सोबतीण भाग १
अपर्णा आणि पृथा एकाच ऑफिस मध्ये होत्या. दोघी एकत्रच जायच्या ऑफिसला. अगोदर अपर्णाने ऑफिस जॉईन केल त्यानंतर पृथाने. पृथाने जरी थोड नंतर ऑफिस जॉईन केल तरी तिच्या बडबड्या स्वभावामुळे तिची अपर्णाशी पटकन दोस्ती झाली. तशी अपर्णा अबोलच होती. त्यामुळे तिची आणि पृठाची मैत्री झालेली बघितल्यावर ऑफिसमधल्या इतरांनी अपर्णाच्या अपरोक्ष पृथाकडे आश्चर्य व्यक्त केल होत.
"कमाल आहे हा पृथा तुझी. आम्ही अपर्णाला तुझ्या अगोदर पासून ओळखतो. पण आजवर तिने कधी आमच्याशी गप्पा नाही मारल्या. अग, लंचला सुद्धा ती आमच्याबरोबर नाही बसत. तुझ्याशी मात्र मस्त मैत्री झाली आहे. काय जादू केलीस ग तिच्यावर." एकाने पृथाला विचारल होत. पृथाला याच उत्तर माहित नव्हत. तिने इतकंच म्हंटल,"मला माहित नाही कशी झाली आमची दोस्ती. पण मी तिच्याशी बोलायला लागले आणि ती सुधा बोलली माझ्याशी... इतकंच."
पृथाने उत्तर तर दिल. पण प्रत्येकानेच तिला अपर्णाच्या अबोल स्वभावाबद्धल सांगितल. त्यामुळे पृथाच्या मनात सुद्धा आल, कशी काय आपल्याशीच दोस्ती झाली अपर्णाची? काही दिवसांनी पृथाने ऑफिसमधून निघाल्यावर स्टेशनला जाताना अपर्णाला हा प्रश्न विचारलाच. अपर्णा यावर फक्त हसली आणि म्हणाली,"सांगीन एकदिवस."
असेच दिवस जात होते. पृथाच्या वडिलांची आई, पृथाची आजी.... कोकणात राहायची. एकदा गावाकडून फोन आला की आजीची तब्बेत बरी नाही. आजीचा पृथावार खुप जीव होता. त्यामुळे तिला पृथाला बघायची... भेटायची... खूप इच्छा होती. म्हणून मग पृथा ऑफिसमधून सुट्टी घेऊन आई-वडीलांबरोबर कोकणात आपल्या गावी गेली आणि दोन दिवसातच तिचा ऑफिसमध्ये फोन आला की तिची आजी वारली. आणि म्हणून मग तिने सुट्टीदेखील थोडी वाढवून घेतली. दहा-बारा दिवसांनी पृथाने परत ऑफिस जॉईन केल. ती आली तिच थोडी शांत होती. शनिवार असल्याने सगळे रविवारच्याच् मूडमधे होते. त्यामुळे इतरांच्या ते फारस लक्षात नाही आल. पण अपर्णाला लगेच लक्षात आल. पण तिला वाटलं की आजी गेल्याच दु:ख असेल. त्यामुळे तिनेदेखील पृथाला छेडल नाही.
संध्याकाळी दोघी नेहेमी प्रमाणे एकत्रच निघाल्या. पृथा तशी गप्पा मारत होती पण तिच फारस लक्ष नव्हत गप्पात. शेवटी अपर्णाने तिला विचारलच.
"काय झाल पृथा? आजीची आठवण येते आहे का? तू बोलते आहेस ग... पण तुझ गप्पात लक्ष नाही आहे; आलय माझ्या लक्षात."
पृथाने एकदा तिच्याकडे टक लावून बघितल आणि अचानक तिला विचारल,"अपर्णा तुझा भूतावर विश्वास आहे का ग?"
चालता-चालता अपर्णा ब्रेक लागल्यासारखी थांबली आणि मोठे डोळे करून तिने पृथाला विचारल,"का पृथा? आणि अचानक हे भूत का आल तुझ्या मनात?"
"अपर्णा.... अस म्हणतात की कोकणात भूत असतात... तुला पण अस वाटत का?" तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत पृथाने स्वतःच म्हणण पुढे ढकलल.
आता मात्र अपर्णाने पृथाचा हात धरला आणि तिला बाजूच्याच बागेत घेऊन गेली. शनिवार असल्याने ऑफिस अर्धा दिवस होत. अजुन जेम-तेम चार वाजले होते. बागेत काही लहान मुल खेळत होती आणि त्यांच्या आया गप्पा मारत बाकदयावर बसल्या होत्या. एका बाकदयावर बसवत अपर्णा पृथाला म्हणाली, "बस पृथा. आणि आता सांग मला नक्की काय झालय? तुला तुझी आजी दिसली आहे का एकदा ती गेल्यावार.... परत?"
"नाही अपर्णा. पण मला वेगळाच अनुभव आला आहे ग. विश्वास ठेऊ की नको अस वाटत आहे ग." पृथा विषण्ण आवाजात म्हणाली.
"पृथा माझा विश्वास आहे भूतावर. माझ मत आहे की भूत असतात. खरच! तुला बर वाटावं म्हणून नाही म्हणत मी. मला अनुभव आला आहे. पण माझ राहुदे. तू कोकणात काय झाल ते सांग पाहू मला." अपर्णा म्हणाली.
"तुला अनुभव आला आहे? म्हणजे काय अपर्णा? आणि तू मला कधीच का बोलली नाहीस याबद्धल?" आपला विषय बाजूला ठेवत पृथा आश्चर्याने म्हणाली.
"सांगीन मी माझा अनुभव नंतर. अगोदर तू सांग काय झाल ते." अपर्णा म्हणाली.
"एक मिनिट ह. घरी फोन करून सांगते मला उशीर होईल म्हणून." आपला मोबाईल काढत पृथा म्हणाली. "तू पण कळव तुझ्या घरी."
"हो! तू कळव. मी... माझ मी कळवते." अपर्णा म्हणाली. आणि मेसेज करायला तिने मोबाईल उघडला.
"हलो आई... मी अपर्णा बरोबर आहे ग. थोडा उशीर होईल बहुतेक मला. काळजी करू नकोस ठीक आहे मी. थोडावेळ गप्पा मारत बसणार आहोत ग. हो... हो... आम्ही एकच ट्रेन घेतो. त्यामुळे एकत्रच असू... चालेल. स्टेशनवर दादाला पाठव मला घ्यायला. मी ट्रेनमध्ये बसले की फोन करतेच." पृथाने आईशी बोलून फोन ठेवला आणि अपर्णाकडे बघितलं.
अपर्णाने काही न बोलता नजरेनेच तू बोल अशी तिला खुण केली.
"अपर्णा मी न थोडी confused आहे आणि थोडी घाबरले पण आहे. खर सांगू का.. माझा न गावाला जाईपर्यंत भूतावर विश्वास नव्हता ग. खर तर माझी आजी आमच्याकडेच राहिली गेली अनेक वर्ष. पण दोन वर्षांपूर्वी आजोबा गेले. मग तिच मन इथे रमत नव्हत. तिने बाबांना म्हंटल की ती गावाच्या घरी जाऊन राहू इच्छिते. अगोदर बाबांनी खूप समजावलं की काही मेडिकल इमर्जन्सी लागली तर गावाला अवघड आहे. पण ती म्हणाली की बर नसेल तर ती इथे येईल. पण इथे आता तिच मन रमत नाही. तिने कोणाचही एकल नाही. हट्टाने गावाला गेली. बाबा पंधरा दिवस सुट्टी काढून गेले होते. आणि आमच गावच घर दुरुस्त करून घेऊन सगळ्या सोई तिला करून देऊन परत आले. आमची आमराई आहे तिथे. ते बघायला दगडू आणि त्याची बायको आहेत. त्याला लहानपणापासून आजी-आजोबानीच वाढवला. त्यामुळे त्याने बाबांना शब्द दिला की तो आजीची चांगली काळजी घेईल. तसा तो बारावी शिकला आहे. त्यामुळे मग बाबाना पण हायस वाटल.
आजीला मोबाईल वापरता यायचा. आम्ही रोज तिच्याशी फोनवर बोलायचो. दिवसभरात प्रत्येकाने तिला किमान २-३ वेळा फोन करायचा अशी आम्ही सगळ्यांनी सवयच लावून घेतली होती. आई, दादा, मी आणि बाबा. त्यामुळे तिच कस आहे ते आम्हाला माहित असायचं. त्यात आई-बाबा पण दगडूशी रोज बोलायचे. आजी खूप खुश होती गावाला. पण गेले सहा महिने मात्र तिने आमच्याशी बोलण कमी केल होत. म्हणजे ते आता आम्हाला लक्षात येत आहे. तेव्हा मात्र नाही कळल. मी किंवा दादाने फोन केला की ती आम्हालाच प्रश्न विचारायची. तिच्याबद्दल बोलण मग राहूनच जायचं. आई-बाबांना ती दगडू बद्दल सांगत रहायची. मात्र तिच्या बोलण्यात आमराईमधल्या माडाच्या झाडाचा कायम उल्लेख असायचा."
"माड म्हणजे काय ग पृथा?" अपर्णाने तिची लिंक तोडत तिला विचारले.
"अग माड म्हणजे नारळ. नारळाच झाड ग." पृथा म्हणाली.
"ओह... ओके... मग?" अपर्णा हसून म्हणाली.
"तर... आजी म्हणायची की आमराईच्या एका कडेला दोन माड आहेत ते तोडले पाहिजेत. अगोदर ती सहज म्हणते आहे अस वाटायचं. मग मात्र तिच ते फक्त मत राहील नाही तर ती त्या बाबतीत आग्रही झाली.
शेवटी बाबांनी दगडूला फोन केला आणि विचारल,"दगडू बाबा काय प्रकार आहे. आई ते माड तोडायचं म्हणते आहे. का रे?" दगडू अगोदर बोलायला तयार नव्हता. पण मग बाबांनी आवाज चढवल्यावर म्हणाला,"दादा काही दिवसांपूर्वी काशा त्या झाडावरून पडून मेला. तो माड चोरायला हळूच चढला होता. माईंनी त्याला चढताना बघितला. त्यावेळी त्या लांब होत्या. कोणीतरी चढत आहे एवढच त्याना लक्षात आल. म्हणून खरच कोणी आहे का याची खात्री करायला त्या तिथे गेल्या. कोणीतरी खरच वर चढत आहे हे बघून त्या मोठ्या आवाजात ओरडल्या... कोण रे? खर तर दादा, माईना त्याला ओरडायच नव्हत. घेतले माड तर घेतले, मला कशाला लागतात. अस त्या नेहेमी म्हणायच्या. पण त्यांच्या आवाजाने अगोदरच मनात भिती असलेला काशा दचकला आणि त्याचा हात सुटला आणि तो खाली पडला. मी पण माईंचा आवाज एकून तिथे पोहोचलो होतो. काशा खाली दगडावर आपटला आणि त्याच डोक फुटलं. त्याच्या डोळ्यात रक्त उतरल. माई घाबरल्या. मला म्हाल्या दगडू उचल त्याला आणि घराकडे घे. डॉक्टरला बोलाव. पण काशा नाही नाही म्हणत राहिला. मला माड हवेत.. अस म्हणाला आणि त्याने प्राण सोडला."
बाबांना कळेना या गोष्टीचा आणि माड तोडण्याचा काय सबंध. त्यांनी तस दगडूला विचारले. दगडू म्हणाला,"दादा.... तुमचा विश्वास बसणार नाही. का मला गरिबाला भरीस पाडता. तुम्ही माईनाच विचारा ना."
मग मात्र बाबा रागावले. म्हणाले,"अरे दगडू ती काही सांगत नाही म्हणून तुला विचारतो आहे ना? तुला तिची काळजी घ्यायला ठेवलं आहे ना? अरे मी तिथे नसताना तूच ना तिला माझ्या जागी. सांग बघू काय आहे तिच्या मनात."
तेव्हा दगडू म्हणाला,"दादा माईंच्या मनाने घेतले आहे की काशा त्या माडावर आहे. त्या तेव्हापासून आमराईमध्ये येत सुद्धा नाहीत."
हे एकून बाबा एकदम चक्रावले. अपर्णा खर सांगू का माझी आजी न खूप शिकलेली होती. त्याकाळातली इंटर ग. खूप हुशार आणि समजूतदार. त्यामुळे ती असा काही विचार करेल अस बाबांना खर वाटेना. म्हणून मग त्यांनी तिला फोन करून विचारले. बाबांनी विषय काढला आणि आजीचा आवाजच बदलला ग. तिचा आवाज रडवेला झाला. म्हणाली,"मला ते माड नकोत आमराईमध्ये." बाबांनी तिला शांत केल. म्हणाले,"मी दगडूला सांगतो लगेच ते माड तोडायला. तू काळजी करू नकोस." आणि मग बाबांनी दगडूला ते माड पाडायला सांगितल.
"मग? अग आजीला काशा तिथे आहे वाटत होत म्हणून तू इतकी अस्वस्थ झालीस का पृथा? कमाल आहे ह तुझी." अपर्णा पृथाची लिंक तोडत म्हणाली.
अपर्णाकडे बघत पृथा म्हणाली,"नाही अपर्णा. ऐक. बाबांनी सांगितल खर दगडूला ते माड तोडायला. पण दुसऱ्याच दिवशी दगडूचा फोन आला. म्हणाला,"माई म्हणतात माड नाही तोडायचा." आता मात्र बाबा वैतागले. त्यांनी आजीला फोन लावला आणि माड न तोडण्याचे कारण विचारले.
तिने उत्तर नाही दिले ग. इतकंच म्हणली की माड नाही तोडायचे. आता जे काही आहे ते माझ्याबरोबरच जाईल. बस." पृथा बोलता बोलता थांबली आणि शून्यात नजर लावून बसली.
Book traversal links for सोबतीण भाग १
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
भुते खेते हडळी..... अनुभव
सुरवात भारी झालीये वाचतोय
छान सुरुवात. पुभाप्र.
आवडले
आवडले
छान सुरुवात.
सुरुवात मस्त झालीये.
बाब्बू, कं लिवलंय
छान सुरुवात
?
चांगली सुरवात. पुभाप्र.
सुरुवात चान साली आहे.. पुढचा
चांगली
रोचक कथा !
छान
हा खेळ सावल्यांचा (१९७६)