Skip to main content

अंधविश्वास भाग (२) - नकारात्मक लढा

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 11/07/2016 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
http://vivekpatait.blogspot.in/2016/07/blog-post_7.html अंधविश्वास - सार्थक लढा (भाग १) -अंधविश्वास म्हणजे काय? नकारात्मक लढा (अंधविश्वास विरुद्ध लढणार्या संस्थांच्या विषयी माझ्या मनात आदर आहे, पण त्यांच्या हातून काय चुका होतात त्या वर हा लेख आहे. हे माझे आकलन आहे) एकदा नागपूरला एका लग्नात गेलो असताना, एक पुणेरी ग्रहस्थ मला भेटले होते. सहज अंधविश्वासावर चर्चा सुरु झाली. त्यांनी आपला एक अनुभव सांगितला. पुण्यात एका संस्थेने, अंधविश्वास विरोधात कार्य करणार्या एका संस्थेच्या महानुभावला बोलविले होते. सुरवातीला त्या महानुभावांनी आपल्या संस्थेचा परिचय दिला. भोंदू बाबांच्या विरोधात चाललेल्या त्यांच्या संस्थेच्या कामांची तपशील दिली. त्यांच्या संस्थेच्या कार्यात येणार्या अनेक संकटांचे विवरण हि दिले. समाजात पसरलेल्या अंधविश्वासांवर बोलताना मात्र ते रस्ता भटकले. थोडक्यात म्हणावे तर त्यांनी सत्यनारायण कथेचा माखौल तर उडविलाच पण अनेक पौराणिक कथांची खिल्ली हि उडविली. तिथे बसलेल्या लोकांमध्ये कुजबुज सुरु झाली. ह्या सदग्रहस्थांचा उद्देश्य अंधविश्वासांबाबत लोकांना जागरूक करणे आहे कि सनातन धर्माच्या विरुद्ध प्रचार करणे. सारांश एवढेच, त्यांची मेहनत फुकट गेली. काय चुकल त्या विद्वान माणसाचे. लोक अंधविश्वासी का बनतात हे त्यांना माहित नव्हते. जर मूळ समस्याच माहित नसेल तर तिचे समाधान कसे सांगणार. समस्येचे मूळ कारण माहित नसल्यामुळे पौराणिक कथा आणि सत्यनारायण कथेचा माखौल उडवून आपण लोकांना जागृत करत आहोत असे त्यांना वाटले. जुन्या काळातल्या पौराणिक कथा, मग त्या देवी देवतांच्या, राक्षस, अप्सरांच्या असो किंवा चान्दोबातल्या, या कथांमध्ये चमत्कार असतात. या चमत्कारांचा उद्देश्य लोकांना सत्य आणि धर्माच्या रस्त्यावर चालण्याची प्रेरणा देणे असतो. ह्या कथा वाचून कोणी हि अंधविश्वासी बनत नाही किंवा भोंदू बाबांच्या जाळ्यात हि अटकत नाही. एक आणखीन मोठी घोडचूक हि ह्या संस्था नेहमीच करतात. प्रत्येक समाजात जन्म ते मृत्य अनेक प्रकारचे संस्कार असतात. धार्मिक संस्कारांचा अंधविश्वास याशी काही एक संबंध नाही. धार्मिक संस्कार आणि अंधविश्वास हे दोन्ही वेगळे विषय आहेत. आपण समाजाचा हिस्सा आहोत, दर्शवण्यासाठी लोक समजासोबत आपले सुख आणि दुख वाटतात. इथे लोक खोट्या प्रतिष्ठेसाठी किंवा समाज काय म्हणेल यासाठी आपल्या चादरीपेक्षा (क्षमतेपेक्षा) जास्त खर्च करतात. हि मूळ समस्या आहे. मुलाचे नाव ठेवणे असो किंवा श्राद्ध, आपण गाव जेवण हि घालू शकतो किंवा कमीत-कमी खर्चात घरातल्या घरात हि करू शकतो. काही नसेल तर पत्र-पुष्प देवाला वाहून हि आपण सर्व संस्कार करू शकतो. शिवाय सर्व धार्मिक परंपरांचे पालन केलेच पाहिजे असे बंधन आपल्या सनातन धर्माने कुठेच घातलेले नाही. समाजाला या दृष्टीकोनातून जागृत करण्याची गरज आहे. संस्कारांचा विरोध करण्यात काहीच अर्थ नाही. आज आपण केक कापून वाढदिवस साजरा करतो. कारण समाजात काळानुसार संस्कार आणि परंपरा बदलत राहतातच. (इथे केक घरी कापायचा कि हॉटेलमध्ये जाऊन, हाही खर्चाचा विषय आहे, अंधविश्वासाचा नाही). धार्मिक अथवा पारंपारिक संस्कार यांना अंधविश्वासांशी जोडणे मुळातच चुकीचे आहे. ह्या मुळेच लोक या संस्थांना धर्मविरोधी समजतात. या संस्थांचा दुसरा उद्देश्य भोंदू बाबांविरोधात कार्रवाई करणे. यात संघर्ष हा आलाच. संघर्ष म्हंटला कि संघर्षरत दोन्ही बाजूंचे नुकसान होणारच. पण कधी-कधी निर्दोष लोकांचा बळी हि यात जातोच. जो पर्यंत लोक उपाय सांगणार्या बाबांना स्वखुशीने दक्षिणा द्यायला तैयार आहे, तो पर्यंत भोंदू बाबांचे प्रस्थ कमी होणार नाही. एक आत गेला कि दुसरा त्याची जागा घेईलच. समस्येचे समाधान लोकांना या बाबांकडे जाण्यापासून थांबविणे यात आहे. पण त्या साठी मूळ समस्या माहित असायला पाहिजे ना. सारांश, अधिकांश अंधविश्वास विरोधी संस्थांचे धोरण नकारात्मक आणि दुसर्यांच्या विरोधावर आधारित असल्यामुळे अपेक्षित परिणाम हि मिळत नाही परंतु शत्रू मात्र भरपूर पैदा होतात. क्रमश:
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1921
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

पटाईतांच्या पहील्या भागात 'भौतिक संसारिक समस्यांचे उत्तर अभौतिक रीतीने शोधणे म्हणजेच अंध विश्वास' तसेच अंधश्रद्धा पेक्षा अंध-विश्वास हा शब्दप्रयोग अधिक उचित आहे तसेच सतिश गावडे यांचा तेथिल प्रतिसाद materialistic problems need materialistic solutions. या टप्प्यापर्यंत लेख आणि चर्चा आली होती असे दिसते. दुसर्‍या भागात प्रचार नकारात्मक विरोधावर आधारीत असू नये म्हणतात, बर्‍याच अ‍ॅडव्होकसी चळवळींना हि खरेच मर्यादा पडते. दुसरा देतो आहे त्या पेक्षा आम्ही काय अधिक देतो, materialistic problems need materialistic solutions हे मार्गदर्शन अधिक प्रभावी होऊ शकेल असे विवेक पटाईतांना म्हणावयाचे असेल तर बर्‍यापैकी सहमत आहे. या धागा लेखाच्या उत्तरार्धात 'संस्कार' या विषयाचा पटाईत उल्लेख करताहेत ते सांस्कृतीक अंगाने असे वाटते. संस्कृती आणि विश्वास यांच्या सहसंबंधांवर हे विशेषत्वाने अवलंबून असेल का ? कुंकू लावणे ही संस्कृती झाली, चित्रपटात दाखवतात तसे इथे देव/येशू समोरचा दिवा/मेणबत्ती विजते तिकडे कुणाचा तरी मृत्यू होतो, तसे एखाद्या विवाहीत स्त्रीने अचानक कुंकू नाही लावले की तीचा नवरा मरेल हाही अंध-विश्वासच असावा किंवा विधवा स्त्रीने/ला कुंकू लावले तर काहीतरी विपरीत घडेल हे अंध विश्वास आहेत मागच्या शतकाच्या पुर्वार्धापर्यंत महाराष्ट्रात विधवांनी केशवपन नाही केले तर मृतपतीला स्वर्गाच्या दारापाशी जाण्यापूर्वी वैतरणी नदी पार करता येत नाही असे सांगितले जायचे. विधवेचे केशवपन हा संस्कार होता जो तार्कीक कसोट्यांवर टिकणारा नव्हता. इथे विधेवच्या मटेरील लाईफचा संबंध आहे पण आर्थीक फायद्या तोट्याचा प्रत्यक्ष संबंध नाही तरीही अंध-विश्वास आहे जो समाजा कडून व्यक्तिस्वातंत्र्याच्या हकनाक आड येत होता. मग अशा नकारात्मक संस्कारांना अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने विरोध करावा की नको ?

In reply to by माहितगार

एकमेकींच्या पतींना दिर्घायूष्य लाभणे यासाठी एकमेकींना कुंकू लावणे हा संस्कार आहे ते तसे लावले म्हणूनच दिर्घायूष्य प्राप्त होते असे नसावे एखाद वेळेस लावायचे राहीले म्हणून मृत्यू होत नाहीत. यात अंध-विश्वास नाही आणि केवळ कुंकू लावण्याची संस्कार संस्कृती जपली जाते आहे आणि अंधविश्वास नसेल तर त्यात अंधविश्वास निर्मूलनवाल्यांनी लक्ष घालू नये या विचाराशी सहमत आहे.

चमत्कारांचा उद्देश्य लोकांना सत्य आणि धर्माच्या रस्त्यावर चालण्याची प्रेरणा देणे असतो. ह्या कथा वाचून कोणी हि अंधविश्वासी बनत नाही किंवा भोंदू बाबांच्या जाळ्यात हि अटकत नाही.
पहीले वाक्य 'कथांचा उद्देश लोकांना सत्य आणि नैतिकतेच्या रस्त्यावर चालण्याची प्रेरणा देणे असतो' हे कदाचित अधिक उचित असेल. जोपर्यंत कथेत सांगितले तेच सत्य आहे किंवा नैतिकतेचा तोच एकमेव मार्ग आहे या बद्दल टोकाचे अट्टाहास नसतील तर सत्य आणि नैतिकतेच्या रस्त्यावर चालण्याची प्रेरणा देणे हा कथेतील नॅरेटीव्हच्या उद्देश्यास हरकत आहे असे नाही. प्रत्येक कथेच्या नॅरेटीव्ह अथवा चमत्कारांना व्यक्ती खरे धरुन टोकाचे आग्रह करतात असे नव्हे पण बालवयापासून ऐकल्यामुळे अथवा सामाजिक प्रभावाने अबकड कथेतील सत्य / नैतिकता / चमत्कार हा खराच आणि एकमेव आहे ह्या बद्दल अंध-विश्वास आणि टोकाचे आग्रह आढळतात जे बर्‍याच वेळा पुढील चर्चांचे मार्ग बंद करतात केवळ मटेरील बेनीफीट नव्हे तर इतर कारणांनीही टोकाचे आग्रह लावून धरले जाताना दिसतात ज्याची व्यक्ती आणि समाजासाठी किंवा देशासाठी दिर्घ कालीन अनिष्ट परीणामही होताना दिसतात किंवा कसे ? मग अंध-विश्वास निर्मूलनार्थ प्रचार करणार्‍याने अशा कथांचा उहापोह करावा की नको. (अर्थात मी इथे कुचेष्टेचे समर्थन करत नाही त्याच वेळी प्रसंगपरत्वे कठोर टिकेचे स्वातंत्र्याचे समर्थन करतो, अर्थात लोक कठोर टिकेला नव्हे तुमचा अल्टरनेटीव्ह मध्ये काय सकारात्मक आहे हे सांगण्याला दाद देताता असेही वाटते.)