिय-सामरिक पाठींबा) धरावेच लागेल आणि त्याला तोलून शिवाय जास्त होईल अश्या एक किंवा अनेक देशांचे वजन आपल्या पारड्यात असणे जरूर असते. त्यामुळे, परदेशाबरोबरच्या आक्रमक कृतीअगोदर जागतिक स्तरावर आपले सबळ पाठीराखे मित्र देश (आक्रमक कृती केल्यावरही आपल्या मागे उभे राहणारे) असणे जरूर असते. हे जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही दर युद्धाअगोदर हे करावेच लागते. हेच १९७१ च्या युद्धाअगोदर इंदिरा गांधींनी वर्ष-दीड वर्ष जगभर भेटी देऊन केले होते. जगातली पत आणि ती वापरण्याची धमक : यासाठी, किमान "आमच्या बाजूला असा किंवा असून नका, तुमची मर्जी. आम्ही आमच्या हितसंबंधांसाठी जरूर ती कृती करणारच. पण आमची न्याय्य बाजू न घेतल्यास, जगाच्या पुढे अंतिमतः तुमचेच नैतिक नुकसान आहे." इतके तरी पटवून देण्याची गरज असते. हे यशस्वीपणे करायला आपल्याकडे एक चांगली नीति असणे आणि तिच्यावर आपला ठाम विश्वास असण्याची गरज असते. असे १९७१ च्या युद्धात केले गेले होते. सद्याच्या सर्जिकल स्ट्राईक्सनंतर, भारताच्या बाजूने अनेक मित्रराष्ट्रे असल्याने आणि पाकिस्तान जागतिक स्तरावर एकटा पडून त्याने "स्ट्राईक्स झालेच नाहीत" असा कातडीबचाऊ पवित्रा घेतल्याने भारताला इतक्या पुढच्या पायरीवर जाणे जरूर पडलेले नाही. जगामध्ये आपली समंजस प्रतिमा स्थापन करून मित्र मिळवणे व शत्रूंना वेगळे पाडणे : मोदींनी सत्तेवर आल्यापासून पाकिस्तानसोबत मित्रत्वाचे संबंध स्थापन करण्यास अगदी टोकाचे प्रयत्न केले आहेत हे जगाला दिसले आहे. हे त्यांच्या मूळच्या आक्रमक प्रतिमेला छेद देणारे असल्याने त्यांचे पाठीराखे व विरोधक यांना बरेच गोंधळाचे व आश्चर्यकारक वाटले. किंबहुना त्यासाठी त्याना देशांतर्गत टीकेचे व चेष्टेचे धनी व्हावे लागले आहे. मात्र, देशांतर्गत आणि जागतिक वारे पाहिले असता, जर सत्तेवर आल्या आल्या त्यांनी पाकिस्तानबरोबर कडक वागणे सुरू केले असते तर जागतिक स्तरावर त्यांची आतताई नेता अशी छबी निर्माण झाली असती. शिवाय, त्यांना अगदी हिटलरपर्यंत नावे ठेवणार्‍या देशांतर्गत विरोधकांच्या हाती कोलीत दिल्यासारखे झाले असते. मग तर त्यांच्या कोणत्याही आक्रमक कृतीला देशाबाहेरून व देशातून मोठा विरोध होऊन ते एकटे पडले असते. सॉफ्ट पॉवर : (अ) जागतिक स्तरावरची मैत्री मुख्य दोन प्रश्नांच्या सकारात्मक उत्तरांवर अवलंबून असते : १. या देशाशी मैत्री केल्याने माझ्या देशाचा फायदा होईल का ? २. या देशाशी मैत्री न केल्याने माझ्या देशाचा तोटा होईल का ? (आ) आर्थिक हितसंबंध : पाकिस्तानबरोबरच्या मैत्रीच्या प्रयत्नाबरोबरच त्यांनी जगातील इतर महत्वाच्या राष्ट्रांबरोबर मैत्रीपूर्ण व आर्थिक संबंध प्रस्थापित करून आपण व आपला देश युद्धखोर नाही, तर आपला मुख्य उद्येश देशाचा आणि एकंदरीत सर्व जगाचा विकास करणे हाच आहे हे सिद्ध केले. त्या प्रयत्नांच्या परिणामाने अनेक महत्वाच्या देशांबरोबर भारताचे दीर्घकालीन सहकार्याचे व्यापारी, राजकिय, सामरिक आणि पर्यावरणसंबंधी करार झाले आहेत. असे समान हितसंबधावर आधारलेले करार दोन देशांना दीर्घकालासाठी घट्टपणे बांधायला मदत करतात. या बाबतीत बहुतेक सर्व विकसित देश पूर्वीपेक्षा भारताच्या जास्त जवळ आहेत यात संशय नाही. (इ) परदेशांतले भारतिय वंशाचे लोक (इंडियन डायास्पोरा) : अनेक विकसित देशांत लक्षणीय प्रमाणांत भारतिय वंशांचे लोक आहेत. पूर्वी त्यांच्याकडे परकिय चलनाचा स्त्रोत असलेले NRI किंवा PIO यापलिकडे पाहिले गेले नाही. जागतिक राजकारणाचा हा एक महत्वाचा दबावगट मोदींनी हेरला आणि आपल्या प्रत्येक परदेश भेटीत त्याला संबोधित करून आपलेसे केले. या गटाला आपली अगोदर माहित नसलेली ताकद उमगली आहे. हे अमेरिका आणि ब्रिटन मधल्या राजकारणी वार्‍यांत स्पष्ट दिसते आहे. आज आणि पूर्वी संख्येने तेवढेच असलेल्या पण पूर्वी स्थानिक राजकारनात फारसे न दिसणारा हा गट आता दृष्य स्वरूपात आला आहे. या गटाच्या धृवीकरणाने त्यांचे स्थानिक राजकारणातले महत्व वाढले आहे. अर्थातच, त्यांना महत्व देतांना त्यांच्या मूळ देशाकडे दुर्लक्ष करणे स्थानिक राजकारण्यांना शक्य नाही. अमेरिका आणि ब्रिटनमधल्या निवडणूकांकडे वरवर लक्ष असलेल्यांनाही मला काय म्हणायचे आहे ते कलले असेलच. अश्या भारताच्या बाजूने बनलेल्या दबावाचा परिणाम त्या देशाचे भारताशी असलेले द्विपक्षिय संबंध अधिक घट्ट होण्यात होतोच, पण आंतरराष्ट्रिय स्तरावर असे दोन देश एकाच गटात येण्याची शक्यता अजून वाढते. (ई) इतर मित्र देश : अनेक छोट्या देशांबरोबरही करार करून भारताने त्यांना मदत केली यावर अनेकदा टीका केली जाते. उदा : माक्रोनेशियातले नकाशातल्या केवळ ठिपक्यासारखे असलेले देश, दक्षिण आशियातले देश, इत्यादी. याचे खूप फायदे असतात. याचे फायदे पाहण्यासाथी दोन मुद्दे पुरेसे आहेत : (१) संयुक्त राष्ट्रांच्या मतदानात भारताला, अमेरिकेला आणि नकाशावरच्या ठिपक्याच्या आकाराच्या देशाला, दोघानांही प्रत्येकी एकच मत असते. (२) नुकताच भारताने पाकिस्तानातील सार्कच्या सभेवर टाकलेल्या बहिष्काराच्या नंतर एक एक करत पाकिस्तान सोडून इतर सर्व देशांनी बहिष्कार टाकला. या घटनेचे परिणाम दक्षिण आशियापुरते सीमीत राहिलेले नाही, त्याची नोंद आपल्या परिसराच्या बाहेर असलेल्या जगातील सर्व देशांनी घेतली असणारच आणि तिचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव त्यांच्या आजच्या व उद्याच्या कृतींवर पडणार आहे. पाकिस्तानच्या स्ट्रॅटेजिक चुका : हे सर्व चालू असतानाच, पाकिस्तानाने त्याच्या मूळ स्वभावाला अनुसरून आपल्या अतिरेकी कारवाया चालूच ठेवल्या. सुरुवातीच्या दिवसांत, मोदी चिडून काही आक्रमक करतील आणि त्यांना जागतिक स्तरावर अलग पाडून आपल्याला वरचढ होता येईल असे पाकिस्तानला वाटले. मात्र या खेळीला न बधता, त्यांच्या मोदींनी पाकिस्तानच्या दिशेने केवळ शांतीपूर्णच नाही तर "शरीफना वाढदिवसाची भेट" या सारख्या "ऑउट ऑफ द वे" कृती चालू ठेवल्या. यामुळे, पाकिस्तानने मोदी 'केवळ मोठ्या घोषणा देणारा पण पूर्वीच्या नेत्यांसारखा कोणतीही आक्रमक कारवाई करण्याला घाबरणारा नेता आहे' असा स्वतःचा गैरसमज करून घेतला व आपल्या अतिरेकी कारवाया चालू ठेवल्या. याचा परिणाम पाकिस्तान नकळत जगाच्या मनातून उतरत जाण्यात झाला. भारताच्याबद्दलच्या या (गैर)समजामुळे पाकिस्तान इतका गाफिल होता की पूर्वानुभावरून भारतातर्फे काही कारवाई होणार नाही याची त्याची खात्री झाली होती. त्यामुळे, उरी हल्ल्यांसारखे अनेक हल्ले करण्यासाठी त्याने लाईन ऑफ कंट्रोल्जवळच्या अनेक लाँचपॅड्सवर मोठ्या प्रमाणात अतिरेकी जमा केले होते. सर्जिकल स्ट्राईकच्या योग्य संधिची वाट पाहणार्‍या भारतिय सैन्याच्या हे पथ्यावरच पडले. जागतिक स्तरावरचा पाठींबा : पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाया जगाला अगोदर माहित नव्हत्या इतके पाश्चिमात्य देश अज्ञानी आहेत असे अजिबात नाही. पण जो देश स्वतःसाठी काहीच करायची हिंमत दाखवत नाही त्याची बाजू घेणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण करून घेणे इतके सर्वसामान्य माणूसही जाणतो, तर हुशार राजकारणी कसे जाणणार नाहीत. समजा, तुमचा एक शेजारी दुसर्‍याला नेहमी मार देत आहे आणि तरीही दुसरा नेहमी शांततेची माळ ओढत मार खाणे पसंत करत आहे व वर त्याचे नीतिमत्तेच्या नावाखाली समर्थन करत आहे. अश्या भित्र्या व भित्रेपणाचे गोडवे गाणार्‍या माणसाची बाजू घेतल्यास, तो केव्हा कच खाऊन त्याला मदत करणार्‍याची अवस्था कठीण करेल याचा नेम नसतो. अर्थात, अश्या माणसाची बाजू सत्याची असली तरी त्याला पाठींबा देणे मूर्खपणाचे ठरते. जागतिक राजकारणातही हेच मूलभूत सत्य कोणी कोणाची बाजू घ्यावी याकरिता वापरले जाते. सामरिक ताकद आणि तिचा वापर : सामरिक साधनसंपत्तीच्या अनेक कमींशी सामना देत असले भारतिय सैन्य जगातील सर्वोत्तम सैन्यदलांपैकी एक आहे. त्यातही भारतिय कमांडोच्या पात्रतेबद्दल कोणालाही संशय नसावा. कमी होती त्यांना आदेश मिळण्याची. भारतात लोकशाही आहे आणि खर्‍या लोकशाहीत सैन्य मुलकी सरकारच्या अधिकारामध्ये असते. त्यामुळे सरकार कणखर नसले व आदेश द्यायला कचरणारे असले तर उत्तमातले उत्तम सैन्यही हात बांधलेल्या अवस्थेत राहते. यावेळेस भारतिय सैन्याला "योग्य वाटेल त्या वेळेस, योग्य वाटेल त्या प्रकारे" हल्ला करण्याचा आदेश मिळाला आणि अश्या आदेशाची वाट पहात असलेल्या सैन्याने त्या संधीचे सोने केले. हल्ल्यानंतरची अप्रतिम मुत्सद्दी खेळी : हल्ल्यानंतरचे भारतिय DGMO चे केवळ एकुलते एक वक्तव्य जर नीट पाहिले तर त्यातला प्रत्येक शब्द काळजीपूर्वक लिहिला व उच्चारला गेला आहे असे ध्यानात येईल. खालील काही गोष्टी तर जाणीवपूर्वक मांडलेल्या दिसतील... १. हल्ला केवळ पाकव्याप्त काश्मीरमध्ये केला हे स्पष्टपणे प्रतिपादन केले गेले : याचा अर्थ असा की कारवाई (आता पाकिस्तानच्या ताब्यात असली तरी) भारताच्याच भूमीवर केलेली आहे. थोडक्यात, हे एका देशाचे दुसर्‍या देशावर आक्रमण (बूट्स ऑन द ग्राऊंड) नाही (जे एखाद्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वावर आक्रमण आणि म्हणून गंभीर आंतरराष्ट्रिय समस्या समजली जाते). त्यामुळे, जरी पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे कबूल केले असते तरी त्याच्या भारताच्या युद्धखोरीबद्दल कांगावा करण्यावर बंधने आली. २. हल्ला केवळ अतिरेक्यांवर केला होता. पण, त्यात अतिरेक्यांना संरक्षण देत असलेले काहीजण (तसे स्पष्ट्पणे म्हटले नाही तरी त्याचा रोख पाकिस्तानी सैनिकांवर होता हे स्पष्ट होते) मारले गेले हे स्पष्टपणे प्रतिपादन केले गेले : हल्ला अतिरेक्यांवर असल्याने पाकिस्तानला त्याविरुद्ध बोलणे जरा जडच जाणार हे नक्की. कारण तसे केल्यास (अ) आमच्या भूमीवर अतिरेकी आहेत आणि (आ) आम्ही त्यांना संरक्षण देतो, या दोन गोष्टी कबूल केल्यासारखे झाले असते. पण तरीही, दोन पाकिस्तानी सैनिक मेल्याचे खुद्द पाकिस्तानने मान्य करून, DGMO च्या म्हणण्याला अप्रत्यक्ष दुजोरा दिला ! ३. हल्ल्याच्या जागा, मृतांचा अंदाजे आकडा (जो खर्‍या आकड्यापेक्षा खूप कमी आहे असे संकेत आहेत) याचा स्पष्ट उल्लेख केला गेला : यामुळे पाकिस्तानला "हल्ला झाला नाही" असे म्हणणे जितके कठीण होईत तितके कठीण केले गेले. याउप्परही पाकिस्तानने अंतर्गत नामुष्की टाळण्यासाठी "हल्ला झाला नाही" असे म्हटलेच. एका बाजूला "सतत खोटे बोलणारे पाकिस्तानी सैन्य व त्याच्या हातचे कठपुतळी सरकारचे बोलणे" तर दुसर्‍या बाजूला "पात्रता, शिस्त आणि प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध असलेल्या भारतिय सैन्याच्या DGMO सारख्या पदावरील वरिष्ठ अधिकार्‍याचे (ज्याच्यावर त्या हल्ल्याची जबाबदारी होती) आम्ही हल्ला केला असे स्पष्ट निवेदन". अर्थातच पाकिस्तानी माध्यमे आणि काही चुकार भारतिय राजकारणी (दोन्हीही त्यांच्या हितसंबंधी वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध आहेत) काहीही म्हणाले तरी जगभरच्या महत्वाच्या राजकारण्यांना आणि युद्धतज्ञांना खरे अर्थ शोधायला कठीण पडले नाही. ४. DGMO-DGMO संभाषणाची माहिती : भारतिय सैन्याच्या DGMOने आपल्या वार्ताहर परिषदेत "आम्ही ही कारवाई केली आहे आणि दुसर्‍या दिवशी सकाळी पाकिस्तानी DGMO शी फोनवर बोलून त्याला ही माहिती मी सांगितली आहे" असे ठणकाऊन सांगितले. याचा सोप्या मराठीत अर्थ असा : "ऑपरेशनच्या यशासाठी हे ऑपरेशन गुप्त (कोव्हर्ट) होते. पण, ते आम्ही लपवू इच्छित नाही. आम्ही सर्व परिणामांची तयारी केली आहे. आता तुम्हाला काय करायचे ते करा." या वाक्यानंतर जगभरातल्या महत्वाच्या व्यक्तींना भारताच्या "राजकिय इच्छाशक्तीबद्दल आणि ती वापरण्याच्या धमकेबद्दल" संशय राहिला नाही. "आता आवरायचेच असेल तर केवळ नस्त्या कुरापती काढणार्‍या पाकिस्तानलाच आवरावे लागेल" असा सर्व महत्वाच्या देशांचा ग्रह झाला यात आश्चर्य नाही... आणि ते त्या देशांच्या संदेशांवरून स्पष्ट होतेच आहे. त्यातला एकही संदेश (भूतकालाप्रमाणे) भारताला सबूरीचा सल्ला देताना दिसत नाही. यापेक्षा जास्त मुद्दे सांगता येतील. पण, खालील साधार निष्कर्ष काढण्यासाठी सद्या इतके पुरे व्हावेत. शपथ समारंभापासून आजपर्यंत केलेल्या कृतीतून मोदींची राजकिय प्रगलभता दिसली आहे. त्यांनी भारताच्या जागतिक व स्थानिक स्तरावरच्या आर्थिक-राजकिय सबलीकरणासाठी जाणिवपूर्वक एक स्ट्रॅटेजी ठरवून त्या दिशेने मार्गक्रमण केले आहे. वास्तवात असे मार्ग फार थोड्या कालात फळे देत नाहीत. देशाच्या सामर्थ्याची वाढ करणे ही लांबवरची कृती आहे. मात्र, वाढत असलेल्या जागतिक शक्तीचा उपयोग अचानक आलेल्या संधीचा उपयोग करून तरीही "नि-जर्क पद्धतीने" नव्हे तर "योग्य वेळेस, योग्य ठिकाणी, हवा तो परिणाम साधणारा हल्ला करण्याचे" स्वातंत्र्य देणारे आदेश सैन्याला दिले गेले आणि अर्थातच, आपल्या सैन्याने त्या संधिचे सोने करून इतिहास घडवला आहे. कोणता एक झेंडा डोळे मिटून सतत हातात घेण्याइतका मी माझ्या बुद्धीचा अपमान करू शकत नाही. त्यामुळे ज्याला जे श्रेय देणे योग्य आहे त्याला ते देण्याचा प्रामाणिकपणा पाळताना मला कधीच अडचण आलेली नाही. एक देशप्रेमी नागरिक म्हणून मला वरच्या गेल्या दोन-अडीच वर्षांच्या सर्व घटनाक्रमांचा साधार अभिमान आणि आनंद आहे. किंबहुना, हा घटनाक्रम तसाच पुढे चालू रहावा आणि भारताचे पाऊल सतत पुढे पडत रहावे हीच माझी इच्छा आहे. ********************************************************** हा विषय खूप मोठा आहे आणि या एका लेखात पूर्णपणे मांडणे शक्य नाही. पण सहज सुचले ते लिहिले आहे. **********************************************************

वाचने 31348 वाचनखूण प्रतिक्रिया 150

अभिदेश Sat, 10/08/2016 - 01:35
सुरेख विवेचन. मागच्याच महिन्यात 'चाणक्य' मालिका (1991 ची)पुन्हा एकदा पाहिली. अनेकवेळा सध्याच्या आपल्या खेळ्या अगदी चाणक्याने सांगितलेल्या युद्धनीती सारख्या वाटल्या.

In reply to by अभिदेश

चाणक्यनीतितील तत्वे कळत-नकळत जगभरात सर्वत्र वापरली गेली आहेत, वापरली जात आहेत. चीन सुन त्सु याच्या "आर्ट ऑफ वॉर" या पुस्तकातील धड्यांचा सतत वापर करताना दिसतो. या पुस्तकातील बरीच तत्वे चाण्यक्यनीतिवर बेतलेली आहेत... काही तज्ञांच्या मते ते सर्व पुस्तक प्राचीन चीनमधल्या तात्कालिक वास्तवाची पार्श्वभूमी वापरून केलेले चाणक्यनीतिच्या युद्ध व राजकारणासंबंधीच्या भागाचे भाषांतर आहे.

चित्रगुप्त Sat, 10/08/2016 - 01:49
उत्तम लेख. माझे एक निवृत्त कर्नल स्नेही यांनी याच विषयावर लिहिलेला लेख नुक्ताच महाराष्ट्र टाईमात प्रकाशित झालेला आहे. तो हुडकून इथे देईन.

चित्रगुप्त Sat, 10/08/2016 - 02:13
मी वर उल्लेखिलेल्या लेखाचा गोषवारा येणेप्रमाणे (लेखक भारतीय लष्करातील निवृत्त कर्नल आहेत) उरीच्या हल्ल्यानंतर देशभर एक अस्वस्थता पसरली होती.......आपल्यावर आपल्या निष्काळजीपणामुळे हल्ला झाल्याचे शल्य एका सैनिकाला जास्त बोचत असते. मरायची पर्वा नसते, पण हे शल्य घेऊन जगणे महाकठीण असते..... ज्या तुकडीवर असा हल्ला होतो, त्या नंतर त्या तुकडीच्या मनोधैर्यावर बराच परिणाम होतो. ते स्वतःवरचा विश्वास गमावतात. हीच फार गंभीर बाब असते. त्यांना त्यांचे मनोधैर्य परत मिळवण्यासाठी पुन्हा अशा एका कामात घ्यावे लागते, जे केल्याने त्यांचा पुन्हा स्वतःवर विश्वास बसेल! उरी क्षेत्राची निवड करताना ही एक मुख्य बाब सैन्याने लक्षात ठेवली असावी. ..... दुसरा मुद्दा आहे की ह्या मार्गाने एकदा आम्ही एक यशस्वी हल्ला केला, आता पुन्हा ह्याच भागातून आत घुसू, कारण इथले सैनिक आता दबले आहेत असे आतंकवाद्यांना वाटायची शक्यता असते. त्यांच्या मनातील हाच गंड मिटवण्यासाठी ह्याच भागात ह्याच सैनिकांच्या मदतीने अशी प्रखर कारवाई केल्याने आता ह्या मार्गाचा वापर करण्याची त्यांची हिंमतच होणार नाही. ......तिसरा मुद्दा आहे, तो म्हणजे ह्या परिसराची इत्थंभूत माहिती इथल्याच सैनिकांना असते. आत जाण्याचे मार्ग कुठले निवडायचे व आपले सैनिक हल्ला करून परत येईपर्यन्त ते सुरक्षित कसे राखायचे हे त्यांनाच चांगले माहीत असते. ह्या हल्ल्यात आपल्या खास कमांडो पथकाने आत जाऊन हल्ला करायचे मुख्य काम केले, पण त्यांना सर्व मदत केली, ती बिहार व डोग्रा पलटणीच्या घातक प्लॅटुनने. आपली १९ माणसे हकनाक मारली गेल्याचे शल्य दोन्ही पलटणींना होतेच. हा त्याचाच वचपा होता. ......शेवटचे कारण असे, की काही कारणाने पाकने ह्या ब्रिगेडला टार्गेट करून त्यांना नको ती जगभर प्रसिद्धी दिली, म्हणून ह्याच ब्रिगेडच्या क्षेत्रात ह्याच ब्रिगेडच्या अधिपत्याखाली आत्तापर्यन्त कधीच करण्यात आली नव्हती अशी बेधडक कारवाई करून पुन्हा ह्याच ब्रिगेडला त्यांचा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवून देण्याची संधी ह्यामुळे साध्य झाली.....उरीच्या ब्रिगेडच्या दृष्टीने ह्याला असामान्य महत्व आहे कारण आज त्यांना त्यांचा हरवलेला विश्वास मिळाला आहे, व ह्यासाठीच ह्या क्षेत्राची निवड केली गेली असावी.

सचु कुळकर्णी Sat, 10/08/2016 - 02:21
नेहमी सारखेच सुरेख विवेचन आणि कोणता एक झेंडा डोळे मिटून सतत हातात घेण्याइतका मी माझ्या बुद्धीचा अपमान करू शकत नाही. त्यामुळे ज्याला जे श्रेय देणे योग्य आहे त्याला ते देण्याचा प्रामाणिकपणा पाळताना मला कधीच अडचण आलेली नाही. ह्याला सलाम

In reply to by सचु कुळकर्णी

तुषार काळभोर Sat, 10/08/2016 - 08:17
कोणता एक झेंडा डोळे मिटून सतत हातात घेण्याइतका मी माझ्या बुद्धीचा अपमान करू शकत नाही. त्यामुळे ज्याला जे श्रेय देणे योग्य आहे त्याला ते देण्याचा प्रामाणिकपणा पाळताना मला कधीच अडचण आलेली नाही. ह्याला सलाम

In reply to by तुषार काळभोर

अजया Sat, 10/08/2016 - 09:10
कोणता एक झेंडा डोळे मिटून सतत हातात घेण्याइतका मी माझ्या बुद्धीचा अपमान करू शकत नाही. त्यामुळे ज्याला जे श्रेय देणे योग्य आहे त्याला ते देण्याचा प्रामाणिकपणा पाळताना मला कधीच अडचण आलेली नाही.
_/\_

अभिजीत अवलिया Sat, 10/08/2016 - 02:37
सर्जिकल स्ट्राईक करण्याची हिंमत दाखवल्याबद्दल सरकारचे अभिनंदन. सततच्या दहशतवादी हल्ल्यांमुळे सर्वांमध्ये एक प्रकारची निराशा पसरलेली होती जी ह्या घटनेनंतर बऱ्यापैकी नाहीशी झालेली आहे. लेखात उल्लेख केल्या अनेक गोष्टी मान्य आहेत फक्त खालील 2 सोडून. 1) तुम्ही कारगिलच्या युध्दात राजकिय इच्छाशक्ती दिसली असं जे म्हणालात त्याबद्दल माझे मत वेगळे आहे. मुळात त्या वेळी पाकिस्तानने घुसखोरी करून आपला भूभाग बळकावला होता. त्यामुळे सरकारकडे कोणताही अन्य मार्ग न्हवता. कोणीही सत्तेत असते तरी त्याला लष्करी कारवाई करावीच लागली असती. जर भारताने कारवाई करून भूभाग पाकिस्तानच्या तावडीतून मुक्त केला नसता तर भाजपाला लोकांनी शिल्लक ठेवले नसते. कारगिल नंतर काही दिवसात झालेल्या काठमांडू दिल्ली विमान अपहरणाच्या वेळी देखील तेच सरकार सत्तेत होते आणी त्या वेळी त्यांनी घातलेला गोंधळ सगळ्यांनी बघितला होता. 2) शपथ समारंभापासून आजपर्यंत केलेल्या कृतीतून मोदींची राजकिय प्रगलभता दिसली आहे. ह्याच्याशी तर पूर्णपणे असहमत.

In reply to by अभिजीत अवलिया

विनोद१८ Sun, 10/09/2016 - 01:41
शपथ समारंभापासून आजपर्यंत केलेल्या कृतीतून मोदींची राजकिय प्रगलभता दिसली आहे. ह्याच्याशी तर पूर्णपणे असहमत./blockquote> "मोदींची राजकिय अप्रगल्भता" याविषयी जरा सविस्तर विवेचन केलेत तर आम्हा मिपाकरांची राजकिय प्रगल्भ कदाचित अधिक प्रगल्भ होउ शकेल.

सचु कुळकर्णी Sat, 10/08/2016 - 02:44
काहि छोट्या छोट्या बातम्या आपण ऐकतो पाहतो पण त्यामागिल कारण समजायला काहि काल जावा लागतो. जुन २०१६ च्या सुरुवातीला किंवा थोडे आधिच पाक स्थित भारतीय वकिलातीत असलेल्या कर्मचार्याना सुचना देण्यात आल्या होत्या कि ह्यावर्षी मुलांच्या Admission पाक मध्ये करु नका, भारतात किंवा ईतरत्र करा. बलोचिस्तान बाबत च वक्तव्य सुध्दा टाळया खेचण्यासाठी नव्हत तर त्यामागे २ वर्षा ची मेहनत होती हे आता स्पष्ट होतय. ईए काका खुप छान लिहिलय / मांडलय तुम्ही

In reply to by मोदक

बाडीस! जसे आम्हालाही झेंडे खांद्यावर न घेतल्याने द्वेष्टा किंवा खांग्रेसी वगैरे म्हणले जाण्याची भीती असते तसेच काकांचे, त्यामुळे disclaimer आवडला! आम्हालाही लावायला सुरुवात करावी लागणार असं दिसतंय, अर्थात त्याने काय फरक पडणार आहे म्हणा, उन्माद करणारे दोन्ही बाजुंना भरभरून सापडतातच. आपण आपले निवांत चालत राहावे म्हणे.

संदीप डांगे Sat, 10/08/2016 - 08:29
भारी लिहिलंय! _/\_ हे स्त्राईक्स अत्युच्च दर्जाची राजनीती व सैन्याच्या ताकदीचा जबरदस्त संगम आहे, ह्यासाठी मोदीसरकार व सैन्याचे मनापासून अभिनंदन, जबरा धोबीपछाड दिला आहे, राजकीय व्यूहनीतीही एक नंबर, डिजिएमो चे पत्रकार परिषदेतले सादरीकरणही क्लास होते, शब्द आणि शब्द नीट जपून व अर्थगर्भ वापरलेला! अवांतर: तुम्ही झेंडेवाले नाही हे सर्वांनाच माहिती आहे, तेव्हा ते डिस्क्लेमर टाकायची आवश्यकता नाही!

In reply to by संदीप डांगे

डिजिएमो चे पत्रकार परिषदेतले सादरीकरणही क्लास होते, शब्द आणि शब्द नीट जपून व अर्थगर्भ वापरलेला! +१०० परत क्लिप पाहिलीत तर त्यावेळचे त्यांचे डोळे पहा.

नाखु Sat, 10/08/2016 - 08:32
वस्तुनिष्ठ विवेचन लेख... दहा धुराळी धाग्यांच्या शेकडो प्रतिसादातून काहीही निष्पन्न होत नाही तेच एक लेख उल्गडून दाखवतो कुठ्लाही प्रचार्/प्रसार्/भलामण न करता. कोणता एक झेंडा डोळे मिटून सतत हातात घेण्याइतका मी माझ्या बुद्धीचा अपमान करू शकत नाही. त्यामुळे ज्याला जे श्रेय देणे योग्य आहे त्याला ते देण्याचा प्रामाणिकपणा पाळताना मला कधीच अडचण आलेली नाही.
त्यामुळे, परदेशाबरोबरच्या आक्रमक कृतीअगोदर जागतिक स्तरावर आपले सबळ पाठीराखे मित्र देश (आक्रमक कृती केल्यावरही आपल्या मागे उभे राहणारे) असणे जरूर असते. हे जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही दर युद्धाअगोदर हे करावेच लागते. हेच १९७१ च्या युद्धाअगोदर इंदिरा गांधींनी वर्ष-दीड वर्ष जगभर भेटी देऊन केले होते.
मोदींच्याच काय अगदी फडणवीस सरकारच्याही काही चुका झाल्या असतील (नव्हे आहेतही) पण त्यांचे चांगले काम आणि अपेक्षीत विकासाभीमुख भरीव योगदान (तुलनेने) बरेच मोठे असले तर काही चुकांचा मी नक्कीच बाऊ करणार नाही. पण त्या चुकांमधून त्यांनी योग्य तो धडा घ्यावा आणि वेळीच दुरुस्ती करावी इतकी रास्त अपेक्षा नक्कीच ठेवीन. पुन्हा एक्दा उत्तम लेखासाठी अभिनंदन. वाचकांचीच पत्रेवाला नाखु

सामान्य वाचक Sat, 10/08/2016 - 09:17
मोदी / काँग्रेस भक्त किंवा द्वेष्टी नसल्यामुळे लेख पटला भारताच्या परराष्ट्र धोरणात खूप बदल घडून आलाच आहे थंड डोक्याने , व्यूहारचना करून काही राष्ट्रांशी जवळीक, मैत्री केली त्याची फळे दिसायला लागली आहेत अर्थात 10 पैकी 4 आडाखे चुकत हि असतील पण 6 बरोबर पण येत आहेत भारत सुपर पॉवर होणार असे नुसते wishful थिंकिंग करून, ते आपोआप होईल , असा विचार न करता, त्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात झाली आहे हे चांगले आहे

महासंग्राम Sat, 10/08/2016 - 09:38
राजकिय इच्छाशक्ती व ती वापरण्याची धमक" असावी लागते. जी भारतातर्फे आजपर्यंत १९६५, १९७१, कारगिल ही युद्धे आणि आताचा सर्जिकल स्ट्राईकचा अपवाद सोडता दिसलेली नाही.
ईए काका म्यानमार मध्ये पण सर्जिकल स्ट्राईक केलं होतं त्याचा उल्लेख राहिलाय ???
लाईन ऑफ कंट्रोल्जवळच्या अनेक लाँचपॅड्सवर मोठ्या प्रमाणात अतिरेकी जमा केले होते. सर्जिकल स्ट्राईकच्या योग्य संधिची वाट पाहणार्‍या भारतिय सैन्याच्या हे पथ्यावरच पडले.
मला नाही वाटत कोणतेही सैन्य अशी योग्य संधीची वाट पाहत असेल कारण, अतिरेकी विशिष्ट ठिकाणी आहेत असं नेमकं कसं सांगता येईल आणि एकाच गुंतून राहणं सुद्धा धोक्याचं आहे. माझ्या माहितीनुसार पाकव्याप्त काश्मिरात झालेला सर्जी स्ट्राईक हा इंटेलिजन्स ने दिलेल्या माहितीनुसार झाला होता.

In reply to by महासंग्राम

ईए काका म्यानमार मध्ये पण सर्जिकल स्ट्राईक केलं होतं त्याचा उल्लेख राहिलाय ??? राजकिय इच्छाशक्ती व ती वापरण्याची धमक या शीर्षकाखाली म्यानमारमधल्या हल्ल्याचा उल्लेख विसरल्यामुळे नाही तर जाणीवपूर्वक केलेला नाही. कारण, म्यानमारमधला व पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधला, या दोन सर्जिकल स्ट्राईक्सच्या राजकीय पार्श्वभूमीमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. १. म्यानमारमधला हल्ला त्या देशाच्या सहमतीने व समन्वयाने केलेला हल्ला होता. अर्थातच, तेथे आंतरराष्ट्रिय संघर्षाचा प्रश्नच नव्हता. सर्जिकल स्ट्राईक असला तरी ते मुख्यतः एक सैनिकी ऑपरेशन होते, त्याला राजकिय संघर्षाची किनार नव्हती. थोडक्यात, त्या हल्ल्यामुळे म्यानमार युद्ध तर नाहीच पण इतर काही विरोधी कारवाई/तक्रार करण्याचीही शक्यता नव्हती. राजकिय दृष्टीने पाहिले तर, या ऑपरेशनच्या मागे, "राजकिय इच्छाशक्ती वापरण्याच्या धमक" नव्हे तर "आपल्या सरकारची परिसरातल्या देशांना, आपल्या सैन्याने त्यांच्या प्रदेशात जाऊन (बूट्स ऑन द ग्राऊंड) अतिरेक्यांना मारण्यासाठी परवानगी मिळविण्याइतपत मित्रदेश बनवण्याची आंतरराष्ट्रिय स्तरावरच्या मुत्सद्देगिरीतिल (डिप्लोमॅटिक) प्रगल्भता" होती. २. त्याविरुद्ध, दुसर्‍या हल्ल्यात शत्रूराष्ट्राच्या ताब्यातल्या प्रदेशात त्याच्या नकळत शिरून अतिरेकी आणि त्यांना संरक्षण देणारे सैनिक मारले गेले. अश्या वेळी, शत्रूराष्ट्र आपल्यावर हल्ला केल्याचा आणि अघोषित युद्ध छेडल्याचा (जो जागतिक स्तरावरचा गुन्हा आहे), आरोप करून आपल्याला जागतिक स्तरावर अडचणीत आणू शकतो. अजून महत्वाचे म्हणजे असा हल्ला अयशस्वी झाला किंवा त्यात आपलेच जबर नुकसान झाले तर प्रचंड आंतरराष्ट्रिय राजकिय दबाव निर्माण होतोच मानहानी होतेच, पण त्याचबरोबर देशांतर्गतही मोठा दबाव निर्माण होऊन खुर्ची सोडण्याची पाळी येऊ शकते. त्यामुळे या सर्जिकल स्ट्राईकसाठी, राजकिय नेतृत्वामध्ये अत्युच्च्य दर्जाची राजकिय इच्छाशक्ती व ती वापरण्याची धमक आवश्यक होती, आणि ती दाखवली गेली. ================================== मला नाही वाटत कोणतेही सैन्य अशी योग्य संधीची वाट पाहत असेल कारण, अतिरेकी विशिष्ट ठिकाणी आहेत असं नेमकं कसं सांगता येईल आणि एकाच गुंतून राहणं सुद्धा धोक्याचं आहे. माझ्या माहितीनुसार पाकव्याप्त काश्मिरात झालेला सर्जीकल स्ट्राईक हा इंटेलिजन्स ने दिलेल्या माहितीनुसार झाला होता. सद्य परिस्थितीचा विचारात घेऊन योग्य विचाराने, योजनाबद्ध पद्धतीने, योग्य संधी शोधून कारवाई करणेच यशाचे मुख्य गमक असते. कोणी कितीही बलवान असले तरी माथेफिरूपणे केलेली आतताई कृती बहुतेक गोत्यातच आणते. हे मूलतत्व युद्धातच नाही तर जीवनात सगळीकडेच लागू पडते. "मला नाही वाटत कोणतेही सैन्य अशी योग्य संधीची वाट पाहत असेल" असे म्हणता म्हणता तुमच्या शेवटच्या वाक्यात "माझ्या माहितीनुसार पाकव्याप्त काश्मिरात झालेला सर्जी स्ट्राईक हा इंटेलिजन्स ने दिलेल्या माहितीनुसार झाला होता." हा, ती संधी कशी शोधतात, याचा एक मार्ग तुम्हीच लिहिला आहे ! याशिवाय, "आपल्या उपग्रहांच्या मदतीने गोळा केलेला जम्मू-काश्मीर विभागांतला डेटा सैन्याला पुरवला होता" हे इस्रोने माध्यमांत सांगितल्याचे वाचले/पाहिले असेलच. हा झाला दुसरा संधी शोधण्याचा मार्ग. इतरही अनेक मार्ग असतात पण त्यांची फार उघड चर्चा न करणेच बरे. आता प्रश्न आहे संधीची वाट का पाहिली / पहायची असते... १. सर्जीकल स्ट्राईक हे सर्वंकष युद्ध नसते, एकांडा हल्ला असतो. तो केल्यावर, शत्रू सजग होतो व जागतिक राजकारणातले प्लेअर्सही कार्यरत होतात. अर्थात, राजकिय दबाव वाढून तसा हल्ला परत करण्याच्या संधी नगण्य होऊ शकतात. म्हणजे, जे काय साध्य करायचे आहे ते सर्व एकुलत्या एका हल्ल्यात साध्य करायचे असते. तसे न झाल्यास किंवा हल्ला अयशस्वी झाल्यास नामुष्की पत्करावी लागते. २. उरी हल्ल्यानंतर जेव्हा भारत-पाक वातावरण उच्च तापमानाला होते, तेव्हा "भारताच्या प्रतिक्षिप्त क्रियेच्या भितीने सर्व अतिरेकी लाँचपॅड्स / तळ रिकामे करून अतिरेक्यांना सुरक्षित जागी हलवणे" ही पाकिस्तानकडून सहाजिकपणे होणारी कृती होती. अश्या रिकाम्या तळांवर हल्ला करून सैन्याने आणि एकंदर भारताने पूर्ण धोका पत्करूनही जगभर हसे करून घेतले असते. ३. हल्ल्यांच्या जवळपास युएनची सभा होती. सहाजिकपणे, त्या काळात भारत काही कारवाई करणे टाळेल व नेहमीप्रमाणेच आठवड्याभरात "थंड" होईल. नंतर युएनची सभा संपल्यावर आपल्याला अजून हल्ले करायला मोकळे रान मिळेल; अशी अटकळ पाकिस्तान पूर्वानुभवावरून करेल, असा अंदाज आपण बांधणे कठीण नव्हते. पाकिस्तान अगदी तसाच वागला आणि युएनच्या सभेचे सूप वाजण्याच्या सुमारास पाच एक दिवसांत त्याने लाँचपॅड्सवर अतिरेकी जमा करायला सुरुवात केली. या कृतीची माहिती वर सांगितलेल्या आणि इतर मार्गांनी सैन्य जमवत असणारच (संघर्ष असो की नसो, हे त्यांचे नेहमीचेच काम आहे). कारवाईसाठी सैन्य पूर्वीपासून तयार असणारच, सैन्याने २४X७ तयार असावे अशीच अपेक्षा असते. जेव्हा अतिरेकी बर्‍याच संख्येने, कोणत्या वेळी, कोणकोणत्या जागी आहेत याची खात्री झाली, तेव्हाच ती संधी साधून त्या जागांवर हल्ला केल्यामुळेच कमीत कमी वेळेत, कमीत कमी श्रमांत आणि कमीत कमी धोका पत्करून शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान करता आले. या सगळ्यालाच दुसर्‍या शब्दांत "संधीची वाट पाहून (संधी साधून) घाव घालणे" म्हणतात. सरकार आणि सैन्य जेव्हा "आम्ही ठरवलेल्या वेळेला, आम्ही ठरवलेल्या जागी आणि आम्ही ठरवलेल्या प्रकारे उत्तर देऊ; असे म्हणत होते त्याचाही "संधी साधून बदला घेऊ" हाच अर्थ होता.

मार्मिक गोडसे Sat, 10/08/2016 - 09:42
हेच १९७१ च्या युद्धाअगोदर इंदिरा गांधींनी वर्ष-दीड वर्ष जगभर भेटी देऊन केले होते.
रशिया सोडल्यास कुठले बलाढ्य देश भारताच्या मागे खंबीरपणे उभे होते? उरीचा हल्ला झाला नसता तर 'सर्जिकल स्ट्राईक' केले असते का? पठानकोटच्या हल्ल्यानंतर का नाही 'सर्जिकल स्ट्राईक' केले? २ वर्षे जगभर दौरे करुनही आत्मविश्वास नव्हता का? असे १-२ वर्षात जागतीक मत आपल्या बाजुने वळवणे इतके सोपे असते का?

In reply to by मार्मिक गोडसे

बोका-ए-आझम Sat, 10/08/2016 - 10:41
रशिया सोडल्यास कुठले बलाढ्य देश भारताच्या मागे खंबीरपणे उभे होते?
१९७१ मध्ये सोव्हिएत रशिया याचा अर्थ निव्वळ रशिया नव्हे तर संपूर्ण कम्युनिस्ट जग असा होता. हे सर्वच देश - पूर्व जर्मनी,पोलंड, झेकोस्लोव्हाकिया,बल्गेरिया, हंगेरी, रूमानिया - रशियाबरोबर भारताच्या बाजूने उभे होते. हे देश महासत्ता नसतील, पण अण्वस्त्रधारी देश होते. आणि एकटा रशिया त्यावेळी व्हिएटनाम युद्धातून बाहेर पडू इच्छिणा-या अमेरिकेसाठी पुरे होता.
उरीचा हल्ला झाला नसता तर 'सर्जिकल स्ट्राईक' केले असते का? पठानकोटच्या हल्ल्यानंतर का नाही 'सर्जिकल स्ट्राईक' केले? २ वर्षे जगभर दौरे करुनही आत्मविश्वास नव्हता का?
एक्काकाकांनी हा लेख मोदींनी लिहायला सांगितला म्हणून लिहिलेला नसून एक विश्लेषण म्हणून लिहिलेला आहे. बाकी या हल्ल्यानंतर का स्ट्राईक केला आणि त्या हल्ल्यानंतर का नाही केला याचं एकच उत्तर असावं - अनुकूल परिस्थिती. जर असा स्ट्राईक करायचा तर शंभर टक्के खात्री असल्याशिवाय करण्यात अर्थ नाही. त्यावेळी परिस्थिती अनुकूल नसेल म्हणून केला नसेल. २ वर्षे जगभर दौरे करूनही आत्मविश्वास नव्हता का - त्याचंही तेच उत्तर आहे. आता तुम्हाला जे अपेक्षित आहे ते उत्तर देतो - उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरात येथील निवडणुका हा मुद्दा आहे का? तर आहे आणि त्यात चुकीचं काय आहे? १९७१ मध्ये इंदिरा गांधींनी आणि २०१२ मध्ये बराक ओबामांनीही आपल्या सामरिक यशाचा (अनुक्रमे बांगलादेश आणि बिन लादेन) राजकीय फायदा उठवलाच की. काँग्रेसने कसाब अाणि अफझल गुरुच्या फाशीचा २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वापर केला होता. ' मां बेटेका ये बलिदान, नही भूलेगा हिंदुस्तान ' अशी घोषणा काँग्रेसवाले अजूनही - इंदिरा गांधींच्या मृत्यूला ३२ आणि राजीव गांधींच्या मृत्यूला २५ वर्षे झाली तरीही देतात. आणि त्यात काहीही चुकीचं नाही. In fact, काँग्रेसच्या प्रतिक्रिया - संजय निरुपम यांनी पुरावे मागणं, राहुल गांधींनी दलालीचा आरोप करणं, शरद पवारांनी ' आम्हीही अशा कारवाया केल्या होत्या पण गवगवा केला नाही असं म्हणणं - हे सगळं भाजपला याचा राजकीय फायदा मिळेल या अस्वस्थतेतून आलेल्या फ्रस्ट्रेशनचे परिणाम आहेत.
असे १-२ वर्षात जागतीक मत आपल्या बाजुने वळवणे इतके सोपे असते का?
सोपं-कठीण हे सापेक्ष शब्द आहेत. मला वाटतं या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानची अवस्था पाहता या प्रश्नाचं उत्तर वेगळं द्यायची गरज नाही. आपल्या बाजूने जनमत होतं, पण ' बिच्चारा देश ' असं होतं. आता ते निदान ' आपल्या सैनिकांचा मृत्यू सहन न करणारा देश ' असं व्हायला सुरुवात झाली असावी. हे चांगलं की वाईट?

In reply to by बोका-ए-आझम

नाखु Sat, 10/08/2016 - 10:53
मार्मीक विचारता बुवा ? ता.क.आमच्या इथे कशाचाही कशासही कसाही संबंध लावून मिळेल.अर्थाची-तर्काची अजिबात गरज नाही ,मुद्दा नसला तरी चालेल. त्वरीत भेटा.. अखिल मिपा विचारवंताचा बेफाम वारू अता कैसा मागे फिरू महासंघ

In reply to by बोका-ए-आझम

चौकटराजा Sat, 10/08/2016 - 10:57
हे विष्लषण पटणारे. मी मागेच एका प्रतिसादात म्हटले होते की राजकीय मजबूरी हे याचे उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय व अंतर्गत पक्षीय राजकारणातली मजबूरी. हल्ला ही मजबूरी वेगळी . प्रसिद्धी ही मजबूरी वेगळी. आजची अशी बातमी आहे की पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे हे अमेरिका अजूनही मान्य करीत नाही. माझ्या अल्पमतिनुसार ते असे जगबुडीपर्यंत करणार नाहीत.पाकिस्तान हे व्रात्य मूल रहावे ही अमेरिका व चीन यांची मनोमन आकांक्षा आहे. त्याचे ते पुरती काळजी घेणार आहेत.असे व्रात्य मूल जन्माला घालून एक नाटो राष्ट्राने ती काळजी फार पूर्वी घेतली आहे.

In reply to by बोका-ए-आझम

ब्लड टेलेग्राम हे पुस्तक अवश्य वाचा. रशिया देखील भक्कम उभा नव्हता कारण रशियाला तेव्हा भारत पाकीस्तान संघर्ष नको होता. तेव्हा आवश्यक असलेल्या ३ मिलियान डॉलर पैकी १० टक्के रशियाने, ३० टक्के अमेरीकेने आणि जवळजवळ ६५ टक्के इस्रायल ने भारताला दिले होते. आपले तथाकथित मित्र अरब यांनी हा पाकिस्तानचा अंतर्गत मामला आहे त्यात तुम्हि पडू नका असे आपल्याला सांगितले होते. आर्चर ब्लड यांच्या विषयी. जरी भारतात इंदीराबाईंनी हिंदूंचे शिरकाण असा शब्द वापरला नसला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर तो त्यांनी तसाच वापरला. अमेरीकेची जी गुप्त प्रणयाराधना चीन सोबत चालू होती त्यात भ*वा म्हणून पाकीस्तान होता. म्हणून या सगळ्या पाकीस्तान पुरस्कृत शिरकाणाकडे अमेरीकेने आणि पर्यायाने जगाने दुर्लक्ष केले. उलट भारताने पूर्वेत पाक विरुद्ध आघाडी उघडली तर पाक पश्चिम आघाडी अमेरीकेच्या मदतीने उघडेल आणि चीनने तिसरी आघाडी उघडून भारताला जेरीस आणावे असा अमेरीकेचा प्रस्ताव होता. पण चीनी सैन्य पण उठावाच्या तयारीत असल्याने चीनने ती रिस्क घेतली नाही आणि बांग्लादेश युद्धातील जनरल जेकब आणि व्हा अ‍ॅडमिरल मिहीर रॉय यांच्या परफेक्त पूर्वतयारी व प्लानिंग ने भारतीय सेनेने पूर्व पाकीस्तान अपेक्षेपेक्षा १-२ दिवस आधीच पूर्ण काबीज केला होता. जरी सर्व लोक या युद्धाचे श्रेय फिल्ड मार्शल सॅम बहादूर यांना देत असले तरी सॅम मात्र नेहेमी हे श्रेय उपरोक्त अधिकारी आणि ऑपरेशनमधील सर्व सैन्य व अधिकार्‍यांना देत असत.

In reply to by मार्मिक गोडसे

रशिया सोडल्यास कुठले बलाढ्य देश भारताच्या मागे खंबीरपणे उभे होते? कोणत्याही युद्धात आपल्या बाजूने सक्रियपणे कोण उभे राहील हे जेवढे महत्वाचे असते तेवढेच शत्रूच्या बाजूने कोणाला उभे राहण्यापासून दूर ठेवता येईल हे महत्वाचे असते. दुसर्‍या शब्दांत आपले पारडे जड करणे जेवढे महत्वाचे तेवढेच विरुद्ध पारड्याचे वजन वाढू नये हे पाहणे महत्वाचे असते... दोन्ही कृतींनी अपलेच पारडे तुलनेने जास्त जड होते :) त्यावेळेस, इंदिरा गांधींनी रशियाला "तुम्ही आलात तर तुमच्या बरोबर, नाहीतर तुमच्याशिवाय; पण कारवाई करणारच. मात्र, आमच्या बरोबर असल्याने तुमचाही फायदाच होईल." असा अल्टीमेटम दिला होता, असे म्हणतात.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कृपया शेवटचे वाक्य खालील्प्रमाणे वाचावे... त्यावेळेस, इंदिरा गांधींना रशियालाही "तुम्ही आलात तर तुमच्या बरोबर, नाहीतर तुमच्याशिवाय; पण कारवाई करणारच. मात्र, आमच्या बरोबर असल्याने तुमचाही फायदाच होईल." असा अल्टीमेटम द्यावा लागला होता, असे म्हणतात.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सहमत. हे पुस्तक अवश्य वाचा. माझ्या माहीतीत जितके रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर्स आहेत त्यांनी हे पुस्तक अक्षरशः ३-३ वेळा वाचल्याचे सांगितले आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

उरीचा हल्ला झाला नसता तर 'सर्जिकल स्ट्राईक' केले असते का? पठानकोटच्या हल्ल्यानंतर का नाही 'सर्जिकल स्ट्राईक' केले? २ वर्षे जगभर दौरे करुनही आत्मविश्वास नव्हता का? यावेळेस, १८ सैनिकांचे दुख्खद निधन, आणि तेही पठाणकोट हल्ल्यानंतर थोड्याच वेळात, हे महत्वाचे कारण होते. जनतेचा जेवढा क्षोभ होता तेवढाच मानहानी झालेल्या सैन्याचाही आग्रह असला तर आश्चर्य नव्हते. शिवाय, दोन जवळपासच्या अतिरेकी घटनाक्रमामुळे, अगोदरच भारताबद्दल अनुकुल होत असणार्‍या जागतिक मताचे अधिक धृवीकरण झाले होते. त्यामूळे अश्या हल्ल्यासाठी जागतिक स्तरावर आणि देशांतर्गत जनमानसाची पार्श्वभूमी तयार झाली होती. एखादी कृती नक्की कोणत्या वेळी केली तर त्यापासून योग्य परिणाम साधता येईल, हे प्रत्येक घटनेच्या वेळच्या वास्तवावरून ठरवायचे असते. अनेक तज्ञांची मदत असली तरीही, हा एक प्रकारे निर्णय घेणार्‍या अधिकार्‍याचा (भारतात, पंतप्रधानांचा) सबजेक्टीव्ह निर्णय असतो. तेव्हा अश्या परिस्थितीत, "आत्ताच का ?", "पूर्वी का नाही ?" किंवा "नंतर का नाही ?"; अश्या शंकेखोरपणाला पटेल असे उत्तर देणे कोणालाच शक्य नसते आणि कारण दिले तरी विचारणार्‍याला ते पटण्याची शक्यता जवळ जवळ शून्य असते... रामराज्यातही खुद्द श्रीरामाला शंकेखोर जनतेचे समाधान करणारी उत्तरे देणे शक्य झाले नव्हते; आपण तर सामान्य माणसे आहोत ! :) ;) असे १-२ वर्षात जागतीक मत आपल्या बाजुने वळवणे इतके सोपे असते का? मी गेली अनेक दशके आंतरराष्ट्रिय राजकारणाचे प्रचंड कुतुहल असलेला विद्यार्थी आहे. डोळे उघडून, कोणत्याही रंगाचा चष्मा न लावता आणि बुद्धी समतोल ठेऊन गेल्या दोन-अडीच वर्षांकडे मी बघतो, तेव्हा ते तसे झाले आहे असे मला दिसते. तसे मला का दिसते याचे विवेचनही मी लेखात केले आहेच. माझे म्हणणे सर्वांनाच पटेल / पचेल / सोईचे असेल असे माझे अजिबात म्हणणे नाही :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मार्मिक गोडसे Sun, 10/09/2016 - 11:57
'पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर भारताचा हल्ला' ह्या धाग्यावर एका प्रतिसादात तुम्ही असे म्हटले होते-
जागतिक राजकारणात अथवा अर्थकारणात यशस्वी व्हायचे असले तर पुढची २५-३० वर्षे पाहून खेळ्या खेळाव्या लागतात.
ह्याचा अर्थ मागील सरकारने गेल्या २५-३० वर्षे ज्या खेळ्या खेळल्या त्यामुळे गेल्या दोन-अडीच वर्षात या सरकारला निर्णय घेणे सोपे गेले असाही होतो.

In reply to by मार्मिक गोडसे

'पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर भारताचा हल्ला' ह्या धाग्यावर एका प्रतिसादात तुम्ही असे म्हटले होते- जागतिक राजकारणात अथवा अर्थकारणात यशस्वी व्हायचे असले तर पुढची २५-३० वर्षे पाहून खेळ्या खेळाव्या लागतात. ह्याचा अर्थ मागील सरकारने गेल्या २५-३० वर्षे ज्या खेळ्या खेळल्या त्यामुळे गेल्या दोन-अडीच वर्षात या सरकारला निर्णय घेणे सोपे गेले असाही होतो. भारतिय राजकारणाप्रमाणेच मिपावरही अनेक "हुशार" वाद-प्रतिवाद होत असतातच व असा एखादा प्रतिसाद येणार हे गृहित धरलेच होते. त्यामुळे, केवळ "त्याला इतका उशीर का झाला?" याचेच आश्चर्य वाटले आहे. :) ;) पण तरीही एक शेवटचा प्रयत्न करून पाहतो... १. "वास्तव जीवनासंबंधी सर्वसामान्य तत्वे सांगितली जातात आणि त्यांना अपवाद असतात" हे तुम्हाला मी सांगायची गरज आहेच असे नाही. २. त्यामुळे, जीवनात बर्‍याचदा असे दिसते की... एखादी व्यक्ती/व्यक्तीसमुह/संघटना अनेक वर्षे प्रयत्न करून अयशस्वी राहते, तर अपवादात्मक का होईना पण एखादी एखादी व्यक्ती/व्यक्तीसमुह/संघटना फार कमी वेळात उत्तम यश मिळवते. असे होण्यामागे त्या दोघांमधील हुशारी, विषयावरची पकड, हुशारी वापरण्याची दिशा/नियत ठीकठाक असणे, अपवादात्मक श्रम घेण्याची तयारी असणे, इत्यादी अनेक गोष्टींतील फरकाचा प्रभाव असतो. ३. प्रतिकूल परिस्थितीपासून सुरुवात करूनदेखील जर थोड्या वेळात अपवादात्मक यश मिळविले जात असेल तर ते अधिकच उज्वल समजले जाते. ४. "हजार किलोमीटरच्या प्रवासाची सुरुवात पहिल्या पावलाने होते." पहिली काही पावले जर दमदार दिसत आहेत आणि त्या अनुभवावरून पुढचा प्रवास वेगवान होऊन भारताची जोमदार प्रगती होईल असा आशेचा किरण दिसत असला, तर एक भारतीय म्हणून मला ती आनंदाची घटना वाटते. "भारताबद्दल" ममत्व असलेल्या इतरांनाही तसेच वाटेल असा माझा अंदाज आहे. आत्ताच्या या उत्तराबद्दलही वरचेच एक वाक्य परत सांगू इच्छितो... माझे म्हणणे सर्वांनाच पटेल / पचेल / सोईचे असेल असे माझे अजिबात म्हणणे नाही. :)

In reply to by मार्मिक गोडसे

बोका-ए-आझम Mon, 10/10/2016 - 15:59
तिरंग्याला बाकीचे झेंडे लावणाऱ्या लोकांची चीड येते? Selective चीड येते असं म्हणणं जास्त बरोबर ठरेल.

In reply to by बोका-ए-आझम

बाकी काय बोलला पेक्षा कोण बोलला हे पाहणे चूक नाही हे बरेचवेळा तुम्हालाच सांगताना वाचले आहे मिपावर बोक्याभाऊ, नाही म्हणले सहज आठवले तर हा एक ताजा कलम सुद्धा जोडूनच टाकावा . :)

In reply to by बोका-ए-आझम

गोडसे प्रश्न विचारात जाऊ नका बुआ तुम्ही , प्रश्न विचारले की तुम्ही सेलेक्टीव असल्याचे दिसून येते, डोक्यात आहे नाही तितका गर हायबरनेट करून तुम्ही निवांत मान डोलवा फक्त. सांगून टाकले बोक्याभाऊ मी ह्या सुडोसेक्युलर गोडसे साहेबांना ! :)

आनंदी गोपाळ Sat, 10/08/2016 - 10:48
पूर्व जर्मनी,पोलंड, झेकोस्लोव्हाकिया,बल्गेरिया, हंगेरी, रूमानिया - रशियाबरोबर भारताच्या बाजूने उभे होते. हे देश महासत्ता नसतील, पण अण्वस्त्रधारी देश होते.
हे सारे अण्वस्त्रधारी होते/आहेत, ही माझ्यासाठी नवी माहिती आहे.

In reply to by आनंदी गोपाळ

बोका-ए-आझम Sat, 10/08/2016 - 11:34
सोडून द्या. On a serious note - युगोस्लाव्हियासारखा तुलनेने छोटा देशही अण्वस्त्रधारी होता. रशियाने आपली क्षेपणास्त्रे कम्युनिस्ट जगात आणि सोव्हिएत युनियनमधील इतर घटक संघराज्यांत (बेलारुस, कझाकस्तान, अझरबैजान इत्यादी)विखरून ठेवली होती. १९९१ च्या डिसेंबरमध्ये जेव्हा सोव्हिएत युनियन संपुष्टात आलं तेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या आणि IAEA च्या निरीक्षकांनी रशियाचे (नुसता रशिया, सोव्हिएत युनियन नाही) अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या मदतीने हे अण्वस्त्रसाठे ताब्यात घ्यायची प्रक्रिया सुरु केली. जर्मनीचं आधीच विलीनीकरण झाल्यामुळे (१९८९) पूर्व जर्मनीचे अाण्विक साठे एकत्र जर्मनीच्या मालकीचे झाले, जे नंतर अमेरिकेने आपल्या ताब्यात घेऊन जर्मनी आणि इतर देशांमधील NATO तळांवर हलवले. अशी घाई करण्यामागचं कारण एकच. सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर उडालेल्या अंदाधुंदीत या अण्वस्त्रांपैकी एकही दहशतवाद्यांच्या हातात पडू नये.

In reply to by बोका-ए-आझम

अमितदादा Sat, 10/08/2016 - 15:15
. रशियाने आपली क्षेपणास्त्रे कम्युनिस्ट जगात आणि सोव्हिएत युनियनमधील इतर घटक संघराज्यांत (बेलारुस, कझाकस्तान, अझरबैजान इत्यादी)विखरून ठेवली होती. हो हे खरे आहे आणि पूर्वी वाचलेले आहे. तसेच युक्रेन कडेही अण्वस्त्रे होती. पूर्व जर्मनी मध्ये सोविअत अण्वस्त्रे तर पश्चिम जर्मनी मध्ये अमेरिकन अण्वस्त्रे होती. मात्र
पोलंड, झेकोस्लोव्हाकिया,बल्गेरिया, हंगेरी, रूमानिया यांचेकडे अण्वस्त्रे होती
हे वाचल नाही याबद्दल दुवा द्यावा वाचाय आवडेल.

In reply to by बोका-ए-आझम

करारा अंतर्गत रशियन अण्वस्त्रे ह्या देशांमध्ये होती. पण त्यांचा वापर करण्याचे हक्क त्या सरकारांकडे होती की रशियाकडे ह्याची माहिती नाही.

In reply to by बोका-ए-आझम

आनंदी गोपाळ Sat, 10/08/2016 - 18:56
मला सांगायला विसरले, हे बोलणे, म्हणजे तुमच्या सभ्यतेची कमाल मर्यादा दिसते. असो.
"रशियाने आपली क्षेपणास्त्रे कम्युनिस्ट जगात आणि सोव्हिएत युनियनमधील इतर घटक संघराज्यांत (बेलारुस, कझाकस्तान, अझरबैजान इत्यादी)विखरून ठेवली होती."
रशीयाने इतर देशांत क्षेपणास्त्रे विखरून ठेवणे म्हणजे त्या-त्या देशाला अण्वस्त्रसज्ज म्हणणे हे मुळात चुकीचे आहे. पण तेही असोच.

In reply to by आनंदी गोपाळ

बोका-ए-आझम Mon, 10/10/2016 - 15:52
आणि शिवाय या देशांची स्वतःचीही अण्वस्त्रे होती. सर्व वाॅर्सा करार राष्ट्रे अण्वस्त्रसज्ज होती. अण्वस्त्रांची संख्या हा मुद्दा नाहीये. १९९१ मध्ये (शीतयुद्धाच्या शेवटी) नाटो आणि वाॅर्सा करार राष्ट्रांकडे मिळून जवळपास ६५०० warheads होती. बाकी तुम्हाला विनोदबुध्दी नसल्याची शंका होती. ती खरी ठरवल्याबद्दल धन्यवाद!

किसन शिंदे Sat, 10/08/2016 - 11:36
सर्जिकल स्ट्राईकवर आत्तापर्यंत मी वाचलेल्यात हे विश्लेषण अगदी वरच्या नंबरला आहे.
कोणता एक झेंडा डोळे मिटून सतत हातात घेण्याइतका मी माझ्या बुद्धीचा अपमान करू शकत नाही. त्यामुळे ज्याला जे श्रेय देणे योग्य आहे त्याला ते देण्याचा प्रामाणिकपणा पाळताना मला कधीच अडचण आलेली नाही.
दुर्दैवाने काही राजकारणी पक्ष आणि त्यांचे स्वार्थी नेते यातही राजकारण करताना दिसत आहेत.

पैसा Sat, 10/08/2016 - 12:16
उत्तम विश्लेषण. नेमके युनोच्या अधिवेशनाच्या जरा आधी उरी तळावर असला भीषण हल्ला करायची अतिरेक्यांना बुद्धी झाली. आणि भारताच्या सैन्यासंबंधित थिंक टँकने यानंतर आततायी काही न करता यूनोच्या अधिवेशनाचाही आपल्याला अनुकूल होईल असा पुरेपूर उपयोग करून घेतला. पुढचा सर्जिकल स्ट्राईक हा मास्टरस्ट्रोक होता. यानंतर पाकिस्तानची अवस्था "सहन होत नाही आणि सांगता येत नाही" अशी झाली. या हल्ल्याचे पुरावे मागणार्‍यांच्या मागे काही पाकिस्तानी लागेबांधे आहेत का याचा नक्कीच शोध घेतला जावा. कारण अशा हल्ल्यांची प्रक्रिया शत्रूला दाखवू नये हे आमच्यासारख्या सामान्य लोकांना कळते तर या अतिशहाण्या धूर्त राजकारण्याना कळत नसेल अशी शक्यताच नाही. ताज हॉटेलच्या हल्ल्यात कमांडो कारवाईचे प्रक्षेपण करून अतिरेक्याना मदत केली गेली तसे पुन्हा कधीही काही घडू नये. उलट हेलिकॉप्टर्स गेली की पॅराट्रुपर्स चालत गेले याबद्दल पाकड्यांचा गोंधळ उडवून दिला गेला पाहिजे. पाकिस्तानसारख्या हरामखोर शत्रूला नामोहरम करायला गनिमी काव्याला पर्याय नाही. .

In reply to by पैसा

प्रसाद_१९८२ Sat, 10/08/2016 - 12:29
या हल्ल्याचे पुरावे मागणार्‍यांच्या मागे काही पाकिस्तानी लागेबांधे आहेत का याचा नक्कीच शोध घेतला जावा. सहमत !

In reply to by पैसा

नेमके युनोच्या अधिवेशनाच्या जरा आधी उरी तळावर असला भीषण हल्ला करायची अतिरेक्यांना बुद्धी झाली. भारत-पाकिस्तानमधली प्रत्येक महत्वाची द्विपक्षिय सभा/भेट आणि जागतिक स्तरावरचा मोठा समारंभ यांच्या वेळेस अथवा आजूबाजूला भारतातले अतिरेक्यांचे हल्ले होणे ही नवीन गोष्ट नाही. पाकिस्तानामधील भारत-पाक सभांत भारतिय ध्वज उलटा लावला जाण्याचे प्रसंग विरळ नव्हते. त्यावर भारत नेहमीच "होते अशी चूक कधी कधी" असे म्हणत सभा सुरु करत असे. अश्या घटनांत आपण दुखावलेला किंवा चिंताग्रस्त (नर्व्हस) केलेला देश "कडक कारवाई करतो" की "आपल्याकडून समारंभाला गालबोट लावले जाईल या भीतीने आपला मान बाजूला ठेऊन पडते घोरण घेतो" हे पाहून त्या देशाचे "पाणी जोखले जाते"... आणि भूतकालात "भारत पडते घेतो" हीच नेहमीची गोष्ट होती. या वेळेस पाकिस्तानला (व जगाला) अनपेक्षित असलेल्या दोन गोष्टी घडल्या आहेत... सर्जिकल स्ट्राईक ही पाकिस्तानी सैन्याला जितकी अनपेक्षित व नामुष्कीची गोष्ट होती, तितकीच सार्क सभेचा बोजवारा ही पाकिस्तानी सरकारला अनपेक्षित व नामुष्कीची गोष्ट होती ! :) चीनचा चेअरमन आणि पंतप्रधान भारतात आले होते त्या वेळेसही चीनच्या सैन्याने भारतीय सीमेचे उल्लांघन करून आपल्या हद्दीत फेर्‍या (इन्कर्शन्स) मारल्या होत्या, हे आठवत असेल. सर्वोच्च महत्वाच्या व्यक्तींच्या भेटीच्या वेळी अश्या कुरापती चुकीने नाही तर सकारण होतात. ते चीनने "भारताचे पाणी जोखणेच" असते.

मार्मिक गोडसे Sat, 10/08/2016 - 12:23
१९७१ मध्ये सोव्हिएत रशिया याचा अर्थ निव्वळ रशिया नव्हे तर संपूर्ण कम्युनिस्ट जग असा होता. हे सर्वच देश - पूर्व जर्मनी,पोलंड, झेकोस्लोव्हाकिया,बल्गेरिया, हंगेरी, रूमानिया - रशियाबरोबर भारताच्या बाजूने उभे होते. हे देश महासत्ता नसतील, पण अण्वस्त्रधारी देश होते.
परंतू बलाढ्य अमेरिका व धोकादायक शेजारील देश चीनही भारताच्या विरुद्ध होते हे विसरून कसे चालेल.
आपल्या बाजूने जनमत होतं, पण ' बिच्चारा देश ' असं होतं.
१९७१ चे युद्ध, दोन अणुचाचण्या, जागतिक निर्बंध लादले असतानाही केलेली प्रगती ,तरी भारत 'बिच्चारा' म्हणनार्‍यांची कीव येते.
आता तुम्हाला जे अपेक्षित आहे ते उत्तर देतो
न विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायची गरज का वाटली? शिक्के मारण्याचेही काम करता का?

In reply to by मार्मिक गोडसे

बोका-ए-आझम Sat, 10/08/2016 - 13:06
न विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायची गरज का वाटली? शिक्के मारण्याचेही काम करता का?
त्याला pre-emptive strike असं म्हणतात. तुम्ही वैयक्तिक मुद्द्यांवर आल्यामुळे तो वर्मी बसला आहे हे समजलंच. असो.

In reply to by बोका-ए-आझम

मार्मिक गोडसे Sat, 10/08/2016 - 15:12
त्याला pre-emptive strike असं म्हणतात.
मराठीत 'खाजवून खरुज काढणे' असे म्हणतात. स्वतःच चर्चेचा रोख बदलायचा व नंतर समोरच्यावर विषयांतर केल्याचा आरोपही करायचा. असते एखाद्याला वाईट खोड. तिरंगा हाच आमचा झेंडा, बाकीच्या झेंड्याना मिरवायची गरज वाटली नाही. तिरंग्याच्या खांबाला बाकीचे झेंडे लावणार्‍यांची चिड येते.

In reply to by मार्मिक गोडसे

तिरंगा हाच आमचा झेंडा, बाकीच्या झेंड्याना मिरवायची गरज वाटली नाही. तिरंग्याच्या खांबाला बाकीचे झेंडे लावणार्‍यांची चिड येते.

जियो!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

हे तिरंग्याबरोबरचे झेंडे आमचे मानबिंदू आहेत. कारण वी डोण्ट हेट इन प्लुरल. :) उदा १. Army Flag उदा २. Navy Flag

In reply to by मार्मिक गोडसे

तिरंगा हाच आमचा झेंडा, बाकीच्या झेंड्याना मिरवायची गरज वाटली नाही. तिरंग्याच्या खांबाला बाकीचे झेंडे लावणार्‍यांची चिड येते. +१,००,००० तिरंगा हा केवळ झेंडा नाही तर मानबिंदू आहे आणि तो सतत आमच्या हृदयात वास करत असल्याने त्याला वेगळे सांगण्याची गरज वाटली नाही ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मार्मिक गोडसे Sun, 10/09/2016 - 12:05
तिरंगा हा केवळ झेंडा नाही तर मानबिंदू आहे आणि तो सतत आमच्या हृदयात वास करत असल्याने त्याला वेगळे सांगण्याची गरज वाटली नाही ! :)
प्रश्नच नाही, परंतू माझा प्रतिसाद तुम्हाला उद्देशून नव्हता, तर तो बळजबरीने दुसरेच झेंडे माझ्या हातात देणार्‍याला होता.

In reply to by मार्मिक गोडसे

बोका-ए-आझम Mon, 10/10/2016 - 15:58
तिरंग्याच्या खांबाला बाकीचे झेंडे लावणार्‍यांची चिड येते.
काय सांगता? खरं वाटेल एखाद्याला!

सचु कुळकर्णी Sat, 10/08/2016 - 12:52
कारण ते सरळ सरळ सैन्यावर संशय व्यक्त करतायत एक ३ *** रँक DGMO ने स्ट्राईक केल्याच जाहिर केल होत. ह्याच DGMO ने काहि दिवसांपूर्वी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटल होत की "कारवाई जरुर होईल पण वेळ आणि जागा आमच्या चॉईस ची असेल " सगळयाच पार्टी चे जे थोर विचारवंत US PRESIDENTIAL DEBATE समजून जो काय धिंगाणा चँनेल्स वर घालत असतात तो तर शिसारी आणणारा असतो, त्याच चर्चेत उपस्थित असलेले रि. जनरल्स, ब्रिगेडीअर ह्यांच्या चेहर्यावरील भाव पाहिले तर लक्षात येत कि त्याना तिथे आल्याचा कीति मनस्ताप होतोय. छ्य जानी हम तुम्हे मारेंगे जरुर मारेंगे लेकीन वक्त भी हमारा होगा, बंदुक भी हमारी होगी और गोली भी.

In reply to by सचु कुळकर्णी

चौकटराजा Sat, 10/08/2016 - 13:15
आता तुम्ही मधे बोलू नका ...तुम्ही बोलत असताना मी मधे बोललो का ....? हे वाक्य तर भाजपा व कॉंग्रेस यांचे प्रवक्ते अगदी पटकथेत लिहिल्याप्रमाणे बोलत असतात. माझ्या मते ही चर्चा वगैरे सब बकवास आहे तो एक करमणुकीचा खेळ म्हणून या सर्वानी स्वीकरलेला आहे.

अनुप ढेरे Sat, 10/08/2016 - 13:41
जाहीर हल्ला करण्याची दोन मुख्य उद्दीष्ट असावीत असा कयास आहे. १. डिटरंटः पुन्हा असे हल्ले होऊ नयेत म्हणून एवढा मोठा हल्ला पब्लिकली केला. डिटरंट म्हणून उपयोगी कितपत ठरलं हे पुढचा हल्ला होई पर्यंत सांगता नाही होणार. अशा स्ट्राईकने जरब बसेल का अतिरेक्यांवर/पाकिस्तान सैन्यावर हे आत्ताच सांगता येणार नाही. २, भारतीय नागरिकांना संदेश देणं की आम्ही नुसते बसलेलो नाही.जशास तसे उत्तर आम्हीही देऊ शकतो. हा मुद्दा तुम्ही लिहिलेला आहेच. पण या हल्ल्याचा एक परिणाम असा की पुन्हा उरी सारखं झालंच काही तर लोक पुन्हा अशाच रिटालिएशनची अपेक्षा ठेवणार. ती अपेक्षा पूर्ण करणं शक्य असेलच दर वेळेला हे नक्की नाही.
जगामध्ये आपली समंजस प्रतिमा स्थापन करून मित्र मिळवणे व शत्रूंना वेगळे पाडणे :
याच्याशी पूर्ण सहमत. भारताने शांततेचे सर्व प्रयत्न थकल्यावर हे केलं आहे हे स्पष्ट दिसत आहे. पठाणकोटमध्ये पाकिस्तानची टीम बोलावणं, शरीफ-मोदी यांच्या भेटी, nsa स्तरावरच्या भेटी हे सर्व उपाय अगदी दृष्य होते.

डँबिस००७ Sat, 10/08/2016 - 15:48
डॉ सुहास म्हात्रे , सुरेख विवेचन कोणता एक झेंडा डोळे मिटून सतत हातात घेण्याइतका मी माझ्या बुद्धीचा अपमान करू शकत नाही. त्यामुळे ज्याला जे श्रेय देणे योग्य आहे त्याला ते देण्याचा प्रामाणिकपणा पाळताना मला कधीच अडचण आलेली नाही. >>>> ह्याला सलाम पाकिस्तान न्युज टीव्ही वर मिळालेल्या माहीती नुसार. पाकिस्तानी ईंटीलिजंसला गाफिल ठेवण्यासाठी सर्जिकल स्ट्राईकस केलेल्या जागा सोडुन ईतर भारत पाक बॉर्डरवर स्ट्राईकसच्या पुर्वी काही दिवस, भारतीय सैन्य, बिएसएफ, चॉपर व ईतर वेहीकल मुव्हमेंट करत होते . त्या शिवाय जागतीक पातळीवर पाकिस्तानला एकट पाडु, ईंडस नदीच पाणी बंद करु वैगेरे पण सुरु होत.

In reply to by डँबिस००७

सहमत. बर्‍याचदा, युद्ध जेवढे शस्त्रांनी जिंकले जाते तेवढेच किंवा किंचीत जास्तच मुत्सद्देगिरी व व्यूहरचनेने जिंकले जाते.

या लेखाच्या विषयाचा आवाका फार मोठा आहे. त्यातले सर्व मुद्दे इथे लिहिणे विस्तारभयास्तव शक्य नाही. परंतु तरीही, मध्यरात्री लेख लिहिताना एक फार महत्वाचा मुद्दा राहून गेला. तो इथे मांडणे आवश्यक आहे. हल्ल्यानंतरची अप्रतिम मुत्सद्दी खेळी : हल्ल्यानंतरचे भारतिय DGMO चे केवळ एकुलते एक वक्तव्य जर नीट पाहिले तर त्यातला प्रत्येक शब्द काळजीपूर्वक लिहिला व उच्चारला गेला आहे असे ध्यानात येईल. खालील काही गोष्टी तर जाणीवपूर्वक मांडलेल्या दिसतील... १. हल्ला केवळ पाकव्याप्त काश्मीरमध्ये केला हे स्पष्टपणे प्रतिपादन केले गेले : याचा अर्थ असा की कारवाई (आता पाकिस्तानच्या ताब्यात असली तरी) भारताच्याच भूमीवर केलेली आहे. थोडक्यात, हे एका देशाचे दुसर्‍या देशावर आक्रमण (बूट्स ऑन द ग्राऊंड) नाही (जे एखाद्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वावर आक्रमण आणि म्हणून गंभीर आंतरराष्ट्रिय समस्या समजली जाते). त्यामुळे, जरी पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे कबूल केले असते तरी त्याच्या भारताच्या युद्धखोरीबद्दल कांगावा करण्यावर बंधने आली. २. हल्ला केवळ अतिरेक्यांवर केला होता. पण, त्यात अतिरेक्यांना संरक्षण देत असलेले काहीजण (तसे स्पष्ट्पणे म्हटले नाही तरी त्याचा रोख पाकिस्तानी सैनिकांवर होता हे स्पष्ट होते) मारले गेले हे स्पष्टपणे प्रतिपादन केले गेले : हल्ला अतिरेक्यांवर असल्याने पाकिस्तानला त्याविरुद्ध बोलणे जरा जडच जाणार हे नक्की. कारण तसे केल्यास (अ) आमच्या भूमीवर अतिरेकी आहेत आणि (आ) आम्ही त्यांना संरक्षण देतो, या दोन गोष्टी कबूल केल्यासारखे झाले असते. पण तरीही, दोन पाकिस्तानी सैनिक मेल्याचे खुद्द पाकिस्तानने मान्य करून, DGMO च्या म्हणण्याला अप्रत्यक्ष दुजोरा दिला ! ३. हल्ल्याच्या जागा, मृतांचा अंदाजे आकडा (जो खर्‍या आकड्यापेक्षा खूप कमी आहे असे संकेत आहेत) याचा स्पष्ट उल्लेख केला गेला : यामुळे पाकिस्तानला "हल्ला झाला नाही" असे म्हणणे जितके कठीण होईत तितके कठीण केले गेले. याउप्परही पाकिस्तानने अंतर्गत नामुष्की टाळण्यासाठी "हल्ला झाला नाही" असे म्हटलेच. एका बाजूला "सतत खोटे बोलणारे पाकिस्तानी सैन्य व त्याच्या हातचे कठपुतळी सरकारचे बोलणे" तर दुसर्‍या बाजूला "पात्रता, शिस्त आणि प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध असलेल्या भारतिय सैन्याच्या DGMO सारख्या पदावरील वरिष्ठ अधिकार्‍याचे (ज्याच्यावर त्या हल्ल्याची जबाबदारी होती) आम्ही हल्ला केला असे स्पष्ट निवेदन". अर्थातच पाकिस्तानी माध्यमे आणि काही चुकार भारतिय राजकारणी (दोन्हीही त्यांच्या हितसंबंधी वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध आहेत) काहीही म्हणाले तरी जगभरच्या महत्वाच्या राजकारण्यांना आणि युद्धतज्ञांना खरे अर्थ शोधायला कठीण पडले नाही. ४. DGMO-DGMO संभाषणाची माहिती : भारतिय सैन्याच्या DGMOने आपल्या वार्ताहर परिषदेत "आम्ही ही कारवाई केली आहे आणि दुसर्‍या दिवशी सकाळी पाकिस्तानी DGMO शी फोनवर बोलून त्याला ही माहिती मी सांगितली आहे" असे ठणकाऊन सांगितले. याचा सोप्या मराठीत अर्थ असा : "ऑपरेशनच्या यशासाठी हे ऑपरेशन गुप्त (कोव्हर्ट) होते. पण, ते आम्ही लपवू इच्छित नाही. आम्ही सर्व परिणामांची तयारी केली आहे. आता तुम्हाला काय करायचे ते करा." या वाक्यानंतर जगभरातल्या महत्वाच्या व्यक्तींना भारताच्या "राजकिय इच्छाशक्तीबद्दल आणि ती वापरण्याच्या धमकेबद्दल" संशय राहिला नाही. "आता आवरायचेच असेल तर केवळ नस्त्या कुरापती काढणार्‍या पाकिस्तानलाच आवरावे लागेल" असा सर्व महत्वाच्या देशांचा ग्रह झाला यात आश्चर्य नाही... आणि ते त्या देशांच्या संदेशांवरून स्पष्ट होतेच आहे. त्यातला एकही संदेश (भूतकालाप्रमाणे) भारताला सबूरीचा सल्ला देताना दिसत नाही. अजून बारीक सारीक बरेच आहे. पण हा मुद्दा मांडायला इतके पुरेसे आहे. तेव्हा, विस्तारभयास्तव, लेखनसीमा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

यशोधरा Sat, 10/08/2016 - 17:37
पाकिस्तानवरचा सर्जिकल स्ट्राईक तर एक भारी मूव्ह होतीच, पण तुम्ही उलगडून लिहिलेय पण झक्कास!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

संदीप डांगे Sat, 10/08/2016 - 22:02
सर्जिकल स्ट्राईक च्या सगळ्या घटनाक्रमाची हि प्रेस काँफेरेन्स चेरी ऑन टॉप होती! 'भाई, हम तो अब ऐसेही मारेंगे, जो उखाडना है उखाड लो!' सविस्तर आणि अचूक विश्लेषण!

याॅर्कर Sat, 10/08/2016 - 18:45
छान विश्लेषण!! पण याविषयीच्या व्हाटसअप फेसबुकी फाॅरवाॅर्ड्सनी वैताग आणलाय. (LOC च्या पलिकडचा भाग आपण आपल्या देशाच्या नकाशातच दाखवतो म्हणजे तो आपला भाग आहे असं, मग ते "पाकिस्तान मे घुस के मारा" हे मिडियावाल्यांचे वाक्य गैरलागु आहे.) जय हिंद!!!

मोहन Sat, 10/08/2016 - 19:29
अत्यंत संयत व माहितीपूर्ण विवेचना बद्दल डॉ. म्हात्रे यांचे आभार आणि अभीनंदन. अशा लेखांमुळे मिपाकर असल्याचा सार्थ अभिमान वाटतो. बाकी गदरोळ पाहिला की "कालचा गोंधळ बरा होता " म्हणायची वेळ येते. आणि हो .... डिसक्लेमर १ नं. आहे ... प्रत्येकाने वापरावे असे.

लिओ Sun, 10/09/2016 - 00:35
चर्चेतील काहि मुद्दे १ कारगिल
तुम्ही कारगिलच्या युध्दात राजकिय इच्छाशक्ती दिसली असं जे म्हणालात त्याबद्दल माझे मत वेगळे आहे. मुळात त्या वेळी पाकिस्तानने घुसखोरी करून आपला भूभाग बळकावला होता. त्यामुळे सरकारकडे कोणताही अन्य मार्ग न्हवता. कोणीही सत्तेत असते तरी त्याला लष्करी कारवाई करावीच लागली असती. जर भारताने कारवाई करून भूभाग पाकिस्तानच्या तावडीतून मुक्त केला नसता तर भाजपाला लोकांनी शिल्लक ठेवले नसते. कारगिल नंतर काही दिवसात झालेल्या काठमांडू दिल्ली विमान अपहरणाच्या वेळी देखील तेच सरकार सत्तेत होते आणी त्या वेळी त्यांनी घातलेला गोंधळ सगळ्यांनी बघितला होता.
पुर्ण सहमत. कारगिल युध्दात तत्कालिन लष्कर प्रमुख / हवाईदल प्रमुख यांनी घोषित केले होते कि L O C भारतातर्फे ओलांडलि जाणार नाही. लष्कर प्रमुख / हवाईदल प्रमुख स्वतःच्या मनाने ही घोषणा केली हे म्हणने फार हास्यास्पद ठरेल. ज्या मुशर्रफने कारगिल केले, त्या मुशर्रफला तत्कालिन पंतप्रधानांनी आग्र्याला वाटाघाटीसाठी बोलवले त्या मुशर्रफला एक तुच्छ शेकहॅन्ड देवुन तत्कालिन हवाईदल प्रमुख टिपणीस यांनी "पाकिस्तानी प्रमुखाला" त्याची लायकी दाखवली. हे धमक दाखवण्याचे एक उत्तम उदाहरण आहे असे माझे मत.
२ राजकीय मजबूरी
मिपावर तत्कालिन पंतप्रधान वाजपेयी यांची संयुक्त सरकार असल्यामुळे राजकीय मजबूरी होती असा उल्लेख वाचला. संयुक्त सरकार चालवणार्या ममोने कशी जोखिम घेवुन ( भ्रष्टाचार करुन ) अमेरिके बरोबर अणुकरार केला, ज्याची फळे कोण चाखत आहे यावरपण चर्चा घडावी. CURRENT AFFAIRE १ फ्रान्स बरोबरच्या पाणबुडि प्रकल्पातील माहिती लिक झाली मोघम विधान करुन सरकारने विषय थांबवला फ्रान्स बरोबर रफाल करार केला २ अमेरीकेबरोबर एकमेकांच्या लष्करी तळांच्या वापराबद्द्ल करार झाला. ( शंकास्पद ) या CURRENT AFFAIRE व सर्जिकल स्ट्राईक नंतर अमेरिका / फ्रान्स फार शांत आहे हा योगायोग नाही यावर पण चर्चा घडावी

अमितदादा Sun, 10/09/2016 - 14:13
२०११ मध्येही भारताने केले होते सर्जिकल स्ट्राईक, ३ पाक जवानांचे शिर आणले होते भारतात लष्कराचे निवृत्त मेजर जनरल ए के चक्रवर्ती यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अर्थात भारतीय लष्कर आणि सरकार हे अधिकृतरीत्या मान्य करणार नाहीत त्यामुळे याची विश्वाससर्हता संशनीय राहील. आता हे जर खरे असेल तर ह्याला सर्जिकल strike म्हणावे का हे हा वादाचा मुद्दा असू शकतो. ह्या क्षेत्रातील जाणकारांना reading between the line समजेल.

In reply to by अमितदादा

अमितदादा Sun, 10/09/2016 - 15:20
अर्थात भारतीय लष्कर आणि सरकार हे अधिकृतरीत्या मान्य करणार नाहीत त्यामुळे याची विश्वाससर्हता संशनीय राहील. आता हे जर खरे असेल तर ह्याला सर्जिकल strike म्हणावे का हे हा वादाचा मुद्दा असू शकतो.
हे वाक्य मी The Hindu ची बातमी न वाचता लिहिलेलं. आता मी म्हणेन हो हे surgical strike होत आणि हे विश्वसनीय आहे. मी ह्या पध्दतीचा प्रतिसाद ह्या आदि हि दिला होता http://www.misalpav.com/comment/883422#comment-883422 http://www.misalpav.com/comment/883441#comment-883441 पण आता बातमी मधील पुरावे आणखी सबळ आणि विश्वसनीय आहेत. जरी हे पुरावे नसते तरी मी म्हंटले असते कि भारतीय आर्मी नेहमी revenge घेते कोणालाही माफ करत नाही मग ती बातमी public domain मध्ये येवो अथवा secret राहो. तसेच भारतीय लष्कर आणि मोदी सरकार बद्दल ह्या कारवाई बद्दल अभिमान च आहे.

In reply to by अमितदादा

बोका-ए-आझम Mon, 10/10/2016 - 15:54
Here's the real reason behind Congress' silence on pre-2014 cross-border raids http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/heres-the-real-reason-behind-congress-silence-on-pre-2014-cross-border-raids/articleshow/54778781.cms via The Economic Times App(Download Now): http://ecoti.in/etapps

अमितदादा Sun, 10/09/2016 - 15:01
हि बातमी सर्वांनी वाचावी हि विनंती. The Hindu कडे याचे सर्व पुरावे आहेत. Official documents, video and photographic evidence accessed by the The Hindu, chillingly capture the two cross-border raids and the brutality of the tit-for-tat cycle which seems far deadlier than what is publicly acknowledged. http://www.thehindu.com/news/national/operation-ginger-titfortat-across-the-line-of-control/article9202758.ece Major General (retired) S.K. Chakravorty, who planned and executed the operation as the chief of Kupwara-based 28 Division, confirmed the raid to The Hindu. For the strike, about 25 soldiers, mainly Para Commandos, reached their launch-pad at 3 a.m. on August 29 and hid there until 10 p.m. They then crossed over the Line of Control to reach close to Police Chowki. By 4 a.m. on August 30, the planned day of the attack, the ambush team was deep within the enemy territory waiting to strike.

In reply to by अमितदादा

यशोधरा Sun, 10/09/2016 - 15:06
हिंदू ने ही बातमी कशी आणि का प्रकाशित केली आहे? अगदी कागदोपत्रांचा पुरावा देऊन? त्याने काही नुकसान तर नाही ना होणार?

In reply to by यशोधरा

अमितदादा Sun, 10/09/2016 - 15:55
मला नाही वाटत नुकसान होईल. पाकिस्तान ला हल्ला झाल्यानंतर कळल असणारच, तसेच tit for tat हल्ले LOC वर नवीन नाहीयेत. बाकी ईतर लोकांची मते वेगळी असू शकतात.

In reply to by अमितदादा

श्रीगुरुजी Sun, 10/09/2016 - 15:11
The Hindu कडे याचे सर्व पुरावे आहेत. Official documents, video and photographic evidence accessed by the The Hindu, chillingly capture the two cross-border raids and the brutality of the tit-for-tat cycle which seems far deadlier than what is publicly acknowledged.
एका गुप्त लष्करी कारवाईची गुप्त कागदपत्रे 'हिंदू' दैनिकाला कशी मिळाली असावीत याचे खूपच कुतुहल वाटत आहे. ही कागदपत्रे खरी असतील तर लष्कराची कागदपत्रे जपण्याची व्यवस्था अत्यंत ढिसाळ आहे असे म्हणावे लागेल.

In reply to by श्रीगुरुजी

अमितदादा Sun, 10/09/2016 - 15:58
भारत सरकार किंवा आर्मी हे पुरावे मान्य करणार नाही (हे साहजिकच आहे), परतू the hindu ची विश्वास सर्हता उच्च दर्जाची आहे. मात्र लष्कराची कागदपत्रे उघड होणे नक्कीच चिंताजनक आहे. मात्र हे लक्ष्यात ह्या the hindu ने हि बातमी २०११ सुद्धा दिली होती मात्र त्यावेळी पुरावे नवते.

In reply to by अमितदादा

श्रीगुरुजी Sun, 10/09/2016 - 20:00
मात्र हे लक्ष्यात ह्या the hindu ने हि बातमी २०११ सुद्धा दिली होती मात्र त्यावेळी पुरावे नवते.
या बातमीची लिंक आहे का?

In reply to by श्रीगुरुजी

अमितदादा Sun, 10/09/2016 - 20:16
आहे हि पहा. बातमी ह्या बातमी मधील काही line Finally, on August 30, 2011, Pakistan complained that three soldiers, including a JCO, were beheaded in an Indian raid on a post in the Sharda sector, across the Neelam river valley in Kel. The Hindu had first reported the incident based on testimony from Indian military sources,, who said two Pakistani soldiers had been beheaded following the decapitation of two Indian soldiers near Karnah.

In reply to by अमितदादा

श्रीगुरुजी Sun, 10/09/2016 - 20:12
The Hindu कडे याचे सर्व पुरावे आहेत. Official documents, video and photographic evidence accessed by the The Hindu, chillingly capture the two cross-border raids and the brutality of the tit-for-tat cycle which seems far deadlier than what is publicly acknowledged.
'हिंदू'कडे या गुप्त कारवाईची सर्व अधिकृत कागदपत्रे, चित्रफिती, प्रकाशचित्रे आहेत हे धक्कादायक आहे. 'हिंदू'तील बातमीत खालील वाक्ये आहेत. A few days after the beheading, Indian Army discovered a video clip from a Pakistani militant who was killed in an encounter while crossing into Kashmir, showing Pakistanis standing around the severed heads of Adhikari and Singh displayed on raised platform. The Hindu has a copy of the video. मारल्या गेलेल्या दोन भारतीय सैनिकाच्या मुंडक्याशेजारी पाकिस्तानी सैनिक उभे आहेत अशी एक चित्रफीत भारतीय लष्कराने मारलेल्या पाकिस्तानी सैनिकाकडे सापडली होती व ती पाकिस्तानी चित्रफीत सुद्धा 'हिंदू'कडे आहे असे या परिच्छेदात लिहिले आहे. लष्कराची इतकी गुप्त कागदपत्रे, चित्रफिती, प्रकाशचित्रे, जप्त केलेली पाकिस्तानी चित्रफीत 'हिंदू'कडे आहे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

श्रीगुरुजी Sun, 10/09/2016 - 15:13
पाकिस्तानवरचा सर्जिकल स्ट्राईक्स हा केवळ लोकक्षोभामुळे, राजकिय प्रतिस्पर्ध्यांवर ब्राऊनी पॉईंट्स मिळविण्यासाठी किंवा केवळ मतपेटीकडे पाहून केले गेले, असे अनेक प्रवाद सद्या ऐकू येत आहेत. याबद्दलचे माझे विचार खालीलप्रमाणे आहेत.
अत्यंत उत्कृष्ट लेख! संपूर्ण लेखाशी सहमत. डॉ. म्हात्रे यांनी हा लेख कोणत्यातरी मराठी दैनिकाकडे पाठवावा असे वाटते.

म्हात्रे काकांनी ऑलरेडी ताजमहाल बांधलाय, त्याला आमची एक वीट, हा व्हिडीओ पाहुन एक मिपाकर्/त्याचा नातलग्/संतती कोणीतरी जरी भरती झाले तरी आमचे उद्देश्य सफल होइल तर, आज पेशे खिदमत आहे, माझी अत्याधिक प्यारी मराठा लाइट इन्फंट्री. खालील व्हिडीओ हा मराठा लाईट रेजिमेंटल सेंटर, बेळगाव ह्यांनी खुद्द बनवलेला आहे "युवक से योद्धा : मराठा सिपाही" असे नाव असलेली ही चित्रफित तब्बल ४७ मिनिटे लांब असुन ती पुर्ण पहावीत अशी सगळ्यांना विनंती. मराठा लाईट फक्त भारतीय भुदलातलीच नाही तर विश्वस्तरावर एक प्रचंड मोठे नाव असलेली रेजिमेंट आहे, हिची स्थापनाच १७५७ म्हणजेच अमेरिकन स्वातंत्र्य प्राप्त होऊन अमेरिकन राष्ट्र बनायच्याही आधीची आहे. "छत्रपती शिवाजी महाराज की जय" हा युद्धघोष असलेली अन "सिंहगड" मार्चिंग साँग असलेली, आमच्या भोळ्या गणपत्सची टोळी, आमचीच मराठा लाईट इन्फंट्री.

बांवरे Tue, 10/11/2016 - 06:48
धन्यवाद एक्काकाका .... उलगडून दाखवलेत ते चांगले झाले. आजच्या घडीला राजकीय इच्छाशक्ती दाखवली आहे हे एक चांगले चिन्ह आहे. Scroll.In Article या लिंकवरती प्लॅन कसा झाला यावर अजून थोडी माहिती सापडली.

विवेकपटाईत Tue, 10/11/2016 - 07:15
उत्कृष्ट आणि विस्तृत लेख साठी अभिनंदन. बाकी मी स्वत: सुरक्षा संबंधित उच्च अधिकाऱ्यांच्या सोबत कार्य केले असल्यामुळे अधिक काही लिहिणार नाही.

In reply to by विवेकपटाईत

धन्यवाद व सहमत विवेकपटाईत साहेब. अश्या लेखात "काय लिहावे हे नक्कीच महत्वाचे, पण त्यापेक्षा 'काय लिहू नये याचे भान ठेवणे' जास्त महत्वाचे असते", हे नि:संशय !

मनिमौ Tue, 10/11/2016 - 09:14
लेख सविस्तर माहिती आणी तितकीच ऊत्तम चर्चा वाचुन खुप माहिती मिळाली सोन्याबापु मी संपूर्ण व्हिडिओ बघितला.खुपच छान आहे

chitraa Tue, 10/11/2016 - 18:14
सनिकांची पेन्शन कमी झाली यावर आजुन काही धागा का आला नाही?

In reply to by chitraa

साहेब / मादाम, कृपया या धाग्यावर धाग्याच्या विषयासंबंधीच चर्चा करावी अशी माफक अपेक्षा आहे. इतर विषयावर चर्चा करायची असल्यास तुम्ही तसा धागा काढू शकता.

लेख थोडासा एकांगी वाटतो , खर तर हा असा हल्ला करण्यावाचून गत्यंतर नव्हते बर आता तो हल्ला केलाच आहे तर तो का केला हे सांगण म्हणजे थोडस Reverse Engineering केल्या सारख वाटताय :)

आजची बातमी... BSF kills 7 Pakistani Rangers, 1 terrorist in 'retaliatory firing' in Jammu या वेळेच्या बातमीत मारलेले लोक केवळ "अतिरेकी" नसून आपल्या बीएसएफ च्या प्रमाणे पाकिस्तानातील "पाकिस्तानी रेंजर्स" या अर्धसैनिकदलाचे सैनिक आहेत, हे फार महत्वाचे आहे. असे करायला उघड परवानगी मिळणे आणि त्यापेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे त्याची उघड बातमी देण्याची परवानगी मिळणे हे या लेखात अधोरेखीत केलेल्या "राजकीय इच्छाशक्ती असण्याचे व ती वापरण्याची धमक असल्याचे" लक्षण आहे. सर्जिकल ट्राईकचा असा पाठपुरावा (फॉलो अप) करने हे एक अत्युत्तम सामरिक-राजकिय-मुत्सद्दी पाऊल आहे. पाकिस्तानमध्ये वर वर काहीही देखावा चालला असला तरी पाकिस्तानी सैन्य (आणि त्याचा खास विखारी भाग असलेली आयएसआय ही संस्था) सद्यातरी पाकिस्तानमधले सर्वेसर्वा आहेत हे उघड गुपीत आहे. त्याचबरोबर, पाकिस्तानमधल्या जनमानसात "जिसकी लाठी उसकी भैस" ही सद्य व्यवस्था (अगतिकतेने का होईना) खोलवर रुजली आहे. पाकिस्तानच्या सैन्याची जनमानसवरची पकड "बाहुबली" प्रकारची आहे. अश्या परिस्थितीत, आपल्या अजेयत्वाचा (भारतापेक्षा व कोणत्याही अंतर्गत शक्तीपेक्षा पाकिस्तानी सैन्य जास्त ताकदवान असल्याचा; व त्याला हात लावण्याचा यापैकी कोणीही प्रयत्न करणार नाही हा) भास कायम ठेवणे, पाकिस्तानवर आपली पकड कायम ठेवण्यासाठी, पाकिस्तानी सैन्याकरिता अत्यावश्यक आहे. जनमानसातून उतरलेल्या "तथाकथित अजेय" लष्करी सत्तांचे काय होते याची उत्तम उदाहरणे, काही कालापूर्वी झालेल्या अरब स्प्रिंगमध्ये, ट्युनिशिया, इजिप्त व लिबिया या देशांमध्ये पहायला मिळाली आहेतच. त्यामुळे, उरी हल्ल्याचा बदला घेणे हे सर्जिकल स्ट्राइकचे तात्कालिक महत्वाचे कारण असले तरी, त्यापुढे जाऊन भारत-पाकिस्तान सीमा, ताबारेषा व जम्मू-काश्मीरमध्ये जी कारवाई चालली आहे ती "पाकिस्तानी सैन्य अजेय आहे व ते स्वतःच्या देशात व सीमेपलिकडेही मनात येईल ती उघड-गुप्त कारवाई करू शकते" हा जनमानसातील गैरसमज दूर करण्यासाठीची उत्तम रणनीती आहे. यापुढच्या काळात "ती प्रतिमा भ्रामक असल्याचे सिद्ध करत राहणे हा भारताचा प्रयत्न राहील" आणि "आपल्या अजेयत्वाची प्रतिमा कायम ठेवण्यासाठी पाकिस्तानी सैन्याची धडपड चालू राहील". ती धडपड, 'शेवटचे आचके' ठरविण्यात, भारतीय रणनीतीज्ञ जेवढे यशस्वी होतील तेवढे भारताच्या भविष्याच्या दृष्टीने, पाकिस्तानी जनतेच्या दृष्टीने, दक्षिण आशियाच्या दृष्टीने आणि एकंदर जगाच्या दृष्टीने चांगले होईल. त्यामुळेच... १. भारताने सर्जिक स्ट्राईक्स केले असे अधिकृत स्तरावर व माध्यमांत त्या कारवाईचा मुख्य असलेल्या अधिकार्‍याकरवी (डीजीएमओ) उघडपणे व स्पष्टपणे सांगितले. २. "सर्जिक स्ट्राईक्स झाले नाहीत" (साध्या शब्दांत सागायचे झाले तर : "भारताने आमचे नाक कापले नाही") हे सांगण्याचा आटापिटा सैन्याने केला आणि जगापुढे विनोदी दिसत असला तरीही, तसाच आटापिटा पाकिस्तान सरकारकरवी करून घेतला. ३. चीन वगळता जगातल्या सर्व महत्वाच्या देशांनी भारताच्या शब्दावर विश्वास ठेवला आहे व पाकिस्तानला अतिरेक्यांना मदत न करण्याचा सल्ला दिला आहे. ३. सीमेवरील कारवाया, सद्याची बीएसएफची कारवाई, काश्मीरमधल्या अतिरेकीविरोधी कारवाया, इत्यादी माध्यमांत आकड्यांसकट अधिकृतपणे प्रसिद्ध करणे, ही सुद्धा सर्जिकल स्टाईक्सचा पाठपुरावा आहे. ४. या बातम्या जेवढ्या जास्त प्रमाणात "पाकिस्तानमधील जनमतावर प्रभाव असणार्‍या सुबुद्ध व महत्वाच्या व्यक्ती" आणि "एकंदर सर्वसामान्य जनता" यांच्यापर्यंत पोहोचतील, तितका पाकिस्तानी सैन्याच्या अजेयतेचा पाकिस्तानी जनमानसावरचा प्रभाव कमी होत जाईल. या रणनीतिने अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी एखाद्या सर्वंकष युद्धापेक्षा जास्त वेळ लागतो, हे नक्की. मात्र, "समरांगणातले युद्ध न करता मिळालेला विजय सर्वोत्तम असतो" हे सार्वकालीक तत्व कोणत्याही युद्धविशेषज्ञाला विसरून चालत नाही. कारण, समरांगणातले सर्वंकष युद्ध कोणीही जिंकले तरी त्यात, जेता व जित, या दोघांची अपरिमित हानी होते, हे अनिवार्य सत्य आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अभिजीत अवलिया Fri, 10/21/2016 - 22:51
असे करायला उघड परवानगी मिळणे आणि त्यापेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे त्याची उघड बातमी देण्याची परवानगी मिळणे हे या लेखात अधोरेखीत केलेल्या "राजकीय इच्छाशक्ती असण्याचे व ती वापरण्याची धमक असल्याचे" लक्षण आहे. सर्जिकल ट्राईकचा असा पाठपुरावा (फॉलो अप) करने हे एक अत्युत्तम सामरिक-राजकिय-मुत्सद्दी पाऊल आहे. --- माझ्या माहितीप्रमाणे पूर्वी देखील हे होतच होते आणि त्यासाठी आतापर्यंतच्या सर्व सरकारांनी परवानगी दिलेलीच होती. पाकिस्तानने गोळीबार केला की त्याला आपल्याकडून चोख प्रत्युत्तर देणे, दोन्ही कडच्या नुकसानीच्या बातम्या येणे हे होतंच होते. समरांगणातले युद्ध न करता मिळालेला विजय सर्वोत्तम असतो --- ह्याच्याशी बाडीस

In reply to by अभिजीत अवलिया

धन्यवाद ! सद्य लेख आणि त्यावरचे माझे विश्लेषण सद्यस्थितीत चाललेल्या घडामोडींवरचे आहे. त्यामुळे, काही कारणाने आताच्या आणि पूर्वीच्या सरकारांची तुलना कोणाच्या मनात आली तर तो माझा दोष नाही :) "पूर्वीच्या सरकारने आणि आत्ताच्या सरकारने" या फुकाच्या राजकिय वादात मला अजिबात रस नाही. कारण त्यातून काही फायदेशीर परिणाम बाहेर येईल अशी वास्तविक परिस्थिती सद्या तरी नाही.
कोणत्याही देशाच्या सरकारने किमान खालील गोष्टी करणे अपेक्षित आहे : १. देश अंतर्गत व बाह्यदृष्टींनी सुरक्षित बनविणे. २. देशासाठी वास्तवातले फायदे मिळविणे आणि ते योग्य रितीने व योग्य प्रमाणात शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवणे. ३. देशाच्या नागरिकाला आपल्या देशाबद्दल ममत्व व अभिमान वाटेल अशी परिस्थिती निर्माण करणे. असे ज्या सरकारने केले असेल/करत असेल/करेल त्या कोणत्याही रंगाच्या अगोदरच्या/आत्ताच्या/भविष्यातल्या सरकारला माझा पाठींबा होता/आहे/असेल.

अभिजीत अवलिया Sat, 10/22/2016 - 00:20
कोणत्याही देशाच्या सरकारने किमान खालील गोष्टी करणे अपेक्षित आहे : १. देश अंतर्गत व बाह्यदृष्टींनी सुरक्षित बनविणे. २. देशासाठी वास्तवातले फायदे मिळविणे आणि ते योग्य रितीने व योग्य प्रमाणात शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवणे. ३. देशाच्या नागरिकाला आपल्या देशाबद्दल ममत्व व अभिमान वाटेल अशी परिस्थिती निर्माण करणे. असे ज्या सरकारने केले असेल/करत असेल/करेल त्या कोणत्याही रंगाच्या अगोदरच्या/आत्ताच्या/भविष्यातल्या सरकारला माझा पाठींबा होता/आहे/असेल. --- समहत.

In reply to by अभिजीत अवलिया

धन्यवाद ! पाकिस्तानसारखा विखारी मूलतत्वांवर चालणारा आणि आतापर्यंतच्या दुबळ्या किंवा पूर्वीच्या नी-जर्क विरोधाच्या अनुभवांवरून माजोरी झालेला देश एखाद्या फटकार्‍याने मानेल असे मानणे शहापणाचे होणार नाही. अश्या परिस्थितीत करायच्या खेळी एखाद्या महिन्या-वर्षांच्या नसतात तर फार दीर्घ पल्यांच्या असतात. परिस्थितीत झालेला थोडाबहुत फरक त्यांची दिशा भरकटवू शकतात. आंतरराष्ट्रिय राजकारणात बर्‍याचदा ताकदी इतकेच चिकाटीला महत्व असते. या कारणासाठीच चीनने फूस लावून उभ्या केलेल्या उत्तर कोरियासारख्या चिमुकला देश सतत कुरापती काढत असलातरी अमेरिका त्यावर हल्ला करत नाही. चीन पाकिस्तानला हाताशी धरून, हाफीज सैद सारख्या अतिरेक्यांना 'युएन'मध्ये राजकिय संरक्षण देवून, भारताच्या बाबतीत तेच करत आहे आणि ते पाकिस्तानी सैन्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पथ्यावर पडले आहे. "राजकिय मुत्सद्दीने जागतिक मत आपल्या बाजूने वळवणे, प्रदीर्घ चिकाटीने प्रदीर्घ प्रयत्न करणे आणि सतत बदलणार्‍या अनुकुल-प्रतिकुल परिस्थितीची जाण ठेवून प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी दूरदृष्टीने खेळलेल्या चाली" या जागतिक राजकारणात आवश्यक असलेल्या पण पूर्वी न दिसलेल्या गुणांची झलक भारताकडून दिसायला सुरुवात झाली आहे. याचा परिणाम म्हणुन पाकिस्तानी राजकारण्यांमध्ये पूर्वी कधिही न दिसलेली 'सैन्याला प्रश्न विचारण्याची धमक' दिसू लागली आहे. हे भारतिय रणनीति सफल होण्याचे संकेत आहेत. यामुळे चिवट व गुर्मीत असलेले पाकिस्तानी सैन्य सहजपणे बदलेल असे नाही. मात्र, ही केवळ सुरुवात आहे. हा दबाव कायम ठेवण्यात आणि वाढविण्यात (उदा. पाकिस्तानच्या अमेरिकन मदतीवर लक्षणिय मर्यादा आणणे, हाफीज सैदला अतिरेकी म्हणून जाहीर करण्यास चीनला तयार करणे, सार्कमधून पाकिस्तानला बाहेर काढणे किंवा पाकिस्तानशिवाय इतर दक्षिण आशियाई देशांची संघटना स्थापन करणे, इ) भारतिय सरकार यशस्वी ठरले तर पाकिस्तानी सरकार, जनता व सैन्य यांच्यात पडलेले तडे अधिकाधिक विस्तारत जातील. त्यामुळे, एक काळ असा येऊ शकतो की भारताला युद्धाशिवाय किंवा मर्यादित युद्धाने आपले उद्द्येश साध्य करून घेता तेतील.

In reply to by शाम भागवत

धन्यवाद ! अशी मते असणारे अनेक पाकिस्तानी आहेत. मात्र ते (भारतातल्या परिस्थितीच्या एकदम विपरित) पाकिस्तानमध्ये राहून आपले मत सांगू शकत नाहीत. ते बहुतेक सर्व कॅनडा किंवा युएसए मध्ये राहत आहेत. पाकिस्तानबद्दलच्या खर्‍या बातम्या दिल्यामुळे मारहाण झालेले अनेक पाश्चिमात्य पत्रकार आहेत, त्यात एक स्त्री पत्रकारही आहे. बलुचिस्तान किंवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये जे अत्याचार चालले आहेत ते बाहेर न येण्याचे हे मुख्य कारण आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

शाम भागवत Sat, 10/22/2016 - 17:52
भारत नेहमी तहात हरतो असे म्हणतात. पण.... मोदींच्या सततच्या परदेशवार्‍यांमुळे मला असे नेहमी वाटत आलेय की, भारत यावेळेस युध्द न करताच तह जिंकणार आहे.

In reply to by शाम भागवत

भारत यावेळेस युध्द न करताच तह जिंकणार आहे. आपके मुहमे घी-शक्कर ! हेच दोन्ही देशांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे आहे. मात्र, हा तह सांमजस्याने ("बघ हं पाकिस्ताना, परत अतिरेकी पाठवू नकोस बरं का. नाहीतर मी तुझा परत निषेध करेन." या स्टाईलने) होणार नाही हे नक्की. त्यासाठी पाकिस्तानला, आणि मुख्यतः पाकिस्तानी सैन्यातल्या जनरल्सना आणि त्यांच्या पाकिस्तानातील व भारतातील पाठीराख्यांना, त्यांच्या कारवायांची जबर राजकिय, आर्थिक, सामाजिक व कायदेशीर किंमत भरायला लावणे हा सर्वात उत्तम उपाय आहे.

भारताची आंतरराष्ट्रिय मुत्सद्देगिरी योग्य दिशेने चालली आहे या बाजूचे अजून दोन संकेत... १. US warns Pakistan, says 'we will act alone on terror' गेल्या एकदोन आठवड्यांत अमेरिकेने पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत दिलेली ही चौथी-पाचवी तंबी असावी. ही तंबी अ‍ॅडम झुबीन, Acting Under Secretary on Countering the Financing of Terrorism याने दिलेली आहे, हे महत्वाचे आहे. या वेळेस बोलल्या गेलेल्या शब्दांचा साध्या मराठीतला अर्थ आहे, "आम्ही तुम्हाला न कळवता, तुमच्या हाती असलेल्या सार्वभौम प्रदेशात 'ओसामा-स्टाईल' कारवाई करू शकतो". माझ्या मते, ही तंबी काही दृष्टीने र्‍हेटॉरिकल आहे. कारण अफगाणिस्तानातल्या अमेरिकन सैन्याला जाणारा सामरिक-असामरिक माल कराची बंदरात उतरवून ट्रकने पाकिस्तानी भूमीवरून नेण्याला सुयोग्य पर्याय अजूनही अमेरिकेकडे नाही. हा त्यांच्या पायात रुतलेला काटा नसता पाकिस्तानची फार वेगळी अवस्था झाली असती. हे पाकिस्तानही ओळखून आहे आणि या परिस्थितीचा जास्तीत जास्त फायदा घेत आहे. शिवाय, "बघा, आम्ही आमची भिकेची झोळी घेऊन चीन-रशियाकडे जाऊ" हा बागुलबुवा त्याच्या मदतीला आहेच. अवांतर : खरी गंमत म्हणजे या मालाची वाहतूक करणार्‍या वाहतूक कंपन्या पाकिस्त्तानी जनरल्सच्या मालकीच्या आहेत ! त्यामुळे अफगाणीस्तानमधली बंडाळी चालू ठेवणे हा जेवढी राजकिय खेळी आहे तेवढीच ती व्यापारी खेळीही आहे ! हाच व्यवसाय नव्हे तर पाकिस्तान व इजिप्त या दोन देशातले सैन्य उघडपणे अनेक अ-सामरिक (टिश्श्यू पेपर, वॉशींग मशीन, इत्यादी बनवणारे) कारखाने व व्यवसाय चालवतात. सैन्याच्या नोकरीत असलेले (निवृत्त नव्हे) जनरल्स त्यांचे अधिकृतरित्या सिईओ आहेत. याशिवाय, बहुतेक सर्व लहान-मोठे सैन्य अधिकारी अनेक दश-शत एकर जमीन बाळगून असलेले जमीनदार आहेत. अशी अधिकाधिक जमीन त्यांना त्याच्या नोकरीतल्या प्रत्येक बढतीबरोबर बक्षीस म्हणून मिळत जाते. त्यांनी 'देशाशी व देशाच्या सरकारशी नव्हे' तर 'सैन्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी' निष्ठावंत रहावे यासाठी ही पद्धत वापरली जाते. २. We have stood by India in its 'darkest hours', says top Russian defence official नजिकच्या काळात पाकिस्तानबरोबर युद्धाचा सराव केलेल्या रशियाच्या महत्वाच्या अधिकार्‍याकडून असे विधान महत्वाचे आहे. हा अधिकारी, सेर्गेई चेमेझोव, रशियाच्या ७०० सामरिक साहित्य निर्माण करणार्‍या कंपन्या ताब्यात असलेल्या पालक-कंपनीचा, रोस्तेक स्टेट कॉर्पोरेशनचा, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहे. यामागे भारताकडून मिळालेल्या $१२ बिलियनच्या युद्धसाहित्याची पार्श्वभूमी आहेच. शिवाय, येथेच भारताच्या सामरिक साहित्याच्या निकडीची यादी संपत नाही, अजून अनेक दश-बिलियनची खरेदी बाकी आहे आणि रशिया विक्री करणार्‍या देशांच्या रांगेत बराच पुढे आहेच. असे खरेदी-विक्री करार दशकांच्या कालावधीवर चालू राहतात, त्या कालावधीवर पैशाचा ओघ चालू राहतो आणि आर्थिक फायद्यावर अवलंबून असलेले संबंध चालू ठेवणे दोन्ही देशांना सोयीचे असते. शिवाय, आर्थिक-सामरिक फायद्यावर अवलंबून असलेले आंतरराष्ट्रिय संबंध जास्त घट्ट असतात हे तर सार्वकालिक सत्य आहे. याशिवाय महत्वाचे आहे की रशियाने आतापर्यंत दुसर्‍या कोणत्याही देशाला न विकलेल्या (अमेरिकेच्या अनेक वर्षे पुढे असलेल्या) सामरिक प्रणाल्या अगोदर केलेल्या व या बारा बिलियनच्या करारामध्ये आहेत. यापूर्वीच्या रशिया-भारताच्या सहकार्याने बनलेले ब्राम्होस क्षेपणास्त्राची चीनला काळजी वाटत आहे. त्या करारप्रमाणे भारत हे क्षेपणास्त्र व्हिएतनामसारख्या मित्र व चीनचा प्रतिस्पर्धी असलेल्या देशाला विकण्यास मोकळा आहे. हे कोणत्याच अमेरिकन युद्धसाहित्याच्या कराराबद्दल शक्य नसते याच पार्श्वभूमीमुळे मी पूर्वी लिहिले होते की, "पाकिस्तानबरोबर युद्धाचा सराव" भारत-अमेरिकेच्या सलगीविरुद्ध केलेल्या रशियाच्या एक दबावतंत्राचा (पोश्चरिंग) भाग होता. किंबहुना, प्रथम तो सराव पाकव्याप्त काश्मीरमध्ये होणार होता आणि माझ्या मते ती जागा बदलून इतरत्र पाकिस्तानध्ये हलविण्यासाठी "भारताचा नाराजीचा संदेश" येण्याचीच वाट रशिया पहात होता. तो आल्यावर लगेच, सरावाच्या दोनेतीन दिवस अगोदर सरावाची जागा बदलली गेली. पूर्वतयारी केलेल्या जागेवरून सामरिक अभ्यासांची जागा दुसरीकडे हलविणे हे एखाद्या "काँन्फरन्सचे हॉटेल बदलण्याइतके सोपे नसते" हे नक्की :) रशियाच्या या वागण्याचा अजून एक भारताच्या फायद्याचा अर्थ असू शकतो. पण त्याबद्दल अजून काही संकेत जरूर आहेत. शिवाय, तो अंदाज आत्ता किंवा अजून काही काळ उघड न करणेच जास्त योग्य होईल.

शाम भागवत Tue, 10/25/2016 - 12:05
रशियाच्या या वागण्याचा अजून एक भारताच्या फायद्याचा अर्थ असू शकतो. पण त्याबद्दल अजून काही संकेत जरूर आहेत. शिवाय, तो अंदाज आत्ता किंवा अजून काही काळ उघड न करणेच जास्त योग्य होईल
युध्दसरावाची बातमी वाचताना मलाही असेच वाटले होते. पण पाकिस्तानला रशियाचा विश्वास कसा वाटला हे ही एक गुढच आहे. कदाचित तुम्ही अमेरिकेच्या जास्त जवळ गेलात तर आम्ही पाकिस्तानला जवळ करू असा इशारा भारताला द्यायचा रशियाचा हेतू तर तुम्ही आम्हाला मदत केली नाही तर आम्ही ती रशियाकडून घेऊ असा इशारा अमेरिकेचा देण्याचा पाकिस्तानचा हेतू शिवाय भारताचा एक जुना मित्र फोडता येतोय का किंवा एखादी फट मिळतेय का अशी ही आशा पाकिस्तानला वाटू शकते. अर्थात यात पाकिस्तानला आपला हेतू पूर्ण करण्याची निकड जास्त वाटतीय अस वाटतय. ज्याची निकड जास्त त्याला फारशा अटी घालता येत नाहीत व तो जरा उतावळेपणा करण्याची शक्यता असते.अगदी तसेच वर्तन पाकचे होतय असे वाटतेय. ज्याला आपण अनेक दशके मदत केली तो देश रशिया च्या जवळ जातोय हे अमेरिकेच्या जिव्हारी लागलेले असणार. (सात्विक संताप म्हणायला हरकत नाही!!!) त्यातूनच अमेरिकेची पाकिस्तानला दिलेली नवी जहाल धमकी जन्माला आली असावी. पाकिस्तानचे नेतृत्व गोंधळ्यासारखे वाटतेय. असो. आपण दिलेल्या संकेतानुसार इथेच थांबतो.

पण पाकिस्तानला रशियाचा विश्वास कसा वाटला हे ही एक गुढच आहे. राजकारण साधे सरळ कधीच नसते... जागतिक राजकारण तर अधिकच गुंतागुंतीचे ! सद्यस्थितीतले तीन महत्वाचे मुद्दे : १. जसा, "शत्रूचा शत्रू हा मित्र असतो" तसाच, "दुरावत जाणार्‍या मित्राचा (पक्षी : भविष्यात शत्रू बनू शकणार्‍या मित्राचा) शत्रू हा पण मित्र असतो" ! :) २. लोखंड गरम झाल्यावर त्यावर घाव घातला तरच हवा तो परिणाम मिळतो. तोपर्यंत, "अडला नारायण... " ही म्हण (मनातल्या मनात) घोकत राहणे जास्त चांगले. इंग्लिशमध्ये "टायमिंग इज एव्हरीथिंग" असे म्हणतात ते उगाच नाही. ;) ३. आंतरराष्ट्रिय राजकारणातल्या आपल्या अपेक्षा, परिस्थितीचे अंदाज व त्यासाठीचे आपले उपाय "भविष्यात (५-१०-१५-२०-२५--- वर्षे) डोकाऊन ठरवावे" लागतात... आणि त्यांना दर प्रचलित स्थितीत घडत असलेल्या अपेक्षित-अनपेक्षित घटनांचा तडका देऊन मगच "आजचे पाऊल टाकावे" लागते. राहता राहिली पाकिस्तानची वागणूक... पाकिस्तानचा इतिहास पाहिला तर "निर्लज्जपणे निव्वळ तात्कालिक हितसंबंधांवर आधारलेले दलबदल करणे" उर्फ "ज्याच्याकडून पैसा मिळेल त्याची (मैत्रीच्या गोंडस नावाआड) चाकरी करणे" उर्फ "भाडोत्री (मर्सिनरी) सैन्य चालवणे" हे पाकिस्तानी सैन्याच्या परदेशनीतिचे एकच एक तंत्र आहे. यामुळे, ज्या दिवशी ज्याची बोली जास्त त्या दिवशी पाकिस्तान त्याचा (मित्र ?!) असतो ;) गेला काही काळ प्रतिस्पर्धी झालेले रशिया आणि चीन, गेल्या शतकातल्या मधल्या काही दशकांप्रमाणे, अमेरिका या समान शत्रूविरुद्ध, जवळ येत आहेत, ... मात्र या दोन मैत्रींत एक मोठा फरक आहे, भूतकालातल्या मैत्रीत युएसएसआर चीनपेक्षा वरचढ होता, पण आजच्या घडीला चीन रशियापेक्षा जास्त प्रबळ आहे. पाकिस्तान चीनचा 'पाळलेला' मित्र आहे. समर्थाशी संबंध ठेवताना त्याच्या श्वानाला चुचकारणे बरेच फायद्याचे असते ! ;)

श्रीगुरुजी गुरुवार, 10/27/2016 - 21:30
Asian Development Bank refuses to fund Pakistan’s $14 bn Indus dam project in PoK. Previously, the World Bank declined to fund the project following Islamabad's refusal to seek an NoC from India. presently the United States Agency for International Development (USAID) was conducting a feasibility study on the dam. Islamabad has consistently failed to attract foreign lenders for the project. Repeated efforts to rope in the World Bank as a co-lender had failed two years ago when the government declined to seek a No objection Certificate from India for the project. The ADB chief also cautioned Pakistan to wisely implement projects under the USD 46 billion China-Pakistan Economic Corridor (CPEC), another strategic project opposed by India as it passes through the PoK, and utilise their funds well so as to avoid debt or repayment problems. म्हणजे या बाबतीत पुन्हा एकदा चीन पाकिस्तानच्या मदतीला धावून येईल व त्याद्वारे पाकिस्तानवरील आपले उपकारांचे ओझे वाढवत नेईल. असे झाले तर काही काळानंतर पाकिस्तान पूर्णपणे चीनचा बटीक झालेला असेल. http://indianexpress.com/article/world/world-news/asian-development-bank-declines-to-fund-pakistans-14-bn-indus-dam-project-in-pok-3105506/

मदनबाण गुरुवार, 11/03/2016 - 20:43
मनदिप सिंग दिवाळीला आलाच नाही... आले त्याचे विटंबना केलेले शरीर :( लहान मुलांनाही पाकिस्तान ने सोडले नाही ! रक्ताळलेली दिवाळी... :( पाकिस्तानला धडा शिकवायची वेळ आली आहे... वि वाँट रिटालिएशन !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अजुन किती ?

In reply to by मदनबाण

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 11/03/2016 - 22:53
अजुन किती ? कदाचित, काही वर्षे सुद्धा ! कदाचित, एखादा मोक्याचा क्षण मिळाला आणि त्याचा फायदा घेता आला तर एखाद्या वर्षांतही ! मूळातच अतिरेकी तत्वांवर पोसलेले आणि ६०-७० वर्षांच्या भारताच्या (एखादा तात्कालिक अपवाद सोडता) सततच्या पडत्या धोरणाने शिरजोर झालेले पाकिस्तानी सैन्य एकाद-दुसर्‍या हल्ल्याने ताळ्यावर येईल अशी कल्पना करणे वास्तवाला धरून होणार नाही. अश्या अनेक दशकांच्या अनुभवाने बनलेल्या सवयी पटकन सुटत नाहीत. "भारतासाठी हा संघर्ष संपवणे शांती प्रस्थापित करण्यासाठी आहे" तर "भारत व अफगाणीस्तानशी संघर्ष चालू ठेवणे, हे पाकिस्तानी सैन्यासाठी त्यांची जगातली आवश्यकता कायम ठेवण्यासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे." अर्थात, अश्या जीवन-मरणाच्या परिस्थितीत, जखमी झालेले व मरण समोर उभे असलेले हिंस्त्र जनावर (पक्षी : पाकिस्तानी सैन्य) अधिक हिंस्त्र बनून जीवाच्या आकांताने प्रतिहला करत राहणारच. आपल्या दर हल्ल्यासाठी हे गृहीतक न ठेवणे वस्तूस्थितीला सोडून व आत्मघातकी असेल. सद्यस्थितीत, (अ) अमेरिकेचा पाय पाकिस्तानी दगडाखाली आहे (अफगाणिस्तानमधिल अमेरिकन सैन्यासाठी सर्व सामरिक व मुलकी मदत, कराची बंदरापासून अफगाणीस्तानापर्यंत पाक भूमीवरून ट्रकमधून जाते व त्याला दुसरा योग्य पर्याय अमेरिकेकडे नाही. या ट्रकिंग कंपन्या पाकिस्तानी जनरल्सच्या प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष मालकिच्या आहेत.); (आ) चीन या पाकिस्तानच्या सर्वमोसमी मित्राला अजूनही पाकिस्तानला मदत करणे गैरफायद्याचे होईल अशी कठीण आंतरराष्ट्रिय परिस्थिती नाही; (इ) अमेरिकेचा शत्रू असलेला रशिया, भारताची अमेरिकेबरोबर वाढणारी जवळीक पाहून, पाकिस्तानला प्रतिकात्मक जवळीक (पोश्चरींग) दाखवू लागला आहे. या तिहेरी वस्तूस्थितीचा पाकिस्तान पुरेपूर फायदा उठवून त्याची भारताची कुरापत काढण्याची नीति शक्य तितकी लांबवणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अश्या परिस्थितीचा वारंवार फायदा घेत तर पाकिस्तानची गेल्या ७० वर्षांची वाटचाल चालली आहे... आतापर्यंत याबाबतीत पाकिस्तानला पीएचडीच्या स्तराचे ज्ञान मिळालेले आहे. "दर चुकारपणाला किंमत असेल, तिची किंमत वाढत दर दर चुकारपणामागे वाढत राहील आणि ती चुकवायलाच लागेल" हा धडा निब्बर पाकिस्तानी जनरल्सना महाग पडेपर्यंत किंवा त्यांचा विमोड होईपर्यंत सतत त्यांच्या पदरात घालावा लागेल. यापेक्षा वेगळा पर्याय आतातरी भारतासमोर नाही. त्यामुळे, हा दीर्घकालीन संघर्ष चालू ठेवणे, त्यातून होणारे नुकसान सोसणे आणि पाकिस्तानचे त्यापेक्षा अधिक नुकसान करणे हे चालूच राहील. यात भारताची एक पडती बाजू आहे : पाकिसानने केलेल आपले नुकसान नुकसान लोकशाही असलेला भारत लपवू शकणार नाही व त्यातून होणारा जनक्षोभ भारत सरकारला सोसणे भाग पडणार आहे (जसा, "अजुन किती ?" या शब्दांत आहे). मात्र, भारताच्या कारवाईने होणारे पाकिस्तानी सैन्याचे नुकसान तेथिल सैन्याच्या त्याब्यातल्या काश्मीर मध्ये असेल व पाकिस्तानी सैन्य नेहमी प्रमाणे ते पाकिस्तानी जनतेपासून लपवेल आणि आंतरराष्ट्रिय स्तरावर नाकारत राहील (जसे सर्जिकल स्ट्राईकच्या बाबतीत केले गेले). थोडक्यात, भारताकडे पाकिस्तानी सैन्याचे नुकसान असह्य होईपर्यंत सतत वाढते ठेवणे, पण तरीही संघर्ष सर्वंकष युद्धापर्यंत न वाढवणे अशी तारेवरची कसरत करणे हाच एक उपाय सद्या आहे. या झाल्या बाधक (cons) गोष्टी. पण, त्याचबरोबर अनेक साधक (pros) गोष्टीही घडत आहेत... अमेरिका : १. यावेळेस अमेरिकन सार्वत्रिक निवडणूकीत भारतियांचे जेवढे उघड उघड महत्व दिसत आहे तेवढे पूर्वी कधीच दिसले नव्हते. हे अमेरिकन भारतियांच्या अमेरिकेतल्या राजकारणातल्या वाढत्या महत्वाचे लक्षण आहे. या दबावाचा उपयोग अमेरिकच्या आंतरराष्ट्रिय निर्णयांना भारताच्या बाजूने झुकण्यास/झुकविण्यास निश्चितच मदत होईल. २. भारत-अमेरिकेचे व भारत-रशिया यांच्यातिल व्यापारी व सामरिक सहकार्याचे करार. याअंतर्गत 'मेक इन इंडिया' मध्ये केली जाणारी अमेरिकन गुंतवणूक फार महत्वाची आहे. यामुळे हे संबंध केवळ अर्थकारणापलिकडे जाऊन दीर्घकालीन समान हितसंबंधाची राखण करणारे ठरतात. ३. Obama Celebrates Last Diwali As President By Lighting Ritual Lamp : It's the first time a president has lit the diya in the Oval Office. या वर्षी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकन राष्ट्रपतींच्या हस्ते द्वीपप्रज्वलन करून दिवाळी साजरी केली गेली.  युएन १. UN lights up for Diwali for the first time : “Light over darkness, hope over despair, knowledge over ignorance, good over evil — the UN lights up. Happy Diwali!” tweets UNGA president Peter Thomson. इमारतीतील द्वीपप्रज्वलन व त्याबरोबरच युएनच्या भव्य इमारतीवर "Happy Diwali" या शब्दांची रोषणाई केली गेली.  २. गेल्या वर्षीच्या योगदिनाच्या नंतर हा एक भारतिय दिन युएनमध्ये साजरा केला गेला आहे. (महत्वाचे म्हणजे हा दिन हिंदूंचा म्हणून जातियवादी आहे हे म्हणावे असे इस्लामी देशांसकट कोणालाच वाटलेले नाही :) ) ब्रिटन ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा यांनी १० डाऊनिंग स्ट्रीट येथिल आपाल्या निवासस्थानी दिवाळी साजरी केली व एक व्हिडीओ मेसेज प्रसारित केला. *************** या सर्व गोष्टी वरवर प्रतिकात्मक (सिंबॉलिक) वाटल्या तरी त्या अनेक राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रिय धोरणांवर दूरगामी परिणाम करणार्‍या आणि ते धोरण कोणत्या दिशेने जाईल यांच्या दिशादर्शक आहेत. ही दिशा आंतरराष्ट्रिय राजकारणात भारताचे स्थान बळकट करण्यास मदत करेल अशी आहे. असे सिंबॉलिझम्स जगातल्या देशांचे कल ठरवणारे/फिरविणारे असतात आणि ते पुढच्या पायर्‍या (उदा: एनएसजी, युएन सिक्युरिटी काऊंसिलमधिल कायम सदस्यत्व, चुकार देशाविरुद्धची आपल्याला हवी असणारी कारवाई, इ) चढून जायला मदत करतात, हे नक्की. भारताला आंतरराष्ट्रिय राजकारणामध्ये आणि एखादा सन्माननिय अपवाद वगळता परदेशांत स्थाईक झालेल्या भारतियांना स्थानिक राजकारणामध्ये गेली साठ वर्षे फारसे महत्व होते असे दिसत नव्हते. गेल्या दोन वर्षांत भारतियांची परदेशातली संख्या लक्षणिय रित्या वाढली आहे असे नाही. मग आताच या वरील (व इतर अनेक) भारतासाठी सकारात्मक गोष्टी का घडत आहेत ? गेली दोन-अडीच वर्षे मोदींच्या परदेशवार्‍यांना नावे ठरवणार्‍या लोकांनी या घटनांचे श्रेय मोदींना देण्याचा प्रामाणिकपणा करावा असे वाटते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अमितदादा Fri, 11/04/2016 - 00:43
सहमत. छान विश्लेषण..आजच्या घडीला युद्ध हि न परवडणारी गोष्ट आहे त्यामुळे छुप्या कारवाई ला छुप्या पद्धतीनेच उत्तर दिले पाहिजे. पाकिस्तानची आर्थिक, राजकीय आणि काही दृष्ट्या लष्करी नाकेबंदी हाच उपाय आहे. मात्र भारतीयांचं आंतरराष्ट्रिय राजकारणामध्ये वाढत चालेल महत्व हे भारताच्या विकासाशी आणि वाढत चाललेल्या आर्थिक ताकतेशी संबंधित आहे (इतर हि बरीच कारणे आहेत), मोदी यायच्या बऱ्याच आधी हे सुरु झालं आहे हे माझं मत आहे.

In reply to by अमितदादा

मदनबाण Fri, 11/04/2016 - 06:38
एक्का काका जी डी बक्षी यांचे जे मत आहे ते तसं का आहे मग ? अमेरिका आणि युरोप महामंदीच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत. अमेरिकेला चीनच्या विरोधात आणि युरोपला त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी { ब्रिटन फ्रान्स इं... } यांना आपली गरज आहे त्यामुळे त्यांनी रोषणाइ केली आणि संदेश दिले यात मोठे अप्रुप वाटण्यासारखे काहीच नाही. आपल्या हिंदुस्थानी लोकांची त्यांच्या प्रगतीसाठी राबणारी लोकसंख्या सुद्धा मोठी आहे ज्याची अर्थातच त्यांना जाणीव आहे. पाकिस्तानचे म्हणाल तर सध्याच्या लष्कर प्रमुखांना अजुन नियंत्रण सोडायचे नसुन अधिककाळ पदावर राहायची इच्छा दिसत असुन त्याच्यासाठी सुद्धा हा उध्योग चालु असेल, परंतु आपण त्यांची कंबर मोडु शकतो ही क्षमता ठेवुन आहोत असे जर असेल तर ती क्षमता आपण दाखवुन ध्यावी इतके मात्र नक्कीच वाटते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pakistan ‘breaks rule’; makes public names of 8 Indian diplomats, calls them spies

In reply to by मदनबाण

आपल्या हिंदुस्थानी लोकांची त्यांच्या प्रगतीसाठी राबणारी लोकसंख्या सुद्धा मोठी आहे ज्याची अर्थातच त्यांना जाणीव आहे. असहमत. विकसित देशांत स्थायिक झालेल्या व स्थानिक प्रगतीसाठी राबणारी भारतिय लोकांची संख्या मोठी आहे, हे आजचे नाही तर अनेक दशके सत्य आहे. हे मीही लिहिले आहेच. पण मुद्दा असा की आज तिथल्या भारतिय वंशाच्या लोकांना त्या ताकदीची जाणीव झाली आहे आणि म्हणून तेथिल स्थानिक राजकारण्यांना त्यांची दखल घ्यावी लागत आहे (जे पूर्वी होत नव्हते)... कारण भारतियांना त्यांच्या ताकदीची कल्पना कोणीतरी करून दिली आहे, यापूर्वी ती सांख्यिक, आर्थिक व सामजिक वजनाची ताकद अजमावी हा विचार त्यांच्या मनाला शिवत नव्हता, हे मी प्रत्यक्ष जागेवरच्या अनुभवाने सांगू शकतो. राजकारण्यांना "तुमच्या ताकदीची" भिती वाटत नाही, पण "ती ताकद वापरण्याच्या तुमच्या कुवतीची" मात्र प्रचंड भिती वाटते ! परंतु आपण त्यांची कंबर मोडु शकतो ही क्षमता ठेवुन आहोत असे जर असेल तर ती क्षमता आपण दाखवुन ध्यावी इतके मात्र नक्कीच वाटते. शत्रूची कंबर मोडणे किंवा सर्वंकष युद्ध जिंकणे म्हणजे केवळ बाँब टाकून त्याची राजधानी आणि काही भूभाग उद्धवस्त करणे असे होत नाही. तर, त्या देशाच्या भूभागावर शासकीय नियंत्रण मिळविणे आवश्यक असते. त्या कारणामुळेच दुसर्‍या महायुद्धानंतरच्या परिस्थितीत; (अ) फार छोटे क्षेत्रफळ व फार कमी लोकसंख्या असलेला देश आणि (आ) पूर्णपणे किंवा बहुतांश आपल्या बाजूला असलेली लोकसंख्या असलेला देश; असल्याशिवाय कोणत्याही देशाबरोबरचे संर्वंकष युद्ध जिंकणे आजच्या सामरीक महाशक्तींनाही शक्य नाही. १. या वस्तूस्थितीचा धडा अमेरिकेला व्हिएतनाम युद्धात मिळाला होता. पण कुवेत युद्धात मिळालेल्या सहज विजयाच्या धुंदीत तो धडा इराक युद्धात उडी घेताना अमेरिका विसरली. कुवेत आणि इराकमधल्या वर सांगितलेल्या क्षेत्रफळ आणि आपल्या बाजूला असलेली लोकसंख्या या दोन्ही बाबतीतल्या तफावती अमेरिकेने नजरेआड केलया. त्या युद्धाचे परिणाम आज केवळ अमेरिका आणि इराक नव्हे तर सर्व जग भोगत आहे. युद्ध जिंकणे आणि त्याचे फायदे उपभोगणे दूर पण तेथे अडकलेला पाय कसा सोडवावा हीच आज अमेरिकेसमोरची सर्वात मोठी समस्या आहे. २. भारताला बांगला देशात विजय मिळाला त्याचे मुख्य कारण "आपल्या बाजूला असलेली लोकसंख्या" हेच होते. ते युद्ध "भारतिय सैन्य + बांगला देशी जनता" विरुद्ध "स्थानिक जनतेचा विरोध असलेले पाकिस्तानी सैन्य + त्यांचे थोडेसे स्थानिक हस्तक" असा होता. (असे असूनही बांगला देश एक वर्षापूर्वीपर्यंत भारताचा मित्र तर नव्हताच पण भारताच्या दृष्टीने सुरक्षित शेजारीही नव्हता, हा इतिहास आहे.) बांगला देश युद्धात भारताला अनुकूल असलेले मुद्दे भारत-पाकिस्तान युद्धात आस्तित्वात असणार नाहीत. हा फरक न जाणल्यास अजून एक "इराक युद्धापेक्षा भयानक परिणामांचे युद्ध" भारत आपल्यावर ओढवून घेईल. "जास्त भयानक" कारण, अमेरिका इराकपासून अनेक हजार किमी दूर आहे, पण तरीही पूर्णपणे सुरक्षित नाही हे सांगायला नकोच. भारत-पाकिस्तान युद्धानंतरचा "इराकसदृष्य परिस्थिती असलेला पाकिस्तान" तर भारताचा निकट शेजारी असणार आहे ! ३. ४ कोटीच्या लोकसंखेच्या व ४.४० लाख चौ किमी क्षेत्रफळाच्या इराकमध्ये, आधुनिक सामरिक-नागरी यंत्रसामुग्री दिमतीला असलेल्या आणि जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला व त्याच्या दोस्त राष्ट्रांना इराकवर "शासकीय नियंत्रण" मिळविणे शक्य झाले नाही. त्यामुळे निर्माण झालेल्या अराजकतून सुखरूप बाहेर कसे पडावे या विवंचनेत आज अमेरिका आहे. वरच्या पार्श्वभूमीवर, चीनचा उघड पाठींबा असलेल्या, २० लाख लोकसंखेच्या, ८.८० लाख चौ किमी क्षेत्रफळाच्या व अतिरेक्यांचे नंदनवन असलेल्या पण तरीही भारताकडून पराभूत झालेल्या पाकिस्तानवर भारतिय सेना "शासकीय नियंत्रण" मिळविण्याचा प्रयत्न करत आहे अशी कल्पना केल्यास मला काय म्हणायचे आहे हे स्पष्ट होईल. आजच्या घडीला अमेरिकासुद्धा अश्या परिस्थितीत सापडण्याचे स्वप्न पहायचे धाडस करणार नाही. ४. दुसरा उपाय म्हणजे पाकिस्तानवर बाँबवर्षाव करून त्याचे "कमांड अँड कंट्रोल स्ट्रक्चर" नष्ट करणे व उरलेला पाकिस्तान आपला मित्र होईल अशी इच्छा मनात धरणे. "सर्वंकष युद्ध जिंकणे म्हणजे केवळ बाँब टाकून शत्रूची राजधानी आणि काही भूभाग उद्धवस्त करणे असे नाही." हा मूलभूत सामरीक धडा विसरून अमेरिकेने अफगाणिस्तान आणि इराक या दोन युद्धांत "कारपेट बाँबिंग करून सद्य राजवटीला उध्वस्त करा आणि घरी जा" हे तत्व वापरले व "भूभागावर शासकीय नियंत्रण मिळविणे आवश्यक समजले नाही". या कृतीने निर्माण झालेल्या राजकिय व शासकिय पोकळीत तालिबान, अल कायदा, इसिस, इत्यादी सकट इतर अनेक अतिरेकी संघटना फोफावल्या (जसे शेतकर्‍याच्या योग्य कृतीच्या अभावात तण माजते, अगदी तसेच) आणि त्यामुळे मध्यपूर्वेपासून दूर असलेल्या अमेरिका-युरोपसकट सर्वच जग अधिक असुरक्षित बनले आहे, हा इतिहास आहे. तेव्हा बाँब टाका आणि पाकिस्तानी शासन नष्ट करा, हा उपाय तर अधिकच धोकादायक ठरेल. ५. प्रत्यक्ष-गुप्त शत्रू : दुसर्‍या महायुद्धपर्यंतच्या युद्धांत आणि त्यानंतरच्या युद्धांत एक फार मोठा फरक आहे. दुसर्‍या महायुद्धपर्यंत शत्रूपक्ष आणि मित्रपक्ष असे उघड दोन तट असत. आजकालची युद्धे प्रत्यक्ष समरांगणावर कमी आणि गुप्त कारवायांनी जास्त अशी लढली जातात... (अ) चीन पाकिस्तानच्या बाजूने सैन्य न उतरवता पाकिस्तानला मदत करतो. (आ) अमेरिका पाकिस्तानला सैनिकी मदत देत असतानाच त्याच्या अतिरेकी कारवायांच्या विरुद्ध आहे असे म्हणतो. (इ) रशिया भारताचा "खास मित्र" असे म्हणत असतानाच; पाकिस्तानबरोबर सैनिकी अभ्यास करतो; आणि त्याच बरोबर सद्याच्या सिक्युरिटी काऊंसेलचा चेअरमन असलेला रशियाचा युएनमधिल राजदूत "I don't want to go there, don't want to go there. No no please, I don't want to go there," असे म्हणून युएन मधिल पत्रकार परिषदेत सर्जिकल स्ट्राईक्स व काश्मीर चर्चा टाळून पाकिस्तानला टोला लगावतो; आणि दोनचार दिवसात रशिया-भारतामध्ये अत्याधुनिक सामरिक साधनांचा $१२ बिलियनचे करार होतात. (ई) सद्या सिरियात चाललेल्या अंदाधुंदीत आज कोण कोणाबरोबर आहे आणि उद्या कोण कोणाबरोबर असेल हे खात्रीलायकरित्या सांगेल त्याला "सामरिक विश्लेषणाचे नोबेल पारितोषिक" नक्की द्यावे लागेल ! ;) (उ) पाकिस्तान हा देश त्याच्या भौगोलिक स्थानामुळे चीनला आणि रशियाला भारतीय महासागरात तडक प्रवेश देउ शकतो... हा एक फार मोठा रणनीतिचा मुद्दा आहे. "अधिक बोली लावेल त्याची चाकरी" हे तत्व बाळगून वागणारा पाकिस्तान या फार मोठ्या मुद्द्याचा पुरेपूर फायदा उठवत आहे आणि उठवत राहील (किंबहुना देशाचा आणि / किंवा शासकांचा वैयक्तीक स्वार्थ त्याला तसे करण्यास भाग पाडेल). अश्या परिस्थितीत, प्रत्यक्ष युद्ध सुरू झाल्यावर कोण कोणाच्या बाजूने किंवा विरुद्ध; आणि ते किती प्रमाणात प्रत्यक्ष व किती प्रमाणात गुप्तपणे करेल; हे प्रत्येक राष्ट्राच्या त्या युद्धाच्या परिणामातून मिळू शकणार्‍या तात्कालीक व दीर्घकालीन फायद्याच्या अंदाजांवर अवलंबून असणार आहे. (In politics, there are are no permanent friends or enemies; only permanent interests.) ६. कोणत्याही सर्वंकष युद्धात हरलेल्या बाजूचे नुकसान होतेच पण जिंकणार्‍या बाजूचे अपरिमित नुकसान होते, हा इतिहास आहे. इतर अनेक लहान-मोठे, सरळ-किचकट, स्पष्ट-अस्पष्ट मुद्दे आहेत, पण सद्य विषय विशद करण्यास वरचे सुस्पष्ट मुद्दे पुरेसे आहेत. वरच्या पार्श्वभूमीवर "आपण त्यांची कंबर मोडु शकतो ही क्षमता ठेवुन आहोत" हे खरे असले तरी आपल्या स्वतःच्याही कंबरेचे आरोग्य ठीक ठेवण्यासाठी शत्रूबरोबर सर्वंकष युद्ध न करता त्याला इतर (राजकिय, आर्थिक, मुत्सद्दी, इ) साधने वापरून एकाकी व हतबल करून आपल्याला सकारात्मक होतील असे राजकीय, शासकीय व सामरीक बदल शत्रूमध्ये करून/करवून घेऊन आपला मूळ उद्द्येश साधणे, हेच जास्त शहाणपणाचे आहे. हा दुसरा उपाय करताना दीर्घकालासाठी चिकाटीने प्रयत्न करावे लागतात. पण, सद्यस्थितीत त्याला जास्त फायदेशीर पर्याय नाही. (कर्मधर्मसंयोगाने भारताचे नशीब खुष होऊन त्याने एखादी "अननोन अननोन (unknown unknown)" संधी दिली तर वेगळी गोष्ट ! )

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अभिजीत अवलिया Sat, 11/05/2016 - 00:33
म्हात्रे साहेब, वरील प्रतिसादातील पाकिस्तानबाबत तुम्ही जे विश्लेषण केले आहे त्याला सहमत. 'भारताने पाकिस्तानवर हल्ला करून पाकिस्तानला नष्ट करून टाकावे आणि अखंड भारत पुन्हा निर्माण करावा' असे फेसबुकी तत्वज्ञान बरेच जण देत असतात. पण 20 कोटी लोकसंख्येच्या पाकिस्तानला भारताने युद्धात पराभूत केले तरी ही समस्या संपणार नाही कदाचित अजून वाढेल. आज भारत पाकिस्तान दोन वेगळी राष्ट्रे आहेत. जर भारताने पाकिस्तानचा सैनिकी पराभव करून त्यांच्या भूभागावर सैनिकी नियंत्रण मिळवले तरी 20 कोटी जनतेला तुम्ही ठार मारू शकत नाही आणी जास्त काळ सैनिकी दबावात देखील ठेवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. पाकिस्तानमधील लोक कधीच भारताच्या बाजूने नसणार पण त्याचबरोबर तिथले दहशतवादी गट हे राजरोज आपल्या सैन्यावर हल्ले करून निश्चित आपणास जेरिस आणतील. आणी असे झाले तर आपले हाल कुत्रे खाणार नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या समस्येवर 'पाकिस्तानवर हल्ला करून त्यांना संपवा' हे निश्चित उत्तर नाही असे मला वाटते. भारत फारफार तर एखादे मर्यादित युद्ध करून पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याची मनीषा बाळगू शकतो पण ते देखील बऱ्यापैकी कठीण आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मदनबाण Sat, 11/05/2016 - 10:58
आर्म फोर्सेसच्या रक्ताला किंमत नाही का ? अजुन किती किंमत मोजण्याची आपली "मानसिक" तयारी झाली आहे ? करुन ठेवायची आपण तयारी केली पाहिजे ? युद्ध न करताही बलिदानाच्या अग्निकुंडात अजुन किती जवानांच्या आहुती ध्यायची आपली तयारी आहे ? एक्का काका युद्धा ने नुकसान होते ही सर्व मान्य गोष्ट आहे, पण आपण ऑलरेडी अघोषित युद्ध इतके वर्ष लढतच आहोतच ना ? त्याची फार मोठी किंमत देखील मोजतच आहोत ! मान्य आहे आजच्या काळात देशातील जनतेला कोणतेही सरकार संपूर्ण संरक्षण देउ शकत नाही, परंतु पाकिस्तानकडुन सातत्याने चाललेल्या आपल्या मोठ्या हानीला आपण टाळु शकलो नाही.झोपेत असलेले सौनिक ठार केले जात आहेत, त्यांची मुंड़की कापली जात आहेत्,मिलेटरी बेसवर हल्ले होत आहेत,लोकं बस मध्ये / रेल्वे मध्ये ब्लास्ट करुन मारली गेली आहेत,पंजाब ड्रग ग्रस्त करुन तरुण पिढीला नष्ट केलं गेल आहे आणि जात आहे,एव्हढच काय पण संसदेवर सुद्धा हल्ला करुन झाला आहे त्यांचा. अजुन किती हानी आपण सहन करायची बाकी आहे ? पाकिस्तानला आपण असेच सहन करणार असु तर मग इतक्या अस्त्र शस्त्रांवर आपण पैसा खर्च करतो आणि करणार आहोत तो काय कामाचा ? कारण आपण काही युद्ध करणार नाही, जवान बोकडा सारखे कापले जाताना सहन करणार, लोक ठार होत राहणार आणि असं काही झाल की परत असेच चर्चेचे गुर्‍हाळ चालवत राहणार ! बाकी वरती जो प्रश्न विचारला आहे तो परत विचारतो... जी डी बक्षी यांचे मत तसे का आहे ? हे गॄहस्थ १ वर्ष थांबा किंवा काही काळ थांबा असे न म्हणता पाकिस्तानवर कारवाईची वेळ आली आहे असे सातत्याने सांगताना दिसत आहेत ! त्यांनाही युद्धाचा अनुभव आणि हानीची कल्पना असणारच ! असो... पाकिस्तानला समजणारे उत्तर हे खालील प्रमाणेच हवे :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pakistan army personnel replacing Rangers as border heat escalates

In reply to by मदनबाण

मला वाटते की पाकिस्तानला सद्याच्या परिस्थितीत योग्य ते उत्तर देणे चालू झाले आहे. ते काही प्रमाणात, बिएसएफ व सैन्य ज्या कारवाया करत आहे त्यांच्याबद्दलच्या बातम्या येत आहे त्यावरून दिसत आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तान यांच्यामधल्या फरकामुळे, सहाजिकच त्या कारवायांबद्दल आपल्याला किती व कसे समजेल यावर काही बंधने असणार आहेत. याबद्दल मी माझ्या वरच्या एका प्रतिसादात खालीलप्रमाणे लिहिले आहेच... पाकिसानने केलेल आपले नुकसान नुकसान लोकशाही असलेला भारत लपवू शकणार नाही व त्यातून होणारा जनक्षोभ भारत सरकारला सोसणे भाग पडणार आहे (जसा, "अजुन किती ?" या शब्दांत आहे). मात्र, भारताच्या कारवाईने होणारे पाकिस्तानी सैन्याचे नुकसान तेथिल सैन्याच्या त्याब्यातल्या काश्मीर मध्ये असेल व पाकिस्तानी सैन्य नेहमी प्रमाणे ते पाकिस्तानी जनतेपासून व इतर जगापासून लपवेल आणि आंतरराष्ट्रिय स्तरावर नाकारत राहील (जसे सर्जिकल स्ट्राईकच्या बाबतीत केले गेले). पाकिस्तानी सैन्याचा त्या देशातील दबदबा हा ते सैन्य अजेय असण्याची प्रतिमा कायम राखण्यावर अवलंबून आहे. हे खालील वस्तूस्थितीवर पाहणे जरूर आहे... (अ) सरळ युद्ध झाले तर पाकिस्तान जिंकणार नाही हे त्याला भूतकाळातल्या तीन पराभवांच्या अनुभवांवरून माहीत झाले आहे. त्यामुळेच तर, गेल्या दोन-तीन दशकांत, त्यांनी अतिरेक्यांना हाताशी धरून "ब्लिडिंग इंडिया बाय थाऊजंड कट्स" हे "अघोषित युद्ध व लो इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्ट"चे धोरण स्विकारले आहे. (आ) तसेच, भारताच्या सीमेलगतच्या कारवाईमुळे नुकसान झाले तरी ते "झालेच नाही" असे खोटे दावे करून आपली प्रतिमा राखण्याची त्या सैन्याची धडपड राहील. मात्र, भूतकाळात आणि सद्यकाळातला फरक असा की पूर्वी असे नुकसान अनेक पाकिस्तानी हल्ल्यांनंतर कधीमधी नाईलाज झाला तरच होत असे व तो पाकिस्तानसाठी फायद्याचा व्यवहार होता. सद्या, प्रत्येक पाकिस्तानी कुरापतीला त्या कुरापतीपेक्षा जास्त शिक्षा करण्याचे उघड आदेश बीएसएफ व सैन्याला आहेत. या शिक्षांनी होणारे नुकसान उर्फ पाकिस्तानला कुरापतींची चुकवावी लागणारी किंमत असह्य होण्यासाठी थोडा वेळ जावा लागेल. अनुभवी निवृत्त सैन्य अधिकार्‍यांबद्दल अतीव आदर ठेवूनही आजची परिस्थिती सर्वंकष युद्ध जाहीर करण्याला योग्य नाही असे मला वाटते. (शिवाय, अश्या युद्धामध्ये जेत्या राष्ट्राच्या होणार्‍या नुकसानीचा उल्लेख अगोदर आला आहेच.) किंबहुना, सद्याच्या पाकिस्तानी कुरापती "भारताने प्रथम युद्ध पुकारावे" यासाठीच चालू आहेत. तसे झाल्यास, चीनच्या मदतीने पाकिस्तान, "भारत आक्रमक राष्ट्र आहे" अशी दवंडी पिटून जगाची सहानभूती मिळवायला मोकळा होईल. आताही "आम्हीच जगात सर्वात जास्त अतिरेक्यांचे बळी आहोत" हे वाक्य तो सतत घोकत असतो. अश्या गोष्टी म्हणजे कांगावाखोरपणा असला तरीही, चीनसारख्या युएनच्या सुरक्षा समितीत कायम सदस्य असलेल्या देशाचा पाठिंबा असल्यावर, जगाच्या गळी उतरवता येतात, हे कटू सत्य आहे... लष्कर ए तयबा ही अतिरेकी संघटना आहे असे युएनने जाहीर केले आहे, तरीही त्या संघटनेचा संस्थापक व म्होरका असलेल्या हाफीज सैदला अतिरेकी असल्याचे युएनने जाहीर करण्यास चीन सतत विरोध करत आहे, यावरून काय सिद्ध होते ? जवळच्या भूतकाळातल्या अनेक युद्धांच्या अनुभवामुळे कोणत्याही महत्वाच्या देशाला जगात कुठेही चालू झालेले युद्ध नको आहे, कारण "ग्लोबल व्हिलेज" असलेल्या या जगातल्या कोणत्याही युद्धाचा सर्व जगावर दुष्प्रभाव पडतोच. त्यामुळे, सद्याच्या काळात भारताने फार मोठ्या कारणाशिवाय स्वतः युद्ध सुरू करणे "आक्रमक राष्ट्र" बनणे म्हणजे महत्वाच्या पाश्चिमात्य राष्ट्रांचा पाठिंबाही गमावणे होईल. तसे युद्ध सुरू करण्याअगोदर पाकिस्तानने "युद्धाशिवाय इतर कोणताही पर्याय बाकी ठेवला नाही" असे सिद्ध करावे लागेल. भारताने सुरु केलेल्या एकमेव बांगला देश युद्धात इंदिरा गांधीनी जवळ जवळ दीड वर्षे जगभरच्या सर्व महत्वाच्या देशांच्या नेत्यांना भेटून हेच सिद्ध करून युद्ध सुरु करण्याची पार्श्वभूमी तयार केली होती. मानसशास्त्रिय भूमिकेतून पाहिले तर, अगोदरच्या सर्वच रंगाच्या पाकिस्तानसंबंधी नरमाईच्या धोरणांच्या सवयीमुळे जनतेने काही मोठ्या अपेक्षा करणे सोडून दिले होते. सद्य सरकार कधी नव्हे ते पाकिस्तान विरुद्ध ताठर भूमिका घेत आहे हे पाहून त्याच्याकडून तडक व निर्णायक कृतीची अपेक्षा प्रमाणाबाहेर वाढली आहे. (जसे आपण वेगवेगळ्या वेळेच्या भारतिय क्रिकेट टीम्सच्या बाबतीत करत आले आहोत.) मात्र, देशाच्या सरकारला सगळे निर्णय आणि विशेषतः परदेशाशी युद्ध करण्याचे निर्णय, तात्कालीक भावना दूर ठेवून व दूरगामी विचारांती घ्यावे लागतात. सद्याच्या सरकारची पहिली दोन वर्षे "भारत शांतीचा चाहता देश आहे, तो आक्रमक कारवाया करू इच्छित नाही आणि केवळ आपल्या देशातील नागरिकांचा विकास करण्याची धडपड करत आहे." हे जगाला पटवून देण्यात गेली आहेत. त्यामुळेच, गेल्या काही महिन्यांत भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक्स व इतर प्रतिहल्ल्ल्यांसारख्या कारवाया गुप्त ठेवण्याची गरज हळू हळू कमी होत आहे. पण तरीही, सद्याच्या पाकिस्तानी कारवाया "भारत आक्रमक देश न ठरता युद्ध सुरू करण्याच्या" स्तरावर पोचलेल्या नाहीत. त्या तेवढ्या स्तरावर पोचल्यानंतरच युद्ध सुरू केल्यास जगातले महत्वाचे देश भारताच्या बाजूला असतील, किंवा कमीत कमी भारताच्या विरुद्ध तरी नसतील. मात्र, तो स्तर गाठण्याअगोदर, तात्कालीक सैनिकी कारवायांच्या (सर्वंकष युद्ध नव्हे) बळावर व त्याबरोबरच जागतीक मुत्सदेगीरीच्या बळावर पाकिस्तानमध्ये भारताला अनुकुल राजकीय व सामरीक बदल घडवून आणणे ही रणनीति सर्वात जास्त योग्य होईल. पाकिस्तानला धडा शिकविला पाहिजे याबद्दल आपले दुमत नाही. मात्र, ते करताना "फायदा-खर्च गुणोत्तर (बेनेफिट-कॉस्ट रेशो)" भारताच्या फायद्याचे असावे असेही मला वाटते. याच करिता, रागाच्या भरात कारवाई न करता, आपल्या बाजूच्या व आपल्या विरुद्ध असलेल्या सर्व गोष्टी जमेस धरून मगच कृती ठरवावी व ती डोळे उघडे ठेवून अमलात आणावी असे माझे मत आहे. असो. हा विषयच अनेक मतमतांतरे असावीत इतका जुनाट व किचकट आहे. तेव्हा सद्यापुरते "अ‍ॅग्री टू डिसॅग्री" या तत्वावर थांबूया. जसजसे नवीन मुद्दे/घटना/पुरावे/धागेदोरे हाती येतील तसतशी त्यावर चर्चा चालू राहीलच. ये जंग फायदेमंद तरीकेसे जितने के लिये लंबे रेसका घोडा होना जरूरी है । :)

श्रीगुरुजी गुरुवार, 11/03/2016 - 21:30
रक्ताळलेली दिवाळी... :( पाकिस्तानला धडा शिकवायची वेळ आली आहे... वि वाँट रिटालिएशन !
युद्ध नको, बुद्ध हवा. युद्धाने प्रश्न सुटणार नाही. चर्चेच्या माध्यमातून, लोकांच्या व कलाकारांच्या देवाणघेवाणीतूनच, व्हिसावरील निर्बंध शिथिल करूनच हा प्रश्न सुटेल. भारत-पाकिस्तान वाद राजकारण्यांनी निर्माण केला आहे. दोन्ही बाजूच्या सर्वसामान्य नागरिकांना एकमेकांबद्दल प्रेम, जिव्हाळा, आपुलकी व आदर आहे. दोन्ही देशांची संस्कृती समान, इतिहास समान, खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी समान. दोन्ही देश एकमेकांची भावंडे आहेत. मोठा भाऊ या नात्याने पाकिस्तानला समजून घेण्याची जबाबदारी जास्त प्रमाणात भारताचीच आहे. पाकिस्तानमधील काही वाट चुकलेल्या मूलतत्ववाद्यांनी व भारतातील हिंदू अतिरेक्यांनी हा प्रश्न निर्माण केला आहे. भारताने पाकिस्तानला डिवचणे थांबवावे.

गामा पैलवान Fri, 11/04/2016 - 02:21
लोकहो, एक गोष्ट नक्की की जेव्हा भारतीय सैन्यावर हल्ला होतो तेव्हा भारतीय सैन्य त्याचा बदला घेतंच. हा प्रतिहल्ला राजकीय कारणामुळे चर्चेत येत नसे. चार दिवसांपूर्वी भारताने पाकिस्तानविरुद्ध चक्क युद्ध छेडलं आहे. इथे त्यावर एक बातमी आहे : https://www.superstation95.com/index.php/world/2345 सतत रट्टे खाऊनही पाकिस्तान परतपरत आगळीक करायला धजावतो कसा? पाकिस्तानला कायमचं गप्प करायला काय करावं लागेल? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सतत रट्टे खाऊनही पाकिस्तान परतपरत आगळीक करायला धजावतो कसा? पाकिस्तानला कायमचं गप्प करायला काय करावं लागेल? वर लिहिल्याप्रमाणे... "भारतासाठी हा संघर्ष संपवणे शांती प्रस्थापित करण्यासाठी आहे" तर "भारत व अफगाणीस्तानशी संघर्ष चालू ठेवणे, हे पाकिस्तानी सैन्यासाठी त्यांची जगातली आवश्यकता कायम ठेवण्यासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे." अर्थात, अश्या जीवन-मरणाच्या परिस्थितीत, जखमी झालेले व मरण समोर उभे असलेले हिंस्त्र जनावर (पक्षी : पाकिस्तानी सैन्य) अधिक हिंस्त्र बनून जीवाच्या आकांताने प्रतिहला करत राहणारच. आपल्या दर हल्ल्यासाठी हे गृहीतक न ठेवणे वस्तूस्थितीला सोडून व आत्मघातकी असेल. *************** पाकिस्तानला कायमचं गप्प करायला काय करावं लागेल? यासंबंधिचे माझे विचार येथे आहेत.

सर्जिक स्ट्राईक्स करण्याअगोदर भारतिय डिजीएमओ आणि संरक्षणमंत्र्यांनी खालील विधान केले होते... "पाकिस्तानच्या प्रत्येक नाठाळ कारवाईला, आम्ही ठरवलेल्याप्रमाणे आणि आम्ही ठरवलेल्या वेळेवर कठोर उत्तर दिले जाईल." यापुढे जावून संरक्षण मत्री... "याचा अर्थ असा नाही की 'नी जर्क रिअ‍ॅक्शन' असाणारच नाही." या वचनांप्रमाणेच भारतिय सैन्यदलाच्या "विटेच उत्तर दगडाने" देणार्‍या पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार्‍या कारवाया चालू आहेतच. काल पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात तीन जवान हुतात्मा झाले व त्यातील एका जवानाच्या कलेवराची पाकिस्तानी गोळीबाराच्या संरक्षणात विटंबना करण्यात आली. याला उत्तर म्हणून भारतीय सैन्याने केलेल्या दंडात्मक कारवाईत मोठ्या आकाराच्या दारूगोळा फेकणार्‍या तोफा व उखळी तोफा वापरून १५-१६ पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. त्यामधे पाकिस्तानचे चार सैनिक व एक अधिकारी (बहुदा कॅप्टन किंवा वरिष्ठ दर्जाचा) मारले गेले. पाकिस्तानी सैन्यासाठी हा आघात इतका तीव्र आणि अनपेक्षित होता की संध्याकाळी ६:३० वाजता घाईगडबडीत पाकिस्तानी डीजीएमओने फोन करून बोलण्याची विनंती केली. भारतिय डीजीएमओने ताठर भूमिकेतून "केवळ तुमच्या कारवायांना योग्य ते उत्तर दिले गेले आहे." असे उत्तर दिल्याचे कळते. पाकिस्तानी डीजीएमओने अशी फोनवर बोलण्याची विनंती करणे हे पाकिस्तानला भारताची सीमेवरची उत्तरे जड पडत असल्याचे लक्षण आहे. पाकिस्तानला असहनिय होईपर्यंत त्याच्या कारवायांची अशीच किंमत मोजणे भाग पाडण्याची रणनीती सतत चालू ठेवणे हाच सद्यस्थितीत भारतापुढील एक उत्तम पर्याय आहे. ====== काळ्या पैशाच्या उच्चाटनाच्यासंबंधात सरकारने केलेल्या डिमॉनेटायझेशन कारवाईच्या विरुद्ध संसदेत आणि संसदेबाहेर गदारोळ करणार्‍या नेत्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना खालील गोष्टींसाठी वेळ मिळालेला नाही : १. हुतात्मा झालेल्या व विशेषतः जवानाच्या मृत शरीराची पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या विटंबनेचा निषेध करणे. ही चर्चा करणे आणि पाकिस्तानचा निषेध करणे. २. नुकत्याच झालेल्या रेल्वे अपघातात मृत झालेल्या शंभरापेक्षा जास्त व इतर जखमी झालेल्या अनेक सर्वसामान्य लोकांचे दु:ख इतके कमी वाटले की रेल्वे मंत्र्यांना त्या अपघाताबद्दल निवेदन करू द्यावे असे वाटले नाही. या दोन्हीऐवजी संसदेचे कामकाज बंद करणे त्यांना जास्त महत्वाचे असल्याचे दिसत होते. दुर्दैवाचे पण भारतिय राजकारणाचे सद्य रूप ! :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मुख्य म्हणजे आतापर्यंत पंतप्रधानांच्या उपस्थितीचा आग्रह करत संसद बंद ठेवणार्‍या विरोधी पक्षांना आज पंतप्रधान संसदेच्या सदनात हजर होते हे पण दिसले नाही आणि गदारोळ पूर्वीप्रमाणेच चालू राहीला.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ट्रेड मार्क गुरुवार, 11/24/2016 - 01:40
या गदारोळात त्यांच्या लाडक्या अल्पसंख्यांकांचे लाडके झाकीर नाईक आणि त्याच्या संस्थांवर झालेल्या कारवाईकडे पण कोणाचंच लक्ष गेलं नाहीये. इथे स्वतःचं सगळं धुतलं गेलंय तर दुसऱ्याची कोण फिकीर करेल, त्यातून हे स्वार्थी लोक तर नाहीच करणार. एकंदरीत बुद्धिबळाचा मोठा पट मांडलाय आणि एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी विविध चाली रचल्या जात आहेत.

नाखु गुरुवार, 11/24/2016 - 09:30
पाकिस्तान सध्या अनेक आव्हानांचा सामना करत आहे. त्यात गरिबी, भ्रष्टाचार, निरक्षरता, असमानता, बेरोजगारी आणि प्रशासनाशी संबंधित अनेक मुद्दे आहेत. या कारणांमुळे देशाचा आर्थिक विकास आणि विकासाच्या गतीवर नकारात्मक परिणाम दिसून येत आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी एईआरसी (अॅप्लाइड इकॉनॉमिक्स रिसर्च सेंटर)च्या संचालक प्राध्यापक समीना यांनीही आपली मते मांडली. पाकिस्तान सामाजिक आणि आर्थिक वादळाच्या दिशेने जात आहे. त्यामुळे मोठी हानी होईल, अशी भीती आहे. हे आर्थिक वादळ सध्याची अर्थव्यवस्था आणि पाकिस्तानच्या भवितव्याला उद्ध्वस्त करीन, असे समीना म्हणाल्या. यावेळी पाकिस्तान इन्स्टिट्युट ऑफ डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सचे कुलगुरू डॉ. असद जमान यांनी भारत-पाकिस्तान संबंधांबाबत आपली मते मांडली. भारतासोबत असलेला तणाव आपल्या देशासाठी नुकसानकारक आहे, असे ते म्हणाले. पाकिस्तानने व्यापारी धोरण आणि आत्मनिर्भरतेबाबत पुन्हा विचार करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
सविस्तर बातमी इथे

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 11/24/2016 - 14:47
भारताने नुकत्याच दिलेल्या प्रत्युतरात पाकिस्तानचे सैनिक व अधिकारी मारले गेले आणि मोठे नुकसान झाले याचे संकेत दिसत आहेत : पाकिस्तानी डी़ईएमओने भारतीय डी़ईएमओशी संध्याकाळी आणिबाणिचा फोन संवाद करावा यासाठी विनंती केली. त्यात भारतीय डी़ईएमओने "प्रत्येक कुरापतीला भविष्यातही असेच योग्य ते उत्तर दिले जाईल" असा इशारा दिल्याने पाकिस्तानची हालत खराब झाल्याचे दिसत आहे. पाकिस्तानकडून... १. परराष्ट्रमंत्रालयाच्या स्तरावर संवाद साधण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. २. युएनमधल्या पाकिस्तानी वकिलाने युएनने भारत-पाक सीमेवरील परिस्थितीत लक्ष घालण्याची विनंती केली आहे. Pakistan reaches out to UN over LoC tension with India

Heart of Asia conference names Pakistan-based terror groups including LeT, JeM as grave threats to peace तालिबान, दाएश (आयसिस) अणि त्यांचे साथी, हक्कानी नेटवर्क, अल कायदा, लष्कर-ए-तायबा, जेश-ए-मोहमद, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान, इतर परदेशी अतिरेकी, इत्यादी सगळ्याचे स्पष्ट नाव घेऊन लिहिलेले (आडून उल्लेख केलेले नाही) घोषणापत्र (डिक्लेरेशन) आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर कधीच लिहिले गेलेले नाही. यातल्या दोन तृतियांशापेक्षा जास्त अतिरेकी संघटना पाकिस्तानच्या भूमीवरून आणि पाकिस्तानच्या सैन्याच्या मदतीने चालतात, हे जगजाहीर आहेच. त्यावरून या घोषणापत्राचा रोख कोणाच्या बाजून आहे हे ओळखायला अजिबात कठीण नाही. मुख्य म्हणजे, या परिषदेचे भारत आणि अफगणिस्तानबरोबरच; पाकिस्तान, चीन व सौदी अरेबिया हे सदस्य आहेत. थोडक्यात, या परिषदेत पाकिस्तानला, त्याच्या पाठीराख्यांच्या पाठिंब्याने व उपस्थितीत, स्वतःच्या हाताने स्वतःच्याच थोबाडीत मारून घेण्याला जबरदस्ती केल्यासारखे झाले आहे ! :) यामुळे, पाकिस्तान अगदी उद्यापासून आपले वागणे बदलेल असे नाही. पण, अश्या प्रतिकात्मक गोष्टींमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात दूरगामी फायदे नक्की मिळतात. या गोष्टीमुळे चीनला युएनमध्ये पाकिस्तानला उघड पाठींबा देणे जास्त कठीण होईल. किंबहुना, चीनने या घोषणापत्रात कोणत्याही प्रकारचा विरोध न करता भाग घेऊन, पाकिस्तानला "आता परिस्थिती हाताबाहेर जात आहे, यापुढे आमचा विनाअट पाठिंबा गृहीत धरू नको" असा इशारा (पोश्चरिंग) दिलेला आहे. हा चीन-पाकिस्तानच्या "ऑल वेदर फ्रेंडशीपला गेलेला पहिला तडा" आहे आणि भारताचा मुत्सद्दी विजय आहे, यात वाद नाही.

मदनबाण Tue, 12/06/2016 - 21:51
'Pakistan-aided' terrorists kill Indian soldier, mutilate his body before fleeing back into PoK ...तर डोळे काढून हातात देऊ, मनोहर पर्रिकरांचा पाकला अप्रत्यक्ष इशारा अहो पर्रिकर इथे जवानांच्या मुंडक्यांची रास लागायची वेळ आलीय, सातत्याने मिलेटरी बेसेसवर हल्ले होत गेले आहेत, कधी काढताय पाकिस्तानचे डोळे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- China-Pakistan axis threatens India’s geopolitical landscape

In reply to by मदनबाण

मदनबाण Tue, 12/06/2016 - 22:44
एक स्पष्टीकरण :- वरती दिलेल्या बातमीचा दुवा Oct 29, 2016 जरी असला तरी सर्च फिल्टर मध्ये 18 hours ago असे दिसल्याने तो चुकुन परत इथे दिला गेला आहे. वेगळा दुवा :- Evidence shows Pakistan's 'complicity' in beheading of Indian soldier, says Army

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- China-Pakistan axis threatens India’s geopolitical landscape

In reply to by मदनबाण

"आम्ही ठरवलेल्या वेळी, आम्ही ठरवलेल्या जागी व आम्ही ठरवलेल्या प्रकारे उत्तर देवू" असे भारतिय सरकार व सैन्य म्हणते आहे. यावेळी त्यांच्यावर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती आहे, असा माझा कयास आहे. पाकिस्तानरुपी भिंत डोके आपटून पाडण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, प्रथम तिला कमकुवत करून नंतर तिला कमीत कमी मनुष्यबळ-अर्थबळ-राजकीय किंमत वापरून पाडता येईल. या भिंतीतली सद्याची ताकद चीनरुपी दगडांमुळे आहे. तिच्यातले शक्य तेवढे दगड एक एक करत काढून घेण्यात यश येत आहे, हे कसे ते माझ्या वरच्या प्रतिसादात लिहिले आहेच. ७० वर्षे दुखणे जुनाट करून घेतल्यावर आता घाईने काम न करता, जरा धीर धरून, "साप मर जाये, लेकीन लाठी ना टूटे ।" हे तत्व डोळ्यासमोर धरून, सरकार योग्य संधीची वाट पाहत आहे, असे मला वाटते.

In reply to by मदनबाण

No conclusive evidence on alleged Indian spy Kulbhushan Jadhav, says Sartaj Aziz: Reports प्रथम सर्जिकल स्ट्राईक, नंतर सीमेवर दीर्घकाळ बदडणे, त्यानंतर नुकतीच सरताज अझिझची "हार्ट ऑफ एशिया" परिषदेत "आंंरराष्ट्रीय मुत्सद्दी संकेत न टाळता" केलेली परवड यांना काहीसे फळ दिसू लागले इतके पुढे जाऊन म्हणण्याजोगी परिस्थिती अजून आलेली नाही. पण, पाकिस्तानने सतत चालवलेला धोशा सोडून एका बाबतीत माघार घेतली आहे असेच दिसते. त्या परिषदेत "चीनने पाकिस्तानची तळी उचलून न धरणे" आणि आता "कुलभूषण जाधव गुप्तहेर असण्याचे पुरावे नाहीत असे सरताझ अझिझने पाकिस्तानच्या सिनेट्मध्ये कबूल करणे" हे, भूतकाळाचा दोन्ही देशांचा अनुभव पाहता, फार लक्षणिय संकेत आहेत. पाकिस्तानरुपी भिंतीतला दुसरा दगड निखळला आहे, पण अजून खूप दगड बाकी आहेत !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रत्येक लहान-मोठ्या राजकिय, मुत्सद्दी व माध्यमांतल्या प्लॅटफॉर्मवर "कुलभूषण भारतिय गुप्तचर संघटना रॉ चा हेर आहे आणि त्याची अटक हा भारताच्या बलुचिस्तानमधल्या अतिरेकी ढवळाढवळीचा फार मोठा पुरावा आहे" असा सतत कंठशोष करणार्‍या पाकिस्तानच्या स्वतःच्या सिनेटमध्ये असे सरकारपुरस्कृत विधान केले जाणे म्हणजे पाकीस्तानने जाहीरपणे स्वतःच्याच थोबाडीत मारून घेण्याइतके नामुष्कीचे आहे. हे पाकिस्तानी सरकार व लष्कर यांच्या ओढाताणीत सरकार जरासे जास्त धीट झाल्याचेही लक्षण आहे.

अमेरिकन पद्धतीत निवडणुक झाल्यावर नवनिर्वाचित प्रेसिडेंटला सत्ताग्रहण करण्याअगोदर आपले मंत्रीमंडळ बनविण्यासाठी एक महिन्यापेक्षा जास्त वेळ मिळतो. या काळात नवीन मंत्रीमंडळाच्या निवडीमधून आणि इतर राष्ट्रांच्या मुख्यांशी केलेल्या संवादामध्ये निर्वाचित प्रेसिडेंटच्या राजकारणाच्या दिशेचे संकेत मिळू लागतात. ट्रंपच्या चीनबद्दलच्या धोरणाचे संकेत त्याने तैवानच्या प्रेसिडेंटबरोबर केलेल्या चर्चेने स्पष्ट होऊ लागले आहेत. चीनच्या मते तैवान हा (तिबेट सारखाच) चीनचा अविभाज्य भाग आहे आणि अमेरिकेने हे म्हणणे, १९७९ मध्ये चीनशी मैत्री करताना, तैवानशी मुत्सद्दी (डिप्लोमॅटिक) संबंध तोडावे ही चीनची अट मानून, पूर्ण केले होते. अर्थात यानंतरही अमेरिकेने तैवानला सामरीक सामानाची विक्री चालू ठेवलीच होती, हे वेगळे ;) अमेरिकेचा पाठिंबा बंद झाल्याने सुरक्षा समितीचा स्थायी सदस्य असलेल्या तैवानचे युएनमधले सभासदत्व १९७१ सालीच रद्द झाले आहे. आता सद्य संभाषणाच्याबद्दल ट्रंपच्या चीफ ऑफ स्टाफ राईन्स प्रीबसने, "ट्रंप काय करत आहेत ते त्यांना नीट माहीत आहे" असे विधान करून अमेरिकेच्या चीनबदल्लच्या बदलत्या धोरणाकडेच संकेत केला आहे. त्याचबरोबर, नवनिर्वाचित उपाध्यक्ष माईक पेन्स याने "हा एक सामान्य शिष्टाचार होता" असे म्हणून चीनला अधिकच गोंधळात टाकले आहे ! या सगळ्यात, हे पण महत्वाचे की असा सामान्य शिष्टाचार सामान्यपणे फक्त जगत्मान्य (साधारणपणे युएन मान्य) देशाच्या सर्वोच्च अधिकार्‍याबरोबर पाळला गातो व सद्याच्या युएन सदस्य नसलेल्या तैवानच्या अध्यक्षाचे पद तसे नाही ! तेव्हा या संभाषणाला अगदी विसरून चालणार नाही. थोडक्यात, चीनचे, इतरांना सतत संभ्रमात ठेवण्याचे धोरण त्याच्याच गळ्यात बांधून, आम्ही पण कमी नाही असे ट्रंपने त्याला दाखवून द्यायला सुरुवात केली आहे. :) By accident or design, Donald Trump signals tougher US policy towards China